मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ८ जुलै, २०२१

तव नयनाचें दल हललें ग




काल्पनिक 

बा. भ.  बोरकरांचा निषेध असो, निषेध असो ! माझ्या एका पर्यावरण मित्र असलेल्या मित्राचा आजच सकाळ सकाळी फोन आला. सुरुवातच त्यानं अशी खळबळजनक केल्यानंतर त्याला शांत करणे आवश्यक होते.

 "अरे तू कोणाविषयी बोलतोय माहिती आहे का तुला? बा. भ.  बोरकरांच्या कविता वाचून पहा मग तू कसा त्यांचे गोडवे गाऊ लागशील" मी म्हणालो.  

"त्यांची एक कविता आकाशवाणीवर आताच ऐकली म्हणूनच तुला फोन केलाय !" तो गुश्श्यातच होता.  बापरे हे प्रकरण जरा गंभीरच होते. 

"नक्की झालं तरी काय? " मी जरा सबूरीच्या स्वरात म्हणालो. 

"ऐक आता " त्यानं सुरुवात केली. 

तव नयनाचें दल हललें ग !
पानावरच्या दवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !

ऋतुचक्राचे आंस उडाले
आकाशांतुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !"

हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !

रागाच्या अगदी उच्च पातळीवरुन त्यानं ही कविता एका दमात वाचून दाखवली. आणि ठळक केलेल्या ओळी त्यानं अगदी ठासुन म्हटल्या. एकंदरीत प्रकरणाचा मला अंदाज येऊ लागला होता. 

पाण्याचा एक घोट घेण्यासाठी त्यानं क्षणभराची उसंत घेतली असावी. 

त्रिभुवन हें डळमळलें ग ! - "बोरकरांना काय भूकंप आवडतो की काय?" 

तारे गळले, वारे ढळले - " तारे गळणे हे तर शक्यच नाही ! पण सद्यपरिस्थितीत मान्सून आपला नियमितपणा पूर्ण विसरला असता वारे जर आपल्या मूळ मार्गापासून ढळले तर भारतीय कृषिक्षेत्रावर किती अनिष्ट परिणाम होईल ह्याचा बोरकरांनी विचार करायला हवा !"

गिरि ढासळले - "बोरकरांना इथं हिमस्खलन अभिप्रेत आहे की काय? पर्यावरणाच्या दृष्टीनं भारतीय उपखंडात पर्वतांचे महत्व किती अनन्यसाधारण आहे ह्यावर माझ्याकडं दीडशे पानाचा प्रबंध आहे. तुला तो पाठवून देतो." सद्यपरिस्थितीत हा मित्र थेट घरी येऊ शकत नाही ह्या विचारानं मला हायसं वाटलं . 

मीन जळीं तळमळले ग !" - "तुम्ही मोठाली जहाजे समुद्रात पाठवून द्यायची आणि त्यातून तेलाची गळती होऊन द्यायची! मग समुद्रातील मासे तळमळणार नाही तर काय आनंदानं नाचणार ? "

पुढील पंधरा वीस मिनिटं मी त्याचं कवीकल्पना ह्या संकल्पनेवर माझ्या अकलेनुसार संबोधन घेतलं. 

"तुला कॉलेजात असताना ती मुलगी आवडायची तिनं एकदा तुझ्याकडं हसून पाहिलं होतं त्यावेळी तुला कसं वाटलं होतं?" मी त्याला विचारलं 

"हृदयाचे ठोके चुकले होते ... " तो मी त्याच्या मर्मावर अचानक बोट ठेवल्यानं  एकदम नरमला. 

"पण त्याचा इथं काय संबंध " दुसऱ्या क्षणी तो पुन्हा खवळून उठला !

"चलाओ  ना नैनो के बाण रे ! चार पाच वर्षांपूर्वी हे गाणं म्हणत कोण थिरकत नाचत होतं ?" मी सुटलो होतो 

"मीच तो !" त्याचं उरलंसुरलं अवसान गळायच्या मार्गावर होतं. 

"प्रेयसीच्या केवळ एका नजरेनं प्रियकराच्या भावनिक विश्वात काय खळबळ माजू शकते ह्याचा कल्पनाविलास बा  भ बोरकरांनी ह्या कवितेतून केला आहे. त्यांच्या प्रतिभाशक्तीला तू दाद द्यावीस असा माझा आग्रह आहे ! " मी गरजलो 

काल्पनिक भाग समाप्त !

मराठी भाषेतील ज्येष्ठ कवी बा. भ. बोरकर ह्यांची आज सदतिसावी पुण्यतिथी ! सकाळी आकाशवाणीने त्यांचं स्मरण करत सलील कुलकर्णी ह्यांच्या आवाजातील तव नयनाचें दल हललें ग हे एक सुरेख गीत ऐकवले. निवेदकाने जो मोजक्या शब्दांत बाकिबाब ह्यांचा परिचय करुन दिला त्यावरुन त्यांच्या प्रतिभेचा अंदाज आला. अगदी तरुणपणी त्यांनी कवितालेखनास सुरुवात केली ! विविध व्यासपीठावरुन, कवितासंग्रहाद्वारे त्यांनी आपल्या कवितांचा आनंद रसिकांना दिला. मराठी साहित्य संमेलन, कोकणी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. 

मराठी भाषेतील एक नावाजलेले कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  बोरकरांच्या पवित्र स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...