मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १८ मे, २०२२

वल्हव रे नाखवा हो !


पावसाळा जवळ येतोय. काही दिवसांतच काजव्यांचं आगमन येईल. काजवे पाहणं एक नयनरम्य आणि सोबत खूप काही शिकवून जाणारा अनुभव असतो.  दाट अंधाऱ्या पार्श्वभूमीवर काही वेळच आपल्या प्रकाशाची झलक दाखवणारा काजवा आपल्यासाठी तरी नंतर गायब होतो. आपल्याला आपलं  आयुष्यसुद्धा तुलनेनं दीर्घकाळ वाटत असलं तरी विश्वाचा प्रदीर्घ कालावधी पाहता आपलं आयुष्य विश्वपटलावर एखाद्या काजव्याप्रमाणंच असतं. 

आयुष्यात खंबीर राहण्याशिवाय पर्याय नसतो. खंबीर राहणं म्हणजे मनाला संतुलित अवस्थेत ठेवणं.  आयुष्यातील घडामोडीचे हेलकावे येतात, मनाची नौका डगमगते. मनाची नौका डगमगणे ह्यात चुकीचं काही नाही पण नावाड्याने तिला लगेचच सावरणं आवश्यक असतं. मनाला गरज असते आधाराची! काहीवेळा हा आधार जवळची माणसं पुरवतात तर काही वेळा संगीत, निसर्ग ह्यांच्याकडं धाव घ्यावी लागते. संगीत, निसर्ग ह्यांच्याकडं धाव घेण्यात एक फायदा असतो, ही माध्यमं एखाद्या विशाल पाषाणासारखी अचल असतात. आपल्याकडं सातत्यानं सुखावह लहरी प्रक्षेपित करत राहण्याची क्षमता हे बाळगून असतात, आवश्यकता असते ती आपल्याला त्यांच्याशी संवादाचं माध्यम प्रस्थापित करता येण्याची!

हे सारं काही आज सकाळी काहीशा गोंधळलेल्या मनाला शांत करणाऱ्या यु ट्यूबवरील लताजींच्या मराठी गाण्यांच्या  मैफिलीला सर्मपित ! जुन्या गाण्यांचं एक खास असतं. त्यातील बहुतांश ओळी खूप अर्थपूर्ण असतात. शांतपणे ही गाणी ऐकत असताना ह्या ओळी, हे शब्द त्यांच्या अर्थासहित मनाला जाऊन भिडतात. कदाचित त्यात जीवनाचा व्यापक अर्थ भरलेला असतो. शांत मन ह्या ओळींचा आपल्या समजुतीप्रमाणं अर्थ लावतं, जगरहाटीमध्ये आपला गोंधळ एकट्याचाच नाही हे मनाला कदाचित उमगतं आणि मन एका नव्या जोमानं नवीन दिवसाला सामोरं जायला सज्ज होतं ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...