मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०२१

माझा होशील ना - अनामिक पत्र !




प्रति निर्माता / दिग्दर्शक,

माझा होशील ना मालिका !

महोदय,

आपली माझा होशील ना ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे ह्याबद्दल सर्वप्रथम आम्ही आनंद व्यक्त करु इच्छितो. अशा ह्या लोकप्रिय मालिकेच्या आमच्या व्यवसायांना  महत्वाचं स्थान मिळाल्याबद्दल आम्ही प्रारंभीस आनंदित झालो होतो. परंतु जसजशी मालिका पुढं प्रवास करत गेली तसतसं ह्या मालिकेत केल्या गेलेल्या आमच्या व्यवसायांच्या विपर्यस्त चित्रणामुळं आम्ही व्यथित झालो असुन आमची व्यथा ह्या पत्राद्वारे आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत. 

१) बाऊन्सर्स - ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर बाऊन्सर्सचा मारा करुन त्यांना जायबंदी केलं होतं. जरी त्या बाऊन्सर्सचा आणि आमचा बादरायण संबंध नसला तरी काही अज्ञानी लोकांनी त्या दौऱ्यापासून आमच्याकडं संशयानं पाहण्यास सुरुवात केली. त्यामुळं आम्ही आधीच दुःखी मनःस्थितीत होतो.  त्या व्यथेत ह्या मालिकेने भर घातली आहे. 

अ - आदित्यला आम्ही व्यवस्थित चोप दिल्यावर सुद्धा तो केवळ दोन दिवसांच्या त्याच्या मामांनी केलेल्या घरगुती उपायानंतर पुन्हा सईचा नाद धरतो हे केवळ अशक्य आहे. प्रत्यक्ष जीवनात आम्ही चोप दिल्यानंतर असे आशिक किमान आठवडाभर इस्पितळात राहतात. त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. पण ह्या मालिकेतील चित्रीकरणानंतर काही मजनु मंडळींचा आत्मविश्वास उगाचच बळावून त्यामुळं त्यांच्यावर असा दुर्धर प्रसंग ओढवला तर त्याची नैतिक जबाबदारी आपली राहील. 

त्याचप्रमाणं ही बाहयकरणी बलदंड दिसणारी मंडळी फक्त इतकाच चोप देऊ शकतात हे पाहुन ह्या व्यवसायात येऊ पाहणारी होतकरी मंडळी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करु लागतील. त्यामुळं ह्या व्यवसायाला कदाचित योग्य मंडळींचा तुडवडा भासु शकतो. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला जबाबदार कोण? आम्ही काय त्या डॅडू आणि मामा लोकांना बाऊन्सर्स म्हणून घ्यावं काय?

ब - ज्याप्रमाणं आदित्य आणि त्याच्या बाजुच्या अनाहुत पाहुण्यांनी मालिकेतील बाऊन्सर्स उपस्थित असताना देखील लग्नमंडपात प्रवेश केला त्या प्रसंगात बाऊन्सर्सच्या बौद्धिक क्षमतेवर अप्रत्यक्षरित्या आघात करण्यात आला आहे अशी आमची भावना झाली आहे. त्या मामाची पंजाबी बायको काहीही बरळते आणि बाऊन्सर्स तिला आत जाऊ देतात. हे केवळ अस्वीकारणीयच नव्हे तर सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे. अशा चित्रीकरणामुळं आम्हांला भविष्यात मिळणाऱ्या व्यावसायिक संधींवर मर्यादा येऊ शकतात ह्याची आपल्याला जाण आहे काय? 

२) डॉक्टर्स - सुयशला डॉक्टर दाखवुन आमच्या व्यवसायाचा घोर अपमान करण्यात आला आहे. मालिकेला आता एक वर्ष होईल. ह्या तथाकथित डॉक्टरने एक वैद्यकीय संज्ञातरी व्यवस्थित उच्चारली आहे का ह्याचा खुलासा आम्ही तुमच्याकडं मागत आहोत? कोणताही डॉक्टर आपल्या होणाऱ्या किंवा झालेल्या बायकोसाठी इतका वेळ देऊ शकत नाही ही सत्यपरिस्थिती असताना ह्या बोगस डॉक्टरनं एक पुर्ण वर्ष सईच्या मागे धावण्यात वाया घालवलं आहे.  वर्ष वाया घालवलं तर घालवलं आणि तरीही त्याला सई मिळाली नाही. जर तुमचे गुन्हे आम्ही माफ करावेत असं तुम्हांला वाटत असेल तर तुमच्या कथानकात योग्य फेरफार करुन सुयशला न्याय मिळवुन द्यावा अशी आमची मागणी आहे. नाहीतर भविष्यात ह्या व्यवसायाकडं वळणाऱ्या मराठी युवकांची संख्या कमी होऊन त्यासाठी आपण सर्वस्वी जबाबदार असाल ! 

३) वेटर - सुयशने ज्या प्रमाणात मालिकेत खलनायकपणा केला आहे ते पाहता त्याला वेटरचा ड्रेस घालु देणे हे योग्य नव्हे. त्यामुळं आमच्या व्यवसायाची प्रतिमा काही प्रमाणात मलीन झाली आहे. आणि तो मामा वेटर बनुन जो गोंधळ घालतो ते कसे काय शक्य आहे? असा कोणीही ऐरागैरा माणुस वेटरचे रुप नाही घेऊ शकत?

४) खानसामा / घोडेवाला - आम्ही आमची निष्ठा पुर्णपणे नवरा मुलगा आणि त्याच्या कुटुंबाप्रती वाहिलेली असते. ह्या मालिकेत आम्ही नवऱ्या मुलाच्या लग्नात अडथळे आणतो हे जे काही चित्रीकरण करण्यात आले आहे ते चुकीचे आहे आणि त्याचा आम्ही निषेध करतो.  

आमच्या ह्या तक्रारींची योग्य दखल घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करत आहोत. नाहीतर उद्या १४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सई आणि आदित्यच्या लग्नात आम्ही मोर्चा काढु असा निर्वाणीचा इशारा आम्ही देत आहोत. 


आपले निषेधकर्ते 

बाऊन्सर्स / डॉक्टर्स /  वेटर्स / खानसामा / घोडेवाला

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

वो सिकंदर ही दोस्तो कहलाता हैं !


एखाद्या देशाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यातील वर्षागणिक कामगिरीचा आलेख अभ्यासणे हा एक सखोल अभ्यासाचा विषय असु शकतो. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज हे संघ १९७० च्या सुमारास बलाढ्य मानले जाणारे संघ होते. परंतु १९९० च्या दशकात वेस्ट इंडिजच्या संघाच्या कामगिरीस जी उतरती कळा लागली त्यातुन तो संघ अद्याप सावरु शकला नाही. त्या बेटांवरील तरुण बहुदा बास्केटबॉल सारख्या पर्यायी खेळांच्या किंवा इतर पर्यायांच्या मागे लागले असावेत असा एक विचारप्रवाह आहे. संगकारा आणि जयवर्धने ह्यांच्या निवृत्तीनंतर सुरु झालेला श्रीलंका संघाचा संघर्ष सुद्धा काहीसा असाच! कदाचित ह्यामागे स्थानिक क्रिकेटच्या दर्जात झालेली घसरण ह्यासारखी वेगळी कारणंअसावीत. देशांतर्गत अशांततेचा फटका पाकिस्तानच्या कामगिरीला बसला आहे. दक्षिण आफ्रिकेतील काही धोरणामुळं त्या देशातील काही गुणवान खेळाडूंनी इंग्लिश कौंटी क्रिकेटचा रस्ता धरला. kolpak deal ह्यावर थोडा शोध घेऊन पहा !

आता वळूयात ऑस्ट्रेलिया संघाकडे! ह्या संघाचा बलाढ्य गुणांक काही प्रमाणात घसरणीला लागला आहे! त्यांच्या संघाचे सरासरी वय पाहिलं तर ते तिशीच्या पलीकडं आहे. पुर्वीही हे असंच असायचं पण हे तिशीपल्याडचे खेळाडू त्यावेळी रथी - महारथी बनलेले असत. सध्याचे तिशीपलीकडील हे खेळाडु अजुनही आपल्या संघर्षाच्या कालावधीतच अडकुन बसलेले आहेत. ऑस्ट्रेलियन तरुण खेळाडु भारतीय युवा खेळाडूंच्या तुलनेनं अजुनही प्राथमिक शाळेत आहेत असे परवा ग्रेग चॅपल म्हणाला ते उगाच नव्हे! चौथ्या सामन्यात भारतानं एक अत्यंत रोमहर्षक विजय मिळविला त्यावेळी एकंदरीत सामन्यातील ऑस्ट्रेलियाच्या खेळाचे वर्णन त्यांचे काही माजी खेळाडु unaustralian  असे करत होते. पुर्वीचा तो आत्मविश्वास, ती मग्रुरी, तो एक जगज्जेत्याचा आविर्भाव कुठंतरी नाहीसा झाला आहे! कसोटी क्रिकेटमध्ये तर नक्कीच ! भारतीय मालकांच्या IPL संघातुन खेळण्याचा ह्यात किती हातभार हे देव जाणो !

ह्याउलट भारतातील परिस्थिती आहे ! इथं क्रिकेटने अगदी व्यावसायिक रुप धारण केले आहे. भारतीय खेळाडूंची तंदुरुस्ती, मनोबल ह्यात गेल्या काही वर्षात लक्षणीय सुधारणा झाली आहे. रणजी, दुलीप करंडकांचे सामने ह्यावर लक्ष देणारा जाणता वर्ग अजुनही अस्तित्वात आहे. क्रिकेटच नव्हे तर एकंदरीत परंपरांचे जतन करणाऱ्या विनायक पंडित, रोहन गुरव ह्यांच्यासारख्या मंडळींचे कौतुक करावं तितकं थोडकं ! स्थानिक सामन्यांच्या वेळी जाणवणारी राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांची उपस्थिती नक्कीच सुखावणारी असते! अशाने होतं काय की आंतरराष्ट्रीय संघांसाठी नवीन खेळाडूंचा सदैव पुरवठा होत राहतो! ह्या  स्वप्नाच्या मागे लागुन किती युवक आपल्या करियरचा बळी देत असतील हा वेगळा मुद्दा ! भारतातील जे गुणवान खेळाडु जसे की पुजारा, विहारी आणि आता अजिंक्य ज्यांना IPL मध्ये संधी मिळत नाही, पण ज्यांच्या कसोटी क्रिकेट खेळण्याच्या क्षमतेमुळं भारताची मान जगभर उंचावली जाते अशा मंडळींना विशेष मोबदला मिळायला हवा! 

आपण चौथ्या कसोटीत ज्या अनुनभवी गोलंदाजांचा संच घेऊन खेळलो आणि तरीही विजय मिळवला हा एक चमत्कारच म्हणायला हवा ! सिराज,  शार्दुल, नटराजन, वॉशिंग्टन ही मंडळी सातत्यानं मारा करत राहिली. शेवटपर्यंत त्यांनी जिद्द सोडली नाही! कोणतीही एक भागीदारी विशिष्ट मर्यादेपेक्षा मोठी न होऊ देण्याची कामगिरी ह्या मंडळींनी बजावली! खरंतर आपली पहिली पसंती असलेले उमेश अथवा सध्याचा इशांत ह्यापेक्षा नक्कीच नव्या दमाचे गोलंदाज खेळविणे केव्हाही इष्ट ! भारतभर आपल्या काहीशा उर्मट स्वभावानं प्रसिद्ध झालेल्या रवी शास्त्रीला ह्या भारतीय संघात निर्माण झालेल्या जिद्दीचा किती वाटा द्यावा हा प्रत्येक क्रिकेट रसिकाने सोडविण्याचा आपापला प्रश्न !

चौथ्या सामन्यातील कलाटणी देणारा एक महत्वाचा क्षण म्हणजे वॉशिंग्टन आणि शार्दुल ह्यांची पहिल्या डावातील एक मोठी भागीदारी ! ज्या सहजतेनं ह्या दोघांनी फलंदाजी केली त्यामुळं भारतीय संघाच्या मनोबलात कमालीचा फरक पडला आणि चौथ्या डावात भारतापुढं नक्की किती आव्हान ठेवावं ह्याबाबत ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या मनात काहीसा संभ्रम निर्माण करण्याचं काम ह्या भागीदारीने केलं ! पाचव्या दिवसाच्या खेळपट्टीवर शुभनम आणि रिषभ ह्यांनी केलेली फलंदाजी पुढील कित्येक दशके भारतीय क्रिकेट रसिकांच्या चर्चेचा विषय बनुन राहील ! शुभनमने ह्या मालिकेत ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यामुळं भारतीय फलंदाजीच्या उज्ज्वल भविष्यकाळाची स्वप्ने रसिकांना पडु लागली आहेत ! 

ऑस्ट्रेलिया संघाचं नक्की काय चुकलं? 

१) पेन ही कर्णधार म्हणुन नक्कीच चुकीची निवड असे मला वाटत राहिले आहे. संघाला स्फुरण देऊन त्यांच्याकडुन स्फूर्तिदायक कामगिरी करुन घेण्यात त्याला कमालीचं अपयश आलं ! खरंतर स्मिथ हाच ह्या संघाचा कर्णधार असायला हवा होता. पण अधुनमधुन काही बेजबाबदार वर्तवणुक करुन त्यानं आपल्या प्रगल्भतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत. 

२)गोलंदाजांची निवड हा सुद्धा त्यांच्यासाठी कळीचा मुद्दा ठरला. स्टार्कच्या कामगिरीविषयी आणि एकंदरीत भवितव्याविषयी  प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुर्णवेळ IPL खेळल्यामुळे कमिन्स चौथ्या कसोटीपर्यंत नक्कीच दमला होता. सिडनीत पाचव्या दिवशी ह्या सर्वांना अश्विन आणि विहारीने खुपच दमविलं होतं. तेही भारताच्या पथ्यावर पडलं. आणि शेवटी तुम्ही एकदा का तिशीच्या पलीकडे गेलात की एक वेगवान गोलंदाज म्हणुन तुमच्या कामगिरीत नक्कीच फरक पडतो ! 

३) वेड, ग्रीन, पेन ही मंडळी केवळ सरासरी / साधारण खेळाडु म्हणुन मालिकाभर वावरली.  स्टिव्ह वॉ, मकग्राथ, क्लार्क, पॉईंटिंग सारख्या खेळाडूंची उंची त्यांना गाठता आली नाही. प्रतिस्पर्ध्याला नॉक आऊट पंच देण्याचं एक शास्त्र असतं ते ह्या मंडळींना अजुन आत्मसात करायचं आहे.  भारतीय संघ सदैव सामन्यात आपलं आव्हान टिकवुन राहिला. त्यामुळं गोलंदाजांवर सदैव काहीसा दबाव राहिला. 

४) वरकरणी पाहता आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाने ऍडलेडचा अपवाद वगळता वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशा खेळपट्ट्या बनवल्या नाहीत. मेलबर्न सारख्या ठिकाणी तर हल्ली ड्रॉप इन पिचेस वापरली जातात. त्यामुळं वेगवान गोलंदाजांच्या धारदारतेत काहीशी उणीव निर्माण होते. कदाचित मुळ भारतीय गोलंदाजीचा संच पाहुन ऑस्ट्रेलियाने सुद्धा कदाचित धसका घेतला असावा. 

आपल्याकडे सुद्धा सर्व काही आलबेल आहे असं नाही. पंतचा झेल सुरुवातीलाच घेतला गेला असता तर चित्र कदाचित वेगळं दिसलं असतं आणि कदाचित ही पोस्ट लिहली सुद्धा गेली नसती! पण जर तरला अर्थ नसतो असं म्हणतात ते उगीच नाही ! ज्या प्रमाणात, ज्या प्रकारे भारतीय खेळाडु संबंध मालिकाभर जायबंदी होत राहिले ही स्वीकारणीय बाब नव्हती. ह्या खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी जी जबाबदार मंडळी आहेत त्यांना ह्याचा नक्कीच जाब विचारायला हवा ! भुवनेशकुमार आठवतो का तुम्हांला ? हा गडी एक सामना खेळला की पुढील दहा सामने अनफिट असतो ! 

जाता जाता विराट की अजिंक्य ? सध्या सर्वांनी अजिंक्यचे गुणगान करावेत असा माहोल आहे. विराटच्या बाजुनं बोलायचं झालं तर ह्या संघात जी विजिगिषु वृत्ती आहे त्याचं बऱ्याच प्रमाणात श्रेय त्याला जातं. पण आता नक्कीच इंग्लंडविरुद्ध मायभूमीवर होणाऱ्या मालिकेत एक कर्णधार म्हणुन त्याच्या कामगिरीकडे सर्वजण बारीक लक्ष ठेवून असणार ! वेगळ्या दृष्टीनं विचार करायचा झाला तर त्या ऍडलेडच्या सर्वबाद (शमी बाद ) ३६ धावांसोबत मालिकेतील भारतातील सर्व दुर्दैवांची मालिका सुद्धा संपली. त्यानंतर बऱ्याच गोष्टींत नशिबानं आपल्याला हात दिला.  म्हणायला गेलं तर ब्रिस्बेन इथं दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला पावसाच्या शक्यतेचा विचार करुन काहीसा आक्रमक खेळ करावा लागला. जर पुर्ण दोन दिवसाचा खेळ होणार आहे हे त्यांना माहिती असतं तर कदाचित त्यांनी आपल्या डावाची आखणी वेगळ्या प्रकारे केली असती ! 

असो एका संस्मरणीय मालिका विजयाची नोंद भारतीय संघानं केली! शेवटी एक खरा क्रिकेट चाहता खेळाकडुन काय अपेक्षा ठेवून असतो? तर मधुर स्मृतींचा ठेवा ! ह्या मालिकेने ह्या मधुर स्मृती भरभरुन दिल्या! आणि अगदीच दृष्ट लागायला नको म्हणुन ऍडलेडच्या त्या सर्वबाद ३६ चा तीटसुद्धा लावला ! 

मालिकेतील दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यांवरील पोस्टच्या ह्या लिंक्स ! 

तिसरी कसोटी 

दुसरी कसोटी 




गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

सिडनी टेस्ट - सहेला रे ते सहना रे !



चांगला मुड असला की कधीतरी मी शास्त्रीय संगीत ऐकतो. त्यातील खरं तर मला काही कळत नाही.तरीही ते ऐकताना प्रचंड छान वाटतं. किशोरी आमोणकर यांची सहेला रे आणि प्रभा अत्रे यांची जमुना किनारे मोरा गाव सावरे ...या रचनांपासुन सुरुवात करुन मग यु ट्युबच्या artificial intelligence च्या मी अधीन होतो. ह्या जाणकार गायिका ह्या स्वर्गीय रचनांद्वारे आपल्याला एका शब्दांपलीकडच्या  विश्वात घेऊन जातात.  एकेक रचना तासभर सुद्धा चालु राहते. मोजके शब्दच, वारंवार येत राहणारे! पण प्रत्येकवेळी त्यांच्या उच्चारात, सादरीकरणात वैविध्य असतं. जितका अधिक पट्टीचा कलाकार तितकी त्याची / तिची ह्या विशिष्ट शब्दरचना खुलवण्याची क्षमता जास्त! क्षमतेचा कलाकार आणि सोबतीला जाणता श्रोता असला की मैफिलीला रंग चढतो.

हँझलवुड, बुमराह अथवा कमिन्स ही मंडळी तासनतास आँफ स्टंपच्या बाहेर मारा करत रहातात वा करु शकतात. वरवर पाहता हे सर्व चेंडू आँफ स्टंपच्या बाहेर ह्या वर्गात मोडतात, पण त्यातला खरा फरक समोर उभ्या असलेल्या शुभनम अथवा रोहितलाच समजु शकतो. प्रत्येक चेंडूवर बळी मिळायलाच हवा असा आग्रह नाही. हळुवारपणे फलंदाजांना आपल्या जाळ्यात पकडण्याची कला म्हणजे कसोटी क्रिकेट. आँफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूपैकी काही झपकन आत शिरणारे, काही नाकासमोर बघत सरळ जाणारे तर काही फलंदाजांना मोहात पाडत हळुवारपणे बाहेर पडणारे ! शास्त्रीय संगीतातील जागांप्रमाणे ह्या सुद्धा गोलंदाजाच्या आपल्या जागा असतात. 

आधुनिक काळात End Result ला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे असं आपल्याला सदैव वाटत राहतं, जसं की परीक्षेतील गुण, एखाद्या कंपनीने मिळवलेला नफा ! हा अंतिम निर्णय जरी महत्त्वाचा असला तरी दीर्घकालीन विचार केला तर अंतिम निर्णय काय मिळाला ह्याइतकेच किंबहुना त्यापेक्षा किंचित अधिक तो कसा मिळविला गेला ही बाब महत्त्वाची ठरते. सातत्याने यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे योग्य तंत्र, नैतिक मार्गाने वाटचाल करण्याची प्रबळ इच्छाशक्ती वगैरे घटक महत्त्वाचे ठरतात. कसोटी क्रिकेट म्हणा किंवा शास्त्रीय संगीत म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला जीवनाविषयी खूप काही शिकवतात. अनिर्णित सामना हा लौकिकार्थाने विजय नाही पण सिडनीचा पराकाष्ठेने अनिर्णित ठेवलेला सामना अनेक विजयांपेक्षा रसिकांच्या ह्दयात वरच्या स्थानावर राहील. 

मागच्या पिढीतील अनेकांनी वसई विरार सारख्या लांबवरच्या भागातून चर्चगेटला येऊन आयुष्यभर नोकरी केली. पगार काही आताच्या पिढीइतका आकर्षक नसला तरीही त्यांनी एक शिस्तबद्ध आयुष्य जगण्यात, संस़्कारक्षम अशी दुसरी पिढी घडविण्यात आपल्या आयुष्याचे सार्थक मानलं. चर्चगेट स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकलमध्ये उडी मारुन पटकावलेली विंडो सीट दिवसातील समाधानाचा एक क्षण म्हणुन  त्यांना पुरेशी होती. गलेलठ्ठ बचत बँकेत नसली तरीही समाधानाची पुरेशी पुंजी त्यांनी बाळगली. कसोटी क्रिकेटसुद्धा काहीसं असंच! झटपट लोकप्रियता मिळवुन देणारं हे माध्यम राहिलं नाही, पण समाधान मात्र भरभरुन देऊ शकतं !

काही महिन्यांपूर्वी मी विहारी आणि पुजारावर एक पोस्ट लिहली होती. वर्षातील बहुतांश वेळ भारतीय संघापासुन दुर रहात एकट्याने सराव करणं, वर्षात पंधरा वीस मिळणाऱ्या फलंदाजीच्या संधीचं मोल करणं ह्यासाठी मोठा मनाचा निग्रह लागतो. हे दोघे तो भरभरून दाखवतात, आता त्यात अश्विन सुद्धा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

अजून एक गोष्ट! फलंदाज म्हणून अजिंक्य ह्या कसोटीवर आपला फारसा ठसा उमटवु शकला नाही पण त्याच्यासाठी संघातील प्रत्येकाने शत प्रतिशत योगदान दिले. मी घाईघाईने अनुमान बांधणार नाही पण कर्णधार असो वा व्यवस्थापक असो, जो आपल्या संघसदस्याला व्यक्त होण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक देतो त्याच्यासाठी सदस्य जिवापाड मेहनत करण्यास तयार असतात हा नेहमीचा अनुभव असतो

आँस्ट्रलियानं आपला दुसरा डाव सहा गडी बाद असतानाच घोषित केला होता. डाव घोषित कधी करावा ही कसोटी क्रिकेट मधील एक खास जागा ! कधी उगाचच डाव लांबविला असा दोष कप्तानाच्या माथी येऊ शकतो तर कधी उगाचच आक्रमकता दाखवली जाऊन सामना गमावण्याची वेळ येऊ शकते. दोन कसोटीआधी ज्या संघाला छत्तीस धावांत गारद केले त्यांच्यापुढे तीनशे साडेतीनशेच्या पलीकडे लक्ष्य ठेवण्यात काय हशील आहे असा विचार नक्कीच पेनच्या मनात आला असणार. पण त्यांनं अँडलेड आणि सिडनीच्या खेळपट्टींमधला फरक बरोबर जाणला. जर तर ला खरोखरच अर्थ नसतो. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रोहितला हुकचा फटका मारून बाद होण्याची दुर्बुद्धी झाली नसती तर किंवा पंत अजून तासभर टिकून राहिला असता तर चारशेचे लक्ष्य चौथ्या डावात सुद्धा सहज गाठले असते असं ज्याप्रमाणे आपल्याला वाटु शकतं त्याचप्रमाणे पेनने मोक्याच्या क्षणी झेल सोडले नसते तर विजय आँस्ट्रलियाच्या अगदी समीप होता. धावफलक फसवा असतो, त्यानं भारतानं दुसऱ्या डावात केवळ पाचच बळी गमावले असं दाखवलं असलं तरी जाडेजा जायबंदी होता आणि त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी कमिन्स आणि मंडळींना बहुधा सात आठ षटके पुरेशी ठरु शकली असती. हे लक्षात घेतलं तर अश्विन आणि विहारी ह्यांच्या खेळीचं महत्व ध्यानात येतं. 

Sledging मुळे प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक प्रमाणात आपले नुकसान होऊ शकते हा धडा जरी पेनला जरी मिळाला असला तरी आजच्या काळात आपण सर्वांनी तो लक्षात घेण्यास काही हरकत नसावी. आपले काम योग्य प्रकारे करत रहावे, उगाचच दुसऱ्याला चुका करायला भाग पाडण्यासाठी आपली शक्ती वाया घालु नये. 

ज्या क्षणी सामना अनिर्णित घोषित झाला त्यावेळी विहारीने शर्ट काढून गोलगोल फिरवला नाही किंवा अश्विनने पेनला शेलक्या शब्दांत चार गोष्टी सुनावल्या नाहीत. हे सारं करण्यासाठी त्यांच्या अंगी त्राण उरलं नव्हतं हे जरी खरे असले तरी एरव्ही सुद्धा त्यांनी हे अजिबात केलं नसतं. Cricket is a Gentleman's Game ह्या उक्तीवर विश्वास ठेवणारी ही मंडळी !

भारतीय खेळाडूंनी ह्या सामन्यात जी जिद्द दर्शवली त्याला तोड नाही.  विहारी, पुजारा, अश्विन, जडेजा ह्यांनी आपल्या जखमांची / दुखापतींची पर्वा केली नाही. एकशेचाळीसच्या वेगानं सातत्यानं तुमच्या अंगावर फेकले जाणारे चेंडूचा सामना करत असताना आपल्या एकाग्रतेत भंग होणं खरं तर स्वाभाविक! पण त्यांनी आपल्या विकेटला खुप जपलं. पंत हा एक विवादाचा मुद्दा बनला आहे. त्यानं सोडलेल्या झेलांची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागली. पण चौथ्या डावात आक्रमणाच्या पुर्ण तयारीत असणाऱ्या चार ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्याचं धाडस ह्या पट्ठ्यानं दाखवलं. 

खेळपट्टी बनविणाऱ्या अनामिकाला सुद्धा अभिवादन ! पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राच्या शेवटापर्यंत खेळपट्टी उत्तमरित्या टिकली. केवळ फलंदाजांना धार्जिणी अशी ही खेळपट्टी नव्हती, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना ह्या खेळपट्टीनं पुरेसं साहाय्य केले. 

आता थोडं प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या कामगिरीविषयी! स्मिथ आणि लाबूशेन ह्यांनी एकदा का खेळपट्टीवर जम बसविला का गोलंदाजांची खैर नसते. विशेषतः भारतीय गोलंदाजांची ! स्मिथचा फलंदाजीचा पवित्रा, काही फटके विशेष प्रेक्षणीय नसले तरी धावांची टांकसाळ उघडण्यात तो माहीर आहे. लाबूशेन हा भविष्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा भार समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहील ह्याविषयी शंका नाही. बाकी कमिन्स, हॅझलवूड ही गोलंदाज मंडळी प्रचंड गुणवत्ता बाळगणारी! त्यांच्यासमोर एखादा चेंडु खेळायला मिळावा अशी इच्छा मी बाळगुन आहे. स्टार्क बहुदा आता उतरणीला लागला असावा असा माझा कयास आहे. वॉर्नरला ह्या सामन्यात आपला खास प्रभाव दाखवता आला नाही. 

एकंदरीत जुन्या मुल्यांवरील विश्वास पक्का करणारी ही कसोटी ! पैशाचा बाजार मांडणाऱ्या IPL मुळे संघातील महत्त्वाच्या खेळाडुंच्या फिटनेसची काय वाताहात झाली आहे हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतच आहोत. आखातात घाईघाईनं IPL  भरविण्यात काय अर्थ होता हा प्रश्न विचारण्याची हिंमत अथवा इच्छाशक्ती कोणीच दर्शवली नाही, दोन महिन्यांपुर्वी मांडला गेलेला हा बाजार पुन्हा एप्रिलमध्ये मांडला जाईल. पण ह्या दोन बाजारांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांचा अगदी रसिकतेने आनंद लुटूयात. फलंदाजाला बाद करण्यासाठी पहिल्याच चेंडूत याँर्करच टाकायला हवा असे नाही, त्याला तीन चार उसळते चेंडू टाकून, मनात धडकी भरवुन मग अचानक याँर्कर टाकून त्याला बाद करता येऊ शकते. गोलंदाजाला सतत चौकार, षटकार मारणे आवश्यक नाही तर नवा चेंडू तासभर खेळून काढून मग दमलेल्या गोलंदाजाला नंतर नामोहरम करता येतं हे मोलाचे धडे कसोटी क्रिकेट आपल्याला शिकवतं. हे सारे धडे वरवर पाहता कदाचित समजणार नाहीत,. त्यासाठी खोलवर जायला हवं. आयुष्यात सुद्धा असंच असतं नाही! सारं काही एका समाधानी आयुष्यासाठीचे आवश्यक घटक ! Long live Test Cricket !

रविवार, ३ जानेवारी, २०२१

Have you been to Tristan da Cunha?

 


जगातील सर्वात दुर्गम किंवा बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन दुर असलेली अशी मानवी वसाहत कोणती असावी असा शोध माहितीजालावर ह्या आठवड्यात घेतला. असा शोध घेण्याचा विचार माझ्या मनात का यावा असा प्रश्न निरर्थक आहे. असा शोध घेतला असता Tristan da Cunha हे नाव पहिल्या पाच नावांत येतं. बाकीच्या वसाहतींपेक्षा ही वसाहत खास लक्षवेधक ठरली ती बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन तिच्या असलेल्या दूरवर अंतरामुळं ! दक्षिण अटलांटिक महासागरात असलेलं हा ज्वालामुखीने निर्मित बेटांचा समुह आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन  शहरापासुन साधारणतः २३०० किमी अंतरावर, सेंट हेलेनपासून २१०० किमी अंतरावर आणि फॉकलँड बेटांपासून ३४०० किमी अंतरावर असणारा हे बेटांचा समुह ! आता फॉकलँड बेटं अर्जेंटिना आणि इंग्लंड ह्यांच्यात कधीकाळी झालेल्या युद्धामुळे माहिती आहेत, पण सेंट हेलेनचा संदर्भ कशासाठी तर ज्ञात मनुष्यवस्तीच्या कोणत्याही बिंदुपासुन हा बेटांचा समुह दूर आहे आणि तिथं गुण्यागोवींदाने मनुष्यवस्ती नांदत आहे ह्या साठी ! ह्या बेटांवर उतरण्यासाठी धावपट्टी अस्तित्वात नाही. त्यामुळं बाकीच्या पृथ्वीवासीयांशी संपर्क साधायचा असेल तर दक्षिण आफ्रिकेपासून सहा दिवसांच्या बोटीच्या प्रवासाव्यतिरिक्त पर्याय नाही. आणि लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे वर्षातुन केवळ नऊ वेळा ह्या बोटीच्या प्रवासाचा पर्याय उपलब्ध असतो. ह्या बेटांचा शोध कसा लागला आणि विविध शतकांमध्ये ह्या बेटाला धाडशी खलाशांनी कशी भेट दिली ह्याची मनोरंजक माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहेच पण ह्या बेटांच्या वेबसाईटवर तुम्हांला इथल्या रहिवाशांविषयी, ह्या बेटांच्या समुहातील प्रत्येक बेटाविषयी, इथं कसं यायचं ह्या सर्वांची इत्यंभुत माहिती मिळु शकते. सध्याची लोकसंख्या २४४ आहे आणि बेटांवर नवीन रहिवाशांना कायम वास्तव्याचा पर्याय उपलब्ध नाही. एक पर्यटक म्हणुन तुमचं स्वागत नक्कीच आहे. पण ज्या बोटीनं आलात त्या बोटीनेच बहुदा परतावं लागतं. 

पोस्टचा खरा विषय वेगळाच आहे! अशा बेटांवर जगण्याचा अनुभव कसा असावा? जगाची सध्याची लोकसंख्या जवळपास ७८० कोटी. त्यातील फक्त २४४ लोकांपैकी आपण एक ही भावना कशी असावी? बाकीच्या ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपासुन आपण दुरावले गेलो आहोत. जगाची प्रगती किती वेगानं होतं आहे आणि आपण मात्र असेच ! आपली मुलंसुद्धा प्रगतीपासुन वंचित राहणार! मनोरंजनाची मोजकी साधने, एकमेव पब वगैरे वगैरे ! आता हा दृष्टिकोन (Point of View) खरोखरी तिथल्या लोकांचा की त्यांच्यापासुन हजारो मैलांवर जगातील सर्वांत गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या शहरात आपलं बहुतांशी आयुष्य व्यतित करणाऱ्या आदित्यचा ? बहुदा केवळ आदित्यचा !

यु ट्युबवर ह्या बेटावरील एका तरुणाची मुलाखत पाहिली. ही बेटं इंग्लंडशी संलग्न! त्यामुळं बहुदा शिक्षणासाठी वगैरे ह्यातील काही तरुण मंडळी इंग्लंडला वगैरे जात असावी ! पण ह्या तरुणाला इंग्लंडमधील नियमांनी बांधलेलं जीवन आवडलं नव्हतं ! माझं स्वातंत्र्य मी तिथल्या वास्तव्यात गमावुन बसलो असा काहीसा त्याच्या बोलण्याचा सूर वाटला ! त्यानंतर  Tristan da Cunha  संबंधित काही व्हिडीओवरील टिपण्णी वाचल्या. भौतिकसुखाच्या मागे लागलेल्या त्या बहुतांशी ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपेक्षा ह्या शांत जीवन जगणाऱ्या २४४ लोकांपैकी एक बनायला मला आवडलं असतं असे बरेच लोक म्हणताहेत ! पण आता दोन आठवड्याच्या सुट्टीनंतर ज्या स्थितीत मी आहे त्यावरुन मला तरी Tristan da Cunha चे वास्तव्य जमलं नसतं असं वाटतंय. Tristan da Cunha जमायला तुम्ही बहुदा तिथंच जन्म घ्यायला हवा ! पुढील जन्म Tristan da Cunha वर होवो हे मागणं परमेश्वराकडे मागावं की नाही ह्याचा आज विचार करतोय !

मुलभूत गरजा पुर्ण झाल्यानंतर काही न करता जर माणसाला स्वस्थ बसता आलं तर मनुष्य बराच सुखी होऊ शकतो असं कधीतरी वाचलं होतं. हा काही न करता स्वस्थ बसु शकण्याचा  प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असु शकतो. काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्षे आणि कदाचित पुर्ण आयुष्यभर ! ह्यात आपण काय कमावतो आणि काय गमावतो ? शेवटी हिशोब शुन्यच असतो ! 

प्रेम धवन ह्यांचं १९७० च्या पवित्र पापी चित्रपटातील गाणे ह्या निमित्तानं आठवलं. "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं बहुत दुर बहुत दूर चला !" त्यांना जर Tristan da Cunha माहिती असतं तर कदाचित त्यांनी "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं Tristan da Cunha चला !" अशी शब्दरचना केली असती ! आणि खट्याळ किशोरकुमार ह्यांनी तिला नक्कीच उचित न्याय दिला असता !

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

अजिंक्य - एक संस्मरणीय विजय !

 


कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी, सूर्याजी ह्यांनी आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांच्या साथीनं रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हल्ला केला.  तानाजी आणि उदयभान ह्यांच्यात निकराची लढाई होऊन त्या दोघांचाही मृत्यू होतो. आपला सेनापतीच धारातीर्थी पडला हे पाहुन मावळे पळू लागतात. भावाच्या मृत्यूचं दुःख बाजुला सारुन सुर्याजी परतीचे दोर कापून टाकतो आणि मावळ्यांना सांगतो, "भित्र्यांनो पळता कुठे?  इथे तुमचा सेनापती मरून पडला आहे. मी परतीचे दोर कापले आहेत!" परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत हे कळताच मावळे मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडतात. मराठे लढाई जिंकतात आणि कोंढाणा मराठ्यांच्या ताब्यात येतो!

ऍडलेड येथे न भूतो न भविष्यती असा पराभव झाल्यावर भारतीय संघाची काहीशी अशीच परिस्थिती झाली होती. कर्णधार विराटला वैयक्तिक कारणामुळे  भारतात परतावे लागणार होते. शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यासाठी उपलब्ध नसणार होता. अशावेळी अजिंक्य रहाणेच्या डोक्यावर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट चढवण्यात आला. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर आपल्याला कर्णधार बनावं लागेल हे त्याला ठाऊक होतं पण अशा परिस्थितीत कप्तानपदाची सूत्रं हाती घ्यावी लागतील ह्याची त्यानं बहुदा कल्पना केली नसावी ! 

१९ डिसेंबरला ज्यावेळी भारतीय संघ ३६धावांत गुंडाळला जाऊन हरला त्या संध्याकाळी भारतीय संघाच्या हॉटेलमधील वातावरणाची एक क्षणभर कल्पना करून पहा! आदल्या दिवशी सायंकाळी असलेली अत्यंत मोक्याची संधी आपण गमावली होती. ज्या पद्धतीने हॅझलवूड आणि कमिन्स यांनी भारतीय फलंदाजांचा फडशा पाडला होता त्यामुळे नक्कीच भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास रसातळाला गेला असणार. अशावेळी अजिंक्य राहणेच्या मनात कोणते विचार डोकावत असणार?

आज सामना जिंकल्यानंतर त्याला एक प्रश्न विचारण्यात आला, "या सामन्यासाठी खास काय तयारी केलीस? त्याचे उत्तर मार्मिक होतं! तो म्हणाला, "नियोजनासोबत एकंदरीत आपण कसे खेळतो आणि मैदानावर कोणती वृत्ती दाखवतो यावर बरंच काही अवलंबून असतं!" कालच्या पेपरात अजून एक पत्रकाराने त्याला विचारण्यात आलेला प्रश्न नमुद करण्यात आला होता.  "सल्ला घेण्यासाठी तु विराटला फोन केलेलास का?"  अजिंक्य त्यावर उत्तरला "हा  विराटसाठी आणि कुटुंबासाठी एक खास क्षण आहे! त्यात त्याला डिस्टर्ब करणं मी उचित समजत नाही !" त्या स्तंभकाराने म्हटलं होतं, " खरंतर त्या उत्तरात मी माझ्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करीन!" असा मतितार्थ होता ! 

आता वळुयात या सामन्यात नक्की काय झालं त्याविषयी! कोणत्याही सामन्यात विजय मिळवायचा असेल तर तुमचं दैव तुमच्या बाजूस काही प्रमाणात असावं लागतं. नक्कीच ह्या सामन्यात ते भारताच्या बाजूने होतं. दैवाला त्याचं श्रेय देऊन झाल्यावर ज्या बऱ्याच जबाबदाऱ्या अजिंक्य आणि भारतीय संघाने उत्तम रितीनं पार पाडल्या त्याविषयी !
सर्वप्रथम संघातील बदल!  शुभमन गिल, रिषभ पंत, जडेजा आणि सिराज असे चार नवे खेळाडु संघात घेण्यात आले! 
शुभमन गिल - १९५ ला ऑस्ट्रेलियन संघ सर्वबाद झाल्यावर स्टार्कने पहिल्याच षटकात मयंक अग्रवालचा बळी घेतला. शुभमनने आपल्या ज्येष्ठ खेळाडूंना ३६ धावांत सर्वबाद होताना गेल्या आठवड्यात  तंबूतून पाहिलं होतं. आता मैदानात आल्यावर पहिल्याच षटकात मयंकला बाद होताना नॉन स्ट्रायकर एंडवरुन पाहिलं. सलामीचा कसोटी सामना तोही मेलबॉर्नसारख्या गौरवशाली परंपरा असलेल्या मैदानावर आणि समोर जोशाने गोलंदाजी करणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज! परंतु त्यानंतर त्यानं ज्या पद्धतीने पुजाराच्या साथीनं बाकीच्या तासभराचा खेळ खेळून काढला , त्यातही ज्याप्रकारे काही चौकार मारले ते भारतीय संघाच्या मनोबलात मोलाची भर पाडण्यात कारणीभुत होते! तुम्ही किती धावा करतात हे नक्कीच महत्त्वाचं पण त्यासोबत तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या धावा बनवता हे त्याहुन महत्वाचं ! मैदानावर त्या बावीस यार्डच्या खेळीपट्टीवर वातावरण असतं तिथं एखादा खणखणीत स्ट्रेट ड्राइव्ह फलंदाजाला फार मनोबल मिळवुन देतो! हीच खेळी त्यानं दुसऱ्या दिवशी काही काळ आणि आज विजयी धाव होईपर्यंत दाखवली, ती मोलाची होती! पहिल्या दिवशी सायंकाळी समजा भारतानं दोन- तीन बळी गमावले असते तर सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ जोमानं परतला असता. रिषभ पंत ; त्याने सामन्यात काही झेल सोडले खरे परंतु त्यानं अजिंक्य सोबत जी भागीदारी केली ती मोलाची होती. पुन्हा एकदा तुम्ही किती धावा करतात हे नक्कीच महत्त्वाचं पण त्यासोबत तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या धावा बनवता हे त्याहुन महत्वाचं ! पंतने एक सकारात्मक भुमिका आणली. 

जडेजा, पंड्या ह्या दोन्ही खेळाडुंकडे परंपरागत फलंदाज किंवा गोलंदाज यांच्या व्याख्येतून पाहिले असता त्यांना स्पेशालिस्ट म्हणून गणले जायला तज्ञ लोक सुरुवातीला तयार नव्हते किंबहुना आजही नसतील. परंतु आपण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवु शकतो हा दुर्दम्य आशावाद त्यांच्या मनात ज्या प्रमाणात ठासुन भरला आहे ते अनन्यसाधारण आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्ध आपण हरलेला उपांत्य फेरीचा सामना आठवून पहा! तिथं आघाडीचे फलंदाज अत्यंत कमी धावांत बाद झाल्यानंतर ज्यापद्धतीने जडेजा खेळला होता ते कायमचे लक्षात राहील! ह्या सामन्यातील त्याची आणि अजिंक्यची भागीदारी केली तिनं सामन्याचा कल भारताच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकवला. जाडेजाने काही मोलाचे बळी सुद्धा घेतले. 

मोहम्मद सिराज! खरंतर  भारतीय संघातील कमकुवत गोलंदाज म्हणून हा मानला जात होता परंतु त्याने आपल्या या मर्यादेत राहून ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर खेळाडूंना बाद केलं! आता वळूयात ते अश्विन बुमराह यांच्या गोलंदाजीकडे! हल्ली एका प्रकारे आपण काही खेळाडूंवर विशिष्ट शिक्का मारून टाकतो! जसं की अश्विन फक्त भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर खेळविण्याचा गोलंदाज!  परंतु या गुणी खेळाडुने ज्या पद्धतीने स्मिथला सतावले आहे त्यामुळे या भारतीय संघाच्या एक कायमची डोकेदुखी असलेल्या फलंदाजाचा आत्मविश्वास खूप कमी झाला आहे. आशा आहे की स्मिथला बाकीच्या मालिकाभर अश्विन आणि मंडळी असेच सतावत राहो! बुमराह यांच्याविषयी जितके प्रशंसोद्गार काढावे तितके कमी !  शमी दुखापतग्रस्त, ईशांत दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात येऊ न शकलेला आणि उमेश यादव दुसऱ्या डावाच्या पहिल्या काही षटकातच दुखापतग्रस्त झालेला! अशावेळी ह्या बुमराहने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बऱ्यापैकी जेरीस आणलं आहे. आपल्या गोलंदाजीवर झेल सोडला असतानासुद्धा जो गोलंदाज चेहऱ्यावर हसू राखू शकतो अशा मोजक्या गोलंदाजापैकी एक बुमराह!

आता शेवटी अजिंक्यकडे वळूयात! त्यांना ज्या पद्धतीने या सामन्यात नेतृत्व केले ते सदैव लक्षात राहीलच पण त्याची फलंदाजीसुद्धा अप्रतिम होती. रविवारी ज्यावेळी भारत फलंदाजी करत होता त्यावेळी ढगाळ वातावरण होते. फलंदाजीसाठी परिस्थिती पुर्णपणे अनुकूल नव्हती. परंतु अजिंक्य खेळपट्टीवर टिकून राहिला! जे काही करायचे आहे ते पहिल्या डावातच करायचे आहे हे त्याच्या मेंदूनं चांगलं नोंदून ठेवलं होते. त्यानं जे काही फटके मारले ते डोळ्यांचे पारणे फिटणारे होते. त्यानं एक केवळ चेंडूला थोपटत आहे असं भासवणारा असा जो स्ट्रेट ड्राईव्ह मारला तो मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला चकवून बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे गेला. बॅकफुटवर जात पॉईंट आणि कव्हर  यामधून चेंडूला अलगद दिशा दाखवत मेलबॉर्नसारख्या मोठ्या मैदानाच्या सीमारेषेपर्यंत प्रेमानं ढकलून द्यायची कला तोच जाणे! त्यानं केलेले गोलंदाजीतील बदल हे देखील अभ्यासण्याजोगे होते.  उमेश यादव अनुपलब्ध असताना अश्विन आणि सिराज ह्यांना त्यानं आलटून-पालटून योग्य रीतीने वापरले. स्मिथसाठी सदैव लेग स्लीप ठेवून शेवटी त्याला त्या जाळ्यात पकडलं.  गावस्कर, सचिन, राहुल आणि अजिंक्य ह्या मंडळींच्या  स्ट्रेट ड्राईव्हचा ख्रिसमस सुट्टीत केकसोबत चहापान करताना आनंद लुटण्यातील मजा काही औरच ! तसंच काल त्यानं एक रिव्यू घेतला. ह्या अपीलविषयी यष्टीरक्षक पंत फारसा आत्मविश्वासपुर्ण वाटत नव्हता परंतु रहाणेच्या मनानं ठरवलं की हा रिव्यू घ्यायचाच. आणि अगदी निसटत्या आवाजाच्या धाग्यावर भारतानं हा बळी मिळवला ! कॉलेजातील सतीशशी काल परवा चॅट केली. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील कष्टानं पुढे आलेल्या मुलाला अथक परिश्रमानंतर योग्य अशी मान्यता मिळाल्याबद्दल आम्ही दोघांनी संतोष व्यक्त केला. 

आता वळूयात ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे! काही वर्षांपुर्वी हेडन आणि स्लेटरची जोडी सलामीला यायची. कित्येक वेळा प्रथम फलंदाजी घेऊन हे दोघे, मधल्या फळीतील पॉन्टिंग, गिलख्रिस्ट मंडळी गोलंदाजांची मस्त पिटाई करायचे! त्यानंतर गोलंदाजीत मॅकग्रांथ, वॉर्न! हे होते Stalwarts (महान खेळाडु). त्यांचा दर्जा, आत्मविश्वास एका वेगळ्या पातळीवरचा असायचा. ह्या संघात ह्या दर्जाचे खेळाडु आहेत ते वॉर्नर, स्मिथ आणि स्टार्क! हॅझेलवूड आणि कमिन्सची वाटचाल त्या दिशेनं चालु आहे! ह्यातील वॉर्नर पहिले दोन सामने अनुपलब्ध होता. स्मिथ कधी नव्हे तो धावांसाठी झगडतोय. आणि स्टार्कच्या तंदुरुस्तीवर बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह असते! मला आपल्या संघाच्या कामगिरीतील श्रेय अजिबात कमी करायचं नाही, पण तिसऱ्या कसोटीत एकटा फिट असलेला वॉर्नर जरी परतला तरी चित्र पुर्णपणे वेगळं असणार ! आणि हो! म्हणायला गेलं तर मुंबई इंडियन्सचा कप्तान कदाचित भारतातर्फे खेळायला उपलब्ध होऊ शकतो! 

जाता जाता विराट आणि पृथ्वीविषयी दोन शब्द ! विराटला अजुनही बहुदा विलगीकरणात ठेवलं असल्यानं सकाळी पाच वाजता उठुन त्यानं चारही दिवस खेळ पाहिला असणार त्याविषयी शंका नाही! आता सामन्याचा बक्षीससमारंभ आटोपल्यावर अजिंक्य फ्रेश होऊन रूममध्ये बसल्यावर विराटनं नक्कीच त्याला फोन लावला असणार! त्या दोघांतील संवाद प्रत्येकानं आपापल्या कल्पनाशक्तीनुसार रचून कागदावर लिहावा, वाटल्यास सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा ! पृथ्वी शॉ - दुखापतीनंतर परतल्यावर ह्या गुणी खेळाडूच्या बाजुनं म्हणावं असं काही घडत नाहीये! मध्येच वाचनात आलेल्या लेखात म्हटल्यानुसार ज्येष्ठ खेळाडूंचा सल्ला घेऊन आपल्या तंत्रातील उणिवा दुर करणे हाच एकमेव मार्ग आहे! 

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे! मालिकेतील पुढील दोन सामन्यांत काय घडणार ते देव जाणे ! पण आजचा क्षण मात्र अजिंक्य आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विजिगीषु वृत्तीचा ! 

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

स्वप्रतिमेशी संघर्ष !


सोशल मीडियावरील संघर्षाविषयी आज सकाळी एक सुंदर स्टेट्स वाचलं. दुसऱ्या कोणी आपल्याशी वादाचा पवित्रा घेतला म्हणुन लगेचच आपणही युद्धाची तयारी करायला नको. त्यांना शांततेनं जिंका ! 

ह्या स्टेट्सला आरंभबिंदु घेऊन आजची ही पोस्ट! भोवताली बऱ्याच प्रमाणात स्वप्रतिमेशी संघर्ष भरुन राहिला आहे की काय अशी परिस्थिती आहे! स्वप्रतिमेच्या अभ्यासात  असं जाणवतं की ह्यात दोन टप्प्यांचा समावेश होतो. बाह्यजगानं मान्य केलेली आपली प्रतिमा आणि त्या प्रतिमेत आपल्या स्वभावानुसार बदल करुन बनवलेलं स्वप्रतिमेचं रुप !

प्रत्येक मनुष्य जन्मतः एक स्वप्रतिमा बाळगुन असतो. ही झाली अनुवंशिकतेने लाभलेली स्वप्रतिमा ! बालपणीच्या काही वर्षात आईवडील, नातेवाईक ह्या स्वप्रतिमेला घडविण्यात हातभार लावतात.  ह्या वर्षात प्रत्यक्षातील प्रतिमा आणि ही घडविण्यात आलेली प्रतिमा ह्यात जितकं साधर्म्य तितकं भविष्यकाळाच्या दृष्टीनं उत्तम ! 

एका क्षणी हे बालक स्वप्रतिमेच्या परीक्षणास सुरुवात करते. व्यक्ती तितक्या प्रकृती ! काहींना आपलं हे स्वप्रतिमेचं मनात साकारलं गेलेलं रुप प्रथमक्षणी आणि आयुष्यभर बेहद आवडतं. अशी माणसं बऱ्यापैकी ठाम स्वभावाची असतात. स्वप्रतिमा परिपुर्ण आहे का वगैरे विचार करण्याच्या फंदात ते पडत नाहीत. ही माझी प्रतिमा आहे ना ! मग ती जशी आहे तशी मी स्वीकारणार अशी ह्यांची विचारधारणा असते ! स्वप्रतिमा स्वीकारलेली माणसं म्हणुयात यांना आपण ! ह्या विचारधारणेत समजुतदारपणाच्या ते बेफिकिरीच्या विविध छटा असतात. छटा कोणतीही असो पण हल्लीच्या जगात ही माणसं सुखी राहण्याची शक्यता जास्त असते. 

आता वळुयात ते स्वप्रतिमेशी संघर्ष करणाऱ्या माणसांकडं ! ह्यातही दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील लोक आपली जी काही स्वप्रतिमा जाणवत आहे त्याविषयी दुःख बाळगुन असतात. परंतु हे दुःख आपल्याकडेच ठेवण्याची त्यांची मनोवृत्ती असते. काहीशी संवेदनशील असतात ही माणसे! जमेल तसं आपल्यापरीनं ह्या प्रतिमेला शांततेनं बदलायचा  प्रयत्न करत राहतात ही माणसे! दुसऱ्या प्रकारातील माणसांचा संघर्ष मोठा क्लेशदायक  असतो; त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भोवतालच्या लोकांसाठी ! त्यांचा हा संघर्ष बाह्यजगतासाठी दृश्यमान असतो. उदाहरणं अनेक आहेत. सध्या सोशल मीडिया खुपच intrusive (योग्य मराठी शब्द आगाऊ?) झाली आहे. फेसबुकचं उदाहरण घेवुयात ! आपण आपली प्रोफाईल पाहत असताना short videos नावाचा प्रकार उगाचच मध्ये येतो. त्यात लोकांचे आपल्याकडं लक्ष वेधुन घेण्यासाठी ज्या थराला काहीजण विशेषतः मुली जातात त्यावेळी केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी हे असले सवंग प्रकार करण्याची गरज आहे का हा प्रश्न पडतो! कदाचित ह्यातुन मोठया चित्रपटासाठी वाव मिळेल अशी आशा बाळगुन असतील. प्रतिमेचा संघर्ष सोशल मीडियावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही दिसत राहतो. ह्यात मोठ्या समूहानं आपल्याला स्वीकारलं पाहिजे ह्यासाठी आपण जे काही नाही आहोत ते रुप स्वीकारण्याचा प्रयत्न केला जातो. 

ह्यावर उपाय काय? आपण जसे आहोत तसंच आपल्याला स्वीकारावं ! बोलायला हे सोपं पण ही निर्वाणा स्थिती आहे जी कमी जणांना लाभु शकते. आपण जसं आहोत तसंच स्वतःला स्वीकारायचं म्हटलं म्हणजे काही वेळा एकट्यानं बराच वेळ व्यतित करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. पण जरी बाकीच्या लोकांशी आपण संपर्क कमी केला तरी प्राणी, पुस्तकं / ग्रंथ आणि निसर्ग ही अशी मंडळी आहेत जी तुम्हांला तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारतात ! मग स्वप्रतिमेशी संघर्ष संपुष्टात येतो आणि लाभते एक नीरव शांतता!

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

पार्थेनियम गवत !

सध्या सुट्टीचे दिवस असल्यानं घराच्या अवतीभोवती फिरणं होतं. फिरणं म्हटलं की दोन चार झाडं झुडपं दिसतात. दोन चार झाडं झुडपं दिसली की आपसुक भ्रमणध्वनी उचलुन दोन चार छायाचित्रं काढली जातात ! दोन चार छायाचित्रं काढली गेली की ती फेसबुक आणि व्हाट्सअँप जाण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो! असंच परवाच्या फोटोंबाबत झालं. वाडीतील गवताचे दोन चार फोटो चांगले आले, फेसबुकवर टाकले ! नेहमीप्रमाणं दोन चार लाईक झाले, दिवस सार्थकी झाल्यासारखा वाटला. 

रात्री अचानक एका चिकित्सक मित्राचा मेसेज आला. हा मित्र कोणत्या बाबतीत चिकित्सकपणा दाखवेल ह्याचा भरवसा नसतो! 

पहिला प्रश्न - "तुमच्याकडं देखील काँग्रेस आहे?" 

आता हा मित्र आणि मी एकाच लोकसभा, विधानसभा मतदारसंघात असल्याची मला पक्की खात्री ! बाकी महानगरपालिकेच्या वॉर्डाबाबत तो एकच असल्याची खात्री नाही ! त्यामुळं मी थोडा साशंक झालो. पण अचानक लक्ष गेलं ! त्यानं माझ्या स्टेटसला टॅग करुन प्रश्न विचारला होता ! 




आता डोक्यात प्रकाश पडला ! लहानपणी किर्लोस्कर मासिकात बहुदा ह्या काँग्रेस गवताविषयी मोठा लेख वाचला होता! ह्या मित्रानं त्या आठवणींना उजाळा दिला होता ! १९५० - ६० च्या दरम्यान भारतात अमेरिकेतुन गहु आयात केला होता. त्याकाळी भारतात हरितक्रांती झाली नसावी, त्यामुळं भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण नसावा. त्यामुळं दुष्काळाच्या वेळी हा मिलो गहू आयात करण्याची वेळ भारतावर आली. ह्या गव्हांच्या बोटींसोबत ह्या गवताच्या बिया अनाहुत पाहुण्यासारखा भारतात चंचुप्रवेश करता झाला आणि पाहतापाहता देशभर पसरला ! ह्या गवताचे शास्त्रीय नाव खरंतर वेगळं पण काँग्रेसच्या राजवटीत हे गवत भारतभर पसरलं म्हणुन आपल्या देशात त्याला काँग्रेस गवत हे नांव पडलं. 

हे गवत खुपच त्रासदायक आहे. एकदा पसरलं की बाकीच्या पिकांचा नाश करतं. प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा सहजरित्या टिकाव धरतं. मित्रानं ह्या सर्व माहितीला उजाळा तर दिलाच पण अधिकच्या माहितीची लिंक सुद्धा पाठवली.  हे गवत सध्या हिवाळ्यातील दवावर जोमानं फोफावेल, उन्हाळ्यापर्यंत सहज टिकाव धरुन राहील. मित्र माहिती पुरवत होता. 

वाडीतील चित्र आठवुन त्याच्या म्हणण्याची पुरेपूर खात्री वाटत होती. वाडीचा बराचसा भाग ह्या गवताने व्यापुन टाकला होता. ऑक्टोबर महिन्यात भाग पुर्ण साफ करुनसुद्धा दोन महिन्यात हे गवत पुन्हा उगवलं होतं. 


फुलवाले गवत आहे त्याला काँग्रेस गवत म्हणतात. मला ही संकल्पना पुर्णपणे समजवावी ह्या हेतुने तो म्हणाला. आज थोडं ह्यावर फुरसतीने वाचन केलं तर ह्या गवताची उपद्रवता ध्यानात आली. एकदा ह्या गवताने तुमच्या शेतीत चंचुप्रवेश केला की त्याचा पुर्णपणे बिमोड करणे फार जिकिरीचं काम बनतं !



लहानपणी मी लावलेल्या सुबाभुळचीसुद्धा अचानक आठवण झाली. मोठ्या कौतुकानं आणलेलं हे सुबाभुळ अगदी वेगानं वाढलं आणि वर्ष - दोन वर्षात वाडीचा भाग त्यानं व्यापुन टाकला. शेवटी स्थानिक वृक्षच खरे आपल्यासाठी धार्जिणे ! 

बाकी परत काँग्रेस गवताकडं ! मित्रानं म्हटल्याप्रमाणं ह्याला फुलं येतात ! मेहनतीनं फोटो काढले तर सुंदरही येतात. 





आता भोळ्याभाबड्या फुलपाखरांना आपण कोणत्या गवतावर बसतो आहोत ह्याची पर्वा नसावी! त्यामुळं ती बिचारी ह्या गवतावर मोठ्या आनंदानं बसली होती! 



छान किती दिसते फुलपाखरु !
ह्या वेलीवर ,काँग्रेस गवतावर 
छान किती दिसते फुलपाखरु !!!

(तळटीप - संपुर्ण पोस्ट हे गवत काँग्रेस गवत आहे ह्या गृहितकावर आधारित आहे. ते गवत काँग्रेस गवत नसल्यास मी जबाबदार नाही !!  वाद नसावा  म्हणुन माहितीमायाजालावरुन काँग्रेस गवताचे शास्त्रीय नाव शोधुन पोस्टचे शीर्षक दिले आहे !)

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...