मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, १९ जून, २०२०

Clarity of Thought Process !


कल्लोळ हा माणसांच्या वाढत्या संख्येमुळे होत नाही, तर तो माणसांच्या वाढत्या महत्वाकांक्षा आणि सरलतेपासुन फारकत घेतलेल्या भावभावनांमुळे होतो. सद्यकाली ज्या माणसाला / स्त्रीला विचारप्रकियेतील सुस्पष्टता साध्य झाली तो माणुस / ती स्त्री सुखी झाली!  आयुष्यातील तुमच्या विचारप्रकियेतील सुस्पष्टता विविध टप्प्यात कोणत्या पातळीवर असावी ह्याची उकल करण्याचा हा प्रयत्न !

१. तुमची विविध कलागुणातील, क्षेत्रातील  क्षमता ! ह्यातील एक क्षेत्र कदाचित तुम्ही उपजिवीकेसाठी निवडलं असेल. आपण निवडलेल्या क्षेत्रात केवळ गुणवत्तेच्या जोरावर आपण कुठवर पोहचू शकतो आणि प्रचंड मेहनत घेऊन कुठवर पोहचु शकतो हे जाणुन घेण्याची सुस्पष्टता ज्यांना लाभली, ते भाग्यवान ! 

प्रचंड मेहनत घेऊन जर आपण वरिष्ठ स्थानी पोहचु शकत असलो तर त्या स्थानाचे महत्व आणि त्या मेहनतीमुळं आपल्याला करावे लागणारे त्याग ह्याचा हिशोब ज्यांना करता आला ते भाग्यवान !

आपण निवडलेलं उपजीविकेचं क्षेत्र जबरदस्त प्रमाणात चुकलं ह्याची जाणीव चाळिशीनंतर होऊनसुद्धा जी माणसं त्याच्याकडं अगदी तटस्थ भावनेनं पाहु शकतात ती माणसं भाग्यवान !

२. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर घेतलेल्या निर्णयांच्या अचुकतेविषयी प्रौढी मिरवणं अथवा चुकांबद्दल पश्चाताप करणे ज्यांना टाळता आलं ते भाग्यवान !

३. जगात अब्जावधी लोक आहेत. त्यातील काही टक्के लोक यशस्वी होणार, काही लोकांची निवड राष्ट्रीय संघात होणार पासुन काही लोक नगरसेवक होणार ! व्यक्तीच्या दृष्टीकोनातुन पाहिलं तर हा तुमच्या नशिबाचा वगैरे खेळ असु शकतो ! पण जगाच्या दृष्टीतुन हा केवळ शक्यतांचा खेळ असतो. तुमची गुणवत्ता, योग्य वेळी योग्य ठिकाणी तुम्ही हजर असणे, काही योग्य लोकांची तुमची विचारसरणी जुळणं वगैरे घटक तुम्ही कुठवर जाऊन पोहोचता हे ठरवतात. त्यामुळं माझं नशीबच खराब वगैरे नाट्यमय वाक्य स्वतःशीच बोलणं टाळावं ! Probability ची संकल्पना आपल्यालाही लागु पडते हे ज्यांना समजलं ते भाग्यवान !

४. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर यशांच्या व्याख्या वेगवेगळ्या असतात. काही  यशं / अपयशं लोकांना दृष्य स्वरुपात जाणवतात तर काही जाणवत नाहीत ! लोकांच्या नजरेस पडलेल्या तुमच्या यशस्विता / अयशस्वितेच्या पलीकडं जाऊन तुमच्या मनाला सुख देणारी काही यशं असतात. ती तुमच्या मनाच्या त्या हळव्या कोपऱ्यात तुम्ही कायम बाळगुन ठेवु शकता ! हे ज्यांना उमगलं आणि अशा यशांचा पाठलाग करता येणं ज्यांना जमलं ते भाग्यवान !

५. जगातील बहुतांश लोकांच्या  आयुष्यात तुमचं स्थान विशिष्ट काळापुरता असतं. त्यानंतर ही माणसं अचानक तुमच्या आयुष्यातुन गायब होतात. कदाचित तुम्हीही लोकांच्या बाबतीत असं वागला असाल! त्यामुळं आपण ज्यांच्यात भावनिकदृष्ट्या गुंतलो आहोत ते आपल्याशी अशा प्रकारे वागु शकतात ह्याची जाणीव ज्यांना आहे ते भाग्यवान !  जिथं दोन्ही बाजुंनी आयुष्यभराचं व्यक्त / अव्यक्त नातं ठेवण्याची आस आहे अशी नाती ओळखता येणं आणि निभावता येणं हे ज्यांना जमलं ते भाग्यवान !

६. आपण अधुनमधुन चुकीचं वागतो! आपल्या चुका ज्यांना  लगेच, काही कालावधीत जाणवतात आणि ज्यांची सद्सद्विवेकबुद्धी त्यांना ह्या चुकांबद्दल योग्य व्यक्तींची माफी मागु देते त्या व्यक्ती भाग्यवान ! 

७. आज जेवण काय करावं, कोणता शर्ट घालावा, ऑफिसात जाताना कोणता मार्ग घ्यावा, दीडशे रुपयाला ३ पापलेट्स घ्यावी की तीनशेला ८ असल्या प्रश्नांवर १० सेकंदात निर्णय घेऊ शकणाऱ्या व्यक्ती भाग्यवान !

७. शेवटी शुक्रवारी सकाळी ब्लॉगपोस्ट लिहिण्याची जिद्द करुन आपल्या ऑफिसच्या कामाचा पुरता गोंधळ उडू शकतो, आपले प्रियजन आपल्यावर वैतागु शकतात ह्याची जाणीव असुनही ही जिद्द जो जोपासु शकतो तो ..... !!!

1 टिप्पणी:

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...