मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २५ मे, २०२०

भव्य तो निसर्ग !

मे महिन्यात आलेला हा सुट्टीचा दिवस ! सोमवारी आलेली ही सुट्टी, ती ही लॉकडाऊनच्या कालावधीतील ! अचानक गवसलेले हे फोटो! आज पाहिलेल्या शेकडो फोटोतील हे मोजके फोटो! ह्या फोटोत का कोणास ठाऊक एक कोणतातरी समान धागा मला जाणवला ! हा धागा शब्दांत तंतोतंत पकडणं कठीणच ! 

बहुसंख्य फोटोत निसर्गाचं एक भव्य रुप सामोरं उभं ! ह्यात रुढार्थानं म्हणायला गेलं तर सौंदर्य असं भरलेलं नाही, तरीही त्यातलं शतप्रतिशत निसर्गपण मनाला भावतं ! कुठंतरी अस्पष्टपणे जाणवुन गेलेलं आपलं छोटेपण मनात एक निनावी भावना निर्माण करुन जाते.  

ह्या पहिल्या फोटोत मला जाणवुन गेलं ते गवताचं विस्कटलेपण ! जिम कॉर्बेट नॅशनल पार्कातील हा फोटो ! इथं काही काळापुर्वी हत्तींचा कळप येऊन गेला असावा की काय असा अंदाज बांधायला मला उगाचच आवडतं! डाव्या कोपऱ्यात फोटोत डोकावणाऱ्या फांदीवर राहिलेल्या मोजक्या पानांच्या मनात कोणते विचार सुरु असतील ह्याचा थोडातरी अंदाज आपणास बांधता आला तर किती बरं होईल असं मला वाटुन जातं !




हे छायाचित्रही साधारणतः सारखंच ! फक्त इथं दुरवर डोकावणारी एक टेकडी ! पौर्णिमेच्या रात्री इथं हरिणांचा कळप ह्या विस्तृत पसरलेल्या गवताळ प्रदेशात कसा मुक्तपणं विहार करत असेल अशी कविकल्पना क्षणभर करावयास आपण मुक्त आहोत ! 


मार्च महिन्यात जवळपास शुष्क होत चाललेल्या नदीचं हे पात्र ! जेव्हा पावसाळ्यात हीच नदी अगदी रौद्र रुप धारण करत असेल तेव्हा तिच्या किनाऱ्याला उभं राहताना सुद्धा किती भय वाटत असणार ! ह्या नदीच्या पात्रात आता निवांत पहुडलेल्या त्या छोट्या दगडांना त्यावेळी नदीचा तो शक्तिशाली प्रवाह किती वेगानं ढकलत असावा ! कदाचित उंच पर्वतराजीतील एका विशाल पाषाणाचे आपल्या जोरदार प्रवाहानं नदीने तुकडे करत त्यांना हे रुप दिलं असणार ! रात्री  ह्याच पाण्याच्या शोधात येणारे वन्य पशु! त्यांची दुनिया एक न्यारी असणार! 


हे चित्र नक्की कुठून घेतलं ते आठवत नाही! परंतु ह्यात त्या डोंगरराईत मनुष्याने केलेली घुसखोरी इंचाइंचात जाणवते !  मनुष्यानं घुसखोरी केली नसती तर हे चित्र कसे दिसले असते ह्याचे कल्पनाचित्र रंगविण्यात मी दंग होतो ! 


दूरदूर पसरलेल्या भातशेतीचे हे मनोहर चित्र ! माझं लक्ष मात्र उजव्या कोपऱ्यात मनुष्यानं सुरु केलेल्या आणि कदाचित अर्धवट सोडुन दिलेल्या बांधकामाकडं जातं ! ह्या बांधकामातील एखाद्या विटेचे आत्मवृत्त असा निबंध लिहावयास कोणाला तरी उद्युक्त करावं अशी मला मनोमन इच्छा होत आहे !


हे ही सारखंच चित्र ! फक्त कोपऱ्यात दिसणारी एक टुमदार हवेली !त्यातल्या एका खिडकीत बसुन एका थंडीच्या सायंकाळी सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेली ही भातशेती पाहायला किती धमाल येणार ! 


नदीचं हे रोडावलेलं पात्र ! पण सांजवेळी मनात एक हुरहूर निर्माण करणारं! त्या नदीच्या पात्रावर बांधलेला तो एक चित्राला वेगळं रुप प्राप्त करुन देणारा हा पुल ! पावसाळ्यात ह्या नदीचं रौद्र रुप ह्या फारशा मजबुत न वाटणाऱ्या पुलावर उभं राहुन पाहताना मनात नक्की काय भावना निर्माण होतील कोणास ठाऊक ! 




सोमवार, १८ मे, २०२०

सांजशकुन - पाणमाय!



कथा फ्लॅशबॅक स्वरूपातील,  एका मातेने सांगितलेली !आयुष्याच्या सायंकाळी  आपल्या संसाराच्या  बहरलेल्या वेलीकडे अत्यंत समाधानाने पहात असता तिला आपल्या वडिलांनी सांगितलेलं वाक्य आठवतं, "अति सुखाच्या क्षणीच माणसाने सावध राहावे,  कारण माणसाचं पूर्ण सुख दैवाला पहावत नाही!"

मग तिला धाकटा मुलगा आपल्याला अचानक लाभलेल्या श्रीमंतीचे रहस्य विचारतो.  तिनं  या प्रश्नाचे उत्तर देणे आयुष्यभर टाळलेलं असतं. परंतु आज छोटा अगदी हट्टालाच पेटलेला असतो. "मी कोणताही अधर्म ना करता हे सर्वकाही मिळवलं आहे!" हे उत्तर तुला पुरेसं नाही का?  ती छोट्याला अजिजीनं विनविते. परंतु आज छोटा तिचं काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत  नसतो! जर  हे रहस्य तुम्हांला  सांगितले तर कदाचित मला मृत्यूला सामोरं जावं लागेल या सत्याची जाणीव त्या सर्वांना करून देते.  ते ही आम्हांला चालेल ह्या सर्वांच्या एकमुखी उत्तरानं  तिला प्रचंड धक्का बसतो. ज्याच्याबरोबर आयुष्यभर संसार केला त्या नवऱ्याकडूनसुद्धा तिला अनुकूल प्रतिसाद मिळत नाही. अचानक तिच्या मनामध्ये या सर्वांविषयी अलिप्ततेतची भावना दाटून येते! मग एका निर्विकार मनाने ती आपलीआणि पाणमायेची कहाणी सर्वांना ऐकवते. 

पुर्वायुष्यातील अत्यंत गरिबीच्या एका पराकोटीच्या क्षणी तिचा निर्धार ढासळतो. ती विहिरीमध्ये आपला जीव देण्यासाठी पायऱ्या उतरु लागते. अशावेळी तिला भेटते ती पाण्यातील तिची पाणमाय! ही पाणमाय तिची सोन्यांच्या चकत्यांनी तिची ओटी भरते.  मग तिला सापडतो तो समृद्धीचा एक अक्षय ठेवा! त्यानंतर तिच्या कुटुंबाला दिवसेंदिवस  समृद्धीची साथ लाभत जाते. आपलं हे मोठं रहस्य ती सर्वांना सांगते!

पाणमायेने घातलेल्या अटीनुसार ज्या क्षणी तिनं हे रहस्य इतरांना सांगितलं तो तिचा भुतलावरील अंतिम दिवस ठरणार असतो. तिला आपल्या पाणमायेकडे परतणं क्रमप्राप्त असतं. आयुष्यभराचे पाश असे एका क्षणात सोडुन निर्मोही मनानं पाणमायेकडे परतणे तिला अवघड जातं. मग पाणमाय तिची समजुत काढते. ही तुझी एकटीची कहाणी नाही! ही आपल्या संपुर्ण स्त्रीजातीची कहाणी आहे ! कथेचा शेवट होतो तो पुढील वाक्यानं !
मग पाण्याने तिला सर्व बाजुंनी आपुलकीनं स्पर्श केला आणि आपल्यात माहेरी आणलं !

जी. ए. च्या बाकी कथांशी तुलना केली तर ह्या कथेची काठिण्यपातळी थोडी कमीच ! नेहमीप्रमाणं कथेतील पात्र नक्की कशाचं प्रतिक ह्याचा अर्थ लावता येणं सहज नाही!  तरीही  स्त्रीनं कुटुंबाप्रती केलेल्या असीम त्यागाची आणि आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील सदस्यांनी तिच्याप्रती दर्शवलेल्या कृतघ्न मानसिकतेची ही कहाणी आहे ! आता मी हे आत्मविश्वासानं बोलतोय खरं पण जी. ए. ना अभिप्रेत असलेला अर्थ बराचसा वेगळाही असु शकतो !

ही पाणमाय म्हणजे नक्की कोण ? प्रत्येक स्त्रीची पाणमाय वेगवेगळी असु शकते !  मातेच्या, बहिणीच्या, आत्याच्या, मावशीच्या, मामीच्या, मैत्रिणीच्या, शेजारणीच्या कोणत्याही रुपात प्रत्येक स्त्रीला ही पाणमाय भेटु शकते! एक संसार उभा करणं, कोणतीही अपेक्षा न बाळगता आयुष्याच्या सायंकाळपर्यंत तो चालवणं हे एकटीचं काम नव्हे हे साऱ्या पाणमाया जाणुन असतात. एकटीनं हा भर उचलताना कोणत्याही कमकुवत क्षणी स्त्रीने हार मानु नये म्हणुन ह्या पाणमाया तिची साथ निभावतात. प्रत्यक्ष घरात तिच्या भोवताली नसल्या तरी तिच्या एका प्रतिसादात तिच्या वेदनेची आर्तता ह्या पाणमाया शेकडो मैलांवरुनसुद्धा ओळखु शकतात! 

आता ह्या कथेतील भावलेली काही वाक्यं !

ज्या क्षणी छोटा तिला रहस्य सांगण्याचा आग्रह धरतो आणि त्यापायी तिचा जीव गेला तरीही कोणालाही त्याची पर्वा नसणार ह्याची तिला जाणीव होते त्यावेळी - पाहतापाहता प्रत्येकाशी असलेला एकेक अदृश्य धागा तुटून गेला! 

पाणमायेकडे दुसऱ्यांदा परत आल्यावर पाणमाय तिला आपल्या जागेवर बसवुन पुन्हा एकदा कुणाचीतरी बहीण, मुलगी, बायको, आई असा खेळ मांडायला निघुन जाते! हे चक्र असेच चालु राहणार असतं! - हा तुझा काय, माझा काय , सगळ्यांचाच शाप आहे . आमच्याखेरीज त्यांचे क्षणभरही चालत नाही . आम्ही नसलो तर ती माणसे निखाऱ्यावरच्या फटिकाच्या लहरींप्रमाणं फुटतील . पण नंतर मात्र सुख अंगावर येतं आणि  त्या क्षणी मात्र आपण कुणाकुणाला नको होतो ! 

जी. ए. च्या इतर बहुतांश कथांप्रमाणे ही कथा सुद्धा कथेच्या शेवटाला आवर्तनात गुंतून जाते! ही माता आता पाणमायेच्या भुमिकेत शिरते तर पाणमाय ह्या मातेच्या ! जीवनातील विविध भुमिकांच्या आवर्तनांचा खेळ सदैव सुरुच राहणार आहे आणि आपण दैवानं आपल्याला सोपवुन दिलेल्या भूमिकेचं ओझं कदाचित बाळगत असु ! 

शनिवार, १६ मे, २०२०

समाजसेवा




समाजसेवा हे एक व्रत आहे. प्रत्यक्ष समाजसेवा न करता समाजसेवेच्या संबंधित मला जाणवलेल्या काही गोष्टी !

१. एखाद्या व्यक्तीनं समाजसेवेला वाहुन घेण्याची प्राथमिक आणि दुय्यम कारणं वेगवेगळी असतात. निरपेक्ष समाजसेवा ही दुर्मिळ गोष्ट असावी.समाजातील गरजु व्यक्तींना मदत व्हावी हा सर्वांचाच प्राथमिक हेतु असायला हवा आणि बहुतांशी उदाहरणांत तो असतोच. 

२. दुय्यम कारणांची टक्केवारी समाजसेवेच्या शुद्ध हेतुत बाधा निर्माण करते. दुय्यम कारणे वेगवेगळी असु शकतात. इथं ती नमुद करुन मला कोणाचाही रोष ओढवुन घ्यायचा नाही. 

३. प्रत्येक व्यक्तीला समाजसेवेला प्रवृत्त करणाऱ्या दुय्यम कारणांची त्या व्यक्तीची सदसदविवेकबुद्धी त्या व्यक्तीला व्यवस्थित जाणीव करुन देत असते. परंतु ही कारणे खुल्या दिलाने अगदी स्वतःशीच मान्य करण्याचा दिलदारपणा सुद्धा मोजके लोक दाखवु शकतात.  

४. दुय्यम कारणे असणे हे अजिबात वाईट नाही. काही न करता गप्प बसुन राहण्यापेक्षा आपले दुय्यम हेतु साध्य करीत समाजसेवा करणे केव्हाही इष्टच ! 

५. आता एका संवेदनशील मुद्याला स्पर्श करुयात ! प्रत्येकाची समाजसेवा आपलं एक वैशिष्ट्य बाळगुन असते. समाजसेवेचे अनेक गुणधर्म (attribute) असतात. प्रत्येक समाजसेवा ह्यातील काही गुणधर्मांच्या आधारे उजवी ठरते तर काही गुणधर्मांत तिला सुधारणेस वाव असतो. 

६. कोणाच्याही समाजसेवेवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह दुसऱ्या समाजसेवकाने अथवा समाजसेवा न करणाऱ्या व्यक्तीनं टाळावा. प्रत्येक समाजसेवा आपल्या जागी श्रेष्ठ असते. 

७. दुसऱ्याच्या समाजसेवेवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह टाळणे जरी इष्ट असले तरी आपल्या समाजसेवेचे, त्यामागील प्राथमिक, दुय्यम कारणांचे परीक्षण प्रत्येक समाजसेविकेने / सेवकाने ठराविक कालावधीनंतर करत राहणं इष्ट !

८. आपल्या समाजसेवेवर टीका होण्याचे, त्यावर शंका निर्माण करण्याचे प्रसंग अधुनमधुन उदभवतात. अशा वेळी आपल्या कार्यावर विश्वास ठेवणं इष्ट ! आपल्या कार्याला आपल्या वतीनं बोलु द्यावं ! आपल्याला बोलावं लागलंच तर ते पुर्णपणे अधिकृत भाषेत बोलावं !

९. निंदकाचं घर असावं शेजारी ह्या उक्तीतील मतितार्थाप्रमाणं ह्या निंदकाच्या टीकेतील मतितार्थावर लक्ष केंद्रित करुन त्यातुन योग्य ती सुधारणा आपल्या कार्यपद्धतीत करावी ! ही टीका वैयक्तिक पातळीवर न घेण्याचा प्रयत्न करावा ! 

१०.  प्रत्येक गोष्टीप्रमाणं कोणताही समाजसेवक कालबाह्य होण्याची वेळ कधीतरी येतेच. ही वेळ ओळखुन सन्मानानं सामाजिक जीवनातुन निवृत्ती घ्यावी !

शनिवार, २ मे, २०२०

सांजशकुन - भाग १ !


सद्यकाळात घरातुन पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती व्यवस्थित आहे. आज बऱ्याच दिवसांनी आलेल्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीमुळं वसईच्या घरातील कपाटाची तपासणी केली असता सांजशकुन हे जी. ए. कुलकर्णी ह्यांचं पुस्तक हाती लागलं. त्यातील सत्यकथा ह्या मासिकात १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या अस्तिस्तोत्र आणि १९७० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रिका ह्या कथांचा मला झालेला बोध ! जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथांमध्ये बरंचसं गुढ वातावरण असतं. त्यातील पात्रे ही कोणत्या तरी अद्भुत शक्तीच्या प्रभावाखाली वावरताना आढळतात. त्या कथांमधील विश्वही आपल्या भोवताली असणाऱ्या विश्वापासुन बरंच फारकत घेऊन आपलं वेगळं असं एक अस्तित्व जपते. 

अस्तिस्तोत्र

कथेची सुरुवात होते ती "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणं वाटणाऱ्या स्वच्छ चकचकीत आभाळाखाली समुद्र स्थिर आहे " ह्या खोलवर अर्थाच्या वाक्यानं ! आभाळाच्या कवटीशी केलेल्या तुलनेशी आपण स्वतःला काहीसं सरावून घेत असतानाच जी. ए. समुद्राकडं वळतात.  प्रत्येक परिच्छेदानंतर ते समुद्राच्या शांततेकडं, स्तब्धतेकडं, निर्ममतेकडं आणि त्यानं बजावलेल्या केवळ निरीक्षकाच्या भूमिकेकडं अंगुलीनिर्देश करीत राहतात. 

समुद्र केवळ शांत आहे, समुद्र केवळ स्तब्ध आहे....  

कथा संपुर्णपणे प्रतीकात्मक विश्वात वावरत राहते. त्यामुळं कवटीमय वाटणारं आकाश, अनासक्त पाणी बाळगणारा समुद्र, त्यातील विक्षिप्त आकृतीचे क्षारांचे खडक, भोवताली पसरलेली रखरखीत वाळु हे सर्व घटक मानवी मर्त्य किंवा त्यापलीकडील जीवनातील ज्ञात / अज्ञात शक्तींचे रुपक असावेत असं सदैव वाटत राहतं. 

त्यानंतर सुरु होते ती एक श्रुंखला ! आभाळ ही एक कवटी, त्यानं आच्छादलेल्या वाळवंटात पसरलेले टेकाड्याएवढ्या कवट्या असलेल्या अतिप्राचीन प्राण्यांचे सांगाडे, त्या कवट्यांचं उन्हानं कोलमडून जाणे, तरीही एका कवटीने तग धरुन राहणे, दुरवरुन आलेल्या एका वृद्धाने ह्या एकमेव कवटीचा सहारा घेणे, कालपरत्वे त्या महाकाय कवटीने सुद्धा धगीपुढे कोलमडुन जाणे. धगीपासुन आपले रक्षण करणाऱ्या त्या कवटीच्या विनाशामुळं त्या वृद्धाचे सुद्धा कोलमडणे. त्याची जगण्याची जिद्द संपताच त्याच्या कवटीच्या सावलीत आलेला कीटक, कालांतरानं त्याचा संपलेला प्रवास आणि त्याच्या शरीराच्या आधाराला आलेली मुंगी ! ही शृंखला जी. ए. इथेच संपवतात ती "कोठेतरी तिच्याहुनही लहान जीवाणू वाट पाहत आहे" ह्या वाक्यानं ! 

संपुर्ण कथेत रंगविलेल्या जीवनाच्या एकमेव चाहुलीचा प्रतीकात्मक पुरावा! त्यानंतर जी. ए. मृत समुद्रातील जीवनाच्या संपुर्णपणे अभावाकडं वळतात. मृत समुद्राच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे! कथा संपते ती "आता समुद्र केवळ आहे !" ह्या वाक्यानं !

एकंदरीत विविध रुपातील मनुष्यजन्माच्या श्रुंखलेतील प्रवास आणि त्यानंतर अस्तित्वात असु शकणाऱ्या मुक्तीचे रुपक असणारा समुद्र ! जो आपले कायमस्वरुपी अस्तित्व बाळगुन असतो!    


पत्रिका

एका प्रासादाच्या विशाल पायऱ्यांपाशी आलेला परंतु आपली स्मृती गमावुन बसलेला हा कथेचा नायक ! प्रथमदर्शी उघडण्यास कठीण परंतु नायकाच्या हळुवार स्पर्शानं सहज उघडणारं प्रासादाचे महाकाय द्वार !प्रासादाच्या अंतर्भागात व्यापुन टाकणारा किट्ट अंधार ! अंधाराला सरावलेली त्याची नजर. त्या प्रासादात कोणी आहे का हे जाणुन घेण्यासाठी त्यानं दिलेल्या अनेक हाका  ! आणि प्रत्युत्तर म्हणुन आलेले केवळ त्याचेच शब्द !  

 मग त्याला दिसलेला अनेक वेटोळी घेतलेला आणि बऱ्याच उंचावर जाणारा एक जिना. त्या जिन्याच्या वरच्या सज्ज्यावर कठड्यावर तेजस्वी कृष्ण्वस्त्रे परिधान केलेली आकृती ! त्या जिन्याची एकेक पायरी ओलांडण्यासाठी त्यानं केलेला कष्टप्रद प्रवास ! शेवटी एकदाचा त्या आकृतीसमोर उभं ठाकून त्यानं माझ्या सादीला तुम्ही उत्तर का नाही दिलंत असा केलेला निकराचा प्रश्न ! त्यावर त्यानं ऐकलेली प्रत्युत्तरे म्हणजे माझीच उत्तरे असा त्या आकृतीने केलेला खुलासा ! त्यानंतर तु उंबरा ओलांडुन मला ती पत्रिका दे आणि मला मुक्त कर ही त्या आकृतीने केलेली विनंतीवजा आज्ञा ! तो उंबरा ओलांडताना सर्पमुखांनी केलेले विषारी फुत्कार ! 

ती पत्रिका त्या आकृतीला सुपूर्द केल्यानंतर त्या आकृतीने मानलेलं आभार आणि त्यासोबत परत जाण्याची धुडकावून लावलेली विनंती ! त्या आकृतीने ती कृष्ण्वस्त्रं ह्याला परिधान करायला लावत तुला मुक्तीसाठी असंच कोणीतरी पत्रिका घेऊन घेण्याची वाट पाहत राहावं लागेल हे सांगणं ! मग त्या व्यक्तीचं निर्भरपणे उंबरा ओलांडून, जिना उतरत, महाद्वार उघडून प्रासादाच्या बाहेर पडणे ! 

आता ह्या नायकाच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा, ती त्याची पत्रिका घेऊन येणाऱ्या दुसऱ्या कोणाची ! ह्या प्रतिक्षेचा कालावधी किती असणार हे कोणीच सांगु शकणार नाही ! तोवर सहन करावं लागणारं प्रदीर्घ एकटेपण! 

पुन्हा एक प्रतीकात्मक कथा ! बहुदा जन्म-मृत्यू, आत्मा ह्यांच्यातील मनुष्याच्या प्रवासाची ! ह्यातील कोणतं रुपक कसलं ते फक्त जी. ए. च जाणोत !

प्रत्येक कथा केवळ ३-४ पानांची पण समजण्यास प्रचंड वेळ लावणारी ! आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा आपणास समजलेला अर्थ जी. ए. ना अभिप्रेत असलेल्या अर्थाशी अंशतः तरी जुळला असेल ह्याची शाश्वती नाही !

शीर्षक भाग १ जरी असलं तरी हे धाडस सातत्यानं करण्याची हिंमत मी पुन्हा करेनच ह्याची हमी मी सध्यातरी देणार नाही ! 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...