मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

एक संध्याकाळ



सायंकाळी घरातील खिडकीत बसून रस्त्यावरुन फिरायला जाणाऱ्या माणसांचं निरीक्षण करणं हा एक जीवनानुभव आहे. सायंकाळी माणसं काहीशी भावुक होत असावीत. आपल्या पूर्वजांच्या मनात सुर्यास्तानंतर येणाऱ्या अंधारामुळं एक भयाची भावना मनात निर्माण होत असावी. त्यानंतर हजारो वर्षे गेली असली तरी ती भावना रेंगाळलेल्या रुपात आपल्या मनात कुठंतरी असावी आणि त्यामुळं आपण भावुक होत असू असा माझा कयास. पण त्यासाठी टीव्ही, मोबाईलपासून आपण दूर असावं ही पूर्वअट ! बऱ्याच दिवसांनी अशी निरीक्षण संधी आज मला मिळाली. ह्यात जोडपी होती, मैदानावर खेळून हातात बॅट, बॉल घेऊन परतणारी मुलं होती, कष्टाचं काम आटपून घरी परतणारे मजूर होते.

एकत्र फिरायला जाणाऱ्या जोडप्याचं निरीक्षण करणं हा एक खास अनुभव असतो.  तिला खूप काही बोलायचं असतं. तो बऱ्याच वेळा मनाविरुद्ध तिच्या आवडीखातर घराबाहेर पडलेला असतो. त्यामुळं तिच्या बोलण्याकडं अगदी एकाग्रतेनं लक्ष देणं हे एकंदरीत अवघडच असतं. त्याच्या मनात कदाचित ऑफिसातील कामाचे, आर्थिक घडीचे किंवा IPL लिलावाचे विचार घोळत असतात. अधून मधून "असं होय?" "तिला काहीच काय कळत नाही का?" वगैरे प्रश्न विचारुन आपली तन्मयता सिद्ध करण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न सुरु असतो. त्यात काहीतरी चुकीचे प्रश्न विचारुन त्याचं तिच्या बोलण्याकडं लक्ष नाही हे तो सिद्ध करतो. पण केवळ त्याच्याकडं लटक्या रागानं पाहण्याव्यतिरिक्त किंवा त्याला चापटी मारण्याव्यतिरिक्त ती काहीच करत नाही. त्यानं आपल्या बोलण्याकडं लक्ष द्यावं अशी तिची अपेक्षाच नसते मुळी! तिला त्याचं आपल्यासोबत असणं महत्वाचं असतं. तिला बोलायचं असतं आणि ते ऐकून घेणारं कोणीतरी हक्काचं आपल्या सोबत आहे हेच तिच्यासाठी पुरेसं असतं. घर जसं जवळ येतं तेव्हा मात्र तिच्या बोलण्यात कदाचित सायंकाळच्या जेवणाचे विचार येऊ लागतात. मग तीही काहीशी गप्प होते. काळ जसा बदलेल तसं अर्थार्जन करणारी स्त्री आणि घर सांभाळणारा नवरा असंही चित्र दिसेल. अशी जोडपी फिरायला जातील तेव्हा कशी चर्चा होईल ह्याच्या विविध शक्यता मनात येतात. ही झाली तरुण जोडपी. वयस्क जोडप्यांची कथा काहीशी वेगळी असते. जे काही बोलण्यासारखं असतं ते आयुष्यभरात बोलून झालेलं असतं आणि त्यावर दिवसभर एकत्र असल्यानं सायंकाळी अजून काही खास बोलण्यासारखं नसावं. कदाचित आजोबा पुढं चालत असतील आणि आजी आपल्या बेतानं त्यांच्या मागे मागे चालत असतील. आयुष्यभर चालल्या तशा !

मैदानावर खेळून परतणारी मुलं म्हणजे मनुष्यजातीचा भविष्यकाळ! उत्साहाच्या चैतन्याचे झरे त्यांच्या चालण्याबोलण्यातून वातावरणात मिसळत असतात. मैदानावर आपण कसा पराक्रम गाजवला ह्याचा आढावा ते घेत असतात. कदाचित आपल्यातील एखाद्या मित्राची मजेत टर उडवत असतात आणि तो ही त्याचा आनंद घेत असतो. कष्टाचा दिवस आटोपून घरी जाणारे कष्टकरी पाहिले की आपसूक माझ्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण होते. प्रतिकूल परिस्थितीत जन्माला आलो म्हणून ना दुःखाची भावना किंवा सुरक्षित भविष्याची खात्री आज देता येणार नाही म्हणून ना चिंतेची भावना. आपल्या स्वतःच्या कष्ट करण्याच्या क्षमतेवर अफाट विश्वास आणि त्या विश्वासावर आयुष्याचा लढा लढण्याची जिद्द. 

पाहता पाहता सूर्य मावळतो. मनुष्यजातीच्या जीवनसंघर्षांचं एक पान उलटलेलं असतं. ह्या पानावर लिहिले गेलेले असतात अनेक बरे वाईट अनुभव प्रत्येकाच्या नजरेतून ! आकाशात एव्हाना चंद्राने आपल्या शीतल किरणांची जादू पसरवलेली असते. शहरातील माणसं बहुदा ह्या जादूपासून अनभिज्ञ राहून केव्हातरी मध्यरात्रीनंतर झोपी जातील, गावातील माणसांना हा चंद्र बहुदा दर्शन देतीलच. पण सर्वांमध्ये एक गोष्ट समान असते ती म्हणजे एक नवीन आशेनं दुसऱ्या दिवसाला सामोरे जाण्याची.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...