मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

अमिश जीवनपद्धती

आमचं अमेरिकेतील कार्यालय विल्मिंग्टन डेलावेर इथं आहे. तिथल्या एका सहकाऱ्याशी गप्पा मारत असताना त्याच्या तोंडून अमिश लोकांच्या वसाहतीविषयी उल्लेख ऐकला. ह्या लोकांविषयी आधी काही माहितीपट पाहिले होते. ह्या चर्चेनंतर ह्या वसाहतीला प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. २०२३ साली जून महिन्यात ह्या वसाहतीला भेट देण्याची संधी मिळाली. त्या भेटीच्या वृतांताआधी थोडा अमिश जीवनपद्धतीचा आढावा घेणं इष्ट ठरेल. 

अमिश जीवनपद्धतीचा उगम कसा झाला ह्याचा इतिहास जाणून घेणं ही एक मनोरंजक बाब आहे.  सोळाव्या शतकात जन्मतःच  ख्रिस्त धर्माची दीक्षा देण्याच्या प्रथेच्या विरोधात सुरु झालेली चळवळ कालांतरानं चांगलीच फोफावली. ह्या पंथाची मुलभूत तत्त्वं नम्रता,  समुदायभावना,  उर्वरित (अमिश व्यतिरिक्त) जगापासून वेगळं जीवन जगणं, अहिंसा आणि साध्या जीवनसरणीला अंगीकारणे ह्यावर आधारित आहेत.  हे सर्व ऑर्डनुंग (Ordnung) नावाच्या अलिखित आचारसंहितेने मार्गदर्शित असते. थोडक्यात म्हणायला गेलं तर आधुनिकीकरणामुळं होणाऱ्या अनिष्ट परिणामांपासून आपल्या समुदायाचं संरक्षण करावं असा विचार ह्या मूलभूत तत्वांमागे / आचारसंहितेमागे  दिसतो. 

ह्या मुलभूत तत्वांकडे थोडं विस्तारानं पाहता व्यक्तीपेक्षा देव आणि समाजाला प्राधान्य देणे,  गैर- अमिश समाजापासून जाणीवपूर्वक वेगळं राहणं,  वादविवाद / संघर्षांचे निराकरण केवळ अहिंसेच्या मार्गाने करणे, साधे वस्त्र, ग्रामीण जीवन, आणि आधुनिक समाजातील गुंतागुंतीचे किंवा चैनीचे घटक टाळणे ह्या बाबी समोर येतात.

ऑर्डनुंग ही एक अलिखित आचारसंहिता दैनंदिन जीवनातील अनेक पैलूंना दिशा देत  समाजातील मूल्ये व परंपरांचे पालन सुनिश्चित करते. श्रद्धेची कबुली दिल्यानंतरच प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा दिला जातो, त्यानंतर त्यांचा चर्च समुदायात औपचारिक प्रवेश होतो. तंत्रज्ञानाचा स्वीकार हा केवळ समुदाय आणि परंपरेवर होणाऱ्या परिणामांच्या आधारे होतो. घरातील फोन, टीव्ही, इंटरनेट, आणि गाड्या नाकारल्या जातात. त्याऐवजी घोडागाडी (buggies) वापरणे पसंत केले जाते. सरकारी योजना किंवा सामाजिक सुरक्षा यावर अवलंबून राहण्याऐवजी अमिश समाज आपले संसाधन एकत्र करून गरजूंना मदत करतो. यात त्यांचा देवावरील विश्वास आणि सामुदायिक जबाबदारी स्पष्ट होते.  औपचारिक शिक्षण साधारणतः आठवीपर्यंतच दिले जाते. त्यानंतरचे शिक्षण प्रामुख्याने प्रौढ जीवनासाठी आवश्यक कौशल्ये, कुटुंबाचा व्यवसाय आणि समाजातील व्यवहारांवर केंद्रित असते.  

विल्मिंग्टनपासून कारने साधारणतः सव्वा तासाच्या अंतरावर पेनसिल्व्हेनिया राज्यात ही अमिश लोकांची वसाहत आहे.  प्रवासात दुतर्फा पसरलेल्या हिरव्यागार वृक्षांच्या नजाऱ्यानं मन अगदी प्रसन्न झालं.  

अमिश लोकांच्या वसाहतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे खूप दूरवरून दिसणारे कॉर्न silos. मक्याच्या पिकाचं भरघोस उत्पादन करून त्यांच्या साठवणीसाठी हे उभारण्यात येतात. स्थानिक शेतीत उत्पादित पिकांचा वापर करावा हे ह्यामागील तत्त्व !


अमिश गावात आपले स्वागत आहे हे सांगणारा हा बोर्ड ! 


इथं आम्ही अमिश गावात फेरफटका मारण्यासाठी प्रत्येकी सव्वीस डॉलर्सचे बसचे तिकीट घेतले. बस सुटायला काही वेळ असल्यानं आम्ही पार्कात फेरफटका मारण्याची संधी दवडली नाही. तिथं मेंढा, मोर, वळू, बदके असे विविध प्राणी गुण्यागोविंदाने नांदत होते. अर्थातच बदके सोडून बाकी सर्वांना बंदिस्त करून ठेवलं होतं. 



समाधिस्थ अवस्थेतील वळू ! 


अनेक शतके अमिश लोक दळणवळण माध्यम म्हणून जिचा वापर करतात ती ही बग्गी !


अमिश लोकांनी बनविलेली परंपरागत आयुधं इथं व्यवस्थित मांडून ठेवली होती. 




अमिश वसाहतीतील एकवर्गीय शाळेची प्रतिकृती इथं बनविण्यात आली होती. 



नियोजित वेळी आम्ही बसमध्ये प्रवेश केला.  बसचे चालक एक वयस्क अमेरिकन गृहस्थ होते. त्यांचा आवाज अगदी खणखणीत होता.  त्यांनी आम्हांला अमिश लोकांविषयी खूप छान माहिती दिली. ही माहिती मी आता इथं नमूद करतोय.  

पुढील दीड तासभर आपण अमिश लोकांच्या वसाहतीचा फेरफटका मारणार आहोत. अमिश लोक त्यांच्या चेहऱ्याचे फोटो घेऊ देणे पाप समजतात. त्यामुळं तुमच्यापैकी कोणी जर त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हांला तात्काळ बसमधून उतरविले जाईल.  इथं एक तर तुम्ही अमिश असता किंवा इंग्लिश ! अमिश घरात फोन नसतो. काही काळापूर्वी त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत फोन असावा अशी विनंती केली. त्यामुळं त्यांना काही घरांबाहेर फोन बसविण्यास परवानगी देण्यात आली. इंग्लिश माणसाचं घर अमिश माणसानं विकत घेतलं की त्याला घरातील विद्युतपुरवठा खंडित करावा लागतो. त्यासाठी त्याच्याकडं एक वर्षाची मुदत असते. 

अमिश लोक शेतीसाठी आधुनिक उपकरणांचा वापर करत नाहीत. तंबाखू हे मुख्य पिकांपैकी एक पीक आहे. ऍलोपॅथी उपचारप्रणाली वापरण्यावर त्यांचा भर नसतो. प्रामुख्यानं ते होमिओपॅथीचा वापर करतात. परंतु अगदीच आणीबाणी उद्भवली तर ते मोठ्या इस्पितळातसुद्धा जातात. बहुतांश वेळा ते बिलाचा भरणा रोकड पैशानं करतात. आणि ते थेट पैसे देत असल्यानं त्यांची घासाघीस करण्याची क्षमता अगदी चांगली असते. 

अमिश विवाहसंस्था ! 

अमिश मुलगा मुलीकडे  आपल्या प्रेमाची थेट वाच्यता करू शकत नाही. त्याआधी तिच्या आईवडिलांची परवानगी घेणं आवश्यक असते. मुलीला लग्नाच्या मागणीला नकार देण्याचा अधिकार असतो. अमिश ज्ञातीत घटस्फोटाला परवानगी नाही. लग्नाआधी पाच वर्षांपर्यंत मुलगा - मुलगी एकत्र राहू शकतात. ह्या काळात त्यांनी एकमेकाला चांगल्या प्रकारे समजून घेणं अपेक्षित असते. ह्या दोघांनी एकदा लग्नाला संमती दर्शविली की बिशपच्या परवानगीने लग्नाची घोषणा होते. नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या कालावधीत हिवाळ्यामुळं शेतीची कामे थंडावली असतात. त्यामुळं ह्याच काळात बहुतांश अमिश लग्ने होतात. लग्ने मंगळवार किंवा गुरुवारी होतात. अमिश स्त्रियाच लग्नातील जेवण बनवितात. लग्नाला साधारणतः ३०० ते ५०० लोक उपस्थित राहतात. दुपारचे भोजन अगदी साग्रसंगीत असते. त्यानंतर नवविवाहित दांपत्याला आलेल्या भेटी उघडण्याचा कार्यक्रम असतो. सायंकाळी मोजके लोक भोजनासाठी असतात. दुपारच्या मेजवानीतील उरलेले पदार्थ ह्या भोजनात समाविष्ट असतात. 

अमिश शाळेत स्त्रिया शिक्षिकेची भुमिका बजावतात. शाळा फक्त आठवीपर्यंत असते. शाळेत फक्त गणित आणि इतिहास हे विषय शिकविले जातात. महिला शिक्षिकेचा विवाह झाल्यानंतर ती शाळेत शिकवू शकत नाही. 

हा माहितीजालावरून घेतलेला फोटो!  ह्या बग्गीची किंमत चौदा हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. बग्गीला टायर लावण्यास अजून बिशपमार्फत परवानगी देण्यात आली नाही.  अमिश लोकांच्या वसाहतीतून मार्गक्रमण करताना जर तुमच्या पुढं बग्गी असेल तर तिला मागं टाकून पुढं जाणं उचित नाही. 


अमिश शेती 


अमिश माणसाने केलेली शेती आणि इंग्लिश माणसानं केलेली शेती ह्यात मूलभूत फरक असतात. अमिश माणूस मक्याच्या दोन भागांमध्ये गवताची लागवड करतो. गवताने जमिनीची धूप थांबावी असा उद्देश ! अमिश माणूस जमिनीच्या उंचसखल भागानुसार पिकांची लागवड करतो. प्रत्येक अमिश कुटुंबाकडं सरासरी ३० ते ६० एकर जमीन असते. बस ड्रायव्हरने एक शेत दाखविले. त्या शेतकऱ्याचे शेत ह्या सरासरीला अपवाद होतं. त्याच्याकडं १०० एकर जमीन आहे. त्याची तीन मुले त्याला शेतीच्या कामात मदत करतात. 



अमिश लोक जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पीक फेरपालट, नैसर्गिक खतांचा वापर, पारंपरिक बियाणे इत्यादी पद्धतींचा वापर करतात. इंग्रजीमध्ये heirloom seeds ह्या नावानं ओळखली जाणारी ही बियाणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जातात, अनेक वर्षांपासून जतन करून ठेवलेली असतात. ती विशिष्ट भागात किंवा कुटुंबात वाढलेली असतात आणि त्यांच्या चव, रंग आणि त्या ठिकाणच्या हवामानाला जुळवून घेण्याची क्षमता ह्या खास गुणधर्मांसाठी ओळखली जातात.  ही बियाणे हायब्रीड नसल्यानं त्यांच्यापासून तयार होणाऱ्या वनस्पती पुन्हा त्याच प्रकारची फळे किंवा फुले देतात. ह्या बियाणांद्वारे निर्माण झालेल्या उत्पादनामध्ये औद्योगिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बियाणांद्वारे मिळणाऱ्या फळ, पीक ह्यापेक्षा जास्त चव असते. 

अमिश स्त्रिया रविवार व्यतिरिक्त बाकीचे सर्व दिवस कपडे धुतात. पुलीचा वापर करून कपडे उंचावर वाळविण्यासाठी दोरीवर टांगलेले असतात. प्राण्यांनी ते खराब करू नयेत हा त्यामागील हेतू ! एकंदरीत अमिश पुरुष घरकामात मदत करत असल्याचा उल्लेख आढळला नाही. 



आता आम्ही अमिश लोकांच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानाकडं आमचा मोर्चा वळविला. मोठ्या आकाराच्या टोमॅटो आणि टरबुजांनी आमचं लक्ष वेधून घेतलं. 



पुढील दालनात अनेक परंपरागत, नक्षीकाम केलेल्या आणि जीवनावश्यक वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या. 






परतीच्या मार्गावर असताना मनात विचारांचं वादळ निर्माण झालं होतं. ह्या भेटीनं मनात अनेक प्रश्न निर्माण केले होते. काळानुसार अनिवार्य मानला जाणारा मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा प्रवास सर्वांनीच स्वीकारला आहे ह्या समजुतीला मोठा धक्का देणारी ही भेट आणि अमिश समाजाची जीवनसरणी ! त्यांची तत्त्वं, आचारसंहिता आदर्शवादाकडं झुकणारी! अजुनही बऱ्यापैकी त्यांचं पालन करण्यात हा समाज यशस्वी ठरला आहे. पण उर्वरित जगात आलेली आधुनिकतेची त्सुनामी लाट अत्यल्प प्रमाणात जरी ह्या समाजातील पुढील पिढीपर्यंत पोहोचली तर हा समाज त्याला थोपवू शकेल का हा यक्षप्रश्न ! 

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

शॉर्ट्स गाथा

बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत.  त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती बदलत राहतात पण बदलत्या काळातील वस्त्र परिधान करण्याच्या आधुनिक चालीरिती मनात काही अगंभीर विचार निर्माण करतात. 

लहानपणी फक्त लहान मुलंच शॉर्ट्स (Shorts - आखूड विजार - हा मराठी ब्लॉग असल्यानं मराठी शब्द एकदा का होईना वापरतोय!) घालून घराबाहेर पडत, शाळेत जात वगैरे वगैरे! मोठी माणसं मात्र फुल पँट (लांबी विजार) परिधान करूनच बाहेर पडत. त्याकाळातील माझ्यासारख्या "जमेल तेव्हा कर्मठ" माणसानं हल्ली माणसं कशी धोतर, टोपी वगैरे परिधान न करता बाहेर पडतात असा लेख लिहिला असावा. असो, त्यावेळची लहान मुलं मोठी झाली पण त्यांची शॉर्ट्स प्रति निष्ठा मात्र कायम राहिली. हे समजण्यासारखं होतं पण ज्या व्यक्ती आमच्या लहानपणी तरुण होत्या आणि तात्कालीन चालीरितीप्रमाणे फुल पँट परिधान करत असत; त्यांतील बऱ्याच जणांनी आपली निष्ठा शॉर्ट्सला बहाल केल्याचं हल्ली वारंवार आढळून येत आहे. 

माझ्या एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. त्याचंही हेच निरीक्षण होतं. परंतु शॉर्ट्स परिधान करून सार्वजनिक जीवनात वावर करणाऱ्या आपल्या समवयस्क आणि  ज्येष्ठ नागरिकांसाठी 'शॉर्ट्स आचारसंहिता' लागू करावी असे त्याचं म्हणणं पडलं. 'शॉर्ट्स आचारसंहिता' हा शब्द ऐकताच माझ्या भुवया माझ्या नकळत उंचावल्या गेल्या. ते पाहून त्यानं आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी बाह्या सरसावल्या.  त्याच्या म्हणण्यातील काही ठळक मुद्दे !

१.  सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्याची पद्धती पाश्चिमात्य देशांतून आपल्याकडं आली. ह्या पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीनं शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठणं आवश्यक आहे. मी त्याच्या ह्या मुद्द्याचा तात्काळ विरोध केला.  शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठण्यासाठीच ह्यातील बरेच सज्जन बाहेर पडतात हा मुद्दा तुझ्या लक्षात कसा येत नाही ह्यावर मी आश्चर्य व्यक्त केलं. तरीही ही विशिष्ट पातळी म्हणजे तुला काय अभिप्रेत आहे असा रोखठोक प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर त्याच्याकडं उत्तर तयार होतं. तो म्हणाला, एक विजेचा दिवा उजव्या किंवा डाव्या बाजूला पेटवून आपण काटकोनातील समोरच्या दिशेकडं तोंड करून उभं राहिलं असता दिव्याच्या समोरील भिंतीवर पडलेल्या आपल्या छायेत वर्तुळाचा कंस, अर्धाकृती व्यास वगैरे दिसता कामा नये. आपलं पोट वगैरे सुटलेलं असता कामा नये हे त्याला म्हणायचं आहे हे कळायला मला थोडा वेळ लागला. 

२. घरी परिधान करायच्या शॉर्ट्स (ह्याला मराठी भाषेतील सर्वमान्य असणारा शब्द मी महत्प्रयासानं टाळत आहे) सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्याचा आत्मविश्वास जरी तुमच्याकडे असला तरी सार्वजनिक जीवनात तुम्हांला वावरताना पाहणाऱ्या लोकांच्या अनुभवाविषयी तुम्ही थोडीतरी अनुकंपा बाळगावी.  त्याचा हा मुद्दा ऐकून मला सकाळी बाजारात दृष्टीस पडणाऱ्या  अनेक व्यक्तींची आठवण झाली. त्याचा हा मुद्दा मी मनापासून मान्य केला.  शॉर्ट्सचा थ्री फोर्थ हा राजमान्य प्रकार परिधान करणे उचित राहील. ह्यात आपल्या जवळील असलेल्या तथाकथित शॉर्ट्स ला पाऊण मापावर आणण्याचा दीडशहाणपणा करू नये. 

३. शॉर्ट्स परिधान करायचंच  झाल्यास वर साजेसा असा टी शर्ट घालणे योग्य राहील. त्याला शॉर्ट्स मध्ये खोचणं उचित नाही. टी शर्ट आणि शॉर्ट्स ह्यांच्यात रंगसंगती असावी.  "हे जरा थोडं अति होतंय असं नाही का वाटत तुला ? " मी न राहवुन माझ्या मनातील बोललो. 

मित्रानं गंभीर चेहरा केला. तो बोलता झाला, "आदित्य, एक समाज आपला अतिआत्मविश्वास सध्या ओसंडून चालला आहे. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणं आवश्यक आहे. आपण आपल्या देशात आहोत ना, मग आम्हांला हवं तसं वागलं तर काय हरकत आहे असा विचार करणं चुकीचं आहे, कारण हल्ली आपल्यापैकी बरेच परदेशी जातात आणि तिथं आपण इथल्या काही सवयी घेऊन जातो. त्यामुळं एक समाज म्हणून आपल्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो"

विषयाला फारच गंभीर वळण लागलं होतं. मी वातावरण थोडं हलकं करण्यासाठी त्याला विचारलं, "मग काय सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्यासाठी परवाना वगैरे लागू करण्याचा विचार आहे का तुझा ?" तो ही लगेचच हसला. म्हणाला सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स घालून वावरताना फोटो असल्यास पाठवून दे, मग कळवतो. 

पोस्टच्या सुरुवातीला दिलेला फोटो त्याला पाठवला आहे. अजून काही त्याचं उत्तर आलं नाही ! बघुयात. बाकी सर्व पोस्टभर काही वाचकांना शॉर्ट्स ऐवजी शॉटस (मद्याचा इवलासा घोट) ची सतत आठवण येत राहिल्यास अपेक्षाभंगाबद्दल क्षमस्व ! 

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

भारताचे पितामह - दादाभाई नवरोजी


मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्याच वर्षांनी अचानक वर्तमानपत्रे, मासिके ह्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामोऱ्या येतात तेव्हा मन त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतं. भावनामय अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्या लेखातील सखोल माहिती वाचल्यानंतर अशा व्यक्तींच्या ज्ञानाविषयी प्रचंड आदराची भावना निर्माण होते. अशीच भावना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादाभाई नवरोजी ह्यांच्याविषयी आज त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त लोकसत्तेने प्रसिद्ध केलेल्या दोन लेखांमुळं निर्माण झाली. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी निरंजन राजाध्यक्ष आणि गोविंद तळवळकर ह्या अभ्यासू लेखकांनी लिहिलेल्या लेखांतील काही महत्वाचे मुद्दे माझ्या मतांसहित इथं उद्धृत करत आहे. गोविंद तळवळकर ह्यांच्या व्यासंगाविषयी बोलण्याचं धारिष्टय मी करू नये. 

आजच्या काळात अर्थशास्त्रज्ञांची एक मोठी फौज दिमतीला घेऊन एखादी वित्तीयसंस्था देशाचं आर्थिक उत्पादन मोजण्याचं काम करते. दादाभाईंनी केवळ कागदोपत्री असलेल्या माहितीच्या आधारे एकट्यानं हा भार उचलला. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या माहितीच्या आधारे भारताच्या कृषी उत्पादनाचा अंदाज बांधून त्यांनी त्याला खाणकाम, वन उत्पादन आणि इतर क्षेत्रातील उत्पन्नाची जोड दिली. त्यांच्या अंदाजानुसार त्याकाळी असलेलं भारताचं ३४० कोटी वार्षिक उत्पन्न (दरडोई केवळ २० रुपये) आपल्याला तत्कालीन भीषण दारिद्याची जाणीव करून देते. अत्यंत धक्कादायक मुद्दा म्हणजे त्याकाळी तुरुंगात असणाऱ्या कैद्यांचे पोषण हे बाहेर असलेल्या मुक्त नागरिकांपेक्षा चांगल्या प्रकारे होत असे. 

कालांतरानं दादाभाई नवरोजी ह्यांनी जी 'ड्रेन थिअरी' मांडली त्यात भारतातून निर्माण होणारी संपत्ती विविध मार्गानं कशी देशाबाहेर नेली जात आहे ह्याच्या विविध मार्गांचा उल्लेख करण्यात आला होता. ब्रिटिश प्रशासकांचं प्रचंड पगार, त्यांना मिळत असणारं सेवानिवृत्ती वेतन, भारतात मिळणाऱ्या फायद्याचं ब्रिटनमध्ये हस्तांतरण इत्यादी मुख्य मुद्यांचा समावेश होतो. अर्थात त्यांच्या ह्या ड्रेन थिअरी मधील अनेक गृहीतकांविषयी काही प्रश्न उपस्थित निर्माण करण्यात आले.  पण आपल्या लेखाच्या शेवटी राजाध्यक्ष ह्यांनी दोन अत्यंत महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. पहिला मुद्दा म्हणजे कोणत्याही देशात राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा ह्यांच्या जोडीला आर्थिक प्रगती महत्वाची आहे ह्याची जाणीव दादाभाई ह्यांनी त्याकाळी निर्माण केली. दुसरा मुद्दा म्हणजे देशप्रेम दाखविण्यासाठी फक्त आंदोलने करण्याऐवजी माहिती आणि आकडेवारी वापरून लोकांचे प्रबोधन करण्याचा मार्ग त्यांनी निवडला. हे दोन्ही धडे आजच्या भारतासाठी उपयुक्त आहेत असे सांगून राजाध्यक्ष ह्यांनी आपल्या लेखाची सांगता केली आहे. 

पहिल्या मुद्यात उल्लेखलेल्या राजकीय स्वातंत्र्य, समाजसुधारणा आणि आर्थिक प्रगती ह्या तीन घटकांचा आजच्या काळात विचार करता काही मुद्दे डोळ्यासमोर येतात. राजकीय स्वातंत्र्याचा आजच्या काळात अभिप्रेत असणारा सखोल अर्थ कोणता? शहरात समाजसुधारणेच्या इच्छित ध्येयांपेक्षा आपण नको तितके पुढे आलो आहोत पण खेड्यांमध्ये मात्र अजूनही बरंच काही गाठायचं आहे आणि आर्थिक प्रगतीची नक्की व्याख्या काय ? पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करू शकतो का? 

दादाभाई नवरोजी ह्यांना बहुदा आपण राजकारणी असे संबोधू शकणार नाही. तरीही एका राष्ट्रीय नेत्यानं कशी अभ्यासू वृत्ती दाखवायला हवी त्याचे ते एक उत्तम उदाहरण होते. सखोल अभ्यास करणाऱ्या नेत्यांचे प्रमाण आजच्या काळात नक्कीच वाढायला हवं असा विचार मनात आल्यावाचून राहत नाही. 

गोविंद तळवळकरांचा लेख हा त्यांच्या पुस्तकातील संपादित अंश आहे. त्यात काही समान मुद्दे आहेत. पण भारतातील गरिबीसाठी केवळ इंग्रजांना जबाबदार धरणं कितपत योग्य आहे ह्याचा योग्य ऊहापोह ह्या लेखात करण्यात आला आहे. इंग्रजांनी अधिक जकातीद्वारे भारतातील वस्त्रउद्योग, जहाजबांधणी उद्योग ह्यांना कसे पद्धतशीर मार्गानं अधोगतीस लावलं ह्याची सविस्तर माहिती इथं देण्यात आली आहे. दादाभाई नवरोजी ह्यांनी आपल्या पन्नास वर्षाच्या सार्वजनिक जीवनातील बराच काळ इंग्लंडमध्ये व्यतित केला. त्यामुळं व्यापार आणि उद्योग ह्यांचं महत्त्व त्यांना पटलं आणि इंग्लंडमधील आधुनिक विचारांची ओळख त्यांना मिळाली. त्याच्या प्रभावामुळं त्यांनी व्यापार आणि उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा दृष्टिकोन १८६० सालापासूनच अवलंबिला. 'द्रष्टा' नेता म्हणतात त्याचं हे उत्तम उदाहरण! 

लेखाच्या पुढील भागात दादाभाई, डिग्बी,  कर्झन, के. टी. शहा ह्या तज्ञांनी मांडलेल्या एकंदरीत राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या अनुषंगानं काढण्यात येणारं दरडोई उत्पन्न ह्या आकड्यात कसा फरक होता आणि त्यामागील कारणं ह्यांचा ऊहापोह करण्यात आला आहे. दीडशे वर्षापुर्वी सुद्धा प्रगत विचारसरणी  आणि सखोल अभ्यासू वृत्ती ह्यांची सांगड घालणारे नेते आपल्याला लाभले होते हे आपलं सुदैव ! 'भारतीय आर्थिक राष्ट्रवादाची गंगा ह्या उदात्त ध्येयानं प्रेरित झालेल्या महर्षीनं परिवर्तित केली'  विचाराला प्रवृत्त करणाऱ्या वाक्यानं ह्या लेखाचा शेवट होतो. 

ह्या दोन लेखांनी माझ्यावर आज बराच सकारात्मक प्रभाव पाडला आहे. प्रतिकुल  परिस्थितीत (आजच्या काळाच्या तुलनेत ज्ञानसंपादनास करावे लागणारे अथक परिश्रम) दादाभाई ह्यांनी सखोल अभ्यासाद्वारे ब्रिटिश साम्राज्यशाहीशी अधिकृत मार्गानं आर्थिक राष्ट्रवादासाठी कसा लढा दिला ह्याचं वर्णन मला उत्साहित करून गेलं.  मोठं ध्येय प्राप्त करायचं असेल तर कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे आपल्याला जरी माहीत असलं तरी दैनंदिन जीवनाच्या रगड्यात ही शिकवणूक कुठंतरी मनाच्या कोपऱ्यात ढकलली जाते. असे लेख ह्या शिकवणुकीला पुन्हा एकदा आपल्या मुख्य विचारांच्या प्रवाहात घेऊन येतात. सद्यपरिस्थितीत काहीसं निराश झालेलं मन पुन्हा एकदा अथक परिश्रमाची कास धरण्यास सज्ज होतं. धन्यवाद साप्ताहिक सुट्टीच्या दिवसातील पुरवण्या !  

रविवार, २४ ऑगस्ट, २०२५

साप्ताहिक सुट्टीचा संभ्रम !


शनिवार सकाळी माझ्या मनात आदर्शवाद ओसंडून वाहवत असतो. आपल्याकडं देवानं दिलेलं पुढील बारा तास आहेत, त्यांचं आपल्या आयुष्यातील विविध जबाबदाऱ्यांमध्ये संतुलित विभाजन करून आपल्या आयुष्यात एक समाधानी दिवसाची नोंद करता येईल असले विचार मनात घोळत असतात. आयुष्य असो वा दैनंदिन दिवस असो, गोष्टी वेळेवर झाल्या की त्यात समाधान असतं. कोणत्याही निर्णयात वेळेचं गणित आणि परिपुर्णता ह्या दोघांची सांगड घालता येणं ही तारेवरची कसरत असू शकते. 

साप्ताहिक सुट्टीत कार्यालयीन कामासंबंधी सखोल वाचन करण्याचा  छुपा विचार मी सदैव बाळगून असतो. पण ते प्रत्येक वेळी जमतंच असं नाही. घरकामात थोडीफार मदत, दोन्ही दिवस घरात येणाऱ्या जाडजूड पेपरांतील लेखांचं वाचन, त्यातून काही डोक्यात विचार आला तर एखादी पोस्ट आणि लोकांना कंटाळून सोडण्यासाठी गायन अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचा माझा मनसुबा असतो. त्याचबरोबर दुपारी मस्त ताणून देणं ही सुप्त इच्छा देखील मनात असते. 

दिवस जसजसा उलगडत जातो तसतसा आदर्शवाद माझा निरोप घेऊन गायब होतो. इच्छित ध्येयांपैकी केवळ मोजक्या ध्येयांचा आपण पाठपुरावा करू शकतो हे सत्य काही काळानं मी स्वीकारतो. बऱ्याच वेळा ह्याला शनिवार, रविवारी येणारी जाडजूड वर्तमानपत्रं कारणीभुत असतात. त्यातील लेख वाचून मी माझ्या बाकीच्या ध्येयांपासून भरकटला जातो. इथं महत्वाचा मुद्दा असा आहे की माझ्या बाबतीत सकाळी सखोल अभ्यास करण्याची शक्यता महत्तम असते. एकदा का ती वेळ गेली की बाकीच्या वेळात मी माझ्या सर्वोत्तम मनस्थितीत नसतो. म्हणायला गेलं तर नाटकं !  

हल्ली खरं तर  साप्ताहिक सुट्टीच्या वेळी वर्तमानपत्रात येणाऱ्या लेखांतील विषयात तोचतोचपणा आला आहे. विषयात नावीन्य नसलं तरी विषय कशा प्रकारे मांडला गेलाय ह्यावरून लेखाच्या वाचनीयतेमध्ये चढउतार होऊ शकतो.  आता वळूयात काल आणि आज आलेल्या पुरवण्यांतील आणि काही बाबतीत मुख्य वर्तमानपत्रातील माझं लक्ष वेधून घेतलेल्या काही लेखांचा आढावा !

कालच्या इंग्लिश पेपरात एका जोडप्याची गोष्ट होती. आपल्याभोवती जाणवणारी! नवरा कामानिमित्त विविध ठिकाणी फिरणारा, काहीसा आपल्या कोषात आनंद मानणारा. तर पत्नीला आपल्या नवऱ्याच्या व्यावसायिक जीवनाचा भाग होण्याची मनापासून इच्छा, त्याचप्रमाणं सामाजिक समारंभांत पतीनं आपल्यासोबत आपल्याइतक्याच उत्साहानं सहभागी व्हावं असंही तिला वाटतं. लेखकानं सांगितल्याप्रमाणं दोघंही आपापल्या भुमिकेत योग्य! त्या दोघांचे मूळ स्वभाव, कौटुंबिक जडणघडण आणि आयुष्यानं तुम्हांला कसे अनुभव दिले ह्या सर्व घटकांचा परिपाक किंवा परिणाम (ह्यातील योग्य शब्द कोणता ?) म्हणजे ह्या दोघांचं सध्याचं वागणं! दोघांचं एकमेकांविषयी असणारं प्रेम ह्या घटकाविषयी शंका नाही पण ते कशा प्रकारे, किती वारंवारतेने प्रदर्शित व्हायला हवं ह्याविषयी मतभेद असू शकतात. लेखाच्या शेवटी लेखकानं उल्लेखलेले दोन मुद्दे - संपूर्ण विश्वासासहित एकमेकांना समजून घेणं; अनुकंपा दाखविताना प्रत्येकाला अपेक्षित असणारं स्वातंत्र्य देणं ! 

ह्या लेखाच्या प्रभावाखाली असतानाच आज सकाळी लग्न करून आनंदी असणाऱ्या पण विविध कारणांस्तव एकमेकांपासून दूर राहणाऱ्या जोडप्यांविषयी लेख वाचनात आला. बऱ्याच वेळा दोघांची करिअर हा कळीचा मुद्दा ! पण काही वेळा बाकी मुद्दे सुद्धा ह्यास हातभार लावू शकतात.  हल्ली बऱ्याच वेळा संकुचित विचारसरणीचा ठप्पा आपल्यावर लागू नये म्हणून योग्य आणि अयोग्य काय ह्याविषयी आपली मतं बासनात गुंडाळून ठेवावी लागतात. हे देखील कदाचित त्यातील उदाहरण! कदाचित आता लग्नाच्या सुद्धा विस्तृत श्रेणी बनल्या असाव्यात. सदैव एकत्र राहणारी जोडपी, आठवड्यातून एकदा भेटणारी जोडपी, वर्षातून एकदा भेटणारी जोडपी वगैरे वगैरे ! ह्या सर्व जोडप्यांतील समान दुवा म्हणजे अधुनमधून होणारी भांडणं ! त्यामध्ये विस्तृत श्रेणी कोणांस माहिती असतील तर मला सांगाव्यात ! बाकी सदैव एकत्र राहणारी जोडपी मनानं एकत्र आहेत का असले गहन प्रश्न आपल्याजवळच ठेवावेत !

कालच्या लोकसत्तेत वीणा पाटील ह्यांचा 'कमी करूया' हा एक हलकाफुलका पण महत्त्वाचा संदेश देणारा लेख वाचला. आपण भारतीयांच्या सद्य मनोस्थितीशी निगडीत असा हा लेख! आवड म्हणून नव्हे तर केवळ आपल्या वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी आपण चंगळवाद स्वीकारला आहे की काय ही शंका यावी अशी आपली एक समाज म्हणून स्थिती आहे. ह्या लेखातील अनेक उदाहरणे आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. लेखाची सुरुवात वीणाताईंनी ज्या उदाहरणाद्वारे केली आहे ते अत्यंत योग्य असे उदाहरण ! पंधरा दिवसाच्या प्रवासासाठी किती वैविध्यपूर्ण सामान घेऊन जावं हा इथला मुख्य प्रश्न ! ह्या पंधरा दिवसात एक तासाच्या  भारतीय लोकांच्या  स्नेहसंमेलनाला हजेरी लावायची आहे म्हणून कुर्ता, कोल्हापुरी चपला वगैरे सामान घ्यावं की पंधरा दिवसात दोन किंवा तीन फॉर्मल पँट्स आणि एकमेव लेदर शूजवर सर्व ठिकाणी हजेरी लावणं  ह्या पर्यायाची निवड करावी इथून सुरुवात होते. विमानतळावर चेकइन काउंटरवर भल्यामोठ्या सामान ऊतू जाणाऱ्या बॅग्स घेऊन कसरत करणारे भारतीय बांधव पाहिले की ह्याची प्रकर्षानं जाणीव होते. 

त्याच पुरवणीत लग्नप्रसंगी, हॉटेलात अन्नाची नासाडी करणाऱ्या आपल्या काही समाजबांधवांचं उदाहरण देण्यात आलं आहे. काही मान्यवर व्यक्ती ह्या प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून आपल्या वर्तनातुन कसा आदर्श घालून देतात ह्याची चांगली उदाहरणं दिली आहेत. 'कमी करूया' आणि ह्या लेखातुन एक समान धागा जाणवतो तो म्हणजे तुमच्याकडे क्रयशक्ती असली तरी तिचा वापर करताना सामाजिक बांधिलकी दाखवा! तुमच्या क्रयशक्तीचा बेबंद वापर ह्या जगाच्या संतुलनाला बिघडवण्यात हातभार लावत आहे हे लक्षात असू द्यात. 

ह्या पोस्टमध्ये वापरलेलं चित्र हे आजच्या पेपरातील मुलं घर सोडून गेल्यानंतर स्त्रियांच्या जीवनात निर्माण होणाऱ्या पोकळीविषयी आहे. आपल्या मुलांभोवती आपलं विश्व उभारणाऱ्या स्त्रियांच्या जीवनात मुलं शिक्षणासाठी परदेशी निघून गेल्यानं कशी पोकळी निर्माण होते आणि ह्या परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी विविध छंदांचा उदाहरणार्थ चित्रकला शिकण्याचा कसा उपयोग होऊ शकतो ह्याविषयी हा लेख आहे. मी खास डोकावून पाहिलं तेव्हा ह्या लेखाच्या शेवटी पुरुषांची उदाहरणं सुद्धा दिली आहेत हे पाहून आनंद झाला.  माझ्या मनात थोडा वेगळा विचार आला. हल्ली दहावी बारावीनंतर मुलं खरंतर घरात असून देखील स्वतःच्याच विश्वात मग्न असतात. पालकांनी आयुष्यातील येऊ घातलेल्या नव्या टप्प्याची मानसिक तयारी तेव्हापासूनच करायला हवी. बहुतांश मुलांनी उच्चशिक्षणासाठी बाहेरगावी जायला हवं का हा एक वेगळ्या लेखाचा मुद्दा! इथं पन्नाशीनंतरची जोडपी घरात बसून कितपत सुसंवाद साधू शकतात हा कळीचा मुद्दा ! सद्यकाली भोवतालच्या माणसांविषयी, त्यांच्या मनःस्थितीविषयी अनुकंपा दाखवून निरपेक्ष भावनेनं आवश्यक प्रसंगी त्यांच्यासाठी उपलब्ध असण्याची कला आपण सर्वांनी अवगत करणं आपल्या, आपल्या आप्तजनांच्या आणि समाजाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे !

शनिवार - रविवारच्या पेपरमुळं कार्यालयीन कामाला पुरेसा वेळ देता न येणं ही झाली माझी आजची सबब! दुपार अजून बाकी असली तरी रविवारी वामकुक्षी ही हवीच! 

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

भावनांचं हरवलेलं खरंखुरेपण !


खरंतर ही पोस्ट मी लिहिण्यात अर्थ नाही, म्हणजे मला ही पोस्ट लिहिण्याचा नैतिक अधिकार असे माझ्या ब्लॉगवर मनापासून प्रतिक्रिया देणारे मोजके सुहृद उरले आहेत ते म्हणु शकतात. तरी ही सवयीचा गुलाम असल्यानं ही पोस्ट!  सुरुवातीला पोस्टची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी काही उदाहरणं 

१. हल्ली ज्याचा बोलबाला आहे असं बहुचर्चित तंत्रज्ञान वापरून तुम्ही ज्यावेळी तुमचं पहिलं प्रेसेंटेशन बनवता त्यावेळी ह्या तंत्रज्ञानानं निर्माण केलेली आकर्षक स्लाईड पाहून तुम्ही अगदी प्रभावित होता. त्यानं वापरलेल्या प्रभावी संज्ञा,  अगदी व्यावसायिक पद्धतीनं आलेखाद्वारे मांडलेली माहिती पाहून आपण ह्याआधी हे तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात का केली नाही हा विचार तुमच्या मनात नक्कीच येतो. 

काही दिवस जातात. तुम्ही अजून काही प्रेसेंटेशन्स बनवता, तुमच्या सहकाऱ्यांनी बनविलेली प्रेसेंटेशन्स पाहता. मग अचानक तुम्हांला जाणवतं की कुठंतरी ह्या साऱ्या प्रेसेंटेशन्स मध्ये सारखेपणा आलेला आहे. त्या प्रभावी संज्ञा, ते आकर्षक आलेख तुमच्या समोर येण्याची वारंवारता वाढली आहे. तुम्ही सावध होता, मग तुम्हांला जाणवतं की ह्या तंत्रज्ञानाची जी काही निर्मिती आहे ती जशीच्या तशी स्वीकारणं धोक्याचं असतं, त्यानं जे काही निर्माण केलं आहे ते तपासून पाहायला तज्ञ माणूस हवाच ! Human in the loop म्हणतात तो हाच ! सध्यातरी तो हवाच !

२. सोशल मीडियावर बरेचजण आपल्या जीवनातील आनंदाच्या बातम्या जाहीर  करतात. इथं शेअर हा शब्द न वापरण्याचा निर्धार केल्यानं जाहीर हा काहीसा जशाचा तसा अर्थ न व्यक्त करणारा शब्द वापरला आहे.  'आनंदाची बातमी' ह्या शब्दप्रयोगाची व्याप्ती ५:५७ च्या चर्चगेट विरार लोकलमध्ये उडी मारून खिडकीची जागा मिळाली पासून ते माझी भारतीय  T २० संघात निवड झाली इतकी मोठी असू शकते.  पण त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये बहुदा ९०% खालील प्रतिक्रियांचा समावेश असतो. आता मराठी लोकसुद्धा मराठीतून प्रतिक्रिया देत नसल्यानं प्रातिनिधिक म्हणवल्या जातील अशा प्रतिक्रिया देण्याइतपत माहिती उपलब्ध नाही. 

"Wow! That's awesome!"

"Congratulations!"

"I'm so happy for you!"

"That's great news!"

"I'm thrilled for you!"

"Fantastic!"

"That's amazing!" 

आता ५:५७ च्या विरार लोकल मध्ये खिडकीची जागा मिळाली ही बातमी सोशल मीडियावर टाकणारा विद्वान "I'm thrilled for you!" ह्या प्रतिक्रियेला कसे उत्तर देत असेल ते माहिती नाही. पण सांगायचा मुद्दा हा की त्याच त्याच प्रतिक्रिया आपण आयुष्यातील सर्व घटनांसाठी वापरत असल्यानं समोरील व्यक्तीला आपल्या प्रतिक्रियेच्या, भावनांच्या खरेखुरेपणाविषयी साशंक व्हायला होतं. ह्यात ग्यानबाची मेख अशी ज्या क्षणी आपण अनेकांच्या आयुष्याचा हिस्सा होण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी आपण खरेतर कोणाच्याच आयुष्यात नसतो. 

३. श्रीमान प्रथिन ह्या गृहस्थानं बहुसंख्य लोकांच्या आयुष्यात खळबळ माजवली आहे. तो दररोज मांसाहारी आहार करणाऱ्या लोकांच्या घरात चिकन, अंडी घेऊन येतो. पूर्वी पांढरा  रस्सा, तांबडा रस्सा ह्या क्वचितच घरी बनणाऱ्या डिशेस आज बनविल्या जात  हे ऐकूनच अत्यानंदाच्या भावनांनी उचंबळून येणाऱ्या माणसांच्या मनात आज दररोज बनणाऱ्या ह्या डिशेसच्या उल्लेखानं थोडीही खळबळ निर्माण होत नाही. 

४.  बऱ्याच धार्मिक, सामाजिक समारंभांना हल्ली एक साचेबंदपणा येऊ लागला आहे.  मर्यादित वेळेमुळे विवाह, मुंज वगैरे समारंभातील धार्मिक विधी बऱ्याच वेळा एक सोपस्कार म्हणून पार पाडावे लागतात. अर्थात ह्याला अपवाद असतातच. सामाजिक समारंभांना बेगडी रूप आलं आहे की काय अशी शंका मनात निर्माण होते. त्यातील भाषणं, एकमेकांचं कौतुक करण्याची वृत्ती, कोणताही वाद न होऊ देण्याची घेतलेली खबरदारी ह्यामुळं अशा समारंभांत कधीकधी अगदी वैतागून जायला होतं. 

पहिलं उदाहरण देण्याचं प्रयोजन असं की हे नवीन तंत्रज्ञान जसं एका साचेबंद पद्धतीनं उत्तर, माहिती देण्याची शक्यता महत्तम असते त्याचप्रमाणे आपण सुद्धा हल्ली एका साचेबद्ध पद्धतीनं बोलु चालू लागलो आहोत! 

दुसऱ्या उदाहरणात मला अभिप्रेत असलेला मुद्दा हा की नाती, मैत्री ह्या मध्ये वेळ गुंतवावा लागतो. पूर्ण मनापासून वेळ गुंतवला तरच ह्या नाती, मैत्रीमध्ये खरंखुरेपण येऊ शकतं. एका विशिष्ट मर्यादेपलीकडे केवळ असतं ते तोंडदेखलेपण ! प्रगतीच्या पुढील टप्प्यांमध्ये आपल्या वेळेवर संगणक, भ्रमणध्वनी, कार्यालय अधिक हक्क गाजवत राहतात. मग उरलेल्या वेळात केवळ त्या चेकबॉक्स वर टिक करायचं म्हणून आपण तोंडदेखलेपणानं प्रतिक्रिया देत राहतो. आता हे पूर्णपणे चुकीचं असं म्हणता येणार नाही. किमान आपण प्रयत्न तरी करत असतो!

तिसऱ्या उदाहरणातील मुद्दा अति परिचयात अवज्ञा ! सतत संपर्कात राहिल्यानं नातेसंबंधातील  गोडवा कमी होण्याचं भय असतं. 

पण जपण जर खरोखर गंभीरपणे विचार केला तर हे सारं अपरिहार्य आहे. मनुष्याच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर मनुष्य भावनांपासून फारकत घेणार हे विधीलिखित आहे. आजही जगातील विविध मनुष्य समुदाय त्यांच्या प्रगतीच्या टप्प्यानुसार आपल्या भावना वेगवेगळ्या प्रमाणात नियंत्रित करायला शिकले आहेत. उत्क्रांतीच्या टप्प्यावर सर्वात पुढे असणारी माणसं आपली जीवनशैली पूर्णपणे यंत्रांशी सर्वप्रथम जुळवून घेतील. 

जाता जाता ह्या पोस्टमधील हे हसतमुख बाळ ! हल्लीच्या बहुचर्चित तंत्रज्ञानाला मी असं चित्र बनविण्याची विनंती केली असता त्यानं मला मोजके दोन तीन प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची मी उत्तरं दिल्यानंतर तात्काळ हे हसतमुख बालक माझ्यासमोर आलं. केवळ भावनांचं खरेखुरेपण हरवलं नसावं, आपल्या भोवतालच्या बऱ्याच गोष्टींच्या खरेखुरपणाबद्दल शंका निर्माण व्हावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे !  

मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५

आस स्वातंत्र्याची


भारताला लौकिकार्थानं स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे झाली. आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो का ह्याविषयी माझे काही विचार !

१. स्वातंत्र्य नक्की कशापासून मिळवायचं आहे ह्या विषयी प्रत्येकाच्या विचारात प्रचंड तफावत आहे.  आहार, पोषाख ह्या मुलभूत गोष्टींपासून सुरु होणारी स्वातंत्र्याची आस जीवनाच्या अनेक पैलूंना इतक्या खोलवर स्पर्शून जाते किंबहुना त्या पैलूंमध्ये इतका आमूलाग्र बदल घडवून आणते की ही आस धरणारी व्यक्ती नक्कीच मनात कुठंतरी खोलवर हादरते. ह्यात आपण रेखाटलेलं स्वातंत्र्याचं चित्र आपल्या पुढील पिढीने ज्या महाकाय प्रमाणात पुढं नेलेलं असतं त्याचा मोठा वाटा असतो. पण आपण हादरलो आहोत हे बाहेरच्यांशी सोडा पण स्वतःशीही कबूल करण्याचं स्वातंत्र्य आपण गमावून बसलो असतो. 

२. पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थेवर आधारित नोकऱ्या गेल्या अनेक वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढल्या. भारताच्या महानगरातील विशिष्ट वर्गाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यात ह्या नोकऱ्यांनी मोठा हातभार लावला. परंतु ह्या नोकऱ्या करताना तिथल्या संस्कृतीशी आधारित आहार, पोषाख, सण, विवाहपद्धती ह्यांनी कधी हळूच आपल्या जीवनात प्रवेश करत मग ठाण मांडलं हे आपल्याला समजलंच नाही. इतकंच काय आपली माय मराठी भाषा देखील ह्या आक्रमणाखाली दबली गेली. ह्या साऱ्यातून आपल्याला स्वातंत्र्य मिळावं असं आपल्याला वाटतंय का हा मुलभूत प्रश्न !

३. वरील  मुद्दा लक्षात घेता पाश्चिमात्य देशांनी प्रभावित केलेली जीवनपद्धती प्रथम महानगरात प्रवेश करती झाली. त्यानंतर चित्रपट, मालिका ह्याद्वारे तिचा शिरकाव गावागावांत होऊ लागला. संपूर्ण भारताचं चित्र लक्षात घेतलं तर फार मोजक्या लोकांना ही जीवनपद्धती स्वीकारणं आर्थिकदृष्टया शक्य आहे. पण सोशल मीडियाने आपल्या घराघरांत ठाण मांडून बसायला मदत केलेल्या ह्या जीवनपद्धतीपासून आपल्याला स्वातंत्र्य मिळेल का हा मोठा प्रश्न !

४. आपलं वस्तुनिष्ठ परीक्षण करून, मोठ्यांचा / जाणकारांचा सल्ला घेऊन त्यानुसार वागावं ह्या मानसिकतेला आपण केव्हांच तिलांजली दिली आहे. हल्ली भारतातील बहुसंख्य लोक विविध कारणास्तव स्वतःला श्रेष्ठ समजू लागले आहेत. ह्या अकारण श्रेष्ठत्वाच्या भावनेतुन आपल्याला स्वातंत्र्य मिळावं ही माझी इच्छा ! 

५. मुद्दा क्रमांक दोन वर आधारित जीवनशैलीसाठी आवश्यक किती गंगाजळी तुमच्यापाशी असावी ह्याचे मोठाले आकडे अर्थतज्ञ मांडत आहेत. प्रात्यक्षिक दृष्ट्या विचार करता फार मोजक्या लोकांना ही गंगाजळी जमविणे शक्य आहे. ह्या मोठमोठ्या आकड्याच्या दडपणातून मुक्त होण्याचं स्वातंत्र्य तुम्हांला मिळावं ही माझी इच्छा !

अखेरीस फेसबुकवरील माझ्या प्रत्येक पोस्टला लाईक मिळायलाच हवेत ह्या मनातील सुप्त इच्छेपासून सुद्धा मला कधीतरी स्वातंत्र्य मिळावं ही माझी माझ्यासाठी इच्छा !

येत्या शुक्रवारी येणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्यदिनी ह्या विविध छुप्या पारतंत्र्यातून मला आणि तुमची इच्छा असल्यास तुम्हांला स्वातंत्र्य मिळावं ही शुभेच्छा ! 

रविवार, १० ऑगस्ट, २०२५

द्वैत -भाग ४





११ जुलै २०५६ (पुणे )

मुथ्थुस्वामी आणि सुमुख बॅनर्जी ह्यांची मस्त चर्चा सुरु होती. "मुथ्थु मला नक्की खात्री आहे की तू सध्या नक्की किती अनिकेत आहेत ह्याविषयी गोंधळला आहेस!" सुमुख मस्करीच्या सुरात म्हणाला. "तीन! एक खरा आणि दोन डिजिटल !" मुथ्थु आत्मविश्वासानं म्हणाला.  "शाब्बास, एक डिजिटल अनिकेत बांद्रयात पोहोचला असला तरी चॅनच्या ताब्यात असलेला डिजिटल अनिकेत ज्याला तो खरा अनिकेत समजतोय त्याचं कसं चाललंय ह्याविषयी आपलं दुर्लक्ष होतंय असं नाही वाटत का तुला? सुमुखच्या ह्या प्रश्नानं मुथ्थुला त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे जाणवलं. 

चॅन आणि अल्बर्टच्या समजुतीनुसार त्यांनी खऱ्या अनिकेतचे अपहरण केलं होतं. पण त्यांच्या ताब्यात असणारा अनिकेत हा मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी पाठवलेला डिजिटल अनिकेत होता हे त्यांना समजलं नव्हतं. त्यांचं सारे लक्ष त्यांनी बनविलेल्या डिजिटल अनिकेतच्या कामगिरीवर असल्यानं आपल्या ताब्यातील अनिकेतच्या माणूसपणाची खातरजमा करून घ्यायला त्यांना संधीच मिळाली नव्हती. 

११ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

"अनिकेत मी आल्ये !" वैदेहीचा आवाज ऐकताच अनिकेतच्या अंगावर शहारे उमटले. हे जे काही चाललं आहे त्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे त्याची मनःस्थिती गेली होती. वैदेहीने झटपट त्याला सर्व बंधनातून मुक्त केलं. "किती अशक्त झाला आहेस रे तू ?" वैदेही कळवळून म्हणाली. अनिकेत अजूनही तिच्यावर विश्वास ठेवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. पण तिनं पुढं केलेल्या शिऱ्याच्या बशीकडे मात्र दुर्लक्ष करणे त्याच्यासाठी अवघड होते. पहिला चमचा जिभेवर टाकताच हिच्यावर विश्वास ठेवणं योग्य राहील अशी ग्वाही त्याच्या अंतर्मनाने दिली. "वैदेही, हे काय चाललंय ?" इतके दिवसाचा संताप त्याच्या स्वरातून व्यक्त होत होता. "झालं, साऱ्या दुनियेचा राग माझ्यावर काढणार असशील तर मी चालले परत भारतात !" वैदेहीच्या ह्या वाक्यानं तो भानावर आला. आपण अजूनही अमेरिकेतच आहोत हे त्याला जाणवलं. 

११ - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - मंगळवार  

काल चॅन आणि अल्बर्ट आपल्यासाठी वेळ देऊ शकले नाहीत हे डिजिटल अनिकेतला पटण्यासारखं नव्हतं. ह्या प्रोजेक्टचे गांभीर्य पाहता प्रत्येक दिवस अत्यंत महत्वाचा असणार होता. पण तरीही त्यानं कसाबसा संयम राखला होता. रात्री वैदेही घरी आलीच नाही. तिनं आपलं ठाण्यातील वास्तव्य दोन दिवस वाढविले असल्याचं त्याला कळवलं होतं.  काहीतरी चुकतंय ह्याची जाणीव ह्या अनिकेतला होऊ लागली होती. 

आज चॅन आणि अल्बर्ट बैठकीला वेळेवर आले होते. व्हिडिओ कॉल एनक्रिप्ट करून त्या तिघांची अतिशय गोपनीय चर्चा सुरु झाली होती.  चॅन आणि अल्बर्ट ज्या पद्धतीनं चर्चेत भाग घेत होते आणि प्राथमिक स्वरूपाचे प्रश्न विचारत होते त्यामुळं डिजिटल अनिकेत साशंक झाला होता.  तासाभराने ज्यावेळी कॉल दहा मिनिटांच्या ब्रेकसाठी  थांबला त्यावेळी डिजिटल अनिकेतने मोठा निर्णय घेतला. त्यानं थेट उच्चपदस्थांशी संपर्क साधला. चॅन आणि अल्बर्ट ह्यांची खरी ओळख पुन्हा एकदा शहानिशा करून घ्यावी अशी त्यानं विनंती केली. 

मुथ्थु आणि सुमुख अनिकेतच्या हालचालीवर लक्ष ठेवून असल्यानं त्यांना लगेचच तो  काहीतरी संशयास्पद कृती करत असल्याचं जाणवलं. दहा मिनिटांनंतर डिजिटल अनिकेत अगदी काळजीपूर्वक कॉलवर आला. तोवर अमेरिकेतून आतापर्यंत भाग घेणारे डिजिटल चॅन आणि अल्बर्ट बाजूला होऊन खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट कॉलवर आले होते. आपल्याला झालेल्या मारहाणीनंतर आणि त्यानंतर मिळालेल्या धमकीनंतर चॅन ह्या कॉलवर फक्त मुथ्थु आणि सुमुख ह्यांनी जे काही सांगितलं तेच बोलणार होता. डिजिटल अनिकेतच्या वरिष्ठांनी कॉलवर आलेल्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांची सर्व शहानिशा केली. ते खरेखुरे चॅन आणि अल्बर्ट असल्याबद्दल त्यांनी डिजिटल अनिकेतला आश्वस्त केले. डिजिटल अनिकेत आता आपल्याला मिळालेल्या सर्व माहितीचा आढावा त्यांना देऊ लागला होता. 

(क्रमशः )


कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...