मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
भन्नाट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भन्नाट लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ४ जून, २०२५

वेडात इंग्लिश खेळाडू झाले सायकलस्वार !


मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घरी येत असल्याचं स्वप्न पडलं.  हडबडून जागा झालो, बराच वेळ बेचैन होतो. शेवटी वेळ न पाहता स्नान केलं तेव्हा कुठं झोप लागली. 

आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच अनेक खळबळजनक बातम्या वाचायला मिळाल्या. त्यात लंडनच्या वाहतूककोंडीत अडकल्यानं इंग्लिश खेळाडूंनी लाईम बाईक्स ह्या भाड्यानं सायकली देणाऱ्या यंत्रणेच्या सायकली वापरून ओव्हल मैदान गाठल्याची मनोरंजक बातमी होती. वेस्ट इंडिजचा संघ मात्र बसमध्येच बसून राहिला. त्यामुळं त्यांना मैदानावर पोहोचण्यास उशीर होऊन नाणेफेक सुद्धा उशिरानं झाली. ह्या निमित्तानं माझ्या मनात आलेले काही विचार !

१.  आधुनिक क्रिकेट खेळाडूंना रस्त्यावर आत्मविश्वासानं सायकल चालवता यायला हवी. ह्यात केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील कोणत्याही देशात स्थानिक वाहतुकीचे नियम पाळून सायकल चालवता यायला हवी. 

२. लाईम बाईक्स ह्या कंपनीत ज्यावेळी इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं "मला जरा चांगल्या पंधरा सायकली भाड्यानं हव्या आहेत" असा भ्रमणध्वनीवरून फोन केला असेल त्यावेळी तो फोन घेणाऱ्या स्वागतकक्षातील मनात कोणकोणते विचार आले असतील ह्यावर एक मोठा लेख लिहून होईल. हॅरीने तासाभरासाठी ह्या पंधरा सायकली नोंदविताना दरांमध्ये घासाघीस केली असेल का हा बाळबोध भारतीय विचार माझ्या मनात आला. तरी सध्या बेन स्ट्रोक संघात नसल्यानं अधिक दणकट सायकल द्या असं सांगण्याची वेळ हॅरीवर आली नसावी. 

३. वेस्ट इंडीज संघ मात्र बिचारा बसमध्येच बसून राहिला. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अमेरिकेच्या सानिध्यात असल्यानं ते रस्त्याच्या उजव्या बाजूनं वाहनं चालवीत असतील. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या बाजूनं सायकली चालविण्यासाठी योग्य तयारी नसल्यानं त्यांनी बसमध्ये बसून राहणं पसंत केलं असावं असं मला वाटलं. पण ते ही इंग्लिश वसाहतीचा भाग असल्यानं ते ही रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवितात असं माहिती मायाजालाने सांगितल्याने हा सिद्धांत मागे पडला. जेव्हा केव्हा शाई होप भेटेल तेव्हा त्याला नक्कीच हा प्रश्न मी विचारेन. 

४. आता लेखातील मुख्य कल्पनाविलास! ह्या कल्पनेवर मी भविष्यात चित्रपट बनविणार. तोवर कोणी चौर्यकर्म करून असा चित्रपट बनवू नये ही आशा. भारतीय संघ वानखेडेवरील क्रिकेट सामन्यासाठी ताज हॉटेलमध्ये राहत असतो. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या सामन्यासाठी साडेअकरा वाजता बसमधून निघालेल्या भारतीय संघाची बस अशीच वाहतूककोंडीत सापडते. तात्काळ लिंबूपाणी ह्या ताशी शंभर रुपये भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपनीला गौतम गंभीर फोन करतो. त्यांच्याशी घासाघीस करून ताशी नव्वद रुपयांपर्यंत तो दर खाली आणतो.  पहिल्या दोन सायकली बसजवळ पोहोचताच रोहित आणि विराट, गिल आणि राहुलवर दादागिरी करून त्या सायकलीवर बसतात. विराटने आपण सायकलवरुन वानखेडेवर जात आहे हे कळविल्यानं तो सायकल व्यवस्थित चालवेल की नाही हे पाहायला अनुष्का आपली सायकल घेऊन तात्काळ तिथं पोहोचते. ते तिघे जरी हेल्मेट घालून रस्त्यावरून मार्ग काढत पुढे पुढे जात असले तरी रस्त्यावरील नागरिक त्यांना लगेचच ओळखतात. लगेचच डझनभर न्युज चॅनेलला ही बातमी कळल्याने त्यांचे प्रतिनिधीसुद्धा लिंबूपाणी कंपनीतर्फे सायकली घेऊन तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. एव्हाना भाडं ताशी दहा हजार रुपयांपर्यंत गेलं असतं. पुन्हा एकदा वाहतूककोंडीत सापडल्यानं रोहित, विराट, अनुष्का हताश झालेले असतात. इतक्यात एक उमदा तरुण विनू त्यांच्या मदतीला धावून येतो आणि गल्लीबोळातील रस्त्यातून वानखेडेला पोहोचविण्याची ऑफर देतो. अनुष्का लगेचच हो म्हणते. ह्या गल्लीबोळातील रस्त्यावरून जाताना एका गल्लीत स्थानिक दोन संघात टेनिस बॉलने सामना चाललेला असतो. तेथील फलंदाजी करणाऱ्या संघाला जिकंण्यासाठी एक षटकात पंचवीस धावांची आवश्यकता असते. त्यांचा कर्णधार स्थानिक दादा असतो. रोहित आणि विराट ह्यांनी एक षटक फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं तरच पुढे जाऊ देण्यात येईल अशी तो अट घालतो. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत अनुष्का त्या दोघांना हो म्हणण्यास भाग पाडते. आता ते दोघे फलंदाजीला जाण्यासाठी निघतात. परंतु रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या पिचवर पोहोचताच त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु होते.  सर्वजण धावत धावत त्यांच्याजवळ पोहोचतात. महत्प्रयासाने त्यांना बाचाबाचीचे कारण कळतं. पहिला स्ट्राईक कोणी घ्यायचा ह्यावर त्या दोघांमध्ये एकमत होत नसतं. पुढं काय होतं ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला माझा आगामी चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत थांबावं लागेल!   

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

गेला राक्षस कुणीकडं?


लहानपणी आपण सर्वजण किंवा मी राक्षसाच्या गोष्टींनी अगदी भयभीत होत असू. राक्षस बहुदा गावाजवळील टेकडीवर राहायचा. राक्षसाचा देह महाकाय. त्याला भूक लागली की तो दणादण पावलं टाकीत टेकडीवरुन, पर्वतावरुन खाली उतरत असे. राक्षसानं टेकडीवर रहावं की पर्वतावर हे बहुदा त्याच्या आकारमानावर अवलंबुन असावं. 

वाचलेल्या सर्व गोष्टींत राक्षस आणि गावकरी ह्याच्यात व्यवस्थित सामंजस्य होते. बकासुराला महिन्याला गाडाभर अन्नधान्य दिलं की तो गावकऱ्यांना बाकीचे दिवस त्रास देत नसे. ह्याआधीचे राक्षस इतके समजुतदार होते की नाही हे समजायला मार्ग नाही. राक्षसाला मोजकी कामे असावीत. दिवसाचं, आठवड्याचं किंवा महिन्याचं एकदाच खाऊन घ्यावं आणि मग झोपी जावं. पुन्हा भूक लागली की टेकडी, पर्वत जे काही असेल ते उतरावं आणि ... 

गोष्टीत कधी वाचलं नाही पण बहुदा राक्षस एकटेच टेकडीवर रहात असावेत. त्यांनाही कदाचित समूहाने राहणाऱ्या माणसांचा हेवा वाटत असावा. ते ही कदाचित रात्री एकटेच टेकडीवर आकाशातील तारकांकडे पाहून उदास गाणी म्हणत असावेत. ह्याचाच परिणाम असेल बहुदा पण कालांतरानं राक्षस त्यांच्या मूळ रुपांतून नाहीसे झाले. एकट्यानं मनुष्यजातीपासुन वेगळं राहणं त्यांना कदाचित आवडलं नसावं. त्यांच्यात उत्क्रांती होत गेली. हळुहळू राक्षस मनुष्यरुपात बाकीच्या माणसांसोबत येऊन राहू लागले. 

ह्या पर्वाच्या सुरुवातीच्या कालावधीत कदाचित बाह्यरुपाद्वारे राक्षस आणि इतर मनुष्यगण ह्यांच्यातील फरक समजू शकत असावा. पण त्यामुळं आपल्याला अजुनही वेगळी वागणुक मिळतेय ह्याला कंटाळून राक्षसांच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात मनुष्य आणि राक्षस ह्यांच्या बाह्यरुपातील उरलासुरला फरकही नाहीसा झाला. आता राहिला होता तो केवळ विचारातील, वागण्यातील फरक.  

बाकीचा मनुष्यगण इतक्या कालावधीत गप्प बसला होता असे नाही. राक्षसाचे गुणधर्म, विचारसरणी ओळखायला आणि त्यावर मात करायला शस्त्रासोबत मंत्र, बोधपर कथा, संस्कार इत्यादी मार्गांचा अवलंब केला गेला. मनुष्यानं आपल्यावर अजुनही पूर्ण विश्वास ठेवला नाही ह्याचं राक्षसाला खूप वाईट वाटलं असणार. त्यामुळं हळूहळू राक्षसानं आता मनुष्यांच्या मनांत प्रवेश करायला सुरुवात केली. बहुतांश सर्व माणसांच्या वागण्यात आता हे गुण दिसु लागले आहेत. 

त्यामुळं वाचकहो, अवतीभोवती टेकडी दिसलं तरी त्यावर राक्षस कुठे दिसतोय का ह्याचा शोध घेऊ नका! 

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०२१

ते दोन तास


ट्रिंग ट्रिंग ! रविवारी सकाळी घरच्या दूरध्वनीची बेल वाजली तसा मी कुतूहल भावनेनं व्यापून 
दूरध्वनीकडे गेलो. बरेच दिवसांत ही बेल वाजली नसल्यानं हा दूरध्वनी घरात आहे ह्याचाच मला विसर पडला होता. 

मी  - "हॅलो" 

समोरचा माणूस - "हॅलो " (अति  उत्साहानं )

आवाज ओळखीचा वाटल्यानं मी स्मरणशक्तीला ताण दिला. 

मी  - "अति गंभीर ?"

समोरचा माणूस - "काय ?" (काहीशा रागानं )

मी - "नाही म्हणजे आपण गेल्याच आठवड्यात बोललो ना !" ( सारवासारव करण्याचा प्रयत्न करत )

समोरचा माणूस -  "हो  तोच तो मी ! कसे  आहात  पंखवाले !"

मी  - "ठीक आहे ! (काहीशा रागानं )

समोरचा माणूस -  "तर थेट मुद्दयाला हात घालतोय मी ! तुमच्या मागच्या आठवड्यातील  पंखांच्या कल्पनाविस्तारावर आम्ही  म्हणजे आमची कंपनी खूप खुश झाली आहे . त्यामुळं आज आम्ही तुमच्याकडं नवीन प्रस्ताव घेऊन आलो आहे !"

मी  - "असं होय "

थोड्याच वेळात मी अतिगंभीर आणि त्याची एक स्त्री सहकारी ह्यांच्या सोबत व्हिडिओ कॉल वर होतो. 

अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ प्रभात !"

मी  - अतिगंभीरकडे पाहत "आपलं झालंय सुप्रभात!"  त्याच्या सहकारीला  "सुप्रभात !"

सहकारी  - "आजचा  आपला  विषय आहे  - ते दोन तास !"

मी - " लहानपणी शाळेत असताना रेल्वे प्लॅटफॉर्मवर अर्धा तास ह्या विषयावर निबंध लिहिण्याची सवय वगळता मला असल्या विषयावर बोलायची अथवा लिहायची सवय नाही ! आणि  मला अभ्यासानं व्यापून टाकल्यानं क्रिकेटर बनता आलं नाही  अन्यथा वकार आणि अक्रमसमोर दोन तास  असं मी नक्कीच लिहू शकलो असतो "

अतिगंभीर - " म्हणजे त्यांच्यासमोर दोन तास टिकला असता असं म्हणायचं आहे का तुम्हांला ? चांगला आत्मविश्वास आहे तुमचा "  

सहकारी  - "आपण जरा मुद्द्याकडे वळूयात का ? तर विषय असा आहे की  एके दिवशी सकाळी अचानक तुम्हांला  ह्या पृथ्वीचा पुढील दोन तासांनंतर  सर्वनाश होणार आहे असं सांगण्यात आलं , तर तुम्ही ते दोन तास कसे  घालवाल , त्यात काय काय कराल? तुम्हांला विचार करण्यासाठी म्हणून आम्ही काही वेळ देत आहोत ! आपण सायंकाळी चार वाजता भेटूयात !"

सायंकाळी चार वाजता - 

अतिगंभीर आणि सहकारी - "शुभ दुपार , संध्याकाळ !"

मी (त्रासिक मुद्रेने ) - "ठीक आहे, ठीक आहे

अतिगंभीर - "तुम्ही  इतके  त्रस्त का दिसत  आहात ? विचार करुन त्रास झाला का?"

मी (वैतागून ) -  "अहो त्या विचारांपेक्षा झोप न झाल्यानं त्रास झालाय !" 

सहकारी  - "आपल्याला झालेल्या तसदीबद्दल आम्ही खरोखर तुमची माफी मागू  इच्छितो . आपण हे थोडक्यात आटपुयात ! तर तुम्हांला  नक्की काय वाटतंय !"

मी (उत्साहानं पुढ्यातील कागद वाचत ) - 

१. "आमच्या  इथं नाक्यावर एक मस्त केकचे नवीन दुकान निघालं  आहे . काय एकाहून एक मस्त  केक ठेवलेले असतात डिस्प्ले ला ! पण खूप महागडा आहे तो ! ही बातमी जाहीर झाली रे झाली की मी त्याच्याकडे धावत जाणार आणि सांगणार  - अरे मित्रा , आता काय सर्वच नाश पावणार आहे ! तर आपण दोघे मिळून हे सर्व केक खाउयात ! "

सहकारीच्या चेहऱ्यावर काय हा बालिश विचार आहे ह्यांचा हे भाव स्पष्ट दिसत होते.  तुम्हांला दुसरा कोणी मिळाला नाही का ह्या प्रकारच्या भावानं तिनं अतिगंभीरकडे पाहिलं. त्यामुळं विचलित न होता मी माझे वाचन पुढे सुरु ठेवले. 

२."आयुष्यात मी काही जणांशी चुकीचं वागलो,  काहींना काही सांगायचं राहून गेलं. ते ह्या दोन तासांत सांगण्याचा प्रयत्न  करीन "

सहकारी  (तिचे डोळे चकाकले होते) - "मग हे आत्ताच का नाही सांगायचं ?"

मी - "त्यानंतरचे परिणाम दोन तासांपलीकडं पेलण्याची कदाचित  ताकत माझ्यात नाही म्हणून !" 

सहकारी - "यादी तयार आहे ?"

मी - "नाही, त्यावेळेला जे आठवणार त्यांनाच "

३. "पुढे अब्जावधी वर्षानंतर पृथ्वीवर अथवा ह्या विश्वात नवीन जीवसृष्टी येईल. त्यांना संदर्भ म्हणून शेवटच्या दोन तासांत पृथ्वीवरील सोशल मीडिया, टीव्हीवरील बातम्यांच्या वाहिन्या ह्यावर कसा धुमाकूळ घातला गेला  ह्याविषयी माझ्या क्षमतेनुसार नोंद ठेवीन ! 

अतिगंभीर - "विचारात घेण्यासारखी बाब आहे"

४. "जगातील महत्वाच्या माणसांना उद्देशून माझ्या फेसबुक वॉलवर संदेश लिहीन"

अतिगंभीर - "म्हणजे चीनचे अध्यक्ष माहिती आहेत, पण अजून कोणाला ?"

मी (त्याला लूक देत ) - " त्यांच्या व्यतिरिक्त डोनाल्ड ट्रम्प, विराट कोहली "

सहकारी - "अय्या , विराटला काय मेसेज देणार तुम्ही ?"

मी - "म्हणजे सांगण्यासारखं खूप आहे पण पाकिस्तानविरुद्ध पांड्याला का घेतला ह्याचा जबाब विचारीन !"

सहकारी (निराशेनं ) - "हम्म "

अतिगंभीर आणि सहकारी - "अजून काही?"

मी - "सध्या तरी इतकेच सुचतंय ! "

अतिगंभीर आणि सहकारी - "आपल्या अमूल्य वेळेबद्दल खूप खूप आभार ! आम्ही निघतो आता"

मी - "आभार कसले त्यात, येत जा असे अधूनमधून वेळ घालवायला. फक्त माझ्यावर एक कृपा करा "

अतिगंभीर आणि सहकारी (उत्साहानं ) - "कोणती ?"

मी - "त्या नाक्यावरील केकवाल्याला ह्यातलं काही सांगू नका !" 

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

गहरा पानी


स्वस्वीकृत मानसिकता 

९ वर्षांपुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मी एक आदर्शवादी मनोधारणा बाळगुन होतो. ब्लॉग लिहुन कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी ही मनोधारणा होती. कदाचित त्यावेळी माझा समाजात वावर कमी होता. तसा तो आताही कमीच आहे. परंतु जो काही वाढला त्यावरुन एक गोष्ट उमजुन आली. लोकांची मानसिकता बदलणं ब्लॉगद्वारे साध्य होणं शक्य नाही. ही मानसिकता कशानं बदलु शकते हे ज्याला कोणाला समजलं तो धन्य ! अर्थात मानसिकता बदलायची गरज आहे तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे. पुर्वी संस्कृती टिकविण्यासाठी  धडपड करण्याची जी मानसिकता होती तिचं प्रथम आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या मानसिकतेत परिवर्तन झालं. आर्थिक स्थैर्य हा काहीसा दुय्यम मुद्दा झाल्यावर सध्या काहीशी स्वस्वीकृत मानसिकता झाली आहे. मला समाजाकडुन ठराविक वेळानं काहीतरी acceptance मिळायला हवं अशी ही स्वस्वीकृत मानसिकता ! ह्या स्वस्वीकृत मानसिकतेच्या पल्याड अनेक मंडळी आहेत, ज्यांना अशा वारंवारच्या स्वीकृतीची गरज भासत नाही. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा?

उच्चवर्गात समाविष्ट होण्याची मानसिकता  

आपल्या देशात आपण घराबाहेर पडलो की आपल्याला प्रचंड गर्दीचा मुकाबला करावा लागतो. ह्या गर्दीमुळं आपल्या मनात अदृश्य तणाव निर्माण होतो. आपण ऑफिसात, शाळाकॉलेजात वेळेवर पोहोचु की नाही हा निर्माण होणारा तणाव एका पातळीवरचा! परंतु ह्या गर्दीमुळं निर्माण होणारा दुसरा तणाव म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला ह्या सर्वांशी मुकाबला करावा लागणार ही काहीशी छुपी भावना आपल्या मनात निर्माण होते. ह्या सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं आपण स्वतः आणि आपल्या कुटूंबियांनी येनकेनप्रकारे जावं अशी जिद्द आपण नकळत मनात बाळगु लागतो.
ह्यातही बराच वर्ग असा असतो जो गर्दीपासुन वेगळा राहण्यासाठी म्हणुन शांत गावांची निवड करतो, एक अनुभवसमृद्ध जीवन जगतो. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा? 

आता सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं जाण्याचे काही मार्ग म्हणजे राजकारणी , उद्योगपती बनणे, अभ्यासाद्वारे प्रगती करणे वगैरे वगैरे. ह्यातील पहिल्या दोन मार्गांशी माझा बादरायण संबंध नाही. तिसऱ्याशी काही प्रमाणात असावा. परत एकदा आपल्याला भोवताली दिसणाऱ्या गर्दीचा आणि अभ्यासाद्वारे पुढे जाऊ पाहणाऱ्या आपल्या मानसिकतेचा काही संबंध आहे का हे आपण पाहुयात! 
हल्ली शिक्षणक्षेत्रात competition खुप वाढली आहे हे मराठी माणसाच्या आवडीच्या आघाडीच्या वाक्यांपैकी एक असावं. आजच्या पोस्टला गाभा वगैरे नाही. ही मिसळपाव पोस्ट आहे. तरीही जर काही गाभा असला तो हा इथं पुढच्या परिच्छेदात आहे.
काही दिवसांपुर्वी मी बारावीचे Integrated क्लास घेणाऱ्या एका आघाडीच्या संस्थेच्या शाखाप्रमुखाला भेटलो. त्यानं काही महत्वाची वाक्यं मला सांगितली. 

१) खोलवर पाण्यात जाऊन कोणी बुडत नाही, उथळ पाण्यातच बहुतेक जण बुडतात. IIT Advanced परीक्षेचे विश्लेषण करणारी जी संस्था आहे तिच्या विश्लेषणानुसार त्या परीक्षेतील ५० -६० % टक्के भाग तुम्हांला वर्षभराच्या नियमित सरावाच्या आधारे सहजरित्या सोडविता यायला हवा. असं असलं तरी मोजक्या विद्यार्थ्यांनाच ह्या परीक्षेत ५० -६० % आणि त्यावर टक्के मिळविता येतात. तो म्हणाला कारण सोपं आहे, बहुतांशी मुलं सोप्या प्रश्नांच्या उत्तरातच चुका करतात

२) आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे सोपा आणि कठीण प्रश्न कोणता हे आपल्याला ओळखता यायला हवं ! कठीण प्रश्न ओळखुन अशा परीक्षांमध्ये त्या प्रश्नांपासुन दूर राहता यायला हवं हे आम्ही मुलांना शिकवतो असे तो म्हणाला! 

३) मुलांनी परीक्षेत भावनाविरहित स्थितीत राहणं शिकावं असं तो म्हणाला. सोपा प्रश्न दिसला आणि आपण अगदी उत्साहित झालो की चुका होण्याची शक्यता वाढीस लागते त्यामुळं भावनाविरहित स्थिती महत्त्वाची !
आता गर्दीच्या / Competition च्या  मुद्द्याशी आणि वरील ३ मुद्द्यांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करुयात. वरील ३ मुद्दे हे हल्ली काही प्रमाणात दुर्मिळ होत चाललेल्या स्थिर मानसिकतेशी निगडीत आहेत. तुमची Competition बाहेरील वाढलेल्या लोकसंख्येशी अजिबात नाही, ती आहे तुमचं मन स्थिर ठेवण्याच्या तुमच्या क्षमतेला अबाधित ठेवण्याशी !
हा मुद्दा मला केवळ शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जाणवतो. तुमच्या व्यावसायिक कौशल्यांच्या इतकीच तुमची नियमितता, स्मरणशक्ती, लोकांशी व्यवस्थित बोलण्याची कला, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन देण्याची संधी उपलब्ध करुन देणं ह्या सर्व घटकांवर तुमचं यश अवलंबुन असतं. हे सर्व घटक तुम्हांला कुठून मिळतात, तर लहानपणी तुमच्यावर झालेल्या संस्कारांतुन ! तर मुलांना योग्य बोर्डातून, कॉलेजातुन शिक्षण देण्यासोबत संस्कार द्यायला विसरु नका !



बऱ्याच वेळा होतं त्याप्रमाणं पोस्टचा आणि फोटोचा संबंध नाही !!


शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८

आदिम वसाहत!



पृथ्वीवरील काही ठराविक मानवांना बाह्य जगतातील घटनांपासून आणि विकासापासून पुर्णपणे विभक्त केलं तर त्यांच्या आयुष्यातील घटनांचा क्रम कसा आहे असेल हा विचार माझ्या मनात सध्या घोळत आहे. हा विचार येण्याचे कारण काय तर तंत्रज्ञान मनुष्याला आपल्या मुळ स्वरुपापासून खुप दूर नेत आहे. त्यामुळे आपल्या मुळ स्वरुपात असलेली आपली काही विशिष्ट वैशिष्टयं आपण गमावुन बसत आहोत. समजा मनुष्यजातीवर बाह्य शक्तीने आक्रमण केलं तर अशा गुणधर्मांची आपल्याला कमतरता भासू शकते. अशा वेळी जर आपणाकडे काही माणसं अशी असतील ज्यांनी आपले मनुष्यजातीचे मूळ गुणधर्म कायम ठेवले आहेत तर अशी माणसे आपल्याला परशक्तींच्या आक्रमणाच्या वेळी वापरता येऊ शकतील.  आता हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल! त्याचे उत्तर सुद्धा माझ्याकडे आहे. हे संपुर्ण काल्पनिक प्रकरण असुन ह्यात मानवी हक्काचं उल्लंघन होत आहे. परंतु काल्पनिक प्रकरणामुळं माझ्यावर त्याची जबाबदारी नाही. 

एक असा असा विस्तृत निर्मनुष्य प्रदेश ज्याचं क्षेत्रफळ लाखो चौरस मैल असेल तो या प्रकल्पासाठी ताब्यात घ्यायचा. ह्या प्रदेशाभोवती अजुन काही भाग बफर म्हणुन घोषित करायचा. अशाप्रकारे ह्या भागाभोवती दुपदरी कुंपण असणार आणि त्याची सुरक्षितता मानवाला शक्य असेल तितकी कडेकोट असणार. ह्या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी जगभरातुन अंदाजे दीडहजार माणसे निवडली जाणार. आयुष्यभरात परत बाकीच्या माणसांशी संपर्क न साधण्याची अट त्यांच्याकडुन मान्य करुन घेतली जाणार. ह्या माणसांची निवड करताना त्यांचं मनोबल अत्यंत कणखर असणार ह्याची खात्री करुन घेतली जाणार. ह्या समुहात जगातील बहुतांशी देशांना, सर्व पेशांच्या लोकांना प्रतिनिधित्व दिलं जाणार.  ह्या  लोकांनी आपले धर्म बाजूला ठेवावेत ही अट घातली जाणार. उर्वरित पृथ्वीवरील लोक ह्या लोकांशी संपर्क साधण्याचा अजिबात प्रयत्न करणार नाहीत आणि ह्यातील कोणाही मानवानं बाह्यजगताशी संपर्क साधु नये ह्याचं कडेकोट पालन केलं जाईल. ह्या प्रदेशात ना दूरचित्रवाणीचे, मोबाईलचे  सिग्नल पोहोचू दिले जाणार ना ही वसाहत मानवी उपग्रहांच्या नजरेखाली असणार !

ह्या प्रदेशात जागोजागी पाण्याची तळी बनवुन दिलेली असणार. वन्य प्राण्यांना एका केंद्रीय जागी सुरुवातीला बंदिस्त केलं असणार. ज्यावेळी तुम्ही सज्ज व्हाल त्यावेळी ह्या प्राण्यांना मुक्त करा असा आदेश ह्या मानवांना वसाहतीत प्रवेश करतेवेळी दिला जाणार! ह्या लोकांसोबत विविध अन्नधान्यांची, फळझाडाची बियाणी दिली जाणार. त्यांच्यासोबत दुधासाठी गाई सुद्धा द्यायच्या. सुरुवातीच्या वीस वर्षात आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न करणार नाही हे कायद्यानं ह्या वसाहतीमध्ये शिरणाऱ्या प्रत्येकाला मान्य करावं लागणार!

ह्या दीड हजार लोकांचा ह्या आदिम वसाहतीत प्रवेश करण्याचा दिवस फारच भावनाविवश करणारा असणार. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे सर्व नातेवाईक ह्या आदिम वसाहतीच्या प्रवेशद्वाराशी गर्दी करणार. प्रवेश करताना फक्त कपड्यांच्या दोन जोड्यांसहित ह्या सर्वांना आत शिरावं लागणार. बाकीचे सर्व भावबंध सोडुन द्यावे लागणार. काही जण आपल्यासोबत आपल्या चिमुरड्या लेकरांना सुद्धा घेऊन येणार! त्या लेकरांचे आजी आजोबा आपल्या आसवांनी भुमातेला ओलेचिंब करणार !

मानसिकदृष्ट्या कितीही कणखर असले तरी सुरुवातीचा काही काळ हे लोक गोंधळून जातील. त्यांना बाह्य जगताची खुप खुप आठवण येईल इंटरनेटच्या माध्यमातून सर्व जगाशी संपर्क साधण्याची साधने तुटल्यामुळे ते एकदम उदासीनसुद्धा होऊ शकतात.  पण आपल्या कणखर मानसिकतेच्या आधारे ही लोकं फार काळ उदास राहणार नाहीत हे मी गृहीत धरीत आहे. हा सुरुवातीचा संभ्रमाचा काळ संपला की मग हे लोक आपला एक नवीन विश्व बसवायला सुरुवात करतील. तळ्याभोवती हळूहळू हिरव्या वृक्षांची झाडी निर्माण होण्यास सुरुवात होईल. या गटांमधील असणारे अभियंते उपलब्ध नैसर्गिक पद्धतीच्या साधनाने आपली घरकुलं बनवण्याचा प्रयत्न सुरु करतील. हा संपुर्ण प्रभाग हा मानवी उपग्रहांच्या कक्षेपासून वेगळा तोडला गेला असल्यानं इथं काय होत आहे हे कोणालाही बाहेरुन पाहता येणार नाही. जसजसा हिरवागार प्रदेश वाढत जाईल तसतसे तिथे वनस्पतींची विविधता वाढत जाईल. आणि एका क्षणी वन्य प्राणी मुक्त केले जातील. 

साधारणतः पन्नास-साठ वर्षे अशीच निघुन जातील. ह्या गटातील कोण ह्या समुहाचा ताबा घेईल ह्यावर शक्य असलेल्या अनेक शक्यतांपैकी कोणती निवडली जाते हे अवलंबुन राहील. तिथं जन्मलेल्या नवीन पिढीला बाह्य जगताशी काहीच माहिती नसेल. एखादा प्रसंग मग असाही येईल, घनदाट जंगलातून सूर्याची किरणे कसाबसा आपला मार्ग काढत जमिनीपर्यंत पोहोचली असतील. तिथं खडकाळ प्रदेशातून वाहणाऱ्या पाण्यावर एखादा हिंस्त्र पशु आपली तहान भागवण्यासाठी आला असेल आणि त्याच्या आसपास असलेल्या घरातून एखादा विशी - तिशीतला युवक त्याच्याकडे कुतूहलाने पाहत असेल. आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे एकदा का अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा मानवाच्या या समूहाने भागवल्या की मग त्यांचा मेंदू कार्यरत होईल. मानवजातीने जो उत्क्रांतीचा टप्पा गेल्या सहस्त्र वर्षात पार पडला तो वेगाने पार पाडण्याचा प्रयत्न हे सर्व सुरू करतील. परंतु त्यांना बाह्य जगतापासून पूर्णपणे तोडल्यामुळे त्यांच्या प्रगतीवर अनेक बंधने येतील. 

मग ते उपलब्ध एका शक्यतेनुसार हे सर्वजण निसर्गाच्या सानिध्यात आनंदाचा परमोच्च क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करतील. हवेचे शुद्धतेचे प्रमाण कमाल असेल. रात्रीच्या आकाशातील चांदण्यांचे सौंदर्य त्या लोकांना अगदी मनसोक्त लुटता येईल. 

मी माझी कल्पनाशक्ती इथंच आवरती घेतोय! जाता जाता एक प्रश्न तुम्हांला! खरोखरच अशी वसाहत उभारायचं ठरवलं आणि त्यात तुमची तुमच्या कुटुंबियांसोबत निवड झाली तर व्हाल तयार आत जायला?

शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८

चंद्रवसाहत - भाग १!



सन - २०८८
स्थळ - चंद्र (पृथ्वीचा)
बैठक विषय - चंद्रावरील वसाहतीचे नियम ठरविणे 

सभासदांपुढे चर्चेसाठी आलेले विषय 
१) पृथ्वीवरील देशांची संरचना चंद्रावर देखील शाबुत ठेवायची की देशविरहित संरचना पाळायची ?
२) चंद्रावरील एक दिवस सुमारे २८ पृथ्वीदिवसाइतका असल्यानं मनुष्याच्या शरीरात होणाऱ्या बदलांचे मापन कसे करायचे? साप्ताहिक सुट्टी घ्यायची कधी?
३) चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या १/६ पट असल्यानं, स्थुल व्यक्तीची व्याख्या बदलायची का?
४) पृथ्वीवरील गुन्हेगार चंद्रावर पळाला तर त्याचे गुन्हे कायम राहतील का?
५) माणसाची मंगळावर सुद्धा वसाहत होणार आहे. पृथ्वी आणि मंगळ हे सुर्याचे थेट उपग्रह तर चंद्र पृथ्वीचा उपग्रह - त्यामुळं चंद्रावरील माणसांना दुय्यम वागणुक तर मिळणार नाही ना?
६) पृथ्वीवरील खेळातील सर्व नियम, विक्रम चंद्रावर कोणत्या रुपात लागु होणार?
७) चंद्रवाल्यांचे WhatsApp, FB वेगळं असायला हवं. 
८) पृथ्वीवरील विविध चलने आणि चंद्रीय चलन ह्याचा विनिमय दर किती राहणार?

बैठक सुरु असताना अचानक जोशी धावत धावत (उडत उडत ) आत आले आणि त्यांनी एक कागद बैठकीच्या अध्यक्षांकडे दिला. अध्यक्ष अगदी प्रभावित झाले आणि त्यांनी त्या कागदावरील मुद्द्यांचे वाचन सुरु केले. 

१) तोच चंद्रमा नभात , मधु इथे अन चंद्र तिथे ह्यासारख्या असंख्य गाण्यात चंद्राचा उल्लेख आहे. सरसकट ही सर्व गाणी बदलुन त्यात पृथ्वीचा उल्लेख करणे कितपत योग्य राहील? आणि योग्य असलेल्या गाण्यांचे पुनर्लेखन करण्याची जबाबदारी कोणाची? पृथ्वीवरील कवींनी भविष्यवादी उदार दृष्टिकोन का स्वीकारला नाही?

२) प्रेयसीच्या चेहऱ्याला 'ये पृथ्वीसा चेहरा' बोलल्यास होणाऱ्या परिणामाची जबाबदारी कोणाची?

२) साळगावकर चंद्रवासीयांसाठी नवीन कालनिर्णय कधी प्रसिद्ध करणार ? संकष्टीचे काय?

३) ईद कशी साजरी होणार? 

४) चंद्र पृथ्वीवरील आकाशात जितका मोठा दिसतो त्यापेक्षा पृथ्वी चंद्रावरील आकाशात चौपट मोठी दिसते. हा दुजाभाव का?

५) पुण्याच्या लोकांना आपली संस्कृती कायम ठेवता यावी म्हणून चंद्रावर वेगळी जागा कधी मिळणार?

६) पृथ्वीवरील पुरुष आणि चंद्रावरील स्त्री (किंवा vice-versa) ह्यांनी लग्न केल्यास त्याला अंतरग्रहीय लग्न म्हणणार का? चंद्रावरील स्त्रीला पृथ्वीवर सून म्हणुन दुय्यम वागणुक मिळेल का?  

अध्यक्ष काहीसे संभ्रमात पडले होते. "ह्या सर्व प्रश्नांची उकल  आताच करणे शक्य होणार  नाही. मी  ही सभा  आता स्थगित करत आहे. पुढील बैठकीत ह्या प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली जाईल!!""

(तळटीप - चांगले मुद्दे सुचल्यास , वाचकांनी सुचवल्यास दुसरा भाग लिहिला जाईल , अन्यथा नाही  - आदित्य  (जोशी नव्हे !!)

शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

बुद्धिभेद


हल्ली सर्वसामान्य लोकांचे लिहिण्याचे प्रमाण वाढले आहे. ह्यात माझाही समावेश आहे. विषय बर्याच वेळा भ्रष्टाचार, स्त्रियांवरील अत्याचार, प्रदूषण, लग्नातील नातेसंबंध ह्याविषयी फिरताना आढळतात. पण प्रत्यक्ष कृती शून्य! क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे!
त्याचप्रमाणे वर्तमानपत्रातील विषय हे राज्य, राष्ट्रीय, जागतिक पातळीऐवजी ह्या विषयांभोवतीच घुटमळताना दिसतात. वर्तमानपत्र आणि केबल वाहिन्या ह्यांवरील ह्या समस्यांचे चित्रण थोड्या थोड्या कालावधीने फिरत असते. एक महिना भ्रष्टाचार मग प्रदूषण मग स्त्रियांवरील अत्याचार असे हे चक्र फिरत असते. त्यात आपण मध्यमवर्गीय गुरफटून जातो पुन्हा नवीन विषयाकडे आपले लक्ष वेधले जाते. मूळ समस्या तशाच राहतात. कोणीतरी चाणक्य बसला आहे तिथे आपला बुद्धिभेद करायला

मनुष्यवस्तीलायक नवीन ग्रह - काय वाटेल ते!



समजा मानवजातीला वास्तव्य करण्यायोग्य नवीन ग्रह सापडला तर? ह्यात काही गोष्टींचा विचार करावा लागेल. १> पृथ्वीपासून त्या ग्रहाचे प्रकाशवर्षे अंतर. समजा तो ग्रह २० - ३० प्रकाशवर्षे अंतरावर आहे (ही शक्यता कमी कारण असे असते तर हा ग्रह आतापर्यंत सापडला असता). तरी सुद्धा २०-३० प्रकाशवर्षे अंतरावरील ग्रहावर पाठवायला लोकांची निवड प्रक्रिया घेण्यात आली असती. कारण यानांची संख्या मर्यादित असेल. आता प्रश्न असा येईल की केवळ आपण बुद्धिमान लोकांचीच निवड करू का? आता ह्या निवडप्रक्रियेचे निकष ठरविणे हा फार संवेदनशील मुद्दा बनू शकतो. राष्ट्र, खंड, धर्म, विविध क्षेत्र ह्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील माणसे निवडावी लागतील. आणि जरी यानाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी २०-३० वर्षाच्या प्रवासाचा ह्या लोकांवर काय परिणाम होईल? बहुदा आपल्यास १० - २० वर्षे वयोगटातील मुलेच पाठवावी लागतील. त्यांना त्यांच्या प्रवासात शिक्षणाची सोय करून द्यावी लागेल. माझ्या मते १ -२ वर्षांच्या फरकाने अशी अनेक याने पाठवावी लागतील आणि मध्ये अंतराळ स्थानके उभारावी लागतील. जिथे हे प्रवासी लोक विश्रांती घेतील. २> हा नवीन ग्रह किती मोठा असेल? बहुदा पृथ्वीच्या १० -२० पट मोठा असलेला बरा! मग तिथल्या मालमत्तेचे वाटप कसे होईल? नक्कीच जे पहिले प्रवासी जातील त्यांना आपल्या मालकीहक्काच्या जागेवर खांब ठोकण्यास परवानगी असावी. जर अशी निवडप्रक्रियेसाठी जाहिरात आली तर त्यात सहभागी व्हायची माझी मनोमन इच्छा असेल. परंतु माझा मुलगा तिथे आला नाही तर? मग तिथल्या मालमत्तेचा वारसाहक्क कोणाला? ३> त्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वीच्या कितीपट असेल हा ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तिथले हवामान कसे असावे? आपल्याकडे पर्याय असेल तर कॅलिफोर्नियाच्या हवामानासारखे असावे. तिथे सर्व क्षेत्रातील माणसे न्यावी लागतील, रस्ते बांधावे लागतील, शेती करावी लागेल, इस्पितळे लागतील आणि शाळासुद्धा उभाराव्या लागतील. परंतु ह्या सर्व क्षेत्रातील ज्ञान जसेच्या तसे अमलात आणता येणार नाही, तिथले भौतिक / रसायन / स्थापत्य / जीव / वैद्यकीय क्षेत्रातील नियम आपल्यापेक्षा वेगळे असतील. मग पृथ्वी आणि त्या नवी ग्रहावरील ह्या क्षेत्रातील नियमांची तुलना करणारे नवीन तज्ञ उदयास येतील. तिथे नवीन प्रकारचे संगीत उदयास येईल. त्या ग्रहावरील आणि पृथ्वीवरील संवादासाठी अधिक विकसित इंटरनेट बनवावे लागेल. तिथला पुरुष आणि पृथ्वीवरील स्त्री प्रेमात पडल्यास धमाल येईल! प्रेमभंग झाल्यास गाण्यासाठी 'तेरी दुनिया से हो के मजबूर में चला, में बहुत दूर चला' हे गाणे खूप मागणीत येईल! ४> काही काळाने पृथ्वी आणि त्या ग्रहात क्रीडा सामने सुरु होतील. परंतु गुरुत्वाकर्षण वेगवेगळे असल्याने पाहुणा संघास अडचणी येतील. ह्या ग्रहाचे नाव काय ठेवावे ह्यावर बरीच चर्चा होईल! ५> थोडे दिवसांनी तिथे स्थानिक आणि परग्रहीय असा संघर्ष सुरु होईल. काय सांगावे युद्ध सुद्धा होईल. असो थांबतो इथे! परंतु ही एकदमच वेडगळ कल्पना म्हणून सोडून देवू नका. येत्या १००-२०० किंवा ५००-१००० वर्षात हे असे काही होणार आहे. आणि त्या साठी तयारी करणे हे अखिल मानवजातीचे कर्तव्य आहे.  

शॉर्ट्स गाथा

बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत.  त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती ...