मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

The Sun Does Shine


 

ऍंथोनी रे हिंटन ह्या गृहस्थाचं हे आत्मचरित्र. आपण न केलेल्या खुनाच्या आरोपाखाली आयुष्यातील तीस वर्षे तुरुंगात व्यतित करताना आयुष्यातील अनमोल असं सारं काही गमावल्याची खंत जरी ह्या पुस्तकातुन सतत जाणवत असली तरी आपण निर्दोष असल्याची जाणीव लेखकाला सतत लढा देण्याची जिद्द देते. १९८५ साली वयाच्या एकोणतिसाव्या वर्षी तुरुंगात गेलेला रे २०१५ साली एकोणसाठाव्या वर्षी मुक्त होतो ! 

रे चे बालपण अमेरिकेतील अलाबामा राज्यातील ग्रामीण भागात गेलं. श्वेतवर्णीयांचे बाहुल्य असलेल्या ह्या भागात एका गरीब कृष्णवर्णीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. द्रारिद्र्य पाचवीला पुजलं म्हणावं अशी परिस्थिती ! खाणीत काम करणाऱ्या वडिलांचा तिथल्याच  एका अपघातात मृत्यू झाल्यावर साऱ्या भावंडाना वाढविण्याची जबाबदारी आई घेते. आईनं दिलेल्या संस्कारांची वर्णनं आणि त्यांनी रे ला इतक्या काठिण्यपुर्ण काळात दिलेल्या मानसिक बलाचे संदर्भ पुस्तकात येत राहतात. 

श्वेतवर्णीयांचं बाहुल्य असलेल्या अमेरिकेच्या ग्रामीण भागात कृष्णवर्णीयांना कसं संघर्षपुर्ण जीवन जगावं लागत असायचं किंबहुना अजुनही जगावं लागतं असेल ह्याची कल्पना सुरुवातीच्या प्रकरणांतून येते. अमेरिका हा भौगोलिकदृष्टया प्रचंड मोठा देश ! कार नसल्यावर इथलं जीवन प्रचंड कठीण! अशा वेळी दूरवर असलेल्या शाळेमध्ये रे आणि त्याचा धाकटा भाऊ चालत जात असत. चालत जाताना - येताना निर्मनुष्य भाग आला आणि एखादी कार रस्त्यानं येताना दिसली की त्या चालकाच्या नजरेस आपण पडु नये ह्याची त्यांना जी धडपड करावी लागायची ते वाचुन अंगावर काटा येतो ! कारण काय तर चालक जर डोकेफिरु निघाला तर जीवावर बेतण्याची पाळी यायची ! रे हा बेसबॉलचा तरबेज खेळाडु, परंतु एका सामन्यात होम रन करताना त्याच्या आईसमोर संपुर्ण स्टेडियमनं निगर म्हणुन त्याला संबोधिल्याचं आणि सामना जिंकुनसुद्धा मनातुन पराभव बाळगावं लागण्याचं शल्य रेच्या पदरी येतं. त्याची आई त्याला सदैव श्वेत लोकांशी कसं काळजीपुर्वक वागावं, त्यांच्या अपमानास्पद बोलण्यानं संतापुन न जाता मनावर कसा संयम ठेवायचा ह्याचं शिक्षण देत राहते ! 

शाळेनंतर खाणीतील नोकरी स्वीकारण्याची पाळी रे वर येते. खाणीत ज्यांनी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत त्या कामगारांच्या ढासळलेल्या तब्येती तो आपल्या डोळ्यांनी पाहत असतो! अंधाऱ्या खाणीत असुरक्षित वातावरणात काम करताना ज्या भयावह स्थितीचा सामना करावा लागतो त्याचं वर्णन लेखकानं अत्यंत तंतोतंत केलं आहे. ह्या अंधारातील श्रीमंतीपेक्षा उजेडातील गरिबी मी स्वीकारीन असं म्हणत रे ही नोकरी सोडुन देतो ! 

तारुण्याच्या भरात रे कडुन काही चुका होतात. भावंडं उज्ज्वल भवितव्याच्या शोधात रे आणि आईला सोडुन वेगवेगळ्या ठिकाणी जातात. त्याआधी बऱ्याच तरुणींच्या सोबत त्याची मैत्रीही होते. त्यात एकाच वेळी त्यानं  मैत्री जोडलेल्या बहिणी आणि त्यापायी त्यातील छोट्या बहिणीशी मैत्री जोडण्यास इच्छुक असलेल्या तरुणाशी त्यानं पत्करलेल्या वैमनस्याचा उल्लेख येतो. कारशिवाय आईचं काठिण्यपुर्ण जीवन पाहता न आल्यानं रे कारची चोरी करतो आणि काही काळानं पकडला जातो.  रे ला आपली चुक उमजते. आईला आणि आपल्या जवळच्या मित्राला पुन्हा अशी चुक न करण्याचं आश्वासनसुद्धा तो देतो!

ह्या काळात सिल्विया नावाच्या तरुणीशी त्याची मैत्री जुळते. आणि तिच्यासोबत आयुष्य व्यतित करण्याची स्वप्नं तो पाहु लागतो. एका गॅरेजमध्ये त्याच्या रात्रपाळीची नोकरी सुरु होते. त्या कालावधीत त्या शहरात दोन खुन होतात आणि तिसऱ्या खुनाचा अयशस्वी प्रयत्न होतो. पोलीस आपल्या चौकशीचे सत्र सुरु ठेवतात. वाचलेला व्यवस्थापक आपल्यावर हल्ला करणाऱ्या युवकाचे वर्णन करतो. छोट्या बहिणीच्या प्रेमात रे ने ज्याच्याशी वैमनस्य पत्करलेलं असतं तो सूडानं पेटलेला युवक ह्या वर्णनाशी मिळताजुळता असा युवक मला माहिती आहे हे पोलिसांना सांगतो. त्यानंतर सुरु होते ती रे ची तीस वर्षांची स्वतःला निर्दोष शाबित करण्याची धडपड ! 

ज्या दिवशी तिसऱ्या खुनाचा प्रयत्न झाला त्यावेळी खरंतर रे आपल्या रात्रपाळीच्या कामावर असतो. ज्या गोळ्यांनी आधीचे खुन झालेले असतात त्या गोळ्या आणि रे च्या आईचे पंचवीस वर्षांपूर्वीचे पिस्तुल ह्याची खरंतर संगती लागत नसते. परंतु केवळ पोलिसांकडे उपलब्ध कारचोरीचं रेकॉर्ड आणि खऱ्याखुऱ्या गुन्हेगाराच्या वर्णनाशी असलेलं रे चे काहीसं साधर्म्य हे घटक त्याच्या विरुद्ध जातात. त्यानंतर पुस्तकात सामोरा येत राहतो तो अमेरिकेतील न्यायव्यवस्थेचा अस्तित्वात असलेला एक अदृश्य भेसुर चेहरा ! रे ने पॉलीग्राफ परिक्षेतुन सिद्ध केलेलं स्वतःचं निर्दोषित्व यंत्रणा पुर्णपणे झाकुन टाकते. रे ला देण्यात आलेला सरकारी वकील आपण १५०० डॉलर्स न्याहारीवर खर्च करतो असं उघडपणे सांगतो. तू निर्दोषी असशीलसुद्धा, पण तू नाही तर दुसरा कोणी कृष्णवर्णीय युवक आम्ही शोधला असता असं त्याला उघडपणे सांगण्यात येतं !

रे ची रवानगी ज्यांना देहांताची शिक्षा झाली आहे अशा कैद्यांच्या सोबत दुसऱ्या तुरुंगात होते ! इथं आपल्या कैदेचा बराचसा कालावधी रे घालवतो! सकाळी ३ वाजता नाश्ता, दहा वाजता दुपारचं जेवण आणि दुपारी २ वाजता रात्रीचं जेवण असा दिनक्रम असतो. त्याच्या खोलीपासुन काही मीटर अंतरावर विद्युतखुर्चीत देहांत देण्याची व्यवस्था असणारा कक्ष असतो. ज्यांची देहांताची तारीख पक्की झाली आहे अशा कैद्यांना १ महिना आधी पुर्वसुचना देण्यात येते. त्यानंतर त्या कैद्यांच्या होणाऱ्या मनःस्थितीचं वर्णन वाचुन मन उद्विग्न होते. प्रत्येक शिक्षेनंतर वातावरणात जो एक दर्प भरुन राहतो तो सहन करणं सर्वांना फार कठीण जातं ! ज्यावेळी कैद्याला प्रत्यक्ष देहांतशिक्षेसाठी घेऊन जातात त्यावेळी बाकीच्या कैद्यांना त्याचा सुगावा लागतो. मग संपुर्ण तुरुंग बाकी कैद्यांनी भिंतीवर, गजांवर हात, ताटल्या वाजवुन केलेल्या उच्चरवाने भरुन जातो! तु एकटा नाहीयेस आम्ही तुझ्या सोबत आहोत हाच ह्या कैद्यांनी आपल्या सोबत्याला दिलेला शेवटचा संदेश असतो ! कसा क्षण असेल हा ! 

बराच काळ रे ह्या देहांताच्या शिक्षेच्या सीमारेषेवर  हिंदकोळे घेत असतो. केवळ काही मीटर अंतरावर अनुभवलेल्या आपल्या अशा अनेक सहकाऱ्यांच्या मृत्युच्या वेळी पुढचा नंबर आपला असु शकतो हे कायमचं भय जाणवत राहतं. अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या मनाचे स्थैर्य शाबुत ठेवण्यात  तो यशस्वी होतो. 

एका काळानंतर सरकारी वकील रे ची बाजु मांडायची असेल तर १५००० डॉलर्सची मागणी करतो. रे च्या आईनं आपलं घर गहाण टाकुन ही रक्कम उभी करावी असं सुचवतो. रे त्यास स्पष्ट नकार देतो ! अशा वेळी मग ब्रायन स्टीवन्सन नावाचा ऍटर्नी आणि त्याची संस्था त्याच्या पाठीशी उभी राहते ! रे च्या अंधारमय आयुष्यात आशेचा किरण येतो ! योग्य पुरावे गोळा करुन रे चे निर्दोषित्व सिद्ध केलं जाते ! तरीही मग बराच काळ सर्व सोपस्कार पार करत तीस वर्षांनी रे एकदाचा मुक्त होतो! 

खरंतर सुरुवातीच्या काही प्रकरणानंतर मी हे पुस्तक पुर्ण वाचलं नाही. हळुहळू वाचीन ! मी हे पुस्तक वाचायला का घेतलं? आयुष्याकडं बघण्याचा एक पुर्ण नवीन दृष्टिकोन हे पुस्तक देतं. संपुर्ण यंत्रणा एकत्र येऊन आपल्याविरुद्ध कसं धडधडीत षडयंत्र रचु शकते आणि एका उभारु लागलेल्या जीवनाला कसं नष्ट करु शकते ह्याचा अनुभव आपल्याला ह्या पुस्तकातुन येतो !  आपण किती साध्या गोष्टींनी निराश होतो, आपल्याजवळ असलेलं स्वातंत्र्य, असलेल्या किती छोट्यामोठ्या गोष्टी ह्याचं आपल्याला कधीच महत्व कळत नाही ! पुस्तकात एक वाक्य आहे - स्वातंत्र्याचं  खरं महत्व आपल्याला ते गमावल्यानंतर कळतं!

२०१५ साली सुटलेला रे आता आपलं आयुष्य पुन्हा उभारु पाहतोय ! एक यशस्वी वक्ता म्हणुन गणला जाऊ लागला आहे ! Hats off to you Anthony Ray Hinton! 

सोमवार, ७ सप्टेंबर, २०२०

दो आँखें बारह हाथ आणि शांताराम

शनिवारी रात्री लोकसभा वाहिनीवर दो आँखें बारह हाथ हा १९५७ सालचा व्ही. शांताराम यांचा गाजलेला चित्रपट पाहण्याचा योग आला. ह्यात योग येण्यासारखं काही विशेष असले प्रश्न मनात उपस्थित होऊन देऊ नकात ! हा चित्रपट तज्ञ मंडळींसोबत पाहत असल्यानं काही वेगळी माहिती सुद्धा मिळाली, त्यामुळं चित्रपटाची लज्जत अजुनच वाढली! 

चित्रपटाचं शीर्षक "दो आँखें बारह हाथ" च का ह्यावर मिनिटभर चर्चा झाली! मोठ्या आईनं हा चित्रपट १९५७ साली पाहिला असल्यानं ह्या चित्रपटातील अट्टल गुन्हेगारांची संख्या किती ह्याबाबतीत तिच्या मनात क्षणभर संभ्रम निर्माण झाला. पण मग बारह हाथ वरुन गुन्हेगार सहाच असावेत असा निष्कर्ष तिनं काढला ! माझं मन क्षणभर कार्यालयीन कामकाजात गेलं. शांताराम व्यवस्थापक आणि सहाजण  म्हणजे प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी ! पण व्यवस्थापकानं केवळ डोळयांची भुमिका बजावता कामा नये त्यानं Hands-on असायला हवं ! त्याला प्रोग्रॅमिंग सुद्धा करता यायला हवं. हा विचार मनात आलाच होता.  पण चित्रपटात नंतर शांताराम प्रत्यक्ष स्वतः कामासाठी ह्या सहाजणांसोबत उतरतो. त्यावेळी चित्रपटाचं शीर्षक दो आँखें चौदा हाथ असायला हवं होतं असा मनात विचार आलाच !

ह्या सहा बेरड गुन्हेगारांच्या मानसिकेत बदल घडविण्याचा निर्धार व्ही. शांताराम आपल्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त करतात. आपल्या अधिकाऱ्यांचं मनपरिवर्तन करुन त्यांची परवानगी घेऊन एका ओसाड भागात ह्या सहा जणांना घेऊन येतात. मग सुरु होतो तो एक मोठा प्रवास ! ह्या गुन्हेगारांच्या सवयी सहजासहजी बदलणाऱ्या नसतात! परंतु माझा तुमच्यावर विश्वास आहे हे वेळोवेळी शांताराम त्यांना जाणवुन देत राहतात. कुठंतरी ह्या बाह्यरूपी पाषाणहृदयी वाटणाऱ्या बेरड गुन्हेगारांच्या मनात ओलावा निर्माण होत जातो. चित्रपटात मग संध्या प्रवेश करते. 

हा चित्रपट १९५७ सालचा ! शांताराम ह्यांचा जन्म १९०१ सालचा ! म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचं वय ५५ च्या आसपास असावं ! पण चित्रपटातील त्यांच्या रंगरुपावरून ते खुप तरुण वाटत राहतात! शांताराम ह्यांनी एकंदरीत तीन लग्न केली ही माहिती मला काल कळली ! त्यांच्या प्रथम पत्नी विमलाबाई ह्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी, जयश्री सौहृदाचे संबंध कायम ठेवले. १९५० ते १९६० कालावधीत शांताराम आणि संध्या ह्यांनी एकत्रितपणे अनेक चित्रपट केले आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि कालांतरानं विवाहबद्ध झाले. संध्या आणि त्यांच्या वयात खुप अंतर होते ! विमलाबाई ह्यांनी संध्या हिच्याशी सुद्धा आयुष्यभर चांगले संबंध ठेवले ! ही सारी माहिती माहितीमायाजालावरुन साभार ! 

चित्रपटातील गाणी मोजकी पण सुरेख! 

सैंया झूठों का बड़ा सरताज निकला

ह्या गाण्यात वाद्य वाजवत जाणारी संध्या - आणि तिच्या मागं वाजत जाणारं ते छोटेसे शानदार वाद्य - ताशा ! हे पाहुन मोठी आईने अजुन आठवणी काढल्या. प्रकाशमामाला हा असा ताशा आणला होता. तिचे काका शांताराम ह्यांच्या अभिनयाचे मोठे चाहते होते वगैरे ! संध्या मोठी धीराची मुलगी ! इतक्या ओसाड भागातुन खेळणी विकायला जाताना तिला भय हा प्रकार माहिती नव्हता. ह्या बेरड गुन्हेगारांचा खट्याळपणा जागृत झाल्यावर ते तिची चेष्टामस्करी करीत. पण ही धीट मुलगी त्यांचा चांगलाच समाचार घेई ! 

ऐ मालिक तेरे बंदे हम 

हे एक अत्यंत अर्थपूर्ण गाणं !  

हे सर्वशक्तिमाना ! आयुष्यातील आमच्या सर्व चुका माफ कर ! आमच्याकडुन चांगली सत्कर्मे घडोत, आमचा जीवनप्रवास प्रामाणिकतेच्या मार्गानं होवो ! ज्या वेळी सर्व काही वाईट घडत असतं, आमचा स्वतःवरचा विश्वास डळमळीत झालेला असतो अशावेळी तुच आमच्या मदतीला धावून येतोस आणि आमच्या जीवनातील अंधःकार नाहीसा करतोस ! मनुष्याच्या अंगी अनेक कमतरता आहेत; त्यामुळं त्याच्या आयुष्यात अनेक दुःख निर्माण होतात! पण तु ही सारी दुःख दूर करतोस ! सध्याच्या करोनाच्या काळात अंगी धीर येण्यासाठी हे एक उत्तम गाणे ! 

संध्याने ह्या चित्रपटात आणि नवरंग मध्ये अत्यंत सुरेख नाच केलेत. परंतु ह्या काठिण्यपूर्ण नाचांमुळं तिला नंतर पाठीचा त्रास जडला ही जाणकारांनी दिलेली माहिती ! शांताराम ह्यांचं आडनाव कठीण असल्यानं त्यांनी व्ही शांताराम असं सुटसुटीत नाव स्वीकारलं ! पहिल्या बायकोपासुन चार आणि दुसरी बायको जयश्री हिच्यापासुन तीन अशी एकूण सात अपत्यं होती. संध्यानं सर्वांना आपलीच मुलं मानलं ! सध्या संध्या आपल्या मुलांच्या आधाराने जीवन व्यतित करत आहे ही माहिती कळली ! 

पुढं चित्रपटात मंडईतील भाजीविक्रेत्याला ह्या नव्या भाजीउत्पादकांपासुन स्पर्धेचं भय वाटु लागतं. खरंतर त्या मंडईतील दलालाचा समाचार घेण्यास ही मंडळी समर्थ होती! परंतु आपण कोणावरही हात उगारणार नाही ह्या शांताराम ह्यांना दिलेल्या वचनामुळं ते मुकाट्यानं मार सहन करतात. नंतर ह्याच दलालाच्या नीच कृतीमुळं शांताराम एका बैलाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडतात. परंतु ही मंडळी त्यांचा वारसा चालविण्याचा निर्धार व्यक्त करतात ! आणि आकाशातुन पाहणाऱ्या शांताराम ह्यांच्या दोन डोळ्यांच्या साक्षीनं चित्रपट संपतो ! 

ह्या काळातील जीवनातील साधेपणा त्याकाळातील चित्रपटांत सुद्धा उतरला आहे. साधी सरळ कथा, नितांत सुंदर अभिनय करणारे कलाकार, अर्थपुर्ण गाणी, जीवन उत्कटतेने जगणारी चित्रपटातील पात्रं ह्यामुळं हा चित्रपट प्रेक्षणीय बनतो ! मान हलवत, नजर डोळ्याच्या एका कोपऱ्यातुन दुसऱ्या कोपऱ्यात वेगानं हलविणारी संध्या लक्षात राहिली. पुर्वीच्या छायागीतमध्ये वारंवार प्रक्षेपित होणारं "आधा हैं चंद्रमा रात आधी " हे गाणं सुद्धा आठवलं ! 

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

२०२१ - दहावी बारावी परीक्षा

 


ह्या आठवड्यातील दोन घटना !  

१) मुलाच्या ११ च्या प्रवेशासाठी मुंबईला फेरी झाली.  ही प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची तयारी संबंधितांनी का दाखवली नाही ह्या प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जिद्द मी दाखवत नाही. त्यामुळं त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तिथलं वातावरण काहीसं असुरक्षित होतं. अधिकृत कागदपत्रं अगदी मोकळेपणानं हाताळली जात होती. सुरक्षित अंतर बाळगण्याचं भान कोणाला राहत नव्हतं. एक दोन मुलींनी तर बोलताना मास्क काढला होता. 

२) काल एका मित्राशी बोलणं झालं. त्याचा मुलगा आणि तो पवईला JEE Mains परीक्षेसाठी जाऊन आले होते. सर्वसामान्य लोकांसाठी लोकल बंद असल्यानं हल्ली रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी होते. परीक्षार्थींना लोकलने प्रवास करण्याची मुभा असल्यानं त्या दोघांनी हा पर्याय स्वीकारला. अंधेरी ते पवई कार (बहुदा उबेर / ओला ) केली. इतक्या प्रयत्नानंतर त्याचा मुलगा आयुष्याचं भवितव्य ठरविणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाला. त्यानं साधारणतः तीन - चार तास पुर्णपणे अनोळखी मुलांच्या सानिध्यात घालवले. त्या भयाचं दडपण घ्यायचं की इतक्या महत्वाच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं ह्या द्विधा मनःस्थितीत तो नक्कीच सापडला असणार !

JEE Mains परीक्षा तुलनेनं कमी विद्यार्थी देत असणार. ह्या वर्षीच्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांसाठी काही बदल घडवुन आणण्याची वेळ निघुन गेली आहे. पण २०२१ साली जे विद्यार्थी दहावी, बारावी परीक्षेला बसणार आहेत त्यांच्या मनःस्थितीचा कोणी विचार करेल का? त्यांना किमान दोन मुद्द्यांवर अधिकृत यंत्रणा सुस्पष्टता देऊन त्यांचा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करु शकतात. 

१) परीक्षेची तारीख जाहीर करणे - १२ परीक्षा  १ मे २०२१ ला आणि १० वी परीक्षा १५ मे २०२१ ला सुरु होतील. (तारखा केवळ उदाहरणासाठी !)  अशी घोषणा शिक्षणखात्यानं आताच करायला हवी !

२) दहावी - बारावी परीक्षा पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होतील. विद्यार्थी घरुन परीक्षा देऊ शकतील. परीक्षा "मुक्त पुस्तक संचार" (Open Book) पद्धतीने आयोजित केल्या जातील. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅबलेट वगैरे देऊन त्यांना परीक्षा देण्यास अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. 

घरुन ऑनलाईन परीक्षा आणि ती सुद्धा "मुक्त पुस्तक संचार" पद्धतीनं ! आपल्या भुवया नक्कीच उंचावल्या गेल्या असणार !ही नक्कीच आदर्श परीक्षा व्यवस्था नसणार ! ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्कीच ह्यात अधिक अडचणींचा सामना करावा लागणार. त्यांना आधीच योग्य मार्गदर्शन मिळत नाही; यंदाच्या वर्षी  त्यात अधिक अडचणींचा मुकाबला करावा लागणार ! सर्व काही मान्य ! 

पण लक्षात ठेवा एका बाजुला ह्या सर्व अडचणी / ऑनलाइन पद्धतीतील त्रुटी आणि दुसऱ्या बाजुला ह्या भावी तरुण पिढीची सुरक्षितता ! ह्या दोन पर्यायांची आपण तुलना करत आहोत. आपण एका अभुतपुर्व परिस्थितीत वावरत आहोत. परीक्षापद्धतीतील परिपुर्णतेपेक्षा माझी पसंती केव्हाही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेलाच राहील ! हवं तर टक्के देण्याऐवजी ग्रेड्स द्या ! ९० च्या वर A+ , ७५ च्या वर A, ६० च्या  वर B वगैरे ! म्हणजे कदाचित एकेक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांवर येणारे दडपण कदाचित कमी होईल ! 

वरील विचार परिपुर्ण आहेत असा माझा दावा नाही !  परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा आणि सुरक्षिततेचा विचार करुन संबंधितांनी त्वरित निर्णय घ्यावा आणि त्या दिशेनं पावलं उचलावीत ! आपल्या नागरिकांचं जीवन आपण ईश्वराच्या हवाली करुनच चालत आहोत ! त्याबाबत असणारी सरकारची अपरिहार्यता आपण समजु शकतो पण आपल्या भावी पिढीच्या स्वास्थ्याची आपण पुर्ण जबाबदारी उचलायला हवी ! 

 

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

Chemical Hearts !

 


प्राईम व्हिडिओवर साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी एखादा चित्रपट randomly निवडुन तो पाहण्याची सवय गेले काही आठवडे मला लागली आहे. जाहिरातीचा व्यत्यय नसेल तर चित्रपटाचा निखळ आनंद आपण लुटू शकतो. आज असाच अचानक निवडलेला चित्रपट  Chemical Hearts !

टीनएज हा अस्थिर मनोवस्थेचा काळ ! चित्रपटात ह्या विषयावर उत्तम भाष्य आहे ! बाल्यावस्था ते प्रौढपण ह्यातील ही संक्रमणावस्था !  मेंदु, शरीरामध्ये ह्या मोजक्या वर्षात प्रचंड बदल घडत असतात. खरंतर ह्या मुलांना ह्या काळात संवादांची, भावनिक आधाराची गरज असते. परंतु आपण मोठे होत आहोत, आपल्याला स्वतंत्रपणे वागता आलं पाहिजे, निर्णय घेता आले पाहिजेत ह्याचा अप्रत्यक्ष दबाब ह्या मुलांवर असतो. त्यामुळं आधीच गोंधळलेली ही मुलं काहीशी विचित्र वागु लागतात. साधारणतः ह्याच काळात त्यांच्या पालकांच्या आयुष्यातसुद्धा अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता बळावते ! 

चित्रपट ह्या परिस्थितीवर उत्तम पण काहीसं अतिरेकी भाष्य करतो !  टीनएज  काळ(आपण पौगंडावस्था ही शब्द वापरु  शकतो !) हा प्रचंड दुःखाचा काळ आहे . ह्यातुन  केवळ सुदैवी माणसेच सुखरूपपणे  बाहेर  पडतात आणि पुढील आयुष्यात  आनंदानं जगु शकतात. 

ह्या  काळात एखाद्या रिलेशनशिपमध्ये  स्वतःला गुंतवून  घेणं ओघानेच आले . ह्यात बऱ्याच वेळा  peer pressure चा  भाग  असतोच . हल्लीच्या काळात त्यात अजुनही अधिक गुंतागुंतीच्या प्रकारांची भर पडली आहे. 

चित्रपटाच्या कथानकातील मुख्य पात्रे दोन ग्रेस टाऊन आणि हेन्री पेज. ग्रेस आपल्या आधीच्या स्थिर नात्यातून एका दुर्दैवी अपघातामुळे बाहेर फेकली जाते. ह्यात तिला बराच मार लागतो आणि तिचा देखणा, खेळाडु असलेला प्रियकर मरण पावतो! एखाद्या स्थिर नात्यातून बाहेर पडल्यानंतरचा काळ फार कठीण असतो. टीनएज कालावधीत ह्याची काठिण्यपातळी अजुन वाढते ! चित्रपट ह्यावर उत्तम भाष्य करतो. ज्यावेळी तुम्ही एखाद्या नात्यात (रिलेशनशिपमध्ये) गुंतलेले असता त्यावेळी तुमच्या मेंदुत आनंद निर्माण करणारी रसायने निर्माण होत असतात. ह्या कालावधीत तुम्हांला ह्या रसायनांची आणि त्याद्वारे निर्माण होणाऱ्या आनंदाची सवय झालेली असते. तुम्ही ज्यावेळी एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे, त्याच्याशिवाय मी जगु शकत नाही असं म्हणता त्यावेळी त्यात ह्या रसायनांचा मोठा हातभार असतो! ग्रेसचा दुसऱ्या नात्यात स्थिरावण्याचा संघर्ष सुरु असताना हेन्री मात्र आपल्या पहिल्याच नात्याशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. इंग्लिश शब्दाचा वापर करत बोलायचं झालं तर ग्रेस आपल्या पहिल्या नात्याचं बॅगेज बाळगत असते. ते झटकन फेकुन देणं तिला जमत नसल्यानं अधूनमधून तिचं वागणं अचानक विचित्र बनतं. हेन्री आपल्यापरीने तिला सांभाळुन घेत राहतो. एखादी गोष्ट ग्रेसला आवडली नाही तर त्यामागं तिच्या आधीच्या रिलेशनशिपचा संदर्भ असु शकतो हे त्याला सहजासहजी कळत नाही. पण एकदा कळल्यानंतर मात्र तो खूप सुंदर प्रयत्न करतो ! 

गावाबाहेर असलेली एक निर्मनुष्य जागा ! इथं ह्या दोघांमध्ये सुंदर संवाद घडत राहतात ! इथं एक पाण्याचा प्रवाह असतो आणि त्यात रंगीबेरंगी मासे असतात. ह्यात पाय सोडून बसुन राहणं ग्रेसला खूप आवडतं ! आपल्या अपघातानंतर आपल्या थेरपीसाठी ह्या जागी मी यायचे असंही ती म्हणते. ती झाली शारीरिक जखमा भरुन काढण्यासाठीची थेरपी, पण ह्याच ठिकाणी ती हेन्रीच्या सोबतीनं आपल्या मानसिक जखमा भरुन काढण्याचा प्रयत्न करत राहते. एका प्रसंगी ती आपल्या आधीच्या प्रियकरासोबत लग्नासाठी निवडलेला पेहराव ह्या पाण्यात सोडुन देते. आधीच्या नात्यातून बाहेर पडण्यासाठी मी सज्ज आहे असा काहीसा प्रतीकात्मक संदेश ! 

चित्रपटातील काही वाक्यं स्मरणीय ! चित्रपटाच्या आरंभी ग्रेस हेन्रीला म्हणते, आपण म्हणजे काय तर अणूंचा एकत्र आलेला समुह ! काही काळापुरती हे अणु एकत्र येतात; आपण आयुष्य जगतो आणि मग पुन्हा हे अणु विखरले जातात. आसमंतात एखाद्या ताऱ्याच्या रुपात आपलं अस्तित्व राहत असावं ! 

पुढं कुठंतरी दोघंही आयुष्यात वेगळ्या दिशेनं निघुन जाण्याचा निर्णय घेतात. इथं एकमेकांच्या विषयी आदर बाळगत वेगळं होणं महत्वाचं ! त्यावेळी ग्रेस हेन्रीला म्हणते, "हेन्री तु एका चांगल्या अणूंचा समुह आहेस !" हा नवीन काळाचा अजुन एक गुणधर्म ! चित्रपटाचा सुखांत व्हायलाच हवा असं बंधन नाही किंबहुना एखाद्याविषयी सुमधुर स्मृती बाळगत आयुष्य जगणं हा सुद्धा दोघांच्या कहाणीचा सुखांत असु शकतो ! 

लिली आणि ऑस्टिन ह्यांचा अभिनय सुंदर! लिली रेनहार्ट ही अत्यंत गुणी अभिनेत्री ! पुढे चांगलंच नाव कमवेल असा माझा अंदाज !!

बुधवार, २६ ऑगस्ट, २०२०

नकार!!




सन १९९x

महिना मार्च

स्थळ - सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वसतीगृह अंधेरी पश्चिम

मुख्य पात्र - आदित्य पाटील - प्रथम वर्ष अभियांत्रिकी

प्रसंग १

होळीच्या रात्री -वसतिगृहातील सर्व विद्यार्थीगण जागरण करुन होळी पेटविण्याच्या अस्सल मूडमध्ये! सर्वजण एक निव्वळ सोपस्कार म्हणुन वसतिगृहाच्या मेसमध्ये रात्रीचे जेवण आटपत होते.

शैलेश - "अरे आज आदित्य एकटाच कोपऱ्यात का बसलाय ? आपल्याकडं पाहत सुद्धा नाही !"

बाकी सर्व मंडळी - "चलो देखते हैं मामला क्या हैं ?"

शैलेश - "आदित्य काय झालं ? आज एकटाच का जेवायला बसला आहेस ? आणि घरी का नाही गेलास होळीला ?"

आदित्य - " अरे बहिणीच्या लग्नाची तयारी घरी जोरात सुरु आहे! अभ्यास होणार नाही घरी ,म्हणुन इथं थांबलोय ! सबमिशन करीन म्हणतोय उद्या !"

शैलेश - "सबमिशन होईल रे ! पण आज रात्री होळी पेटवायला आणि उद्या सकाळी धुळवडीला यायचं बरं का !"

त्याच्या स्वरात गर्भित धमकी ओथंबुन भरली होती !

आदित्य - "नको रे शैलेश, सबमिशन बाकी राहील ! " - हाच तो नकार !

नक्की काय झालं आठवत नाही पण मंडळींचं लक्ष दुसरीकडं गेलं ! रात्री मी होलिकादहनाला गेलो नाही हे ह्या मंडळींच्या ध्यानात आलं नसावं असा सोयीस्कर समज मी करुन घेतला !



प्रसंग २

दुसऱ्या दिवसाची रम्य सकाळ !

सकाळी पावणेसहा वाजता उठून कर्तव्यदक्ष आदित्य पाटील ह्यांनी आंघोळ वगैरे आटपुन घेतली. खोली तळमजल्यावर आणि खोलीला लागुन बाल्कनी ! खोलीबाहेर जाऊन कोणी पाहत नाही ह्याची खातरजमा करुन घेत महाशयांनी खोलीला कुलूप लावलं. आणि सुमडीमध्ये बाल्कनीमधून प्रवेश करुन, बाल्कनीचा दरवाजा आतून घट्ट बंद करुन जग जिंकल्याच्या अविर्भावात महाशय रसायनशास्त्राचा धडा वाचू लागले ! साधारणतः साडेआठ वाजेपर्यंत हा प्लॅन अगदी ११०% यशस्वी झाल्याची लक्षणं दिसत होती. परंतु पावणेनऊच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरुन कल्लोळ सुरु झाला! स्लीपर घालुन जोरजोरात धावत जाण्याचे आवाज येऊ लागले ! ह्यातील पहिला आवाज बाथरुम मध्ये जाऊन बादली भरुन आणण्याचा आणि दुसरा गाढ झोपेत अंगावर थंड पाण्याची बादली ओतल्यावर मनात जे असंख्य भाव निर्माण होतील त्यांना एका सेकंदात शब्दरुप मिळाल्यानंतरचा होता ! तिसरा मजला आटोपला आणि मंडळी दुसऱ्या मजल्यावर आली ! धकधक करने लगा गाणे त्यावेळी आले नव्हते तरी तेच भाव निर्माण झाले ! रसायनशास्त्रातील रसायनांपेक्षा थंड पाणी भयावह असु शकते हे भाव मनी निर्माण झाले !

आणि तो क्षण आला !

शैलेश - "अरे आदित्य लॉक करुन गेला कुठं ?"

साधारणतः भिजलेली पंधरा वीस मंडळी माझ्या रूमच्या बंद दरवाजासमोर उभी होती ! त्यातील ऐशी टक्के लोक मनाविरुद्ध भिजवले गेले असल्यामुळं सूडाच्या भावनेनं पेटले होते !

राजकुमार - "लेकिन आदित्य सुबह कहा नहीं जा सकता !"

राजकुमारच्या ह्या आत्मविश्वासपर शब्दांनी गोंधळ केला ! ही उत्साही मंडळी धावत धावत बाहेर गेली आणि माझ्या गॅलरीत आली ! त्यांच्या ह्या प्रवेशानंतर मी लपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते शक्य नव्हते ! त्यांनी मला पाहिलं !

आता नाट्य पुन्हा माझ्या दरवाज्यासमोर घडू लागलं !

शैलेश - "आदित्य बऱ्या बोलाने दरवाजा उघड ! नाहीतर तोडायला कमी नाही करणार !"

त्याच्या ह्या शब्दावर अविश्वास ठेवण्याचं काही कारण नव्हतं !

आदित्य - "अरे पण थोडा अभ्यास करायचा आहे !"

माझ्या ह्या उत्तरानं मंडळींचा संयम संपुष्ठात आला! दरवाज्यावर जोरात धडका बसु लागल्या ! दरवाजा तुटू शकतो ह्याची खात्री होताच मी दरवाजा उघडला !

पुढील अर्धा मिनिट भयानक सन्नाटा होता !

राजकुमार - "क्या करने का इसका !"

आदित्य - "एक के बदले दो बादली से भिगाओ !" माझ्या ह्या उत्तरावर मंडळीचे नक्की समाधान होईल ह्याची मला खात्री होती !

आदित्य - "और मुझे एक मिनिट दे दो, मैं ये अच्छा कपडा बदल के आता हूँ !"

स्वराज आणि राजकुमार ह्यांची नेत्रपल्लवी झाली. तिसऱ्या सेकंदाला मी धरणीमातेला समांतर अवस्थेत होतो, आणि माझा प्रवास होस्टेलच्या प्रवेशद्वाराकडे सुरु झाला. तिथं तीन चार मजबुत लोकांनी मला घट्ट पकडून ठेवले. (खरंतर त्यातला एकसुद्धा पुरला असता !) बाकीच्या असंख्य लोकांनी समोर मातीचा खड्डा बनविणे, त्यात दहा - बारा बादल्या पाणी ओतुन दर्जेदार चिखल बनविणे ही सर्व कामं अत्यंत आवडीनं केली !

आणि मग पुढील पंधरा - वीस मिनिटं मला सचैल चिखलस्नान घडविण्यात आलं ! तेव्हाही पहिले दहा मिनिटं उघड्या राहिलेल्या खोलीच्या दाराची चिंता करायची की हे खराब झालेले चांगले कपडे कसे धुवायचे ह्याची चिंता करायची की रसायनशास्त्राचा त्या राहिलेल्या धड्याची चिंता करायची ह्यावर मी विचार करत होतो ! साधारणतः अकराव्या मिनिटाला मला सर्वज्ञानप्राप्ती झाली ! त्यानंतर मला चिखलस्नान घडवायला आलेल्या बेसावध दोघांना मी गनिमी काव्याने चिखलात लोळवले ! आणि त्यानंतर आदित्य त्यांच्यातलाच झाला ! पुढील तीन तास मी माझ्या आयुष्यातील खेळलेल्या एकमेव सिरिअस होळीचा येथेच्छ आनंद लुटला !

आदित्य पाटील

रविवार, १६ ऑगस्ट, २०२०

अलविदा माही !



 

काळाचा महिमा अगाध आहे ! यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरील प्रत्येकाला कधी ना कधी शिखरावरुन पायउतार व्हावं लागतं ! कधी हे सत्य स्वखुशीनं स्वीकारलं जातं तर कधी ते तुम्हांला स्वीकारावं लागतं ! शंभर कोटींहून अधिक लोकसंख्येच्या क्रिकेटवेड्या देशातील जनतेच्या मनावर  बारा ते चौदा वर्षे राज्य करणं कोण्या येरागबाळ्याचं काम नाही ! माही, गेल्या अनेक वर्षांतील मनावर कोरुन ठेवलेल्या स्मृतींबद्दल शतशः धन्यवाद !

तु खेळाडु आणि कर्णधार दोन्ही पातळ्यांवर जिंकलास ! जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकणं म्हणजे एक महायज्ञ असतो ! तुमच्याकडील संघातील वैयक्तिक गुणवत्ता, संघभावना आणि मोक्याच्या क्षणी मैदानावरील परिस्थिती ध्यानात घेऊन अचुक निर्णय घेता येण्यासाठी आवश्यक असणारी चाणाक्ष बुद्धी ह्या सर्वांचा मिलाफ जुळून यावा लागतो!  तु हा मिलाफ एकदा नव्हे तर तीनदा जुळवून आणलास ! 

२००७ साली संपुर्ण राष्ट्र काही महिन्यांपुर्वी विश्वचषक स्पर्धेत झालेल्या अनपेक्षित पराभवानं दुःखाच्या गर्तेत ढकललं गेलं होतं. दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या उदघाटनाच्या  T20 विश्वचषक स्पर्धेत दिग्गजांना विश्रांती देण्याचं धाडस निवड समितीनं दाखवलं ! काहीशा नवख्या खेळाडुंना घेऊन तु आफ्रिकेत गेलास. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका सारख्या बलाढ्य संघांना हरविण्याची किमया तू आणि तुझ्या संघानं घडवुन आणली ! त्यात युवराज, गौतम, रोहितने तुला मोलाची साथ दिली ! अंतिम सामन्यात तुझ्या कप्तानपदातील भविष्यात वारंवार दिसुन आलेल्या एका महत्वाच्या गुणाची झलक आम्हांला प्रथम दिसली ! ती म्हणजे संघातील नवख्या खेळाडूंवर तु दाखवलेला विश्वास ! १५७ सारख्या माफक धावसंख्येचा बचाव करताना आर. पी. सिंग आणि इरफान पठाण ह्यांनी खरंतर सामना भारताच्या बाजुनं झुकवला होता. पण मग मिस्बाहच्या फटकेबाजीनं सामन्याचे चित्र पुरतं पालटलं होतं. अशा वेळी शेवटच्या षटकात नवख्या जोगिंदरच्या हातात चेंडु सोपविण्याचे धाडस तू दाखविलेस आणि त्या पुढं जे काही घडलं तो एक अविस्मरणीय इतिहास होता !

२०११ सालच्या विश्वचषक स्पर्धेत चित्र वेगळं होतं. मायभुमीवर खेळल्या जाणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत तु एका बलाढ्य संघाला घेऊन उतरला होतास! संघात प्रथितयश खेळाडूंचा भरणा होता. फलंदाजीसाठी खास अनुकूल खेळपट्ट्या बनविल्या गेल्या होत्या. २००७ सालच्या विश्वचषकातील अनपेक्षित पराभवाच्या आठवणी पुसून काढायच्या होत्या ! अजुन एका अपेक्षाभंगाचे दुःख पचविण्याची तयारी ह्या १२० कोटींच्या देशाकडे नव्हती. इथंही तु ह्या कसोटीला पुरेपूर उतरलास ! युवराज ह्या विश्वचषक स्पर्धेत अगदी नजर लागण्याइतका उत्कृष्ट खेळला ! फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण ह्यात त्यानं तुला पुरती साथ दिली. सचिन, विरु, गौतम, नुकतास उदयाला येऊ लागलेला विराट ह्यांनी सुद्धा आपला हातभार लावला. उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलिया, उपांत्य फेरीत मानसिक कणखरतेची कसोटी पाहणारा पाकिस्तान संघ ह्या सर्वांना तु आणि तुझ्या शिलेदारांनी हरविले ! पण अंतिम फेरीतील विजय फक्त तुझा आणि तुझाच होता ! शतकाजवळ आलेला गौतम ज्यावेळी तंबुत परतला त्यावेळी श्रीलंका आणि विश्वचषक ह्यांच्यामध्ये फक्त तु आणि युवराज होतास ! तू नाबाद ९१ धावांची अविस्मरणीय खेळी खेळलास ! मायदेशातील विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकताना  एक कर्णधार म्हणुन प्रतिस्पर्धी संघाच्या वेगवान गोलंदाजाला थेट समोर षटकार मारण्याचं धारिष्ट्य तुझ्यात होतं ! प्रत्येक भारतीय क्रिकेटरसिकाच्या हृदयात हा क्षण कायमचा कोरला गेला ! २०१३ सालाची ICC Champions Trophy सुद्धा तू भारताला जिंकुन दिलीस ! ह्या तिन्ही महत्वाच्या जागतिक पातळीवरील स्पर्धा जिंकुन देणारा कर्णधार म्हणुन तू आपलं नाव इतिहासात नोंदविलंस  ! कसोटीमध्ये सुद्धा तु  कप्तानपद भूषविलंस आणि काही संस्मरणीय विजयांची नोंद केलीस ! 

तु जसा थंड डोक्याचा कर्णधार होतास तसाच तु धाडसी आणि कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता बाळगुन असणारा खेळाडु होतास ! तु कोणत्याही खेळाडूच्या प्रतिष्ठेचं ओझं बाळगलं नाही, मग तो प्रतिस्पर्धी संघातला खेळाडु असो वा स्वतःच्या ! कठोर संदेश देण्यात माहीर असा कप्तान म्हणुन तू नावलौकिक मिळविलास ! पण इथं कोणत्यातरी एका क्षणी तु काहीसा स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात पडल्यासारखा वाटलास ! संघात काही खरोखर सभ्यतेचे मूर्तिमंत पुतळे असणारे खेळाडु होते. त्यांच्या निवृत्तीचे अनुभव काहीसे क्लेशदायकतेकडं झुकले असं मला वाटलं ! त्याला तु काही एकटा जबाबदार नसशील पण त्यांना चांगली वागणूक देता आली असती असं राहुन राहुन वाटलं !

सामना जिंकण्यासाठी चौकार, षटकार, बळी हे धावफलकांवरील नायक ! ह्या नायकांच्या प्रेमात पडलेल्या भारतीय संघाला आणि चाहत्यांना त्या मानसिकतेतुन बाहेर काढण्यात तु मोलाचा वाटा बाळगलास ! शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर Running Between the Wickets, अप्रतिम क्षेत्ररक्षण ह्या माध्यमातुन सुद्धा धावा वाचवता येतात, सामने जिंकता येतात हे तू दाखवुन दिलेस ! कमीत कमी धोका घेऊन सामन्याचा कल आपल्या बाजुने झुकविण्याकडे तुझं प्राधान्य होतं ! एक यष्टीरक्षक म्हणुन तू जबरदस्त होतास आणि आहेसुद्धा ! मर्यादित षटकांच्या सामन्यात निकराच्या क्षणी चोरटी बाय धावुन काढणाऱ्या फलंदाजांना तुझ्या नेमबाजीचा धाक सदैव राहिला ! 

तु क्रिकेटसेन्सचा सर्वोत्तम मेंदु बाळगुन होतास ! प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाच्या शैलीचा अभ्यास करुन तू तुझ्या मिश्किल भाषेत गोलंदाजांना उपयुक्त सल्ले दिलेस ! असे काही व्हिडिओ पाहताना तुझ्या वाणीने हास्याचे फवारे उडतात !  हाती उपलब्ध असलेल्या मोजक्या Third Umpire Review (DRS) चा कसा वापर करावा ह्या बाबतीत तुझा निर्णय क्वचितच चुकला ! त्याचप्रमाणे प्रतिस्पर्धी संघाच्या कोणत्या गोलंदाजांला लक्ष्य करुन त्याच्यावर आक्रमण करायचं ह्याचं गणित तुझ्या डोक्यात पक्के बसलेलं असायचं ! वाढत्या धावगतीचं तु कधी दडपण घेतलं नाहीस कारण तुझा स्वतःच्या क्षमतेवर असलेला प्रचंड विश्वास ! 

२०१५ सालचा ऑस्ट्रेलियातील विश्वचषक! साखळी सामन्यात भारतानं दृष्ट लागण्यासारखी कामगिरी केली होती ! साखळीतील सर्व सामने जिंकुन उपांत्य फेरीत आपण दिमाखात दाखल झालो होतो ! पण उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने ३२८ धावांचा डोंगर उभा केला ! सुरुवातीच्या आशादायक सलामीनंतर रोहित, धवन, विराट तंबुत परतले ! तू ६५ धावांची खेळलास खरा, पण विजयाकडं तु घेऊन जाशील असं कधीच त्या खेळीत वाटलं नाही! त्या पराभवाचं दुःख तर आम्ही पचविले पण मग हे वारंवार घडु लागलं ! कदाचित वयोमानानुसार तुझ्या हालचाली थोडयाफार मंदावल्या होत्या. ह्या बाबतीत अगदी निष्ठुर असलेल्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना ही गोष्ट समजली नसती तरच नवल ! हळूहळू आपल्या मर्जीवर सामना संपविण्याची तुझी क्षमता कमी होत चालली ! गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर टिकून राहुन चांगली धावसंख्या उभारण्याची क्षमता अजुनही तू बाळगुन आहेस! पुन्हा एकदा २०१९ चा विश्वचषक ! साखळीतील उत्तम कामगिरीनंतर उपांत्य सामन्यात न्यूझीलंड सामोरे होते ! गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्टीवर किवींना आपण २३९ धावांत रोखले खरे पण आघाडीचे फलंदाज ३ फलंदाज ५ धावांत बाद झाले. तू आणि जडेजाने सहाव्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली खरी पण संपुर्ण भारताच्या आशा जडेजावर अवलंबुन राहिल्या ! जडेजा बाद झाला आणि रसिकांच्या नजरा आणि आशा तुझ्याकडे वळल्या ! तुही एक दोन चमकदार फटके मारलेस पण सामना आवाक्याबाहेर गेला होता हे तुझ्या देहबोलीतुन जाणवत होते ! आणि तु धावबाद झालास ! पुर्वीचा धोनी ही धाव घेताना धावबाद कधीच झाला नसता, किंबहुना त्यानं ही धोकादायक धाव न घेता शेवटी एक अधिक षटकार मारण्याचं ठरविलं असतं ! इथं तु धावबाद झालास आणि आता भारतातर्फे तु खेळलेला हा शेवटचा सामना ठरला ! 

IPL मध्ये तु मुंबई इंडियन्सचा प्रतिस्पर्धी असल्यानं त्यांच्याशी खेळताना तु बाद व्हावा अशी इच्छा प्रबळ असली तरी बाकी संघांशी खेळताना तुझ्या फटकेबाजीचा मनमुराद आनंद आम्ही लुटला ! निळ्या धोनीने हृदय जिंकलं तर चेन्नई सुपरकिंग्सवाल्या पिवळ्या गणवेशातील धोनीनं आम्हांला मनोरंजनाच्या आठवणींचा खजाना दिला ! 

बाकी एक माणुस म्हणूनही तू मन जिंकलंस ! सैन्यासोबत वावरलास ! एका छोट्या गावातुन मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीवरुन येऊन सुद्धा तु कधी वलयांकित दुनियेत परका वाटला नाहीस ! देशभरातील छोट्या छोट्या गावांतील मुलांना मेहनतीवर दृढ विश्वास ठेवण्यास तु मदत केलीस ! 

माही, तू लक्षात राहशील तो २००७ च्या त्या अंतिम सामन्यात जोगिंदरच्या हातात चेंडू सोपविणारा कप्तान म्हणुन, वानखेडेवर विश्वचषक जिंकताना उत्तुंग षटकार टोलविणारा कप्तान म्हणुन आणि 'इसके पैरमे डाल, पॉईंट में हवा में मारेगा !" असे सल्ले देणारा चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणुन !

Well Played Dhoni!

गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२०

मला समजलेला कृष्ण !


 

जनमानसात कृष्णाविषयी बरंच कुतूहल असतं. महाभारतातील कृष्णाविषयी बोलण्याचा माझा अधिकार नाही. पण कृष्णाचं ते एकमेव रुप नाही अशी माझी समजुत आहे. कृष्णाविषयी असलेल्या माझ्या काही समजुती !

१. कृष्णाचं पारंपरिक रुप एक जे आपण लहानपणापासुन वाचत, ऐकत आलो आहोत ! पण कृष्ण हे एक तत्व आहे, एक संकल्पना आहे ! 

२. कृष्णाचं प्रत्येकासाठी एक खास अस्तित्व असतं. हे रुप आपल्याला जाणुन घेता यायला हवं ! हे रुप जाणुन घेण्याची इच्छा हवी आणि क्षमताही हवी ! नाहीतर आपल्यासाठीचं कृष्णाचं रुप आपल्या भोवताली येऊन, पिंगा घालुन गायब होतं आणि आपल्याला ते जाणवत सुद्धा नाही ! 

३. आपल्या कृष्णाची प्रतिमा जनमानसातील कृष्ण प्रतिमेपेक्षा फार वेगळी असु शकते ! आपल्या कृष्णाला कदाचित ठाऊक सुद्धा नसतं की तो आपल्यासाठी कृष्ण आहे ! 

४. कृष्ण तुम्हांला गवसला पाहिजे. ज्यावेळी कृष्णभान होते तो एक विलक्षण अनुभूतीचा क्षण असु शकतो. काहींना कृष्ण मुर्त स्वरूपात सापडतो तर काहींना त्याचं अस्तित्व आसपास जाणवत राहतं. 

५. कृष्ण तुमच्यासोबत कायम रहात नाही. तुमचं व्यक्ती म्हणुन स्वतंत्र अस्तित्व तो जाणुन असतो. तुम्ही आनंदाच्या शिखरावर असाल तर तो तुम्हांला एकटं सोडुन देतो. तुम्ही संकटात सापडलात तर तो कदाचित तात्काळ धावुन येण्याची घाई करत नाही ! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत तुम्ही स्वतः संकटाचा कसा मुकाबला करु शकता ह्याची तो चाचणी घेतो ! 

६. कृष्ण तुम्हाला जीवनावर श्रद्धा ठेवायला शिकवतो, तुम्हांला दुनियेच्या नकळत दाद देतो, तुम्हांला स्वतःवरील आत्मविश्वास बळकट करण्यास मदत करतो. 

७. तुमच्या वयानुसार तुमचा कृष्ण आपली रुपं पालटतो ! तुमच्या भावनिक जीवनाचा तो कायम अंश बनुन राहतो !  तो तुमचाच एक अविभाज्य अंश असतो ! काही कारणास्तव विधात्यानं त्याला एक वेगळं अस्तित्व दिलेलं असतं !

८. मरणानंतर काय होत असावं? कदाचित आपण ह्या कृष्णात विलीन होत जात असु ! दोघं मिळुन आपल्या आयुष्याचा आढावा घेत असु !

कृष्ण आपल्याला सोळा हजाराहुनही कित्येक अधिक प्रकारे समजु शकतो ! त्यातलाच कदाचित हा एक प्रकार ! 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...