मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

आर्या




एकेकाळी स्वतःच्या व्यक्तिमत्वात, विचारसरणीत जे काही बदल कदापि होऊ शकणार नाहीत असं आपल्याला वाटत असतं ते कालांतरानं घडून येतात. हा आपल्या मूळ विचारसरणीचा पराभव समजून दुःखी व्हायचं की काळानुसार आपल्यात बदल घडवून आणल्याबद्दल आनंद मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न! ही प्रस्तावना आर्या ह्या वेब मालिकेचे पहिल्या आणि दुसऱ्या मोसमाचे भाग ज्या झपाट्यानं मी गेल्या चार दिवसांत संपवत आणले आहेत त्या संदर्भात ! Binge Watch हा शब्दप्रयोग साधारणतः एका बैठकीत एखाद्या मालिकेच्या सर्व भागांचा फडशा पाडणे ह्या घटनेसाठी वापरला जात असावा. त्यामुळं माझं हे शब्दशः Binge Watch म्हणता येणार नाही. मी एखाद्या मालिकेमुळे इतका झपाटला जाऊ शकतो हा कधीकाळी मला वाटणाऱ्या माझ्या संयमित मनाचा पराभव मानावा का हा विचार करण्याच्या पलीकडं मी सध्या आहे. 

एका मोठ्या कुटुंबातील नातेसंबंध हळुवार उलगडणारी एक मालिका हे ह्या कथेचा मूळ गाभा ! पिझाचा बेस म्हणावं तसं ! मग त्यावर एकेक थर येत राहतात. हे साधंसुधं कुटुंब नाही, तर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारे कुटुंब. पैशामुळं नातेसंबंधातील बंध बदलत जातात. ह्या मालिकेतील पैसा हा वैध मार्गानं कमावलेला पैसा नसुन तो एका वैध व्यवसायाच्या मागे दडलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीतून मिळवलेला आहे. हे क्षेत्र मुळातच गुन्हेगारी आणि त्यामुळं ह्या कुटुंबांच्या कर्त्या लोकांचे गुन्हेगारी विश्वाशी आणि पोलिसांशी सदैव संबंध येत राहतात. प्रचंड पैसा जिथं गुंतलेला असतो तिथं सर्वोच्च पदावरील व्यक्तीला कठोर निर्णय घ्यावेच लागतात. ह्या व्यवसायाच्या क्रूर रुपामुळं इथले कठोर निर्णय  आपल्या निर्णयांच्या आड येणाऱ्या व्यक्तीच्या हत्येपर्यंत सातत्यानं पोहोचत राहतात; मग ती व्यक्ती आपली अगदी जवळची नातलग का असेना ! 

नातेसंबंध, श्रीमंती, अवैध धंदा ह्यानंतर कथेचा मुख्य रंग आपल्यासमोर येतो तो म्हणजे आपल्या तीन मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी एका आईचा संघर्ष ! बाहेरच्या विश्वात अगदी निष्ठुरपणे वागणारी सुश्मिता शेवटी आपल्या पिल्लांना बाहेरच्या जगापासून वाचवू पाहणारी एक माताच आहे हे विविध प्रसंगातून जाणवत राहते. सुश्मिताच्या बाबतीत एकामागून एक ज्या भयंकर घटनांची मालिका घडत राहते त्यामागं बऱ्याच वेळा असतात ती तिची नातलग मंडळीच आणि त्यात बहुतांश वेळा तिचे जन्मदाते वडीलच. आर्या आपल्यासोबत आपल्या ह्या व्यवसायातच असावी ह्या वेड्या अट्टाहासापायी कोणत्याही थराला जाऊ शकणारे तिचे वडील ! 

वेब मालिका असल्यानं इथं सेन्सॉर बोर्डाचं नेहमीप्रमाणं नियंत्रण नाही. त्यामुळं अमली पदार्थ सेवन, शारीरिक जवळीक, शिव्या हे सारं काही कुठंही फारशी कात्री न लावता दाखवलं जातं. खरोखर वास्तववादी वाटत राहते. सुरुवातीला फारसं  न जाणवलेल्या  ह्या मुद्द्याचं गांभीर्य जसजसे पुढील भाग पाहत गेलो तसतसं मला प्रकर्षानं जाणवत गेलं. बहुतांशी पंधरा - सोळा वर्षांच्या मुलांना सुद्धा ही किंवा अशा तत्सम मालिका, चित्रपट पाहण्याचं स्वातंत्र्य आज आहे. त्यांच्यावर ह्या मालिकांच्या कथानकाद्वारे आणि अगदी वास्तववादी चित्रीकरणामुळं कोणता परिणाम होणार आहे ह्याचा विचार करुन अंगावर काटा येतो. 

पहिल्या मोसमात जी काही गूढता सर्व भागांत टिकवून राहते त्याचं नावीन्य दुसऱ्या मोसमात काहीसं नाहीसे होत जातेय. कदाचित ह्या मालिकेतील विविध व्यक्तिरेखांना हळूहळू आपण चांगले जाणू लागतो आणि त्यांनतर ह्यातील कोणत्या घटनांना कोण जबाबदार असू शकतील ह्याचे बऱ्यापैकी अचूक आडाखे आपण बांधू शकतो. म्हणायला गेलं तर व्यक्तिरेखांच्या सातत्यपूर्ण चित्रीकरणाबद्दल ह्या मालिकाकारांना दिलेली ही दाद आहे पण त्याचवेळी मालिका काहीशी साचेबंद होण्याकडे झुकते. 

मालिकेतील एका श्रीमंत कुटुंबातील वातावरण कसं असू शकते ह्याचं ज्या प्रकारे चित्रीकरण करण्यात आले आहे त्याला खरोखरच मनापासून दाद द्यावीशी वाटते. वयात येणाऱ्या मुलांना पालकांची किती गरज आहे हा ही मुद्दा इथं अप्रत्यक्षरीत्या जाणवत राहतो.बऱ्याच वेळा होतं काय की वयात येणाऱ्या मुलांची एकाच पालकांसोबत जास्त भावनिक गुंतवणूक असते. दुर्दैवानं जर नेमका तोच काळाच्या पडद्यामागं गेला तर मग दुसऱ्याची होणारी घालमेल शब्दांच्या पलीकडील ! 

कदाचित पुढील दोन तीन दिवसांत दुसऱ्या मोसमाचे सर्व भाग पाहून होतील! तीनशे कोटींचा ह्या मालिकेतील संदर्भ आणि त्या अनुषंगानं केलेलं चित्रीकरण खरोखर मनाला पटतात. पण उगाचच तीनशे कोटींचा संदर्भ ओढूनताणून  आणलेली मराठी मालिका सुद्धा आठवत राहते! एका वास्तववादी मालिकेबद्दल निर्मात्यांचे अभिनंदन पण  त्याचबरोबर वेब मालिकांद्वारे जे काही कोणत्याही बंधनांशिवाय आपल्या मुलांना उपलब्ध करुन दिले जात आहे त्याविषयी मनात उठलेली चिंतेची लहर अशा संमिश्र भावनेनं ह्या पोस्टची सांगता करत आहे ! 

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

अतरंगी रे !


हा चित्रपट पाहण्याआधी एक वैधानिक इशारा मी आपणास देऊ इच्छितो.  आपण जर पेशानं डॉक्टर असाल किंवा आपण सध्या वैद्यकीय उपचार घेत असाल तर हा चित्रपट पाहण्याचं धारिष्ट्य करु नये. एक डॉक्टर म्हणून तुमचा स्वतःचा आत्मविश्वास किंवा एक पेशंट म्हणून तुमच्या डॉक्टरवरील तुमचा विश्वास तुम्ही मोठ्या प्रमाणात गमावू शकता! 

मला वारंवार भयावह स्वप्नं पडतात. ह्या स्वप्नांवर आपलं नियंत्रण नसलं तरी मेंदू कुठंतरी त्यावर लक्ष ठेऊन असतो. म्हणजे मोकळ्या पठारावर वाघ माझा पाठलाग करत असेल तर मेंदू स्वप्न सुरु ठेवून देतो. पण समजा पळता पळता समोर विहीर आली तर मेंदू मला जाग आणतो. हा चित्रपट म्हणजे मोकळ्या पठारावर वाघानं पाठलाग सुरु ठेवण्यासारखा होता. भयावह होता पण इतकाही नाही की चित्रपट पूर्ण बंद करावा. 

चित्रपट पाहिला तो डिस्नी हॉटस्टार सबस्क्रिप्शनवर ! गेल्या महिनाभर जिओचे इंटरनेट आणि केबल घेतलं आहे. इंटरनेटचा स्पीड खूप जलद आणि केबलवरील विविध पर्यायांची उपलब्धता मुबलक आहे. पण केबल वापरण्याचं एक वेगळं तंत्र आहे. ते आत्मसात करता यायला हवं. कोणत्याही चॅनेलला नंबर नाही. ते चॅनेल ज्या प्रकारात मोडतं त्या प्रकारात जाऊन ते निवडायचं किंवा त्या चॅनेलचे नाव बोलून सांगायचं. हे म्हणजे घरी भाजीत मीठ जास्त पडलंय हे सांगायचं असेल तर आधी आहार - प्रतिक्रिया - भोजन - भाजी क्रमांक १ - मीठ जास्त अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं झालं. त्यानंतर चपात्या सुरेख झाल्या आहेत हे सांगायचं असेल तर दोन वेळा back दाबून  आहार - प्रतिक्रिया - भोजन  पर्यंत पोहोचून चपात्या हा पर्याय निवडायचा आणि मग सुरेख म्हणायचं असं झालं. 

असो ! डिस्नी हॉटस्टारवर चित्रपट पाहिल्याने केवळ वेळ वाया गेल्याचं दुःख आणि दोन मराठी मालिकांपासून मुक्तता मिळाल्याचा आनंद ! आपण एखादा चित्रपट पाहताना सारासार विचाराची पातळी किती टक्क्यांवर ठेवली असा मी चित्रपट संपल्यावर विचार करतो. ह्या चित्रपटानंतर ही पातळी १२ टक्के होती की साडेबारा ह्यावर माझा भयंकर गोंधळ झाला आहे. तरीही इथं काही शंका उपस्थित करणे हे मी माझे कर्तव्य समजतो. 

१) मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात केवळ एकाच मुलाला (?) सपत्निक राहण्याची परवानगी का देण्यात आली. वैद्यकीय शिक्षणाचं खास करुन पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्वच डॉक्टरांना ही सवलत देण्यात यावी अशी मागणी जोर धरण्याची शक्यता आता नाकारता येत नाही! 

२) संपूर्ण चित्रपटात अक्षयकुमार प्रचंड थकलेला दिसतोय. हा इतका थकलेला का दिसतोय हा प्रश्न पत्नीनं मला विचारला. मग काही वेळानं तो बाळसं धरलेल्या साराला उचलून धरतो असा प्रसंग आला. बहुदा ह्यामुळंच त्याला पाठदुखी झाली असावी आणि तो दमलेला दिसत असावा असा निष्कर्ष आम्ही काढला. आणि पुढील सर्व शक्यतांच्या चर्चेपासून मुक्तता झाली म्हणून मी सुटकेचा निःश्वास टाकला. 

३) चित्रपटाच्या सुरुवातीला सारा स्टेशनवर काचेचा प्रचंड चुराडा करते. पुढे धनुष आपल्या डोक्यावर मद्याने भरलेल्या अनेक बाटल्या फोडून घेतो. ह्यापुढं ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणात मुक्या प्राण्यांचा छळ करण्यात आलेला नाही ह्यासोबत उगाचच काचेचा चुराडा करण्यात आलेला नाही हे कलम टाकण्यात यावं ही मागणी मी ह्या पोस्टद्वारे करत आहे. त्याचबरोबर त्या बाटल्यांमध्ये केवळ पाणी भरलेलं होतं असा खुलासा सुद्धा माझ्या मित्रांच्या भावनांचा विचार करुन देण्यात यावा ही मागणी सुद्धा मी करतोय !

४) जिथं आपल्याला खरंखुरं लग्न करायचं आहे तिथं खोट्या लग्नातील बायको नेणं हे का पटावं? आणि केवळ तिला एक वाक्य आपला होणारा सासरा बोलला म्हणून समस्त स्त्री वर्गाला आदरानं पाहण्याचा साक्षात्कार व्हावा ! हे सारं पाहून मी धन्य झालो. पण त्याचबरोबर जिला इतके दिवस लग्नाचं आश्वासन दिलं होतं आणि जिच्याशी प्रत्यक्ष लग्न करायला आला होतास त्या मुलीचं पुढे काय ? असा प्रश्न विचारावासा वाटतो. 

५) दिल्लीहून भरपावसात विजेच्या खांबावर चढून दक्षिण भारतात landline वर फोन लावण्याची वेळ येणं हे दृश्य पाहून हा चित्रपट सत्तर / ऐशीच्या काळातील असावा असा निर्माण झालेला समज पुढे येणाऱ्या करोनाच्या संदर्भाने दूर झाला!  

आता चित्रपटाच्या कथानकाकडं वळावं असं म्हणतोय ! पण धारिष्ट्यच  होत नाही! कदाचित माझ्या बाजूला सध्या सांता वावरत असावा आणि त्यानेच ही पोस्ट माझ्याकडून लिहून घेतली असावी ! असंच काहीतरी चित्रपटात होत राहतं. साराचा चांगला म्हणावा असा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजु ! कोलावेरी गाण्याच्या पलीकडं धनुषला स्वतःची काहीतरी वेगळी प्रतिमा निर्माण करता यावी ह्यासाठी त्याला शुभेच्छा ! बॉलीवूडमध्ये असे अनेक चित्रपट येत असतात त्यामुळं क्रिसमसच्या आनंदी पर्वात हा चित्रपट बघायला तशी काही हरकत नाही फक्त सुरुवातीचा वैधानिक इशारा लक्षात घ्यावा !

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

गाढवांच्या व्यथा !


भारतीय समाजात, साहित्यात गाढवांना सदैव उपेक्षेचेच स्थान मिळालं आहे. ह्यामागे एखाद्या गोष्टीच्या रंगरूपावरुन त्याविषयी पूर्वग्रह बनविण्याच्या आपल्या समाजाच्या मानसिकतेचा मोठा वाटा असावा असं मानायला वाव आहे. खरंतर गाढव हा किती कष्टाळू प्राणी आहे. भारतीय ग्रामीण जीवनात ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांनी पिढ्यानपिढ्या मोलाचं योगदान दिलं आहे. इतकंच काय तर सीमारेषेवरील अत्यंत प्रतिकूल हवामानात सुद्धा ओझी वाहून नेण्यासाठी गाढवांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. गाढवांच्या केवळ रुपावरुन आपण त्यांना हिणवत नाही तर त्यांची बुद्धी सुद्धा सुमार असावी असा विनाकारण ग्रह आपण करुन घेतला आहे. ओझं कमी व्हावं ह्यासाठी मिठाचं पोतं घेऊन जाणारा गाढव नदीत बसतो आणि मीठ विरघळून त्याचं ओझं कमी होतं. त्याला अद्दल घडावी म्हणून मग मालक त्याच्या पाठीवरील पोत्यात दुसऱ्या दिवशी पाला भरतो; मग पाण्यानं त्याचं ओझं वाढून गाढवाचे कष्ट अधिकच वाढतात अशी गोष्ट आपण लहानपणी वाचली / ऐकली असेल. गाढवांच्या बाजुनं विचार केला तर कामचुकारपणा आणि मूर्खपणा ही दोन वैशिष्टयं कोणत्याही सबळ पुराव्याअभावी ह्या गोष्टीत त्यांना बहाल केलेली दिसतात. 

एखाद्या गोष्टीच्या रंगरूपावरुन त्याविषयी पूर्वग्रह बनविण्याची मानसिकता ह्या सत्याकडं आपण पाहुयात. मोराचा आपण इतका उदोउदो करतो ते बहुदा त्याच्या सुंदर अशा मोरपिसांमुळं आणि प्रेक्षणीय नृत्यामुळं ! प्रत्यक्ष मोर काय कष्ट करतो? काही नाही ! मग मोराला आपल्या साहित्यात मानाचं स्थान आणि गाढवांना दुजाभाव हा विरोधाभास वर्षोनुवर्षे आपण का जोपासला ? कारण आपल्याला जे सुखावतं तेच पाहायला, ऐकायला, वाचायला आवडतं ! आपल्या समाजात कष्टकरी माणसांना, प्राण्यांना प्रतिष्ठाच नाही.  आपल्या घरांत सुद्धा आपण अगदी प्रेक्षणीय वस्तू दर्शनीय भागात ठेवतो. परिसरात पुर्वी रानटी झाडं मुक्त जीवन जगायची. आता फक्त फेसबुकात लाईक मिळवून देणारी झाडं आपण ठेवतोय की काय असा संशय येण्याजोगी परिस्थिती आहे. 

सकाळसकाळी इतका भावनिक स्फोट होण्याचं कारण म्हणजे आजच्या लोकसत्तेत आलेली "चिनी कुरापतींमुळं भारतात गाढवटंचाई" ही बातमी. बिहार वगळता भारतातील बहुतांश राज्यांतील गाढवांची संख्या झपाट्यानं कमी होत आहे असा त्या बातमीचा सारांश! प्रामुख्यानं वैद्यकीय कारणास्तव ही तस्करी होत असली हा मला समजलेला मुद्दा असला तरी "ह्यामागे भारतातील लोकशाहीला नख लावण्याच्या दीर्घकालीन कटाचा भाग म्हणून चीन आपली गाढवं पळवून नेत असावा असा काही जणांचा वहीम आहे" ह्या विधानानं माझी आठ तास पूर्ण झालेली झोप सुद्धा उडाली आहे. भारतीय लोकशाहीच्या अस्तित्वात मोलाचे योगदान बजावणाऱ्या हे गाढवांनो, तुम्हांला भारतीय आणि खास करुन मराठी समाजानं जी दुय्यम वागणूक दिली आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागू इच्छितो. 

परिस्थिती वाटते तितकी निराशाजनक नाही हे गेल्या काही दिवसांत मला जाणवत चाललं आहे. दुनियेपासून हटके करण्याची नवीन पिढीला खूप हौस आहे. जुन्या चांगल्या गोष्टी जितक्या दुर्मिळ होत जाणार तसतसा त्या जुन्या गोष्टींचा दुर्मिळपणा, heritage quotient झपाट्यानं उंचावणार! त्यामुळं काही वर्षात नवीन पिढी धोतर, पगडी वगैरे घालून CBSE, ICSE International शाळेत जाईल असा जबरदस्त आशावाद मी बाळगून आहे. रस्त्याच्या कडेला, घराभोवती रानटी झाडे जाणीवपूर्वक लावली जातील, त्यांची निगराणी केली जाईल! आजच्या लोकसत्तेतील लेखांमुळे गाढवांना भारतीय समाजातील, साहित्यातील योग्य ते स्थान लवकरच प्राप्त होईल.  नवीन पिढी गाढवाची पाळीव प्राणी म्हणून निवड करतील आणि एखादा टीनएजर आपल्या पाळीव गाढवासोबत फोटो टाकून शेकडो लाईक मिळवून जाईल अशी आशा मी करत आहे!

लेखाला काहीशी विनोदाची छटा असली  (हा माझा गैरसमज आणि फुकाचा आत्मविश्वास !) तरी आपल्या समाजाच्या  मानसिकेतचा मुद्दा गाढवांच्या मुद्द्याच्या रुपाने पुढे आणणाऱ्या लोकसत्तेचे आभार ! बाकी ते गाढव आणि भारतीय लोकशाहीचा संबंध आपल्यास माहिती असल्यास नक्की कळवा !

मंगळवार, २१ डिसेंबर, २०२१

भारत आणि India



आपण दोन वेगवेगळ्या देशात (भारत आणि इंडिया) जगतोय असे विचारवंत अधुनमधून म्हणत रहातात. विचारवंतांना अशी अर्थानी ओतप्रोत भरलेली वाक्यं सोडून सामान्यांना गोंधळवून टाकण्याची सवय आहे. वर्षोनुवर्षे अशा वाक्यांवर विचार करुन गोंधळून  एकदा जवळच्या मित्राजवळ अशा वाक्यांचा अर्थ न कळल्याची खंत मी बोलून दाखवली. तर तो अगदी सहज म्हणाला, "अरे त्यांना देखील त्याचा पूर्ण अर्थ कळला आहे असं थोडंच ! ज्याला जसा कळला तसा त्याचा अर्थ ! जशी हत्ती आणि सात आंधळ्यांची गोष्ट होती तसं !" ह्या मित्राचे मी चरण धरण्याचे बाकी होतो ! 

पण एकंदरीत खरं आहे हे विधान! आर्थिकदृष्ट्या, सामाजिक भानाच्या दृष्टिकोनातून आणि अनेक बाबींचा विचार करता प्रत्येक बाबतीत आपल्या भोवताली दोनच नाही तर अनेक प्रकारच्या (spectrum) व्यक्ती आढळतात.  आपण आपला दृष्टिकोन घेऊन सर्वांशी जीवनव्यवहार करत असतो; आपल्या भोवतालचे त्यांचा दृष्टिकोन घेऊन आपल्याशी वागत असतात. त्यामुळं नक्कीच मतभेद होत राहतात. "पूर्वीसारखी दुनिया राहिली नाही, अजून जिवंतपणी काय काय पाहायला मिळेल कुणास ठाऊक!" हे देखील मागील पिढीतील लोकांचं आवडतं वाक्य. हल्लीची म्हणजे चाळीशी / पन्नाशीला आलेली पिढी सहसा हे वाक्य बोलताना आढळत नाही. समाज बदलण्याची इच्छा अथवा क्षमता नसली तरी समाजपरिवर्तनाची मोठाली विधानं करण्याची सवय मागच्या पिढीत होती. ऐकून बरं वाटायचं. कधीतरी दुनिया बदलेल अशी आशा वाटायची. हल्लीची पिढी शक्यतोवर ह्या विधानाचा वापर करताना दिसत नाही. इंटरनेट बंद पडायचं सोडून बाकी काहीही झालं तरी दुनियेचं काही बिघडत नाही ह्यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. 

जरा खोलात शिरलं, तर "पूर्वीसारखी दुनिया राहिली नाही, अजून जिवंतपणी काय काय पाहायला मिळेल कुणास ठाऊक!" ह्या विधानामागं पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या भारतीय संस्कृतीच्या जतन करण्याची इच्छा होती. एक व्यक्ती म्हणून जरी शक्य नसलं तरी एक समाज म्हणून आपण ह्या भारतीय संस्कृतीच्या जतनीकरणात हातभार लावु शकू हा ठाम विश्वास होता. दुर्देवानं आजच्या पिढीचा आपण एका समाजाचा घटक आहोत ह्यावरचाच  विश्वास ढळत चालला आहे. हे विधान बहुदा शहरांपुरतं योग्य असावं. शहरात आपल्याला आपला समाज दिसत नाही, जाणवत नाही. इथं समाज म्हणजे एखादा जात, भाषा, धर्म हे अधिष्ठान असलेला लोकसमूह नव्हे तर चांगल्या सुसंस्कृत जीवनाच्या ध्येयासाठी झटणारा लोकसमूह हा अर्थ अभिप्रेत आहे. 

समाजाशी असलेलं आपलं दैनंदिन आणि भावनिक जीवनातील नातं संपुष्ठात आलं की त्याचे अनेक विपरीत परिणाम होऊ शकतात. आपण कदाचित कमी संवेदनशील बनत असू, पैसे देऊन सर्व सेवा विकत घेता येतील ह्या तत्वांवर आपला दृढ विश्वास होऊ शकतो. पैसे नसतील तर आयुष्यात चांगलं असं काहीच होऊ शकत नाही असं वाटू लागतं. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी किमान हमीभाव मिळाला पाहिजे ह्या विधानाशी जो थोडासुद्धा मानसिकदृष्टया जुळू शकत नाही, त्या माणसाची समाजापासून दूर जाण्याची प्रक्रिया अगदी पुढील टप्प्यात गेली आहे असे आपण म्हणू शकतो. 

वरील प्रश्न कदाचित India भागात प्रकर्षानं जाणवत असतील. पण हे प्रश्न आहेत हे करण्याची त्यांची कदाचित तयारी सुद्धा नसेल. ह्यापुढील पिढीत हे मुद्दे अजून गहन होत जाणार! एका स्वकेंद्रित समाजाकडे आपली वाटचाल होत राहील. त्यामुळं आपले प्रश्न आपणच सोडविण्याची तयारी करावी लागणार हे खरं ! समाजप्रिय, सणांना महत्व देणारे आपले समाजजीवन कायम कधीच टिकणार नव्हते. कारण आपले समाजजीवन टिकवायचे असेल तर आपली स्वतःची अर्थव्यवस्था बळकट हवी. पूर्वी एखादी संस्कृती जगभर पसरायची ती कदाचित सैन्यबळावर, आज कदाचित त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीवर तिथल्या संस्कृतीचे भवितव्य ठरते. जोवर दुसऱ्या देशांच्या अर्थव्यवस्थेला पूरक म्हणूनच आपली अर्थव्यवस्था कार्यरत राहील तोवर आपल्या संस्कृतीची जोपासना करणे अधिकाधिक कठीण होत राहील! 

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

चिंतन Times !



एका खरोखरीच्या तणावपुर्व वर्षाची अखेर आता दृष्टीक्षेपात आली आहे असं वाटतंय. वाटतंय म्हणायचं कारण की असे काही प्रश्न उद्भवत आहेत की सुट्टीवर गेलेल्या सहकाऱ्यांना फोन करुन कॉलवर येण्याची विनंती करावी लागत आहे. एक व्यवस्थापक म्हणून रविवार सकाळी असे कॉल करणे हे खूपच नकोसे वाटते. 

वर्ष तणावात का गेलं? सद्यस्थितीत काही उद्योगधंद्यांवर परिणाम झाला, काहींच्या नोकऱ्या गेल्या. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे झालेलं आर्थिक नुकसान किंवा एका विशिष्ट वयानंतर गमावलेली नोकरी ह्यातून पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी ह्या प्रसंगाला सामोरी जाणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप कणखर असावी लागते.  आर्थिकदृष्ट्या सर्व काही आलबेल असले तरीही केवळ नित्यनेमाच्या गोष्टी जसे की समारंभ, मित्रमंडळींशी बोलणं - चालणं ह्या बाबतीत बंधनं आल्यामुळं मनात साचुन राहिलेल्या भावभावनांचा वेळीच निचरा झाला नाही. त्यामुळं सुद्धा लोकांच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम झाला. सर्वसाधारण परिस्थितीत समाजाचं मानसिक स्वास्थ व्यवस्थित असताना ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक कणखरता बरेचजण दाखवायचे देखील ! पण आता मात्र माणसं काहीशी गोंधळलेल्या मनःस्थितीत वावरताना आढळतात. ह्या बाबत लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी! 

१. आपल्याला सल्ल्याची, दोन चांगल्या आपुलकीच्या शब्दांची गरज आहे हे बऱ्याच जणांना समजत नसावं किंवा समजलं तरी मान्य करता येण्याची तयारी नसावी. 

२. आपली खरी समस्या काय आहे हे बहुतेक जणांना माहिती असते. परंतु त्या समस्येचं निराकरण करु शकेल अशा माणसांसोबत गाठ पडेपर्यंत ही समस्याग्रस्त माणसे काहीशा वैफल्यग्रस्त परिस्थितीत वावरत राहतात. हे वैफल्य, हा संताप समोर येणाऱ्या माणसावर दिसेल त्या कारणाच्या निमित्तानं बाहेर काढण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. 

३. भूतकाळात आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय ह्या समजुतीखाली संपूर्ण आयुष्य व्यतित करण्याची काही जणांची प्रवृत्तीअसू शकते. ह्या काळात विचार करायला वेळ मिळाल्यानं ह्या अप्रिय आठवणी काही जास्तच प्रमाणात उफाळून आल्या आहेत. त्यामुळं फार पूर्वीच्या प्रसंगांचा दाखला देऊन काही व्यक्ती उगाचच तणावाचे प्रसंग निर्माण करताना आढळतात. "Move on with the life" ह्या उक्तीची कधी नव्हे ती आज खूप आवश्यकता आहे. 

४. इथं एक महत्वाचा मुद्दा ! आयुष्यानं आपल्याला जशा समस्या दिल्या आहेत त्याचप्रमाणे काही बाबतीत भरभरुन सुद्धा दिलं आहे. त्यामुळं आपल्या पदरात दैवाने टाकलेल्या काही मोजक्या प्रतिकूल गोष्टींमुळं सदैव वैफल्यग्रस्त राहावं हे योग्य ठरणार नाही.  The Glass is half full as well हे ध्यानात घेऊन जमेल तसं आशावादी राहता यायला हवं. 

५.  माणसं आपल्यासोबत अनाकलनीय पद्धतीनं वागू शकतात. त्यामागचं मूळ कारण कदाचित त्यांच्याशी सखोल बोलल्याशिवाय आपल्याला समजणार देखील नाही. पण हल्ली एकदा का विवादाची परिस्थिती उद्भवली की संवादाद्वारे ही परिस्थिती निवळण्याची तयारी दाखवणारे लोक कमीच ! मुद्दा क्रमांक तीन मध्ये उल्लेखल्याप्रमाणं आयुष्यानं तुमच्या ओंजळीत तर काही चांगलं टाकलंय असा तुमचा विश्वास असेल तर त्याची परतफेड कोणाच्या तरी ओंजळीत जमेल तितकं चांगलं टाकून करा ! काही लोक अनाकलनीय पद्धतीनं तुमच्याशी वागली तरी त्यांना अजून काही संधी द्या, कदाचित त्यांच्या मूळ समस्यांचं निराकरण झालं की तीच माणसं तुमच्याशी अगदी नीट वागू लागतील. 

व्यवसायाला अनुकूल अशी वर्षाच्या शेवटच्या दोन आठवड्यात घेतलेली ही सुट्टी! ह्या  सुट्टीचा आजचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस ! ह्या सुट्टीत जमेल तसे लिखाण करावं असं म्हणतोय ! बघुयात !!

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

चाकोरीबाहेर




चाकोरीबाहेर जगण्याची इच्छा सद्यकालीन बहुतांश जनांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. किंबहुना समाजातील सद्यकाळाला अनुसरुन सर्वसाधारण जगणं म्हणजे काय हे समजावून सांगणाऱ्या सर्व व्यक्ती, संस्था ह्यांचा झपाट्यानं ऱ्हास होत आहे. ह्या व्यक्ती, संस्था ह्यांच्या अनुपस्थितीमुळं आपल्या वागण्यावरील अंकुश नाहीसा होत आहे. त्यामुळं जाणता अजाणता बहुतांश लोक त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी जगलेल्या जीवनापेक्षा वेगळं असं जीवन जगत आहेत.  

चाकोरीबाहेरील जगण्याची एक किंमत चुकवावी लागते ह्या गोष्टीचा असं जगणं जगु इच्छिणाऱ्या व्यक्तींना सुरुवातीला अंदाज येत नाही. ही किंमत चुकविणे ही काही अगदी अवघड गोष्ट आहे असं नव्हे पण ते सर्वांनाच जमत नाही. त्यासाठी तुमच्याकडं खरोखर काही कौशल्य असायला हवं ! नाहीतर मोठ्या उत्साहानं घेतली भरारी, गगनी जाता गोंधळली स्वारी अशी अवस्था होण्याची दाट शक्यता असते. 

उगवणारा दिवस कसा असेल ह्याविषयी खात्री नसणे,  आयुष्यात नक्की काय मिळवायचं आहे ह्याविषयी विचारांची सुस्पष्टता नसणे, जवळच्या नात्यांना टिकविण्यासाठी जो वेळ खर्च करावा लागतो तो नसणे, गैरसमजांना दूर ठेवण्यासाठी जे भावनिक बंध निर्माण करावे लागतात त्यासाठी  मनाची असणारी आवश्यक प्रगल्भता नसणे हे सारे घटक चाकोरीबाहेर जगण्याच्या निर्णयाच्या सोबत आपल्याला स्वीकारावे लागतात. 

चाकोरीबाहेरील जगणे दोन पातळीवरील आहे.पहिली पातळी आहे ती एक समाज म्हणून आपण मागच्या पिढीच्या तुलनेनं चाकोरीबाहेरील जगणे जगत आहोत; पण ह्यात आपल्या सर्वांचा काही प्रमाणात नाईलाज आहे. आता हे जे काही बदल झाले त्यामुळं आपली जी ठोस नियमांत न बसणारी जीवनशैली निर्माण झाली त्याला पुढील पिढीसाठी चाकोरीतलं जगणं असं म्हणण्याची आपली इच्छा होऊ शकते. 

चाकोरीबाहेरील जगण्याची दुसरी पातळी म्हणजे वरील परिच्छेदातील एक समाज म्हणून निर्माण झालेल्या चाकोरीबाहेरील जगण्याहुन वेगळी अशी काही व्यक्तींनी निर्माण केलेली स्वतःची अशी जीवनशैली ! इथं मी चाकोरीपलीकडील जगणं म्हणजे काय ह्याचं एकही उदाहरण न दिल्यानं काहीशी अस्पष्टता आपल्या मनात राहील. पण हे जाणीवपूर्वक आहे. चाकोरीबाहेरील जगणं म्हणजे काय ह्याचा अर्थ व्यक्तीनुसार बदलतो आणि म्हणूनच मी मला अभिप्रेत असलेला अर्थ इथं नमूद करुन ह्या पोस्टद्वारे तुमच्यामनात येणाऱ्या विचारांना संकुचित करू इच्छित नाही ! 

चाकोरीत जगणाऱ्या लोकांना आयुष्याच्या उत्तरार्धात मनात काहीशी खंत निर्माण होऊ शकते. देवाने दिलेलं एकच आयुष्य, अगदी सर्वसाधारणपणे जगलो, विशेष काही वेगळं केलं नाही ही ती खंत ! स्वकेंद्रित जीवन जगावं ह्या विचारसरणीचा झपाट्यानं प्रसार होत असल्यानं त्याग हे ज्याचं अधिष्ठान आहे अशा चाकोरीतील जगणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस झपाट्यानं कमी होत जाणार आहे. आणि आपल्यासमोर येणार आहे तो स्थिर मनाचा अभाव असणाऱ्या लोकांची बहुसंख्यता असणारा एक आर्थिकदृष्टया सबळ समाज ! 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...