मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

बिबट्या माझा शेजारी


'कानन निवास'  ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्या हक्काच्या वामकुक्षीसाठी निघण्याच्या तयारीत होते. आजचा दिवस तसा शांत गेला होता.  तसंही जगभर काय अगदी आपल्या वॉर्डाच्या पलीकडील कोणत्याही बातमीनं त्रास करून घ्यायची लेले ह्यांना सवय नव्हती. त्यामुळं आपल्या शहरात बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या येत असल्या तरीही तो आपल्या वॉर्डात फिरकणार नाही असा काहीसा त्यांना विश्वास होता. 

लेले आपल्या खुर्चीवरून उठणार तितक्यात 'गुर्रर्र गुर्रर्र' अशा खणखणीत आवाजानं त्यांना दचकवलं. बंद दरवाजा उघडून जसा राजबिंडा बिबट्या कार्यालयात प्रवेश करता झाला तसं लेले ह्यांना ब्रह्मांड आठवलं. आपण भ्रमणध्वनीवर फुकाचा वेळ न घालवता वेळीच घरी गेलो असतो तर हा दुर्धर प्रसंग आपल्यावर ओढवलाच नसता ह्या विचारानं ते प्रचंड अस्वस्थ झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्याकडं सुद्धा स्मार्टफोन होता. बिबट्यानं तो चालू केला आणि कोणतंतरी अँप सुरु करून तो गुरकावला. "बसा लेले बसा! घाबरू नका !" स्मार्टफोननं बिबट्याचं म्हणणं लेलेंच्या भाषेत त्यांना सांगितलं. प्रसंगावधान राखून लेलेंनी सुद्धा "बिबट्याजी स्थानापन्न व्हा !" काही थंड वगैरे घेणार का?" अशा शब्दांत त्याचं स्वागत केलं.  

पुन्हा बिबट्या काहीसं स्मार्टफोनमध्ये पुटपुटला. "बिबट्याजी वगैरे काय? मी कोणी होतकरू नगरसेवक वगैरे वाटलो की काय तुम्हांला ?" स्मार्टफोनने बिबट्याच्या भावना लेलेंपर्यंत पोहोचवल्या. "आपण कसं काय येणं केलंत आम्हां गरीबाच्या घरी?" लेलेंचा मेंदू आता खुपच सक्रिय झाला होता. ते जे काही स्मार्टफोनमधील अँप आहे ते बिबट्याला आपल्या भावना चांगल्या प्रकारे पोहोचवत आहे ह्यावर त्यांचा प्रचंड विश्वास बसला होता. 

"मला तुमच्या सोसायटीत फ्लॅट भाड्यानं घ्यायचा आहे !" बिबट्या म्हणाला. "काय, काय म्हणालात? फ्लॅट भाड्यानं घ्यायचाय?" डोळे विस्फारून लेले म्हणाले. "त्यात काय वावगं आहे? आम्ही तुमच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करू?" "आम्ही म्हणजे .. ?" "मी आणि माझी पत्नी !" बिबट्या आत्मविश्वासानं म्हणाला. 

प्रकरण एकदम गंभीर होते. "सोसायटीची सभा बोलवावी लागेल, बहुमतानं जो काही निर्णय होईल तो मान्य करावा लागेल" लेलेंनी आपल्याकडचं प्रभावी शस्त्र बाहेर काढलं. लगेचच बिबट्याच्या चेहऱ्यावरील निर्माण झालेले क्रुद्ध भाव लेलेंनी हेरले. 'सर सलामत तो सभा पचास !" असं आपल्यासाठी म्हणीचे रूप बनवून त्यांनी झटपट सर्व रिकामी अर्ज बिबट्यासमोर मांडले. पुन्हा वैतागलेला बिबट्या पाहून त्यांनी स्वतःहूनच सर्व अर्ज जमतील तसे भरून टाकले. सोसायटीचं नांव पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यांत खुपत होतं. ह्या वेडपट स्मार्टफोनने काननचा अर्थ बिबट्याला सांगितला असावा म्हणुनच तो बाकीच्या चांगल्या चांगल्या सोसायट्या सोडून इथं कडमडला असावा ह्याविषयी त्यांची पक्की खात्री झाली.  दुपारी जेवणाला उशीर झाला म्हणून लेलेंना घरून सारखे फोन येत होते, ते त्यांनी अर्थातच घेतले नाहीत. तासाभरात सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले होते. लेले ह्यांनी सर्व काही धैर्य एकवटून आमच्या सोसायटीच्या सदस्यांच्या जीवाला काही धोका नाही ना असा प्रश्न विचारला. फ्लॅट मिळाल्यानं खुश झालेल्या बिबट्यानं मान डोलावत अजिबात नाही असं खुणेनं सांगितलं. "मी संध्याकाळी माझं सामान घेऊन शिफ्ट होतो" जाता जाता बिबट्या म्हणाला. बिबट्या गेला तसं लगेचच लेलेंनी आपल्यावर ओढवलेला अनावस्था प्रसंग व्हाट्सअँपच्या माध्यमातुन सर्व सोसायटीच्या सदस्यांना कळवला. लगेचच सर्वजण धावत कार्यालयात येतील अशी वेडी आशा लेले बाळगून होते. पण थोड्याच वेळात सर्वजण आपापल्या खिडक्यांतून लेलेंना धीर देण्यासाठी डोकावून पाहत असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं.  वॉचमननं बिबट्याला आत सोडलंच कसं? रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली का? असे प्रश्न घेऊन लेले त्याच्याकडं गेले. बिचारा बेशुद्ध होऊन पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबकारे मारल्यानंतर त्याला जागं केलं तर तो जीव मुठीत घेऊन पळून गेला. एव्हाना सोसायटीवर लोकांच्या कल्पनाशक्तीला मोकळं रान मिळालं होतं. लेलेंनी बिबट्याला म्हटलं, "बिबट्या फ्लॅट लेले !" वगैरे वगैरे विनोद लोक टाकत होते. इतक्यात लेलेंना घरून फोन आला. "त्या बिबट्याबरोबर गप्पा मारून झाल्या असतील जेवायला लवकर घरी या ! मी पुन्हा पुन्हा जेवण गरम करणार नाही ! " आज्ञाधारक लेले खाली मान घालून घरी परतले. चप्पल काढून घरात प्रवेश करत नाही तोच "पटकन जेऊन घ्या, ते टीव्ही चॅनेलवाले कधी पोहोचतील ह्याचा भरंवसा नाही. आणि हो त्यांना मुलाखत द्यायची असेल तर ती सोसायटीच्या ऑफिसमध्येच द्या. इथं इतक्या सगळ्या लोकांना चहा करायला दूध घरात नाही आणि कालच ते सर्व घर स्वच्छ पुसून घेतलंय ! बाकी मुलाखत देताना तो दिवाळीत नवीन शर्ट घेतला आहे तो घाला !"  स्वच्छ लादी, संपलेलं दूध आणि आपला जीव ह्यात नक्की प्राधान्यक्रम कसा लावायचा हे लेलेंना समजेनासं झालं. 

संध्याकाळी बिबट्या आणि त्याची सहचारिणी सदनिकेत शिफ्ट झाले. बिबट्या शिफ्ट होतोय म्हणजे नक्की काय करतो ह्याविषयी लेलेंना खूपच कुतूहल होते. "त्यात काय मोठा विचार करायचा? दोन तीन मारलेल्या प्राण्यांना तोंडात घेऊन येतील दोघं?" आत्मविश्वासानं त्यांची बायको म्हणाली. चार वाजता वॉचमन विना भकास वाटत असलेल्या प्रवेशद्वारातुन ते दोघं प्रवेश करते झाले तेव्हा आपल्या बायकोचा अंदाज इतका अचुक कसा काय ठरला हे पाहून लेलेंच्या मनात अभिमान, कौतुक, असूया वगैरे संमिश्र भावना उमटल्या. "मी तुम्हांला सांगितलं होतं ना !" हे वाक्य तिच्या नजरेद्वारे स्पष्टपणे सांगितलं जात होतं. 

महिनाभरानंतर 
कानन सोसायटी आणि लेले इंटरनेट सेलेब्रिटी झाले होते. बिबट्या आणि लेले, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून व्यवस्थित बोलू शकत होते. आपण मॉर्निंग वॉकला एकत्र जाऊयात असं फ्लॅटमध्ये राहून कंटाळलेल्या बिबट्यानं कालच लेलेंना कळवलं होतं. पैसे कमवायची ही मोठी संधी आहे असं लेलेंचा मुलगा म्हणाला होता. बिबट्यासोबत एकत्र चालतानाचे रील्स बनवून इंटरनेट दणाणुन सोडुन टाकुयात असे तो म्हणाला. बाकी बिबट्याच्या चरितार्थाला सुद्धा मदत होईल असं काही करू असे तो म्हणाला. ह्या संवादाने प्रेरित होऊन  "आज खीर चांगली झाली आहे, ती बिबट्याच्या घरी घेऊन जाऊ का? " अशी लेलेंची सौ. त्यांना विचारत होती. 

लिमये, जोशी ह्यांचे कुत्रे घराबाहेर यायलाच तयार नव्हते. त्यामुळं त्यांच्या घरात भलत्याच समस्या उद्भवल्या होत्या. बिबटया स्मार्टफोनवरूनच चिकन, मटण मागवत असल्यानं त्याच्या फिटनेसच्या समस्या होऊ शकतील असे सौ. बिबट्या ह्यांना वाटत होते. बाकी चिकन, मटण घेऊन येणारे डिलिव्हरी माणसं पहिल्यांदा चुकून बिबट्याच्या फ्लॅटपर्यंत गेली होती, पण बिबट्यानं दार उघडताच त्यांची पळता भुई थोडी झाली होती. लेलेंनी वॉचमनची समजूत काढून त्याला परत कामावर बोलावलं होतं. आता तो बिबट्याच्या घरची सर्व डिलिव्हरी खालीच घेत असे. एकंदरीत लेलेंच्या रटाळ आयुष्यात अगदी धमाल सुरु झाली होती. 

बाकी फ्लॅटबाहेर चपला काढून ठेवल्या म्हणून बिबट्याला सोसायटीतर्फे पहिली नोटीस मिळाली. त्या चपलांचा हा तो फोटो !! 


शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

आपण असे का ?? - जावा २५ - जावा २१ ते मनुष्य १५०.४ - मनुष्य ११६.१.४



साधं सुधंचा अगदी मोजका वाचकवर्ग आहे. पण त्यांच्या प्रतिक्रियेच्या सखोलपणामुळं समाधान मात्र भरभरून मिळतं. प्रतिक्रिया खरंतर मुळ पोस्टपेक्षा गहन असतात! 'सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !' वर सुद्धा अशाच काही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणाऱ्या सखोल प्रतिक्रिया आल्या. त्यातील आपल्या समाज जीवनातील शिस्तीच्या उणिवेची ही प्रतिक्रिया मनोमन पटली. 

आपल्या समाजजीवनाच्या अधःपतनाला सामाजिक शिस्तीची उणीव मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे वाटते. आपण भारतीय (मनोवृत्तीचे) लोक शेकडो/हजारो वर्षे कोणत्यातरी राज्यकर्त्याची प्रजा म्हणूनच जगत आलोय. आपण नागरिक कधीच नव्हतो आणि नाही! नागरिक म्हटलं की सामाजिक जबाबदारी, स्वयंशिस्त आली, जी आपल्या रक्तात नाही. आपण बेशिस्त लोकांची झुंड आहोत निव्वळ!!नियम पाळण्यासाठी भारतीय मनोवृत्तीला धाक आवश्यक असतो! स्वतःहून कुणीच नियम पाळणार नाही! पण हेच भारतीय परदेशात सुतासारखे सरळ असतात, कारण तिथे तिथल्या कायद्याचा धाक असतो.

एकंदरीत समस्या गहन आहे, तिची मुळं आपल्या भुतकाळात दडलेली आहेत. आपण प्रत्येकजण आपल्याला वाटतं तितक्या स्वतंत्र पद्धतीनं विचार करत नसतो. आपल्या पुर्वजांची मानसिकता आपल्या विचारशक्तीचा एक अविभाज्य घटक बनलेली असते. ही मानसिकता आपल्या मागील पिढ्यांनी अनुभवलेली असुरक्षितता, अनुभव सर्व काही आपल्या स्वभावात भिनवते. 

आपल्या पुर्वजांच्या दृष्टीनं आपला स्वार्थ बाजुला ठेवून समाजहितास प्राधान्य देणं हा अनुभव कधीच सुखदायक ठरला नाही.आपल्या मागील बऱ्याच पिढ्या सदैव रोजीरोटीच्या संघर्षाच्या मानसिकेत खोलवर दडल्या गेल्या होत्या. त्यामुळं समाजाच्या दृष्टीनं विचार करण्याची चैन त्यांना कधीच परवडली नव्हती. आता रोजीरोटीचा संघर्ष आपल्या लोकसंख्येच्या काही हिश्श्यासाठी संपला, पण समाजहिताला आपल्या विचारप्रक्रियेचा भाग बनविण्याचं जे काही शिक्षण त्यांना नागरिकशास्त्रात मिळालं ते शालेय जीवनाबरोबरच मागे ठेवून ते सामाजिक जीवनात वावरू लागले. 

कोणत्याही आज्ञावलीच्या भाषेच्या आवृत्त्या ठराविक कालांतरानं प्रसिद्ध होत राहतात. सध्या जावा ह्या programming language ची सर्वात नवीन आवृत्ती Java 25 आहे, त्याआधी Java 21 होती. माहितीजालावर शोध घेतला तर ह्या प्रत्येक आवृत्तीत नक्की कोणते बदल झाले हे अगदी अचुकपणे सांगितलं जातं. प्रत्येक आवृत्तीत सकारात्मक सुधारणा होत राहतात. 

कदाचित आपल्या मानवजातीचं सुद्धा असंच काहीतरी असावं. प्रत्येक खंडात आपल्या विविध आवृत्त्या एकाच कालावधीत नांदत आहेत. कदाचित आपल्या  देशात ८०% जनता "मनुष्य ११६.१.४" आवृत्तीवर आहे तर १०% जनता "मनुष्य १२६.४" आवृत्तीवर आहे वगैरे वगैरे! विकसित देशात बहुदा "मनुष्य १५०.४" वगैरे आवृत्या अस्तित्वात असाव्यात. "मनुष्य १५०.४" आवृत्ती "मनुष्य १२६.४" आवृत्तीपेक्षा सर्वच बाबतीत सरस असे मी अजिबात म्हणत नाहीय. पण सामाजिक जीवनातील शिस्त पाळण्याच्या बाबतीत, निसर्गसंवर्धन करण्याबाबतीत मात्र ती नक्कीच विकसित आहे. ह्या आवृत्त्या धर्म, भाषा ह्याच्या पल्याड असतात. 

मनुष्यांच्या ह्या विविध आवृत्या जेव्हा सामुहिक स्थलांतरांमुळं एकमेकांच्या नजीकच्या संपर्कात येतात, तेव्हा विविध शक्यता उद्भवतात. विकसित संस्कृतीची / आवृत्तीची सहिष्णुता आणि आधीच्या आवृत्तीची दांडगाई ह्यांचा संघर्ष होऊ शकतो किंवा पारशी लोकांच्या प्रसिद्ध कथेप्रमाणे ते साखरेप्रमाणे दुधात मिसळून जाऊ शकतात. 

एकाच देशात मात्र जेव्हा विविध आवृत्त्या सहजीवन जगतात त्यावेळी मात्र सुसंस्कृत आवृत्तीची कुचंबणा होऊ शकते. केवळ लिखाण, संवाद ह्या माध्यमातून आपली खंत एकमेकांकडे व्यक्त करणे ह्यापलीकडे त्यांच्याकडं पर्याय नसतो. असो पुढील काही दिवसांत प्रत्येक आवृत्तीचे गुणधर्म सविस्तर लिहून नवीन पोस्ट लिहायचा मानस आहे! बघुयात कितपत जमतं ते ! 

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

जिव्हारी लागणारा पराभव ते मध्यान्हीच्या भोजनाची उचित वेळ !



हल्ली भारतीय संघांचे पराभव माझ्या जिव्हारी लागत नाही. मी असंवेदशील झालो की काय वगैरे गोष्टींवर चिंतन करायला मला सध्या वेळ नाही. सखोल अभ्यास करायला माझ्यासमोर बरेच कार्यालयीन विषय आहेत आणि ते मला पुरून उरताहेत ! असो जिव्हारी लागलेल्या पराभवांची यादी बनवायची झाली तर खालील पराभव डोळ्यासमोर येतात 

१. शारजाह अंतिम सामना १९८६

२. भारत पाकिस्तान बंगलोर कसोटी सामना १९८७

३. भारत इंग्लंड रिलायन्स कप उपांत्य सामना वानखेडे १९८७ 

४.भारत श्रीलंका वर्ल्ड कप उपांत्य सामना कलकत्ता १९९६ 

५. भारत पाकिस्तान चेन्नई कसोटी सामना १९९९

मग माझ्या आयुष्यात एक संस्मरणीय क्षण आला. १९९९ सालच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ खराब कामगिरी करत असताना सायंकाळी सीप्ज़ बस स्थानकाबाहेर मी मित्रासोबत बसची वाट पाहत असताना तावातावानं भारतीय संघांतील खेळाडूंवर टीकेचे आसूड ओढत होतो. मी क्षणभराची उसंत घेतली तेव्हा ती संधी साधून मित्र म्हणाला, "आदित्य, तुझ्या जीवनातील आनंदासाठी तू अशा बाह्य घटकांवर इतका अवलंबून असशील तर ह्याचा अर्थ असा की तू तुझ्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात म्हणावा तसा गुंतलेला नाहीस आणि त्यात काही खास कामगिरी करत नाहीस !" 

आपल्या जीवनातील अशा क्षणांचं महत्त्व समजायला आणि त्यातील संदेश अंगीवळणी पडायला कधी कधी वर्षे जातात. पण उशिरा का होईना त्यातील उपदेश आपण स्वीकारला तर आपलं भलं होतं. माझंही भलं झालं, म्हणजे माझा संताप होणं कमी होत गेलं. २००३ सालच्या वर्ल्ड कप मधील अंतिम फेरीतील पराभव, २००७ सालच्या वर्ल्ड कप मधील प्राथमिक  फेरीत गारद होणे, २०१५ / २०१९ सालच्या वर्ल्ड कप मधील उपांत्य फेरीतील पराभव मी फारसे मनाला लावून घेतले नाहीत. पण राव १९ नोव्हेंबर २०२३ ने मात्र जबरदस्त चटका लावला. असो बाकी सर्व पराभवाच्या मी जून १९९९ मधील मित्राचा संदेश आठवून कार्यालयीन कामाकडं वळतो किंवा घरात उगाचच मदत करायचा प्रयत्न करतो. 

असाच दुसरा संदेश माझ्या आईनं मला १९९८-९९ च्या सुमारास दिला होता. त्यावेळी मी सीप्ज़मधील ICH / Kaydees ह्या उपहारगृहात दुपारचे भोजन करायचो. वडिलांचा उल्लेख करून आई म्हणाली होती, "भाईंनी आयुष्यभर घरून जेवणाचा डब्बा नेला आहे! ह्या वयातही त्यांची तब्येत बघ !" हा संदेश सुद्धा अंमलात आणायला मला काही वर्षे गेली. पण तो स्वीकारला आणि खूप फरक पडला. पण पुन्हा आयुष्यात संदेह निर्माण झाला. कार्यालयात एक मित्र म्हणाला, "मला कामाचं खूप टेन्शन असलं की मी चमचमीत खातो, चिकन बिर्याणी मागवतो! ते माझं तणाव निवारक म्हणून काम करतं".  मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. शनिवार / रविवार संध्याकाळी तणाव निवारक म्हणून नाही तर मूड (मनःस्थिती) सुधारक म्हणून आम्ही नूडल्स, मुर्ग मुस्स्लम वगैरे पदार्थ मागवतो. म्हणजे दहा - बारा जेवणं पडवळ, दुधी, गलका, शिराळा ह्या भाज्यांची (आईच्या शिकवणीमुळं) आणि बाकीची दोन - तीन जेवणं नूडल्स, मुर्ग मुस्स्लम ह्यांची - मूड बूस्टरच्या नावाखाली ! 

आता कार्यालयाची वेळ काहीशी वेगळी. म्हणून मी सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेतो. ह्या वाक्यात विसंगती ओतप्रोत भरली आहे. पण आयुष्यातील प्राधान्यक्रम आपल्याला कळायला हवा ! गरमागरम वरणभात,पडवळ, दुधी, गलका, शिराळा वगैरे आपल्या पोटात जावं असं आपल्याला वाटत असेल आणि तरीही कार्यालयाची मध्यान्हीची वेळ पाळायची असेल तर सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेता यायला हवं. जेवायला बसताना पोटाला समजावं लागतं की आज वीक डे आहे आणि हे दुपारचं जेवण आपण घेत आहोत ! बाकी रात्री सुद्धा ऑफिसात चपाती भाजी असा हलका आहार घ्यावा !

आता ह्या लेखातील दोन मुद्द्यांना जोडणारा दुवा म्हणजे गुवाहाटी सामन्यातील भारतीय संघांचा दारुण पराभव आणि प्रसारमाध्यमांनी उगाचच निष्पाप गौतम गंभीरवर उठवलेली टीकेची झोड! मुख्य कारण मला उमगलं आहे. तसा मी सर्वज्ञ वगैरे नसलो तरी बऱ्याच गोष्टी मला कळतात. तर सांगायची गोष्ट अशी की संपुर्ण भारतात एकच प्रमाणवेळ पाळायच्या अट्टाहासापायी ईशान्य भारतातील लोकांना साडेचार - पाच वाजता सूर्योदय पाहावा लागतो. बिचारा भारतीय संघ! त्यांना सकाळी नऊ वाजता सामना खेळायला मैदानावर यावं लागलं. त्याहून अधिक गंभीर गोष्ट म्हणजे दोन तासांच्या खेळानंतर अकरा वाजता त्यांना भोजनऐवजी चहा देण्यात आला. भोजनासाठी त्यांना एक वाजून वीस मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागली. इथंच सगळा गोंधळ झाला! मी जर सकाळच्या साडेदहा वाजता दुपारचे भोजन घेऊ शकतो तर त्यांना अकरा वाजता दुपारचं जेवण द्यायला काय हरकत होती?  भले ते दुधी, पडवळ वगैरे भाजीचं का असेना!  असो माझे सल्ले लोकं ऐकत नाहीत, नुकसान त्यांचंच आहे! त्यांना समज कधी येईल देव जाणे ! 

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !





सदैव अस्तित्वात असणारा जगातील विरोधाभास दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत असावा. एकीकडे ट्रिलियन डॉलर्स वार्षिक उत्पन्न असणारी व्यक्ती ह्या भुतलावर अस्तित्वात आहे, तर दुसऱ्या टोकाला ज्यांच्या पुढील अनेक पिढयांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागणार आहे अशी माणसं सुद्धा इथं नेटानं जीवन जगत आहेत. वर्णपटाच्या ह्या दोन टोकांमध्ये सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात खेळ खेळणारे आपण सामान्य ! 

ज्याला कोणतीही व्याधी नाही तो सुखी माणुस ही व्याख्या बहुतांशी भागात त्रिकालाबाधित राहणार आहे असा माझा समज होता. पण जगात घडणाऱ्या घटना पाहिल्या, ऐकल्या की ह्या समजुतीला तडा जातो. नायजेरियात ३०० हुन अधिक मुलांचं अपहरण केल्यानं शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आपण कुठं जन्माला येतो हे आपल्या हाती नसतं पण त्यामुळं इतका जमीनअस्मानाचा फरक पडतो हे जाणून घ्यायला हवं. दिवसेंदिवस हवामान बेभरंवशाचं होणार आहे. शहरी नागरिकांना त्याचा फारसा फरक पडत नाही, एखाद्या दिवशी कदाचित अचानक आलेल्या पावसात भिजावं लागणं, किंवा पाणी साचल्यामुळं कारमध्ये अडकून बसायला लागणं अशी काहीशी आपल्या समस्यांची व्याप्ती असु शकते. पण ह्या अकाली पावसामुळं ज्यांची हाताला आलेली पिकं वाया जाण्याच्या घटना सातत्यानं घडू लागल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडं पाहावं ? खेड्यातील तरुणांना लग्न जमविण्याच्या समस्या येऊ लागल्यानं त्यांनी गेल्या काही महिन्यात राजकीय नेत्यांना पत्र लिहिण्याच्या घटना सातत्यानं प्रसिद्ध होत आहेत. आज महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत आलेला लेख ह्या समस्येच्या विविध कंगोऱ्यांचा वेध घेतो.  ही खरी तर मोठी समस्या आहे पण आपल्या भोवतालच्या उथळ विषयांच्या गोंधळात ह्यावर चर्चा होतच नाही. 

एक समाज म्हणून निःशंकपणे आपण उथळपणाची कास धरली आहे. यु ट्यूबवरील रील्स पाहणे हे ह्या उथळपणाच्या वर्णपटाचं एक टोक तर दुसरीकडं कसोटी सामन्यात पाहुण्या संघाला नामोहरम करण्यासाठी आखाडेरुपी खेळपट्टी बनविणं हे दुसरं टोक! शांतपणे घरात बसून गहन विषयावरील ग्रंथांचं पठण करून विद्येची आराधना करणारा युवक सापडणे अपेक्षित नसलं तरीही केवळ लक्ष वेधुन घेण्यासाठी बहुतेक वेळा संस्कारांचा त्याग करून रील्स बनविणं हे एक पतन आणि अशी रील्स पाहत वेळ घालवुन आपल्या मेंदूला त्याच्या सम्यक स्थितीपासून खाली खेचणं हे दुसऱ्या प्रकारचं पतन! 

आपल्याभोवताली निर्माण होणारं ध्वनी प्रदुषण हा एक अजून चर्चेला घेण्यासारखा विषय!  आपल्या भोवतालच्या लोकांना त्रास होतोय ह्याची जाणीव एक तर ह्या जोरानं फटाके वाजविणाऱ्या, वाजत गाजत मिरवणूक नेणाऱ्या, मेट्रोत जोरानं बोलणाऱ्या / संगीत वाजविणाऱ्या अथवा ध्वनिवर्धकाचा वापर करून कार्यक्रम करणाऱ्या लोकांना नसावी अथवा त्याची पर्वा ते करत नसावेत. एक समाज म्हणून आपण नक्कीच मुजोर बनत चाललो आहोत का हा प्रश्न मला भेडसावत आहे. 

आता मी हा केवळ प्रश्न उपस्थित करत आहे. ह्यावर दीर्घ विचारमंथन करावं अशी आशा करावी ही सुद्धा परिस्थिती उरली नाही. सखोल विश्लेषण करण्याची क्षमता, मानसिकता आपण गमावून बसलो आहोत. आपल्याला हवे आहेत ते तात्काळ परिणाम ! 

लेखात समाविष्ट केलेली चित्रं गेल्या आठवड्यातील एका बैठकीनंतर आयोजित केलेल्या जेवणातील काही पदार्थांची.  पदार्थांचा सादरीकरण स्तर निर्विवादपणे उच्च, चवही छान! सर्वांनी त्या पदार्थांचं तोंडभरून कौतुक केलं. मला कुठंतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तिथुन बाहेर पडल्यावर दोघं सहकारी म्हणालं, सगळं काही ठीक पण दाल मखनी, चावल, सब्जी ह्यानं जे समाधान मिळतं ते ह्यात नाही. मला जाणवणारी वरणभाताची उणीव अजून कोणाला तरी जाणवली ह्यात मला खूपच समाधान मिळालं. 

आपल्या शहरी जीवनाचं असंच काही झालं आहे नाही का? सादरीकरणाच्या उच्च स्तराच्या मोहात आपण ती मूळ मूल्य कुठंतरी गमावून बसलो आहोत. सद्यपिढीत ही मूल्यं कुठंतरी ह्रदयात दडून असल्यानं अशा काही प्रसंगी हे शल्य बाहेर पडतं. पण पुढच्या एक दोन पिढीत ही मूल्यंच हृदयातुन गायब होतील का हे भय आहे. 

खंत कशा कशाची करावी? वेगानं वितळून गायब होण्याचं भय असणाऱ्या A23a ह्या हिमनगाची की अदृश्य होणाऱ्या मुल्यांची ! 
    

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

अग्रोवन सकाळ - २०२५ दिवाळी अंक


दोन वर्षांपूर्वी योगायोगानं सोशल मीडियावरून अमित गद्रे ह्यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या शेतीविषयक पोस्ट्स वाचणं हा एक आनंदाचा ठेवा असतो. ह्यावेळी त्यांनी मला अग्रोवन दिवाळी अंक खास पाठवून दिला आहे. मुंबईसारख्या शहरात बरंचसं वास्तव्य करत असताना प्रामुख्यानं महाराष्ट्रातील कृषीक्षेत्राविषयी आपण किती अज्ञान बाळगून आहोत ह्याविषयी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा दिवाळी अंक ! 

ह्या अंकाविषयी मला आवडलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषीक्षेत्रातील केवळ यशस्वी शेतकऱ्यांच्या कथांवर लक्ष केंद्रित न करता समाधानी शेतकऱ्यांच्या कथा प्रसिद्ध करण्यावर इथं प्राधान्य दिलेलं दिसतंय.  एका दिवाळी अंकात प्रेरणादायी असे किती लेख असू शकतात हे पाहून मी थक्क झालो आहो. हे सर्व लेख सविस्तर तर वाचीनच परंतु ह्या पोस्टद्वारे ह्या अंकातली काही मला भावलेली वाक्यं किंवा व्यक्तिमत्वं अगदी संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा माझा हा प्रयत्न !

'जीवन त्यांना कळलं हो!', 'सुखाचा शोध', 'हौशी शेतकरी', गवसली वाट समाधानाची' अशा समर्पक शीर्षकांमध्ये ह्या अंकातील लेखांची विभागणी केली गेली आहे. 
लौकिकार्थानं यशस्वी असं जीवन जगणारी माणसं प्रत्यक्षात कशी मनातून असमाधानी असू शकतात आणि काळ्या आईची अंतर्मनाला सदैव ऐकू येणारी  साद  एका क्षणी त्यांना कसा शहरी जीवनाचा त्याग करून निसर्गाच्या कायमच्या सानिध्यात घेऊन येते हे महारुद्र मंगनाळे ह्यांच्या प्रदीर्घ कहाणीतून दिसून येतं. ह्या मुलाखतीमधील सच्चेपणा मनाला भावतो. एखाद्या वर्षाचा अपवाद सोडला तर दरवर्षी शेतीत जी गुंतवणूक करतो तितके पैसे निघत नाहीत हे उघड सत्य त्यांनी सांगितलं आहे. पण त्याच वेळी शेती पूरक, निसर्गपूरक जीवनशैलीमुळं माझी तब्येत ठणठणीत आहे, औषधाचा खर्च नगण्य आहे हे मात्र ते आग्रहानं नमूद करतात. रासायनिक खतांचा वापर न करता पिकवलेली बारमाही फळे, घरच्या गाई - म्हशीचं ताजं दूध, भाजीपाला, रानभाज्या हे पैशापलीकडील सुख आपण अनुभवतो हे ते सांगतात. झाडं, पाखरं, सूर्य, चंद्र, चांदण्याच्या सोबतीनं मी जगतो असे ते म्हणतात. ह्या लेखाचा सारांश त्यांच्याच शब्दात सांगायचा झाला तर आनंददायी शेती करण्यासाठी आपलं पोट शेतीवर अवलंबून असायला नको! 

मिलिंद पाटील ह्यांचा लेख सुद्धा काहीसा ह्याच पठडीतला ! शेती माणसाला नेहमी बजावत असते की तुमच्या अमर्याद वखवखीला पुरेल एवढा प्रचंड पैसा तुम्हांला माझ्याकडून कधीच मिळणार नाही. पण त्याच्या बदल्यात मी तुमच्याकरता इतर काही गोष्टीतले अनमोल आनंद ठेवले आहेत, जे तुम्हांला पैसे मोजूनही कुठे मिळणार नाहीत. त्या आनंदाचं मेन्यूकार्ड शेती तुम्हांला दाखवत नाही, ती सुखं तुमची तुम्ही ओळखायची असतात. पावसाळ्यात, वादळवाऱ्यात विस्कळीत झालेलं जीवन, निष्प्राण झालेले हँडसेट पूर्ववत होण्यासाठी आठवडा जाऊ शकतो. पण घरी मागविलेलं पार्सल दहा मिनिटं जरी उशिरा आलं तर येणारा वैताग इथं ह्या आठवड्याभराच्या प्रतीक्षेत होत नाही. कारण जे आहे ते स्वीकारून सबुरीने घेण्याची कार्यशाळा इथं नेहमीच सुरु असते. अशी अनेक वाक्यं आपल्याला ह्या निसर्गाच्या सानिध्यातील जीवनाची समृद्धता जाणवून देत राहतात.  

पुढे कहाणी येते ती आयबी एम मधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन डहाणूला स्थायिक होऊन शेती करणाऱ्या अय्यर ह्यांची, मायक्रोसॉफ्ट मधून निवृत्ती घेऊन तरुण वयात शेतीकडं परतणाऱ्या विनोद यादव ह्यांची आणि अशाच अजून दोघा-तिघांची ! ह्या लेखाच्या शेवटी लक्षवेधक असं एक वाक्य. गणितातील समीकरणाची उकल करणारा एक्स त्या समीकरणाचा तोल राखतो. अगदी तसंच शेती, माती, आभाळ, पाणी ह्यांच्याशी मैत्रभावना जपताना आधी इमानेइतबारे विश्वासाचा एक्स मानावा लागतो. नंतर निष्ठेच्या पायऱ्या पार करता करता ह्या विश्वासाचं मोल बिनचूक मिळून येतं. ह्या वाक्याची उकल करण्याचा प्रयत्न मी करणार नाही. प्रत्येकानं आपापली उकल करावी! 

वानगीदाखल पहिल्या दोन लेखांविषयी थोडंसं लिहिलं. पूर्ण अंक असा प्रेरणादायी!  निसर्ग, परिसंस्थेसोबत कसं जोडून घ्यावं, बहुस्तरीय, बहुपीक रचना कशी स्वीकारावी ह्याविषयी मार्गदर्शन करणारा, शेतीत रमलेल्या डॉक्टरची गोष्ट सांगणारा ! प्रवरा खोऱ्यातील शेती संस्कृती बहुविध संकटांना तोंड देत आजही कशी टिकून आहे, त्यात निसर्गाचं आणि शेतकरी, पशुपालकांचं जैवसांस्कृतिक नातं कसा मोलाचा हातभार लावतं ह्याचा उलगडा करणारा! शेतकरी महिला आणि पुरुष मानस समजावून सांगणारा! शेतीतील जोखीम कमी करणाऱ्या शाश्वत शेतीचं माहात्म्य सोप्या भाषेत विशद करणारा! निसर्गाचं पूजन आणि वंदन ह्या तत्वांवर आधारित आदिवासांच्या निसर्गपूरक शेतीची कहाणी सांगणारा ! 

पुढे कहाण्या येतात त्या शेतीच्या माध्यमातून उन्नती साधणाऱ्या महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या ! इथं काही महत्वाचे मुद्दे जाणवतात. कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकोपा आणि शेतात एकत्र राबता, रासायनिक अवशेषमुक्त शेती, आरोग्यदायी अन्नाचा ध्यास, शेतीमालाची थेट विक्री, नेटके व्यवस्थापन, पीक विविधतेचे गणित, पशुपालनातून मिळणारे भांडवल, शिस्त आणि कष्ट ह्यातील सातत्य! शेतीचा समाधानकारक ताळेबंद ! काही आश्चर्यकारक सत्यं पुढे येतात जसे की आपल्या जनावरांना हिरवा चारा अधिकाधिक काळ मिळावा ह्या साठी डोंगरातील गुहेत वास्तव्य करणारं कुटुंब! पुढे  कृषी क्षेत्रात पदवी घेतलेल्या आणि यशस्वीरीत्या शेती करणाऱ्या दोन तरुण महिला शेतकऱ्यांच्या अगदी प्रेरणादायी कथा वाचायला मिळतात. 

संपूर्ण अंकाचा आढावा घेणं वेळेअभावी शक्य नाही! पण बऱ्याच काळानंतर काहीसं प्रेरणादायी असं वाचायला मिळालं ! असंही हल्ली चाळीस - पन्नाशीनंतर नोकरी टिकविताना अत्यंत तणावाला सामोरे जावं लागतं. अशा वेळी आपल्यातील सर्वांनी नाही पण तीस - चाळीस टक्के तरुणाईनं कृषी क्षेत्राची कास का धरू नये? ह्यासाठी आर्थिक, मानसिक तयारी कशी करावी? कितपत आर्थिक यशाची अपेक्षा धरावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा हा अंक! आपल्याभोवती आपल्याच राज्यात इतकं काही चांगलं घडतंय हे जाणवून देणारा हा अंक ! शक्य असेल तितक्या सर्वांनी विकत घेऊन वाचायलाच हवा ! अगदी ह्या क्षणी तुम्ही नोकरी सोडून शेतीकडं वळणार नसलात तरी ह्या विचारांचं बीज म्हणा अथवा खूळ म्हणा तुमच्या मनात रुजवण्याची नक्कीच ताकद असणारा हा अंक !

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

२०२५ सप्टेंबर अमेरिका भेट


कालच आटोपलेल्या अमेरिका भेटीचा छायाचित्राधारित संक्षिप्त वृतांत !

१४-९-२०२५ सकाळी १ वाजता 

लाउंजमध्ये कंटाळा आल्यानंतर गेटवर येऊन विमानाची वाट पाहत असताना मुसळधार पाऊस सुरु होता. अशा वेळी विमानात बसताना मन थोडं साशंक असतं. 


ब्रिटिश एअरवेजचे बाकी सगळं ठीक असलं तरी त्यांच्या काही विमानांमध्ये बिझनेस क्लासमधील  आसनरचना अगदी वैतागवाणी असते. आपण समोरच्या प्रवाशाच्या अगदी चेहऱ्याकडं निरखून पाहतो की काय असं वाटावं इतके आपण जवळ असतो. जेवणं वगैरे झाली की मधली काच वर येते, तोवर समोरचा प्रवासी आणि आपण ब्रिटिश एअरवेजच्या नावानं खडे फोडत असतो. 

ब्लॉगपोस्टच्या परंपरेनुसार जेवणाचं छायाचित्र! रविवार असल्यानं चिकनवर ताव मारायला हरकत नव्हती! 


लंडन यायला साधारणतः दीड तास वगैरे बाकी असताना आपल्याला नाश्ता दिला जातो. उड्डाण केल्यानंतर जेवण देतानाच एअरहोस्टेस (बहुदा हे पुरुष असतात) आपल्याला नाश्त्यासाठी तुम्हांला उठवायचं की नाही ह्याची खातरजमा करून घेतात.  खाण्यावर थोडं नियंत्रण ठेवावं असा निर्धार केल्यानं त्यातील फक्त फळं आणि स्वीट डिश घेतली. डिशमध्ये डावीकडे वर असलेला ब्रेड आणि त्याच्या बाजूला असलेले त्याचे सवंगडी बटर, जॅम मला नेहमीच खुणावत असतात.  सुरुवातीला नाही नाही म्हणत मी मग सुरी काट्यानं त्या ब्रेडचे तुकडे करून त्याला बटर, जॅमने चोपडून त्याचा आनंद घ्यायला पाहतो. मग कोणी पाहत नाही ना ह्याची खातरजमा करून मस्तपैकी हातानं तो ब्रेड आणि चहा ह्याचा आस्वाद घेतो.  विमानात, अमेरिकेत  सर्व काही थंडच मिळतं. सवय करून घ्यावी लागते. फळ, ब्रेड, चहा वगैरे एकत्र कसा घेऊ शकतोस असा प्रश्न विचारू नकात !


लंडन विमानतळ सुर्याच्या कोवळ्या किरणांनी न्हाऊन निघालं होतं. त्यात मी ही सामील झालो. टर्मिनल तीनकडे जायला फारच कमी प्रवाशी असल्यानं बस पुर्णपणे मोकळी असल्याचा अनुभव प्रथमच मिळाला !




विमानात इतकं भरपेट खाल्ल्यावर ब्रिटिश एअरवेजच्या लाउंजमध्ये बाकी काही खाण्याची इच्छा नसली तरी ही फळांचा आस्वाद घ्यायला हवाच. खूपच नैसर्गिक गोडवा असणारी ही फळं मला मनापासून आवडतात. महत्वाची कागदपत्रे असणाऱ्या आपल्या केबिन बॅग्स लाउंजमधील आपल्या सीटवर तशाच ठेऊन ही फळं आणायला जावं की नाही हा संभ्रम मला नेहमीच असतो.  हल्ली मी ह्या बाबतीत थोडा आत्मविश्वासपुर्ण झालो आहे हे मात्र खरे !





फिलाडेल्फिया इथं जाणाऱ्या विमानात खिडकीचे आसन मिळालं. शॅम्पेन हवं की संत्रारस ह्या प्रश्नात जिंकलेला संत्रारस आणि पाण्याची बाटली !


विमान जसजसं धावपट्टीकडे जायला लागलं तसं जगभरातील विविध खंडातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आणि अर्थातच मला दर्शन दिलं. 










लंडन इतकं व्यस्त विमानतळ आहे की धावपट्टीवर येण्यासाठी अनेक विमानं एकामागे एक अशी रांगेत उभी असतातच पण अजून काही विमानं दुसऱ्या दिशेनं सुद्धा धावपट्टीवर प्रवेश करण्यासाठी सज्ज असतात. अशा वेळी बहुदा वैमानिक एकमेकाला नजरेनंच पहले आप वगैरे खुणावत असावेत असा मला दाट संशय आहे. 

ह्या स्थितीत पाच मिनिटांपूर्वी आपल्या बाजुला उभं असणारं विमान आकाशात झेपावतानाचा क्षण आपल्याला डोळ्यात साठवता येतो. 


आकाशातुन दिसणारं लंडन शहराचं मनोहर दृश्य मला नेहमीच मोहात पाडते. 




पुन्हा एकदा भोजनाची तयारी! माझा आवडता साल्मन मासा! खूपच चविष्ट होता हा !





अमेरिका जवळ आल्यावर पुन्हा एकदा फळं आणि काहीसा अगम्य पदार्थ !


इतक्या आलिशान विमानातील हा कप्पा काम करत नव्हता. त्यात पारपत्र ठेवून मी आरामात झोपलो होतो. मग तो उघडेनासा झाला म्हणून मी काही वेळ चिंतेत पडलो होतो. हा प्रकार दुसऱ्या वेळा घडल्यानंतर मात्र मी योग्य काळजी घेतली ! थोड्या वेळानं माझ्या समोरच्या सीटवरील प्रवाशास सुद्धा हाच अनुभव आल्याचं तो एअरहोस्टेसला सांगत होता ते ऐकून मी मिश्किलपणे गालातल्या गालात हसलो !



स्थानिक वेळेनुसार बारा वाजून पन्नास वाजता विमान फिलाडेल्फिया विमानतळावर उतरलं. सगळं काही अगदी झटपट आटोपून सव्वादोनच्या आसपास मी माझ्या खोलीत प्रवेश केला. 

हॉटेलच्या परिसराच्या बाजूलाच संगम नावाचं भारतीय उपहारगृह सुरु झालं आहे. तिथं सहकाऱ्यांसोबत रात्रीचे जेवण केलं.   



परंपरेनुसार ह्या भेटीतही माझा भयंकर जेट लॅग ह्या भेटीतसुद्धा माझ्या सोबतीला राहिला. पुढील दहा दिवस रात्री एक - दोन वाजता जाग येत राहिली. 

सोमवार पंधरा संप्टेंबर - सकाळी बैठकीच्या खोलीत प्रवेश करून आलेली सुर्याची कोवळी किरणं !


सोमवारी सकाळी कार्यालयातील पहिल्या दिवशी खिडकीतून दिसणारी ही झाडं ! दुपारी वाऱ्यानं ह्याची पानं अगदी वेगानं गळत राहिली. माझा २००५ सालापासूनच मित्र प्रशांत परांजपे भेटायला आला. तेव्हा त्याला मी स्कॉलरशिप परीक्षेतील प्रश्नांसारखा  प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. समोरील झाडांवर दहा लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे शहात्तर पर्ण आहेत. सध्या ही पाने मिनिटाला दहा ह्या वेगानं गळत आहेत. मला प्रश्न पूर्ण न करण्याची संधी देता तो मनापासून हसत सुटला. 



नुकत्याच झालेल्या यशस्वी implementation च्या ख़ुशीप्रित्यर्थ  Timothy's Riverfront Grill - Wilmington, DE इथं सहकाऱ्यांसोबत आम्ही भोजन केलं. तिथून दिसणारं नदीचं दृश्य !




गुरुवारी कंपनीत आमच्या मोठ्या ग्रुपची सहल होती. तिथं विविध खेळ (क्रिकेट, बास्केटबॉल) आयोजित करण्यात आले होते. भारतीय जेवण सुद्धा होते. त्या सहलीचा आनंद घेऊन हॉटेलवर परतल्यावर आम्ही हॉटेलच्या मागे असणाऱ्या nature trail वर गेलो.  अत्यंत दाट झाडीनं व्याप्त हा परिसर होता !



शुक्रवारी रात्री एका सहकाऱ्याने त्याच्या घरी आम्हां सर्वांना भोजनासाठी बोलावलं होतं. तिथं गाणं, टेबलटेनिस वगैरेचा आनंद आम्ही घेतला. 


शनिवारी सकाळी प्रसन्न मुद्रेतील आदित्य ! शनिवार सकाळ अमिश लोकांच्या वसाहतीवरील लेख पूर्ण करण्यात व्यतित केली. 


दुपारी माझा बालवाडीपासूनचा मित्र अजय हटकर भेटायला आला. माझ्या प्रत्येक भेटीत तो बहुदा येतोच ! त्याच्या सोबत मी आमची वर्गमैत्रीण नंदा सूर्यवंशी हिच्याकडे गेलो. तिथं खूप गप्पा आणि मस्त अशा मिसळपाव, इडलीचा आनंद घेतला. त्या रस्त्यावरील एक मनोहारी दृश्य !


रविवारी हॉटेलभोवती फेरफटका मारत असताना अचानक बदकांचा एक समूह त्या तळ्यात उडत येऊन विसावला !


मुंबईत इतका पाऊस पडत होता म्हणून की काय इथंही पाऊस सुरु झाला होता.  सकाळी आम्ही नाश्ता घेतो तिथल्या त्या डायनींग हॉलबाहेरील जास्वदींची मनोहारी फुलं !




बावीस सप्टेंबरला आम्ही जर्सी सिटी इथल्या कार्यालयात ट्रेनने गेलो ! जाताना एमट्रेक ह्या रेल्वे कंपनीच्या सुप्रसिद्ध अशा acela ह्या वेगवान गाडीनं penn station newark इथं गेलो. येताना Northeast Regional Train ने येताना थोडा गोंधळ उडाला. मूळ गाडी ५:४४ वाजता येणार असताना अँपवर ५:४८ वाजता येणार असे सांगण्यात आलं. त्यामुळं आम्ही काहीसे बेफिकीर असताना ५:४६ वाजता गाडी आली. इंडिकेटर नाही किंवा उद्घोषणा नाही! आमची गाडी आमच्या डोळ्यासमोर निघून गेली. सुदैवानं कार्यालयात आमची बाजू मान्य करण्यात येऊन आम्हांला पुर्ण परतावा देण्यात आला. आम्ही मग उबेरने लांबवर प्रवास करून आलो. 



मंगळवारी रात्री एका सहकाऱ्याच्या घरी आम्ही नवरात्रीनिमित्त त्यानं आणि त्याच्या कुटुंबीयांनी मांडलेल्या गोलूचं मनोभावे दर्शन घेतलं. त्यांनी अत्यंत स्वादिष्ट असं इडली सांबर, खिचडी, वडे आणि खीर असे भोजन बनविले होते. 
 

नवरात्र असल्यानं सकाळचा नाश्ता आता मर्यादित पण आरोग्यपूर्ण अशा शाकाहारी पर्यायांनी युक्त होता. 


कार्यालयातील अंतिम दिवशी पुन्हा त्याच खिडकीतून फोटो काढला. दशलक्ष पानांपैकी दीड लक्ष वगैरे पानं गळाली असावीत. शरद ऋतूतील पानांचे रंग पूर्ण बहरात यायला अजून दोन तीन आठवड्यांचा अवधी होता.  


पुन्हा एकदा बॅग्स भरण्याचा सोपस्कार पार पडला! हॉटेलमध्ये मला मोठी रूम देण्यात आली होती. तिचं भाडं नेहमीच्या भाड्यापेक्षा खूपच जास्त होतं. मी ह्या मोठ्या खोलीची विनंती केली नव्हती असं सांगताच  लगेचच मला अधिकच्या भाड्याचा परतावा देण्यात आला. फिलाडेल्फिया विमानतळावरील छायाचित्रण !


सायंकाळी उड्डाण करण्याआधी विमानाच्या गवाक्षातून मावळतीच्या सूर्याचे टिपलेलं एक लोभस दृश्य !




आकाशात अत्यंत गूढ असं वातावरण होतं. करड्या रंगांच्या मेघांनी सर्व आसमंत व्यापून टाकला होता. 
 









ह्या सर्व करड्या रंगांच्या ढगात एक गूढ असं लाल रंगाचं विवर दिसत होतं. विमान त्या दिशेनं घेऊन जावं अशी वैमानिकाला विनंती करावी की काय असा मनात विचार येऊन गेला. 







नवरात्र असल्यानं शाकाहारी पर्याय तो ही अमेरिका इंग्लंड विमानात मिळेल ह्याची खात्री नव्हती. पण एअर होस्टेसने मेन कोर्समधील तिसरा पर्याय पुर्ण शाकाहारी असल्याची छातीठोकपणे खात्री दिल्यानंतर मी त्याचा आस्वाद घेतला.  तो खूपच चविष्ट असल्यानं तो खरोखरच शाकाहारी असावा की नाही ह्याविषयी मनात शंकेचे दाट ढग निर्माण झाले. 




इतक्या मनमोकळ्या छायाचित्रणामुळं एव्हाना भ्रमणध्वनीची बॅटरी तीस टक्क्यावर आल्यानं धोक्याची घंटा वाजवली गेली.  

पुन्हा एकदा लंडन आणि पुन्हा एकदा ती फ्रुट प्लेट ! ह्यावेळेस मात्र त्यांच्या साऊथ लाउंजला भेट दिली! 

उगाचच काढलेला फोटो !


पुन्हा एकदा ब्रिटिश एअरवेजची ती भयानक बैठक व्यवस्था ! ह्यावेळी मला खिडकीचे आसन असल्यानं मी चिंतामुक्त होतो. बॅटरी पंचवीस टक्क्यावर आल्यानं मर्यादित छायाचित्रण!  मी पुन्हा एकदा भ्रमणध्वनी रिचार्ज का केला नाही हा प्रश्न विचारू नकात!

मध्येच एकदा खिडकी उघडून पाहिली असता अगदी वैराण डोंगराळ भाग दिसला. लगेचच नकाशा उघडून आपण कुठं आलो आहोत ह्याची शहानिशा केली. 



काही वेळानंतर खूप दूरवर दिसलेली ढगांची रांग !


विमान वीस मिनिटं वेळेआधी मुंबईला उतरलं. इमिग्रेशन पर्यंत दीड किलोमीटर पर्यंतचे अंतर झपाट्यानं पार केलं. पहिल्या वीस बॅग्स मध्ये माझ्या दोन्ही बॅग्स आल्या. उतरल्यापासून दीड तासात घरात पाऊल टाकलं. 

दहा दिवसांत कार्यालयीन काम व्यवस्थित पार पडलं. सकाळी लवकर जात असल्यानं एकाग्रता अगदी वरच्या पातळीवर होती. अमेरिकेतील बदलत्या वातावरणाची झलक प्रवेश करताना इमिग्रेशन, कस्टमपासुनच जाणवली. इथला निसर्ग मोहवत राहिला. इथं येऊन सुद्धा केवळ भारतीय लोकांच्यातच मिसळून राहण्याची आपली मानसिकता खटकत राहिली.  बरीच कुटुंब भारतातील कुटुंबापेक्षा अधिक धार्मिक असल्याचं पुन्हा एकदा दिसलं. तिथं जन्मापासुन वाढलेली भारतीय मुलं त्यांच्याच वर्गात शिकण्यासाठी भारतातून आलेल्या मुलांशी दुजाभाव करतात हे ऐकून थक्क झालो. इथं लग्न करण्यासाठी २०० पाहुण्यांना बोलावून लग्न करण्याचा खर्च २००००० अमेरिकन डॉलर्स इतका असतो. बऱ्याच वेळा मुलं आणि पालक मिळून हा खर्च करतात.   

अमेरिकन प्रशासनानं व्हिसाच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळं निर्माण झालेली अस्वस्थता बऱ्याच खोलवर पर्यंत पोहोचल्याचं जाणवत राहिलं.  सद्य परिस्थितीत आर्थिक गणितांची मोठी जुळवाजुळव करून अमेरिकेला कायम वास्तव्य करण्याच्या हेतूनं खटाटोप करणे योग्य नव्हे ह्या निष्कर्षापर्यंत मी खूप आधीच येऊन पोहोचलो आहे, त्याला ह्या भेटीत दुजोरा मिळाला. शहरातील निसर्गाला किमान धक्का देत उभारलेली टुमदार घरं, तिथल्या प्रसन्न तरीही काहीशा भावाकुल बनविणाऱ्या सायंकाळी सारं काही पुन्हा एकदा आवडलं. आपल्याला निसर्गाचा थोडाही आदर का करता येत नाही हा यक्ष प्रश्न खूपच सलत राहिला.  कदाचित आपली अमेरिकेतील संख्या मर्यादित राखणं हाच योग्य निर्णय असावा ह्या धक्कादायक निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो ! रेल्वे तिकिटाचा परतावा असो की हॉटेलच्या खोलीच्या अधिकच्या भाड्याचा परतावा असो, जे काही नियमानुसार योग्य आहे ते तात्काळ करण्याची अमेरिकन माणसांची वृत्ती पुन्हा अनुभवली. सर्व काही आपल्याला भारतात बसुन सुद्धा शिकण्यासारखं !

बिबट्या माझा शेजारी

'कानन निवास'  ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्...