मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
मन स्पंदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मन स्पंदन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच

स्थळ - मुंबई २०६५ 

संदर्भ - विनय मांडे (वर्षे ९०) दैनंदिनी 

आज पहाटे थोडी लवकरच जाग आली. रात्रभर तशी बेचैनीत गेली. अखिलची तब्येत अगदी नाजुक बनली होती. कधी वाईट बातमी येईल ह्याचा भरवसा नव्हता. अखिल आणि सर्व शालेय मित्रांच्या आठवणी डोळ्यासमोरून अगदी झरझर सरकत राहिल्या. 

अखिल माझा बालपणीचा शालेय मित्र! लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी धमाल दिवस घालविले. सरस्वती विद्या मंदिरची आमची बॅच तशी हुशार म्हणून गणली गेलेली. शालेय जीवनातील आठवणी अगदी हृदयाशी जपुन ठेवल्या. शालेय जीवनानंतर आम्ही सर्व दुरावले गेलो. मधली काही वर्षे फारसे एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. मग २०१० च्या सुमारास फेसबुक, whatsapp ने आम्हांला एकत्र आणले ते कायमचे! 

whatsapp चा आमचा 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच ' ग्रुप म्हणजे एक धमाल कट्टा बनला. शालेय जीवनातील आठवणी, प्रत्येकाच्या जीवनातील सुखदुःखाचे क्षण सर्वांसोबत शेयर करण्याचे हे साधन बनले. आम्ही असे जवळ आलो की कधी दूर गेलोच नव्हतो. 

वर्षे पुढे सरकत गेली. केंद्रबिंदू आमच्यावरून आमच्या मुलांच्या जीवनाकडे वळला. मुलांच्या दहावी, बारावी, पदवी परीक्षामधील यशांचे आम्ही कोडकौतुक केले. हे करताना मग हळुहळू ह्या नवीन पिढीच्या लग्नाच्या निमित्ताने आमच्या भेटी होऊ लागल्या. कोणाच्या गुडघेदुखीचे, सांधेदुखीचे अपडेट 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' वर येऊ लागले. ह्यासाठी नवनवीन चिन्हांचा वापर वाढू लागला. वेगवेगळ्या जोक्सचे प्रमाण हळुहळू कमी होत गेले. जीवनातील अखिल आनंदाचा झरा वाहता ठेवणे फार कमी जणांना जमत राहिलं. ग्रुपवर अभंगाचे प्रमाण वाढत गेले. 

२०४० चे दशक मात्र सुरुवातीलाच दुःखी बातम्या घेऊन आले. आजारपणात आमचे दोन सवंगडी स्वर्गवासी झाले. मग ग्रुप अगदी हबकून गेला. जीवनाचे अंतिम सत्य सर्वांना अगदी अंतर्मुख करून गेले. वर्षे काळाच्या पडद्यामागे जात राहिली आणि त्यांच्यासोबत आमचे साथीदारही! गेल्या वर्षी कादंबरी गेली आणि मग मी आणि फक्त अखिलच राहिलो ह्या ग्रुपवर. काहींचे नंबर तसेच ग्रुपवर राहिले होते. 

मला अखिल हवा आहे! माझ्या बालपणाशी जोडणारा एकमेव दुवा अखिल; त्याची तब्येत सुधारावी अशी खुप खूप इच्छा! पण गेले दोन दिवस त्याचा काही पत्ता नाही. last seen चार दिवसांपूर्वीचे! 

बिनसाखरेचा चहा घेता घेता नवीन मेसेज whatsapp वर आला. धीर होत नव्हता तरी पाहिलं - मेसेज अखिलच्या मुलाकडून आला होता. तो उघडून पाहायची गरज नव्हती. 

आताशा मला खूप खूप एकट वाटतंय! 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' चा ग्रुप उघडून पाहायची इच्छा सुद्धा होत नाही! हा ग्रुप कधीपर्यंत अस्तित्वात राहील कोण जाणे! अधुनमधून बालवाडीचा पहिला दिवस डोळ्यासमोर सरकत राहतो इतकं मात्र खरं! 

गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

सांग सांग भोलानाथ!!

 
जानेवारी मध्ये अचानक वाचनात आलं. बहुदा तिसरा किंवा चौथा सोमवार होता तो! वर्षातील सर्वात कंटाळवाणा दिवस म्हणून जाणकार लोकांनी त्या दिवसाची निवड केली होती. त्यामागे अनेक कारणे दिली होती. बरीचशी मला पटली नाहीत. मग मी मला कंटाळा येणारे क्षण शोधावयास लागलो. 
जानेवारी हा नक्कीच सर्वात कंटाळवाणा महिना! माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी तर अधिकच! डिसेंबर महिन्यात सर्व अमेरिकन सहकारी, बॉस वगैरे सुट्टीवर असतात म्हणून कार्यालयात खूप मोकळे (कमी तणावाचे) वातावरण असते. वर्षभर राखून ठेवलेल्या बऱ्याच सुट्ट्या वापरायची संधी मिळते. मुलांच्या शाळेत सुद्धा परीक्षेचा मारा कमी असल्याने त्या पातळीवर सुद्धा मोकळेपणा मिळतो. वसईत क्रिसमसमध्ये धमाल करून झालेली असते. आणि मग अशा वातावरणातून जानेवारी उजाडतो. गेले दोन तीन वर्षे १ जानेवारीची सुट्टी आमच्याकडे बंद झाली आहे पण अमेरिकेच्या ऑफिसात सुरूच आहे. त्यामुळे वर्षाची सुरुवात चांगली होते. म्हणजे नवीन वर्षातील एक सुट्टी सुरुवातीलाच न गेल्याचे समाधान मिळते आणि अमेरिकेची मंडळी सुट्टीवर असल्याने मिटिंगचा तणाव नसतो. 
पण त्या नंतर मात्र कठीण काळ उगवतो. सुट्टीवरून कामावर परतणाऱ्या माणसांचे दोन प्रकार असतात. 
पहिल्या प्रकारातील माणसे आता सुट्टी घेतली त्यात ताजेतवाने होऊन मग नवीन जोमाने कामाला लागतात. नवीन वर्षाचे निर्धार, कामाच्या याद्या वगैरे बनवून बाकीच्यांना भंडावून सोडतात. ह्यात एक महत्वाचा मुद्दा असतो - उत्साहाच्या भरात आपल्याला वाटणारा कामाच्या प्राधान्याचा क्रम आपल्या बॉसच्या, संघटनेच्या प्राधान्यक्रमाशी मिळताजुळता आहे की नाही हे तपासून पाहणे फार महत्वाचे असते. नाहीतर प्रत्येक क्षणी कामात गर्क राहण्याच्या अट्टाहासापायी चुकीच्या दिशेने खूप पुढे जायला होते. 
दुसऱ्या प्रकारातील माणसे जानेवारीत तापायला (म्हणजेच पूर्ण जोमाने कामाला लागायला किंवा झोन मध्ये यायला) जरा वेळ घेतात. ह्यातही उपप्रकार असतात. ह्यातील काहीजण चलाख असतात. जोवर योग्य दिशा मिळत नाही तोवर ते थंड घेतात. एकदा का योग्य दिशा मिळाली की मग अगदी झपाट्याने कामाला लागतात.  अजून एक खोलवर मुद्दा. नेहमीच स्मार्ट बनून काम करणे शक्य नसते. स्मार्ट काम आणि यांत्रिक काम ह्याचे परिस्थितीनुसार योग्य मिश्रण जमायला हवं.
दुसरा प्रकार जन्मजात आळशी असतो. जितका वेळ चालढकल करता येईल तितका वेळ चालढकल करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

ह्यात काही गोष्टी आपण करू शकतो. जसे की रविवारी झोपण्याआधी सोमवारची जमेल तितकी तयारी करणे, सोमवारी नेहमीच्या वेळेपेक्षा आधी ऑफिसात पोहोचून तिथल्या वातावरणाला सरावायचा प्रयत्न करणे. सोमवारी एखादी हलकीफुलकी (विषयावरील) बैठक ठेवणे वगैरे वगैरे!
इतकं करून सुद्धा बेभान मन एखाद्या गंभीर बैठकीच्या वेळी सुद्धा कुठंतरी भरकटत रहातं. चेहऱ्यावरील भाव आणि मनातील विचार ह्यांचा संबंध जोडला जाऊ नये म्हणून मग खूप प्रयत्न करावे लागतात! 

बाकी मग मंगळवार संध्याकाळ वगैरे उजाडली की हळूहळू मन प्रसन्न व्हायला लागतं. ह्यात दोन प्रकारे हातभार लागतो. दोन दिवस कार्यालयात काम करून मन ताळ्यावर आलं असतं आणि दुसरं म्हणजे शुक्रवार संध्याकाळ जवळ येत चालली असते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला एक आनंदक्षण म्हणजे शुक्रवार संध्याकाळ! तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात, प्रोजेक्ट कितीही बिकट परिस्थितीत असले तरी माणसाने शुक्रवार संध्याकाळ आपल्याला हवी तशी अनुभवावी! त्या वेळेला मनात कामाचे कोणतेही विचार येऊ देऊ नयेत! तळीराम मंडळींनी ऐच्छिक ठिकाणे गाठावीत!
  वर्षे भराभर निघून जातात. सोमवार ते शुक्रवार हा प्रवास कसा पटकन संपला हे जसं समजत नाही तसे जानेवारी ते डिसेंबर हा प्रवासही झटकन संपत जातो.  वयाच्या / व्यावसायिक कारकीर्दीच्या दृष्टीने विचार केला तर आपण बुधवारपर्यंत पोहोचलो असतो. पण इथला शुक्रवार मात्र जमेल तितका पुढे ढकलावासा वाटतो!

आपण वयाने मोठे होत जातो, वाढलेल्या वयानुसार आणि कदाचित वाढलेल्या अनुभवामुळे आपण वरच्या पदावर जाण्याची शक्यता वाढीस लागते. अगदी उच्चपदस्थ लोकांनी उदात्त विधान करण्याची पद्धत असते. त्याचप्रमाणे थोडेसं वरती पोहोचलो की मग आपणसुद्धा अशी काही विधानं करू लागतो. पण एक सत्य मात्र कायम राहते. बालवाडीत आईने वर्गात सोडल्यावर डोळ्यात येणारे अश्रू जरी लपवता येत असले तरी नजर मात्र दरवाजाकडे लागून रहायची. तसंच अजूनही सोमवारी ऑफिसात कार्ड स्वाईप करताना सुद्धा भावना मात्र तीच असते!

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

आयुष्याच्या ह्या टप्प्यावर



नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा! प्रत्येक नवीन वर्षी माणूस साधारणतः थोडासा भावूक बनतो. आयुष्यातील एक वर्ष निघून गेल्याची जाणीव मनात काहीशी खंत निर्माण करते. स्वतःच्या अक्षय अस्तित्वाच्या कल्पनेला कालरूपी वास्तवाने अजून एक छेद दिला हे नाही म्हटले तरी कोणाला आवडणार?
चाळीशीच्या उंबरठ्यावर एक मोठा प्रश्न मनात डोकावू लागतो. माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्षे निघून गेली आहेत का? प्रगतीची शिखरे गाठण्याची संधी मी गमावली तर नाही ना?. ह्या प्रश्नाकडे बर्याच प्रकारे पाहता येईल. जो पर्यंत तब्येत धडदाकट आहे, मन चिरतरुण आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस बनू शकतो. मी तर असे म्हणेन की केवळ अनुभवाने येणारी प्रगल्भता या वेळी आपणाकडे असते. स्वतःला विविध पातळ्यांवर काही प्रमाणात का होईना पण सिद्ध केल्याचा आत्मविश्वास तुम्हाकडे असतो. पिकल्या केसांनी (हे ह्या पिढीचे वास्तव) तुम्हाला संयमी बनविले असते. मान्य आहे की कौटुंबिक जबाबदार्या काही प्रमाणात वाढलेल्या असतात पण जर आपल्या जीवनसाथीदाराशी योग्य सामंजस्य निर्माण करण्यात तुम्हाला यश आले असेल तर ह्या जबाबदार्या सुद्धा तुम्ही सहजपणे पेलून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता.
आता प्रगतीची शिखरे ह्या शब्दप्रयोगाकडे मी परत वळतो. प्रगतीची शिखरे म्हणजे केवळ व्यावसायिक जगातील यश असा अर्थ मला अभिप्रेत नाही आहे. प्रगतीची शिखरे मोजण्याचा मापदंड हा केवळ लौकिकार्थाने मिळालेले यश असा होत नाही. एखाद्या गृहिणीने संसारावर, मुलांच्या अभ्यासावर मिळविलेले नियंत्रण, एखाद्या कलाकाराने अथक प्रयत्नानंतर कलेवर मिळविलेले प्रभुत्व, एखाद्या छायाचित्रकाराने टिपलेले एक दुर्मिळ चित्र हे ही प्रगतीचे शिखर असू शकते. दहावीच्या मराठीच्या पुस्तकातील एक वाक्य कायमचे माझ्या लक्षात राहिले आहे. स्वानंद हे कवीचे सर्वात मोठे पारितोषिक आहे.
मीच माझ्या मनाचा स्वामी. त्यामुळे जर मी मनाला प्रसन्न ठेवू शकलो तर मी प्रगती करणारच. जगाने बनविलेले प्रगतीचे मापदंड माझ्या निकर्षाशी मिळतेजुळते असतील असेही नाही.
मन करा रे प्रसन्न
सर्व सिद्धीचे कारण!
अजूनही अर्धे आयुष्य बाकी आहे! मी वास्तववादी असे जीवनध्येय ठरविणार आणि जीवनाचा आनंद घेत ते साध्यही करणार! आणि दुनियेतील मला निराश करणाऱ्या घटकांपासून मला सांभाळण्यासाठी मनोबल वाढविणार!

विचारांची सरमिसळ



आज बर्याच विचारांची एकत्र सरमिसळ इथे मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
सुरुवात करतोय ते मृत्यूविषयीच्या काही विचाराविषयी! मृत्यूविषयी प्रत्येकजण आपापल्या परीने विचार लढवीत असतो. मृत्यूनंतर आपले काय होत असावे ह्याविषयी बरेच सिद्धांत आहेत. मला असे वाटते की जो कोणी सर्वशक्तिमान आहे त्याच्याकडे आत्म्याचे बरेच द्रव्य साठले असावे. नवीन जीव निर्माण होताना तो ह्या द्रव्यातील थोडा भाग काढून त्या जीवात आत्मा म्हणून पाठवून देत असावा. आणि मृत्युनंतर हा आत्मा परत अनंतात विलीन होत असावा. आता वाढत्या लोकसंख्येला पुरेल इतके आत्माद्रव्य ह्या सर्वशक्तीमानाकडे असेल की नाही, त्याच्याकडे ह्या द्रव्याचे वैविध्य कसे असावे आणि हा सिद्धांत प्राण्यांसाठी लागू होतो की नाही यावर आपणा पामरांनी विचार करू नये. ह्या भूलोकावरील जीवनाची, इथल्या नियमावलीची आपणास बर्यापैकी सवय झाली आहे. आपण नियमानुसार वागले तर आपणास दंड होण्याची शक्यता बरीच कमी. परंतु जर मृत्यूनंतर जर आपण मनाने (आत्म्याने) अस्तित्वात राहिलो आणि त्या अस्तित्वातील नियम आपल्या आकलनापलीकडील असतील तर लागली ना बोंब!
दररोज दिवस संपला की आपण जे काही समाधान मिळाले असेल त्यात आनंद मानून घरी येतो. आठवडा संपला की मागे वळून पाहता थोडे समाधानी होत, साप्ताहिक सुट्टीच्या पलीकडील दुसर्या आठवड्याकडे नजर लावतो. तीच गोष्ट वार्षिक सुट्टीची. आयुष्याच्या ह्या प्रत्येक टप्प्यावर समाधान मोजण्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे मापदंड असतात. ह्या मापदंडानुसार काहीजण समाधानी होतात तर काही असमाधानी! प्रश्न असा आहे की आयुष्याच्या यशस्वीतेचे वा अयशस्वीतेचे मापदंड कोणी बनवितो का? आता हा मापदंडाला विविध मिती असतील; व्यक्तिगत यश, कौटुंबिक समधानाची पातळी, जोडलेली माणसे, समाजकार्य अशा विविध पातळ्यांवर आपण आपल्या आयुष्याची यशस्विता अजमावू शकतो. प्रश्न असा आहे की असा मापदंड बनविण्याची आणि त्या निकषानुसार हवी ती पातळी गाठल्यावर सामाजिक आयुष्यातून निवृत्ती घेण्याची आपली तयारी आहे काय?
तात्कालिक समाधानाची प्रत्येकाची आपली वेगवेगळी संकल्पना असते. लहान बालकाला आईचा सहवास समाधान देवून जातो. हल्लीच्या बर्याच लहान मुलांना (वयोगट ७ - ८ वर्षे आणि अधिक) मैदानी खेळापेक्षा संगणकीय खेळ अधिक समाधान देवू लागले आहेत. विद्यार्थांना परीक्षेतील गुण समाधान देवून जातात. माणूस वयाने कितीही मोठा होत गेला तरीही त्यास आपले कोणीतरी कौतुक करावे, आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी अशी सुप्त इच्छा असते. परंतु हे काही सदैव शक्य नसते. मग त्यावेळी आर्थिक लाभाकडे पाहत ही माणसे दिवस लोटतात. आपल्या अस्तित्वाची दखल घ्यावी ह्याच्या सुद्धा विविध छटा असू शकतात. काही जणांना आपली दखल घेतली तरी पुरसे असते तर काही जणांना इतरांपेक्षा आपली जास्त दखल घेतली जावी असा अट्टाहास असतो. सार्वजनिक समारंभात अशा व्यक्तींचे वागणे पाहणे हा एक मजेशीर अनुभव असतो. घरातील वयस्क माणसांना अन्य व्यक्तींचे असणे देखील समाधान देवून जाते. हल्ली फेसबुकने आपल्या अस्तित्वाची दुसर्यास जाणीव करून देण्याचा एक चांगला मार्ग उपलब्ध करून दिला.
कालच मी महाबळेश्वरला सुट्टीचा आनंद लुटून मुंबईला परतलो. महाबळेश्वर म्हणा किंवा वसई म्हणा ह्या दोन्ही ठिकाणात रोजच्या जगण्यात जीवन अधिक प्रमाणात अनुभवता येते असे माझे मत आहे. मुंबईत असतो तो जीवनाचा केवळ संघर्ष. जेवढे तुम्ही निसर्गाच्या अधिक सहवासात जाल तितकी त्या सर्वशक्तीमानाशी संवाद साधण्याची शक्यता अधिक प्रबळ होते. आता हा संवाद म्हणजे काय तर आपल्या ह्या शरीरात जो त्या सर्व शक्तीमानाचा अंश आहे त्याच्याशी त्या सर्व शक्तीमानाने साधलेला संपर्क. आतापर्यंत आज हा काय अध्यात्माच्या मार्गाने चालला की काय असे तुम्हाला वाटू लागले असेल. ह्या मार्गाविषयी मला काही अनुभव नाही परंतु ह्या मार्गावर खरोखर जे पुढे गेले आहेत त्यांच्या विचारांच्या परिपक्वतेविषयी मात्र अतीव आदर आहे! बाकी पुढील आठवड्यात एकदा का कार्यालयीन कामकाजात मग्न झालो की मग हे विचार मागे पडतील. कसे मजेशीर आहे पहा ना, माणसाच्या मनात विचारांची अगदी दाटीवाटी झाली असते, त्यातील काहीच मनाचा काही काळापर्यंत ताबा घेवू शकतात आणि त्यातील अगदी थोडेच भाग्यवान बोलण्या / लिखण्याद्वारे दुसर्यांपर्यंत पोहचू शकतात.
बाकी आधी म्हटल्याप्रमाणे ही विचारांची अगदीच सरमिसळ आहे. आपण जर ह्याचा सामना करीत लेखाच्या शेवटपर्यंत पोहचला असाल, तर धन्यवाद!

उम्र का हिसाब


सकाळी बोरिवलीहून वसईला निघालो. एकटाच असल्याने तयारी लवकर आटपली. सुदैवाने एक नंबरच्या फलाटावर वसई जलद लोकल गाडी मिळाली. सकाळची वेळ, मधल्या स्थानकांवर थांबता सुसाट धावणारी लोकल, सारे काही प्रसन्न वाटत होते. नंतर मग जाणवले सर्वजण शांत विचारात गढून गेले आहेत. माणसाचं असंच असत, कधी अशी शांतता मिळाली की आपण सारे विचारात मग्न होतो. त्या डब्यात सर्वजण विचार करीत होते. विचार जर दृश्य असते तर? त्या डब्यात विचारांचा झंझावात दिसला असता. आता माणस अश्यावेळी कोणता विचार करीत असतील? तात्कालिक समस्या माणसाच्या विचारांना ग्रासणारा प्राथमिक घटक असेल. मग पाच - दहा मिनटांनी माणसाचे मन असंच मागे जात असावं .
तेव्हाच मला उमराव जान मधील गाण्यातील ह्या ओळी अचानक आठवल्या.
ये किस मकाम पर हयात मुझको लेके गयी
ना बस खुशी पे हैं जहाँ, ना गम पे इख्तयार है
तमाम उम्र का हिसाब मांगती हैं जिन्दगी
असेच काही निवांत क्षण मिळतात, आणि आपल्या गतआयुष्याचा हिशोब मांडायला प्रवृत्त करतात .


कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...