मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २९ जुलै, २०१८

Starters ते Meddlers!!


माननीय आरोग्यमंत्री महाराष्ट्र राज्य, भारत सरकार
महोदय,

बरेच दिवसापासून ह्या मुद्द्यावर आपल्याशी संपर्क साधावा हा विचार मनात घोळत होता. गेल्या आठवड्यातील तेलंगणा राज्यातील माझ्या व्यावसायिक भेटीनंतर हा विचार पक्का झाला. हा विचार आहे तो स्थानिक समाजातील स्टार्टरचे अधिक प्रमाणात ग्रहण आणि त्या अनुषंगाने उदभवू शकणाऱ्या आरोग्यविषयक समस्या!

सद्यकालीन भारतीय समाजाची आर्थिक स्थिती उंचावत चालली आहे. यामागे कोणत्याही पक्षाचा वगैरे हात नसुन ही कालानुरूप घडलेली घटना आहे. अर्थशास्त्राच्या मुलभूत नियमांनुसार ज्या क्षणी माणसांकडे अन्न, वस्त्र, निवारा या गरजांना मुलभूत स्वरुपात पुर्ण करुनसुद्धा त्यांच्याकडे क्रयशक्ती बाकी राहते. त्यावेळी मनुष्याचं लक्ष चैनीच्या गोष्टींकडे वळते. साधारणतः हाच प्रकार आपल्याला भारतीय मध्यमवर्गीयांच्या बाबतीत घडताना आढळून येत आहे. हाती पैसा खुळखुळत असलेला हा तरुण मध्यमवर्ग एक नव्याने स्थिरावत चाललेल्या जीवनसरणीचा पाठलाग करताना दिसत आहे. यामध्ये फॅन्सी कार, फॅशनेबल कपडे या गोष्टींचा समावेश होतो. ह्यात समाविष्ट करण्याजोगी अजुन एक गोष्ट म्हणजे बाहेर जाऊन चमचमीत पदार्थ खाण्याचं वाढलेलं प्रमाण! 

आता इथं थोडं खोलवर जाऊन पाहुयात. बाहेर जाऊन हॉटेलात चमचमीत पदार्थ खाण्याची पद्धती ही काही अगदी आताची नाही. गेले कित्येक वर्ष आपण भारतीय ते करत आलो आहोत. परंतु गेल्या पाच-दहा वर्षांत एक महत्त्वाचा फरक यात दिसून येतो. बुफे पद्धतीच्या आहाराचे आणि त्यासोबत स्टार्टर्सचे वाढते प्रमाण!! हे बुफे नक्की कधी भारतात सुरू झाले हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही. परंतु २००० साली इंग्लंडात असताना तेथे सहा पौंडाला मनमुराद अन्नपदार्थांचा आस्वाद घेण्याची आठवण मी बाळगुन आहे. परंतु यामध्ये सर्व काही मेनकोर्स संबंधित खाद्यपदार्थ असावेत असं मला पुसटसं आठवतं. पण नंतर काळ बदलला.  मध्यंतरीच्या काळात स्टार्टर या प्रकारातील खाद्यपदार्थांनी जनमानसाचा (आणि जनपोटाचा) कब्जा घेतला. 

तुम्ही जिथे बसला आहात तिथं आणुन ठेवलेली कोळशाची शेगडी आणि त्या शेगडीवर लोखंडी सळयांना लावुन आणलेले मसालेदार पदार्थ म्हणजेच स्टार्टर्स! काही स्टार्टर्स तुमच्यासमोर थेट प्लेटमध्ये आणुन वाढले जातात. आता होतं काय की या पदार्थांचं खुप वैविध्य असतं.  बहुतांशी तरुणवर्ग असतो आणि सर्वजण त्या एका पार्टीच्या वातावरणात प्रसन्न मनाने धमाल करत असतात. चर्चेलासुद्धा अत्यंत मजेदार विषय असतात. ह्या सर्व घटकांमुळं आपण नक्की किती स्टार्टर्सचा आस्वाद घेतला आहे याची गणती करणे अशक्य होऊन राहतं. त्यात नॉनव्हेज starters खाणाऱ्यांसमोर अजून एक आव्हान असतं. संपुर्ण नॉनव्हेज स्टार्टर्स जरी त्यांनी चाखुन पाहिले (चाखुन पाहणे हा झाला सौम्य शब्दप्रयोग !!) तरी त्यानंतर काही चमचमीत व्हेज स्टार्टर्स सुद्धा तुम्हाला खुणावत असतात! या सर्व प्रकारामध्ये तुमचं पोट हे गच्च ते अतिगच्च या स्थितीच्या मध्ये पोहोचलेलं असतं. 

पोटात कशीबशी जागा करुन तुम्ही ज्यावेळी सर्व (व्हेज आणि नॉन-व्हेज) स्टार्टसना न्याय देऊन एक सुटकेचा निःश्वास टाकता. त्यावेळी तुमचा एखादा मित्र विचारतो,  "चला आता मेन कोर्सला जाऊयात का?" ह्या क्षणी तुमच्या चेहर्‍यावरील भाव पाहण्यासारखे होत असावेत. तरीसुद्धा एका सामाजिक बांधिलकीच्या दायित्वाला न्याय देण्यासाठी म्हणुन अडखळत पायाने तुम्ही मेन कोर्सपर्यंत जाऊन पोहोचता! (आता या अडखळण्यामागे भरगच्च पोटाचा वाटा किती आणि मनातील अपराधी भावनेचा वाटा किती याविषयी मी काही टिप्पणी करू इच्छित नाही). परंतु एकदा का तुम्ही मेन कोर्सपर्यंत पोहोचलात की तेथील पदार्थांचे वैविध्य पाहून तुमचा मनोनिर्धार ढासळून पडण्याची शक्यता बळावते. तिथं चिकन मटण यांचे बरेच प्रकार त्यांच्यासोबत शाकाहारी पदार्थांचे वैविध्य हे तुम्हाला खुणावत असते. 

जोशी, गाडगीळ मंडळी स्टार्टर्सचा आस्वाद घेतल्यानंतर मेनकोर्सकडे ढुंकूनही पहात नाही! हा त्यांच्या निर्धाराचा विजय!!
सर म्हणतात की तंदूर स्टार्टर्स म्हणून चांगले चायनीज स्टार्ट नको!! आता हे झालं त्यांच्या देशप्रेमाचा प्रतीक!!
संतसुर्य तर बाहेर जास्त अन्नग्रहण करीतच नाही. त्यामुळे स्टार्टर / मेनकोर्स यामध्ये गल्लत होण्याचा संभवच नाही. विनुची सध्याची देहयष्टी पाहता तो बाहेर काही खात असेल असे वाटत नाही. राहता राहिला तो बालक! प्रत्येक खाद्यपदार्थ बनवणाऱ्या खानसाम्याने अगदी मन लावुन  तो पदार्थ बनवला असला पाहिजे. आणि जर आपण त्याला न्याय दिला नाही तर त्या खानसाम्याला कसे वाटेल हा उदात्त विचार करून तो नक्कीच सर्व पदार्थांना न्याय देत असावा!!

अशाप्रकारे मेनकोर्सचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर आपण आता कोणीतरी मला इथून उचलून घेऊन घरी किंवा हॉटेलात पोहोचवा अशा विचारात असतो. अशा वेळी अजुन एखादा मित्र म्हणतो, "अरे इथले डेझर्ट चांगले आहेत असं म्हणतात! या क्षणी आपली सदसद्विवेकबुद्धी संपुष्टात आलेली असते किंवा आपण अगदी सुस्पष्ट विचार करु लागलो असतो! आता इतका पोटावर अन्याय केलेलाच आहे आणि पुढील काही दिवस आपल्याला नाहीतरी लंघन करावंच लागणार आहे तर मग बिचाऱ्या डेझर्टवर अन्याय कशाला असा विचार करुन आपण डेझर्टच्या दिशेने चालू लागतो. याक्षणी आपण अपराधी भावनेवर पूर्ण विजय मिळवला असल्यामुळे आपण मनसोक्तपणे डेझर्टचा आस्वाद घेतो. इथं गुलाब जामुन, फेरणी, जलेबी, केक,  विविध प्रकारची आईस्क्रीम वगैरे प्रकारांना आपण उचित न्याय देतो. 

माननीय आरोग्यमंत्री, 
आता वळुयात मुख्य मुद्द्याकडे! तरुण पिढीतील आरोग्यविषयक समस्या या भयंकर स्वरुपात वाढीस लागल्या आहेत.  आपण भारतीयांनी गेल्या काही वर्षांत आपल्या आहारपद्धतीत खूप बदल केल्याचं आढळून येतं.  १९७० सालातील अजित वाडेकरसोबत गेलेल्या  इंग्लंड दौऱ्यातील भारतीय खेळाडू पहा किंवा त्या काळातील कोणत्याही बातम्यांची चित्रफीत पहा. त्यावेळी आपण भारतीय सडसडीत होतो. कारण आपण कमी खायचो आणि चीझ वगैरे प्रकारांचं कमी सेवन व्हायचं! पण नंतर आपला संपर्क पाश्चिमात्य लोकांशी अधिकाधिक प्रमाणात येऊ लागला. तेथील थंड हवामानामुळे हे लोक अधिक प्रमाणात मांसाहाराचं  आणि एकंदरीत आहाराचं सेवन करतात. परंतु थंड हवामान आणि त्यांची सक्रिय जीवनसरणी यामुळे ते आपला फिटनेस राखून असतात. आपण त्यांचा त्यांची ही जीवनपद्धती किंवा आहारपद्धती उचलताना हवामानाचा विचार केला नाही. त्याचबरोबर आपल्यातील फक्त मोजक्या लोकांनी सक्रिय जीवनसरणीचा म्हणजेच व्यायामाचा अंगीकार केला आणि त्यामुळे ज्या लोकांनी केवळ आपला आहार वाढविला त्या लोकांमधील आरोग्यविषयक समस्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. 

आता तुम्ही म्हणाल की तू केवळ प्रश्न मांडतोय यावर उपाय काय?  उपाय म्हणायला गेला तर तसा सोपा नाहीये! बफे पद्धतीचं आणि त्यासोबत स्टार्टर्सचे भारतीय मध्यमवर्गीयात पसरलेलं लोण आता थोपवून धरणे शक्य होईल असे मला वाटत नाही. "मी खूप मेहनत करुन (डोकं चालवुन) पैसा कमावतो. त्यामुळे तो मी कशा पद्धतीने खर्च करावा हे मी माझे ठरवणार! त्याबाबतीत तुम्ही कोणी ढवळाढवळ करण्याची गरज नाही!" असेच उत्तर बहुतांशी तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर एक वेगळा क्रांतिकारक उपाय मी सुचवू इच्छितो आहे. 

कोणताही माणूस  हॉटेलात गेला असता त्याला पहिला अर्धा तास फक्त मेनकोर्स वाढण्याचं कायदेशीर बंधन प्रत्येक हॉटेलवर घालावं अशी मी मागणी करत आहे. प्रत्येक माणसाने मेनकोर्सच्या किमान दोन प्लेट ग्रहण केल्याशिवाय त्याला स्टार्टर्सचा आस्वाद घेऊन देता कामा नये. स्टार्टर्सचा क्रम बदलल्यामुळं त्यांचं  नावसुद्धा बदलून मेडलर्स (Meddlers) किंवा लुडबुड्या असं करावं.  त्यामुळे स्टार्टर्स सुरुवातीलाच का सर्व केले जात नाहीत असले प्रश्न निरर्थक प्रश्न कोणी विचारणार नाही. 

हा एकंदरीत लेखाचा खटाटोप हा भारतीय जनतेच्या आरोग्याच्या हिताच्या उद्देशानं मी केलेला आहे. ही सुचना जर अंमलात आणली गेली तर लोकांच्या तब्येती सुधारुन कन्सल्टिंग डॉक्टरच्या आणि विमा कंपन्यांच्या उद्योगावर गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही माझ्या सूचनेचा स्वीकार करणार असाल तर त्यासोबत मी माझ्या संरक्षणाची सुद्धा मागणी करत आहे!!

एक जबाबदार नागरिक!!

शनिवार, २८ जुलै, २०१८

गुंतागुंत



आयुष्यातील मोठेपण (वय आणि जबाबदारी ह्या दोन्हींचं ) तुमच्यासमोर तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक घटक आणुन ठेवत असतं.  
काही घटक केवळ एकतर्फी परिणाम करत असतात तर काही घटक आणि तुम्ही ह्या दोघांचं एकमेकांशी दुतर्फी नातं असतं. हे घटक म्हणजे तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक सहकारी,समाज वगैरे वगैरे!

प्रारंभ करुयात व्यावसायिक आयुष्यापासून! व्यावसायिक आयुष्यात तुमच्यासमोर असणारे दोन पर्याय म्हणजे केवळ तग धरत राहणं किंवा दुसरा म्हणजे सतत प्रगतीचा ध्यास धरणं! 

हल्ली व्यावसायिक यश या विषयावर बरंच काही बोललं आणि लिहिलं जातं! काही वेळा ह्या विश्लेषणामध्ये एका विशिष्ट ज्ञातीमध्ये एक विशिष्ट गुण असतो या दिशेने विचाराची मांडणी केलेली दिसून येते. इथं ज्ञात म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेला समाज असा अर्थ प्रामुख्यानं अभिप्रेत आहे.  पुर्वी आपल्या समाजाला धरुन राहण्याची आणि त्या समाजातच वावरण्याची वृत्ती दिसुन यायची. त्यामुळे या विचारसरणीला अनुसरुन प्रत्येक समाजाचं वागणं काही प्रमाणात दिसुन यायचं. सध्या या बाबतीत परिवर्तनाचा काळ दिसुन येत असला तरी अजुनही काही ज्ञाती आपले काही गुण बाळगून असल्याचं आढळून येतं. 

एक उदाहरण देत आहे की समजा तुम्हाला व्यावसायिक ठिकाणी प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ही प्रतिकुल परिस्थिती अनेक प्रकारची असू शकते. यामध्ये नोकरीसाठी लांबचा प्रवास करावा लागणे, सतत तुमच्या कामगिरीचं विश्लेषण चारचौघात होत राहणे आणि त्या अनुषंगाने येणारे काहीसे अपमानास्पद असे बोल चार-चौघात ऐकावे लागणे अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो.  

तुम्ही या परिस्थितीला कसे तोंड देता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबुन असतात. तुमच्यामध्ये जर चिकाटी असेल तर तुम्ही या गोष्टीचा सामना करु शकता. कोणतीही गोष्ट कायम राहात नाही असे आपण लहानपणापासून ऐकत आलो असतो. परंतु त्यावर माझा आधी फारसा विश्वास नसायचा. परंतु हल्ली मात्र खूप विश्वास बसू लागला आहे. बऱ्याच मोठाल्या वित्तीय संस्थांमध्ये झपाट्याने बदल होत असतात. जर तुम्ही अशा वातावरणात कार्यरत असाल तर काहीवेळा तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती तर काहीवेळा परिस्थिती प्रतिकुल बनते. या दोन्ही स्थितीत स्थिर डोक्याने वावरणारी माणसे व्यवस्थितपणे तग धरु शकतात. 

प्रतिकुल परिस्थितीत चिकाटीपणा दाखवणं ह्या बाबीचं प्रशिक्षण लहानपणापासुन मिळायला हवं. सर्व प्रकारची यशं सहजगत्या साध्य होणं शक्य नसतं आणि बऱ्याच वेळा हितकारक सुद्धा नसतं. एक विशिष्ट यश मिळविण्यासाठी किंवा लक्ष्य साध्य करण्यासाठी वर्षोनुवर्षे तपस्या करावी लागणं ही केवळ जुन्या काळात घडणारी घटना नव्हे. हे सद्यकाळातील सुद्धा सत्य आहे.  

काही काळानंतर व्यावसायिक जीवन एक तपस्या सुद्धा बनू शकते किंबहुना बहुतांशी वेळा बनतेच. तिथल्या वातावरणात तग धरुन राहण्यासाठी किंवा प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या
कौशल्याची आणि व्यावसायिक वर्तणुकीची अपेक्षा असते. ही आवश्यक कौशल्यं किंवा अपेक्षित व्यावसायिक वर्तणुक लिखित स्वरुपात केव्हाच उपलब्ध नसतात. त्या वातावरणातील तुमच्या अस्तित्वामुळं तुम्हांला अनुभवातून आणि आकलनशक्तीद्वारे ह्या सभोवतालच्या 
Ecosystem ला जाणुन घेऊन त्याप्रमाणे आपलं वागणं आणि कौशल्य विकसित करणं हे अपेक्षित असते. 

ह्या अपेक्षेचं भान प्रत्येकाला समजतंच असं नाही.  ज्या काही जणांना समजतं त्यातील प्रत्येकाला ते आपल्या वागण्यात अंमलात आणणं आवश्यक वाटतं असेही नाही. आणि ज्या कोणाला हे परिवर्तन करण्याची इच्छा असते त्यातील सर्वांना लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेले भोवतालचे घटक साथ देतील असंही नाही . 

आता इथे विचारात घेण्यासाठी एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे तुमच्या आयुष्यातील किती वेळ तुम्ही तुमच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देऊ शकता. कारण एक मुलगा, एक पती / पत्नी, एक पालक आणि एक समाजातील जबाबदार नागरिक ह्या विविध रुपातील जबाबदाऱ्या तुमच्या समोर असतात. त्यातील किती जबाबदाऱ्या कोणत्या प्रमाणात स्वीकारण्याचं तुम्ही ठरवता यावर तुमचा बाकीच्या जबाबदारींचा उपलब्ध वेळ अवलंबून असतो. 
इथं एक काहीसा लक्ष वेधुन घेणाऱ्या घटनांचा क्रम सुरु होऊ शकतो.  तुम्हाला एखाद्या व्यावसायिक ठिकाणी प्रगती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा उलगडा झाला तर तुम्ही मनातल्या मनात खुश होता. आणि तिथे अधिकाधिक यशप्राप्तीच्या हव्यासापायी प्रयत्नशील होत जाता. हे होत असताना तुम्हाला अजुन यश मिळतं आणि त्यामुळं तुमच्या जबाबदाऱ्या अधिक वाढतात आणि मग तुम्ही पुन्हा त्याहून अधिक प्रयत्नशील होता. हे चक्र सुरूच राहतं. 

या सर्व बाबींमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील बाकीच्या सर्व घटकांपासुन दुर दुर जाऊ लागता. परंतु तुमचे डोळे हे तुमच्या स्वतःच्या यशाने दिपुन गेले असल्यामुळे तुम्हाला बाकीच्या वास्तवाची जाणीव होणं तसं म्हटलं तर कठीण असतं. अचानक असा एक दिवस उजाडू शकतो कि ज्या दिवशी काही कारणास्तव तुमचं ते व्यवसायिक दुनियेतील जग अचानक भंग पावते.  मग अशावेळी मात्र तुम्हांला बाकीच्या घटकांची गरज भासु लागते.   त्या घटकांकडे तुम्ही धाव घेतात परंतु यातील सर्वच घटक तुमच्यासाठी काही वाट बघत थांबलेले नसतात. त्यामुळे होतं काय की तुम्ही एकटेपणाच्या गर्तेत जाऊ शकता.  

आता दुसऱ्या बाजुनं विचार करुयात. जर काही कारणास्तव तुम्ही व्यावसायिक ध्येयं प्राध्यान्यक्रमावर स्वतःहुन ठेवली नाहीत किंवा परिस्थितीनं तुम्हांला ती प्राध्यान्यक्रमावर ठेवू दिली नाहीत तर तुमचं आयुष्य बाकीच्या घटकांमध्ये प्रामुख्यानं व्यतित होत असतं. ह्यात काही वेळा काही न करता वेळ घालवणं ह्या शक्यतेचा सुद्धा समावेश होऊ शकतो. जसं पहिल्या शक्यतेत व्यावसायिक जगातील अपेक्षाभंगामुळं बाकीच्या घटकांची गरज भासु शकते त्याचप्रमाणं ह्या शक्यतेत आयुष्याच्या एका वळणावर तुमच्यातील व्यावसायिक महत्वाकांक्षा जागृत होऊ शकतात. आयुष्यातील एका विशिष्ट वळणानंतर तुमची इच्छा कितीही दुर्दम्य असली तरी तुम्ही तुमचं व्यावसायिक जीवन मार्गावर आणु शकत नाहीत.  

थोडक्यात पहायला गेलं तर तुम्ही पुर्णपणे समाधानी असण्याची शक्यता तसं पाहिलं तर नगण्यच असते. काही माणसं हे स्वतःहून हे सत्य कबुल करतात तर काही प्रकारची माणसं हे सत्य दडवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्या मनातील सर्व काही मनमोकळेपणाने कोणाला तरी सांगायचं का हा एक पहिला प्रश्न असतो. जर त्याचं होकारार्थी उत्तर आला तर ज्याच्यासमवेत हे सारं शेअर करायचं असतं त्या माणसाची खरी खुरी ओळख आपल्याला पटायला हवी. 

जाता जाता सांगणं एकच! ह्यातील आपला प्रकार कोणता हे प्रत्येकानं ओळखावं आणि त्या सत्याचा स्वीकार करुन आनंदानं जीवन जगावं. पण हे करत असताना दुसऱ्या प्रकारातील व्यक्तींचा आदर बाळगण्याचं भान दाखवावं.  

रविवार, २२ जुलै, २०१८

शिक्षणमहर्षी डोंगरेसर!!



सद्ययुगात परिचित व्यक्तीला तुझे कोणते छंद आहेत अशी विचारण्याची पद्धत रुढ झाली आहे. बरेचजण आपल्या उमेदवारी अर्जातसुद्धा ह्याचा उल्लेख करतात. ह्या प्रश्नाचे उत्तर एका ठराविक धाटणीचे असतं. भारतातील ८० ते ८५ टक्के लोक वाचन, गायन ( यात बहुतांशी प्रतिकिशोरकुमार), क्रिकेट पाहणं आणि खेळणे  हे छंद बाळगून असतात. आता २०१८ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेनंतर यात फुटबॉल हा सुद्धा एक छंद म्हणून समाविष्ट होत जाईल यात तिळमात्र शंका नाही. 

आज आपण अशा एका व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन घेणार आहोत ज्या व्यक्तिमत्त्वाला छंदाचे काही बंधनच नाही. जणु काही मुक्तछंदच! या माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलु पाहिले असता प्रत्येक ऋतुमानानुसार ती व्यक्ती वेगवेगळ्या उपक्रमात गढुन गेलेली आपल्याला आढळून येते. Ladies and Gentleman! Let me take the privilege of introducing Professor Hemant Dongre!!

माझी आणि सरांची ओळख तशी आधीपासुन होतीच. परंतु ही ओळख दृढ होण्यास कारण म्हणजे १९८५ बॅचने त्यांचं जे पहिलं स्नेहसंमेलन आयोजित केलं होतं त्यात त्यांनी मलासुद्धा बोलावलं. त्यांनी मला नक्की का बोलावलं हे मला अजून समजलेलं नाही. प्रस्तावनेच्या भाषणात सरांनी त्यांच्या शालेय जीवनातील काही आठवणी सांगितल्या. त्यात अनघाला शाळेच्या प्रत्येक वर्षी पहिल्या बाकावर का बसवलं गेलं याविषयी त्यांच्या मनात असलेल्या खंत /असुया वगैरे भावनांचं मिश्रण त्यांनी प्रत्यक्ष बोलून दाखवलं. त्यानंतर मीसुद्धा स्टेजवर जाऊन काहीतरी बोललो. काय बोललो ते नक्की आठवत नाही. परंतु त्यानंतर मात्र मला 1985 बॅचच्या एकाही कार्यक्रमास पुन्हा कधी बोलवण्यात आले नाही!असो !!

माझ्या नात्यामध्ये सरांचे काही विद्यार्थी पसरलेले आहेत. सर भौतिकशास्त्र चांगलं शिकवितात  हे मत त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये सातत्यानं दिसुन येतं. बाकी काही विद्यार्थी त्यांना अनिल कुंबळे या नावाने सुद्धा ओळखत असत हे ऐकिवात आहे. 

हेमंतच्या चिरतरुण प्रतिमेमागे त्याच्या धर्मपत्नीचा खूप मोठा वाटा आहे. ते जेव्हा वसईत असतात त्यावेळी त्यांना दोन्ही वेळी घरगुती जेवण ते  जिथे असतात तिथं पोचवण्यात येतं. ते घर सोडून कितीही वेळ बाहेर भटकत असले तरी त्यांना घरी फारसा ओरडा मिळत नसावा असे मानण्यास एकंदरीत परिस्थितीजन्य पुराव्यानुसार वाव आहे. त्याच्या ८५ बॅचमधील सहाध्यायी मुलींचे (???) सौ.डोंगरे अत्यंत आपुलकीने आदरातिथ्य करत असल्याचं ऐकिवात आहे. 




आता वळूयात ते ह्या बहुरंगी व्यक्तिमत्वाच्या एकेक पैलुकडे !!

पट्टीचे पोहणारे  !!

पावसाळ्याच्या मोसमात वसईतील काही मंडळी पाण्यानं तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये आपल्या पोहण्याच्या कलेचे प्रदर्शन विनाशुल्क करत असतात. ह्यात केवळ पोहणे समाविष्ट नसुन विहिरीच्या काठावरुन मारलेल्या विविध डायविंग प्रकारांचा समावेश होतो. हेमंत ह्यांनी मारलेली ही "निरागस सूर". हे बहुदा २०१६ सालातील चित्र आहे. त्यावेळी हा सर्व ग्रुप २०२० ऑलिम्पिकमध्ये synchronized swimming ह्या क्रीडाप्रकारात भाग घेण्याचा विचार करत होता.  ह्या प्रतिमेतील डाव्या बाजुचे सुरमारे डोंगरे सर आहेत.

त्यांच्या ह्या प्रसिद्धीमुळे वसईतील काही वजनदार व्यक्ती त्याच्याकडे पोहण्याची शिकवणी लावण्यासाठी उत्सुक आहेत. परंतु वजनदार व्यक्ती आणि भौतिकशास्त्राचे नियम ह्यांची पाण्यात कशी सांगड बसेल ह्याविषयी खात्री नसल्यानं हेमंत ह्या बाबतीत चालढकल करताना आपल्याला आढळुन येतोय !





पंडितांच्या शब्दात सांगायचं झालं तर ... 
"सूर निरागस हो" हे गाणे तर गळ्यातील सूर नाही तर सरांची विहिरीतील सूर पाहूनच लिहिले असणार अशी मला नक्की खात्री आहे. पट्टीचे पोहणारे सर अवघ्या महाराष्ट्राचे ते सुर सम्राट आहेत. इतकेच काय वसईच्या थोर समाजसेविका भगिनी सुगंधा मौशी जोशी सुतारआळीकर यांना विहिरीत पोहायला शिकवण्याची भीष्म प्रतिज्ञा सरांनी केली आहे. 

आपलं पोहण्यातील कौशल्य विविध खंडात सिद्ध व्हावं ह्यासाठी अमेझॉन जंगलासारख्या दुर्गम ठिकाणी पोहण्यास जाण्यास सर अजिबात कचरत नाहीत. 



"सुरमई" सम्राट


पुन्हा एकदा पंडितांच्या शब्दात 
वसई नायगांव कोळीवाड्यातील मासळी बाजार करोडोंची उलाढाल करतो.  त्यातही सरांचा मोठ्ठा वाटा आहे. अनेक मित्रमंडळींना एकत्र करून ते मासळी विकत घ्यायला जातात. त्यांना आठवड्याला (हो आठवड्याला) पुरेल इतकी तब्बल २० ते २४ हजारांची मच्छि ते स्वतःसाठी घरी घेऊन येतात. त्यामुळेच मच्छिमार समाजाने राज्य सरकारकडे अखिल भारतीय मच्छि विक्रेता संघाने  सरांना ब्रँड अँबेसिटर करण्याची मागणी करत त्यांना राज्य मंत्र्यांचा दर्जा देण्याची विनंती केली आहे. तसेच त्यांचे पोहतानाचे सूर पाहून आणि सर्वात आवडती मच्छिवरून त्यांना  "सुरमई" सम्राट अशी उपाधी देखील दिली आहे. 

फोटोत  जरी पापलेट दिसत असले तरी पंडितांच्या  शब्दावर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्या ह्या मासे खाण्याच्या अफाट क्षमतेमुळं काहीसा असुयाभाव निर्माण झालेला त्यांचा मित्रवर्ग "आठवड्याला एवढे मासे खाणारा  'असूर' वर्गात येऊ शकतो" अशा शब्दांत त्यांची संभावना करतो.  

जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटू 



एकदा मी प्रोफेसरांना प्रश्न विचारला होता. वसईतील तुमचं नामांकन कितवे असावं ? सरांच्या बॅडमिंटन वर्तुळात त्यांना हरवणारे एक - दोघंजण असावेत. त्यामुळं त्यांनी आत्मविश्वासानं उत्तर दिलं - तिसरं ! माझ्या चेहऱ्यावरील भाव पाहुन त्यांनी मनोमनी एक चंग बांधला असावा. यंदाच्या मे महिन्यात त्यांनी वसईत एका बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन करुन त्यातील तीन-चार स्पर्धा प्रकारातील विजेतेपदं पटकावली. त्यामुळं आता त्यांना वसईतील जागतिक दर्जाचे बॅडमिंटनपटु असं कायम संबोधण्यात येईल.  

हौशी सायकलस्वार

आपल्या बॅडमिंटन कौशल्याला पुरक म्हणुन त्यांनी गेल्या काही वर्षात सायकलस्वार होण्याचं मनावर घेतलं आहे. आपल्या जिवलग मित्रांसोबत नोव्हेंबर - मे महिन्यात ते बरेच वेळा वसईच्या निसर्गरम्य भागात सायकलस्वार बनुन हिंडताना दिसतात. 



हौशी क्रिकेटपटु 



सरांच्या अंगी विनम्रपणा ओतपोत भरला आहे. आपण काही उत्तम क्रिकेटपटु नाहीत हे ते सांगत असले तरी ८५ बॅचच्या अतिउत्साही मित्रांमुळं त्यांना दरवर्षी NPL मध्ये सहभागी व्हावं लागतं. ८५ बॅचचा क्रिकेट संघ म्हणजे सचिन पाटणकर ह्या सुप्रसिद्ध क्रिकेटपटुवर आधारित एकखांबी तंबु ! सर सचिनला सदैव साथ देताना दिसुन येतात! वरील फोटोत  खरंतर ते non-striker end ला उभे आहेत पण कॅप्टनला साथ द्यायला हवी ही भावना मनात इतकी दाटुन आली की त्यांनी तिथंच फलंदाजीचा पवित्रा घेतला !

धाडशी स्वभावाच्या छटा ! 


सरांचा स्वभाव तसा मुळचा धाडशी नसला तरी त्यांनी मध्यंतरी प्रचंड धाडस केलं होतं. आपल्या मित्रांसोबत ते एकटे बँकॉकला जाऊन आले. तिथल्या जीवनाचा अनुभव घेतला आणि नंतर तिथल्या रोचक अनुभवांवर त्यांनी चक्क ब्लॉग लिहिला ! ह्या धाडसाबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच !



सर्पमित्र 


आपल्या सामाजिक कार्याच्या निमित्तानं सर महाराष्ट्रभर फिरत असतात. अशा दौऱ्यांमध्ये ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा विविध सर्पवर्गातील प्राण्यांशी भय न बाळगता संपर्क साधताना दिसतात. 







प्रकाश आमटेंसोबत!! 
सरांनी धरलाय तो प्रसिद्ध बँडेड क्रेट, नागाच्या अनेक पट विषारी




सामाजिक कार्य  

सरांचा  सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग आहे. ८५ बॅच आणि वसईतील सामाजिक संघटनांच्या माध्यमातुन ते विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. काही वर्षांपुर्वी त्यांनी "स्वरानंदवन" ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातुन आनंदवन उपक्रमासाठी निधी उभारुन देण्यास मदत केली होती.  

परंपरेला झुगारुन देणारा   

सर भौतिकशास्त्र आणि गणित ह्या विषयांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अध्यापन करतात. ह्या क्षेत्रात राहुन म्हणुन की काय त्यांच्यामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरांना आव्हान देण्याची वृत्ती दिसुन येते. आणि केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात असं न होऊ देता त्यांनी आपल्या स्वतःच्या वर्तवणुकीद्वारे ह्याचा आदर्श घालुन दिला आहे. 

लोकल प्रवासाचा धसका 

लोकल ट्रेनच्या प्रवासाविषयी मात्र सरांनी काहीसा धसका घेतला असल्याचे त्यांच्या बोलण्यावरून आढळून येते. बराच वेळा वसई स्टेशनवर स्टेशनच्या पुलावर ते विरारच्या दिशेने टक लावून पाहत असल्याचे आढळुन आले आहे. शेवटी बऱ्याच गाड्या सोडून दिल्यावर ते परत आले आहेत. या सर्व बातम्यांची अफवा म्हणून ते बोळवण करतात. आणि त्यावर पुरावा म्हणून क्वचितच केलेल्या हेसुद्धा दुपारच्या कमी गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवासाची चित्रे हे विविध व्हाट्सअप ग्रुप वर प्रसारित करतात. 


उत्तम बल्लवाचार्य 


सर पेशानं आचार्य असले तरी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी मात्र ते बऱ्याच वेळा आपल्या पाककलाकौशल्याचे घरी प्रदर्शन करतात. आणि व्हाट्सअँपवर आपल्या मित्रांना त्याचा आनंद लुटण्याची संधी देतात.  त्यांनी स्वहस्ते बनविलेल्या (त्यांच्या म्हणण्यानुसार) मसालेदार चिकनचे हे छायाचित्र!

उत्तम गायक 

सर उत्तम गायक आहेत. आपल्या ८५ बॅचच्या सहकाऱ्यांच्या सानिध्यात असले की उत्तमोत्तम गाण्यांचा नजराणा ते पेश करतात. त्यांच्या बॅचमधील मुकेश ह्यांच्या साथीनं त्यांनी अनेक मैफिली गाजवल्या आहेत. काही तांत्रिक कारणांमुळं ह्याचा पुरावा सादर करु शकत नाही.  


व्याख्याता - प्रमुख पाहुणे 



सरांची वाटचाल  वसईतील एका प्रसिद्ध वैचारिक व्यक्तिमत्वाच्या दिशेनं चालु असुन बऱ्याच वेळा त्यांना वसईतील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणुन अगत्याचं आमंत्रण असतं !









त्यांच्या एका हितचिंतकाच्या  शब्दांत   सांगायचं झालं  तर !  

उदयनराजे आणि आइन्स्टाइनसारखे दिसणारे तसेच त्या दोन्ही व्यक्तींसारखेच अनुक्रमे भारदस्त आणि हुशार असणारे शिक्षण महर्षी, संतशिरोमणी हेमंत डोंगरे सर माझे चांगले मित्र असणे हे खरं तर माझ्यासाठी अहोभाग्य 


हे सर्व झाले सरांच्या बहुरंगी व्यक्तिमत्वाचे काही पैलु !! आता वळुयात त्यांच्या सर्वात महत्वाच्या पैलूंकडे ! हा असा पैलु ज्यामुळं एक खराखुरा मित्र, सल्लागार म्हणुन त्यांच्याकडं अनेकजण पाहत असतात. 


उत्तम मित्र /सल्लागार / स्थितप्रज्ञ 

सरांचा स्वभाव खुप स्थितप्रज्ञ आहे. ते भडकलेले आहेत असं माझ्यातरी पाहण्यात आलं नाही. एखाद्या कठीण प्रसंगी सल्ला मागायला जावं असं हे एक व्यक्तिमत्व! आपलं बोलणं ते शांतपणे ऐकुन घेतात. आणि आपल्या एका खास शैलीत ते आपलं मत नोंदवितात. कोणी एखादा सल्ला मागायला आला म्हणजे त्याला सल्ला द्यायलाच हवा असं त्यांचं म्हणणं नसतं. जर आपल्याकडं समोरच्याला हवी असणारी माहिती नसेल तर ते तसं मोकळेपणानं त्या व्यक्तीला सांगतात. आणि त्यांच्या माहितीत कोणी योग्य व्यक्ती असेल तर तिचा संदर्भसुद्धा देतात.   

त्यांच्या जवळच्या सुहृदांनी व्यक्त केलेल्या त्यांच्याविषयीच्या प्रतिक्रिया ... 

१००%  विश्वास वाटावा असा मित्र

बोलतो खूप, चिडवतो खूप... पण करतो खूप ... गरज असेल ते तो करतो

मला त्याचा रोखठोकपणे बोलण्याचा प्रकार आवडतो . आणि तो जे बोलतो ते करतो हे नक्की आहे

वेळ , पैसा, मेहेनत सर्व बाबतीत तयारी असते. Only thing we all fear
तो कधी काय बोलेल नेम नाही बरं बोलतो ते एकदम correct असतं  
Open minded Outspoken



धन्य भाग हमारे जो आप ने हमें गुरुदेव की शान मे कुछ कहने का मौका दिया!!!


पुन्हा एकदा पंडित उवाच !!

सरांचा स्वभाव. ते हुशार, बुद्धिमान, नेहमी शांत स्वभावी तसेच ते नेहमी हसतखेळत आणि आनंदी असतात आणि महत्वाचं म्हणजे ते विनोदी देखील आहेत. चर्चेत, गप्पात नर्मविनोद जोक, मजा मस्करी यामुळे आमचे स्वभाव जास्त जुळले. एक राजकारण सोडले तर आमच्यात मतभेद अगदी नाहीच. शिक्षकांना सातवा वेतन आयोग मिळण्यामागे सरांचे मोलाचे परिश्रम आहेत. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असूनही मराठी भाषेवर त्यांचे जबरदस्त प्रभुत्व आहे. लिखाण, भाषाशैली प्रभावी आहे. विनोदी स्वभाव ही तर त्यांची खासियत. ते शिक्षणासोबतच अनेक क्रीडा प्रकारात ते रुची ठेवून आहेत. बॅडमिंटन मध्ये तर वसईचे प्रकाश पडुकोणच. बुद्धिबळ, कॅरम, रायफल शूटिंग ह्यात ही वाकबगार. 
अफाट बौद्धिक खजिना असलेले, प्रचंड आर्थिक सुबत्ता असलेले सर तितकेच सेवाभावी. अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी हातभार असतो. 
अशा या आमच्या सदाबहार सरांनी यशाचे उत्तमोत्तम डोंगर पार करोत ही ईश्वरचरणी प्रार्थना..

वरील प्रतिक्रिया सरांचा जनमानसावर असलेला पगडा अधोरेखित करतात. सर दोस्तों के दोस्त आहेत. सर आणि PM ह्यांची मैत्री अखिल महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सरांच्या मैत्रीला PM सुद्धा दिलदारपणे दाद देतात. PM ह्यांच्या वाडीतील हिरव्यागार भाज्यांपैकी काही भाज्या  होळी बाजारात पोहोचण्याआधी सरांच्या किचनमध्ये स्वखुशीने विसावतात! सरांसोबत PM च्या विहिरीत पोहण्यास गेलेले त्यांचे विविध वयोगटातील मित्रसुद्धा प्रसंगी PM ह्यांच्या दानशुरतेचे लाभार्थी होताना दिसतात. अशाच एक बालवर्गातील लाभार्थीच्या घरी बनलेली केळफुलाची भाजी !




साहजिकच आहे की ही पोस्ट खुपच लांबली तरी बरंच काही बाकी असल्यासारखं वाटतंय ! सरांचे व्यक्तिमत्व आहेच तसं व्यापक ! ह्या पोस्टने प्रेरणा घेऊन ८५ बॅच आता सरांवर पुस्तकच लिहेल असं मला वाटतंय! पंडितांच्या म्हणण्यानुसार ब्लॉगमध्ये व्यक्तिमत्व मावणे शक्य नसल्याने NES ८५ बॅच  सरांचा बायोपिक सिनेमासुद्धा बनवु शकते. आणि ही बातमीवर शिक्कामोर्तब होण्याआधीच सरांची भुमिका कोणी वठवायची ह्यावरुन  वादही सुरु झालेत म्हणे !!

बायोपिक किंवा पुस्तकात टाकण्यासाठी उपयोगी पडू शकणाऱ्या सरांच्या काही आकर्षक मुद्रा !!

















जाता जाता १९९३ साली आलेल्या सर ह्या चित्रपटातील हे गाणं बहुदा सरांना डोळ्यासमोर ठेवून लिहलं असावं !!

आज हमने दिल का हर किस्सा तमाम कर दिया !!
आज हमने दिल का हर किस्सा तमाम कर दिया !!
Sir sir ho sir we love you!! 

शुक्रवार, १३ जुलै, २०१८

वसईचा पाऊस आणि व्यावसायिक वर्ग !






गेल्या आठवड्यातील वसई परिसरातील मुसळधार पावसामुळे तिथं पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे वसईतील दैनंदिन जीवनात आणि वसईहून मुंबईला नोकरी, शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या लोकांच्या जीवनात प्रचंड अडचणी निर्माण झाल्या.  वसईहुन मुंबईला शिक्षण, नोकरीसाठी जे लोक प्रवास करतात त्यांच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनातील अडचणींविषयी मीमांसा करणारी पाच वर्षांपुर्वीची ब्लॉग पोस्ट मी कालच शेअर केली.


आज त्याच विषयावर काहिसं विस्तारानं लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे.  एकंदरीत वसईची सद्यस्थिती ही परिवर्तनाचा मधला टप्पा असं आपण म्हणू शकतो. ६० - ७० वर्षांपूर्वी वसईतील बहुतांशी लोक शेतीवर अवलंबुन होते. परंतु कालांतरानं केवळ शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबुन राहणे शक्य होणार नाही याची जाणीव वसईतील लोकांना झाली असावी. त्यामुळे शिक्षण घेऊन नोकरी करण्याकडे लोकांचा कल दिसू लागला. त्यावेळी असणारी मुंबईतील लोकांची मर्यादित संख्या आणि परिणामी लोकल गाड्यांतील कमी गर्दी यामुळे वसईवरुन मुंबईला नोकरी करणार हे आवाक्यातील होते. परंतु पुढे मीरारोड, भाईंदर, वसई नालासोपारा आणि विरार या भागातील लोकसंख्या प्रचंड वाढली. त्यामुळे लोकल गाड्यांतून प्रवास विशेषतः गर्दीच्या वेळी जवळपास अशक्यप्राय होऊन बसला आहे. रस्त्याने जावं म्हटलं तर ट्रॅफिक जॅम होण्याची दोन तीन ठिकाणे आहेत जिथे ट्रॅफिक जाम केव्हांही होऊ शकतो. 

आतापर्यंतचा पोस्टचा भाग हा प्रस्तावना असे म्हणता येईल.  आता मुख्य मुद्द्याकडे वळतो. वसईतील जीवनाचा स्तर निर्विवादपणे चांगला म्हणता येईल. आता प्रत्येकाच्या चांगलं जीवन कशाला म्हणावं याविषयीच्या संकल्पना वेगवेगळ्या असतात. पण वसईतील जीवन चांगलं का म्हणावं तर शुद्ध हवा, ताजा भाजीपाला, चांगल्या दर्जाचे मासे /मटण, वाहतूक कोंडीची समस्या नाही या बऱ्याच चांगल्या गोष्टी उपलब्ध आहेत. माणसं बऱ्यापैकी समाधानी वाटतात मला वसईत! परंतु वसईत राहुन जर तुम्हाला उपजीविका करायची म्हटली तर मुंबईच्या तुलनेने कमी संधी उपलब्ध आहेत. वसईतील माणसं बहुधा एका द्विधा मन:स्थितीत सापडलेली असतात असं धाडशी विधान मी करु इच्छितो. वसईला सोडुन नोकरीसाठी मुंबई / दुसऱ्या शहरात वास्तव्य करावं की वसईतल्या वसईत राहून उपलब्ध व्यवसायिक संधींचा वापर करावा हा तो संभ्रम.  यातील कोणता निर्णय घ्यावा हे प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. 

आता ह्या सर्व प्रकाराकडं दुसऱ्या दृष्टीने पाहुयात ! एका शहराची एक विशिष्ट आयडेंटिटी किंवा ओळख असते. त्या शहरात बुद्धिजीवी वर्गाला राहण्यासाठी अनुकूल घटक आहेत की नाही हा त्या शहराची ओळख बनवण्यात महत्त्वाचा घटक आहे. आता वसईतील बुद्धिजीवी लोकांच्या दृष्टीतून पाहिले असता त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्या प्रकारचा अनुभव मिळतो ते पाहूयात. दिवसाचे सरासरी तीन ते चार तास प्रतिकुल प्रवासात व्यतित करावे लागतात. वसईतील विद्युत पुरवठा पुर्णपणे नियमित केव्हाच नसतो. त्यावर उपाय म्हणून बऱ्याच जणांनी इन्वर्टर बसवले आहेत इंटरनेट कनेक्शनचा स्पीड असूनही सुधारण्यास वाव आहे.  तुमची कंपनी तुमच्याकडून उपलब्धतेची एका विशिष्ट पातळीवर अपेक्षा बाळगून असते. एखादा महत्त्वाचा कॉल तुम्हाला घरुन घ्यावा लागतो आणि दुनियाभरातील लोकांना २५ MB साईझचे प्रेसेंटेशन संगणकावरुन शेयर करावं लागतं त्यावेळी हे सर्व घटक व्यवस्थितपणे काम करत असणे आवश्यक असते. कंपनीच्या दृष्टीकोणातून पाहिलं असता तुमच्या घरी असलेली विजेची, इंटरनेटची उपलब्धता याबाबतीत घरून काम करण्यास अडचणी येत असतील तर ती कंपनीची समस्या नसून तो प्रश्न तुमचा असतो आणि तो तुमचा तुम्ही सोडवायचा असतो. आता प्रत्येक शहरातील बुद्धिजीवी व्यावसायिकाला या आधुनिक काळातील या मूलभूत सोयींची उपलब्धता करुन देण्यात शहरातील प्रशासनाची सुद्दा जबाबदारी नक्कीच असते. 

आता या बुद्धिजीवी वर्गाची एक खासियत आहे. यातील बहुतांशी लोक आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्याचा स्वतःहून प्रयत्न करीत नाहीत आणि ते का करीत नाहीत याची त्यांच्याकडे शेकडो कारणे असतात.  एक गोष्ट मात्र त्यांच्या बाबतीत काहीशी अप्रत्यक्षरीत्या घडत असते. जर एखाद्या शहरात किंवा विभागात त्यांच्या वास्तव्यासाठी आणि व्यावसायिक जीवनातील त्यांच्या कामगिरीला अनुकूल असे घटक उपलब्ध नसतील तर ते हळूहळू त्या भागातून काढता पाय घेण्याची मानसिकता दर्शवितात. आता त्या भागातील लोकप्रतिनिधींना किंवा प्रशासनाला हा बुद्धीजीवी वर्ग किती महत्त्वाचा वाटतो यावर त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कितपत प्राधान्य दिले जाते हे अवलंबून असतं . 

आता मी जो काही बुद्धिजीवी वर्ग असे मगापासून म्हणत आहे त्यात सुद्धा अनेक प्रकार असतात. यातील काहीजण एकदम स्ट्रॅटेजिक डिसिजन (महत्वाचे धोरणात्मक निर्णय) घेण्यात सहभागी असतात. त्यांच्या बुद्धीच्या पातळीमुळे त्यांना दररोज आठ तास काम करणार गरजेचं नसतं. त्यांच्या बुद्धीने एखादी विशिष्ट बुद्धिमान (brilliant) कल्पना पाच मिनिटात दिली तर त्याच्या जोरावर ते पुढील आठवडा महिना सुद्धा आरामात निभावून नेऊ शकतात.  असा वर्ग आरामात वसईत वास्तव्य करू शकतो आणि व्यावसायिकजीवन आणि त्यातील सर्व जबाबदाऱ्यासुद्धा निभावू शकतो.  परंतु दुसरा एक गट असा असतो की ज्यामध्ये तुमची दिवसातील किमान आठ ते दहा तास उपलब्धता हा एक महत्त्वाचा घटक तुमचे व्यावसायिक महत्त्व ठरवतो आणि हा एक असा वर्ग आहे ज्याला मुंबईला प्रवास करण्यात येणाऱ्या अडचणी आणि वसईत राहून तोंड द्याव्या लागणाऱ्या वीज आणि इंटरनेटची अनियमित उपलब्धता या घटकांचा मोठा फटका बसू शकतो. गेल्या काही दिवसांत वीज, इंटरनेट नसल्यानं आणि मुंबईला जाऊ न शकल्याने ह्यातील कितीजणांनी व्यावसायिक तोटा स्वीकारला ह्याची चाचपणी केली तर काही धक्कादायक आकडेवारी समोर येण्याची शक्यता जास्त आहे. 

ह्या आठ - दहा तास काम करुन आपलं व्यावसायिक आयुष्य जगणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाच्या वास्तव्यासाठी वसईत अनुकूल वातावरण निर्माण करणं ह्यासाठी बऱ्याच घटकांना एकत्र येऊन पुढील काही वर्षे काम करावं लागणार आहे. प्रयत्नांची प्रामाणिकता आणि मनोबल हे दोन घटक ह्या प्रवासातील फार महत्वाचे घटक ठरणार आहेत. 

जाता जाता दिवसाला तीन-चार तास प्रचंड गर्दीत प्रवास करुनसुद्धा  लोक वसईला येणं का पसंत करतात हे जाणुन घ्यायचं असेल तर वसईतील नामांकित छायाचित्रकार प्रितम पाटील ह्यांनी काढलेलं हे छायाचित्र पहा!



रविवार, ८ जुलै, २०१८

VNU


श्री गणेशाय नमः !!

एखाद्या विषयाला गवसणी घालण्याची आपली जर कुवत नसेल तर त्याच्या नादाला लागु नये हे माझं तत्त्व!  त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती आणि तिचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी असेल की जे समजायला आपल्याला कठीण पडणार असेल तर त्यावर पोस्ट लिहायची धारिष्ट्य करु नये असा खरा तर माझा समज! परंतु एकदा मजेमजेत मी तुझ्यावर पोस्ट लिहितो म्हटल्यावर विनूने ते त्याच्या मनाच्या असंख्य कोपऱ्यांपैकी एका कोपऱ्यात घट्ट लिहुन घेतले . ह्या माणसाची निरीक्षणशक्ती अफाट ! मी साधारणतः शनिवारी मोठाले ब्लॉग लिहितो हे त्याच्या ध्यानात आलं असणार. त्यामुळे काल रात्री त्यानं विचारणा केली AP माझ्यावरचा ब्लॉग झाला की नाही लिहुन!  आता त्यानंच  विचारला म्हणजे ब्लॉग लिहिण्याचा प्रयत्न जरी पूर्ण तयारीनिशी नसला तरी तो खपवून घेतला जाईल यामुळे आजचं हे धारिष्ट्य !

विनायक सुभाष पंडित! अग्निपथमधील अमिताभ बच्चनच्या विजय दीनानाथ चौहान नावाइतकेच किंबहुना अंमळ जास्तच भारदस्त! विनुचे मुळचे गाव चिंचणी जवळचे वरोर! पंडित कुटुंबीय हे एकंदरीत संस्कृतीचे मोठे पुजारी असावेत असा विनूकडे पाहून अंदाज बांधता येतो. त्याचे आजोबा राजकारणी (११ वर्षे सरपंच) आणि समाजकारणी असल्यानं गावात त्यांचा खुप मान आणि दरारा होता. तेथील मंदिर उभारण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता.  विनुची आई मुळ वसईची आणि तिची नोकरीची शाळा दहिसरला आणि वडिलांची बदली पंचायत समिती ठाण्याला झाली. ह्या कारणास्तव विनुचे आई वडील वसईत स्थानिक झाले. विनू मात्र लहानपणापासून जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा गावी जाऊन जायचा रहायचा. त्याच्या म्हणण्यानुसार दीड-दोन वर्षाचा असल्यापासून तिथं जाऊन तो एकटा राहायचा. आता विनूला ज्याने कोणी जवळून पाहिलं आहे किंवा त्याचा फेसबुक अवतार अनुभवला आहे त्या सर्वांना विनूवर आणि त्याच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवावा ही नेहमीच संभ्रमात  टाकणारी बाब आहे. पण दीड वर्षाचा बाळ विनु वरोर गावी एकटा जाऊन रहायचा ही विश्वास ठेवण्याजोगी बाब आहे. एक मात्र खरं की विनूला आपल्या गावाची प्रचंड ओढ आहे आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रितीभाती अगदी त्यांचा पूर्ण अर्थ समजावून घेऊन परिपुर्णपणे पार पाडण्याकडे त्याचा कल असतो. सकाळी साडेतीन वाजता उठून पूर्ण चालीरीतिपुर्ण दिवाळीची पहिली आंघोळ पार पडणारा विनु  हा एकमेव माझ्या माहितीतील तरुण असावा. त्याच्या पहिल्या आंघोळीच्या उघड्याबंब फोटोंमुळे त्याची तुलना सलमान खानशी होऊ लागली असावी असा मला संशय आहे. विनूला गरिबांचा सलमान खान म्हणण्यात येतं त्यांना सलमान खानचा तेरे नाम हा चित्रपट ११३ वेळा पाहिला आहे असे त्याचे म्हणणे आहे. 

आत्ता इथे जरी मी विनू म्हणत असलो तरी खरं ते आहे VNU! यामध्ये पहिला V विनायकचा, N निहिरा आणि U उमिकाचा! हे सर्व जुळवून आणण्यासाठी ह्या पठ्ठ्यानं आपल्या मुलीचं नांव U वरुन ठेवण्याचा अट्टाहास धरला असावा.  ह्याने शालेय शिक्षण घेतलं ते वसईच्या RP  वाघ हायस्कूलमध्ये! बाकी सर्व आम्ही मित्रमंडळी न्यू इंग्लिश स्कूलची असल्याने अधुनमधुन हा आपल्यातला नाही अशी भावना आमच्यात निर्माण होते. परंतु या भावनेनिमित्त निर्माण झालेल्या आमच्या दुजाभावाला तो एकटा पुरून उरण्याची क्षमता तो बाळगुन आहे. त्याला RP  वाघची मंडळी एकत्र का आणता आली नाहीत असा मला मनात पडलेला प्रश्न कधीतरी त्याला विचारावासा वाटतो परंतु त्याविषयी तो काही फारसं वाईट वाटून घेणार नाही. ही न्यु इंग्लिश स्कुलची पोर इतकी हुशार कशी ही शंका लहानपणापासुन त्याच्या मनात खदखदत असली तरी ती प्रत्यक्षात बोलुन दाखवेल तो विनु कसला? 

विनूची विनोद बुद्धी जबरदस्त आहे आणि या विनोदबुद्धीला मराठी भाषेचे भाषेवरील त्याच्या प्रभुत्वाचे सहाय्य लाभले असल्याने तो जातिवंत विनोदाची हमखास पेरणी करू शकतो. त्याच्या तोडीस तोड विनोद करणारे हेमंत डोंगरे सर आणि राहुल ठोसर आणि बाकी काही त्यांची मित्रमंडळी एकत्र आली की मग एकमेकांना देण्यात येणाऱ्या कोपरखळ्यांची बहार उडवून दिली जाते. परंतु यातील काही संज्ञा ह्या केवळ त्या निवडक लोकांनाच माहीत असतात त्यामुळे आपल्याला मात्र केवळ त्या कळल्यासारखं करुन हसण्याचे नाटक करावं लागतं. 

स्पष्ट सांगायचं झालं तर काही महिन्यांपूर्वी विनु स्थूल होता. त्याला त्याआधी सुद्धा बऱ्याच जणांनी या वास्तवाची जाणीव करून दिली असणार. म्हणा तो ज्या ग्रुपमध्ये वावरतो तिथं एखादं सत्य सभ्यपणे सांगण्याची पद्धत नाही किंवा तिथं सत्य उतरण्याआधीच त्या ग्रुपकडून तुम्हाला ते भयानक परखडपणे सांगितलं जाण्याची पद्धत आहे. त्यामुळे तो स्थूल होण्याच्या बरेच आधी त्याला हे सांगण्यात आले असणार. त्यानं कित्येक वर्ष त्यावर काहीच केलं नव्हतं. परंतु सहा महिन्यांपूर्वी नक्की काय झालं कुणास ठाऊक! विनूने फिटनेसचे वेड डोक्यात घेतले. सकाळचा सूर्योदय ज्यांना गेले कित्येक वर्षे पाहिला नसेल असा हा विनू सहा वाजता उठून सायकलिंगला जायला लागला. वसईतील जागतिक दर्जाचे बॅडमिंटन खेळाडू हेमंत डोंगरे सर यांच्याकडून बॅडमिंटनची शटल्स मिळावीत म्हणून त्यांच्या मनधरण्या करू लागला. डोंगरे सरांनी शटल्स देणे जरी त्याच्या हाती नसले तरी सायकलिंग करणा मात्र त्याच्या हाती होतं त्यामुळे जिद्दीने सायकलिंगचा पाठपुरावा करून त्यांना गेल्या सहा महिन्यात तब्बल 20 किलो वजन घटवले. विनु हा पट्टीचा पोहणारा आहे. आफ्रिका खंडातील अमॅझॉन खोऱ्यातील विहिरीत दोन वर्षांपुर्वी वसईतील काही मंडळी अत्यंत धाडस करुन पोहण्यास गेली होती. त्यावेळी लाल शर्टात असणारा हा विनु! विहिरीच्या पाण्यात बोचकं वगैरे प्रकारांचं प्रदर्शन करण्यात विनूचा हातखंडा आहे हे मी ऐकुन आहे !


मित्रांच्या वाढदिवसांची फेसबुकवर अतिशोयक्ती अलंकारयुक्त आणि विनोदाचे कारंजे निर्माण करणारी पोस्टर्स बनवण्यात विनूचा हातखंडा आहे. जोपर्यंत विनुचे पोस्टर येत नाही तोपर्यंत लोकं बेचैन होऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू करीत नाहीत. त्याच्या या पोस्टर्समुळे वसईमध्ये तुम्हाला असंख्य जागतिक दर्जाचे लेखक, व्यवसायिक, खेळाडू वगैरे असण्याचा भास होईल. ते जे मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरेचे प्रकार म्हणतात ना! त्याचा वापर करून जर कोणी विनूच्या फेसबुक पोस्टचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सर्व पोस्ट पृथ्वीवरील माणसाच्या नसून हा मनुष्य आणि त्याची मित्रमंडळी मागची काही शतकं आणि पुढची काही दशके यामध्ये वेगाने पुढे मागे करीत आहेत असा त्यांना भास होण्याची शक्यता आहे. 

विनू स्वतःचे लग्न हे जमवून म्हणजे घरच्यांनी जमवून दिलेले लग्न असे म्हणतो. परंतु याविषयीदेखील शंका घेण्यास प्रचंड वाव आहे. घरच्यांकडून स्थळ आले आणि मग मी ते पुढे नेले असे तो म्हणतो. आता त्याच्या या विधानाची खातरजमा जमा करुन घेण्यास अजिबात वाव नाही. काही काळापूर्वी म्हणजे अगदी गेल्यावर्षीपर्यंत विनू विनोदी गाणी बनवून की फेसबुक वर टाकायचा. त्याची गायन कला आणि विनोदबुद्धी यांचा उत्तम संगम या गाण्यांमधुन आढळून येत असे. परंतु पूर्ण धमाल करणारा तरुण  ते एक जबाबदारीने वागणारा मध्यमवर्गीय गृहस्थ हा जो विनूचा प्रवास गेल्या काही महिन्यांपासून चालू झालो आहे त्यामुळे त्याचे फेसबुक वरील हे गायन संपले असे मानण्यास वाव आहे सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय या गाण्याचे विनू वर्जन तुम्हाला कुठे सापडलं तर पहा!!!

विनूला राजकारणाविषयी भरपूर काही माहिती आहे. तो एका विशिष्ट पक्षाशी ओढ बाळगून आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचा तो हिरीरीने वैयक्तिक पातळीवर पुरस्कार करतो किंवा त्यांच्यावरील टीकेला तो सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु या सर्व प्रकारात तो समोरचा माणूस दुखावला जाणार नाही याची काही विशिष्ट मर्यादेपर्यंत काळजीसुद्धा घेतो. राजकारणाविषयी त्याच्या मनात प्रचंड ओढ असली तरीसुद्धा राजकारणासाठी लागणारा धूर्तपणा माझ्यात नाही असे तो म्हणतो आणि त्यामुळे मी राजकारणापासून दूर राहतोय असे तो म्हणतो काही प्रमाणात ते सत्य असावे. विनूच्या अंगी छायाचित्रणाची सुद्धा कला आहे परंतु आपला स्वयंघोषित छायाचित्रकार मित्र राहुल ठोसर याच्या फेसबुक लाईक्स वर गदा येऊ नये म्हणून तो आपली छायाचित्रकारिता आणि त्याचे सोशल मीडियावरील प्रदर्शन मर्यादित ठेवतो. तरीदेखील त्याचे छायाचित्रकारितेतील कौशल्य अशा फोटोमधुन डोकावत राहते. 


वसईतील कला क्रीडा महोत्सवाच्या आयोजनात तो सक्रिय सहभाग घेतो. विनुची भारतीय रितीविषयीची ओढ त्याच्या विविध सामाजिक / सांस्कृतिक उपक्रमांतून परिवर्तित होते. अस्तंगत होत चाललेल्या ढोल संस्कृतीला पुनर्जीवन देण्याच्या उदात्त हेतूनं स्थापन झालेल्या वसईतील ढोल पथकाचा तो सक्रिय सभासद आहे. महाराष्ट्रदिन, दसरा अशा पवित्र सणांच्या दिवशी हे ढोल पथक वसईच्या मुख्य भागातुन मिरवणुक काढतात. त्या निमित्त विनुची फेसबुकावरील ही पोस्ट त्याच्या मराठीवरील प्रभुत्वाची जाणीव करुन देते. 

गर्व आहे #महाराष्ट्रीय असण्याचा
अभिमान आहे #ढोल_ताशा च्या कलेचा
जपतो आपली महाराष्ट्राची #संस्कृती
#निष्ठा आहे आपल्या #मराठी मातीशी
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

ह्या माणसाचं आधीचं स्थूलपण त्याच्या खवय्येपणातुन आलं आहे. पारंपरिक पदार्थाचं त्याला भारी वेड असावं. यंदाच्या उन्हाळ्यात त्याच्याकडुन (म्हणजे अर्थात त्याच्या फेसबुकवरील पोस्टवरुन) मला ही रायत ह्या पदार्थाची रेसिपी कळली. 

हॉटेलमधले पंजाबी, गुजराथी, मारवाडी पदार्थ आवडीने खाणारा पण घरच्या #पारंपारिक खाद्यपदार्थांवर अक्षरशः हात,बोट चाटून/पुसून यथेच्छ #ताव मारतो तो खरा #मराठी. आपल्या पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची चव काही औरच..

छोटे गावठी आंबे पिकायला लागले की, आमच्या घरात आठवड्यातून किमान ५-७ वेळा बनणारा पदार्थ म्हणजे रायत.

आंब्याच्या रसात #नारळाचे दूध टाकून त्यात #मिरची_पूड, #मीठ, #गूळ आणि #मोहरीची पावडर टाकून एकत्र केले की झाले रायत. पोळी, भाता सोबत खायला योग्य. पण वाटीत याच्या रसात बुडवलेल्या #बाठ्यासोबत अगदी #बोट चाखून, चोखुन खाण्याची धन्यता काही वेगळीच..

एप्रिल - मे मोसमातील अजूनही बरेच पदार्थ बनायचे बाकी आहेत. आधी #आईने आणि आता #बायकोने असे वेगवेगळ्या मोसमातील पदार्थ बनवण्याची #परंपरा टिकवून ठेवली असल्याने त्याची चव आणि मजा घ्यायला मिळणार आहे. त्यामुळे दोघांचेही #आभार..

विनु यंदाच्या मोसमात खुप बिझी असणार आहे. नावातच गणपती असणारा विनु परम गणेशभक्त! वसईत त्यानं शाडू मातीच्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सुबक गणेश मुर्ती उपलब्ध करुन दिल्या आहेत. 
 

ह्या उपक्रमासाठी आणि एकंदरीत भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी विनुला आणि त्याच्या कुटुंबियांना मनःपुर्वक शुभेच्छा !

रविवार, १ जुलै, २०१८

साथ सोबत!



न्यु इंग्लिश स्कूल ही वसईतील एक नामवंत शाळा!! या शाळेची स्थापना साधारणतः ७५ वर्षांपुर्वी झाली. या शाळेनं वसईतील अनेक पिढ्या घडवण्याचे कार्य केलं आहे. या शाळेत अनेक गुरुतुल्य व्यक्तिमत्वांनी वास्तव्य केले आणि आपल्या ज्ञानदानाने असंख्य विद्यार्थ्यांचे आयुष्य अलंकारित केले. ह्या सुवर्णयुगातील आठवणी केवळ मनात ठेवुन गेल्या कित्येक पिढ्या राहिल्या. आणि त्यातील काही काळाच्या पडद्याआड गेल्या सुद्धा! वसईच्या सुवर्णकाळातील या अतिरम्य आठवणींना लिखित स्वरुपात नोंदवण्याचा प्रयत्न झाला नसेलच असं मी म्हणत नाही! परंतु या सर्व आठवणींची एकत्रित स्वरुपात लिखित नोंद नाही ही खंत मात्र तो सुवर्णकाळ अनुभवलेल्या बऱ्याच जणांच्या मनात आहे. 

जणु काही ही खंत ओळखुनच या सुवर्णकाळाचे साक्षीदार असलेल्या वसईतील दोन नामवंत शिक्षिका नंदिनी पाटील मॅडम आणि सापळे मॅडम या दोघींनी गेले काही महिने या आठवणींना उजाळा दिला आणि नुकतंच ह्या  आठवणी पुस्तकरुपानं प्रसिद्ध केल्या. या पुस्तकाचं नाव आहे साथ सोबत!  या दोघीजणींनी जवळपास चाळीस वर्ष या पवित्र वास्तूमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले.
अजुनही मोजक्या विद्यार्थ्यांना ह्या दोघी मार्गदर्शन करीत असतात.  या शालेय नोकरीच्या कालावधीत विविध गुणी शिक्षिकांशी त्यांचा संबंध आला. हा संबंध केवळ शैक्षणिक क्षेत्रापर्यंत मर्यादित न राहता हे ऋणानुबंध वैयक्तिक आयुष्यात सुद्धा विस्तारित झाले. आणि मग विणले गेले ते मैत्रीचे घट्ट बंध! या मैत्रीच्या अतुट नात्यांना पुस्तक स्वरुपात या दोघींनी अत्यंत सुरेख मुर्तरुप दिलं आहे. 

है दोघींच्या जवळपास २१ मैत्रिणींची व्यक्तिचित्रे या पुस्तकात आपल्याला वाचायवास मिळतात. 


यातील बहुतेक सर्वजणींनी वसईतील न्यु इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना शिकविले आहे. परंतु या शिक्षकांची तेव्हा केवळ शिक्षिका म्हणूनचआम्हांला ओळख होती. एक व्यक्ती म्हणून ह्या साऱ्याजणी कशा होत्या, त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्या अडचणींचा मुकाबला केला,  प्रत्येकीच्या अंगी कसे वेगवेगळे कलागुण आहेत आणि वयाचे बंधन पाळता अजूनही या सर्वजणी कशा एकत्र येऊन ह्या मैत्रीला उजाळा देतात या सर्वांचं एक उत्कट वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचावयास मिळतं.  

पाटील मॅडम आणि सापळे मॅडम यांनी या पुस्तकांमध्ये छोट्या छोट्या काव्यरूपी रचनांचा मुक्तहस्ते वापर केला आहे. नारकर मॅडमचा उल्लेख करताना खालील ओळी मॅडमचे चित्र खरोखर डोळ्यासमोर उभं करतात.  

हात जोडीते स्मरण तुझे। 
डोळे बंद करता मूर्ती दिसे। 
मनाच्या कोपऱ्यात ध्यास वसे। 

या रचना इतक्या बेमालुमपणे या पुस्तकातील त्या व्यक्तिमत्वाच्या छटेत अशा मिसळून जातात की आपण अगदी खुश होऊन जातो. खरंतर पाटील मॅडम प्रामुख्यानं इंग्लिश शिकवायच्या आणि सापळे मॅडम गणित आणि विज्ञानाच्या शिक्षिका!! परंतु आपल्या अंगी असलेले मराठीचे यांनी प्रभुत्व या दोघींनी या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यंत दिलदारपणे वाचकांसमोर ठेवलं आहे. 

प्रत्येक मैत्रिणीला या दोघींनी एक विशेषण दिलं आहे आणि ते विशेषण त्या मैत्रिणीच्या व्यक्तिमत्वाला अगदी साजेसं आहे! पुस्तकाची मांडणी दोन मैत्रिणींनी केलेले आपल्या बाकीच्या जिवलग मैत्रिणींचे वर्णन अशी असली तरी हे वर्णन करताना न्यु इंग्लिश स्कुल आणि वसईचा मागील काही दशकातील  सुवर्णकाळ डोळ्यासमोर अलगदपणे उलगडत जातो.  त्यातील प्रत्येक मैत्रीण ही शाळेतील एक मान्यवर शिक्षिका आणि त्यातील काही जणींचे यजमान हे मान्यवर शिक्षक! या पुस्तकाच्या माध्यमातून या ऋषितुल्य शिक्षकांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी आपल्याला मिळते.  या शिक्षिकांच्या अंगी असलेले पाककलेचे, संगीताचे अज्ञात असे पैलूसुद्धा आपल्याला समजतात. 

या पुस्तकातून शाळेच्या आवारात असलेल्या शिक्षकांच्या कॉलनीचे वर्णन अधूनमधून डोकावत राहते आणि मग वाचकाच्या मनात असणाऱ्या या कॉलनीच्या आणि त्यात वास्तव्य करुन राहिलेल्या शिक्षकांच्या आठवणी  पुन्हा जागृत होतात. हे सर्व शिक्षक मूळचे वसईचे होते असं नाही.  महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेली आणि आपल्या पेशाच्या निमित्ताने वसईत विसावलेली ही मंडळी! वसईच्या मातीत असा कोणता घटक आहे देव जाणे पण वसईत जो कोणी एकदा आला तो वसईत मनानं अगदी रमून गेला. ह्या सर्वांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं झालं आहे. वसईत कायमस्वरुपी वास्तव्य करणं सर्वांनाच शक्य झाला असे नाही परंतु जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा ही सर्व मंडळी वसईला नक्कीच येतात. ह्या मैत्रिणींच्या स्नेहसंमेलनाच्या आठवणी पुस्तकातुन डोकावत राहतात. 
वसईच्या आठवणी त्या तर मात्र मनात सदैव घेऊन वावरत असतील ह्या विषयी शंका नाही! 

मांजरेकर आणि दांडेकर ही जोडी वसईकरांना कित्येक दशके पाहिली आहे  पुस्तकातील हे वाक्य तंतोतंत परिस्थितीशी जुळणारं आहे. मांजरेकर मॅडमचं वर्णन करताना ह्या दोघी म्हणतात की १९७०-७१ साली भेटलेल्या मांजरेकर मॅडम आणि आजच्या मॅडम यांत आम्हांला कुठे बदल दिसत नाही हे वाक्य तर मनाला अगदी शंभर टक्के पटून जाते.  २००२ च्या सुमारास मांजरेकर मॅडम सत्यनारायणाच्या पुजेच्या निमित्तानं घरी आल्या होत्या. मी कोणा लहान मुलासोबत तरी सहज बॅडमिंटन खेळायला होतो आम्हाला खेळताना बघुन स्वस्थ बसल्या त्या मॅडम कसल्या! त्या देखील लगेच खेळावयास उतरल्या आणि आपल्या जीवनातील बॅडमिंटन आठवणी सांगू लागल्या.  न्यु इंग्लिश स्कूलच्या काही शिक्षकांना त्यांच्या आद्याक्षरांवरून जात असे. मीना म्हात्रे मॅडम मुळगावच्या! त्यांचं वर्णन करताना सुद्धा MH असे करण्यात आले आहे. 

 या पुस्तकाविषयी अधिक काही लिहून मी तुमची उत्सुकता ताणणार नाही. पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन आदरणीय श्रीमती इंदुमती बर्वे मॅडम ह्यांच्या शुभहस्ते त्यांच्या वाढदिवशी करण्यात आले. त्या प्रसंगी दोन्ही लेखिकेचे मॅडम सोबतचे हे छायाचित्र ! 



पहिल्या आवृत्तीच्या मोजक्या प्रति छापताना केवळ आपल्या मैत्रिणींसोबत हे पुस्तक शेयर करावं असा त्यांचा विचार होता. परंतु ही बातमी जसजशी पसरली तसं ह्या दोघीजणींना दुसऱ्या आवृत्तीचा जोरदार आग्रह करण्यात येऊ लागला आहे. न्यु इंग्लिश स्कूलशी  आपला जर संपर्क आला असेल तर  This is a Must Read Book! दुसऱ्या आवृत्तीची आपली प्रत आधीच राखुन ठेवा !!

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...