मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

आप यूँ फासलों से ...


 
लहानपणी ऐकलेलं, आवडलेलं हे गाणं मधूनच रेडिओवर लागलं की मग पुन्हा अस्वस्थ करून जातं. ह्या गाण्याचा अर्थ जाणून घ्यायचा कधी प्रयत्न केला नव्हता, तरीही हे गाणं का कोणास ठाऊक कुठतरी मनात कायम दडून राहत. आज थोडी फुरसत मिळाली आणि मग ठरवलं की जरा गाण्याचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करावा.

चित्रपट १९७७ सालचा शंकर हुसेन. गीत जां निसार अख्तर ह्यांचं. एका हिंदू बापाने वाढविलेल्या अनाथ मुस्लिम मुलाची ही कथा! कथानकात खोलवर जाण्याचे इथे प्रयोजन नाही. त्या काळी नायकाला सर्वस्व मानणाऱ्या नायिकांचे चित्र रेखाटलं जायचं. जसं ते चित्रपटातून दर्शविलं जायचं तसंच गीतातून सुद्धा प्रकट व्हायचं. हल्ली सर्व काही, प्रेमासकट  डोकं ताळ्यावर ठेवून केलं जात असल्याने अशा भावना व्यक्त केल्या जात नाहीत. 


आप यूँ फासलों से गुजरते रहे
दिल से कदमों की आवाज़ आती रही 


दूर कोठून तरी तू असाच जात होतास, पण माझ्या हृदयात मात्र तुझ्या पावलांचे नाद घुमत राहिले.  

आहटों से अंधेरे चमकते रहे
रात आती रही, रात जाती रही







केवळ तुझ्या चाहुलीने अंधारात आशेचे किरण चमकत राहिले. अशा अनेक रात्री आल्या आणि निघून गेल्या!


गुनगुनाती रही मेरी तनहाईयाँ
दूर बजती रही कितनी शहनाईयां
जिंदगी, जिंदगी को बुलाती रही



आजूबाजूला आनंदाचे अनेक प्रसंग येत होते. माझे एकटेपणाचे नाद असेच आसमंतात  घुमत राहिले. माझ्यातील जिवंतपणाची चिन्ह माझ्या सर्वस्वाला म्हणजेच तुला कायम बोलावत राहिली. 


कतरा कतरा, पिघलता रहा आसमान
रूह की वादियों में ना जाने कहा
एक नदी दिलरुबा गीत गाती रही







आकाशातून अधूनमधून वर्षा होत राहिली. (माझ्या नयनांतून अधूनमधून अश्रू वाहत राहिले).  दरीखोऱ्यातून भटकणाऱ्या आत्म्याच्या मनात एक प्रेमाचे गाणं कायम गुंजत राहिलं.


आप की गर्म बाहों में खो जायेंगे
आप की नर्म जानों पे सो जायेंगे
मुद्दतों रात नींदे चुराती रही


तुझ्या उष्ण बाहुपाशात मी विरघळून जाईन. तुझ्या मऊशार छातीवर मी निद्रा घेईन. अशाच आशेवर रात्रभर माझी झोप अधूनमधून चाळवत राहिली.
 
ह्या गीताच रसग्रहण करण्याचा प्रयत्न म्हणजे एक शिवधनुष्य उचलण्यासारखा होता. तो व्यवस्थित झेपला नाही हे मध्यंतरी जाणवले. 

त्यानंतर मग अशीच काही नायिकेच्या भावनांचे विविध पैलू उलगडून दाखविणारी काही गीते मला आठवली. ह्या प्रत्येक गीताचं रसग्रहण करण्याचा पुन्हा प्रयत्न मी करणार नाही. पण प्रत्येक गीतातील प्रेयसीची  जाणवणारी एक मुख्य भावना इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे

२) अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा हैं!

ह्या गीतात एका अनोळखी व्यक्तीला भेटल्यावर नायिकेचे विश्वच पूर्णपणे बदलून गेलं आहे. संपूर्ण विश्वच आपल्या नजरेत सामावून गेल्याचा तिला भास होत आहे. फुलांच्या प्रत्येक गुच्छात, गाण्याच्या प्रत्येक ओळीत तिला हा अनोळखी माणूस भेटत आहे. कित्येक वर्षे ज्याची वाट पाहिली तो पाऊस एकदाचा आला असा भास तिला होत आहे. प्रत्येक श्वासातून शहनाईचे सूर उमटल्याचा तिला भास होत आहे. अंधाराने भरलेल्या माझ्या विश्वात आशेचा एक किरण आला आहे. जेव्हा रात्र येते त्यावेळी तुझा मोहक गंध पूर्ण आसमंतात भरून राहतो. 

बाकी ह्या गाण्यातील गोंडस विनोद मेहरा आणि सुंदर शबाना केवळ लाजबाबच!



३) ये मुलाकात एक बहाना हैं!
प्यार का सिलसिला पुराना हैं!

आपल्या दोघांचं प्रेम जन्मोनजन्म चालू आहे. ही भेट तर केवळ एक निमित्त आहे. आपण इतके जवळ येऊयात की हृदयाचे नाद एकमेकांत मिसळून जातील. मी ज्यावेळी माझ्या प्रियकराच्या मिठीत असेन त्यावेळी संपूर्ण विश्वातील सुखे माझ्या पायाशी लोळण घेत असल्याचा भास मला होतोय. स्वप्नं तर काचेहून नाजूक असतात, ती तुटू नयेत म्हणून खूप काळजी घ्यावी लागणार आहे!!

४) सावन के झुले पडे, तुम चले आओ!

निसर्ग कधी अचानक अगदी सुंदर रूप घेऊन आपणासमोर येतो, तर कधी पाऊस, बर्फवृष्टी, सूर्यास्त अशी हळव्या माणसाला अधिकच भावूक बनविणारी रूपे घेऊन आपणासमोर येतो. अशावेळी ती प्रिय व्यक्ती जवळ असावी अशी भावना उफाळून येते.

५) बहारों मेरा जीवन भी सवारों, कोई आये कहिसें, तुम पुकारो!

हे गीत पण काहीसे सावन के झुले पडे सारखंच! फरक इतका की अजून नायिकेला कोणी जवळचा मिळाला नाहीये! फुलांनी बहरलेल्या बागेत फिरताना ह्या निसर्गाने माझे जीवनसुद्धा असेच बहरून टाकावे असे मनोगत नायिका व्यक्त करीत राहते. माझ्या हृदयाला धडकणे तुम्हीच शिकवलं आहे आणि त्यामुळे तुम्हांलाच मी दोष देईन! आता माझा अंत पाहू नका, कोणी माझ्या हातात बांगड्या आणून भरा, माझ्या वेणीत गजरा माळा आणि मला सजवून माझ्या नायकाची भेट घडवून द्या अशी आर्जवं ही नायिका करीत आहे. जवळजवळ अर्ध शतक नायक म्हणून वावरलेला देव आनंद आजूबाजूला बागडत असल्याने नायिकेची आपण चिंता करण्याचं काम नाही!!
 

६) दिल तो दिल, दिल का ऐतबार क्या कीजिये 
आ गया तो किसीपे प्यार क्या कीजिये!

हृदयाची तऱ्हाच वेगळी! त्याच्यावर विश्वास कसा ठेवावा! त्याच्यामुळे आपण कोणाच्या प्रेमात पडलो तर आपण काय करू शकणार? बाकी मग पूर्ण गीतभर राखी प्रेमाने झालेली आपली हालत व्यक्त करीत राहते.

७) आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे 
दिल की ऐ धड़कन ठहर जा, मिल गयी मंज़िल मुझे!

 इथे आपल्याला प्रियकर भेटल्याने अगदी धन्य झालेली नायिका हे गीत गात आहे. ह्यातील एक ओळ लक्षात राहते 

क्यों तूफ़ानोसे डरु मैं, मेरा साहिल आप हैं 
कोई तूफ़ानोसे कह दे मिल गया साहिल मुझे!

मागच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी आप यूँ फासलों से ने सुरु केलेली ही गाण्याची मैफिल यु ट्यूबच्या सूचनांची अधिकच बहरत गेली! पूर्वी विविधभारतीवर ऐकलेली ही गीते यु ट्यूबमुळे प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद देऊन गेली! धन्य ती लता, जुन्या गायिका आणि धन्य ते पूर्वीचे गीतकार!!

रविवार, १८ जानेवारी, २०१५

व्यक्ती ते वैचारिक संस्था!!!!



मध्यंतरी एका लग्नाच्या मांडवात एक परिचित व्यक्ती भेटली .  "तू या प्रसंगाला दिसला नाहीस .तु त्या ठिकाणी उशिरा आलास. "  अशी तिने नेहमी प्रमाणे माझी हजेरी घेतली. मी काहीतरी बहाणा काढून वेळ मारून नेली.  
काही वेळानंतर ही व्यक्ती एका घोळक्यात बसली होती. ह्या सर्वजणी मांडवातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण करण्यात आणि त्या व्यक्तीवर टिपणी करण्यात गुंतलेल्या होत्या. त्यांचे खास लक्ष नवीन पिढीतील लोकांकडे विशेषतः नुकत्याच संसारात पडलेल्या मुलींकडे होते. उपलब्ध माहिती आधारे त्या ह्या सर्वांविषयीची आपली मते अगदी मोकळ्या मनाने मांडत होत्या.
नंतर मग एक अगदी जवळचे कुटुंबीय भेटले. ते पूर्ण लग्न समारंभात सर्व काही व्यवस्थित चालले आहे की नाही ह्याची खात्री करून घेत होते. हे आमचे कुटुंबीय म्हणजे सर्व माहितीचा, धार्मिक विधीचा ज्ञानकोषच!! ज्ञात असलेल्या सर्व प्रथांना कालानुसार योग्य रूप देऊन त्या प्रथा पाळण्यास समाजातील सर्व व्यक्तींना मदत करण्यास त्यांचा सतत हातभार लागतो. 

१> गावात अशा अनेक व्यक्ती भेटतात, ज्या आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करू लागतात. ही घटना काही एका क्षणात होत नसते. ही जडणघडणीची प्रक्रिया लहानपणापासून चालू असते. आयुष्यात कधीतरी ह्या जडणघडणीच्या प्रगतीचा टप्पा एका विशिष्ट पातळीला पार करतो आणि त्या व्यक्तीला ही विचारसरणी बाह्य जगापुढे मांडण्याचा आत्मविश्वास प्राप्त होतो. छोट्या मोठ्या घटनांमधून मग ह्या व्यक्तीचा आत्मविश्वास बळावू लागतो आणि मग ही व्यक्ती अधिकृतरित्या त्या विचारसरणीची प्रतिनिधी बनते. ही व्यक्ती पारंपारिक वागण्याचा पुरस्कार करणारी संस्था बनली असे आपण म्हणूयात. 

२> उदाहरण १ मध्ये उल्लेखलेली व्यक्ती सार्वजनिक जीवनात संस्था म्हणून वावरण्याइतपत आत्मविश्वास बाळगून असते. पण प्रत्येक वेळा असे होते असं नाही. बहुतेक सर्वच जण आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट प्रकारे विचार करू लागतात. ह्यातील काही भाग अनुवांशिक घटकातून, काही ज्या भागात तुम्ही वाढलात तिथल्या चालीरितीमधून आलेला असतो. जर तुम्ही समजा एकाच प्रकारच्या वातावरणात कायम राहिलात तर तुमच्या विचारसरणीच्या कक्षा रुंदावत नाहीत. मग तुम्ही थोड्या मर्यादित विभागातील विचारांचे प्रतिनिधित्व करणारी संस्था बनता! पण तुम्ही ह्या विचारसरणीचे अगदी हिरिरीने प्रतिनिधित्व करण्याची शक्यता मात्र जास्त असते. ह्या उलट जर तुम्ही आयुष्यभर जगात वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात तर तुमच्या अनुवांशिक आणि जन्मभूमिद्वारे तुम्हांला मिळालेला एका विशिष्ट पद्धतीचा वैचारिक वारसा आपली संहती, तीव्रता कोठेतरी गमावून बसतो. तो माणूस आधुनिक विचाराचा म्हणून गणला जात असला तरी त्याला आपण वैचारिक संस्था म्हणू शकत नाही. 

३> तरुण वयात होणारे पती पत्नीचे वाद हे बऱ्याच वेळा त्यांच्या व्यक्तिगत विचारसरणीतील फरकामुळे होत असतात. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे त्यांचे वैचारिक संस्थामध्ये परिवर्तन होत जाते. मग संघर्ष दोन संस्थामधील मतभेदासारखे वाटू लागतात. 

४> काही व्यक्ती एखाद्या विषयात खोलवर संशोधन करतात. मग त्यांचे त्या विषयाच्या ज्ञानकोषात रुपांतर होते. पण सहसा अशा व्यक्ती शांत राहणे पसंत करीत असल्याने त्यांचं बोलघेवड्या संस्थात रुपांतर होत नाही; बऱ्याच वेळा लिहिणाऱ्या संस्थात रुपांतर होते!

व्यक्तीरुपातील अशा विविध संस्था आपल्या आसपास वावरत असतात. सामाजिक जीवनात वावरताना हल्ली मी व्यक्तींचे निरीक्षण करीत असतो आणि त्यांचं संस्थात रुपांतर झालं आहे का ह्याचा विचार करतो. असंच माझंही कोणीतरी निरीक्षण करीत असणार!

एक गोष्ट मात्र खरी की ह्या व्यक्तीसंस्था आपल्या संस्कृतीचे हस्तांतरण करण्यात मोलाचा वाटा बजावत असतात.

शनिवार, १० जानेवारी, २०१५

अलिप्ततावाद!!


 
मागील शनिवारी विक्रम गोखले ह्यांचं चतुरंग मधील सदर वाचलं. आपल्या वडिलांनी आपल्याला जीवनातील तत्त्वज्ञानाचे धडे कसे दिले हे त्यांनी अगदी सुंदरपणे मांडलं होतं. त्यांचं एक वाक्य खूप लक्षात राहिलं. "पन्नाशीच्या आसपास केव्हातरी अलिप्ततावाद लक्षात आलेला मी  एक पुरुष आहे!" 
ह्या वाक्याने मनात आलेले हे विचार! विक्रम गोखले ह्यांना ह्यातील कोणता अलिप्ततावाद अभिप्रेत होता ह्यावर भाष्य करण्याचं धाडस मी करणार नाही.
लहानपणी आपण प्रत्येक गोष्टीत अगदी रस घेत असतो. ह्या नाविन्यपूर्ण जीवनातील प्रत्येक गोष्ट शिकण्याची उमेद आपण बाळगून असतो. हळूहळू आपण आयुष्यातील अनुभवाला सामोरे जाऊ लागतो. काही सुखदायक तर काही कटू! प्रत्येकाची हे अनुभव पचविण्याची क्षमता वेगवेगळी असते. काहींना पहिल्या काही कटू अनुभवांतच वैराग्य येतं तर काहीजण संकटाचे, दुःखाचे पहाड पेलून सुद्धा आयुष्यातील उत्साह राखून असतात. 
एखाद्या व्यक्ती सभोवतालच्या परिस्थितीपासून, समाजापासून अलिप्त बनून का वागू लागते? ज्या क्षणी एका व्यक्तीचे सभोवतालच्या व्यक्तींच्या स्वभावाशी प्रथम मतभेद होतात, त्या क्षणी दोन प्राथमिक शक्यता असतात. एकतर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवायला पाहू शकते किंवा दुसऱ्या व्यक्तीला आपल्यावर नियंत्रण मिळवू देऊ शकते. समजा अशा ताणतणावाच्या प्रसंगांची वारंवारता वाढत गेली तर मग ती व्यक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीला टाळण्याची मानसिकता दाखवते. हीच स्थिती एखाद्या व्यक्तीबाबत सभोवतालच्या परिस्थिती किंवा समाजासोबत निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती भोवतालच्या परिस्थितीशी पूर्णपणे मिसळून घेऊ शकत नाही. मग ती ह्या परिस्थितीला टाळू लागते. अशी परिस्थिती 
वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक जीवनात येऊ शकते. 
वैयक्तिक जीवनात समजा जीवनसाथी अचानक काही कारणांमुळे अलिप्तपणे वागू लागला तर? काही वेळा दोघही अलिप्तपणे वागतात तर काही वेळा एकच अलिप्तपणे वागतो. अशा वेळी दुसऱ्या जोडीदाराची अवस्था बिकट होऊ शकते. काही वेळा एखादा जोडीदार बाकीच्या कुटुंबियांशी अलिप्तपणे वागू लागतो. भारतीय विवाहसंस्थेत अशी अलिप्तता आयुष्यभर घेऊन जगणारी अनेक जोडपी असू शकतात. हा फार मोठा गहन विषय आहे जो एका पोस्टमध्ये हाताळण्याजोगा नाही. गेल्या काही वर्षात प्रसिद्ध पुरुषांच्या पत्नींनी विवाहात आयुष्यभर झालेली आपली घुसमट पुस्तकरुपात प्रसिद्ध करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. पुरुष मात्र अशा गोष्टीमुळे बहुदा घुसमट करून घेत नाहीत. एकतर त्यांचा मित्रपरिवार मोठा असतो. पुरुषांना त्यांच्याशी बराच वेळ घालवता येतो आणि मग वैयक्तिक जीवनातील अलिप्तपणाची कसर भरून काढण्याचे माध्यम त्यांना उपलब्ध होते. नोकरी न करणाऱ्या स्त्रियांना मात्र काही वेळा असे माध्यम उपलब्ध न झाल्याने मग मोठा प्रश्न निर्माण होतो. 
व्यावसायिक जगात सुद्धा असे प्रश्न निर्माण होतात. माणसं चुकीच्या ठिकाणी नोकरीस आणि मग दुसरा पर्याय नसल्याने अशा ठिकाणी अडकून बसतात. एकतर ती आवश्यकतेपेक्षा जास्त पात्रता बाळगून असतात किंवा कमी! आता तुम्ही म्हणाल की आवश्यकतेपेक्षा जास्त पात्रता बाळगून असणाऱ्या लोकांनी अडकून बसायचे कारण काय? आर्थिक, कौटुंबिक कारणं अशा गोष्टींमुळे असे प्रसंग उद्भवतात. कधी कधी कार्यालयातील प्रभावी गटाशी न जुळल्याने मग लोक आपलं अलिप्ततेचे एक घरटे बनवून राहतात. 
वरील दोन प्रकारच्या अलिप्ततेपेक्षा कमी गांभीर्याची अलिप्तता म्हणजे सामाजिक अलिप्तता! आजूबाजूच्या सामाजिक रूढीशी, चालीरितींशी आपलं जमत नाही असं एखाद्याला वाटू शकतं आणि मग तो सामाजिक समारंभात मिसळणे टाळू लागतो किंवा कमी करतो. कधी कधी आर्थिक, शैक्षणिक पात्रतेच्या कमाल किंवा किमान पात्रता गाठल्याने सुद्धा काही जण सामाजिक दृष्ट्या अलिप्त राहणे पसंत करतात. 
काही वेळा एखादा समाजच बाकीच्या समाजापासून अलिप्त राहू लागतो. सामाजिक जीवनात आपल्यापेक्षा कमी बौद्धिक पातळीच्या लोकांनी कब्जा करून गोंधळाची परिस्थिती निर्माण केल्यास बुद्धीजीवी वर्ग सामाजिक जीवनात अलिप्ततेचे धोरण स्वीकारतो. 
पुन्हा एकदा वैयक्तिक अलिप्ततावादाकडे! म्हणायला गेलं तर मनुष्य समाजप्रिय, संवादप्रिय प्राणी! वैयक्तिक जीवनात अलिप्ततावाद स्वीकारायला लागल्यास अर्थात संवाद कमी होतात. एकमेकांशी व्यवहार अगदी गरजेपुरता होतात. काहींना हे झेपतात कारण त्यांचा स्वभाव मुळी असतोच तसा! पण काहींना मात्र हे बाह्यस्वरुपात स्वीकारलेलं अलिप्ततेचे धोरण आतून अगदी छळत असतं. पण पर्याय नसतो!
शेवटी वयानुसार आलेला अलिप्ततावाद! "भौतिक सुखांचा उपभोग घेण्याचं माझं वय निघून गेलं, आता मला बाह्यजगातील सुखापासून अलिप्त राहिलं पाहिजे", "माझ्या अवतीभोवती तरुण मंडळी आहेत त्यांना माझा त्रास नको" असे विचार काही जणांच्या मनात ठराविक वयानंतर येऊ लागतात आणि मग अशी माणसं भोवतालच्या व्यवहारातून अंग काढून घेत मनुष्यजातीला ज्ञात असलेल्या पुढच्या मार्गाची तयारी म्हणून अध्यात्ममार्गाला लागतात!
बाकी इतक्या उत्साहाने ब्लॉग पोस्ट्स लिहिणाऱ्या नवोदित लेखकाला प्रतिक्रिया देताना मात्र आपण सारी मंडळी अलिप्ततावाद दाखवतोच की!

रविवार, ४ जानेवारी, २०१५

नववर्षचिंतन !


 
नवीन वर्षाचा काळ एक मैलाचा दगड असतो. आपल्या आयुष्यातील एक वर्ष सरलं. विविध लोक आयुष्याच्या विविध टप्प्यात एकंदरीत आयुष्याची दिशा आणि मार्ग ठरून गेला आहे हे मानतात. निवडलेला नोकरी - व्यवसाय, विवाह हे घटक ह्यात विशेष हातभार लावतात. हे झालं सर्वसामान्य लोकांच्या बाबतीत; पण आपल्यातीलच काही लोक आयुष्याच्या प्रत्येक क्षणी ह्या विश्वाच्या, पृथ्वीच्या, मानवी जीवनाच्या अगाध पैलुंमधील जमतील तितकी रहस्य उलगडून पाहण्याच्या प्रयत्नात असतात. नवीन वर्षाच्या क्षणी मग मानवाने आखलेल्या पुढील टप्प्यातील म्हणजेच पुढील वर्षातील आपल्याला जमण्यासारखी उद्दिष्टे ठरवतात. 
मी आपला साधा माणूस! जीवनाची दिशा, मार्ग बऱ्यापैकी आखली गेली आहे असं मानणारा. त्यामुळे काही मोठा फेरबदल जीवनात संभवत नाही. तरीसुद्धा आता छोट्या वाटणाऱ्या काही गोष्टी आयुष्यात मोठा फरक घडवू शकतात हे मागच्या काही वर्षात अनुभवाने शिकलो. त्यामुळे त्या संदर्भात काही निर्धार करणे चांगले असते. आता निर्धार हा शब्द अगदी अचूक आहे असे म्हणता येणार नाही. प्रामाणिक प्रयत्न हा चांगला शब्द असू शकतो. येत्या वर्षात काही चांगल्या गोष्टी नव्याने करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायचा. खरं म्हणजे ह्यात गाजावाजा न करता हा सुद्धा भाग यायला हवा. ह्या पोस्टमुळे गाजावाजा न करता हा भाग मात्र चुकला जाणार. तर मग मूळ मुद्द्याकडे - ह्या वर्षी ज्या गोष्टींचे प्रामाणिक प्रयत्न करायचं ठरवलं आहे त्या अशा,
१> शांत राहण्याची सीमा विस्तारित करायचा प्रयत्न करणे. वर्षात अनेक प्रसंग असे येतात जे तुमच्या सहनशक्तीचा अंत पाहतात. त्या क्षणानंतर चांगली वाट आपल्यापुढे येईल असा विश्वास मनात बाळगणे आणि ही शांत राहण्याची आपली क्षमता अधिक सक्षम करणे. 
२> क्रोधाच्या प्रसंगी शांत राहणे आणि एकंदरीत आपली मनःस्थिती चांगली ठेवणे ह्या म्हटल्या तर एकमेकांशी संबंधित गोष्टी आहेत. कार्यालयात तुमच्यावर जर जबाबदारीचं काम असेल तर तुमची मनःस्थिती चांगली असायला हवी. जबाबदारीचं काम म्हणजे नक्की काय? ज्या कामामध्ये तुम्ही बुद्धीचा वापर करता किंवा अनेकजणांच्या कामावर देखरेख ठेवता; ते जबाबदारीचं काम! थोडक्यात म्हणजे तुम्ही ह्या कामात उपलब्ध माहितीचा उपयोग करून निर्णय घेत असता. ह्यातील काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन असतात. काही धोरणात्मक असतात. तर असे महत्त्वाचे निर्णय योग्य प्रकारे घेण्यासाठी मनःस्थिती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करीन. मनःस्थितीबरोबर उपलब्ध माहितीविषयी माझे ज्ञान वाढविण्याचा प्रयत्न करीन; जेणेकरून चांगले निर्णय घेण्याची माझी क्षमता वाढीस लागेल. 
३> गेल्या आठवड्यात वाचलं, की लोकांचं एकंदरीत ब्लॉगिंग ह्या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचं प्रमाण कमी झालं आहे. हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे मांडायचं झालं तर गंभीर, एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून मांडलेले विचार ब्लॉगद्वारे कमी प्रमाणात हाताळले जातात. हा मुद्दा माझ्याही मनाला पटला. त्यामुळे ह्या वर्षी खरोखर विचारपूर्वक, मानवी स्वभावाचा अभ्यास करून मगच पोस्ट्स टाकत जाईन. बहुदा कथा हा प्रकार अगदी कमी होईल. आणि पोस्ट्स टाकायची घाई करणार नाही. लिहिलेली पोस्ट पुन्हा वाचून, गरज असल्यास त्याची पुनर्मांडणी करून मगच टाकीन. आणि हो पुन्हा एकदा एकंदरीत वाचकसंख्येच्या मागे लागून लोकप्रिय विषयावर लिहीण्याचा अट्टाहास धरणार नाही. 
४> बोलताना, लिहिताना विशेषकरून दुसऱ्या व्यक्तीविषयी आपली मते व्यक्त  करताना शब्दांचा सुयोग्य वापर केला आहे की नाही ह्याची पुन्हा पुन्हा खातरजमा करून घेईन. एकंदरीत सभोवतालच्या भारतीय समाजाची आक्रमक वृत्ती वाढत चालली आहे. आत्मविश्वास आणि अहंकार ह्यातील सीमारेषा धुसर होत चालल्या आहेत. पारंपारिकतेच्या एका टोकाला बसून सभोवतालच्या बदलत्या दुनियेला ज्ञान देण्याचा आव कमी आणीन!
५> माझी सामाजिक जीवनात प्रत्यक्ष कृतीचे प्रमाण नगण्य आहे. ह्या गोष्टीला प्राध्यान्यक्रमात कसे वरचे स्थान देता येईल ह्याचा विचार करीन. 

एक गोष्ट मात्र जी गेली काही वर्षे करत आहे ती करणे चालूच ठेवीन! आणि ती म्हणजे मुलाच्या मागे अभ्यासासाठी लागणे! एका मल्लाची गोष्ट आहे. तो मल्ल एकदा रिंगणात सर्वांसमोर मोठ्या बैलाला अगदी सहजासहजी उचलतो. सर्वजण अगदी अचंबा व्यक्त करतात. त्यातील एकजण त्या मल्लाला विचारतो, "इतका मजबूत बैल; त्याला तू कसे उचलु शकलास?" मल्ल म्हणतो, "हा बैल जेव्हा छोटे वासरू होते; तेव्हापासून त्याला मी दररोज उचलतो आहे! त्याचे वजन जसे वाढत गेले तसा मी माझा व्यायाम आणि आहार वाढविला!" 
सात - आठ वर्षांनी बारावीचे पाटील क्लासेस निघतील, तेव्हा लोक सुद्धा मला असाच प्रश्न विचारतील, "अरे आदित्य, बारावीचा इतका कठीण अभ्यासक्रम तू इतका कसा सहजासहजी शिकवू शकतोस?"

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...