मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

चिंतन Times !



एका खरोखरीच्या तणावपुर्व वर्षाची अखेर आता दृष्टीक्षेपात आली आहे असं वाटतंय. वाटतंय म्हणायचं कारण की असे काही प्रश्न उद्भवत आहेत की सुट्टीवर गेलेल्या सहकाऱ्यांना फोन करुन कॉलवर येण्याची विनंती करावी लागत आहे. एक व्यवस्थापक म्हणून रविवार सकाळी असे कॉल करणे हे खूपच नकोसे वाटते. 

वर्ष तणावात का गेलं? सद्यस्थितीत काही उद्योगधंद्यांवर परिणाम झाला, काहींच्या नोकऱ्या गेल्या. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे झालेलं आर्थिक नुकसान किंवा एका विशिष्ट वयानंतर गमावलेली नोकरी ह्यातून पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी ह्या प्रसंगाला सामोरी जाणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या खूप कणखर असावी लागते.  आर्थिकदृष्ट्या सर्व काही आलबेल असले तरीही केवळ नित्यनेमाच्या गोष्टी जसे की समारंभ, मित्रमंडळींशी बोलणं - चालणं ह्या बाबतीत बंधनं आल्यामुळं मनात साचुन राहिलेल्या भावभावनांचा वेळीच निचरा झाला नाही. त्यामुळं सुद्धा लोकांच्या मनःस्वास्थ्यावर परिणाम झाला. सर्वसाधारण परिस्थितीत समाजाचं मानसिक स्वास्थ व्यवस्थित असताना ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक कणखरता बरेचजण दाखवायचे देखील ! पण आता मात्र माणसं काहीशी गोंधळलेल्या मनःस्थितीत वावरताना आढळतात. ह्या बाबत लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी! 

१. आपल्याला सल्ल्याची, दोन चांगल्या आपुलकीच्या शब्दांची गरज आहे हे बऱ्याच जणांना समजत नसावं किंवा समजलं तरी मान्य करता येण्याची तयारी नसावी. 

२. आपली खरी समस्या काय आहे हे बहुतेक जणांना माहिती असते. परंतु त्या समस्येचं निराकरण करु शकेल अशा माणसांसोबत गाठ पडेपर्यंत ही समस्याग्रस्त माणसे काहीशा वैफल्यग्रस्त परिस्थितीत वावरत राहतात. हे वैफल्य, हा संताप समोर येणाऱ्या माणसावर दिसेल त्या कारणाच्या निमित्तानं बाहेर काढण्याची त्यांची वृत्ती दिसून येते. 

३. भूतकाळात आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलंय ह्या समजुतीखाली संपूर्ण आयुष्य व्यतित करण्याची काही जणांची प्रवृत्तीअसू शकते. ह्या काळात विचार करायला वेळ मिळाल्यानं ह्या अप्रिय आठवणी काही जास्तच प्रमाणात उफाळून आल्या आहेत. त्यामुळं फार पूर्वीच्या प्रसंगांचा दाखला देऊन काही व्यक्ती उगाचच तणावाचे प्रसंग निर्माण करताना आढळतात. "Move on with the life" ह्या उक्तीची कधी नव्हे ती आज खूप आवश्यकता आहे. 

४. इथं एक महत्वाचा मुद्दा ! आयुष्यानं आपल्याला जशा समस्या दिल्या आहेत त्याचप्रमाणे काही बाबतीत भरभरुन सुद्धा दिलं आहे. त्यामुळं आपल्या पदरात दैवाने टाकलेल्या काही मोजक्या प्रतिकूल गोष्टींमुळं सदैव वैफल्यग्रस्त राहावं हे योग्य ठरणार नाही.  The Glass is half full as well हे ध्यानात घेऊन जमेल तसं आशावादी राहता यायला हवं. 

५.  माणसं आपल्यासोबत अनाकलनीय पद्धतीनं वागू शकतात. त्यामागचं मूळ कारण कदाचित त्यांच्याशी सखोल बोलल्याशिवाय आपल्याला समजणार देखील नाही. पण हल्ली एकदा का विवादाची परिस्थिती उद्भवली की संवादाद्वारे ही परिस्थिती निवळण्याची तयारी दाखवणारे लोक कमीच ! मुद्दा क्रमांक तीन मध्ये उल्लेखल्याप्रमाणं आयुष्यानं तुमच्या ओंजळीत तर काही चांगलं टाकलंय असा तुमचा विश्वास असेल तर त्याची परतफेड कोणाच्या तरी ओंजळीत जमेल तितकं चांगलं टाकून करा ! काही लोक अनाकलनीय पद्धतीनं तुमच्याशी वागली तरी त्यांना अजून काही संधी द्या, कदाचित त्यांच्या मूळ समस्यांचं निराकरण झालं की तीच माणसं तुमच्याशी अगदी नीट वागू लागतील. 

व्यवसायाला अनुकूल अशी वर्षाच्या शेवटच्या दोन आठवड्यात घेतलेली ही सुट्टी! ह्या  सुट्टीचा आजचा खऱ्या अर्थानं पहिला दिवस ! ह्या सुट्टीत जमेल तसे लिखाण करावं असं म्हणतोय ! बघुयात !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...