मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

Chemical Hearts !

 


प्राईम व्हिडिओवर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एखादा चित्रपट randomly निवडुन तो पाहण्याची सवय गेले काही आठवडे मला लागली आहे. जाहिरातीचा व्यत्यय नसेल तर चित्रपटाचा निखळ आनंद आपण लुटू शकतो. आज असाच अचानक निवडलेला चित्रपट  Chemical Hearts !

टीनएज हा अस्थिर मनोवस्थेचा काळ ! चित्रपटात ह्या विषयावर उत्तम भाष्य आहे ! बाल्यावस्था ते प्रौढपण ह्यातील ही संक्रमणावस्था !  मेंदु, शरीरामध्ये ह्या मोजक्या वर्षात प्रचंड बदल घडत असतात. खरंतर ह्या मुलांना ह्या काळात संवादांची, भावनिक आधाराची गरज असते. परंतु आपण मोठे होत आहोत, आपल्याला स्वतंत्रपणे वागता आलं पाहिजे, निर्णय घेता आले पाहिजेत ह्याचा अप्रत्यक्ष दबाब ह्या मुलांवर असतो. त्यामुळं आधीच गोंधळलेली ही मुलं काहीशी विचित्र वागु लागतात. साधारणतः ह्याच काळात त्यांच्या पालकांच्या आयुष्यातसुद्धा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता बळावते ! 

चित्रपट ह्या परिस्थितीवर उत्तम पण काहीसं अतिरेकी भाष्य करतो !  टीनएज  काळ(आपण पौगंडावस्था ही शब्द वापरु  शकतो !) हा प्रचंड दुःखाचा काळ आहे . ह्यातुन  केवळ सुदैवी माणसेच सुखरूपपणे  बाहेर  पडतात आणि पुढील आयुष्यात  आनंदानं जगु शकतात. 

ह्या  काळात एखाद्या रिलेशनशिपमध्ये  स्वतःला गुंतवून  घेणं ओघानेच आले . ह्यात बऱ्याच वेळा  peer pressure चा  भाग  असतोच . हल्लीच्या काळात त्यात अजुनही अधिक गुंतागुंतीच्या प्रकारांची भर पडली आहे. 

चित्रपटाच्या कथानकातील मुख्य पात्रे दोन ग्रेस टाऊन आणि हेन्री पेज. ग्रेस आपल्या आधीच्या स्थिर नात्यातून एका दुर्दैवी अपघातामुळे बाहेर फेकली जाते. ह्यात तिला बराच मार लागतो आणि तिचा देखणा, खेळाडु असलेला प्रियकर मरण पावतो! एखाद्या स्थिर नात्यातून बाहेर पडल्यानंतरचा काळ फार कठीण असतो. टीनएज कालावधीत ह्याची काठिण्यपातळी अजुन वाढते ! चित्रपट ह्यावर उत्तम भाष्य करतो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या नात्यात (रिलेशनशिपमध्ये) गुंतलेले असता त्यावेळी तुमच्या मेंदुत आनंद निर्माण करणारी रसायने निर्माण होत असतात. ह्या कालावधीत तुम्हांला ह्या रसायनांची आणि त्याद्वारे निर्माण होणाऱ्या आनंदाची सवय झालेली असते. तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, त्याच्याशिवाय मी जगु शकत नाही असं म्हणता त्यावेळी त्यात ह्या रसायनांचा मोठा हातभार असतो! ग्रेसचा दुसऱ्या नात्यात स्थिरावण्याचा संघर्ष सुरु असताना हेन्री मात्र आपल्या पहिल्याच नात्याशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. इंग्लिश शब्दाचा वापर करत बोलायचं झालं तर ग्रेस आपल्या पहिल्या नात्याचं बॅगेज बाळगत असते. ते झटकन फेकुन देणं तिला जमत नसल्यानं अधूनमधून तिचं वागणं अचानक विचित्र बनतं. हेन्री आपल्यापरीने तिला सांभाळुन घेत राहतो. एखादी गोष्ट ग्रेसला आवडली नाही तर त्यामागं तिच्या आधीच्या रिलेशनशिपचा संदर्भ असु शकतो हे त्याला सहजासहजी कळत नाही. पण एकदा कळल्यानंतर मात्र तो खूप सुंदर प्रयत्न करतो ! 

गावाबाहेर असलेली एक निर्मनुष्य जागा ! इथं ह्या दोघांमध्ये सुंदर संवाद घडत राहतात ! इथं एक पाण्याचा प्रवाह असतो आणि त्यात रंगीबेरंगी मासे असतात. ह्यात पाय सोडून बसुन राहणं ग्रेसला खूप आवडतं ! आपल्या अपघातानंतर आपल्या थेरपीसाठी ह्या जागी मी यायचे असंही ती म्हणते. ती झाली शारीरिक जखमा भरुन काढण्यासाठीची थेरपी, पण ह्याच ठिकाणी ती हेन्रीच्या सोबतीनं आपल्या मानसिक जखमा भरुन काढण्याचा प्रयत्न करत राहते. एका प्रसंगी ती आपल्या आधीच्या प्रियकरासोबत लग्नासाठी निवडलेला पेहराव ह्या पाण्यात सोडुन देते. आधीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मी सज्ज आहे असा काहीसा प्रतीकात्मक संदेश ! 

चित्रपटातील काही वाक्यं स्मरणीय ! चित्रपटाच्या आरंभी ग्रेस हेन्रीला म्हणते, आपण म्हणजे काय तर अणूंचा एकत्र आलेला समुह ! काही काळापुरती हे अणु एकत्र येतात; आपण आयुष्य जगतो आणि मग पुन्हा हे अणु विखरले जातात. आसमंतात एखाद्या ताऱ्याच्या रुपात आपलं अस्तित्व राहत असावं ! 

पुढं कुठंतरी दोघंही आयुष्यात वेगळ्या दिशेनं निघुन जाण्याचा निर्णय घेतात. इथं एकमेकांच्या विषयी आदर बाळगत वेगळं होणं महत्वाचं ! त्यावेळी ग्रेस हेन्रीला म्हणते, "हेन्री तु एका चांगल्या अणूंचा समुह आहेस !" हा नवीन काळाचा अजुन एक गुणधर्म ! चित्रपटाचा सुखांत व्हायलाच हवा असं बंधन नाही किंबहुना एखाद्याविषयी सुमधुर स्मृती बाळगत आयुष्य जगणं हा सुद्धा दोघांच्या कहाणीचा सुखांत असु शकतो ! 

लिली आणि ऑस्टिन ह्यांचा अभिनय सुंदर! लिली रेनहार्ट ही अत्यंत गुणी अभिनेत्री ! पुढे चांगलंच नाव कमवेल असा माझा अंदाज !!

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

नकार!!




सन १९९x

महिना मार्च

स्थळ - सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वसतीगृह अंधेरी पश्चिम

मुख्य पात्र - आदित्य पाटील - प्रथम वर्ष अभियांत्रिकी

प्रसंग १

होळीच्या रात्री -वसतिगृहातील सर्व विद्यार्थीगण जागरण करुन होळी पेटविण्याच्या अस्सल मूडमध्ये! सर्वजण एक निव्वळ सोपस्कार म्हणुन वसतिगृहाच्या मेसमध्ये रात्रीचे जेवण आटपत होते.

शैलेश - "अरे आज आदित्य एकटाच कोपऱ्यात का बसलाय ? आपल्याकडं पाहत सुद्धा नाही !"

बाकी सर्व मंडळी - "चलो देखते हैं मामला क्या हैं ?"

शैलेश - "आदित्य काय झालं ? आज एकटाच का जेवायला बसला आहेस ? आणि घरी का नाही गेलास होळीला ?"

आदित्य - " अरे बहिणीच्या लग्नाची तयारी घरी जोरात सुरु आहे! अभ्यास होणार नाही घरी ,म्हणुन इथं थांबलोय ! सबमिशन करीन म्हणतोय उद्या !"

शैलेश - "सबमिशन होईल रे ! पण आज रात्री होळी पेटवायला आणि उद्या सकाळी धुळवडीला यायचं बरं का !"

त्याच्या स्वरात गर्भित धमकी ओथंबुन भरली होती !

आदित्य - "नको रे शैलेश, सबमिशन बाकी राहील ! " - हाच तो नकार !

नक्की काय झालं आठवत नाही पण मंडळींचं लक्ष दुसरीकडं गेलं ! रात्री मी होलिकादहनाला गेलो नाही हे ह्या मंडळींच्या ध्यानात आलं नसावं असा सोयीस्कर समज मी करुन घेतला !



प्रसंग २

दुसऱ्या दिवसाची रम्य सकाळ !

सकाळी पावणेसहा वाजता उठून कर्तव्यदक्ष आदित्य पाटील ह्यांनी आंघोळ वगैरे आटपुन घेतली. खोली तळमजल्यावर आणि खोलीला लागुन बाल्कनी ! खोलीबाहेर जाऊन कोणी पाहत नाही ह्याची खातरजमा करुन घेत महाशयांनी खोलीला कुलूप लावलं. आणि सुमडीमध्ये बाल्कनीमधून प्रवेश करुन, बाल्कनीचा दरवाजा आतून घट्ट बंद करुन जग जिंकल्याच्या अविर्भावात महाशय रसायनशास्त्राचा धडा वाचू लागले ! साधारणतः साडेआठ वाजेपर्यंत हा प्लॅन अगदी ११०% यशस्वी झाल्याची लक्षणं दिसत होती. परंतु पावणेनऊच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरुन कल्लोळ सुरु झाला! स्लीपर घालुन जोरजोरात धावत जाण्याचे आवाज येऊ लागले ! ह्यातील पहिला आवाज बाथरुम मध्ये जाऊन बादली भरुन आणण्याचा आणि दुसरा गाढ झोपेत अंगावर थंड पाण्याची बादली ओतल्यावर मनात जे असंख्य भाव निर्माण होतील त्यांना एका सेकंदात शब्दरुप मिळाल्यानंतरचा होता ! तिसरा मजला आटोपला आणि मंडळी दुसऱ्या मजल्यावर आली ! धकधक करने लगा गाणे त्यावेळी आले नव्हते तरी तेच भाव निर्माण झाले ! रसायनशास्त्रातील रसायनांपेक्षा थंड पाणी भयावह असु शकते हे भाव मनी निर्माण झाले !

आणि तो क्षण आला !

शैलेश - "अरे आदित्य लॉक करुन गेला कुठं ?"

साधारणतः भिजलेली पंधरा वीस मंडळी माझ्या रूमच्या बंद दरवाजासमोर उभी होती ! त्यातील ऐशी टक्के लोक मनाविरुद्ध भिजवले गेले असल्यामुळं सूडाच्या भावनेनं पेटले होते !

राजकुमार - "लेकिन आदित्य सुबह कहा नहीं जा सकता !"

राजकुमारच्या ह्या आत्मविश्वासपर शब्दांनी गोंधळ केला ! ही उत्साही मंडळी धावत धावत बाहेर गेली आणि माझ्या गॅलरीत आली ! त्यांच्या ह्या प्रवेशानंतर मी लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नव्हते ! त्यांनी मला पाहिलं !

आता नाट्य पुन्हा माझ्या दरवाज्यासमोर घडू लागलं !

शैलेश - "आदित्य बऱ्या बोलाने दरवाजा उघड ! नाहीतर तोडायला कमी नाही करणार !"

त्याच्या ह्या शब्दावर अविश्वास ठेवण्याचं काही कारण नव्हतं !

आदित्य - "अरे पण थोडा अभ्यास करायचा आहे !"

माझ्या ह्या उत्तरानं मंडळींचा संयम संपुष्ठात आला! दरवाज्यावर जोरात धडका बसु लागल्या ! दरवाजा तुटू शकतो ह्याची खात्री होताच मी दरवाजा उघडला !

पुढील अर्धा मिनिट भयानक सन्नाटा होता !

राजकुमार - "क्या करने का इसका !"

आदित्य - "एक के बदले दो बादली से भिगाओ !" माझ्या ह्या उत्तरावर मंडळीचे नक्की समाधान होईल ह्याची मला खात्री होती !

आदित्य - "और मुझे एक मिनिट दे दो, मैं ये अच्छा कपडा बदल के आता हूँ !"

स्वराज आणि राजकुमार ह्यांची नेत्रपल्लवी झाली. तिसऱ्या सेकंदाला मी धरणीमातेला समांतर अवस्थेत होतो, आणि माझा प्रवास होस्टेलच्या प्रवेशद्वाराकडे सुरु झाला. तिथं तीन चार मजबुत लोकांनी मला घट्ट पकडून ठेवले. (खरंतर त्यातला एकसुद्धा पुरला असता !) बाकीच्या असंख्य लोकांनी समोर मातीचा खड्डा बनविणे, त्यात दहा - बारा बादल्या पाणी ओतुन दर्जेदार चिखल बनविणे ही सर्व कामं अत्यंत आवडीनं केली !

आणि मग पुढील पंधरा - वीस मिनिटं मला सचैल चिखलस्नान घडविण्यात आलं ! तेव्हाही पहिले दहा मिनिटं उघड्या राहिलेल्या खोलीच्या दाराची चिंता करायची की हे खराब झालेले चांगले कपडे कसे धुवायचे ह्याची चिंता करायची की रसायनशास्त्राचा त्या राहिलेल्या धड्याची चिंता करायची ह्यावर मी विचार करत होतो ! साधारणतः अकराव्या मिनिटाला मला सर्वज्ञानप्राप्ती झाली ! त्यानंतर मला चिखलस्नान घडवायला आलेल्या बेसावध दोघांना मी गनिमी काव्याने चिखलात लोळवले ! आणि त्यानंतर आदित्य त्यांच्यातलाच झाला ! पुढील तीन तास मी माझ्या आयुष्यातील खेळलेल्या एकमेव सिरिअस होळीचा येथेच्छ आनंद लुटला !

आदित्य पाटील

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

अलविदा माही !



 

काळाचा महिमा अगाध आहे ! यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरील प्रत्येकाला कधी ना कधी शिखरावरुन पायउतार व्हावं लागतं ! कधी हे सत्य स्वखुशीनं स्वीकारलं जातं तर कधी ते तुम्हांला स्वीकारावं लागतं ! शंभर कोटींहून अधिक लोकसंख्येच्या क्रिकेटवेड्या देशातील जनतेच्या मनावर  बारा ते चौदा वर्षे राज्य करणं कोण्या येरागबाळ्याचं काम नाही ! माही, गेल्या अनेक वर्षांतील मनावर कोरुन ठेवलेल्या स्मृतींबद्दल शतशः धन्यवाद !

तु खेळाडु आणि कर्णधार दोन्ही पातळ्यांवर जिंकलास ! जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकणं म्हणजे एक महायज्ञ असतो ! तुमच्याकडील संघातील वैयक्तिक गुणवत्ता, संघभावना आणि मोक्याच्या क्षणी मैदानावरील परिस्थिती ध्यानात घेऊन अचुक निर्णय घेता येण्यासाठी आवश्यक असणारी चाणाक्ष बुद्धी ह्या सर्वांचा मिलाफ जुळून यावा लागतो!  तु हा मिलाफ एकदा नव्हे तर तीनदा जुळवून आणलास ! 

२००७ साली संपुर्ण राष्ट्र काही महिन्यांपुर्वी विश्वचषक स्पर्धेत झालेल्या अनपेक्षित पराभवानं दुःखाच्या गर्तेत ढकललं गेलं होतं. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या उदघाटनाच्या  T20 विश्वचषक स्पर्धेत दिग्गजांना विश्रांती देण्याचं धाडस निवड समितीनं दाखवलं ! काहीशा नवख्या खेळाडुंना घेऊन तु आफ्रिकेत गेलास. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघांना हरविण्याची किमया तू आणि तुझ्या संघानं घडवुन आणली ! त्यात युवराज, गौतम, रोहितने तुला मोलाची साथ दिली ! अंतिम सामन्यात तुझ्या कप्तानपदातील भविष्यात वारंवार दिसुन आलेल्या एका महत्वाच्या गुणाची झलक आम्हांला प्रथम दिसली ! ती म्हणजे संघातील नवख्या खेळाडूंवर तु दाखवलेला विश्वास ! १५७ सारख्या माफक धावसंख्येचा बचाव करताना आर. पी. सिंग आणि इरफान पठाण ह्यांनी खरंतर सामना भारताच्या बाजुनं झुकवला होता. पण मग मिस्बाहच्या फटकेबाजीनं सामन्याचे चित्र पुरतं पालटलं होतं. अशा वेळी शेवटच्या षटकात नवख्या जोगिंदरच्या हातात चेंडु सोपविण्याचे धाडस तू दाखविलेस आणि त्या पुढं जे काही घडलं तो एक अविस्मरणीय इतिहास होता !

२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत चित्र वेगळं होतं. मायभुमीवर खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत तु एका बलाढ्य संघाला घेऊन उतरला होतास! संघात प्रथितयश खेळाडूंचा भरणा होता. फलंदाजीसाठी खास अनुकूल खेळपट्ट्या बनविल्या गेल्या होत्या. २००७ सालच्या विश्वचषकातील अनपेक्षित पराभवाच्या आठवणी पुसून काढायच्या होत्या ! अजुन एका अपेक्षाभंगाचे दुःख पचविण्याची तयारी ह्या १२० कोटींच्या देशाकडे नव्हती. इथंही तु ह्या कसोटीला पुरेपूर उतरलास ! युवराज ह्या विश्वचषक स्पर्धेत अगदी नजर लागण्याइतका उत्कृष्ट खेळला ! फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्यात त्यानं तुला पुरती साथ दिली. सचिन, विरु, गौतम, नुकतास उदयाला येऊ लागलेला विराट ह्यांनी सुद्धा आपला हातभार लावला. उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया, उपांत्य फेरीत मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा पाकिस्तान संघ ह्या सर्वांना तु आणि तुझ्या शिलेदारांनी हरविले ! पण अंतिम फेरीतील विजय फक्त तुझा आणि तुझाच होता ! शतकाजवळ आलेला गौतम ज्यावेळी तंबुत परतला त्यावेळी श्रीलंका आणि विश्वचषक ह्यांच्यामध्ये फक्त तु आणि युवराज होतास ! तू नाबाद ९१ धावांची अविस्मरणीय खेळी खेळलास ! मायदेशातील विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकताना  एक कर्णधार म्हणुन प्रतिस्पर्धी संघाच्या वेगवान गोलंदाजाला थेट समोर षटकार मारण्याचं धारिष्ट्य तुझ्यात होतं ! प्रत्येक भारतीय क्रिकेटरसिकाच्या हृदयात हा क्षण कायमचा कोरला गेला ! २०१३ सालाची ICC Champions Trophy सुद्धा तू भारताला जिंकुन दिलीस ! ह्या तिन्ही महत्वाच्या जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकुन देणारा कर्णधार म्हणुन तू आपलं नाव इतिहासात नोंदविलंस  ! कसोटीमध्ये सुद्धा तु  कप्तानपद भूषविलंस आणि काही संस्मरणीय विजयांची नोंद केलीस ! 

तु जसा थंड डोक्याचा कर्णधार होतास तसाच तु धाडसी आणि कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता बाळगुन असणारा खेळाडु होतास ! तु कोणत्याही खेळाडूच्या प्रतिष्ठेचं ओझं बाळगलं नाही, मग तो प्रतिस्पर्धी संघातला खेळाडु असो वा स्वतःच्या ! कठोर संदेश देण्यात माहीर असा कप्तान म्हणुन तू नावलौकिक मिळविलास ! पण इथं कोणत्यातरी एका क्षणी तु काहीसा स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडल्यासारखा वाटलास ! संघात काही खरोखर सभ्यतेचे मूर्तिमंत पुतळे असणारे खेळाडु होते. त्यांच्या निवृत्तीचे अनुभव काहीसे क्लेशदायकतेकडं झुकले असं मला वाटलं ! त्याला तु काही एकटा जबाबदार नसशील पण त्यांना चांगली वागणूक देता आली असती असं राहुन राहुन वाटलं !

सामना जिंकण्यासाठी चौकार, षटकार, बळी हे धावफलकांवरील नायक ! ह्या नायकांच्या प्रेमात पडलेल्या भारतीय संघाला आणि चाहत्यांना त्या मानसिकतेतुन बाहेर काढण्यात तु मोलाचा वाटा बाळगलास ! शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर Running Between the Wickets, अप्रतिम क्षेत्ररक्षण ह्या माध्यमातुन सुद्धा धावा वाचवता येतात, सामने जिंकता येतात हे तू दाखवुन दिलेस ! कमीत कमी धोका घेऊन सामन्याचा कल आपल्या बाजुने झुकविण्याकडे तुझं प्राधान्य होतं ! एक यष्टीरक्षक म्हणुन तू जबरदस्त होतास आणि आहेसुद्धा ! मर्यादित षटकांच्या सामन्यात निकराच्या क्षणी चोरटी बाय धावुन काढणाऱ्या फलंदाजांना तुझ्या नेमबाजीचा धाक सदैव राहिला ! 

तु क्रिकेटसेन्सचा सर्वोत्तम मेंदु बाळगुन होतास ! प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या शैलीचा अभ्यास करुन तू तुझ्या मिश्किल भाषेत गोलंदाजांना उपयुक्त सल्ले दिलेस ! असे काही व्हिडिओ पाहताना तुझ्या वाणीने हास्याचे फवारे उडतात !  हाती उपलब्ध असलेल्या मोजक्या Third Umpire Review (DRS) चा कसा वापर करावा ह्या बाबतीत तुझा निर्णय क्वचितच चुकला ! त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाच्या कोणत्या गोलंदाजांला लक्ष्य करुन त्याच्यावर आक्रमण करायचं ह्याचं गणित तुझ्या डोक्यात पक्के बसलेलं असायचं ! वाढत्या धावगतीचं तु कधी दडपण घेतलं नाहीस कारण तुझा स्वतःच्या क्षमतेवर असलेला प्रचंड विश्वास ! 

२०१५ सालचा ऑस्ट्रेलियातील विश्वचषक! साखळी सामन्यात भारतानं दृष्ट लागण्यासारखी कामगिरी केली होती ! साखळीतील सर्व सामने जिंकुन उपांत्य फेरीत आपण दिमाखात दाखल झालो होतो ! पण उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३२८ धावांचा डोंगर उभा केला ! सुरुवातीच्या आशादायक सलामीनंतर रोहित, धवन, विराट तंबुत परतले ! तू ६५ धावांची खेळलास खरा, पण विजयाकडं तु घेऊन जाशील असं कधीच त्या खेळीत वाटलं नाही! त्या पराभवाचं दुःख तर आम्ही पचविले पण मग हे वारंवार घडु लागलं ! कदाचित वयोमानानुसार तुझ्या हालचाली थोडयाफार मंदावल्या होत्या. ह्या बाबतीत अगदी निष्ठुर असलेल्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना ही गोष्ट समजली नसती तरच नवल ! हळूहळू आपल्या मर्जीवर सामना संपविण्याची तुझी क्षमता कमी होत चालली ! गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टिकून राहुन चांगली धावसंख्या उभारण्याची क्षमता अजुनही तू बाळगुन आहेस! पुन्हा एकदा २०१९ चा विश्वचषक ! साखळीतील उत्तम कामगिरीनंतर उपांत्य सामन्यात न्यूझीलंड सामोरे होते ! गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्टीवर किवींना आपण २३९ धावांत रोखले खरे पण आघाडीचे फलंदाज ३ फलंदाज ५ धावांत बाद झाले. तू आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली खरी पण संपुर्ण भारताच्या आशा जडेजावर अवलंबुन राहिल्या ! जडेजा बाद झाला आणि रसिकांच्या नजरा आणि आशा तुझ्याकडे वळल्या ! तुही एक दोन चमकदार फटके मारलेस पण सामना आवाक्याबाहेर गेला होता हे तुझ्या देहबोलीतुन जाणवत होते ! आणि तु धावबाद झालास ! पुर्वीचा धोनी ही धाव घेताना धावबाद कधीच झाला नसता, किंबहुना त्यानं ही धोकादायक धाव न घेता शेवटी एक अधिक षटकार मारण्याचं ठरविलं असतं ! इथं तु धावबाद झालास आणि आता भारतातर्फे तु खेळलेला हा शेवटचा सामना ठरला ! 

IPL मध्ये तु मुंबई इंडियन्सचा प्रतिस्पर्धी असल्यानं त्यांच्याशी खेळताना तु बाद व्हावा अशी इच्छा प्रबळ असली तरी बाकी संघांशी खेळताना तुझ्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद आम्ही लुटला ! निळ्या धोनीने हृदय जिंकलं तर चेन्नई सुपरकिंग्सवाल्या पिवळ्या गणवेशातील धोनीनं आम्हांला मनोरंजनाच्या आठवणींचा खजाना दिला ! 

बाकी एक माणुस म्हणूनही तू मन जिंकलंस ! सैन्यासोबत वावरलास ! एका छोट्या गावातुन मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन येऊन सुद्धा तु कधी वलयांकित दुनियेत परका वाटला नाहीस ! देशभरातील छोट्या छोट्या गावांतील मुलांना मेहनतीवर दृढ विश्वास ठेवण्यास तु मदत केलीस ! 

माही, तू लक्षात राहशील तो २००७ च्या त्या अंतिम सामन्यात जोगिंदरच्या हातात चेंडू सोपविणारा कप्तान म्हणुन, वानखेडेवर विश्वचषक जिंकताना उत्तुंग षटकार टोलविणारा कप्तान म्हणुन आणि 'इसके पैरमे डाल, पॉईंट में हवा में मारेगा !" असे सल्ले देणारा चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणुन !

Well Played Dhoni!

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

मला समजलेला कृष्ण !


 

जनमानसात कृष्णाविषयी बरंच कुतूहल असतं. महाभारतातील कृष्णाविषयी बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण कृष्णाचं ते एकमेव रुप नाही अशी माझी समजुत आहे. कृष्णाविषयी असलेल्या माझ्या काही समजुती !

१. कृष्णाचं पारंपरिक रुप एक जे आपण लहानपणापासुन वाचत, ऐकत आलो आहोत ! पण कृष्ण हे एक तत्व आहे, एक संकल्पना आहे ! 

२. कृष्णाचं प्रत्येकासाठी एक खास अस्तित्व असतं. हे रुप आपल्याला जाणुन घेता यायला हवं ! हे रुप जाणुन घेण्याची इच्छा हवी आणि क्षमताही हवी ! नाहीतर आपल्यासाठीचं कृष्णाचं रुप आपल्या भोवताली येऊन, पिंगा घालुन गायब होतं आणि आपल्याला ते जाणवत सुद्धा नाही ! 

३. आपल्या कृष्णाची प्रतिमा जनमानसातील कृष्ण प्रतिमेपेक्षा फार वेगळी असु शकते ! आपल्या कृष्णाला कदाचित ठाऊक सुद्धा नसतं की तो आपल्यासाठी कृष्ण आहे ! 

४. कृष्ण तुम्हांला गवसला पाहिजे. ज्यावेळी कृष्णभान होते तो एक विलक्षण अनुभूतीचा क्षण असु शकतो. काहींना कृष्ण मुर्त स्वरूपात सापडतो तर काहींना त्याचं अस्तित्व आसपास जाणवत राहतं. 

५. कृष्ण तुमच्यासोबत कायम रहात नाही. तुमचं व्यक्ती म्हणुन स्वतंत्र अस्तित्व तो जाणुन असतो. तुम्ही आनंदाच्या शिखरावर असाल तर तो तुम्हांला एकटं सोडुन देतो. तुम्ही संकटात सापडलात तर तो कदाचित तात्काळ धावुन येण्याची घाई करत नाही ! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही स्वतः संकटाचा कसा मुकाबला करु शकता ह्याची तो चाचणी घेतो ! 

६. कृष्ण तुम्हाला जीवनावर श्रद्धा ठेवायला शिकवतो, तुम्हांला दुनियेच्या नकळत दाद देतो, तुम्हांला स्वतःवरील आत्मविश्वास बळकट करण्यास मदत करतो. 

७. तुमच्या वयानुसार तुमचा कृष्ण आपली रुपं पालटतो ! तुमच्या भावनिक जीवनाचा तो कायम अंश बनुन राहतो !  तो तुमचाच एक अविभाज्य अंश असतो ! काही कारणास्तव विधात्यानं त्याला एक वेगळं अस्तित्व दिलेलं असतं !

८. मरणानंतर काय होत असावं? कदाचित आपण ह्या कृष्णात विलीन होत जात असु ! दोघं मिळुन आपल्या आयुष्याचा आढावा घेत असु !

कृष्ण आपल्याला सोळा हजाराहुनही कित्येक अधिक प्रकारे समजु शकतो ! त्यातलाच कदाचित हा एक प्रकार ! 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

निसर्गसाद!




वर्षाऋतूत निसर्ग हिरव्या रंगानं बहरुन जातो. हा निसर्ग कधीकधी आपल्या जवळपासच असतो. ह्यात प्रत्येक वेळा लौकिकार्थानं लोकप्रिय असलेली फुलं झाडं असतातच असं नव्हे ! पण निसर्ग कधीही रंगरुपाच्या आधारावर आपल्या ह्या अपत्यांमध्ये भेदभाव करत नाही!  

निसर्ग आपल्याला का भावतो? निसर्ग रंगांची उधळण करतो ! एखाद्या रंगाच्या किती छटा असु शकतात ह्याची जाणीव आपल्याला करु देण्याचा  निसर्ग प्रयत्न करत राहतो ! 

निसर्ग रंगांसोबत विविध आकारांचे प्रदर्शन भरवतो !  गगनाला भिडु पाहणाऱ्या उंच वृक्षांच्या बरोबरीनं इथं इवली इवली रोपटीसुद्धा आनंदानं नांदत असतात. हे झालं भव्यतेच्या दृष्टीनं आकारांचे वैविध्य ! 

त्यासोबत वर्तुळाकार आणि तत्सम आकारांच्या असंख्य वैविध्याचा नजराणा निसर्ग आपल्यासमोर सादर करतो ! प्रत्येक आकार आपलं एक वैशिष्ट्य बाळगुन असतो ! पावसाळ्यात चार महिना आपल्या समोर बागडणारी इवलीशी रोपटी मग अचानक नाहीशी होतात. त्यांचा रंग, त्यांचा आकार पुन्हा आपल्याला दिसणार की नाही ह्याची काहीशी भिती आपल्या मनात निर्माण होते. परंतु हे सर्व काही वैभव निसर्गानं ह्या रोपट्यांच्या बियांमार्फत  सुखरुप जतन करुन ठेवलेलं असतं ! पुन्हा पावसाळा येतो आणि ह्या बियांद्वारे ह्या असीम सौंदर्याची निसर्ग बहार आणतो ! 

निसर्ग आपल्याला सहजीवनाचा धडा देऊ इच्छितो ! पावसाळ्यात उगवणाऱ्या वेलांचे निरीक्षण करणे हा एक आनंददायी अनुभव असतो ! ही बालमंडळी आपल्याला उभं राहण्यासाठी एखाद्या भरभक्कम आधाराच्या शोधात असतात ! प्रत्येक वेळा हा आधार जवळपास असतोच असं नाही ! मग आपल्याला दिसुन येते ती ह्या वेलांनी आधाराच्या दिशेनं घेतलेली लांबलचक झेप ! 

बऱ्याच वेळा जिथं ही झाडं जन्म घेतात तिथं आधीच त्यांच्या वरिष्ठांनी  जम बसविलेला असतो. अशा वेळी सूर्यप्रकाशाच्या शोधात ह्या झाडांनी केलेली कसरत पाहण्यासारखी असते. सुरणाची काही झाडं अशाच गर्दीच्या ठिकाणी उगवली ! भोवताली असलेल्या जास्वंदीच्या झाडांहून उंच होण्यासाठी ह्या सुरणांनी आधी उंचच उंच खोडाची व्यवस्था केली!  वर्षानुवर्षे कित्येक पावसाळे पाहणारी झाडं आणि चार महिने ह्या भुतलावर येऊन नाहीशी होणारी झाडं ह्यांच्यात नक्की कोणतं हितगुज होत असेल? 

सहजीवन जसं झाडांमध्ये दिसुन येतं तसंच ते झाडं आणि पक्ष्यांमध्ये सुद्धा जाणवतं.  धो धो पडत असणाऱ्या पावसानं दहा पंधरा मिनिटं विश्रांती घेतली असताना अचानक लांबवरुन उडत आलेला पक्षी जास्वंदीच्या झाडावर विसावतो. ते झाडसुद्धा आपल्या अंगावरील फुलांतील मधाचं त्या छोट्याशा पक्षाला मनमुराद प्राशन करुन देतं ! "जा बाळा लवकर आपल्या घरट्यात जा, पाऊस येईल आणि तू भिजशील !" जणु काही हे झाड त्याला सांगत असावं असा भास आपल्याला होत राहतो ! 

पावसाळ्यात तेरडा उगवतो ! त्याचं रान होतं. ह्या रानात एक छोटेखानी जैविकसंस्था उदयास येते! गेले कित्येक महिने नाहीशी झालेली फुलपाखरं अचानक ह्या रानात दिसु लागतात. नक्की कोणत्या फुलाचा मध प्यावा ह्याबाबतीत त्यांचा उडालेला गोंधळ पाहण्यात एक वेगळीच गंमत असते ! रंगीबेरंगी फुलपाखरांकडं लक्ष जाणं स्वाभाविक असलं तरीही ह्या तेरड्याच्या रानात भुंगे, चतुर, सुया ही मंडळी सुद्धा गुण्यागोविंदानं राहत असतात.  पावसाळ्यात ह्या निसर्गदर्शनासाठी बाहेर पडलं तर सर्व काही आलबेल असतेच असं नाही ! ऍमेझॉन जंगलात जसे विषारी जनावरांचं वास्तव्य आढळुन येते त्याचप्रमाणं आपल्या भोवताली फेरफटका मारायला बाहेर पडलं की डास, खाज आणणाऱ्या वनस्पती ह्यांपासून सावध रहावं लागतं. एखादा फोटो घेण्यात जरा जास्तच तन्मयता दाखवली की ह्यांच्या उपद्रवी स्पर्शानं आपण तात्काळ भानावर येतो ! पण हेही निसर्गाचा भागच की ! 

अंगणात मोठाले लाल मुंगळे असतात. पावसाळा येण्याआधी महिनाभर आंब्याच्या झाडावर वॉटरप्रुफ घरटे बांधण्यासाठी त्यांची जोरदार धडपड सुरु असते. आंबे पाडण्यासाठी आखा (बहुदा स्थानिक शब्द !) घेऊन आपण आणलेला त्यांच्या ह्या सुनियोजित कामातील व्यत्यय त्यांना अजिबात खपत नाही. जे कोणी एक दोघे आपल्या अंगावर पडतात ते जोरदार चावा घेऊन समस्त मुंगळे मंडळींतर्फे आपला निषेध व्यक्त  करतात.  

हे सहजीवन सदैव शांततामय असतंच असं नाही ! काल बावखलात दुपारच्या वेळी अदिलवट (बहुदा स्थानिक शब्द !) निवांतपणे पाण्याच्या वर डोकं काढुन होता. त्याला बहुदा कसली घाई नसावी! माझी  चाहुल लागताच तो काठाच्या दिशेनं पोहु लागला ! त्याच्यावर कुवाकोंबडीचा  (पुन्हा स्थानिक शब्द) प्रचंड राग असावा. ती बेताबेतानं अंतर राखत त्याचा पाठलाग करु लागली. हा पाठलाग अदिलवट काठाला लागुन बहुदा त्याच्या बिळात जाईस्तोवर चालु होता. बहुदा त्यानं तिची अंडी फस्त केली असावीत ! 

अशाच एका अशांततामय सहजीवनाचं उदाहरण कावळे आणि मांजरीच्या बाबतीत दिसुन आलंय ! ही मांजर अंगणातुन एका टोकाकडुन दुसरीकडे जाताना कावळ्यांनी तिचा असा पिच्छा पुरविला की आधी अगदी आरामात चालणाऱ्या मांजरीला धाव घेण्यावाचुन पर्याय उरला नाही ! 

आता इतक्या प्रदीर्घ प्रस्तावनेनंतर ह्यावर्षातील आणि आधीच्या वर्षात प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांचे हे संकलन !फेसबुकवरील माझ्या मित्रांना ह्या पोस्टमध्ये पुनरावृत्ती आढळणार आहे. वरील उल्लेखलेल्या दृष्टीकोनातुन खालील छायाचित्रांकडं पहा ! वेगळं काही जाणवतं का पहा ! 
















































































Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...