साधं सुधं!!
शनिवार, ६ डिसेंबर, २०२५
बिबट्या माझा शेजारी
शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५
आपण असे का ?? - जावा २५ - जावा २१ ते मनुष्य १५०.४ - मनुष्य ११६.१.४
साधं सुधंचा अगदी मोजका वाचकवर्ग आहे. पण त्यांच्या प्रतिक्रियेच्या सखोलपणामुळं समाधान मात्र भरभरून मिळतं. प्रतिक्रिया खरंतर मुळ पोस्टपेक्षा गहन असतात! 'सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !' वर सुद्धा अशाच काही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणाऱ्या सखोल प्रतिक्रिया आल्या. त्यातील आपल्या समाज जीवनातील शिस्तीच्या उणिवेची ही प्रतिक्रिया मनोमन पटली.
आपल्या समाजजीवनाच्या अधःपतनाला सामाजिक शिस्तीची उणीव मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे वाटते. आपण भारतीय (मनोवृत्तीचे) लोक शेकडो/हजारो वर्षे कोणत्यातरी राज्यकर्त्याची प्रजा म्हणूनच जगत आलोय. आपण नागरिक कधीच नव्हतो आणि नाही! नागरिक म्हटलं की सामाजिक जबाबदारी, स्वयंशिस्त आली, जी आपल्या रक्तात नाही. आपण बेशिस्त लोकांची झुंड आहोत निव्वळ!!नियम पाळण्यासाठी भारतीय मनोवृत्तीला धाक आवश्यक असतो! स्वतःहून कुणीच नियम पाळणार नाही! पण हेच भारतीय परदेशात सुतासारखे सरळ असतात, कारण तिथे तिथल्या कायद्याचा धाक असतो.
एकंदरीत समस्या गहन आहे, तिची मुळं आपल्या भुतकाळात दडलेली आहेत. आपण प्रत्येकजण आपल्याला वाटतं तितक्या स्वतंत्र पद्धतीनं विचार करत नसतो. आपल्या पुर्वजांची मानसिकता आपल्या विचारशक्तीचा एक अविभाज्य घटक बनलेली असते. ही मानसिकता आपल्या मागील पिढ्यांनी अनुभवलेली असुरक्षितता, अनुभव सर्व काही आपल्या स्वभावात भिनवते.
आपल्या पुर्वजांच्या दृष्टीनं आपला स्वार्थ बाजुला ठेवून समाजहितास प्राधान्य देणं हा अनुभव कधीच सुखदायक ठरला नाही.आपल्या मागील बऱ्याच पिढ्या सदैव रोजीरोटीच्या संघर्षाच्या मानसिकेत खोलवर दडल्या गेल्या होत्या. त्यामुळं समाजाच्या दृष्टीनं विचार करण्याची चैन त्यांना कधीच परवडली नव्हती. आता रोजीरोटीचा संघर्ष आपल्या लोकसंख्येच्या काही हिश्श्यासाठी संपला, पण समाजहिताला आपल्या विचारप्रक्रियेचा भाग बनविण्याचं जे काही शिक्षण त्यांना नागरिकशास्त्रात मिळालं ते शालेय जीवनाबरोबरच मागे ठेवून ते सामाजिक जीवनात वावरू लागले.
कोणत्याही आज्ञावलीच्या भाषेच्या आवृत्त्या ठराविक कालांतरानं प्रसिद्ध होत राहतात. सध्या जावा ह्या programming language ची सर्वात नवीन आवृत्ती Java 25 आहे, त्याआधी Java 21 होती. माहितीजालावर शोध घेतला तर ह्या प्रत्येक आवृत्तीत नक्की कोणते बदल झाले हे अगदी अचुकपणे सांगितलं जातं. प्रत्येक आवृत्तीत सकारात्मक सुधारणा होत राहतात.
कदाचित आपल्या मानवजातीचं सुद्धा असंच काहीतरी असावं. प्रत्येक खंडात आपल्या विविध आवृत्त्या एकाच कालावधीत नांदत आहेत. कदाचित आपल्या देशात ८०% जनता "मनुष्य ११६.१.४" आवृत्तीवर आहे तर १०% जनता "मनुष्य १२६.४" आवृत्तीवर आहे वगैरे वगैरे! विकसित देशात बहुदा "मनुष्य १५०.४" वगैरे आवृत्या अस्तित्वात असाव्यात. "मनुष्य १५०.४" आवृत्ती "मनुष्य १२६.४" आवृत्तीपेक्षा सर्वच बाबतीत सरस असे मी अजिबात म्हणत नाहीय. पण सामाजिक जीवनातील शिस्त पाळण्याच्या बाबतीत, निसर्गसंवर्धन करण्याबाबतीत मात्र ती नक्कीच विकसित आहे. ह्या आवृत्त्या धर्म, भाषा ह्याच्या पल्याड असतात.
मनुष्यांच्या ह्या विविध आवृत्या जेव्हा सामुहिक स्थलांतरांमुळं एकमेकांच्या नजीकच्या संपर्कात येतात, तेव्हा विविध शक्यता उद्भवतात. विकसित संस्कृतीची / आवृत्तीची सहिष्णुता आणि आधीच्या आवृत्तीची दांडगाई ह्यांचा संघर्ष होऊ शकतो किंवा पारशी लोकांच्या प्रसिद्ध कथेप्रमाणे ते साखरेप्रमाणे दुधात मिसळून जाऊ शकतात.
एकाच देशात मात्र जेव्हा विविध आवृत्त्या सहजीवन जगतात त्यावेळी मात्र सुसंस्कृत आवृत्तीची कुचंबणा होऊ शकते. केवळ लिखाण, संवाद ह्या माध्यमातून आपली खंत एकमेकांकडे व्यक्त करणे ह्यापलीकडे त्यांच्याकडं पर्याय नसतो. असो पुढील काही दिवसांत प्रत्येक आवृत्तीचे गुणधर्म सविस्तर लिहून नवीन पोस्ट लिहायचा मानस आहे! बघुयात कितपत जमतं ते !
गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५
जिव्हारी लागणारा पराभव ते मध्यान्हीच्या भोजनाची उचित वेळ !
हल्ली भारतीय संघांचे पराभव माझ्या जिव्हारी लागत नाही. मी असंवेदशील झालो की काय वगैरे गोष्टींवर चिंतन करायला मला सध्या वेळ नाही. सखोल अभ्यास करायला माझ्यासमोर बरेच कार्यालयीन विषय आहेत आणि ते मला पुरून उरताहेत ! असो जिव्हारी लागलेल्या पराभवांची यादी बनवायची झाली तर खालील पराभव डोळ्यासमोर येतात
१. शारजाह अंतिम सामना १९८६
२. भारत पाकिस्तान बंगलोर कसोटी सामना १९८७
३. भारत इंग्लंड रिलायन्स कप उपांत्य सामना वानखेडे १९८७
४.भारत श्रीलंका वर्ल्ड कप उपांत्य सामना कलकत्ता १९९६
५. भारत पाकिस्तान चेन्नई कसोटी सामना १९९९
मग माझ्या आयुष्यात एक संस्मरणीय क्षण आला. १९९९ सालच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ खराब कामगिरी करत असताना सायंकाळी सीप्ज़ बस स्थानकाबाहेर मी मित्रासोबत बसची वाट पाहत असताना तावातावानं भारतीय संघांतील खेळाडूंवर टीकेचे आसूड ओढत होतो. मी क्षणभराची उसंत घेतली तेव्हा ती संधी साधून मित्र म्हणाला, "आदित्य, तुझ्या जीवनातील आनंदासाठी तू अशा बाह्य घटकांवर इतका अवलंबून असशील तर ह्याचा अर्थ असा की तू तुझ्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात म्हणावा तसा गुंतलेला नाहीस आणि त्यात काही खास कामगिरी करत नाहीस !"
आपल्या जीवनातील अशा क्षणांचं महत्त्व समजायला आणि त्यातील संदेश अंगीवळणी पडायला कधी कधी वर्षे जातात. पण उशिरा का होईना त्यातील उपदेश आपण स्वीकारला तर आपलं भलं होतं. माझंही भलं झालं, म्हणजे माझा संताप होणं कमी होत गेलं. २००३ सालच्या वर्ल्ड कप मधील अंतिम फेरीतील पराभव, २००७ सालच्या वर्ल्ड कप मधील प्राथमिक फेरीत गारद होणे, २०१५ / २०१९ सालच्या वर्ल्ड कप मधील उपांत्य फेरीतील पराभव मी फारसे मनाला लावून घेतले नाहीत. पण राव १९ नोव्हेंबर २०२३ ने मात्र जबरदस्त चटका लावला. असो बाकी सर्व पराभवाच्या मी जून १९९९ मधील मित्राचा संदेश आठवून कार्यालयीन कामाकडं वळतो किंवा घरात उगाचच मदत करायचा प्रयत्न करतो.
असाच दुसरा संदेश माझ्या आईनं मला १९९८-९९ च्या सुमारास दिला होता. त्यावेळी मी सीप्ज़मधील ICH / Kaydees ह्या उपहारगृहात दुपारचे भोजन करायचो. वडिलांचा उल्लेख करून आई म्हणाली होती, "भाईंनी आयुष्यभर घरून जेवणाचा डब्बा नेला आहे! ह्या वयातही त्यांची तब्येत बघ !" हा संदेश सुद्धा अंमलात आणायला मला काही वर्षे गेली. पण तो स्वीकारला आणि खूप फरक पडला. पण पुन्हा आयुष्यात संदेह निर्माण झाला. कार्यालयात एक मित्र म्हणाला, "मला कामाचं खूप टेन्शन असलं की मी चमचमीत खातो, चिकन बिर्याणी मागवतो! ते माझं तणाव निवारक म्हणून काम करतं". मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. शनिवार / रविवार संध्याकाळी तणाव निवारक म्हणून नाही तर मूड (मनःस्थिती) सुधारक म्हणून आम्ही नूडल्स, मुर्ग मुस्स्लम वगैरे पदार्थ मागवतो. म्हणजे दहा - बारा जेवणं पडवळ, दुधी, गलका, शिराळा ह्या भाज्यांची (आईच्या शिकवणीमुळं) आणि बाकीची दोन - तीन जेवणं नूडल्स, मुर्ग मुस्स्लम ह्यांची - मूड बूस्टरच्या नावाखाली !
आता कार्यालयाची वेळ काहीशी वेगळी. म्हणून मी सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेतो. ह्या वाक्यात विसंगती ओतप्रोत भरली आहे. पण आयुष्यातील प्राधान्यक्रम आपल्याला कळायला हवा ! गरमागरम वरणभात,पडवळ, दुधी, गलका, शिराळा वगैरे आपल्या पोटात जावं असं आपल्याला वाटत असेल आणि तरीही कार्यालयाची मध्यान्हीची वेळ पाळायची असेल तर सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेता यायला हवं. जेवायला बसताना पोटाला समजावं लागतं की आज वीक डे आहे आणि हे दुपारचं जेवण आपण घेत आहोत ! बाकी रात्री सुद्धा ऑफिसात चपाती भाजी असा हलका आहार घ्यावा !
आता ह्या लेखातील दोन मुद्द्यांना जोडणारा दुवा म्हणजे गुवाहाटी सामन्यातील भारतीय संघांचा दारुण पराभव आणि प्रसारमाध्यमांनी उगाचच निष्पाप गौतम गंभीरवर उठवलेली टीकेची झोड! मुख्य कारण मला उमगलं आहे. तसा मी सर्वज्ञ वगैरे नसलो तरी बऱ्याच गोष्टी मला कळतात. तर सांगायची गोष्ट अशी की संपुर्ण भारतात एकच प्रमाणवेळ पाळायच्या अट्टाहासापायी ईशान्य भारतातील लोकांना साडेचार - पाच वाजता सूर्योदय पाहावा लागतो. बिचारा भारतीय संघ! त्यांना सकाळी नऊ वाजता सामना खेळायला मैदानावर यावं लागलं. त्याहून अधिक गंभीर गोष्ट म्हणजे दोन तासांच्या खेळानंतर अकरा वाजता त्यांना भोजनऐवजी चहा देण्यात आला. भोजनासाठी त्यांना एक वाजून वीस मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागली. इथंच सगळा गोंधळ झाला! मी जर सकाळच्या साडेदहा वाजता दुपारचे भोजन घेऊ शकतो तर त्यांना अकरा वाजता दुपारचं जेवण द्यायला काय हरकत होती? भले ते दुधी, पडवळ वगैरे भाजीचं का असेना! असो माझे सल्ले लोकं ऐकत नाहीत, नुकसान त्यांचंच आहे! त्यांना समज कधी येईल देव जाणे !
रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५
सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !
मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५
अग्रोवन सकाळ - २०२५ दिवाळी अंक
शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५
२०२५ सप्टेंबर अमेरिका भेट
बिबट्या माझा शेजारी
'कानन निवास' ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
पुस्तक प्रदर्शनात घेतलेल्या तीन पुस्तकांपैकी वि . स. खांडेकरांची अश्रू ही कादंबरी एक . कथा म्हणून बघितली तर साधी सुधी . एका आदर्श वादी श...
-
महाराष्ट्राला समाजसुधारकांची थोर परंपरा लाभली आहे. तत्कालीन महाराष्ट्रात ज्या लोकरुढींविषयी ह्या विचारवंतांना सुधारणा कराव्याशा वाटल्या त...











































































