मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १४ जानेवारी, २०२१

सिडनी टेस्ट - सहेला रे ते सहना रे !



चांगला मुड असला की कधीतरी मी शास्त्रीय संगीत ऐकतो. त्यातील खरं तर मला काही कळत नाही.तरीही ते ऐकताना प्रचंड छान वाटतं. किशोरी आमोणकर यांची सहेला रे आणि प्रभा अत्रे यांची जमुना किनारे मोरा गाव सावरे ...या रचनांपासुन सुरुवात करुन मग यु ट्युबच्या artificial intelligence च्या मी अधीन होतो. ह्या जाणकार गायिका ह्या स्वर्गीय रचनांद्वारे आपल्याला एका शब्दांपलीकडच्या  विश्वात घेऊन जातात.  एकेक रचना तासभर सुद्धा चालु राहते. मोजके शब्दच, वारंवार येत राहणारे! पण प्रत्येकवेळी त्यांच्या उच्चारात, सादरीकरणात वैविध्य असतं. जितका अधिक पट्टीचा कलाकार तितकी त्याची / तिची ह्या विशिष्ट शब्दरचना खुलवण्याची क्षमता जास्त! क्षमतेचा कलाकार आणि सोबतीला जाणता श्रोता असला की मैफिलीला रंग चढतो.

हँझलवुड, बुमराह अथवा कमिन्स ही मंडळी तासनतास आँफ स्टंपच्या बाहेर मारा करत रहातात वा करु शकतात. वरवर पाहता हे सर्व चेंडू आँफ स्टंपच्या बाहेर ह्या वर्गात मोडतात, पण त्यातला खरा फरक समोर उभ्या असलेल्या शुभनम अथवा रोहितलाच समजु शकतो. प्रत्येक चेंडूवर बळी मिळायलाच हवा असा आग्रह नाही. हळुवारपणे फलंदाजांना आपल्या जाळ्यात पकडण्याची कला म्हणजे कसोटी क्रिकेट. आँफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूपैकी काही झपकन आत शिरणारे, काही नाकासमोर बघत सरळ जाणारे तर काही फलंदाजांना मोहात पाडत हळुवारपणे बाहेर पडणारे ! शास्त्रीय संगीतातील जागांप्रमाणे ह्या सुद्धा गोलंदाजाच्या आपल्या जागा असतात. 

आधुनिक काळात End Result ला खुप महत्त्व प्राप्त झाले आहे असं आपल्याला सदैव वाटत राहतं, जसं की परीक्षेतील गुण, एखाद्या कंपनीने मिळवलेला नफा ! हा अंतिम निर्णय जरी महत्त्वाचा असला तरी दीर्घकालीन विचार केला तर अंतिम निर्णय काय मिळाला ह्याइतकेच किंबहुना त्यापेक्षा किंचित अधिक तो कसा मिळविला गेला ही बाब महत्त्वाची ठरते. सातत्याने यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे योग्य तंत्र, नैतिक मार्गाने वाटचाल करण्याची प्रबळ इच्छाशक्ती वगैरे घटक महत्त्वाचे ठरतात. कसोटी क्रिकेट म्हणा किंवा शास्त्रीय संगीत म्हणा, ह्या गोष्टी तुम्हाला जीवनाविषयी खूप काही शिकवतात. अनिर्णित सामना हा लौकिकार्थाने विजय नाही पण सिडनीचा पराकाष्ठेने अनिर्णित ठेवलेला सामना अनेक विजयांपेक्षा रसिकांच्या ह्दयात वरच्या स्थानावर राहील. 

मागच्या पिढीतील अनेकांनी वसई विरार सारख्या लांबवरच्या भागातून चर्चगेटला येऊन आयुष्यभर नोकरी केली. पगार काही आताच्या पिढीइतका आकर्षक नसला तरीही त्यांनी एक शिस्तबद्ध आयुष्य जगण्यात, संस़्कारक्षम अशी दुसरी पिढी घडविण्यात आपल्या आयुष्याचे सार्थक मानलं. चर्चगेट स्थानकात प्रवेश करणाऱ्या लोकलमध्ये उडी मारुन पटकावलेली विंडो सीट दिवसातील समाधानाचा एक क्षण म्हणुन  त्यांना पुरेशी होती. गलेलठ्ठ बचत बँकेत नसली तरीही समाधानाची पुरेशी पुंजी त्यांनी बाळगली. कसोटी क्रिकेटसुद्धा काहीसं असंच! झटपट लोकप्रियता मिळवुन देणारं हे माध्यम राहिलं नाही, पण समाधान मात्र भरभरुन देऊ शकतं !

काही महिन्यांपूर्वी मी विहारी आणि पुजारावर एक पोस्ट लिहली होती. वर्षातील बहुतांश वेळ भारतीय संघापासुन दुर रहात एकट्याने सराव करणं, वर्षात पंधरा वीस मिळणाऱ्या फलंदाजीच्या संधीचं मोल करणं ह्यासाठी मोठा मनाचा निग्रह लागतो. हे दोघे तो भरभरून दाखवतात, आता त्यात अश्विन सुद्धा समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

अजून एक गोष्ट! फलंदाज म्हणून अजिंक्य ह्या कसोटीवर आपला फारसा ठसा उमटवु शकला नाही पण त्याच्यासाठी संघातील प्रत्येकाने शत प्रतिशत योगदान दिले. मी घाईघाईने अनुमान बांधणार नाही पण कर्णधार असो वा व्यवस्थापक असो, जो आपल्या संघसदस्याला व्यक्त होण्याची, निर्णय घेण्याची मोकळीक देतो त्याच्यासाठी सदस्य जिवापाड मेहनत करण्यास तयार असतात हा नेहमीचा अनुभव असतो

आँस्ट्रलियानं आपला दुसरा डाव सहा गडी बाद असतानाच घोषित केला होता. डाव घोषित कधी करावा ही कसोटी क्रिकेट मधील एक खास जागा ! कधी उगाचच डाव लांबविला असा दोष कप्तानाच्या माथी येऊ शकतो तर कधी उगाचच आक्रमकता दाखवली जाऊन सामना गमावण्याची वेळ येऊ शकते. दोन कसोटीआधी ज्या संघाला छत्तीस धावांत गारद केले त्यांच्यापुढे तीनशे साडेतीनशेच्या पलीकडे लक्ष्य ठेवण्यात काय हशील आहे असा विचार नक्कीच पेनच्या मनात आला असणार. पण त्यांनं अँडलेड आणि सिडनीच्या खेळपट्टींमधला फरक बरोबर जाणला. जर तर ला खरोखरच अर्थ नसतो. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या रोहितला हुकचा फटका मारून बाद होण्याची दुर्बुद्धी झाली नसती तर किंवा पंत अजून तासभर टिकून राहिला असता तर चारशेचे लक्ष्य चौथ्या डावात सुद्धा सहज गाठले असते असं ज्याप्रमाणे आपल्याला वाटु शकतं त्याचप्रमाणे पेनने मोक्याच्या क्षणी झेल सोडले नसते तर विजय आँस्ट्रलियाच्या अगदी समीप होता. धावफलक फसवा असतो, त्यानं भारतानं दुसऱ्या डावात केवळ पाचच बळी गमावले असं दाखवलं असलं तरी जाडेजा जायबंदी होता आणि त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांना बाद करण्यासाठी कमिन्स आणि मंडळींना बहुधा सात आठ षटके पुरेशी ठरु शकली असती. हे लक्षात घेतलं तर अश्विन आणि विहारी ह्यांच्या खेळीचं महत्व ध्यानात येतं. 

Sledging मुळे प्रतिस्पर्ध्यापेक्षा अधिक प्रमाणात आपले नुकसान होऊ शकते हा धडा जरी पेनला जरी मिळाला असला तरी आजच्या काळात आपण सर्वांनी तो लक्षात घेण्यास काही हरकत नसावी. आपले काम योग्य प्रकारे करत रहावे, उगाचच दुसऱ्याला चुका करायला भाग पाडण्यासाठी आपली शक्ती वाया घालु नये. 

ज्या क्षणी सामना अनिर्णित घोषित झाला त्यावेळी विहारीने शर्ट काढून गोलगोल फिरवला नाही किंवा अश्विनने पेनला शेलक्या शब्दांत चार गोष्टी सुनावल्या नाहीत. हे सारं करण्यासाठी त्यांच्या अंगी त्राण उरलं नव्हतं हे जरी खरे असले तरी एरव्ही सुद्धा त्यांनी हे अजिबात केलं नसतं. Cricket is a Gentleman's Game ह्या उक्तीवर विश्वास ठेवणारी ही मंडळी !

भारतीय खेळाडूंनी ह्या सामन्यात जी जिद्द दर्शवली त्याला तोड नाही.  विहारी, पुजारा, अश्विन, जडेजा ह्यांनी आपल्या जखमांची / दुखापतींची पर्वा केली नाही. एकशेचाळीसच्या वेगानं सातत्यानं तुमच्या अंगावर फेकले जाणारे चेंडूचा सामना करत असताना आपल्या एकाग्रतेत भंग होणं खरं तर स्वाभाविक! पण त्यांनी आपल्या विकेटला खुप जपलं. पंत हा एक विवादाचा मुद्दा बनला आहे. त्यानं सोडलेल्या झेलांची मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागली. पण चौथ्या डावात आक्रमणाच्या पुर्ण तयारीत असणाऱ्या चार ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्याचं धाडस ह्या पट्ठ्यानं दाखवलं. 

खेळपट्टी बनविणाऱ्या अनामिकाला सुद्धा अभिवादन ! पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्राच्या शेवटापर्यंत खेळपट्टी उत्तमरित्या टिकली. केवळ फलंदाजांना धार्जिणी अशी ही खेळपट्टी नव्हती, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना ह्या खेळपट्टीनं पुरेसं साहाय्य केले. 

आता थोडं प्रतिस्पर्धी संघाच्या चांगल्या कामगिरीविषयी! स्मिथ आणि लाबूशेन ह्यांनी एकदा का खेळपट्टीवर जम बसविला का गोलंदाजांची खैर नसते. विशेषतः भारतीय गोलंदाजांची ! स्मिथचा फलंदाजीचा पवित्रा, काही फटके विशेष प्रेक्षणीय नसले तरी धावांची टांकसाळ उघडण्यात तो माहीर आहे. लाबूशेन हा भविष्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजीचा भार समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहील ह्याविषयी शंका नाही. बाकी कमिन्स, हॅझलवूड ही गोलंदाज मंडळी प्रचंड गुणवत्ता बाळगणारी! त्यांच्यासमोर एखादा चेंडु खेळायला मिळावा अशी इच्छा मी बाळगुन आहे. स्टार्क बहुदा आता उतरणीला लागला असावा असा माझा कयास आहे. वॉर्नरला ह्या सामन्यात आपला खास प्रभाव दाखवता आला नाही. 

एकंदरीत जुन्या मुल्यांवरील विश्वास पक्का करणारी ही कसोटी ! पैशाचा बाजार मांडणाऱ्या IPL मुळे संघातील महत्त्वाच्या खेळाडुंच्या फिटनेसची काय वाताहात झाली आहे हे आपण सर्व उघड्या डोळ्यांनी पाहतच आहोत. आखातात घाईघाईनं IPL  भरविण्यात काय अर्थ होता हा प्रश्न विचारण्याची हिंमत अथवा इच्छाशक्ती कोणीच दर्शवली नाही, दोन महिन्यांपुर्वी मांडला गेलेला हा बाजार पुन्हा एप्रिलमध्ये मांडला जाईल. पण ह्या दोन बाजारांमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांचा अगदी रसिकतेने आनंद लुटूयात. फलंदाजाला बाद करण्यासाठी पहिल्याच चेंडूत याँर्करच टाकायला हवा असे नाही, त्याला तीन चार उसळते चेंडू टाकून, मनात धडकी भरवुन मग अचानक याँर्कर टाकून त्याला बाद करता येऊ शकते. गोलंदाजाला सतत चौकार, षटकार मारणे आवश्यक नाही तर नवा चेंडू तासभर खेळून काढून मग दमलेल्या गोलंदाजाला नंतर नामोहरम करता येतं हे मोलाचे धडे कसोटी क्रिकेट आपल्याला शिकवतं. हे सारे धडे वरवर पाहता कदाचित समजणार नाहीत,. त्यासाठी खोलवर जायला हवं. आयुष्यात सुद्धा असंच असतं नाही! सारं काही एका समाधानी आयुष्यासाठीचे आवश्यक घटक ! Long live Test Cricket !

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...