मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २४ जानेवारी, २०२२

माझी दिनचर्या





मनात ठाम निर्धार करुन मी हिमालयाची त्या पायवाटीचा मार्ग धरला होता. बोचरे वारे, दूरवर दिसणारी हिमालयीन रानटी जनावरे ह्यांना न भीता मी शेवटी एकदाचा त्या महर्षींच्या गुहेसमोर पोहोचलो. माझ्या सुदैवानं काही वेळातच महर्षींची समाधी समाप्त झाली. 

स्मित हास्य करत महर्षी मला म्हणाले, " वत्सा, वसई क्षेत्री सर्व काही कुशल आहे ना ? 
मी - "हो महर्षी !"
महर्षी - "भोवताली इतके निर्बंध असताना तू इथंवर कसा काय येऊन पोहोचलास ?"
मी - "महर्षी,  मी स्वनिर्मित संकटात सापडलो आहे.  आपल्या मदतीसाठी इथंवर धाव घेतली आहे !"
इतक्यात टिंग असा आवाज येताच माझं लक्ष भ्रमणध्वनीकडं गेलं. 
महर्षी - "हा ध्वनी कसला?"
मी - (काहीशा अपराधी भावनेनं) - "माझ्या शनिवारी फेसबुकवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टला लाईक आणि कमेंट आली आहे "
महर्षी (काहीसे प्रक्षुब्ध होऊन) :- "आपण इथल्या संवादाकडे लक्ष केंद्रित करुयात का ?"
मी - "हो महर्षीं. प्रमादाबद्दल क्षमा असावी"
महर्षी - "तुझी नक्की समस्या काय आहे ?"
मी - "हीच ती समस्या "
महर्षी - "नक्की समजेल असं बोलशील का "
मी - "कोणतेही काम एकाग्रतेनं करण्याची माझी क्षमता प्रत्येक दिवसाला कमी होत चालली आहे"
महर्षी - "हे असे का व्हावं ?"
मी - "मघाशी जे घडलं ते सदैव होत राहतं. हा भ्रमणध्वनी विविध संदेशांची सूचना देत राहतो आणि मी माझं मुख्य कामातील लक्ष गमावून बसतो !"
महर्षी - "ह्यावर उपाय काय असं तुला वाटतंय ?"
मी - "काही उपाय लागू पडतील असे मला वाटतंय, पण खात्री नाही"
महर्षी - "उदाहरणार्थ ?"
मी - "एक दररोजचं वेळापत्रक आखावे आणि त्यानुसार दिवस व्यतित करावा "

मान डोलावून संमती दर्शवित महर्षीनी मला अर्धा तास दिला.  महत्प्रयासाने मी खालील मजकूर नोंदविला 

पहाटे सूर्योदयाच्या किमान पंधरा मिनिटं आधी उठावं. ब्रश करुन एका प्रसन्न मनानं सूर्योदय पहावा. अशा ह्या प्रसन्न वेळी किमान दहा सूर्यनमस्कार, पाच उठाबशा आणि पाच सीटअप्स असा निसर्गाशी नातं जोडणारा व्यायाम करावं. सूर्यनमस्कार जसे जमतील तसे काढावेत. उगाचच त्यातील प्रत्येक स्थितीच्या अचूकतेविषयी साशंक होऊ नये. नाहीतर दुसऱ्या दिवसापासून हे सूर्यनमस्कार काढण्याची इच्छाशक्ती झपाट्यानं कमी होऊ शकते.  आपण अगदी तंदुरुस्त दिसावं असा स्वार्थी विचार करुन व्यायाम करु नयेत. आनंदी मनासाठी हा सकाळचा व्यायाम आपण करत आहोत ही भावना मनात ठेवावी. उठल्यापासून एका तासाच्या आत स्नान आटोपून घ्यावं. सकाळी लवकर स्नान केल्यानंतर सकाळच्या प्रत्येक क्षणाचा दर्जा, त्या क्षणातील तुमची एकाग्रता ह्यात कमालीची सुधारणा होते. स्नानानंतर पाठांतरशक्ती / इच्छाशक्तीनुसार मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्र पठण करावे. स्नानानंतर एक चषक धारोष्ण दूध प्राशन करावं. दूध प्राशन केल्यावर वाय फाय सुरु करावे पण ते केवळ कार्यालयीन ई - मेल्स तपासून पाहण्यासाठी. कार्यालयीन ई - मेल्समधील अगदी महत्वाच्या मेल्सना उत्तर द्यावं. बाकीच्यांचे वर्गीकरण करुन दिवसभरात त्यावर योग्य कार्यवाही करावी. ह्या नंतर शिरा, पोहे, उपमा असा गरमागरम नाश्ता घेत असताना दारी आलेल्या वर्तमानपत्रांचे वाचन करावे. ह्यातील मनाला क्लेशदायक बातम्या जसे की बेजबाबदार फटका मारुन पंतचे बाद होणे किंवा भारतीय गोलंदाज व फलंदाज ह्यांना एकत्रितपणे चांगली कामगिरी न करता येणे जमतील तितक्या टाळाव्यात. अग्रलेखाकडे नजर फिरवावी आणि न समजणारे तीन शब्द सापडल्यावर अग्रलेख वाचणे थांबवावे. नाश्ता आटोपल्यावर स्वयंपाकघरातील हिरव्यागार भाज्यांकडे लक्ष देऊन प्रसन्न व्हावं. ह्या क्षणी पंधरा मिनिटं सोशल मीडियाला बहाल करावीत पण ती केवळ वाचकाच्या भूमिकेत. कोणत्याही विषयावर आपले मतप्रदर्शन करणे प्रकर्षानं टाळावे. ह्यानंतर सध्या वर्क फ्रॉम होम सुरु असल्यानं कार्यालयीन कामात शिरण्याची मानसिक तयारी करावी. शर्टाला इस्त्री करणे हा ह्या मानसिकेत शिरण्याचा जालीम उपाय आहे. लॅपटॉप, मोबाईल ही सर्व आयुधं विद्युतप्रभारीत करून ठेवावीत. पुढील नऊ तास फेसबुक लाईक, टिपण्णी, व्हाट्सअप चर्चा आणि ब्लॉग हिट्स संख्या ह्याकडे दुर्लक्ष करावे. रात्रौ नऊच्या आसपास कार्यालयीन कामं आटोपल्यावर जेवण आटोपून मगच मोबाईल हाती घ्यावा. जो काही धुमाकूळ, वादविवाद घालायचे असतील ते ह्यावेळी घालावेत. पार्श्वभूमीवर जुनी हिंदी गाणी सुरु ठेवावीत. रात्री दहा वाजता वाय फाय बंद करावे ! 

महर्षीनी त्या कागदावर नजर फिरवली आणि म्हणाले - "शुभस्य शीघ्रम !" 

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

जीवना कसा मी असा !


सद्यकाळात माणसं आपापल्या कोशात जाऊ लागली आहेत. माणसांच्या वर्गीकरणाच्या अनेक पद्धती पुर्वापार अस्तित्वात होत्याच. सध्या त्यात काहींची भर पडली आहे तर काही अस्तित्वातील प्रकारांना सद्यकालानं नवीन पैलू प्राप्त करुन दिले आहेत. 

आशावादी आणि निराशावादी हा पूर्वापार चालत आलेला माणसांच्या वर्गीकरणाचा प्रकार! सध्या आशावादींना आपली मनोवृत्ती कायम ठेवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत आहेत तर निराशावादींना आपल्या स्वभाववैशिष्ट्यांना अनुकूल असे वातावरण सापडलं असल्यानं ते निराशेच्या गर्तेत खोलवर जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. 

आशावादी माणसांनी मनुष्यजातीच्या दृष्टिकोनातून पाहता एक अधिक जबाबदारी स्वीकारायला हवी ती म्हणजे ही सकारात्मकता आपल्या भोवतालच्या, आपल्या संपर्कात येणाऱ्या लोकांत पसरवायला हवी. ही सकारात्मकता पसरविताना समोरच्या माणसाचा विश्वास बसेल असे स्पष्टीकरण, अशी उदाहरणं द्यायला हवीत. मनुष्यजातीच्या बाबतीत सदैव चांगल्याच घटना घडतील असे नाही. मनुष्याचा इतिहास पाहता ह्याहून अधिक खडतर काळाला आपल्या पूर्वजांना सामोरे जावे लागले आहे; तेही तंत्रज्ञान इतके प्रगत नसताना. त्यावेळच्या माणसांना बहुदा जीवनाकडून सदैव आनंद अपेक्षित नव्हता. आपण मात्र सदैव आनंदी राहण्याची अपेक्षा करतो आणि तिथंच जीवन आपला वारंवार अपेक्षाभंग करतं. 

परत एकदा कोशात जाण्याकडं वळून माणसांच्या वर्गीकरणाचा एक नवीन प्रकार पाहुयात. पहिला प्रकार म्हणजे सदैव आपल्या भ्रमणध्वनीमध्ये / गॅझेटमध्ये गुंतून राहणारी, तिथे भेटणाऱ्या आभासी किंवा खऱ्या माणसांशीच जोडली जाणारी माणसं. ही माणसं अनुकूलतेच्या शोधात वेगवेगळ्या मालिका, चित्रपट धुंडाळत राहतात, किंवा आपल्याला आनंद देणाऱ्या माणसांशीच संपर्क जोडत राहतात. ह्या विश्वातून प्रत्यक्ष जीवनात जो काही थोडा काळ ते येतात त्या वेळी ते कमीतकमी संवाद साधत असतात. ह्याउलट काही माणसांनी अजूनही स्वतःला ह्या मोहापासून दूर ठेवले आहे. प्रत्यक्ष जीवनातील वैविध्यपूर्ण माणसांसोबत संवाद साधणे किंवा आयुष्यातील खडतर प्रसंगाना स्वतःहून सामोरे जाणे असले प्रकार ही माणसे स्वखुशीने करत असतात. 

माणसांचा प्रकार कोणताही असो पण आपल्या नकळत आपल्या मेंदूत एक स्वतःविषयी आपल्याला कसं वाटत आहे / आपण कितपत आनंदी आहोत  ह्याचा एक निर्देशांक वावरत असतो. माणसं आपल्या अर्थाजनासाठी जो नोकरी व्यवसाय करतात त्यावेळी हा निर्देशांक बासनात गुंडाळून ठेवला जातो. दिवसातील ज्या क्षणी आपण त्या दिवशीची नोकरी व्यवसायाची आणि कौटुंबिक जबाबदारी आटपतो त्यावेळी हा स्वखुशीचा, आत्मसन्मानाचा निर्देशांक उसळी मारुन बाहेर येतो आणि माणसं ह्या निर्देशांकाच्या इच्छेनुसार वागू लागतात. ह्या अनुषंगानं माणसांचा एक नवीन प्रकार अस्तित्वात आला आहे.  जीवन ज्यांना ह्या निर्देशांकाच्या मर्जीनुसार काही काळ व्यतीत करण्याची संधी देते अशी काही माणसं तर ज्यांना देत नाही ती उरलेली माणसं !

कोणत्याही कोशाचा अतिरेक वाईटच ! प्रत्येक दिवस आपल्याला आयुष्य नव्या पद्धतीनं जगण्याची संधी देत असतो. आपल्या मागील आयुष्याच्या जीवनपद्धतीला कुरवाळून बसण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपण नव्या पद्धतीनं दैनंदिन जीवनाकडं पाहण्याचे कष्ट क्वचितच घेतो. 

मनुष्यांच्या जीवनात हल्ली जास्त ताणतणाव का निर्माण झाला आहे ह्याचा मला प्रश्न पडतो. पण बहुदा ह्याचं उत्तर सोपं असावं असं मला वाटत रहातं. मनुष्यांची संख्या तर वाढलीच आहे; त्याचबरोबर स्वतःविषयी भ्रामक आत्मसन्मानाच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत. ह्या आत्मसन्मानाच्या कल्पना आपल्या सभोवतालच्या वास्तविक आणि आभासी जीवनात विशिष्ट लहरी सोडत राहतात. जेव्हा दोन भिन्न व्यक्तींच्या भिन्न ध्येयाने प्रेरित लहरी एकमेकांवर आदळतात तेव्हा तणावनिर्मिती होते. काही काळानंतर मनुष्यांचा अवास्तव वाढलेला आत्मसन्मान हीच मनुष्यांची सर्वात मोठी समस्या बनणार आहे! मला माझ्या एका ज्येष्ठ अमेरिकन सहकाऱ्याने दिलेला सल्ला मी वारंवार वापरतो. तो म्हणाला होता, "आदित्य, कधीकधी स्वतःकडे गांभीर्यानं पाहणं सोडून दे! आयुष्य सोपं होईल ! 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...