मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
माहिती आणि तंत्रज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माहिती आणि तंत्रज्ञान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

यंत्रांचे शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता !


जीवनात सोप्या आणि क्लिष्ट गोष्टी अवतीभोवती घडत असतात. 

सोप्या गोष्टींच्या बाबतीत आपण एकदा का त्यांचा अनुभव घेतला की त्या अनुभवांच्या आधारे भविष्यात आपण ती गोष्ट घडत असताना त्याच्या परिणामाची (Outcome / Result) सहज अटकळ बांधु शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गोष्ट उंचावरुन खाली सोडली की ती जमिनीवर पडायलाच हवी, काचेवर दगड मारला आणि ती सर्वसामान्य काच असेल तर ती फ़ुटायलाच हवी वगैरे वगैरे. गणित आणि विज्ञान ह्यांच्या बाबतीतसुद्धा काही बाबतीत आपण समीकरण, सुत्र (Formula) सहजासहजी मांडु शकतो. 

पण जीवन नेहमीच सोपं नसतं. आपल्या अवतीभोवती काही क्लिष्ट गोष्टी सुद्धा असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात वार्षिक पावसाचा अंदाज बांधणं, एखाद्या ठिकाणी भुकंपाची शक्यता वर्तविणे ह्या गोष्टी बऱ्याच क्लिष्ट आहेत. क्लिष्टता येते ती दोन बाबतीत 
१. पाऊस, भुकंप ह्यासारख्या घटनांवर परिणाम करु शकणाऱ्या सर्व घटकांना ओळखुन काढणं. 

२. ह्या सर्व घटकांना ओळखुन काढल्यावर मग त्यांच्यातील अन्योनसंबंध प्रस्थापित करुन त्याच एखादं सुत्र किंवा समीकरण बनविणं. 

आतापर्यंत माणसाची बुद्धिमत्ता अशा क्लिष्ट गोष्टींच्या बाबतीत अचुक सूत्र, समीकरण प्रस्थापित करण्याइतकी प्रगत झाली नाही. त्यामुळं मग माणसाचा कल आपणच निर्माण केलेल्या संगणकांचा वापर करुन ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकडे वळतो. इथं अचुक सुत्र, समीकरण नसल्यानं ह्याऐवजी मॉडेल ह्या प्रकाराचा वापर केला जातो. ह्या मॉडेल्सना आतापर्यंतची सर्व माहिती / डेटा आणि त्यावेळी आलेले रिझल्ट्स (निकाल) पुरवले जातात. संगणकाने विकसित केलेली ही निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता ढोबळमानाने Artificial Intelligence ह्या नावानं ओळखली जाते. आणि ह्या क्षमतेचा वापर करुन प्रचंड प्रमाणातील माहितीचे पृथ्थकरण करुन त्या घटनेच्या भविष्यातील शक्यतेचे निदान करण्याच्या तंत्रास ढोबळमानाने Machine Learning असं म्हटलं जातं. ह्यातसुद्धा दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारची मॉडेल्स (Unsupervised Models) फक्त input डेटाचा वापर करुन निकालाची शक्यता वर्तवितात तर दुसऱ्या प्रकारची मॉडेल्स (Supervised Models) input आणि output ह्या दोन्ही माहितीचा वापर करुन निकालाची शक्यता वर्तवितात. 

सुज्ञ वाचकांनी आतापर्यंत ओळखलंच असेल की ह्या सर्व प्रकारात वर्तविलेली निकाल १००% अचुक असण्याची शक्यता विरळच. जे मॉडेल अधिकाधिक अचुक निकाल वर्तवु शकेल ते उत्तम मॉडेल!

आता आदित्य स्पेशल ! केवळ वरील तांत्रिक माहिती द्यायची असती तर मी ही पोस्ट लिहिली नसती. ह्याविषयावर शेकडो तज्ञ लोक बसली आहेत आणि मी वर दिलेल्या वरवरच्या माहितीत ते चुका काढतीलही. माझा मुद्दा आहे वेगळाच !  बऱ्याच वर्षांपासुन माझ्या मनात ही शंका होतीच. आता हे AI / ML प्रकरण जास्त तापायला लागल्यापासुन माझ्या मनातील ह्या शंकेनं जोरदार बळ पकडलं आहे. 

आपलं मनुष्यजातीचं ह्या भुतलावरील अस्तित्व हा आपल्याहुन बुद्धिमान शक्तीचा खेळ आहे. आपण सर्व मॉडेल्स आहोत. मॉडेल्स म्हणजे तसली मॉडेल्स नव्हेत तर आपण प्रयोगशाळेतील पात्र आहोत. चांगल्या प्रकारची एक शक्ती आणि वाईट प्रकारची एक शक्ती - ह्या दोघांनी आपापले हस्तक आपल्या रुपानं ह्या पृथ्वीवर पाठवले आहेत. आणि हे Supervised Model आहे. आपण आयुष्यभर सर्व अनुभव गोळा करतो, शिकतो.  ह्या आपल्या खऱ्या शक्तींना आपले आयुष्याभरातील अनुभव हवे असतात. त्यामुळं आपल्याला मरणं क्रमप्राप्त आहे. जेणेकरुन आपले हे मालक आपल्या अनुभवांचा वापर करुन अधिक बुद्धिमान चांगली / वाईट मॉडेल्स भविष्यात पृथ्वीवर पाठवेल. 

आता संगणकाच्या बाबतीत आपल्याला कसं भय आहे की ते एके दिवशी आपल्यापेक्षा बुद्धिमान होतील आणि आपल्यावर नियंत्रण करतील. त्याचप्रमाणं भविष्यातील आपल्यातील एखादा बुद्धिमान माणुससुद्धा ह्या आपल्या मॉडेलचं रहस्य उलगडुन काढेल आणि त्या मालकाशी लढा देईल. 

सारांश - इथं तिघेजण आहेत. शक्तिमान, माणुस आणि संगणक. पहिली शक्यता अशी की शक्तिमानानेच आपल्याला संगणकाची निर्मिती करण्याची बुद्धी दिली. जेणेकरुन ज्यावेळी आपण शक्तिमानाशी लढा द्यायला तयार होऊ त्याचवेळी शक्तिमान आपल्याविरुद्ध संगणकांना बंड करायला लावेल. 

दुसरी शक्यता. भविष्यातील बुद्धिमान माणुस संगणकांना आपल्यासोबत घेऊन मग त्या शक्तिमानाच्या अस्तित्वाचं कोडं उलगडुन काढेल आणि त्यांच्याशी लढा सुरु करेल. त्यावेळी हा बुद्धिमान माणुस मरण्यास सुद्धा नकार देईल.   



शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

सुपूर्दता



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतांना अशा अनेक गोष्टी अनुभवायला मिळतात ज्या आपण प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणू शकतो. उदाहरणे द्यायची झाली ती अनेक, मला आवडलेले उदाहरण म्हणजे अडचण / धोका व्यवस्थापन (Risk Management). ऑफिसात अशा प्रकारच्या व्यवस्थापनासाठी आपत्कालीन योजना तयार ठेवली जाते आणि ती बर्याच वेळा तपासून सुद्धा पाहिली जाते. आपल्या जीवनात सुद्धा याची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरते. घरकामवाल्या बाईने न सांगता सोमवारी सुट्टी मारणे, मुलाची शाळेची बस न येणे ह्या छोट्या छोट्या आपत्कालीन प्रसंगासाठी आपल्या सर्वांकडे Plan B तयार असणे आवश्यक असते. तसा तो आपल्याकडे तयार असतो पण तो चर्चिला / तपासाला गेलेला नसतो.
असो आज मला अशाच एका विषयावर लिहायचे आहे आणि तो म्हणजे Knowledge Transition अर्थात माहिती, संस्कृती यांची एका व्यक्तीकडून दुसर्याकडे यशस्वीरीत्या सुपूर्दता ! मागच्या पिढीपर्यंत एकत्र कुटुंबात ही सुपूर्दता नकळत होत असे, कारण देणारा आणि घेणारा दोघेही एका घरात राहत, एकाच प्रकारच्या व्यवसायात मग्न असत. परंतु आजच्या शहरात राहणाऱ्या पिढीमध्ये मात्र हे वहन बर्याच बाबतीत अपूर्णच राहिले. प्रत्येक ज्ञातीचे संस्कार, चालीरिती ह्या बर्याच प्रमाणात मागच्या पिढीकडून आजच्या पिढीकडे सुपूर्द झाल्याच नाहीत. आता ह्या बाबतीत सुपुर्दतेची गरज आहे किंवा नाही यावर मतभेद होवू शकतात. ठीक आहे परंतु किमानपक्षी ह्या गोष्टी लिखित स्वरुपात तरी उपलब्ध करून ठेवावायला हव्यात असे माझे म्हणणे. म्हणजे आज नाही पण पुढे कधीतरी कोणास हे संस्कार, चालीरिती माहित करून घ्यावेसे वाटले तर माहितीचा स्तोत्रच नाही अशी परिस्थिती नको! असो बहुधा ह्या स्थितीचे गांभीर्य मोठ्या शहरात जास्त असावे, छोट्या शहरात, गावांत मात्र ही सुपूर्दता यशस्वीरीत्या होत असावी असा भाबडा विश्वास बाळगूया!

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने



माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र - एका बदलत्या चित्राच्या निमित्ताने - भाग


१९९५ - ९६ च्या सुमारास पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरींच्या बाबतीत काहीसे मंदीचे वातावरण होते. मुंबईतील चित्र पाहता VJTI आणि सरदार पटेल अभियांत्रिकी ह्या सरकारी अभियांत्रिकी विद्यालयात नावाजलेल्या कंपन्या मुलाखतीसाठी येत परंतु शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे त्यांचे प्रमाण काहीसे कमी टक्के होते. त्यामुळे ज्यांना ह्या नोकऱ्या मिळत नसत त्यांना नोकरीसाठी बाहेर बऱ्यापैकी संघर्ष करावा लागत असे.आणि पगारही त्याकाळी प्रतिमहिना ८ - १० हजाराच्या आसपासच असत. त्यामुळे GRE सारख्या परीक्षा देऊन पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशी जाणे, GATE देऊन भारतात पदव्युत्तर शिक्षण घेणे किंवा MBA च्या परीक्षा देणे ह्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांचा ओढा असे. नक्की आठवत नाही पण १९९७ च्या आसपास Y2K चा झंझावात आला आणि त्याने हे चित्र बऱ्याच प्रमाणात बदलले. ह्या बागुलबुवाने भारतीय IT कंपन्यांना अगणित प्रोजेक्ट मिळवून दिले आणि त्यांना प्राथमिक पातळीवरील संगणकीय ज्ञान असलेल्या लोकांची प्रचंड गरज भासू लागली. वर उल्लेखलेल्या पारंपारिक अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक अभियंत्यांनी ही संधी साधून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चंचूप्रवेश केला. ह्यामध्ये ह्या अभियंत्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीविषयी ना त्या अभियंत्यांनी विचार केला होता न त्यांना नोकरी देणाऱ्या कंपन्यांनी. ह्यामुळे अजून एक घटना झाली ती म्हणजे पारंपारिक क्षेत्रातील उरलेल्या अभियंत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील हे गुलाबी चित्र पुढे ८ ते १० वर्षे कायम राहिले. ह्या क्षेत्रातील बहुतांशी लोकांना परदेशगमनाची संधी मिळाली. त्यातील काहींना कायमस्वरुपात राहण्याची मिळाली तर काहीना कालांतराने परत यावे लागले तर काहींनी स्वतःहून परत येण्याचा निर्णय घेतला. परदेशगमनाच्या ह्या संधींमुळे ह्या लोकांची आर्थिक स्थिती बर्याच प्रमाणात उंचावली. त्यामुळे आणि ह्या लोकांना परदेशी राहण्याच्या गरजेमुळे त्यांच्या जीवनसाथी असलेल्या सुविद्य पत्नींना आपल्या नोकऱ्या सोडाव्या लागल्या. मागील एका ब्लॉगमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे एकंदरीतच आपल्या देशाच्या कुशल मनुष्यबळाच्या नियोजनाबाबत आनंदीआनंदच आहे. आपण सद्यपरिस्थिती दीर्घकाळ कायम राहणार आहे असे मानून आपले बरेचसे निर्णय घेतो आणि मग काहीशी फसगत होते. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात किंवा कोणत्याही क्षेत्रात उच्चपदावर जाण्यासाठी पिरामिड संकल्पना लक्षात घेणे आवश्यक आहे. प्राथमिक पातळीवर बहुसंख्य लोक असतात परंतु व्यवस्थापनाच्या उच्च पातळीवर जावे तशी ह्या व्यवस्थापकांची संख्या झपाट्याने घटते. त्यामुळे केवळ अनुभवांची वर्षे वाढली म्हणून सदैव बढत्या मिळणे कठीण होत जाते. अमेरिकन लोकांना वर्षोनवर्षे आज्ञावली लिहिण्यात काही वावगे वाटत नाही. उलट ते आनंदीच असतात परंतु आपली मानसिकता इथे आड येते. सामाजिक प्रतिष्ठेच्या आपल्या भ्रामक कल्पनांनी आपणास व्यावसायिक बढती मिळविण्याचे अदृश्य दडपण येते. सर्वांनाच हे जमत नसल्याने एका प्रकारची उदासीनता अशा लोकांच्या मनात येते. आता आपण गेल्या ४-५ वर्षात ह्या क्षेत्राकडे वळलेल्या लोकांकडे पाहूयात. आता चित्र पालटले आहे. पारंपारिक क्षेत्रात कुशल अभियंत्यांची गरज वाढल्याने त्या क्षेत्रातील पगार आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या बरोबरीचे झाले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील परदेशगमनाच्या संध्या झपाट्याने कमी झाल्या आहेत. त्यामुळे सुविद्य पत्नींनी नोकरी सोडण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या काही वर्षात आर्थिक स्थितीच्या निर्माण केल्या गेलेल्या आभासी चित्राने जीवनावश्यक गोष्टींचे दर प्रमाणाबाहेर गेले आहेत आणि त्यातच ह्या क्षेत्रातील लोकांनी आपला जीवनस्तर परत वळण्याच्या पलीकडच्या पातळीवर उंचावून ठेवला आहे. ह्याचे परिणाम वैयक्तिक जीवानांवर सुद्धा होत आहेत. एकंदरीत आपण एका नवीन स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु पुढील १० - १५ वर्षांसाठी चांगले क्षेत्र कोणते हे सांगण्याचा विश्वास आपल्या दूरदृष्टीच्या अभावामुळे आपल्याकडे नाही. चौथीत असलेल्या माझ्या मुलासाठी चांगले क्षेत्र कोणते ह्या प्रश्नाचे उत्तर आज माझ्याकडे नाही. आणि त्यामुळेच IPL मुळे ऑस्ट्रेलियन संघांच्या कसोटी फलंदाजीवर परिणाम झाला असे टेलर जेव्हा म्हणतो तेव्हा IPL हा आपल्या मुलासाठी एक पर्याय ठेवावा असा विचार मी करू लागतो. आज इथे थोडा हा खोलात जाण्याचा प्रयत्न! आज्ञावली लिहिण्यासाठी कोणत्या कौशल्यांची गरज आहे ह्याचा आपण आढावा घेवूयात १> गणिती डोके. बर्याच वेळा क्लिष्ट आकडेवारी करण्यासाठीची आज्ञावली लिहावी लागते. ही आज्ञावली लिहिण्याचा एक अचूक मार्ग असतो आणि अनेक अपरिणामकारक मार्ग असतात. अचूक मार्गाने आज्ञावली लिहिण्यासाठी गणिती डोके आवश्यक आहे. जसजसे एखादी कंपनी ह्या क्षेत्रातील प्रगल्भतेच्या पायऱ्या ओलांडू लागते तेव्हा तिला अचूक मार्गाने आज्ञावली लिहिणाऱ्या संगणक प्रोग्रामरची गरज भासते. २> Domain Knowledge - अर्थात एका विशिष्ट क्षेत्रातील व्यावसायिक ज्ञान. साधारणतः ३ - ४ वर्षे प्रोग्रामिंग केलेल्या संगणकीय व्यावसायिकास एखादया विशिष्ट क्षेत्रातील सखोल ज्ञान असणे आवश्यक असते. ह्या ज्ञानाचा वापर तो अस्तित्वात असलेल्या आज्ञावलीत क्लिष्ट व्यावसायिक तत्वे (business logic) सहजतेने समजून घेण्यासाठी करून घेवू शकतो. त्याचप्रमाणे एखादी नवीन व्यावसायिक गरज (business requirement) आल्यास ती कितपत व्यवहार्य आहे आणि ती आज्ञावलीत समाविष्ट करण्यासाठी लागणाऱ्या प्रयत्नांचा अचूक अंदाज हा व्यावसायिक देवू शकतो. वरीलपैकी पहिला घटक हा बर्यापैकी तुमच्या नैसर्गिक गुणवत्तेवर अवलंबून असतो. फार तर एखादी संगणकीय भाषा अधिकाधिक अचूकपणे शिकून तुम्ही त्यात थोडीफार सफाई आणू शकता. आणि दर वर्षी हा घटक असणारे हजारोजण ह्या क्षेत्रात प्रवेश करीत असतात त्यामुळे आपले वेगळेपण टिकविण्यासाठी हा घटक फार काळ तुमची साथ देवू शकत नाही. दुसर्या घटकासाठी चिकाटीची आवश्यकता असते. तात्कालिक प्रलोभने (जशी की दुसर्या क्षेत्रातील परदेशगमनाची संधी) तुम्हांला विचलित करीत असतात. परंतु जर तुम्हास खरोखर दीर्घकाळ माहिती आणि तंत्रज्ञान ह्या क्षेत्रात राहायचे असेल तर ह्या विचलीत करणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तज्ञ (SME) बनणे अत्यावश्यक आहे. वरील सर्व चर्चेत तुम्ही TCS, INFOSYS सारख्या संगणक तज्ञ पुरवणाऱ्या कंपन्यात काम करीत आहात की मोठ्या आर्थिक कंपन्याच्या भारतीय शाखेत (CAPTIVE) काम करीत आहात हा महत्वाचा मुद्दा येतो. एकंदरीत सुरुवातीची पाच सहा वर्षे ह्या क्षेत्रात काढल्यावर बर्याच जणांना आज्ञावली लिहिणे नकोसे वाटू लागते. नवीन लोकांशी करावी लागणारी स्पर्धा, वैयक्तिक जीवनात वाढलेल्या जबाबदार्या, वाढलेल्या आर्थिक लाभाचा कंपनीला केवळ आज्ञावली लिहून मोबदला देवू शकण्याच्या आत्मविश्वासाचा अभाव अशा बर्याच कारणांमुळे असे घडते. मग हे लोक वेगवेगळे मार्ग अवलंबितात. त्यांचा उहापोह पुढील लेखात! मागील लेखात एका मुद्द्याचा उल्लेख करायचा राहून गेला. आज्ञावली लिहिण्याच्या पलीकडे काही संधी उपलब्ध असतात. Business Analyst - BA (व्यावसायिक पृथ्थकरण करणारे) आणि Quality Analyst QA (नवनिर्मित आज्ञावलीवर विविध चाचण्यांची तपासणी करून पाहणारे) हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. साधारणतः Y2K खूळ ओसरल्यानंतर ह्या पर्यायांची खोलवर जाणीव भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात शिरली. BA वर्गातील व्यावसायिक एखाद्या प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्याकडून त्यांच्या व्यावसायिक गरजा समजावून घेवून त्या योग्य भाषेत आज्ञावली लिह्णाऱ्या गटापर्यंत पोहोचवितात. ह्या वर्गाला जशी प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्याच्या खऱ्या गरजांची जाणीव असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे ही गरज पूर्ण करण्यासाठी विकसित कराव्या लागणाऱ्या आज्ञावलीसाठी येऊ शकणार्या अडचणींचे भान असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे दोन वेगळ्या गटांशी समन्वय साधण्यासाठी ह्या वर्गाकडे अत्यंत उत्कृष्ट असे लिखित आणि मौखिक संभाषणकौशल्य असणे आवश्यक आहे. आणि व्यावसायिक संकल्पनांची सखोल जाणीवसुद्धा! हल्ली काही आज्ञावली विकसित करणारे व्यावसायिक एक पळवाट म्हणून ह्या मार्गाचा विचार करू इच्छितात त्यांनी ह्या पर्यायासाठी लागणारे गुणधर्म आपण बाळगून आहोत की नाही ह्याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. QA गटातील व्यावसायिक नव्याने विकसित केलेल्या अज्ञावालीवर विविध चाचण्यांचा मारा करून त्यातील दोष हुडकून काढण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. ह्यात नव्याने विकसित केलेली आज्ञावली आधीपासून अस्तित्वात असलेल्या FUNCTIONALITY वर काही विपरीत परिणाम तर करीत नाही ना आणि नव्याने दिलेल्या गरजा पूर्णपणे समाधानकारकरीत्या पार पाडत आहे की नाही ह्या दोन प्रकारांच्या चाचण्यांचा समावेश होतो. ह्या ही पर्यायाकडे वळु पाहणाऱ्या व्यावसायिकानी दीर्घकाळ केवळ चाचण्यांचे परीक्षण करण्याचा संयम आपण बाळगून आहोत की नाही ह्याचे परीक्षण करावे. ह्यात MANUAL (प्रत्येक सूचना माणसाद्वारे अमलात आणून) आणि AUTOMATED (सूचनांना एका स्वयंचलित आज्ञावलीद्वारे अमलात आणणे) असे दोन प्रकार पडतात. अजून एक थोडासा कमी प्रमाणात आढळणारा वर्ग म्हणजे DBA (माहिती भांडाराचा पहारेकरी). हा वर्ग PRODUCTION वातावरणात अस्तिस्वात असलेल्या माहिती भांडारात काही प्रश्न निर्माण झाल्यास किंवा त्यातून माहिती हुडकून FRONT END ला पोहोचविण्यात विलंब होत असल्यास तत्काळ सक्रीय होवून लीलया समस्येचे मूळ कारण शोधून काढतो. त्याच प्रमाणे माहिती भांडाराच्या संरचनेत बदल होत असल्यास नवीन संरचना कशी प्रतिसादासाठी लागणाऱ्या अवधीच्या बाबतीत कशी उत्कृष्ट राहील ह्याची काळजी घेतो. ह्या सर्व गटांवर लक्ष ठेवणारा एक PM (व्यवस्थापक) असतो. प्रोजेक्टच्या पुरस्कर्त्यांनी दिलेल्या सर्व गरजा त्यांच्या मूळ रुपात प्रोजेक्टच्या संपूर्ण कालावधीत कशा टिकून राहतील, नव्याने निर्माण झालेल्या गरजांसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचा अंदाज घेवून त्यासाठी पुन्हा नव्याने नियोजन करणे, प्रोजेक्टमध्ये निर्माण होवू शकणार्या संभाव्य धोक्यांना आधीपासून ओळखून त्यांचा परिणाम कमी करण्यासाठी उपाय ओळखून ठेवणे, त्याचप्रमाणे QA गटाने शोधून काढलेले दोष कसे योग्य प्रकारे वेळीच निस्तरले जात आहेत ह्याची खात्री करून घेणे ह्या सर्व गोष्टींसाठी हा इसम जबाबदार असतो. हा इसम मनुष्यबळाचा अंदाज आणि प्रत्यक्षातील वापर, QA ने हुडकून काढलेले दोष अशी सर्व आकडेवारी आलेखाच्या रुपात जगासमोर मांडण्याचे इतर गटांना न आवडणारे काम करतो. त्यामुळे बाकीच्या गटांत उगाचच अपराधीपणाची भावना निर्माण होते आणि ते ह्या माणसास टाळू लागतात. एकंदरीत आज थोडे विषयांतर झाले. पुढील भागात परत आज्ञावली निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांच्या पुढील मार्गाविषयी बोलूयात! ह्या लेखमालिकेतील दुसरया भागाचा शेवट ह्या क्षेत्रात पाच सहा वर्षे काढलेल्या एका पारंपारिक मनोवृत्तीच्या भारतीय व्यावसायिकाच्या उदाहरणाने केला होता. ह्या व्यावसायिकास विविध कारणांमुळे आज्ञावली लिहिणे नकोसे होऊ लागते. ह्या सर्व प्रकारात ज्या प्रकारची प्रोजेक्ट तुमची कंपनी घेत असते हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा असतो. समजा कंपनीकडे बहुतांशी प्रोजेक्ट अशी आहेत ज्यात अनुभवी , आज्ञावलीतील खाचाखोचा माहित असलेल्या लोकांची गरज नाही, तर मग साहजिकपणे त्या कंपनीच्या दृष्टीने अनुभवी माणसांचे महत्व कमी होते. एकंदरीत चाणाक्ष व्यावसायिक ह्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेऊन मग वेगळे पर्याय निवडतो. ह्यात नवीन येणाऱ्या प्रोजेक्टसाठी प्रपोजल लिहिणे, ऑडीट / सेल्स टीम मध्ये सहभागी होणे, किंवा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये डीलीव्हरी मनेजर होऊन बसणे ह्या प्रकारांचा समावेश होतो. आता खरी मेख अशी आहे की वरील उल्लेखलेल्या भूमिकांमध्ये चपलख बसण्याचे गुण काही माणसांत निसर्गतःच असतात. ती माणसे ह्या भूमिकांत आनंदी राहतात परंतु काहीजण असे असतात ज्यांनी लहानपणापासून अभ्यासाव्यतिरिक्त काही केले नसते आणि ह्या व्यवसायातसुद्धा आज्ञावली लिहिणे हे सुद्धा एक अभ्यासाचेच व्यापक रूप आहे. अशा लोकांना वरील भूमिका निभावणे कठीण होऊ लागते. केवळ मेहनतीच्या जोरावर ह्या भूमिकांतील यशाच्या व्याख्या काबीज करणे त्यांना कठीण जाते आणि मग त्यांची ह्या भूमिकांमध्ये कुतरओढ होत राहते. एकंदरीत हे सर्व मुद्दे मांडण्याचा हेतू असा की आतापर्यंतचे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले यश आपणास काहीसे आपसूक मिळाले आहे. ह्यात कंपन्या आणि व्यावसायिक हे दोन्ही आनंदी आहेत. परंतु आता ह्या अनुभवी मनुष्यबळाची योग्य काळजी घेणे हे मोठे आव्हान आपल्यासमोर ठाकले आहे. हा प्रश्न पाहिले तर अजून गंभीर होत जाणार. आज मोठ्या कंपनीमध्ये जवळपास दोन लाख व्यावसायिक आहेत. दहा वर्षांनी ह्या सर्वांना व्यवस्थापक पदे मिळणे शक्य नाही. त्यामुळे जमेल तितक्या व्यावसायिकांनी खोलवर ज्ञान मिळविणे अत्यावश्यक आहे. हे क्षेत्र तसे कठोर आहे. इथे २० : ८० नियम लागू होतो. वीस टक्के लोक ८० टक्के महत्वाचे काम करतात आणि बहुदा ह्या लोकांनाच खुश ठेवले जाते. अजून एक गोष्ट, ह्या क्षेत्रात सतत कामगिरी उंचाविण्याचे तुमच्यावर दडपण असते. त्यामुळे बढती मिळून जर तुम्ही वरच्या जागी गेलात आणि दुर्देवाने तिथले काम जमले नाही तर तुम्हांला बहुदा बाहेरचे दार दाखविले जाते. ह्यात अजून एक पर्याय उपलब्ध आहे. साधारणतः १५ - २० वर्षे ह्या क्षेत्रात नोकरी केल्यावर दुसर्या एखाद्या तुलनात्मक दृष्ट्या शांत क्षेत्राची निवड करणे. तितकी प्रगल्भता आपण जोपासणे आवश्यक आहे. असो एकंदरीत ही लेखमालिका इथेच आटोपती घेतोय. ह्या लेखाचा मुख्य रोख मोठी स्वप्ने बाळगून ह्या क्षेत्रात शिरणाऱ्या नवीन पिढीकडे आहे. हे क्षेत्र अजूनही फायदेशीर आहे परंतु सरधोपटपणे सर्वांना यश मिळण्याचा काळ मागे पडला आहे. त्यामुळे आपल्या स्वतःच्या क्षमतेचे, गुणवत्तेचे व्यवस्थित मूल्यमापन करून ह्या क्षेत्रातील आपले करीअर नियीजन करणे अत्यावश्यक बनले आहे.

IT मधल्या रात्रपाळ्या

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र बाहेरून फार आकर्षक वाटते किंबहुना वाटायचं. परंतु त्यातही बऱ्याच वेळा घी देखा लेकीन बडगा न देखा अशी स्थिती असते.  रात्री उशिरापर्यंत थांबणे, किंवा बिकट परिस्थिती उदभवल्याने पूर्ण रात्र कार्यालयात घालविण्यास भाग पडणे असले प्रसंग वारंवार येतात. हल्ली काही सुदैवी लोकांना घरून कार्यालयाचे काम करण्याची सुविधा (?) मिळाल्याने, रात्री बेरात्री घरच्या सकट सर्वांना उठवून मग कार्यालयाचे काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होते.

रात्रपाळीची माझी गाठ प्रथम ९८ साली सीप्झ मध्ये Y२K प्रोजेक्टवर  काम करताना पडली. सुरुवातीला कंपनीने एकदम १०० लोकांना त्या प्रोजेक्टवर घेतले खरे परंतु सर्वांसाठी संगणक नव्हते, त्यामुळे आमच्यासारख्या सुदैवी लोकांची निवड रात्रपाळीसाठी झाली. पहिल्या काही दिवसात मेनफ्रेमची लिंक नव्हती आणि त्यामुळे आम्ही आज्ञावली मायक्रोसोफ्ट वर्ड मध्ये बदलून ठेवत असू. ह्यात काय साध्य होतंय हे फक्त आमच्या व्यवस्थापकालाच कळत असावे. परंतु त्याला आव्हान करण्याचे धारिष्ट्य आम्ही दाखविले नाही.

दुसऱ्या आठवड्यापर्यंत लिंक आली. प्रत्यक्ष मेनफ्रेमवर काम करण्याची संधी मिळतेय ह्याचा आम्हा पामरांना कोण आनंद झाला. तो काळ वेगळा होता. लोक मेनफ्रेमचा थोडाफार अभ्यास करीत, जमल्यास एखाद्या कंपनीत तीन चार महिने काम करीत आणि मग काहीसा अनुभव फुगवून दाखवून अमेरिकेला पळ काढीत. त्यामुळे आपल्या सोबत काम करणारा आपला सहकारी किती दिवस आपली सोबत करणार आहे हे समजावयास वाव नसे. लिंक आल्यावर मला मेनफ्रेममध्ये असलेल्या काही JCL / PROC चे पृथ्थकरण करून त्याची नोंद एक्सेल मध्ये करण्यास सांगण्यात आली. अशाच एका अशुभ शुक्रवारच्या रात्री (ज्या वेळी बाकी दुनिया FRIDAY NIGHT चा आनंद उपभोगत होती) मी आणि माझा सहकारी किरण, अजून पाच दहा सहकाऱ्यांसोबत दुःखी अंतकरणाने, मनात आमच्या व्यवस्थापकाचे गुणगान करीत हे पृथ्थकरण करीत होतो. त्यावेळी बहुधा एक्सेलमध्ये ऑटोसेव पर्याय (जो तुम्ही एक्सेल मध्ये उतरविलेली माहिती थोड्या थोड्या वेळाने कायमस्वरूपात उतरवितो) उपलब्ध नव्हता. रात्रीचे जेवण दहा वाजेपर्यंत आटोपले. मी माझ्या अननुभवी स्थितीमुळे अजून एकदाही उतरविलेली माहिती सेव केली नव्हती. गप्पाटप्पा आणि अधूनमधून काम असला प्रकार चालला होता. तीनच्या आसपास डोळे पेंगुळाय़ला लागले. आणि मग तो दुर्भाग्यपूर्ण  क्षण आला. मी चुकून एक्सेल बंद करण्याच्या कळीवर क्लिक केले. 'पामरा तुला तुझी गेल्या सहा तासातील धडपड कायमस्वरूपी करायची आहे का?' एक्सेलने मला विचारलं. आयुष्यात काही क्षण किंवा काळ असे येतात की ज्यावेळी आपल्या कृतीवर आपले नियंत्रण नसतं, कोणती तरी बाह्य शक्ती आपले नियंत्रण घेते. माझेही असेच झाले, किंवा सोप्या शब्दात झोपेने माझ्यावर अंमल बजावला होता त्यामुळे मी नाही म्हणून मोकळा झालो. एक्सेलने ते वर्कबुक बंद करताच माझी झोप खाडकन उतरली, आपल्या हातून काय चूक घडली हे ध्यानात आले. आता पश्चात्ताप करण्यात काही अर्थ नव्हता. बाकी आपल्या हातून मोठी चूक झाल्यास आपण पेटून उठतो आणि ती चूक निस्तरायचा प्रयत्न करतो. माझेही तसेच झाले. मी झोपेचा विचार सोडून देवून गेल्या सहा तासातील काम पुढील तीन तासात पुन्हा आटोपले.

हळूहळू काम वाढत चालले होते. आज्ञावली लिहायची, तिचे एकक परीक्षण (युनिट टेस्टिंग) करायचे हा प्रकार सुरु झाला. प्रियु आणि रमाकांत असे आमचे वरचे बॉस होते. त्यांचे १०० जणांच्या संघावर बारीक लक्ष असायचे. एखादी मूर्खपणाची चूक झाल्यास त्यातील एक अपराध्याला सर्वांसमोर ओरडे पण मग दुसरा काही वेळाने त्या चूककर्त्याची समजूत घाली. प्रियु सकाळी साडेनऊच्या सुमारास ऑफिसात येत . आणि रात्री बऱ्याच उशिरापर्यंत थांबे. सीप्झची दारे रात्री १२ वाजता बंद होत आणि सकाळी पावणे सहाच्या सुमारास उघडत.  प्रियु पावणेबारा पर्यंत ऑफिसात थांबणे हे नित्याचे असे. परंतु त्यापलीकडे ते ऑफिसात थांबले की आम्ही बेचैन होत असू! न जाणो त्यांना सीप्झच्या गेटवरून घरी जाऊ नाही दिले तर? एकदा खरोखर तसे झालेही परंतु प्रीयुंनी मग एक दोघांना फोन करून आपली (आणि आमची सुद्धा) सुटका करून घेतली. प्रियु साधारणतः अकरा वाजता सर्व फ्लोअरवर चक्कर मारीत आणि सर्वांचे स्टेटस विचारीत. सुरुवातीला असेच एकदा त्यांनी मला आणि दहा पंधरा जणांना स्टेटस विचारलं. मग ते घरी निघून गेले. त्या दिवशी पोरे टाईमपासच्या मूड मध्ये होती आणि मी ही! बहुधा प्रीयुंना घरी झोप लागत नसावी.  पहाटे चार वाजता माझा फोन खणखणला. प्रियु फोनवर होते. "आदित्य आपण कोठवर आलो आहोत?" ११ वाजल्यापासून काही केलेच नाही तर माझी काय प्रगती होणार? मी अकरा वाजताचेच स्टेटस ऐकवण्यास सुरुवात केली. दीड मिनिटातच समोरून आवाज आला, "बॉस, ये तो ग्यारा बजे का स्टेटस है, जावो अभी काम करो!" मी पूर्ण शरणागती पत्करली.

आमच्यात कलाकार लोक होतेच. त्यातील मनीषला प्रियुचा आवाज बऱ्यापैकी जमे. मग त्याने रात्री दीड दोनला पब्लिकला स्टेटस विचारणारे फोन करण्यास सुरुवात केली. अर्धेअधिक लोक त्यात फसले जात आणि मनीषला स्टेटस देत. मनीष सुद्धा त्यांना झाडून घेत असे. असेच एकदा त्याने रविकृष्णला फसविले. रवीचा संताप संताप झाला. रवीच्या दुर्दैवाने पुढील दोन तीन दिवसात खरोखर प्रियुचा फोन आला. रवीने त्यांना मनीष समजून आपला सर्व राग त्यांच्यावर काढण्यास सुरुवात केली. पुढील संभाषण आठवले की मला अजूनही जोरदार हसू येते. आधी सिंहाच्या आवेशाने संभाषण सुरु करणारा रविकृष्णा शेवटी अगदी गोगलगाय बनून गयावया करू लागला होता.

रात्री बारा वाजता चहावाला येई. त्याभोवती आम्ही एकत्र जमू आणि चहा, बिस्किटे अशा मेनूचा आनंद घेत असू. जनतेने मग गाणी संगणकावर आणून टाकली. R D बर्मनची 'पन्ना कि तमन्ना है' वगैरे गाणी वाजवली जात. ती गाणी ऐकताना मेनफ्रेमच्या हिरव्या - काळ्या स्क्रीन कडे पाहत काम करण्याचा आनंद काही औरच असे. तीन साडेतीन वाजता अमेरिकतील संघ घरी निघून जाई. मग आम्हीसुद्धा चार चार खुर्च्या एकत्र लावून साधारणतः अंधारातील जागा पाहून  झोप काढीत असू. सकाळी सहा वाजले की मी सीप्झच्या गेटकडे धाव घेई आणि रिकाम्या विरार लोकल पकडून वसईला परतत असे. कधी कधी ह्यातही धमाल येई. काहीजण (पुन्हा रविकृष्णा आलाच!) SHORT PANT वर झोपित. असेच एकदा मंडळी SHORT PANT आणि गंजी अशा वेशात निद्राधीन झाली होती . त्यावेळी सकाळी काही मुली कामानिमित्त सात वाजताच ऑफिसात आल्या. त्यांना पाहून रविकृष्णा लज्जेने चुरचुर झाला! त्या मग बाजूला गेल्यावर "तुम लोगको मेरेको उठाने को नही होता क्या?" असे म्हणत त्याने आम्हाला फैलावर घेतले!
गेले ते दिन गेले! अशाच पुढील काही आठवणी पुढच्या भागात!

मागील भागात रंजूचा उल्लेख करायचा राहून गेला. जसजसे एकक परीक्षण प्रगतावस्थेत गेले तसतशा  काही क्लिष्ट समस्या पुढे येऊ लागल्या. मग रंजूला पाचारण करण्यात आले. आता रात्रपाळीत तीस चाळीस लोक धडपडत असायची आणि रंजूसाहेब एका संगणकावर कारचा खेळ खेळत असायचे. सुरुवातीला मला रंजुची आणि त्याच्या मेनफ्रेमवरील करामतीची माहिती नव्हती. आणि त्यातच रंजूचे आगमन झाल्यावर पहिले काही दिवस काहीच प्रश्न उदभवले नाहीत. त्यामुळे ह्या माणसाला खेळ खेळण्यासाठी इथे का बोलावलं असा मला प्रश्न पडायचा. बाकी तो कारचा खेळ मात्र उत्तम खेळायचा. मग एकदा आमचा एक संघ एका समस्येत अडकला. आता DB२ टेबल लोड होत नव्हते की nomad प्रोग्रॅम चालत नव्हता हे नक्की आठवत नाही. पण दिवसभर संघ अथक प्रयत्न करीत होता. रंजूचे रात्री नऊच्या सुमारास आगमन झाले. पाच दहा मिनिट त्या समस्येकडे त्याने पाहिलं. मग आपल्या डेस्कवर गेला. एक कारची शर्यत खेळला. त्यावेळी त्याच्या डोक्यात त्या प्रश्नाचे उत्तर कसे शोधायचं ह्याचा विचार चालू होता हे नक्की. मग ती शर्यत जिंकून आल्यावर गडी त्या प्रश्नावर बसला. दोन तीन प्रकारे प्रयत्न झाले आणि मग दहा मिनिटात तो प्रश्न सुटला होता. रंजूविषयी माझा आदर दुणावला होता. कोणत्याही क्षेत्रात मेहनत वगैरे ठीक असते पण अफाट गुणवत्तेला पर्याय नसतो ह्याची नोंद मी त्यावेळी केली.
रंजू खट्याळ होता. आपल्या खट्याळपणासाठी तो मेनफ्रेमच्या रेक्स ह्या भाषेचा वापर करायचा. रेक्समध्ये मेक्रो लिहून आम्हा गरीब आत्म्यांचा तो छळ करायचा. मेनफ्रेममध्ये लॉगऑन करताना किंवा मध्येच कधीही आमची हिरवी काळी स्क्रीन अचानक मोठमोठ्या संदेशांनी भरून जायची. मग आम्ही समजायचो की रंजूची आमच्यावर वक्रदृष्टी झाली आहे. एकदा त्याने असाच एकाला संध्याकाळच्या वेळी मेसेज पाठवला की मेनफ्रेमचे TSO सेशन  आता पाच मिनिटात बंद होणार आहे. तो बिचारा गरीब जीव खुशीने सर्व तयारी करून घरी जायला तयार होवून बसला.  सेशन बंद होण्याची वाट पाहत! एव्हाना ही बातमी शंभर जणांच्या संघाला पोहाविण्याची काळजी रंजुने घेतली होती त्यामुळे सर्वजण गालात हसत त्या गरीब जीवाकडे बघत होते. मग काही वेळाने त्या गरीब जीवाने (रमेश) बाकीच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली आणि सर्वत्र हास्यकल्लोळ पसरला!
कालांतराने Y२K प्रोजेक्ट संपलं. मग मी इंग्लंडला गेलो तिथे सुदैवाने रात्रपाळी करण्यापर्यंत वेळ आली नाही. शनिवारी मात्र जावं लागायचं. तिथे त्या मजल्याच्या दुसऱ्या भागात  त्या वित्तीय संस्थेचे कॉलसेंटर सुद्धा होते. एकदा त्यांचा दुभाषा आला नव्हता आणि पाकिस्तानातून क्रेडीट कार्डच्या चौकशीसाठी एक कॉल आला. मग तेथील एक गौरवर्णीय ललना माझ्याकडे आली आणि तिने मला तो कॉल घेण्यासाठी बोलाविले. अस्मादिक धन्य झाले! बाकी तो कॉल मात्र मी कसाबसा निभावला.
मधली काही  वर्ष रात्रपाळीशिवाय गेली. ०३-०४ साली मी फ्लोरिडात गेलो. तिथे एक मोठे प्रोजेक्ट प्रोडक्शनमध्ये  जायचं होत. त्याचं सर्व प्रकारचं परीक्षण आम्ही सहा - सात महिने करीत होतो. त्यातील शेवटचा एक महिना implementation डे (अंमलबजावणीचा दिवस) च्या दिवशी कराव्या लागणाऱ्या कृतींचा क्रम आणि त्यासाठी जबाबदार व्यक्तींची नेमणूक हे ठरविण्यात गेला. ही एकूण अंमलबजावणी ३६ - ४२ तास चालणार होती. प्रथम युरोप, मग अमेरिका आणि मग आशिया - ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे ही अंमलबजावणी करण्यात येणार होती. ह्यात कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर आज्ञावली आणि माहितीभांडार ह्यांना कसे पूर्वपदावर आणायचे ह्याचेही नियोजन करणे आवश्यक होते. कितीही नियोजन केले तरी ही (पूर्वपदावर आणण्याची) वेळ येऊ नये ही प्रार्थना आम्ही करीत होतो. माझी नेमणूक शुक्रवारी आणि शनिवारीच्या रात्रपाळीसाठी करण्यात आली होती. थोडक्यात म्हणजे मी आघाडीचा आणि शेवटचा फलंदाज होतो.
शुक्रवार संध्याकाळ सात ते शनिवार पहाट चार अशी माझी शिफ्ट होती.  माझ्याबरोबर गॅरी होता. गॅरी तसा प्रेमळ माणूस होता. त्याच्याकडे आणि त्याच्या एका मित्राकडे विविध प्रकारच्या चॉकलेटचा मोठा साठा असे . माझ्या अमेरिकतील वास्तव्यातील प्रत्येक दिवशी तो तीन - चार चॉकलेट माझ्या आणि आम्हा काही जणांच्या डेस्कवर आणून ठेवी. आणि ही चॉकलेट न खाल्ल्यास तो नाराजी व्यक्त करी. त्यामुळे सुरुवातीला मी दररोज ती खात असे. पण नंतर कंटाळा आल्याने मी ही चॉकलेटस खणात ठेवून घरी नेऊन ठेवण्यास सुरुवात केली. घरी मोठा चॉकलेटचा डबा भरला. मला काही काळाने गॅरी तसला म्हणजे गे असल्याचे एका मित्राकडून कळाले. मला मोठा धक्का बसला. परंतु त्याचे ऑफिसातील वागणे चारचौघासारखे होते. त्यामुळे चिंता न करण्याचे आम्ही ठरविले.
आमची सुरुवात थोडी अडखळत झाली. काही सुरुवातीचे जॉब अबेंड (अयशस्वी) झाले. परंतु आम्ही त्यातील समस्या सोडवून पुढे मार्गक्रमणा सुरु ठेवली. मग IMS माहितीभांडार रूपांतरण करण्याची वेळ आली. कोट्यावधी रेकॉर्ड असलेले हे माहितीभांडार. ज्यावेळी त्याचे रूपांतरण करण्याचा क्षण येतो तेव्हा भलेभले तणावाखाली येतात. तुम्ही भले आधी कितीही परीक्षण केले असो, प्रोडक्शन ते प्रोडक्शन! तिथे डेटाच्या असंख्य शक्यता (combination) असतात. त्यातील काही जर परीक्षणात समाविष्ट झाल्या नसतील तर बोंब लागली म्हणून समजाच! अशा सगळ्या वाईट विचारांना बाजूला सारून आम्ही देवाचे नाव घेत हे जॉब सुरु करण्याची सूचना दिली. जसजसे हे जॉब व्यवस्थित धावू लागले तसतसा आमचा जीव भांड्यात पडला. हे जॉब एकूण अडीच तीन तास चालले. जॉब चालू असताना आम्ही काही फारसे करू शकणार नव्हतो.  मध्ये पिझ्झा येवून गेला. आमच्या मोठ्या डायरेक्टर बाईचे रात्री दोन वाजता  आगमन झाले. एकंदरीत काम व्यवस्थित चालल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
पहाटे चारच्या सुमारास दुसऱ्या फळीचे आगमन झाले. त्यांना माहिती हस्तांतरित करून आम्ही निघालो. मला गॅरीने घरी सोडण्याची तयारी दर्शविली. काहीशा धाकधुकीतच मी त्याच्या गाडीत बसलो. त्याने सुखरूपपणे घरी सोडल्यावर मी देवाचे आभार मानले.
बाकी मग अंमलबजावणी यशस्वी झाली. सर्वत्र आमचे कौतुक वगैरे झाले.
०५ साली मी न्यू जर्सीला एका  भाड्याने कार देणाऱ्या कंपनीच्या संगणक विभागात दाखल झालो. बाकी काम तसे ठीक होते. अचानक एका निवांत संध्याकाळी विविध रेंटल स्टेशनच्या उत्पन्नाचे शहर, जिल्हा, विभाग ह्यानुसार वर्गीकरण करून माहिती साठविणारा डेटाबेस करप्ट झाल्याची चिन्हे दिसू लागली. ऑनलाईन आणि  बेच (हे नीट टाईप होत नाहीय) अशा दोन्ही प्रोसेस आचके देऊ लागल्या. हा उत्पन्न नोंद ठेवण्याचा डेटाबेस असल्याने ही नक्कीच आणीबाणीची वेळ होती. आम्ही सर्व एकत्र येऊन नक्की कोठे प्रश्न निर्माण झाला असावा ह्याचे विश्लेषण करू लागलो. अशा विश्लेषणात ही स्थिती टेस्ट रिजन मध्ये निर्माण करता येणे ही मोठी बाब असते. आमचा अमेरिकन व्यवस्थापक देखील आमच्या मागे येवून आम्ही काय करतो आहोत हे पाहू लागला. दुर्दैवाने आमचे सर्व अंदाज चुकत होते . त्या डेटाबेसमध्ये ही माहिती रात्रीच अपडेट होणे अत्यावश्यक होते. त्यामुळे घरी जाण्याचा तर प्रश्नच नव्हता. दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तसे कंपनीचा VP सुद्धा येवून बसला. तो  मुळचा इंग्लिश. परंतु गेले वीस वर्षे अमेरिकेत ह्या कंपनीत होता. आणि सुरुवातीच्या दिवसात त्याने  ह्या आज्ञावलीवर काम केले होते. त्यामुळे तोसुद्धा आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन आम्हाला विविध प्रोग्रॅम उघडायला सांगू लागला. ह्या प्रोग्रॅमच्या ह्या पराग्राफमध्ये बघा वगैरे वगैरे. दुर्दैवाने ते ही उपयोगी पडत नव्हते. बाकी इंग्लिश आणि अमेरिकन लोकांचे संबंध सलोखा, जिव्हाळा ह्या सर्व संज्ञांना कोसभर दूर ठेवणारे. त्यामुळे आमचा व्यवस्थापक आणि हा VP ह्यांचे एकमेकाला चिमटे काढीतच होते. शेवटी मग  एक मोठा कॉल झाला आणि बेच प्रोसेस तशीच पुढे दामटवायचा निर्णय घेण्यात आला. मध्येमध्ये जॉब अबेंड करीत होता पण शेवटी आम्ही सकाळपर्यंत ती प्रोसेस संपविली.  आता डेटाबेस अधिकच भ्रष्ट झाला होता आणि  पुढील काही दिवस, आठवडे तो सुधारेपर्यंत देशभरातून येणाऱ्या चौकशीसत्राला सामोरे जावे लागणार हे स्पष्ट होते. आणि झालेही तसेच! आणि हो रात्री अकराच्या सुमारास मागवलेला पिझ्झा खाण्याची सुद्धा फारशी इच्छा आम्हाला झाली नव्हती.
ह्याच कंपनीत रेंटल स्टेशनचे नंबर साठवणारा एक डेटाबेस होता. त्याची व्याख्या काहीशी चुकीची केली गेल्यामुळे तो एका वेळी मर्यादित नंबर साठवू ठेवू शकत असे. त्यामुळे दरवर्षी आम्ही न वापरात असलेले नंबर आणि त्यासंबंधीची माहिती उडवून टाकून तो नंबर नवीन ठिकाणच्या रेंटल स्टेशनला देत असू. हा नंबर खरोखरच वापरात नाही ह्याची खात्री करून घेण्यासाठी आम्ही खूप पाठपुरावा करीत असू. परंतु कधीतरी गोंधळ व्हायचाच! ही माहिती उडविण्याची प्रक्रिया संध्याकाळी ज्यावेळी डेटाबेस थोडी शांतता अनुभवत असेल अशा वेळी अमलात आणली जायची. अशाच एका डिसेंबर महिन्यातील थंडीच्या दिवशी आम्ही ही  प्रक्रिया संध्याकाळी सहाच्या सुमारास चालू केली. सुरुवातीला सारे काही आलबेल होते. सर्व काही नियोजनानुसार चालले होते. त्यामुळे आम्ही आठ वाजायच्या सुमारास घरी परतलो. सर्व रस्ते बर्फाच्छादित होते. पण नंतर मग अबेंड यायला सुरुवात झाली. अर्ध्या तासातच आम्हाला कळून चुकले की उडविलेल्या स्टेशनपैकी एक स्टेशन खास उपयोगातील होते. त्याचा बिसनेस काही वेगळ्या कारणासाठी उपयोग करायचे. हे उडविल्यामुळे बराच गोंधळ माजला. आम्ही आपापल्या गाड्या घेवून आठ मैलावरील ऑफिसात परतण्याचा निर्णय घेतला. शून्याखालील तापमानात रात्री दहा वाजता घराबाहेर पडणे हा नक्कीच आनंददायी अनुभव नव्हता. आणि गाडी जोरात पळविली तर जागोजागी दिसणाऱ्या पोलिसांचा धाक वाटत होता. ऑफिसात पोहोचल्यावर त्या स्टेशनला परत डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्याचे उत्तर फारसे कठीण नसल्याचे जाणविले. तरीही ते उत्तर अंमलात आणण्यासाठी विविध परवानग्या घ्याव्या लागल्या. त्या परवानग्या घेवून, त्या स्टेशनला समाविष्ट करून सर्व काही आलबेल होण्याची खात्री करेपर्यंत सकाळचे चार वाजले होते. यशस्वी होवून सकाळी घरी परतण्याचा आनंद काही औरच होता. मग दुसऱ्या दिवशी हे स्टेशन उडविण्याची ज्याने परवानगी दिली होती त्याचा आमच्या व्यवस्थापकाने व्यवस्थित समाचार घेतला!
अशा ह्या काही गमती जंमती! आपणास आवडल्या असाव्यात ही आशा !

शॉर्ट्स गाथा

बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत.  त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती ...