मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

आदित्यास पत्र


प्रिय आदित्य,

तुला नितांत गरज असलेल्या वार्षिक सुट्टीचा आजचा पहिला दिवस. ह्या वर्षातील घडामोडींचा आढावा घेत पुढील आयुष्यासाठी महत्त्वाच्या गोष्टीना एका आखीव स्वरूपात मांडण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे अशी समजूत करून घेत मी पुढील मुद्दे मांडत आहे. 

  1. सकाळच्या वेळी तू अधिक कार्यक्षम असतोस. लवकर शुचिर्भूत होऊन आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींवर तू अधिक वेळ घालवावा. महत्त्वाच्या गोष्टी ह्या संकल्पनेत कार्यालयीन कामाव्यतिरिक्त आई, भावंडं, पत्नी, मुलगा आणि नातेवाईक  ह्यांच्याशी सुसंवाद साधणे हे सुद्धा अपेक्षित आहे ह्याची तुला जाणीव असावी हे अपेक्षा. 
  2. तुझा मेंदू आणि मन सदैव उल्हसित, टवटवीत ठेवावास. हे दोघे तुझ्या शरीरात वास्तव्य करतात. त्यामुळं तुझ्या शरीराची काळजी घेणं हे ओघानं आलंच. वरणभात, भाजी हा आहार शरीराला सम्यक स्थितीत ठेवण्यासाठी उत्तम. झोपायला जाण्याच्या तुझ्या वेळेत दिवसेंदिवस उशीर होत आता ही वेळ रात्री अकरा वाजता (आणि पलीकडे) झाली आहे. ह्यावर वेळीच उपाययोजना करत, ही वेळ किमान साडेदहा वाजेपर्यंत आणावी. 
  3. दररोज किमान तीस मिनिटं चाल. तुला जाणवलं असेलच की चालण्यानं मेंदूला प्राणवायूचा पुरवठा होऊन चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आणि तू अधिक कार्यक्षम होतोस. 
  4. ह्या वर्षात काही प्रसंगी तू चिडलास, भविष्यात सुद्धा हे असेच घडत राहील. तुझ्या मनाचा तोल जाण्याची घटना घडत असताना त्याची जाणीव व्हायला हवी जेणेकरून आपल्याकडून दुखावल्या जाणाऱ्या लोकांची संख्या आणि त्यांचं दुखावलं जाणं आटोक्यात ठेवता येऊ शकते. शांत झाल्यावर त्या लोकांशी जाऊन बोलणं महत्त्वाचं !
  5. आयुष्यात महत्त्वाच्या असे नातेवाईक आणि मित्र ह्यांना पारखण्यात आणि त्यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध कायम ठेवण्यात तू यश मिळवलेस. आयुष्यात एका विशिष्ट टप्प्यानंतर पैशाव्यतिरिक्त इतर गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणून आयुष्यात ह्या लोकांना अग्रिम स्थान देणं तू चालू ठेवावंस. दुसऱ्या बाजूनं विचार करता तुझ्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येत राहतील ज्यांच्याशी तुझं मनापासून कधीच जुळू शकणार नाही. तरीही त्यांच्याशी पूर्णपणे फारकत न घेता किमान पातळीवर संपर्क कायम ठेवता येणं तुला जमायला हवं 
  6. वैयक्तिक आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तुझ्याकडून काडीचीही आशा बाळगणं चुकीचं ठरेल. त्यामुळं ह्याबाबतीत वाईट वाटणं सोडून दे ! आयुष्यात सर्वानांच सर्व गोष्टी जमत नाहीत
  7. घरी कागदपत्रांचे व्यवस्थित नियोजन करणे तुला अजिबात जमत नाही. किमान सर्वात महत्वांच्या अशा कागदपत्रांची यादी करुन ती कागदपत्रं सांभाळून ठेव जेणेकरून प्रत्येकवेळी त्यांचा शोध घेण्यातील तुझा वेळ वाचेल. 
  8. सत्तरी - ऐंशीतील मोजक्या जुन्या गाण्याव्यतिरिक्त जगात अजूनही चांगलं संगीत आहे ह्याची जाणीव ठेव. तरीही हीच गाणी ऐकण्याचा अट्टाहास असेल तर कानात हेडफोन घालून ऐक. 
  9. रात्रीच्या जेवणाची वेळ आठच्या आत ठेवण्यात तुला बऱ्यापैकी यश मिळालं आहे. ही सवय कायम ठेव. रात्रीच्या जेवणाची वेळ दहाच्या पलीकडे गेल्यास हे जेवण टाळणं उत्तम 
  10. घरी गाणी म्हणण्याच्या तुला मिळालेल्या परवानगीचा दुरुपयोग करू नकोस. कदाचित ती रद्द होऊ शकते. 
  11. आपल्या पूर्वापार आवडीकडं, मुळांकडे जाण्यासाठी ह्या सुट्टीचा वापर कर. रात्रीच्या आकाशाकडं पाहत ह्या ताऱ्याकडून निघालेल्या प्रकाशानं पृथ्वीवर पोहोचण्यासाठी खरोखरच काही वर्षे घेतली असतील का हा विचार तुझ्या मनात येऊन कित्येक वर्षे झाली. 
  12. वाडीत जा, तिथल्या झाडांशेजारी बस. झाडांभोवताली फिरणाऱ्या मुंग्या, कीटक, फुलपाखरं ह्यांचं निरीक्षण कर. जग वैविध्यपूर्ण आहे. दररोज तुला जो काही जगाचा मर्यादित नजारा दिसतो तो नजारा म्हणजेच संपूर्ण जग आहे अशी चुकीची समजूत करुन घेऊ नकोस. 
  13. मराठी / हिंदी मालिका अधुनमधून पाहत जा. जरी ह्या मालिका मूर्खपणाची हद्द गाठत असल्या तरी ह्या मालिका म्हणजे जीव की प्राण असणाऱ्या हजारो लोकांमध्ये आपण राहत आहोत ह्याचं भान तुला असणं आवश्यक आहे. 
  14. भोवतालच्या वयस्क लोकांशी बोलत जा. त्यांच्याकडं असणाऱ्या ज्ञानाच्या खजिन्याचा तुला खूप फायदा होऊ शकतो. त्यासाठी त्यांच्याशी तुला संवाद साधता यायला हवा, त्यांना बोलतं करता यायला हवं. जगात गोष्टी झपाट्यानं बदलत आहेत असं जरी आपल्याला वाटत असलं मूळ प्राथमिक गोष्टी, शहाणपणा कायमच राहत असतो. 
  15. तुझ्या मुलाचं नीट निरीक्षण कर, त्याचं बोलणं मन लावून ऐक. "मला तुला शहाणपणाचे दोन शब्द ऐकवू देत" ह्या कायमच्या मनोवृत्तीतून बाहेर ये! नवीन पिढीकडे पाहण्यासाठी, त्यांना समजावून घेण्यासाठी सोहम महत्त्वाची संधी आहे हे ध्यानात ठेव 
  16. वरील मुद्दा खरा असला तरीही जगाला तुझ्या ब्लॉगपोस्ट्सची गरज आहे ज्याद्वारे तू जुन्या चालीरीतींचे, संस्कृतीचे, मूल्यांचे  गुणगान गात असतोस. त्यामुळं तुझं लिहिणं चालू ठेव 
  17. वर्षभरात तीसहुन अधिक दिवस असे होते ज्यादिवशी एका दिवसात तू पंचवीसपेक्षा जास्त बुद्धिबळाचे ऑनलाईन सामने खेळलास. आता तुझ्यात लक्षणीय सुधारणा होण्याची तिळमात्र शक्यता नाही आणि तू एखादी स्थानिक स्पर्धा सुद्धा जिंकू शकत नाहीस. त्यामुळं ह्याबाबतीत स्वतःवर नियंत्रण ठेवलेलंस बरं !
  18. २०२३ विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून फारशा अपेक्षा ठेऊ नकोस. त्यांच्या खराब कामगिरीनंतर त्या कामगिरीचे विश्लेषण करण्याचा विचारसुद्धा मनात आणू देऊ नकोस. चुकूनमाकून त्यांनी तुला खोटं ठरविले तर ही पोस्ट एडिट करून "मी चुकलो" असे वाक्य टाक.    
  19. पुढील पंधरा दिवसांत सर्व गॅझेटपासून सातत्यानं किमान दोन तास दूर राहण्याचा प्रयत्न कर 

 हे वर्ष तू बऱ्यापैकी चांगलं निभावलंस. तुझ्या भूमिकेत एक वर्ष निभावण्यासाठी दररोज नेकीचे प्रयत्न करावे लागतात, ते तू केलेस. त्याबाबत सार्थ अभिमान ठेव. "आपल्या मूळ रूपापासून फारशी फारकत घेऊ नकोस" शेवटी तेच महत्त्वाचं आहे. 

तुझा विश्वासू,
आदित्य 

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

दिवाळी




सणांना तोटा नसलेल्या भारतदेशात दिवाळी सणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.  मनात दडून बसलेल्या बालपणीच्या दिवाळीच्या मनोहर आठवणी, त्यावेळी चिंताविरहित भावनेत अनुभवलेले आनंदाचे, कौतुकाचे क्षण आपण कितीही मोठे होत गेलो तरी दर दिवाळीला मनःपटलावर नव्यानं उमटत राहतात. मग सुरु होते ती आजच्या काळात त्या आठवणींना शोधण्याची, पुन्हा अनुभवण्याची धडपड!

दिवाळी खरंतर तीन-चार दिवसांची. पण ह्या तीन - चार दिवसांनी उत्साहानं आयुष्य जगण्याची उमेद वर्षभर पुरणारी. आपल्यापासून कायम दूर निघून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणी दररोज तर येत असतातच पण दिवाळीच्या दिवसांत त्यांची उणीव प्रकर्षानं जाणवते. त्यांना बरं वाटलं असतं अशा पद्धतीनं दिवाळी साजरी करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वर्षी बरेचजण दिवाळीनिमित्त भेटायला आले. जुन्या आठवणी निघाल्या. खरंतर आयुष्याच्या एका टप्प्यानंतर आपण स्वतंत्ररित्या आपल्या पद्धतीनं आयुष्य जगायला शिकलो असतो. परंतु आधीच्या पिढीचं भोवताली असणं खूप आश्वासक असतं. अगदी कसोटीच्या प्रसंगी त्यांचा सल्ला अगदी सुखावह असतो. त्यांच्या निघून जाण्यानं प्रचंड एकाकी वाटत राहतं. आपल्यापरीनं आयुष्यात गुंतून घेत ह्या एकाकीपणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वयात वरच्या पिढीचं छप्पर असणं खूप आधार देणार असतं हे बोलणारा सुजित भेटला. अभ्यंगस्नानासाठी सकाळी लवकर उठणं नक्कीच महत्वाचं पण साडेतीन म्हणजे जास्तीच लवकर होते अशी काहीशी हळुवार तक्रार प्रज्ञाताईनं केली.  गावातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना भेटायला निघालेला राकेश तासभर गप्पा मारत बसला. कधीही हक्कानं गप्पा मारायला येऊ शकतो अशा घरांपैकी तुमचं हे घर हे त्याचं वाक्य लक्षात राहिलं. पूर्वी गावागावांत आदरानं ज्यांच्याकडं पाहिलं जायची अशी काही घरं असायची. परंपरा, शिष्टाचार कसे पाळावेत हे ज्यांच्याकडून शिकावं अशी ही घरं असायची. काळाच्या ओघात ही घरं, त्यातील आदरणीय माणसं विखुरली गेली आणि संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत अशा संस्था नाहीशा झाल्या.    

सण हा समूहानं साजरा करण्याचा प्रसंग. सणाच्या आठवणी कुटुंब, घर, गांव, मित्रमंडळी ह्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या असतात. ज्यांनी हे अनुभवलं आहे ती सारी माणसं आयुष्यभर ह्या आठवणींसोबत जगत राहतात. सणांचं खरं सणपण अनुभवण्यासाठी जुन्या परंपरा, आठवणींना शक्य तितका उजाळा देत ते कुटुंबासमवेत घरी  साजरे करणं हेच इष्ट होय. रस्त्यातील ट्रॅफिक जॅममध्ये स्वतःला कोंडून घेत बऱ्याच कालावधीनंतर रिसॉर्टवर पोहोचुन साजरी केली गेलेली दिवाळी आता मूळ धरु पाहतेय! बघुयात काय होतंय ते ! 

बलिप्रतिप्रदेच्या दिवशी भल्या पहाटे घरातील कचरा घराबाहेर काढून थोड्याफार थंडीत आंघॊळ केल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळात लिहलेली ही पोस्ट ! बळी तो कान पिळी! 

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Pushing ourselves to the brink! (कडेलोटाच्या दिशेनं )


संदेशभाऊ वर्तक ह्यांना शनिवारी सायंकाळी बोरिवली ते नायगांव हे तीस किलोमीटर अंतर कारने कापण्यासाठी तीन तास लागले. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अचानक पावसानं इन्फिनिटी मॉलच्या बाजुच्या रस्त्यावर मी कारमध्ये एकाच ठिकाणी दहा मिनिटं अडकून होतो. मालाड ते बोरिवली ह्या टप्प्यात मेट्रोच्या कामामुळं मेट्रोच्या बरोबर खालच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला अत्यंत खडबडीतपणा आला आहे आणि दुसऱ्या कडेला वाहनं अनधिकृतरित्या पार्क करुन ठेवलेली असतात. त्यामुळं बऱ्याच वेळा कृत्रिमरीत्या वाहतुक कोंडी होत राहते. नागरिक मग उलट्या दिशेनं वाहनं चालविणे, सिग्नल तोडणे असले प्रकार करत राहतात. 

प्रचंड वेगानं अजूनही वाढत असलेल्या मुंबई महानगराच्या पाणी, वीज पुरवठ्याच्या गरजा त्याच प्रमाणात वाढत चालल्या आहेत. संबंधित यंत्रणा अजुन तरी ह्या गरजा पुर्ण करण्यात यशस्वी होत असली तरी ही यंत्रणा अत्यंत तणावाखाली असल्याचं वेळोवेळी जाणवत राहतं. सध्यातरी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरमिश्रित कौतुकाची भावना असली तरीही भविष्यात कुठंवर ते वाढत्या शहराच्या गरजांना तोंड देऊ शकतील ह्याविषयी चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 

मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या परिसंस्थेवर सुद्धा ताण पडत राहतो. इतकं सारं असलं तरीही विनु म्हणत असल्याप्रमाणं मुंबईतील परिसंस्था बिनबोभाट सुरु ठेवण्याकडं अधिकृत यंत्रणेची महत्तम शक्ती खर्च पडत असते. मुंबईत तुमच्याकडं पैसा असेल तर सर्व काही मिळू शकते. गावात तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही तुम्हांला सुद्धा वीजपुरवठा खंडित होणं, अनियमित पाणीपुरवठा वगैरे प्रकारांना तोंड द्यावं लागतं. ह्या सर्व प्रकारांमुळं गांव सोडून मुंबईकडं / परदेशात धाव घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळं मुंबई आणि महानगरांवर अधिक ताण पडत राहतो. 

आमच्या एका घरातून एका दिवसात बाहेर पडणारा कचरा पाहून चिंता वाटू लागते. तीच गोष्ट ई-कचऱ्याच्या बाबतीत! भ्रमणध्वनी, संगणक ही सारी मंडळी मोजक्या वर्षांत एकतर कालबाह्य किंवा नादुरुस्त होतात. लगेचच आपण नवीन घेण्याच्या मागे धाव घेतो. तीच गोष्ट थोड्याफार फरकानं टीव्ही, कार ह्यांच्या बाबतीत. दहा वर्षात ह्या गोष्टी बदलाव्या लागण्याची शक्यता अधिक असते. ऍमेझॉन, झोमॅटो, स्विगी आपल्यासाठी सोयीचे, पण एका शर्टांसोबत, एका मसाला डोश्यासोबत त्यांनी आपल्या घरात आणून टाकलेलं प्लॅस्टिक, आवरणाचा कचरा भयंकर असतो. आपल्यापैकी मोजके लोक प्लॅस्टिक रिसायकल करतात. झोमॅटो, स्वीगीने आपल्या शरीरात आणलेल्या जास्तीच्या कॅलरी जाळण्यासाठी आपल्यातील काहीतरी जिममध्ये जातात, काही जात नाहीत. दोन्ही वर्गातील काही लोकांना विविध आरोग्य समस्येनं ग्रासण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मोठाली इस्पितळं, आरोग्यविमा ह्या संस्था आता तिथं होणाऱ्या अविश्वसनीय खर्चामुळं आता आश्वासक ऐवजी भितीदायक वाटू लागल्या आहेत. 

आपल्या पुढील पिढ्यांसाठी आपण पृथ्वी कोणत्या स्थितीत सोडणार आहोत हा प्रश्न मनाला भेडसावत राहतो.  गावांमध्ये  उपलब्ध असणाऱ्या उपजीविकेच्या पर्यायांची  कमतरता किंबहुना असे पर्याय निर्माण करण्यात एक राष्ट म्हणून आपल्याला आलेलं अपयश हे महत्वाचं कारण ज्यामुळं सर्वांना शहराकडं धाव घ्यायची आहे. शहरात, परदेशात एकदा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर सुरु होते ती प्रतिष्ठेची शर्यत! तुमचं घर, नोकरी, कार, तुमच्या सहलींची ठिकाणं, तुमच्या मुलांचा शैक्षणिक प्रवास / यश  ह्यावरुन तुमचं मूल्यमापन करण्यात रस असणारी मंडळी !  तुम्हांला सामाजिक वर्तुळाचा भाग बनून राहायचं असेल तर ह्या मंडळींशी पडणारी तुमची गाठ अनिवार्य आहे.  सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातील मुखपृष्ठाला ज्यावेळी जाहिरातीची पहिली दोन तीन पानं मागच्या क्रमांकावर ढकलतात त्यावेळी समाजाच्या प्राधान्यक्रमाची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. मान्यवर व्यक्ती तंबाखूच्या जाहिराती करतात त्यावेळी भोवताली खरोखरच चिंतादायक परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याची खात्री पटते.  

हे कसं थांबविता येईल ह्याचा आता आपण विचार केला नाही तर पुढील काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की हल्ली कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. त्यामुळं आपण आपला विचार करावा. ठेवले ईश्वरे तैसेची राहावे ! ह्या उक्तीला अनुसरुन वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करावा. प्रगती करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा पण एका मर्यादेपलीकडं स्वतःला खेचू नये. महानगराच्या बाहेर सुद्धा अनेक मंडळी आनंदात राहतात. ती कशी काय आनंदात राहू शकतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. थोड्याच वेळात आपण आपल्याभोवती निर्माण केलेल्या गैरसमजुतींचे जाळं दूर करण्यात नक्कीच यश मिळेल ! 

Happy Sunday! 

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

निवडीचा संभ्रम

सोमवार सकाळी मी अत्यंत शिस्तबद्ध मनःस्थितीत असतो.  साधारणतः लोक १ जानेवारीला वर्ष कसं घालवायचं ह्याविषयी जे काही निर्धार व्यक्त करत असतात त्याप्रमाणं मी रविवारी सायंकाळी / सोमवारी सकाळी आठवडा कसा शिस्तीत घालवायचा ह्याविषयी मनसुबे रचतो. आज सकाळी एक तास कार्यालयीन काम अगदी गंभीरपणानं केल्यानंतर हा निर्धार मोडकळीस आल्यानं ही पोस्ट लिहीत आहे किंवा ही पोस्ट लिहायचा विचार आल्यानं हा निर्धार मोडला जात आहे. विषय काही नसताना सुद्धा लोकांना छळायचं हा सुप्त मनसुबा ही पोस्ट लिहिताना मनात आहे. 

सध्या महिलांचा T20 आशिया चषक बांगलादेशात खेळला जात आहे. त्यात थायलंड, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात वगैरे आपण कल्पना करु शकणार नाहीत असे देश सुद्धा सहभागी होत आहेत. ह्या महिला ज्या चित्रविचित्र आवाजात सामनाभर ओरडत असतात त्यामुळं घरातील शांततेचा भंग होतो असं आमचं म्हणणं आहे. संयुक्त अरब अमिरात संघात बहुसंख्य भारतीय वंशांच्या महिला आहेत. त्यात एक गोखले सुद्धा आहे! बांगलादेशात एकाच मैदानावर ही स्पर्धा खेळवली जात आहे. त्या दिवशी ह्या स्पर्धेत मोठा चमत्कार झाला. थायलंड संघानं पाकिस्तान संघाला नमविले. दुसऱ्या दिवशी आपण विविध प्रयोग करुन पाकिस्तान संघाकडून हरण्यात यश मिळविलं. 

भारताचा महिला संघ म्हणा की पुरुष संघ असो, आपल्याकडं गरजेपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असल्यानं सातत्यानं आपण बदल घडवत राहतो. Only thing which is constant in current world is CHANGE हे वाक्य टाळ्या मिळविण्यासाठी चांगलं असलं तरी ह्या बहुपर्यायानं आणि त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या सततच्या बदलांमुळं भारतीय महिला क्रिकेट संघ,  पुरुष क्रिकेट संघ आणि एकंदरीत भारतीय शहरी नागरिक पुर्णपणे गोंधळलेला आहे. ह्या बहुविध पर्यायांतुन आपल्यासाठी नक्की कोणता पर्याय चांगला हेच मुळी आपल्याला समजेनासं झालं आहे. भारतीय पुरुष संघात निवड होऊ शकणारे जे काही वीस बावीस खेळाडू आहेत ते ही जबरदस्त मानसिक तणावाखाली आहेत. जर तुम्ही रोहित शर्मा अथवा विराट कोहली नसाल तर तुम्ही सतत दोन - तीन खेळीनंतर संघाबाहेर जाता. 

BCCI अगदी मनाला येईल तसं वागत राहतं. आपला मूळ (कदाचित तथाकथित ह्या विशेषणासहित ) संघ ऑस्ट्रेलियाला पाठवून आपल्या fringe player च्या संघासहित दक्षिण आफ्रिकेच्या खऱ्या संघासहित पन्नास षटकांचे सामने बिनधास्त खेळतोय. वर्षातील बावन्न रविवारपैकी किती रविवार भारतीय संघ टीव्हीवर जाहिरातींचं उत्पन्न मिळवून देतो ह्याचं विश्लेषण मी निवृत्त झाल्यावर नक्की करणार आहे. तोवर भारताचे (पुरुष आणि महिला) अ, ब , क वगैरे संघ नक्की रविवारी खेळत असतील. इतके सर्व खेळाडू पस्तिशीच्या आसपास निवृत्त झाल्यावर त्यांना समालोचक म्हणून काम मिळण्यासाठी अधिक सामने नक्कीच असायला हवेत. 

घरी घेतलेल्या जिओमुळं सुद्धा विविध पर्याय माझ्यासमोर उभे आहेत. हे पर्याय टीव्ही, भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत. नशिबानं पाच सहा महिन्यातच ह्या बहू पर्यायांचा उबग येऊन त्यातील मोजक्या पर्यायांकडंच मी हल्ली वळतो. 

एकंदरीत आपल्याकडं काहीच नसणं हा जसा प्रश्न असू शकतो तसंच बरेच पर्याय असणं हा तितकाच गंभीर प्रश्न असू शकतो. शहरी भारतीय समाजाचा हाच मोठा प्रश्न बनला आहे. त्यामुळं आपल्या स्वतःसाठी , कुटुंबासाठी नक्की योग्य काय ह्याचा निर्णय जे घेऊ शकतात तेच लोक ह्या काळात समाधानी राहू शकतात. 

जाता जाता माझ्या एका अमेरिकन व्यवस्थापकाचं आवडतं वाक्य - Let Perfect be not the enemy of Good. परिपूर्ण निवडीचा शोध घेतांना आपल्यासमोर आलेल्या चांगल्या पर्यायांना सातत्यानं धुडकावून लावण्याची चूक करु नकात ! 

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

सद्यकाळात संस्कारांचे महत्त्व


म्हटलं तर सर्व काही आलबेल आहे पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकतंय असं सध्याच्या समाजातील कौटुंबिक  परिस्थितीविषयी म्हणता येईल. काही काळापूर्वी समाजात, घरात वागण्याच्या चालीरिती ह्याविषयी काहीसे लवचिकता नसणारे नियम रुढ होते. ह्या नियमांची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेणारी वरिष्ठ माणसं घरात, गावांत असत. हे नियम न पाळणाऱ्या बाळगोपाळांचे आणि प्रसंगी मोठ्यांचे कान पकडण्याचा, त्यांना दोन शब्द सुनाविण्याचा अधिकार ह्या वरिष्ठ माणसांना होता. 

पुर्वापार ही पद्धती, हे मॉडेल व्यवस्थित चाललं. आता ह्यातील व्यवस्थित ह्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. ह्या पद्धतीमुळं आपण येणाऱ्या नवीन पिढीला दाबून ठेवलं, त्यांना फुलण्याची संधी दिली नाही वगैरे आक्षेप घेतले जाऊ शकतात. इंग्लिशमध्ये Pandora's Box हा शब्दप्रयोग वापरला जातो. एखादा पर्याय सर्वांना उपलब्ध करुन दिल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांची जर आपल्याला कल्पना करता येत नसेल तर तो पर्याय उपलब्ध करुन देऊच नये असा साधारणतः मतितार्थ असतो. कदाचित ह्याच विचारामुळं आपल्या पूर्वजांनी काहीसं कठोर अथवा कर्मठ म्हणता येईल असं धोरण स्वीकारलं होतं.  

ह्या धोरणाविरुद्ध पिढ्यानुपिढ्या काहीशा दबल्या आवाजात होणाऱ्या कुजबुजीचं गेल्या दोन तीन पिढ्यांत जवळपास बंडखोरीत झालं.  हे काहीसं अतिरंजित वर्णन झालं. अजुनही परंपरांचं व्यवस्थित पालन करणारी अनेक कुटुंब भोवताली आहेत, फक्त त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आता पोस्टचा ओघ परत मुक्त विचारसरणीकडं वळवुयात. आपल्या कुटुंबातील परंपरांना, चालीरितींना पूर्णपणे बगल देऊन आपल्या इच्छेनुसार वागणारा असा हा वर्ग. त्यांच्या ह्या वागण्याला तात्पुरतं बंडखोरी म्हणुयात. ह्या बंडखोरीमागं विविध कारणं असु शकतात. 

१) जसा काळ बदलत गेला तसं परंपरांचे हस्तांतरण करताना त्यामागील मूळ हेतू नवीन पिढीला व्यवस्थित समजावून देणं आवश्यक होतं. ह्यासाठी नवीन पिढीला आपल्या बरोबरीची वागणूक देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणं आवश्यक होतं. बऱ्याच कुटुंबात हे घडलं नाही. 

२) नवीन पिढीचा वेगानं पाश्चिमात्य / आधुनिक जीवनपद्धतीशी संपर्क आला, त्या झंझावाताने नवीन पिढी काहीशी बहकली. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व काही ह्या जीवनपद्धतीने आपल्या पुढ्यात ठेवलं.  आपल्या संस्कृतीचा ह्या झंझावातापासून बचाव करण्यासाठी ज्या सुसंवादाची गरज होती त्यात आपण कमी पडलो. 

ह्या झंझावाताला येऊन किंवा आपल्या चालीरितींच्या परीक्षेचा काळ सुरु आता काही वर्षे उलटली आहेत. जसं आता युक्रेन पलटवार करु पाहतोय किंवा वेगवान गोलंदाजांनी आघाडीच्या तिघा चौघांना परत पाठविल्यानंतर वर्षोनुवर्षे मधली फळी आणि यष्टीरक्षक आपला डाव सावरतात तसं आपल्याला आपल्या चालीरीती सावरण्याचा प्रयत्न करता येईल हा महत्वाचा मुद्दा इथं मी मांडू पाहत आहे. 

आपल्या संस्कृतीशी फारकत घेऊन स्वतंत्र वागण्याचा आनंद घेणाऱ्या पिढीला कदाचित ह्यातील त्रुटी जाणवु लागल्या असतील. प्रत्यक्ष जीवनातील त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रसंगामुळं आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी आपल्याला विशिष्ट पद्धतीनं वागण्याचा आग्रह का केला हे त्यांना उमजलं असेल. हीच वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा परंपरा, चालीरीती ह्यांना काळानुसार योग्य रुपात सर्वांच्या समोर आणलं पाहिजे. 

हल्लीच्या काळात एकटेपणाच्या भावनेनं बऱ्याच जणांना ग्रासलं आहे. जुन्या काळातील जमेल तितक्या गोष्टींचा काळानुसार बदललेल्या स्वरुपात स्वीकार केल्यास मानसिक स्थैर्यास नक्कीच मदत होऊ शकेल. नवीन जीवनपद्धतीचा तर आपणांस स्वीकार करायचाच आहे पण त्या प्रवासात जुन्या चालीरीती, जुने संस्कार ह्यांची योग्य रुपात मदत घेतल्यास भविष्य सुखकारक होईल. हा लढा प्रत्येक घराघरातून लढला गेला पाहिजे.  

रविवार, १८ सप्टेंबर, २०२२

माझे कालवणाचे प्रयोग !

पाककलेतील कौशल्याच्या अनेक पातळी असाव्यात. त्यातही देशानुसार, प्रांतानुसार विविध चविष्ट पदार्थ बनविले जात असतात. त्यामुळं कौशल्य मापनासाठी नवीन परिमाण उपलब्ध होत असतं. माझा आणि पाककलेचा संबंध क्वचितच येतो. ज्यावेळी पत्नी घरात नसेल किंवा पूर्वी अमेरिकेत एकट्यानं गेलो असता मी स्वयंपाक करत असे / असतो. माझ्या स्वयंपाकाची एक खासियत आहे, त्याला कोणी चविष्ट म्हणू शकणार नाही पण तो भूक भागविण्यासाठी एक चांगला पर्याय असतो. मला शिकविण्यात आलेल्या पाककृतींचे मी तंतोतंत पालन करतो. माझी पाककौशल्याची पातळी किमान म्हणून गणली जाऊ शकते. 

आज हा स्वयंपाक करण्याचा प्रसंग ओढवला. रविवारी स्वयंपाक करायचा असेल तर खरं म्हणजे चिकन हा एक सोपा उपलब्ध पर्याय असतो. कांदा, हळद, मसाला आणि बटाटा ह्यांच्या संगतीला चिकन खुलून उठतं.  अगदीच धाडस करायची इच्छा असेल तर भोपळी मिरची चिकनसोबत अशा पाककृतींचे धाडस करावे. पण आज मी त्याहूनही एक मोठं धाडस केलं त्याची ही थोडक्यात कहाणी. 

आज मी आणि सोहमच असल्यानं झोमॅटो हा स्वाभाविक पर्याय होता. पण फ्रीजमध्ये असलेल्या माशाची आठवण झाल्यानं आम्हांला हा पर्याय सुचविण्यात आला. मला सविस्तर पाककृती देण्यात आली तर मी करीन असे मी म्हणालो. साधारणतः अर्ध्या तासात एक सविस्तर पाककृती व्हाटसअँपवर अर्थात इंग्लिश मध्ये मला देण्यात आली. त्याचं हे भाषांतर. 

१. सकाळी उठताक्षणी फ्रीज मधून मासे बाहेर काढून ठेवणे. (Thaw ह्या शब्दाचं स्वैर भाषांतर)
२. प्रत्यक्ष स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी मासे स्वच्छ धुवून घ्यावेत. उरलेसुरले कल्ले वगैरे साफ करावेत. स्वच्छ धुतलेला मासा बाजूला ठेवावा. 
३. आता वाटणाची तयारी करायला घ्यावी 
- कोथिंबीर जुडी स्वच्छ धुवून घ्यावी 
- लसण्याच्या आठ ते दहा कळ्या सोलून, धुवून घ्याव्यात. ह्यात त्यांचा सेमीमधील आकार नमूद न करण्यात आल्यानं मी माझ्या अंदाजानुसार ह्यात थोडाफार फेरफार केला. 
- कमी तिखटाच्या दोन मिरच्या मधोमध कापून बिया काढून घ्याव्यात. माझा स्वयंपाक सुरु असताना सोहमने फेरी मारली आणि बिया काढू नयेत ह्यावर आमचं एकमत झालं 
- नखाइतकं आलं. ही सूचना धुडकावून लावत मी मनसोक्त आलं टाकलं. 
- कडीपत्त्याची दहा ते बारा पाने. 
- बिया काढून एक टोमॅटो. सोहमने आधी केलेल्या ऑम्लेटमधील उरलेला अर्धा टोमॅटो सुद्धा ह्यात समाविष्ट करण्यात आला. 
- फ्रीझर मध्ये खिसुन ठेवलेल्या खोबऱ्यातील दोन मोठे चमचे इतकं खोबरं सुरीने काढून घेणे. फ्रीझर मधील विविध डब्यातील खोबऱ्याचा डबा नक्की कोणता हे ठरविण्यासाठी सोहमची मदत घेण्यात आली. 

इतकी मेहनत घेऊन वाटणासाठी बनविण्यात आलेली कच्ची सामुग्री ! 


खोबरं म्हणून वापरण्यात आलेला पांढऱ्या रंगाचा फ्रीझरमधील पदार्थ 

खसखसून धुण्यात आलेले मासे  (केवळ साबण वापरण्याचे बाकी ठेऊन) 



पाककृतीचा पुढील भाग 

४. वरील कच्ची सामुग्री मिक्सर मध्ये घालून मोजक्या पाण्यासहित अगदी चांगली दळून घ्यावी. अपघाताची शक्यता ध्यानात घेता मिक्सरच्या भांड्याच्या झाकणावर हात धरावा. 

हेच ते दळलेले वाटण !



५.  आता हे वाटण मिक्सरच्या भांड्यातून स्वयंपाकघरातील तांब्याचा बेस असलेल्या दोन भांड्यातील मोठ्या भांड्यात हस्तांतरित करावं. 

६. त्यात एक चहाच्या चमच्याइतकी हळद टाकावी. इथं चुकून मोठा चमचा हळदीच्या भांड्यात होता. पण ते नशिबानं माझ्या ध्यानात आलं. 

७.  ** चहाच्या चमच्याइतका मसाला. (पूर्ण रेसिपीचा उलगडा होऊ नये म्हणून काही ठिकाणी ** चा वापर)

८. **  चमचे मीठ ! (खरंतर कापून पण मी भरभरुन घेतलं आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य म्हणून अजुन थोडं टाकलं !!)

९. दोन मोठे चमचे तेल. (हे नेमकं संपलं होतं.  मोठ्या डब्यातून काढावं लागलं!)

१०. चवीनुसार चिंचेचं पाणी (हे मिळालंच नाही !!)

हे सर्व केल्यानंतरचा हा फोटो ! 



११. आता अर्धा भांडं भरुन पाणी ! भांडं अर्ध झाकून साधारणतः दहा मिनिटं उकळावं. माशाला तू शिजला का रे हे विचारावं. त्यानं हो म्हणताच गॅस बंद करावा.  कालवणाचा हा फोटो !


आताच जेवून उठलो. बहुदा पाणी थोडं जास्त झालं. पण एकंदरीत चव चांगली होती. पाककृती लिहिणाऱ्याचं आणि स्वयंपाक करणाऱ्याचे कौतुक! 

ह्या सर्व प्रकारात मासे धुणे आणि वाटण करणे ह्या वेळ घेणाऱ्या कृती आहे. बाकी शिजविण्याचा वेळ किमान आहे! 

ह्या सोबत कोळंबी फ्राय करावी असे सोहम म्हणाला. ही सोपी पाककृती असल्यानं मी स्वतः केली. ह्यात कांदा एकसमान कापणे आणि मंद आचेवर संयमाने तो थोडासा तांबूस होईस्तोवर भाजणे ह्या महत्वाच्या बाबी असाव्यात. ह्यात मी कापून बटाटा टाकण्याचा निर्णय घेतला. परंतु कोळंबी लवकर शिजते, त्यामुळं बटाटयाच्या कापाही लवकर शिजण्यासाठी बारीक कापाव्यात हे ध्यानात राहिलं नाही. Masterchef Australia कोळंबी अगदी कमी वेळ शिजवितात हे बऱ्याच वेळा घरी ऐकलं होतं. त्यामुळे संभ्रमात पडून शेवटी बटाटा थोडा कच्चा राहिला ! पण मसाला आणि कोळंबीची चव ह्यामुळे अंतिम पाककृती चविष्ट झाली. 





महागाईच्या झळा! दोनशे रुपयाची इवलीशी कोळंबी ! वसईला हे चित्र पाहताच तुमच्यामुळे कोळीणी भाव वाढवतात हे वाक्य नक्की ठरलेलं ! 




अशा प्रकारे एका धाडसाचा यशस्वी शेवट !

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

शोधिशी मानवा

 


सहसा ऑक्टोबर महिन्यात अनुभवायला मिळणारं परतीच्या पावसाचं वातावरण ह्या आठवड्यात वसईत अनुभवायला मिळालं. सायंकाळी सहानंतर ढगांचा गडगडाट आणि त्यामुळं येणारा थंडावा मनाला सुखावून जातो. झोपही गाढ लागते. पुढील आठवड्याला सामोरं जाण्याचं एक बळ मिळतं. हा परतीचा पाऊस नसावा ही आशा !

दोन वर्षांच्या खंडानंतर मांडलई गावातील गणपती पाहायची संधी मिळाली. गावातील शांत वातावरणात घराघरांतून फिरत गणपती बाप्पाचं दर्शन घेणं मनाला खूप सुखावतं. गणपतीबाप्पा सुद्धा निवांतपणे आनंदात असतात. ते  आपल्याकडं प्रेमळ नजरेनं पाहत आहेत असा भास होतो. खरंतर गणपती पाहायला जायचं ते चालतच अशी पुर्वीची पद्धत! पण काही कारणांनी त्यात बदल झाला आहे. 

दोन तीन दिवस वसईत मुक्काम झाला की काहीबाही सुचतं. आताच संध्याकाळी असंच काहीतरी झालं. भोवताली एकंदरीत मूळ भावनेला बाजूला सारुन त्याभोवताली आपण निर्माण केलेल्या आकर्षक आवरणांनाच  माहात्म्य प्राप्त झालं आहे की काय असं वाटु लागतं. ह्यामागचं कारण काय असावं ही कुतूहलभावना मनात निर्माण झाली. जगातील बरं - वाईट, यौग्य - अयोग्य काय हे ठरविण्याचा अधिकार पूर्वी मोजक्या जाणकार व्यक्तींच्या हाती होता. आता आपण हा अधिकार सर्वांच्या हाती दिला. 

त्यामुळं परीक्षण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या मूळ गुणधर्माकडं परीक्षणाचा रोख न राहता त्या गोष्टीच्या आकर्षकतेकडे भर दिला जातो. ह्या परिस्थितीत आता बदल होण्याच्या पलीकडं स्थिती गेली आहे. त्यामुळं उगाचच तक्रारभावना मनात बाळगण्यापेक्षा ह्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला हवं ते कसं मिळविता येईल ह्याचा शोध घ्यायला हवा. चविष्ट घरगुती जेवण, शांत वातावरणातील घरगुती गणपती, प्रमाणपत्राचा ध्यास न घेता केवळ ज्ञानप्राप्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा केलेला सखोल अभ्यास, नेहमीच्या बोर्डात शांतपणे छापील पुस्तकांच्या आधारे अभ्यास करणारी मुलं सर्व काही अस्तित्वात आहे, फक्त ते कुठंतरी दडलं गेलं आहे. 

महानगरातील बहुसंख्य जनता ज्याप्रकारे जीवन जगत आहे त्यानुसार (ऍमेझॉन, उबेर, झोमॅटो, स्वीगी आधारित) जीवन जगणं हा आपला निर्णय आहे. असं जीवन जगताना आपल्याला काही प्रमाणात गुदमरायला होत असेल एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की हे जीवन जगण्याची सक्ती आपल्यावर कोणी केली नाही. काहीशा विस्मृतीत गेलेल्या जीवनातील मनाला शांत करणाऱ्या गोष्टीना पुन्हा आपल्या जीवनात समाविष्ट करुन घेता येऊ शकतं. मुंबई ब वरील मंगलप्रभात, डी डी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम शोधून काढून पाहावेत. खासगी वाहिन्यांनी जणू काही शांतपणे बोलणं चालणं आपल्याला विसरायला लावण्याचा चंग बांधला आहे की काय अशी स्थिती निर्माण केली आहे. देवपूजा जमेल तेव्हा करुन पहावी, बरं वाटतं. आपल्या चुका देव कसा माफ करतोय हे पाहून आनंद होतो. घरकाम केलं तरीही बरं वाटतं. सतत आपण दिमतीला भ्रमणध्वनी, संगणक ठेवत असल्यानं सतत अधिकारात राहण्याची आपल्याला सवय लागून राहते. हातात झाडू घेतला की काही काळ का होईना आपल्या भोवतालच्या खऱ्या विश्वात आपला प्रवेश होतो. 

गेल्या आठवड्यातील गुरुवारी सुरु झालेल्या कार्यालयातील समस्येनं (प्रॉडक्शन इश्यू) ह्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पिच्छा पुरवला. त्यामुळं मेंदू भणभणला होता. ह्या समस्या जरी निपटल्या तरी त्यांचे सखोल विश्लेषण करणारे  प्रदीर्घ कॉल्स तुमची वाट पाहत असतात. ह्या समस्येचं मूळ कारण तुमच्या टीमकडे अंगुलिदर्शन करत असेल तर अशा प्रदीर्घ कॉल्सची प्रतीक्षा करताना झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. परंतु चांगल्या कंपनीत कोणा व्यक्तीला, अथवा टीमला दोषी न ठरवता ह्या चुकांमधून आपल्याला कसं काय शिकता येईल ह्यावर भर दिला जातो. ह्या आठवड्यात पुन्हा एकदा त्याचा सुखद प्रत्यय आला. जगातील चांगुलपणा काहीसा विरळ झाला असला तरी त्याच्या अस्तित्वाविषयी पुन्हा एकदा खात्री पटली. सद्ययुगात तुमच्या बाबतीत सदैव चांगलं कदाचित होत नसेल परंतु जर जगातील मुलभूत तत्त्वांवर अढळ श्रद्धा ठेवत जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच  तुमच्या प्रयत्नांना यश मिळेलच, ह्याची खात्री हे जग देत आहे आणि देत राहील !!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...