मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

मनोगत


शुभ दुपार,  मित्रमैत्रिणींनो, 
 
आज तीन वर्षांच्या कालावधीनंतर आपण भेटत आहोत.  ह्या टप्प्यावर आयुष्याकडं कसं पाहावं यासंबंधी माझे विचार  तुमच्या समोर मांडत आहे. 

बालपणी आपण सगळ्यांनीच आयुष्याकडं कुतूहलानं, उत्साहानं  पाहिलं. त्यानंतर तारूण्यात अगदी नाट्यमयरित्या म्हणायचं झालं तर अगदी गगनाला गवसणी घालण्याइतपत स्वप्नं पाहिली नसली तरी काहीतरी लक्षणीय करावं अशी सुप्त इच्छा मनात बाळगली असेल. नशिबानं बऱ्याच काही गोष्टी मनासारख्या घडल्या असतील, काही निसटल्या असतील. आता ह्या क्षणी व्यावसायिक क्षेत्रात अजूनही बरंच काही करण्यासारखं असेलही. पण ते साध्य करण्यासाठी आयुष्यातील इतर ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत एका विशिष्ट मर्यादेपलीकडं तडजोड करण्याची आपली तयारी नाही. त्यामुळं ह्या क्षणी  तटस्थेनं जीवनाकडे, स्वतःकडे पाहणं हा समाधानी जीवनाचा मूलमंत्र आहे. त्यासाठी विरक्ती यायला हवी, जे सध्या तरी कठीण आहे :). तटस्थता, विरक्ती ही मार्गदर्शक तत्त्वं आपल्या अधिकृत भूमिकांसाठी असली तरी काही वेळा त्यातूनही मुक्त होऊन जगायला हवं. खेळकरपणा, मस्तीखोरपणा सारं काही अधूनमधून तरी नक्की हवा. त्यासाठी काही सोशल ग्रुप असणे, मित्र मंडळी नातेवाईकांच्या नियमित भेटी होणे आवश्यक आहे. 

सत्तरीनंतर वैद्यकीय उपचारांचा अतिरेक नको असला तरी त्याशिवाय पर्याय नाही. नैसर्गिकरित्या आयुष्य जगण्याची सवय केली तर  शरीर आपल्याला चांगली साथ देईल. आयुष्यातील शिस्त ह्या टप्प्यावर खूप महत्त्वाची आहे. चवीसाठी मटण खावं, त्याची चव मला अप्रतिम वाटते ! मला स्वतः ला खाटखूट नावाचा मासा आवडतो. तो ही खावा! पण यावर मर्यादा येतील का या विचाराने कधी तरी उगाच अस्वस्थ होतो.

 स्वतःकडं तटस्थ मनोवृत्तीद्वारे पाहता यायला हवं. म्हणजे नक्की काय? आपण बराच वेळ कामाच्या ठिकाणी असतो. कार्यालयीन कामात कधी तरी आपल्या मर्यादा उघड होण्याची शक्यता असते. Which is absolutely ok. त्यातून शिकावं पुढं जावं. स्वतःच्या मर्यादा उघड होण्याचे प्रसंग येऊ शकतात, त्यांना स्वीकारायला हवे, हा व्यावसायिक जीवनाचा महत्वाचा धडा आहे, हे मी माझ्या वरिष्ठांकडून शिकलो. ह्यात माझ्या बॉसचे श्रेय मोठं आहे. Aditya, Don't take it personally! हे त्याचं आवडतं वाक्य! आयुष्याच्या सुरुवातीला घरी, शाळेत बरंचसं कौतुक होत राहिल्यानं जीवनातील परखडपणापासून मी काहीसा अनभिज्ञ, बायकोच्या शब्दात "लाडावलेला" होतो. 

आपल्याकडं तटस्थेनं पाहणं मला काहीसं सोपं गेलं ह्या मागं अजून एक मजेशीर कारण आहे. दोन तीन वर्षांपासून पृथ्वीवरील मनुष्यजीवन हा सर्वशक्तिमानाचा  AI / ML प्रयोग आहे असे मला वाटू लागले आहे. त्यानं मनुष्याला घडवलं, मनुष्याने संगणकाला घडवलं, त्याच्यात आता बुद्धीचा समावेश करणार. मग परमेश्वर थेट संगणकाशी संपर्क साधून मनुष्याला अद्दल घडविणार असले काहीबाही विचार माझ्या मनात येत राहतात. त्यामुळं आदित्याच्या बाबतीत जे काही घडतेय त्याकडं खूप गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही कारण माणूस हे सर्वशक्तिमान देवाचे एक मॉडेल आहे, माणसाला जे काही वाटतं, तो जे काही करतो त्यावर देवाचे नियंत्रण आहे याची खात्री वाटू लागली आहे!  

माझा बॉस गेल्या आठवड्यात IIT मध्ये एका प्रदर्शनात मार्गदर्शनासाठी गेला होता. तिथं बहुसंख्य मुलांशी संवाद करताना त्यांनी स्टार्टअप सुरु करणे हे आपलं ध्येय असल्याचं सांगितलं. बॉसने त्यांना एका सत्याची जाणीव करून दिली. एका यशस्वी स्टार्टअप मागे किमान दहा अयशस्वी स्टार्टअपस असतात.  त्या मुलांना ते कितपत रुचलं हे माहिती नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनं ही गोष्ट मला विश्लेषणासहीत सांगितली. माझ्यासोबत राहून तोही आता तत्वज्ञानी बनला आहे. "आपल्या आजोबांच्या पिढीचे ध्येय  survival हे होते. वडिलांच्या पिढीनं स्थैर्याला प्राधान्य दिलं. आपण काही प्रमाणात चंगळवादाकडं झुकलो. पुढील पिढीला instant gratification ची आस आहे. क्षणार्धात प्रसिद्ध होणं हे त्यांना महत्वाचं वाटतं" तो म्हणाला. काही प्रमाणात मी त्याच्याशी सहमत झालो. पण मी नवीन पिढीचे  इतक्या साचेबद्ध स्वरूपात वर्गीकरण करणार नाही. माझा मुलगा मला ज्या प्रमाणात फंडे देतो त्यावरून मला पुढील पिढीविषयी खूपच आशा वाटते. मी उत्तम शिक्षक आहे ही माझी भ्रामक समजूत "हल्लीच्या काळात शिक्षकानं खेळीमेळीने शिकवायला हवं " ह्या एका वाक्यात दूर केली. आजची ही पिढी पुढील दहा वर्षात आपल्यासारखीच होईल ह्याविषयी मी अगदी शाश्वत आहे. 

लहानपणीचे आदर्श मनात बाळगून हल्लीच्या काळात सर्व काही चुकीचं घडतंय असं आपल्याला वाटतं पण ते खूपदा चुकीचे असू शकते. आमच्या महामंडळाचे उदाहरण देतो. माझ्या मनात स्वातंत्र्यदिनी पेटी वाजविणाऱ्या म्हात्रे गुरुजींची प्रतिमा कायम होती. मधली कित्येक वर्षे मी महामंडळात गेलो नव्हतो. त्यामुळं बऱ्याच वर्षांनी मी जेव्हा महामंडळात गेलो तेव्हा बाजीपूरमधील म्हात्रे गुरुजींना शोधत राहिलो. आणि ते न सापडल्यानं उदास बनलो. अचानक पल्लवी दिसली. ती अगदी उत्साहानं सर्व समारंभांत भाग घेत होती. माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. काळानुसार परिस्थितीत बदल होतो. त्या बदलासह आपल्याला प्रवास सुरु ठेवता यायला हवा. जुन्या आदर्श प्रतिमेला मनात कायम ठेवावं पण नव्या प्रतीमेसाठी  सुद्धा जागा करून द्यावी.  चांगुलपणाचा धागा समाजात पुढं सतत जात राहतो. तो शोधण्याची दृष्टी असायला हवी. आणि त्यात आपल्या परीनं भर घालता यायला हवी. शेवटी काही झालं तरी हे interactive AI/ML Model आहे 

"व्यक्त होणं महत्वाचं आहे ह्याची जाणीव झालेली व्यक्ती ! "- माझ्या एका गटातील एका व्यक्तीचं हे status आहे. विचार करण्यासारखं आहे. व्यक्त होणं ही बऱ्याच जणांची गरज आहे. त्या सर्वांचीच ती गरज पूर्ण होते, असं नाही. आपल्याकडे परिचयातील, ऑफिसातील बरेच जण व्यक्त होण्यासाठी येतात. कार्यालयीन समस्या, काहीजण घरगुती समस्या आपल्या बरोबर शेयर करतात.  पण ह्यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे आपल्यात हा गुण आहे हे  सुरवातीला लक्षात येत नाही पण आपण इतरांना अशीही मदत करू शकतो. नुसते त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेण्यानेही त्या माणसाला बरे वाटते. आयुष्यातील ह्या टप्प्यावर आपल्याला आपल्यातील सुप्त गुणांचा शोध घेता यायला हवा. अधिक समाजपयोगी बनायला हवे. त्यासाठी विश्वासू मित्रांचे वर्तुळ असावं. राकेश आणि आजचे आयोजक  यात आदर्श आहेत. त्यांनी आज पुढाकार घेऊन अनेकांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. 

मी कधीतरी कामानिमित्त अमेरिकेत  जातो. तिथं ठरलेलं एक हॉटेल आहे तिथंच राहतो. तिथं स्वागतकक्षावर एक म्हातारे गृहस्थ आहेत. त्यांनी वयाची ऐंशी पार केली असावी! आपलं काम अगदी चोख करतात. परतताना विमान थोडं उशिरा असेल तर चेक आऊटच्या वेळी  वाढीव दोन तीन तास असंच राहा असं सांगतात, स्वतः ची काळजी घे असंही आवर्जून सांगतात. बर्फ पडत असला किंवा वारे सुटले की काळजी घे असं सांगतात. मलाच नव्हे तर बऱ्याच जणांना त्यांचा हा चांगला अनुभव येतो. असे काही अनुभवले की चांगुलपणावर हे जग सुरळीतपणे सुरू आहे असा आपला विश्वास बसतो. 

मी बऱ्यापैकी कर्मठ आहे असं प्राजक्ता म्हणते. त्यानंतर आता काही बहिणी सुद्धा म्हणतात.  ऑफिसातील पार्ट्यांत नवीन पिढीतील काही लोक सुरेख नाचतात. मग मलाही नाचण्याचा आग्रह केला जातो. मला केवळ वसईतील ख्रिश्चन लग्नांतील वाजवल्या जाणाऱ्या गाण्यांवर एक हात वर करून नाचता येते. नीट नाचता येत नाही या गोष्टींचा माझ्या मनात बरेच दिवस न्यूनगंड होता. पण गेल्या वर्षी एका पार्टीत मी तिशीतील एका मुलाजवळ जाऊन बसलो आणि त्याला विचारलं अरे बाबा तू इथं का बसला आहेस. नाचत का नाहीस? तो म्हणाला - हा सगळा थिल्लरपणा आहे, मला पटत नाही. मी अत्यंत खुश झालो, आपण एकटेच नाही आहोत ही भावना सुखावणारी होती. पण खूप लोकात नाचणे मला खरच मनापासून आवडत नाही हे स्वीकारायला हवे असे माझ्या मनात आले. Accept the moment the way it is! हे या टप्प्यावर तरी शिकायला हवं.

मला नक्की काय म्हणायचं आहे? आयुष्य काही प्रमाणात सुंदर आहे. हे सौंदर्य आपसूकपणे आपल्या वाट्याला येणारं नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. भोवताली चांगुलपणा आहे, परंपरागत चाललेल्या चालीरीती आहेत अगदी आकाशवाणीवरील मंगलप्रभात सुद्धा आहे. पण पूर्वी हे सर्व काही उघडपणे समोर होतं, आज त्याचा काहीसा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सर्व प्रक्रियेत आपल्या सारख्या बालमित्रांची साथसंगत असली की एका विश्वासानं ह्या शोधात सामील होता येतं !!

आपण सर्व जीवनातील बहुविध अनुभवांना सामोरे गेलो आहोत. आपल्या सर्वांची मनोगतं ऐकणं खूप आवडेल. त्यामुळे सर्वांनी व्यक्त व्हावं हीच विनंती !
धन्यवाद 
आदित्य !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...