मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३ सप्टेंबर, २०२२

शोधिशी मानवा

 


सहसा ऑक्टोबर महिन्यात अनुभवायला मिळणारं परतीच्या पावसाचं वातावरण ह्या आठवड्यात वसईत अनुभवायला मिळालं. सायंकाळी सहानंतर ढगांचा गडगडाट आणि त्यामुळं येणारा थंडावा मनाला सुखावून जातो. झोपही गाढ लागते. पुढील आठवड्याला सामोरं जाण्याचं एक बळ मिळतं. हा परतीचा पाऊस नसावा ही आशा !

दोन वर्षांच्या खंडानंतर मांडलई गावातील गणपती पाहायची संधी मिळाली. गावातील शांत वातावरणात घराघरांतून फिरत गणपती बाप्पाचं दर्शन घेणं मनाला खूप सुखावतं. गणपतीबाप्पा सुद्धा निवांतपणे आनंदात असतात. ते  आपल्याकडं प्रेमळ नजरेनं पाहत आहेत असा भास होतो. खरंतर गणपती पाहायला जायचं ते चालतच अशी पुर्वीची पद्धत! पण काही कारणांनी त्यात बदल झाला आहे. 

दोन तीन दिवस वसईत मुक्काम झाला की काहीबाही सुचतं. आताच संध्याकाळी असंच काहीतरी झालं. भोवताली एकंदरीत मूळ भावनेला बाजूला सारुन त्याभोवताली आपण निर्माण केलेल्या आकर्षक आवरणांनाच  माहात्म्य प्राप्त झालं आहे की काय असं वाटु लागतं. ह्यामागचं कारण काय असावं ही कुतूहलभावना मनात निर्माण झाली. जगातील बरं - वाईट, यौग्य - अयोग्य काय हे ठरविण्याचा अधिकार पूर्वी मोजक्या जाणकार व्यक्तींच्या हाती होता. आता आपण हा अधिकार सर्वांच्या हाती दिला. 

त्यामुळं परीक्षण होणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या मूळ गुणधर्माकडं परीक्षणाचा रोख न राहता त्या गोष्टीच्या आकर्षकतेकडे भर दिला जातो. ह्या परिस्थितीत आता बदल होण्याच्या पलीकडं स्थिती गेली आहे. त्यामुळं उगाचच तक्रारभावना मनात बाळगण्यापेक्षा ह्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला हवं ते कसं मिळविता येईल ह्याचा शोध घ्यायला हवा. चविष्ट घरगुती जेवण, शांत वातावरणातील घरगुती गणपती, प्रमाणपत्राचा ध्यास न घेता केवळ ज्ञानप्राप्तीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा केलेला सखोल अभ्यास, नेहमीच्या बोर्डात शांतपणे छापील पुस्तकांच्या आधारे अभ्यास करणारी मुलं सर्व काही अस्तित्वात आहे, फक्त ते कुठंतरी दडलं गेलं आहे. 

महानगरातील बहुसंख्य जनता ज्याप्रकारे जीवन जगत आहे त्यानुसार (ऍमेझॉन, उबेर, झोमॅटो, स्वीगी आधारित) जीवन जगणं हा आपला निर्णय आहे. असं जीवन जगताना आपल्याला काही प्रमाणात गुदमरायला होत असेल एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की हे जीवन जगण्याची सक्ती आपल्यावर कोणी केली नाही. काहीशा विस्मृतीत गेलेल्या जीवनातील मनाला शांत करणाऱ्या गोष्टीना पुन्हा आपल्या जीवनात समाविष्ट करुन घेता येऊ शकतं. मुंबई ब वरील मंगलप्रभात, डी डी सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम शोधून काढून पाहावेत. खासगी वाहिन्यांनी जणू काही शांतपणे बोलणं चालणं आपल्याला विसरायला लावण्याचा चंग बांधला आहे की काय अशी स्थिती निर्माण केली आहे. देवपूजा जमेल तेव्हा करुन पहावी, बरं वाटतं. आपल्या चुका देव कसा माफ करतोय हे पाहून आनंद होतो. घरकाम केलं तरीही बरं वाटतं. सतत आपण दिमतीला भ्रमणध्वनी, संगणक ठेवत असल्यानं सतत अधिकारात राहण्याची आपल्याला सवय लागून राहते. हातात झाडू घेतला की काही काळ का होईना आपल्या भोवतालच्या खऱ्या विश्वात आपला प्रवेश होतो. 

गेल्या आठवड्यातील गुरुवारी सुरु झालेल्या कार्यालयातील समस्येनं (प्रॉडक्शन इश्यू) ह्या आठवड्यातील मंगळवारपर्यंत पिच्छा पुरवला. त्यामुळं मेंदू भणभणला होता. ह्या समस्या जरी निपटल्या तरी त्यांचे सखोल विश्लेषण करणारे  प्रदीर्घ कॉल्स तुमची वाट पाहत असतात. ह्या समस्येचं मूळ कारण तुमच्या टीमकडे अंगुलिदर्शन करत असेल तर अशा प्रदीर्घ कॉल्सची प्रतीक्षा करताना झोपेचं खोबरं झालंच म्हणून समजा. परंतु चांगल्या कंपनीत कोणा व्यक्तीला, अथवा टीमला दोषी न ठरवता ह्या चुकांमधून आपल्याला कसं काय शिकता येईल ह्यावर भर दिला जातो. ह्या आठवड्यात पुन्हा एकदा त्याचा सुखद प्रत्यय आला. जगातील चांगुलपणा काहीसा विरळ झाला असला तरी त्याच्या अस्तित्वाविषयी पुन्हा एकदा खात्री पटली. सद्ययुगात तुमच्या बाबतीत सदैव चांगलं कदाचित होत नसेल परंतु जर जगातील मुलभूत तत्त्वांवर अढळ श्रद्धा ठेवत जर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहिलात तर नक्कीच  तुमच्या प्रयत्नांना यश मिळेलच, ह्याची खात्री हे जग देत आहे आणि देत राहील !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...