मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २५ सप्टेंबर, २०२२

सद्यकाळात संस्कारांचे महत्त्व


म्हटलं तर सर्व काही आलबेल आहे पण तरीही कुठंतरी काहीतरी खटकतंय असं सध्याच्या समाजातील कौटुंबिक  परिस्थितीविषयी म्हणता येईल. काही काळापूर्वी समाजात, घरात वागण्याच्या चालीरिती ह्याविषयी काहीसे लवचिकता नसणारे नियम रुढ होते. ह्या नियमांची अंमलबजावणी करण्यात पुढाकार घेणारी वरिष्ठ माणसं घरात, गावांत असत. हे नियम न पाळणाऱ्या बाळगोपाळांचे आणि प्रसंगी मोठ्यांचे कान पकडण्याचा, त्यांना दोन शब्द सुनाविण्याचा अधिकार ह्या वरिष्ठ माणसांना होता. 

पुर्वापार ही पद्धती, हे मॉडेल व्यवस्थित चाललं. आता ह्यातील व्यवस्थित ह्या शब्दप्रयोगावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. ह्या पद्धतीमुळं आपण येणाऱ्या नवीन पिढीला दाबून ठेवलं, त्यांना फुलण्याची संधी दिली नाही वगैरे आक्षेप घेतले जाऊ शकतात. इंग्लिशमध्ये Pandora's Box हा शब्दप्रयोग वापरला जातो. एखादा पर्याय सर्वांना उपलब्ध करुन दिल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य परिणामांची जर आपल्याला कल्पना करता येत नसेल तर तो पर्याय उपलब्ध करुन देऊच नये असा साधारणतः मतितार्थ असतो. कदाचित ह्याच विचारामुळं आपल्या पूर्वजांनी काहीसं कठोर अथवा कर्मठ म्हणता येईल असं धोरण स्वीकारलं होतं.  

ह्या धोरणाविरुद्ध पिढ्यानुपिढ्या काहीशा दबल्या आवाजात होणाऱ्या कुजबुजीचं गेल्या दोन तीन पिढ्यांत जवळपास बंडखोरीत झालं.  हे काहीसं अतिरंजित वर्णन झालं. अजुनही परंपरांचं व्यवस्थित पालन करणारी अनेक कुटुंब भोवताली आहेत, फक्त त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आता पोस्टचा ओघ परत मुक्त विचारसरणीकडं वळवुयात. आपल्या कुटुंबातील परंपरांना, चालीरितींना पूर्णपणे बगल देऊन आपल्या इच्छेनुसार वागणारा असा हा वर्ग. त्यांच्या ह्या वागण्याला तात्पुरतं बंडखोरी म्हणुयात. ह्या बंडखोरीमागं विविध कारणं असु शकतात. 

१) जसा काळ बदलत गेला तसं परंपरांचे हस्तांतरण करताना त्यामागील मूळ हेतू नवीन पिढीला व्यवस्थित समजावून देणं आवश्यक होतं. ह्यासाठी नवीन पिढीला आपल्या बरोबरीची वागणूक देऊन त्यांच्याशी सुसंवाद साधणं आवश्यक होतं. बऱ्याच कुटुंबात हे घडलं नाही. 

२) नवीन पिढीचा वेगानं पाश्चिमात्य / आधुनिक जीवनपद्धतीशी संपर्क आला, त्या झंझावाताने नवीन पिढी काहीशी बहकली. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्व काही ह्या जीवनपद्धतीने आपल्या पुढ्यात ठेवलं.  आपल्या संस्कृतीचा ह्या झंझावातापासून बचाव करण्यासाठी ज्या सुसंवादाची गरज होती त्यात आपण कमी पडलो. 

ह्या झंझावाताला येऊन किंवा आपल्या चालीरितींच्या परीक्षेचा काळ सुरु आता काही वर्षे उलटली आहेत. जसं आता युक्रेन पलटवार करु पाहतोय किंवा वेगवान गोलंदाजांनी आघाडीच्या तिघा चौघांना परत पाठविल्यानंतर वर्षोनुवर्षे मधली फळी आणि यष्टीरक्षक आपला डाव सावरतात तसं आपल्याला आपल्या चालीरीती सावरण्याचा प्रयत्न करता येईल हा महत्वाचा मुद्दा इथं मी मांडू पाहत आहे. 

आपल्या संस्कृतीशी फारकत घेऊन स्वतंत्र वागण्याचा आनंद घेणाऱ्या पिढीला कदाचित ह्यातील त्रुटी जाणवु लागल्या असतील. प्रत्यक्ष जीवनातील त्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रसंगामुळं आपल्या आधीच्या पिढीतील लोकांनी आपल्याला विशिष्ट पद्धतीनं वागण्याचा आग्रह का केला हे त्यांना उमजलं असेल. हीच वेळ आहे जेव्हा आपण पुन्हा परंपरा, चालीरीती ह्यांना काळानुसार योग्य रुपात सर्वांच्या समोर आणलं पाहिजे. 

हल्लीच्या काळात एकटेपणाच्या भावनेनं बऱ्याच जणांना ग्रासलं आहे. जुन्या काळातील जमेल तितक्या गोष्टींचा काळानुसार बदललेल्या स्वरुपात स्वीकार केल्यास मानसिक स्थैर्यास नक्कीच मदत होऊ शकेल. नवीन जीवनपद्धतीचा तर आपणांस स्वीकार करायचाच आहे पण त्या प्रवासात जुन्या चालीरीती, जुने संस्कार ह्यांची योग्य रुपात मदत घेतल्यास भविष्य सुखकारक होईल. हा लढा प्रत्येक घराघरातून लढला गेला पाहिजे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...