मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १९ मार्च, २०२३

Bella Vista, महाबळेश्वर



अचानक ठरवून केलेल्या काही गोष्टी बऱ्याच वेळा व्यवस्थित पार पडतात. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यातील महाबळेश्वर भेटीचं बरंचसं असंच काही झालं. त्याआधीच्या शनिवार सकाळी शांतपणे चहाचे कप घेऊन आम्ही दोघं बसलो असता सोहमच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेच्या समाप्ती आणि दुसऱ्या सत्राच्या आरंभामध्ये चार दिवसांचा प्रचंड कालावधी असल्याचा साक्षात्कार आम्हांला झाला. खरंतर मला आधीच झाला होता. पण मी ह्याबाबतीत सोयीस्कररित्या मौन बाळगून होतो. शनिवारी सकाळी चहाचे कप घेऊन बसलो असताना जर सकाळची वर्तमानपत्रे आली नसतील तर जगातील सर्वात गंभीर समस्या चर्चिल्या जाण्याची दाट शक्यता असते. तुर्कस्थान हा भूकंपप्रवण क्षेत्रात आहे हा विषय चर्चेला घेण्यात माझी काही हरकत नसते. कारण त्यात मी करण्यासारखं काही नसतं. परंतु ह्यावेळी मात्र "आपण हे चार दिवस काय करतो आहोत ?" हा प्रश्न चर्चेला घेण्यात आला.  

"प्रबोधनकारला कोणतं नाटक आहे?"  चेहरा जमेल तितका गंभीर ठेवत मी ठेवणीतला प्रश्न विचारला. पुढील पाच मिनिटं दिवाणखान्यात अगदी शांतता होती. "सिक्कीम" असं बोलून मी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही काळ चर्चा होऊन महाबळेश्वरला जाऊयात ह्याविषयी आमच्या दोघांच्यात एकमत झालं. हल्ली केवळ दोघांच्यात एकमत होऊन पुरेसं नसतं. "तुम्ही जा, मी इथं एकटा राहीन" ह्या बिछान्यात लोळत पडलेल्या सोहमच्या उत्तरानंतर आम्ही परत हॉलमध्ये परतलो. 

 काही गोष्टीवर फारशी चर्चा करण्यात अर्थ नसतो हे मला हल्ली कळून चुकलं आहे. घरच्या बॉसला महाबळेश्वर हा स्वीकारार्ह पर्याय आहे ह्याची खात्री पटल्यामुळं मी तात्काळ संगणक घेऊन बसलो. का कोणास ठाऊक पण मी हॉटेल बुकिंग वगैरे प्रकार फारसं संशोधन न करता पार पाडतो. प्रत्येक वेळा हा निर्णय योग्य असतोच असे नाही. पण हे दोघं  मला ह्याबाबतीत चांगली साथ देतात. फारशी कुरबुर करत नाहीत. तर पुढील वीस पंचवीस मिनिटांत हॉटेल आणि महाबळेश्वरची बस तिकिटं आरक्षित करण्यात आली होती. 

महाबळेश्वर म्हटलं की खरंतर आमच्या डोळयांसमोर राजेश आणि हॉटेल ड्रीमलँड ही हॉटेल्स येतात. पण ह्यावेळी मी बदल म्हणून Bella Vista हे काहीसं महाबळेश्वरच्या बाहेर असणारं हॉटेल बुक केलं. काहीसं वेगळं नांव असल्यामुळं मी बहुदा ते बुक केलं असावं अशी मला दाट शंका आहे. अशा ठिकाणी हॉटेल बुक करण्यात काही फायदे आणि काही तोटे असतात. महाबळेश्वरच्या गर्दीपासून दूर ही एक जमेची बाजू. पण मुख्य शहरात जाण्यासाठी प्रत्येक वेळी टॅक्सी करावी लागणार ही काहीशी त्रासदायक बाब. मी महाबळेश्वरला कार चालवत का गेलो नाही किंवा एखाद्या चालकाला का घेऊन गेलो नाही हा एका स्वतंत्र पोस्टचा विषय. 

गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता हॉटेलला हजर रहायचं होतं. रात्री दहा वाजता कार्यालयातून परतलो. त्यामुळं माझं पूर्ण पॅकिंग प्राजक्तानंच केलं. ह्यात म्हणा काही नवीन नाही.  बस वेळेवर सुटली. मधल्या एका थांब्यावर सोहमच्या महाविद्यालयात शिकणारा सोहम नावाचा मित्र त्याच्या आईबाबांसोबत बसमध्ये प्रवेश करता झाला. सोहमची कळी खुलली, आमचा जीव भांड्यात पडला.  नीता ट्रॅव्हल्सच्या बसेस अगदी आरामदायी आणि वेळापत्रक पाळणाऱ्या होत्या. मध्ये नाश्त्यासाठी एक थांबा घेण्यात आला. साधारणतः सव्वा वाजता आमची बस Bella Vista च्या थांब्यावर थांबली. नीता ट्रॅव्हलच्या भाषेत हा हॉटेल सूर्याचा थांबा होता. इथं Bella Vista चा कर्मचारी आमच्या बॅग्स घेण्यासाठी तत्परतेनं हजर होता. 

हॉटेलच्या खोलीचा ताबा घेऊन आम्ही जेवणासाठी त्यांच्या उपहारगृहाकडं धाव घेतली. "बाहेर जातांना खोलीच्या खिडक्या घट्ट बंद करायला विसरू नका. इथं माकडं भरपूर आहेत!" स्वागतकक्षातील कर्मचाऱ्याने आम्हांला प्रेमानं बजावलं होतं. 

Bella Vista चे उपहारगृह अत्यंत सुखद अनुभव देऊन गेलं. इथला कर्मचारीवर्ग अत्यंत आतिथ्यशील आहे. सामोरा येणारा प्रत्येक कर्मचारी आपल्याला नमस्कार असं म्हणून आपलं स्वागत करतो. उपहारगृह अगदी प्रशस्त आणि टापटीप आहे.  त्यातील कर्मचारी आपल्याला विविध  डिशेशविषयी माहिती / सूचना देतात.  रात्री एक गायक न दमता अनेक गाणी गात असतो. "तु ह्याच्याइतकेच किंबहुना अधिक चांगलं गातो" माझ्या अतिआत्मविश्वासानं उचल खात मला सांगितलं. आमचं भाजीप्रेम इथंही शाबूत असल्यानं आम्ही विविध भाज्यांचा समावेश असलेली कोणतीतरी एक डिश मागवली. एकंदरीत सोहम खुश वाटत होता.  जेवणानंतर मी ताणून दिली. 

हॉटेलचा निसर्गरम्य परिसर सायंकाळी अधिकच खुलून दिसत होता. उपहारगृहाच्या बाह्यकक्षातून सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दिसत होते. चहासोबतची खारी बिस्किटं वातावरणाला परिपूर्णतेकडे घेऊन जात होती. 

परिसर जैववैविध्यानं नटलेला आहे. विविध प्रकारची फुलझाडं, पक्षी परिसरात गुण्यागोविंदानं नांदत आहेत. म्हटलं तर त्यांच्या ह्या वास्तव्याच्या ठिकाणी आपण अतिक्रमण केलं आहे. 

 

रात्रीच्या जेवणानंतर परिसर अजूनही नयनरम्य वाटत असला तरीही ही रोषणाई नैसर्गिक अंधारात करता येण्यासारख्या आकाशदर्शनाच्या आनंदापासून आपल्याला वंचित ठेवत आहे हा विचार नक्कीच मनात डोकावत होता. 

मुंबईतील हवेचा दर्जा अत्यंत खालावला असल्यानं महाबळेश्वरला आल्यानंतर फुफ्फुसांमध्ये  जमेल तितका शुद्ध ऑक्सिजन भरून घेतला पाहिजे ह्यावर आमचं एकमत झालं होतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता खोलीबाहेर पडून फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन भरण्याची तयारी दाखविणारा मीच एकटा होतो. 



वातावरणात मस्त गारवा होता. उतारावर गावांकडे जाणारे मार्ग दाखविणाऱ्या पाट्या होत्या. ह्या सर्व नैसर्गिक वातावरणात शहरी लोकांच्या सहलीच्या गरजा भागविण्यासाठी निसर्गाला ओरबाडून उभारलेली Bella Vista आणि अनेक हॉटेल्स दिमाखानं उभी होती. पुढं एक शेतकरी स्ट्रॉबेरी विकत होते. मी त्यांच्याकडून एक किलो स्ट्रॉबेरी एकशे ऐंशी रुपये ह्या दराने विकत घेतली. रूमवर आल्यानंतर आम्ही तिघांनी ह्या स्ट्रॉबेरीचा मनमुराद फडशा पाडला. 

हल्ली अशा हॉटेलात मनमुराद नाश्त्याची प्रथा रूढ झाली आहे. इथंही पहिल्या दिवशी उपमा, मसालाडोसा, पावभाजी, छोले, फळं असल्या प्रकारांसोबत बेकरीतील असंख्य प्रकार उपलब्ध होते. नको नको म्हणताना त्याचा गरजेपेक्षा जास्तच आस्वाद घेतला गेला. हे पुढील तीन दिवस सुरु राहिले. 

बाहेर फिरायला गेल्यानंतर, विविध समारंभाच्या निमित्तानं,  कार्यालयीन पार्टीच्या निमित्तानं आपण हल्ली गरजेपेक्षा जास्तच आहार करण्याचे प्रसंग वारंवार उद्भवत राहतात.  नेहमीच्या जीवनात सायंकालीन जेवण कमीत कमी घेऊन ते आठच्या आत घेण्याचा मी प्रयत्न करीत असतो. परंतु अशा विचलित करणाऱ्या प्रसंगामुळं त्यात बाधा येत राहते. चांगली गोष्ट अशी की तिथल्या हवेमुळं इतकं सारं भरपेट खाऊन सुद्धा प्रसन्न वाटत राहिलं. 

पुढील तीन दिवसांत मॅप्रो गार्डन, जुनं महाबळेश्वर, इको आणि त्याच्या समवेत असलेले अनेक पॉईंट, वेण्णा लेक ह्या स्थळांना भेटी दिल्या.  ह्यात काही खास लिहिण्यासारखं असं नाही. फक्त कार्यालयीन व्यापाला विसरून मुंबईबाहेर गेल्यानंतर मनाला जी एक नवीन उभारी मिळते तिचा खास उल्लेख करण्याजोगा. 

दहावी - बारावी परीक्षा अजूनही आटोपल्या नसल्यानं महाबळेश्वर बऱ्यापैकी शांत होतं. अपवाद फक्त शनिवारी सायंकाळच्या वेण्णा लेकच्या भेटीचा. तिथं खूप गर्दी होती. हॉटेल ड्रीमलँड, राजेश ह्यांची पुर्वीची शान गेली आहे असं वाटलं. तिथल्या जेवणाच्या आठवणी अजूनही मनात कायम आहेत. मार्केटमध्ये येणारा बहुतांश माल मुंबई-पुण्यातून येतो असे ड्रायव्हर म्हणाला. 

परत येताना नीता ट्रॅव्हल्सच्या स्लीपरबसचा अनुभव मिळाला. घाईघाईनं बुकिंग केल्याचा हा परिणाम. रात्रीच्या प्रवासासाठी ह्या उत्तम असल्या तरीही दिवसा त्यात कोंडले गेल्याची भावना निर्माण होऊ शकते. 






































































पोस्टचा बराचसा  भाग हा ह्या भेटीतील फुलांच्या, हॉटेल परिसराच्या आणि विविध स्थळांच्या छायाचित्रांनी व्यापलेला आहे.  ही पोस्ट प्रवासवर्णनापेक्षा जास्त फुलांच्या छायाचित्रांची आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इतकं म्हणून ह्या पोस्टची सांगता करतोय.

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

गोंधळलेली मध्यमवयीन माणसं


आयुष्य आपल्यापुढं काय वाढून ठेवेल हे नक्की सांगता येत नाही. तुम्हांला जाणवो  वा ना जाणवो  पण ह्या पोस्टमध्ये विनोदाची पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आंतरिक मानसिक गोंधळ हा बहुसंख्य भारतीय मध्यमवयीन  माणसांच्या प्राक्तनात लिहिला असावा. ह्याला अपवाद दोन प्रकारची माणसं. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला आयुष्याचं कोडं उलगडण्याची सुतराम शक्यता नाही हे पूर्णपणे उमजलेली माणसं. त्यामुळं त्यांना विचार न करता वागण्याचा परवाना मिळालेला असतो. मजेत जगतात ही माणसं. दुसरा प्रकारात आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं हे जाणवलेली माणसं. हल्लीच्या भाषेत म्हणायचं झालं तर पूर्णपणे sorted असतात ही माणसं. आपल्याला हवं तेव्हा हवं तसं वागतात. कोणत्या लोकांशी कधी संपर्क ठेवावा हे त्यांना नक्की माहिती असतं. बऱ्यापैकी मजेत आयुष्य जगता येतं त्यांना. फक्त अशी लोक कदाचित जाणते अजाणतेपणी दुसऱ्यांचा वापर करून घेण्याची शक्यता असते. 

आता वळुयात पोस्टच्या केंद्रस्थानी असलेल्या जमातीकडं - गोंधळलेली मध्यमवयीन माणसं! इथं ही माणसं का गोंधळलेली असतात ह्याविषयी मी विविध मुद्दे सादर करत आहे. 

१. मोकळा वेळ - ह्या मध्यमवयीन  माणसांचा बालपणीचा काळ आईवडिलांकडून आज्ञा स्वीकारण्यात, त्यानंतर नवऱ्याला आज्ञा देण्यात / बायकोकडून आज्ञा घेण्यात आणि मुलांचं संगोपन करण्यात व्यस्त गेलेला असतो. अचानक एका टप्प्यावर आज्ञांची देवाणघेवाण विविध कारणांस्तव मंदावते, मुलं स्वावलंबी होतात. इतका प्रचंड वेळ फावला वेळ ह्या वर्गात दाखल झाल्यानं ह्या माणसांचा मेंदू अगदी गोंधळून जातो. देवानं आपल्याला इतका महत्वाचा मनुष्यजन्म दिला आणि त्यातील तासनतास, दिवसेंदिवस आपण असेच वाया घालवत बसलो तर पूर्ण आयुष्याचा हिशोब मांडायला बसल्यावर देव आपल्याला ओरडेल अशी त्यांना भिती वाटू लागते. त्यातच भर म्हणून उमराव जान मधील - तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी  ह्या ओळी त्यांच्या कानावर पडतात. त्यामुळं आपण एखादा छंद जोपासला पाहिजे ह्याचा त्यांना साक्षात्कार होतो. 

काही जणांना काही कारणास्तव मोकळा वेळ मिळत नाही. 'भला उसके पास मोकळा वेळ हैं और मेरे पास क्यू नहीं ?' ह्या विचारानं ते गोंधळून जातात. 

२. न उमगलेल्या गोष्टी - प्रत्येक माणसाला आयुष्यात न समजलेल्या बऱ्याच गोष्टी असतात. आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कधीतरी समजू शकतात हा विश्वास बाळगून ही माणसं आयुष्य जगत असतात. पण एका क्षणी ह्या गोष्टी आपल्याला कधीच समजू शकणार नाहीत ह्याची त्यांना जाणीव होते. त्यामुळं त्यांच्या गोंधळात अजून भर पडते. वानगीदाखल काही उदाहरणं 

अ . शेअरबाजारातील चढावउतार. आपण प्रचंड अभ्यास करून घेतलेल्या शेयर्सचे आपण गुंतवणूक केल्यानंतर गडगडणे !

ब. Age is just a number - अमीरखान वगैरे मंडळीचे आवडतं असलेल्या ह्या वाक्याचं मराठी भाषांतर 'वय हा एक केवळ आकडा आहे' हे असावं का आणि असल्यास त्याचा नक्की अर्थ काय?

क. TOI  बरोबर येणाऱ्या बॉम्बे टाईम्स चे नामांतर मुंबई टाईम्स करावं म्हणून अजून कोणी आंदोलन कसं छेडलं नाही? त्यातील जे कोणी सेलेब्रिटी आहेत त्यातील बहुतांश लोकांना आपण कसं काय ओळखत नाही?

ड. प्रत्येक देशाकडं असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या प्रमाणात त्या देशानं चलन बाळगावं असं ह्या माणसांनी लहानपणापासून ऐकलेले असते. ह्यामागचं नक्की कारण दहा मित्रांनी दहा बैठकीत समजावून सांगितल्यावर सुद्धा आपल्या डोक्यात प्रकाश का पडत नाही 

अशी ही यादी वाढतच जाते 

३. आपण ज्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो अशा लोकांची दिवसेंगणिक कमी होत जाणारी संख्या - हळुहळू आपलं फार कमी लोकांशी पटत आहे ह्याचा साक्षात्कार ह्या लोकांना होतो. ह्यासाठी ही लोक सुरुवातीला दुसऱ्यांना दोषी धरतात. मग काही काळानं कदाचित खरी समस्या आपणच आहोत ह्याची जाणीव त्यांना होऊ लागते. हे आपल्या बाबतीत कसं काय होऊ शकते ह्याचा प्रचंड धक्का त्यांना बसतो. बिचारी अजूनच गोंधळून जातात. 

मध्यमवर्गीय माणसं गोंधळून जाण्याची तीन कारणं आपण पाहिलीत. आता ही लोक ह्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहुयात. 

१. छंद - आपल्याला काही छंद असायला हवा ह्याची जाणीव त्यांना होते. ह्या वयात छंद जोपासणं हे काहीसं कठीण जात असलं तरीही हे लोक जिद्दीनं प्रयत्न करतात. ब्लॉग लिहिणं, कविता करणं, फुलांचे फोटो काढणं, किशोरकुमारची गाणी गाणं, वनात शांत बसलेल्या पक्ष्यांना कॅमेरात टिपणं वगैरे वगैरे. जोवर हा छंद आपला वेळ योग्य रितीनं व्यतीत करण्यासाठी आपण जोपासत आहोत तोवर ठीक. ज्याक्षणी आपण कौतुकाच्या अपेक्षेनं हे करायला जातो तिथं गोंधळ होतो. छंदामध्ये योग्य अंशी विरक्ती समाविष्ट असावी. 

२. कंपू - आपल्यासारख्या समविचारी लोकांचा कंपू बनवून चर्चा, सामाजिक कार्य करणे वगैरे वगैरे. काहीजणांना कंपू बनवून विधायक कार्य करायचं असतं, तर काहीजणांना केवळ धमाल करायची असते तर काहीजणांना काही भव्यदिव्य ध्येयाच्या पडद्याआडून वेळ घालवायचा असतो, आपली प्रसिद्ध होण्याची भूक भागवून घ्यायची असते. एक गोष्ट मात्र खरी की असे कंपू चांगली कामं नक्कीच करतात. त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. फक्त ह्यात गटबाजी होऊ नये, किंवा एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे असले प्रकार होऊ नयेत आणि योग्य वेळ येताच आपण बाजूला होऊन नवीन लोकांना संधी देता यायला हवी. आणि हो कंपूच्या माध्यमातून मदिराप्राशनाचे वाढतं प्रमाण अगदी चुकीचं. पण हल्ली ह्या मुद्द्यावरून लोक अगदी आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळं ह्यावर न बोललेलंच बरं !

ह्या आधी मांडलेला मुद्दा पुन्हा एकदा मांडतोय. तुम्ही जर स्वतःला काही चांगल्या गोष्टीत व्यस्त ठेवू पाहत असाल तर वाचन, संगीतश्रवण, निसर्ग ह्यासारखे उत्तम पर्याय नाहीत. सर्वशक्तिमानाकडं परतण्याच्या मार्गावर असताना एक समृद्ध व्यक्तिमत्व होऊन त्याच्याकडं परतणं केव्हाही इष्ट !

एक गोंधळलेला माणुस 

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

एअरबस ते एसटी via पार


 

सायंकाळी नेहमीप्रमाणे पारावर कंपू गप्पा मारायला जमला होता. वर्षानुवर्षे ही रामगावची परंपरा होती. अचानक दूरवरून भाऊराव तावातावाने पाराच्या दिशेनं येताना दिसले.

नाना - "अरे हा का आज वैतागलेला दिसतोय ?"

तात्या - " ह्याला काय वैतागायला कारण लागतं होय ? बहुदा शेजाऱ्याने ह्याच्या पोरानं उडविलेला फुगा बेचकीनं फोडलेला असावा"

आधीच वैतागलेल्या भाऊरावांच्या कानावर तात्यांचे हे वाक्य ओझरते पडले. बसता बसता तात्याला एक धक्का देण्याची संधी भाऊरावाने सोडली नाही. 

आप्पा - "भाऊ, झालं तरी काय इतकं वैतागायला?"

भाऊ - "काय सांगु आप्पा, पोरगी म्हणते की मी आता कॉलेजात जाणार नाही!"

आप्पा - "अन ते का म्हणून ?"

भाऊ - " ते आपले टाटा आणि एअर इंडिया मिळून ४७० विमानं घेणार आहेत ना, म्हणून"  हे सांगताना भाऊंच्या कपाळावरील आठ्या स्पष्ट दिसत होत्या. 

गुरुजी - "म्हणजे सारिकाला एक विमान वगैरे देणार की काय, टाटा ?"

हे बोलणारे गुरुजी होते म्हणून वाचले, दुसरं कोणी असतं तर भाऊंचा सर्व राग त्याच्यावर निघाला असता. 

भाऊ - "नाही हो! तिला एअर होस्टेस होण्याची स्वप्नं पडू लागली आहेत. जगातील प्रत्येक शहरात थेट विमानसेवा सुरु करणार एअर इंडिया. म्हणजे आपली नक्कीच हवाई सुंदरी म्हणून वर्णी लागेल असा तिला आत्मविश्वास वाटू लागला आहे. काल कोण्या मैत्रिणीशी बोलत होती फोनवर. अमुकतमुक शहरांतील फोटो इंस्टावर टाकला तर किमान पाचशे लाईक मिळतील असं म्हणत होती!

बाजूला बसलेल्या खट्याळ टिनूला फुटलेल्या हास्यरसाच्या उकळ्या तो मोठ्या प्रयत्नानं दाबून ठेवत होता. मोठ्या गांभीर्याचा आव आणत तो म्हणाला, "भाऊ, बघा आपली कोकणात मोठी जमीन आहे. टाटांना सांगा इतकी ४७० विमानं ठेवायला नवीन विमानतळ तर लागणारच की नाही. तुमचीच जमीन देऊन टाका त्यांना विमानतळासाठी! मुलगी एअर होस्टेस, जमिनीवर विमानतळ! तुम्ही अगदी सेटल होऊन जाल बघा !"

टिनूच्या ह्या बोलण्यानं मात्र कंपू अगदी गंभीर झाला. त्याच्या बोलण्यात तथ्य आहे असंच सर्वांना वाटू लागलं. त्याच वेळी कधी नव्हे त्या सगुणाबाई पारासमोरून चालल्या होत्या. सर्व कंपूला एकत्र आणि तेही गंभीर पाहून त्यांना आपलं कुतूहल आवरता आलं नाही.  

सगुणाबाई - "रामराम ! आज सर्वजण कोणत्या विषयावर चर्चा करताहेत? " 

तात्यांनी त्यांना थोडक्यात सर्व चर्चेचा तपशील सांगितला. अचानक सगुणाबाईंच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. 

सगुणाबाई - "कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात असं काही आम्ही होऊ देणार नाहीत. आम्ही आंदोलन उभारू !"

"आंदोलन" शब्द ऐकताच तात्यांचे कान टवकारले.  आंदोलनासाठी लागणारी माणसे आम्ही सवलतीच्या दरात पुरवू असं हळूच त्यांनी सगुणाबाईंच्या कानात सांगितलं. सगुणाबाई अजूनच रागावल्या. त्यांचा रागावलेला चेहरा पाहताच त्यांना शांत करण्यासाठी विमानतळ जरी झालं तरी त्याच्या धावपट्टीवर आपण रविवारी सकाळी लहान मुलांच्या खेळांचं आयोजन करू असे तात्यांनी म्हणताच त्यांचा राग काहीसा निवळला. 

गावात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारा सदानंद उर्फ सँडी इतका वेळ शांत बसून हे ऐकत होता. अचानक तो उभा राहिला. 

सँडी - "Guys, Please listen to me! I have brilliant idea" 

आपण guys म्हटल्यावर सर्वजण आजुबाजूला गाई आल्या की काय ह्याचा शोध घेऊ लागले आहेत हे सँडीला समजलं. त्यामुळं तो लगेचच जमिनीवर आला. 

सँडी - " मोठ्या लोकांनो !" 

"ह्याच्या वडिलांना ह्याला मराठी शाळेत टाकायला सांगितलं होतं मी" तात्या आप्पांच्या कानांत पुटपुटले. त्यांच्याकडं दुर्लक्ष करत सँडी बोलत राहिला. 

सँडी - "नवीन एअरपोर्ट बांधला की तिथं येणाऱ्या ट्रॅव्हलर्ससाठी  कॅब्स लागणार. म्हणजे इथं मला एक मोठी business opportunity दिसते आहे." 

कॅब्स म्हणजे अनेक कोबी असावेत अशी समजुत केलेल्या आप्पांना पुढील वाक्य कळेनासं झालं. त्यानंतर सँडी पुर्ण सुटला होता. 

"आपल्यापैकी काही जणांनी मिळून नवीन aggregator cab कंपनी उभारूयात! म्हणजे पंचकोनातील युवकांना जॉब्स मिळतील !" 

भाऊ (रागावून) - "पंचकोनातील नाही पंचक्रोशीतील !"

सँडी - "हा हा तेच ते ! तर सर्वांना जॉब्स मिळतील. गावातील महिला भाकऱ्या, ठेचा बनवतील. तो आपण विमानात authentic इंडियन ब्रेकफास्ट म्हणून विकूयात ! "

सर्वजण अवाक होऊन सँडीचे बोलणं ऐकत होते. त्यामुळं स्वतःवर अजून खुश होत सँडी पुढे म्हणाला. "माझ्याकडं अजून काही जबरदस्त आयडिया आहेत. भारतीय लोकांना matching कलर्सचे आकर्षण आहे. त्यामुळं आपण टाटांना I mean एअरबस कंपनीला वेगवेगळ्या रंगांत विमानं रंगवायला सांगू. "

भाऊ - "तो वांगी रंग नक्की कोणता ते टाटांना नीट सांगा. त्या दिवशी वेगवेगळ्या दहा रंगांच्या वांग्याचा फोटो व्हाट्सअँपवर आला होता! त्यावरून घरी मोठी वादावादी झाली होती"

भाऊंच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करत सँडी बोलतच राहिला. ज्या रंगांचे विमान विमानतळावर उतरणार त्याच रंगांच्या टॅक्सी प्रवाशांना प्रवासासाठी द्यायच्या. अशा प्रकारचे ऑनलाईन बुकिंग करण्यासाठी नवीन वेबसाईट करायची वगैरे वगैरे ! कंपू  अगदी भारावून गेला होता. अजून बराच काळ खरंतर ही मैफिल चालली असती. पण दोन तास उशीर झालेली बोरीगाववरुन आलेली एसटी सर्व कंपूला धुलीस्नान करून जोरात पुढे निघून गेली. त्या एसटीला, चालकाला शेलक्या शब्दांत आहेर देत कंपू आपापल्या घरी परतला. 

४७० विमानं येतील तेव्हा येतील पण तुमची  सध्या गाठ माझ्याशीच आहे ह्याची एसटीने त्यांना आठवण करून दिली होती. 


(तळटीप - ह्या पोस्टची संकल्पना एका व्हाट्सअँप ग्रुपवरील चर्चेतून मिळाली आहे. ह्या पोस्टमधील पात्रांचा आणि प्रत्यक्ष जीवनातील काहीही संबंध नाही. जर का असा संबंध तुम्हांला जाणवला तर तो निव्वळ योगायोग समजावा )

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

मनोगत


शुभ दुपार,  मित्रमैत्रिणींनो, 
 
आज तीन वर्षांच्या कालावधीनंतर आपण भेटत आहोत.  ह्या टप्प्यावर आयुष्याकडं कसं पाहावं यासंबंधी माझे विचार  तुमच्या समोर मांडत आहे. 

बालपणी आपण सगळ्यांनीच आयुष्याकडं कुतूहलानं, उत्साहानं  पाहिलं. त्यानंतर तारूण्यात अगदी नाट्यमयरित्या म्हणायचं झालं तर अगदी गगनाला गवसणी घालण्याइतपत स्वप्नं पाहिली नसली तरी काहीतरी लक्षणीय करावं अशी सुप्त इच्छा मनात बाळगली असेल. नशिबानं बऱ्याच काही गोष्टी मनासारख्या घडल्या असतील, काही निसटल्या असतील. आता ह्या क्षणी व्यावसायिक क्षेत्रात अजूनही बरंच काही करण्यासारखं असेलही. पण ते साध्य करण्यासाठी आयुष्यातील इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत एका विशिष्ट मर्यादेपलीकडं तडजोड करण्याची आपली तयारी नाही. त्यामुळं ह्या क्षणी  तटस्थेनं जीवनाकडे, स्वतःकडे पाहणं हा समाधानी जीवनाचा मूलमंत्र आहे. त्यासाठी विरक्ती यायला हवी, जे सध्या तरी कठीण आहे :). तटस्थता, विरक्ती ही मार्गदर्शक तत्त्वं आपल्या अधिकृत भूमिकांसाठी असली तरी काही वेळा त्यातूनही मुक्त होऊन जगायला हवं. खेळकरपणा, मस्तीखोरपणा सारं काही अधूनमधून तरी नक्की हवा. त्यासाठी काही सोशल ग्रुप असणे, मित्र मंडळी नातेवाईकांच्या नियमित भेटी होणे आवश्यक आहे. 

सत्तरीनंतर वैद्यकीय उपचारांचा अतिरेक नको असला तरी त्याशिवाय पर्याय नाही. नैसर्गिकरित्या आयुष्य जगण्याची सवय केली तर  शरीर आपल्याला चांगली साथ देईल. आयुष्यातील शिस्त ह्या टप्प्यावर खूप महत्त्वाची आहे. चवीसाठी मटण खावं, त्याची चव मला अप्रतिम वाटते ! मला स्वतः ला खाटखूट नावाचा मासा आवडतो. तो ही खावा! पण यावर मर्यादा येतील का या विचाराने कधी तरी उगाच अस्वस्थ होतो.

 स्वतःकडं तटस्थ मनोवृत्तीद्वारे पाहता यायला हवं. म्हणजे नक्की काय? आपण बराच वेळ कामाच्या ठिकाणी असतो. कार्यालयीन कामात कधी तरी आपल्या मर्यादा उघड होण्याची शक्यता असते. Which is absolutely ok. त्यातून शिकावं पुढं जावं. स्वतःच्या मर्यादा उघड होण्याचे प्रसंग येऊ शकतात, त्यांना स्वीकारायला हवे, हा व्यावसायिक जीवनाचा महत्वाचा धडा आहे, हे मी माझ्या वरिष्ठांकडून शिकलो. ह्यात माझ्या बॉसचे श्रेय मोठं आहे. Aditya, Don't take it personally! हे त्याचं आवडतं वाक्य! आयुष्याच्या सुरुवातीला घरी, शाळेत बरंचसं कौतुक होत राहिल्यानं जीवनातील परखडपणापासून मी काहीसा अनभिज्ञ, बायकोच्या शब्दात "लाडावलेला" होतो. 

आपल्याकडं तटस्थेनं पाहणं मला काहीसं सोपं गेलं ह्या मागं अजून एक मजेशीर कारण आहे. दोन तीन वर्षांपासून पृथ्वीवरील मनुष्यजीवन हा सर्वशक्तिमानाचा  AI / ML प्रयोग आहे असे मला वाटू लागले आहे. त्यानं मनुष्याला घडवलं, मनुष्याने संगणकाला घडवलं, त्याच्यात आता बुद्धीचा समावेश करणार. मग परमेश्वर थेट संगणकाशी संपर्क साधून मनुष्याला अद्दल घडविणार असले काहीबाही विचार माझ्या मनात येत राहतात. त्यामुळं आदित्याच्या बाबतीत जे काही घडतेय त्याकडं खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही कारण माणूस हे सर्वशक्तिमान देवाचे एक मॉडेल आहे, माणसाला जे काही वाटतं, तो जे काही करतो त्यावर देवाचे नियंत्रण आहे याची खात्री वाटू लागली आहे!  

माझा बॉस गेल्या आठवड्यात IIT मध्ये एका प्रदर्शनात मार्गदर्शनासाठी गेला होता. तिथं बहुसंख्य मुलांशी संवाद करताना त्यांनी स्टार्टअप सुरु करणे हे आपलं ध्येय असल्याचं सांगितलं. बॉसने त्यांना एका सत्याची जाणीव करून दिली. एका यशस्वी स्टार्टअप मागे किमान दहा अयशस्वी स्टार्टअपस असतात.  त्या मुलांना ते कितपत रुचलं हे माहिती नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनं ही गोष्ट मला विश्लेषणासहीत सांगितली. माझ्यासोबत राहून तोही आता तत्वज्ञानी बनला आहे. "आपल्या आजोबांच्या पिढीचे ध्येय  survival हे होते. वडिलांच्या पिढीनं स्थैर्याला प्राधान्य दिलं. आपण काही प्रमाणात चंगळवादाकडं झुकलो. पुढील पिढीला instant gratification ची आस आहे. क्षणार्धात प्रसिद्ध होणं हे त्यांना महत्वाचं वाटतं" तो म्हणाला. काही प्रमाणात मी त्याच्याशी सहमत झालो. पण मी नवीन पिढीचे  इतक्या साचेबद्ध स्वरूपात वर्गीकरण करणार नाही. माझा मुलगा मला ज्या प्रमाणात फंडे देतो त्यावरून मला पुढील पिढीविषयी खूपच आशा वाटते. मी उत्तम शिक्षक आहे ही माझी भ्रामक समजूत "हल्लीच्या काळात शिक्षकानं खेळीमेळीने शिकवायला हवं " ह्या एका वाक्यात दूर केली. आजची ही पिढी पुढील दहा वर्षात आपल्यासारखीच होईल ह्याविषयी मी अगदी शाश्वत आहे. 

लहानपणीचे आदर्श मनात बाळगून हल्लीच्या काळात सर्व काही चुकीचं घडतंय असं आपल्याला वाटतं पण ते खूपदा चुकीचे असू शकते. आमच्या महामंडळाचे उदाहरण देतो. माझ्या मनात स्वातंत्र्यदिनी पेटी वाजविणाऱ्या म्हात्रे गुरुजींची प्रतिमा कायम होती. मधली कित्येक वर्षे मी महामंडळात गेलो नव्हतो. त्यामुळं बऱ्याच वर्षांनी मी जेव्हा महामंडळात गेलो तेव्हा बाजीपूरमधील म्हात्रे गुरुजींना शोधत राहिलो. आणि ते न सापडल्यानं उदास बनलो. अचानक पल्लवी दिसली. ती अगदी उत्साहानं सर्व समारंभांत भाग घेत होती. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काळानुसार परिस्थितीत बदल होतो. त्या बदलासह आपल्याला प्रवास सुरु ठेवता यायला हवा. जुन्या आदर्श प्रतिमेला मनात कायम ठेवावं पण नव्या प्रतीमेसाठी  सुद्धा जागा करून द्यावी.  चांगुलपणाचा धागा समाजात पुढं सतत जात राहतो. तो शोधण्याची दृष्टी असायला हवी. आणि त्यात आपल्या परीनं भर घालता यायला हवी. शेवटी काही झालं तरी हे interactive AI/ML Model आहे 

"व्यक्त होणं महत्वाचं आहे ह्याची जाणीव झालेली व्यक्ती ! "- माझ्या एका गटातील एका व्यक्तीचं हे status आहे. विचार करण्यासारखं आहे. व्यक्त होणं ही बऱ्याच जणांची गरज आहे. त्या सर्वांचीच ती गरज पूर्ण होते, असं नाही. आपल्याकडे परिचयातील, ऑफिसातील बरेच जण व्यक्त होण्यासाठी येतात. कार्यालयीन समस्या, काहीजण घरगुती समस्या आपल्या बरोबर शेयर करतात.  पण ह्यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे आपल्यात हा गुण आहे हे  सुरवातीला लक्षात येत नाही पण आपण इतरांना अशीही मदत करू शकतो. नुसते त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्यानेही त्या माणसाला बरे वाटते. आयुष्यातील ह्या टप्प्यावर आपल्याला आपल्यातील सुप्त गुणांचा शोध घेता यायला हवा. अधिक समाजपयोगी बनायला हवे. त्यासाठी विश्वासू मित्रांचे वर्तुळ असावं. राकेश आणि आजचे आयोजक  यात आदर्श आहेत. त्यांनी आज पुढाकार घेऊन अनेकांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. 

मी कधीतरी कामानिमित्त अमेरिकेत  जातो. तिथं ठरलेलं एक हॉटेल आहे तिथंच राहतो. तिथं स्वागतकक्षावर एक म्हातारे गृहस्थ आहेत. त्यांनी वयाची ऐंशी पार केली असावी! आपलं काम अगदी चोख करतात. परतताना विमान थोडं उशिरा असेल तर चेक आऊटच्या वेळी  वाढीव दोन तीन तास असंच राहा असं सांगतात, स्वतः ची काळजी घे असंही आवर्जून सांगतात. बर्फ पडत असला किंवा वारे सुटले की काळजी घे असं सांगतात. मलाच नव्हे तर बऱ्याच जणांना त्यांचा हा चांगला अनुभव येतो. असे काही अनुभवले की चांगुलपणावर हे जग सुरळीतपणे सुरू आहे असा आपला विश्वास बसतो. 

मी बऱ्यापैकी कर्मठ आहे असं प्राजक्ता म्हणते. त्यानंतर आता काही बहिणी सुद्धा म्हणतात.  ऑफिसातील पार्ट्यांत नवीन पिढीतील काही लोक सुरेख नाचतात. मग मलाही नाचण्याचा आग्रह केला जातो. मला केवळ वसईतील ख्रिश्चन लग्नांतील वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवर एक हात वर करून नाचता येते. नीट नाचता येत नाही या गोष्टींचा माझ्या मनात बरेच दिवस न्यूनगंड होता. पण गेल्या वर्षी एका पार्टीत मी तिशीतील एका मुलाजवळ जाऊन बसलो आणि त्याला विचारलं अरे बाबा तू इथं का बसला आहेस. नाचत का नाहीस? तो म्हणाला - हा सगळा थिल्लरपणा आहे, मला पटत नाही. मी अत्यंत खुश झालो, आपण एकटेच नाही आहोत ही भावना सुखावणारी होती. पण खूप लोकात नाचणे मला खरच मनापासून आवडत नाही हे स्वीकारायला हवे असे माझ्या मनात आले. Accept the moment the way it is! हे या टप्प्यावर तरी शिकायला हवं.

मला नक्की काय म्हणायचं आहे? आयुष्य काही प्रमाणात सुंदर आहे. हे सौंदर्य आपसूकपणे आपल्या वाट्याला येणारं नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. भोवताली चांगुलपणा आहे, परंपरागत चाललेल्या चालीरीती आहेत अगदी आकाशवाणीवरील मंगलप्रभात सुद्धा आहे. पण पूर्वी हे सर्व काही उघडपणे समोर होतं, आज त्याचा काहीसा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सर्व प्रक्रियेत आपल्या सारख्या बालमित्रांची साथसंगत असली की एका विश्वासानं ह्या शोधात सामील होता येतं !!

आपण सर्व जीवनातील बहुविध अनुभवांना सामोरे गेलो आहोत. आपल्या सर्वांची मनोगतं ऐकणं खूप आवडेल. त्यामुळे सर्वांनी व्यक्त व्हावं हीच विनंती !
धन्यवाद 
आदित्य !!

रविवार, १ जानेवारी, २०२३

न चल अकेला !




कोणी काही म्हणो माणुस एकटाच असतो. म्हणावं तर लहानपणीचा काळ ह्याला अपवाद असतो. आईवडिलांच्या मायेच्या ऊबेत जीवनाचा उषःकाल व्यतीत केलेल्या बालकास नंतर मात्र परखड वास्तवास सामोरे जावं लागतं. 

काहीजणांना हे वास्तव सहन करण्याची क्षमता उपजत प्राप्त झालेली असते. त्यांचं आयुष्य व्यवस्थित चाललेलं असतं. आयुष्यात यश / अपयशाला सामोरे जावं लागणं, सुखद / दुःखद घटनांना तोंड द्यावं लागणं ह्या सर्वांना ह्या व्यक्ती फारशा न डगमगता सामोऱ्या जातात. मनाचा खंबीरपणा ही एक देणगी अशा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना लाभली असते असं आपण म्हणू शकतो. लोकांचं लक्ष आपल्याकडं वेधून घेणं, लोक आपल्याविषयी काय म्हणतील ह्याविषयी विचार करण्यात फारसा वेळ न दवडणे अशा व्यक्तिवैशिष्ट्यामुळं ही माणसं आपल्याला हव्या त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकतात. 

दुसऱ्या प्रकारची व्यक्तिमत्वं एका वेगळ्याच संघर्षाला तोंड देत असतात. लोकांनी आपल्याला स्वीकारावं, हे स्वीकारलं आहे ह्याची वेळोवेळी दृश्य स्वरूपात दखल घ्यावी अशी ह्यांची सुप्त अपेक्षा असते. वाढत्या वयानुसार ही अपेक्षा उघडपणे व्यक्त न करता आल्यानं  ह्या व्यक्तींचा काहीसा कोंडमारा होत राहतो. ह्यांच्या नशिबानं जर ह्यांना असा साथीदार अथवा सुहृद मिळाला जो ह्यांच्या ह्या दखलीकरणाच्या  अपेक्षेच्या भावनेला उमजू शकेल तर त्यांचं आयुष्य सुखकारक होऊ शकते. 

पण सर्वचजण असे सुदैवी नसतात. आयुष्यातील वयानुसार आलेल्या जबाबदाऱ्या पार पडत राहणं हेच ह्यांच्या नशिबात असतं. आता जग इतकं भावनाशून्य होत चाललं आहे की आपल्या भोवताली असणाऱ्या अशा व्यक्तींची आपल्याला बऱ्याच वेळा जाणीव सुद्धा होत नाही. लौकिकार्थानं ह्या व्यक्तींचं आयुष्य एक सरळ रेषेत व्यवस्थित चाललेलं असतं. पण कौतुकाच्या एका किमान अपेक्षेपासून ह्या व्यक्ती वंचित राहतात.  अशा व्यक्ती ओळखाव्या कशा? बोलण्यात उत्साह नसणं, आपल्या आवडीनिवडीविषयी फारसा चोखंदळपणा न दाखविणे, समारंभात केवळ एक उपचार म्हणून उपस्थित असणं वगैरे वगैरे! 

ही पोस्ट आटोपशीर आहे. उद्देश्य एकच ! भोवताली असलं व्यक्तिमत्व आहे का ह्याचा शोध घ्या आणि त्यांची वेळोवेळी दखल घ्या. जगाचं झपाट्यानं अलिप्तीकरण होत आहे. माणसं एकटी पडत चालली आहेत. त्यांना परत उमेद देण्यासाठी तुमचा एक दूरध्वनी , एक भेट पुरेशी आहे. कोणी काही म्हणेल ह्याचा विचार न करता अशा लोकांनां स्वतःहून भेटा, त्यांच्याशी बोला. 

ही पोस्ट माझ्या शाळेच्या मित्रांना समर्पित जे आपल्या व्यग्र दिनचर्येतून वेळ काढून आपल्या मित्रांना भेट देत आहेत. मी काहीसा ह्या बाबतीत दोषी आहे. माझे लिखाण आणि माझे आचरण ह्यात काहीशी विसंगती आहे. योग्य वेळी ही विसंगती दूर करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन.   

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...