मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

गेला राक्षस कुणीकडं?


लहानपणी आपण सर्वजण किंवा मी राक्षसाच्या गोष्टींनी अगदी भयभीत होत असू. राक्षस बहुदा गावाजवळील टेकडीवर राहायचा. राक्षसाचा देह महाकाय. त्याला भूक लागली की तो दणादण पावलं टाकीत टेकडीवरुन, पर्वतावरुन खाली उतरत असे. राक्षसानं टेकडीवर रहावं की पर्वतावर हे बहुदा त्याच्या आकारमानावर अवलंबुन असावं. 

वाचलेल्या सर्व गोष्टींत राक्षस आणि गावकरी ह्याच्यात व्यवस्थित सामंजस्य होते. बकासुराला महिन्याला गाडाभर अन्नधान्य दिलं की तो गावकऱ्यांना बाकीचे दिवस त्रास देत नसे. ह्याआधीचे राक्षस इतके समजुतदार होते की नाही हे समजायला मार्ग नाही. राक्षसाला मोजकी कामे असावीत. दिवसाचं, आठवड्याचं किंवा महिन्याचं एकदाच खाऊन घ्यावं आणि मग झोपी जावं. पुन्हा भूक लागली की टेकडी, पर्वत जे काही असेल ते उतरावं आणि ... 

गोष्टीत कधी वाचलं नाही पण बहुदा राक्षस एकटेच टेकडीवर रहात असावेत. त्यांनाही कदाचित समूहाने राहणाऱ्या माणसांचा हेवा वाटत असावा. ते ही कदाचित रात्री एकटेच टेकडीवर आकाशातील तारकांकडे पाहून उदास गाणी म्हणत असावेत. ह्याचाच परिणाम असेल बहुदा पण कालांतरानं राक्षस त्यांच्या मूळ रुपांतून नाहीसे झाले. एकट्यानं मनुष्यजातीपासुन वेगळं राहणं त्यांना कदाचित आवडलं नसावं. त्यांच्यात उत्क्रांती होत गेली. हळुहळू राक्षस मनुष्यरुपात बाकीच्या माणसांसोबत येऊन राहू लागले. 

ह्या पर्वाच्या सुरुवातीच्या कालावधीत कदाचित बाह्यरुपाद्वारे राक्षस आणि इतर मनुष्यगण ह्यांच्यातील फरक समजू शकत असावा. पण त्यामुळं आपल्याला अजुनही वेगळी वागणुक मिळतेय ह्याला कंटाळून राक्षसांच्या उत्क्रांतीच्या पुढील टप्प्यात मनुष्य आणि राक्षस ह्यांच्या बाह्यरुपातील उरलासुरला फरकही नाहीसा झाला. आता राहिला होता तो केवळ विचारातील, वागण्यातील फरक.  

बाकीचा मनुष्यगण इतक्या कालावधीत गप्प बसला होता असे नाही. राक्षसाचे गुणधर्म, विचारसरणी ओळखायला आणि त्यावर मात करायला शस्त्रासोबत मंत्र, बोधपर कथा, संस्कार इत्यादी मार्गांचा अवलंब केला गेला. मनुष्यानं आपल्यावर अजुनही पूर्ण विश्वास ठेवला नाही ह्याचं राक्षसाला खूप वाईट वाटलं असणार. त्यामुळं हळूहळू राक्षसानं आता मनुष्यांच्या मनांत प्रवेश करायला सुरुवात केली. बहुतांश सर्व माणसांच्या वागण्यात आता हे गुण दिसु लागले आहेत. 

त्यामुळं वाचकहो, अवतीभोवती टेकडी दिसलं तरी त्यावर राक्षस कुठे दिसतोय का ह्याचा शोध घेऊ नका! 

रविवार, ७ ऑगस्ट, २०२२

स्कॅनर




अभिमानानं सांगण्याची गोष्ट नक्कीच नाही परंतु कार्यालयीन ई-मेलच्या बाबतीत कधीकधी असा प्रसंग येतो की माझ्या इनबॉक्समध्ये पाचशेपेक्षा जास्त न वाचलेली 
ई-मेल्स असतात. आता म्हणायला गेलं तर ती न वाचलेली असतात, परंतु मी त्यांचा विषय आणि ती कोणाकडून आली आहेत यावर नजर फिरवून ती ईमेल उघडायची की नाही याचा मनातल्या मनात निर्णय घेतलेला असतो. बऱ्याच वेळा हा निर्णय योग्य असावा कारण ही ई-मेल्स न उघडल्यामुळे आणि त्यांना प्रतिसाद न दिल्यामुळे बोंबाबोंब झाल्याची उदाहरणे त्यावेळी नसतात. परंतु कधीतरी गोंधळ होतो आणि एखादं महत्त्वाचं ई-मेल उघडण्याचं आणि त्याला प्रतिसाद देण्याचं राहून जातं. 

आता मी जे काही करतो म्हणजे  ई-मेलवरून नजर टाकून त्यांचं महत्त्व जाणुन घेण्याचा जो माझा प्रयत्न असतो त्याला स्कॅनर म्हणण्याची माझी सवय आहे. त्यामागे बहुदा मी विकसित केलेली माझी निर्णयप्रणाली आहे. त्या निर्णयप्रणालीनुसार निर्णय मी घेत असतो. ही सवय जोवर कार्यालयीन वापरापुरता मर्यादित आहे तोपर्यंत ठीक आहे. परंतु शनिवार रविवार आला तरीही ही सवय कायम राहते.  शनिवार रविवारी मराठी वर्तमानपत्राच्या दर्जेदार लेखांनी सजवलेल्या पुरवण्या असोत किंवा एखादं पुस्तक वाचायला घेतलं तरीही हल्ली हा स्कॅनर कार्यान्वित होतो.  पुरवणीतील लेखात किंवा पुस्तकात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत याचाच शोध घेत राहतो.  झटपट पुरवणी वाचून किंवा पुस्तक वाचून बाजूला ठेवलं जातं. मला लागलेली ही सवय आता आयुष्यभर माझ्या सोबत राहणार की काय याची चिंता मला आता लागून राहिली आहे. 

हे झालं लिखाणाच्या बाबतीत छापील मजकुराच्या, पुस्तकांच्या बाबतीत ! परंतु हीच सवय हळूहळू आता उपलब्ध असलेले टीव्ही, मोबाईल वरील विविध चित्रपट, वेब सिरीज यावर नजर टाकून ते पाहायचं की नाही याचा निर्णय मी घेत असतो. विविध जाणकार लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचून सुद्धा हा निर्णय घेण्यात मदत होत असते. प्रतिक्रिया वाचून एखादा चित्रपट किंवा मालिका बघण्यात त्या प्रतिक्रियेतील मतांमुळे आपण काहीसा पूर्वग्रह बनवतो आणि त्या कलाकृतीला न्याय देत नाही असं मला कधी कधी जाणवतं. त्यामुळे हा पर्याय स्वीकारावा की नाही असा सदैव संभ्रमात मी असतो. 

मनाची समजूत घालण्यासाठी हा प्रश्न केवळ माझाच नव्हे तर सद्ययुगातील  बहुतेकजणांचा असावा असे मी वाटून घेतो. उपलब्ध असलेल्या मजकुरांची किंवा विविध दृकश्राव्य माध्यमातील उपलब्ध पर्यायांची संख्या खूप असल्यामुळे हा संभ्रम निर्माण होत असावा. परंतु यात एक दीर्घकालीन प्रभाव मनुष्य जमातीवर होत असावा; तो म्हणजे एखाद्या छापील मजकुराचं, संगीताचं किंवा चित्रपटाचं रसग्रहण करण्याचं जी आपण क्षमता किंवा इच्छा बाळगून आहोत अशा लोकांची संख्या दिवसेंदिवस आता कमी होत आहे. 

तीस चाळीस वर्षांपूर्वी मोजक्या कलाकृती निर्माण होत असल्यानं त्यातील बहुतेकांचं रसिकांद्वारे रसग्रहण होत असे. त्यामुळं छोट्या छोट्या तपशीलाकडं, लिखाणातील शुद्धलेखनाकडं काटेकोरपणे लक्ष दिलं जात असणार. अशा कलाकृतींचे बहुमत होतं. आता दर्जात्मक कलाकृतींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत असणार कारण अशा कलाकृतींना त्यांना अपेक्षित असलेली दाद मिळणं कठीण होत आहे. 

मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्रवासात पुढील काही वर्षांत मोजक्या कलाकृतींचं सखोल विश्लेषण करण्याची क्षमता बाळगून असलेल्या मानवांची संख्या कदाचित कमी होईल. भरमसाट मजकूर, दृक श्राव्य कलाकृती ह्यांना वाचून, पाहून संतुष्ट होणारी माणसं आणि कृत्रिम बुद्धिमता असलेला यंत्रमानव ह्यात कदाचित फारसा फरक उरणार नाही. त्यामुळं आपल्या मेंदूला सतत खाद्य पुरवून त्याला सतर्क ठेवा. तुमच्या मेंदूचा एकंदरीत प्रवास मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्रवासात अगदी थोडक्या प्रमाणात का होईना पण आपला प्रभाव टाकतोय ! 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...