मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०२३

व्यक्तीस्वातंत्र्याच्या कोषाकडे!






कालच्या लोकसत्तेतील "पालक की मारक" हा विचारप्रबोधक अग्रलेख वाचला. केवळ नामांकित  वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशामागे लागून जगण्याशी संबंधित अनेक अंगाचा अभ्यास आनंददायी असू शकतो याचा अंदाज नसलेल्या आपल्या समाजात अजूनही अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखांची हाव सुटत नाही  असा विचार मांडणारा हा अग्रलेख! अधोरेखित  वाक्य अग्रलेखातून जसच्या तसं उचललेलं !

आता यावरील माझे विचार. 

मागच्या पिढीने शिक्षणाचा आधार घेत आपलं राहणीमान मध्यमवर्गीय जीवनस्तराकडे उंचावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पूर्वीच्या चांगल्या राहणीमानाच्या आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या कल्पना या वेगळ्या पातळीवर होत्या. १९९० च्या दशकात जे आर्थिक उदारीकरणाचे धोरण आपल्या देशानं स्वीकारलं त्यामुळे एखाद्या वादळामुळे शेतीवाडीची जशी वाताहत होते त्यासारखी  परिस्थिती आपल्या समाजाची आणि त्याच्या मानसिक स्थैर्याची झाली. या उदारीकरणामुळे  आणि त्याच्या अनुषंगाने आलेल्या विविध पर्यायांच्या उपलब्धतेमुळे जीवनातील नव्या पैलूची (चंगळवादी आयुष्याची) आपल्या समाजाला ओळख झाली.  

आजचं कोणतंही वर्तमानपत्र उघडलं की अत्यंत आकर्षक जाहिरातींचा आपल्यावर भडिमार होत असतो.  त्यामध्ये लाख-लाख रुपयांचे भ्रमणध्वनी, तीस चाळीस लाखांच्या गाड्या,  दोन कोटी पासून ज्यांची किंमत सुरू होते अशा आलिशान सदनिका,  किमान चार-पाच लाख रुपये शुल्क असलेल्या परदेशवारी यात्रा,  विविध रंगीत टेलिव्हिजन संच, वातानुकूलन प्रणाली, महागडे  रेफ्रिजरेटर ह्यांचा समावेश असतो.  समाजातील काही मनं स्थिर असतात. आपली क्षमता, आपल्याला लाभलेला संस्काराचा वारसा, जीवनाकडून आपल्याला नक्की काय हवंय ह्याविषयी कमालीची सुस्पष्टता ती बाळगून असतात. त्यामुळं असल्या जाहिरातींपासून विचलित न होण्याची म्हणायला गेलं तर देणगी त्यांना लाभलेली असते. 

अजूनही बरीचशी मध्यमवर्गीय कुटुंब अशी आहे की जी जुन्या विचारसरणीला अनुकूल असे आयुष्य जगत असतात. परंतु बऱ्याच वेळा हा स्वखुशीने घेतलेला निर्णय नसून परिस्थितीसमोर हार मानून स्वीकारलेली एक अपरिहार्य अशी जीवन पद्धती असते. त्यामुळेच पालकवर्ग आणि काही प्रमाणात विद्यार्थीसुद्धा या परिस्थितीवर मात करण्यासाठी नामवंत महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपडत असतात.  त्यामुळं जो वर्ग अजूनही आपला आर्थिक स्तर उंचाविण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना हा विचार पटणं सहजशक्य नाही. "नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे आवश्यक नाही" ही विचारसरणी आयुष्यात स्थिरस्थावर झालेल्या लोकांकडून येण्याची शक्यता जास्त! 

अजून एक मुद्दा की अजूनही आपला बहुतांश समाज सामाजिक जीवनाशी आपली नाळ टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.  भारतीय सामाजिक जीवन हे एका विशिष्ट किंमतीवरच उपलब्ध असतं.  तुम्ही जेव्हा जेव्हा भारतीय सामाजिक जीवनात सहभागी होता त्यावेळी तुम्ही त्या संपूर्ण समाजाला तुमच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी हवे तसे टक्केटोमणे देण्यास मारण्याचा अधिकार प्रदान करत असता.  बऱ्याच वेळा हे टक्केटोमणे हे तुम्ही आयुष्यात किती यशस्वी आहात यासंबंधी असतात.  टक्केटोमणे मारणारी लोक स्वतः किती यशस्वी आहेत किंवा त्यांनी आयुष्यात नक्की कायमिळविलं  आहे हा मुद्दा गौण असतो.  इथं तुम्हाला दोन पातळीवर निर्णय घ्यायचा असतो.पहिली पातळी म्हणजे सामाजिक जीवनात तुम्हांला सहभागी व्हायचं आहे की नाही आणि दुसरी पातळी म्हणजे जर तुम्ही सामाजिक जीवनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलात तर त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या तुमच्यावर होणाऱ्या टिप्पणीला तुम्ही किती महत्त्व देता! जर तुम्हाला या टिप्पणीकडे दुर्लक्ष करण्यात यश लाभत असेल किंवा तितकी मानसिक कणखरता तुम्ही दाखवू शकत असाल तर तुम्हाला तुमच्या मर्जीने  जीवन जगता येतं. 

प्रश्न असा आहे की इतकी मानसिक कणखरता आपल्या समाजाकडे खरोखर उरली आहे का?  ही मानसिक कणखरता आणण्यासाठी आपला स्वतःशी संवाद असणे आवश्यक आहे.  स्वतःशी असलेला संवाद आणि नजीकच्या नातेवाईकांशी,  मित्रांशी  असलेला संपर्क आपल्याला समाजाच्या टिप्पणीपासून विचलित न होण्याची शक्ती देऊ शकतो.  अजूनही समाजाचा एक भाग ही कणखरता दाखवतो आणि आपल्या मर्जीनुसार जीवन जगतो. 

पुढील पिढीच्या बाबतीत एक गोष्ट होण्याची शक्यता मला वाटतेय. आज समाजाला जी बाकीच्या समाजाशी नाळ टिकून ठेवण्याची गरज वाटत आहे की बहुदा पुढच्या पिढीला वाटणार नाही.  आजच्या सामाजिक समारंभात आढळून येणारे दांभिकपण हे पुढच्या पिढीला या सामाजिक समारंभांपासून दूर लोटणारे ठरेल.  मग आपली स्थितीसुद्धा पाश्चात्य देशांसारखी होण्यास वेळ लागणार नाही, जिथे प्रत्येकजण आपल्याभोवती  व्यक्तीस्वातंत्र्याचा कोष विणून त्यात मग्न असेल. मनुष्यउत्क्रांतीतील हा पुढील टप्पा असेल.  


Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...