मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३ जानेवारी, २०२१

Have you been to Tristan da Cunha?

 


जगातील सर्वात दुर्गम किंवा बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन दुर असलेली अशी मानवी वसाहत कोणती असावी असा शोध माहितीजालावर ह्या आठवड्यात घेतला. असा शोध घेण्याचा विचार माझ्या मनात का यावा असा प्रश्न निरर्थक आहे. असा शोध घेतला असता Tristan da Cunha हे नाव पहिल्या पाच नावांत येतं. बाकीच्या वसाहतींपेक्षा ही वसाहत खास लक्षवेधक ठरली ती बाकीच्या मनुष्यवस्तीपासुन तिच्या असलेल्या दूरवर अंतरामुळं ! दक्षिण अटलांटिक महासागरात असलेलं हा ज्वालामुखीने निर्मित बेटांचा समुह आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन  शहरापासुन साधारणतः २३०० किमी अंतरावर, सेंट हेलेनपासून २१०० किमी अंतरावर आणि फॉकलँड बेटांपासून ३४०० किमी अंतरावर असणारा हे बेटांचा समुह ! आता फॉकलँड बेटं अर्जेंटिना आणि इंग्लंड ह्यांच्यात कधीकाळी झालेल्या युद्धामुळे माहिती आहेत, पण सेंट हेलेनचा संदर्भ कशासाठी तर ज्ञात मनुष्यवस्तीच्या कोणत्याही बिंदुपासुन हा बेटांचा समुह दूर आहे आणि तिथं गुण्यागोवींदाने मनुष्यवस्ती नांदत आहे ह्या साठी ! ह्या बेटांवर उतरण्यासाठी धावपट्टी अस्तित्वात नाही. त्यामुळं बाकीच्या पृथ्वीवासीयांशी संपर्क साधायचा असेल तर दक्षिण आफ्रिकेपासून सहा दिवसांच्या बोटीच्या प्रवासाव्यतिरिक्त पर्याय नाही. आणि लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे वर्षातुन केवळ नऊ वेळा ह्या बोटीच्या प्रवासाचा पर्याय उपलब्ध असतो. ह्या बेटांचा शोध कसा लागला आणि विविध शतकांमध्ये ह्या बेटाला धाडशी खलाशांनी कशी भेट दिली ह्याची मनोरंजक माहिती विकिपीडियावर उपलब्ध आहेच पण ह्या बेटांच्या वेबसाईटवर तुम्हांला इथल्या रहिवाशांविषयी, ह्या बेटांच्या समुहातील प्रत्येक बेटाविषयी, इथं कसं यायचं ह्या सर्वांची इत्यंभुत माहिती मिळु शकते. सध्याची लोकसंख्या २४४ आहे आणि बेटांवर नवीन रहिवाशांना कायम वास्तव्याचा पर्याय उपलब्ध नाही. एक पर्यटक म्हणुन तुमचं स्वागत नक्कीच आहे. पण ज्या बोटीनं आलात त्या बोटीनेच बहुदा परतावं लागतं. 

पोस्टचा खरा विषय वेगळाच आहे! अशा बेटांवर जगण्याचा अनुभव कसा असावा? जगाची सध्याची लोकसंख्या जवळपास ७८० कोटी. त्यातील फक्त २४४ लोकांपैकी आपण एक ही भावना कशी असावी? बाकीच्या ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपासुन आपण दुरावले गेलो आहोत. जगाची प्रगती किती वेगानं होतं आहे आणि आपण मात्र असेच ! आपली मुलंसुद्धा प्रगतीपासुन वंचित राहणार! मनोरंजनाची मोजकी साधने, एकमेव पब वगैरे वगैरे ! आता हा दृष्टिकोन (Point of View) खरोखरी तिथल्या लोकांचा की त्यांच्यापासुन हजारो मैलांवर जगातील सर्वांत गर्दीच्या मानल्या जाणाऱ्या शहरात आपलं बहुतांशी आयुष्य व्यतित करणाऱ्या आदित्यचा ? बहुदा केवळ आदित्यचा !

यु ट्युबवर ह्या बेटावरील एका तरुणाची मुलाखत पाहिली. ही बेटं इंग्लंडशी संलग्न! त्यामुळं बहुदा शिक्षणासाठी वगैरे ह्यातील काही तरुण मंडळी इंग्लंडला वगैरे जात असावी ! पण ह्या तरुणाला इंग्लंडमधील नियमांनी बांधलेलं जीवन आवडलं नव्हतं ! माझं स्वातंत्र्य मी तिथल्या वास्तव्यात गमावुन बसलो असा काहीसा त्याच्या बोलण्याचा सूर वाटला ! त्यानंतर  Tristan da Cunha  संबंधित काही व्हिडीओवरील टिपण्णी वाचल्या. भौतिकसुखाच्या मागे लागलेल्या त्या बहुतांशी ७७९ कोटी ९९ लाख ९९ हजार ७५६ लोकांपेक्षा ह्या शांत जीवन जगणाऱ्या २४४ लोकांपैकी एक बनायला मला आवडलं असतं असे बरेच लोक म्हणताहेत ! पण आता दोन आठवड्याच्या सुट्टीनंतर ज्या स्थितीत मी आहे त्यावरुन मला तरी Tristan da Cunha चे वास्तव्य जमलं नसतं असं वाटतंय. Tristan da Cunha जमायला तुम्ही बहुदा तिथंच जन्म घ्यायला हवा ! पुढील जन्म Tristan da Cunha वर होवो हे मागणं परमेश्वराकडे मागावं की नाही ह्याचा आज विचार करतोय !

मुलभूत गरजा पुर्ण झाल्यानंतर काही न करता जर माणसाला स्वस्थ बसता आलं तर मनुष्य बराच सुखी होऊ शकतो असं कधीतरी वाचलं होतं. हा काही न करता स्वस्थ बसु शकण्याचा  प्रत्येकाचा कालावधी वेगवेगळा असु शकतो. काही तास, काही दिवस, काही महिने, काही वर्षे आणि कदाचित पुर्ण आयुष्यभर ! ह्यात आपण काय कमावतो आणि काय गमावतो ? शेवटी हिशोब शुन्यच असतो ! 

प्रेम धवन ह्यांचं १९७० च्या पवित्र पापी चित्रपटातील गाणे ह्या निमित्तानं आठवलं. "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं बहुत दुर बहुत दूर चला !" त्यांना जर Tristan da Cunha माहिती असतं तर कदाचित त्यांनी "तेरी दुनिया से हो के मजबूर चला; मैं Tristan da Cunha चला !" अशी शब्दरचना केली असती ! आणि खट्याळ किशोरकुमार ह्यांनी तिला नक्कीच उचित न्याय दिला असता !

मंगळवार, २९ डिसेंबर, २०२०

अजिंक्य - एक संस्मरणीय विजय !

 


कोंडाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी, सूर्याजी ह्यांनी आपल्या जिवाभावाच्या मावळ्यांच्या साथीनं रात्रीच्या वेळी किल्ल्यावर हल्ला केला.  तानाजी आणि उदयभान ह्यांच्यात निकराची लढाई होऊन त्या दोघांचाही मृत्यू होतो. आपला सेनापतीच धारातीर्थी पडला हे पाहुन मावळे पळू लागतात. भावाच्या मृत्यूचं दुःख बाजुला सारुन सुर्याजी परतीचे दोर कापून टाकतो आणि मावळ्यांना सांगतो, "भित्र्यांनो पळता कुठे?  इथे तुमचा सेनापती मरून पडला आहे. मी परतीचे दोर कापले आहेत!" परतीचे सर्व मार्ग बंद झाले आहेत हे कळताच मावळे मोठ्या त्वेषाने शत्रूवर तुटून पडतात. मराठे लढाई जिंकतात आणि कोंढाणा मराठ्यांच्या ताब्यात येतो!

ऍडलेड येथे न भूतो न भविष्यती असा पराभव झाल्यावर भारतीय संघाची काहीशी अशीच परिस्थिती झाली होती. कर्णधार विराटला वैयक्तिक कारणामुळे  भारतात परतावे लागणार होते. शमी दुखापतग्रस्त झाल्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यासाठी उपलब्ध नसणार होता. अशावेळी अजिंक्य रहाणेच्या डोक्यावर कर्णधारपदाचा काटेरी मुकुट चढवण्यात आला. म्हणजे पहिल्या कसोटीनंतर आपल्याला कर्णधार बनावं लागेल हे त्याला ठाऊक होतं पण अशा परिस्थितीत कप्तानपदाची सूत्रं हाती घ्यावी लागतील ह्याची त्यानं बहुदा कल्पना केली नसावी ! 

१९ डिसेंबरला ज्यावेळी भारतीय संघ ३६धावांत गुंडाळला जाऊन हरला त्या संध्याकाळी भारतीय संघाच्या हॉटेलमधील वातावरणाची एक क्षणभर कल्पना करून पहा! आदल्या दिवशी सायंकाळी असलेली अत्यंत मोक्याची संधी आपण गमावली होती. ज्या पद्धतीने हॅझलवूड आणि कमिन्स यांनी भारतीय फलंदाजांचा फडशा पाडला होता त्यामुळे नक्कीच भारतीय फलंदाजांचा आत्मविश्वास रसातळाला गेला असणार. अशावेळी अजिंक्य राहणेच्या मनात कोणते विचार डोकावत असणार?

आज सामना जिंकल्यानंतर त्याला एक प्रश्न विचारण्यात आला, "या सामन्यासाठी खास काय तयारी केलीस? त्याचे उत्तर मार्मिक होतं! तो म्हणाला, "नियोजनासोबत एकंदरीत आपण कसे खेळतो आणि मैदानावर कोणती वृत्ती दाखवतो यावर बरंच काही अवलंबून असतं!" कालच्या पेपरात अजून एक पत्रकाराने त्याला विचारण्यात आलेला प्रश्न नमुद करण्यात आला होता.  "सल्ला घेण्यासाठी तु विराटला फोन केलेलास का?"  अजिंक्य त्यावर उत्तरला "हा  विराटसाठी आणि कुटुंबासाठी एक खास क्षण आहे! त्यात त्याला डिस्टर्ब करणं मी उचित समजत नाही !" त्या स्तंभकाराने म्हटलं होतं, " खरंतर त्या उत्तरात मी माझ्या पद्धतीने संघाचे नेतृत्व करीन!" असा मतितार्थ होता ! 

आता वळुयात या सामन्यात नक्की काय झालं त्याविषयी! कोणत्याही सामन्यात विजय मिळवायचा असेल तर तुमचं दैव तुमच्या बाजूस काही प्रमाणात असावं लागतं. नक्कीच ह्या सामन्यात ते भारताच्या बाजूने होतं. दैवाला त्याचं श्रेय देऊन झाल्यावर ज्या बऱ्याच जबाबदाऱ्या अजिंक्य आणि भारतीय संघाने उत्तम रितीनं पार पाडल्या त्याविषयी !
सर्वप्रथम संघातील बदल!  शुभमन गिल, रिषभ पंत, जडेजा आणि सिराज असे चार नवे खेळाडु संघात घेण्यात आले! 
शुभमन गिल - १९५ ला ऑस्ट्रेलियन संघ सर्वबाद झाल्यावर स्टार्कने पहिल्याच षटकात मयंक अग्रवालचा बळी घेतला. शुभमनने आपल्या ज्येष्ठ खेळाडूंना ३६ धावांत सर्वबाद होताना गेल्या आठवड्यात  तंबूतून पाहिलं होतं. आता मैदानात आल्यावर पहिल्याच षटकात मयंकला बाद होताना नॉन स्ट्रायकर एंडवरुन पाहिलं. सलामीचा कसोटी सामना तोही मेलबॉर्नसारख्या गौरवशाली परंपरा असलेल्या मैदानावर आणि समोर जोशाने गोलंदाजी करणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज! परंतु त्यानंतर त्यानं ज्या पद्धतीने पुजाराच्या साथीनं बाकीच्या तासभराचा खेळ खेळून काढला , त्यातही ज्याप्रकारे काही चौकार मारले ते भारतीय संघाच्या मनोबलात मोलाची भर पाडण्यात कारणीभुत होते! तुम्ही किती धावा करतात हे नक्कीच महत्त्वाचं पण त्यासोबत तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या धावा बनवता हे त्याहुन महत्वाचं ! मैदानावर त्या बावीस यार्डच्या खेळीपट्टीवर वातावरण असतं तिथं एखादा खणखणीत स्ट्रेट ड्राइव्ह फलंदाजाला फार मनोबल मिळवुन देतो! हीच खेळी त्यानं दुसऱ्या दिवशी काही काळ आणि आज विजयी धाव होईपर्यंत दाखवली, ती मोलाची होती! पहिल्या दिवशी सायंकाळी समजा भारतानं दोन- तीन बळी गमावले असते तर सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ जोमानं परतला असता. रिषभ पंत ; त्याने सामन्यात काही झेल सोडले खरे परंतु त्यानं अजिंक्य सोबत जी भागीदारी केली ती मोलाची होती. पुन्हा एकदा तुम्ही किती धावा करतात हे नक्कीच महत्त्वाचं पण त्यासोबत तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या धावा बनवता हे त्याहुन महत्वाचं ! पंतने एक सकारात्मक भुमिका आणली. 

जडेजा, पंड्या ह्या दोन्ही खेळाडुंकडे परंपरागत फलंदाज किंवा गोलंदाज यांच्या व्याख्येतून पाहिले असता त्यांना स्पेशालिस्ट म्हणून गणले जायला तज्ञ लोक सुरुवातीला तयार नव्हते किंबहुना आजही नसतील. परंतु आपण कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवु शकतो हा दुर्दम्य आशावाद त्यांच्या मनात ज्या प्रमाणात ठासुन भरला आहे ते अनन्यसाधारण आहे. गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्ध आपण हरलेला उपांत्य फेरीचा सामना आठवून पहा! तिथं आघाडीचे फलंदाज अत्यंत कमी धावांत बाद झाल्यानंतर ज्यापद्धतीने जडेजा खेळला होता ते कायमचे लक्षात राहील! ह्या सामन्यातील त्याची आणि अजिंक्यची भागीदारी केली तिनं सामन्याचा कल भारताच्या बाजूने मोठ्या प्रमाणात झुकवला. जाडेजाने काही मोलाचे बळी सुद्धा घेतले. 

मोहम्मद सिराज! खरंतर  भारतीय संघातील कमकुवत गोलंदाज म्हणून हा मानला जात होता परंतु त्याने आपल्या या मर्यादेत राहून ऑस्ट्रेलियाच्या मातब्बर खेळाडूंना बाद केलं! आता वळूयात ते अश्विन बुमराह यांच्या गोलंदाजीकडे! हल्ली एका प्रकारे आपण काही खेळाडूंवर विशिष्ट शिक्का मारून टाकतो! जसं की अश्विन फक्त भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवर खेळविण्याचा गोलंदाज!  परंतु या गुणी खेळाडुने ज्या पद्धतीने स्मिथला सतावले आहे त्यामुळे या भारतीय संघाच्या एक कायमची डोकेदुखी असलेल्या फलंदाजाचा आत्मविश्वास खूप कमी झाला आहे. आशा आहे की स्मिथला बाकीच्या मालिकाभर अश्विन आणि मंडळी असेच सतावत राहो! बुमराह यांच्याविषयी जितके प्रशंसोद्गार काढावे तितके कमी !  शमी दुखापतग्रस्त, ईशांत दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात येऊ न शकलेला आणि उमेश यादव दुसऱ्या डावाच्या पहिल्या काही षटकातच दुखापतग्रस्त झालेला! अशावेळी ह्या बुमराहने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बऱ्यापैकी जेरीस आणलं आहे. आपल्या गोलंदाजीवर झेल सोडला असतानासुद्धा जो गोलंदाज चेहऱ्यावर हसू राखू शकतो अशा मोजक्या गोलंदाजापैकी एक बुमराह!

आता शेवटी अजिंक्यकडे वळूयात! त्यांना ज्या पद्धतीने या सामन्यात नेतृत्व केले ते सदैव लक्षात राहीलच पण त्याची फलंदाजीसुद्धा अप्रतिम होती. रविवारी ज्यावेळी भारत फलंदाजी करत होता त्यावेळी ढगाळ वातावरण होते. फलंदाजीसाठी परिस्थिती पुर्णपणे अनुकूल नव्हती. परंतु अजिंक्य खेळपट्टीवर टिकून राहिला! जे काही करायचे आहे ते पहिल्या डावातच करायचे आहे हे त्याच्या मेंदूनं चांगलं नोंदून ठेवलं होते. त्यानं जे काही फटके मारले ते डोळ्यांचे पारणे फिटणारे होते. त्यानं एक केवळ चेंडूला थोपटत आहे असं भासवणारा असा जो स्ट्रेट ड्राईव्ह मारला तो मिडऑफच्या क्षेत्ररक्षकाला चकवून बघता बघता सीमारेषेच्या पलीकडे गेला. बॅकफुटवर जात पॉईंट आणि कव्हर  यामधून चेंडूला अलगद दिशा दाखवत मेलबॉर्नसारख्या मोठ्या मैदानाच्या सीमारेषेपर्यंत प्रेमानं ढकलून द्यायची कला तोच जाणे! त्यानं केलेले गोलंदाजीतील बदल हे देखील अभ्यासण्याजोगे होते.  उमेश यादव अनुपलब्ध असताना अश्विन आणि सिराज ह्यांना त्यानं आलटून-पालटून योग्य रीतीने वापरले. स्मिथसाठी सदैव लेग स्लीप ठेवून शेवटी त्याला त्या जाळ्यात पकडलं.  गावस्कर, सचिन, राहुल आणि अजिंक्य ह्या मंडळींच्या  स्ट्रेट ड्राईव्हचा ख्रिसमस सुट्टीत केकसोबत चहापान करताना आनंद लुटण्यातील मजा काही औरच ! तसंच काल त्यानं एक रिव्यू घेतला. ह्या अपीलविषयी यष्टीरक्षक पंत फारसा आत्मविश्वासपुर्ण वाटत नव्हता परंतु रहाणेच्या मनानं ठरवलं की हा रिव्यू घ्यायचाच. आणि अगदी निसटत्या आवाजाच्या धाग्यावर भारतानं हा बळी मिळवला ! कॉलेजातील सतीशशी काल परवा चॅट केली. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील कष्टानं पुढे आलेल्या मुलाला अथक परिश्रमानंतर योग्य अशी मान्यता मिळाल्याबद्दल आम्ही दोघांनी संतोष व्यक्त केला. 

आता वळूयात ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीकडे! काही वर्षांपुर्वी हेडन आणि स्लेटरची जोडी सलामीला यायची. कित्येक वेळा प्रथम फलंदाजी घेऊन हे दोघे, मधल्या फळीतील पॉन्टिंग, गिलख्रिस्ट मंडळी गोलंदाजांची मस्त पिटाई करायचे! त्यानंतर गोलंदाजीत मॅकग्रांथ, वॉर्न! हे होते Stalwarts (महान खेळाडु). त्यांचा दर्जा, आत्मविश्वास एका वेगळ्या पातळीवरचा असायचा. ह्या संघात ह्या दर्जाचे खेळाडु आहेत ते वॉर्नर, स्मिथ आणि स्टार्क! हॅझेलवूड आणि कमिन्सची वाटचाल त्या दिशेनं चालु आहे! ह्यातील वॉर्नर पहिले दोन सामने अनुपलब्ध होता. स्मिथ कधी नव्हे तो धावांसाठी झगडतोय. आणि स्टार्कच्या तंदुरुस्तीवर बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह असते! मला आपल्या संघाच्या कामगिरीतील श्रेय अजिबात कमी करायचं नाही, पण तिसऱ्या कसोटीत एकटा फिट असलेला वॉर्नर जरी परतला तरी चित्र पुर्णपणे वेगळं असणार ! आणि हो! म्हणायला गेलं तर मुंबई इंडियन्सचा कप्तान कदाचित भारतातर्फे खेळायला उपलब्ध होऊ शकतो! 

जाता जाता विराट आणि पृथ्वीविषयी दोन शब्द ! विराटला अजुनही बहुदा विलगीकरणात ठेवलं असल्यानं सकाळी पाच वाजता उठुन त्यानं चारही दिवस खेळ पाहिला असणार त्याविषयी शंका नाही! आता सामन्याचा बक्षीससमारंभ आटोपल्यावर अजिंक्य फ्रेश होऊन रूममध्ये बसल्यावर विराटनं नक्कीच त्याला फोन लावला असणार! त्या दोघांतील संवाद प्रत्येकानं आपापल्या कल्पनाशक्तीनुसार रचून कागदावर लिहावा, वाटल्यास सोशल मीडियावर प्रसिद्ध करावा ! पृथ्वी शॉ - दुखापतीनंतर परतल्यावर ह्या गुणी खेळाडूच्या बाजुनं म्हणावं असं काही घडत नाहीये! मध्येच वाचनात आलेल्या लेखात म्हटल्यानुसार ज्येष्ठ खेळाडूंचा सल्ला घेऊन आपल्या तंत्रातील उणिवा दुर करणे हाच एकमेव मार्ग आहे! 

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे! मालिकेतील पुढील दोन सामन्यांत काय घडणार ते देव जाणे ! पण आजचा क्षण मात्र अजिंक्य आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या विजिगीषु वृत्तीचा ! 

गुरुवार, २४ डिसेंबर, २०२०

स्वप्रतिमेशी संघर्ष !


सोशल मीडियावरील संघर्षाविषयी आज सकाळी एक सुंदर स्टेट्स वाचलं. दुसऱ्या कोणी आपल्याशी वादाचा पवित्रा घेतला म्हणुन लगेचच आपणही युद्धाची तयारी करायला नको. त्यांना शांततेनं जिंका ! 

ह्या स्टेट्सला आरंभबिंदु घेऊन आजची ही पोस्ट! भोवताली बऱ्याच प्रमाणात स्वप्रतिमेशी संघर्ष भरुन राहिला आहे की काय अशी परिस्थिती आहे! स्वप्रतिमेच्या अभ्यासात  असं जाणवतं की ह्यात दोन टप्प्यांचा समावेश होतो. बाह्यजगानं मान्य केलेली आपली प्रतिमा आणि त्या प्रतिमेत आपल्या स्वभावानुसार बदल करुन बनवलेलं स्वप्रतिमेचं रुप !

प्रत्येक मनुष्य जन्मतः एक स्वप्रतिमा बाळगुन असतो. ही झाली अनुवंशिकतेने लाभलेली स्वप्रतिमा ! बालपणीच्या काही वर्षात आईवडील, नातेवाईक ह्या स्वप्रतिमेला घडविण्यात हातभार लावतात.  ह्या वर्षात प्रत्यक्षातील प्रतिमा आणि ही घडविण्यात आलेली प्रतिमा ह्यात जितकं साधर्म्य तितकं भविष्यकाळाच्या दृष्टीनं उत्तम ! 

एका क्षणी हे बालक स्वप्रतिमेच्या परीक्षणास सुरुवात करते. व्यक्ती तितक्या प्रकृती ! काहींना आपलं हे स्वप्रतिमेचं मनात साकारलं गेलेलं रुप प्रथमक्षणी आणि आयुष्यभर बेहद आवडतं. अशी माणसं बऱ्यापैकी ठाम स्वभावाची असतात. स्वप्रतिमा परिपुर्ण आहे का वगैरे विचार करण्याच्या फंदात ते पडत नाहीत. ही माझी प्रतिमा आहे ना ! मग ती जशी आहे तशी मी स्वीकारणार अशी ह्यांची विचारधारणा असते ! स्वप्रतिमा स्वीकारलेली माणसं म्हणुयात यांना आपण ! ह्या विचारधारणेत समजुतदारपणाच्या ते बेफिकिरीच्या विविध छटा असतात. छटा कोणतीही असो पण हल्लीच्या जगात ही माणसं सुखी राहण्याची शक्यता जास्त असते. 

आता वळुयात ते स्वप्रतिमेशी संघर्ष करणाऱ्या माणसांकडं ! ह्यातही दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारातील लोक आपली जी काही स्वप्रतिमा जाणवत आहे त्याविषयी दुःख बाळगुन असतात. परंतु हे दुःख आपल्याकडेच ठेवण्याची त्यांची मनोवृत्ती असते. काहीशी संवेदनशील असतात ही माणसे! जमेल तसं आपल्यापरीनं ह्या प्रतिमेला शांततेनं बदलायचा  प्रयत्न करत राहतात ही माणसे! दुसऱ्या प्रकारातील माणसांचा संघर्ष मोठा क्लेशदायक  असतो; त्यांच्यासाठी आणि त्यांच्या भोवतालच्या लोकांसाठी ! त्यांचा हा संघर्ष बाह्यजगतासाठी दृश्यमान असतो. उदाहरणं अनेक आहेत. सध्या सोशल मीडिया खुपच intrusive (योग्य मराठी शब्द आगाऊ?) झाली आहे. फेसबुकचं उदाहरण घेवुयात ! आपण आपली प्रोफाईल पाहत असताना short videos नावाचा प्रकार उगाचच मध्ये येतो. त्यात लोकांचे आपल्याकडं लक्ष वेधुन घेण्यासाठी ज्या थराला काहीजण विशेषतः मुली जातात त्यावेळी केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी हे असले सवंग प्रकार करण्याची गरज आहे का हा प्रश्न पडतो! कदाचित ह्यातुन मोठया चित्रपटासाठी वाव मिळेल अशी आशा बाळगुन असतील. प्रतिमेचा संघर्ष सोशल मीडियावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही दिसत राहतो. ह्यात मोठ्या समूहानं आपल्याला स्वीकारलं पाहिजे ह्यासाठी आपण जे काही नाही आहोत ते रुप स्वीकारण्याचा प्रयत्न केला जातो. 

ह्यावर उपाय काय? आपण जसे आहोत तसंच आपल्याला स्वीकारावं ! बोलायला हे सोपं पण ही निर्वाणा स्थिती आहे जी कमी जणांना लाभु शकते. आपण जसं आहोत तसंच स्वतःला स्वीकारायचं म्हटलं म्हणजे काही वेळा एकट्यानं बराच वेळ व्यतित करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. पण जरी बाकीच्या लोकांशी आपण संपर्क कमी केला तरी प्राणी, पुस्तकं / ग्रंथ आणि निसर्ग ही अशी मंडळी आहेत जी तुम्हांला तुम्ही जसे आहात तसंच स्वीकारतात ! मग स्वप्रतिमेशी संघर्ष संपुष्टात येतो आणि लाभते एक नीरव शांतता!

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

पार्थेनियम गवत !

सध्या सुट्टीचे दिवस असल्यानं घराच्या अवतीभोवती फिरणं होतं. फिरणं म्हटलं की दोन चार झाडं झुडपं दिसतात. दोन चार झाडं झुडपं दिसली की आपसुक भ्रमणध्वनी उचलुन दोन चार छायाचित्रं काढली जातात ! दोन चार छायाचित्रं काढली गेली की ती फेसबुक आणि व्हाट्सअँप जाण्याव्यतिरिक्त पर्याय नसतो! असंच परवाच्या फोटोंबाबत झालं. वाडीतील गवताचे दोन चार फोटो चांगले आले, फेसबुकवर टाकले ! नेहमीप्रमाणं दोन चार लाईक झाले, दिवस सार्थकी झाल्यासारखा वाटला. 

रात्री अचानक एका चिकित्सक मित्राचा मेसेज आला. हा मित्र कोणत्या बाबतीत चिकित्सकपणा दाखवेल ह्याचा भरवसा नसतो! 

पहिला प्रश्न - "तुमच्याकडं देखील काँग्रेस आहे?" 

आता हा मित्र आणि मी एकाच लोकसभा, विधानसभा मतदारसंघात असल्याची मला पक्की खात्री ! बाकी महानगरपालिकेच्या वॉर्डाबाबत तो एकच असल्याची खात्री नाही ! त्यामुळं मी थोडा साशंक झालो. पण अचानक लक्ष गेलं ! त्यानं माझ्या स्टेटसला टॅग करुन प्रश्न विचारला होता ! 




आता डोक्यात प्रकाश पडला ! लहानपणी किर्लोस्कर मासिकात बहुदा ह्या काँग्रेस गवताविषयी मोठा लेख वाचला होता! ह्या मित्रानं त्या आठवणींना उजाळा दिला होता ! १९५० - ६० च्या दरम्यान भारतात अमेरिकेतुन गहु आयात केला होता. त्याकाळी भारतात हरितक्रांती झाली नसावी, त्यामुळं भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण नसावा. त्यामुळं दुष्काळाच्या वेळी हा मिलो गहू आयात करण्याची वेळ भारतावर आली. ह्या गव्हांच्या बोटींसोबत ह्या गवताच्या बिया अनाहुत पाहुण्यासारखा भारतात चंचुप्रवेश करता झाला आणि पाहतापाहता देशभर पसरला ! ह्या गवताचे शास्त्रीय नाव खरंतर वेगळं पण काँग्रेसच्या राजवटीत हे गवत भारतभर पसरलं म्हणुन आपल्या देशात त्याला काँग्रेस गवत हे नांव पडलं. 

हे गवत खुपच त्रासदायक आहे. एकदा पसरलं की बाकीच्या पिकांचा नाश करतं. प्रतिकुल परिस्थितीत सुद्धा सहजरित्या टिकाव धरतं. मित्रानं ह्या सर्व माहितीला उजाळा तर दिलाच पण अधिकच्या माहितीची लिंक सुद्धा पाठवली.  हे गवत सध्या हिवाळ्यातील दवावर जोमानं फोफावेल, उन्हाळ्यापर्यंत सहज टिकाव धरुन राहील. मित्र माहिती पुरवत होता. 

वाडीतील चित्र आठवुन त्याच्या म्हणण्याची पुरेपूर खात्री वाटत होती. वाडीचा बराचसा भाग ह्या गवताने व्यापुन टाकला होता. ऑक्टोबर महिन्यात भाग पुर्ण साफ करुनसुद्धा दोन महिन्यात हे गवत पुन्हा उगवलं होतं. 


फुलवाले गवत आहे त्याला काँग्रेस गवत म्हणतात. मला ही संकल्पना पुर्णपणे समजवावी ह्या हेतुने तो म्हणाला. आज थोडं ह्यावर फुरसतीने वाचन केलं तर ह्या गवताची उपद्रवता ध्यानात आली. एकदा ह्या गवताने तुमच्या शेतीत चंचुप्रवेश केला की त्याचा पुर्णपणे बिमोड करणे फार जिकिरीचं काम बनतं !



लहानपणी मी लावलेल्या सुबाभुळचीसुद्धा अचानक आठवण झाली. मोठ्या कौतुकानं आणलेलं हे सुबाभुळ अगदी वेगानं वाढलं आणि वर्ष - दोन वर्षात वाडीचा भाग त्यानं व्यापुन टाकला. शेवटी स्थानिक वृक्षच खरे आपल्यासाठी धार्जिणे ! 

बाकी परत काँग्रेस गवताकडं ! मित्रानं म्हटल्याप्रमाणं ह्याला फुलं येतात ! मेहनतीनं फोटो काढले तर सुंदरही येतात. 





आता भोळ्याभाबड्या फुलपाखरांना आपण कोणत्या गवतावर बसतो आहोत ह्याची पर्वा नसावी! त्यामुळं ती बिचारी ह्या गवतावर मोठ्या आनंदानं बसली होती! 



छान किती दिसते फुलपाखरु !
ह्या वेलीवर ,काँग्रेस गवतावर 
छान किती दिसते फुलपाखरु !!!

(तळटीप - संपुर्ण पोस्ट हे गवत काँग्रेस गवत आहे ह्या गृहितकावर आधारित आहे. ते गवत काँग्रेस गवत नसल्यास मी जबाबदार नाही !!  वाद नसावा  म्हणुन माहितीमायाजालावरुन काँग्रेस गवताचे शास्त्रीय नाव शोधुन पोस्टचे शीर्षक दिले आहे !)

सोमवार, २१ डिसेंबर, २०२०

माझे बुद्धिबळाचे प्रयोग !

सध्या मी Chess.com ह्या संकेतस्थळाचे सदस्यत्व पत्करले आहे. इथं एका वेळी तीन - चार लाख सदस्य ऑनलाईन असतात. दिवसाला लाखोंच्या संख्येनं सामने खेळले जातात. 


सध्या मी दहा मिनिटांच्या अवधीचे खेळ खेळतो. इथं आपण खेळण्याची इच्छा व्यक्त करण्याचा अवकाश की ही साईट आपणासाठी एक आपल्या तोडीचा एक प्रतिस्पर्धी निवडते आणि सामना सुरु होतो. सध्या माझा स्कोर १३०० आणि १४०० च्या मध्ये घुटमळतो आहे. त्यामुळं प्रतिस्पर्धी सुद्धा त्याच गुणवत्तेचे येतात. 

माझा खेळ सुधारावा म्हणुन मी सध्या बुद्धिबळाचे यु ट्यूबवर व्हिडिओ पाहत आहे. गुगलवर सर्च सुद्धा करत आहे. ह्यातुन समजलेल्या आणि बुद्धिबळाच्या काही मुलभूत संकल्पना ! 

Disclaimer - १३०० चे गुणांकन हे सरासरी खेळाडूचे गुणांकन मानलं जात असल्यानं ह्या खालील संकल्पना केवळ प्राथमिक माहिती  म्हणुनच वाचाव्यात !

१. बुद्धिबळात सुरुवातीच्या खेळीच्या काही विशिष्ट साचेबद्ध पद्धती असतात. त्यांना Standard Opening म्हणुन संबोधिले जाते. जगातील आघाडीच्या खेळाडुंनी अशा ह्या साचेबद्ध पद्धतीचा खुप खोलवर अभ्यास केलेला असतो. सुरुवातीच्या पंधरा  - वीस खेळी ह्या Standard Opening चा भाग असु शकतो. अशा वेळी हे दोन्ही खेळाडु प्रचंड वेगानं सुरुवातीच्या ह्या खेळी खेळतात. आता इथं दोन्ही खेळाडु त्या Standard Opening नुसार खेळत असणार हे अभिप्रेत असतं. इथं समजा एखाद्या नवख्या खेळाडूने एखादी वेगळीच खेळी केली तर अनुभवी खेळाडु त्या खेळीतील त्रुटीचा फायदा घेत त्या नवख्या खेळाडूला नामोहरम करु शकतो! 

२. सुरुवातीच्या काही खेळींमध्ये बुद्धिबळाच्या पटाच्या मध्यभागी असलेल्या चार घरांवर ताबा मिळविणे हे ध्येय असते. 


सुरुवातीला वजीर बाहेर काढण्याची पद्धत फारशी अवलंबली जात नाही. त्यामुळं राजा, वजीर  ह्यांच्या समोरील प्यादी, उंट आणि घोडे ह्यांच्या मदतीने ह्या चार घरांवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. Four Knight Opening ही ह्याच प्रकारात मोडणारी साचेबद्ध सुरुवात ! 



बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक घराला एक विशिष्ट नाव असते. डाव्या कोपऱ्यातुन उजवीकडे a,b,c,d,e,f,g,h अशी नावे दिली जातात. खालुन वर रांगांना १-२-३-४-५-६-७-८ अशी नावं दिली जातात. 

कधीतरी मान्यवर खेळाडु सुरुवातीच्या खेळांमध्ये आपल्या एका प्याद्याचा बळी देऊन नंतरच्या खेळासाठी अनुकूल जागा काबीज करण्याचा प्रयत्न करतात. त्याला Queen / King's Gambit असे संबोधिले जाते. 

केंद्रीय चार घरांवर ताबा मिळविण्यासाठीच्या खेळ्या खेळुन झाल्या की खेळाडु आपल्या हद्दीपलीकडील पुढील दोन रांगांवर आपल्या सोंगट्या हलविण्याचा किंवा आपल्या सोंगट्यांद्वारे त्या रांगांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करु लागतात. 

प्यादी हे बुद्धिबळातील महत्वाचं सोंगटे आहे. ह्या प्याद्यांनी रांग बनविली तर ती प्रतिस्पर्धी खेळाडूसाठी डोकेदुखी बनु शकते. 


बुद्धिबळाचे वेळेच्या बंधनानुसार वेगवेगळे प्रकार करण्यात आले आहेत.शीघ्रगतीच्या (रॅपिड चेस) बुद्धिबळाच्या खेळात तुम्हांला वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन झटापट खेळ्या खेळाव्या लागतात. इथं आघाडीचे खेळाडु मनातल्या मनात पुढील पाच सहा खेळ्यांचा विचार करु शकतात. इथं permutation and combinations प्रकार लक्षात घ्यावा लागतो. ह्या शक्यतांची वेगानं आणि अचुकतेनं विचार करण्याची तुमच्या मेंदुची क्षमता जितकी जास्त तितके तुम्ही चांगले खेळाडु असता !

प्याद्यांना १, उंट - घोड्यांना प्रत्येकी ३ गुण, हत्तीला ५ गुण, वजिराला नऊ गुण असे गुणमापन केले जाते. तरीही दोन हत्तीच्या बदल्यात वजीर देणे हा काही नेहमीच फायद्याचा सौदा असतोच असे नाही. बुद्धिबळाच्या खेळात आरंभीचा खेळ, मध्य सत्रातील खेळ आणि शेवटाचा खेळ अशा दृष्टीनं सुद्धा पाहिलं जाऊ शकते. वजीर ही अत्यंत महत्वाचे सोंगटी असल्यानं मध्य सत्रापर्यंत त्याला आपल्या अर्धभागात ठेवणं राजमान्य मानलं जात असावं. 

राजाला सुरक्षित ठेवणं हा बुद्धिबळाच्या खेळातील महत्वाचा हेतु! त्यामुळं किल्ला करणे ही एक खास खेळी बुद्धिबळात आहे. किल्ला करण्याआधी राजाने एकसुद्धा हालचाल केली नसावी. किल्ला हा पटाच्या दोन्ही बाजुंना करता येतो. जरी किल्ला करण्यानं राजा सुरक्षित होत असला तरी त्याच्यासमोरील प्याद्यांवर हल्ला करुन प्रतिस्पर्धी तुम्हांला बेजार करु शकतो. त्याप्रमाणं किल्ला केलेल्या राजासमोरील एकही प्यादं हलविले नसेल तर त्याच्या रांगेत येऊन हत्ती अथवा वजिराने शह दिल्यास चेकमेट होण्याची शक्यता असते ! 

घोडा हा अडीच घरे जातो. घोडा हे एकमेव सोंगटे असे आहे की त्याच्या खेळीला वजिराकडे पर्यायी उत्तर नसते. म्हणजे उंटाची तिरपी चाल, हत्तीची सरळ चाल, प्याद्याचे एक घर तिरपे आक्रमण ह्या सर्वांच्या कक्षेत वजीर आला तर तो प्रतिहल्ला चढवु शकतो. परंतु घोड्याची चाल वजीर प्रतिआक्रमणाने मोडु शकत नाही. सर्वात धोकादायक खेळी म्हणजे घोडा अशा घरात येणे जिथुन तो राजाला शह आणि वजिरावर आक्रमण करु शकतो. अशावेळी घोडयाला मारता आले नाही तर आपणास वजीर गमवावा लागतो. त्यामुळं घोडा मध्यरेषेच्या पलीकडे आला की त्यावर खास लक्ष ठेवले पाहिजे ! 

बाकी प्यादी एक एक घर पुढे सरकत अंतिम रेषेपर्यंत पोहोचली की तिचा वजीर, हत्ती, उंट, घोडा वगैरे करण्याची मुभा आपणास असते. त्यामुळं प्यादं सहाव्या रांगेत पोहोचले की त्यावर विशेष लक्ष द्यावे. 

एका रांगेत असलेले दोन हत्ती विशेष ताकदवान असु शकतात. ते समोरच्या वजिराला सुद्धा धमकी देऊ शकतात. खेळ ज्यावेळी शेवटच्या टप्प्यात पोहोचतो त्यावेळी प्रतिस्पर्धी चेकमेट होण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट सोंगट्या असाव्या लागतात. 

१) राजा + वजीर 

२) राजा +  हत्ती 

३) राजा + दोन उंट 

४) राजा + दोन घोडे 

ह्या सर्व प्रकारात स्टेलमेट नावाचा सुद्धा एक प्रकार असतो. राजाला शह दिला नसताना सुद्धा जर त्याला हलण्यासाठी घर उपलब्ध नसेल तर स्टेलमेट होतो. आपली नाजुक परिस्थती असताना स्टेलमेट करुन घेणे ही कौशल्याची बाब आहे. 

बुद्धिबळ का खेळावं? विविध शक्यतांचा वेगानं अभ्यास करुन त्यातील योग्य शक्यता ओळखता येण्यासाठी, एकाग्रता वाढविण्यासाठी नक्कीच ह्या खेळाचा उपयोग होतो. तणावाखाली सुद्धा समतोल बुद्धीनं विचार करण्याची सवय होण्यास मदत होते. ह्या पोस्टमध्ये आधी आपण स्टॅंडर्ड ओपनिंग्स हा प्रकार पाहिला. ह्यात तुम्हांला ह्या खेळ्या लक्षात ठेवाव्या लागतातच परंतु प्रतिस्पर्धी खेळाडूने जर त्यात एखादा बदल घडवुन आणला तर त्यालाही प्रतिखेळी तात्काळ शोधता यायला हवी !

आता माझं chess.com मधील भविष्य काय? गेल्या आठवड्यात मी ही साईट जॉईन केली. सुरुवातीला १२०० - १३०० गटातील खेळाडूंचा मुकाबला करणे सोपं गेलं. पण आता १३०० - १४०० गटातील खेळाडु खुप तयारीनिशी येत आहेत. ह्यात एक शक्यता अशी आहे की प्रत्येक सामन्यातील चुका जर का मी लक्षात ठेऊ शकलो तर मी पुढे जाईन ! नाहीतर .... 

© आदित्य पाटील 

(प्रतिमा माहितीआंतरजालावरुन साभार !)

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

आयुर्वेदिक तेल - पुर्वतयारी














सालाबादप्रमाणे होणाऱ्या व्यवस्थापकीय मंडळींच्या चिंतन सोहळ्याला यंदा करोनाच्या कृपेने घरुन हजेरी लावली. भारतातील तीन शहरे आणि अमेरिकेतील तीन भिन्न टाईम झोन मधील मंडळी उपस्थित होती. ह्या व्हर्च्युअल सोहळ्यामुळं काही अधिक गोष्टींसाठी नियोजन करावं लागलं.  पाच दिवसांत साधारणतः ३० जणांनी आपल्या प्रेसेंटेशनचे  झुमवर सादरीकरण केले. जवळपास शंभर मंडळी आपल्या प्रेसेंटेशनवर लक्ष ठेवून असताना समजा अचानक आपल्या इंटरनेट पुरवठादाराला कंटाळा आला व  काहीशी गंमत करावी वाटली तर आपलं इंटरनेट जोडणी गटांगळ्या खाणार आणि आपण झुमवर स्तब्ध आणि निशब्द होणार!  मग अशावेळी दोन तीन सेकंदात आपल्या साथीदाराने लगेचच आपण बोलत असतो तो दुवा घेऊन लगेच बोलायला सुरुवात करायला हवी ! वगैरे वगैरे ! 

काही गोष्टी चांगल्या सुद्धा झाल्या.  उगाचच खाण्याचा अतिरेक टळला. सहकाऱ्यांना सोबत म्हणुन आपण कोकचे ग्लासच्या ग्लास रिचवतो तेही टळले. प्रेसेंटेशननंतर प्रत्येक टेबलवर खोल उडी (Deep Dive) म्हणुन जे चर्चासत्र असतं त्यात वेळेचे बंधन पाळायला फार कठीण ! पण झुमच्या ब्रेकआऊट विंडोंना लोकांच्या उच्चपदाची वगैरे काही चिंता नव्हती. त्यामुळं ठरलेल्या मिनिटाला कोणीही कितीही तावातावाने बोलत असो, लोकांना मुख्य रूममध्ये परत आणुन सोडलं जात होतं. 

ह्या सगळ्याचा साईड इफेक्ट घरी झाला. घरचे वातावरण मी अगदी गंभीर करुन टाकले. सर्वांना मोठ्यानं बोलायला वगैरे बंदी घालण्यात आली. कर्फ्युच लावला म्हणा ना ! पण जसजसा आठवडा पुढे सरकु लागला तसतसा घरच्या सदस्यांचा संयम ढळु लागला. तुझं तु बघुन घे वगैरे संवाद होतील की काय अशी शंका निर्माण झाली. शेवटी एकदाचा शुक्रवार उजाडला आणि मावळला देखील ! परिसंवादाची यशस्वी सांगता झाली. आता सर्वासमोर होताना सांगता यशस्वीच होते. खरं काय ते नंतर सविस्तर कळेलच ! 

शुक्रवार संपला तसं आठवडाभरातील कृत्यांचा जाब देण्याची वेळ आली.  Quality Time, Team Building activity वगैरे शब्दांचा वर्ड क्लाऊड माझ्याभोवती काल रात्रीपासुन पिंगा घालु लागला. सुरुवात मुलानं केली. तो सध्या ऑनलाईन बुद्धिबळ खेळतोय. काही स्टँडर्ड खेळींचा अभ्यास वगैरे करतोय. बऱ्याच दिवसांनी त्याच्याशी खेळत होतो. त्यानं कोणत्या तरी चांगल्या सुरुवातीचा अवलंब केला. पण चौथ्या पाचव्या खेळीत मी पुर्णपणे अनपेक्षित खेळी केली. तोच प्रकार मी पुढील काही खेळीत केला! तो खूप वैतागला! "बाबा हे बरोबर नाही ! ते कसे स्टॅंडर्ड खेळीच खेळतात ?" ! "अरे पण मला त्या स्टॅंडर्ड वगैरे काय म्हणतात त्या खेळी माहीतच नाहीत ! मग?" मी म्हणालो. त्या वैतागानेच बहुतेक तो हरला. Quality Time मधला Quality वर्ड क्लाऊड मधुन अंधुक होत गायब झाला. 

आज सकाळी Team Building activity घोषित करण्यात आली! आपण आयुर्वेदिक तेल बनवुयात असे घोषित करण्यात आले. तसं काहीतरी वेगळा प्रयोग होणार आहे ह्याची चाहुल काल बाजारात जाताना १०० ग्राम कलौंजी आणा असं सांगितलं त्यावेळीच लागली होती. हल्ली नवीन मराठी / हिंदी शब्द माहिती होण्याची वेळ क्वचित येते ! काल ती कलौंजीने आणली !

आयुर्वेदिक तेल बनविण्यासाठी लागणारी कच्ची सामुग्री !

मोहरी 

मेथी दाणे 

लवंग 

आवळा 

कांदा (खिसलेला)

मेंदीची पाने 

जास्वंदीची पाने 

जास्वंदीची फुले 

तुळशीची पाने 

ब्राह्मि 

माका 

कडीपत्ता 

दुर्वा 

ह्यातील जास्वंदीच्या पानांपासून पुढील गोष्टी गोळा करण्याचा Team Building Activity मध्ये समावेश करण्यात आला होता. जास्वंदीची पाने, फुले, कडीपत्ता आणि दुर्वा ओळखायला सोप्या! पण ब्राह्मी, माका ह्यांनी जरा मेहनत करायला लावली! शनिवार सकाळ असल्यानं ओ माकारीना गाणे सुद्धा आठवलं. पण सर्व गोष्टी एकत्र झाल्यावर त्यांचे एकत्रित दर्शन डोळ्याला सुखावुन गेले! 

कच्ची सामुग्री गोळा करुन देण्यापुरता माझा Team Building Activity मधील सहभाग मर्यादित होता असं गृहीतक मी केलं आहे! जर पुढील काही दिवसांत  आयुर्वेदिक तेल - एक प्रयोगशाळा अशी पोस्ट आली तर हे गृहीतक चुकीचं होतं हे सुज्ञांनी समजुन जावं !


शनिवार, २१ नोव्हेंबर, २०२०

Ecosystem - परिसंस्था


 

भुतलावरील प्रत्येक व्यक्ती ही जगाची, देशाची, राज्याची, कंपनीची, सोसायटीची आणि तत्सम मानवनिर्मित प्रत्यक्ष वा आभासी सीमारेषांची अथवा गटांची सदस्य असते. ह्या प्रत्येक गटात समाविष्ट झाल्यावर ही व्यक्ती त्या गटाच्या संस्कृतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत राहते. ह्या सर्व प्रकाराकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातुन पाहणारी ही आजची पोस्ट ! 

ह्या पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्क्रांती गेले कोट्यवधी वर्षी होत आहे. ह्या  प्रक्रियेमध्ये विविध जीव वेगवेगळ्या स्वरुपात भुतलावर अवतीर्ण झाले. त्यातील काही जीवांनी भोवतालच्या वातावरणातील बदलाला यशस्वीरीत्या तोंड दिले, तर काहींना ही बाब जमली नाही. डायनासॉरसारखे काही जीव परिसंस्थेच्या जीवनकालातील काही काळ बाकीच्या जीवांवर वर्चस्व गाजवु शकले, पण कालांतरानं झालेल्या बदलाला तोंड देता न आल्यानं नष्ट झाले. 

हे झाले एक दृश्य उदाहरण. पण आपल्याभोवती अशा अनेक परिसंस्था अदृश्य स्वरुपात अस्तित्वात असतात. आपण ह्या परिसंस्थेतील प्रभावशाली घटकांना एकतर ओळखण्यात कमी पडतो किंवा त्यांच्याशी कशा प्रकारे वागावं ह्याचा शास्त्रीय दृष्टीनं विचार करुन ते प्रत्यक्षात अंमलात आणण्यात कमी पडतो. अशा काही परिसंस्थेच्या उदाहरणांकडे वळण्याआधी आपण परिसंस्थेत अस्तित्वात असणाऱ्या प्रत्येक सदस्याच्या स्थानाविषयी बोलुयात. 

परिसंस्थेत एखादी सदस्या  ज्यावेळी प्रवेश करतो त्यावेळी तिला जी भुमिका दिली गेली असते त्या भूमिकेनुसार परिसंस्थेवर प्रभाव टाकण्याची  एक विशिष्ट क्षमता प्रदान केली गेली असते. विशिष्ट भुमिकेत राहुन परिसंस्थेवर प्रभाव टाकण्याची एक मर्यादा असते. ह्या मर्यादेपलीकडे प्रभाव टाकण्यासाठी सदस्याला वेगळ्या भुमिकेत शिरावं लागतं. वेगळ्या भुमिकेत स्वतःच्या  इच्छेनुसार हवं तेव्हा शिरता येत नाही. परिसंस्थेने प्रभावी भुमिकेत शिरकाव करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे घालुन दिली असतात. ह्या मार्गदर्शक तत्वानुसार विशिष्ट प्रभावी भुमिकेत शिरण्यासाठी आपण बाकी इच्छुकांपेक्षा अधिक पात्र आहोत हे त्या परिसंस्थेतील निर्णय घेणाऱ्या पंचमंडळींना प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मार्गानं पटवुन देण्याची जबाबदारी आपली असते. 

वरील परिच्छेदाचे महत्व काय हे समजुन घेण्यासाठी आपण विशिष्ट उदाहरण पाहुयात! एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील एका विशिष्ट कंपनीत काम करणारा कर्मचारी त्या कंपनीतील एका विशिष्ट विभागात बनल्या गेलेल्या परिसंस्थेचा घटक असतो. काही कर्मचाऱ्यांना आपलं जे काही स्थान आहे ते फक्त टिकवुन ठेवण्यात रस असतो. जोवर बाह्य घटक ह्या परिसंस्थेच्या समीकरणांवर घातक हल्ला चढवत नाहीत तोवर ह्या कर्मचाऱ्यांचे आयुष्य स्थिर चालु शकते. मंदीसारख्या बाह्य घटकांमध्ये ह्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात खळबळ माजविण्याची क्षमता असते. 

कंपनीत काही जणांना प्रगतीच्या शिड्या वेगाने चढुन जायची इच्छा असते. इथं त्यांना परिसंस्थेच्या समीकरणांचे खोलवर ज्ञान असणे आवश्यक असते. कोणत्याही यशस्वी कंपनीमध्ये वरिष्ठ पदांवरील व्यक्तींना आपलं स्थान टिकविण्यासाठी सातत्यानं उत्कृष्ट कामगिरीची आवश्यकता भासते. उत्कृष्ट कामगिरीच्या व्याख्या वेगानं बदलत राहतात. त्यामुळं ह्यातील काही वरिष्ठ पदांवरील व्यक्ती त्या स्थानांवरुन बाहेर फेकल्या जातात आणि कनिष्ठ पदातील व्यक्तीला ह्या स्थानावर जाण्याची संधी मिळु शकते. बऱ्याच वेळा अशी घटना ह्या कनिष्ठ व्यक्तीच्या ध्यानीमनी नसताना घडु शकते. त्यामुळं आपण आपल्या कामगिरीद्वारे, आचरणातून परिसंस्थेकडे सातत्यानं योग्य संदेश पाठवत आहोत ह्याचं भान राखणं आवश्यक असतं. 

काही परिसंस्थेतील समीकरणं by default एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेले कौशल्य, त्या व्यक्तीची देहबोली ह्यासाठी अनुकूल असतात. त्या परिसंस्थेत ही व्यक्ती लवकर स्थिरावते, तिची वाढ जोमानं होते. तर काही वेळा ही समीकरणं प्रतिकुल असतात. मग व्यक्तीची चिडचिड होण्याची शक्यता निर्माण होते. एखाद्या परिसंस्थेत आपण स्वीकारलो गेलो आहोत की नाही ह्याचे पुरेसे संदेश परिसंस्था आपल्याकडं पाठवत राहते. हे संदेश आपल्यासाठी आहेत आणि त्यांचा नक्की अर्थ काय हे जाणुन घेण्याची परिपक्वता आपणाकडे हवी. काही जणांना हे अजिबात समजत नाही. अशावेळी अशी माणसं सदैव चिडचिड करत राहतात; पर्यायानं स्वतःचा  आणि परिसंस्थेचा वेळ घालवितात, नुकसान करतात. 

परिसंस्थेतील संघर्षाच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपल्यासाठी अनुकूल दुसऱ्या परिसंस्थेचा शोध घेणं इष्ट असतं. परंतु सद्य परिसंस्थेपेक्षा अधिक योग्य नवीन परिसंस्था शोधणं आणि तिथं स्थिरावणं हे कष्टदायी काम असतं, त्यात अनिश्चितता बऱ्याच मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळं बरेच लोक ह्या धोक्याला सामोरे जाण्यास तयार होत नाहीत. पण मग ह्या जाणीवपुर्वक निर्णयानंतर स्वतःची आणि भोवतालच्या लोकांची कमीतकमी चिडचिड व्हावी इतका तरी प्रयत्न करावा. 

कंपनीतील आयुष्य हे परिसंस्थेचे केवळ एक उदाहरण! लग्नानंतर मोठ्या एकत्र कुटुंबात प्रवेश करणारी सुन, मोठ्या सोसायटीच्या व्हाट्सअँप ग्रुपवर प्रवेश करणारा सदस्य अशी अनेक उदाहरणे आहेत जिथं परिसंस्थेची संकल्पना लागु पडते! 

जाता जाता आहिस्ता आहिस्ता ह्या चित्रपटातील निदा फाजली आणि खय्याम ह्या गुणवान जोडगोळीची ही संरचना ! 

कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता 

कहीं जमीं तो कहीं आसमा नहीं मिलता !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...