मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २२ जून, २०२६

वैचारिक साखळी - खरं आव्हान !



वैचारिक सुस्पष्टतेचा डोळ्यांत ठळकपणे भरणारा अभाव हा आजच्या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.  स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी नक्की योग्य काय ह्याची जाण आपल्याला नाही. समाजानं ठरवुन दिलेल्या यशाच्या तथाकथित मापदंडांच्या मागे धावण्यात आपली शक्ती आपण वाया घालवत आहोत. कोणत्याही मनुष्यानं निवांत बसुन आपल्यासमोरील परिस्थितीचा शांतपणे विचार केल्यास त्याला / तिला स्वतःसाठी योग्य मार्ग सापडु शकतो. पण आपण सर्व काही बाजुला सारून परिस्थितीचा सखोल विचार करायला क्वचितच बसतो. ह्याची अनेक उदाहरणं मी नंतरच्या पोस्टमध्ये क्रमशः देईन. 

आजच्या ह्या छोटेखानी पोस्टमध्ये आपण एका साखळीचा उल्लेख करू इच्छितो. सोशल मीडियाचे कुटुंबाला लागलेलं व्यसन !  => स्वयंपाकघरात उत्साहानं तरुण पिढीला आवडतील असे नवीन पदार्थ शिकू पाहणाऱ्या गृहिणींची झपाट्यानं कमी होणारी संख्या => कालानुरूप ह्या गृहिणींना आवश्यक असणारी पण न मिळणारी स्वयंपाकघरातील पुरुषांची साथ => घरातील सदस्यांच्या संवादाच्या विविध तऱ्हा => त्यामुळं संवादाच्या पहिल्या चकमकीतच ठिणग्या उडून संवादाचं पुढं न जाणं => घरातील जेवणांकडं पाठ फिरवणारी तरुण पिढी => झोमॅटो / स्वीगीवरून मागवल्या जाणाऱ्या चविष्ट पण तेलकट, मिठाचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचं सेवन => प्रोटीन वेडापायी शरीरातील पचनसंस्थेवर पडणारा ताण => बऱ्याच वेळा विनाकारण वैद्यकीय तपासणीच्या मागं लागणं => आपण एखाद्या मॉडेलप्रमाणं दिसावं असा विविध वयोगटातील लोकांचा अट्टाहास => ह्या सर्वांसाठी लागणारा भरमसाट पैसा => हा पैसा मिळविण्यासाठी नोकरी / व्यवसायात यशस्वी होण्याचं प्रत्येकावर असणारं दडपण => जगात कधीही, केव्हाही फक्त विशिष्ट टक्के (२०-२५% टक्के) लोकंच यशस्वी होऊ शकतात ह्या मुलभूत तत्वाचा बहुतेकांना पडलेला विसर => ह्या सर्व कारणांमुळं येणारा तणाव / नैराश्य 

आपल्याला जी काही बुद्धी लाभली आहे, कष्ट करण्याची आपली जी क्षमता आहे, आपल्याकडं जी काही संवादकला आहे, लोकांना सोबत घेऊन जाण्याचं जे कौशल्य आपल्याला लाभलं आहे, आपल्यात धोका पत्करण्याची किती तयारी आहे हे आणि इतर काही घटक आपण ह्या दुनियेत किती यश मिळवणार ह्याच्या सीमारेषा आखुन देतात. ह्याची जाणीव ठेवून सातत्यानं दुधी, गलका, शिराळे, पडवळ ह्या भाज्यांचं सेवन करणारी व्यक्ती ह्या दुनियेत निःसंशय सुखी होणार - इति आदित्य ! 

रविवार, ७ जून, २०२६

पोह्यांचा ऊहापोह




पारंपरिक मराठी घरांमध्ये दररोज सकाळी सर्वसाधारणपणे शिरा, उपमा आणि पोहा हे तीन होतकरू उमेदवार आपला अर्ज दाखल करत असत. घरातील मुख्य गृहिणी विविध तात्कालीन घटकांचा विचार करून ह्यातील एका पदार्थांची निवड करत असे. 

आजच्या पोस्टमध्ये आपण संक्षिप्तपणे भारताच्या विविध प्रांतात वेगवेगळे न्याहारीचे पदार्थ सर्वमान्य का झाले असावेत, महाराष्ट्रात पोह्यांनी अग्रगण्य न्याहारीच्या पदार्थात स्थान का मिळवलं असावं? भावी वधूवरांना प्रथम भेटीच्या वेळी कांदापोहे का खाऊ घातले जातात आणि प्रोटीन वादळात पोह्यांचे भवितव्य काय ह्या प्रश्नांचा ऊहापोह करणार आहोत. खरंतर हा एक सखोल संशोधनाचा विषय आहे. पण मी थोडक्यात आटोपतं घेतलं आहे. 

१.  न्याहारीच्या पदार्थातील प्रांतीय वैविध्य 

स्थानिक पिके प्रत्येक प्रांतात न्याहारीच्या पदार्थ निवडीत महत्वाचा घटक बनतात. दक्षिण भारतात तांदुळ मुबलक असल्यानं इडली, डोसा तर पंजाबात गव्हामुळं पराठा, महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, तांदूळ ह्यामुळं पोहे, उपमा, थालीपीठ तर बंगालमध्ये चक्क मासे सुद्धा न्याहारीच्या पदार्थात स्थान मिळवून आहेत. 

हवामानाचा प्रभाव हा घटक लक्षात घेण्याजोगा आहे. पंजाबात जास्त उष्मांक मिळवून देणारे लोणी, तूप, पराठे तर तुलनेने उष्ण प्रदेशात हलके, पचनास सोपे असे इडली, पोहे असे पदार्थ पसंत केले जातात. 

कष्टकरी समाज ऊर्जा देणारी न्याहारी पसंत करतो तर पांढरपेशा वर्ग हलकीफुलकी न्याहारी पसंत करतो. दक्षिण भारतात मंदिर संस्कृतीमुळे इडली, पोंगल यांसारखे सात्त्विक पदार्थ विकसित झाले.

मुघल प्रभावामुळे उत्तर भारतात पराठे आणि भरपूर मसालेदार पदार्थ लोकप्रिय असावेत तर पोर्तुगीज प्रभावामुळे गोव्यात काही विशिष्ट ब्रेड व बेकरी पदार्थ विकसित झाले.

मराठी गृहिणी, कुटुंब सात्विक, शालीन स्वभावाच्या असतात. सकाळच्या प्रसन्न घडीला तरी घरातील सात्विक वातावरण कायम राहावं म्हणून सात्विक पोहे निवडले जाण्याची शक्यता जास्त असते. पोहे बनविण्यासाठी लागणारे जिन्नस सहज उपलब्ध असतात आणि पोहे बनविण्यात तुलनेनं कमी वेळ लागत असल्यानं पुर्वीच्या गृहिणींना ज्ञानसाधनेस आणि हल्लीच्या गृहिणींना भ्रमणध्वनीसाधनेस पुरेसा वेळ मिळतो. घरातील पुरुषांनी पोहे बनविण्यात पुढाकार घ्यावा अशी चळवळ सुरु झाल्यास माझा तिला तात्विकदृष्ट्या पाठिंबा राहील. 

वरील सर्व प्रकारांचा विचार करता महाराष्ट्रात पोहे न्याहारीच्या आघाडीच्या तीन पदार्थात स्थान पटकावून आहे. 

२. पोह्यांचे एकूण प्रकार 

पोह्यांचे एकूण प्रकार १७३ की १८९ ह्याविषयी तज्ञ मंडळीत सुद्धा एकमत होऊ शकत नाही.  मी तज्ञ व्याख्येच्या जवळपास सुद्धा जात नसल्यानं मी फक्त पोह्यांच्या काही लोकप्रिय प्रकारांचा उल्लेख करून पुढील मुद्याकडे जातो. कांदा पोहे, बटाटा पोहे, दडपे पोहे, कोल्हापुरी पोहे,  नागपुरी तर्री पोहे, कोकणी नारळ पोहे, दूध पोहे, दही पोहे, चिवडा पोहे (सणावाराचे), इंदोरी पोहे, सेव पोहे, उसळ-पोहे. बुधवार, शुक्रवार, रविवारी आमच्या घरी पोहे केल्यास त्यासोबत ऑम्लेट किंवा तत्सम अंडाजन्य पदार्थ दिला जातो. ह्या प्रकारास पोह्याच्या अधिकृत प्रकारात राजमान्यता मिळाली नाही. 

पोह्यांचे प्रकार फक्त पाककृतीनुसारच नाही तर पोह्यांच्या जाडीवरूनही केले जातात.  जाड पोहे, मध्यम पोहे, पातळ पोहे, लाल तांदळाचे पोहे वगैरे वगैरे. अजुन काही जाडीचा प्रकार / रंग असल्यास ह्या विषयात जो कोणी डॉक्टरेट करणार असेल त्यांनी त्यांचा उल्लेख करावा.   

३. भावी वधुवर आणि कांदेपोहे 

भावी वधुवर ज्यावेळी भेटतात त्यावेळी बहुदा कांदेपोहेच का निवडले जातात ह्याची ऐतिहासिक, सांस्कृतिक, भावनिक आणि इतर इक कारणे आहेत. 

अशा भेटींच्या वेळी भावी वधुवर आणि त्यांच्या कुटुंबातील संवाद हा महत्वाचा घटक असतो. अशा वेळी बनविण्यास सर्वात सोपा,जो बनविण्यात चुक होण्याची शक्यता कमी आहे (Low Risk), जो ग्रहण केल्यानं उपस्थित पाहुणे मंडळींच्या पचनसंस्थेला सर्वात कमी धोका आहे असा पदार्थ निवडणं योग्य आहे असं इतिहासानं मराठी लोकांना समजावलं असावं. आता सांस्कृतिक, भावनिक कारणं वगैरे काय आहेत असा विचारण्याचा दीडशहाणेपणा करू नकात. ते वाक्य प्रभावशाली होण्यासाठी ह्या दोन प्रकारांची भर घातली होती. 

थोडा अधिक विचार करता समजा मसालाडोसा हा अशा भेटींच्या वेळचा राजमान्य पर्याय ठेवला असता तर नवऱ्या मुलाला चमचा काट्यानं मसाला डोसा खाता येत नाही, मुलीकडच्यांना एकही चटणी नीट बनवता आली नाही अशा कारणांमुळं होऊ घातलेली लग्न फिस्कटली असती. 

आता तर कांदेपोहे कार्यक्रम ही एक सांस्कृतिक संज्ञा बनली आहे. 

४. प्रोटीन वादळ आणि पोह्यांचे भवितव्य 

आजकाल सोशल मीडिया, फिटनेस शिक्षक आणि सप्लिमेंट उद्योगामुळे "प्रोटीन" अपरिहार्य बनले आहे. अनेकदा असा आभास निर्माण होतो की न्याहारीत ३०-४० ग्रॅम प्रोटीन नसेल तर ती न्याहारीच नाही. या पार्श्वभूमीवर पोह्याला मागे पडण्याचा धोका संभवतो कारण पारंपरिक कांदापोह्यांच्या एका प्लेटमध्ये साधारण ४-६ ग्रॅम प्रोटीन असते. धोका पोह्यांना नाही, तर "फक्त पोहे पुरेसे आहेत" या विचाराला आहे. प्रोटीनमध्ये वाहून गेलेल्या लोकांसाठी पोह्याला नवीन रूपात यावं लागेल. कडधान्यं, दही, ताक, ज्यांना चालतं त्यांनी अंडी ह्यांच्यासोबत पोहे घ्यावेत. 

एकंदरीत ज्यावेळी आपल्यासमोर नाश्त्याला पोहे समोर येतात त्यावेळी हे सर्व घटक ध्यानात घेऊन त्यांना मनमोकळी दाद द्यावी ! 

रविवार, १७ मे, २०२६

पुढच्या शुक्रवारी ७ वाजता


'पुढच्या शुक्रवारी ७ वाजता' हे नाटक मनोविकाराच्या एक टोकाला गेलेल्या मुलाचं, मंगेशचं (सुदीप मोडक) कथानक आपल्यासमोर घेऊन येतं. दोन वेगवेगळ्या कारणांसाठी मंगेशला सुधारण्याचा प्रयत्न करणारे डॉ. अतुल  ( सतीश राजवाडे ) आणि राधिका (चैत्राली गुप्ते)  ही ह्या नाटकातील महत्त्वाची दोन पात्रं! वीस वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेल्या ह्या दोघांमधील प्रेमकहाणीची ह्या कथानकालाअसलेली झालर! 

एखादया उत्तम कलाविष्काराच्या माध्यमातुन कलाकार जितकं काही चाहत्यांपर्यंत पोहोचवतो त्याहून बरंचसं अधिक असं चाहत्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे मिळवावं असं मला नेहमीच वाटत आलं आहे. प्रत्येक चाहत्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणं हे अधिक असं जे काही आहे ते बदलत राहतं. मला असंच बरंच काही ह्या नाटकातून मिळालं. 

Spectrum हा एक अर्थपुर्ण शब्द आहे. प्रकाशाचा वर्णपट ह्या अर्थी संबोधिण्यासाठी त्याचप्रमाणं मनःस्थितीच्या विविध अवस्था असतात, त्या सर्वांना एकत्रितरित्या संबोधण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मंगेश मनोविकाराच्या टोकाच्या स्थितीत पोहोचला आहे. आपण आपल्याभोवती पाहिलं तर निराशा हल्ली कोणालाच चुकली नाही. हा काळाचा महिमा आहे. यशाच्या शिखरावर असणाऱ्या माणसांना सुद्धा ही निराशा हल्ली सोडत नाही तर बाकीच्यांचं काय? दैनंदिन दिवसात येणाऱ्या निराशेच्या क्षणापासून परत सम्यक स्थितीत घेऊन येण्यासाठी काहीतरी सकारात्मक घडावं लागतं,  कोणी जिव्हाळ्याचं माणुस आयुष्यात असावं लागतं किंवा तुम्ही मानसिकरित्या खंबीर असावे आवश्यक असतं.  

ही झाली सर्वसामान्य माणसाची कहाणी! मंगेशची कहाणी तर अगदी हृदयद्रावक म्हणावी अशीच आहे! बुद्धिमतेचं प्रचंड वरदान लाभलेला मंगेश वयाच्या चौदाव्या वर्षी आयुष्यात घडलेल्या कठीण प्रसंगामुळं भोवतालच्या निष्ठुर दुनियेच्या तावडीत सापडतो. एका नाजुक क्षणी अंमली पदार्थाची झालेली ओळख त्याला ह्या खोल दरीत खेचून घेऊन जाते.  पत्नीच्या अकाली जाण्यानं खचलेला डॉ. अतुल आपला व्यवसाय बंद करून दूरवर कुठंतरी जायच्या तयारीत असतानाच राधिका त्याच्या भेटीला येते.  आपल्याला भेटायला येण्यामागं आपलं सांत्वन करणं हा तिचा खरा हेतू नाहीए हे जाणण्याइतका अतुल तिला ओळखून असतो. मंगेशला ह्या स्थितीतून बाहेर काढण्याचं आव्हान तो स्वीकारतो त्याचं कारण वेगळं असं आहे.  

एखादया मनोरुग्णाला त्याच्या त्या अवस्थेतुन सामान्य स्थितीत आणण्याचा प्रवास रंगमंचावर अडीच - तीन तासांत उलगडुन दाखविण्याचं आव्हान झेपण्याचा प्रामाणिक प्रयत्न नाटक, कलाकार करतात. ह्या आजारातील विविध संज्ञाचा योग्य वापर, त्या प्रेक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा! आजारातून बरं होताना रुग्णाला कसं विविध स्थितींमधून जावं लागतं, त्याला कसे भास होत राहतात, त्यावेळी कसं त्याला जवळच्या माणसाची गरज असते हे सर्व काही खूप चांगल्या पद्धतीनं सादर करण्यात आलं आहे. नशील्या पदार्थांचा राक्षस आज नाक्या-नाक्यावर लपून बसला आहे. आपल्या युवकांचं  ह्या राक्षसापासुन रक्षण करणं कसं आवश्यक आहे हा संदेशही नाटक देतं. पण कुठंही हा संदेश अगदी भडक रूपात आपल्यासमोर येत नाही. 

नाटकाची संहिता, सादरीकरण एका उच्च दर्जाचं आहे. सतीश राजवाडेंविषयी थोडंफार ऐकून होतो, पण ह्या नाटकातील त्यांचा अभिनय पाहुन नक्कीच त्यांचा चाहता बनलो आहे.  एका प्रथितयश डॉक्टरच्या वागण्यातील आत्मविश्वास, भारदस्तता त्यांच्या अभिनयातुन अगदी परिपुर्णपणे पाहावयास मिळते. 

आपल्याला तिचा मनोमनी राग येतो असा राधिकेचा अभिनय आणि त्यातच तिचं यश सामावलेलं! कॉर्पोरेट जगातील संस्कृती तिनं अगदी हुबेहूब प्रेक्षकांसमोर आणली आहे. आपल्याला यशस्वी बनायचं आहे हे तिनं कधी कोणापासुन लपविलं नाही, कायद्याच्या चौकटीत राहून जमेल त्या मार्गानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी बनायचं हे तिचं ध्येय आहे. त्यासाठीच तिनं अतुलवरील असलेल्या आपल्या प्रेमाला एका क्षणी दूर केलं. अशी विचारात सुस्पष्टता असणारी माणसं आपल्या भोवताली आपल्याला दिसत असतात. राधिका त्यांना अगदी हुबेहूब रूपात आपल्या समोर आणते. 

एक चांगलं कथानक लिहिल्याबद्दल सुदीप मोडक ह्याचं मनःपुर्वक अभिनंदन ! अमली पदार्थांचा आपल्या भोवताली असलेला विळखा, त्यापासुन आपल्या तरुण पिढीला असणारा धोका ( धारावीसारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या युवकांना तर अधिकच धोका!), त्यातुन बाहेर पडत यशस्वी होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे सारं काही ह्या कथानकात अगदी संयतपणं आपल्यासमोर ह्या कथानकाद्वारे सुदीप ह्यानं आणलं आहे. अभिनयही चांगला म्हणावा असा ! 

मला हे नाटक आवडलं कारण नाटकात मंगेश निराशेच्या ह्या गर्तेत का सापडला ह्याचा शोध घेण्याचा खराखुरा प्रयत्न डॉ. अतुल करत राहतात. मंगेश नक्की कशापासून पळतोय हे मला शोधायचं आहे असं ते राधिकेला सांगतात. एका मुलाचं आयुष्य वाचविण्यासाठी सुरुवातीला केवळ एकदाच भेटायची तयारी दाखवली असताना नंतर मात्र ते आपला निवृत्तीचा विचार बदलतात.  इतकी खोलवर नसेल पण निराशा आपल्या सगळ्यांचा पाठलाग तर करतच असते ना? हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. हे आपण उघडपणे मान्य करायला शिकणार का? एक समाज म्हणुन नैराश्य हा एक गहन प्रश्न बनतोय ह्याची कबुली आपण कधी देणार? 

मला हे नाटक आवडलं कारण कुठंही उथळपणा नाही. आपल्याकडं बावनकशी सोनं आहे तर मग बाकी उथळपणाची गरजच नाही हे नाट्यकर्त्यांना चांगलं ठावूक आहे. उगाचच पात्रांची खोगीरभरती नाही. सेट, संगीत ह्यावर उगाचच जास्तीचं लक्ष दिले नाही. मला आवडणाऱ्या  'No Nonsense' प्रकारात मोडणारं! कितीही बुद्धिमान माणूस असला तरी हॅकर्सना तासाभरात पळवुन लावणं हा एकमात्र खटकलेला मुद्दा ! 

पहिल्या प्रयोगाला पुढच्या काही रांगाच भरल्या होत्या; आज बऱ्याच भरल्या आहेत, पुढील प्रयोगाला हाऊसफुल्ल होऊ द्यात असे डॉ. राजवाडे प्रेक्षकांचं आभार मानताना म्हणाले. बऱ्याच अटी कबुल करून घेऊन मी पत्नीसोबत ह्या नाटकाला गेलो होतो. तिचं इथं आभार मानणं उचित ठरेल. आज ह्या नाटकाचा प्रयोग पुण्यात होता. पुणेकरांना आवडलं तर नक्कीच यशस्वी होईल हे नाटक ! 

सद्यस्थितीनुसार प्रेक्षकांत ज्येष्ठ नागरिकांचंच त्यातही महिलांचंच बहुमत होतं. पण काही वेळानं युवकवर्गाचा देखील काही प्रमाणात प्रवेश झाला. पुढील प्रवेशात हे प्रमाणसुद्धा वाढावं ही इच्छा !  बाकी मध्यंतरात आमच्या शेजारी पॉवरलूम, हँडलूम असे शब्द कानांवर पडले. पत्नीकडून त्याची अधिक माहिती गोळा करायला हवी. तितकीच सामान्यज्ञानात भर !

शनिवार, १६ मे, २०२६

The Folk आख्यान!





गेल्या शनिवारी "The Folk आख्यान" आणि आज (ह्या शनिवारी) "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" ह्या दोन दर्जेदार कलाकृती अनुभवण्यास मिळाल्या. 

आजची पोस्ट "The Folk आख्यान"  विषयी. महाराष्ट्राचं वैभव म्हणुन ज्यांना आपण संबोधू शकतो असे अभंग, भारूड, लावणी, गवळणी हे लोकसंगीताचे प्रकार वर्षोनुवर्षे महाराष्ट्राच्या गावागावांत समाजजीवनाशी अत्यंत जवळून निगडीत आहेत. हल्लीच्या संगणकाच्या विश्वात ह्या कला काळाच्या उदरात गडप होतील का असं भय वाटत असतांना तरुण कलावंतांनी सादर केलेला "The Folk आख्यान" हा कार्यक्रम एक अत्यंत सुखद धक्का देऊन जातो. 

ह्यातील बहुदा सर्व कलाकृती नवनिर्मीत असल्या तरी परंपरेशी आपली नाळ जोडुन आहेत. कलाकार खरोखरच लोकसंगीताला मूळ स्वरूपात सादर करतात. आपण २०२६ सालात हा कार्यक्रम पाहतो आहोत असं जाणवतच नाही इतकी ह्या कलाकारांची गुणवत्ता आहे. बहुदा ह्यातील बरेचसे कलाकार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून आल्यानं शहरी संस्कृतीनं त्यांच्या कलेच्या शुध्दतेवर घाला केला नाही. 

कार्यक्रमाच्या शेवटी जवळपास १५ मिनिटं सादर करण्यात आलेली असंख्य वाद्यांची जुगलबंदी केवळ अप्रतिमच ! यानिमित्तानं पारंपरिक, दुर्मिळ वाद्यांचा परिचय आपल्याला होतो. ह्या कार्यक्रमाच्या सादरीकरणामागं ह्या सर्व कलावंतांनी किती प्रचंड मेहनत केली असेल ह्याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं. माझ्या मनात ह्या कार्यक्रमाने प्रचंड सकारात्मकता निर्माण केली. ह्या कार्यक्रमाचे निर्माते महाराष्ट्रातील लोककलाकारांना मदत व्हावी ह्यासाठी सक्रिय प्रयत्न करत असतात. आपल्या लोकसंगीताविषयी, संस्कृतीविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानं पाहावी अशी ही कलाकृती! ह्यातील सर्वच कलाकार युवा असल्यानं असे उपक्रम आपल्या संस्कृतीला प्रतिकुल वातावरणात देखील पुढे नेऊ शकतील हा आशेचा किरण ! बऱ्यापैकी महागडी तिकिटं असली तरी मैदानावरील सर्व आसने भरली होती, हा ही एक सकारात्मक संदेश ! बाकी आपले प्रेक्षक कितीही सुंदर कलाकृती असो आपल्या चमचमीत खाण्यावरील प्रेमाला कशी मुरड घालू शकत नाहीत हे पाहुन चांगलंच मनोरंजन झालं. 

खटकणाऱ्या काही गोष्टी ! साडेसहाची वेळ देऊन कार्यक्रम साडेसात वाजता सुरु करण्यात आला. सुर्यप्रकाश नाहीसा होण्याची आम्ही वाट पाहत होतो असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं. ही अत्यंत अस्वीकारार्ह अशी बाब आहे. तुमच्याकडं एक बावनकशी सोनं म्हणावं अशी कलाकृती आहे, त्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग तुम्हांला लाभला आहे. त्यांना गृहीत धरू नका. सादरीकरणात पुर्णपणे व्यावसायिकता ठेवा. मुख्य सूत्रधाराच्या शब्दफेकीचं, भाषेवरील प्रभुत्वाचं कौतुक करावं तितकं थोडं! पण एकंदरीत निवेदनात कुठंतरी विषयांतर झाल्यासारखं वाटत राहिलं. उगाचच उथळ विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासारख्या काहीशा आजच्या काळात कर्मठ म्हणता येईल अशा प्रेक्षकाला हे खटकलं ! वसईतील निसर्गाचा आधीच ऱ्हास होत असताना दहा मिनिटांचं मध्यंतर अशी घोषणा करून जवळपास पंचवीस मिनिटं उंच इमारतीच्या जाहिराती दाखवत राहणं चुकीचं आहे! वसईत आजही रात्री दहा वाजता निद्राधीन होणारा वर्ग अस्तित्वात आहे ह्याची जाणीव असायला हवी होती!

हे सर्व असलं तरी पुन्हा एकदा - "संधी मिळाल्यास हा कार्यक्रम बघाच !"

आज पाहिलेलं "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" हे नाटक म्हणजे एक अत्यंत उत्कृष्ट कलाकृती ! त्यावरील पोस्ट लवकरच ! 

शुक्रवार, ८ मे, २०२६

अनंतिका !




सकाळी पावणेसात ते सहा पन्नास ह्या वेळात सूर्याच्या किरणांचं रूप पाहायला आणि अंगावर खेळवायला प्रसन्नदायी वाटतं. सहा एकावन्न झाले की ही किरणं तप्त होऊ लागतात. मी तासा - दोन तासाला जास्वंदीच्या रोपट्याला पाणी देत राहतो. मुंबईच्या भट्टीत गॅलरीत वाढणाऱ्या रोपट्यांविषयी माझ्या मनात दयाभाव निर्माण होत राहतो. त्यांना पुढील जन्म कोणत्यातरी जंगलात मिळो आणि तिथुन कोणत्याही महामार्गाची योजना निघू नये अशी मी परमेश्वराकडं मनोमन प्रार्थना करत राहतो. 

गावाकडील भाजीवाले साडेसात - आठच्या सुमारास आपापल्या जागी स्थिरावतात. तोवर सूर्याच्या किरणांनी दाहक रूप धारण केलेलं असतं. दोन मिनिटं ह्या उन्हात राहताच मला कससंच होऊ लागतं. लहानपणी मे महिन्यात तासनतास क्रिकेट खेळणारा आदित्य गेला कुठं असा प्रश्न मला पडत राहतो. अकराच्या सुमारास कार्यालयात निघताना ह्या भाजीवाल्यांना तळपत्या उन्हांत एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारतांना पाहुन मी अचंबित होतो. मेट्रोच्या मार्गात नसते बदल केल्यानं मी हल्ली लोकल ट्रेनने कार्यालयात जातो. त्या वेळातील एकमेव वातानुकूलित लोकल आपल्या मर्जीनुसार पंधरा मिनिटांच्या कालावधीत केव्हांही येते, केव्हांतरी रद्द सुद्धा होते.  गेल्या आठवड्यापासून मी टोपीचा वापर सुरु केला आहे. ह्या एकंदरीत प्रकाराचा मी खूपच धसका घेतला आहे. यंदा पाऊस कमी असल्यानं हा प्रकार असाच काही महिने सुरु राहील ह्या धास्तीनं मी अधिकच चिंताग्रस्त होतो. 

..... 

मी पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे दूर अशा ग्रहावर एकटाच असतो.  ह्या उन्हापासून, ह्या तप्ततेपासून मुक्तता मिळाल्यानं मला खूप खूप आनंद झालेला असतो. माझ्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय त्या सर्वशक्तिमानानं केलेली असते. भोवताली नानाविध बियाणी विखुरलेली असतात. त्यांचं प्रयोजन काहीसं मला उमजलं असलं तरीही मी त्याविषयी शाश्वत नसतो. त्यावेळी एक धीरगंभीर आवाज मनाच्या गाभाऱ्यात उमटतो. "तुझ्या मनोहर वसुंधरेचं साजिरे रूप ह्या अनंतिकेला देण्याची जबाबदारी तुझ्यावर मी सोपवत आहे!" 

हजारो वर्षे उलटून गेलेली असतात. त्या बियाणांच्या आधारे अनंतिकेला मिळालेलं ते साजिरे रूप पाहताना मला खूपच आनंद होत असतो. मी एक निमित्तमात्र असतो. 

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

या चिमण्यांनो परत फिरा रे !


आमची गॅलरी चिमण्यांना आवडते असं दिसतंय. हल्ली पहाटे लवकर उजाडत असल्यानं सव्वा सहाच्या सुमारास येऊन त्या चिवचिवाट करू लागतात. चिमण्यांच्या चिवचिवाटाने येणारी जाग एक प्रसन्नतेची चाहुल घेऊन येते. असंही सकाळची वेळ  रात्री झोपताना मनात असलेल्या चिंता दुर सारण्याची क्षमता बाळगुन असते, त्यावर हा चिमण्यांचा चिवचिवाट एक प्रसन्नतेचा शिडकावा पसरवुन जातो.  हिवाळ्यात ज्या वेळी ह्यांना थंडी वाजत असे (हा माझा कयास!) त्यावेळी त्यातील चिमणी बराच वेळ एका जागी बसुन समोरील झाडांकडं पाहत समाधिस्थ होत असे.  हा फोटो ज्यावेळी फेसबुकवर टाकला त्यावेळी मित्रानं 'कधी तिने मनोरम रुसणे' अशी टिपण्णी केली ज्यामुळं ह्या सुप्रसिद्ध काव्यपक्तींना उजाळा मिळाला! 

कधी तिने मनोरम रुसणे

कधी तिने मनोरम रुसणे

रुसण्यात उगिच ते हसणे
रुसण्यात उगिच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
म्हणून ते मनोहर रुसणे

पुरुषांच्या मनात ज्या काही मोजक्या गोष्टींची दहशत असते त्यात ह्या तथाकथित रुसण्याचा अग्रक्रम आहे. ह्याची प्रामुख्यानं दोन कारणं! हा रुसवा निर्माण होण्यास आपण कसे कारणीभुत आहोत ह्याचा बहुतांश वेळी अजिबातच थांगपत्ता नसणे हे पहिलं आणि हा रुसवा दुर करण्याचे आपण जे प्रयत्न करीत आहोत त्यामुळं हा रुसवा अधिकच वाढत जातो ह्याचा पुरुषांनी घेतलेला धसका! त्यामुळं ह्या रुसण्याकडं पुर्णपणे दुर्लक्ष करण्याचं धाडस जे पुरुष दाखवतात त्यांना माझा सलाम! वरच्या छायाचित्रातील चिमणा बहुदा त्याच वर्गातील असावा !

हे सर्व काही प्रसन्न असताना ह्या आठवड्यात टाइम्स मध्ये एका कोपऱ्यात एक दुःखद बातमी आली.  मध्य प्रदेशात आलेल्या अवकाळी वादळी पावसानं भरोली आणि अमायान गावांतील सात किलोमीटर पट्ट्यात हजारो चिमण्या मृत्युमुखी पडल्या. बहुदा ह्या अचानक आलेल्या पावसानं त्यांना आडोश्याला जाण्याची संधीच मिळाली नाही! बातमी वाचुन झालेल्या तीव्र दुःखाचा  जीवनरगड्याच्या संघर्षात काही तासांतच विसर पडला. अवकाळी पावसानं उद्ध्वस्त झालेल्या शेतांच्या / संसाराच्या बातम्या वाचुन त्या शेतकऱ्यांच्या विषयी आपल्या मनात क्षणभर तरी अनुकंपा निर्माण होत असावी का हा प्रश्न निर्माण व्हावा इतके आपण असंवेदनशील बनलो आहोत, तर ह्या बिचाऱ्या चिमण्यांच्या जीवाचं काय? 

ही बातमी वाचल्यानंतर मुंबईच्या काँक्रीट जंगलात आपला निवास शोधणाऱ्या आमच्या चिमण्यांकडं पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. त्यांना हिरव्यागार शेतात दाणे टिपायला मिळत नाही ह्याचं मला आधी दुःख वाटत असे. आता मात्र किमान त्या ह्या काँक्रीट जंगलात आपला जीव सुरक्षित ठेवू शकतात असं वाटुन गेलं. गावातली माणसं काय किंवा चिमण्या काय त्यांच्या व्यथा सारख्याच! जगाच्या काही भागात माणसांची चिमणी बाळे सुद्धा हकनाक आपला जीव गमावुन बसताहेत! त्यांच्याविषयी आपली अनुकंपा जर का असेल तर तिलासुद्धा  आपला जीवनरगड्याचा संघर्ष अल्पकालीन ठरवत आहे किंबहुना जीवनरगड्याचा संघर्ष ही ढाल पुढं करून आपण अधिकाधिक स्वकेंद्रित बनत चाललो आहोत. 

रविवार, २९ मार्च, २०२६

मनाला काबुत ठेवताना !


खंबीर मनाची माणसं हल्ली पुर्वीइतक्या वारंवारतेने दिसत नाहीत किंवा माणसांची खंबीरता वारंवार आपल्यासमोर येत नाही. ह्या दोन्ही गोष्टींच्या अनुभवानं मन पुर्वी आपसुक शांत होत असे. हल्ली भोवतालच्या माणसांशी सखोल संवाद क्वचितच होतो. सखोल संवाद अपघातानं होत नाही. सखोल संवाद घडवून आणण्यासाठी जाणकार, जगाचा अनुभव घेतलेली माणसं बैठकीत असावी लागतात, त्यांना बोलतं करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी लागते. अशा माणसांची कदर करणारा समुह भोवताली असावा लागतो. हल्ली अशा माणसांची कदर करण्याची वृत्ती आपण एक समाज म्हणुन झपाट्यानं गमावत चाललो आहोत. 

वर्तमानपत्रांचं समाजजीवनातील स्थान मला अजुनही खूप महत्वाचं वाटतं. ती समाजातील अगदी साध्या बातम्या देखील आपणापर्यंत पोहोचवत असतात. त्यात भोवतालच्या जीवनातील विज्ञान समजावुन सांगणारं सदर असतं, तिथं जुनी माणसं आपलं मनोगत अजुनही मांडत असतात. मोबाईल, संगणकाद्वारे आपल्यापर्यंत पोहचणाऱ्या बातम्यांमध्ये, सदरांमध्ये जुन्या लोकांची मतं क्वचितच आपल्यापर्यंत पोहोचत असतात. केवळ ह्या माध्यमांवर अवलंबुन राहिल्यास एका महत्वाच्या दृष्टिकोनाला आपण मुकत राहतो. 

हल्ली सामाजिक क्षेत्रातील वावर असणाऱ्या व्यक्तींच्या अधःपतनाच्या बातम्या आपणासमोर येत राहतात. सामाजिक माध्यमांची गरज म्हणुन अशा प्रकारच्या बातम्यांचा भडीमार आपल्यावर होत राहतो. मी ह्या बातम्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतो. ह्या घटना समाजजीवनात प्रथमच घडत नाहीयेत फक्त समाजमाध्यमं त्यांना आपल्यासमोर अतिउग्र रूपात सातत्यानं आणत आहेत. मला कोणाचं समर्थन करायचं नाहीये. पण जीवनात अजुन खूप तीव्र अशी दुःख आहेत, तिच्याकडं एकतर आपलं लक्ष नाही किंवा आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही. 

जीवनाच्या संघर्षाला दररोज अजिबात कुरकूर न करताना सामोरी जाणारी माणसं आपल्याला दिसत राहतात. सफाळे - केळवा इथून दररोज सकाळी चार वाजताची ट्रेन पकडून सात वाजता बोरिवलीला ताज्या भाज्या घेऊन येणाऱ्या भाजीवाल्या असतात, त्यात सत्तरीला पोहोचलेली एक वृद्ध महिला देखील आहे. थंडी, पाऊस, दुपारचं ऊन ह्याविषयी कधीही तक्रार करताना मी तिला पाहिलं नाही. 

आपल्या नियंत्रणातील गोष्टींविषयीच फक्त वाईट वाटून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याविषयी नाही! ज्या व्यक्तींशी बोलुन चांगलं वाटतं, ज्या गोष्टी (अर्थात समाजातील चालीरीतीला अनुसरून) केल्यानं बरं वाटतं, ज्या ठिकाणांना भेट दिल्यानं बरं वाटतं, जे पदार्थ (योग्य) ग्रहण केल्यानं मन प्रसन्न होतं असं सर्व काही करावं. जी माणसं आपल्या आयुष्यात आनंद आणतात ते त्यांना योग्य प्रकारे सांगावं. 

एका विशिष्ट मर्यादेपलीकडे स्वप्रतिमेची फिकीर बाळगू नये. स्वानंद आणि स्वप्रतिमेची फिकीर ह्यात निर्णय घ्यायचा झाल्यास स्वानंदाला झुकतं माप द्यावं. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवावी की आपला स्वानंद दुसऱ्या कोणाच्या पीडेला कारणीभुत न व्हावा. आपल्यापायी कोणाला पीडा होऊ शकतेय ह्याची जाणीव, हे समाजभान आपण दर्शवावं. 

साध्या साध्या गोष्टी नकारात्मकतेकडे झुकू पाहणाऱ्या मनाला थोपवू शकतात. सकाळी लवकर उठुन स्नान करून देवपूजा / भगवंताचं स्मरण करणं हे देखील मनाला बरं वाटुन देऊ शकतं. निसर्गाच्या सानिध्यात जे राहतात त्यांना निसर्ग भरभरून देत राहतो, त्यांच्या मनाची काळजी तो वाहत राहतो. निसर्गाअभावी आपल्या महानगरांचं, त्यातील माणसांचं काय होणार ह्याची चिंता मात्र मला सतावत राहते. वरणभात, भाजी, चपाती, (मांसाहारी असल्यास मोजकाच सामिष आहार), सायंकाळी लवकर आणि मोजकं जेवणं ह्या साऱ्या गोष्टी मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. 

सतत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, भ्रमणध्वनीला खिळून राहणाऱ्या माणसांचं मन त्याच्या शांत स्थितीपासून दीर्घकाळ दूर राहतं . त्याला पूर्ण शांतीची आवश्यक वेळ न मिळाल्यास  ते बेभान होण्याची शक्यता वाढीस लागते. 

ही पोस्ट लिहूनही उद्या मी माझ्या मनाला शांत ठेवू शकेन असे अजिबात नाही. फक्त मनाची सैरभैर परिस्थिती ही कायम राहणारी नाही, परिस्थिती बदलताच पुन्हा एकदा मनाला मी काबुत आणू शकेन इतका विश्वास पुन्हा नव्यानं देण्याचे काम मात्र ही पोस्ट जरूर करेल. 

(पोस्टमधील छायाचित्र माझ्या कार्यालयातील सहकारीच्या नालासोपारा येथील शेतात डिसेंबरात घेतलेलं ! अशा ठिकाणांना दिलेल्या भेटी मनाला दीर्घकाळ शांत ठेवतात )

वैचारिक साखळी - खरं आव्हान !

वैचारिक सुस्पष्टतेचा डोळ्यांत ठळकपणे भरणारा अभाव हा आजच्या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.  स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी नक्की योग्य का...