शनिवार, ६ जुलै, २०२४
२०२४ - युरोप सहल - भाग ३- लंडन
रविवार, ३० जून, २०२४
२०२४ - युरोप सहल - पूर्वतयारी, बोरिवली ते लंडन व्हाया T2
युरोप सहलीचा बेत खरं तर २०२० मध्ये आखला होता. त्यावेळी फेब्रुवारीमध्ये इंग्लंडचा व्हिसा मिळाला सुद्धा होता. शेंघेन व्हिसासाठी कागदपत्रांची जमवाजमव सुरू असतानाच कोविड सुरू झाला. अर्थातच सर्व सहली पुढे ढकलल्या गेल्या. २०२२ पर्यंत सहली सुरू झाल्या नव्हत्या किंवा मर्यादित प्रमाणात सुरु होत्या. त्यानंतर वीणा वर्ल्डने आमच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. आमच्यासमोर दोन पर्याय होते. पहिला म्हणजे बुकिंगसाठी दिलेल्या काही रकमेवर पाणी सोडून बाकी रक्कम परत घेणे. दुसरा पर्याय म्हणजे आता वाढलेल्या किंमतीनुसार फरक भरून काढून उपलब्ध असलेल्या सहलीमध्ये सहभागी होणे. २०२३ साली आम्हां सर्वांचे वेळापत्रक वीणा वर्ल्डच्या उपलब्ध असलेल्या सहलींच्या वेळापत्रकासोबत न जमल्यामुळे तेव्हा आम्ही युरोप सहलीला जाऊ शकलो नाही.
साधारणतः २०२३ च्या उत्तरार्धात वीणा वर्ल्डने आता ही रक्कम अशीच राखून ठेवणे शक्य होणार नाही असा निर्वाणीचा खलिता पाठविला. त्यामुळे एकतर भारतातील सहलींसाठी ही रक्कम वापरणे किंवा तात्काळ युरोप सहलींचे नियोजन करणे हेच पर्याय आमच्यापुढे शिल्लक राहिले. आम्ही दुसऱ्या पर्यायाची निवड करत "युरोपियन हायलाईट" ही १३ जूनपासून सुरू होणारी बारा दिवसांची सहल निवडली.
साधारणतः फेब्रुवारीमध्ये सहलीची निवड केल्यानंतर इंग्लंडचा व्हिसा आणि शेंघेन व्हिसा यासाठी तयारी सुरू झाली. दोन्ही व्हिसासाठी बऱ्यापैकी सारख्याच कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये प्रामुख्याने तुमच्या बँक अकाउंटमध्ये गेल्या सहा महिन्यात बचत खात्यामध्ये उपलब्ध असलेली सरासरी रक्कम, तुमच्या मुदत ठेवींची माहिती, तुमच्या नावावर असलेल्या मालमत्तेची माहिती, तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला, तुमच्या कंपनीकडून सहलीच्या कालावधीसाठी तुमची सुट्टी मंजूर झाल्याचे पत्र इत्यादी माहितीचा समावेश होतो. यातील बरीचशी माहिती आपल्या खाजगी माहितीत समावेश होते अशी भावना निर्माण होते. मुख्य म्हणजे ही माहिती त्या देशांच्या वकिलातीपर्यंत पोहोचेपर्यंत मध्यस्थ कर्मचाऱ्यांना देखील ही माहिती उपलब्ध होते. हे खरोखरच आवश्यक आहे काय हा प्रश्न निर्माण होतो.
ही बाब वगळता वीणा वर्ल्डतर्फे व्हिसाचे नियोजन करणे हा एक चांगला अनुभव असतो. ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वीणा वर्ल्ड तुम्हाला खूप सहकार्य करते. तुम्ही भरलेल्या अर्जाची सखोल छाननी करून त्यात काही चुका असल्यास त्या तुम्हांला दुरुस्तीसाठी पाठवून देण्यात येतात. त्याचप्रमाणे इंग्लंड आणि शेंघेन देशांपैकी ज्या देशाच्या व्हिसा मुलाखतीसाठी सर्वात पहिली तारीख मिळू शकते त्या देशाच्या वकिलातीमध्ये व्हिसासाठी तुम्हाला तारीख मिळवून देण्यात वीणा वर्ल्ड अत्यंत मोलाचे सहकार्य करते. प्रत्येक माणसाच्या दृष्टीने वेळ आणि पैसा या दोन महत्त्वाच्या घटकांपैकी प्राधान्यक्रम ठरलेला असतो. काहींसाठी वेळ महत्त्वाचा तर काहींसाठी पैसा! तुम्ही स्वतः ही संपुर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुमचा पैसा वाचेल पण तुम्हांला त्यासाठी अधिक वेळ द्यावा लागेल, हजारो लोकांचे व्हिसा करून दिलेल्या अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनाला तुम्ही मुकाल. हे काही मोठे क्लिष्ट काम आहे असे मला म्हणायचे नाही. परंतु ते मोठे डोकेदुखीचे काम आहे हे मात्र नक्की! यामुळे वीणा वर्ल्डचा या प्रक्रियेतील सहभाग आमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरला असे मी म्हणेन.
आम्हांला इंग्लंड व्हिसासाठी वांद्रा, कुर्ला संकुलात बोलवण्यात आले. शेंघेन व्हिसासाठी आम्ही महालक्ष्मी येथील ऑफिसमध्ये गेलो. दोन्ही ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजित केलेली प्रक्रिया आहे. सर्वप्रथम तुम्ही आणलेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली जाते. या कार्यालयात ज्या क्रमानं कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्याच क्रमवारीने वीणा वर्ल्डने आम्हांला कागदपत्रांची आखणी करून दिली होती. त्यामुळे तेथील कर्मचारी वर्गांची बरीच मेहनत वाचली. ही कागदपत्रांची छाननी करून झाली की मग पुढे तुमचे बायोमेट्रिक, व्हिसाची फी भरणे इत्यादी सोपस्कार पार पाडले जातात. या सर्व प्रकारास दीड तास लागतो. त्यानंतर एका वकिलातींद्वारे सर्व तपासणी होऊन एका आठवड्यात तुमची पारपत्र तुमच्या घरी कुरियरने पोहोचवली जातात. ह्या कार्यालयात जाऊन पारपत्र स्वीकारण्याचा पर्याय सुद्धा तुमच्यासमोर उपलब्ध असतो. परंतु इतक्या उन्हात या दोन लांबच्या ठिकाणी पुन्हा जाण्यापेक्षा थोडे अधिक पैसे देऊन पारपत्रे घरी स्वीकारण्याचा पर्याय आम्ही निवडला.
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये व्हिसासकट पारपत्रे आमच्या हाती आली होती. त्यामुळे एक प्रकारची काहीशी आश्वासकता निर्माण झाली होती. आता सहलीची तयारी करण्यास आम्ही मोकळे होतो. वीणा वर्ल्ड युरोपच्या सहलीसाठी जाणाऱ्या भावी प्रवाशांना माहिती देण्यासाठी अनेक झूम बैठकींचे आयोजन केले जाते करते. त्यामध्ये खालील मुद्द्यांचा समावेश होतो.
- सहलीमध्ये घेऊन जाण्यासाठी आवश्यक असणारी पौंड, युरो रक्कम
- सहलीत किती बॅगा घेऊन जाव्यात. चेक इन, केबिन बॅगांची संख्या किती असावी? त्यात नेऊ शकू अशी शिफारस करण्यात आलेल्या गोष्टी.
- युरोपमध्ये आपल्या मौल्यवान गोष्टींची कशी काळजी घ्यावी. पारपत्र हरवल्यास किती गंभीर प्रसंगास तोंड द्यावे लागू शकते ह्याची आपणास वारंवार जाणीव करून दिली जाते.
- युरोपात हॉटेलमधील खोल्या आकाराने अगदी छोट्या असतात. ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही सुद्धा घेतला. एका हॉटेलात आमच्या तिन्ही बॅग्स उघडल्यानंतर संपूर्ण खोली व्यापून गेली होती.
- इथे सार्वजनिक नळातील पाणी थेट तुम्ही घेऊन गेलेल्या बाटलीमध्ये भरून पिऊ शकता. त्यामुळं रिकामी बाटली नेणं आवश्यक आहे. ह्या विधानावर उगाचच भुवया उंचावू नये.
- सुके खाद्यपदार्थ नेणे आवश्यक आहे की नाही ह्यावर मार्गदर्शन करण्यात येतं. माझ्या अनुभवानुसार तुम्ही वीणा, केसरीसारख्या कंपन्यांद्वारे प्रवास करत असाल तर सुक्या खाद्यपदार्थांची अजिबात आवशक्यता नाही.
- लोकरी कपडे किती न्यावेत.
- युरोपातील कित्येक ठिकाणी आढळणाऱ्या चोरट्यांपासून आपल्या मौल्यवान वस्तूंचे कसे संरक्षण करावे.
सतत बारा दिवस प्रवास करत असल्यामुळे कपड्यांचे नियोजन हे प्रत्येकाने आपापल्या सवयीनुसार, आवडीनुसार करणे आवश्यक आहे. बहुतेक विमानकंपन्या तुम्हाला दोन चेक इन बॅग्स नेण्यास परवानगी देतात. वीणा किंवा तत्सम प्रवास कंपन्यांबरोबर आपण स्वदेशामध्ये प्रवास केला असल्यास आपण अत्यंत खुशीत असतो. हॉटेलमधील खोली ते प्रवासाची बस यामध्ये बॅग्सची ने आण करण्यासाठी हॉटेलमधील कर्मचारी आपल्याला मदत करतील अशी नियोजन ह्या प्रवासकंपन्यांनी केलेले असते. परंतु परदेशामध्ये मात्र मनुष्यबळ इतक्या सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने किंवा असे मनुष्यबळ उपलब्ध करणे ही खर्चिक बाब असल्यानं आपल्या बॅग्सची बस ते हॉटेलची खोली यामधील ने आण आपल्यालाच करावी लागते. त्यामुळे माणशी दोन चेकिंग बॅगा हा योग्य पर्याय असू शकत नाही. बऱ्याच वेळा या बस हॉटेलपासून बऱ्यापैकी दूर अंतरावर थांबतात. अशावेळी दोन चेकिंग बॅगा, एक केबिन बॅग स्वतः वाहून नेणे हे बहुतांशी प्रवाशांना सहजसाध्य होत नाही. त्यामुळे "Travel Light Travel Smart" या तत्त्वाचे अंगीकरण करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
सतत बारा दिवस तुम्ही घराबाहेर राहता. युरोपातील ज्या हॉटेलमध्ये आपण वास्तव्य करतो तिथं वॉशिंग मशीन सहजासहजी उपलब्ध असल्याचे मी तरी पाहिले नाही. जरी ती उपलब्ध असली तरी कपडे धुण्याचे आणि वाळवण्याचे वेगळे मशीन अशा एकंदरीत प्रकारात तुमचा सहजासहजी दीड दोन तास वाया जाण्याची शक्यता असते. बहुतांशी वेळा रात्रीचे जेवण आटपून आम्ही खोलीत प्रवेश करेस्तोवर दहा वाजले होते. सकाळचा गजर सर्वात लवकर तीन वाजता आणि सरासरी सहा वाजता होत असे. या सर्व प्रकारात हॉटेलमधल्या लॉन्ड्रीचा वापर करत कपडे धुणे हे बऱ्यापैकी कठीण आहे. त्यामुळे तुम्ही बारा दिवसांचे कपडे आपापल्या सवयीनुसार घेऊन जाणे आवश्यक आहे. आता यामध्ये अधिक खोलात शिरणे मी प्रशस्त समजत नाही. केवळ दोन जीन्सवर बारा दिवस काढणारी मंडळी सुद्धा असू शकतात असे विधान करून मी या विषयावर पडदा पडत आहे. सोशल मीडियावरील सर्व फोटोत दोनच रंगांच्या जीन्स दिसतील हे योग्य आहे का अशा शंका असतील तर त्यावर विविध उपाय आहेत.
भले तुम्ही दोन आठवडाभर आधी पॅकिंगला सुरुवात करा. खरं पॅकिंग हे प्रवासाच्या आदल्या दिवशी होते. त्यावेळी रात्री झोपताना सर्व चेक-इन बॅगा कुलूपबंद करून दिवाणखान्यात आणल्या गेलेल्या असाव्यात. लॉकसाठी टीएसए कुलुपं नावाचा प्रकार असतो. माझ्या समजूतीनुसार सुरक्षा यंत्रणेकडे टीएसए कुलुपं उघडू शकतील अशा किल्ल्या असतात. त्यामुळे जर त्यांना संशय आला तर ते त्या किल्ल्यांद्वारे टीएसए कुलुपं लावलेल्या बॅग्स उघडून तपासणी करून पुन्हा त्या बंद करून ठेवतात. जर तुम्ही या कुलुपांव्यतिरिक्त दुसरी कुलुपं वापरलीत तर त्यांना ती कुलुपं तोडण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नसतो. माझ्या आतापर्यंतच्या अनुभवात अशी कुलुपं फोडली गेली होती. परंतु तो अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय प्रवास असल्याने त्यांनी आमच्यासाठी दुसरी कुलुपं बॅगेमध्ये ठेवली होती. असो!
ज्याक्षणी तुम्ही विमानतळासाठी बोलावलेल्या टॅक्सीचे इमारतीखाली आगमन झालं आहे असा टॅक्सी चालकाचा मेसेज किंवा फोन येतो त्यावेळी दोन मिनिटं थांबून आपल्या सर्वांची पारपत्रे आणि आपण घेतलेले परकीय चलन हे नक्की कोणत्या बॅग्समध्ये आहे याची खातरजमा करून घ्यावी. संपूर्ण प्रवासामध्ये या दोन गोष्टी शक्यतोवर एकाच ठिकाणी ठेवाव्यात आणि ह्या बॅग / पाकिटाकडं दुर्लक्ष करण्याचा वेंधळेपणा करू नये. प्रत्येक ठिकाणी बसमधून उतरताना पारपत्र आपल्यासोबत घेऊन जाण्याची दक्षता घ्यायला हवी. आता चलनाच्या बाबतीत! हल्ली चलन तुम्ही रोख रकमेच्या स्वरूपात घेऊ शकता किंवा तुमचे क्रेडिट, डेबिट कार्ड आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी सक्षम करू शकता किंवा फॉरेक्स कार्ड घेऊ शकता. तुम्ही जरी कार्डद्वारे परदेशात खरेदी करणे हा योग्य पर्याय समजत असाल तरी काही दुकानांमध्ये ही स्वीकारली न जाण्याची शक्यता असल्यानं तुमच्यासोबत किमान रोख रक्कम असणे आवश्यक आहे. इंग्लंडमध्ये केवळ पौंड स्वीकारले जातात. बाकी सर्व युरोपियन देशांमध्ये युरो स्वीकारले जातात. आम्ही भेट दिलेल्या देशांमध्ये याला अपवाद स्वित्झर्लंडचा होता. तिथलं स्थानिक चलन स्विस फ्रॅंक आहे. त्यामुळे ते तुम्हाला शिलकीची रक्कम फ्रॅंक नाण्यांमध्ये देतात. आता फ्रॅंकमधील नोटा व नाणी हे दोन वेगळे प्रकार आहेत. तुम्ही जर भारतात परकीय चलन परत आणून ते स्वीकारणाऱ्या आस्थापनांमध्ये गेलात तर तिथे नोटा स्वीकारल्या जातील परंतु नाणी नाहीत. त्यामुळे स्वित्झर्लंडमधून बाहेर पडताना सर्व फ्रॅंकची नाणी खरेदीसाठी वापरून टाकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर युरोप प्रवास समाप्तीआधी युरोपमधील सर्व नाणी खरेदीसाठी वापरावीत. मी या गोष्टींकडे पैसे वेगळ्या प्रकारे बघतो. माझ्याकडे अशी सुट्टी नाणी बरीच आहेत. अशीच ही नाणी पुढील पिढ्यांकडे हस्तांतरित करून दीडशे दोनशे वर्षानंतर त्यांना दुर्मिळ वस्तूंचा खजिना उपलब्ध असेल अशी माझी विचारसरणी आहे.
आमचं लंडनला जाणार विमान खरं तर दुपारी पावणेदोन वाजता मुंबई विमानतळावरून निघणार होते. परंतु एक दिवस आधी या विमानाची वेळ पुढे आणण्यात आली असून आता हे विमान एक वाजून दहा मिनिटांनी विमानतळावरून निघेल असा संदेश आम्हांला एअर इंडिया आणि वीणा वर्ल्ड या दोघांकडून आला. आतापर्यंतच्या इतिहासात विमान आधी सुटण्याचा ( ते ही केवळ पत्तीस मिनिटं) संदेश येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे मी स्वतःला चिमटा काढून हे खरोखरच होत आहे ना याची खात्री करून घेतली. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी चार तास आधी विमानतळावर हजर व्हायला हवं असा नियम मी स्वतःसाठी घालून घेतला आहे. बरेचजण यावर माझी फिरकी घेतात. परंतु मी याबाबतीत ठाम आहे. मर्फी नामक सद्गृहस्थाचा नियम आहे - एखादी गोष्ट चुकीची घडण्याची जर शक्यता असेल तर ती केव्हातरी नक्कीच चुकीची घडणार. विमानतळावर प्रवेश करण्याआधी सुरक्षाकर्मचाऱ्याने केलेली तपासणी, चेकइन बॅग्स एअरलाईनला हस्तांतरित करून बोर्डिंग पास घेणं, सुरक्षातपासणी, इमिग्रेशन आणि इच्छित गेटसमोर उड्डाणाआधी एक तास पोहोचणं ह्या सर्व सोपस्कारांचा विचार करता हे चार तास आवश्यक आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे.
कंपनीद्वारे होणारा विमानप्रवास बिझनेस क्लासने होत असल्यामुळे तिथं ही सर्व प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पडते. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी इकॉनॉमी क्लासने करत असलेल्या या प्रवासाविषयी माझ्या मनात काहीशी साशंकता निर्माण झाली होती. त्यामुळे घरच्या सर्वांना लवकरात लवकर निघण्याची मी विनंतीवजा धमकी देत होतो. एक वाजून दहा मिनिटाचे विमान लक्षात घेता त्यातून चार तास वजा केले तर नऊ वाजून दहा मिनिटांनी विमानतळावर पोहोचायला हवे. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्ग हा आठ वाजल्यानंतर कांदिवलीच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपासून अत्यंत गजबजलेला असतो. आठ वाजल्यानंतर त्या बिंदूपासून विमानतळावर पोहोचण्यासाठी नक्की किती वेळ लागू शकतो याविषयी छातीठोकपणे कोणताही तज्ञ सांगू शकत नाही. त्यामुळे असे सर्व अशाश्वततेला आमंत्रण देणारे घटक लक्षात घेता घरातून साडेसात वाजता सर्वांनी निघावे असे फर्मान मी काढले. सर्व आटपून आम्ही पावणेआठ वाजता विमानतळाकडं प्रस्थान केलं. सुदैवाने पश्चिम द्रुतगती मार्ग हा बऱ्यापैकी मोकळा होता. आम्ही त्यामुळे साडेआठ वाजता विमानतळावर पोहोचलो. आमच्या सोबत माझी मोठी बहीण सुस्मितताई आणि तिचे यजमान संदीपभाई सुद्धा होते. ते अंधेरीहुन निघाले होते. आमची लगबग ध्यानात घेता ते सुद्धा लवकरच निघाले होते. योगायोगाने ते आणि आम्ही एकाच वेळी विमानतळावर पोहोचलो. तेथील सुरक्षा रक्षकाने आमच्या तिकिटांकडे पाहत तुम्ही इतक्या लवकर का आलात अशी प्रश्नार्थक मुद्रा केली. ती मुद्रा प्राजक्ताने माझ्याकडे हस्तांतरित केली. कोणत्या क्षणी आकाशाकडे पाहावे हे इतक्या वर्षानंतर मला नक्की ठाऊक असल्यामुळे मी आकाशातील ढगांकडे पाहत असल्याचे ढोंग केले. थोड्याच वेळात आम्ही एअर इंडियाच्या चेक इन रांगेत होतो. माझ्या दुर्दैवाने म्हणा पण इथं सुद्धा कोणीच नव्हते. त्यामुळे लगेचच आम्ही तेथील स्त्री कर्मचाऱ्याच्या समोर आमच्या पाच चेक इन बॅग्स घेऊन हजर होतो. तिथेच आमची वीणा वर्ल्डचे टूर मॅनेजर अतुल भोबे यांच्यासोबत भेट झाली. त्यांनी माणशी एक अशी ठेपल्याची पाच पाकिटे आमच्या स्वाधीन केली. थोड्याच वेळात आमच्या पाचही बॅगा एअर इंडियाच्या पट्ट्यांवर होत्या. त्यांनी योग्य पट्ट्यांवर योग्य दिशेने प्रवास करून आमच्याच विमानाच्या पोटात जावे अशी ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना केली.
इतक्यात आम्हांला एक अत्यंत धक्कादायक बातमी कळाली. अर्धा तास लवकर उड्डाण करणे अपेक्षित असलेलं आमचे विमान बऱ्याच उशिराने प्रस्थान करणार होते. आमची बोर्डिंग वेळ ही आता सव्वा दोन वाजताची करण्यात आली होती. या क्षणी नऊसुद्धा वाजले नव्हते. आम्हांला आता जवळपास पाच तास वेळ घालवायचा होता. सुरक्षातपासणी सुद्धा अत्यंत वेगाने झाली. तेथील अधिकाऱ्यांनी युरोपातील हवामान कसे असेल याविषयी प्राजक्ताशी बातचीत केली. सुरक्षातपासणी झाल्यानंतर आम्ही फूडकोर्ट मधील एक मोक्याची जागा पकडली. आमच्या विमानाचा गेट क्रमांक ७६ होता. ते गेट आम्हांला आम्ही बसलेल्या जागेवरून दिसत होते. एव्हांना आम्हांला बऱ्यापैकी भूक लागली होती. मसाला डोसा फक्त ३८० रुपये, चहा १८० ते २१० रुपये असे माफक दर पाहून आमच्या डोळ्यांत आलेल्या आनंदाश्रूंना न जुमानत आम्ही हे पदार्थ ग्रहण केले. वीणा वर्ल्डने दिलेले ठेपलेच्या पाकीट उघडले, ते जास्तच तेलकट आहेत असा निष्कर्ष काढण्यात आणला.
बराच वेळ काहीच घडत नव्हते. मग थोड्या वेळाने त्या गेटवर एअर इंडियाचे एक विमान आले. त्या विमानाभोवती कर्मचारी येऊन थोडावेळ काही घडामोडी झाल्या. त्या बघण्यात आमचा वेळ गेला. त्यानंतर जवळच्या गेटवर दुसरे एक एअर इंडियाचे विमान आले. तिथे सुद्धा कर्मचारी येऊन बऱ्याच काही घडामोडी होऊ लागल्या. तेव्हा बारा वाजत आले होते. वैतागून मी सोहमला एअर इंडियाला ट्विटरवर मेसेज कर असा सल्ला दिला. कधी नव्हे त्यांनं तो मानला. अहो आश्चर्यम! पुढील पाच मिनिटांत एअर इंडियाचा प्रतिसाद आला. या उशिराबद्दल त्यांनी खेद व्यक्त करून आम्ही त्याची नोंद घेतली आहे; यावर आम्ही नक्कीच कृती करू असा संदेश पाठवला. योगायोगाची गोष्ट म्हणजे थोड्याच वेळात आम्हांला वीणा वर्ल्डच्या अतुल यांनी पाठवलेला एअर इंडियातर्फे त्या विमानातील सर्वांच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे असा संदेश मिळाला. त्यात वरण-भात आणि भाजी असा मेनू होता. जेवण जरी अत्यंत साधे असले तरी अगदी योग्य वेळ मिळाल्याने ते अमूल्य वाटले.
अशा प्रकारात सर्व वेळ गेल्यामुळे आता दोन वाजू लागले होते. जवळच्या गेटमधील विमानामध्ये वेगाने घडामोडी होत असल्याचे दिसू लागले होते. थोड्याच वेळात विमानाचे गेट बदलून या नवीन विमानाच्या गेटची घोषणा करण्यात आली. आम्ही तीन वाजताच्या सुमारास तिथे गेलो. विमानाचे बोर्डिंग काही वेळात सुरू झाले. अचानक मला तिथं चेतेश्वर पुजारा दिसला. तो बिझनेस क्लासने जरी प्रवास करत असला तरी एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्यांने त्याला काहीतरी सांगितले. तो बिचारा शांतपणे बाजूला कोपऱ्यात जाऊन वाट बघत राहिला. थोड्याच वेळात त्याला बोलावण्यात आले. इकॉनॉमी क्लासच्या प्रवाशांसोबतच त्याने प्रवेश केला. ही संधी साधून मी सोहमला त्याच्यासोबत सेल्फी घ्यायला सांगितले. सोहमची विनंती त्याने तात्काळ मान्य केली.
विमान अत्यंत टुकार होते. बहुदा खूप जुने होते. आतल्या स्वच्छतेच्या नावाने अत्यंत बोंब होती. स्वच्छतागृहे सुद्धा नीट स्वच्छ केली गेली नव्हती. शेवटी एकदाचे पावणेचार ते चार मध्ये कधीतरी विमानाने लंडनच्या दिशेने उड्डाण केले. वादळी हवामानामुळे विमान हेलकावे खात होते. विमान ज्या ज्या वेळी हेलकावे खात होते त्या त्या वेळी जलपान खानपान सेवा स्थगित केली जाण्याची उद्घोषणा अत्यंत तत्परतेने विमानात केली जात होती. बऱ्याच रांगांतील प्रवाशांना केवळ एकच हवाई सुंदरी सर्व काही आणून देत होती. त्या बिचारीची दया यावी अशी परिस्थिती होती. ती आपल्या परीने खूप प्रयत्न करत असली तरी इतक्या सर्व प्रवाशांना वेळेवर जलपान खानपान सेवा देणे तिच्या दृष्टीने शक्य नव्हते. त्यातच भरीला वादळी हवामानामुळे तिला सतत आपल्या जागी जाऊन बसावे लागत होते. विमानात थंड हवा झाली तर आवश्यक असणारी ब्लॅंकेट सुद्धा प्रत्येक सीट्सवर उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्राजक्ताने विनंती केलेले ब्लॅंकेट येण्यासाठी अर्धा पाऊण तास लागला. प्रवासी अचानक उठून डोक्यावरील केबिनमधील बॅग्समधील जिन्नस काढून घेत होते. ती हवाईसुंदरी ही सर्व केबिन्स पुन्हा बंद करत होती. सीटसमोरील स्क्रीन कशीबशी चालू होती. परंतु त्यातही सर्व काही पर्याय उपलब्ध नव्हते. टॉयलेटच्या स्वच्छतेविषयी न बोललेलेच बरे! जेवण ठीकठाक होते. त्यात नाव ठेवण्यासारखं काही नसलं तरी आठवणीत राहील असंही काही नव्हतं. अशा प्रकारे एका अत्यंत निरस आणि वैतागवाणा साडेनऊ तासाचा प्रवास करून आम्ही एकदाचे हीथ्रो विमानतळावर स्थानिक वेळेनुसार साडेनऊच्या आसपास उतरलो.
शनिवार, २९ जून, २०२४
२०२४ - युरोप सहल - प्रस्तावना
नुकत्याच आटोपलेल्या बारा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर मनात अनेक सकारात्मक भावना दाटल्या आहेत. भव्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गाची डोळ्यात साठवून ठेवण्यासारखी क्षणाक्षणाला समोर येणारी रूपं आपल्याला थक्क करत राहतात. देशानुसार बदलणारं भोवतालच्या निसर्गाचं सौंदर्य, रूप नुसतं अनुभवायचं नसतं तर निवांत क्षणी त्याचा सखोल अभ्यास करायचा असतो. खूप थोड्या कालावधीत इतकं काही अनुभवायला मिळतं की हे थोड्या सावकाशपणं अनुभवायला मिळायला हवं होतं असं वाटत राहतं.
वीणा वर्ल्डतर्फे आयोजिलेल्या ह्या सहलीत आम्ही इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँड्स (हॉलंड), बेल्जियम, लक्सेनबर्ग, जर्मनी, स्वित्झर्लंड, लिचेनस्टिन, ऑस्ट्रिया, इटली, सॅन मरिनो, व्हॅटिकन सिटी (जगातील सर्वात छोटा देश) अशा बारा देशांना धावती भेट दिली. युरोप अनुभवायच्या अनेक पद्धती आहेत. ही सहल बहुदा तोंडओळख ह्या प्रकारात मोडणारी. पुढं वेळ, पैसा, तब्येत ह्या सर्वांचे समीकरण जुळून आलं तर ह्या देशांतील आवडलेल्या ठिकाणांना निवांत भेट देण्याची इच्छा सदैव मनात राहील.
केवळ एकच ठिकाण निवडायचं झालं तर स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया मधील एखाद्या अनामिक डोंगरातील एका छोट्या घरात होम स्टे च्या माध्यमातून आठवडाभर रहायला आवडेल. यजमानांकडे एका सायकलची विनंती करायची आणि सकाळी नाश्ता आटपून त्या हिरव्यागार डोंगरांच्या दिशेनं कूच करायचं. वाटेत येणाऱ्या झऱ्यांतील निर्मळ जलाने तहान भागवावी, अधूनमधून झाडांखाली हिरव्यागार गवतावर लोळत पडावं. चरणाऱ्या गायींना हळुवार स्पर्श करावा, रात्री नऊ - दहापर्यंत आकाशात रेंगाळणाऱ्या दिनकरावर विसंबून न राहता सायंकाळी परत यजमानाच्या घरी परतावं, त्यांनी बनविलेल्या रुचकर पास्ता, पिझ्झाचा आस्वाद घेऊन झोपी जावं.
पुढील भागांत मुंबईपासून सुरु झालेल्या आमच्या प्रवासाचा, प्रत्येक देशात काय अनुभवलं ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. जे काही अनुभवता आलं नाही त्याविषयी अर्थात अधिकारवाणीने बोलता येणार नाही. तरीही त्याविषयी टिपणी करण्याचा प्रयत्न राहील. एअर इंडियाविषयी काही नकारात्मक, काही सकारात्मक अभिप्राय, वीणा वर्ल्डसोबत प्रवास करत असल्यानं इमिग्रेशन, दूरदूरची ठिकाणं एका दिवसांत कूच करण्यात आलेली सहजता, राहण्याची नाश्ता-जेवणाची उत्तम सोय, सहल व्यवस्थापक अतुल भोबे ह्यांनी अत्यंत व्यावसायिकपणे तरीही माणुसकीची शिंपड करत पार पाडलेली सहल, भारताच्या क्रयशक्तीने जगभर निर्माण केलेला दबदबा, त्यामुळं भारतीय संस्कृती, भोजनपद्धतीला स्वीकारण्यासाठी चाललेली पाश्चात्य देशांची धडपड, त्यामुळं कुठंतरी सुखावणारं आपलं मन पण त्याचबरोबर सुधारलेल्या आर्थिक स्थितीमुळं आपल्या देशवासीयांच्या वागण्यात जाणवणारा आणि काहीसा उद्धटपणाकडं झुकणारा आत्मविश्वास पाहून दुखावणारं आपलं मन हे सारं काही जमेल तसं पुढील दहा - बारा भागांत सादर करण्याचा प्रयत्न राहील. खरंतर घाईघाईनं ब्लॉगपोस्ट प्रसिद्ध करण्याची माझी खासियत. पण ह्यावेळी मात्र शांतपणे हे प्रवासवर्णन प्रसिद्ध करण्याचा माझा प्रयत्न राहील. दीर्घकाळ थांबलो तर दैनंदिन आयुष्यातील संघर्ष ह्या निसर्गरम्य आठवणींना पुसून टाकण्याचा किंवा त्यांना विरळ बनविण्याचा धोका राहीलच. So All the Best - Aditya !!
रविवार, २६ मे, २०२४
अनियोजित महानगर वाढ आणि संभाव्य धोके !
आपल्याभोवताली सर्वत्र महानगरांचा कायापालट सुरू आहे. जर मुंबई शहरात आपण राहत असाल तर सभोवताली मोठ्या वेगानं पसरणारे गगनचुंबी इमारतींचे जाळं, विविध ठिकाणी उभारले जाणारे उड्डाणपूल आणि सर्वत्र खणलेले रस्ते हे चित्र आपल्याला सतत दिसत राहतं. आजच्या लेखाचा विषय मुंबई शहरात उभारल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि ह्या इमारतींना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयींचं प्रशासनानं कसं सखोल, विचारपूर्वक नियोजन केलं पाहिजे याविषयी आहे.
पाणीपुरवठा
सर्वात प्रथम मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ह्या इमारतींमध्ये वास्तव्य करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक पाणीपुरवठ्याची तरतूद कशा प्रकारे करण्यात आली आहे? जर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रामध्ये व्यवस्थित पाऊस पडला आणि ही वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन आखल्या गेलेल्या सर्व अतिरिक्त पाणीपुरवठाच्या योजना वेळीच पूर्ण झाल्या तर कदाचित सर्वकाही आलबेल असू शकेल. परंतु एखाद्या वर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी केली नाही तर इतक्या प्रचंड लोकसंख्येला कसा पाणीपुरवठा करणार हा एक मोठा यक्ष प्रश्न होऊ शकतो. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य देऊन बाकीच्या शहर, गावांचे पाणी मुंबईकडं खेचलं जाऊ शकतं, पण नैतिकदृष्ट्या ही चुकीची उपाययोजना आहे.
पावसाच्या पाणीसाठवणाविषयी (Rainwater Harvesting) काही बांधकाम व्यावसायिक जागरूकता दाखवितात. परंतु ह्याची अधिक व्यापकतेने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ही बाब जर ऐच्छिक असेल तर ती बंधनकारक करायला हवी.
प्लॅस्टिक वापर आणि कचरा व्यवस्थापन
प्लॅस्टिकबंदी ही हल्ली तात्कालिक घटना बनली आहे. काही काळ अचानक प्रशासन जागं होतं आणि प्लॅस्टिकबंदी घोषित केली जाते. काही काळाने पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार दिसून येतो. उंच इमारतीमधील रहिवाशी सुजाण असल्याची आशा आपण करू शकतो. त्यामुळं त्यांनी ह्याबाबतीत जागरूकता दाखवावी ह्यासाठी खास प्रयत्न केले जावेत.
सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून मगच तो कचरापेटीपर्यंत पोहोचावा ह्याबाबत सुद्धा हीच गोष्ट दिसून येते. ह्या बाबतीत अत्यंत कडक नियम लागू का केले जात नाहीत ही माझ्या समजुतीपलीकडली गोष्ट आहे. दैनंदिन दिवसात जर प्रत्येक नागरिकाने ह्यासाठी काही मिनिटं राखून ठेवली तर पर्यावरण हानी वाचविण्यासाठी आपण मोठा हातभार लावू शकतो.
विद्युतपुरवठा
मुंबई शहरातील उन्हाळा हा अत्यंत दाहक होऊ लागला आहे. पूर्वी केवळ मे महिन्यात AC सुरु व्हायचे, पण हल्ली वर्षातील अनेक महिन्यात वातानुकूलित यंत्रणेशिवाय घरात बसणे जवळपास अशक्य होऊ लागले आहे. नवीन पिढीनं शाळेपासूनच वातानुकूलित यंत्रणेनं थंड केलेल्या वर्गात दिवस काढल्याने त्यांना AC शिवाय घरात बसणं म्हणजे मानवाधिकार हक्कांची पायमल्ली वगैरे प्रकार वाटू शकतो. या इमारतींमध्ये प्रचंड संख्येने निर्माण झालेल्या सदनिकांची वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अधिक विद्युतनिर्मिती करणे आवश्यक आहे. ह्या अत्याधुनिक घरांना प्रत्येक गोष्टीसाठी विद्युत पुरवठ्याची गरज लागते. त्याच बरोबर या बऱ्याच इमारतींमध्ये पार्किंगसाठी पहिले सात-आठ मजले राखून ठेवण्यात येतात. बऱ्याच इमारतीमध्ये त्यातील रहिवाशांच्या कार या उद्वाहकाच्या साहाय्यानं वर खाली केल्या जातात.
इमारतींमध्ये रहिवाशांना, इस्त्रीवाले, झोमॅटो, ऍमेझॉन डिलिव्हरी मुले ह्या सर्वांना वर खाली आणण्यासाठी उद्वाहकांना सतत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करावा लागतो. मुंबई शहराला हा इतका अतिरिक्त विद्युतपुरवठा सातत्यानं २४ तास करणे शक्य होणार आहे का याचा विचार करणे खूप गरजेचे झाले आहे.
आपत्कालीन नियोजन (डिझास्टर मॅनेजमेंट) हे एक सद्यकाळातील अत्यावश्यक तंत्र आहे. ज्या काळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळी विविध मूलभूत सुविधा कशा सुरळीतपणे चालू ठेवल्या जाऊ शकतील, अशा वेळी निर्णय घेण्याचे अधिकार नक्की कोणाकडे असतील याविषयी अत्यंत बारकाव्यांनिशी नियोजन करणे आवश्यक असते. हे नियोजन लिखित स्वरूपात असणं आणि आपत्कालीन परिस्थिती घोषित करणाऱ्या अधिकारी व्यक्तीची निवड करणे ह्या सर्व गोष्टी सुस्पष्ट असाव्यात, वेळोवेळी त्यांची तपासणी करून त्यांना अचूक स्वरूपात ठेवायला हवं.
मुंबईला विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा जर काही मिनिटं किंवा तासांकरता खंडित झाली तर या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होईल याचा सखोल अभ्यास कशा पद्धतीने केले करण्यात आला आहे हे सर्व नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. साधा मुद्दा म्हणजे जर विद्युत पुरवठा खंडित झाला आणि बॅकअप प्लॅन म्हणून असलेली जनित्र यंत्रणा सुद्धा जर बंद पडली तर उंचावरील मजल्यावर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आणीबाणीची परिस्थितीत सुरक्षितरित्या कसं खाली आणता येईल ह्याचं नियोजन झालेलं असणं आवश्यक आहे.
वाहतुकीवर पडणारा अतिरिक्त ताण
या इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेत सरासरी दीड ते दोन कार असणार. ही सर्व वाहने सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी एकत्र रस्त्यावर आली तर त्या रस्त्यांची क्षमता हा अतिरिक्त ताण सहन करण्यासाठी सक्षम आहे का याचा विचार कितपत करण्यात आला आहे? प्रशासनाला सतत रस्ते खोदून ठेवण्याची सवय आहे. रस्त्याच्या एका भागात थोडं जरी खणकाम केलं तरी बराच लांबवर त्याचे परिणाम जाणवतात. या उंच मजल्यांच्या इमारतींच्या आसपास ही वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण आता अत्यंत वारंवारतेने दिसून येणार आहे. अशावेळी रुग्णवाहिका, अग्निशमनदलाची वाहने ह्यांना आपल्या लक्ष्य असलेल्या ठिकाणी पोहचण्यास विलंब होऊ शकतो जो जीवघेणा ठरू शकतो.
अग्निशमन दलावर पडणारा ताण
सात ते आठ मजली उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा मुंबई अग्निशामक दलाकडे आहे. त्यांनी अशा इमारतींमध्ये अग्निशमन करण्याचे आपले कौशल्य वारंवार प्रदर्शित केले आहे. आपल्या सर्वांना त्याचा यथार्थ अभिमान आहे, परंतु आता मुंबई शहराच्या विविध भागांच्या उंच इमारती झाल्या आहेत की एकाच वेळी समजा तीन चार ठिकाणी दुर्दैवाने अशा उंच इमारतींमध्ये आग लागली तर मुंबई अग्निशमन दलाकडे या आगी विझवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारं मनुष्यबळ आणि यंत्रणा देखील उपलब्ध आहे का याचा कोणी विचार केला आहे का?
नागरिकांचे मनोस्वास्थ
अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या एकट्या राहणाऱ्या वयस्कर नागरिकांच्या मनोस्वास्थ्याचा सखोल विचार करायला हवा? पाचव्या सहाव्या मजल्यावर राहताना आपण जमिनीजवळ असल्याची भावना सुखदायक असते. काही अनिष्ट प्रकार घडला तर कसे का होईना आपण खालच्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतो असा आत्मविश्वास किमान सत्तरीपर्यंच्या नागरिकांमध्ये तरी असतो. परंतु समजा असे नागरिक पन्नासाव्या मजल्यावर राहत असतील तर मात्र त्यांच्या मनात हे भय सदैव राहणार की काही अनिष्ट प्रसंग उठवला तर आपण कसे खाली पोहोचू शकतो? त्याच बरोबर या मजल्यांवर जो सतत वेगानं वारा वाहत असतो त्याचे परिणाम कसे होतात हे येणारा काळच आपल्याला सांगेल.
गगनचुंबी इमारतींचा भविष्यातील पुनर्विकास
साधारणता १९८० - ९० साली बांधण्यात आलेल्या इमारती आता पुनर्विकासासाठी जात आहेत. त्या इमारतींना ज्यावेळी उद्ध्वस्त केले जाते त्यावेळी जे सिमेंट, स्टील आणि अतिरिक्त सामानाचे जे भंगार निर्माण होतं ते शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड वर टाकलं जातं. आज निर्माण होणाऱ्या या तीस - चाळीस मजल्याच्या इमारती पुढील ५० वर्षानंतर ज्यावेळी पुनर्विकासासाठी जातील त्यावेळी निर्माण होणारा बांधकाम साहित्याचा हा अतिरिक्त भार आपल्या जमिनीवर किती प्रदूषणाचे ओझे निर्माण करणार आहे केवळ याचा विचारच असह्य होतो.
मुलांसाठी मोकळी मैदानं
ह्या सर्व उंच इमारतीमुळं लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे. ह्या एकत्रित लोकसंख्येला आवश्यक मैदानं आपण पुरवत आहोत का? कमी मैदानांमुळं मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना चालण्यासाठी मोकळ्या जागांची कमतरता भासणार आहे. वातानुकूलित व्यायामशाळेतील व्यायाम सर्वांनाच परवडणारा नसतो आणि तसंही म्हटलं तर मोकळ्या जागेतील खेळण्याचालण्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही.
सारांश
आपल्याभोवताली शहरात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. त्या आपल्याला दिसतात, जाणवतात. परंतु आपल्याला त्याविषयी फारसं काही बोलता येत नाही. कारण हे असंच होणार हे सर्वांनी एकंदरीत गृहीत धरले आहे की काय अशी भोवतालची परिस्थिती आहे. परंतु ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते त्यावेळी मात्र मग या सर्वांना माहीत असलेल्या गोष्टीच या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्या आहेत हे जाणवतं. मुंबई शहर आणि त्यात या झपाट्याने वाढणाऱ्या गगनचुंबी इमारती या अशा अनेक समस्यांचे मूळ बनणार आहेत. या संभाव्य समस्यांची प्रशासनास जाण आहे का, प्रशासनानं आपत्कालीन नियोजन किती सखोलपणे केले आहे आणि त्या नियोजनाचे ऑडिट करण्यात आले आहे काय हेच मुद्दे आज मला या पोस्टद्वारे मांडायचे आहेत. नागरिकांच्या बाजूनं विचार करायचा झाला तर भविष्यात मुंबई शहरात राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक कणखरता आपण दाखवू शकतो ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करणं आवश्यक आहे.
मुंबई हे राहण्यासाठी गेली शंभर - दीडशे वर्षे एक उत्तम नगर, महानगर होतं. ह्या शहरात आपल्या पुढील पिढीसाठी एका किमान दर्जाच्या आयुष्याची तजवीज करून ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...













.jpg)
























