साधं सुधं!!
सोमवार, ३० जून, २०२५
द्वैत -भाग १
रविवार, २२ जून, २०२५
भावनिक बुद्ध्यांक !
आयुष्यात एका वळणानंतर मनुष्याच्या जीवनातील संपत्ती, नुसता बुद्ध्यांक (IQ) ह्यांचं महत्त्व अग्रस्थानावर कायम राहत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळले तर ह्या वयात तुम्ही काहीतरी नेत्रदीपक करून दाखविण्याची शक्यता मावळू लागलेली असते. पस्तिशी - चाळिशीनंतर कुठंतरी आयुष्यातील उभारीचा काळ संपल्याची जाणीव मनात डोकावू लागते. मग सुरु होतो आपल्या जीवनाचा, भोवतालच्या परिस्थितीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याची धडपड. ह्या संदर्भातील काही मुद्दे.
१. ह्या वयातील व्यावसायिक, वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. आपण स्वतःच्या हुशारीवर, श्रीमंतीवर सर्व काही निभावून नेऊ शकतो हा अट्टाहास चुकीचा ठरू शकतो. त्यामुळं माणसं जोडून ठेवायला हवीत. आपली तत्त्वं आणि माणसं जोडून ठेवण्याची गरज ह्यातील सुवर्णमध्य साधता यायला हवा. तत्त्वांशी विशिष्ट प्रमाणाबाहेर केलेली तडजोड संवेदनशील माणसाला त्रासदायक ठरू शकते. इथं आपल्या भावनिक बुद्ध्यांकाची कसोटी लागते. त्रासदायक अशी तडजोड काही केल्यांनतर त्या परिस्थितीतून किती झटकन तुम्ही बाहेर येऊ शकता हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर अवलंबून असते.
२. व्यावसायिक, वैयक्तिक जीवनात तुमची कर्तव्यं असतात. ह्या कर्तव्यांना संबंधित अशा सर्व घटनांवर आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं असतं. एकलव्य बनायचं असतं. पण त्याच वेळी तुमच्या जीवनात घडणाऱ्या इतर घटनांमध्ये तुमची उपस्थिती, तुमचा सक्रिय सहभाग असतो. आपला दिवस, सप्ताह, महिना ह्यांचं एका काल्पनिक कागदावर चित्र आखून कर्तव्यं आणि त्या पलीकडील असलेल्या आयुष्याला त्यावर योग्य ते स्थान देणं हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकाचं महत्वाचं काम ! हे चित्र योग्य कालावधीनंतर बदलत राहतात. 'और क्या ऐहदे वफा होते हैं, लोग मिलते हैं जुदा होते हैं' प्रकार घडत राहतात.
३. हल्ली बरीच माणसं आयुष्यात काहीच घडलं नाही की निराश होतात. ह्या निराश होण्यासाठी काहीच न घडण्याचा कालावधी अगदी काही तासांपासून सुद्धा सुरु होऊ शकतो. इथं आपले संस्कार कामी येऊ शकतात. गॅजेटपासून तुम्ही जितकं दूर राहाल तितकं तुम्हांला स्वत्व गवसेल आणि एकदा का स्वत्व गवसलं की नैराश्यापासून दूर राहायला तुलनेनं सोपं जाईल. आपल्या शहरातील मोकळ्या जागांचा अभाव हा मोठ्या चिंतेचा विषय तो ह्याच कारणास्तव! ह्या अभावामुळं लोक घरात कोंडून घेऊ पाहताहेत किंवा महामार्गावर गाड्या घेऊन वाहतूककोंडीत भर घालीत आहेत.
४. आयुष्यात दीर्घकालीन आणि तात्कालिक ध्येयं असतात. त्यातही तुमची वैयक्तिक आणि संघटनेची ध्येयं असतात. सतत बदलणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीत सर्वांना सोबत घेत जाऊन ह्या ध्येयांच्या विविध छटांना न्याय देण्यासाठी आवश्यक असणारा गुणधर्म म्हणजे भावनिक बुद्ध्यांक !
५. आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वशक्तिमानाशी मिसळून जाण्याची प्रक्रिया जमेल तितकी लवकर सुरु करण्याची प्रगल्भता म्हणजे तुमचा भावनिक बुद्ध्यांक. ह्यासाठी देवांचे नामस्मरण करणे, स्वाभिमानाला योग्य ठिकाणी मुरड घालणे, सखोल वाचनात स्वतःला झोकून देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
६. गावात वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भावनिक बुद्ध्यांक पाहून मी नेहमीच अचंबित होत आलो आहे. जीवनातील विविध घटनांकडे तटस्थपणे पाहण्याची प्रगल्भता ह्यातील बऱ्याच लोकांकडे असते. निसर्गाची असलेली जवळीक ह्यात मोठा हातभार लावत असावी असा माझा कयास. म्हणूनच पोस्टमध्ये एका डेरेदार वृक्षाचं छायाचित्र! पोस्टशी अजिबात संबंध नसणारी छायाचित्रं पोस्टमध्ये बिनधास्त जोडून देणे ही माझी सवय !
कालच्या वसई भेटीत घरच्या जाणकार मोठ्या लोकांसोबत केलेल्या चर्चेचा ह्या पोस्टमध्ये मोठा सहभाग आहे.
गुरुवार, १२ जून, २०२५
So what ..अर्थात तर मग काय ?
आधुनिक काळातील मला उमगलेल्या काही गोष्टी !
१. हल्ली बरीच माणसं, राष्ट्रं अधिकाधिक महत्वाकांक्षी बनताहेत. माणसांच्या महत्वाकांक्षांचा उगम नक्की कुठं झाला आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला आपली विचारप्रक्रिया भरकटत चालली आहे हे जाणवल्यानं मी हा प्रयत्न मी सोडून देतो.
२. माणसानं महत्वाकांक्षी असणं चांगलं. प्रगतीसाठी ते आवश्यकच आहे. फक्त ध्येयापर्यंत मार्गक्रमणा करताना आपण जे काही त्याग करतो, ज्या माणसांना गृहित धरतो / दुखावतो त्याची जाणीव असणं आवश्यक आहे. तो एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असावा.
३. ध्येय प्राप्तीनंतर त्याचा आपल्याला कोणत्याही बाह्य घटकांच्या मदतीशिवाय निखळ आनंद व्हायला हवा. आपल्या आनंदासाठी इतरांच्या कौतुकाची, दाद मिळण्याची अपेक्षा नसावी. आपल्या तोंडावर कौतुक करताना काही खोचक वाक्यं, शब्द वापरण्याची सवय काही जणांना असते. मनुष्यजातीची ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे ह्याची जाणीव ठेवावी. कोणीही किती मोठी प्रगतीची शिखरं गाठली तरी so what हा प्रश्न विचारला जाणार हे अपरिहार्य आहे.
४. चाळीस, पन्नाशीनंतर माणसं विचित्र वागु लागली आहेत. मी ही वेगळाच वागतो. आपण वेगळं वागतोय हा संदेश आपल्या मेंदूनं आपल्याला द्यावा ह्याची सूचना मेंदूला द्यावी. आपल्याला हे जाणवु देणारी माणसं भोवताली असतील तर आपण सुदैवी आहात. फक्त अशा माणसांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्यांना पुढील प्रतिक्रिया देण्यासाठी परावृत्त करेल अशी आपली प्रतिक्रिया नसावी.
५. मुद्दा क्रमांक चार मुळे आपण आयुष्यभर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या माणसांपासून काही घटनांमुळं आपण दुखावलं जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. अशावेळी खंत न बाळगता शांतपणे बाजूला व्हावं. आपल्या दैनंदिन, कार्यालयीन कामात व्यस्त करून घ्यावं. जसं त्यांनी आपल्याला दुखावलं असं आपल्याला वाटतं तसंच आपण त्यांना दुखावलं असं त्यांना वाटत असावं ही शक्यता ध्यानात घेऊन गप्प बसावं.
६. जिथं आपल्या मताला किंमत नाही तिथं व्यर्थ / फुकाची गडबड करू नये.
७. मर्यादित कार्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दृढ असतो, त्याला दैनंदिन दिवसात तडा जाईल असं काही घडत नसतं. त्यामुळं त्याच्या नादाला लागू नये. सुसरबाई तुझी पाठ मऊ सांगून गप्प बसावं.
८. समाजातील एकमेकांविषयीचा विश्वास, आस्था झपाट्यानं लयाला जाऊ लागली आहे. ह्यासाठी कदाचित मुद्दा क्रमांक एक कारणीभूत आहे. आपल्या पूर्वजांनी ह्या युगाला कलियुग म्हटलं त्यामागं हे मुख्य कारण असावं.
कालच वसईतील ज्ञानी माणसांनी 'जो पुरुष घरात शांत बसू शकतो तो समाधानी, त्याच्या जीवनात समस्या कमी!' असा संदेश पाठवला. ह्या संदेशाचे अनुकरण करत ऋतूकाळाप्रमाणे निसर्गात निर्माण होणाऱ्या हिरव्या भाज्या, डाळ, भात आणि मोजक्या वेळा सामिष आहार घेऊन सुखी जीवन जगावं!
बुधवार, ४ जून, २०२५
वेडात इंग्लिश खेळाडू झाले सायकलस्वार !
मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घरी येत असल्याचं स्वप्न पडलं. हडबडून जागा झालो, बराच वेळ बेचैन होतो. शेवटी वेळ न पाहता स्नान केलं तेव्हा कुठं झोप लागली.
आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच अनेक खळबळजनक बातम्या वाचायला मिळाल्या. त्यात लंडनच्या वाहतूककोंडीत अडकल्यानं इंग्लिश खेळाडूंनी लाईम बाईक्स ह्या भाड्यानं सायकली देणाऱ्या यंत्रणेच्या सायकली वापरून ओव्हल मैदान गाठल्याची मनोरंजक बातमी होती. वेस्ट इंडिजचा संघ मात्र बसमध्येच बसून राहिला. त्यामुळं त्यांना मैदानावर पोहोचण्यास उशीर होऊन नाणेफेक सुद्धा उशिरानं झाली. ह्या निमित्तानं माझ्या मनात आलेले काही विचार !
१. आधुनिक क्रिकेट खेळाडूंना रस्त्यावर आत्मविश्वासानं सायकल चालवता यायला हवी. ह्यात केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील कोणत्याही देशात स्थानिक वाहतुकीचे नियम पाळून सायकल चालवता यायला हवी.
२. लाईम बाईक्स ह्या कंपनीत ज्यावेळी इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं "मला जरा चांगल्या पंधरा सायकली भाड्यानं हव्या आहेत" असा भ्रमणध्वनीवरून फोन केला असेल त्यावेळी तो फोन घेणाऱ्या स्वागतकक्षातील मनात कोणकोणते विचार आले असतील ह्यावर एक मोठा लेख लिहून होईल. हॅरीने तासाभरासाठी ह्या पंधरा सायकली नोंदविताना दरांमध्ये घासाघीस केली असेल का हा बाळबोध भारतीय विचार माझ्या मनात आला. तरी सध्या बेन स्ट्रोक संघात नसल्यानं अधिक दणकट सायकल द्या असं सांगण्याची वेळ हॅरीवर आली नसावी.
३. वेस्ट इंडीज संघ मात्र बिचारा बसमध्येच बसून राहिला. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अमेरिकेच्या सानिध्यात असल्यानं ते रस्त्याच्या उजव्या बाजूनं वाहनं चालवीत असतील. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या बाजूनं सायकली चालविण्यासाठी योग्य तयारी नसल्यानं त्यांनी बसमध्ये बसून राहणं पसंत केलं असावं असं मला वाटलं. पण ते ही इंग्लिश वसाहतीचा भाग असल्यानं ते ही रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवितात असं माहिती मायाजालाने सांगितल्याने हा सिद्धांत मागे पडला. जेव्हा केव्हा शाई होप भेटेल तेव्हा त्याला नक्कीच हा प्रश्न मी विचारेन.
४. आता लेखातील मुख्य कल्पनाविलास! ह्या कल्पनेवर मी भविष्यात चित्रपट बनविणार. तोवर कोणी चौर्यकर्म करून असा चित्रपट बनवू नये ही आशा. भारतीय संघ वानखेडेवरील क्रिकेट सामन्यासाठी ताज हॉटेलमध्ये राहत असतो. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या सामन्यासाठी साडेअकरा वाजता बसमधून निघालेल्या भारतीय संघाची बस अशीच वाहतूककोंडीत सापडते. तात्काळ लिंबूपाणी ह्या ताशी शंभर रुपये भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपनीला गौतम गंभीर फोन करतो. त्यांच्याशी घासाघीस करून ताशी नव्वद रुपयांपर्यंत तो दर खाली आणतो. पहिल्या दोन सायकली बसजवळ पोहोचताच रोहित आणि विराट, गिल आणि राहुलवर दादागिरी करून त्या सायकलीवर बसतात. विराटने आपण सायकलवरुन वानखेडेवर जात आहे हे कळविल्यानं तो सायकल व्यवस्थित चालवेल की नाही हे पाहायला अनुष्का आपली सायकल घेऊन तात्काळ तिथं पोहोचते. ते तिघे जरी हेल्मेट घालून रस्त्यावरून मार्ग काढत पुढे पुढे जात असले तरी रस्त्यावरील नागरिक त्यांना लगेचच ओळखतात. लगेचच डझनभर न्युज चॅनेलला ही बातमी कळल्याने त्यांचे प्रतिनिधीसुद्धा लिंबूपाणी कंपनीतर्फे सायकली घेऊन तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. एव्हाना भाडं ताशी दहा हजार रुपयांपर्यंत गेलं असतं. पुन्हा एकदा वाहतूककोंडीत सापडल्यानं रोहित, विराट, अनुष्का हताश झालेले असतात. इतक्यात एक उमदा तरुण विनू त्यांच्या मदतीला धावून येतो आणि गल्लीबोळातील रस्त्यातून वानखेडेला पोहोचविण्याची ऑफर देतो. अनुष्का लगेचच हो म्हणते. ह्या गल्लीबोळातील रस्त्यावरून जाताना एका गल्लीत स्थानिक दोन संघात टेनिस बॉलने सामना चाललेला असतो. तेथील फलंदाजी करणाऱ्या संघाला जिकंण्यासाठी एक षटकात पंचवीस धावांची आवश्यकता असते. त्यांचा कर्णधार स्थानिक दादा असतो. रोहित आणि विराट ह्यांनी एक षटक फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं तरच पुढे जाऊ देण्यात येईल अशी तो अट घालतो. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत अनुष्का त्या दोघांना हो म्हणण्यास भाग पाडते. आता ते दोघे फलंदाजीला जाण्यासाठी निघतात. परंतु रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या पिचवर पोहोचताच त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु होते. सर्वजण धावत धावत त्यांच्याजवळ पोहोचतात. महत्प्रयासाने त्यांना बाचाबाचीचे कारण कळतं. पहिला स्ट्राईक कोणी घ्यायचा ह्यावर त्या दोघांमध्ये एकमत होत नसतं. पुढं काय होतं ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला माझा आगामी चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत थांबावं लागेल!
गुरुवार, १५ मे, २०२५
आठवणीतील कविता - मुलांस बोध
आठवणीतील कविता ह्या शृंखलेतील भाग एक आणि दोन ह्या पुस्तकांचं वाचन करत असताना मुलांना बोधपर अशा तीन कविता वाचनात आल्या. ह्या भागात आणि उर्वरित दोन भागात अजूनही ह्याच आशयावरील काही कविता असू शकतात.
तत्कालीन समाजात लिखित वाङमयानं समाजाला बोध देण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावली असणार. त्यावेळची बुद्धिमान माणसं चांगलं काही वाचण्यासाठी भुकेली असावीत. अशा ज्ञानी माणसांना लिखित स्वरूपात मिळालेलं ज्ञान त्यांनी समाजातील इतर घटकांपर्यंत विविध माध्यमाद्वारे पोहचविण्याचा प्रयत्न केला. कविता ह्या माध्यमातून ज्ञान, संदेश प्रसार सहजरित्या होत असणार कारण एकदा का कवितेला चाल देऊन तिचा सर्व घरात प्रसार झाला की घरातील जुनीजाणती मंडळी, आजी पुढील पिढीपर्यंत ह्या अमूल्य ठेव्याचं हस्तांतरण अगदी अलगदपणे करण्याचं काम नीटनेटकेपणानं बजावत असत.
ही पोस्ट लिहितांना मनात आलेले काही विचार
कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं
सदा हंसावें तुजला जनांहीं ।।१।।
कसा तुला छंदच भ्रमणध्वनीचा
तासंतास व्हाट्सअँपवर रेंगाळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं
सदा हंसावें तुजला जनांहीं ।।१।।
आता तीन कविता ह्या दोन पुस्तकांतून घेतलेल्या मूळ रूपात! शुद्धलेखनाच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी काही चुका राहिल्या असल्यास क्षमस्व!
मुलांस बोध - रामदास
भुजंगप्रयात
बरे सत्य बोला यथातथ्य चाला,
बहु मानिती लोक येणें तुम्हांला,
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो,
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ।।१।।
सदा दांत घांसोनि तोंडा धुवावें,
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें,
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे,
बहू काळ हा खेळ कामा नये रे. ।।२ ।।
दिसामाजि कांहीतरी ते लिहावें,
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करावें,
बरें बोलणें नित्य जीवीं धरावें. ।। ३ ।।
बहु खेळ खोटाची आलस्य खोटा,
समस्तांशि भांडेल तोची करंटा.
बहुतां जनांलागिं जीवें भजावे,
भल्या संगतीं न्याय तेथे वसावें. ।। ४ ।।
विवेकेंविणें सर्वही दंभ झाला,
बहु नेटका सज्जला साज केला.
प्रतीतीविणें बोलणें व्यर्थ होतें
विचारेविणें सर्वही व्यर्थ हो तें . ।। ५ ।।
'भला रे भला!' बोलती तें करावें,
बहुता जनांचे मुखें येश घ्यावें.
परी शेवटी सर्व सोडून द्यावें,
मरावें परी कीर्तिरूपे उरावे. ।। ६ ।।
मुलांस उपदेश
शिवी कोणा देऊं नये ।।
कोणासंगे भांडूं नये ।।१।।
अनवाणी चालूं नये ।।
चालताना धांवूं नये ।।२।।
खोटी साक्ष देऊं नये ।।
जामिन कोणा होऊं नये ।।३।।
दुसऱ्याचें चोरुं नये ।।
खोटें कधीं बोलूं नये ।।४।।
गोड फार खाऊं नये ।।
पाहिलें तें मागूं नये ।। ५ ।।
चित्तीं धरी जो हे बोल ।।
त्याचें कल्याण होईल ।। ६ ।।
अभंग
सकाळी उठोनी, देवासी भजावें ।।
गुरुसी वंदावे, जीवें भावें ।। १ ।।
वडिलांची आज्ञा, घेतल्यावांचून ।।
कोठें घरांतून, जाऊं नये ।। २ ।।
शाळेसी जातांना, मुलांनीं वाटेंत ।।
तमाशा पाहात, राहूं नये ।। ३ ।।
नेमियल्या वेळीं, शाळेमध्यें जावें ।।
चित्त तें ठेवावें, विद्येवरी ।। ४ ।।
बालपणीं विद्या, वृक्षासी लावावें ।।
तरुणपणी घ्यावें, फळ त्याचें ।। ५ ।।
अभंग तुकाराम
आता तरी पुढें, हाची उपदेश ।।
नका करूं नाश, आयुष्याचा ।। १ ।।
सकळांच्या पायां, माझे दंडवत ।।
आपुलालें चित्त, शुद्ध करा ।। २ ।।
हित तें करावें, देवाचें चिंतन ।।
करूनियां मन, शुद्ध भावे ।। ३ ।।
तुका म्हणे हित, होय तो व्यापार ।।
करा, काय फार शिकवावें ।। ४ ।।
मुलांस उपदेश
श्लोक - उपेंद्रवज्रा
कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं
सदा हंसावें तुजला जनांहीं ।।१।।
भुजंगप्रयात
मुलांनों तुम्हीं सर्व हा खेळ सोडा
मनीं काळजी बाळगा ज्ञान जोडा
असा काळ कैसा तुम्हांला मिळेल
पुढे दुःख होतां तुम्हांला कळेल ।। २ ।।
आर्या
तुमचें वय हें आहे, केवळ विद्या शिकून असण्याचें
चित्तीं धरूनि ऐसें, टाकुनि द्यावें उगीच फिरण्याचें ।। ३।।
श्लोक - कामदा
चांगल्यासवें संगती घरी
त्यामुळे जगीं मान्यता खरी
अन्यथा तुम्हां कोण मानिल
योग्यता जगीं कैशि होईल ।। ४ ।।
शुद्धकामदा
धरुं नका तुम्ही दुष्ट वाट ती
जरी तुम्हांस ती गोड वाटती
करिल नाश ती हे धरा मनीं
करूं नका हसूं आपलें जनीं ।। ५ ।।
भुजंगप्रयात
स्मरा नित्य देवा करा मातृसेवा
धरा सुस्वभावा त्यजा वैरभावा
असे केलिया सौख्य तुम्हांस आहे
म्हणूनीच मी नित्य बोधीत आहें ।। ६ ।।
आर्या
उपदेश हा ठसूं द्या, तुमच्या चित्तावरीच बळकटसा
नाहींपक्षीं तुमचा, होय श्रम आमचाहि फुकट तसा ।। ७।।
गुरुवार, १७ एप्रिल, २०२५
जडले नाते ढगांशी !
मागच्या जन्मी मी आदिमानव होतो त्यावेळची गोष्ट! जंगलातून फिरताना अचानक सामोऱ्या येणाऱ्या नदीच्या विस्तृत पात्रातील अत्यंत वेगाने वाहणाऱ्या जलप्रवाहाकडे बघून मी खूप अचंबित होत असे. या जलप्रवाहाचा स्त्रोत म्हणजे आकाशातील ढगातून होणारी पर्जन्यवृष्टी हे समजावयास मला फार वेळ लागला होता. परंतु त्यानंतर मात्र या ढगांकडे मी मोठ्या आदराने पाहत असे. पावसाळ्यात हे ढग माझ्या जीवनाच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचवतील की काय अशी शंका माझ्या मनात निर्माण होत असे. याउलट उन्हाळ्यात झपाट्याने कोरड्या पडू लागलेल्या नदीच्या पात्राकडे पाहून मी मोठ्या आशेने या ढगांची वाट पाहत असे.
या जन्मी शहरांच्या काँक्रीट जंगलात आयुष्य व्यतित करत असताना ढगांशी संपर्क होत असला तरी त्यांच्याशी संवाद मात्र फारसा होत नाही. याला अपवादात्मक असे काही क्षण येतात जसे की कार्यालयातील गवाक्षातून पावसाळ्यात ज्यावेळी मोठ्या प्रमाणात ढग दाटून येतात! त्यावेळी कदाचित माझ्या मागच्या जन्मीच्या स्मृती जागृत होत असाव्यात. परंतु ढगांशी या आयुष्यात अगदी जवळून असा संपर्क म्हणा किंवा संवाद म्हणा होतो असा प्रसंग म्हणजे विमानप्रवास! विमानप्रवासाच्या बाबतीत मी कार्यालयीन कामांसाठी जेव्हा प्रवास करतो त्यावेळी खिडकीची जागा मिळवण्यासाठी माझा मोठा अट्टाहास असतो. असंच या रविवारी हैदराबादला जाताना सायंकाळच्या विमान प्रवासात अचानक ढगांच्या मोठ्या परिसंस्थेतून प्रवास करण्याचा मोका मिळाला. ही परिसंस्था मोठी क्लिष्ट होती. ढगांची आपण ज्यावेळी छायाचित्र पाहत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा आपण केवळ द्विमितीय ढगांची कल्पना रेखाटत असतो. परंतु विमान ज्यावेळी अशा महाकाय ढगांमधून प्रवास करतं त्यावेळी त्यांच्या अवाढव्य पसरलेल्या तिन्ही मितींची आपणास स्पष्ट जाणीव होते. या ढगांची ही रूप अत्यंत लोभसवाणी अशी असतात. या चित्रांमध्ये ढगांच्या बहुधा अशा तीन परिसंस्था दिसत आहे. या परिसंस्था निर्माण होण्यासाठी पर्यावरणातील कोणते घटक कारणीभूत ठरले असावेत हा संशोधनाचा विषय आहे. परंतु असे उभे आडवे पसरलेले गोलाकार ढग ज्यावेळी मावळत्या सूर्यकिरणांनी उजळून निघतात तेव्हा त्यांची ही रूप अत्यंत मनोवेधी अशी असतात. ह्या महाकाय ढगांच्या आसपास काहीशे अत्यंत छोटुकले परंतु वेगाने प्रवास करणारे स्लिम आणि फिट ढग सुद्धा प्रवास करत असतात. मनात वेगवेगळे विचार येतात. महाकाय ढगांची परिसंस्था कमी वेगाने प्रवास करत आपल्या सानिध्यात येणाऱ्या भूमातेला आपल्या थंडगार जलधारांनी तृप्त करत पुढे जात राहते. याउलट स्लिम व फिट ढग मात्र आपल्याच नादात "मै जिंदगी का साथ निभाता चला गया!' हे गाणे गुणगुणत पुढे जात राहतात.
हैदराबादचा प्रवास मोजून मापून तासाभराचा! अशी ही ढगांची परिसंस्था आपल्या सोबतीला वीस पंचवीस मिनिटे असली तर हा प्रवास खूपच मनोरंजक होतो. वास्तवात यायचं झालं तर हे ढग आपल्या विमानाला हेलकावे देत राहतात. त्यामुळे त्या तासाभरात आपल्याला मिळणार सँडविच आपल्याला काहीशा विलंबाने मिळतं, पाच मिनिटातच आपल्याला ते संपवावे लागतं. बिचाऱ्या त्या ढगाला त्याच्या मुळे होणाऱ्या माझ्या आयुष्यातील परिणामांची काय कल्पना! हैदराबादच्या प्रवासात दिसलेला हा ढग म्हणून कदाचित याचं नाव काहीसं तेलगू प्रकारात मोडणार असावं असा माझा कयास!
आता सहजच आठवलं म्हणून लंडनच्या परतीच्या प्रवासात दिसलेल्या जॉन ढग आणि त्याच्या कुटुंबाचे हे एक मोहक दृश्य !
चिंता करू नका मी ठीक आहे. उद्यापासून येणाऱ्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीच्या विचारामुळे असं काही झालं असेल कदाचित!
रविवार, २३ मार्च, २०२५
आठवणीतल्या कविता - आजीचे घड्याळ
द्वैत -भाग १
१ - जुलै - २०५६ (मुंबई) "अनिकेत, अमेरिकेतील ह्या महत्वाच्या प्रोजेक्टसाठी तुला मनःपुर्वक शुभेच्छा ! मला खात्री आहे की तू यशस्वी होऊनच...

-
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो. त्यावेळी स...
-
बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव. गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्ड...
-
महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. तत्कालीन महाराष्ट्रात ज्या लोकरुढींविषयी ह्या विचारवंतांना सुधारणा कराव्याशा वाटल्या त...