सुशांत सिंगच्या अकाली मृत्युची बातमी कळली. मोठा धक्का बसला, खुप वाईट वाटलं. सद्यःकाली मुंबई हे एकट्यानं राहण्याचं शहर राहिलं नाही. शहरानं आपला माणुसकीचा चेहरा काही काळासाठी बाजुला सारला आहे. अशा वेळी तुमच्या सोबत जिवाभावाचे माणुस हवंच !
काही आठवड्यापुर्वी धोनीच्या भुमिकेत सुशांतला पाहिला. सुशांतची भूमिका आणि मी पाहिलेला हा पहिला चित्रपट ! सुशांत माझ्या लक्षात राहिला तो त्यानं ज्या शांतपणे ही भुमिका निभावली त्यासाठी ! ह्या भुमिकेत कुठंही आक्रस्ताळेपणा जाणवला नाही. दुर्देवानं आज ही बातमी ऐकायला मिळाली.
ही टोकाची भुमिका घेण्याआधी तो कोणत्या मनःस्थितीतुन गेला असेल ह्याचा विचार करणं कठीण जातं. संपुर्ण विश्व एका बाजुला व दुसऱ्या बाजुला मी आणि माझी समस्या ! ही समस्या इतकी गहन की त्यातुन माझी कोणीही सुटका करु शकणार नाही !
आता लोक म्हणणार, सुशांत तु जवळच्या लोकांशी संपर्क करायला हवा होता. त्यांच्याशी बोलुन पहायला हवं होतं. पण हे फार कठीण असतं. सुशांत एकटा नाही असे अनेकजण भोवताली आहेत. ह्या सर्वांच्या वेदना, दुःख ऐकुन घ्यायला प्रत्येक वेळी कोणी असेलच ह्याची शाश्वती नाही !
लेखाच्या या पुढील भागात हे सारं काही सुशांतच्या बाबतीत घडलं आहे असं मला अजिबात म्हणायचं नाही! हा संघर्ष सुशांतचा एकट्याचा नाहीये ! आपल्या सर्वांचा आहे !
नक्की काय होतंय ! आपल्या मुळ रुपात राहुन उपजीविका साध्य करु शकु असे मोजके व्यवसाय शिल्लक राहिले आहेत. चोवीस तासातील बराच काळ तुम्हांला तुमच्या मुळ रुपापेक्षा वेगळ्या रुपात वावरावं लागतं. कारण ही तुमच्या व्यवसायाची गरज असते. आपल्या मुळ रुपाला सोडुन ह्या वेगळ्या रुपात शिरताना, वावरताना तुमची प्रचंड ऊर्जा खर्च होत असते. जोवर ह्या ऊर्जेच्या समप्रमाणात तुम्हांला यश मिळत राहतं तोवर तुम्ही ही ऊर्जा स्वतः निर्माण करु शकता.
ज्या क्षणी तुमच्या यशाची पातळी घसरु लागते किंवा तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही ताणतणाव निर्माण होतात त्यावेळी मात्र तुम्हांला कोणीतरी जवळचं लागतं. एक असते आपली मुळ प्रतिमा आणि दुसरी असते आभासी प्रतिमा जी आपण व्यावसायिक जगासाठी बनविलेली असते ! ज्यावेळी ह्या व्यावसायिक जगातील आपल्या क्षणभंगुरतेची आपल्याला जाणीव होते त्यावेळी आपल्याला आपल्या आभासी प्रतिमेचा तिटकारा येतो, तिच्यापासुन दूरदूर पळावेसे वाटतं. पण जिच्याकडं परत जावं ती आपली मुळ प्रतिमा कोसो मैल दुर गेलेली असते !
सगळ्याच माणसांच्या बाबतीत असं होतं असंही नाही ! म्हणजे काही जणांना कोणीतरी जवळचं लागतं तर काहीजणांना ते लागत नाही ! काही माणसं किंबहुना माणसांचे प्रकार स्वयंपुर्ण असतात. एकतर निराशावादी विचार त्यांच्या मनात निर्माण होत नाहीत किंवा तयार झाले तरी त्यांचीबुद्धी अशा विचारांचा वेळीच निचरा करते.
आता ह्या क्लिष्ट समस्या निर्माण करणाऱ्या व्यवसायांपासून दुर जाऊन साधं आयुष्य स्वीकारावं म्हटलं तर साधं आयुष्य जगणाऱ्या माणसांना सुखी म्हणावं अशी सुद्धा परिस्थिती जगानं ठेवली नाही. भले ती माणसं सुखानं जगायला तयार असतील आणि ते ही आपल्या मुळ रुपात ! पण त्यांच्या विश्वात शिरुन जाहिरातींच्या आणि अन्य माध्यमातुन तुम्ही कसे विविध सुखांना पारखे झाले आहात ह्याची सदैव जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला जातो ! ह्या अपप्रचाराला बळी पडु शकते ती युवामंडळी !
कोणत्याही चैनीच्या गोष्टींची जाहिरात करणाऱ्या माध्यमांवर तुम्हांला काहीतरी करुन आळा घालता यायला हवा किंवा त्यांना तितकाच खर्च करुन साध्या जीवनात सुद्धा कसं सुख मिळु शकतं ह्याची जाहिरात करावयास भाग पडायला हवं ! जितका जास्त विचार मी करतोय तितकं ह्यातुन बाहेर पडण्याचा रास्त मार्ग क्लिष्ट आहे हे जाणवतंय !
जगाचा हा प्रश्न सोडविणं कठीण आहे ! प्रयत्न वैयक्तिक पातळीवर करायला हवेत ! शांत मनोवृत्तीची शिकवण देता यायला हवी ! तुम्ही शहरात राहत नसाल, तुमच्याकडं शहरातील नोकरी नसेल तर तुमच्या आयुष्यातील भला मोठा भाग अपुर्ण राहिला आहे ह्या समजुतीचे समुळ उच्चाटन ज्यावेळी आपण करु शकु त्यावेळी आपल्या ह्या समस्येची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल ! तोवर आजच्या दुर्दैवी घटनांसारख्या घटनांची पुनरावृत्ती होतच राहणार !













