मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१८

मुरांबा !




एका भरभक्कम खांबाला मजबूत जोराने बांधलेल्या बैलाची कल्पना करुयात ! बैल त्या खांबापासून मोकळा होण्यासाठी सुरुवातीला खूप धडपड करतो. त्या दोराला खूप मोठमोठे हिसके देऊन त्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतु खांब आणि दोर यांची युती त्या बैलाला मुक्त होऊ देत नाही!

गेल्या रविवारी सोनी टीव्हीवर मुरंबा हा एक उत्तम चित्रपट पाहण्याचा योग आला. रविवारच्या दुपारच्या जेवणाच्या वेळी सुरू झालेला हा चित्रपट जाहिरातीच्या व्यत्ययाशिवाय सुरुवातीची जवळपास चाळीस मिनिटे चालला.  त्यामुळे आम्ही चित्रपटात गढून गेलो. 

चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, मिथिला पारकर आणि सुमित राघवनची पत्नी चिन्मयी सुमित यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट मला बऱ्याच गोष्टींसाठी आवडला. बेसिकली मला चित्रपट आवडण्यासाठी जास्त काही गोष्टी लागत नसाव्यात अशा निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो आहे! वेगाने पुढं सरकणारी कथा, मेंदुला जागं ठेवणारे बौद्धिक अथवा विनोदी संवाद, डोळ्याला सुखावणारा निसर्ग अथवा घरं ह्या काही महत्वाच्या गोष्टी !

चित्रपटातील एक आवडलेली गोष्ट म्हणजे चित्रपटाचे चित्रीकरण ज्या बंगल्यामध्ये झालं आहे तो बंगला सुंदर / प्रशस्त / भव्यदिव्य आहे. चित्रपटाचे जवळपास ८६ टक्के चित्रिकरण याच बंगल्यात झाले असल्याने चित्रपटाचा निर्मितीखर्च खूप कमी झाला असणार असा विचार येण्यापासून मनाला थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी तो विचार मनात आलाच!  बाकी मिथिला पारकरचे घरसुद्धा पॉश आहे असे सोहम म्हणाला. 

चित्रपटाच्या सुरुवातीलाच आमचं ब्रेकअप झालं आहे असे अमेय आपल्या आई-वडिलांकडे जाहीर करतो.  साहजिकच आईला खूप धक्का बसतो.  वडिलांचा संपर्क बाह्यजगताशी जास्त प्रमाणात येत असल्यामुळे काहीशी संयत अशी प्रतिक्रिया ते नोंदवितात. बहुदा वडिलांच्या मेंदूमध्ये पुढील काही वेळ विचारचक्र फिरत रहात असावं आणि त्यांच्या मनात एक योजना साकारते. आपल्या मुलाचा विरोध हुशारीने मोडून काढून ते पुढील काही गोष्टी अशाप्रकारे घडवून आणतात की चित्रपटाच्या शेवटी आपणा सर्वांना एक गोड अनुभव मिळतो. 

वरकरणी पाहायला गेलं तर एकमेकाला अगदी अनुरुप अशी अमेय आणि मिथिलाची जोडी! गेली तीन वर्षभर ते एकत्र फिरत आहेत. त्यामुळे डन डील नावाचा जो प्रकार असतो त्यानुसार मिथिला आता या घरची सून होणार हे दोन्ही बाजूच्या आई-वडिलांनी आणि त्यांच्या ओळखीतील सर्वांनी गृहीतच धरलेलं असतं. त्यामुळे ज्यावेळी अमेय आपल्या ब्रेकअपची घोषणा करतो त्यावेळी साहजिकपणे त्यांच्या आई वडिलांना धक्का बसतो. 

चित्रपट जसजसा पुढे सरकत जातो तसतसं चर्चेतून आणि फ्लॅशबॅकमधून खऱ्या कारणाचा आपल्याला उलगडा होत जातो. व्यावहारिकदृष्ट्या अमेय एक शिकलेला, देखणा तरुण असला तरी व्यावसायिक जगात जी काही तीव्र स्पर्धा आहे, त्याला तोंड देण्याची त्याची मानसिक इच्छा नाही. यामध्ये त्याची स्पर्धेला तोंड देण्याची क्षमता नाही की इच्छा नाही या प्रश्नाचा खोलात जाऊन चित्रपट ऊहापोह करीत नाही. परंतु आपला होणारा नवरा हा स्पर्धेला तोंड देत नाही किंवा व्यावसायिक जगात यशस्वी होण्याची त्याची इच्छा नाही ही गोष्ट मिथिलाला खूपच खटकत असते. ती स्वतःच्या करिअरबाबत खूपच आग्रही आहे असे साधारणतः चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं.  बाह्य जगतापुढे एक पिक्चर परफेक्ट प्रेझेंट करीत असताना प्रत्यक्षात मात्र हे दोघे या मुद्द्यावरून खूप चर्चा करीत असतात आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये तणावही निर्माण होत असतो. एका क्षणी आपण Point of No Return ला पोचलो आहोत असा निर्णय हे दोघे जण घेतात. 

आता इथं चित्रपट आपल्यासमोर दोन वेगवेगळ्या विचारधारा घेऊन येतो.  एक आहे ती आधुनिक पिढीची विचारधारा आणि दुसरी म्हणजे आयुष्य बऱ्यापैकी पाहिलेल्या मध्यमवर्गीय पिढीची विचारधारा! आधुनिक पिढीच्या विचारधारेतून पाहिलं असता दोघांची करिअर्स ही आयुष्यातील महत्त्वाच्या मोजक्या  बाबींपैकी एक बाब! जर याबाबतीत एकमत नसेल तर हे नातं पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही असा विचार करणारी!  यात अजून एक मुद्दा !!हल्ली इन-रिलेशनशिप आणि तत्सम मोठ-मोठाले शब्द आपण सेलिब्रिटींच्या बाबतीत सतत ऐकत असतो. कुठेतरी मनात आपल्यालासुद्धा हे शब्द आपल्याबाबतीत वापरण्याची संधी नवीन पिढी शोधत असते.  आणि त्यामुळे ब्रेकप झाल्याचं दुःख असतं परंतु हा शब्द आपल्याला वापरता येतो याच मनात कुठेतरी थोडासा आनंद सुद्धा होत असावा !

सचिन खेडेकर आणि मध्यमवर्गीय पिढीच्या दृष्टिकोनातून! आयुष्याचे सर्व कंगोरे या टप्प्यावर साधारणता पाहून झालेले असतात. Absolutely Perfect असं काही नसतं याची जाणीव किंवा खात्री बऱ्यापैकी झालेली असते. त्यामुळे ज्याच्याशी आपलं बऱ्यापैकी जमतं,  ज्या माणसाबरोबर आपण घरात शांतपणे राहू शकतो असा माणूस हा जिवनसाथी म्हणुन मिळाला तर भाग्य समजायला हवं अशी मानसिकता एव्हाना विकसित झालेली असते.  बाविशी ते पंचविशीच्या आसपास ज्या काही भव्यदिव्य आकांक्षा असतात,  त्या तशाच्या तशा व्यवहारात साकारणं शक्य नसतं हे एव्हाना समजलेलं असतं. आपल्याला जी काही गोष्ट समजली आहे ती गोष्ट आपल्याला पुढील पिढीला समजावता आली पाहिजे याची जी तयारी सचिन खेडेकर दाखवतात ते खरोखर उत्तम आणि ते चित्रपटाचा शेवटाला अमेयला जे ज्ञान देतात तेही उत्तम!! तुझ्या भल्यासाठी काहीसं कठोर होऊन तुला सल्ला देणारी मैत्रीण तुला एक जोडीदार म्हणून मिळत आहे तर केवळ तुझ्या पुरुषी अहंकारामुळे तू तिला गमवायची स्थिती ओढवुन घेत आहे हे अगदी उत्तम प्रकार अमेयला ते समजावतात!!

अमेय आणि मिथिला यांचे जे ब्रेकप लग्नाआधी झालं तशीच कारणे लग्नानंतर सुद्धा उद्भवू शकतात आणि हल्ली घटस्फोटाविषयीसुद्धा अगदी मुक्त विचार संस्कृती पसरल्यामुळे असे काही चर्चेच्या आधारे सोडवता येणारे प्रश्नसुद्धा गंभीर स्वरूप धारण करतात.  एकंदरीत नातं  तुटण्यास फारसा वेळ लागत नाही. चित्रपटातून सर्वात महत्त्वाचा घेण्यासारखा बोध म्हणजे हाच!! हल्लीच्या आयुष्यातील क्लिष्टता तुमच्या नात्यांमध्ये सुद्धा उतरली आहे.  त्यामुळे सर्वच गोष्टी बाबत जोडीदारांची एकवाक्यता होण्याची शक्यता कमीच आहे.  न पटणाऱ्या गोष्टिंवर किती चर्चा करायची,  त्यांना किती ताणून धरायचं याचा सारासार विचार दोघांनी करायला हवा!!

खरंतर ही चर्चा ज्याची त्यांनी करायला हवी आणि सामंजस्यपूर्वक निर्णय घ्यायला हवा.  परंतु तुमच्या बाबतीत असं होऊ शकत नसेल तर तुमच्या भोवताली तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींत एक सचिन खेडेकर असावा!! सचिन खेडेकर यांची व्यक्तिरेखा म्हणजे स्वतःच्या आयुष्यात बऱ्यापैकी समाधानी असणारा, प्रगल्भतेच्या काही पायऱ्या ओलांडलेला, दुनिया पाहिलेला असा माणूस! आपलं जे काही ज्ञान अनुभव आहे ते दुसऱ्याला शांतपणे शब्दरूपात मांडून सांगू शकणारा माणूस!! अशी माणसं तुमच्या भोवताली वावरत असतील आणि जर ती तुम्हाला ओळखता आली तर खरोखर उत्तम!! तुम्ही सुदैवी आहात !!

बाकी चित्रपटातील मिथिलाचे रुप लक्षात राहिले. क्वचितच ड्रिंक घेणारी, ऑफिसच्या कामानिमित्त उशिरापर्यंत थांबावी लागणारी, घरी आलेल्या आपल्या मित्राला तूच फ्रीजमधलं उघडून त्यातलं पाणी घे आणि पी असं सांगणारी ! अशी ही बाह्यरुपी बंडखोर वाटणारी मिथिला, आपल्या भावी सासू-सासऱ्यांसमोर मात्र एका पारंपरिक सुनेच्या रुपात मनापासुन वावरते! तिचं आधुनिक रूप पचवण्याची ताकद तिला जीवनसाथी म्हणून वरु  इच्छिणाऱ्या तरुणांकडे असावी! हा संदेश पुढील पिढीसाठी फार महत्त्वाचा आहे नाहीतर पुढील काळ कठीण आहे!!!

ते सुरुवातीचे खांब, दोर आणि बैल यांचा संदर्भ काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बैल म्हणजे हल्लीची नातेसंबंध खिळखिळी करु पाहणारी भोवतालची परिस्थिती ! खांब आणि दोर म्हणजे नातं एकत्र ठेवू पाहणारा विश्वासाचा धागा!!!

बुधवार, १४ नोव्हेंबर, २०१८

बालदिन


विश्वाचे कारभार व्यवस्थित चालावेत म्हणून काही भुमिकांची निर्मिती करण्यात आली आहे.  जसे की घरामध्ये वडील, शाळा-कॉलेजातील  शिक्षक, रस्त्यावर पोलीस आणि ऑफिसमध्ये व्यवस्थापक वगैरे वगैरे!! आता या भूमिका बजावणारी माणसे सुद्धा माणसेच असतात. त्यामुळे सतत या भूमिकांमध्ये राहून कायदा आणि सुव्यवस्था शाबूत ठेवणे हे कधीकधी त्यांनासुद्धा त्रासदायक वाटू शकतं. त्यामुळे ही मंडळी सुद्धा आपल्या या कडकपणाच्या अधिकृत भूमिकेमधून पळवाट काढून काही वेळ आपल्या मूळ स्वरूपात प्रकट होण्याची संधी शोधत असतात. 

पुर्वी ठीक होतं. या भूमिकांनी सतत आपला मुखवटा कायम ठेवावा अशीच त्यांच्याकडून अपेक्षा असायची. आणि या भुमिका बजावणाऱ्या माणसांनी या अपेक्षेपुढे चक्क शरणागती पत्करली होती. त्यामुळे पुर्वीचे वडील गंभीर म्हणजे गंभीरच दिसायचे! फारच झालं तर एखादी स्मितरेषा कधीतरी त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असे आणि ही स्मितरेषा ते माणूस असल्याचा पुरावा त्यांच्या मुलांना, पत्नीला देत असे.  कधीकधी केवळ एका या पुराव्याच्या आधारे आयुष्यसुद्धा काढावं लागत असे. 

आता काळ बदलला आहे. माणसं आपल्या अधिकृत भूमिकेत कमीत कमी वेळ काढण्याची मनोवृत्ती बाळगुन आहेत.  ज्याक्षणी आपल्या अधिकृत भूमिकेची कालमर्यादा संपते, त्यावेळी ते झटकन स्विच मारुन आपल्या मूळरुपात (बालरुपात)  येतात व  विविध फोरमवर आपलं हे मूळ रूप दर्शवितात.  हे वेगवेगळे फोरम म्हणजे सोशल मीडिया,  मित्रांची बैठक वगैरे वगैरे!

आता हा प्रकार म्हणायला गेला तर माणुसकीशी सुसंगत! कारण या भूमिका निभावणारी माणसं सुद्धा माणसंच आहेत. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की या माणसांची अनधिकृत (हा चुकीचा शब्दप्रयोग - इथं अधिकृतेतर असं वाचावा) रूपे ज्या श्रोतावर्गांसमोर समोर येतात त्यांना या अधिकृत भूमिकांचे विरळ झालेले हे रुप किंवा कडकपणा पचवण्याची प्रगल्भता असायला हवी.  नाहीतर त्यांच्या मनात या अधिकृत भूमिकांचे हे मनमोकळे रुपच घर करून बसते.  

त्यामुळे या व्यक्ती ज्यावेळी परत आपल्या अधिकृत भूमिकांमध्ये येऊन मानवजातीच्या हिताच्या दृष्टीने अथवा व्यवहार बिनबोभाट चालावेत ह्या हेतूनं योग्य असे संदेश देऊ इच्छितात त्यावेळी त्यांच्यासमोरील श्रोतावर्ग हा काहीसा या संदेशांचे गांभीर्य ओळखण्याच्या पलीकडच्या मनस्थितीत गेलेला असतो. 

आजच्या बालदिनाच्या निमित्ताने या गंभीर रुपातील भूमिका बजावणाऱ्या व्यक्तींच्या बालरुपात जाण्याच्या हक्कांची जाणीव ठेवूयात!   त्यांच्यासमोरील त्यांच्या अधिकृत रुपातील सेवाग्रहण करणाऱ्या वर्गाला त्यांच्या अधिकृत आणि मनमोकळ्या भूमिकांमध्ये गल्लत न करणाऱ्या प्रशिक्षणाची गरज मान्य करुयात!

अजुन एक मुद्दा! आजच्या काळात काही पालक, शिक्षक,व्यवस्थापक तुम्हांला असेही मिळतील जे ह्या भुमिकांच्या पारंपरिक रुपांना पुर्णपणे छेद देणारे असतील! तेव्हा त्यांच्या बाह्यरुपावर न जाता त्यांनी दिलेल्या संदेशाकडं लक्ष द्या !!

काही वर्षांनी जेव्हा आपल्याला ह्या भुमिकांमध्ये रोबो दिसतील त्यावेळी सर्वांच्याच बालपणाची कसोटी लागली असेल तेव्हा माणुसकीने बहुव्याप्त अशा शेवटच्या काही बालदिनांपैकी अशा एका आजच्या बालदिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा!!

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१८

बधाई हो !


चित्रपटाच्या कथानकाकडे आणि त्यातुन देऊ इच्छिलेल्या संदेशाकडं आपण नंतर येऊयात!  चित्रपट आम्हांला आवडला तो त्याच्या उत्तम सादरीकरणामुळे, त्यातील खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे, देखण्या आयुष्यमानमुळे आणि सुंदर सनया मल्होत्रामुळे! ही पोस्ट मुक्तछंद आहे, जे काही आवडलं ते कोणताही विशिष्ट क्रम, मांडणी विचारात न घेता इथं मांडतोय !

चित्रपटातील दोन्ही घरं आवडली! आयुष्यमानचं मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर! ज्या घरात पाचजणांना मुक्तसंचार करता येत नाही असं हे घर! ह्या घराचं एक वास्तववादी चित्रण या चित्रपटात केलं जातं. याउलट सनयाचे एक नितांतसुंदर घर! त्यामधून ओसंडून वाहणारी श्रीमंती ही एका हॉलिवूडच्या चित्रपटाप्रमाणे एका कलात्मकदृष्ट्या दाखवण्यात आली आहे. इतकी श्रीमंत सनया इतक्या छोट्या ऑफिसात कशी (का) काम करत असेल हीच या चित्रपटातील एक न पटण्यासारखी गोष्ट!

सुरुवातीला सासू आपल्या सुनेचे छोट्या छोट्या गोष्टीवरुन वाभाडे काढत असते. हे जसं काही घरात घडत असावं त्याप्रमाणे हुबेहूब चित्रित करण्यात आले आहे. आपण फस्त केलेल्या आंब्यांच्या फोडीचा हिशोब न ठेवता सुनेनं किती फोडी खाल्ल्या ह्याकडे लक्ष असणारी सासु लक्षात राहण्याजोगी!  स्त्रियांच्या किटी पार्टीतील वातावरण थोडक्यात दाखवण्यात आले आहे परंतु ते सुद्धा अगदी सुंदररित्या!

आयुष्यमान या चित्रपटात खरोखर भाव खाऊन जातो.  त्याची विविध  व्यक्तीरेखांसोबत असलेली नाती सुंदररित्या फुलवण्यात आली आहेत.  

सर्वप्रथम त्यांचे समवयस्क तीन मित्र! सुरुवातीला एकमेकांच्या मैत्रिणींवरून चेष्टा करणारे ते मित्र ज्यावेळी त्यांना आयुष्यमानच्या घरी येणाऱ्या नवीन पाहुण्याची चाहूल लागते त्यावेळी त्याची ज्याप्रकारे फिरकी घेतात ते पाहण्याजोगं! 

त्यानंतर आयुष्यमान आणि त्याच्या धाकट्या भावाचे एक सुंदर नातं! कोणताही गंभीर प्रसंग ओढवला की एका उंच भिंतीवर हे दोघेजण बसतात आणि आपली मन की बात बोलत राहतात! ह्या दोघांच्यातही अंतर तसं जास्तच१ त्यामुळं  काहीवेळा आयुष्यमान त्याला मोठ्या माणसाप्रमाणं सल्ला देत असतो तर काही वेळा दोघांची दुःख सारखे असल्यामुळे एका समवयस्क मित्राप्रमाणे दुःख वाटून घेत असतो. 

आयुष्यमान आणि त्याच्या आजीचं नातंसुद्धा पाहण्यासारखं! सुरुवातीला या नात्याला फुलायला वाव मिळत नसतो.  परंतु जसजशी परिस्थिती गंभीर होत जाते तेव्हा मात्र हे दोघे एकत्र येतात. प्रसंगी खेळकरपणे एकमेकांची चेष्टा सुद्धा करतात! 

आयुष्यमान व त्याचे वडील यांचं नातं मध्यमवर्गीय कुटुंबातील एखादा विशीतला तरुण आणि पन्नाशीतील बाप ह्याचं नातं कसं असावं त्याप्रमाणं असतं!  परंतु चित्रपटात एक कलाटणीचा क्षण येतो आणि त्या वेळेपासून आयुष्यमान आपल्या काहीशा बावळटपणाकडे झुकणाऱ्या मध्यमवर्गीय आई-बाबा आणि कुटुंबाच्या बाजूने ठामपणे उभा राहतो. त्याक्षणी तो एखाद्या वडिलांच्या मित्रांप्रमाणे त्यांच्या सोबतीला उभा राहतो!

चित्रपटात मला सर्वात जास्त आवडलेलं नातं म्हणजे आयुष्यमान खुराणा आणि त्याची प्रेयसी सनया मल्होत्रा ह्यांचं!  ह्या नात्यातील फुलवण्यात आलेले कंगोरे! आयुष्यमान नवीन पिढीतील एका तरुण मुलाचे प्रतिनिधित्व करणारा! आता आपण या गोष्टीकडे एका वेगळ्या नजरेने पाहुयात.  भारतीय पुरुष हे बऱ्याच अंशी कर्मठ म्हणता येतील. किंबहुना पुर्वीच्या पिढ्यांमध्ये त्यांचे अंतरंग आणि बाह्यरुप हे दोन्ही कर्मठ असायचं!
आता गेल्या एक पिढीमध्ये भारतीय पुरुषांचे बाह्यरुप बदललं आहे असं आपणास नक्कीच म्हणता येईल. परंतु ह्यांचं अंतरंग मात्र अजुनही पारंपरिक पद्धतीने विचार करतं असं कधी कधी वाटतं. पण नक्की काही सांगता येत नाही! कदाचित हा मुद्दा निघाला म्हणून असं होत असावं. बाकी सर्व मुद्द्यांच्या बाबतीत आयुष्यमान हा नक्कीच पुढारलेला आहे. अगदी विवाहापुर्वीचे  मैत्रीसंबंध कोणत्या पातळीवर न्यायचे या मुद्द्यावरसुद्धा! सनयाची व्यक्तिरेखा अगदी प्रगल्भपणे रेखाटण्यात आली आहे. आपली भावी सासू गरोदर आहे हे कळल्यावर ती फारशी काही आश्चर्यचकित होत नाही. याउलट आयुष्यमानने संभाव्य भावाला आपल्या लग्नात घोड्यावर बसवताना जो शब्द वापरला तो शब्द ऐकून अगदी खळखळून हसते.  बाकी मग ती या बातमीमुळे आयुष्यमानला नक्की कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करते. 

चित्रपटातील कलाटणीचा क्षण तसा एकच म्हणता येणार नाही. सुरुवातीला ती बातमी जाहीर झाल्यावर जसा हा कलाटणीचा क्षण येतो तसा तो मग नंतर एका मध्यमवर्गीय कुटुंबातील माणसे कुटुंबातील एका सदस्याच्या बाजूंना कशी उभी राहतात तेव्हासुद्धा येत राहतो. 

नीना गुप्ताच्या सासुबाईच्या बाबतीत हा क्षण एका लग्नाच्या वेळी आपल्या सुनेवर बाकीच्या सुना ज्यावेळी या गोष्टीमुळे टीका करत असतात त्यावेळी येतो! आणि मग ती अगदी ठामपणे आपल्या सुनेच्या मागे उभी राहते 

तसाच हा क्षण आयुष्यमान च्या बाबतीत ज्यावेळी त्याची भावी सासू त्याच्या त्या ठिकाणच्या अस्तित्वाची जाणीव नसताना ज्याप्रकारे त्याच्या कुटुंबावर टीका करते आणि आपल्या मुलीला तिच्यावर पडणाऱ्या संभाव्य जबाबदारीची जाणीव करून देते त्यावेळी येतो! मग त्याला आपण आपल्या कुटुंबाच्या मागे कसं ठामपणे उभं राहिलं पाहिजे ह्याची जाणीव होते!

मला हा चित्रपट आवडला तो ह्याच कारणास्तव! मध्यमवर्गीय कुटुंबात एक जे टीम स्पिरीट असतं ते सर्वसाधारणवेळी अदृश्य होऊन राहिलेलं असतं.  भोवतालच्या परिस्थितीनं आपल्या सामान्यत्वाची सतत जाणीव करुन दिल्यामुळं आलेल्या एक प्रकारच्या नैराश्यामुळं कदाचित हे होत असावं. परंतु ज्यावेळी अडचणीची परिस्थिती येते त्यावेळी हे टीम स्पिरीट उफाळून येतं आणि एका प्रचंड संघभावनेने सर्वजण उभे ठाकतात.  याचं एक उत्तम चित्रीकरण या चित्रपटात आपणास पहावयास मिळतं. 

नीना गुप्ताचा अभिनय सुंदरच! जे काही घडलं त्याविषयी आता इलाज नाही परंतु उभ्या ठाकलेल्या परिस्थितीला ठामपणे सामोरे जाण्याची जिद्द एक स्त्रीच दाखवू शकते. ते तिनं संपुर्ण चित्रपटात सुरेखरित्या आपल्या अभिनयातून दाखवून दिलं आहे. या प्रकरणामुळे आयुष्यमान आणि त्याच्या प्रेयसीच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे हे समजायला तिला वेळ लागत नाही.  ती आपल्या मुलाकडून सर्व तपशील जाणून घेते आणि आपल्या मुलाला तिच्या आईची माफी मागण्याचा सल्ला देते. 

आयुष्यमान आपल्या संभाव्य सासूच्या घरी येतो त्यावेळी ती असासुसुद्धा अगदी मौनव्रत धारण करते, एकदम डिफिकल्ट अॅक्ट करते.  परंतु त्यावेळी मनातल्या मनात मात्र तिने या मुलाच्या चांगुलपणा विषयी आपला निग्रह पक्का केलेला असतो. सायंकाळी सनया परतल्यावर तिच्याशी आईने साधलेला संवाद हृदयस्पर्शी!

आता वेळ आली आहे ती या चित्रपटाच्या मुख्य विषयाविषयी लिहिण्याची! परंतु ह्या विषयावर या ब्लॉगमध्ये आपली मत मांडण्याइतका  मी अथवा हा ब्लॉग पुढारलेला नाही त्यामुळे असु देत!!

मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८

लोक काय म्हणतील!




लोक काय म्हणतील ह्याचा विचार करण्यात मागच्या काही पिढ्यांची आयुष्यं गेली. लोक म्हणजे कोणता जनसमुदाय ह्या विषयीच्या संकल्पना त्या वेळी स्पष्ट होत्या. हल्ली बऱ्याचजणांनी नोकरी धंद्यानिमित्त गावं सोडली आणि त्यानंतर लोक काय म्हणतील ह्या गोष्टीचं भय बऱ्यापैकी कमी झालं. आता इथं लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे मी "लोक काय म्हणतील या गोष्टीचं भय" हा शब्दप्रयोग केला म्हणजेच आपल्याला असं लक्षात येईल की लोकांचं म्हणणं हे बऱ्याच वेळा नवीन पिढीला नकोसं  किंवा बंधनकारक असं असु शकतं. 


बऱ्याच वेळा जुने लोक नवीन पिढी परंपरांचे कसे पालन करत आहे याविषयी आपली मते नोंदवत असत / असतात. जुन्या लोकांनी आपल्या नवीन पिढीकडून असलेल्या परंपरापालनाच्या अपेक्षांची पातळी केव्हाही शिथिल केली नाही. त्यामुळे नवीन पिढी ही या परीक्षणास यशस्वीरित्या सामोरे जाण्याची शक्यता तशी कमीच होती. त्यामुळे प्रयत्न करुन सुद्धा जर मी अयशस्वी होणार असेल आणि या जुन्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकणार नसेन तर त्यापेक्षा प्रयत्नच न केलेला बरा या निष्कर्षापर्यंत नवीन पिढीतील काही लोकं येऊन पोहोचली! त्यानंतर काहीजणांना गावाबाहेर आपले दुसरे विश्व निर्माण करण्यात यश मिळाले आणि त्यांचा हळूहळू आपल्या मूळ विश्वाशी किंवा मूळ लोकांशी संपर्क कमी झाला किंवा संपुष्टात आला. 

इथं एक फरक ध्यानात घेण्यासारखा आहे तो म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या लोक या समूहात कोणत्या व्यक्तींचा समावेश करावा हे आपल्या हाती नसतं. त्यामुळे कौतुक करणारे, टीका करणारे अशा सर्व प्रकारच्या व्यक्ती या लोक या समूहात समाविष्ट व्हायच्या.  त्यातील टीका करणाऱ्या व्यक्तींचा समूह त्यांच्या टिप्पणीमुळे त्रासदायक ठरत असल्याने
नवीन पिढीतील काही जणांनी हा घटक आपल्याभोवताली जे काही नवीन लोक जमवले त्यावेळी लक्षात घेतला. टीकाटिप्पणी करणाऱ्या व्यक्तींना नवीन लोकसमुहात स्थान मिळाले नाही. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वातील त्रुटी जाणवून देणाऱ्या फुकटच्या सल्लागारांची उणीव नवीन पिढीला जाणवू लागली. 

अजून एक मुद्दा हा स्थायित्वाविषयीचा! पूर्वीच्या व्याख्येतील लोक ही एक सामुदायिक विचारधारा असायची! आता ही विचारधारा गेल्या किती पिढ्यांच्या अनुभवातून तावून-सुलाखून निघून बनली गेली आहे हा विचार करणेसुद्धा महत्त्वाचे आहे.  साधारणतः सध्याच्या मराठी कुटुंबातील वंशावळीचा इतिहास पाहता ही विचारधारा मागील दोनशे वर्षात बनली गेली आहे असे मानण्यास वाव आहे. अर्थात याला सन्माननीय अपवाद असू शकतात. आता लोक या  संज्ञेच्या पारंपारिक व्याख्येमध्ये विशिष्ट व्यक्ती अभिप्रेत नसून काही विशिष्ट भूमिका अभिप्रेत असतात.  वेगवेगळ्या व्यक्ती काळानुसार या भूमिकांमध्ये शिरत असतात आणि आपली वेळ संपताच एक तर दुसऱ्या भूमिकेत शिरतात किंवा काळाच्या पडद्यामागे जातात. ह्या गोष्टीमुळं वर्षानुवर्षे चालत आलेल्या पारंपरिक सामूहिक ज्ञानाचा आपल्याला लाभ होऊ शकतो. 
फक्त आपल्यामध्ये काही कठीण टिप्पणी सहन करण्याचे संयम असावा.  याउलट आपण आपल्याला अनुकूल असा ज्या व्यक्तींच्या समूह आपल्या भोवताली गोळा करतो आणि ज्यांना आपण आपली नवीन लोक बनवतो हा व्यक्ती समूह काहीसा अस्थायी स्वरूपाचा असतो. तुमची नोकरीची ठिकाणे बदलली तर ही लोकं तुमच्यापासून दुरावली जाऊ शकतात.  इतकंच काय तर जर तुमचं सोशल स्टेटस बदललं तरीही ही यातील काही व्यक्ती तुमच्या लोक या व्याख्येत समाविष्ट होण्यास चक्क नकार देऊ शकतात. त्यामुळे ह्या आपणच बनवलेल्या लोक या व्यक्ती समूहाविषयी जास्त अपेक्षा अगदी सुरुवातीलाच ठेवू नयेत.  ह्या नवीन लोक समूहाचा एक फायदा मात्र असा आहे की भवतालच्या व्यावसायिक विश्वातील घडामोडींविषयी या समूहातून आपल्याला ज्ञान मिळण्याची शक्यता जास्त असते. 


सारांश असा की तुमच्या गावाचा किंवा कुटुंबांचा वर्षानुवर्षे चालत आलेला लोक म्हणून जो काही व्यक्ती समूह आहे त्यामध्ये वयाच्या विशिष्ट टप्प्यावर तुम्ही सहभागी होणे इष्ट आहे. आपल्या माहितीचा, आपण जमा केलेल्या ज्ञानाचा या लोक समूहात शिरकाव करुन  या लोकसमूहाचे आणि त्या समुहाच्या विचारधारेचे कालानुरूप परिवर्तन करणे इष्ट राहील. कोणास ठाऊक परिवर्तित केलेला हा परंपरागत लोकसमूह नवीन पिढीला कदाचित आकर्षित करू शकेल!




शुक्रवार, १९ ऑक्टोबर, २०१८

चला रन आऊट होऊ या!!



स्थळ:  लाहोर (पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड हेडक्वॉर्टर्स 

बैठकीचा मसुदा: अबुधाबी इथं खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अजहर अली ज्या पद्धतीने धावबाद झाला त्याची चौकशी!!

बैठकीस सुरुवात होते. 

पाकिस्तान बोर्ड अध्यक्ष: -  "इन्शा अल्ला! अबुधाबी येथे १८ ऑक्टोबर २०१८ रोजी जे काही घडलं त्यामुळे पाकिस्तानी क्रिकेटची सर्वत्र नाचक्की झाली आहे!! जगभरातील क्रिकेट रसिक हास्यरसात डुंबून गेले आहेत. 

अशा या अयोग्य कारणासाठी पाकिस्तानी क्रिकेटला प्रकाश झोतात आणणाऱ्या अजहर आली आणि असद शफिक,  तुम्हां दोघांना इथं काही प्रश्न विचारले जाणार आहेत.  
तुम्ही आपआपल्या सद्सदविवेक बुद्धीला जागृत राहून या प्रश्नांची उत्तरे द्यावीत"

अजहर आणि असत दोघेही माना डोलावतात!

अध्यक्ष: -  "पहिला प्रश्न,  तुम्ही दोघे पीचच्या मध्यभागी राहून नक्की कसली चर्चा करीत होतात?"

अजहर:  "चेंडू ज्याप्रकारे स्विंग झाला आणि माझ्या बॅटची कड घेऊन गल्लीच्या क्षेत्ररक्षकाला चुकवून थर्ड मॅनच्या दिशेने गेला त्याबद्दल आम्ही दोघे आश्चर्य व्यक्त करीत होतो!! आम्ही दोघे मिळून १३० कसोटी सामने खेळलो आहोत आणि नऊ हजारच्या वर धावा जमवल्या आहेत! परंतु आत्तापर्यंत अबुधाबीसारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात कसोटी सामन्याच्या केवळ तिसऱ्या दिवशी सकाळी चेंडू इतका स्विंग होऊ शकतो ही अशक्यप्राय गोष्ट आहे मिलॉर्ड!!!"

अध्यक्ष : (वैतागुन)  इथं मिलॉर्ड वगैरे कोण नाही! मी बसलो आहे! तुमचा अध्यक्ष!! 

दोघेही चपापतात!! इतक्यात तिथे उपस्थित असलेल्या डोळ्याचा डॉक्टर हात वरती करतो!!

डोळ्याचा डॉक्टर : - "मी सुद्धा तेच म्हणु इच्छित आहे  सर!! ते दोघे स्विंगची वगैरे चौकशी करीत नव्हते.  अजहरने फटका मारला.  परंतु असदच्या डोळ्यांच्या क्षमतेविषयी मला सुरुवातीपासूनच शंका आहे!! त्याला दूरवरचे सोडा, पण जवळचे सुद्धा दिसत नाही!! ही सर्व मंडळी रात्री बॉलीवूड चित्रपट पाहत असतात,  त्यावेळी हा असद टीव्हीच्या अत्यंत जवळ जाऊन मोठ्या रसिकतेने हिंदी चित्रपट पाहत असतो!! त्यामुळे त्याची दृष्टी अधिकच खराब झाली आहे!! 

"खामोश" अध्यक्ष अत्यंत रागाने ओरडतात. ह्यात आपल्याला नवीन बॉलीवूड सिनेमे पाहता येत नाहीत पण ही मंडळी मात्र खुलेआम पाहतात ह्याचाच विशाद जास्त होता!

तितक्यात अजून एक व्यक्ती हात वरती करते.  ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पाकिस्तान संघाचा व्यवस्थापक असतो!

व्यवस्थापक : "सर यामध्ये एक गंभीर मुद्दा आहे! संघाच्या बैठकीमध्ये सर्व खेळाडूंना आपली मतं मांडण्याची संधी दिली जात नाही.  त्यामुळे एकमेकांशी चर्चा करण्यासाठी ते मिळेल त्या संधीची वाट पाहत असतात!आणि त्यामुळे असे हास्यास्पद प्रसंग उद्भवतात. 

पाकिस्तान संघाचा कर्णधार सर्फराजची मुद्रा पहाण्यासारखी होते दोन-तीन अपशब्द उदगारून तो गप्प बसतो. 

इतक्यात पाकिस्तान बोर्ड अध्यक्षांना एक खलिता आणून दिला जातो.  या प्रसंगामुळे पाकिस्तानी संघांची लोकप्रियता आकाशाला भिडली असून या प्रसंगात सहभागी असणाऱ्या अजहर आणि असद या दोघांना मनोरंजनपर कार्यक्रमासाठी भारतातून निमंत्रण येत आहेत अशी ती बातमी होती! निलेश साबळे ह्यानं तर त्या दोघांना थेट मुंबईची तिकिटं पाठवली होती आणि भाऊ कदम हार घेऊन स्वागतासाठी सज्ज असल्याचा फोटोही पाठवला होता!

ती बातमी वाचताच अध्यक्षांची मुद्रा एका क्षणात पालटते! ते अजहर आणि असद यांचे कौतुक करु लागतात. या कार्यक्रमात शक्य असेल आम्हा सर्वांना सहभागी करून घ्या. अशी विनंती ते या दोघांना करतात आणि सभा समाप्त होते!!

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

Get your मेंदु sorted!!



साधारणतः सुट्टीच्या दिवशी घराची साफसफाई करण्याची किंवा घर थोड्या प्रमाणात नीटनेटकं करण्याची सवय आपल्यापैकी काहीजणांना असते.  दसरा दिवाळी आली की मग मात्र वर्षभराची साफसफाई केली जाते. घर नीटनेटकं होतं आणि आपण एका नव्या जोमाने सणासुदीच्या हंगामाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. 

आज मात्र एका वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. आपण आयुष्याच्या एका टप्प्यावर एका विशिष्ट विचारसरणीच्या प्रभावाखाली येतो. त्या विचारसरणीच्या नकळत प्रेमात सुद्धा पडतो. काहीजणांना ही जाणीव स्पष्टपणे होते तर काही जणांना होत नाही! ज्यांना ही जाणीव स्पष्टपणे होते; त्यातील काहीजण या विचारसरणीचा उघडपणे पुरस्कार करण्याचे धोरण अंगिकारतात,  तर काही जण आपली विचारसरणी आपल्यापाशी या धोरणाचा स्वीकार करतात. 

आता होतं काय की आपल्यासमोर आयुष्यातील करण्यासारख्या अनेक गोष्टींची यादी सदैव असते. इंग्लिशमध्ये याला 'टू डू लिस्ट' हे अधिकृत नाव देण्यात आलं आहे. 'टू डू लिस्ट' दैनंदिन पातळीवरील करण्यासारख्या गोष्टींची यादी असते. आयुष्यभराच्या पातळीवरील करण्यासारख्या गोष्टींची यादी लक्षात घेतली तर त्याला बकेट लिस्ट म्हणण्याची प्रथा सद्यकाली रुढ होत आहे.  जेव्हा केव्हा आपणास सुट्टी मिळते त्यावेळी प्रत्येकाने स्वतःसाठी (जमल्यास त्यात आपल्या नवऱ्याला / बायकोला समावेश करुन) फुरसतीचा काही काळ काढून ठेवावा.  साप्ताहिक सुट्टी असेल तर हा काही काळ म्हणजे दोन-तीन तास आणि जर आठवडाभराची सुट्टी घेतली असेल तर हा काळ  दिवसभराचा असावा!

आता या काळात आपण काय करावे?  प्रथम आपली 'टू डू लिस्ट' आणि 'बकेट लिस्ट' दोन्ही कागदावर मांडून घ्याव्यात.  त्यामध्ये सुद्धा 'टू डू लिस्ट' मध्ये प्राधान्यक्रम मांडून घ्यावा. त्यानंतर आपल्याला ज्ञात असलेल्या काही विचारसरणी कागदाच्या दुसऱ्या बाजूला लिहाव्यात.  आता या विचारसरणीची उदाहरण द्यायची म्हटली तर 

१) मला व्यावसायिक जगात खूप यश मिळवायचं आहे. 
२) मला माझ्या आई-वडिलांची आणि नातेवाईकांची काळजी घ्यायची आहे.
३) मला शांततेने जीवन जगायचं आहे आणि त्यासाठी व्यवसायिक यशाशी तडजोड करण्याची माझी तयारी आहे. 
४) मला माझा मुलाबाळांच्या शिक्षणावर आणि त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे आहे. 
५) मला भोवतालच्या समाजामध्ये मानाचे स्थान मिळवायचे आहे. 
६) मला खूप पैसा मिळवायचा आहे. 
७) मला खुप प्रवास करायचा आहे, दक्षिण अमेरिकेला भेट द्यायची आहे वगैरे वगैरे !!

ह्या सर्व विचारसरणी कागदाच्या दुसऱ्या बाजूवर मांडून झाल्या की 100% उपलब्ध आहेत हे लक्षात ठेवून तुम्ही यातील कोणत्या विचारसरणींना किती टक्के देणार आहात हेसुद्धा लिहावेत. आता अशा प्रकारे तुमच्या विचारसरणीना देण्यात येणारं वेटेज (महत्त्व) ठरविण्यात आले की ही संयुक्त विचारसरणीचे आयुध घेऊन तुमच्या 'टू डू लिस्ट' कडे आणि 'बकेट लिस्ट' या दोन्हीकडे वळावे.  केवळ एक दोन दिवसाची सुट्टी असेल तर फक्त 'टू डू लिस्ट' कडेच पहावे असा माझा अनाहूत सल्ला आहे.  आता या 'टू डू लिस्ट' मधील प्राधान्यक्रमातील सुरुवातीच्या काही गोष्टींवर आपण ठरविलेल्या संयुक्त विचारसरणींच्या मदतीने आक्रमण करुन पुढील काही काळात आपण या 'टू डू लिस्ट' मधील हे सुरुवातीचे प्राधान्य असलेले पाच-सहा महाभाग कसे काही हातावेगळे करू शकतो  याचे धोरण आखावे.  ह्या नियोजनात आपल्यासोबत बायको नवरा असण्याचे प्रयोजन अशासाठी की त्यांच्या सहकार्याशिवाय तुमचे धोरण यशस्वी होण्याची शक्यता कमी असते आणि ह्या सर्व फंदात तुमच्या वागण्यात बदल घडला तर उगाचच संशयाचं वातावरण नको!

हा उपक्रम पहिल्या प्रयत्नात पूर्णपणे अयशस्वी होण्याची शक्यता गृहित धरावी. जसे की तुम्ही या प्राधान्यक्रमातील पाच-सहा गोष्टींवर पुढील दीड-दोन महिन्यात लक्ष केंद्रित करून त्यांचे उकलन करण्याचा बेत बनवता पण तो काही कारणास्तव यशस्वी होत नाही. परंतु त्याने हताश न होता पुन्हा एकदा ही नियोजन बैठक दोन तीन महिन्याच्या कालावधीनंतर भरवावी. त्यामध्ये मागच्या कालावधीत जे काही बरोबर घडलं त्यापासून स्फूर्ती घ्यावी आणि जे काही चुकीचं घडलं त्यातून धडा शिकावा! हे आवर्तन साधारणतः चार-पाच वेळा केलं की मग मात्र तुम्हाला वस्तुस्थितीशी अनुरूप अशी ध्येयं ठरवता येणं बऱ्यापैकी शक्य होतं किंवा त्याची शक्यता वाढीस लागते, मग मात्र आपला मेंदू शांत होतो कारण अपेक्षाभंगाचे दुःख आपल्याला कमी प्रमाणात होऊ लागतं!  यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या अपेक्षा वस्तुस्थितीशी मिळत्याजुळत्या बनू लागतात!! बकेट लिस्टविषयी सल्ला घेण्यासाठी माधुरी दिक्षीत नेने ह्यांच्याशी संपर्क साधावा !! आला क्षण जगावा ह्या विचारसरणीच्या वाचकांनी ह्या पोस्टकडे दुर्लक्ष करावं !

दसऱ्याच्या सर्व वाचकांना शुभेच्छा आणि आपल्या घराबरोबर आपला मेंदू सुद्धा नीटनेटका करण्याचा यत्न करावा ही विनंती!!

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

मोगरा


आज बंगल्यामध्ये सायंकाळपासुनच लगबग सुरु होती. माळीदादा आधीच नीटनेटक्या असलेल्या बागेला अजून सोंदर्य आणून द्यायचा प्रयत्न करीत होते. पाण्याच्या कारंज्यामध्ये सर्व फुलं न्हाऊन निघत होती अन प्रसन्नचित्ताने पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यावर डोलत होती. बंगल्यातील मोठ्या दिवाणखान्यात संगीताच्या बैठकीची तयारी मोठ्या जोमानं सुरु होती. रंगनाथरावांची आणि त्यांच्या सोबतीला साथ देणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची आसनं व्यवस्थित मांडून ठेवण्यात आली होती.  मैफिल संध्याकाळी उशिरा सुरु होऊन बहुदा पहाटेपर्यंत चालणार होती. त्यामुळे अशा मैफिलीला पोषक वातावरणासाठी आवश्यक अशी प्रकाशरचना करण्यासाठी दिवाणजी आपली प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. 

रंगनाथरावांना सर्व काही अगदी परिपूर्ण हवं असे.  संपूर्ण बैठकीत त्यांना काही खटकेल असे घडलं तर त्यांचा मुड खराब होऊन जाई! आजचा कार्यक्रम तसा खासच असणार होता. शहरातील बरीचशी प्रतिष्ठित मंडळी कार्यक्रमाला हजर असणार होती. कार्यक्रमाला अजूनही दीड तास बाकी असला तरी रंगनाथराव आपल्या रियाजामध्ये मग्न होते अशा दिवशी त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय आणलेला त्यांना अजिबात खपत नसे हे त्यांच्या नजीकच्या सर्व मंडळींना माहीत होतेच! आणि त्या सर्व नजीकच्या मंडळीमध्ये समावेश होता तो त्यांची अर्धांगी राधिका हिचा!

या सर्व कार्यक्रमांमध्ये आणि त्यांच्या पुर्वतयारीमध्ये त्यांचा सहभाग असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला पूर्ण रंगत येत नसे. एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांना माहेरी जावं लागलं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनात छोट्या मोठ्या उणिवा राहून गेल्या होत्या. मग त्यामुळे रंगनाथरावांचा शेवटपर्यंत सुर लागलाच नाही.  सर्व रसिकांनी दाद दिली खरी परंतु कुठेतरी काहीतरी राहून गेलं याची जशी रसिकांना जाणीव झाली तशी रंगनाथरावांनासुद्धा!!

ठरल्याप्रमाणे सायंकाळी साडेसहा वाजता मंडळींचं आगमन व्हायला सुरुवात झाली. त्यांचे स्वागत करण्यात आणि बैठकीमधील त्यांच्या स्थानावर त्यांना  आग्रहानं बसवून देण्यात व्यवस्थापकासोबत राधिकानेसुद्धा मनापासून सहभाग घेतला होता. 
ठीक सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली.  सुरुवातीपासून आज रंगनाथरावांचा सूर लागला होता. एकाहून एक सुरेख राग ते गात होते आणि मंडळी मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आस्वाद घेत होती!  राधिकेच्या खास देखरेखीखाली सर्व रसिकांची अल्पोपहाराची सोयसुद्धा अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली होती! त्यामुळे रसिकांसाठी ही एक सुवर्णपर्वणी होती असं म्हणायला हरकत नाही! अपेक्षेनुसार मैफिल पहाटेपर्यंत चालली.  रंगनाथरावांना साथ देण्यास आलेले कलाकारसुद्धा ताकदीचे होते. त्यामुळे मध्ये काही वेळ विश्रांती घेऊन रंगनाथराव ताजेतवाने  होऊन येत होते.  आणि पुन्हा रसिकांना आपल्या सुरांच्या वर्षावात न्हाऊ घालत होते. 

गवाक्षांतून पहाटेचा झुंजुमुंजु वारा मंडळींच्या अंगावर आला आणि मग रंगनाथरावांनी आपल्या शेवटच्या सुरांनी रसिकांना तृप्ततेच्या शिखरावर नेऊन बैठकीचा शेवट केला! कधी नव्हे ते दोन मिनिटं बोलुन त्यांनी रसिकांचं आभार सुद्धा मानले. त्यातील त्यांचं शेवटचं वाक्य राधिकेला सुखद धक्का देऊन गेलं! "हे सर्व काही शक्य झालं ते केवळ माझ्या सौभाग्यवतीमुळे!" आपल्या आभारप्रदर्शनाच्या शेवटी ते बोलले! आपली आयुष्यभराची मेहनत या एका वाक्यामुळे सार्थकी लागली असं तिला  त्याक्षणी वाटले! सर्व मंडळी निघतोवर सकाळ झाली होती.  सूर्यदेवाची कोवळी किरणे शयनगृहात प्रवेश करती झाली होती. घरातील थोडीफार आवराआवर करुन कौतुकाचा तो क्षण रंगनाथरावांच्या तोंडून पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी म्हणून राधिका घाईघाईने येती झाली. तोवर रंगनाथराव एखाद्या लहान मुलाप्रमाणे निद्रादेवीच्या अधीन झाले होते.  त्यांची ही गाढ झोप पाहून राधिका हिरमुसली झाली!

दुसरा दिवस अगदी निवांत चालला होता.  दिवसाच्या ह्यावेळी झोप येणं राधिकेला शक्यच नव्हते! परंतु थोडा वेळ तिने झोपण्याचा प्रयत्न केला.  मग ह्या अयशस्वी प्रयत्नानंतर ती उठून घराच्या आवराआवरीला लागली.  रंगनाथराव दुपारी केव्हातरी उठले तोवर घर आपलं पूर्वीचं रुप घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हजर होतं.  ते घर आणि मालकीण दोघेही रंगनाथरावांच्या एका कौतुकाच्या शब्दासाठी आणि नजरेसाठी आसुसलेले होते.  परंतु रंगनाथराव मात्र आपल्याच तंद्रीमध्ये होते. आपली आंघोळ वगैरे आटपून ते जेवणासाठी आले.  त्यांच्या खास पसंतीचा मेनू राधिकेनं बनवला होता.  त्यांनी राधिकेकडे घरातील सर्व व्यावहारिक गोष्टींची चौकशी केली.  कार्यक्रमासाठी ज्या काही गोष्टी मागवल्या होत्या त्या सर्व गोष्टींची बिले वेळच्या वेळी चुकवण्यासाठी त्यांनी राधिकेला  स्मरण करुन दिले.  त्यानंतर मात्र ते विविध  लोकांकडून  येणाऱ्या अभिनंदनपर  फोन कॉल्सना उत्तरं देण्यात  गढून गेले!

दुपारी दमल्याभागल्या राधिकेला केव्हा डोळा लागला ते तिचं तिला कळलं नाही! जाग आली ती सायंकाळच्या सूर्यकिरणांनी तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यावर येऊन तिला उठवलं म्हणून! आपल्याला इतकी कशी गाढ झोप लागली या अपराधीभावनेनं राधिका झटपट उठून बाहेर आली! तर तोवर रंगनाथराव आणि ड्रायव्हर शहरामध्ये कामासाठी गेलं असल्याचे तिला समजलं! ती चहाचा कप घेऊन बाहेर झोपाळ्यावर घेऊन बसली. समोरच मोगरा फुलला होता! संध्याकाळच्या वाऱ्यावर मोगऱ्याची फुलं
डुलत होती. राधिकेला ती फुले पाहून काय वाटलं कुणास ठाऊक परंतु ती झोपाळ्यावरुन त्या फुलांच्या जवळ जाऊन बसली, त्यांना अलगदपणे गोंजारुन त्यांच्याशी शब्दांवाचुनच्या गप्पा मारु लागली! अचानक एक एकटी संध्याकाळ एकटी राहिली नव्हती!

शहरातून रात्री केव्हातरी रंगनाथराव परतले ते पुढील सात दिवसासाठी आपण नागपुरात दौऱ्यासाठी जात आहोत ही बातमी घेऊनच! का कुणास ठाऊक पण एका त्रयस्थ भावनेनं राधिकेने त्यांची ही बातमी ऐकून घेतली!यांत्रिकपणे झटपट तिनं  रावांची तयारी करुन दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच रावांना निघायचे असल्यामुळे त्यांना रात्री लगेच झोपणे आवश्यक आहे हे अध्याहृतच होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजताच राव आपल्या ड्रायव्हर सोबत निघून गेले. आठवडाभरासाठीचे पैसे रात्रीच तिला देण्यास ते विसरले नव्हते. 

पुर्ण दिवस राधिकेला खायला उठला होता. काय करावं हे समजत नव्हतं!
ती असंच काहीतरी काम काढून वेळ पुढे ढकलत होती. सायंकाळी पुन्हा एकदा झोपाळ्यावर येऊन बसली असता तो मोगरा एकदा तिला हसताना आणि डुलताना दिसला! तिच्या मनात विचार आला हा किती सुंदर नाच करीत आहे ना! तिला काय वाटलं कुणास ठाऊक! ती मग त्या पुन्हा मोगऱ्याजवळ गेली! बराच वेळ काही न बोलता त्याच्याजवळ बसून राहिली!  "मी तुझ्यासारखे नृत्य केले तर तुला आवडेल ना?" तिनं हळुवारपणे मोगऱ्याला विचारले आणि काय आश्चर्य! त्या मोगऱ्यानं जणु काही आनंदानं स्वतःभोवती डुलकी घेतली !

पुढील आठवडाभर राधिकेचा नृत्याचा सराव जोमानं सुरु होता! महाविद्यालयात असताना ती एक बऱ्यापैकी शास्त्रीय नृत्य करायची! पण पदवीनंतर लगेच लग्न जमलं आणि मग सारं काही राहुनच गेलं होतं ! राधिकेच्या नृत्याचा आवाज ऐकुन एक दिवस तिची शेजारच्या बंगल्यातील मैत्रीण जुई न राहवुन तिच्याकडं आली. "अगं तु इतकं सुंदर नृत्य करतेस हे मला माहीतच नव्हतं !" तिचं नृत्य पाहुन जुई म्हणाली. जुईला सुद्धा शास्त्रीय नृत्याची चांगलीच जाणीव होती. आठवडाभर दोघींचा सराव अगदी जोमात सुरु राहिला! मधल्या काही वर्षांचा जणु काही खंड पडलाच नाही असंच राधिकेला वाटु लागलं ! 

दिवसेंदिवस सायंकाळी मोगरा अजुनच जोमानं फुलू लागला होता!

राधिका सायंकाळी ध्वनिमुद्रिका लाऊन आपल्या नृत्याचा सराव करत होती. आणि अचानक अंगणात रावांची गाडी येऊन थांबली. राव आज येणार हे माहिती असलं तरी इतक्या लवकर येतील ही राधिकेनं अपेक्षा केली नव्हती! राव दिवाणखान्यात येईस्तोवर राधिकेला आवरायला वेळ मिळाला नाही ! राधिकेला ह्या अवतारात पाहुन रावांच्या चेहऱ्यावरील रागाचे भाव पाहुन राधिका पार भयभीत झाली होती. 

पुढील काही दिवस रावांनी अगदी अबोला धरला होता. राधिकेला काय करावं हे अजिबात समजत नव्हतं! शेवटी आठवड्याभरानंतर न राहवुन तिनं  रावांकडं विषय काढला, "काय झालं अबोला धरायला?" "ह्या वाड्यातील सुनेनं आजतोवर कधी नाच केला नव्हता! " कडक स्वरात एक वाक्य  बोलुन राव दिवाणखान्याबाहेर निघुन गेले होते. 

रावांच्या ह्या उत्तरानंतर राधिकेकडं पर्याय उरला नव्हता! एका भरल्या घरातील रितेपण घेऊन जगण्यावाचुन तिच्याकडं दुसरा पर्याय तिला दिसत नव्हता! बागेतील मोगऱ्याचा बहरसुद्धा ओसरला होता! 

समोरच गाण्याची ध्वनिमुद्रिका पडली होती "मोगरा फुलला"... राधिकेनं जवळच पडलेलं पेन घेतलं आणि त्यावर शब्द खरडले "आणि कोमेजला देखील !!"

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...