मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २८ एप्रिल, २०१५

जीवनगाणे!


 
 मोठं होत असताना शाळेत तर शिकण्याची प्रक्रिया चालूच होती पण प्रत्यक्ष जीवनातसुद्धा अधूनमधून जाणवायचं की अरे हे तर नवीनच काहीतरी आज शिकायला मिळालं. त्यावेळी पूर्ण जगाकडे पाहण्यासाठी उपलब्ध असलेली खिडकी फारच किलकिलती उघडल्यामुळे बाह्य जगताचा म्हटलं तर मर्यादित भाग दृष्टीस पडायचा. आजच जरी मी मोठा  तत्त्वज्ञ बनण्याचा आव आणून ह्या पोस्ट्स टाकत असलो तरी अजूनही जगाचा अगदी अगदी मर्यादित भाग मी प्रत्यक्ष पाहिला / अनुभवला आहे. आपल्या मातापिता, पत्नी आणि तान्हुल्याला गावी मागे सोडून सीमारेषेवर शत्रूशी लढावयास आलेला सैनिक शत्रूशी लढताना जेव्हा आपल्या सर्व साथीदारांपासून एकटा पडतो आणि शत्रू त्याला घेरतो त्यावेळी त्याच्या मनात येणाऱ्या भावनांची व्याप्ती मला समजू शकते असे विधान मी इथं सुखात बसून करू नये. मनाची कल्पनाशक्ती इतकी प्रगल्भ असू शकते का ज्यामुळे एखादा प्रसंग प्रत्यक्ष न अनुभवता सुद्धा त्यातील भावनांची अनुभूती एखादा माणूस घेऊ शकेल; हा चर्चेचा विषय. 
 
माणसाची जीवनाविषयीची आसक्ती जोवर शाबूत असते तोवरच्या माणसाच्या भावना आणि एका परिस्थितीनंतर माणूस सर्व आशा सोडून देतो त्यानंतरच्या भावना ह्यात आमुलाग्र फरक असतो. केवळ मरण समोर ठाकलं म्हणून माणसाची जीवनआसक्ती संपते असं नाही. आणि जीवनआसक्तीच्या केवळ शून्य आणि शंभर अशा दोनच स्थिती असतात असंही नाही. भोवतालच्या परिस्थितीने हतबल झालेली आणि जीवनआसक्ती कमी होत चाललेली अनेक माणसं आजूबाजूला दिसतात. पैशाची चणचण, आरोग्याच्या अडचणी, नात्यांतील क्लिष्टता अशी अनेक कारणे ह्या ढळलेल्या आशेला कारणीभूत असतात. 

लहानपणचे दिवस आठवून पाहा. शाळेतील स्नेहसंमेलन, वार्षिक क्रीडादिवस, स्वातंत्र्यदिनाची परेड अशा दिवशी सकाळी घरून निघताना मन कसं उत्साहाने पुरेपूर ओथंबून भरलेलं असायचं. पहिल्या परदेशवारीला पण खरतर असंच भरून यायला हवं. पण माझ्यासारखा चिंतातुर जंतू आपल्याला तिथलं काम झेपेल की नाही ह्या प्राथमिक विचारातच गढून गेला तर कसं होणार. 

आयुष्याची दिशा सर्वसाधारणपणे तिशीच्या आसपास ठरून जाते असा आपण ग्रह करून घेतो. ह्याच्याही पुढे जाऊन आपण ह्या पृथ्वीवरील आनंद, जीवनातील क्षण टिपण्याच्या आपल्या क्षमतेविषयी आपणच एक सीमारेषा आखून घेतो. ह्या सीमारेषा बऱ्याच वेळा ऐकीव माहितीच्या आधारे आणि समाजाच्या रूढीवर आधारित असतात. अहो जगातील सर्वात सुखाचा क्षण तुम्हांला अगदी चैनीच्या प्रवास कंपनीतून केलेल्या युरोप सहलीतून मिळतो असं नाही; तो अगदी साध्या रेल्वेने केलेल्या केरळच्या प्रवासाने सुद्धा मिळू शकतो. श्रीमंती युरोप सहल तुमच्या शरीराला सुख नक्कीच देते पण मनाचे सुख मात्र तुमच्या हाती आहे. 

बदलत्या काळानुसार किंवा वाढत्या वयानुसार म्हणा जीवनातील क्लिष्टता वाढत जाते. लहानपणी प्रश्नांची उत्तरे फक्त दोनच असतात आणि ती काळानुसार सुद्धा कायम राहतात. पण हळूहळू पूर्ण बरोबर किंवा चूक असे उत्तर नसणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यायची हळूहळू सवय होते. आयुष्याच्या विविध टप्प्यावर घेतलेल्या निर्णयाचे दायित्व स्वीकारून आयुष्याला सामोरे जावे लागतं. हे सर्व घडत असलं म्हणून जीवनाकडे पाहायची खेळकर वृत्ती सोडायची नाही. हा पण सार्वजनिक जीवनात आपल्या प्रफुल्लित चित्तवृत्तींचे कितपत प्रदर्शन करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न!

दहावी बारावीच्या वेळी वाक्य कानावर पडायचं. "हे वर्ष अभ्यास कर! एकदा चांगले गुण मिळाले की मग काही चिंता नाही!" त्यावेळी मोठ्या श्रद्धेने मी वाक्य ऐकलं. नंतर जाणवलं की साधारणतः आठवीनंतर आयुष्यातील निखळ मजेची वर्षे संपतात. मग उरते ती जीवनरगाड्यातून अचानकपणे सामोऱ्या येणाऱ्या काही आनंदी क्षणाची प्रतीक्षा ! ह्या क्षणांना आगंतुकपणे सामोरे येऊन द्यावे की त्यांना निर्माण करणाऱ्या प्रसंगांचे आयोजन करण्यात पुढाकार घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न!

रविवार, १९ एप्रिल, २०१५

IPL च्या मोहमयी विश्वात!


 
मागच्या दोन तीन वर्षांत भारताने कसोटी सामन्यात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ह्या सारख्या संघांकडून दारूण पराभव स्वीकारला. भारताला कसोटी सामन्यात खेळता येत नाही ह्याचे मुख्य कारण IPL असल्याचा मनोग्रह मी करून घेतला असल्याने मला ह्या स्पर्धेविषयी मनात काहीसा राग आहे. 
मन काहीसं द्विधा परिस्थितीत सापडतं. अगदी कर्मठपणे विचार करता IPL विषयीचा राग कायम राहतो, पण नवीन युगाचा प्रतिनिधी असणारा सोहम ज्या आवडीने IPLचे सामने पाहतो ते पाहून मग हा राग काहीसा कमी होतो. 
आयुष्य आपणासमोर गंभीर, हलकेफुलके आणि अनेक विविधरंगी क्षण घेऊन येतं. आयुष्यात अनुभवलेला एखादा हलकाफुलका, सुखाचा क्षण तुम्हांला किती काळ पुरतो ह्याची समीकरणे व्यक्तीनुसार बदलतात. तशी ही समीकरणे मागची पिढी ते ह्या पिढीपर्यंत सुद्धा बदललेली आहेत. हल्ली आपल्याला दररोज हलकेफुलके क्षण लागतात. अशा क्षणांचा नियमित डोस मिळाला नाही तर मग नैराश्य वगैरे येतं. मग उगाचच मानसोपचारतज्ञ वगैरे लागतात. पूर्वी जुन्या पिढीकडून उपदेश, टोमणे ऐकायची इतकी सवय असायची की उगाचच नैराश्य वगैरे यायचं नाही. पण कालाय तस्मे नमः! 
असो अशाच एका हलक्याफुलक्या क्षणाच्या शोधात आम्ही मागच्या रविवारी मुंबई इंडियन विरुद्ध पंजाब किंग्स एलेव्हन हा रात्रीचा ८ वाजताचा सामना पाहावयास गेलो. आमच्या सोबत अजून दोन कुटुंब असल्याने एकूण १० जण होतो. वानखेडेची प्रवेशद्वारे साधारणतः सामन्याच्या तीन तास आधी उघडतात अशी बातमी होती. अगदी तीन तास नसलं तरी दीड दोन तास लवकर पोहोचावं ह्या हिशोबाने आम्ही नियोजन केलं होतं. 
ह्या सामन्याची तिकिटे बुक माय शो ह्या संकेतस्थळावरून नोंदवली होती. ती नोंदवल्यापासून तीन ते चार दिवसात घरी पोहोचली सुद्धा! ही तिकिटे जनांनी सांभाळून ठेवावीत. ती फाटली किंवा खराब झाली तर स्टेडीयम मध्ये प्रवेश मिळणार नाही अशी धमकीवजा सूचना देण्यात आली होती. 
सहाच्या सुमारास आम्ही सर्वजण चर्चगेट स्थानकात पोहोचलो. आपण पश्चिम रेल्वेच्या नावाने अधूनमधून खडे फोडत असलो तरी मला मात्र ह्या रेल्वेचे आणि ती इतक्या नियमितपणे चालवणाऱ्या कर्मचारी वर्गाचे सदैव कौतुकच वाटत आले आहे. 
१० जणांत काही वयानुसार आणि काही मनानुसार बालके असल्याने चर्चगेट स्थानकात अल्पोपहाराचा कार्यक्रम रंगला. साधारणतः साडेसहाच्या सुमारास आम्ही स्थानकाबाहेर पडलो. मग मुंबई इंडियन्सचे निळे झेंडे आणि पंजाब किंग्स एलेव्हनचे लाल झेंडे विकणाऱ्या विक्रेत्यांनी आम्हांला घेरलं. त्यांच्या विक्रीकलेचा मान राखत आम्ही थोडे पुढे सरकलो तेव्हा चेहऱ्यावर लाल, निळी रंगकला करून देणारे भेटले. त्यांनाही आमच्यातील काहीजणांनी संधी दिली. मग मलिंगाच्या पुंजक्यारूपी केसांच्या निळ्या रंगातील आवृत्या विकणारे भेटले. त्यांनाही आम्ही निराश केले नाही. शेवटी मग टी शर्टस विकणारे भेटले. सुदैवाने त्यांच्या किमती फारच अवास्तव वाटल्याने आम्ही पुढे सरकलो. 
चर्चगेट स्थानकाच्या बाहेरूनच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसत होता. आमची तिकिटे ही विजय मर्चंट कक्षातील असल्याने आम्हांला स्टेडीयमच्या पश्चिमेकडे असलेल्या प्रवेशद्वारातून शिरणे आवश्यक होते. प्रथम आमची तिकिटे तपासून पाहण्यात आली. दक्षिण बाजूला ज्यांचे स्टैंड होते त्यांना तात्काळ प्रवेश मिळाला. आमच्यातील तीन बालकांनी ऑस्ट्रलियन खेळाडूंच्या प्रभावाखाली येऊन पंजाबच्या संघाला पाठींबा जाहीर केला होता. काळ कसा बदलला आहे पाहा, पूर्वी आपला संघ कितीही कमकुवत असला तरी परक्या संघाला पाठींबा देण्याचा विचार चुकुनही मनाला शिवायचा सुद्धा नाही. आणि हल्लीची मुले पहा - जिथलं पारड जड तिथे त्यांची निष्ठा! बायकोचे हे शब्द ऐकून मी धन्य, अंतर्मुख वगैरे वगैरे झालो. शेवटी एकदाचे आम्ही पश्चिम दिशेला असणाऱ्या गेटपाशी पोहोचलो. तिथे आमची तिकिटे पुन्हा तपासण्यात आली. आणि अर्धा भाग फाडून घेण्यात आला. इथे आपल्यासोबत असणाऱ्या सर्व बैग्स सोडून द्यायची वेळ आली होती. अगदी पाण्याच्या बाटल्या सुद्धा! आता सुरक्षिततेच्या नावाखाली पाण्याची बाटली सुद्धा आत नेऊ न देणे हे खचितच योग्य नाही. पण बाजार मांडला पैशाचा तिथं वाद कोणाशी घालणार! भ्रमणध्वनी आत नेता येणार की नाही ह्याविषयी थोडी संदिग्धता होती पण नशिबाने त्याला परवानगी मिळाली. स्कॅनरमधून जायच्या आधी खिशात रुमाल सोडून काहीच नसावं अशी सक्त ताकीद देण्यात आली. त्यामुळे मोबाईल, पाकीट वगैरे हातात पकडून स्कॅनरमधूनमी प्रवेश केला. तरीही खिशातील घराची चावी कुरकुरलीच. ती ही मग बाहेर काढण्यास सांगण्यात आली. तिचीही कठोर परीक्षा करून मग आम्हांला आत सोडण्यात आले. आता जिन्याने दोन मजले  वर जाऊन आम्ही स्थानापन्न होणार होतो. वातावरणात अगदी जोष होता. दुसऱ्या मजल्यावर पोहोचताच तिथल्या दृश्याने आम्ही अगदी प्रसन्न झालो. 

 

आमच्या समोरच बालकांचा दैवत असलेला पंजाब एलेव्हनचा संघ वॉर्म अप करीत होता. 

त्यात मॅक्सवेल आणि जॉन्सन ही मंडळी दिसताच ह्या बालकांना स्वर्ग दोन बोटे उरला. अवतीभोवती मुंबई इंडियन्सच्या निळ्या सागरात ही तीन बालके आणि त्यांचे लाल टी शर्टस नक्कीच उठून दिसत होते. थोड्या वेळाने वॉर्म अप संपताच मग संजय बांगर ह्यांनी हवेत उंच चेंडू उडवून झेलांचा सराव देण्यास सुरुवात केली. त्यात मॅक्सवेलला त्याने आमच्या दिशेला पाठवलं. बहुदा ह्या उठून दिसणाऱ्या तीन टी शर्ट त्यालाही दिसले असावेत. आणि एका क्षणी त्याने ह्या तीन बालकांकडे पाहून त्याने स्मितहास्य केले. ही तीन मंडळी अगदी गारद झाली. हा क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा लक्षात राहील. 
आमचा मुंबई इंडियन्सचा संघ पलीकडच्या बाजूला दिसत होता. त्यात मलिंगाचा केसांचा पिंजारा शोधून काढण्यात आम्हांला यश मिळालं. मग थोड्यावेळानं नाणेफेकीसाठी रवि शास्त्री आणि दोन्ही कप्तान मैदानात आले. काहीही सनसनाटी घडत नसताना उगाच नाट्यपूर्णरित्या ओरडून काहीतरी घडतंय असा आभास निर्माण करण्याची हल्ली सर्वत्र पद्धत निर्माण झाली आहे. त्यानुसार रवी शास्त्री ह्यांनी जोरात ओरडून वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. रोहित शर्मा ह्यांनी नाणेफेक जिंकून पाहुण्या संघास प्रथम फलंदाजीस बोलावलं. समोरच्या मोठ्या पडद्यावर अगदी मोठ्या रुपात दिसणारे हे लोक नक्की कोठे आहेत हे शोधण्यात आमचे काही क्षण गेले. ते आम्हांला लगेचच दिसले खरे पण प्रीती झिंटा मात्र नक्की कोठे बसल्या आहेत हे आम्हांला समजत नव्हते. १९९८ सालच्या जिया जले जां जले गाण्यापासूनचे त्यांचे आम्ही भक्त! त्यांना ह्याची देही ह्याची डोळा बघण्याचे भाग्य आम्हांला लाभले नाही. मध्येच मग सचिनवर कॅमेरा आला आणि मग स्टेडीयम मध्ये नवचैतन्य पसरलं.




सामना सुरु होण्याची वेळ जशी येऊ लागली तशी सराव करणारी मंडळी आत परतली आणि मैदान मोकळं झालं. खेळपट्टीवर विविध रेखा आखणारा कर्मचारी एक शेवटची तपासणी करत होता. परीक्षा असो की IPL सामना शेवटच्या क्षणीची तयारी ही हवीच! 



बाकी एकंदरीत पोस्टचा सूर काहीसा नकारात्मक वाटण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट मात्र सांगू इच्छितो. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रत्यक्ष खेळताना पाहण्याचा अनुभव मात्र जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा घ्यावाच. ज्या पद्धतीने हे खेळाडू गोलंदाजी, क्षेत्ररक्षण करतात त्याचा प्रत्यक्ष खेळ पाहताना आनंद टीव्हीवर पाहण्याच्या आनंदाच्या अनेक पटीने असतो. वेगवान गोलंदाजाचा चेंडू ज्या वेगाने यष्टीरक्षकाकडे पोहोचतो, फलंदाजाने जोरात टोलावलेला चेंडू ज्या सफाईने क्षेत्ररक्षक अडवतात हे प्रत्यक्ष बघण्यात नक्कीच आनंददायी असते. विशेष करून लहान मुलांनी हा प्रत्यक्ष खेळ पाहिल्यास त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्या तिन्ही गोष्टीतील आपला दर्जा कोणत्या पातळीवर असावा ह्याचा अंदाज बांधण्यास मदत होते. 

यंदाचा रणजी हंगाम ज्याने आपल्या कर्नाटक संघासोबत गाजवला त्या विनयकुमारने गोलंदाजीची सुरुवात केली. समोर भारतातर्फे आंतरराष्ट्रीय सामने गाजवलेले मुरली विजय आणि सेहवाग हे होते. ह्या दोघांनी विनयकुमारला झोडपून काढलं. पहिल्या तीन षटकात विनयकुमारने ३५ धावा मोजल्या. सेहवागची फलंदाजी तंत्रशुद्ध जरी नसली धावगती शाबूत ठेवण्यासाठी प्रभावी होती. दुसऱ्या बाजूने सुयल हा गोलंदाजी करीत होता. त्याने मात्र आपल्या पहिल्या दोन षटकात दहाच धावा मोजल्या. मला सुयलची गोलंदाजी आवडली. हा गडी भविष्यात चांगली गोलंदाजी करेल अशी मला आशा वाटते. विनयकुमारला दोन षटकात फटकावल्यावर तिसरं षटक द्यायचा रोहितचा निर्णय चुकीचा होता असं वाटून गेलं. मुंबई इंडियन्सचा एक मुख्य प्रश्न म्हणजे त्यांच्याकडे खूपच जास्त वैयक्तिक महान खेळाडू आणि मार्गदर्शक आहेत. परंतु सामने जिंकण्यासाठी खेळाडू आणि मार्गदर्शक ह्यांची जी लय जुळून यावी लागते ती मात्र बऱ्याच वेळा जुळत नाही. तेंडूलकर, कुंबळे, पॉन्टिंग, जॉटी ऱ्होडस इतकी रथी महारथी मंडळी मार्गदर्शनासाठी उपलब्ध असताना ह्या हंगामातील मुंबई इंडियन्सची केविलवाणी कामगिरी ह्याच मुद्द्यावर बोट ठेवते. 





मलिंगाच्या पहिल्या षटकात ११ धावा फटकावल्यावर मात्र मग रोहितने भज्जीला गोलंदाजीस पाचारण केलं. त्यानेसुद्धा पहिल्याच षटकात धोकादायक अशा विरूला माघारी धाडून कर्णधाराचा आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला. सेहवाग बाद झाल्यावरसुद्धा आमच्यातील पंजाब एलेव्हनचे खंदे समर्थक इतके का खुश झाले हे आम्हांला कळेना. पण मॅक्सवेल साहेबांना प्रवेश करताना पाहून सर्व शंकाचे निरसन झाले. सोहमशी अधूनमधून क्रिकेटवर माझी चर्चा होते. त्यातही त्याला फंडे द्यायची संधी मी सोडत नाही. मॅक्सवेलची अजून महान खेळाडूंत गणना व्हायला वेळ का आहे हे मी त्याला समजावून देत होतो. केवळ तीन चार मोठे फटके मारून तुम्ही त्यावेळेपुरता लोकांच्या लक्षात राहू शकता पण महान खेळाडू बनायचं असेल तर तुम्हांला मोठ्या खेळी कराव्या लागतात आणि अशा खेळ्या तुम्हांला अनेक मोसमात कराव्या लागतात. माझे हे बोल ऐकून सोहम थोडासा विचारात पडला खरा! बाकी मग अजूनही मॅक्सवेलला कसोटी संघात का घेतलं जात नाही ह्याचही बहुदा त्याला उत्तर मिळालं. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या सुचींथ त्याने एक चौकार मारला खरा पण दुसऱ्याच चेंडूवर एक उंच फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद झाला. ह्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चांगले झेल घेतले हे मात्र खरं. मध्येच प्रेक्षकांना लहर आली आणि त्यांनी मेक्सिकन वेव सुरु केली. पूर्ण स्टेडीयमभर हे लाट तीन चार वेळा फिरली. 

आमच्या बाजूला तगडा कोरी एण्डरसन क्षेत्ररक्षण करत होता। का कोणास ठाऊक पण हा अंग राखून क्षेत्ररक्षण करीत आहे असंच मला वाटत होतं. चौकार जात असेल तर गडी विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे प्रयत्न करीत नसे. शेवटी देश आणि क्लब ह्यांच्यासाठी खेळण्यातला फरक तर येणारच ना! आणि जेव्हा तुम्ही दीड महिन्यात तीन दिवसाला एक ह्या वेगानं भारतासारख्या खंडप्राय देशात प्रवास करीत १४ सामने खेळणार असाल तेव्हा तुम्हांला स्वतःची थोडी काळजी घ्यायलाच हवी.


झिंटाबाईं दिल चाहता है निमित्त केलेल्या ऑस्ट्रेलियाच्या प्रवासानंतर त्या देशाविषयीच्या प्रेमाने भारून गेलेल्या असाव्यात. म्हणूनच की काय त्यांच्या संघात सर्वात जास्त परकीय खेळाडू ऑस्ट्रेलियाचेच भरले आहेत. मॅक्सवेल गेला आणि मिलर आला. भज्जी फॉर्मात होता. त्याने विजयलाही परत पाठवलं. मी सोहमच्या दिशेने तोंड वळवून जोरदार आरोळी ठोकली. सोहमला श्रीश आणि मृण्मयी ह्यांची साथ होती. त्या तिघांनी माझी ही प्रतिक्रिया फारच मनावर घेतली. मला ही पुढे महागात पडणार आहे ह्याचा अंदाज नव्हता.पंजाब ३ बाद ८८. आता बेली आला. दोघेही ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानात होते. 

बेलीवरून आठवलं की आमच्या आजूबाजूला फिरणाऱ्या विक्रेत्यांकडील पिझ्झा, सैंडवीच ह्या सारखे पदार्थ पाहून आमच्या बेलीमधील कावळे ओरडत असत. सुरक्षेच्या नावाखाली कोणताच खाद्यपदार्थ आत नेता न आल्याने आम्हांला हे अतिशय महागडे पदार्थ खाण्याशिवाय पर्यायच नव्हता. इथे बऱ्याच गोष्टी न पटण्यासारख्या होत्या. खाली विकली जाणारी पाण्याची बाटली वर स्टेडीयममध्ये आणण्यास परवानगी नव्हती. केवळ पेप्सी घ्या आणि तीही पन्नास रुपयाच्या चढ्या भावात! 

पुढची ३ -४ षटक बेली आणि मिलर ह्यांनी डावाला स्थैर्य देण्यात घालवली. त्या वेळात माझे लक्ष आजूबाजूच्या स्टेडीयमकडे गेलं. स्टेडीयमला अगदी सुंदर रूप देण्यात आलं होतं. समोर दिसणारा पत्रकारकक्ष देखील अतिआरामदायी वाटत होता. दुसऱ्या बाजूला अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठींचा कक्ष देखील सुंदर होता.



डावाच्या शेवटी मात्र बेलीने धुंवाधार फलंदाजी करत धावसंख्या १७७ पर्यंत पोहोचवली. मधल्या पंधरा मिनिटाच्या विश्रांतीच्या कालावधीत खाली स्वच्छतागृहात जाण्यासाठी आणि पाण्याच्या बाटल्या खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. स्वच्छतागृहाची स्थिती अगदीच वाईट नव्हती! माझ्या नशिबाने मला पाण्याची बाटली वरती आणण्यास कोणी मज्जाव केला नाही. 

मी आणि सोहम स्थानापन्न होत नाही तोवर मुंबईच्या डावाचे पहिलं षटक सुरूही झालं होतं आणि दुसऱ्याच चेंडूवर कप्तान रोहित पायचीत झाला. डावाची अशी निराशाजनक सुरुवात पुढेही कायम राहिली. माझे नामबंधू तरे सुद्धा लगेचच तंबूत परतले. पाच षटकात २ बाद १७ ही अगदी निराशाजनक परिस्थिती होती. दुष्काळात तेरावा महिना ह्या उक्तीनुसार मग मिचेल जॉन्सन गोलंदाजीस आले आणि त्यांनी आपले देशबंधू फिंच ह्यांना त्रिफळाचीत केले. क्षेत्ररक्षणात आळशीपणा करणारा कोरी मग फलंदाजीस आला. आणि त्याला अक्सर पटेलने यष्टीचीत केलं. अक्सरला विश्वचषकात एक तरी सामना धोनीने खेळावावयास हवा होता ह्या माझ्या विचाराने पुन्हा उचल घेतली. एव्हाना मुंबई ९ षटकात ४ बाद २७ अशा दयनीय परिस्थितीत होती. पोलार्ड आणि रायडू खेळपट्टीवर असले तरी काही जणांनी स्टेडीयम सोडण्यास सुरुवात केली होती. मध्येच रायडूविरुद्ध यष्टीचीतचे जोरदार अपील करण्यात आले. तो नाबाद असल्याचे मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आल्यावर प्रेक्षकांनी जल्लोष केला पण त्यात जान नव्हती. 



दोन चौकार मारून रायडू बाद झाला आणि एक षटकार मारून पोलार्ड. होता. सर्व प्रेक्षक अगदी शांत झाले होते. "पोलार्ड गया तो जायेंगे!" अशी घोषणा करणारा माझ्या बाजूचा गट देखील काढत पाऊल घेता झाला. 


आमच्या पंजाब एलेव्हनच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून जात होता.


१४ षटकात ६ बाद ६०, ही मुंबईची दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर पंजाब दा पुत्तर असलेल्या भज्जीने आपली करामत दाखविण्यास सुरुवात केली. हिमाचलच्या मंडी इथल्या ऋषी धवन, जॉन्सन, अनुरीत सिंग ह्यांची इथेच्छ धुलाई करीत त्याने आणि सुचींतने एक अविश्वसनीय अशी भागीदारी केली. भज्जीची फलंदाजी खरोखर बघण्याजोगी होती. प्रेक्षकांनी मैदान अगदी डोक्यावर घेतलं होतं. पण खरं नुकसान आधीच होऊन गेलं होतं. शेवटी ह्या दोघांची झुंज १८ धावांनी कमी पडली. जवळपास ३० हजार प्रेक्षकांसोबत एकत्र बाहेर पडताना अगदी गर्दी होईल म्हणून आम्ही थोडे आधीच बाहेर पडलो. 
भर उन्हाळ्यातील अगदी हिरव्यागार गालीच्यासारखे वानखेडे पाहून आपण कोठे परदेशी असल्याचाच भास होत होता. पण त्याच वेळी देशातील बहुसंख्य शेतकऱ्यांना मात्र अगदी घोटभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं आणि आपल्या देशाने जर IPL इतकी शक्ती प्रत्येक गावात तलावनिर्मिती करून गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यात व्यतीत केली तर किती बरं होईल हा विचार मात्र मनात डोकावला. केवळ हा विचार मनात आला म्हणून धन्य मानणारी माझ्यासारखी मंडळी ह्या देशात आहेत  म्हणूनच IPL इथं फोफावत हे मात्र खरं! 

शनिवार, ११ एप्रिल, २०१५

मन मोकळं!


 
अनोखी रात्र कथा संपली! संपली एकदाची असं वाचणाऱ्या बहुतेक सर्वांनी म्हटलं असणार! कायच्या काय पकवतो हा असे ही काहीच्या मनात आलं असणार. आणि खरं तर एकाने प्रतिक्रिया लिहून कळवलं सुद्धा तसं! पण निनावी राहून त्याने / तिने  प्रतिक्रिया द्यायचा प्रयत्न केला म्हणून ती प्रतिक्रिया मी प्रसिद्ध केली नाही. मग पुढचे भाग कृपया लिहू नका (बहुदा तिसऱ्या भागानंतर) असा सल्ला द्यायला तो अथवा ती विसरला /ली नाही. मी हल्ली प्रत्येक पोस्टविषयी जास्त भावुक व्हायचं टाळतो त्यामुळे ही प्रतिक्रिया तसं पाहिलं तर मला आवडली! 
कंपनीत सध्या Gender Bias विषयी जाणीव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ह्या परिच्छेदात मी ही प्रतिक्रिया देणारा केवळ पुरुषच असू शकतो असा पूर्वग्रह करून घेतला नाही. बाकी दीपिकाबाईच्या माझी निवड ह्या चित्रफितीनंतर महिलांच्या निर्णयस्वातंत्र्याच्या क्षितिजाच्या मर्यादेविषयी कोणतीही बंधनं मानायला मी तयार नाही.  खट्याळपणा काय फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही. असो मी ह्या मुद्द्यावर इथंच थांबतो नाहीतर माझ्यात कुठंतरी दडलेला पुरुषी सुप्त अहंकार एखाद्या वाक्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या परिवर्तित व्ह्यायचा! 
इतके दिवस लांबणीवर पडलेला नवीन फोन घ्यायचा निर्णय शेवटी एकदाचा मागच्या आठवड्यात अंमलात आणला. मागचा फोन ब्लॅकबेरीचा! काहीसा निरस आणि केवळ ऑफिसच्या कामाला उपयुक्त असा. त्या आधीचा २००६ साली अमेरिकेत असताना घेतलेला फोन २ एप्रिल २०११ साली बसप्रवासात हरवला. त्याच दिवशी भारतानं विश्वचषक जिंकला. त्यामुळे ह्या विश्वचषकात सुद्धा हा ब्लॅकबेरी हरवेल आणि मग आपण हा ही विश्वचषक जिंकू अशी आशा मी बाळगून होतो. पण ऑस्ट्रेलियाने भारताची धूळधाण उडवत माझा मनसुबासुद्धा लयीस नेला. थोड्या गंभीरपणे बोलायला गेलं तर अँड्रोइड वर आधारित भ्रमणध्वनीची ऑपरेटिंग प्रणाली वापरत नसल्याने काळाच्या मागे पडत चालल्याची जाणीव होऊ लागली होती. आणि माझ्या सद्यव्यवसायात हे मागे पडणं महागात पडू शकत असल्याने शेवटी नवीन फोन घेतला. ह्या फोनवरून मोबाईल पेमेंट पासून सर्व काही वापरणं ही काळाची गरज!
जसा हा फोन आला तसंच मग व्हॉटसअप सुद्धा आलं. जवळच्या मित्र, नातेवाईक मंडळींनी विविध गटात सामील करून घेतलं. आणि मग दररोजचा विनोदाचा खुराक सर्वत्र सुरु झाला. ह्या विषयावर मी मागे एक पोस्ट लिहिली होती. एकाग्रचित्ताने काम, अभ्यास करताना ह्या व्हॉटसअपचे संदेश पाहण्याची सवय त्यात खंड निर्माण करते हा माझा मुख्य आक्षेप होता आणि अजूनही आहे. पण हा ज्याचा त्याचा प्रश्न! बाकी मनुष्य समुहप्रिय प्राणी आहे. आधुनिक काळानुसार प्रत्यक्षात समुहाने राहणे जरी शक्य होत नसलं तरी ह्या हलक्याफुलक्या विनोदाद्वारे आपण एका गटाचे सदस्य असल्याची भावना निर्माण होण्यास / कायम राहण्यास मदत होते. काही जणांच्या बाबतीत दिवसात निर्माण होणारा तणाव, काहीसं नैराश्य, एकलेपणाची भावना दूर करण्यास हे मेसेज मदत करू शकतात. 
ह्या विविध गटात विविध मनोवृत्ती दिसतात. काहींना आपण काळानुसार किती आधुनिक / खेळकर बनलो आहोत हे दाखवून देण्याची खुमखुमी असते. ती ते ह्या गटात पुरी करून घेतात. माझ्यासारखे काही लोक आपल्या गंभीरपणाचा आव इथेही कायम ठेवायचा प्रयत्न करीत असतात. शेवटी एक गोष्ट खरी की इथं तुमच्यावर दिवसभर व्हॉटसअपला चिकटून राहायचं बंधन नाही, जेव्हा केव्हा करमणूक करून घ्यायची इच्छा येईल तेव्हा जावं इथं! बाकी अधूनमधून तातडीने कोणाला मदत करण्याचे सत्कार्य इथं होऊ शकतं. 
आपण बऱ्याच जणांना ओळखत असतो. काहींना बऱ्याच वर्षांपासून. आपल्या मनात त्या व्यक्तीची फार वर्षापासूनची प्रतिमा मनात असते. मग काय होतं की बऱ्याच वर्षांनी पुन्हा ही व्यक्ती आपणास भेटते. आपल्या मनातील प्रतिमेला काहीसा तडाही जातो. मग हीच व्यक्ती व्हॉटसअपच्या / सोशल मीडियाच्या रुपात भेटते आणि मग कधीकधी आपणास मोठा धक्का बसतो. जुनी प्रतिमा होती तीच बरी असे म्हणण्याची कधी कधी येते.  प्रत्येकवेळा येते असं नाही म्हणायचं मला पण काही वेळा येतेच येते.
मी पूर्वी स्वतःला बराच आदर्शवादी मानत असे. आत्मपरीक्षणाची प्रक्रिया कार्यालयात सुरु होत मग ती वैयक्तिक जीवनात येऊन पोहोचली. आदर्शवादाची मानलेली बरीचशी पुटं(असा शब्द आहे का नाही ह्याविषयी काहीशी साशंकता!) गळून पडली. आत्मपरीक्षण करावं की नाही, केल्यास ते कितपत करावं? आत्मपरीक्षणाने आत्मसन्मान प्रत्येक वेळी गळून पडावाच का? हे माझ्या मनात घोळत असलेले सध्याचे काही प्रश्न! 

शुक्रवार, १० एप्रिल, २०१५

अनोखी रात्र - भाग ६


 
आपल्या अगतिकतेने मामाला अगदी वैफल्य येत असे. साधनाच्या शरीरात दुसरीच कोणी शिरली आहे हे माहीत असून सुद्धा तो कोणाला सांगू शकत नव्हता. हे सगळे प्रकरण सहन न होत असल्याने तो आपल्या गावी परतला. 

साधनाचं वैफल्य तर कल्पनेच्या पलीकडे होतं. काही दिवसानं तिचा आणि मोहनचा विवाह मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लौकिकार्थाने मोहनचे आणि तिचं लग्न लागलं खरं, पण आपल्या मनावरचा ताबा तिनं केव्हाचाच गमावला होता. आपल्याच शरीरात कोठतरी अगदी क्षुल्लक अस्तित्व राखून जीवन जगण्याची तिच्यावर वेळ आली होती. तिचा राग उफाळून यायचा पण तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. आपल्या मोहनला दुसऱ्या कोणाचा स्वामी बनून जीवन कंठताना पाहताना तिला अतोनात दुःख होत असे. 

खरा धक्का तर तिला तेव्हा बसला जेव्हा आपल्या मनावर वर्चस्व गाजविणाऱ्या स्त्रीने स्वतःचा रुही म्हणून परिचय करून दिला. आणि सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे मोहनने सुद्धा तिचं रुही म्हणूनच अस्तित्व स्वीकारलं. दिवस असेच पुढे जात राहिले. मोहन - साधनाच्या नव्हे मोहन रुहीच्या संसारवेलीवर फुलं सुद्धा उमललं. सर्वजण कसे आनंदी होते शिवाय एकट्या साधनाच्या! आणि हो मामा देखील होता. पण त्याला रूहीने हे बिंग फोडल्यास मी आत्महत्या करीन अशी धमकी दिली होती. त्या शरीरातील साधनाचे अस्तित्व जरी रुहीला माहीत नसलं किंवा त्या अस्तित्वाची तिला पर्वा नसली तरी मामाला आपल्या लाडक्या साधनाच्या अस्तित्वाची इतकीशी खुण सुद्धा पुरेशी होती. त्यामुळं त्यानं गप्प राहायचंच स्वीकारलं. 

"डॉक्टर, डॉक्टर! साधनाला नक्की काय झालंय ते सांगा ना!" अगदी घाबऱ्या घुबऱ्या स्वरात मोहनने त्यांना विचारलं. "आय ऍम सॉरी मोहन! ती कर्करोगाच्या शेवटच्या स्थितीत आहे. केवळ शेवटचे काही दिवस बाकी आहेत!" डॉक्टरांच्या ह्या शब्दांनी मोहनच्या पायातील त्राणच निघून गेले.

रुहीला केव्हातरी सायंकाळी जाग आली. "मला नक्की काय झालंय मोहन? सांग ना! मला अगदी कसंचच होतंय!" मोहनचा तिच्यापासून हा आजार लपवून ठेवायचा प्रयत्न फार काळ यशस्वी ठरला नाही. हॉस्पिटलात आलेल्या साधनाच्या भावाच्या तोंडून हे सत्य अभावितपणे बाहेर पडून गेलं. ह्या सत्याचा मुकाबला करणे त्याला त्या क्षणी शक्य न झाल्याने तो तसाच रात्री घरी परतला. 

काहीशा अपराधी भावनेने दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे मोहन  हॉस्पिटलात परतला. खिडकीची मोडलेली काच पाहून त्याला धक्काच बसला. धावतच तो साधनाच्या जवळ गेला. तिची नजर त्याला काहीशी वेगळीच वाटली. त्याला धक्काच बसला. ही नजर तो पक्की ओळखत होता. 

"मोहन, तू माझ्याशी असं का वागलास! माझ्या खऱ्या प्रेमाला तू कसा विसरलास!" खऱ्या साधनाच्या ह्या प्रश्नाला मोहनकडे उत्तर नव्हतं. "बघ तुला ती गतजन्मीच्या आठवणी सांगणारी रुही, कर्करोगाची बातमी ऐकताच कशी माझा देह सोडून गेली!" मोहनला पुन्हा एक धक्का बसला. 
ह्या विश्वात परतण्यासाठी आपण केलेल्या स्वार्थीपणाची कबुली साधनाकडे देण्याशिवाय त्याला दुसरा पर्याय दिसत नव्हता. फरशीवर पडलेल्या फुटक्या काचांकडे पाहत, रुहीची आठवण काढत असताना त्याचा शब्दांची जुळवाजुळव करायचा प्रयत्न चालू होता. इतक्यात घाईघाईने डॉक्टर प्रवेश करते झाले. त्यांच्या चेहऱ्यावर पराकोटीचे अपराधीपणाचे भाव पाहून मोहनला आश्चर्य वाटलं. "आय ऍम रियली सॉरी. आमच्या हातून अक्षम्य चूक घडली आहे. बाजूच्या खोलीतील पेशंटचा रिपोर्ट तुम्हांला आम्ही काल तुमचा म्हणून दिला. साधनाला काही मोठा आजार झालेला नाही! होईल बरी ती पुढच्या दोन आठवड्यात!"

डॉक्टरच्या ह्या शब्दांनी मोहन पुरता हवालदिल झाला. हॉस्पिटलच्या खोलीची फुटकी काच तर लगेच जुळवता येणार होती, पण दुभंगलेली मने जोडायचा प्रयत्न करीत पुरतं आयुष्य काढण्याचं मोठं धनुष्यबाण आपल्याला पेलवेल की नाही हे त्याला समजत नव्हतं. त्यानं शेवटी कसबसं साधनाकडे पाहिलं. तिची उशी रडूनरडून पुरती ओली झाली होती. मागे काही घडलं त्याची तिला अजिबात पर्वा नव्हती. आपला मोहन आपल्याला आयुष्यात उशिरा का होईना पण मिळाला ह्याचाच पुरता आनंद तिच्या नजरेतून ओसंडून वाहत होता.

(समाप्त)






शुक्रवार, ३ एप्रिल, २०१५

अनोखी रात्र - भाग ५

 
आपल्या केविलवाण्या नजरेतून रुही मोहनला हा मुकाबला संपला असल्याची जाणीव करून देत होती. त्या शक्तीने तिचं त्या विश्वातील अस्तित्व संपवत आणलं होतं. ती शक्ती मोहनच काय करणार हा प्रश्न तिला भेडसावत होताच. आपल्या अनुपस्थितीत मोहनचे अतोनात हाल होणार हा विचारच तिला सहन होत नव्हता. 
मांत्रिकाची बराच वेळ धडपड चालली होती. त्या विश्वाशी संपर्क होतच नव्हता. अचानक त्याला नजरेच्या एका कोपऱ्यात क्षणभर दोन मिणमिणते दिवे दिसले. त्याला एका दिव्याच्या अस्तित्वाची जाणीव होतीच. पण दुसरा दिवा कोणता ह्याची शंका त्याच्या मनात निर्माण झाली. ह्यातील एक दिवा पूर्ण विझत चालला होता पण दुसऱ्याचे अस्तित्व अजून व्यवस्थित होतं. हे सर्व त्याला दिसलं ते क्षणभरच! पुन्हा संपर्क खंडित झाला. मामा मांत्रिकाची ही धडपड अगदी चिंतीत नजरेने पाहत होता. अचानक मांत्रिकाच्या नजरेत मामाला वेगळीच चमक दिसू लागली.
रुहीला अचानक एक झटका बसला. तसा तो मोहनला सुद्धा बसला पण मोहनला त्याचं महत्त्व समजलं नाही. रुही मात्र आपली उरलीसुरली शक्ती एकवटून पुन्हा एका झटक्याची वाट पाहू लागली. आणि काही क्षणातच तो दुसरा झटका आला. रुहीला अचानक जोश आला. पोकळीतील अंधाऱ्या कोपऱ्यातील शक्तीशी मुकाबला करण्याइतपत! मोहनला सुद्धा काहीतरी बदलत आहे हे समजू लागलं होतं. अचानक एक क्षणभर त्याच्या नजरेसमोर इस्पितळातील भिरभिरता पंखा दिसला. पण केवळ क्षणभरच!

मांत्रिक आता पूर्णपणे तल्लीन झाला होता. त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून त्याचा संपर्क झाला हे मामाला कळून चुकलं होतं. काहीतरी गल्लत होत आहे हे मांत्रिकाला कळून चुकलं होतं. त्याच्या अपेक्षेपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात शक्ती खेचली जात होती. केवळ मोहनलाच परत आणायचं असतं तर इतकी धडपड करावी लागली नसती. अचानक त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. मोहनसोबत अजून कोणीतरी ह्या दुनियेत यायचा प्रयत्न करत होतं आणि मांत्रिकाला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. 

मोहन अगदी जीव मुठीत धरून रुहीची आणि त्या अदृश्य शक्तीची झटापट पाहत होता. दोन अर्धपारदर्शक आकृत्या अचानक पुढे मागे येत होत्या आणि एकमेकाला झोंबत होत्या. सुरुवातीला ह्या झटापटीत मागे पडणाऱ्या रुहीचे पारडं हळूहळू वरचढ होऊ लागलं होतं आणि एका क्षणी तिनं त्या दुसऱ्या आकृतीचा पुरता बिमोड केला. 
"चल मोहन पळ इथून लवकर!" विजयी झालेल्या रुहीच्या अगदी उत्साहित स्वरांनी मोहन भानावर आला. त्यालाही एव्हाना अगदी बळ चढलं होतं. पुढे निघताना थोड्याच वेळात त्या काळोख्या भागाला त्या दोघांनी मागे टाकलं. आणि मग त्यांना अचानक प्रकाश दिसू लागला. एका नव्या जोमानं ते दोघंही त्या दिशेने तिथं निघाले. 

मांत्रिकाला दोन बिंदू येताना दिसत होत्या. मोहनच ह्या विश्वातील शरीर आता बरंच सचेतन दिसू लागलं होतं. एका क्षणी मांत्रिकाला एका बिंदूत मोहनच अस्तित्व जाणवलं आणि त्याने त्याला प्रवेश दिलाही. एका मोठ्या झटक्यानिशी मोहनच त्या आधीच्या विश्वातील अस्तित्व संपलं होतं. मोहनने डोळे उघडलेले पाहताच साधनाचे डोळे पाणावले. "मोहन!" अशी बऱ्यापैकी जोरात हाक मारत ती मोहनला बिलगली. 

मोहन तर त्या विश्वात यशस्वीपणे शिरला पण आपल्याला प्रवेश करायला कोणीतरी अडवत आहे ही गोष्ट तिला अजिबात खपली नाही. मांत्रिक पुऱ्या जोशात तिला अडवायचा प्रयत्न करत होता. पण कित्येक वर्षे परतायची आस धरून बसलेली रुही सहजासहजी हार मानायला तयार नव्हती. 

मामाचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. साधनाच्या अंगात अगदी कोणीतरी शिरल्याप्रमाणे ती हलत होती. मांत्रिकाचा देह मोठ्या धडपडीनंतर निश्चेतन होऊन पडला होता. साधनाचे डोळे अगदी वेगळेच दिसत होते. आणि मामाच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. आपली वाचा गेली की काय असे भय त्याला वाटू लागलं होतं. 

(क्रमशः)  

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...