मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

गोंधळलेली मध्यमवयीन माणसं


आयुष्य आपल्यापुढं काय वाढून ठेवेल हे नक्की सांगता येत नाही. तुम्हांला जाणवो  वा ना जाणवो  पण ह्या पोस्टमध्ये विनोदाची पेरणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 

आंतरिक मानसिक गोंधळ हा बहुसंख्य भारतीय मध्यमवयीन  माणसांच्या प्राक्तनात लिहिला असावा. ह्याला अपवाद दोन प्रकारची माणसं. पहिला प्रकार म्हणजे आपल्याला आयुष्याचं कोडं उलगडण्याची सुतराम शक्यता नाही हे पूर्णपणे उमजलेली माणसं. त्यामुळं त्यांना विचार न करता वागण्याचा परवाना मिळालेला असतो. मजेत जगतात ही माणसं. दुसरा प्रकारात आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचं हे जाणवलेली माणसं. हल्लीच्या भाषेत म्हणायचं झालं तर पूर्णपणे sorted असतात ही माणसं. आपल्याला हवं तेव्हा हवं तसं वागतात. कोणत्या लोकांशी कधी संपर्क ठेवावा हे त्यांना नक्की माहिती असतं. बऱ्यापैकी मजेत आयुष्य जगता येतं त्यांना. फक्त अशी लोक कदाचित जाणते अजाणतेपणी दुसऱ्यांचा वापर करून घेण्याची शक्यता असते. 

आता वळुयात पोस्टच्या केंद्रस्थानी असलेल्या जमातीकडं - गोंधळलेली मध्यमवयीन माणसं! इथं ही माणसं का गोंधळलेली असतात ह्याविषयी मी विविध मुद्दे सादर करत आहे. 

१. मोकळा वेळ - ह्या मध्यमवयीन  माणसांचा बालपणीचा काळ आईवडिलांकडून आज्ञा स्वीकारण्यात, त्यानंतर नवऱ्याला आज्ञा देण्यात / बायकोकडून आज्ञा घेण्यात आणि मुलांचं संगोपन करण्यात व्यस्त गेलेला असतो. अचानक एका टप्प्यावर आज्ञांची देवाणघेवाण विविध कारणांस्तव मंदावते, मुलं स्वावलंबी होतात. इतका प्रचंड वेळ फावला वेळ ह्या वर्गात दाखल झाल्यानं ह्या माणसांचा मेंदू अगदी गोंधळून जातो. देवानं आपल्याला इतका महत्वाचा मनुष्यजन्म दिला आणि त्यातील तासनतास, दिवसेंदिवस आपण असेच वाया घालवत बसलो तर पूर्ण आयुष्याचा हिशोब मांडायला बसल्यावर देव आपल्याला ओरडेल अशी त्यांना भिती वाटू लागते. त्यातच भर म्हणून उमराव जान मधील - तमाम उम्र का हिसाब मांगती है जिंदगी  ह्या ओळी त्यांच्या कानावर पडतात. त्यामुळं आपण एखादा छंद जोपासला पाहिजे ह्याचा त्यांना साक्षात्कार होतो. 

काही जणांना काही कारणास्तव मोकळा वेळ मिळत नाही. 'भला उसके पास मोकळा वेळ हैं और मेरे पास क्यू नहीं ?' ह्या विचारानं ते गोंधळून जातात. 

२. न उमगलेल्या गोष्टी - प्रत्येक माणसाला आयुष्यात न समजलेल्या बऱ्याच गोष्टी असतात. आयुष्याच्या एका टप्प्यापर्यंत ह्या गोष्टी आपल्याला कधीतरी समजू शकतात हा विश्वास बाळगून ही माणसं आयुष्य जगत असतात. पण एका क्षणी ह्या गोष्टी आपल्याला कधीच समजू शकणार नाहीत ह्याची त्यांना जाणीव होते. त्यामुळं त्यांच्या गोंधळात अजून भर पडते. वानगीदाखल काही उदाहरणं 

अ . शेअरबाजारातील चढावउतार. आपण प्रचंड अभ्यास करून घेतलेल्या शेयर्सचे आपण गुंतवणूक केल्यानंतर गडगडणे !

ब. Age is just a number - अमीरखान वगैरे मंडळीचे आवडतं असलेल्या ह्या वाक्याचं मराठी भाषांतर 'वय हा एक केवळ आकडा आहे' हे असावं का आणि असल्यास त्याचा नक्की अर्थ काय?

क. TOI  बरोबर येणाऱ्या बॉम्बे टाईम्स चे नामांतर मुंबई टाईम्स करावं म्हणून अजून कोणी आंदोलन कसं छेडलं नाही? त्यातील जे कोणी सेलेब्रिटी आहेत त्यातील बहुतांश लोकांना आपण कसं काय ओळखत नाही?

ड. प्रत्येक देशाकडं असलेल्या सोन्याच्या साठ्याच्या प्रमाणात त्या देशानं चलन बाळगावं असं ह्या माणसांनी लहानपणापासून ऐकलेले असते. ह्यामागचं नक्की कारण दहा मित्रांनी दहा बैठकीत समजावून सांगितल्यावर सुद्धा आपल्या डोक्यात प्रकाश का पडत नाही 

अशी ही यादी वाढतच जाते 

३. आपण ज्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो अशा लोकांची दिवसेंगणिक कमी होत जाणारी संख्या - हळुहळू आपलं फार कमी लोकांशी पटत आहे ह्याचा साक्षात्कार ह्या लोकांना होतो. ह्यासाठी ही लोक सुरुवातीला दुसऱ्यांना दोषी धरतात. मग काही काळानं कदाचित खरी समस्या आपणच आहोत ह्याची जाणीव त्यांना होऊ लागते. हे आपल्या बाबतीत कसं काय होऊ शकते ह्याचा प्रचंड धक्का त्यांना बसतो. बिचारी अजूनच गोंधळून जातात. 

मध्यमवर्गीय माणसं गोंधळून जाण्याची तीन कारणं आपण पाहिलीत. आता ही लोक ह्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहुयात. 

१. छंद - आपल्याला काही छंद असायला हवा ह्याची जाणीव त्यांना होते. ह्या वयात छंद जोपासणं हे काहीसं कठीण जात असलं तरीही हे लोक जिद्दीनं प्रयत्न करतात. ब्लॉग लिहिणं, कविता करणं, फुलांचे फोटो काढणं, किशोरकुमारची गाणी गाणं, वनात शांत बसलेल्या पक्ष्यांना कॅमेरात टिपणं वगैरे वगैरे. जोवर हा छंद आपला वेळ योग्य रितीनं व्यतीत करण्यासाठी आपण जोपासत आहोत तोवर ठीक. ज्याक्षणी आपण कौतुकाच्या अपेक्षेनं हे करायला जातो तिथं गोंधळ होतो. छंदामध्ये योग्य अंशी विरक्ती समाविष्ट असावी. 

२. कंपू - आपल्यासारख्या समविचारी लोकांचा कंपू बनवून चर्चा, सामाजिक कार्य करणे वगैरे वगैरे. काहीजणांना कंपू बनवून विधायक कार्य करायचं असतं, तर काहीजणांना केवळ धमाल करायची असते तर काहीजणांना काही भव्यदिव्य ध्येयाच्या पडद्याआडून वेळ घालवायचा असतो, आपली प्रसिद्ध होण्याची भूक भागवून घ्यायची असते. एक गोष्ट मात्र खरी की असे कंपू चांगली कामं नक्कीच करतात. त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही. फक्त ह्यात गटबाजी होऊ नये, किंवा एखाद्या व्यक्तीला लक्ष्य करणे असले प्रकार होऊ नयेत आणि योग्य वेळ येताच आपण बाजूला होऊन नवीन लोकांना संधी देता यायला हवी. आणि हो कंपूच्या माध्यमातून मदिराप्राशनाचे वाढतं प्रमाण अगदी चुकीचं. पण हल्ली ह्या मुद्द्यावरून लोक अगदी आक्रमक भूमिका घेतात. त्यामुळं ह्यावर न बोललेलंच बरं !

ह्या आधी मांडलेला मुद्दा पुन्हा एकदा मांडतोय. तुम्ही जर स्वतःला काही चांगल्या गोष्टीत व्यस्त ठेवू पाहत असाल तर वाचन, संगीतश्रवण, निसर्ग ह्यासारखे उत्तम पर्याय नाहीत. सर्वशक्तिमानाकडं परतण्याच्या मार्गावर असताना एक समृद्ध व्यक्तिमत्व होऊन त्याच्याकडं परतणं केव्हाही इष्ट !

एक गोंधळलेला माणुस 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...