मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १४ जून, २०२०

सुशांत ...


सुशांत सिंगच्या अकाली मृत्युची बातमी कळली. मोठा धक्का बसला, खुप वाईट वाटलं. सद्यःकाली मुंबई हे एकट्यानं राहण्याचं शहर राहिलं नाही. शहरानं आपला माणुसकीचा चेहरा काही काळासाठी बाजुला सारला आहे. अशा वेळी तुमच्या सोबत जिवाभावाचे माणुस हवंच !

काही आठवड्यापुर्वी धोनीच्या भुमिकेत सुशांतला पाहिला. सुशांतची भूमिका आणि मी पाहिलेला हा पहिला चित्रपट ! सुशांत माझ्या लक्षात राहिला तो त्यानं ज्या शांतपणे ही भुमिका निभावली त्यासाठी ! ह्या भुमिकेत कुठंही आक्रस्ताळेपणा जाणवला नाही.  दुर्देवानं आज ही बातमी ऐकायला मिळाली. 

ही टोकाची भुमिका घेण्याआधी तो कोणत्या मनःस्थितीतुन गेला असेल ह्याचा विचार करणं कठीण जातं. संपुर्ण विश्व एका बाजुला व दुसऱ्या बाजुला मी आणि  माझी समस्या ! ही समस्या इतकी गहन की त्यातुन माझी  कोणीही सुटका करु शकणार नाही ! 

आता लोक म्हणणार, सुशांत तु जवळच्या लोकांशी संपर्क करायला हवा होता. त्यांच्याशी बोलुन पहायला हवं होतं. पण हे फार कठीण असतं. सुशांत एकटा नाही असे अनेकजण भोवताली आहेत. ह्या सर्वांच्या वेदना, दुःख ऐकुन घ्यायला प्रत्येक वेळी कोणी असेलच ह्याची शाश्वती नाही !

लेखाच्या या पुढील भागात हे सारं काही सुशांतच्या बाबतीत घडलं आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही! हा संघर्ष सुशांतचा एकट्याचा नाहीये ! आपल्या सर्वांचा आहे ! 


नक्की काय होतंय ! आपल्या मुळ रुपात राहुन उपजीविका साध्य करु शकु असे मोजके व्यवसाय शिल्लक राहिले आहेत. चोवीस तासातील बराच काळ तुम्हांला तुमच्या मुळ रुपापेक्षा वेगळ्या रुपात वावरावं लागतं. कारण ही तुमच्या व्यवसायाची गरज असते. आपल्या मुळ रुपाला सोडुन ह्या वेगळ्या रुपात शिरताना, वावरताना तुमची प्रचंड ऊर्जा खर्च होत असते. जोवर ह्या ऊर्जेच्या समप्रमाणात तुम्हांला यश मिळत राहतं तोवर तुम्ही ही ऊर्जा स्वतः निर्माण करु शकता. 

ज्या क्षणी तुमच्या यशाची पातळी घसरु लागते किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही ताणतणाव निर्माण होतात त्यावेळी मात्र तुम्हांला कोणीतरी जवळचं लागतं. एक असते आपली मुळ प्रतिमा आणि दुसरी असते आभासी प्रतिमा जी आपण व्यावसायिक जगासाठी बनविलेली असते ! ज्यावेळी ह्या व्यावसायिक जगातील आपल्या क्षणभंगुरतेची आपल्याला जाणीव होते त्यावेळी आपल्याला आपल्या आभासी प्रतिमेचा तिटकारा येतो, तिच्यापासुन दूरदूर पळावेसे वाटतं. पण जिच्याकडं परत जावं ती आपली मुळ प्रतिमा कोसो मैल दुर गेलेली असते ! 

सगळ्याच माणसांच्या बाबतीत असं होतं असंही नाही ! म्हणजे काही जणांना कोणीतरी जवळचं लागतं तर काहीजणांना ते लागत नाही ! काही माणसं किंबहुना माणसांचे प्रकार स्वयंपुर्ण असतात. एकतर निराशावादी विचार त्यांच्या मनात निर्माण होत नाहीत किंवा तयार झाले तरी त्यांचीबुद्धी अशा विचारांचा वेळीच निचरा करते. 

आता ह्या क्लिष्ट समस्या निर्माण करणाऱ्या व्यवसायांपासून दुर जाऊन साधं आयुष्य स्वीकारावं म्हटलं तर साधं आयुष्य जगणाऱ्या माणसांना  सुखी म्हणावं अशी सुद्धा परिस्थिती जगानं  ठेवली नाही. भले ती माणसं सुखानं जगायला तयार असतील आणि ते ही आपल्या मुळ रुपात ! पण त्यांच्या विश्वात शिरुन जाहिरातींच्या आणि अन्य माध्यमातुन तुम्ही कसे विविध सुखांना पारखे झाले आहात ह्याची सदैव जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जातो ! ह्या अपप्रचाराला बळी पडु शकते ती युवामंडळी !

कोणत्याही चैनीच्या गोष्टींची जाहिरात करणाऱ्या माध्यमांवर तुम्हांला काहीतरी करुन आळा घालता यायला हवा किंवा त्यांना तितकाच खर्च करुन साध्या जीवनात सुद्धा कसं सुख मिळु शकतं ह्याची जाहिरात करावयास भाग पडायला हवं ! जितका जास्त विचार मी करतोय तितकं ह्यातुन बाहेर पडण्याचा रास्त मार्ग क्लिष्ट आहे हे जाणवतंय !

जगाचा हा प्रश्न सोडविणं कठीण आहे ! प्रयत्न वैयक्तिक पातळीवर करायला हवेत ! शांत मनोवृत्तीची शिकवण देता यायला हवी !  तुम्ही शहरात राहत नसाल, तुमच्याकडं शहरातील नोकरी नसेल तर तुमच्या आयुष्यातील भला मोठा भाग अपुर्ण राहिला आहे ह्या समजुतीचे समुळ उच्चाटन ज्यावेळी आपण करु शकु त्यावेळी आपल्या ह्या समस्येची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल ! तोवर आजच्या दुर्दैवी घटनांसारख्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहणार ! 

रविवार, ७ जून, २०२०

मॅटर झालं !



सामान्यपणे माणसं एखाद्या विशिष्ट वयानंतर भोवतालच्या सर्वच गोष्टींकडं गंभीरतेने पाहायला लागतात. अर्थात ह्याला सन्माननीय अपवाद असतातच! काही माणसं अगदी जन्मल्यापासुन गंभीर असावीत की काय असा संशय घ्यावा इतक्या लहान वयात गंभीर बनतात. तर काही माणसं आयुष्यभर खट्याळ राहतात. ह्या सर्व प्रस्तावनेमागचं कारण की साधारणतः आठवी- नववी पासुन ते महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हा गट दिलखुलास असतो. घरी पालक, शाळा-कॉलेजात शिक्षक डोक्याला कितीही ताप (त्यांच्या भाषेत शॉट) देत असले तरीही आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी हलकाफुलका ठेवत असतात, अगदी थ्री इडियटस मधील आमीर सारखा ! ह्या मंडळींची दैनंदिन जीवनातील भाषा (lingo) सुद्धा आपल्याला चेहऱ्यावर एक मितहास्य आणायला भाग पाडतो! आजची पोस्ट अशीच ह्या मंडळींच्या वापरातील एका शब्दप्रयोगावर! तो म्हणजे मॅटर झालं किंवा मॅटर हो गया ! 

ह्या मॅटर हो गया शब्दप्रयोगाची व्याप्ती विस्तृत आहे. 

वैश्विकसध्यातरी ह्या मंडळींनी हा शब्दप्रयोग अंतराळातील घटनांबाबत वापरल्याचे मी प्रत्यक्षात ऐकलं नसलं तरी एखादी उल्का पृथ्वीच्या जवळुन गेली तर मॅटर होते होते बच गया असं ते म्हणु शकतात ! 

जागतिक - जागतिक राजकारणात पाहिलं तर ट्रम्प आल्यापासुन त्याचं दररोज चीन, उत्तर कोरिया, इराण अशा देशांशी मॅटर होतंच राहतं! 

आशिया - सध्या भारत आणि चीन ह्यांचं लडाख इथं मॅटर चालु आहे. 

भारत - कोरोना ने जो  जगभर आणि भारतात धुमाकूळ घातला आहे त्याचा स्कोप "मॅटर हो गया" च्या पलीकडचा आहे. इथं आपण मॅटर झालं ह्या संज्ञेचे गुणधर्म लक्षात घ्यायला हवेत ! मॅटर झालं ह्या संज्ञेत जुजबी नुकसान करणाऱ्या आणि दीर्घकालीन दुष्परिणाम  नसणाऱ्या घटनांचा अंतर्भाव होतो! त्यामुळे आपल्या राज्यात परत जायला उत्सुक असणाऱ्या असंख्य नागरिकांनी वांद्रा स्टेशनबाहेर गर्दी केली ही घटना मॅटर झालं ह्याच्या स्कोपमध्ये येते. पण जर का त्यामुळं अचानक दहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाला तर मात्र ती मॅटर झालं च्या परिघाच्या पलीकडं जाते! 

शाळा / महाविद्यालयीन जीवन - लेक्चर बंक करुन जाताना शिक्षकांनी पकडणं, वर्गात फ्री लेक्चरला क्रिकेट खेळणं, पालकांची सही करण्याचं धारिष्ट्य केलं असता शिक्षकांच्या ते ध्यानात येणं वगैरे फुटकळ घटना मॅटर झालंच्या व्याप्तीत येतात. पुर्वी शाळेत मुलामुलींनी एकमेकांशी बोलणं ही मॅटर होण्याची नांदी समजली जायची! पण त्याकाळी हा शब्दप्रयोग अस्तित्वात नव्हता ! 

घर ते शाळा / कॉलेज - स्कुल बसचा चालक आणि रिक्षाचालक ह्याची बाचाबाची होणे, रेल्वेचा पास संपला असता समोरुन टी. सी. येणं ह्या घटना मॅटर झालं म्हणुन गणल्या जातात. 

सोशल मीडिया - व्हाट्सअँप, फेसबुकवरील दैनंदिन घटना  जरी मॅटर हो गया इतकी महत्त्वाची नसली तरी कधीतरी तिथंही मॅटर होतात !

घर - ह्या वयोगटात घरी दररोज मॅटर व्हायलाच लागतं. एखाद्या दिवशी मॅटर नाही झालं तर काहीतरी मोठं मॅटर झालं असावं असा ह्यांना संशय येतो ! घरी मॅटर झालं ह्यात मोबाईलवर रात्री दोन - दोन वाजेपर्यंत खेळत राहणं जे पालकांच्या लक्षात येणं, आईनं दिलेलं महत्वाचं काम विसरुन येणं, बाबांना एखादं दुसरं उलट वाक्य बोलणं ह्या सर्व घटनांचा समावेश होतो !

आता आपण तथाकथित मोठ्यांनी ह्या मॅटर झालं ह्या संज्ञेकडून आणि पर्यायानं ह्या वयोगटाकडुन काही शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं ! जर लहान वयात त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मॅटरना ते इतके हसतखेळत सामोरे जाऊ शकतात तर आयुष्यात मोठं झालेल्या आपल्याला आयुष्यात सामोरे येणाऱ्या तथाकथित समस्यांकडे मॅटर झालं च्या चश्म्यातुन पाहायला काय हरकत आहे ! ही मंडळी मॅटर झालं हे सांगताना कधी दुःखी नसतात, तर त्यांच्या चेहऱ्यावर बहुतेक वेळा मिश्किल भावच असतात! आपणही त्यांच्याकडुन आयुष्याला सामोरे जाण्याचा हा दृष्टिकोन स्वीकारुयात ! 

आता बघा आठवडाभराची सुट्टी संपल्याने मी ही एक मोठी समस्या आहे असा चेहरा करुन बसलो होतो पण आता मात्र मी मॅटर हो गया असं स्वतःला समजावत आठवड्याला सामोरे जायला तयार झालो आहे ! 

मंगळवार, २ जून, २०२०

समजुतदारपणाचा लेखाजोगा आणि Corona Times!!!


काही माणसं जन्मतः समजुतदार असं म्हटलं जातं. समजुतदार म्हणजे काय ह्याचा थोडा ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न !

सामाजिक जीवन सुरळीत चालण्यासाठी मनुष्यजातीने शेकडो वर्षांच्या अनुभवांच्या आणि सामुहिक बुद्धिमत्तेच्या जोरावर कायदे बनविले आहे. या कायद्यांच्या जोरावर सामाजिक जीवन सुरळीतपणे चालवण्याची मनिषा शासनकर्ते बाळगुन असतात. जर समाज सुशिक्षित आणि सुविचारी असेल तर शासनकर्त्यांची हे मनिषा बऱ्यापैकी पूर्ण होते. परंतु मनुष्यांच्या एखाद्या छोट्या समुहाच्या दैनंदिन कामकाजात  सुरळीतपणा हवा असेल तर तिथं कायदे लागू करता येणं शक्य नसते. 

प्रत्येक कुटुंबाचे, एखाद्या मित्रमंडळींच्या गटाचे आणि सामाजिक संस्थांचे काही अलिखित असे नियमअसतात. हे अलिखित नियम त्या गटांत वावरण्यासाठी सदस्यांना एक चौकट घालुन देतात.  ही चौकट काहीशी ऐच्छिक असते. त्यामुळं अलिखित नियम, बंधनांचा अभाव हे सर्व घटक अस्तित्वात असतानादेखील जी व्यक्ती प्रसंगी स्वतःकडे पडती बाजु घेत सामुहिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी पुढाकार घेते तिला समजूतदार व्यक्ती असे आपल्याला ढोबळमानाने म्हणता येईल. 

आता प्रत्येक व्यक्तीचा समजुतदारपणा कुठून येतो याकडे आपण वळूयात! व्यक्तीला जन्मतः समजूतदारपणाची पुंजी मिळालेले असते. ही मूळ पुंजी बहुतांशी वेळा त्या व्यक्तीच्या वयानुसार अनुरुप असे रुप घेत त्या व्यक्तीचा समजूतदारपणा आयुष्यभर कायम ठेवण्यास मदत करते. समजूतदारपणाचे लहानपणीचे उदाहरण म्हणजे सर्व मुलं एकत्र खेळत असताना आपला चेंडू असूनही सदैव पहिल्या फलंदाजीचा आग्रह न धरणे हे असू शकते! मोठं झाल्यावर समजूतदारपणाला बहुआयामी बनावं लागतं!  आपल्याशी कठोर वागणाऱ्या लोकांशी आपणसुद्धा तसंच वागायला हवं हा अट्टाहास न धरणे हा समजूतदारपणा असू शकतो!!

आपल्याला समजूतदारपणाची जी पुंजी लहानपणी मिळालेली असते ती तशीच्या तशी आयुष्यभर पुरणे किंबहुना तिच्यावरील विश्वास अढळ रहाणे तसे कठीणच! समजूतदारपणा हा काही फुकटात येत नाही. समजुतदारपणा दाखवणाऱ्या व्यक्तीला त्याची काही प्रमाणात किंमत मोजावी लागते! काहीजणांना  त्यासाठी त्याग करावा लागतो तर कधी होणारा मानसिक संताप आतल्याआत दडून ठेवावा लागतो. 

ही शक्ती त्या व्यक्तीला नक्की देतं कोण?  प्रत्येक समजूतदार व्यक्तीचा समजुतदारपणावर विश्वास ठाम राहण्यासाठी त्या व्यक्तीला कोणत्यातरी एका आश्वासक स्त्रोताचा पाठिंबा लागतो. हा स्त्रोत "तू समजूतदार आहेस" आणि "जगाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने हे आवश्यक आहे, त्यामुळे तू सदैव समजूतदारच राहा" असे आणि तत्सम संदेश त्या व्यक्तीला सदैव देत राहतो !! 

आता पोस्टच्या उत्तरार्धाकडे वळुयात ! कोरोनामुळं मनुष्यजातीचा सरासरी समजुतदारपणा आधीच खालावला गेला आहे. बरीच लोक आपल्या नेहमीच्या वर्तवणुकीच्यापेक्षा काहीशा वेगळ्या वर्तवणुकीचे प्रदर्शन करु लागले आहेत. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी ! सामाजिक जीवनातील काही घटक बऱ्याचजणांना आपलं मनःस्वास्थ्य टिकवुन ठेवायला मदत करतात. ह्या स्वास्थ्यकारी स्त्रोतांशी संपर्क तुटल्यानं आणि हा संपर्क पुन्हा प्रस्थापित होण्याचा नक्की कालावधी माहित नसल्यानं माणसं बैचैन झाली आहेत. 

अशा वेळी समाजातील समजूतदार व्यक्तींची जबाबदारी अधिकच वाढली आहे. आपल्या भोवताली वावरणाऱ्या व्यक्तींपैकी कोणाचं मनःस्वास्थ्य हे Breaking Point च्या आसपास पोहचत तर नाही ना ह्यावर ह्या मंडळींनी लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवणं आवश्यक आहे. 

आता प्रश्न असा येतो की सामान्य परिस्थितीतील समजुतदार / समजंस माणुस कोरोना काळातील सुद्धा समजंस माणुस असेलच का? त्यांचे स्वास्थ्य टिकवणारे स्रोत त्यांना उपलब्ध राहतील का? समाजस्वास्थ्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा ह्या प्रश्नांची उत्तरच येत्या काळातील एखाद्या विशिष्ट समाजाच्या वाटचालीत महत्वाचा भाग घेतील ! एक वेळ करोनानंतर आर्थिक नुकसानीतुन बाहेर पडणे सोपं असु शकेल पण तुटलेल्या भावबंधांना जोडणं हे मात्र कठीण ठरु शकतं !


आदित्य पाटील 

सोमवार, २५ मे, २०२०

भव्य तो निसर्ग !

मे महिन्यात आलेला हा सुट्टीचा दिवस ! सोमवारी आलेली ही सुट्टी, ती ही लॉकडाऊनच्या कालावधीतील ! अचानक गवसलेले हे फोटो! आज पाहिलेल्या शेकडो फोटोतील हे मोजके फोटो! ह्या फोटोत का कोणास ठाऊक एक कोणतातरी समान धागा मला जाणवला ! हा धागा शब्दांत तंतोतंत पकडणं कठीणच ! 

बहुसंख्य फोटोत निसर्गाचं एक भव्य रुप सामोरं उभं ! ह्यात रुढार्थानं म्हणायला गेलं तर सौंदर्य असं भरलेलं नाही, तरीही त्यातलं शतप्रतिशत निसर्गपण मनाला भावतं ! कुठंतरी अस्पष्टपणे जाणवुन गेलेलं आपलं छोटेपण मनात एक निनावी भावना निर्माण करुन जाते.  

ह्या पहिल्या फोटोत मला जाणवुन गेलं ते गवताचं विस्कटलेपण ! जिम कॉर्बेट नॅशनल पार्कातील हा फोटो ! इथं काही काळापुर्वी हत्तींचा कळप येऊन गेला असावा की काय असा अंदाज बांधायला मला उगाचच आवडतं! डाव्या कोपऱ्यात फोटोत डोकावणाऱ्या फांदीवर राहिलेल्या मोजक्या पानांच्या मनात कोणते विचार सुरु असतील ह्याचा थोडातरी अंदाज आपणास बांधता आला तर किती बरं होईल असं मला वाटुन जातं !




हे छायाचित्रही साधारणतः सारखंच ! फक्त इथं दुरवर डोकावणारी एक टेकडी ! पौर्णिमेच्या रात्री इथं हरिणांचा कळप ह्या विस्तृत पसरलेल्या गवताळ प्रदेशात कसा मुक्तपणं विहार करत असेल अशी कविकल्पना क्षणभर करावयास आपण मुक्त आहोत ! 


मार्च महिन्यात जवळपास शुष्क होत चाललेल्या नदीचं हे पात्र ! जेव्हा पावसाळ्यात हीच नदी अगदी रौद्र रुप धारण करत असेल तेव्हा तिच्या किनाऱ्याला उभं राहताना सुद्धा किती भय वाटत असणार ! ह्या नदीच्या पात्रात आता निवांत पहुडलेल्या त्या छोट्या दगडांना त्यावेळी नदीचा तो शक्तिशाली प्रवाह किती वेगानं ढकलत असावा ! कदाचित उंच पर्वतराजीतील एका विशाल पाषाणाचे आपल्या जोरदार प्रवाहानं नदीने तुकडे करत त्यांना हे रुप दिलं असणार ! रात्री  ह्याच पाण्याच्या शोधात येणारे वन्य पशु! त्यांची दुनिया एक न्यारी असणार! 


हे चित्र नक्की कुठून घेतलं ते आठवत नाही! परंतु ह्यात त्या डोंगरराईत मनुष्याने केलेली घुसखोरी इंचाइंचात जाणवते !  मनुष्यानं घुसखोरी केली नसती तर हे चित्र कसे दिसले असते ह्याचे कल्पनाचित्र रंगविण्यात मी दंग होतो ! 


दूरदूर पसरलेल्या भातशेतीचे हे मनोहर चित्र ! माझं लक्ष मात्र उजव्या कोपऱ्यात मनुष्यानं सुरु केलेल्या आणि कदाचित अर्धवट सोडुन दिलेल्या बांधकामाकडं जातं ! ह्या बांधकामातील एखाद्या विटेचे आत्मवृत्त असा निबंध लिहावयास कोणाला तरी उद्युक्त करावं अशी मला मनोमन इच्छा होत आहे !


हे ही सारखंच चित्र ! फक्त कोपऱ्यात दिसणारी एक टुमदार हवेली !त्यातल्या एका खिडकीत बसुन एका थंडीच्या सायंकाळी सूर्याच्या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघालेली ही भातशेती पाहायला किती धमाल येणार ! 


नदीचं हे रोडावलेलं पात्र ! पण सांजवेळी मनात एक हुरहूर निर्माण करणारं! त्या नदीच्या पात्रावर बांधलेला तो एक चित्राला वेगळं रुप प्राप्त करुन देणारा हा पुल ! पावसाळ्यात ह्या नदीचं रौद्र रुप ह्या फारशा मजबुत न वाटणाऱ्या पुलावर उभं राहुन पाहताना मनात नक्की काय भावना निर्माण होतील कोणास ठाऊक ! 




सोमवार, १८ मे, २०२०

सांजशकुन - पाणमाय!



कथा फ्लॅशबॅक स्वरूपातील,  एका मातेने सांगितलेली !आयुष्याच्या सायंकाळी  आपल्या संसाराच्या  बहरलेल्या वेलीकडे अत्यंत समाधानाने पहात असता तिला आपल्या वडिलांनी सांगितलेलं वाक्य आठवतं, "अति सुखाच्या क्षणीच माणसाने सावध राहावे,  कारण माणसाचं पूर्ण सुख दैवाला पहावत नाही!"

मग तिला धाकटा मुलगा आपल्याला अचानक लाभलेल्या श्रीमंतीचे रहस्य विचारतो.  तिनं  या प्रश्नाचे उत्तर देणे आयुष्यभर टाळलेलं असतं. परंतु आज छोटा अगदी हट्टालाच पेटलेला असतो. "मी कोणताही अधर्म ना करता हे सर्वकाही मिळवलं आहे!" हे उत्तर तुला पुरेसं नाही का?  ती छोट्याला अजिजीनं विनविते. परंतु आज छोटा तिचं काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत  नसतो! जर  हे रहस्य तुम्हांला  सांगितले तर कदाचित मला मृत्यूला सामोरं जावं लागेल या सत्याची जाणीव त्या सर्वांना करून देते.  ते ही आम्हांला चालेल ह्या सर्वांच्या एकमुखी उत्तरानं  तिला प्रचंड धक्का बसतो. ज्याच्याबरोबर आयुष्यभर संसार केला त्या नवऱ्याकडूनसुद्धा तिला अनुकूल प्रतिसाद मिळत नाही. अचानक तिच्या मनामध्ये या सर्वांविषयी अलिप्ततेतची भावना दाटून येते! मग एका निर्विकार मनाने ती आपलीआणि पाणमायेची कहाणी सर्वांना ऐकवते. 

पुर्वायुष्यातील अत्यंत गरिबीच्या एका पराकोटीच्या क्षणी तिचा निर्धार ढासळतो. ती विहिरीमध्ये आपला जीव देण्यासाठी पायऱ्या उतरु लागते. अशावेळी तिला भेटते ती पाण्यातील तिची पाणमाय! ही पाणमाय तिची सोन्यांच्या चकत्यांनी तिची ओटी भरते.  मग तिला सापडतो तो समृद्धीचा एक अक्षय ठेवा! त्यानंतर तिच्या कुटुंबाला दिवसेंदिवस  समृद्धीची साथ लाभत जाते. आपलं हे मोठं रहस्य ती सर्वांना सांगते!

पाणमायेने घातलेल्या अटीनुसार ज्या क्षणी तिनं हे रहस्य इतरांना सांगितलं तो तिचा भुतलावरील अंतिम दिवस ठरणार असतो. तिला आपल्या पाणमायेकडे परतणं क्रमप्राप्त असतं. आयुष्यभराचे पाश असे एका क्षणात सोडुन निर्मोही मनानं पाणमायेकडे परतणे तिला अवघड जातं. मग पाणमाय तिची समजुत काढते. ही तुझी एकटीची कहाणी नाही! ही आपल्या संपुर्ण स्त्रीजातीची कहाणी आहे ! कथेचा शेवट होतो तो पुढील वाक्यानं !
मग पाण्याने तिला सर्व बाजुंनी आपुलकीनं स्पर्श केला आणि आपल्यात माहेरी आणलं !

जी. ए. च्या बाकी कथांशी तुलना केली तर ह्या कथेची काठिण्यपातळी थोडी कमीच ! नेहमीप्रमाणं कथेतील पात्र नक्की कशाचं प्रतिक ह्याचा अर्थ लावता येणं सहज नाही!  तरीही  स्त्रीनं कुटुंबाप्रती केलेल्या असीम त्यागाची आणि आयुष्याच्या उत्तरार्धात कुटुंबातील सदस्यांनी तिच्याप्रती दर्शवलेल्या कृतघ्न मानसिकतेची ही कहाणी आहे ! आता मी हे आत्मविश्वासानं बोलतोय खरं पण जी. ए. ना अभिप्रेत असलेला अर्थ बराचसा वेगळाही असु शकतो !

ही पाणमाय म्हणजे नक्की कोण ? प्रत्येक स्त्रीची पाणमाय वेगवेगळी असु शकते !  मातेच्या, बहिणीच्या, आत्याच्या, मावशीच्या, मामीच्या, मैत्रिणीच्या, शेजारणीच्या कोणत्याही रुपात प्रत्येक स्त्रीला ही पाणमाय भेटु शकते! एक संसार उभा करणं, कोणतीही अपेक्षा न बाळगता आयुष्याच्या सायंकाळपर्यंत तो चालवणं हे एकटीचं काम नव्हे हे साऱ्या पाणमाया जाणुन असतात. एकटीनं हा भर उचलताना कोणत्याही कमकुवत क्षणी स्त्रीने हार मानु नये म्हणुन ह्या पाणमाया तिची साथ निभावतात. प्रत्यक्ष घरात तिच्या भोवताली नसल्या तरी तिच्या एका प्रतिसादात तिच्या वेदनेची आर्तता ह्या पाणमाया शेकडो मैलांवरुनसुद्धा ओळखु शकतात! 

आता ह्या कथेतील भावलेली काही वाक्यं !

ज्या क्षणी छोटा तिला रहस्य सांगण्याचा आग्रह धरतो आणि त्यापायी तिचा जीव गेला तरीही कोणालाही त्याची पर्वा नसणार ह्याची तिला जाणीव होते त्यावेळी - पाहतापाहता प्रत्येकाशी असलेला एकेक अदृश्य धागा तुटून गेला! 

पाणमायेकडे दुसऱ्यांदा परत आल्यावर पाणमाय तिला आपल्या जागेवर बसवुन पुन्हा एकदा कुणाचीतरी बहीण, मुलगी, बायको, आई असा खेळ मांडायला निघुन जाते! हे चक्र असेच चालु राहणार असतं! - हा तुझा काय, माझा काय , सगळ्यांचाच शाप आहे . आमच्याखेरीज त्यांचे क्षणभरही चालत नाही . आम्ही नसलो तर ती माणसे निखाऱ्यावरच्या फटिकाच्या लहरींप्रमाणं फुटतील . पण नंतर मात्र सुख अंगावर येतं आणि  त्या क्षणी मात्र आपण कुणाकुणाला नको होतो ! 

जी. ए. च्या इतर बहुतांश कथांप्रमाणे ही कथा सुद्धा कथेच्या शेवटाला आवर्तनात गुंतून जाते! ही माता आता पाणमायेच्या भुमिकेत शिरते तर पाणमाय ह्या मातेच्या ! जीवनातील विविध भुमिकांच्या आवर्तनांचा खेळ सदैव सुरुच राहणार आहे आणि आपण दैवानं आपल्याला सोपवुन दिलेल्या भूमिकेचं ओझं कदाचित बाळगत असु ! 

शनिवार, १६ मे, २०२०

समाजसेवा




समाजसेवा हे एक व्रत आहे. प्रत्यक्ष समाजसेवा न करता समाजसेवेच्या संबंधित मला जाणवलेल्या काही गोष्टी !

१. एखाद्या व्यक्तीनं समाजसेवेला वाहुन घेण्याची प्राथमिक आणि दुय्यम कारणं वेगवेगळी असतात. निरपेक्ष समाजसेवा ही दुर्मिळ गोष्ट असावी.समाजातील गरजु व्यक्तींना मदत व्हावी हा सर्वांचाच प्राथमिक हेतु असायला हवा आणि बहुतांशी उदाहरणांत तो असतोच. 

२. दुय्यम कारणांची टक्केवारी समाजसेवेच्या शुद्ध हेतुत बाधा निर्माण करते. दुय्यम कारणे वेगवेगळी असु शकतात. इथं ती नमुद करुन मला कोणाचाही रोष ओढवुन घ्यायचा नाही. 

३. प्रत्येक व्यक्तीला समाजसेवेला प्रवृत्त करणाऱ्या दुय्यम कारणांची त्या व्यक्तीची सदसदविवेकबुद्धी त्या व्यक्तीला व्यवस्थित जाणीव करुन देत असते. परंतु ही कारणे खुल्या दिलाने अगदी स्वतःशीच मान्य करण्याचा दिलदारपणा सुद्धा मोजके लोक दाखवु शकतात.  

४. दुय्यम कारणे असणे हे अजिबात वाईट नाही. काही न करता गप्प बसुन राहण्यापेक्षा आपले दुय्यम हेतु साध्य करीत समाजसेवा करणे केव्हाही इष्टच ! 

५. आता एका संवेदनशील मुद्याला स्पर्श करुयात ! प्रत्येकाची समाजसेवा आपलं एक वैशिष्ट्य बाळगुन असते. समाजसेवेचे अनेक गुणधर्म (attribute) असतात. प्रत्येक समाजसेवा ह्यातील काही गुणधर्मांच्या आधारे उजवी ठरते तर काही गुणधर्मांत तिला सुधारणेस वाव असतो. 

६. कोणाच्याही समाजसेवेवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह दुसऱ्या समाजसेवकाने अथवा समाजसेवा न करणाऱ्या व्यक्तीनं टाळावा. प्रत्येक समाजसेवा आपल्या जागी श्रेष्ठ असते. 

७. दुसऱ्याच्या समाजसेवेवर टीकाटिप्पणी करण्याचा मोह टाळणे जरी इष्ट असले तरी आपल्या समाजसेवेचे, त्यामागील प्राथमिक, दुय्यम कारणांचे परीक्षण प्रत्येक समाजसेविकेने / सेवकाने ठराविक कालावधीनंतर करत राहणं इष्ट !

८. आपल्या समाजसेवेवर टीका होण्याचे, त्यावर शंका निर्माण करण्याचे प्रसंग अधुनमधुन उदभवतात. अशा वेळी आपल्या कार्यावर विश्वास ठेवणं इष्ट ! आपल्या कार्याला आपल्या वतीनं बोलु द्यावं ! आपल्याला बोलावं लागलंच तर ते पुर्णपणे अधिकृत भाषेत बोलावं !

९. निंदकाचं घर असावं शेजारी ह्या उक्तीतील मतितार्थाप्रमाणं ह्या निंदकाच्या टीकेतील मतितार्थावर लक्ष केंद्रित करुन त्यातुन योग्य ती सुधारणा आपल्या कार्यपद्धतीत करावी ! ही टीका वैयक्तिक पातळीवर न घेण्याचा प्रयत्न करावा ! 

१०.  प्रत्येक गोष्टीप्रमाणं कोणताही समाजसेवक कालबाह्य होण्याची वेळ कधीतरी येतेच. ही वेळ ओळखुन सन्मानानं सामाजिक जीवनातुन निवृत्ती घ्यावी !

शनिवार, २ मे, २०२०

सांजशकुन - भाग १ !


सद्यकाळात घरातुन पार पाडाव्या लागणाऱ्या कार्यालयीन कामकाजाची व्याप्ती व्यवस्थित आहे. आज बऱ्याच दिवसांनी आलेल्या दीर्घ साप्ताहिक सुट्टीमुळं वसईच्या घरातील कपाटाची तपासणी केली असता सांजशकुन हे जी. ए. कुलकर्णी ह्यांचं पुस्तक हाती लागलं. त्यातील सत्यकथा ह्या मासिकात १९७१ साली प्रसिद्ध झालेल्या अस्तिस्तोत्र आणि १९७० साली प्रसिद्ध झालेल्या पत्रिका ह्या कथांचा मला झालेला बोध ! जी. ए. कुलकर्णी ह्यांच्या कथांमध्ये बरंचसं गुढ वातावरण असतं. त्यातील पात्रे ही कोणत्या तरी अद्भुत शक्तीच्या प्रभावाखाली वावरताना आढळतात. त्या कथांमधील विश्वही आपल्या भोवताली असणाऱ्या विश्वापासुन बरंच फारकत घेऊन आपलं वेगळं असं एक अस्तित्व जपते. 

अस्तिस्तोत्र

कथेची सुरुवात होते ती "उन्हात तावून निघालेल्या कवटीप्रमाणं वाटणाऱ्या स्वच्छ चकचकीत आभाळाखाली समुद्र स्थिर आहे " ह्या खोलवर अर्थाच्या वाक्यानं ! आभाळाच्या कवटीशी केलेल्या तुलनेशी आपण स्वतःला काहीसं सरावून घेत असतानाच जी. ए. समुद्राकडं वळतात.  प्रत्येक परिच्छेदानंतर ते समुद्राच्या शांततेकडं, स्तब्धतेकडं, निर्ममतेकडं आणि त्यानं बजावलेल्या केवळ निरीक्षकाच्या भूमिकेकडं अंगुलीनिर्देश करीत राहतात. 

समुद्र केवळ शांत आहे, समुद्र केवळ स्तब्ध आहे....  

कथा संपुर्णपणे प्रतीकात्मक विश्वात वावरत राहते. त्यामुळं कवटीमय वाटणारं आकाश, अनासक्त पाणी बाळगणारा समुद्र, त्यातील विक्षिप्त आकृतीचे क्षारांचे खडक, भोवताली पसरलेली रखरखीत वाळु हे सर्व घटक मानवी मर्त्य किंवा त्यापलीकडील जीवनातील ज्ञात / अज्ञात शक्तींचे रुपक असावेत असं सदैव वाटत राहतं. 

त्यानंतर सुरु होते ती एक श्रुंखला ! आभाळ ही एक कवटी, त्यानं आच्छादलेल्या वाळवंटात पसरलेले टेकाड्याएवढ्या कवट्या असलेल्या अतिप्राचीन प्राण्यांचे सांगाडे, त्या कवट्यांचं उन्हानं कोलमडून जाणे, तरीही एका कवटीने तग धरुन राहणे, दुरवरुन आलेल्या एका वृद्धाने ह्या एकमेव कवटीचा सहारा घेणे, कालपरत्वे त्या महाकाय कवटीने सुद्धा धगीपुढे कोलमडुन जाणे. धगीपासुन आपले रक्षण करणाऱ्या त्या कवटीच्या विनाशामुळं त्या वृद्धाचे सुद्धा कोलमडणे. त्याची जगण्याची जिद्द संपताच त्याच्या कवटीच्या सावलीत आलेला कीटक, कालांतरानं त्याचा संपलेला प्रवास आणि त्याच्या शरीराच्या आधाराला आलेली मुंगी ! ही शृंखला जी. ए. इथेच संपवतात ती "कोठेतरी तिच्याहुनही लहान जीवाणू वाट पाहत आहे" ह्या वाक्यानं ! 

संपुर्ण कथेत रंगविलेल्या जीवनाच्या एकमेव चाहुलीचा प्रतीकात्मक पुरावा! त्यानंतर जी. ए. मृत समुद्रातील जीवनाच्या संपुर्णपणे अभावाकडं वळतात. मृत समुद्राच्या चिंतनाची सर्व सांगता झाली आहे! कथा संपते ती "आता समुद्र केवळ आहे !" ह्या वाक्यानं !

एकंदरीत विविध रुपातील मनुष्यजन्माच्या श्रुंखलेतील प्रवास आणि त्यानंतर अस्तित्वात असु शकणाऱ्या मुक्तीचे रुपक असणारा समुद्र ! जो आपले कायमस्वरुपी अस्तित्व बाळगुन असतो!    


पत्रिका

एका प्रासादाच्या विशाल पायऱ्यांपाशी आलेला परंतु आपली स्मृती गमावुन बसलेला हा कथेचा नायक ! प्रथमदर्शी उघडण्यास कठीण परंतु नायकाच्या हळुवार स्पर्शानं सहज उघडणारं प्रासादाचे महाकाय द्वार !प्रासादाच्या अंतर्भागात व्यापुन टाकणारा किट्ट अंधार ! अंधाराला सरावलेली त्याची नजर. त्या प्रासादात कोणी आहे का हे जाणुन घेण्यासाठी त्यानं दिलेल्या अनेक हाका  ! आणि प्रत्युत्तर म्हणुन आलेले केवळ त्याचेच शब्द !  

 मग त्याला दिसलेला अनेक वेटोळी घेतलेला आणि बऱ्याच उंचावर जाणारा एक जिना. त्या जिन्याच्या वरच्या सज्ज्यावर कठड्यावर तेजस्वी कृष्ण्वस्त्रे परिधान केलेली आकृती ! त्या जिन्याची एकेक पायरी ओलांडण्यासाठी त्यानं केलेला कष्टप्रद प्रवास ! शेवटी एकदाचा त्या आकृतीसमोर उभं ठाकून त्यानं माझ्या सादीला तुम्ही उत्तर का नाही दिलंत असा केलेला निकराचा प्रश्न ! त्यावर त्यानं ऐकलेली प्रत्युत्तरे म्हणजे माझीच उत्तरे असा त्या आकृतीने केलेला खुलासा ! त्यानंतर तु उंबरा ओलांडुन मला ती पत्रिका दे आणि मला मुक्त कर ही त्या आकृतीने केलेली विनंतीवजा आज्ञा ! तो उंबरा ओलांडताना सर्पमुखांनी केलेले विषारी फुत्कार ! 

ती पत्रिका त्या आकृतीला सुपूर्द केल्यानंतर त्या आकृतीने मानलेलं आभार आणि त्यासोबत परत जाण्याची धुडकावून लावलेली विनंती ! त्या आकृतीने ती कृष्ण्वस्त्रं ह्याला परिधान करायला लावत तुला मुक्तीसाठी असंच कोणीतरी पत्रिका घेऊन घेण्याची वाट पाहत राहावं लागेल हे सांगणं ! मग त्या व्यक्तीचं निर्भरपणे उंबरा ओलांडून, जिना उतरत, महाद्वार उघडून प्रासादाच्या बाहेर पडणे ! 

आता ह्या नायकाच्या वाट्याला आलेली दीर्घ प्रतीक्षा, ती त्याची पत्रिका घेऊन येणाऱ्या दुसऱ्या कोणाची ! ह्या प्रतिक्षेचा कालावधी किती असणार हे कोणीच सांगु शकणार नाही ! तोवर सहन करावं लागणारं प्रदीर्घ एकटेपण! 

पुन्हा एक प्रतीकात्मक कथा ! बहुदा जन्म-मृत्यू, आत्मा ह्यांच्यातील मनुष्याच्या प्रवासाची ! ह्यातील कोणतं रुपक कसलं ते फक्त जी. ए. च जाणोत !

प्रत्येक कथा केवळ ३-४ पानांची पण समजण्यास प्रचंड वेळ लावणारी ! आणि इतक्या प्रयत्नानंतर सुद्धा आपणास समजलेला अर्थ जी. ए. ना अभिप्रेत असलेल्या अर्थाशी अंशतः तरी जुळला असेल ह्याची शाश्वती नाही !

शीर्षक भाग १ जरी असलं तरी हे धाडस सातत्यानं करण्याची हिंमत मी पुन्हा करेनच ह्याची हमी मी सध्यातरी देणार नाही ! 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...