रविवार, १७ जुलै, २०२२
२०२२ - अमेरिका दौरा
शनिवार, २८ मे, २०२२
हरवलेल्या पत्त्यांचा बंगला
सद्य:स्थितीवर अत्यंत समर्पक, संयत असं भाष्य करणारं हे नाटक! चाळ पाडून उभ्या राहिलेल्या फ्लॅट संस्कृतीत राहणारी इंदिरा आजी. तिच्या सोबतीला पेइंग गेस्ट म्हणून राहणारी कॉलेजयुवती निधी. निधीचं वयाला अनुसार असं बिनधास्त वागणं आजीला जरी वरवर खटकत असलं तरी तिच्या वागण्यातील सच्चेपणा आजीला भावलेला असतो. आजीचा मुलगा अमेरिकेत आणि मुलगी बदलापूरला. आजीनं ह्या परिस्थितीला स्वीकारुन निधीसोबत आपल्या आयुष्याची घडी बसवलेली असते. अचानक काही कारणांमुळं प्रथम नातवाला आणि मग मुलीला आपल्या नवऱ्यासोबत आपल्या आईच्या घरी रहायला यावं लागतं. ती येणार म्हणून निधीला त्या घरातून बाहेर पडावं लागतं. आजीला खरंतर मनापासून हा निर्णय पटलेला नसतो तरीही काहीशा नाईलाजानं ती तो स्वीकारते. कथानकात अजून दोन उपकथानकं आहेत ती म्हणजे आजीच्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या बहिणीची आणि निधीच्या आईबाबांची. पुढं कथानक वेगळं वळण घेतं. शेवटी आजीला एक तिच्या आतापर्यंतच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत अशी पण ठाम भुमिका घ्यावी लागते.
नाटक मनापासुन आवडलं. कथा अगदी घराघरांत घडणारी. आता जी ऎशींच्या आसपास पोहोचलेली पिढी आहे तिनं आपल्या आधीच्या पिढीचं आणि नवीन पिढीचं सारं काही अगदी मन लावुन केलं. पण त्यातील काही जणांच्या बाबतीत आपल्या अपत्यांसोबत राहण्याचं भाग्य आलं नाही. विविध कारणांस्तव नवीन पिढीतील काहीजणांना ह्या ऐंशीच्या घरात पोहोचलेल्या पिढीसोबत रहायला जमत नाही. आपल्या मुलांना आपल्यासोबत राहता येत नाही किंवा रहायचं नाही हे सत्य ज्यावेळी त्यांच्या समोर आलं त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला असणार, काहीशी कटुता आली असणार. त्यांच्यातील काहीजण बहुदा कायमचे निराश बनले असणार, पण काही जणांनी मात्र बदलणाऱ्या जगाचं हे वास्तव स्वीकारलं. "World around you is changing, embrace the change" काहीशा अशा अर्थाचं वाक्य निधी आजीला बोलते. आजीला ते मनापासुन पटतं. आजीच्या तोंडच्या म्हणी, त्यांतील जीवनाचं सार सांगणारा अर्थ निधीला भावत राहतो, तर निधीच्या बोलण्याचालण्यातुन आजीसमोर उघडणारं नवीन जगाचं दालन आजीला हवंहवंसं वाटणारं ! नातवंडं आणि आजी- आजोबांचं जमणारं Bonding हे गेले कित्येक पिढ्या चालत आलेलं एक गोड नातं नाटक सुरेखरित्या उलगडून दाखवतं. ह्या ऐंशीच्या पिढीनं एकदा का हे नवीन जगाचं वास्तव स्वीकारलं की मग त्यांना जाणीव होते ती आपल्या "स्पेस" ची! आपण आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टींचा गेले कित्येक वर्षे त्याग केला त्या गोष्टींना नव्यानं एकदा आपल्या आयुष्यात सामावुन घेण्याची हीच संधी आहे हे त्यांना जाणवतं. आजी म्हणते तसं मग कलकलाट नकोसा होतो, शांतता / एकांत प्रिय वाटू लागतो. महिनोंमहिने आपल्या मुलांपासून दूर राहिल्यावर मग त्या एकट्या काळात जी माणसं सोबतीला येतात त्यांच्यांशी ह्या आजीआजोबांचे ऋणानुबंध निर्माण होतात. रक्ताच्या नात्यापलीकडं असलेले हे बंध बऱ्याच वेळा खऱ्या नात्यापेक्षा गहिरे बनतात. खरा प्रश्न त्या वेळी निर्माण होतो ज्यावेळी मुलगा-मुलगी अचानक पुन्हा आपल्या आई-वडिलांच्या आयुष्यात प्रवेश करु इच्छितात. आयुष्यातील सर्वात मोठं गृहितक ज्यावेळी कोलमडताना पहावं लागतं त्यावेळी मुलांमुलींना मोठा धक्का बसू शकतो.
बदलत्या जगातील एक महत्वाचं सत्य नाटक कळत नकळत अधोरेखित करतं. पुर्वी माणसं भावनिकदृष्ट्या कणखर असल्यामुळं असेल कदाचित पण आयुष्यभर मोजक्याच लोकांशी भावबंध जोडून पूर्ण आयुष्य व्यतित करण्याची क्षमता बाळगून असत. हल्ली आयुष्यात एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे मोकळ्या वेळात तुम्हांला खूप अस्थिर करणारं तुमचं मन. ह्या काहीशा कमकुवत क्षणी तुम्हांला जे कोणी साथ देतं, तुमच्यासाठी जे कोणी उपलब्ध असतं त्यांच्यासोबत तुम्ही जोडले जाता. आजी निधीशी ह्याच कारणामुळं जोडली जाते, तीही आपल्या मुलीपेक्षा घट्ट बंधाने !
चाळीस - पन्नाशीच्या आसपास पोहोचलेली पिढी म्हणायला गेलं तर स्वार्थी वाटु शकते. आपल्या गरजांसाठी आपल्या आईवडिलांचा वापर करुन घेणारी . नाटकात ह्या पिढीची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला गेला नाही. म्हणजे ही काही उणीव आहे असं नाही तर नाटक आपल्या कथानकाशी प्रामाणिक राहतं. राहता राहिली ती नातवंडं. आपल्या आईवडिलांचं आयुष्य जवळून बघणारी आणि त्यावर आपली मतं मांडण्याची मुभा मिळालेली. त्यांचं हे आपल्या आईवडिलांच्या आयुष्यावर व्यक्त होणं बहुदा आईवडिलांना आवडत नाही. त्यामुळं बऱ्याच वेळा ते संवाद अचानक कमी करुन टाकतात, भरल्या घरात एकलकोंडे आयुष्य जगत राहतात.
नाटक अगदी सुरेख जमलेलं ! संवाद, जुन्या म्हणींचा समर्पक वापर, वंदना गुप्ते (आजी), निधी, प्रतीक्षा लोणकर, ईशान साऱ्यांचा अभिनय, नवीन पिढीच्या जीवनशैलीचे केलेलं अगदी हुबेहूब चित्रण ह्या साऱ्या नाटकाच्या समर्थ बाजु ! नाटकाच्या पुर्वार्धात काहीशी उत्साहानं आयुष्य जगणारी आजी मध्यंतरानंतर मात्र तिच्या आयुष्यातील घडामोडींनी हताश होते.हा हताशपणा वंदना गुप्ते ह्यांनी खूप सुरेखपणे साकारला आहे. ठिगळ, पत्ते ह्यांचे रुपकात्मक उल्लेख नाटकात अगदी चपखल बसतात. घरात वाजणाऱ्या फोनकडे चालत जाताना "हो आलो" वगैरे बोलण्याची पद्धत अगदी मस्तच! घरात दिवाणखान्यात असलेल्या गणपतीशी आजीचं असलेलं नातं, मुलीनं हा गणपती इथं शोभत नाही म्हटल्यानंतर होणारी तिची निराशा, वयानुसार गणपतीला गणोबा म्हणण्याइतपत त्याच्याशी झालेलं सख्य, सारं काही अप्रतिम !
हे नाटक नाटक रहात नाही. ते प्रेक्षकांना थेट प्रश्न विचारतं, त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेल्या भुमिकेविषयी विचार करायला भाग पाडतं. नाटकाच्या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणं तिन्ही पिढींनी मिळून बघण्यासारखं हे नाटक! खास करुन एकत्र कुटुंबपद्धतीच्या झपाट्यानं होत असलेल्या अस्ताच्या काळात नवीन पिढीला आपल्या पुढील दोन पिढींच्या विचारसरणीची झलक दाखवून देणारं सुद्धा !
नाटक हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सद्यपरिस्थितीत आधीच्या पिढ्यांनी आपल्याला दिलेल्या संस्कारी आयुष्याचा ठेवा आपण आपल्या पुढील पिढीला देऊ शकत नाही ह्या गोष्टीचं काहीसं अपराधीपण मी बाळगून असतो. पण असे ताकदीचे कलाकार, असं अर्थपूर्ण नाटक एक मोठा आशेचा किरण दाखवतं. पुढील पिढीला देखील आपल्याशी जोडण्याची क्षमता बाळगतं. घरात दहा वर्षाच्या वरील मुलं असतील तर त्यांच्यासोबत नक्की बघण्यासारखं हे अर्थपूर्ण नाटक!
गुरुवार, २६ मे, २०२२
विरार लोकल - १९९५ ते २०२२
(प्रत्यक्ष जीवनातील प्रसंग आणि काल्पनिक प्रसंग ह्यांचं मिश्रण !)
प्रसंग १ - मे १९९५ वेळ सायंकाळ साडेपाच
चर्चगेट स्थानकावर चार क्रमांकांच्या फलाटावरील इंडिकेटर पाच अडतीसची विरार ट्रेन दाखवत होता. अनेक चाकरमान्या प्रवाशांसोबत वसईचा विकास बॅग सांभाळत बॉम्बे सेंट्रल स्थानकावरुन थेट चर्चगेटला येणाऱ्या लोकलची वाट पाहत उभा होता. समोरच्या फलाटावर उभं राहून त्याच लोकलची वाट पाहणाऱ्या राऊतांनी विकासकडं पाहून स्मित हास्य केलं. राऊत हे विकासच्या आजीच्या मामाकडील कुटुंबातील होळीवर राहणारे! त्यांची पाच अडतीसची गाडी नित्यनेमानं ठरलेली ! चेहऱ्यानं ओळख असली तरी मान डोलावून "बरे आहेत ना" ह्या संवादापलीकडं काही चर्चा होत नसे !
लोकल आली! चपळाईने वाऱ्याच्या दिशेची खिडकी पकडून विकास स्थिरावला. तीस ते पंचेचाळीस सेकंदात सर्व सीट्सवर प्रवासी स्थानापन्न झाले होते. थोड्याच वेळात बाजूच्या कक्षातील आक्टनच्या डिसोजाने विकासला आवाज दिला. "ओ पाटील, बरे ना ! चार पाच दिवस कुठे होतात? शनिवारी आर. पी. शाळेत आमच्या टेनिसच्या मॅचेस आहेत, बघायला या !" हा डिसोजा विकासच्या धाकटया भावाचा मित्र. "यंदा तरी पहिला राउंड जिंका!" विकासने त्याला टोला हाणला. डिसोजाने मनमुराद हसत त्याला दाद दिली. लोकल सुटायची वेळ होत आली होती. इतक्यात सर्व डब्याला विस्कळत तर्खडचे ठाकूर डिसोजाच्या ग्रुपच्या दिशेनं येऊ लागले. लोकांनीही त्यांना कटकट न करता येऊ दिलं. गाडी गच्च भरली होती, मुंगीलाही पाय टाकायला जागा नव्हती. मरीन लाईन्स गेले, आणि ठाकुरांनी भली मोठी पिशवी काढली. त्यात वर्तमानपत्रात गुंडाळलेले वडापाव होते. पूर्ण डब्याभर वडापावचा खमंग वास पसरला. "ओ, पाटील! घ्या हा वडापाव ! शनिवारी आम्ही टूर्नामेंट मारली ना की मग पूर्ण टीमला तुम्ही अनलिमिटेड वडापाव द्यायचे !" डिसोजाने विकासला टोला हाणला! खिडकीच्या गजाला धरलेल्या हातानं विकासने लगेचच तो वडापाव घेतला आणि खाल्ला देखील! सॅनिटायझरचे पृथ्वीवर आगमन होण्यासाठी अजून अनेक वर्षांचा कालावधी बाकी होता. डिसोजाने अर्ध्या डब्याला वडापाव वाटले. डिसोजा आणि ग्रुपचा मेंढीकोटचा डाव रंगात आला होता. मुंगीलाही पाय ठेवायला जागा नसलेल्या डब्यात सुद्धा दादर, बांद्रा, अंधेरी, बोरिवली इथं लोक चढत होते. ठाकुरांप्रमाणे डब्याला घुसळून टाकत डिसोजांच्या ग्रुपच्या दिशेनं येत होते. विकास मिड-डे मधील शब्दकोडे सोडविण्यात गर्क झाला होता. कांदिवलीची कार शेड गेली आणि विकासने उभ्या असलेल्या माणसाला जागा दिली. "ओ, पाटील वडिलांना सांगा, पुढच्या महिन्यात वऱ्हाडाला यायचं! घरी पत्रिका द्यायला येईनच!" उभ्या राहिलेल्या विकासला पाहून लांबवर उभ्या असलेल्या परेरांनी त्यांच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. भाईंदरला गाडी रिकामी होत आली. वसईला होळी एस. टी. बसमध्ये विकासला मागची सीट मिळाली. वरती निळा दिवा असलेला पाहून विकास खुश झाला. लांबूनच राऊतांनी विकासला त्याचे तिकीट काढल्याची खूण केली आणि कंडक्टरला सुद्धा सांगितलं! माणिकपूर नंतर लाईट गेली होती. भर उन्हाळयात देखील भागोळ्याला बसने वळण घेतल्यावर थंड वाऱ्याची झुळूक विकासला सुखावून गेली!
प्रसंग २ - मे २०२२ वेळ सायंकाळ पाच
विकासला बऱ्याच वर्षांनी चर्चगेटला काम निघालं होतं. चर्चगेट स्थानकावरील गर्दी पाहत त्यानं एक स्लो लोकल पकडली आणि तो मुंबई सेंट्रल स्थानकावर आला. तिथून त्यानं चर्चगेटला जाणारी आणि तिथं विरार लोकलमध्ये बदलणारी गाडी पकडली. त्याची खातरजमा करण्यासाठी त्यांना बाजूच्या माणसाला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला. विकासला लूक देत त्या माणसानं "मोस्ट लाइकली " असे विम्याचे सुरक्षाकवच असलेलं उत्तर दिलं! गाडी भरधाव वेगात चर्चगेट स्थानकात शिरली. लोकांनी आतासुद्धा डब्यात वेगानं उड्या मारल्या, पण आपल्यापेक्षा ह्यांची चपळाई खूपच कमी झाली आहे असे विकासला वाटून गेलं. आताही पंचेचाळीस सेकंदात सर्व सीट्स भरल्या होत्या. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विकासने मुद्दामच सेकंड कलासचा तोच डब्बा आणि तीच सीट पकडली होता. बहुदा एखाद्या ग्रुपची मोक्याची जागा पटकावल्याबद्दल आपल्याला त्यांची नाराजी पत्करावी लागेल असे विकासला वाटले होते. परंतु तसे काही झाले नाही. मिनिटाभरातच सर्व जण खाली माना घालत आपल्या भ्रमणध्वनीत मग्न झाले होते. विकासने डिसोजाच्या ग्रुपच्या दिशेनं नजर टाकली, तिथं ओळखीचा एकही माणुस दिसला नाही. लांबवर एक चेहरा परिचयाचा वाटला, विकासची आणि त्याची नजरानजर झाली. परंतु दोघांनाही खात्री नसल्यानं दोघांनीही नजर फिरवली. दादर, बांद्रा, अंधेरी, बोरिवली इथं दरवाजाजवळ अजूनही झटापट होत होती, पण कोणीही आत येऊ शकत नव्हते. विकासच्या बाजूच्या माणसानं तासाभरात चार वेळा सॅनिटायझरने हात निर्जंतुक करत बिसलेरी पाण्याचं प्राशन केलं होतं. विकास मीरारोडला उभा राहिला. नायगावला दरवाज्याच्या दिशेनं कूच करुन देखील त्याला वसईला उतरण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. रिक्षा स्टॅन्डची रचना पूर्णपणे बदलली होती. विकास ह्या प्रवासानं पुर्णपणे दमला होता. शारीरिक दमछाकेपेक्षा त्याची मानसिक दमवणूक जास्तच झाली होती. स्पेशल रिक्षा करुन विकास स्थिरावला. त्याच वेळी त्याला लक्षात आले की डब्यात दिसलेला परिचित चेहरा फेसबुकवर त्याच्या पोस्टना लाईक करणारा त्याचा फेसबुक फ्रेंड होता !!
बुधवार, १८ मे, २०२२
वल्हव रे नाखवा हो !
पावसाळा जवळ येतोय. काही दिवसांतच काजव्यांचं आगमन येईल. काजवे पाहणं एक नयनरम्य आणि सोबत खूप काही शिकवून जाणारा अनुभव असतो. दाट अंधाऱ्या पार्श्वभूमीवर काही वेळच आपल्या प्रकाशाची झलक दाखवणारा काजवा आपल्यासाठी तरी नंतर गायब होतो. आपल्याला आपलं आयुष्यसुद्धा तुलनेनं दीर्घकाळ वाटत असलं तरी विश्वाचा प्रदीर्घ कालावधी पाहता आपलं आयुष्य विश्वपटलावर एखाद्या काजव्याप्रमाणंच असतं.
आयुष्यात खंबीर राहण्याशिवाय पर्याय नसतो. खंबीर राहणं म्हणजे मनाला संतुलित अवस्थेत ठेवणं. आयुष्यातील घडामोडीचे हेलकावे येतात, मनाची नौका डगमगते. मनाची नौका डगमगणे ह्यात चुकीचं काही नाही पण नावाड्याने तिला लगेचच सावरणं आवश्यक असतं. मनाला गरज असते आधाराची! काहीवेळा हा आधार जवळची माणसं पुरवतात तर काही वेळा संगीत, निसर्ग ह्यांच्याकडं धाव घ्यावी लागते. संगीत, निसर्ग ह्यांच्याकडं धाव घेण्यात एक फायदा असतो, ही माध्यमं एखाद्या विशाल पाषाणासारखी अचल असतात. आपल्याकडं सातत्यानं सुखावह लहरी प्रक्षेपित करत राहण्याची क्षमता हे बाळगून असतात, आवश्यकता असते ती आपल्याला त्यांच्याशी संवादाचं माध्यम प्रस्थापित करता येण्याची!
हे सारं काही आज सकाळी काहीशा गोंधळलेल्या मनाला शांत करणाऱ्या यु ट्यूबवरील लताजींच्या मराठी गाण्यांच्या मैफिलीला सर्मपित ! जुन्या गाण्यांचं एक खास असतं. त्यातील बहुतांश ओळी खूप अर्थपूर्ण असतात. शांतपणे ही गाणी ऐकत असताना ह्या ओळी, हे शब्द त्यांच्या अर्थासहित मनाला जाऊन भिडतात. कदाचित त्यात जीवनाचा व्यापक अर्थ भरलेला असतो. शांत मन ह्या ओळींचा आपल्या समजुतीप्रमाणं अर्थ लावतं, जगरहाटीमध्ये आपला गोंधळ एकट्याचाच नाही हे मनाला कदाचित उमगतं आणि मन एका नव्या जोमानं नवीन दिवसाला सामोरं जायला सज्ज होतं !
मंगळवार, १० मे, २०२२
आयुष्य म्हणजे ..
एका टप्प्यानंतर आयुष्य म्हणजे
आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणींसोबत केलेला प्रवास
सर्व काही ठीक चाललं आहे हे स्वतःला समजविण्याचा एक वेडा प्रयत्न
झालेल्या गैरसमजांना सोबत घेऊन जीवनप्रवास सुरु ठेवण्याची अगतिकता
संभाव्य गैरसमजांना टाळता यावं ह्यासाठी सतत जागरुक राहण्याची गरज
लोकांच्या प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष प्रतिक्रियांपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याची निकड
झपाट्यानं जीवनमूल्यं बदलणाऱ्या जगात स्वत्व टिकविण्याची एक धडपड
भोवतालच्या आक्रमक वृत्तींना आपल्या पद्धतीनं उत्तर देण्याचा संयम
आनंदाच्या क्षणी देखील मर्यादेत राहण्याची समज
आयुष्यभरातील मोठ्या गोंधळाला दिवसातील छोट्या छोट्या आनंदानं उत्तर देण्याचा प्रयत्न
स्वतःच्या स्वभावाशी बराच काळ केलेल्या संघर्षानंतर त्या स्वभावाला स्वीकारण्याची आलेली उमज
शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२
Just hanging in there!
कंपनीत गेल्या आठवड्यात असाच एक टाऊन हॉल सुरु होता. शेकडो माणसं त्या कॉलवर होती. अचानक एका व्यक्तीनं तिथं प्रश्न विचारला. नांव परिचयातील होतं. २००५ - ०७ साली न्यू जर्सीत काम करताना तिथं ही व्यक्ती माझी व्यवस्थापक होती. त्याला मी पिंग करुन विचारलं, " ओळखलं का मला ? कसं काय चाललंय?" पंधरा वीस सेकंदांनी प्रतिसाद आला, " अरे वा आदित्य ! कसा आहेस ? I am just hanging in there." सुरुवातीचा आनंद ओसरल्यानंतर आम्ही आपापल्या कामाकडे वळालो.
"Just hanging in there" डोक्यात बसून राहिलं. गेले कित्येक वर्षे ऐकत आलेला हा शब्दप्रयोग. एकदा अमेरिकेतील बहुदा न्यू जर्सीतील ऑफिसातच रात्री ऑफिसात गेल्यानंतर तीन वाजता सुद्धा प्रश्न सुटायची चिन्हे दिसत नसताना तत्कालीन व्यवस्थापकाने बहुदा म्हटलं होतं, " Aditya, Just Hang in there!" सकाळी कधीतरी प्रश्न सुटला होता, त्यावेळी त्याचे मी आभार मानले होते त्यानं दिलेल्या त्या धीराबद्दल !
हल्ली आपण सर्व सुद्धा बहुदा Just hanging in there चा अनुभव घेत असतो. वैयक्तिक आयुष्य, कार्यालयीन जबाबदाऱ्या ह्यात सर्व काही नियंत्रणाखाली आहे अशी परिस्थिती केव्हाच नसते. एका वेळी चिंता करण्याजोग्या असलेल्या पंधरा वीस प्रश्नांपैकी कोणाकडं तात्काळ लक्ष द्यावं हे ठरवून त्या प्रश्नाचं प्राधान्यानं निराकरण करावं लागतं.
आपलं आयुष्य कसं असावं ह्याविषयी आपण रेखाटलेल्या परिपूर्ण चित्रापासून (Picture Perfect) बरंचसं दूर असलेलं जीवन जगण्याची वेळ आपल्यापैकी बऱ्याच जणांवर येत असते. पण त्यामुळं आपण काही हतबल होऊन बसत नाहीत. आपल्या मतीनुसार, क्षमतेनुसार आपल्या भोवतालच्या परिस्थितीतुन आपण मार्ग काढत राहतो. सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर ही जिद्दीनं टिकून राहण्याची वृत्तीच आपल्याला घडवत असते. भविष्यात मागं वळून ह्या कालावधीकडे पाहिलं तर ह्या कालावधीत आपण बरंच काही चांगलं केलं हे आपल्याला जाणवतं.
इथं एक लक्षात घ्यायला हवं की Just hanging in there आपल्या एकट्याच्या बाबतीतच घडत नाहीये. आपल्या भोवताली अनेकजण सुद्धा त्या दोराच्या हातातून सुटू पाहणाऱ्या एका टोकाला अगदी घट्ट पकडून त्यांचा लढा लढत आहेत. त्यामुळं उघड्या डोळ्यांनी भोवतालचे असे सर्व जीवनसंघर्ष शोधत रहा आणि जमेल तितकी मदत करा.
सतत ह्या स्थितीत राहणं हे योग्य नव्हे. ह्या संघर्षाचा नाही म्हटलं तरी तब्येतीवर, मनःस्वाथ्यावर परिणाम होत असतो. त्यामुळं योग्य वेळ येताच आपण ज्या गोष्टीसाठी संघर्ष करतोय ती खरोखरीच त्या संघर्षाच्या, त्यागाच्या पात्र आहे का हा प्रश्न देखील स्वतःला विचारुन पहावा. Just hanging in there ही फार कौतुकाची गोष्ट करु नये. जर संपूर्ण मनुष्यजमात ह्या उक्तीचा अनुभव घेत असेल तर एक समूह म्हणून आपल्या एकंदरीत विचारसरणीतच खोट असावी असंही आपण म्हणू शकतो.
जाता जाता जागतिक पटलावर एक राष्ट्र सुद्धा ह्या उक्तीचा कसा प्रत्यय आणुन देत आहे हे आपण सर्व पाहत आहोतच. मित्रा - धीर सोडू नकोस!
शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२
कंपास
गेल्या आठवड्यात प्रिंट आऊट काढण्यासाठी सकाळ सकाळी स्टेशनरीच्या दुकानात गेलो होतो. सव्वा नऊच वाजले असल्यानं उघडल्यानं दुकानात कोणीही नव्हतं. प्रिंट आऊटची संख्या जरा जास्तच असल्यानं मी निवांत दुकानातील सर्व सामुग्रीकडं अगदी कुतूहलबुद्धीनं पाहत होतो. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी सर्व सामुग्री पाहून कसं बरं वाटतं. कोशातील जीवन जगत असल्यानं बहुदा ह्या सर्व गोष्टी वापरणारी मुलं आपल्या भोवताली आहेत ह्याचा खरंतर आपल्याला विसर पडलेला असावा असं वाटून गेलं.
प्रिंटर पण निवांतपणे प्रती काढत होता. बहुदा वीस सेकंदामागे एक वगैरे वेगानं! मुलाच्या अभ्यासाच्या प्रती असल्यानं प्रिंटर त्या वाचूनच मग प्रती काढत असावा की काय असं सुद्धा मला वाटून गेलं. घरी प्रिंटर का नाही वगैरे शंका वाचकांच्या मनात आल्यास घरचा प्रिंटर सुस्थितीत ठेवण्याचा नाद मी काही वर्षांपूर्वी सोडून दिला. ते प्रकरण पांढरा हत्ती पोसण्यासारखं वगैरे असतं.
माझ्या आणि त्या दुकानदाराच्या निवांतपणाची हद्द होईल अशी स्थिती सुरु असल्यानं ह्या प्रती विषयानुसार फाईलमध्ये लावून देऊ का अशी पृच्छा त्यानं माझ्याकडं केली. त्या फाईल पाहून मला गहिवरुन आले. एखादं कागदपत्र सापडत नसल्यावर घरात असलेल्या असंख्य फाईल्सशी आमचा जवळचा संबंध सदैव येत असतो. असं असलं तरीही ह्या सर्व जुन्या फाईल्स आहेत. बरेच वर्षात नवीन फाईल घेण्याचा प्रसंग आला नव्हता. मी गदगदून त्याला विषयानुसार फाईल देण्याची विनंती केली. ह्या फाईल्स बऱ्याच जुन्या असल्यानं मला अजूनच गदगदून आलं. पहिल्या विषयाच्या प्रती छापून झाल्यावर दुकानदारानं त्यांना पंच करुन त्या व्यवस्थित फाईलमध्ये लावण्याचं काम सुरु केलं. त्यानं मला पंच विकण्याचा प्रयत्न करुन पाहिला नाही. एकंदरीत Customer Satisfaction अगदी महत्तम पातळीवर पोहोचलं होतं.
हे सर्व भावनाविवश होण्याचे प्रसंग सुरु असताना अचानक दुकानात एक मुलगा आला. "अंकल, कॅम्लिन का कंपास हैं क्या? " त्यानं एका सराईतासारख्या स्वरात विचारलं. अंकल शब्द कानी येताच मी हमखास वळुन पाहतो आणि आपल्याला कोणी संबोधित नाही ना ह्याची खात्री करुन घेतो. इथं तशी शक्यता कमीच होती, नवीन गिऱ्हाईक आल्यानं दुकानदारानं त्याचा मोर्चा त्या मुलाकडं वळवला. दुकानात उपलब्ध असलेले विविध कंपास बॉक्स त्यानं त्या मुलासमोर ठेवले. मुलाला बहुदा कॅम्लिनचीच कंपास बॉक्स हवी होती. त्यानं ती उघडली आणि त्याची सखोल तपासणी केली. ह्या तपासणीत कर्कटकला (हा शब्द लिहिताना मला पुन्हा गहिवरुन येत आहे) विशेष लक्ष मिळालं. एकंदरीत तपासणीनंतर समाधान झाल्यावर त्या मुलानं मुख्य मुद्द्याचा म्हणजे किंमतीचा विषय काढला. "एक सौ दस " दुकानदारानं त्वरित उत्तर दिलं. "क्या अंकल! वो कॉर्नरवाला सौ में बेचता हैं लेकिन आजकल बहुत नाटक कर रहा हैं इसलिये इधर आ गया। " बहुदा तो कॉर्नरवाला दुकानदार ह्या मुलाला वस्तुंची इतकी तपासणी करुन देत नसावा. पुढील दहा मिनिटं त्या मुलानं अगदी शांतपणे त्या दुकानदाराशी त्या दहा रुपयांसाठी घासाघीस केली. तितक्या वेळात नवीन विषयाच्या प्रती प्रिंटआऊट साठी देणं, त्या मुलाला कंपासचे दुसरे उपलब्ध पर्याय दाखविणं इत्यादी गोष्टी सुद्धा त्यानं केल्या. शेवटी त्या मुलाच्या जिद्दीचा विजय झाला. त्या दुकानदारानं तो कंपासबॉक्स शंभर रुपयांत त्या मुलास दिला.
सवडीनं प्रिंटरने आपलं काम आटोपलं. केवळ प्रिंटआऊट घेण्यासाठी गेलो असता त्यासोबत फाईल्स सुद्धा घेऊन आलो. त्या मुलाचं आणि दुकानदाराचे मला खूप कौतुक वाटलं. त्या मुलासाठी बहुदा खरोखरच ते दहा रुपये महत्त्वाचे होते. ज्या शांतपणे त्यानं ते संभाषण हाताळलं हे नक्कीच कौतुकास्पद होतं. जीवन जगण्याची कला तो ह्या वयातच शिकला आहे. कष्ट करण्याची तयारी आणि संभाषणकला असेल तर उपलब्ध पैशात सन्मानानं जीवन जगण्याच्या संधी आजही किमान भारतात तरी उपलब्ध आहेत. तुम्ही जितका भोवतालच्या किराणा दुकानदारांशी, स्थानिक भाजीवाल्यांशी अधिक संवाद साधता तितकं तुम्हांला जीवनाविषयी अधिक आशादायी वाटायला लागतं. न राहवून मनात विचार आला तो आपल्या मुलासाठी हीच कंपास बॉक्स अधिकच्या भावानं ऍमेझॉनवरुन विकत घेणाऱ्या पालकांविषयी. कदाचित आपल्या मुलांना मिळू शकणारा जीवनातील एक पाठ त्या खरेदीमुळं ते गमावत असतील. आणि नाक्यावरील किराणा दुकानदाराला अस्तित्वात ठेवण्याची एक संधी सुद्धा !
Long Live किराणा दुकानदार!
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...
















































