मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २७ जून, २०१५

WELCOME जिंदगी!!


 
सर्वप्रथम हा चित्रपट बनविणाऱ्या निर्मात्याचे आणि ह्यात अभिनय करणाऱ्या मराठी कलावंतांचे अभिनंदन! हा चित्रपट एका बंगाली चित्रपटावर आधारित आहे असे वाचनात आले. व्यावसायिकदृष्ट्या एखादा चित्रपट यशस्वी ठरावा म्हणून एखाद्या विशिष्ट सिनेसृष्टीची विशिष्ट समीकरणे असतात. त्यानुसार चित्रपट बनविल्यास सुरुवातीच्या काही दिवसात चित्रपट एक विशिष्ट गल्ला गोळा करतो. पण ह्या निर्मात्याने मात्र पूर्णपणे एक सामाजिक संदेश देण्याच्या दृष्टीने ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 
चित्रपटाची कथा फिरते ती आपल्या आयुष्यातील समस्यांना कंटाळून झोपेच्या गोळ्यांनी आपलं आयुष्य संपवायचा प्रयत्न करणाऱ्या नायिकेभोवती! काही वर्षापूर्वी आई गेली, मग वडिलांनी आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच तरुण असणाऱ्या स्त्रीशी लग्न केलं आणि आता कळस म्हणून आपलं ज्याच्याशी लग्न केलं त्यानं आपल्याला फसवलं ह्या सर्वाचा परिणाम म्हणून एका कमकुवत क्षणी नायिका हा निर्णय घेते. तिची ही अवस्था पाहतो तो चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी, जो तिला घेऊन जातो तो आत्महत्येचा प्रयत्न पूर्ण तयारीनिशी कसा करायचा हे शिकवणाऱ्या संस्थेत ! 
चित्रपटाचा संदेश किंवा चित्रपटात हाताळली जाणारी मुख्य समस्या ही भारतात असणाऱ्या आत्महत्येच्या मोठ्या संख्येविषयी आहे. ही समस्या म्हटलं तर बरीच गहन होत चालली आहे. मध्ये एकदा स्वप्निल अमृताला सुनावतो, " तुम्ही श्रीमंत बापाच्या मुली, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हांला असे काही चाळे करायची सवयच असते! पण ज्या क्षणी तुम्हांला कळत की आत्महत्या म्हणजे पूर्ण शेवट आणि त्यानंतर मात्र तुम्ही जीवनातील कोणत्याच सुखाचा आनंद घेऊ शकणार नाहीत त्या क्षणी मात्र तुम्ही पुढे जायला कचरता!" आणि मग अमृता ते मान्यही करते. 
चित्रपटाच्या पूर्वाधात काहीसं गंभीर चित्रण आहे. विविध प्रकारांनी आत्महत्या कशी करायची हे ज्या प्रकारे दाखवलं जात ते काहीसं अति वास्तववादी आहे. अशी संस्था असू शकते हा भाग पटण्यापलीकडचा! पण त्यानंतरचे काही संदेश महत्वाचे! जसे की दुसऱ्यांची दुःखसुद्धा ज्यावेळी आपणास समजतात तेव्हा नक्कीच आपल्या दुःखाकडे बघण्याचा व्यापक दृष्टीकोन आपल्याला मिळतो. जरी समस्या इथे आत्महत्येची मांडली गेली असली तरी संदेश छोट्या छोट्या कारणांनी दुःखी होणाऱ्या लोकांना सुद्धा लागू पडतो. समस्या जशी अगदी गरीब पिडीत लोकांची असते तशीच एखाद्या आयुष्याच्या पूर्वाधात ज्याला खूप यश मिळालं त्याची सुद्धा असू शकते. आयुष्यात आपण सतत यशस्वी राहू शकत नाही हा संदेश महत्वाचा! जसं दुसऱ्यांनी आपलं कौतुक केलेलं आपल्याला मनापासून आवडतं तसं दुसऱ्याच सुद्धा आपल्याला कौतुक करता यायला हवं! यशस्वी माणसाने आपली यशस्वी प्रतिमाच सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवणं चुकीचं आहे. 
केबलवर एक दोन परदेशी वाहिन्या येतात. त्यात दोन तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणारे अनेक चित्रपट पहावयास मिळतात. सर्व लक्ष कथेवर केंद्रित असतं. नायक नायिका आजूबाजूचा परिसर सर्वकाही अगदी साधं सुधं असतं! व्यक्तिरेखा फुलल्या जातात, कथा मांडली जाते आणि दीड दोन तासात चित्रपट संपतो! अशा चित्रपटांची आठवण ह्याने करून दिली. इंद्रियदानाचा संदेश सुद्धा दिला. हिंदी चित्रपटातील जुने संदर्भ देण्याचा प्रयत्न टाळला असता तर बरं झालं असतं असं वाटून गेलं. 
तसंच मग नायकाला असणाऱ्या गंभीर आजाराचं चित्रण करून सहानभुती मिळविण्याचा प्रकार बाकीच्या चित्रपटाने दर्शविलेल्या No Nonsense दृष्टीकोनाशी काहीसा  विसंगत वाटला.

मराठी चित्रपटात बरेच नवीन प्रयोग होत आहेत हे वाचलं होतं. हा चित्रपटसुद्धा ही एक चांगला प्रयोग. माझ्या ब्लॉग पोस्ट्सच्या हिट संख्येवरून मी एका निकषापर्यंत येऊन पोहोचलो आहे. हल्लीच्या मराठी लोकांना गंभीर विषयावरच बोलणं फारसं आवडत नाही, झेपत नाही. हा चित्रपट सुद्धा जवळपास पूर्णपणे गंभीर त्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीविषयी मी साशंक आहे. आपले मराठी लोक माझी ही भीती निराधार ठरवतील ही आशा बाळगतो!! जाता जाता तात्पर्य एकच - दुनियेतील बहुतांशी लोकांना तुमची पर्वा नाही ह्याचं दुःख बाळगू नका! दुनियेत एक जरी माणूस असा असेलच ज्याला तुमची पर्वा असते. त्या माणसासाठी, स्वतःसाठी आयुष्य जगा आणि ते सुद्धा पूर्णपणे स्वतःला जीवनगाण्यात झोकून देऊन! आणि हो चित्रपटाचा संदेश आजूबाजूला नक्कीच पोहोचवा!!

गुरुवार, २५ जून, २०१५

व्यावसायिक संज्ञा !!!


 
व्यावसायिक जगात कानावर पडणाऱ्या अनेक संज्ञा उपयुक्त असतात. त्यातील काहींचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न!!
१> Seat At the Table
व्यावसायिक जगतातील महत्वाचे निर्णय ज्या बैठकीत घेतले जातात त्या बैठकीला उपस्थित राहायला मिळणे हा एक सन्मान आणि महत्वाची जबाबदारी असते. 
  • ज्या टीमचे तुम्ही प्रतिनिधित्व करता त्या टीमची सर्व माहिती तुम्हांला असणे आवश्यक असते. 
  • बैठकीतील चर्चा बऱ्याच वेळा अनपेक्षित वळण घेते अशा वेळी आपल्या टीमला न्याय देईल असा निर्णय घेण्याची क्षमता अशा व्यक्तीकडे असणे आवश्यक असते. 
  • ह्या व्यक्तीला केवळ आपल्या संघाचेच हित लक्षात घेऊन चालत नाही तर संघटनेच्या व्यापक हिताच्या दृष्टीने एखादा निर्णय घेतला जात असेल तर प्रसंगी आपल्या संघाचे हित बाजूला ठेवावं लागतं आणि मग बैठकीनंतर आपल्या संघाला हे पटवून द्यावं लागतं. 
  • बैठकीतील चर्चा जर काही अगदीच निरस, गंभीर अथवा वादाचे वळण घेत असेल तर प्रसंगाला अनुरूप अशा विनोदाची पेरणी करून वातावरण निवळण्याची क्षमता सुद्धा ह्या व्यक्तीकडे असावी.
  • बैठकीत भाग घेणाऱ्या दुसऱ्या संघांची योग्य ती माहिती असावी जेणेकरून त्यांनी परिस्थितीचे विपर्यस्त वर्णन केल्यास वेळीच त्यांना ओळखता आले पाहिजे. त्याच प्रमाणे दुसरा संघ जर खरोखर अडचणीत सापडला असेल तर उदारमतवादी भूमिका घेता आली पाहिजे. हृदय तितकं मोठं हवं पण त्याच वेळी मेंदू शाबूत हवा!!

पूर्वी एकत्रित मोठ्या कुटुंबात ही संज्ञा काही प्रमाणात लागू पडायची. मोठ्या कुटुंबातील मालमत्तेच्या वाटपाच्या वेळी केवळ जेष्ठ मंडळीना ह्या बैठकीतील ही खुर्ची मिळायची!!

२> Auto Pilot
एखाद्या व्यवस्थापकाच्या अनुपस्थितीत किंवा त्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केलं असता एखादा संघ आपल्याला नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पाडत असेल तर तो संघ 'Auto Pilot' अवस्थेत आहे असे म्हणतात. हे व्यवस्थापकाच्या व्यवस्थापन कौशल्याचे यश मानलं जातं. पण मग 'No one is indispensable' ह्या उक्तीचं ह्या व्यवस्थापकाला भय वाटू शकतं. जर संघ ह्या व्यवस्थापकाच्या अनुपस्थितीत सुद्धा इतकं चांगलं काम करू शकत असेल तर ह्या गड्याला डच्चू देऊ शकतो अशी दृष्ट बुद्धी वरच्या लोकांना सुचू शकते. 
 
घरच्या कारभारात जर तुमचे अपत्य सकाळी फारसा आरडाओरडा न करता उठत असेल, वेळच्या वेळी शुचिर्भूत होऊन शाळा कॉलेजात जात असेल आणि आपला अभ्यास व्यवस्थित पार पाडत असेल तर तो / ती 'Auto Pilot' अवस्थेत आहे असे आपण म्हणू शकतो. 

बाकी बायका आपल्या यजमानांचे (ही संज्ञा आता दुर्मिळ होत चालली आहे) formatting करण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. काही अत्यंत दुर्मिळ उदाहरणात यजमान हे आपल्या पत्नीच्या आज्ञेनुसार व्यवस्थित वागू लागल्यास ते 'Auto Pilot' अवस्थेत आहे असे म्हणू शकतो. काही चलाख नवऱ्याकडे आपल्या मर्जीनुसार वागून सुद्धा आपण बायकोच्या दृष्टीने 'Auto Pilot' अवस्थेत आहोत असा भास निर्माण करण्याची शक्ती असते.

३> 1:1 
एका मीटिंग रूम मध्ये जाऊन दोन लोकांनी साधारणतः ३० मिनिटे बोलून एकंदरीत कामाची प्रगती, वैयक्तिक समस्या, व्यावसायिक प्रगतीचा टप्पा वगैरेंची चर्चा करणे ह्या प्रकारास १:१ म्हटलं जातं. ह्यात आपल्या व्यवस्थापकाचा खास वेळ आपल्यासाठी मिळू शकतो ज्यात त्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या बाकीच्या गोष्टी नसतात. एखादा व्यवस्थापक किती प्रभावीपणे हे १:१ घेतो ह्यावर त्याचे जनमानसातील आदराचे स्थान अवलंबून असतं.

घरगुती पातळीवर नवरा बायको ह्यांनी शांतपणे बसून १:१ केल्यास बऱ्याच प्रमाणात नात्यात चांगुलपणा टिकून राहतो. परंतु लग्नानंतर लगेचच  जे नवराबायको एकत्र तासभर चर्चा करू शकतात त्यांची ही शांततापूर्ण चर्चेची क्षमता दरवर्षी ५ मिनिटे कमी होत जाते असा माझा सिद्धांत आहे!!! थोडं गंभीर होत, पती पत्नींनी आपली आर्थिक स्थिती, मुलांचे शिक्षण, वार्षिक प्रवास वगैरे विषय अशा चर्चेत घ्यायला हरकत नाही.

पिता आणि मुलगा ह्यांचे १:१ हे फक्त दम देण्यापुरत सीमित असण्याची मराठी कुटुंबात प्रथा आहे. पण शाळेत अभ्यासाव्यतिरिक्त काय चालत, त्याचे मित्र कसे आहेत, त्यांच्या चर्चा कोणत्या विषयावर होतात असे विषय साधारणतः आठवी पर्यंतच्या अपत्याशी चर्चेस घ्यायला हरकत नाही. त्याहूनही मोठ्या वयाच्या मुलांशी व्यावसायिक क्षेत्राची निवड वगैरे विषय निवडायला हरकत नाही. अमेरिकेत वगैरे मुलं आपल्या खास मैत्रिणीविषयी वगैरे वडिलांना सांगतात. आपलं BP वगैरे वाढण्याचं भय नसल्यास आपण ही हा मोकळेपणा आपल्या अपत्यास द्यावा!!

४> SME
एखादा कर्मचारी एका विषयात खास तज्ञ बनला की त्याला SME (Subject Matter Expert) म्हटलं जातं. ह्यावर अजून काही खास बोलण्याची गरज नाही.

मराठी कुटुंबात ज्यांना पुरणपोळ्या, उकडीचे मोदक, शेवाळाची आमटी हे प्रकार अप्रतिम जमतात त्यांना आपण SME म्हणू शकतो. आपल्या बायकोच्या उपस्थितीत आपली माता, भगिनी, बायकोच्या मैत्रिणी किंवा अन्य परस्त्री ही एखाद्या पदार्थात SME आहे असे म्हणण्याचे दुःसाहस माझे हृदय सिंहाचे आहे असा दावा करणारे मराठी नवरे सुद्धा करीत नाहीत असा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. अजून बऱ्याच संज्ञा आहेत पण वेळेअभावी आज इतकेच!!


शनिवार, २० जून, २०१५

ज्युरासिक वर्ल्ड !!


 
चित्रपट पाहिला गेल्या रविवारी!! एक आठवड्यानंतर आज ही पोस्ट लिहितोय. वसईत पहिला पाऊस पडल्यानंतरची जी रात्र असते त्यावेळी दिवसाचा उजेड संपून पूर्ण काळोख होण्याच्या एका क्षणी पंख फुटलेल्या मुंग्या अचानक दिव्यांच्या दिशेने झेपावतात. ह्या मुंग्यांची संख्या शेकडोनी असते. अतिशोयक्ती अलंकार वापरायचा झाला तर हजारोंच्या संख्येने असते. मग अनुभवी माणसे वयाला जमेल त्या वेगाने झटापट सर्व विद्युत दिवे बंद करण्याच्या, घराची दारे मागे लागतात. आपलाही वयोमानपरत्वे अनुभवी माणूस ह्या सदरात प्रवेश होणे ही भावना सुखद की दुःखद ह्याचा उलगडा गेली अनेक वर्षे मला झालेला नाही!! ह्या सगळ्या धडपडीनंतर पूर्वी मग देवासमोरचा दिवा पेटता राहायचा आणि मग घरात शिरलेली ही पाखरे त्या दिव्यांवर झेपावायची. क्षणभंगुर जीवन म्हणजे काय ह्याची प्रचिती मला ह्या पाखरांच्या जीवनावरून यायची.हल्ली त्यात मिणमिणत्या मोबाईलच्या उजेडाचा समावेश झाला आहे. तसा पूर्वी गल्लीतला नगरपालिकेचा दिवा सुद्धा असायचा. 

ज्युरासिक वर्ल्ड आणि ह्या सर्वांचा संबंध कोठे असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर ऐका!! कोणत्याही दिशेने हवेतून उडत येणारे पंखधारी जीव आणि त्यांच्यावर तुटून पडणारे त्यांचे भक्षक (आपल्या उदाहरणात पाली) आणि ह्या सर्व हिंसक वातावरणात भयाच्या भावनेचा अनुभव घेणारे आपण! ह्या सर्व अनुभवाची प्रत्यक्ष प्रचिती घेण्याची जी प्रत्येकात विविध पातळीवर खुमखुमी असते ती माझ्या बाबतीत दर पावसाळ्यात ही पाखरे पूर्ण करतात. त्यामुळे खास वातानुकुलीत सिनेमागृहात जाऊन त्रिमिती दृक अनुभव देणारी चाळीशी (वयाचा उल्लेख करायचा नाही म्हणता म्हणता कोठेतरी सुगावा लागून दिलाच की हो राव!!) लावून डायनासोर पाहण्याचा मला फारसा छंद नाही. पण तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स (ह्यात तन्नूने मन्नूला वेडा केला असा मराठी शब्दशः अर्थ घेण्याचा मोह टाळावा!!) पाहताना सोहम बालकाला न नेल्याने त्याचा डायनासोर पाहण्याचा हट्ट मला पूर्ण करणे भाग होते. आमच्यासोबत श्राव्या ही सोहमची पाच वर्षाची मामेबहीण होती. तिचा हा डायनासोरना प्रत्यक्ष सिनेमागृहात बघण्याचा प्रथम अनुभव असणार असल्याने एका चित्तथरारक अनुभवाची अपेक्षा मनात बाळगून आम्ही सर्व , खास करून तिचे पालक मॉलमध्ये प्रवेश करते झालो. 

जीवशास्त्र आणि माझे तसे दहावीपर्यंत बरे चालले होते. म्हणजे अमीबाच्या आकृत्या काढताना बऱ्यापैकी झटापट व्हायची पण आजूबाजूचा मजकूर पाठ असल्यावर चालून जायचं. खरा प्रश्न बारावीत निर्माण झाला. रुपारेलात Zoology अर्थात प्राणीशास्त्र शिकवायला कल्याणपूर नावाच्या अगदी कडक मॅडम होत्या. म्हणजे ज्यांना हा विषय आवडायचा त्यांच्यासाठी त्या अगदी चांगल्या होत्या. पण मी PCM करीत असल्याने प्राणीशास्त्राकडे तसे दुर्लक्षच करीत होतो. पण त्या काळदिवशी (आतापर्यंत काळरात्र असा शब्द ऐकला असेल पण आता काळदिवस हा ही ऐका!!) आम्हांला बेडूक विच्छेदन पार पाडायचे होते. त्यावेळी प्राण्याविरुद्ध अत्याचार थांबवणारी संघटना फारशी कार्यरत नसल्याचा फटका मला बसला. बिचारा गुंगी दिलेला अर्धमेला बेडूक माझ्यासमोर ट्रे मध्ये ठेवण्यात आला होता. त्याला मधोमध छेद देऊन त्याच्या काही रक्तवाहिन्या कापायच्या होत्या काही ठेवायच्या होत्या. मग ज्या राखून ठेवलेल्या वाहिन्या होत्या त्यांना गाठ बांधून मग आपलं शल्यविशारद कौशल्य दाखविण्यासाठी मॅडमना पाचारण करायचं असा एकंदरीत कार्यक्रम होता. आधीच तो अर्धमेला बेडूक बघून मी वैतागलो होतो आणि मग त्यातच ह्या सर्व कापाकापीमध्ये जी ठेवायची होती ती वाहिनी कापली जाऊन तिथे थोडाफार रक्तपात झाला. आणि मग मी अजून गोंधळून जाऊन तिथे मी पूर्ण गोंधळ केला. बाकीच्या मित्रांचं व्यवस्थित चाललं होतं त्यामुळे त्यांची स्तुती करत करत मॅडम जेव्हा माझ्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा मी केलेला पराक्रम पाहून त्या यं वैतागल्या. माझी त्यांनी मनसोक्त स्तुती केली. चारचौघात स्तुती होण्याचा हा माझा बहुदा पहिलाच प्रसंग असल्याने मी ही चांगलाच वैतागलो. आणि मग मी बोलून गेलो, "मॅडम मी PCM करतोय!" त्यांना आणि बाकीच्या सर्वांना मोठाच धक्का बसला. पण मॅडम मनाने चांगल्या होत्या. माझ्या ह्या रुपारेलच्या मानकदंडाप्रमाणे उद्धट मानल्या जाऊ शकले जाणारे उत्तर त्यांनी फारसे मनावर घेतलं नाही. बाकी मग वर्षभर त्यांनी माझ्याकडे आणि माझ्या पराक्रमाकडे काहीसा कानाडोळा केला. हे अजून दुसरं रामायण अशासाठी की मी मग बारावीत पोटापाण्यापुरते मार्क मिळवणे सोडता प्राणीशास्त्र ह्या विषयाकडे पूर्ण कानाडोळा केला. आणि म्हणून मला डायनासोरचे विविध प्रकार माहित नाहीत!!!
असो चित्रपट चालू झाला.चित्रपटाच्या सुरुवातीला सुट्टीवर एका थीम पार्कच्या सहलीला जाणारी दोन मुले आणि त्यांना वेळेवर विमानतळावर पोहोचवण्याच्या खटाटोपीत असणारे त्यांचे पालक आपल्या दृष्टीस पडतात. दोन मुलांच्या वयोमानात तसा बऱ्यापैकी फरक. म्हणजे मोठा दोन दिवस आपली मैत्रीण आपल्यापासून दुरावणार म्हणून मनातून दुःखी झालेला ह्याउलट छोटा आईचा दुरावा दोन दिवस सहन करावा लागणार म्हणून दुःखी झालेला आणि त्याचवेळी ज्युरासिक वर्ल्डला जायला मिळणार म्हणून अतिउत्साहात असलेला!! त्यांची मावशी ज्युरासिक वर्ल्ड मध्ये मोठ्या अधिकारावर आणि तिच्या भरवशावर ह्या दोन मुलांची आई ह्या दोघांना तिथे दोन दिवसांसाठी एकटं सोडायला तयार झालेली!! चित्रपट पुढे सरकत राहतो. काही गोष्टी आपणासमोर येत राहतात. सर्वसामान्य माणसांचे पूर्वीचे ज्युरासिक थीमचे आकर्षण आता कायम राहिलं नाही ह्याची ह्या ज्युरासिक वर्ल्डच्या चालकांना भेडसावणारी चिंता!!
त्यामुळे काहीतरी नवीन, काहीतरी विशेष नव्याने निर्माण करण्याची धडपड!! हे विशेष निर्माण करताना कोठेतरी सारासार विचार करण्याची विवेकबुद्धी बाजूला ठेवली जाते. आणि मग निर्माण केला जातो तो अगदी महाकाय शक्तीचा एक डायनासोर!!

आता बघा समजा एखाद्या अशिक्षित माणसास गणित अजिबात समजत नाहीयं आणि तुम्ही त्याला लाख, कोटी, पद्म वगैरे संख्या समजावून सांगायचा प्रयत्न करीत आहात. तो ज्या अचंब्याने एक लाखाकडे पाहील त्याच अचंब्याने एक कोटीकडे पाहील. तसाच काहीसा प्रकार माझ्या बाबतीत डायनासोरच्या विविध प्रकाराची नावे ऐकताना होतो. पुन्हा त्यातील काही अगदी भयंकर तर काही अगदी निरुपद्रवी!! 

ह्या ज्युरासिक वर्ल्डचं चित्रपटातील प्रथमदर्शन अगदी नयनसुख देणारं आहे!! समजा तुम्हांला तुमच्या कल्पनाशक्तीला ताण देत जगात / ह्या विश्वात सर्वात सुंदर अशा ठिकाणाची निर्मिती अथवा वर्णन करावयास तुम्हांला सांगितलं तुम्ही कसं कराल? काहीसं गोंधळून जायला होईल की नाही राव! 

जिथवर नजर पोहोचेल तिथवर हिरवेगार कुरण पसरलेलं; अगदी दूरवर हे कुरण जिथं संपल्याचा भास होईल तिथं सुरु होणारा आणि आकाशाला आपल्या हिमाच्छादित शिखरांनी स्पर्शु पाहणाऱ्या पर्वतरांगा! ह्या पर्वतरांगावर पसरलेले महाकाय सुचीपर्णी वृक्ष! ह्या पर्वतरांगातून उगम पावणारी आणि आपल्या शुभ्र पाण्याच्या खळखळणाऱ्या आवाजाने सर्व आसमंतात जिवंतपणा आणणारी नदी! आपल्या नजरेसमोर ह्या नदीचं पर्वतात असतानाचं बाल्यावस्थेतील अवखळ रूप समोर असावं आणि आयुष्यभराच्या प्रवासानं आलेल्या प्रगल्भतेने सपाट भूभागात आल्यानंतरच संयत रूपसुद्धा असावं. हिरव्यागार कुरणावर अगदी रंगीबेरंगी फुलझाडांनी दाटी केलेली असावी आणि त्यातील डेरेदार वृक्षांवर आपल्या मधुर रवाने आसमंत भारून टाकणाऱ्या पक्ष्यांचं वास्तव्य असावं. असा काहीसा प्रकार मला रंगवासा वाटतो. 

ह्या हॉलीवूडच्या निर्मात्यांना मात्र दाद द्यावी तितकी थोडी!! आपल्या कल्पनेतील ह्या स्वप्नवत वाटणाऱ्या दृश्याला शब्दरूप देताना सुद्धा आपल्याला फार मोठी धडपड'करावी लागते. तर ही श्रेष्ठ मंडळी त्यांच्या मनातील स्वप्नातील ह्या दृश्याला एनिमेशनच्याच्या आधारे प्रेक्षकांसमोर हुबेहूब पुढे करतात. ज्युरासिक वर्ल्डचं चित्रपटातील प्रथमदर्शन डोळ्यांना अगदी सुखावून सोडतं. 

ज्यात जैवशास्त्रीय बदल घडवून आणून त्याला महाकाय शक्ती प्रदान करण्यात आली आहे असा एक डायनासोर मोकळा सुटतो. त्यामागे सुद्धा त्याची विकसित झालेली बुद्धी असावी असा तर्क करायला वाव असतो. त्या डायनासोरच्या विध्वंसात मग ही मुले सापडतात. पण काही वेळातच आपली सुटका करून घेण्यात यश मिळवतात. प्रेक्षक जितका वेळ लहान मुलं एकटी संकटाचा मुकाबला करत असतात तोवर जीव कंठाशी आणून चित्रपटाशी एकरूप असतात. पण मग ती मोठ्या माणसांना मिळाल्यानंतर आपल्या मनावरील दडपण आपसूकच कमी होतं. परदेशी सिनेमातील संवाद काळजीपूर्वक ऐकायची आपल्याला सवय विकसित करावी लागते. लहान लहान प्रसंगातून आपल्यासमोर विविध पात्रांच्या व्यक्तिरेखा उलगडत जातात. लहान भावाच्या मनात आपले आई वडील एकमेकांपासून वेगळे होण्याचं असलेलं भय, त्यांच्या आई आणि मावशीच्या संवादातून आपल्यासमोर येणारं त्यांच्या नात्याची झलक वगैरे वगैरे!! मावशीबाई अगदी मोठ्या हुद्द्यावर असतात आणि त्यांचं एक प्रेमपात्र चार गोंडस (?) डायनासोरना प्रशिक्षित करीत असते. ह्या प्रेमपात्राचे आणि मावशीबाईचे काहीसं बिनसलेलं असल्याने ते फक्त व्यावसायिक संबंध राखून असतात. सर्वसामान्य परिस्थिती असेल तर कोणत्याही (विवाहित / अविवाहित ) जोडप्यातील संबंध ताणलेलेच असायला हवेत आणि जर ते सुरळीत व्हायला हवे असतील तर एखादी आपत्ती यायला हवी असा काहीसा समज चित्रपट पाहून होऊ शकतो. पण खरे आणि चित्रपटातील जीवन वेगवेगळ असते हे लक्षात असून द्यात!!

चित्रपट एखाद्या विशिष्ट मर्यादेपलीकडे उत्कंठा निर्माण करण्यात अयशस्वी ठरतो. महाकाय शक्तीचा मोकळा सुटलेला डायनासोर सतत विध्वंस करीत फिरणार, त्याला काबूत आणण्यासाठी चांगल्या विचाराची / मनाची माणसे प्रयत्नरत असणार; त्यात खो घालण्यासाठी व्यावसायिक वृत्तीची माणसे येणार, डायनासोर पुढचा हल्ला कोणत्या रुपात करणार ह्याची काय ती उत्कंठा असणार!! हा पुन्हा पुन्हा वापरून झालेला फॉर्म्युला!! आणि त्यात हल्लीच्या पिढीकडे असणारी गैजेट्स! ह्या गैजेट्समुळे तुम्हांला जीवनात उत्कंठादायी अनुभवाची प्रचिती घेण्यासाठी सिनेमागृहात जाण्याची गरज भासत नाही. आणि गेल्या २० वर्षात प्रेक्षकांच्या मानसिकतेत झालेला हा बदलच ज्युरासिक वर्ल्डला आधीच्या भागांइतके यश देऊ शकला नाही असे माझे वैयक्तिक मत!! बाकी लाईफ ऑफ पाय नंतर एका मोठ्या हॉलीवूड चित्रपटात काम करण्याचा इरफान खानचा हा अजून एक अनुभव!! त्याच्या अभिनयात काय खास आहे हे मला समजले नाही; बहुदा त्याचं इंग्लिश बाकीच्या ३ महानायकांपेक्षा चांगलं असावं असा मी समज करून घेतला. 
सोहम आणि श्राव्या मंडळी चित्रपटानंतर खुशीत दिसली. त्रिमितीय गॉगलातून अगदी जवळपर्यंत येउन सुद्धा डायनासोरने काहीच केले नाही म्हणून श्राव्या खुश असावी तर वेगवेगळ्या फ्लेवरच्या पॉपकोर्नचे सेवन करायचा योग आला म्हणून सोहम खुश असावा!! 

शनिवार, १३ जून, २०१५

सुज्ञता !!


 
खरंतर लेखाला Politically Correct असं शीर्षक देण्याचा मोह फार होत होता. पण वसई महानगरपालिकेच्या निवडणुका उद्या असल्याने उगाच भानगड नको म्हणून तो टाळला. 
लहानपणी इतिहासाची पुस्तके वाचण्यासाठी अगदी मस्त असत. त्यात गोष्टी वाचायला मिळत आणि आपल्या मराठी भाषेच्या नाट्यमयपणाची तिथे लयलूट असे. "शत्रूचे घोडे नदीकाठी पाणी पिण्यासाठी सुद्धा कचरत कारण त्यांना त्यात धनाजी संताजी दिसत" असं वाक्य वाचलं की माझी छाती सुद्धा अभिमानानं दोन इंच फुलून येई. मातृभाषेतील अशा वाक्यांनी आपल्या परंपरेविषयी सदैव अभिमानच वाटला. अगदी काही वर्षापूर्वी काळ बराचसा निरागस होता. अजूनही बहुदा गावात मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या लोकांसाठी तो तसा असावा. त्याच इतिहासाच्या पुस्तकात अजून काही प्रसिद्ध वाक्य होती. "मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले!" हे त्यातील एक! त्यानंतर एक होतं "दत्ताजींनी मुत्सद्दीपणाचे धोरण स्वीकारलं आणि …" "दत्ताजींनी मुत्सद्दीपणाचे धोरण स्वीकारलं.. . " ह्या वाक्याचा अर्थ समजा त्याकाळच्या मुलांना वर्गात उभं करून विचारला असता तर अगदी धमाल आली असती. 

हळूहळू वयाने मोठेपण येत जातं. जर तुमच्यासोबत एखाद्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील मुलांना लाभतं इतकं सुदैव असेल तर तुम्हांला महाविद्यालयीन शिक्षण संपेपर्यंत मुत्सद्दीपणा अंगी बाणवायची गरज भासत नाही. नाही म्हणजे तुम्ही ह्या काळात प्रेमात वगैरे पडलात तर मात्र काहीसा मुत्सद्दीपणा बाणवावा लागतो. एकदा का तुम्ही नोकरीला लागलात आणि तुमचं लग्न झालं की तुमच्या आयुष्यात अनेक नवीन लोक प्रवेश करतात. शिक्षणाचा कालावधी संपेपर्यंत तुमच्या आयुष्यात आलेली लोक आणि त्यानंतर आलेली लोक ह्यात एक मुलभूत फरक असतो. पहिल्या टप्प्यातील लोक एकतर लहानपणापासून तुम्हांला ओळखत असतात आणि दुसरं म्हणजे तुमच्याशी त्यांची व्यावसायिक स्पर्धा नसते. त्यामुळे ह्या टप्प्यात तुम्हांला तुमच्या मुलभूत अवतारात वागणं बऱ्यापैकी शक्य असते. नंतर मात्र आयुष्य क्लिष्ट होतं जातं. कार्यालयात तुम्ही व्यावसायिक यशाच्या शिड्या झपाट्याने चढून जाण्यासाठी आजूबाजूच्या लोकांशी प्रत्यक्ष / अप्रत्यक्षरित्या स्पर्धा करीत असता. आपण ज्या कंपनीसाठी काम करतो तिच्या भल्यासाठी काम करणे हे आपल्या सर्वांचे समान ध्येय असलं तरी त्यात स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याच्या अनेक संधी उपलब्ध असतात. मेहनत करून ध्येय साध्य करणे आणि त्याचबरोबर आपण हे काम केलं हे योग्य लोकांच्या लक्षात आणून देणं ह्या दोन पातळीवर आपण मेहनत घेत असतो. आता एखादे लक्षवेधी काम कोणी किती प्रमाणात केलं आणि त्याचं श्रेय वाटप त्या योग्य प्रमाणात झालं की नाही हे अगदी अचूकपणे कोणीच ठरवू शकत नाही. आणि मग मानवी भावनांचे कधी सुप्त तर कधी उघडपणे प्रकटीकरण होण्यास सुरुवात होते. आणि मग अशा वेळी Politically correct वागणं महत्त्वाचं ठरतं. एखादा माणूस अगदी फार मोठ्या प्रमाणात धूर्तपणा करत आहे हे माहित असून सुद्धा त्याच्याशी किमान व्यावसायिक संबंध टिकवणं ही आपली बऱ्याच वेळा गरज असते. एखादी खूप मेहनत करून मिळवलेली नोकरी आपण करत असतो कारण ती आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यासाठी लागणारा वित्त पुरवठा करत असते. एखादा व्यवसाय आपण एका परिचिताबरोबर भरभराटीला आणला असतो आणि मग यशाच्या एका टप्प्यावर आपले त्याच्याशी मतभेद होतात. पण अगदी त्याच क्षणी टोकाची भुमिका घेत एक घाव दोन तुकडे करणे शक्य नसते. प्रिती झिंटा आणि नस वाडियाचे पहा ना!
Politically Correct च्या अनेक छटा आहेत जसे की सुज्ञता, मुत्सद्दीपणा, , व्यावहारिकपणा अथवा धूर्तपणा!! ह्यात लबाडीचे प्रमाण डावीकडून उजवीकडे हळूहळू वाढत जाते. ह्याची व्याख्या अचूक शब्दात पकडता येणं कठीण! तरी प्रयत्न करायला हरकत नाही. 

Politically Correct - एखाद्या प्रसंगी आपल्या मनात निर्माण होणाऱ्या भावनांना त्यांच्या मुळ स्वरुपात कृती अथवा उक्तीद्वारे उतरविण्याआधी दीर्घकालीन परिणामांचा, bigger picture चा विचार करून त्या भावनांना अल्प ते विस्तृत प्रमाणात बदलून मगच कृती / उक्ती करणे ह्याला Politically Correct असे म्हणता येईल. 

काही लोक थेट नोकरी करीत नाहीत. ते सामाजिक जीवनात वावरून अथवा स्वतःच्या व्यवसायाद्वारे अर्थाजन करीत असतात. सामाजिक जीवनातील त्यांची प्रतिमा ही त्यांच्यासाठी फार मोठी बाब असते. मग ते सतत Politically Correct राहायचा प्रयत्न करतात आणि काहीवेळा मग हा प्रयत्न बेगडीपणाचे, नाटकीपणाचे रूप प्राप्त करतो. Politically Correct ही गोष्ट तुम्ही सतत वापरू शकत नाहीत. ह्या गोष्टीत तुम्ही तुमचा मूळ निर्णय काही काळापुरता विलंबित ठेवत असता, आणि त्यामुळे तुमच्यात काहीशी बेचैनी असते. मग होतं काय की तुम्ही काही काळाने आपल्या उक्तीशी विसंगत अशी कृती करता किंवा निर्णयच घ्यायचे प्रदीर्घ काळापर्यंत टाळता. आणि मग लोकांच्या ही गोष्ट लक्षात 
येते. अजून एक गोष्ट तुमची मुलं, तुमचा जीवनसाथी तुम्हांला अगदी जवळून न्याहाळत असतो / असतात. तुमचे हे बाह्यजगतातील बेगडी रूप सर्वप्रथम त्यांच्या लक्षात येतं. 
Politically Correctness at the cost of what? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला स्वतःशीच द्यायचं असतं. 

आता दुसरा टोकाचा प्रकार! ह्या माणसांना Politically Correctness हा प्रकार अजिबात झेपत नाही. ज्या व्यक्तीशी पटत नाही त्याला ते अगदी तोंडावर बोलून मोकळे होतात. एखादी भल्या मोठ्या लठ्ठ पगाराची नोकरी तिथल्या काही लोकांशी पटत नाही म्हणून सोडून ते मोकळे होतात. जोवर आपण आपले एकटेच असतो तोवर हा प्रकार ठीक असतो पण ज्या क्षणी तुम्ही एका कुटुंबाचे घटक असता, तुमच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या असतात तेव्हा तुम्हांला तुमचे हे मूळ रूप कायम ठेवून चालत नाही. काळ बदलत चालला आहे. जरी तुमच्या स्वभावात मुत्सद्दीपणा मूलतः नसेल तरी दीर्घकालीन परिणामांच्या दृष्टीने एका किमान पातळीपर्यंत तरी हा गुणधर्म तुम्हांला विकसित करता यायला हवा. अगदी ते ही जमत नसेल तरी चिंता करायचं काम नाही. शेवटी It's your life!!!

रविवार, ७ जून, २०१५

कालबाह्य !!!


 
आजकाल समाज हा बऱ्याच गोष्टींना फारच झपाट्याने कालबाहय ठरवतोय असे मला वाटत आहेत. हा भ्रम असेल तर किती बरे असे मी वारंवार मनाला समजावत असतो.
काही शालेय संस्था कालबाहय होतांना दिसतात. शालेय शिक्षणाचे माध्यम कालबाहय झाले असावे असा व्यापक समज असतो. पण माध्यमापेक्षा एखाद्या संस्थेची तात्कालीन प्रस्थापित समाजातील मुलांना आपल्याकडे खेचून घेण्याची क्षमता कमी होत असल्याने त्या कालबाहय होतात. शालेय संस्थातील शिक्षकांचा दर्जा जर काळास सुसंगत असा ठेवला तर संस्था कालबाहय होण्याचे भय बऱ्याच प्रमाणात टळू शकते.
काही राजकीय पक्ष स्थानिक, राज्य अथवा राष्ट्रीय पातळीवर कालबाहय होतांना दिसतात . बऱ्याच वेळा हया पक्षांच्या विचारसरणीत चुकीच असं काहीच नसत पण काळानुसार लोकानुनय करण्यासाठी जे बदल करण्यासाठी जी मानसिक लवचिकता दाखवावी लागते त्यात हे पक्ष अपयशी ठरतात .
काही व्यक्ती काळानुसार , वयानुसार कालबाहय होतांना दिसतात . ही कालबाह्यता कोणाच्या नशिबी सामाजिक, व्यावसायिक आयुष्यात येते तर काहीच्या बाबतीत वैयक्तिक आयुष्यात! सामाजिक आयुष्यात आपल्या ज्ञानाचा प्रसाद भाषणातून, लेखातून जनतेला देणारे लोक काही काळाने कालबाहय होऊ शकतात. प्रत्येक भाषण, लेख ह्यातून असे लोक आपल्याजवळील ज्ञानाचा ठराविक टकके भाग जनतेसमोर ठेवत असतात. एखादया माणसाकडे अगाध ज्ञान असेल तर तो आपल्या प्रत्येक जनसंपर्काच्या प्रसंगी हया अगाध ज्ञानाचा ठराविक टकके नवनवीन भाग लोकांसमोर ठेऊ शकतो  आणि तो केव्हाच कालबाहय होत नाही . हया उलट उथळ ज्ञानाच्या जोरावर सर्वत्र गडबड करु इच्छिणारे अर्धी हळकुंड पिवळधारी लोक काही कालावधीतच आपल्या ज्ञान प्रकटनामध्ये तोचतोच पणा आणून थोड्याच वेळात कालबाहय होतात.
जाता जाता एक सावधानतेचा इशारा! बऱ्याच वेळा नवीन पक्ष, शालेय संस्था येऊन पूर्वापार चालत आलेल्या पक्ष, शालेय संस्थांना कालबाहय करत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसतात . हया नवीन घटकांनी केलेले दावे काळाच्या कसोटीवर किती काळ टिकून राहतील हा महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे हया नवीन पक्षांच्या, संस्थांच्या वल्गनांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापुर्वी भोवतालच्या परिस्थितीचे आणि भविष्यात होऊ घातलेल्या परिस्थितीचे शांतपणे पृथ्थकरण करून मगच निर्णय घ्यावा ही विनंती!!!

शनिवार, ६ जून, २०१५

Multitasking


 
हल्ली बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान "तुम्ही बरीच कामे एका वेळी सक्षमपणे हाताळू शकता का? " असा प्रश्न विचारला जातो. आणि मग तो होतकरू उमेदवारसुद्धा उत्साहाच्या भरात हो म्हणून जातो. 
Multi-tasking चा नक्की अर्थ काय ह्याचं आपण थोडं विश्लेषण करूयात. सर्वांना समजेल अथवा आवडेल असे गृहिणीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून! सकाळी उठून तिच्या डोळ्यासमोर अनेक कामे असतात. स्वतःची, मुलांची तयारी करणे; सर्वांच्या न्याहाऱ्या बनविणे, सर्वांचे डबे बनविणे आणि भरून देणे. ह्यातच घरात कामवाली आल्यास तिला सुचना देणे इत्यादी इत्यादी. हल्ली त्यात whatsapp चे मेसेज बघणे ह्याची भर पडली आहे. 
ह्या सर्व कामांची यादी कागदावर लिहून तो कागद डोळ्यासमोर ठेवण्याची चैन तिला परवडण्यासारखी नसते किंबहुना त्याची तिला गरजही नसते. आता वळूयात मूळ मुद्द्याकडे. समजा एखाद्या गृहिणीने ठरवले की ही सर्व कामे मी एका मागोमाग एक करणार. म्हणजे प्रथम सर्वांची न्याहारी बनवायची, ती पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या कोणत्या कामाला हात लावणार नाही. आदर्शवादी आणि अव्यावहारिक दृष्टीकोन झाला. समजा असा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून कोण्या गृहिणीने तयारी करायची ठरविली तर मग ती बहुदा दुसऱ्या दिवशी सकाळी तयार होईल. ह्यातील अतिश्योक्तीचा भाग सोडला तर आपल्या असे लक्षात येईल की multitasking करणे ही गृहिणीची गरज असते. कुकर लावणे हा गृहिणीला multitasking करण्यात हातभार लावणारा महत्वाचा घटक आहे. एकदा का कुकर लावला की तो त्याचे काम आपसूक करत राहतो. तो जरी माहेरून दिलेला असला तरी तो कसा मस्त शिट्टी देतो हे बघत बसायचं काम नाही. मग अशा वेळात गृहिणी दुसरे काम सुद्धा करू शकते. आता ह्या क्षणी आपण दुसरं काम करू शकतो हा निर्णय घेणे हा सोपा भाग पण ते दुसरं काम कोणतं हा निर्णय घेणे हे कौशल्याचं काम. मुल थोडं लहान असेल तर त्याला जास्त लवकर उठवून ठेवणं हा शहाणपणाचा भाग नाही कारण ते लुडबुड जास्त करेल. त्याचप्रमाणे कोणताही प्रसंग असो दाढी, आंघोळीला अगदी मनसोक्त वेळ घेणाऱ्या नवऱ्याला न्हाणीघराचा ताबा अगदी शेवटी घेऊ देणे असे कठोर पण आवश्यक निर्णय ती घेत असते. 
आता ह्या प्रस्तावनेनंतर आपण लेखाच्या मुख्य भागाकडे म्हणजे कार्यालयातील multitasking कडे वळूयात. साधारणतः कार्यालयात परिणामकारक कार्य करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचा एक समान गुणधर्म असतो आणि तो म्हणजे ते आपल्याला दिवसभरात कराव्या लागणाऱ्या कामाची यादी तयार बनवून ठेवतात. ही यादी जमल्यास उतरत्या प्राधान्यक्रमाने असावी. हा कर्मचारी सकाळी किंवा जेव्हा केव्हा त्याची शिफ्ट सुरु होते त्यावेळी अगदी स्वप्ने पाहत कार्यालयात प्रवेश करतो. आज माझी सर्व कामे मी आटपून टाकीन असे ते स्वप्न असते. त्याचवेळी नियतीच्या मनात मात्र वेगळेच विचार असतात. आता मी नियतीवर विश्वास ठेवतो म्हणून माझ्या आधुनिक विचारसरणीच्या मित्रांनी खट्टू व्हायचं काम नाही! इथे नियती म्हणजे आपल्या जीवनातील अनिश्चततेचे प्रतिक! आपली कामे पूर्ण करण्यात आपल्या प्रयत्नांसोबत बाकी काही घटक अवलंबून असतात जसे की योग्य व्यक्तीची चर्चेसाठी, निर्णय घेण्यासाठी अथवा काम करण्यासाठीची उपलब्धता! काही दिवशी ह्या बाह्य घटकांचा मेळ जुळून येतो तर काही दिवशी नाही. 
ज्या दिवशी हा मेळ जमून येत असतो त्या दिवशी झटापट कामे उरकून घ्यावीत हेच शहाण्या माणसाचे लक्षण! वरवर पाहता multitasking हे एका कार्यक्षम माणसाचे लक्षण मानले जाऊ शकते. पण बऱ्याच वेळा हा आभास असू शकतो. काही कामे अशी असतात जी कमी वेळात अचूकपणे पूर्ण करण्यासाठी तुमचे एकाग्र होऊन गुंतून जाणे आवश्यक असते. आणि अशा कामाचा प्राधान्यक्रम वरचा असू शकतो कारण ती पूर्ण होण्यावर बाकीची अन्य महत्त्वाची कामे अवलंबून असतात किंवा त्याच्या आऊटपुट वर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो. अशा वेळी multitasking बाजूला सारणे आवश्यक असते. बाजूला सारायचं म्हणजे नक्की काय करायचं. आपल्या डेस्कवर येणाऱ्या फोनकडे सरळसरळ दुर्लक्ष करायचं, अगदी पराकोटीच्या प्रसंगी मग तो तुमच्या बॉसचा फोनही का असेना! हल्ली लोक पिंग करतात त्यांच्याकडे सरळ दुर्लक्ष करायचं, एखादी कमी महत्त्वाच्या मिटिंगला सरळसरळ टांग द्यायची. ह्या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण देणे शक्य आहे जर तुम्ही खरोखर महत्वाच्या बाबीवर काम करत असाल! गेल्या आठवड्यात ऑफिसात झालेल्या चर्चेनुसार ह्या multitasking च्या नादापायी आपण बऱ्याच कामांना पूर्ण करण्यात आवश्यकतेपेक्षा बराच जास्त वेळ घेत असल्याचे आढळून आल्याचे म्हटलं होतं. 
वरचा परिच्छेद multitasking च्या काहीशा विरोधात गेला. पण बऱ्याच वेळा multitaskingआवश्यक असतं. एखादं काम बराच वेळ सतत करून आपली त्या कामातील परिणामकारकता एखाद्या विशिष्ट मर्यादेच्या खाली उतरल्याचे आपणास वेळीच लक्षात यायला हवं म्हणजे आपण आपल्या to do list मधील प्राधान्यक्रमातील पुढील काम तात्काळ हाती घ्यायला हवं. अजून एक मुद्दा २० : ८० तत्वाचा. बऱ्याच वेळा एखाद्या कामाचा ८० टक्के भाग पूर्ण करायला केवळ २० टक्के वेळ पुरेसा असतो; पण पुढील २० टक्के भाग जो आपणास परिपूर्णतेकडे घेऊन जातो तो मात्र पुढील ८० टक्के वेळ घेतो. अशा वेळी दुनिया आपल्याकडून जर त्यांच्या प्राध्यान्यक्रमातील कामे पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवत असेल तर त्याच्याकडे लक्ष देणे आवश्यक असते. 
multitasking म्हणजे कोणत्याही क्षणी दोन कामे करणे असा नव्हे! खऱ्या अर्थाने पाहिलं तर संगणक सुद्धा multitasking करत नाही. multitasking चा खरा अर्थ म्हणजे आपल्यासमोर आपल्याला करायच्या असलेल्या सर्व गोष्टींची यादी तयार ठेवणे आणि त्यातील प्रत्येकावर किती वेळ काम केल्यास आपण परिणामकारक राहू ह्याचा अंदाज घेत; काळाच्या तितक्या भागात त्या टास्कवर काम करून मग योग्य वेळी दुसऱ्या टास्कवर झेपावणं!  
आता पहा ना ही पोस्ट लिहून होईस्तोवर मी ना whatsapp पाहिलं ना कार्यालयाची ई - मेल चेक केली!! बाकी कोणी multitasking  पर्यायी मराठी शब्द सुचवा बरं!

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...