मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १४ मार्च, २०२०

विजयनगर एक वसाहत भाग - ३



आपण अवेळी विचारलेल्या प्रश्नामुळं आजोबांचे ज्ञानदायी संभाषण अचानक थांबलं ह्याची चुटपुट लागु आजींना लागुन राहिली. तीच चुटपूट घेऊन लागु आजी रात्री झोपल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्या लवकर उठल्या. आकाशवाणीवर मंगल प्रभात हा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम सुरु होता. भल्या पहाटे "घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ! उठी लवकरी वनमाळी " ही शाहीर होनाजी बाळा ह्यांची अमर भुपाळी ऐकुन त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या आपसुकच ओल्या झाल्या. "जुनं ते सोनं" असं पुटपुटतच त्या घराबाहेर पडल्या. 

आसमंतात एक सुखद असा गारवा भरुन राहिला होता. पक्ष्यांची किलबिल सुरु होती. लागु आजी प्रसन्न मनानं मंदिराकडील रस्त्यावर चालु लागल्या. 

"गुड मॉर्निंग आजी !" मागुन आवाज आला तशा त्या थांबल्या. 

"सुप्रभात वेदा !" आजींनी सुहास्य मुद्रेनं वेदाला अभिवादन केलं. 

"कशा आहात तुम्ही, आजी?" वेदाने त्यांना विचारलं. 

"मी मजेत आहे ! तू कशी आहेस, जॉगिंग झालं का? " आजी म्हणाल्या. 

"हो, तुम्ही कुठं मंदिरात निघालात का? वेदाने त्यांना विचारलं. 

त्यांची मान होकारार्थक प्रतिसाद देतेय ह्याचा पुसटसा अंदाज येताच "मी सुद्धा येते तुमच्या सोबत !" वेदाने घोषित करुन टाकलं. खरंतर काही वर्षांपुर्वी आजीचे देवळात जाण्याविषयीचे नियम अगदी कडक होते. सकाळची आंघोळ न केलेल्या वेदाला आपल्यासोबत मंदिरात घेऊन जायला त्या कदापि तयार झाल्या नसत्या. पण वयानुसार त्यांच्या स्वभावात बराच फरक पडत चालला होता. आपल्या आयुष्यातील महत्वाच्या माणसांसाठी आपल्या नियमांत थोडेफार बदल करण्यास त्या अनुभवानं शिकल्या होत्या. 

देवदर्शन झालं. देवापुढं बराच वेळ डोळे मिटुन नमस्कार करणाऱ्या वेदाला पाहुन पुन्हा एकदा लागु आजींच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. इतक्या तरुण वयात नवऱ्यासोबत न पटल्याने घटस्फोट घेऊन वेदा एकटी राहत होती. व्यवस्थापनाची पदवी घेतलेली वेदा एका बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या अधिकारी पदावर होती. आपलं देवदर्शन आटोपलं तसं आजी भिंतीपाशी असलेल्या बाकांवर येऊन बसल्या. मिनिटा दोन मिनिटांनी वेदाही त्यांच्या बाजुला येऊन बसली. का कोणास ठाऊक पण नेहमी उत्साहानं भरलेली वेदा देवळात मात्र अगदी शांत झाली होती. काही वेळ कोणी काहीच बोललं नाही. मग अचानक वेदाला न राहवुन तिनं आजींच्या कुशीत आपलं डोकं लपविले. 

"का ग वेडाबाई ! काय झालं ?" आजींनी तिला विचारलं. 

"काही नाही ! -" एका हळव्या क्षणावर मात करत वेदा सावरली होती. 

हिच्याशी आज सविस्तर बोलावंच असा विचार आजींच्या मनात आला. इतक्यात अचानक कालचे आजोबा आजींना दिसले. 

"आजोबा !" आजींनी आपल्या मोकळ्या स्वभावाला  अनुसरुन आजोबांना मोठ्यानं साद दिली. 

"अरे वा तुम्ही आज मंदिरात सकाळीच भेटलात !" आजोबांनी त्यांचे स्वागत केले! 

"या बसा ना इथं ! आजींनी वेदाच्या बाजुला त्यांना बसण्यासाठी जागा करुन दिली. जणू काही आपण आजोबांना गेले कित्येक वर्षे ओळखत आहोत ह्या थाटात आजीबाईंनी वेदाला आजोबांचा परिचय करुन दिला. आजोबांना वेदाने पदव्युत्तर शिक्षणासाठी घेतलेल्या विषयाची बरीच माहिती होती. त्यामुळं त्या दोघांच्या गप्पा बऱ्याच रंगल्या. लागु आजी आपल्या परीनं त्या संभाषणात सहभागी होत होत्या. 

"सर्वतोपरी प्रयत्न करुनसुद्धा सुखाचं माप सर्वांच्या पदरात देव का देत नाही? " वेदाच्या तोंडुन अचानक आलेल्या ह्या  प्रश्नानं आजी जरी दचकल्या तरी आजोबा मात्र स्थितप्रज्ञ होते. 

"तु एक गहन प्रश्न विचारलास मुली ! आपण सर्वांनी आपल्या सुखाच्या झोळ्या इतक्या मोठ्या बनवुन ठेवल्या आहेत की बिचारा भगवंत आपल्या सर्वांसाठी पुरेनासा झाला आहे !" आजोबा उत्तरले. 

"असं नाही हो आजोबा ! माझ्या अगदी किमान माफक अपेक्षा होत्या! त्याच्यासाठी सर्व करिअरचा त्याग करण्याची माझी तयारी होती. पण का कोणास ठाऊक, आमच्या तारा  कधी जुळल्याच नाहीत ! " अचानक स्वतःभोवती घातलेले सर्व बांध झुगारुन देऊन वेदा बोलली. 

"मुली, आपण सर्वांनी आपली आयुष्य ना खुप क्लिष्ट बनवुन ठेवली आहेत ! पुर्वी कसं साधं सोपं असायचं. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी  चांगलं आणि वाईट अशी दोन वर्तुळं बनवलेली असायची. समाजाला तुमच्यासाठी जे काही चांगलं वाटतंय त्या वर्तुळात तुम्हांला सक्तीनं ढकललं जायचं ! वडीलधारी माणसांचा, समाजाचा हा निर्णय पटला नाही तरी सर्वजण स्वीकारत असत. आयुष्य जरी परिपुर्ण नसलं तरी केवळ आपल्या बाबतीतच असं घडत नाहीए, आपल्या सोबत बरेचजण आहेत केवळ ह्या गोष्टीवर सारेजण समाधान मानुन आयुष्य कंठीत करत असत. 

आता ना  चांगलं, वाईट अशी दोनच पर्यायांची वर्तुळं राहिली नाहीत. प्रत्येक निर्णयासाठी आपल्याभोवती  पर्यायांची अनेक वर्तुळं बनली आहेत.  प्रत्येक वर्तुळात चांगलं, वाईट वेगवेगळ्या प्रमाणात वास्तव्य करुन आहे. पुर्वी समाजासाठी ग्राह्य असलेली चांगल्या वाईटाची व्याख्या आता व्यक्तिसापेक्ष बनली आहे. त्यामुळं तुझं बरोबर की माझं ह्याच्या पलीकडं जाऊन एकत्रितपणे आयुष्य व्यतित करण्याची दोघांकडे असलेली इच्छाशक्ती हाच सर्वात महत्वाचा घटक ठरत चालला आहे !" 
आजोबांनी आपलं लांबलचक बोलणं एका दमात सांगुन टाकलं. 

वेदा आणि आजी दोघीही अगदी एकाग्रचित्तानं  त्यांच्या बोलण्याकडं लक्ष देऊन ऐकत होत्या. त्यांचं बोलणं संपलं तरीही त्यांची भारावलेली अवस्था कायम होती. अचानक वेदाचा फोन वाजला तसं ती फोन घेऊन थोडी बाजुला गेली. आजीची तंद्री काही काळ कायमच होती. एका मिनिटातच वेदा परतली तर आजीला एकटीलाच पाहुन आश्चर्यचकित झाली. 

"आजी! आजोबा कुठं गेले? " वेदाने विचारलं. 

"अगंबाई कुठं गेले असतील ! " आजी दचकल्याच !

काहीवेळानं दोघीही मंदिराबाहेर पडुन इमारतीच्या दिशेनं चालु लागल्या. वेदाशी बोलत असल्या तरी आजीबाईंच्या मनात मात्र आजोबांचे काल आणि आज अचानक नाहीसे होणे हा निव्वळ योगायोग असणं कितपत शक्य आहे ह्यावर विचारमंथन सुरु होते. 

(क्रमशः)

आधीच्या भागांच्या लिंक्स 

भाग पहिला 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post.html

भाग दुसरा 
https://patil2011.blogspot.com/2020/03/blog-post_10.html


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...