मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १ ऑक्टोबर, २०२३

स्वप्नरंजन



"सुदैवी आहेत जे त्यांनी नियोजित निवृत्तीचा क्षण अनुभवला"  ह्या अर्थाचा शेर ह्यांनी मिर्झा गालिब ह्यांनी उर्दूत जर लिहिला असता तर आज मला इथं तो उद्धृत करता आला असता. त्यांनी तसं काही लिहिलं नसावं आणि जरी लिहिलं असलं तरी ते माझ्यासारख्या मर्यादित वाचन करणाऱ्या माणसाच्या वाचनात येण्याची शक्यता तशी कमीच !  

हल्लीच्या काळात काही विशिष्ट वर्षांच्या अनुभवानंतर  व्यावसायिक जीवनात येणारं प्रत्येक वर्ष हे बोनस म्हणूनच समजावं ही सत्य परिस्थिती आहे.  त्यामुळं अगदी सविस्तर जरी नसलं तरी निवृत्तीनंतरचं नियोजन काही अंशी आपल्या मनात तरी तयार असावं ही माझी विचारधारणा.  त्यामुळं निवृत्तीनंतर करावयाच्या काही ठळक गोष्टींची माझ्या मनातील यादी आज कागदावर उतरवत आहे. 

१. जंगल लागवड  -  बऱ्याच काळापासून हे माझ्या मनात घोळत आहे. आता लागवड केलेलं  जंगल अगदी घनदाट होण्यासाठी कित्येक वर्षे जाणार, त्यामुळं मला ह्यासाठी आधीच उशीर झाला आहे, तरीही ह्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार. जमेल इतकी मोठी जमीन विकत घेऊन पारंपरिक डेरेदार वृक्षांच्या बियांची त्यात पेरणी करणार. मध्यावर काही मोजकी तळी असावीत. ह्या जंगलात चालत जाण्यासाठी सुद्धा पायवाट उपलब्ध नसावी. हळूहळू पक्षी येऊन इथं आपलं वास्तव्य करतील. त्यांच्या मधुर रवाने जंगलाचा परिसर प्रसन्न होऊन जाईल. वृक्ष इतके घनदाट होतील की ते सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करण्यासाठी उंच उंच वाढत जातील. संध्याकाळी जंगलात चालत गेल्यावर थंड वाऱ्याची झुळूक आपल्याला सुखावून जाईल. मावळत्या सूर्याची किरणे जंगलातील झाडांमधून मार्ग काढत कशीबशी आपल्यापर्यत पोहोचतील.  भास्कराचे ते दर्शन नयनांना आल्हाददायक ठरेल. 

हळूहळू माझ्या भोवतालच्या परिसरात माझ्या सारखेच निसर्गप्रेमी असाच उपक्रम राबवतील आणि एक मोठालं जंगल जिथं प्राणवायूचा अगदी मुबलक पुरवठा होईल, पक्ष्यांचे मधुर आवाज कानावर पडतील उदयास येईल ! कदाचित वाघ - सिंह सुद्धा तिथं वास्तव्यास येतील. 

२. प्रवास -  जगभरातील अफाट, वैविध्यपूर्ण निसर्ग पाहण्यासाठी मी भटकंतीवर निघीन. पुन्हा जंगलांत भटकंती करणं हा माझा प्राधान्यक्रम असेल. त्यासाठी आवश्यक असलेली काटक प्रकृती बनविणे आवश्यक असेल. ती मेहनतीनं कदाचित मी बनवीन सुद्धा पण जंगलात भटकण्यासाठी लागणारी हिंमत आणणं हे मात्र जरा जिकिरीचं काम असेल. त्यासाठी मात्र सुनियोजित असा उपाय काही नसतो. 

प्रवासात वेगवेगळ्या माणसांना भेटून त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांचा अभ्यास करणं हे माझ्या यादीत वरच्या क्रमांकावर असेल. काळ पुढे जात असला तरीही जुन्या विचारसरणीची माणसं जगात अस्तित्वात आहेत आणि राहतील ह्या सिद्धांतावर माझा विश्वास आहे. ह्या सिद्धांताला पुष्टी देणाऱ्या माणसांना भेटण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. माझा प्रवास, मला भेटलेली ही माणसं, मी भेट दिलेली जंगलं, त्यात भेटलेले पशु, पक्षी ह्यावर खूप खूप लिहीन. 

३. क्रीडा - जगभरात वर्षभर विविध क्रीडास्पर्धा होत असतात. वर्षभरात ह्या सर्व क्रीडास्पर्धा दूरदर्शनसंचावर आणि शक्य असल्यास प्रत्यक्ष मैदानावर जाऊन पाहीन.  प्रत्यक्ष स्टेडियमवर  जाऊन पाहण्याच्या यादीत प्राधान्यक्रमावर खालील क्रीडास्पर्धा असतील 

अ - एडन गार्डन्स, मेलबॉर्न आणि लॉर्ड्स येथील कसोटी सामने 

ब - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना 

क - वसई मैदानावर पूर्वी दोन दिवसांचे क्रिकेटचे अंतिम सामने होत असत. त्यातील होळी विरुद्ध पारनाका ह्या संघातील अंतिम सामना 

ड - न्यूझीलंडच्या अप्रतिम निसर्गसौंदर्याची पार्श्वभूमी लाभलेल्या क्रिकेट मैदानावरील एक दिवसीय (दिवस - रात्र) अंतिम सामना. ह्यात रात्री नऊ वाजता वगैरे मावळणाऱ्या सूर्याच्या सोनेरी किरणांत न्हाऊन निघालेलं ते हिरवेगार मैदान !

ई - विम्बल्डन स्पर्धेचा पुरुष गटातील अंतिम सामना. 

फ़ - मुंबई विरुद्ध दिल्ली रणजी अंतिम सामना 


४. अध्यापन - एक मराठी माध्यमाची शाळा सुरु करून त्यात अगदी तीस - चाळीस वर्षांपूर्वीचं वातावरण निर्माण करायचं. मुलांना मराठीतील गाजलेल्या लेखकांच्या साहित्यकृती जसे की स्वामी, पानिपत, श्रीमान योगी वगैरे. साने गुरुजींच्या गोष्टी सुद्धा ह्या मुलांना वाचायला मिळाव्यात. महाराष्ट्राचा इतिहास त्यांना कळायला हवा. गाजलेल्या कवींच्या कवितांचं रसग्रहण करण्याचा अनुभव त्यांना मिळायला हवा. इतकं सारं करताना त्यांना आधुनिक जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व शिक्षणसुद्धा योग्य त्या माध्यमातून दिलं जाईल.  त्यात मी दहावीपर्यंत गणित हा विषय शिकवीन. 

५. वाचन - मराठी आणि इंग्लिश भाषांतील नावाजलेल्या साहित्याचे अगदी सखोल वाचन करणार. (बहुदा हे एकाग्रतेनं करण्यासाठी मी जोपासलेल्या जंगलात वास्तव्य करावं लागणार). हे वाचन केल्यानंतर त्याचे रसग्रहण करणाऱ्या ब्लॉगपोस्ट्स लिहिणार. 

ह्याला आज नक्की झालं काय असं आपल्याला कदाचित वाटलं असणार. मला जवळून ओळखणाऱ्या लोकांना बहुदा ही शंका येणार नाही. कधी नव्हे ती सतत तीन दिवस सुट्टी आल्यानंतर आणि सलग आठ तास कंपनी ई-मेल कडे लक्ष न दिल्यावर मिनी निवृत्तीचे विचार मनात आले ह्यात आश्चर्य नाही. पण खरोखर ह्यातील थोड्याफार गोष्टी जरी करता आल्या तर मी स्वतःला धन्य समजीन !

सोमवार, १० एप्रिल, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग ४ Testing (परीक्षण)



बराच वेळ काही न सुचल्यामुळं सदानंद खिडकीबाहेर टक लावून पाहत होता.  ज्या झाडाकडं सदानंद टक लावून पाहत होता बहुदा त्याच झाडावर तो बसला होता. फडफड उडत तो खिडकीवर येऊन बसला. 

"तू माझ्याकडं का पाहत आहेस?"

"छे छे ! मी असाच बाहेर खिडकीबाहेर बघतोय. "

"गेली पाच मिनिटं तू काही न करता बाहेर कसा काय पाहू शकतोस? तुझ्या कामाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होणार नाही का?"

"प्रत्यक्ष संगणकावर घालवलेला वेळ आणि उत्पादकता समप्रमाणात असणं हे समीकरण केवळ यांत्रिक कामांच्या बाबतीत लागू होतं. बौद्धिक कामाच्या बाबतीत तुम्ही संगणकावर घालवलेल्या वेळेपेक्षा तुमच्या कामाच्या दर्जा महत्वाचा ठरतो. सतत संगणकावर काम करण्यापेक्षा तुम्ही विचारपूर्वक दीर्घकालीन धोरण आखणं हे अधिक महत्वाचं आहे"

"अबब, सदानंद महाराज आता कसलं धोरण आखात आहेत? ChatGPT च्या वादळाला कसं तोंड द्यायचं त्याचं ?"

ChatGPT प्रकरण अगदी ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं ह्याचं आश्चर्य करण्याची ही वेळ नव्हती. 

"मी आणि माझ्या टीमने विकसित केलेल्या आज्ञावलीवर विविध प्रकारचे परीक्षण करून मगच ती प्रत्यक्ष production मध्ये अंमलात आणायची असते, त्यात सुद्धा मानवानं स्वतः परीक्षण करण्यापेक्षा विविध स्क्रिप्ट्स विकसित करून संगणकाला केवळ एका कळीच्या आधारे  ह्या स्क्रिप्ट्स धावायला सांगायच्या ह्यावर खरंतर भर आहे. बोलायला आणि वरिष्ठांसमोर रंगीबेरंगी स्लाईडसच्या आधारे सादर करायला हे सारं सोपं असलं तरी प्रत्यक्षात अंमलात आणायला खूप विचार करावा लागतो"

"तुम्हांला त्याचेच पैसे मिळतात. बाकी तू माझ्याशी बोलताना एक तर धड पूर्ण मराठीत बोलत जा किंवा पूर्ण इंग्लिश मध्ये! उगाचच अधूनमधून इंग्लिश शब्दांचा वापर करतोस, मराठी शब्दांचा हास्यास्पद वापर करतोस जसे की स्क्रिप्ट्स धावायला"

"अजूनही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील साधारणतः २५ टक्के संज्ञांना योग्य असे पर्यायी मराठी शब्द नाहीत. त्यामुळं तू मला दोष देऊ नकोस !"

"बरं ते जाऊ देत ! तुम्हां माणसांचं मला कळत नाही. एकीकडं तुम्ही म्हणता की आज्ञावलीवर विविध प्रकारचे परीक्षण करून मगच ती प्रत्यक्ष production मध्ये अंमलात आणायची असते, आणि दुसरीकडं नव्या पिढीनं लग्नाआधी लिव्ह - इन च्या गोष्टी केल्या की तुम्ही नाकं मुरडता !" 

सदानंदला मोठा धक्का बसतो. ह्याला सर्व कसं माहिती हे अगदी समजेनासं होतं. पण हार मानेल तो सदानंद कसला !

"अर्धवट ज्ञान हे संपूर्ण अज्ञानापेक्षा धोकादायक असतं असं म्हणतात ते खरंच आहे. अरे आज्ञावलीचं परीक्षण करण्यासाठी वेगळे environment असतं. तिथं केलेल्या टेस्टिंगमुळे प्रत्यक्ष प्रॉडक्शनवर काही परिणाम होत नाही. लिव्ह - इनचं तसं नसतं तिथं तुम्ही थेट तुमच्या आयुष्याशी खेळत असता !"

"सर्व काही मीच समजावून सांगायचं का तुम्हांला ? अरे तुम्ही मोठमोठाली आभासी जगं उभारता , तुमचे विकसित अवतार बनवता. मग तुमची तरुण जोडपी त्यांच्या अवतारांना आभासी दुनियेत लिव्ह - इन ला का पाठवत नाहीत? "

त्याच्या ह्या प्रश्नावर सदानंदकडं उत्तर नव्हतं. कदाचित ही कल्पना एखाद्या स्टार्टअपला विकावी असा विचार त्याच्या मनात आला. 

"आणि हो नुसतं टक लावायला हेच झाड नेहमी निवडणार असशील तर नक्की सांग ! मी दुसरीकडं जाऊन बसेन. मलाही झोन मध्ये असायला आवडतं !" 

शुक्रवार, ३१ मार्च, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग २ आनंदमय


 

आज सकाळी सदानंद लवकरच तयार होऊन धावायला निघाला. टी शर्ट, स्पोर्ट्स शूज अशा तयारीनिशी मैदानाभोवती फेऱ्या मारणाऱ्या सदानंदला पाहून लोक अचंबित झाले. किंबहुना ते अचंबित झाले असावे असा त्यानं समज करुन घेतला. अर्थात दुसऱ्या फेरीनंतर दमछाक झाल्यानं तो एका डेरेदार वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला. 

तितक्यात तो आला. कॅव् कॅव् करत त्या वृक्षावर बसला. 

"मी काय करतोय ह्यात लोकांनी का नाक खुपसावं ?" तो आता सदानंदच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनल्यानं त्यानं थेट मुद्द्याला हात घातला. 

"कॅव्  कॅव्! आईवडिलांनी तुझं  नांव सदानंद का ठेवलं असावं ह्याचा क्षणभर तरी विचार केला आहे का तू ?"

त्याला काय म्हणायचं आहे हे समजल्यानं सदानंदनं त्याच्याकडं सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करत पाणी पिण्याकडं लक्ष केंद्रित केलं. 

"कॅव्  कॅव्! तुझ्याकडं काही मिनिटं आहेत असं गृहीत धरुन मी पुढील काही काळ तुला अनुभवाचे दोन शब्द ऐकवत आहे. 

१.  आधुनिक काळातील कोणतीही व्यक्ती सामाजिक जीवनात प्रवेश करण्याचे ठरविते त्यावेळी ती भोवताली असलेल्या समाजाला आपल्यावर टिपण्णी करण्याचा अधिकार प्रदान करत असते. 

२. ज्याप्रमाणे निवृत्त झालेला प्रत्येक क्रिकेटर / क्रिकेटरीण समालोचक होण्याची दाट शक्यता असते त्याप्रमाणं नोकरीव्यवसायातून निवृत्त झालेला प्रत्येक माणूस भोवतालच्या समाजाला अधिकारवाणीने सल्ले देत असतो. 

३. आपल्याला काय हवं आहे हे ज्याला समजलं आहे आणि त्याप्रमाणं जीवन जगण्याचा ठामपणा जो दाखवु शकतो तोच माणुस आजच्या काळात  आपलं मन:स्वास्थ्य टिकवू शकतो.  विचारांतील सुस्पष्टता ही सध्या मनुष्यस्वभावातील सर्वात महत्वाची गोष्ट बनली आहे. 

४. समाजात परस्परांविषयी अविश्वासाची भावना वाढत चालली आहे. समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कृतीचा चुकीचाच अर्थ लावणारी माणसं बहुसंख्येनं तुझ्या भोवती वावरत असतील. ह्या व्यक्तींमुळे प्रभावित होऊ नकोस. अशा व्यक्ती मालिकांमधून तुला भेटत असतील तर अशा मालिका बघणं बंद कर. त्यापेक्षा हॉलिवूड चित्रपट परवडले. जे काही भांडण करायचं असेल ते थेट करण्याची त्यांची तयारी असते. 

५. उघडपणे भांडणं करण्याची मानसिकता लोक हल्ली दाखवत नाहीत. टोमणे मारून समोरच्याचं मनःस्वास्थ बिघडविण्याचा हलकासा प्रयत्न केला जातो. त्यामुळं हा प्रकार आपल्याला समजलाच नाही ही कला अवगत करणे योग्य !

६. सद्यकाळात बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. पुर्वी वाढत्या  वयानुसार मोकळेपणानं जीवनातील विविध कलांचा आस्वाद घेण्याची संधी, पर्यटन वगैरे गोष्टींवर जी बंधनं येत ती आज बऱ्याच प्रमाणात नाहीशी झाली आहेत. नव्या जगानं पुर्वीच्या आचारविचारांत काहीसे फेरफार केले आहेत. थोडासा विचार करुन हे नियम समजावून घेतलं तर आयुष्य खूप सुखकर होऊ शकतं. ह्यासाठी थोडंफार व्यवहारचातुर्य दाखवता यायला हवं. पूर्वी भाबडेपणा हा एक चांगला गुण समजला जात असे. आज तसं नाही!"

"कॅव् कॅव् येतो मी" आणि तो उडून गेला. 

"आपल्याला बोलायची अजिबातच संधी न देता गेला तो!" सदानंद पुटपुटला. "हा सुद्धा हॉलिवूड चित्रपट पाहतो. अमॅझॉन प्राईम घ्यायला हवं, त्या सोबत प्राईम व्हिडिओ फुकटात मिळेल!" नव्या जोमानं सदानंद मैदानाला फेऱ्या मारू लागला होता. 

बुधवार, २९ मार्च, २०२३

Life ऑफ सदानंद ! -भाग १ सैरभैर

प्रस्तावना - सदानंदच्या जीवनातील संभ्रमांचा उहापोह करू पाहणारी ही शृंखला. ह्यात काही ठोस विचारांचं पाठबळ घेऊन सुरुवात करत नाहीय. जमेल तसं लिहीन.  सदानंदचे जीवन असे शीर्षक द्यावं की Life  ऑफ सदानंद असं लिहावं ह्यावर बराच विचार करून उत्तर सापडलं नाही. आताशा असंच होतंय. शंभर टक्के बरोबर किंवा शंभर टक्के चूक असं हल्ली नसतंच काही. असो बघुयात काय होतंय ते !





सकाळ झाली. सदानंद चहाचा कप घेऊन अंगणात येऊन बसला. मार्च महिना असला तरी गेल्या आठवड्यातील पावसानं वातावरणात आलेला गारवा अजूनही तग धरून होता. गारवा असला की कसं मन चैतन्यानं भरून जातं असं सदानंदला वाटून गेलं. भोवतालच्या वातावरणाचा आपल्याला मूडवर परिणाम होता कामा नये असं वारंवार बजावून सुद्धा काही परिणाम होत नाही ह्याचा नेहमीप्रमाणं सदानंदला राग आला. 

तितक्यात तो आला. कॅव् कॅव् करत सदानंदच्या जवळच्या झाडावर बसला. त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं टाळायचं असं सदानंदने कितीही ठरवलं असलं तरीही त्याच्या बंडखोर मनानं त्याची साथ दिली नाही. 

"कसा आहेस तू" काहीशा नाखुषीनं सदानंदने त्याला विचारलं. "मी सदैव मजेतच असतो" तो म्हणाला. "तूच काहीसा सैरभैर झालेला दिसतोयस!" त्यानं थेट आपल्या खासगी बाबीत घुसावं ह्याचा खरं तर सदानंदला राग आला होता. पण आता नाईलाज होता. 

"मनातील द्वंदाचा सामना करतोय मी. आप्तजनांचं अचानक निघून जाणं, विविध लोकांच्या, कुटुंबाच्या आपल्याकडून / स्वतःच्या  स्वतःकडून असलेल्या अपेक्षांची पुर्तता न करता आल्यामुळं सदैव असमाधानी राहावं लागणं, भोवतालच्या लोकांसोबत होणाऱ्या आपल्या मतभेदांची वारंवारता वाढत जाणं, संपूर्ण समाधानी असल्याचे क्षण क्वचितच येणं ह्या साऱ्या गोष्टींमुळं  सैरभैर झालोय मी!" 

" कॅव् कॅव्, तू खरोखरंच अज्ञानी आहेस. तू ज्या गोष्टीमुळं सैरभैर होतोय त्या सर्व गोष्टी तुझ्या वयोगटातील बहुसंख्य माणसांच्या आयुष्यात सातत्यानं घडत राहतात. त्यानं ते सुद्धा काही काळ विचलित होतात. पण लगेचच दुसऱ्या गोष्टीत आपलं मन रमवून घेतात. तुझं जे मन आहे ना त्याला तुला सांभाळता येत नाहीये ! उगाचच त्याला डोक्यावर चढवून ठेवलं आहेस त्याला तू!" 

"आता हेच बघ ना -  लोकांसोबत होणाऱ्या आपल्या मतभेदांची वारंवारता वाढत जाणं. जर तू हा मुद्दा लक्षात घेतलास तर त्यात चिंता करण्यासारखं फारसं काही नाही. वयानुसार तुझ्या कार्यालयीन, वैयक्तिक जीवनातील भूमिका बदलत गेल्या आहेत. मनुष्य जन्मातील काही भुमिकांमध्ये तुम्हांला एक ठाम निर्णय घ्यावाच लागतो. हा ठाम निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करत असताना तू सर्वांना खुश ठेऊ शकत नाहीस. त्यामुळं त्या भूमिकेला जे योग्य आहे ते करावं. आपण हे का करत आहोत हे समजावून सांगण्याचा एकदा प्रयत्न करावा. आणि आयुष्यात पुढे चालायला सुरुवात करावी. एक लक्षात ठेव. म्हटलं तर आयुष्य फार छोटं आहे. मागं काय घडलं त्याचा फारसा विचार करण्याइतका तुझ्याकडं वेळ नाही! येतो मी, तुझ्या कार्यालयाची वेळ तुला पाळायला हवी!" 

कॅव् कॅव् करत तो उडून गेला. "तुझं आयुष्य किती सोपं आहे ना !" असा प्रश्न त्याला विचारला असता तो वैतागला असता का असला विचार करतच सदानंद कार्यालयाच्या तयारीला लागला. 

शनिवार, ३० जुलै, २०२२

पर्वताचं पर्वतपण

 


घराची खिडकी उघडली की समोर एक महाकाय पर्वत मला दर्शन देतो. ह्या पर्वताची अनेक रुपं मला भावत रहातात. कधी त्याचं शिखर हिमाच्छादित असतं, कधी त्याचा बहुतांश भाग हिरव्यागार झाडीनं व्यापलेला असतो तर प्रखर ग्रीष्म ऋतूत त्याच्या पायथ्याशी काहीसा रखरखीतपणा जाणवतो. आपल्या बाह्यरुपानं आपल्या मनःस्थितीवर परिणाम करुन घेणं पर्वताच्या स्वभावातच नसावं अशी माझी समजुत! त्यामुळं ह्या सर्व परिवर्तनांना स्थितप्रज्ञासारखा सामोऱ्या जाणाऱ्या पर्वताचं मला भारी कौतुक ! 

मी खूप आनंदात असलो की पर्वताकडं मोठ्या आशेनं पाहतो, पर्वत माझं कौतुक करेल म्हणून ! पर्वत कौतुक करण्यात काहीच उणा पडत नाही पण मी ह्या आनंदाच्या भरात वाहत जाणार नाही ह्याची योग्य ती काळजी घेतो. मी दुःखी असलो, निराश झालो की पर्वत माझा एकमेव आधार असतो. पर्वत सहानभूती वगैरे दाखवत नाही. माझं बोलणं फक्त शांतपणे ऐकून घेतो. मनातील शल्यं मी बोलुन अथवा त्यांची मनातल्या मनात मी उजळणी करेपर्यंत  तो तिथं केवळ माझ्यासाठी हजर असतो. त्याला माझ्यासाठी सदैव उपलब्ध राहण्यापलीकडं दुसरं काही काम नसावं का ही शंका माझा पिच्छा सदैव पुरवत राहते. पण तो माझ्यासाठी उपलब्ध नसला तर माझं काय होईल ह्या भितीपोटी त्या शंकेचा पाठपुरावा करण्याचं धारिष्ट्य माझ्यात नसतं. 

एके दिवशी नवलच घडलं ! पर्वताकडं पाहताक्षणी ह्याचं काहीतरी बिनसलं आहे हे मला जाणवलं. मी पर्वताला विचारलं, "पर्वता, पर्वता, काय झालं रे?" सुरुवातीला पर्वत काही बोलेना. पण मी ही इरेला पेटलो होतो. मला खरोखरच पर्वताची काळजी वाटत होती की माझ्यासाठी पर्वताचं पर्वतपण नसण्याची होती ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं धारिष्ट्य माझ्यात नव्हतं.पर्वताची मनधरणी करण्यासाठी अर्थातच मला कित्येक दिवस लागले. मी ही काहीसा अबोला धरला त्याच्याशी. शेवटी एका सायंकाळी पर्वत बोलता झाला. 

"तू माझ्याकडं मोठ्या आदरानं पाहतोस, माझ्या स्थितप्रज्ञतेचं तुला कौतुक वाटतं ह्याची मला पुरेपूर जाणीव आहे. माझ्या रुपानं  तुझ्या आयुष्यात एक स्थैर्य पुरवणारा कायमस्वरुपी आधार आहे ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. तुझ्याच नव्हे तर ह्या भूतलावरील बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात काय घडत आहे हे मला माझी इच्छा असो वा  नसो दिसत रहातं. माझ्या अंगाखांद्यावर लाखो वृक्षवेली, हजारो पशु पक्षी, जीव जन्म घेतात, आनंदात बालपण घालवतात, तारुण्याच्या उन्मादात मोजके क्षण घालवतात आणि त्यानंतरच्या प्रदीर्घ जबाबदारीच्या आयुष्यानंतर शेवटी जीवनाच्या अंतिम सत्याला सामोरे जातात. माझ्या अंगावर एका ओहोळाच्या रुपात जन्म घेणारी नदी जेव्हा पठारावर पोहचेपर्यंत एक विशाल रुप धारण करते आणि रुपगर्वितेप्रमाणं गावागावातून लोकांची आयुष्यं फुलवत जाते हे ही मी पाहतो."

"हे सर्व पाहून माझ्या मनात काहीच खळबळ माजत नसावी असंच तुम्हां साऱ्यांना वाटत असावं. निर्मात्यांनी सृष्टीची निर्मिती केली तेव्हा मी स्वखुशीनं पर्वतपण स्वीकारलं असावं अशीच सोयीस्कर समजूत तुम्ही साऱ्यांनी करुन घेतली असावी. तो काळच वेगळा होता. आदर्शवादी होता. ज्येष्ठांनी माझी निवड केली ती काही विशिष्ट योग्य कारणांमुळं ह्याची मला जाणीव होती. त्यामुळं त्यांचा हा निर्णय मी शिरोध्याय मानला. पर्वताचं पर्वतपण असणं ही समाजाची गरज असते ह्याची जाणीव सर्वांना होती. त्यामुळं मी हे पर्वतपण जरी सुरुवातीला स्वखुशीनं स्वीकारलं नसलं तरीही कालांतरानं ते माझ्या अंगवळणी पडलं"

"काळ बदलत चालला. महत्वाकांक्षा आणि सोबतीला वृथा अभिमान सर्वत्र पसरत चालला. टेकड्यांना सुद्धा पर्वत बनण्याची स्वप्नं पडू लागली. टेकड्यांनी पर्वत बनण्याची स्वप्नं बघण्यात गैर काही नाही. पर्वत बनावं ते विशाल होऊन, उंची गाठून! ते जमत नाही म्हणून मुळच्या पर्वताचं खच्चीकरण करुन त्याला आपल्या बरोबरीला आणण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. माणसांना मोजक्या महाकाय पर्वतांची गरज आहे, असंख्य टेकड्यांची नाही"

अचानक पर्वताच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव दिसू लागले. "असं हे व्यक्त होणे माझ्या व्यक्तिमत्वात बसत नाही आणि खरंतर मी चुकलोच ! " पर्वताने आपल्या मनोगताचा शेवट केला. पर्वताची उंची काहीशी कमी झाली होती. ही व्यथा व्यक्त करणं हे त्याच्या भुमिकेला शोभेसं नव्हतं. 


त्यानंतर पर्वतानं मौन स्वीकारलं ते आजतागायत कायम आहे.  

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

मला समजलेला कृष्ण !


 

जनमानसात कृष्णाविषयी बरंच कुतूहल असतं. महाभारतातील कृष्णाविषयी बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण कृष्णाचं ते एकमेव रुप नाही अशी माझी समजुत आहे. कृष्णाविषयी असलेल्या माझ्या काही समजुती !

१. कृष्णाचं पारंपरिक रुप एक जे आपण लहानपणापासुन वाचत, ऐकत आलो आहोत ! पण कृष्ण हे एक तत्व आहे, एक संकल्पना आहे ! 

२. कृष्णाचं प्रत्येकासाठी एक खास अस्तित्व असतं. हे रुप आपल्याला जाणुन घेता यायला हवं ! हे रुप जाणुन घेण्याची इच्छा हवी आणि क्षमताही हवी ! नाहीतर आपल्यासाठीचं कृष्णाचं रुप आपल्या भोवताली येऊन, पिंगा घालुन गायब होतं आणि आपल्याला ते जाणवत सुद्धा नाही ! 

३. आपल्या कृष्णाची प्रतिमा जनमानसातील कृष्ण प्रतिमेपेक्षा फार वेगळी असु शकते ! आपल्या कृष्णाला कदाचित ठाऊक सुद्धा नसतं की तो आपल्यासाठी कृष्ण आहे ! 

४. कृष्ण तुम्हांला गवसला पाहिजे. ज्यावेळी कृष्णभान होते तो एक विलक्षण अनुभूतीचा क्षण असु शकतो. काहींना कृष्ण मुर्त स्वरूपात सापडतो तर काहींना त्याचं अस्तित्व आसपास जाणवत राहतं. 

५. कृष्ण तुमच्यासोबत कायम रहात नाही. तुमचं व्यक्ती म्हणुन स्वतंत्र अस्तित्व तो जाणुन असतो. तुम्ही आनंदाच्या शिखरावर असाल तर तो तुम्हांला एकटं सोडुन देतो. तुम्ही संकटात सापडलात तर तो कदाचित तात्काळ धावुन येण्याची घाई करत नाही ! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही स्वतः संकटाचा कसा मुकाबला करु शकता ह्याची तो चाचणी घेतो ! 

६. कृष्ण तुम्हाला जीवनावर श्रद्धा ठेवायला शिकवतो, तुम्हांला दुनियेच्या नकळत दाद देतो, तुम्हांला स्वतःवरील आत्मविश्वास बळकट करण्यास मदत करतो. 

७. तुमच्या वयानुसार तुमचा कृष्ण आपली रुपं पालटतो ! तुमच्या भावनिक जीवनाचा तो कायम अंश बनुन राहतो !  तो तुमचाच एक अविभाज्य अंश असतो ! काही कारणास्तव विधात्यानं त्याला एक वेगळं अस्तित्व दिलेलं असतं !

८. मरणानंतर काय होत असावं? कदाचित आपण ह्या कृष्णात विलीन होत जात असु ! दोघं मिळुन आपल्या आयुष्याचा आढावा घेत असु !

कृष्ण आपल्याला सोळा हजाराहुनही कित्येक अधिक प्रकारे समजु शकतो ! त्यातलाच कदाचित हा एक प्रकार ! 

शनिवार, २८ जुलै, २०१८

गुंतागुंत



आयुष्यातील मोठेपण (वय आणि जबाबदारी ह्या दोन्हींचं ) तुमच्यासमोर तुमच्या आयुष्यावर परिणाम करणारे अनेक घटक आणुन ठेवत असतं.  
काही घटक केवळ एकतर्फी परिणाम करत असतात तर काही घटक आणि तुम्ही ह्या दोघांचं एकमेकांशी दुतर्फी नातं असतं. हे घटक म्हणजे तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक सहकारी,समाज वगैरे वगैरे!

प्रारंभ करुयात व्यावसायिक आयुष्यापासून! व्यावसायिक आयुष्यात तुमच्यासमोर असणारे दोन पर्याय म्हणजे केवळ तग धरत राहणं किंवा दुसरा म्हणजे सतत प्रगतीचा ध्यास धरणं! 

हल्ली व्यावसायिक यश या विषयावर बरंच काही बोललं आणि लिहिलं जातं! काही वेळा ह्या विश्लेषणामध्ये एका विशिष्ट ज्ञातीमध्ये एक विशिष्ट गुण असतो या दिशेने विचाराची मांडणी केलेली दिसून येते. इथं ज्ञात म्हणजे एका विशिष्ट प्रदेशात प्रदीर्घ काळ वास्तव्य केलेला समाज असा अर्थ प्रामुख्यानं अभिप्रेत आहे.  पुर्वी आपल्या समाजाला धरुन राहण्याची आणि त्या समाजातच वावरण्याची वृत्ती दिसुन यायची. त्यामुळे या विचारसरणीला अनुसरुन प्रत्येक समाजाचं वागणं काही प्रमाणात दिसुन यायचं. सध्या या बाबतीत परिवर्तनाचा काळ दिसुन येत असला तरी अजुनही काही ज्ञाती आपले काही गुण बाळगून असल्याचं आढळून येतं. 

एक उदाहरण देत आहे की समजा तुम्हाला व्यावसायिक ठिकाणी प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ही प्रतिकुल परिस्थिती अनेक प्रकारची असू शकते. यामध्ये नोकरीसाठी लांबचा प्रवास करावा लागणे, सतत तुमच्या कामगिरीचं विश्लेषण चारचौघात होत राहणे आणि त्या अनुषंगाने येणारे काहीसे अपमानास्पद असे बोल चार-चौघात ऐकावे लागणे अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो.  

तुम्ही या परिस्थितीला कसे तोंड देता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबुन असतात. तुमच्यामध्ये जर चिकाटी असेल तर तुम्ही या गोष्टीचा सामना करु शकता. कोणतीही गोष्ट कायम राहात नाही असे आपण लहानपणापासून ऐकत आलो असतो. परंतु त्यावर माझा आधी फारसा विश्वास नसायचा. परंतु हल्ली मात्र खूप विश्वास बसू लागला आहे. बऱ्याच मोठाल्या वित्तीय संस्थांमध्ये झपाट्याने बदल होत असतात. जर तुम्ही अशा वातावरणात कार्यरत असाल तर काहीवेळा तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती तर काहीवेळा परिस्थिती प्रतिकुल बनते. या दोन्ही स्थितीत स्थिर डोक्याने वावरणारी माणसे व्यवस्थितपणे तग धरु शकतात. 

प्रतिकुल परिस्थितीत चिकाटीपणा दाखवणं ह्या बाबीचं प्रशिक्षण लहानपणापासुन मिळायला हवं. सर्व प्रकारची यशं सहजगत्या साध्य होणं शक्य नसतं आणि बऱ्याच वेळा हितकारक सुद्धा नसतं. एक विशिष्ट यश मिळविण्यासाठी किंवा लक्ष्य साध्य करण्यासाठी वर्षोनुवर्षे तपस्या करावी लागणं ही केवळ जुन्या काळात घडणारी घटना नव्हे. हे सद्यकाळातील सुद्धा सत्य आहे.  

काही काळानंतर व्यावसायिक जीवन एक तपस्या सुद्धा बनू शकते किंबहुना बहुतांशी वेळा बनतेच. तिथल्या वातावरणात तग धरुन राहण्यासाठी किंवा प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या
कौशल्याची आणि व्यावसायिक वर्तणुकीची अपेक्षा असते. ही आवश्यक कौशल्यं किंवा अपेक्षित व्यावसायिक वर्तणुक लिखित स्वरुपात केव्हाच उपलब्ध नसतात. त्या वातावरणातील तुमच्या अस्तित्वामुळं तुम्हांला अनुभवातून आणि आकलनशक्तीद्वारे ह्या सभोवतालच्या 
Ecosystem ला जाणुन घेऊन त्याप्रमाणे आपलं वागणं आणि कौशल्य विकसित करणं हे अपेक्षित असते. 

ह्या अपेक्षेचं भान प्रत्येकाला समजतंच असं नाही.  ज्या काही जणांना समजतं त्यातील प्रत्येकाला ते आपल्या वागण्यात अंमलात आणणं आवश्यक वाटतं असेही नाही. आणि ज्या कोणाला हे परिवर्तन करण्याची इच्छा असते त्यातील सर्वांना लेखाच्या सुरुवातीला उल्लेखलेले भोवतालचे घटक साथ देतील असंही नाही . 

आता इथे विचारात घेण्यासाठी एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे तुमच्या आयुष्यातील किती वेळ तुम्ही तुमच्या व्यावसायिक आयुष्यासाठी देऊ शकता. कारण एक मुलगा, एक पती / पत्नी, एक पालक आणि एक समाजातील जबाबदार नागरिक ह्या विविध रुपातील जबाबदाऱ्या तुमच्या समोर असतात. त्यातील किती जबाबदाऱ्या कोणत्या प्रमाणात स्वीकारण्याचं तुम्ही ठरवता यावर तुमचा बाकीच्या जबाबदारींचा उपलब्ध वेळ अवलंबून असतो. 
इथं एक काहीसा लक्ष वेधुन घेणाऱ्या घटनांचा क्रम सुरु होऊ शकतो.  तुम्हाला एखाद्या व्यावसायिक ठिकाणी प्रगती करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा उलगडा झाला तर तुम्ही मनातल्या मनात खुश होता. आणि तिथे अधिकाधिक यशप्राप्तीच्या हव्यासापायी प्रयत्नशील होत जाता. हे होत असताना तुम्हाला अजुन यश मिळतं आणि त्यामुळं तुमच्या जबाबदाऱ्या अधिक वाढतात आणि मग तुम्ही पुन्हा त्याहून अधिक प्रयत्नशील होता. हे चक्र सुरूच राहतं. 

या सर्व बाबींमध्ये तुम्ही तुमच्या आयुष्यातील बाकीच्या सर्व घटकांपासुन दुर दुर जाऊ लागता. परंतु तुमचे डोळे हे तुमच्या स्वतःच्या यशाने दिपुन गेले असल्यामुळे तुम्हाला बाकीच्या वास्तवाची जाणीव होणं तसं म्हटलं तर कठीण असतं. अचानक असा एक दिवस उजाडू शकतो कि ज्या दिवशी काही कारणास्तव तुमचं ते व्यवसायिक दुनियेतील जग अचानक भंग पावते.  मग अशावेळी मात्र तुम्हांला बाकीच्या घटकांची गरज भासु लागते.   त्या घटकांकडे तुम्ही धाव घेतात परंतु यातील सर्वच घटक तुमच्यासाठी काही वाट बघत थांबलेले नसतात. त्यामुळे होतं काय की तुम्ही एकटेपणाच्या गर्तेत जाऊ शकता.  

आता दुसऱ्या बाजुनं विचार करुयात. जर काही कारणास्तव तुम्ही व्यावसायिक ध्येयं प्राध्यान्यक्रमावर स्वतःहुन ठेवली नाहीत किंवा परिस्थितीनं तुम्हांला ती प्राध्यान्यक्रमावर ठेवू दिली नाहीत तर तुमचं आयुष्य बाकीच्या घटकांमध्ये प्रामुख्यानं व्यतित होत असतं. ह्यात काही वेळा काही न करता वेळ घालवणं ह्या शक्यतेचा सुद्धा समावेश होऊ शकतो. जसं पहिल्या शक्यतेत व्यावसायिक जगातील अपेक्षाभंगामुळं बाकीच्या घटकांची गरज भासु शकते त्याचप्रमाणं ह्या शक्यतेत आयुष्याच्या एका वळणावर तुमच्यातील व्यावसायिक महत्वाकांक्षा जागृत होऊ शकतात. आयुष्यातील एका विशिष्ट वळणानंतर तुमची इच्छा कितीही दुर्दम्य असली तरी तुम्ही तुमचं व्यावसायिक जीवन मार्गावर आणु शकत नाहीत.  

थोडक्यात पहायला गेलं तर तुम्ही पुर्णपणे समाधानी असण्याची शक्यता तसं पाहिलं तर नगण्यच असते. काही माणसं हे स्वतःहून हे सत्य कबुल करतात तर काही प्रकारची माणसं हे सत्य दडवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता आपल्या मनातील सर्व काही मनमोकळेपणाने कोणाला तरी सांगायचं का हा एक पहिला प्रश्न असतो. जर त्याचं होकारार्थी उत्तर आला तर ज्याच्यासमवेत हे सारं शेअर करायचं असतं त्या माणसाची खरी खुरी ओळख आपल्याला पटायला हवी. 

जाता जाता सांगणं एकच! ह्यातील आपला प्रकार कोणता हे प्रत्येकानं ओळखावं आणि त्या सत्याचा स्वीकार करुन आनंदानं जीवन जगावं. पण हे करत असताना दुसऱ्या प्रकारातील व्यक्तींचा आदर बाळगण्याचं भान दाखवावं.  

गुरुवार, १८ मे, २०१७

डेट भेट


ह्या आठवड्यात एका सुंदर फ्रेंच भाषेतील चित्रपटाचा काही भाग पाहण्यात आला. ऑफिसातुन आधीच उशिरा आल्यानं तो अधिक उशिरापर्यंत जागून पूर्ण पाहिला नाही. पण जितका काही भाग पाहिला त्यावर ही पोस्ट!

चित्रपटाचं कथानक एका  प्रतिभावंत कलाकाराभोवती गुंफलं गेलं आहे. त्याची प्रतिभा लेखणीद्वारे झरझर व्यक्त होत असली तर प्रत्यक्षात मात्र त्याला ह्या भावना व्यक्त करण्यास जमत नसतं. त्यामुळं ह्या अडचणीवर मात करण्यासाठी परदेशातील चालीरितीनुसार तो ह्या क्षेत्रातील एका तज्ञ सल्लागाराची नेमणुक करतो. आता चित्रपट म्हटला म्हणजे ही सल्लागार एक स्त्री असणं ओघानं आलं. आणि अजुन रंगत आणायची म्हटली तर ही सल्लागारच आपल्या नायकात भावनिकदृष्ट्या गुंतणार हे ही आलंच. 

काही हॉलिवुड चित्रपटातील संवाद खूप अर्थपूर्ण असतात. कथानक सरळसोपं असतं, पात्र मोजकी असतात. कथानक उलगडतं ते केवळ संवादांतून; कथेतील पात्रांच्या भावनांच्या गुंत्यातून हळुवारपणे आपली वाट शोधत! You've got a mail आणि बहुदा Harry met Sally हे ह्या धाटणीतील काही चित्रपट! हा चित्रपट सुद्धा काहीसा त्या धाटणीतील!

सुरुवातीला थिअरीचे पाठ झाल्यावर सल्लागारबाई नायकाला रोल प्ले करायला सांगतात. 

सल्लागारबाई : - "तु रेस्तरॉमध्ये जातोस आणि अचानक तुला आवडणारी मुलगी एकटीच एका टेबलवर बसलेली दिसते, आता तू काय करशील ?" 

नायक - (काही वेळ विचार करुन) "बहुदा मी माझं टेबल पकडून बसेन आणि तिचं माझ्याकडं लक्ष जातंय का ह्याची वाट पाहीन!"

सल्लागारबाई पुर्ण हताश!! त्यांच्या चेहऱ्यावरील हे भाव पाहून 

नायक - "मी तिच्या टेबलापाशी जाईन!" 

रोल प्ले 

नायक - "आपली हरकत नसेल तर मी काही वेळ आपल्याला सोबत देऊ का?

नायिका - (एका सेकंदात त्याला आपादमस्तक न्याहाळून केवळ चेहऱ्यावर हावभावाद्वारे होकार देते ! हावभावाद्वारे पुढील भावना योग्यप्रकारे व्यक्त होतात - म्हणजे तुम्ही इथं बसावं अशी माझी मनापासुन इच्छा नाहीए! पण वेळ घालविण्यासाठी माझ्याकडं दुसरा सध्या उपलब्ध पर्याय नाही आणि तु तसा काही मला उपद्रव देशील असं तुझ्या चेहऱ्याकडं पाहुन मला वाटत नाही. )

नायक - "आपण इथं एकट्याच बसला आहात का?" 

नायिका - ("दिसत नाही का तुला, डोळे तपासून घे " - मनातील हे भाव प्रचंड प्रयत्नांद्वारे लपवून ) - "हो मैत्रिणीची वाट पाहत आहे!"

नायक - "असं का? तुमची मैत्रीण ट्रॅफिक मध्ये अडकली असेल का?"  

सल्लागार टाइमआऊटची खुण करते.    

सल्लागार - "इथं मैत्रीण महत्वाची नाही. तू संवाद तुझ्या नायिकेभोवती केंद्रित कर! तिला काही कॉम्प्लिमेंट्स दे !"

रोल प्ले 
नायक - "तुम्ही सुंदर दिसताहात!"

सल्लागार प्रचंड वैतागून टाइमआऊटची खुण करते.

सल्लागार - " This is too direct. तुम्ही आताच संवादाला सुरुवात केली आहे आणि तू असा थेट मुद्याला हात घालू शकत नाही. म्हणजे घालू शकतोस पण ते अप्रत्यक्षपणे व्यक्त व्हायला हवं!

रोल प्ले 
नायक - "बाकी तुझं कसं व्यवस्थित चाललंय ना  "
नायिका - (मला काय धाड भरलीय! मनातील हे भाव महत्प्रयासानं दूर सारून!) "ठीक चाललंय. जीवन बरंचसं एकसुरी बनून गेलंय. जीवनात काही happening असं होतंच नाहीए!"

नायक - (क्षणभर थांबून) - "गेल्या पाच मिनिटात माझं आयुष्य मात्र आमुलाग्र बदलून गेलंय! (इथं आमुलाग्र हा योग्य शब्द आहे का हा वादाचा मुद्दा) माझ्या जीवनात प्रचंड चैतन्य निर्माण झालंय. वगैरे वगैरे "

सल्लागार प्रचंड आश्चर्यचकित होऊन टाईमआउटची खुण करते. "हा संवाद अचानक कुठून ह्या पात्राला सुचला - ही भावना!" 

बाकी क्षणापासुन मग कथानक, संवाद अधिक प्रगल्भ होत जातात. पुढील भाग म्हणजे त्याचा गोषवारा !

संवादात मुख्य जबाबदारी पुरुषावर असते. म्हणजे बरेचसे पुरुष ह्या बाबतीत मठ्ठ असतात. आणि स्त्रिया त्यांना तसंही स्वीकारतात!  तरीपण खालील मुद्द्यांवर त्यांनी प्रयत्न करायला हरकत नसावी.  आधुनिक स्त्रीला बौद्धिक पातळीवरील संवाद आवडतात. पुरुषास फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक क्षेत्रांची माहिती असणं चांगलं. बाकी क्रीडा, राजकारण आणि ऑफिस ह्या विषयांवर स्त्रीने स्वतःहून रस दाखविल्याशिवाय चर्चा सुरु करू नये. फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक ह्या विषयांवर स्त्रीच्या कम्फर्ट झोनची मर्यादा जाणुन घ्यावी आणि चर्चा त्यात मर्यादित ठेवावी. मधुनच स्त्रीला अप्रत्यक्ष दाद द्यावी आणि मग तिला ती दाद आवडल्यास बोलणं चालू ठेवावं. अशा वेळी ती बहुदा शांत राहुन ती दाद मनातल्या मनात घोळवत राहण्याची शक्यता गृहित धरावी. जर स्त्री बोलू लागली तर चांगल्या श्रोत्याची भूमिका निभावता यायला हवी. बोलत्या स्त्रीला मध्येच खंडित करण्याची अरसिकता दाखवेल तो पुरुष आपलं दुर्दैव आपल्या हातानं ओढवून घेतो!

सर्व काही ठीक झालं तर महाराष्ट्रात "हात तुझा हातात" किंवा फ्रांसमध्ये फ्रेंच व्हर्जनने भेटीची सांगता करावी. 

चित्रपट पूर्ण काही पाहता आला नाही. महाराष्ट्रातील विवाहित पुरुषासाठी असं काही मार्गदर्शन मिळण्याची नितांत आवशक्यता आहे. "वांग्याची भाजी चांगली झाली" हे विधान कितीही मनापासुन केलं तर बायकोची संशयास्पद नजर आपला चेहरा निरखून पाहते हे कित्येक वर्ष मी अनुभवलं. त्यामुळं ही कॉम्प्लिमेंट असू शकत नाही. पण "वांग्याची भाजी चांगली झाली" ह्या वाक्यानंतर पॉझ घेऊन मग दबल्या आवाजात "तुझ्या मानानं" किंवा "तुझ्या परीनं " बोलावं. ह्यात तुमच्या विनोदबुद्धीला दाद मिळण्याची शक्यता जास्त असते हा स्वानुभव! बाकी धोकाही असतोच! पण धोका घेतल्याशिवाय दाद मिळणार थोडीच!

बुधवार, ३ मे, २०१७

वसंत बहरत नाही!

(संदर्भ - उत्तर अमेरिकेतील हिवाळा आणि त्यानंतरचा वसंत ऋतू. हा केवळ उदाहरणादाखल !)

मनाला उदासीन करणारा हिवाळा तोच आहे. आयुष्यातील चैतन्याच्या  क्षणभंगुरतेची जाणीव करुन देणारे बर्फाचे ढिगारे तितकेच आहेत. पण आजकाल ते ही मनाला फारसे खिन्न करीत नाहीत. सहा मासांच्या त्या पांढऱ्या रंगाच्या सदैव प्रदर्शनानं मन कोशात जाऊन हरवत नाही.  






नेहमीप्रमाणं तो निर्दयी हिवाळाही एका क्षणी थकुन जातो. केवळ ह्या क्षणाच्या आगमनासाठी सर्व दुःख सहन केलेले पुष्पांकुर, तृणांकूर आनंदाच्या भरात फोफावून निघाले तरीही त्यांची जीवनावरील ही अतुट श्रद्धा आजकाल मनाला मोहवीत नाही! 





का कोणास ठाऊक आजकाल (मनातला) वसंत बहरत नाही! हे असे का होते हे उमजत नाही पण खंत हीच की न बहरलेला वसंत मनाला खटकतसुद्धा नाही! 

बिबट्या माझा शेजारी -ChatGPT - लिखित भाग

२०२५ च्या अंतिम संध्याकाळी काहीतरी उद्योग असावा म्हणुन बिबट्या माझा शेजारी ही पोस्ट ChatGPT ला विश्लेषणासाठी दिली. ChatGPT ला ह्यात विशेष रस...