मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
मराठी कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

द्वैत -भाग ४





११ जुलै २०५६ (पुणे )

मुथ्थुस्वामी आणि सुमुख बॅनर्जी ह्यांची मस्त चर्चा सुरु होती. "मुथ्थु मला नक्की खात्री आहे की तू सध्या नक्की किती अनिकेत आहेत ह्याविषयी गोंधळला आहेस!" सुमुख मस्करीच्या सुरात म्हणाला. "तीन! एक खरा आणि दोन डिजिटल !" मुथ्थु आत्मविश्वासानं म्हणाला.  "शाब्बास, एक डिजिटल अनिकेत बांद्रयात पोहोचला असला तरी चॅनच्या ताब्यात असलेला डिजिटल अनिकेत ज्याला तो खरा अनिकेत समजतोय त्याचं कसं चाललंय ह्याविषयी आपलं दुर्लक्ष होतंय असं नाही वाटत का तुला? सुमुखच्या ह्या प्रश्नानं मुथ्थुला त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे जाणवलं. 

चॅन आणि अल्बर्टच्या समजुतीनुसार त्यांनी खऱ्या अनिकेतचे अपहरण केलं होतं. पण त्यांच्या ताब्यात असणारा अनिकेत हा मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी पाठवलेला डिजिटल अनिकेत होता हे त्यांना समजलं नव्हतं. त्यांचं सारे लक्ष त्यांनी बनविलेल्या डिजिटल अनिकेतच्या कामगिरीवर असल्यानं आपल्या ताब्यातील अनिकेतच्या माणूसपणाची खातरजमा करून घ्यायला त्यांना संधीच मिळाली नव्हती. 

११ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

"अनिकेत मी आल्ये !" वैदेहीचा आवाज ऐकताच अनिकेतच्या अंगावर शहारे उमटले. हे जे काही चाललं आहे त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे त्याची मनःस्थिती गेली होती. वैदेहीने झटपट त्याला सर्व बंधनातून मुक्त केलं. "किती अशक्त झाला आहेस रे तू ?" वैदेही कळवळून म्हणाली. अनिकेत अजूनही तिच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पण तिनं पुढं केलेल्या शिऱ्याच्या बशीकडे मात्र दुर्लक्ष करणे त्याच्यासाठी अवघड होते. पहिला चमचा जिभेवर टाकताच हिच्यावर विश्वास ठेवणं योग्य राहील अशी ग्वाही त्याच्या अंतर्मनाने दिली. "वैदेही, हे काय चाललंय ?" इतके दिवसाचा संताप त्याच्या स्वरातून व्यक्त होत होता. "झालं, साऱ्या दुनियेचा राग माझ्यावर काढणार असशील तर मी चालले परत भारतात !" वैदेहीच्या ह्या वाक्यानं तो भानावर आला. आपण अजूनही अमेरिकेतच आहोत हे त्याला जाणवलं. 

११ - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - मंगळवार  

काल चॅन आणि अल्बर्ट आपल्यासाठी वेळ देऊ शकले नाहीत हे डिजिटल अनिकेतला पटण्यासारखं नव्हतं. ह्या प्रोजेक्टचे गांभीर्य पाहता प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा असणार होता. पण तरीही त्यानं कसाबसा संयम राखला होता. रात्री वैदेही घरी आलीच नाही. तिनं आपलं ठाण्यातील वास्तव्य दोन दिवस वाढविले असल्याचं त्याला कळवलं होतं.  काहीतरी चुकतंय ह्याची जाणीव ह्या अनिकेतला होऊ लागली होती. 

आज चॅन आणि अल्बर्ट बैठकीला वेळेवर आले होते. व्हिडिओ कॉल एनक्रिप्ट करून त्या तिघांची अतिशय गोपनीय चर्चा सुरु झाली होती.  चॅन आणि अल्बर्ट ज्या पद्धतीनं चर्चेत भाग घेत होते आणि प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारत होते त्यामुळं डिजिटल अनिकेत साशंक झाला होता.  तासाभराने ज्यावेळी कॉल दहा मिनिटांच्या ब्रेकसाठी  थांबला त्यावेळी डिजिटल अनिकेतने मोठा निर्णय घेतला. त्यानं थेट उच्चपदस्थांशी संपर्क साधला. चॅन आणि अल्बर्ट ह्यांची खरी ओळख पुन्हा एकदा शहानिशा करून घ्यावी अशी त्यानं विनंती केली. 

मुथ्थु आणि सुमुख अनिकेतच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्यानं त्यांना लगेचच तो  काहीतरी संशयास्पद कृती करत असल्याचं जाणवलं. दहा मिनिटांनंतर डिजिटल अनिकेत अगदी काळजीपूर्वक कॉलवर आला. तोवर अमेरिकेतून आतापर्यंत भाग घेणारे डिजिटल चॅन आणि अल्बर्ट बाजूला होऊन खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट कॉलवर आले होते. आपल्याला झालेल्या मारहाणीनंतर आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीनंतर चॅन ह्या कॉलवर फक्त मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी जे काही सांगितलं तेच बोलणार होता. डिजिटल अनिकेतच्या वरिष्ठांनी कॉलवर आलेल्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांची सर्व शहानिशा केली. ते खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट असल्याबद्दल त्यांनी डिजिटल अनिकेतला आश्वस्त केले. डिजिटल अनिकेत आता आपल्याला मिळालेल्या सर्व माहितीचा आढावा त्यांना देऊ लागला होता. 

(क्रमशः )


रविवार, ६ जुलै, २०२५

द्वैत -भाग ३


९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

अनिकेतला खरं तर स्थळ आणि वेळेचं भान ठेवायला कठीण जायला हवं होतं. पण तैलबुद्धीचा अनिकेत दमला भागला असला तरीही महत्प्रयासाने आपली विचारशक्ती कायम ठेवून होता.  आज रविवार ९ जुलै. गेल्या शनिवारी रात्री आपण थेट विमान पकडून अमेरिकेला आलो. सोमवारी कामात खूपच चांगली प्रगती झाली होती. आणि अचानक सोमवारी रात्री आपल्याला असं डांबून ठेवण्यात आलं. गेले चार दिवस केवळ एक अनोळखी माणूस पिझ्झा, बर्गर वगैरे आणून देत असे.  आंघोळ वगैरे आटोपण्यासाठी त्याला अंधारातच बाथरूममध्ये सोडलं जात असे. त्यावेळी त्याला अर्थातच बंधनातून मुक्त केलं जाई. पण तिथं करड्या आवाजात त्याला न्हाणीघरातून बाहेर येताच पुन्हा बांधून घेण्यासाठी ताकीद दिली जाई. एकंदरीत अनिकेत शाळेपासूनच मारामारी ह्या प्रकरणापासून दूर राहत असल्यानं इथं तो काही प्रतिकार करण्याची शक्यता नव्हती. तरीही ह्या आपल्या अपहरणकर्त्यांबद्दल तो काहीसं चांगलं मत बाळगून होता.  त्याचबरोबर हे आपल्याबरोबर इतकं चांगलं का वागत आहेत हे त्याला समजणं कठीण जात होतं. 

१० जुलै २०५६ (सॅन दिएगो )

अनिकेतला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. आज सकाळी त्याला नाश्त्याला चक्क त्याच्या आवडीचे पोहे देण्यात आले होते. पोहे काहीसे करपले असले तरीही त्याबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. आवडीचे पोहे मिळाल्याच्या आनंद काही वेळानं स्थिरावल्यानंतर वैदेहीने पोहे केले असते तर असेच केले असते हा विचार त्याच्या डोक्यात आला. पण तिनं नक्कीच हे पोहे करपवले नसते हे तो जाणून होता. वैदेहीच्या चिंतेनं तो अगदी व्याकुळ झाला होता.  

८ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)

सकाळी अनिकेतला उठायला काहीसा उशीर झाला होता.  वैदेहीला शोधत तो स्वयंपाकघरात आला. "गुड मॉर्निंग!" वैदेहीने त्याला सकाळच्या शुभेच्छा दिल्या. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी स्वयंपाकघरातून पोह्याचा खमंग वास यायला हवा होता. परंतु इथं तर वैदेहीने झोमॅटोवरून साग्रसंगीत नाश्त्याची ऑर्डर दिली होती.  अनिकेत उठायचीच ती वाट पाहत होती. अनिकेत स्वयंपाकघरात येताच तिनं त्याला दात वगैरे घासून नाश्त्याला यायची सूचना दिली. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवार सकाळी वैदेही जरा रोमँटिक मूडमध्ये असायला हवी होती. पण इथं तर उलट प्रकार दिसत होता. त्यानं पाठविलेले हे डेटा पॉईंट वाचून चॅनसुद्धा गोंधळात पडला होता.  पण अल्बर्टने मात्र त्याची शंका उडवून लावली होती.  "आपल्या कामावर लक्ष द्या, त्या वैदेहीकडे प्रमाणाबाहेर लक्ष देऊ नका" असं त्यानं चॅनला बजावलं. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या विनंतीवजा आदेशाकडं लक्ष देण्याव्यतिरिक्त चॅनकडे पर्याय नव्हता. 

अनिकेत आणि वैदेही ह्या दोघांनी मिळून जरी न्याहारी संपवली तरी वातावरणातील तणाव दोघांना जाणवत होता. अचानक दरवाजावरील बेल वाजली. "अनिकेत दरवाजा उघड!" वैदेहीने सूचना केली. चॅन अगदी सतर्क झाला होता. ह्या सर्व धावपळीत ह्या शक्यतेचा विचार करायला त्याला वेळ मिळाला नव्हता. त्यानं क्षणार्धात दोघांच्या नातेवाईकांची माहिती तात्काळ अनिकेतपर्यंत पोहोचवली. "या! या! दादा,  वहिनी !" अनिकेतने त्यांचं स्वागत केलं. वैदेहीचे दादा, वहिनी काहीसे आश्चर्यचकित झाले. शक्यतो अनिकेतच्या तोंडून फार कमी शब्द बाहेर पडायचे. पुढील तासभर अनिकेत, वैदेहीसाठी कसोटीचा काळ होता. चॅन वैदेहीच्या वागण्याकडं बारीक लक्ष ठेऊन होता आणि क्षणाक्षणाला त्याच्या चिंतेत भर पडत होती. पण अल्बर्टचा त्याला धाक असल्यानं चॅनकडे गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. 

दादा, वहिनी जसे परत जायला निघाले तसा वैदेहीने अनिकेतला अजून एक आश्चर्याचा धक्का दिला. "अनिकेत, मी दादा, वहिनीसोबत ठाण्याला जाऊ का?" अनिकेत सोबत दादा वहिनी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. "जाऊ दे तिला!" अनिकेत आपल्याला संदेश पाठवून विचारणा करणार हे जाणून चॅनने त्याला आधीच उत्तर दिलं.  ते तिघंही बाहेर पडले तसं अनिकेत गॅलरीत येऊन उभा राहिला. पावसानं चांगलाच जोर धरला होता. 

शनिवार - रविवार वैदेही अनिकेतची वेळोवेळी चौकशी करत होती. त्याच्या जेवणाची व्यवस्थित ऑर्डर सुद्धा तिनं दिली होती. दादा वहिनीशी कामापुरता संवाद साधून ती आपल्या भ्रमणध्वनीवरच जास्त वेळ घालवत होती. "त्यांचं आपल्यासारखंच लुटुपुटीचं भांडण झालं असावं. चल आपण बाहेर फिरून येऊ !" दादा वहिनीला म्हणाला.

१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार 

आज अनिकेतसाठी कार्यालयात अत्यंत महत्वाचा दिवस होता. केनेडी अमेरिकेतील कार्यालयात स्थानिक वेळेनुसार सकाळी (म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी) येण्याआधी त्याला बरीच कामगिरी पार पाडायची होती. रात्री उशिरा घरी परतलेल्या वैदेहीशी बोलायला त्याला वेळ नव्हता आणि रसही नव्हता. 

९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

आपल्यासोबत काय होत आहे हे चॅनला समजत नव्हते.  आज रात्री जागून भारतात परतलेल्या अनिकेतसोबत त्याला मोठा पल्ला गाठायचा होता. पण अचानक त्याच्या डोक्यावर एक फटका मारून त्याची शुद्ध घालविण्यात आली होती. काही तासानं शुद्धीवर येताच "आपल्या खोलीत इतक्या सगळ्या सुरक्षापातळ्या पार पाडून कोण पोहोचू शकतो?" हाच पहिला विचार त्याच्या मनात आला होता. "अल्बर्ट?" हा विचार त्याच्या मनात येताच एक मोठी भयाची लहर त्याच्या सर्वांगाला शहारून गेली. 

१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार 

अनिकेत मोठ्या उत्साहानं बांद्रा कार्यालयात पोहोचला होता. व्हिडीओ कॉलवर येताच समोर चॅन आणि अल्बर्टला पाहून तो उत्साहित झाला. "आजच आपण सर्व कामं आटोपून टाकुयात!" अनिकेत मोठ्या उत्साहात म्हणाला. "टेक इट इझी यंग मॅन!" अल्बर्टच्या संयमी शब्दांनी त्याला भानावर आणलं. 

 (क्रमशः )


भाग १ - द्वैत -भाग १  

मंगळवार, १ जुलै, २०२५

द्वैत -भाग २


३ - जुलै - २०५६  सायंकाळ (सॅन दिएगो )

आजच्या दिवसभराचं काम व्यवस्थित आटोपलं म्हणून समाधान पावलेला अनिकेत उबेरमध्ये आरामात बसला. आवडीचं मराठी गाणं भ्रमणध्वनीवर सुरु करून इअरफोन कानात टाकून तो  बाहेरच्या रहदारीकडं पाहू लागला. 

...... 


अनिकेतला बऱ्याच वेळानं जाग आली तेव्हा वेदनेनं त्याचं सर्वांग ठणकत होतं. हात पाय बांधल्याने डोळ्यावरील पट्टी काढण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नक्की काय झालं असावं ह्याचा अंदाज घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. 


४ - जुलै - २०५६ सकाळ  (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट कार्यालयाच्या दिशेनं जाणाऱ्या अनिकेतच्या प्रत्येक हालचालीवर सुक्ष्म नजर ठेवून होते. कार्यालयात पोहोचल्यावर अनिकेतने बायोमेट्रिक प्रवेशद्वारातून यशस्वीरीत्या आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी एकमेकांना हाय फाय देऊन आनंद व्यक्त केला.  "गुड मॉर्निंग सर!" अनिकेतने अभिवादन करताच बॉस केनेडीनं नजरेनंच त्याला प्रतिसाद देतानाच लगेचच माझ्या केबिनमध्ये ये असं सुचवलं. अनिकेत आणि केनेडीची चर्चा बराच वेळ चालली. अनिकेतच्या माध्यमातून ती चर्चा चॅन आणि अल्बर्ट ह्यांना थेट ऐकायला मिळत होती. चर्चेचे सविस्तर तपशील ऐकत असताना चॅनचे छोटे डोळे अगदी विस्फारून जात होते. एकंदरीत योजना यशस्वीरित्या सुरु झाली आहे ह्याविषयी त्यांच्या मनात खात्री निर्माण झाली होती.  

४ - जुलै - २०५६ सायंकाळ  (सॅन दिएगो )

अंधारकोठडीतील अनिकेत संतापानं अगदी पेटून उठला होता. आपल्याशी कोण हा असला खेळ खेळत आहे ह्याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. त्याच गोष्टीचा त्याला जबरदस्त राग येत होता. त्याच बरोबर केवळ बर्गर आणि पिझ्झा खाऊन त्याच्या संतापाचा पारा अगदी वर गेला होता. 

५ - जुलै - २०५६ दुपार  (सॅन दिएगो )

केनेडी आणि अनिकेतची आजची बैठक सुद्धा अगदी यशस्वी झाली होती.  केबिनमधून बाहेर पडता पडता अचानक अनिकेत म्हणाला, "सर, मी सायंकाळचे फ्लाईट बुक करतो. इथली चर्चा बऱ्यापैकी आटोपली आहे, मी आता उर्वरित काम मुंबईतून करू शकतो. " ह्या अनपेक्षित प्रश्नाने केनेडी क्षणभर गोंधळला. पण दुसऱ्याच क्षणाला सावरत "व्हाय नॉट, आताच तू बेकीला सांगून थेट विमानाची सायंकाळची तिकिटं आरक्षित कर !" असं केनेडी म्हणाला. 

हे सारं ऐकणाऱ्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांना हवी ती माहिती मिळाली होती.  

सायंकाळी विमानतळाकडे जाणाऱ्या अनिकेतच्या हालचालीवर चॅन आणि अल्बर्ट नजर ठेवून होते. तिथून येणाऱ्या व्हिडिओमध्ये दूरवर दिसणाऱ्या एका कारमध्ये केनेडी आपल्या कुटुंबासोबत विमानतळातून बाहेर पडणाऱ्या दिशेनं जात आहे असा भास चॅनला झाला. त्याच्या दुर्दैवानं अतिवेगाने जाणारी ती कार क्षणार्धात दूर गेल्यानं अथक प्रयत्न करूनही चॅन आपल्या शंकेचा पाठपुरावा करू शकला नाही. आताच कार्यालयात असणारा केनेडी इथं कसा असू शकेल ह्या शंकेला त्यानं थोडा वेळ विश्रांती दिली. कारण अनिकेतचे इमिग्रेशन कसं सुरळीत पार पडेल ह्यावर त्याला लक्ष द्यायचं होतं. 

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
वैदेही सायंकाळी घरी परतली तेव्हा अनिकेत क्षणभर आश्चर्यानं तिच्याकडं पाहतच राहिला. वैदेही काहीशी लाजली हे पाहून त्यानं पुन्हा संगणकात लक्ष गुंतवलं. तरीही ही इतके मॉडर्न कपडे कधीपासून परिधान करू लागली हा विचार त्याच्या मनात रेंगाळतच राहिला. 

(क्रमशः )

भाग १ - द्वैत -भाग १  

सोमवार, ३० जून, २०२५

द्वैत -भाग १

 


१ - जुलै - २०५६ (मुंबई)

"अनिकेत, अमेरिकेतील ह्या महत्वाच्या प्रोजेक्टसाठी तुला मनःपुर्वक शुभेच्छा ! मला खात्री आहे की तू यशस्वी होऊनच परतशील !"  वांद्रा कार्यालयात आपल्या व्यवस्थापकाच्या ह्या शब्दांकडं अनिकेतचे फारसं लक्ष नव्हतं. आपल्याला विमानतळावरून वैदेहीला न भेटताच परस्पर अमेरिकेला जावं लागतंय ह्याची खंत त्याला बहुदा जाणवत असावी. "धन्यवाद जॉन !" म्हणत त्यानं जॉनच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. लगोलग केबिनमधून बाहेर पडत त्यानं वैदेहीला फोन लावला. "ठीक आहे रे, अनिकेत! मला सवय आहे तुझ्या अशा अचानक ठरणाऱ्या ट्रिपची! मी राहीन व्यवस्थित दोन आठवडे ! तू तुझी काळजी घे !" वैदेही रागावली तर अनिकेतला दडपण येत असे, पण अशा प्रसंगी ती रागावली नाही ह्याचं त्याला अधिक दडपण येई !

अनिकेतने अमेरिकेला पोहोचताच वैदेहीला मेसेज करून आपण सुखरूप पोहोचल्याचा संदेश पाठवला. त्याच्या प्रोजेक्टचे स्वरूप गोपनीय असल्यानं दिवसातून एखादाच मेसेज किंवा फोन करता येईल ह्याचा अंदाज त्यानं वैदेहीला देऊन ठेवला होता. 

३ - जुलै - २०५६ (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट आपल्या तयारीच्या अंतिम टप्प्यात होते. वर्षभर अनेक चाचण्या केल्या तरी डिजिटल अनिकेत भारतात विमानानं सुखरूप पोहोचेल ना, तिथं कार्यालयात आपल्याला हवी असलेली कामगिरी पार पाडेल ना ह्या गोष्टींचं त्यांना दडपण आलंच होतं. त्याहूनही अधिक दडपण होतं ते वैदेहीला अनिकेतच्या ह्या रूपाविषयी काही संशय येणार नाही ना ह्याविषयी !

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
अडीच वाजता घराची बेल वाजली आणि वैदेही दचकून जागी झाली. इतक्या रात्री कोण आलं असणार हा विचार तिच्या मनात आला. अनिकेत घरात नसल्यानं अगदी सावध राहायला हवं हे ही तिनं स्वतःला बजावलं. पीप होल मधून दरवाजाबाहेर अनिकेत आहे हे पाहताच तिची उरलीसुरली झोप उडाली. "अनिकेत, तू आणि इथं कसा काय?" दरवाजा उघडता उघडता ती जवळजवळ ओरडलीच. "अग वैदेही शेजारी जागे होतील ना? मी सारं काही तुला समजावून सांगतो. प्रोजेक्टमध्ये बराच गोंधळ झाला आहे, त्यामुळं मला तातडीनं परतावं लागलं. आताही मला तासभर काम करत बसावं लागेल. तू झोप आता. आपण सकाळी बोलूयात! " अनिकेतने एका दमात सारं काही सांगून टाकलं. "ह्याचं काही जगावेगळंच असतं! " असं स्वतःशीच पुटपुटत वैदेही झोपी गेली. 

सोफ्यावर काम आटपून दमलेला अनिकेत तिथंच झोपी गेला. सकाळी नऊ वाजता त्याला जाग आली तेव्हा घरात अगदी सामसूम होती. "वैदेही गेली कुठं" असा विचार करत अनिकेतने घरात एक फेरी मारली. शेवटी त्यानं भ्रमणध्वनी हातात घेतला तेव्हा त्याला वैदेहीचा संदेश दिसला. "सॉरी अनिकेत, तुला झोपेतून उठवायला मला जीवावर आलं ! मी जातेय ऑफिसला. आपण संध्याकाळी बोलूयात !" अनिकेत आश्चर्यचकित झाला होता. मोजक्या वेळात बरीच कामं आटोपायची होती आणि वैदेहीचं असं अचानक जाणं त्याच्या प्लॅन मध्ये बसणारं नव्हतं !
(क्रमशः ) 

शनिवार, २५ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग 3


आधीच्या भागाच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/07/2.html

आपल्या बॉसचे या महत्वाच्या प्रकरणात लक्ष वेधून घेण्यासाठी बर्नीला बरेच कष्ट करावे लागले. एकतर ६८ वर्षापूर्वी शेवटी लॉगइन झालेले अकाउंटला आता पुन्हा लॉगइन केलं जातं म्हणजे कुठे तरी पाणी मुरत आहे हे बर्नीला नीट समजावून सांगता येत नव्हतं किंवा त्याच्या बॉसला ह्या प्रकरणाचं गांभीर्य कळत नव्हतं. शेवटी एकदाचा  बर्नी आपल्या बॉसला आपलं म्हणणं पटवुन देण्यात यशस्वी झाला. 

मग मात्र बॉसने झटपट सूत्र हलवुन महाराष्ट्र पोलिसांच्या योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. शाल्मलीचा प्रवास वेगाने चालू होता. रस्त्यावरील वाहतुक एव्हाना काहीशी तुरळक झाल्यानं गाडी ऑटोपायलट मध्ये टाकण्यासाठी सुद्धा तिला संधी मिळाली होती.  त्यामुळे तिचं विचारचक्र जोरात सुरु होतं. तरीही बॅकमिरर मधुन सतत डोकावणाऱ्या गाडीनं तिला काहीसं विचलित करण्यास सुरुवात केली होती.  मग तिनं  स्वतः गाडीचा ताबा घेऊन थोडा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. पण ही कार तिला ओव्हरटेक करण्याच्या अजिबात घाईत नव्हती. 

शाल्मलीचा मेंदू एव्हाना खूपच जागृत झाला होता. तिने आपला पाठलाग केला जात आहे हे तिनं मान्य केलं होतं. आपला पाठलाग पृथ्वीवर तो सुद्धा काहीशा अपरिचित प्रदेशात होत आहे हे तिला पुरेसं धोकादायक वाटलं. काही केलं तरी ती चंद्राची नागरिक होती त्यामुळे तिच्या सुरक्षिततेची प्राथमिक जबाबदारी चंद्रांच्या अधिकाऱ्यांकडे होती. तिनं पुन्हा एकदा गाडी ऑटोपायलट टाकून काही मेसेजेस पाठवले. 

शाल्मलीचा पाठलाग करणारा सामंत पुर्ण  उत्साहात आला होता. बऱ्याच दिवसांनी एखाद्या सनसनाटी कामगिरीत सहभागी व्हायची संधी त्याला मिळाली होती. परंतु सावजाचं लक्ष न वेधता पाठलाग करण्यात त्याला यश मिळाले नव्हतं. अचानक त्याचा फोन खणखणला.  "पाठलाग ताबडतोब थांबवावा!" हा संदेश मिळताच
 ठेवणीतले काही शब्द उच्चारून सामंतने पुढील उपलब्ध एक्झिट घेतला.  तेथील फूड मॉलमध्ये जाऊन तोआपला राग शांत करीत तो बसला. 

सामंतांचा बॉस असणाऱ्या  तळेकरचा मात्र भेजा खलास झाला होता. प्रथम 
अमेरिकेतून कॉल येऊन त्याला द्रुतगती मार्गावर त्याला आपल्या माणसाला पाठलाग करण्याचे  आदेश द्यावे लागले होते. पाठलाग अगदी रंगात येताच मात्र एका तासातच चंद्रावरून एक अशक्यप्राय व्यक्तीने त्याला हुकुमी स्वरात पाठलाग रद्द करण्याचे आदेश दिले होते. 

गाडी जशी दिसेनाशी झाली तसे शाल्मलीने सुटकेचा निश्वास टाकला. गुहागरला पोहोचेस्तोवर रात्रीचे दहा वाजले होते. तिनं तिथलं एक छोटेखानी पण चांगलं हॉटेल बुक केलं. फ्रेश होऊन कुतूहल न शमल्यानं शाल्मली पुन्हा नीलाच्या फेसबुक अकाउंटला लॉग इन करती झाली.  "हॅलो" नीलाच्या अकाउंटवर कोणीतरी तिला पिंग केले होते. "हाय" शाल्मलीने त्या पिंगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला खरा पण त्यानंतर आपण हे बरोबर केले का या विचारात ती पडली होती.  "या अकाउंटवर कोण लॉग इन आहे?" अशी समोरुन विचारणा झाली.  ह्या उद्धट माणसाला काय उत्तर द्यावे ह्या विचारात असताना नीलाला प्रत्यक्षात ओळखणारे कोणीतरी अजूनही जिवंत आहे हा विचार तिला काहीसा दिलासा देऊन गेला. 

"मी आहे राजेश!" शाल्मलीने धडधडीत खोटं उत्तर दिलं.  "आपण कोण आहात?" शाल्मलीने राजेशच्या पडद्याआडून काहीसा धाडसी प्रश्न विचारला. थोडावेळ समोरून काही उत्तर आले नाही. मग आपण कुठे आहात हा प्रश्न तिने विचारला. "मी कोकणात गुहागरला आहे" ह्या उत्तराने तिच्या अंगावर शहाऱ्याची लहर पसरुन गेली. "मी सुद्धा.... " तिच्या तोंडात आलेले हे वाक्य पूर्ण होण्याच्या आधी कोणत्यातरी अद्भुत शक्तीने तिला थांबविलं अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. 

काहीशा भितीनं तिनं घाईघाईनं लॉगआऊट केलं खरं पण  तिची उत्सुकता तिला स्वस्थ बसु देत नव्हती. तिनं पंधरा मिनिटांनी पुन्हा लॉगइन केलं. ती व्यक्ती ऑनलाइन नव्हती. शाल्मलीनं नीलाच्या अकाउंटची बारकाईनं तपासणी सुरू केली. आता ज्या व्यक्तीने पिंग केले होते त्या व्यक्तीचे आणि निलाचे बरेच सामायिक मित्र होते. त्या मित्रांच्या यादीवर लक्ष टाकताना एका नावाने तिचे लक्ष वेधून घेतले. सरंजामे नावाची एक व्यक्ती होती. त्या व्यक्तीची आणि नीलाची फ्रेंड हिस्टरी पाहताना बऱ्याच गोष्टी शाल्मलीला उलगडत गेल्या होत्या. 

सरंजामे आणि नीला कॉलेजच्या जीवनात प्रथम एकत्र भेटले होते. त्यानंतर बहुधा एकत्रही आले होते. परंतु काही कारणाने मध्ये अनेक वर्ष दोघांचा संपर्क नसावा असे एकंदरीत वाटत होते. अचानक २०१९ साली पुन्हा सरंजामे नीलाच्या संपर्कात आला होता. तिथून मग मात्र नीलाच्या जीवनात खळबळ माजण्यास सुरुवात झाली होती. शाल्मली इतक्या सर्व काही विचारात असताना " हॅलो!" पुन्हा एकदा समोरील व्यक्तीने पिंग केले! या व्यक्तीचे नाव होते जोशी. वय वर्षे ८५ म्हणजे नीला आणि शाल्मली या दोघांना जाणणारी सध्यातरी एकमेव व्यक्ती ! "मी इथे कोकणातच आहे,  मी उद्या गुहागरला येऊ शकतो!" राजेशच्या अवतारातील शाल्मली म्हणाली.  "सकाळी ११ वाजता!" शाल्मलीला आपला विचार बदलण्याची संधी न देता जोशी आजोबा म्हणाले आणि क्षणार्धात गायब झाले सुद्धा !

शाल्मलीला आता मात्र झोप येऊ लागली होती. पण इतक्यात तिला काहीतरी सुचलं ! तिनं एक मेसेज टाकला आणि पाचव्या मिनिटाला तिचा बॉस नॅथनची हॉलॉग्राफिक प्रतिमा तिच्यासमोर अवतीर्ण झाली होती. "शाल्मली, हा काय प्रकार सुरु आहे?" त्यानं काहीशा दरडावणीच्या सुरात विचारलं. "थोडंसं धाडस सुरु आहे इतकंच !" शाल्मली म्हणाली. तो बहुदा कामात खूप गर्क होता. "टेक केअर !" इतकं बोलुन तो गायब झाला ! आणि दमलीभागली शाल्मली सुद्दा दोन मिनिटात झोपी गेली! 

त्या छोटेखानी रेस्टाँरंटमध्ये जोशीआजोबांना शोधुन काढण्यास शाल्मलीला फारसा वेळ लागला नाही ! "राजेश!" त्यांच्यासमोर आत्मविश्वासानं जात, मिळवत आणि खुर्ची सरकवत आसनस्थ होत शाल्मली म्हणाली. 

"ओह आय सी !" आपल्या चेहऱ्यावरील आश्चर्य लपविण्याचा प्रयत्न करीत आजोबा म्हणाले. 

"तु निलाचे अकाऊंट हॅक का आणि कसं केलंस ?" आजोबांनी थेट मुद्द्याला हात घातला. 

"कोकणाविषयीच्या माझ्या आकर्षणामुळं मी नीलाताईंच्या अकाउंटपर्यंत पोहोचले ! आणि ... " 

"तू करतेस काय? " जोशीआजोबांनी  तिला अडवलं ते बहुदा तिच्याकडुन आपल्याला अकाउंटविषयी काही खरी माहिती मिळणार नाही ह्याची खात्री पटल्यानं !

"मी चंद्रावर असते ! आणि बाकी काही सांगु शकत नाही !" शाल्मली म्हणाली. 

जोशीआजोबांच्या चेहऱ्यावरील भाव पालटले होते ! 

"आपण नीलाताईंचे कोण ?" शाल्मलीने प्रश्न विचारला. 

"त्यांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध होते!" जोशीआजोबा तुटकपणे म्हणाले. त्यांच्या डोक्यात विचारचक्र  सुरु होती ह्यात शंका नव्हती !

आता पुढं बोलायचं काय ह्याविषयी शाल्मलीला प्रश्न पडला होता !  
"त्यावेळचं कोकण किती छान होतं किनई !" तिच्या तोंडुन किनई शब्द ऐकुन जोशीआजोबांइतकीच तीही आश्चर्यचकित झाली होती. आजोबा काही बोलण्याच्या मुडमध्ये नसल्यानं तिचीच गडबड सुरु होती. खरंतर ती एक मितभाषी व्यक्ती होती. परंतु आज काहीतरी आगळंवेगळं घडत होतं!   आणि बोलताबोलता 

"हे सरंजामे कोण हो ?" हा प्रश्न तिच्या तोंडुन निघाला ! आजोबांच्या चेहऱ्यावरील भाव आता पुर्णपणे पालटले. त्यानंतर त्यांना आलेली खोकल्याची उबळ खोटी आहे हे सांगायला कोणा तज्ञाची गरज नव्हती ! त्याचं निमित्त करुन "मी आलो थोड्याच वेळात!" म्हणुन ते घाईघाईनं आतील कक्षात असलेल्या वॉशबेसिन मध्ये गेले ! 

का कोणास एका अनामिक भितीच्या भावनेनं शाल्मलीला स्पर्श केला होता. "U5435" तिनं नॅथनला मेसेज केला. "मला मदतीची तातडीनं गरज आहे " असा त्याचा अर्थ होता. नॅथन इतक्या त्वरित कशी मदत करणार ह्याविषयी तिच्या मनात शंका होतीच! घाईघाईनं तिनं रेस्टॉरंटमधुन काढता पाय घेतला.  

"गुड मॉर्निंग !" बाहेर उभ्या असलेल्या एका देखण्या युवकानं तिला साद दिली. साडेअकरा वाजता एकट्या दुकट्या तरुणीला पाहुन गुड मॉर्निंग करणाऱ्या तरुणांविषयी २०९० साली सुद्धा तरुणींच्या मनात काही सॉफ्ट कॉर्नर असण्याची शक्यता कमीच होती ! पण प्रसंग वेगळा होता. शाल्मली त्या तरुणासोबत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या त्याच्या कारकडं चालु लागली होती !

(क्रमशः)

गुरुवार, २३ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग 2



T O m A t O K e T c H u P 

लाल भगव्या रंगांच्या त्या अगडबंब अक्षरांनी neela.limayeabcd चे अकाऊंट लॉग इन झालं होते. "अय्या किती मस्त DP होता हिचा !" शाल्मलीच्या तोंडातुन आपसुकच शब्द बाहेर पडले !  शाल्मली हळुहळू त्या नीलाच्या विश्वात रंगत गेली. विसाव्या शतकातील हिरव्यागार कोकणच्या नयनरम्य फोटोंनी निलाची प्रोफाइल व्यापुन टाकली होती. "अरे वा ! " ती मनातल्या मनात म्हणाली. आपण ज्या कोकणच्या केवळ कथाच ऐकल्या ते प्रत्यक्ष फोटोतुन बघण्याची संधी तिला मिळाली होती !

हिचा जन्म किती सालचा असावा बरे ? हा विचार येण्याच्या एका मिनिटातच ती निलाच्या account information विभागात होती. २४-सप्टेंबर-१९६४ ही निलाची जन्मतारीख पाहुन तिच्या पायाखालील जमीन सरकल्याचा  तिला भास झाला. तरीही मनाची समजुत म्हणुन तिनं आपलं ID कार्ड पुन्हा एकदा निरखुन पाहिलं. शाल्मली सरपोतदार जन्मतारीख २४-सप्टेंबर-२०६४!

आता शाल्मली तिथुन बाहेर निघणं केवळ अशक्य होतं. त्यानंतर तिला पुढील एक धक्का मिळाला. नीलाच्या ह्या प्रोफाईलवर २०२२ सालानंतर  नोंदी दिसत नव्हत्या. नाही म्हणायला "तु आमच्या सदैव लक्षात राहशील!" "एक हसतं खेळतं दिलखुलास व्यक्तिमत्व !" वगैरे कॉमेंट्स होत्या ! ह्या नीलाला वाहिलेली श्रद्धांजली आहे हे कळायला शाल्मलीला वेळ लागला होता ! म्हणजे ह्या बाई अठ्ठावनाव्या वर्षी स्वर्गवासी झाल्या ! शाल्मली स्वतःशी म्हणाली ! 

शाल्मली थोडी अजुन पुढे सरकली तर एक विशेष गोष्ट तिच्या ध्यानात आली ! २०१९ सालापासून बऱ्याचशा पोस्टचे प्रायव्हसी सेटिंग Only Me असे होते.  आणि ह्या पोस्टमध्ये बरीचशी गुप्त माहिती नोंदवली गेली आहे हे शाल्मलीला सहजासहजी समजत होते. "कोण्याच्या अकाउंट मध्ये असं डोकावुन पाहणे चुकीचं आहे" हे तिच्या सद्सद् विवेकबुद्धीनं तिला समजावलं. तिने जवळपास लॉग आऊटचा पर्याय स्वीकारला होताच पण अचानक तिचं लक्ष गेलं, "तु मला का त्रास देतोयस ! मी तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टींचा ताबा तुला दिलाय ना ?" ह्या प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या अजुन एका पोस्टकडे !

तो पुर्ण दिवस शाल्मली त्या अकाऊंटवरच होती ! प्रायव्हसी सेटिंग Only Me असलेल्या नोंदी तिला एका गूढ विश्वात घेऊन जात होत्या ! सायंकाळचे चार वाजले होते. आई वडिलांनी आफ्रिकेतुन केलेला कॉल तिनं धुडकावून लावला होता.  बरोबर चार वाजुन पंधरा मिनिटांनी शाल्मली सरपोतदार आपली आलिशान गाडी घेऊन मुंबई कोकण ह्या बारा पदरी आलिशान द्रुतगती मार्गावरुन निघाल्या होत्या ! 

सॅनफ्रॅन्सिस्को मध्ये राहणारा आणि फेसबुकच्या जुन्या कर्मचारीवर्गापैकी एक बर्नी सकाळी आपल्या घरुन लॉगिन झाला होता. सर्व Health Check रिपोर्ट्सवर नजर टाकुन सर्वकाही आलबेल असल्याची खातरजमा करुन घेण्याची त्याची जबाबदारी होती ! लॉगिन केल्यानंतर बरोबर दुसऱ्या मिनिटाला त्याची चाणाक्ष नजर एका नोंदीवर पडली होती. गेले ६८ वर्षे निष्क्रिय असलेल्या अकाउंटवर कोणीतरी लॉगिन केले होते. ज्या गॅजेटमधुन हे लॉगिन झालं होते ते गॅजेट प्रतिताशी १५० किमी वेगानं अशा ठिकाणी जात होतं जिथं त्या अकाउंटने १९९० ते २०२२ सालांपर्यंत सक्रियता दर्शवली होती ! 

(क्रमशः )

पहिला भाग 
https://patil2011.blogspot.com/2020/07/blog-post_21.html 



मंगळवार, २१ जुलै, २०२०

टोमॅटो केचप - भाग १



साल - २०९० 

चंदावरील आपली आठ महिन्याची वार्षिक नेमणूक संपवून शाल्मली पृथ्वीवर परतली होती.  चंद्रावरून परत येण्याची ही तिची पहिलीच वेळ नसली तरी पृथ्वीवरील वेळेला सराव होण्यासाठी तिला एक आठवडा नक्कीच जात असे. वर्षातून आठ महिने चंद्रावर नेमणूक, पृथ्वीवर त्यानंतर तीन महिने सुट्टी आणि मग पृथ्वीवरून एक महिना कामाला सुरुवात असेच तिचे वेळापत्रक गेले सहा वर्ष सुरू होते. तिचे आई-वडील आफ्रिकेत वसवल्या गेलेल्या मराठी वसाहतीत राहत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते आफ्रिकेतील हवामानाला बरेचसे सरावले होते.  शाल्मली त्यांना महाराष्ट्र मुंबई भेटीला येण्याचा आग्रह करत होती. परंतु यावर्षी मात्र काहीसे तयार नाही असे तिला वाटु लागले होते. 

मुंबईतील त्यांचा फ्लॅट प्रशस्त होता. इथं या अपार्टमेन्ट कॉम्प्लेक्स मध्येच  शेती आणि दुग्धव्यवसाय विकसित केले गेल्यामुळे तिची याबाबतीत गैरसोय होण्याची शक्यता तशी कमीच होती. तिच्या लग्नाचा विषय तिच्यासोबत चर्चेला आणणं म्हणजे उगाच मनस्ताप करून घेणं याची तिच्या आईला आई-वडिलांना पूर्ण कल्पना असल्यानं हल्ली त्यांनी हा विषय तिच्यासोबत काढणार टाळलं होतं. मंगळावरील वसाहतीमध्ये कायम वास्तव्य करण्यासाठी आपला क्रमांक कधी लागतो याची ते वाट पाहत होते. 

अशाच एका रात्री झोपेची वाट पाहत असतानाच शाल्मलीने आपले जुने पुराणे फेसबुक अकाउंट उघडले. तिनं दहा वर्षापुर्वी उघडलेलं हे अकाउंट ती पृथ्वीवरील वास्तव्यात वापरत असे. पृथ्वीवरील मित्रमैत्रिणींशी थोडाफार संपर्क ठेवण्यासाठी हे अकाउंट कामास येत असे. चंद्रावरील मनुष्य आणि परग्रहवासी ह्यांच्या संयुक्त वसाहतीत असले उद्योग करणं तिला शक्य होत नसे. तिच्या मेंदुला आकर्षित करेल असला कोणताही अपडेट तिला पहिल्या नजरेत दिसला नाही. ती लॉगऑऊट करणार इतक्यात तिची नजर People You May Know ह्या विभागाकडं गेली. 

नीला लिमये ह्या व्यक्तीच्या प्रोफाईलकडे लक्ष जाताच तिच्या मनात काहीशी अस्पष्टशी बैचैनीची भावना जाणवुन गेली. असेल काही तरी अशी मनाची समजुत काढुन ती परत झोपण्याचा प्रयत्न करु लागली.  कधीतरी तिला झोप लागली. तिला अधुनमधून स्वप्नं पडत. आजही असंच काही स्वप्न पडत राहिलं. सुरुवातीला काहीसं सर्वसाधारण भासणाऱ्या स्वप्नानं मग मात्र काहीसं वेगळं रुप घेतलं. भोवताली अफाट विस्तार असलेली पोकळी तिच्यासमोर होती. त्या पोकळीत लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे कोणत्याही क्रमानं तिच्याभोवती वेगानं येत आणि निघुन जात होती. काही वेळ असंबद्ध वाटणारा ह्या क्रमात काहीतरी एक पॅटर्न आहे हे जाणवायला तिच्या कुशाग्र मेंदुला वेळ लागला नाही! Fibonacci series च्या क्रमातील अक्षरेच फक्त जर लक्षात ठेवली तर एक विशिष्ट शब्द तयार होतोय हे तिला समजलं. तो शब्द तिच्या मेंदूने कुठंतरी नोंदवुन ठेवला. ह्या शब्दांची ही कसरत थांबली तेव्हा अचानक @gmail.com ही शब्दसाखळी एक सेकंद तिच्या डोळ्यासमोर आली आणि सर्व काही शांत झालं. ह्या नंतर तिला कधी झोप लागली हे तिला समजलंच नाही !  

दुसऱ्या दिवशी तिला जाग आली तिला जवळपास दुपारचे बारा वाजले होते. सर्व काही आटपुन ती फुरसतीत बसली नसेल तितक्यात तिच्यासमोर ती लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे पुन्हा एकदा पिंगा घालु लागली ! ती खरंतर कधी बैचैन होत नसे पण हा प्रकार तिला नक्कीच त्रासदायक होत होता. तिनं मग काही काळ नृत्य केलं, विविध प्रकारचं संगीत ऐकलं पण फारसा फरक पडत नाही हे तिला ध्यानात आलं. दमली भागली शाल्मली त्रस्त मनानं पुन्हा एकदा लॅपटॉपवर बसली.आजच्या दिवसात तिच्यासाठी काही ठीक घडावं असं नियतीला मान्य नसावं! फेसबुक उघडता क्षणीच तिच्यासमोर नीला लिमयेची प्रोफाइल आली! 

शाल्मली ह्या क्षणी आपलं संतुलन गमवून बसली. चंद्रावरील आपल्या अवतारात ती एक प्रसिद्ध संशोधक होती. तिचा मेंदु कसा विचार करेल ह्याचा तिलाही बऱ्याच वेळा थांगपत्ता लागत नसे. आपल्या मेंदुवर कोणी बाह्य शक्ती ताबा घेत असावी असा तिला दाट संशय होता. आताही असेच झालं. तिनं आपल्या अकाउंटमधुन लॉगऑऊट केलं आणि Login into new account हा पर्याय स्वीकारला. neela.limayeabcd  ह्यातील abcd हे वर्ष आपण का टाईप केला ह्याचा तिला विचार करायचा नव्हता. ई-मेलचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी ती गोंधळली ते क्षणभरच ! @gmail.com ची स्वप्नातील शब्दसाखळी तिच्यासमोर स्पष्टपणे झळकली होती ! 

आता प्रश्न होता तो पासवर्डचा ! लाल भगव्या रंगांची अगडबंब अक्षरे तिच्या चांगलीच लक्षात होती ! 
(क्रमशः )

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

मोगरा


आज बंगल्यामध्ये सायंकाळपासुनच लगबग सुरु होती. माळीदादा आधीच नीटनेटक्या असलेल्या बागेला अजून सोंदर्य आणून द्यायचा प्रयत्न करीत होते. पाण्याच्या कारंज्यामध्ये सर्व फुलं न्हाऊन निघत होती अन प्रसन्नचित्ताने पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यावर डोलत होती. बंगल्यातील मोठ्या दिवाणखान्यात संगीताच्या बैठकीची तयारी मोठ्या जोमानं सुरु होती. रंगनाथरावांची आणि त्यांच्या सोबतीला साथ देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची आसनं व्यवस्थित मांडून ठेवण्यात आली होती.  मैफिल संध्याकाळी उशिरा सुरु होऊन बहुदा पहाटेपर्यंत चालणार होती. त्यामुळे अशा मैफिलीला पोषक वातावरणासाठी आवश्यक अशी प्रकाशरचना करण्यासाठी दिवाणजी आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. 

रंगनाथरावांना सर्व काही अगदी परिपूर्ण हवं असे.  संपूर्ण बैठकीत त्यांना काही खटकेल असे घडलं तर त्यांचा मुड खराब होऊन जाई! आजचा कार्यक्रम तसा खासच असणार होता. शहरातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी कार्यक्रमाला हजर असणार होती. कार्यक्रमाला अजूनही दीड तास बाकी असला तरी रंगनाथराव आपल्या रियाजामध्ये मग्न होते अशा दिवशी त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय आणलेला त्यांना अजिबात खपत नसे हे त्यांच्या नजीकच्या सर्व मंडळींना माहीत होतेच! आणि त्या सर्व नजीकच्या मंडळीमध्ये समावेश होता तो त्यांची अर्धांगी राधिका हिचा!

या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि त्यांच्या पुर्वतयारीमध्ये त्यांचा सहभाग असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्ण रंगत येत नसे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांना माहेरी जावं लागलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनात छोट्या मोठ्या उणिवा राहून गेल्या होत्या. मग त्यामुळे रंगनाथरावांचा शेवटपर्यंत सुर लागलाच नाही.  सर्व रसिकांनी दाद दिली खरी परंतु कुठेतरी काहीतरी राहून गेलं याची जशी रसिकांना जाणीव झाली तशी रंगनाथरावांनासुद्धा!!

ठरल्याप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजता मंडळींचं आगमन व्हायला सुरुवात झाली. त्यांचे स्वागत करण्यात आणि बैठकीमधील त्यांच्या स्थानावर त्यांना  आग्रहानं बसवून देण्यात व्यवस्थापकासोबत राधिकानेसुद्धा मनापासून सहभाग घेतला होता. 
ठीक सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.  सुरुवातीपासून आज रंगनाथरावांचा सूर लागला होता. एकाहून एक सुरेख राग ते गात होते आणि मंडळी मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आस्वाद घेत होती!  राधिकेच्या खास देखरेखीखाली सर्व रसिकांची अल्पोपहाराची सोयसुद्धा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती! त्यामुळे रसिकांसाठी ही एक सुवर्णपर्वणी होती असं म्हणायला हरकत नाही! अपेक्षेनुसार मैफिल पहाटेपर्यंत चालली.  रंगनाथरावांना साथ देण्यास आलेले कलाकारसुद्धा ताकदीचे होते. त्यामुळे मध्ये काही वेळ विश्रांती घेऊन रंगनाथराव ताजेतवाने  होऊन येत होते.  आणि पुन्हा रसिकांना आपल्या सुरांच्या वर्षावात न्हाऊ घालत होते. 

गवाक्षांतून पहाटेचा झुंजुमुंजु वारा मंडळींच्या अंगावर आला आणि मग रंगनाथरावांनी आपल्या शेवटच्या सुरांनी रसिकांना तृप्ततेच्या शिखरावर नेऊन बैठकीचा शेवट केला! कधी नव्हे ते दोन मिनिटं बोलुन त्यांनी रसिकांचं आभार सुद्धा मानले. त्यातील त्यांचं शेवटचं वाक्य राधिकेला सुखद धक्का देऊन गेलं! "हे सर्व काही शक्य झालं ते केवळ माझ्या सौभाग्यवतीमुळे!" आपल्या आभारप्रदर्शनाच्या शेवटी ते बोलले! आपली आयुष्यभराची मेहनत या एका वाक्यामुळे सार्थकी लागली असं तिला  त्याक्षणी वाटले! सर्व मंडळी निघतोवर सकाळ झाली होती.  सूर्यदेवाची कोवळी किरणे शयनगृहात प्रवेश करती झाली होती. घरातील थोडीफार आवराआवर करुन कौतुकाचा तो क्षण रंगनाथरावांच्या तोंडून पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी म्हणून राधिका घाईघाईने येती झाली. तोवर रंगनाथराव एखाद्या लहान मुलाप्रमाणे निद्रादेवीच्या अधीन झाले होते.  त्यांची ही गाढ झोप पाहून राधिका हिरमुसली झाली!

दुसरा दिवस अगदी निवांत चालला होता.  दिवसाच्या ह्यावेळी झोप येणं राधिकेला शक्यच नव्हते! परंतु थोडा वेळ तिने झोपण्याचा प्रयत्न केला.  मग ह्या अयशस्वी प्रयत्नानंतर ती उठून घराच्या आवराआवरीला लागली.  रंगनाथराव दुपारी केव्हातरी उठले तोवर घर आपलं पूर्वीचं रुप घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हजर होतं.  ते घर आणि मालकीण दोघेही रंगनाथरावांच्या एका कौतुकाच्या शब्दासाठी आणि नजरेसाठी आसुसलेले होते.  परंतु रंगनाथराव मात्र आपल्याच तंद्रीमध्ये होते. आपली आंघोळ वगैरे आटपून ते जेवणासाठी आले.  त्यांच्या खास पसंतीचा मेनू राधिकेनं बनवला होता.  त्यांनी राधिकेकडे घरातील सर्व व्यावहारिक गोष्टींची चौकशी केली.  कार्यक्रमासाठी ज्या काही गोष्टी मागवल्या होत्या त्या सर्व गोष्टींची बिले वेळच्या वेळी चुकवण्यासाठी त्यांनी राधिकेला  स्मरण करुन दिले.  त्यानंतर मात्र ते विविध  लोकांकडून  येणाऱ्या अभिनंदनपर  फोन कॉल्सना उत्तरं देण्यात  गढून गेले!

दुपारी दमल्याभागल्या राधिकेला केव्हा डोळा लागला ते तिचं तिला कळलं नाही! जाग आली ती सायंकाळच्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर येऊन तिला उठवलं म्हणून! आपल्याला इतकी कशी गाढ झोप लागली या अपराधीभावनेनं राधिका झटपट उठून बाहेर आली! तर तोवर रंगनाथराव आणि ड्रायव्हर शहरामध्ये कामासाठी गेलं असल्याचे तिला समजलं! ती चहाचा कप घेऊन बाहेर झोपाळ्यावर घेऊन बसली. समोरच मोगरा फुलला होता! संध्याकाळच्या वाऱ्यावर मोगऱ्याची फुलं
डुलत होती. राधिकेला ती फुले पाहून काय वाटलं कुणास ठाऊक परंतु ती झोपाळ्यावरुन त्या फुलांच्या जवळ जाऊन बसली, त्यांना अलगदपणे गोंजारुन त्यांच्याशी शब्दांवाचुनच्या गप्पा मारु लागली! अचानक एक एकटी संध्याकाळ एकटी राहिली नव्हती!

शहरातून रात्री केव्हातरी रंगनाथराव परतले ते पुढील सात दिवसासाठी आपण नागपुरात दौऱ्यासाठी जात आहोत ही बातमी घेऊनच! का कुणास ठाऊक पण एका त्रयस्थ भावनेनं राधिकेने त्यांची ही बातमी ऐकून घेतली!यांत्रिकपणे झटपट तिनं  रावांची तयारी करुन दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच रावांना निघायचे असल्यामुळे त्यांना रात्री लगेच झोपणे आवश्यक आहे हे अध्याहृतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच राव आपल्या ड्रायव्हर सोबत निघून गेले. आठवडाभरासाठीचे पैसे रात्रीच तिला देण्यास ते विसरले नव्हते. 

पुर्ण दिवस राधिकेला खायला उठला होता. काय करावं हे समजत नव्हतं!
ती असंच काहीतरी काम काढून वेळ पुढे ढकलत होती. सायंकाळी पुन्हा एकदा झोपाळ्यावर येऊन बसली असता तो मोगरा एकदा तिला हसताना आणि डुलताना दिसला! तिच्या मनात विचार आला हा किती सुंदर नाच करीत आहे ना! तिला काय वाटलं कुणास ठाऊक! ती मग त्या पुन्हा मोगऱ्याजवळ गेली! बराच वेळ काही न बोलता त्याच्याजवळ बसून राहिली!  "मी तुझ्यासारखे नृत्य केले तर तुला आवडेल ना?" तिनं हळुवारपणे मोगऱ्याला विचारले आणि काय आश्चर्य! त्या मोगऱ्यानं जणु काही आनंदानं स्वतःभोवती डुलकी घेतली !

पुढील आठवडाभर राधिकेचा नृत्याचा सराव जोमानं सुरु होता! महाविद्यालयात असताना ती एक बऱ्यापैकी शास्त्रीय नृत्य करायची! पण पदवीनंतर लगेच लग्न जमलं आणि मग सारं काही राहुनच गेलं होतं ! राधिकेच्या नृत्याचा आवाज ऐकुन एक दिवस तिची शेजारच्या बंगल्यातील मैत्रीण जुई न राहवुन तिच्याकडं आली. "अगं तु इतकं सुंदर नृत्य करतेस हे मला माहीतच नव्हतं !" तिचं नृत्य पाहुन जुई म्हणाली. जुईला सुद्धा शास्त्रीय नृत्याची चांगलीच जाणीव होती. आठवडाभर दोघींचा सराव अगदी जोमात सुरु राहिला! मधल्या काही वर्षांचा जणु काही खंड पडलाच नाही असंच राधिकेला वाटु लागलं ! 

दिवसेंदिवस सायंकाळी मोगरा अजुनच जोमानं फुलू लागला होता!

राधिका सायंकाळी ध्वनिमुद्रिका लाऊन आपल्या नृत्याचा सराव करत होती. आणि अचानक अंगणात रावांची गाडी येऊन थांबली. राव आज येणार हे माहिती असलं तरी इतक्या लवकर येतील ही राधिकेनं अपेक्षा केली नव्हती! राव दिवाणखान्यात येईस्तोवर राधिकेला आवरायला वेळ मिळाला नाही ! राधिकेला ह्या अवतारात पाहुन रावांच्या चेहऱ्यावरील रागाचे भाव पाहुन राधिका पार भयभीत झाली होती. 

पुढील काही दिवस रावांनी अगदी अबोला धरला होता. राधिकेला काय करावं हे अजिबात समजत नव्हतं! शेवटी आठवड्याभरानंतर न राहवुन तिनं  रावांकडं विषय काढला, "काय झालं अबोला धरायला?" "ह्या वाड्यातील सुनेनं आजतोवर कधी नाच केला नव्हता! " कडक स्वरात एक वाक्य  बोलुन राव दिवाणखान्याबाहेर निघुन गेले होते. 

रावांच्या ह्या उत्तरानंतर राधिकेकडं पर्याय उरला नव्हता! एका भरल्या घरातील रितेपण घेऊन जगण्यावाचुन तिच्याकडं दुसरा पर्याय तिला दिसत नव्हता! बागेतील मोगऱ्याचा बहरसुद्धा ओसरला होता! 

समोरच गाण्याची ध्वनिमुद्रिका पडली होती "मोगरा फुलला"... राधिकेनं जवळच पडलेलं पेन घेतलं आणि त्यावर शब्द खरडले "आणि कोमेजला देखील !!"

शनिवार, ८ सप्टेंबर, २०१८

आदिम वसाहत - कथा भाग १




दिवस पहिला 

मनानं कितीही निर्धार केला असला तरी प्रत्यक्षात ती वेळ येऊन ठेपली त्यावेळी मात्र अत्यंत द्विधा मनस्थिती झाली होती. या पृथ्वीवर राहुन बाकीच्या सर्व मानवजातीपासुन दुर होण्याचा क्षण समीप आला होता. एकदा का या वसाहतीचे दरवाजे उघडले गेले आणि आम्ही सर्व दीड हजार मंडळी त्या प्रवेशदारातुन आत शिरलो की मग ते भलेमोठे लोखंडीद्वार बंद होणार होते. मग एकत्र राहणार होती ती केवळ दीड हजार मंडळी! यातील माझी पत्नी आणि दीड वर्षाचा आर्यन सोडला तर बाकी कोणीही परिचित नव्हते, किंबहुना या उपक्रमाची ती एक पूर्वअट होती. प्रतिक्षाकक्षातील वातावरण खुपच नियोजनबद्ध होतं. आम्हां सर्वांना एक विशिष्ट सांकेतिक क्रमांक देण्यात आला होता. आम्ही बंद कक्षात आमचा क्रमांक पुकारला जाण्याची वाट पाहत होतो. विविध वयोगटातील विविध राष्ट्रांची ही माणसे होती. या सर्वांसोबत आता पुढील आयुष्य व्यतीत करायचं होतं.  आयुष्यच नव्हे तर आपल्या पुढील पिढ्यादेखील या सर्वांच्या आणि त्यांच्या पुढील पिढ्यांसोबत राहणार होते. 

ह्या लोखंडी द्वाराच्या पलीकडं बफर प्रदेश होता आणि तो संपला की विस्तृत महाकाय प्रदेश सुरु होणार होता. इथं सुरुवातीच्या काळात आम्हाला जिवंत राहता यावं यासाठी दुर दुर अंतरावर तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय करण्यात आली होती. ही माहिती आम्हांला आधी देण्यात आली होती आणि त्याचे नकाशेसुद्धा आम्हाला इंटरनेटवर पाठविण्यात आले होते. परंतु नकाशांच्या छापील प्रती घेऊन जाण्यास आम्हाला मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मनात साठवलेल्या प्रतिमेवर विश्वास ठेवून आम्हाला यातील उत्तम जागा शोधायची होती!! उत्तम म्हणजे काय याची व्याख्या त्या जगात काय असेल याची काहीही पुर्वकल्पना आम्हांला नव्हती. आमच्यासोबत ह्या महाकाय प्रदेशात येणाऱ्या बाकीच्या दीड हजार लोकांपैकी काहींची तरी ओळख असावी म्हणून त्यांची नावे आम्हाला सांगावीत म्हणून आम्ही असंख्य विनवण्या केल्या होत्या. परंतु आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत. 

असा बराच वेळ विचार करीत असताना अचानक ते महाकाय प्रवेशद्वार उघडलं गेलं. सर्वत्र जमलेल्या नातेवाईकांचा जवळजवळ आक्रोश म्हणता येईल असा आवाज सर्वत्र पसरला. परंतु मनाचा निर्धार केला असल्यामुळे आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करून प्रवेशद्वारातून शिरु लागलो. बफर झोन मधून चालताना मनात विविध भावनांचे कल्लोळ उमटले होते. आर्यनला काही छोटी मुले दिसल्यामुळे तो काहीसा मजेत होताआणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा पण प्रयत्न करत होता. परंतु आम्ही सध्या तरी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत होतो. शेवटी एकदाचा बफर झोन संपला आणि पुन्हा एका महाकाय प्रवेशद्वाराने आमचे स्वागत केले.  इथे मानवी सुरक्षा नसली तरी विद्युत् प्रवाहाचे प्रचंड जाळे सोडून कोणीही एका भागातून दुसऱ्या भागात जाऊ शकणार नाही याची व्यवस्था करण्यात आली होती आणि शेवटचा माणूस आत मध्ये शिरल्यावर हा प्रचंड क्षमतेचा विद्युत प्रवाह सक्रिय होणार होता. सर्व दीड हजार माणसे आत शिरायला जवळपास एक तास लागला आणि शेवटचा माणूस आत शिरताच ते महाकाय प्रवेशद्वार बंद झालं. 

सर्वत्र काहीशी शांतता पसरली होती. आता पुढे नक्की काय करायचं हे ठरत नव्हतं. कोणीतरी पुढाकार घेऊन पुढील पावले आखणे आवश्यक होते. ह्या अभूतपूर्व प्रकल्पात सहभागी होण्यासाठी निवड होणे हे फार मोठे जिकरीचे काम होते. जगभरातील सर्व देशातून इच्छुक नागरिकांचे अर्ज मागवण्यात आले होते आणि त्यानंतर प्रत्येक देशातील लोकसंख्येनुसार त्यांना निवड करण्यात आली होती. आम्ही या प्रक्रियेत गंमत म्हणून सुरुवातीला सहभागी झालो. परंतु जसजसे निवडप्रक्रियेचे टप्पे पार पडत गेले त्यानुसार मनाला खूप आनंद कसा होत गेला तसं दडपणसुद्धा वाढत गेलं. एका कमकुवत क्षणी आम्ही ह्या प्रकल्पातुन बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेला पोहोचलो होतो परंतु आता असला कोणताही विचार करणं तुमच्या हातात नाही असा धमकीवजा इशारा आम्हांला मिळाला होता. 

ही निवडप्रक्रिया अत्यंत गोपनीय अशी होती. जगभरातील कोणत्या नागरिकांची निवड झाली आहे हे ते नागरिक सोडून बाकी कोणालाही न सांगण्याचे बंधन त्यांच्यावर होते. निवड झाल्यापासून पुढील सहा महिन्यात आम्हाला बाकीच्या मनुष्यजातीपासूनचे आपले सर्व संबंध तोडून टाकण्यात सांगण्यात आले होते. आपल्या अस्तित्वाच्या खुणा टाकुन देण्यास सांगण्यात आलं होतं. आयुष्यभराच्या मेहनतीनं जोडलेल्या नात्यांचा, मैत्रीचा त्याग करुन जाणे हे काही सोपे काम नव्हते. परंतु जी काही मंडळी या प्रवेशप्रक्रियेत सहभागी झाली होती त्या सर्वांची जिद्द आणि अवलियागिरी वाखाणण्याजोगी होती. 

बंद प्रवेशद्वाराकडे पाहण्यात काही वेळ असाच गेला. आता समोर दिसणाऱ्या भव्य प्रदेशाकडे वाटचाल करायची होती. इथं लक्षावधी चौरस किलोमीटरचा हा प्रदेश पसरला होता आणि विविध ठिकाणी घरांसाठी आवश्यक असलेली मूलभूत सामुग्री ठेवण्यात आली होती.  ह्या वास्तव्यासाठी अनुकुल ठिकाणांचा अंदाज देणारे नकाशे आम्हाला काही दिवसांपूर्वी दाखवण्यात आले होते. परंतु त्याच्या काही छापील प्रती आत घेऊन जाण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता. एकदा आत आल्यावर केव्हा आपल्या स्मरणशक्तीवर अवलंबून राहायचे होते. 

इथं आम्हांला दोन निर्णय घ्यायचे होते पहिला म्हणजे कोणत्या माणसांसोबत आपला गट बनवायचा आणि दुसरा म्हणजे या अवाढव्य प्रदेशातील कोणते ठिकाण आपली वास्तव्यभूमी म्हणून स्वीकारायचा. इथं निर्णयासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक होते. परंतु ही तर पडली पंधराशे अनोळखी माणसं आणि ध्वनिक्षेपकाच्या  अभावे सर्वांना ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात बोलणं सुद्धा कठीणच होतं. अशावेळी अचानक आफ्रिका खंडातील दोघं माणसे उभे राहुन त्यांच्या मोडक्या तोडक्या इंग्रजी भाषेत काहीतरी मोठ्याने बोलत आहेत असे आम्हांला लांबूनच दिसले. मध्ये असलेल्या प्रचंड गर्दीमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. त्या आफ्रिकन लोकांचे बोलणे बहुधा तिथे असलेल्या काही गोऱ्या लोकांना पटले नसावे. ते आणि आफ्रिकन लोक यांच्यात वादावादीचे प्रसंग उद्भवला आहे अशी चिन्हे दिसू लागली. 

समजा हा जर वाद टोकाला पोहोचला तर त्यात पोलिसाची भूमिका कोण बजावणार हा प्रश्न माझ्या मनात आला. समजा पुढील पातळी गाठली गेली आणि हाणामारीचा प्रसंग उद्भवला, कोणी जखमी झालं तर डॉक्टर कोठून आणायचे आणि जरी या समुहात डॉक्टर असले तरी त्यांच्यासाठी आवश्यक अशी उपकरणे,  इस्पितळ नाही हे सर्वच प्रश्न उद्भवणार होते.  म्हणायला गेलं तर सर्व शक्यतांचा थोडाफार विचार आम्ही केला होता.  परंतु आधी विचार करणं आणि प्रत्यक्षात तो प्रसंग तुमच्यासमोर उभा ठाकणे यात जमीनअस्मानाचा फरक असतो हे मला कळून चुकले होते.  नशिबाने तो प्रसंग फारसा ताणला न जाता थोडक्यात निभावला गेला. 

अचानक लोक रांगेत उभे रहात असल्याचे आम्हाला दिसलं. दहा दहाच्या गटात लोक उभे राहत होते. आम्हीसुद्धा आम्हांला जमेल तसे एका रांगेत उभे राहिलो. आमच्या रांगेतील पहिल्या माणसाला मग पुढे येण्यास सांगण्यात आले. अशा पहिल्या क्रमांकावरील पंधरापंधराजणांना एकत्र बोलावुन त्यांचे पुन्हा विविध वेगळे गट करण्यात आले आणि त्यातील एकाला निवडण्यात आले. अशाप्रकारे दर दीडशे माणसांचे प्रतिनिधित्व करणारा एक माणूस निवडण्यात आला. या निवडीमागे कोणतीही तर्कसंगता नव्हती.  जे कोणी  पुढं उभे राहिले होते त्यांना निवडले गेले होते. अशाप्रकारे निवडले गेलेले हे दहाजण संपूर्ण दीड हजार लोकांचे प्रतिनिधित्व करत होते.  हे दहाजण संपुर्ण समुदायाच्या समोरील मोकळ्या भागात चर्चा करत असल्याचं मला दिसत होतं.  इथे ध्वनिक्षेपकाच्या सोयीअभावी त्यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा होत आहे हे समजण्यास वाव नव्हता. बराच वेळ चर्चा करुन आमचा मुख्य गटप्रमुख समोर उभ्या असलेल्या १५ उपगटप्रमुखांच्या समुदायाकडे आला. त्याने मुख्य चर्चेचा गोषवारा या पंधराजणांना दिला. आता हे उपप्रमुख आपल्या गटांच्या दिशेने येऊ लागले. आमचा उपप्रमुख आमच्याजवळ आला आणि आम्हाला एकंदरीत चर्चेचा आढावा आम्हांला देऊ लागला. त्यानं जमिनीवर एका काठीच्या आधारे संपूर्ण परिसराचा नकाशा काढला आणि नैऋत्य दिशेकडील एका कोपऱ्यात आपल्याला राहायला जायचे आहे असे सांगितले.  मुख्य १० गटप्रमुखांची बैठक दर पोर्णिमेला होणार होती.  दिनदर्शिका नसल्यामुळे केवळ पौर्णिमा हेच कालगणनेचे साधन बनणार आहे हे स्पष्ट झाले होते. ह्या बैठकीची आगाऊ सूचना म्हणून आदल्या दिवशी ढोल वाजवून सर्वांना पूर्वसूचना देण्यात येणार होती. एकंदरीत ह्या सूचना ऐकून काही काळ मन सुन्न झाले होते. प्रगतीचा ध्यास सोडून आपल्या अतिअतिपूर्वजांनी ज्याप्रकारे जीवन घालवलं होतं त्या प्रकारच्या जीवनाकडे आमची वाटचाल चालली होती. आमचं ठीक होतं कारण निर्णय आमचा होता. परंतु छोट्या आर्यनचा यात काय दोष? का म्हणुन मी माझा निर्णय त्याच्यावर लादला होता! माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं!!!

(क्रमशः)

बुधवार, २१ मार्च, २०१८

साद - भाग १



पुन्हा तीच हुरहूर, तीच अस्वस्थता !! रात्रीच्या त्या किट्ट शांततेतुन सदानंद अचानक जागा झाला. त्याची नजर बाजूला झोपलेल्या शारदा आणि छोट्या संगीतावर पडली. त्यांना पाहुन मनाला काहीशी शांतता लाभली असली तरी मनातील हुरहूर मात्र कायम होती. सदानंद काही वेळ तसाच पडुन राहिला. शारदेने झोपेचं सोंग कायम ठेवलं असलं तरी तिची बेचैनी कायम होती. 

थोड्या वेळानं मात्र सदानंदला राहवेना. तो उठला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडला. त्यानं दार उघडलं तसा थंड वारा शारदा आणि संगीताला सकाळची चाहुल देऊन गेला. शारदेनं पटकन चादर संगीताच्या अंगावर ओढून घेतली आणि स्वतःलाही आणखी एका चादरीचं संरक्षण दिलं. शारदा झोपली असली तरी तिचे कान मात्र सदानंदची चाहुल घेत होते. खिडकीतुन दिसणाऱ्या आकाशातील चांदणीचा तिनं वेध घेतला. साधारणतः पाच वाजले असावेत. सदानंदने गोठ्यातल्या गाईंना चारा पाणी दिला असावा. मग थोड्या वेळ शांततेनंतर विहिरीवर पोहऱ्याने पाणी काढण्याचा आवाज ऐकू आला. इतक्या थंडीत भल्या पहाटे विहिरीच्या थंडगार पाण्यानं सदानंद आंघोळ करत होता. शारदेची बैचैनी वाढतच होती. 

सकाळ झाली, सुर्यदेवाचं आगमन झालं. संगीताच्या बोलांनी घर गजबजुन गेलं. तिची शाळेत जायची धावपळ सुरु होती. सदानंद मात्र सर्व काही आटपुन चुपचाप ओटीवर बसुन होता. गावातील येणारी जाणारी मंडळी त्याला हाक देत होती तरी त्यांच्याकडं त्याच लक्ष असावं असं वाटत नव्हतं.  मग थोड्या वेळातच संगीताच्या छोट्या मैत्रिणीचे आगमन झालं. छोट्या चिमण्यांची सगळी वरात शाळेकडे निघाली. खिडकीतुन त्या सर्वांना गप्पा मारत जाताना पाहून शारदेला आपलं लहानपण आठविल्याशिवाय राहणं शक्य नव्हतं.  

संगीता शाळेत गेली आणि मग सदानंदला न्याहारी देण्यात शारदेचा वेळ गेला. सदानंद शांतच होता. तसाच मग तो सावकाराच्या कचेरीत गेला. कचेरीच्या कामात त्याच लक्ष लागेना. पण महत्वाची कागदपत्रं बनविणं आवश्यक होतं आणि त्याचा नाईलाज होता. शेवटी कसबसं काम आटपुन सायंकाळी तो घरी परतला. संध्याकाळ शांतच गेली. संगीताच्या चिवचिवाटाकडं त्याच अजिबात लक्ष नव्हतं. त्यामुळं संगीता कंटाळली होती. "तु त्यांना त्रास देऊ नकोस, बस आपली खेळत बाहुल्यांसोबत!" असं सांगत शारदेनं तिला जुन्या बाहुल्यांची जोडी फडताळातून काढुन दिली होती. 

पहाटे शारदेला जाग आली आणि सदानंद बाजुला नाही हे पाहुन तिला कससंच झालं. वेड्या आशेनं तिनं अंगणात धाव घेतली. सदानंदची कोठेच चाहुल नव्हती. मुक्या गाई तिच्याकडं आशेनं चाऱ्याची वाट पाहत बघत होत्या. अंगातील सर्व त्राण संपल्यानं शारदेनं तशीच अंगणातील पायरीवर बसकण मांडली. 

बरीच पायपीट करत सदानंद एकदाचा गुहेपाशी पोहोचला. बहुदा दोन दिवसाची वाटचाल त्यानं केली असावी. तहानभुकेचं त्याला भान राहिलं नव्हतं. गुहेपाशी पोहोचताच तिथल्या वातावरणानं त्याला खूप खूप बरं वाटलं. आपल्या आसनाची मांडणी करुन तो ध्यानस्थ झाला. बराच वेळ झाला तरी त्याच्या अंतर्मनात कुठं काही चाहुल लागत नव्हती. पण तो बेचैन होणं शक्य  नव्हतं. आणि मग त्याला तो आवाज ऐकु आला! "आलास, खुप उशीर केलास ह्या वेळी सदानंद !!" 

(क्रमशः)  

गुरुवार, ११ मे, २०१७

Trapped - अंतिम भाग



आधीच्या भागाच्या लिंक्स 

भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 

भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html

भाग सातवा
http://patil2011.blogspot.in/2017/01/trapped.html

भाग आठवा
http://patil2011.blogspot.in/2017/02/trapped.html
  

परस्वामीचा संताप अनावर झाला होता. योगिनी, नवस्वामी अगदी आनंदात दिसत होते. आणि त्याचा आर्यन त्या दोघांच्या ताब्यात होता. महत्प्रयासाने त्यानं योगिनी आता नवस्वामींची होणार ह्या गोष्टीचा स्वीकार केला होता.  पण आर्यनविषयी मात्र आता त्याला अनावर प्रेम दाटून आलं होतं. परंतु तो आता हतबल होता. त्याच्याकडं आता मानवी देह नव्हता आणि त्यामुळं आपल्या भावनांना कृतीत परिवर्तित करण्यासाठी त्याच्याकडं माध्यमाची कमतरता होती. 

आर्यननं त्याचं अस्तित्व केव्हाचं ओळखलं होतं आणि त्यामुळं तो खिदळत होता. पण ह्यावेळी योगिनी आणि नवस्वामीसुद्धा खिडकीच्या दिशेनं पाहत होते. योगिनीकडेसुद्धा आपलं ह्या रूपातील अस्तित्व ओळखण्याची क्षमता निर्माण झाली आहे ह्याविषयी आता परस्वामीला तिळमात्र शंका राहिली नव्हती आणि तिनं हे सारं नवस्वामीकडे उघड केलं ह्याचाही त्याला प्रचंड खेद होत होता. 

अत्यंत निराश मनःस्थितीत त्यानं तिथुन निघून जाण्याचा निर्णय घेतला. कापसासारखं त्याचं ते अस्तित्व रस्त्याच्या पलीकडच्या भागात आलं आणि त्याची नजर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या वेड्याकडं गेली. हा वेडा इसम त्याच्या परिचयाचा होता. त्याच्याच जमातीने त्याच्या मदतीसाठी ह्याचा मेंदु ताब्यात घेतला होता. अधुनमधून खबरीसाठी परस्वामी त्याचा वापर करायचा. त्याला पाहून अचानक  त्याच्या मनात एक भयंकर कल्पना आली. 
भावनेच्या उद्रेकात वाहुन गेलेल्या परस्वामीनं आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं. सुरुवातीला त्याला अपयश आलं. पण त्यानं आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 

योगिनीने नवस्वामीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. पण काही वेळातच आर्यन शांत झाला आणि काही वेळ खेळून निघून गेला. आता खिडकीबाहेर योगिनीला कसलंच अस्तित्व दिसत नव्हतं. तिनं सुटकेचा निश्वास टाकला. आजच्या रात्रीपुरता तरी हा निघुन गेला असावा असं तिनं स्वतःलाच आश्वासक स्वरात समजावलं. ह्या क्षणाला तिला नवस्वामींच्या मानसिक आधाराची गरज होती. पण तो मात्र काही वेळ जागा राहून झोपी गेला होता. आपलं हे उद्विग्न मन असंच शांत करत झोपायचा ती प्रयत्न करत होती. 

अचानक तिला बाल्कनीबाहेर काही चाहुल लागली. नको त्या शंकेनं तिच्या मनात काहूर माजवलं. नवस्वामीला उठविण्याचा विचार तिनं कसाबसा हाणून पाडला. काही क्षण शांततेत गेले. शेवटी तिला राहवलं नाही. ती हलक्या पावलाने बाल्कनीच्या दिशेनं गेली. 

. . . 
. .. 

तिनं दाराच्या नॉबला हात लावला तोच दार बाहेरून जोरात ढकललं गेलं. त्या आघातानं योगिनी जमिनीवर जोरात पडली. खरंतर नवस्वामी गाढ झोपणारा, पण आज तोही काहीसा अस्वस्थ असावा. ह्या आवाजानं त्याला लगेचच जाग आली. पाहतो तो काय, योगिनी जमिनीवर पडली होती. तिला बराच मुका मार लागला असावा. वेदनेनं तिचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. आणि एक वेडा इसम हातात मोठा दगड घेऊन हिंस्त्रक नजरेनं नवस्वामीकडे पाहत होता. योगिनीला सारं काही उमजायला वेळ लागला नाही. 

"परस्वामी आहे तो !!" ती आर्त स्वरात किंचाळली. नवस्वामी प्रचंड हादरला. पण त्याच्याकडं वेळ कमी होता. त्यानं क्षणाचाही  विलंब न लावता खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्याकडं झेप घेतली. तिथं लाकडाचं एक शिल्प होतं. योगिनीला अशा कलात्मक गोष्टींची फार आवड होती. एक सहस्त्रांश सेकंद त्यानं योगिनीकडे पाहिलं. हे तिचं आवडतं शिल्प तो हाणामारीसाठी वापरणार होता आणि त्याला त्यासाठी योगिनीची परवानगी हवी होती. अशा परिस्थितीतही योगिनीला त्याचं हे वागणं प्रचंड आवडलं. 

परस्वामी मोठ्या असूयेनं त्या दोघांचा हा मूक संवाद पाहत होता आणि त्यामुळं त्याच्यात काहीसा गाफीलपणा आला होता. आणि त्यामुळंच वेगानं त्याच्या डोक्यावर आलेलं हे शिल्प त्याला फार उशिरा दिसलं. त्यानं शेवटच्या क्षणी दूर व्हायचा प्रयत्न केला पण तोवर उशीर झाला होता. ते वजनदार शिल्प त्याच्या डोक्यावर आदळून गेलं. वेडयाच्या देहातील परस्वामीला प्रचंड वेदना झाल्या. त्यातच नवस्वामी वेगानं त्याच्या अंगावर झेपावला. त्याही परिस्थितीत काही मिनिटं परस्वामीने त्याच्याशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला पण सदैव भुकेल्या असणाऱ्या आणि मस्तकाला मार बसलेल्या एका वेड्याच्या देहाच्या माध्यमातून हा लढा लढणं त्याला कठीण जात चाललं होतं. 

एका क्षणाला परस्वामीने निर्णय घेतला. त्यानं नवस्वामींच्या पकडीतून कशीबशी आपली सुटका केली आणि बाल्कनीतून तो बाहेर पडला. नवस्वामी जोरजोरात "चोर चोर!" असा आरडाओरडा करु लागला. खाली असलेला गुरखा वेगानं परस्वामीच्या दिशेनं धावला. त्याला चुकविण्यासाठी परस्वामीने रस्त्यावर धाव घेतली. 

कर्रर्रर्र ... भरदार वेगानं जाणाऱ्या तवेराच्या ब्रेकच्या आवाजानं सर्व वसाहतीला जाग आली. 

. . 
. .. 

... 

रस्त्यावरील दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचं पाणी झालं होतं. त्या चोराचा  संपूर्ण देह छिन्नविच्छिन्न झाला होता. गाडीचं चाक त्याच्या डोक्यावरून गेलं होतं. 

... 

... 

ह्या वेड्याला गेले काही महिने दररोज पाहणारी  लोक मात्र हा चोरीचं काम करत असेल ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. पण नवस्वामी, गुरखा आणि मुख्य म्हणजे CCTV च्या पुराव्यानंतर त्यांचाही पूर्ण विश्वास बसला. 

रस्त्यावर झेप घेताना आपल्या दिशेनं वेगानं येणारी तवेरा पाहून परस्वामीनं स्वतःला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तोवर खूप उशीर झाला होता. चाक मेंदूवरून गेल्यानं त्याचं हे आभासी अस्तित्वालाच इजा झाली होती. त्याच्या त्या अस्तित्वाचा प्रकाश क्षणाक्षणाला क्षीण होत चालला होता, एका विझत चाललेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणं! कोट्यावधी प्रकाशवर्षे दूरच्या विश्वातून आलेला आणि केवळ योगिनीसाठी आपल्याच जमातीविरुद्ध 
पेटून उठलेला परस्वामी आज आपलं अस्तित्व गमावून बसला होता. 

पोलीस चौकशीमुळे योगिनी आणि नवस्वामींचे पुढील काही दिवस अगदी व्यस्त गेले. महिनाभरात  सर्व काही आलबेल झालं. योगिनीसुद्धा हळूहळू सावरली. परस्वामीचा काही वावर जाणवला नव्हता. शेवटी अशाच एका मोकळ्या सायंकाळी तिनं न राहवुन नवस्वामीकडं विषय काढला. ज्या प्रकारे तो वेडा इसम अपघातात ठार झाला त्यानुसार परस्वामी आपलं अस्तित्व पूर्ण गमावून बसला असेल अशी आपल्या मनातील आशा तिनं स्वामीला बोलून दाखवली. स्वामीला तेच वाटत होतं. एक क्षणभर त्यानं योगिनीकडं पाहिलं आणि मग दोघंही एकमेकांच्या मिठीत घट्ट विसावले. आकाश पूर्णपणे निरभ्र झालं होतं. योगिनीचा लढा संपला होता. 

(संपूर्ण)

P.S. स्वामीच्या बाहुपाशातून दूर झालेल्या योगिनीची नजर आर्यनकडे गेली. त्याची नजर तिला वेगळीच वाटली. तिच्या देहातून एक विजेची लहर प्रचंड वेगानं गेली. खरोखर मी मुक्त झाले का? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तिला किती थांबावं लागणार होतं कोणास ठाऊक?

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

Trapped - भाग ८


आधीच्या भागाच्या लिंक्स 
भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 


भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html

भाग सातवा
http://patil2011.blogspot.in/2017/01/trapped.html

परस्वामी खूप विचारात पडला होता. त्याचं मनुष्यदेहातील वास्तव्य संपुष्ठात येऊन त्याला त्याची मूळ काया प्राप्त झाली होती. परंतु मनुष्यदेहातील वास्तव्याच्या काळातील विचार मात्र त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हते. सुक्ष्मरुपात आपल्या मूळ देहाबाहेर पडण्याची कला त्यानं आत्मसात करुन घेतली होती. ह्या सर्व प्रकरणात आपल्या प्रजातीचा प्रचंड रोष त्यानं ओढवून घेतला होता. त्याच्या हालचालीवर त्याची प्रजात जरी लक्ष ठेऊन असली परस्वामी महबुद्धिमान होता. ह्या पहाऱ्यातुन त्याला जे काही मोजके क्षण मिळायचे त्यावेळी तो योगिनीवर लक्ष ठेवण्यासाठी फेरी मारायचा. आताच्या ह्या प्रसंगानंतर आपली एक चुक त्याच्या ध्यानात आली होती. योगिनीची मागच्या काळातील स्मृती त्यानं तात्काळ नष्ट करायला हवी होती. ही चूक लक्षात येताच त्यानं तातडीनं तिची स्मृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही त्याला जमलं नव्हतं आणि तो स्वतःवर खूप संतापला होता. 

योगिनी दिवसभर अगदी घाबरलेल्या मनःस्थितीत होती. परस्वामी आभासी रुपात आपल्या भोवती वावरतो आहे ही जाणीवच तिला हादरवुन टाकणारी होती. नवस्वामी कालपासुन अगदी प्रेमानं जरी वागत असला तरी मागच्या काही महिन्यांत जे काही घडलं ते त्याला सांगण्याची तिला अजिबात हिंमत होत नव्हती. परस्वामी मनुष्यदेहातून निघुन जाण्याआधी शेवटच्या दिवसात त्यानं तिच्यावर जो काही सुखाचा वर्षाव केला होता, तो सुद्धा ती विसरू शकत नव्हती. मी, माझं भावनिक जीवन आणि वास्तवातील जीवन सर्व काही ह्या दोन स्वामीमध्ये Trapped झालं आहे! ती स्वतःशीच पुटपुटली. पण ह्या दोघांचीही प्रेमळ बाजु सुद्धा तिनं पाहिली होती आणि त्यामुळे ह्यातील कोणीही आपल्याला अथवा आर्यनला धोका पोहोचवणार नाही अशी आशा ती बाळगुन होती. पण आपणा दोघांना नसला तरी हे दोघं एकमेकांच्या जीवावर बेतणार नाहीत हे कशावरून हा प्रश्न तिच्या मनात प्रकट झाला. आणि ह्यात परस्वामीचा जीव म्हणजे नक्की काय हे तिला समजेनासं झालं होतं. ह्याउलट परस्वामी नवस्वामीविषयी सर्व काही जाणुन होता आणि नवस्वामीचं ह्या सर्व प्रकाराविषयीचं अज्ञान त्याला परस्वामीची सहज शिकार बनवु शकणार होतं. बराच विचार करुन करुन योगिनी थकली. आर्यनच्या रडण्याने तिचं लक्ष आपल्या विचारसाखळीतून उडालं पण नवस्वामीला सर्व प्रकार संध्याकाळी सांगुन टाकावा ह्या निष्कर्षाप्रती ती येऊन पोहोचली होती. 

सायंकाळ झाली तशी योगिनीच्या मनातील धाकधुक वाढू लागली होती. नवस्वामी आपली कहाणी कशी स्वीकारेल ह्याविषयी तिच्या मनात खूप धाकधुक होती आणि त्याचबरोबर परस्वामीने आपल्यावर शिंपडलेल्या सुखाच्या क्षणांशी आपण प्रतारणा करणार ही भावना तिला बोचत होती. 
नेहमीच्या वेळी नवस्वामी परतला. कॉफीचं प्रमाण एव्हाना योगिनीला जमु लागलं होतं. नवस्वामीचा सकाळचा प्रसन्न मूड अजुनही कायम होता. जेवणं वगैरे आटोपली. आर्यन नेहमीप्रमाणं खेळून झोपी गेला आणि मनाचा हिय्या करुन योगिनीनं हाक मारली, "स्वामी!"

नवस्वामीच्या चेहऱ्यावरील भाव पहिल्या काही मिनिटांत वेगानं बदलत होते. आधी योगिनीविषयी सहानुभूती, भय आणि असुया आणि मग संताप अशा क्रमानं विविध भावनांनी त्याचा ताबा घेतला होता. संतापाच्या एका क्षणी त्यानं टेबलावरील पाण्याचा ग्लास जोरानं भिंतीवर फेकून मारला. त्याच्याजवळ जाण्याची हिंमत योगिनीजवळ नव्हती. बराच वेळ असाच गेला. नवस्वामी खुर्चीवर क्रुद्ध होऊन बसला होता आणि योगिनी हतबल होऊन बिछान्यावर! शेवटी नवस्वामीनं तोंड उघडलं. "तरीच मला काही कळत नव्हतं! ऑफिसातील बऱ्याच गोष्टी मला अधुनमधून नव्यानव्या वाटायच्या, तुही बदलेली वाटायचीस आणि आर्यन तर मला बराच वेळ पूर्ण अनोळखीच वाटायचा!" नवस्वामी आपलं मन मोकळं करत होता. "छे ! कोणी परका माझ्या देहात स्वामी म्हणून इतका काळ वास्तव्य करुन गेला आणि तुझ्याशी संसार करुन गेला!" नवस्वामीच्या मनातील संताप पुन्हा उचंबळुन येत होता. 

आता मात्र योगिनी आपल्या जागेवरुन उठली. नवस्वामीचा हात हातात घेऊन म्हणाली, "स्वामी मी पूर्णपणे हतबल होती ह्या साऱ्या प्रकरणात!" नवस्वामीनं आपल्याला काहीसं सावरलं होतं. "ठीक आहे!" नजरेनंच त्यानं योगिनीला सांगितलं. "स्वामी - अजुन एक गोष्ट सांगायची राहिली - आज सकाळी हे सारं झालं त्यावेळी आर्यन त्याच्याशी नजरेनंच संवाद साधून खिदळत होता!" नवस्वामीचं डोकं आता बऱ्यापैकी ताळ्यावर आला होतं. "तो समजा परत आला तर?" त्यानं जणु काही योगिनीच्या मनातीलच प्रश्न विचारला होता. 
"आपण शब्दांशिवाय एकमेकांशी संवाद साधुयात!" योगिनी म्हणाली. इतक्या सगळ्या प्रकारानंतरही नवस्वामीच्या मनात योगिनीविषयी प्रेम, आदर दाटुन आलं. झोपायला जाताना योगिनीने घडयाळाकडं नजर टाकली. रात्रीचे दोन वाजले होते. 

योगिनीला बराच वेळ झोप लागत नव्हती. नंतर कधीतरी तिचा डोळा लागला. डोळा लागुन थोडा वेळच झाला असावा इतक्यात आर्यनच्या चुळबुळीने तिला जाग आली. आर्यन खिडकीच्या दिशेनं पाहुन हासत होता. योगिनी भयभीत झाली असली तरी तिनं ह्या शक्यतेवर विचार करुन ठेवला होता. पायाच्या अंगठ्यानेच तिनं नवस्वामीला उठवलं. काहीशा त्रासिक मुद्रेनं उठलेला नवस्वामीनं योगिनीकडे पाहिलं. तिचा इशारा त्याला कळला. त्याची नजर खिडकीकडं गेली. तिथलं परस्वामींच अस्तित्व त्याला समजलं. योगिनी आणि नवस्वामी एकमेकांकडे पाहत होते. नक्की काय करायचं हे दोघांपैकी कोणालाही  समजत नव्हतं. 

योगिनीला न जाणवलेली एक गोष्ट नवस्वामीला जाणवत होती. त्याच्या हृदयाच्या कप्प्यात एक वेगळीच धकधक त्याला जाणवत होती. परस्वामी आपल्या शरीरात काही त्याच्या अस्तित्वाची खूण ठेऊन गेला की काय? त्याच्या मनात नवीन शंकेनं प्रवेश केला!
(क्रमशः )

शॉर्ट्स गाथा

बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत.  त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती ...