मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २४ जानेवारी, २०१८

वाङनिश्चय (Engagement) सोहळा - एक वाढतं प्रस्थ

महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. तत्कालीन महाराष्ट्रात ज्या लोकरुढींविषयी ह्या विचारवंतांना सुधारणा कराव्याशा वाटल्या त्या त्यांनी लोकरोषाची पर्वा न करता प्रत्यक्षात अंमलात आणण्यास सुरुवात केली. सद्यकालीन महाराष्ट्रदेशीसुद्धा चंगळवादाचं वाढतं प्रस्थ वसईग्रामस्थित (केवळ माहितीमायाजालावर कार्यरत असलेल्या) एका तथाकथित समाजसुधारकाच्या नजरेस खुपलं आणि तिथंच ह्या पोस्टने जन्म घेतला. 

मी शक्यतोवर वादग्रस्त लिखाण टाळतो. आत्तापर्यंत लिहिलेल्या पोस्टमध्ये मदिराप्राशनास समाजमान्यता, रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु ह्या दोन सर्वांत खळबळजनक अशा पोस्ट्स म्हणता येतील. 

मदिराप्राशनास  समाजमान्यता ह्या पोस्टचा माझ्या मित्रमंडळींवर फारसा काही परिणाम झाला नाही. अशा पार्टीमध्ये मला बोलवुन ते फॉर्मात आले की माझी टर उडवायला त्यांना मजा येत असल्यानं अजूनही मला तिथं बोलावलं जातं. पण अशाच एका पार्टीत मित्रमंडळी मदिरेच्या आस्वादात रंगली असता मी आणि माझ्यासारख्या एका अरसिक माणसानं मटण - वडे ह्यांचा  फडशा पाडला. त्यामुळे ह्या मित्रमंडळीतील आमची लोकप्रियता काहीशी कमी झाली.
रिसेप्शनला उशिरानं येणारी वधु ह्या पोस्टनंतर जी काही लग्न अटेंड केली तिथं नवदांपत्याला शुभेच्छा द्यायला स्टेजवर गेल्यावर वधू माझ्याकडं काहीशी रागानं पाहत आहे असा भास मला होऊ लागला. (ह्यात माझा ब्लॉग किती लोकप्रिय आहे हे अप्रत्यक्षपणे सांगण्याचा यत्न नाही ह्याची नोंद घेण्यात यावी!)

Engagement च्या वाढत्या प्रस्थाविषयी खरंतर मला बऱ्याच दिवसांपासून लिहायचं आहे. पण होतं काय की ही भावना एखाद्या वाङनिश्चय सोहळ्याला हजेरी लावल्यावर प्रबळ होते, परंतु ज्याचा पाहुणचार झोडपला त्याला कसं वाटेल ह्या विचारानं मी थांबतो. आजचा दिवस असा आहे की शेवटच्या वाङनिश्चय सोहळ्याला हजेरी  लावुन बरेच दिवस झाले आहेत आणि पुढील वाङनिश्चय सोहळा दृष्टीक्षेपात नाही, त्यामुळं ही पोस्ट लिहायचं धारिष्ट्य मी करु इच्छितो. 

वाङनिश्चय सोहळ्याचं मुख्य उद्दिष्ट काय इथुन सुरुवात करुयात! आमची Engagement झाली त्या काळात (म्हणजे अगदीच काही ५० वर्षांपूर्वी वगैरे नाही ) ज्यांचं लग्न जमलंय त्या दोघांना राजरोसपणे फिरता यावं, गावातील स्थानिक चौकस लोकांना आपल्या विचारशक्तीला जास्त ताण द्यायला लागु नये म्हणुन हा सोहळा केला जायचा. सोहळा बऱ्याच वेळा घरीच केला जायचा, दोन्हीकडची मिळून चाळीस - पन्नास मंडळी हजर असायची. सोहळ्याला सगळेच हजर नसले तरी जे लोक उपस्थित आहेत त्यांनी ही बातमी सर्वत्र पसरवावी अशी त्यांच्याकडुन माफक अपेक्षा असायची. 

परिस्थिती बदलली, काळ बदलला. ज्यांचं लग्न जमलंय त्यांनीच राजरोसपणे फिरावं असा नियम केव्हाचा मागं पडला. त्यामुळं ह्या सोहळ्याचा हेतु काय असा प्रश्न पडू शकतो. लोकांना बातमी कळावी असा हेतू साध्य करायचा असेल कोणीही झुकेरबर्ग साहेबांनी उपलब्ध करुन दिलेल्या FB स्टेटसची (बहुदा committed / engaged ) मदत घेऊ शकतो. हे सर्व असलं तरी वाङनिश्चय सोहळ्याचं प्रस्थ दिवसेंदिवस वाढू लागलं आहे. "अजुन फक्त अक्षता टाकल्या असत्या तर लग्न सुद्धा लागलं असतं" असं म्हणावं इतक्या थाटामाटात हा सोहळा साजरा केला जातो. आणि खर्च सुद्धा अफाट केला जातो. 

आता पंडितांनी म्हटल्याप्रमाणं दुसऱ्या बाजूनं विचार करूयात. मुलामुलीच्या आईवडिलांची ऐपत आहे, हौशी मंडळी आहेत, पाहुण्यांना सुद्धा असे समारंभ अटेंड करायची हौस आहे मग तुला काय करायचंय असला प्रश्न मला विचारला जाऊ शकतो. अजुन पुढं जायचं म्हटलं तर कॅटरर, छायाचित्रकार लोकांना अधिकच्या business  संधी मिळुन अर्थव्यवस्थेला चालना मिळते असंही म्हटलं जाऊ शकतं. 

आता सारांशाकडं जाण्याआधी (महर्षीं लक्ष असूद्यात) हा आक्षेप केवळ वाङनिश्चय  सोहळ्याशीच मर्यादित नसुन संगीत, मेहंदी, pre-wedding shooting वगैरे प्रकारांना सुद्धा लागू आहे.  

सारांश - माझे मुख्य आक्षेप खालील प्रमाणे 
१) समाजात नक्की काही टक्के लोकं अशी आहेत ज्यांची विवाहबंधनात अडकणाऱ्या एका जोडप्यामागं चार - पाच समारंभ करण्याची ऐपत नाही, पण एक नुकत्याच रुढ पडू लागलेल्या एका प्रथेच्या दबावाखाली येऊन त्यांना काहीशा जबरदस्तीनं असे समारंभ आयोजित करावे लागतात आणि ज्याचा आर्थिक दबाब त्यांच्यावर येऊ शकतो. 

२) समाज आपला मोकळा वेळ कसा व्यतित करतो ह्यावर समाजाचं भवितव्य अवलंबुन असतं. ह्यासाठी समाजापुढं दोन पर्याय असतात - पहिला म्हणजे वाचन, बौद्धिक activities मध्ये वेळ व्यतित करणे आणि दुसरा म्हणजे विविध प्रकारचे समारंभ आयोजित करुन त्यात वेळ वाया घालविणं. काहीशी चिंतेची बाब म्हणजे एक समाज म्हणुन आपली वाटचाल दुसऱ्या पर्यायाकडं चालली आहे असं मला वाटतं.  



Disclaimer (हात झटकणे ) - ह्यात  कोणत्याही समाजबांधवांच्या भावना दुखावण्याचा हेतु नाही. 

शनिवार, २० जानेवारी, २०१८

Critique


जगात असंख्य संकल्पना, विविध घटनांची शक्यता नेहमीच अस्तित्वात राहिल्या आहेत. ह्या सर्वांचं भान असणं आणि त्या प्रत्यक्षात अनुभवणं ह्या दोन भिन्न घटना आहेत. माणसांना आयुष्यात ह्या भोवताली अदृश्य स्वरुपात वावरणाऱ्या संकल्पनांना कधीतरी सामोरं जावं लागतं. 

वाढत्या वयानुसार माणसांची काही बाबतीतली क्षमता वाढीस लागते. स्वतःकडे विरक्तपणे पाहण्याची क्षमता ही अशीच एक बाब आहे. ही संकल्पना माणसाच्या भोवताली त्याच्या / तिच्या जन्मापासुन सदैव अस्तित्वात असते, वावरत असते. पण सुरुवातीच्या वर्षांत ह्या संकल्पनेचं माणसाला भान अजिबात नसतं आणि ते नसणं हेच माणसांसाठी उत्तम असतं. पण मग एक क्षण असा येतो की आपल्या शरीराच्या बाहेर पाच - सहा फुट उंचावर (उंचीचं हे माप निव्वळ अंदाजानं !!) जाऊन स्वतःकडे पाहण्याची क्षमता आपल्याला अचानक लाभते किंबहुना अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे ह्याची जाणीव होते. 

मग काही मजेशीर गोष्टी घडतात. आपण कोणाशी तरी जोरदार भांडतो आणि मग थोडा वेळानं हा पाच फुटावर वावरणारा मिनी आदित्य आपल्याला सांगतो, "अरे भल्या माणसा! इथं तुझं चुकलं बरं का !" हा क्षण महत्वाचा असतो. सर्वप्रथम आपलं काही चुकलंय हे आपलं आपल्याला जाणवणं ही काहीशी अस्वस्थ करणारी भावना असते. ती अगदी वेगानं झटकुन टाकावी असाच आपला 'by default' प्रयत्न राहतो. पण आपणसुद्धा चुकू शकतो ह्या जाणिवेशी मैत्री करायला आपण एकदा का शिकलो की मग मात्र आपल्या मनातील अस्वस्थता कमी होते आणि मग आपण काहीसा वास्तववादी विचार करु शकतो. अजुन एक प्रसंग म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यात किंवा सोशल मीडियात आपल्यावर कोणीतरी टीका करतं तेव्हा त्याच्याकडं विरक्तपणे पाहण्याची क्षमता सुद्धा ह्या वरील गुणाचाच भाग आहे. 

व्यावसायिक जगातील चर्चेत आपल्याला ज्या विषयात अगदी १००% टक्के खात्री नाही आणि जिथं आपण काही ठोकताळे बांधुन आपले विचार एखाद्या बैठकीत मांडत असतो अशा वेळी 'keep me honest here' असं म्हणण्याची पद्धत असते. मुख्यतः माझ्याकडं संपुर्ण माहिती नाही, त्यामुळं मी इथं चुकू शकतो आणि तुम्ही तज्ञ मंडळींनी मी ज्या पद्धतीने विचार करतोय ते बरोबर आहे का ह्यावर खास लक्ष ठेवा अशी विनंती असते. कोणी वरील वाक्य म्हणाला की मग सर्वजण अगदी ध्यानपुर्वक लक्ष देऊन ऐकतात. 

पुर्वी लोक म्हणायचे, "निंदकाचे  घर असावे शेजारी!" कारण शेजाऱ्याला आपलं चालणंबोलणं कुंपणापलिकडून बारकाईनं दिसायचं. आणि त्यामुळं आपण कुठं चुकतोय का हे शोधण्यासाठी त्याच्यासारखा योग्य माणुस नसावा. हल्ली आपण आपल्या शेजाऱ्याला महिन्यातुन एखादं वेळा सामोरे जातो आणि त्यामुळं तुम्ही हॅलो कसे करता,मनापासुन करता की नाही ह्यावरुन तो टीका करण्याची शक्यता कमीच ! म्हणूनच स्वतःच ही भुमिका बजावणे आवश्यक ठरतं. 

स्वतःचे स्वतः परीक्षण करण्याची सवय चांगली असली तरी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक ज्याप्रमाणं वाईट असतो तसंच स्वपरीक्षणाचा अतिरेक सुद्धा वाईट ठरु शकतो. काही समुह, काही देश ह्यांच्यामध्ये ह्या स्वपरीक्षणाचा अतिरेक दिसुन येतो. स्वपरीक्षण ह्या संज्ञेचा शोध घेता घेता Self-deprecation पर्यंत पोहोचलो. आणि मग wikipedia वर खालील संदर्भ आढळला.  

Self-deprecation is often perceived as being a characteristic of certain nations, such as in the United Kingdom, Ireland, Australia and New Zealand, where "blowing one's own trumpet" is frowned upon. 
ह्याउलट एक राष्ट्र म्हणुन आपली बऱ्याच वेळा blowing one's own trumpet च्या दिशेनं वाटचाल चालु आहे की काय अशी भिती वाटते. 


मागच्या पोस्टमध्ये सारांश तर दिला नाहीच ह्यावर सारांश देणं अथवा न देणं हे सर्वस्वी माझ्या मर्जीवर अवलंबुन आहे असं विधान मी केलं होतं. महर्षींनी ह्या विधानावर आणि मुख्यत्वे माझ्या ऍटिट्यूडवर सोशल मीडियातून कडाडुन टीका केली त्यामुळं ह्यावेळी सारांश देणं हे माझ्या भल्यासाठी अत्यावश्यक आहे.  

सारांश - स्वस्तुती आणि स्वनिंदा ह्या दोन सीमांमध्ये कोठंतरी मनुष्याचं वागणं, विचारपद्धती  बसते. ह्याची रेखा अगदी मध्यावर केव्हाच नसते आणि नसावी. पण त्या रेषेचं कोणत्याही एका सीमेकडं झुकणं धोकादायक ठरू शकतं. अशावेळी ह्या रेषेला अगदी डांबरी रस्त्यावरील रेषेप्रमाणं पक्की न ठेवता धुळीत स्वहस्ते आखलेल्या रेषेप्रमाणं flexible ठेवणं हेच योग्य ! आणि हे रेख आखणाऱ्या दोरीच्या एका टोकाला आपण स्वतः आणि दुसऱ्या टोकाला आपली जवळची माणसं असणं केव्हाही इष्टच !

गुरुवार, १८ जानेवारी, २०१८

संयम - आधुनिक चालीरिती

रागात संयम बाळगायला हवा हे आपण सर्व ऐकुन असतो आणि जमेल तेव्हा हे तत्त्व पाळण्याचा प्रयत्न देखील करत असतो. पण हल्ली नव्यानं एक गोष्ट मला जाणवली ती म्हणजे बहुतांशी गोष्टीला प्रतिक्रिया देण्याची सवय सुद्धा घातक बनु शकते. 

आधीच्या पिढीला प्रतिक्रिया देण्यासाठी तुलनेनं कमी माध्यमं उपलब्ध आणि त्यांची व्याप्ती कमी विस्तृत होती. एखाद्या कडक नवऱ्याबरोबर संसार केला हे सांगायला सुद्धा काही स्त्रियांनी सत्तरी गाठायची वाट पाहिली असेल. हल्ली तसं नाही, आपल्याला काही वाटलं तर आपण ज्याच्याबाबतीत हे वाटलं त्या व्यक्तीला शक्य असेल तर थेट आणि नसेल तर सांकेतिक शब्दांत सोशल मीडियावर सांगतो. आपण दिलेली प्रतिक्रिया बऱ्याच जणांपर्यंत पोहोचते आणि त्यातील काही टक्के लोकांना ती आवडते. ज्यांना आवडते त्यातील काही टक्के आपल्याला तसं सांगतात सुद्धा, पण ज्यांना आवडत नाही त्यातील बहुतांशी लोक आपल्याला हे सांगत नाहीत पण कुठंतरी त्यांच्या आपल्याविषयीच्या मतात, आपल्याबरोबरच्या वागण्यात फरक पडतो. एकदंरीत काय तर बहुतांशी वेळा आपली प्रतिक्रिया आपल्यासोबतच ठेवणं हे हितकर ठरु शकतं. जर तुम्हांला विवादात पडणं जाणीवपुर्वक आवडत असेल तर मग मात्र ठीक!

नेहमी प्रतिक्रिया देण्याप्रमाणे सोशल मीडियावरील आपलं रुप म्हणजे व्हाट्सअँपचा DP, फेसबुकचे प्रोफाईल चित्र वारंवार बदलण्याची सवय काही जणांना असते. मला सुद्धा आहे. ह्या सवयीवरुन माणसाचा स्वभाव कसा आजमावा ह्याविषयी सुद्धा बरेच मेसेज येत राहतात. मी ह्याबाबतीत ऍटिट्यूड बाळगुन आहे. ह्या गोष्टीवरुन लोकांनी माझ्या स्वभावाचं निदान करु नये असे मला वाटतं. "It's my life" च्या धर्तीवर हा माझा DP, हे माझं फेसबुकचे प्रोफाईल चित्र, मला वाटेल तेव्हा मी बदलणार असं मला वाटतं! पण त्यामुळं आपल्या FB मित्रांना मात्र नाहक त्रास होतो. बदलला फोटो की लाईक केलाच पाहिजे वगैरेचे मैत्रीक बंधन वगैरे !!

अजुनही काही लोक मात्र ह्या बाबतीत प्रचंड संयम बाळगुन असतात. ते फारशी प्रतिक्रिया कुठं देत नाहीत, त्यांचा DP, प्रोफाईल चित्र वर्षोनुवर्षे कायम असतं. ह्या लोकांविषयी मी संमिश्र भावना बाळगुन आहे. आदर ही त्यातील एक भावना आहे. बाकीच्या भावना हे माझं वैयक्तिक मत आहे आणि ते स्वतःजवळ ठेवणं उत्तम! 

आपण महान आहोत ही भावना बऱ्याच लोकांच्या मनात हल्ली उफाळुन येऊ लागली आहे. माझ्या मनात सुद्धा ती बऱ्याच वेळा येते. खरंतर ऑफिसात काही वेळा आणि मुंबईत कार चालवताना नेहमीच ही भावना आवश्यक असते. पण बाकीच्या वेळा ह्या भावनेचं debriefing करणं आवश्यक असतं. महानतेच्या ढगात तरंगत असताना एकदम वास्तवाच्या धावपट्टीवर लँडिंग करावं लागलं तर धक्का बसु शकतो आणि त्यामुळं आपल्याला वास्तववादी उंचीवरुन उड्डाण करायला मदत करणारे मित्र आवश्यक असतात. तुम्ही कितीही उंचीवर उड्डाण करतअसाल तरीही त्याहुन अधिक उंचावरुन जाणारी विमानं नेहमीच असतात. पण आपल्याकडे वरच्या दिशेनं पाहायची तयारी हवी. 

सारांश - इथं सारांश वगैरे काही नाही. मनाला आलं लिहिलं. पण जर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या व्यक्तिमत्वाच्या अनेक छटा असतात त्यातील किती सर्वांसमोर आणायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न ! आणि त्या सर्वांसमोर आणताना स्वानंदासोबत परभावना सुद्धा लक्षात घ्यायच्या का हा प्रत्येकाचा निर्णय! 

बुधवार, १० जानेवारी, २०१८

Cricket ऊहापोह - Men Vs Boys


(Disclaimer - व्यक्ती खऱ्याखुऱ्या, प्रसंग काल्पनिक)

स्थळ - केप टाऊन, भारतीय हॉटेल, रवी शास्त्री ह्यांची रुम 
वेळ - ८ जानेवारी सायंकाळ 
Attendee - रवी शास्त्री, विराट कोहली (१:१)

शास्त्री - "विराट ये बस!"
विराट - (चेहऱ्यावर भन्नाट भाव) "हं"
शास्त्री - "आज इथं ABCD नको!"
विराट - (चेहऱ्यावर कसनुसं हसु आणत) "ठीक आहे !"
शास्त्री - "विराट, सुरुवात सकारात्मक गोष्टींपासुन करुयात! तुझ्या दृष्टीनं गेल्या चार दिवसातील चांगल्या घटना कोणत्या?"
विराट - (तोंडावर येणारं ABCD महत्प्रयासानं रोखुन) "हरले म्हणजे हरले, त्यात सकारात्मक काय पाहायचं !" 
शास्त्री - "विराटा, क्रिकेट एक गोष्ट, पण आता तु संसारात सुद्धा पडलायस, तर तुला सर्वत्र सकारात्मक गोष्टींचा शोध घेता आला पाहिजे !"
विराट - "व्हॉट डू यु मीन बाय संसारात सुद्धा पडलायस?"
शास्त्री - चेहऱ्यावर गंभीर भाव त्याला एक लुक देतो. 
विराट - "ओके, लेट मी ट्राय !"
१) गोलंदाजी - दक्षिण आफ्रिकेसारख्या बलवान फलंदाजी असलेल्या संघास त्यांच्या देशात १३० धावांमध्ये आपण बाद करु शकलो! 
२) हार्दिक पंड्या - ज्यावेळी तुमच्या समोर चार अतिजलद गोलंदाज १४०+ किमीहुन अधिक वेगानं एकामागुन एक येत असतात त्यावेळी केवळ बचाव हे तुमचं खेळपट्टीवर टिकुन राहण्याचं तंत्र असु शकत नाही, हे पंड्याने दाखवुन दिलं. तुम्हांला UNORTHODOX फटके मारुन त्यांची लय बिघडवता आली पाहिजे. ज्यावेळी पंड्या खेळत होता तेव्हा नक्कीच दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचे खांदे खाली पडले होते, देहबोली निराशेकडे झुकली होती, त्यांनी झेल, यष्टिचित संधी देखील दवडल्या. आपण सुद्धा त्यांना बचावात्मक पवित्रा घ्यायला लावू शकतो हे पंड्याने दाखवुन दिलं !"
शास्त्री - "Excellent! विश्लेषण करण्याची तुझी क्षमता माझ्यासोबत राहुन सुधारली आहे !" आता सुधारण्याच्या संधी असलेल्या गोष्टी!"
विराट - "खरंतर मी अजुनही माझ्या मनात खुपच सकारात्मक भावना आहेत! पहिल्या कसोटीत ज्या गोष्टी मनासारख्या घडल्या नाहीत त्या न घडण्याची शक्यता सांख्यिकीशास्त्राचा अभ्यास करता बऱ्याच प्रमाणात होती !"
शास्त्री - "व्यवस्थापकीय बोल बोलण्याचा अधिकार मी माझ्याकडं राखु इच्छित आहे"
विराट - "ठीक आहे ! विजय, धवन आणि रोहित ह्या तिघांना दुसऱ्या डावात "Innings of a lifetime" खेळायची संधी मिळाली होती, ती त्यांनी दवडली. माझ्या बाबतीत म्हणायचं झालं, तर स्टिव्ह स्मिथ ज्या प्रकारे इंग्लंडशी खेळला तसं मी खेळायला हवं होतं ! पुजाराचं सातत्य इथं पाहायला मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी उपहारानंतर पहिल्याच चेंडूवर त्याची एकाग्रता भंगली ही खेदाची बाब आहे !"
शास्त्री - "ओके, माय टर्न नाऊ !"

सकारात्मक 
१) भारतीय खेळपट्ट्यांवर श्रीलंकेसारख्या संघाशी सतत खेळुन मग दक्षिण आफ्रिकेत जायचं आणि एकही सराव सामन्याशिवाय थेट त्यांच्या चौकडीला सामोरे जायचं ही नक्कीच कठीण गोष्ट होती. १९९६ साली भारतीय संघात रथी महारथी होते तरीही दरबान येथील पहिल्याच कसोटीत भारताने सपाटून मार खाल्ला होता. केवळ १०० आणि ६६ धावा बनविता आल्या होत्या. 
http://www.espncricinfo.com/series/16126/scorecard/63736/south-africa-vs-india-1st-test-india-tour-of-south-africa-1996-97/

म्हणजे इथं आपल्या गोलंदाजांनी त्यांच्या नजरेला नजर देत जबरदस्त कामगिरी केली. भुवनेश, बुमराह, पंड्या आणि शमी - खरोखर चांगली कामगिरी केलीत तुम्ही !

२) आपली लढवय्यी वृत्ती - तु म्हणालास त्या प्रमाणे पंड्याने एका क्षणी दक्षिण आफ्रिकन खेळाडूंना मानसिक दृष्ट्या कमकुवत बनवलं होतं. 

नकारात्मक 
१) आपल्याला दक्षिण आफ्रिकेचा कमकुवत क्षण पकडता आला नाही. 
२) दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात हरवायचे असेल तर गोलंदाज आणि फलंदाज ह्यांना एकाच वेळी क्लीक व्हावं लागेल. आमला, डी पलुसी आणि डी विलिअर्स हे तीन महान फलंदाज पुन्हा इतक्या स्वस्तात बाद होणे शक्य नाही. 

आता वेळ कमी आहे. तेव्हा 

सारांश 
भारतीय संघ क्रिकेट सतत खेळत राहतो. आणि IPL , भारतात खेळलं जाणारं क्रिकेट ह्यांनी असंख्य तथाकथित महान खेळाडु बनविले आहेत. पण लक्षात ठेव, १९७१ साली वाडेकरांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वेस्ट इंडिज आणि नंतर इंग्लंड मध्ये मिळविलेला कसोटी विजय, १९८३/८५ एक दिवसीय मालिका विजय, १९८६ इंग्लंड मधील कसोटी विजय आणि २००४ साली पाकिस्तानात मिळविलेला विजय हे विजय खऱ्या क्रिकेट रसिकांच्या कायमचे हृदयात घर करुन राहणार ! इथं आपल्याला काथ्याकुट करायला वेळ नाही. स्टेन जायबंदी झाला अजुन कोणी एक येईल, चारजण सातत्यानं १४० किमीहून अधिक वेगानं आग ओकत राहणार! चेंडू स्विंग होणार, अधून मधून  पाऊस पडणार. ह्या सर्व गोष्टीचा मुकाबला करत तु, पुजारा किंवा रोहित ह्यापैकी एकाला Innings of a lifetime खेळावी लागणार. तुमच्यापैकी कोणी एक सातत्यानं खेळला आणि दीडशे पेक्षा अधिक धावा काढत राहिला तरच आपल्याला जिंकण्याची संधी आहे. आणि अशी खेळीच will separate men from boys. 

तु ह्या दशकातील खेळाडू नक्कीच आहेस पण तू शतकातील खेळाडू बनु शकशील हा ह्याचा निर्णय घेणाऱ्या मोजक्या मालिका असतील आणि त्यातील ही एक आहे ! जमलं तर बघ नाहीतर लोकांची स्मरणशक्ती फार तोकडी असते आणि IPL चालु झालं की बहुतेक जण हे सारं काही विसरुन जातील. 

विराट स्तब्ध होऊन बसुन राहतो !!! 

शनिवार, ६ जानेवारी, २०१८

Avalanche


बर्फमय डोंगराळ प्रदेशात आपलं आकारमान वाढवत अतिशय वेगानं खाली येणाऱ्या बर्फाला Avalanche म्हणतात. ह्या प्रदेशात ह्या घटनेची शक्यता सदैव गृहित धरुन रहावं लागतं. ज्यावेळी उंचावरील बर्फावर कार्यरत असणारी बलं बर्फाच्या एकत्र राहण्याच्या शक्तीपेक्षा अधिक बलवान होतात तेव्हा बर्फाच्या घसरणीला सुरुवात होते. उतरणीवर हा बर्फ आपल्यासोबत अधिकाधिक वस्तुमान गोळा करत जातो आणि क्षणार्धात अगदी छोट्या प्रमाणात सुरु झालेल्या क्रियेचं अगदी भयावह विध्वंसक घटनेत रुपांतर होते. उतारावरील बर्फाची ह्या घटनेला प्रतिकार करण्याची असक्षमता त्याला ह्या घटनेत सहभागी बनवते आणि ह्या घटनेच्या विध्वसंकरुपात भर घालण्यात कारणीभुत ठरवते. 
  
समाजरचनेत ज्यावेळी स्वतःची ठाम मतं नसणारा रिकामटेकडा असा मोठा वर्ग अस्तित्वात असतो त्यावेळी समाजातसुद्धा अशा  Avalanche सदृश्य विध्वंसक घटना होण्याची शक्यता गृहित धरुनच सदैव जगावं लागतं. हा प्रकार समाजात ज्यावेळी घडतो त्यावेळी ह्या घटनेशी विविध घटक संबंधित असतात. 

हिमस्खलन (Avalanche) मध्ये उंचावरील बर्फाच्या एका विशिष्ट बिंदूवर कार्यरत असणारी बलं बर्फाच्या एकत्र राहण्याच्या शक्तीपेक्षा अधिक बलवान होतात. समाजातसुद्धा अशा घटनांची सुरुवात अगदी छोट्या ठिकाणी होते.  

हिमस्खलन (Avalanche) मध्ये जिथं विध्वंसक घटना सुरु होते तिथल्या फुटीर शक्तीला विशिष्ट स्थानाचा (उंचीचा) फायदा मिळतो. तिथं अगदी नाममात्र स्वरुपात सुरु झालेली घटनेला गुरुत्वाकर्षणाच्या बलाची जोड मिळुन विध्वंसकतेचा प्रभाव बर्फाच्या समुहावर विस्तारणे शक्य होते. समाजात ह्यासाठी निष्क्रिय समाजमानसावर ज्यांचा प्रभाव पडू शकेल अशा प्रसारमाध्यमाची मदत घेतली जाते. 

इथं तीन घटक आहेत. त्यातील दोन कर्ते आणि एक कर्म. प्रसारमाध्यमं आणि विध्वंसक वृत्तीचा रिकामटेकडा वर्ग हे कर्ते आणि निष्क्रिय समाजमानस हे कर्म. ह्या समाजमानसाला घरात भयभीत करायचं झालं तर प्रसारमाध्यमं आणि घराबाहेर भयभीत करायचं झालं तर विध्वंसक वृत्तीचा रिकामटेकडा वर्ग ह्यांचा आधार घेतला जातो. 

समाजातील विध्वंसक घटनांचं प्रमाण एका विशिष्ट प्रमाणापेक्षा वाढलं तर प्रसारमाध्यमांच्या अस्तित्वावरच घाला येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

हिमस्खलन (Avalanche) घटना विशिष्ट हंगामात म्हणजे हिवाळ्यात घडतात. समाजातील अशा घटनांचे प्रमाण सुद्धा विशिष्ट हंगामात म्हणजे निवडणुकीच्या काळात पद्धतशीररित्या वाढवलं जाण्याची शक्यता असते. 

हिमस्खलन घटना आणि समाजातील विध्वंसक घटना ह्यांचं साधर्म्य इथंच संपतं. जसजसं राजकीय पक्ष संगणकाचा आधार मतदारांच्या वर्गीकरणासाठी अधिकाधिक प्रमाणात घेऊ लागतील तसतसं अशा कृत्रिमरीत्या घडवुन आणलेल्या विध्वंसक घटनांचं आणि समाजमानसाला प्रभावित करण्यासाठी पसरविलेल्या चुकीच्या बातम्यांचे प्रमाण वाढत जाणार. ज्यांना पुर्ण बहुमत मिळवणं शक्य नसल्याची जाणीव आहे त्यांना सामाजिक बांधीलकी कमी प्रमाणात असते हे कित्येक वेळा दिसुन आलं आहे. केवळ आपलं अस्तित्व टिकवणं हाच एक मसुदा त्यांच्यापाशी असतो. 

भविष्यात अशा घटना घडण्याची शक्यता गृहित धरुनच सर्वांना वावरावं लागणार आहे. जो कोणता सत्ताधारी पक्ष आहे त्यावर अशा घटनांना सामोरं जाण्याची प्रशासनाची क्षमता वर्धित करण्याची जबाबदारी मोठ्या प्रमाणात येणार. ह्यात राज्यात / देशात कुठं हिमस्खलनात परिवर्तित होऊ शकणाऱ्या विध्वंसक घटनांच्या बारकाईनं लक्ष ठेवणं / त्यांना नियंत्रणात ठेवणं, समजा असा avalanche सुरु झालाच तर सोशल मीडियावर पसरविल्या जाणाऱ्या संदेशावर नियंत्रण ठेवणं हे सर्व प्रकार येणार आणि ह्या सर्वासाठी संगणकांचा वापर प्रभावीपणे करावा लागणार. पक्षीय फायद्यासाठी संगणकाचा वापर आणि राष्ट्रहितासाठी संगणकाचा वापर ह्यातील लक्ष्मणरेषा जबरदस्त काळजीपुर्वक आखावी लागणार. 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...