मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

२०२५ - शिकवण


'२०२५ - आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा जरी चांगला लेख असला तरी छायाचित्रांनीच जास्त व्यापलेला होता अशी दिलखुलास प्रतिक्रिया मिळाली. तिचा स्वीकार करून २०२५ ने दिलेल्या काही शिकवणुकींची ही नोंद !

१.  मनुष्य निसर्गाचा झपाट्यानं ऱ्हास करत आहे, हे न पटणारी आपल्यासारखी अनेक माणसं भोवताली भेटतात. परंतु भोवतालच्या परिस्थितीवर अशा माणसांच्या मतांचा काहीच प्रभाव पडू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. मी २०१० साली ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी आपल्या लिखाणानं भोवतालच्या परिस्थितीत काही सकारात्मक बदल घडून येईल असा भोळा आशावाद बाळगुन होतो. हा आशावाद संपुन काही वर्षे झाली, पण ज्या मोजक्या लोकांना ही मतं वाचुन बरं वाटत राहतं त्यांच्यासाठी आणि माझ्या मानसिक समाधानासाठी माझं हे लिहिणं मी सुरु ठेवणार आहे. 

२. कार्यालयात भोवताली असणारी बुद्धिमान तरूण मुलं ही मला भवितव्याविषयी असणारा माझा आशावाद कायम ठेवायला प्रचंड मदत करतात. ही केवळ बुद्धिमानच असतात असं नव्हे तर आपल्या पद्धतीनं संस्कृतीची जपणुक करण्याचा प्रयत्न ह्यातील काहीजण करत असतात. भोवताली सकारात्मकता आहे फक्त तिचा शोध घेता यायला हवा. संस्कृतीची जपणुक केवळ आपल्याला अपेक्षित असलेल्या पद्धतीनंच केली जावी हा अट्टाहास चुकीचा! 

३. माझ्या मनाविरुद्ध काही घडलं की त्यातील काही वेळा माझी प्रतिक्रिया अगदी टोकाची असते असं मला सांगण्यात आलं. ही प्रतिक्रिया पाहण्याचं भाग्य केवळ जवळच्या लोकांना लाभतं. आता माझं हे मुळ स्वरूपातील स्वभाववैशिष्टय. ह्याला बदलण्याचा प्रयत्न मी कोणत्या टोकापर्यंत करावा ह्याचा सखोल विचार मी करत आहे. माझे मी पण मी हिरावुन घ्यावं का?  आपल्याला अप्रिय असणारी अशी घटना समोर घडणे ह्या क्षणापासुन आपली एक टोकाची प्रतिक्रिया बाहेर येणं ह्या क्षणापर्यंत आपल्या मेंदुत जे काही विचार येतात, त्यांचं विश्लेषण करून त्यावर आपण नियंत्रण मिळवु शकतो का असे ह्या अभ्यासाचं स्वरूप असु शकतं. 

४.  माझ्या लिखाणांत ऱ्हस्व-दीर्घाच्या असंख्य चुका असतात. ही बाब माझ्या ध्यानात गेले कित्येक वर्षे आणुन दिली जात आहे. मला शालेय जीवनात जे काही ऱ्हस्व-दीर्घाचे शिक्षण मिळालं ते ज्यात जतन करून ठेवलं होतं, त्या मेंदुच्या कप्प्यापर्यंत मी सध्या पोहोचु शकत नाही. भविष्यात मी व्यावसायिक जीवनापासुन निवृत्ती घेतल्यावर मेंदुला विश्रांती मिळाल्यानंतर पुन्हा ह्या कप्प्यापर्यँत मी कदाचित पोहोचु शकेन ह्याविषयी मी आशावादी आहे. 

५. "आदित्य तु स्वतःचे इतकं कठोर परीक्षण करू नकोस" असं मला सांगण्यात आलं. आपल्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची (नैतिक) जबाबदारी घेणं हे स्वभाववैशिष्टय काही प्रमाणात मी बहुदा दाखवलं असावं. ह्या स्वभाववैशिष्ट्याचा अभिमान वाटावा अशी छुपी भावना मी कदाचित बाळगुन असेन. पण ही अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट नाही, संघातील प्रत्येकाला आपल्या जबाबदारीची योग्य शब्दांत जाणीव करून देता यायला हवी. 

६. मध्यंतरी इतका व्यस्त कालावधी आला होता की कसोशीनं पुर्ण केलेला क्लिष्ट गोष्टींचा आनंद वाटुन घेण्याचीही उसंत नसे. केवळ पुर्ण न केलेल्या गोष्टींचं दडपण, झालेल्या छोट्यामोठ्या चुकांची खंत ह्याचा भावना प्रबळ होत असत. आघाडीची भुमिका बजावायची असेल तर नैराश्याला प्रयत्नपुर्वक दूर सारता येण्याची कला अवगत करायला हवी. तुम्ही जितके वरच्या पदावर जाता तितके तुम्ही एकटे बनता असं जरी म्हटलं तरी तुम्हांला घरी, कार्यालयात तुमची आधार परिसंस्था (सपोर्ट सिस्टिम) बनवता यायला हवी. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर दरवर्षी ह्या मुद्द्यावर तुम्हांला भरघोस गुंतवणुक करायलाच हवी. 

७. भोवताली उथळपणा ओसंडुन वाहु लागला आहे. बरेचसे चित्रपट, रील्स, मालिका ह्यातुन सखोल असे काही हाती लागत नाही. पण त्यातुनही काही मोजके चित्रपट, नाटकं, पुस्तकं ह्यात खूप काही शिकायला मिळतं. अशा सखोलपणाचा आपल्याला प्रभावीपणे शोध घेता यायला हवा. 

८. लोकांचं लक्ष वेधून घेत जीवन जगण्याची खुमखुमी दरवर्षी झपाट्यानं कमी करता यायला हवी. news on air ह्या अँपवरील रागम ह्या चोवीस तास सुरु असणाऱ्या वाहिनीने मला खूप मदत केली आहे. मेंदुला शांत ठेवण्यासाठी ह्या अँपवर सुरु असणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचा मला बराच उपयोग झाला. दीर्घकाळ तबला, सतार व इतर साधनांवर रियाज करणाऱ्या ह्या वादकांची तपस्या वाखाणण्याजोगीच ! त्यांची कलेविषयी श्रद्धा, वर्षोनुवर्षे त्यांनी घेतलेली मेहनत ही आपण घेऊ शकू का ? ह्या प्रश्नाचं उत्तर सदैव नकारात्मकच आलं. 

९. आपण ज्यावेळी आपल्याला न आवडणाऱ्या परिस्थितीत सापडतो त्यावेळी आपल्यासमोर पुढील पर्याय असतात. 
अ.    मोठ्या धैर्यानं, तयारीनिशी परिस्थितीचा ताबा घेऊन उपस्थित सर्वांना आपल्या मर्जीनुसार वागण्यास भाग पाडावे.  
ब.    पर्याय अ मध्ये उल्लेखलेलं धैर्य किंवा आवश्यक तयारी जर आपणांजवळ नसेल तर मेहनत घेऊन ते अंगी बाणवून पर्याय अ स्वीकारावा. 
क.    पर्याय अ आणि ब स्वीकारायची आपली तयारी नसेल तर शांतपणे त्या परिस्थितीत कमीत कमी नुकसान होऊन देत तग धरावा. चांगली वा वाईट कोणतीही परिस्थिती कायम राहत नाही त्यामुळं तग धरून राहणं हा सद्यःकाळात फार महत्वाचा गुणधर्म ठरत आहे. तग धरून राहताना संगीत मानापमान होत तर राहणारच ! त्याला पर्याय नाही !   

१०. आपल्या सर्वांप्रमाणं माझ्या जीवनात सुद्धा AI ने खळबळ माजवली आहे. त्याच्या संगतीनं पुढचा प्रवास करताना सखोल ज्ञानाची कास धरून आपलं स्थान अबाधित ठेवणं हा सर्वात मोठा धडा मला २०२५ ने दिला.  त्या अनुषंगानं ह्या पोस्टमध्ये घेतलेलं हे छायाचित्र ! आकर्षक छायाचित्र न देताही कितीजण खरोखर पोस्ट वाचण्यासाठी इथं येतात हे पाहण्याचा माझा हा प्रयत्न ! 

ह्या वर्षात अचानक हिरावुन घेतलेल्या प्रियजनांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करत ही पोस्ट आवरती घेतो ! 

सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

२०२५ आठवणींच्या हिंदोळ्यावर

दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की वर्तमानकाळाशी आपल्या भुमिकेसाठी सदैव सज्ज राहत भविष्यकाळाला सामोरे जाण्यासाठी गुंतवणूक करायची हा यक्ष प्रश्न! 

२०२५ वर्ष पहायला गेलं तर माझ्यासाठी मानवी मनाच्या आतील कंगोरे उलगडवून दाखविणारे ठरलं. 'केल्यानं देशांतर मनुजा येत शहाणपण'  ह्या म्हणीची सार्थता मला प्रत्येक दौऱ्यात येते. माझ्या बाबतीत शहाणपण म्हणण्यापेक्षा प्रत्येक दौरा माझं अज्ञानीपण थोडं थोडं कमी करत असतो. एक क्षण असा येतो की आपण स्वतःला आपल्या अज्ञानीपणासहित आत्मविश्वासानं स्वीकारतो, त्यानंतर सर्व काही रम्य भासु लागतं. 

फेब्रुवारी अमेरिका दौऱ्यात फिलाडेल्फिया विमानतळावरून डल्लासला जाताना विमानाचे चाक पंक्चर झाल्याची उद्घोषणा झाल्यानंतर चार तास भोवताली असलेल्या प्रवाशांचे वागणं हे मानवी स्वभावाच्या अभ्यासासाठी एक उत्तम संधी होती. काहीजण शांतपणे आपल्या कामात व्यग्र राहिले, तर काही जण बैचैन झाले. चार तासानंतर परत विमानात बसल्यावर देखील ज्यावेळी अर्धा तास विमान निघण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मात्र काही जण खरोखर बैचैन झाले. दोघा जणांनी तर विमानातुन उतरणे पसंत केले. मला ह्यावेळी नक्की काय वाटत होते हे मला नक्की सांगता येणार नाही. पण एकदा का तुम्ही एखादा व्यवसाय निवडला की त्या अनुषंगानं येणाऱ्या सर्व गोष्टी स्वीकाराव्या लागतात. जर तुमच्या व्यवसायामुळं तुम्हांला सतत प्रवास करावा लागणार असेल तर प्रत्येक वेळी विमानात बसताना तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकता कामा नये. 

मे महिन्यात मोजके दिवसच सुरु असलेल्या युद्धानं देखील आपल्या सर्वांना जीवनाच्या अशाश्वततेबद्दल पुन्हा एकदा जाणीव करून दिली. बढती मिळाली नाही, पगार कमी प्रमाणात वाढला, सेन्सेक्स गडगडला ह्या गोष्टींनी दुःखी होणारे आपण! ह्या सर्व गोष्टींना जीवनातील सर्वात मोठ्या सत्याच्या भिंगातून तपासून पाहावं, मग आपल्याला आपल्या विचारांचा फोलपणा जाणवुन येतो. 

पावसाळा वेळेआधी सुरु होऊन बराच काळ लांबला. निसर्ग आपल्याला स्पष्ट संदेश देत आहे. पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करत आपल्या अल्पकालीन स्वार्थासाठी जगण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैवानं आपल्या पुढील पिढीला त्याचे भयंकर दुष्परिणाम भोगावे लागतील.  महानगरातील आपली प्रशस्त घरं, गाड्या, शेअर बाजारातील गुंतवणुकी हे सारं सारं काही निसर्गाच्या प्रलयापुढं शून्य आहे. भारतातील समस्यांपासून दूर पळण्यासाठी परदेशी जाणं हा काही वर्षांपुर्वी योग्य असलेला पर्याय आपणच तिथं केलेल्या गर्दीमुळं आता फारसा योग्य ठरणारा राहिला नाही. 

ह्या वर्षातील माझ्या आयुष्यातील काही मोजकी छायाचित्रं !
 



भाईंदर खाडीवरून लोकल जातांना फोटो काढल्याशिवाय चैन न पडणारा मी ! 



घराभोवतालच्या अंगणात फिरताना आकाशातील ढगांची सुंदर नक्षी! 


आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान - पाटील कुटुंबीयांचा गावातील गणपती! बालपण पुन्हा नव्यानं आठवून देणारा हा गणपती !



अग्रोवन सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेला अमिश वसाहतीवरील माझा लेख! 


घराभोवतीच्या गोकर्णाचं फुल !



सप्टेंबर मधील अमेरिका फेरीनंतर परतताना उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात दिसलेलं लाल रंगांचं रहस्यमय विवर ! मला पळवुन नेण्यासाठी परग्रहवासी अंतरिक्षयान घेऊन नक्की येणार ह्याविषयी माझी नक्की खात्री झाली होती. X Files मालिका बघण्याचा हा परिणाम !


सप्टेंबर मधील अमेरिका फेरीत सहकाऱ्याच्या घरी नवरात्रात मांडलेला गोलु ! खरी श्रद्धाळू माणसं कोणत्याच सबबी पुढे करत नाहीत हा माझ्यासाठीचा संदेश ! 


अमेरिकेतील हॉटेलभोवतालची बदके ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 

                        अमेरिकेतील हॉटेलभोवतालच्या पाऊलवाटेवर भेटलेली ही रानफ़ळे  ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 




अमेरिकेतील हॉटेलभोवतालची पानगळ  ! निसर्ग हा निसर्ग असतो, त्याला सीमेची बंधनं नसतात! 





वसईत आढळणारा रानटी वेल ! त्याची फळं आम्ही क्रिकेटचा चेंडू म्हणून वापरलेली. वसईत ज्यांचं बालपण गेलं त्यांना नक्की आठवेल. 


कार्यालयातील नेत्रदीपक भोजन ! ह्यातील नक्षी किती आणि खरं ग्रहण करण्यासारखे खाद्यपदार्थ किती ह्याविषयी प्रचंड साशंक असणारा मी ! 


चार दिवस सासुचे चार दिवस सुनेचे !
एअर इंडिया विमानातुन विश्रांती घेत असलेल्या इंडिगो विमानाचं घेतलेलं छायाचित्र !




कार्यालयातील आसनावरून दिसणारा सुर्यास्त ! दक्षिणायन आणि उत्तरायण बरोबर समजावून सांगणारं माझं आसन !


मराठी भाषेची भोवताली सुरु असलेली अधोगती दाखवणारा हा T1 टर्मिनलवरील बोर्ड ! सोलापूरवरून आलेल्या विमानाची स्थिती "आलेली"

 

सुदैवानं ह्या आठवड्यात थंडी जोरदार पडलेली ! तेल गोठल्यावर उन्हात ठेवून ते वितळविणे ही माझ्या वडिलांची सवय! त्या आठवणीला उजाळा देताना !


अमेरिकेतील संजेशला वसईतल्या खऱ्याखुऱ्या नाश्त्याची चव मिळावी ह्यासाठी मेहनत घेऊन राकेश, वैभव ह्यांनी चार पाच हॉटेलातून आणलेले हे चविष्ट पदार्थ ! 

धन्यवाद २०२५ ! 

शनिवार, ६ डिसेंबर, २०२५

बिबट्या माझा शेजारी


'कानन निवास'  ह्या प्रसिद्ध सोसायटीचे सेक्रेटरी श्री. लेले दुपारी सोसायटीच्या कार्यालयातुन दुपारच्या भोजनासाठी आणि त्यानंतरच्या आपल्या हक्काच्या वामकुक्षीसाठी निघण्याच्या तयारीत होते. आजचा दिवस तसा शांत गेला होता.  तसंही जगभर काय अगदी आपल्या वॉर्डाच्या पलीकडील कोणत्याही बातमीनं त्रास करून घ्यायची लेले ह्यांना सवय नव्हती. त्यामुळं आपल्या शहरात बिबट्या फिरत असल्याच्या बातम्या येत असल्या तरीही तो आपल्या वॉर्डात फिरकणार नाही असा काहीसा त्यांना विश्वास होता. 

लेले आपल्या खुर्चीवरून उठणार तितक्यात 'गुर्रर्र गुर्रर्र' अशा खणखणीत आवाजानं त्यांना दचकवलं. बंद दरवाजा उघडून जसा राजबिंडा बिबट्या कार्यालयात प्रवेश करता झाला तसं लेले ह्यांना ब्रह्मांड आठवलं. आपण भ्रमणध्वनीवर फुकाचा वेळ न घालवता वेळीच घरी गेलो असतो तर हा दुर्धर प्रसंग आपल्यावर ओढवलाच नसता ह्या विचारानं ते प्रचंड अस्वस्थ झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिबट्याकडं सुद्धा स्मार्टफोन होता. बिबट्यानं तो चालू केला आणि कोणतंतरी अँप सुरु करून तो गुरकावला. "बसा लेले बसा! घाबरू नका !" स्मार्टफोननं बिबट्याचं म्हणणं लेलेंच्या भाषेत त्यांना सांगितलं. प्रसंगावधान राखून लेलेंनी सुद्धा "बिबट्याजी स्थानापन्न व्हा !" काही थंड वगैरे घेणार का?" अशा शब्दांत त्याचं स्वागत केलं.  

पुन्हा बिबट्या काहीसं स्मार्टफोनमध्ये पुटपुटला. "बिबट्याजी वगैरे काय? मी कोणी होतकरू नगरसेवक वगैरे वाटलो की काय तुम्हांला ?" स्मार्टफोनने बिबट्याच्या भावना लेलेंपर्यंत पोहोचवल्या. "आपण कसं काय येणं केलंत आम्हां गरीबाच्या घरी?" लेलेंचा मेंदू आता खुपच सक्रिय झाला होता. ते जे काही स्मार्टफोनमधील अँप आहे ते बिबट्याला आपल्या भावना चांगल्या प्रकारे पोहोचवत आहे ह्यावर त्यांचा प्रचंड विश्वास बसला होता. 

"मला तुमच्या सोसायटीत फ्लॅट भाड्यानं घ्यायचा आहे !" बिबट्या म्हणाला. "काय, काय म्हणालात? फ्लॅट भाड्यानं घ्यायचाय?" डोळे विस्फारून लेले म्हणाले. "त्यात काय वावगं आहे? आम्ही तुमच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करू?" "आम्ही म्हणजे .. ?" "मी आणि माझी पत्नी !" बिबट्या आत्मविश्वासानं म्हणाला. 

प्रकरण एकदम गंभीर होते. "सोसायटीची सभा बोलवावी लागेल, बहुमतानं जो काही निर्णय होईल तो मान्य करावा लागेल" लेलेंनी आपल्याकडचं प्रभावी शस्त्र बाहेर काढलं. लगेचच बिबट्याच्या चेहऱ्यावरील निर्माण झालेले क्रुद्ध भाव लेलेंनी हेरले. 'सर सलामत तो सभा पचास !" असं आपल्यासाठी म्हणीचे रूप बनवून त्यांनी झटपट सर्व रिकामी अर्ज बिबट्यासमोर मांडले. पुन्हा वैतागलेला बिबट्या पाहून त्यांनी स्वतःहूनच सर्व अर्ज जमतील तसे भरून टाकले. सोसायटीचं नांव पुन्हा पुन्हा त्यांच्या डोळ्यांत खुपत होतं. ह्या वेडपट स्मार्टफोनने काननचा अर्थ बिबट्याला सांगितला असावा म्हणुनच तो बाकीच्या चांगल्या चांगल्या सोसायट्या सोडून इथं कडमडला असावा ह्याविषयी त्यांची पक्की खात्री झाली.  दुपारी जेवणाला उशीर झाला म्हणून लेलेंना घरून सारखे फोन येत होते, ते त्यांनी अर्थातच घेतले नाहीत. तासाभरात सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले होते. लेले ह्यांनी सर्व काही धैर्य एकवटून आमच्या सोसायटीच्या सदस्यांच्या जीवाला काही धोका नाही ना असा प्रश्न विचारला. फ्लॅट मिळाल्यानं खुश झालेल्या बिबट्यानं मान डोलावत अजिबात नाही असं खुणेनं सांगितलं. "मी संध्याकाळी माझं सामान घेऊन शिफ्ट होतो" जाता जाता बिबट्या म्हणाला. बिबट्या गेला तसं लगेचच लेलेंनी आपल्यावर ओढवलेला अनावस्था प्रसंग व्हाट्सअँपच्या माध्यमातुन सर्व सोसायटीच्या सदस्यांना कळवला. लगेचच सर्वजण धावत कार्यालयात येतील अशी वेडी आशा लेले बाळगून होते. पण थोड्याच वेळात सर्वजण आपापल्या खिडक्यांतून लेलेंना धीर देण्यासाठी डोकावून पाहत असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं.  वॉचमननं बिबट्याला आत सोडलंच कसं? रजिस्टर मध्ये त्याची नोंद केली का? असे प्रश्न घेऊन लेले त्याच्याकडं गेले. बिचारा बेशुद्ध होऊन पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर पाण्याचे हबकारे मारल्यानंतर त्याला जागं केलं तर तो जीव मुठीत घेऊन पळून गेला. एव्हाना सोसायटीवर लोकांच्या कल्पनाशक्तीला मोकळं रान मिळालं होतं. लेलेंनी बिबट्याला म्हटलं, "बिबट्या फ्लॅट लेले !" वगैरे वगैरे विनोद लोक टाकत होते. इतक्यात लेलेंना घरून फोन आला. "त्या बिबट्याबरोबर गप्पा मारून झाल्या असतील जेवायला लवकर घरी या ! मी पुन्हा पुन्हा जेवण गरम करणार नाही ! " आज्ञाधारक लेले खाली मान घालून घरी परतले. चप्पल काढून घरात प्रवेश करत नाही तोच "पटकन जेऊन घ्या, ते टीव्ही चॅनेलवाले कधी पोहोचतील ह्याचा भरंवसा नाही. आणि हो त्यांना मुलाखत द्यायची असेल तर ती सोसायटीच्या ऑफिसमध्येच द्या. इथं इतक्या सगळ्या लोकांना चहा करायला दूध घरात नाही आणि कालच ते सर्व घर स्वच्छ पुसून घेतलंय ! बाकी मुलाखत देताना तो दिवाळीत नवीन शर्ट घेतला आहे तो घाला !"  स्वच्छ लादी, संपलेलं दूध आणि आपला जीव ह्यात नक्की प्राधान्यक्रम कसा लावायचा हे लेलेंना समजेनासं झालं. 

संध्याकाळी बिबट्या आणि त्याची सहचारिणी सदनिकेत शिफ्ट झाले. बिबट्या शिफ्ट होतोय म्हणजे नक्की काय करतो ह्याविषयी लेलेंना खूपच कुतूहल होते. "त्यात काय मोठा विचार करायचा? दोन तीन मारलेल्या प्राण्यांना तोंडात घेऊन येतील दोघं?" आत्मविश्वासानं त्यांची बायको म्हणाली. चार वाजता वॉचमन विना भकास वाटत असलेल्या प्रवेशद्वारातुन ते दोघं प्रवेश करते झाले तेव्हा आपल्या बायकोचा अंदाज इतका अचुक कसा काय ठरला हे पाहून लेलेंच्या मनात अभिमान, कौतुक, असूया वगैरे संमिश्र भावना उमटल्या. "मी तुम्हांला सांगितलं होतं ना !" हे वाक्य तिच्या नजरेद्वारे स्पष्टपणे सांगितलं जात होतं. 

महिनाभरानंतर 
कानन सोसायटी आणि लेले इंटरनेट सेलेब्रिटी झाले होते. बिबट्या आणि लेले, भ्रमणध्वनीच्या माध्यमातून व्यवस्थित बोलू शकत होते. आपण मॉर्निंग वॉकला एकत्र जाऊयात असं फ्लॅटमध्ये राहून कंटाळलेल्या बिबट्यानं कालच लेलेंना कळवलं होतं. पैसे कमवायची ही मोठी संधी आहे असं लेलेंचा मुलगा म्हणाला होता. बिबट्यासोबत एकत्र चालतानाचे रील्स बनवून इंटरनेट दणाणुन सोडुन टाकुयात असे तो म्हणाला. बाकी बिबट्याच्या चरितार्थाला सुद्धा मदत होईल असं काही करू असे तो म्हणाला. ह्या संवादाने प्रेरित होऊन  "आज खीर चांगली झाली आहे, ती बिबट्याच्या घरी घेऊन जाऊ का? " अशी लेलेंची सौ. त्यांना विचारत होती. 

लिमये, जोशी ह्यांचे कुत्रे घराबाहेर यायलाच तयार नव्हते. त्यामुळं त्यांच्या घरात भलत्याच समस्या उद्भवल्या होत्या. बिबटया स्मार्टफोनवरूनच चिकन, मटण मागवत असल्यानं त्याच्या फिटनेसच्या समस्या होऊ शकतील असे सौ. बिबट्या ह्यांना वाटत होते. बाकी चिकन, मटण घेऊन येणारे डिलिव्हरी माणसं पहिल्यांदा चुकून बिबट्याच्या फ्लॅटपर्यंत गेली होती, पण बिबट्यानं दार उघडताच त्यांची पळता भुई थोडी झाली होती. लेलेंनी वॉचमनची समजूत काढून त्याला परत कामावर बोलावलं होतं. आता तो बिबट्याच्या घरची सर्व डिलिव्हरी खालीच घेत असे. एकंदरीत लेलेंच्या रटाळ आयुष्यात अगदी धमाल सुरु झाली होती. 

बाकी फ्लॅटबाहेर चपला काढून ठेवल्या म्हणून बिबट्याला सोसायटीतर्फे पहिली नोटीस मिळाली. त्या चपलांचा हा तो फोटो !! 


शनिवार, २९ नोव्हेंबर, २०२५

आपण असे का ?? - जावा २५ - जावा २१ ते मनुष्य १५०.४ - मनुष्य ११६.१.४



साधं सुधंचा अगदी मोजका वाचकवर्ग आहे. पण त्यांच्या प्रतिक्रियेच्या सखोलपणामुळं समाधान मात्र भरभरून मिळतं. प्रतिक्रिया खरंतर मुळ पोस्टपेक्षा गहन असतात! 'सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !' वर सुद्धा अशाच काही आत्मपरीक्षण करायला भाग पाडणाऱ्या सखोल प्रतिक्रिया आल्या. त्यातील आपल्या समाज जीवनातील शिस्तीच्या उणिवेची ही प्रतिक्रिया मनोमन पटली. 

आपल्या समाजजीवनाच्या अधःपतनाला सामाजिक शिस्तीची उणीव मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे वाटते. आपण भारतीय (मनोवृत्तीचे) लोक शेकडो/हजारो वर्षे कोणत्यातरी राज्यकर्त्याची प्रजा म्हणूनच जगत आलोय. आपण नागरिक कधीच नव्हतो आणि नाही! नागरिक म्हटलं की सामाजिक जबाबदारी, स्वयंशिस्त आली, जी आपल्या रक्तात नाही. आपण बेशिस्त लोकांची झुंड आहोत निव्वळ!!नियम पाळण्यासाठी भारतीय मनोवृत्तीला धाक आवश्यक असतो! स्वतःहून कुणीच नियम पाळणार नाही! पण हेच भारतीय परदेशात सुतासारखे सरळ असतात, कारण तिथे तिथल्या कायद्याचा धाक असतो.

एकंदरीत समस्या गहन आहे, तिची मुळं आपल्या भुतकाळात दडलेली आहेत. आपण प्रत्येकजण आपल्याला वाटतं तितक्या स्वतंत्र पद्धतीनं विचार करत नसतो. आपल्या पुर्वजांची मानसिकता आपल्या विचारशक्तीचा एक अविभाज्य घटक बनलेली असते. ही मानसिकता आपल्या मागील पिढ्यांनी अनुभवलेली असुरक्षितता, अनुभव सर्व काही आपल्या स्वभावात भिनवते. 

आपल्या पुर्वजांच्या दृष्टीनं आपला स्वार्थ बाजुला ठेवून समाजहितास प्राधान्य देणं हा अनुभव कधीच सुखदायक ठरला नाही.आपल्या मागील बऱ्याच पिढ्या सदैव रोजीरोटीच्या संघर्षाच्या मानसिकेत खोलवर दडल्या गेल्या होत्या. त्यामुळं समाजाच्या दृष्टीनं विचार करण्याची चैन त्यांना कधीच परवडली नव्हती. आता रोजीरोटीचा संघर्ष आपल्या लोकसंख्येच्या काही हिश्श्यासाठी संपला, पण समाजहिताला आपल्या विचारप्रक्रियेचा भाग बनविण्याचं जे काही शिक्षण त्यांना नागरिकशास्त्रात मिळालं ते शालेय जीवनाबरोबरच मागे ठेवून ते सामाजिक जीवनात वावरू लागले. 

कोणत्याही आज्ञावलीच्या भाषेच्या आवृत्त्या ठराविक कालांतरानं प्रसिद्ध होत राहतात. सध्या जावा ह्या programming language ची सर्वात नवीन आवृत्ती Java 25 आहे, त्याआधी Java 21 होती. माहितीजालावर शोध घेतला तर ह्या प्रत्येक आवृत्तीत नक्की कोणते बदल झाले हे अगदी अचुकपणे सांगितलं जातं. प्रत्येक आवृत्तीत सकारात्मक सुधारणा होत राहतात. 

कदाचित आपल्या मानवजातीचं सुद्धा असंच काहीतरी असावं. प्रत्येक खंडात आपल्या विविध आवृत्त्या एकाच कालावधीत नांदत आहेत. कदाचित आपल्या  देशात ८०% जनता "मनुष्य ११६.१.४" आवृत्तीवर आहे तर १०% जनता "मनुष्य १२६.४" आवृत्तीवर आहे वगैरे वगैरे! विकसित देशात बहुदा "मनुष्य १५०.४" वगैरे आवृत्या अस्तित्वात असाव्यात. "मनुष्य १५०.४" आवृत्ती "मनुष्य १२६.४" आवृत्तीपेक्षा सर्वच बाबतीत सरस असे मी अजिबात म्हणत नाहीय. पण सामाजिक जीवनातील शिस्त पाळण्याच्या बाबतीत, निसर्गसंवर्धन करण्याबाबतीत मात्र ती नक्कीच विकसित आहे. ह्या आवृत्त्या धर्म, भाषा ह्याच्या पल्याड असतात. 

मनुष्यांच्या ह्या विविध आवृत्या जेव्हा सामुहिक स्थलांतरांमुळं एकमेकांच्या नजीकच्या संपर्कात येतात, तेव्हा विविध शक्यता उद्भवतात. विकसित संस्कृतीची / आवृत्तीची सहिष्णुता आणि आधीच्या आवृत्तीची दांडगाई ह्यांचा संघर्ष होऊ शकतो किंवा पारशी लोकांच्या प्रसिद्ध कथेप्रमाणे ते साखरेप्रमाणे दुधात मिसळून जाऊ शकतात. 

एकाच देशात मात्र जेव्हा विविध आवृत्त्या सहजीवन जगतात त्यावेळी मात्र सुसंस्कृत आवृत्तीची कुचंबणा होऊ शकते. केवळ लिखाण, संवाद ह्या माध्यमातून आपली खंत एकमेकांकडे व्यक्त करणे ह्यापलीकडे त्यांच्याकडं पर्याय नसतो. असो पुढील काही दिवसांत प्रत्येक आवृत्तीचे गुणधर्म सविस्तर लिहून नवीन पोस्ट लिहायचा मानस आहे! बघुयात कितपत जमतं ते ! 

गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०२५

जिव्हारी लागणारा पराभव ते मध्यान्हीच्या भोजनाची उचित वेळ !



हल्ली भारतीय संघांचे पराभव माझ्या जिव्हारी लागत नाही. मी असंवेदशील झालो की काय वगैरे गोष्टींवर चिंतन करायला मला सध्या वेळ नाही. सखोल अभ्यास करायला माझ्यासमोर बरेच कार्यालयीन विषय आहेत आणि ते मला पुरून उरताहेत ! असो जिव्हारी लागलेल्या पराभवांची यादी बनवायची झाली तर खालील पराभव डोळ्यासमोर येतात 

१. शारजाह अंतिम सामना १९८६

२. भारत पाकिस्तान बंगलोर कसोटी सामना १९८७

३. भारत इंग्लंड रिलायन्स कप उपांत्य सामना वानखेडे १९८७ 

४.भारत श्रीलंका वर्ल्ड कप उपांत्य सामना कलकत्ता १९९६ 

५. भारत पाकिस्तान चेन्नई कसोटी सामना १९९९

मग माझ्या आयुष्यात एक संस्मरणीय क्षण आला. १९९९ सालच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ खराब कामगिरी करत असताना सायंकाळी सीप्ज़ बस स्थानकाबाहेर मी मित्रासोबत बसची वाट पाहत असताना तावातावानं भारतीय संघांतील खेळाडूंवर टीकेचे आसूड ओढत होतो. मी क्षणभराची उसंत घेतली तेव्हा ती संधी साधून मित्र म्हणाला, "आदित्य, तुझ्या जीवनातील आनंदासाठी तू अशा बाह्य घटकांवर इतका अवलंबून असशील तर ह्याचा अर्थ असा की तू तुझ्या वैयक्तिक, व्यावसायिक जीवनात म्हणावा तसा गुंतलेला नाहीस आणि त्यात काही खास कामगिरी करत नाहीस !" 

आपल्या जीवनातील अशा क्षणांचं महत्त्व समजायला आणि त्यातील संदेश अंगीवळणी पडायला कधी कधी वर्षे जातात. पण उशिरा का होईना त्यातील उपदेश आपण स्वीकारला तर आपलं भलं होतं. माझंही भलं झालं, म्हणजे माझा संताप होणं कमी होत गेलं. २००३ सालच्या वर्ल्ड कप मधील अंतिम फेरीतील पराभव, २००७ सालच्या वर्ल्ड कप मधील प्राथमिक  फेरीत गारद होणे, २०१५ / २०१९ सालच्या वर्ल्ड कप मधील उपांत्य फेरीतील पराभव मी फारसे मनाला लावून घेतले नाहीत. पण राव १९ नोव्हेंबर २०२३ ने मात्र जबरदस्त चटका लावला. असो बाकी सर्व पराभवाच्या मी जून १९९९ मधील मित्राचा संदेश आठवून कार्यालयीन कामाकडं वळतो किंवा घरात उगाचच मदत करायचा प्रयत्न करतो. 

असाच दुसरा संदेश माझ्या आईनं मला १९९८-९९ च्या सुमारास दिला होता. त्यावेळी मी सीप्ज़मधील ICH / Kaydees ह्या उपहारगृहात दुपारचे भोजन करायचो. वडिलांचा उल्लेख करून आई म्हणाली होती, "भाईंनी आयुष्यभर घरून जेवणाचा डब्बा नेला आहे! ह्या वयातही त्यांची तब्येत बघ !" हा संदेश सुद्धा अंमलात आणायला मला काही वर्षे गेली. पण तो स्वीकारला आणि खूप फरक पडला. पण पुन्हा आयुष्यात संदेह निर्माण झाला. कार्यालयात एक मित्र म्हणाला, "मला कामाचं खूप टेन्शन असलं की मी चमचमीत खातो, चिकन बिर्याणी मागवतो! ते माझं तणाव निवारक म्हणून काम करतं".  मला एक नवीन दृष्टिकोन मिळाला. शनिवार / रविवार संध्याकाळी तणाव निवारक म्हणून नाही तर मूड (मनःस्थिती) सुधारक म्हणून आम्ही नूडल्स, मुर्ग मुस्स्लम वगैरे पदार्थ मागवतो. म्हणजे दहा - बारा जेवणं पडवळ, दुधी, गलका, शिराळा ह्या भाज्यांची (आईच्या शिकवणीमुळं) आणि बाकीची दोन - तीन जेवणं नूडल्स, मुर्ग मुस्स्लम ह्यांची - मूड बूस्टरच्या नावाखाली ! 

आता कार्यालयाची वेळ काहीशी वेगळी. म्हणून मी सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेतो. ह्या वाक्यात विसंगती ओतप्रोत भरली आहे. पण आयुष्यातील प्राधान्यक्रम आपल्याला कळायला हवा ! गरमागरम वरणभात,पडवळ, दुधी, गलका, शिराळा वगैरे आपल्या पोटात जावं असं आपल्याला वाटत असेल आणि तरीही कार्यालयाची मध्यान्हीची वेळ पाळायची असेल तर सकाळी साडेदहा वाजता दुपारचं जेवण घेता यायला हवं. जेवायला बसताना पोटाला समजावं लागतं की आज वीक डे आहे आणि हे दुपारचं जेवण आपण घेत आहोत ! बाकी रात्री सुद्धा ऑफिसात चपाती भाजी असा हलका आहार घ्यावा !

आता ह्या लेखातील दोन मुद्द्यांना जोडणारा दुवा म्हणजे गुवाहाटी सामन्यातील भारतीय संघांचा दारुण पराभव आणि प्रसारमाध्यमांनी उगाचच निष्पाप गौतम गंभीरवर उठवलेली टीकेची झोड! मुख्य कारण मला उमगलं आहे. तसा मी सर्वज्ञ वगैरे नसलो तरी बऱ्याच गोष्टी मला कळतात. तर सांगायची गोष्ट अशी की संपुर्ण भारतात एकच प्रमाणवेळ पाळायच्या अट्टाहासापायी ईशान्य भारतातील लोकांना साडेचार - पाच वाजता सूर्योदय पाहावा लागतो. बिचारा भारतीय संघ! त्यांना सकाळी नऊ वाजता सामना खेळायला मैदानावर यावं लागलं. त्याहून अधिक गंभीर गोष्ट म्हणजे दोन तासांच्या खेळानंतर अकरा वाजता त्यांना भोजनऐवजी चहा देण्यात आला. भोजनासाठी त्यांना एक वाजून वीस मिनिटांपर्यंत वाट पाहावी लागली. इथंच सगळा गोंधळ झाला! मी जर सकाळच्या साडेदहा वाजता दुपारचे भोजन घेऊ शकतो तर त्यांना अकरा वाजता दुपारचं जेवण द्यायला काय हरकत होती?  भले ते दुधी, पडवळ वगैरे भाजीचं का असेना!  असो माझे सल्ले लोकं ऐकत नाहीत, नुकसान त्यांचंच आहे! त्यांना समज कधी येईल देव जाणे ! 

रविवार, २३ नोव्हेंबर, २०२५

सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात !





सदैव अस्तित्वात असणारा जगातील विरोधाभास दिवसेंदिवस नवनवीन उंची गाठत असावा. एकीकडे ट्रिलियन डॉलर्स वार्षिक उत्पन्न असणारी व्यक्ती ह्या भुतलावर अस्तित्वात आहे, तर दुसऱ्या टोकाला ज्यांच्या पुढील अनेक पिढयांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागणार आहे अशी माणसं सुद्धा इथं नेटानं जीवन जगत आहेत. वर्णपटाच्या ह्या दोन टोकांमध्ये सुखदुःखाच्या तळ्यात मळ्यात खेळ खेळणारे आपण सामान्य ! 

ज्याला कोणतीही व्याधी नाही तो सुखी माणुस ही व्याख्या बहुतांशी भागात त्रिकालाबाधित राहणार आहे असा माझा समज होता. पण जगात घडणाऱ्या घटना पाहिल्या, ऐकल्या की ह्या समजुतीला तडा जातो. नायजेरियात ३०० हुन अधिक मुलांचं अपहरण केल्यानं शाळा बंद ठेवाव्या लागल्या आहेत. आपण कुठं जन्माला येतो हे आपल्या हाती नसतं पण त्यामुळं इतका जमीनअस्मानाचा फरक पडतो हे जाणून घ्यायला हवं. दिवसेंदिवस हवामान बेभरंवशाचं होणार आहे. शहरी नागरिकांना त्याचा फारसा फरक पडत नाही, एखाद्या दिवशी कदाचित अचानक आलेल्या पावसात भिजावं लागणं, किंवा पाणी साचल्यामुळं कारमध्ये अडकून बसायला लागणं अशी काहीशी आपल्या समस्यांची व्याप्ती असु शकते. पण ह्या अकाली पावसामुळं ज्यांची हाताला आलेली पिकं वाया जाण्याच्या घटना सातत्यानं घडू लागल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी कोणाच्या तोंडाकडं पाहावं ? खेड्यातील तरुणांना लग्न जमविण्याच्या समस्या येऊ लागल्यानं त्यांनी गेल्या काही महिन्यात राजकीय नेत्यांना पत्र लिहिण्याच्या घटना सातत्यानं प्रसिद्ध होत आहेत. आज महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत आलेला लेख ह्या समस्येच्या विविध कंगोऱ्यांचा वेध घेतो.  ही खरी तर मोठी समस्या आहे पण आपल्या भोवतालच्या उथळ विषयांच्या गोंधळात ह्यावर चर्चा होतच नाही. 

एक समाज म्हणून निःशंकपणे आपण उथळपणाची कास धरली आहे. यु ट्यूबवरील रील्स पाहणे हे ह्या उथळपणाच्या वर्णपटाचं एक टोक तर दुसरीकडं कसोटी सामन्यात पाहुण्या संघाला नामोहरम करण्यासाठी आखाडेरुपी खेळपट्टी बनविणं हे दुसरं टोक! शांतपणे घरात बसून गहन विषयावरील ग्रंथांचं पठण करून विद्येची आराधना करणारा युवक सापडणे अपेक्षित नसलं तरीही केवळ लक्ष वेधुन घेण्यासाठी बहुतेक वेळा संस्कारांचा त्याग करून रील्स बनविणं हे एक पतन आणि अशी रील्स पाहत वेळ घालवुन आपल्या मेंदूला त्याच्या सम्यक स्थितीपासून खाली खेचणं हे दुसऱ्या प्रकारचं पतन! 

आपल्याभोवताली निर्माण होणारं ध्वनी प्रदुषण हा एक अजून चर्चेला घेण्यासारखा विषय!  आपल्या भोवतालच्या लोकांना त्रास होतोय ह्याची जाणीव एक तर ह्या जोरानं फटाके वाजविणाऱ्या, वाजत गाजत मिरवणूक नेणाऱ्या, मेट्रोत जोरानं बोलणाऱ्या / संगीत वाजविणाऱ्या अथवा ध्वनिवर्धकाचा वापर करून कार्यक्रम करणाऱ्या लोकांना नसावी अथवा त्याची पर्वा ते करत नसावेत. एक समाज म्हणून आपण नक्कीच मुजोर बनत चाललो आहोत का हा प्रश्न मला भेडसावत आहे. 

आता मी हा केवळ प्रश्न उपस्थित करत आहे. ह्यावर दीर्घ विचारमंथन करावं अशी आशा करावी ही सुद्धा परिस्थिती उरली नाही. सखोल विश्लेषण करण्याची क्षमता, मानसिकता आपण गमावून बसलो आहोत. आपल्याला हवे आहेत ते तात्काळ परिणाम ! 

लेखात समाविष्ट केलेली चित्रं गेल्या आठवड्यातील एका बैठकीनंतर आयोजित केलेल्या जेवणातील काही पदार्थांची.  पदार्थांचा सादरीकरण स्तर निर्विवादपणे उच्च, चवही छान! सर्वांनी त्या पदार्थांचं तोंडभरून कौतुक केलं. मला कुठंतरी चुकल्यासारखं वाटत होतं. तिथुन बाहेर पडल्यावर दोघं सहकारी म्हणालं, सगळं काही ठीक पण दाल मखनी, चावल, सब्जी ह्यानं जे समाधान मिळतं ते ह्यात नाही. मला जाणवणारी वरणभाताची उणीव अजून कोणाला तरी जाणवली ह्यात मला खूपच समाधान मिळालं. 

आपल्या शहरी जीवनाचं असंच काही झालं आहे नाही का? सादरीकरणाच्या उच्च स्तराच्या मोहात आपण ती मूळ मूल्य कुठंतरी गमावून बसलो आहोत. सद्यपिढीत ही मूल्यं कुठंतरी ह्रदयात दडून असल्यानं अशा काही प्रसंगी हे शल्य बाहेर पडतं. पण पुढच्या एक दोन पिढीत ही मूल्यंच हृदयातुन गायब होतील का हे भय आहे. 

खंत कशा कशाची करावी? वेगानं वितळून गायब होण्याचं भय असणाऱ्या A23a ह्या हिमनगाची की अदृश्य होणाऱ्या मुल्यांची ! 
    

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

अग्रोवन सकाळ - २०२५ दिवाळी अंक


दोन वर्षांपूर्वी योगायोगानं सोशल मीडियावरून अमित गद्रे ह्यांच्या संपर्कात आलो. त्यांच्या शेतीविषयक पोस्ट्स वाचणं हा एक आनंदाचा ठेवा असतो. ह्यावेळी त्यांनी मला अग्रोवन दिवाळी अंक खास पाठवून दिला आहे. मुंबईसारख्या शहरात बरंचसं वास्तव्य करत असताना प्रामुख्यानं महाराष्ट्रातील कृषीक्षेत्राविषयी आपण किती अज्ञान बाळगून आहोत ह्याविषयी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा दिवाळी अंक ! 

ह्या अंकाविषयी मला आवडलेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृषीक्षेत्रातील केवळ यशस्वी शेतकऱ्यांच्या कथांवर लक्ष केंद्रित न करता समाधानी शेतकऱ्यांच्या कथा प्रसिद्ध करण्यावर इथं प्राधान्य दिलेलं दिसतंय.  एका दिवाळी अंकात प्रेरणादायी असे किती लेख असू शकतात हे पाहून मी थक्क झालो आहो. हे सर्व लेख सविस्तर तर वाचीनच परंतु ह्या पोस्टद्वारे ह्या अंकातली काही मला भावलेली वाक्यं किंवा व्यक्तिमत्वं अगदी संक्षिप्त स्वरूपात तुमच्यासमोर आणण्याचा माझा हा प्रयत्न !

'जीवन त्यांना कळलं हो!', 'सुखाचा शोध', 'हौशी शेतकरी', गवसली वाट समाधानाची' अशा समर्पक शीर्षकांमध्ये ह्या अंकातील लेखांची विभागणी केली गेली आहे. 
लौकिकार्थानं यशस्वी असं जीवन जगणारी माणसं प्रत्यक्षात कशी मनातून असमाधानी असू शकतात आणि काळ्या आईची अंतर्मनाला सदैव ऐकू येणारी  साद  एका क्षणी त्यांना कसा शहरी जीवनाचा त्याग करून निसर्गाच्या कायमच्या सानिध्यात घेऊन येते हे महारुद्र मंगनाळे ह्यांच्या प्रदीर्घ कहाणीतून दिसून येतं. ह्या मुलाखतीमधील सच्चेपणा मनाला भावतो. एखाद्या वर्षाचा अपवाद सोडला तर दरवर्षी शेतीत जी गुंतवणूक करतो तितके पैसे निघत नाहीत हे उघड सत्य त्यांनी सांगितलं आहे. पण त्याच वेळी शेती पूरक, निसर्गपूरक जीवनशैलीमुळं माझी तब्येत ठणठणीत आहे, औषधाचा खर्च नगण्य आहे हे मात्र ते आग्रहानं नमूद करतात. रासायनिक खतांचा वापर न करता पिकवलेली बारमाही फळे, घरच्या गाई - म्हशीचं ताजं दूध, भाजीपाला, रानभाज्या हे पैशापलीकडील सुख आपण अनुभवतो हे ते सांगतात. झाडं, पाखरं, सूर्य, चंद्र, चांदण्याच्या सोबतीनं मी जगतो असे ते म्हणतात. ह्या लेखाचा सारांश त्यांच्याच शब्दात सांगायचा झाला तर आनंददायी शेती करण्यासाठी आपलं पोट शेतीवर अवलंबून असायला नको! 

मिलिंद पाटील ह्यांचा लेख सुद्धा काहीसा ह्याच पठडीतला ! शेती माणसाला नेहमी बजावत असते की तुमच्या अमर्याद वखवखीला पुरेल एवढा प्रचंड पैसा तुम्हांला माझ्याकडून कधीच मिळणार नाही. पण त्याच्या बदल्यात मी तुमच्याकरता इतर काही गोष्टीतले अनमोल आनंद ठेवले आहेत, जे तुम्हांला पैसे मोजूनही कुठे मिळणार नाहीत. त्या आनंदाचं मेन्यूकार्ड शेती तुम्हांला दाखवत नाही, ती सुखं तुमची तुम्ही ओळखायची असतात. पावसाळ्यात, वादळवाऱ्यात विस्कळीत झालेलं जीवन, निष्प्राण झालेले हँडसेट पूर्ववत होण्यासाठी आठवडा जाऊ शकतो. पण घरी मागविलेलं पार्सल दहा मिनिटं जरी उशिरा आलं तर येणारा वैताग इथं ह्या आठवड्याभराच्या प्रतीक्षेत होत नाही. कारण जे आहे ते स्वीकारून सबुरीने घेण्याची कार्यशाळा इथं नेहमीच सुरु असते. अशी अनेक वाक्यं आपल्याला ह्या निसर्गाच्या सानिध्यातील जीवनाची समृद्धता जाणवून देत राहतात.  

पुढे कहाणी येते ती आयबी एम मधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन डहाणूला स्थायिक होऊन शेती करणाऱ्या अय्यर ह्यांची, मायक्रोसॉफ्ट मधून निवृत्ती घेऊन तरुण वयात शेतीकडं परतणाऱ्या विनोद यादव ह्यांची आणि अशाच अजून दोघा-तिघांची ! ह्या लेखाच्या शेवटी लक्षवेधक असं एक वाक्य. गणितातील समीकरणाची उकल करणारा एक्स त्या समीकरणाचा तोल राखतो. अगदी तसंच शेती, माती, आभाळ, पाणी ह्यांच्याशी मैत्रभावना जपताना आधी इमानेइतबारे विश्वासाचा एक्स मानावा लागतो. नंतर निष्ठेच्या पायऱ्या पार करता करता ह्या विश्वासाचं मोल बिनचूक मिळून येतं. ह्या वाक्याची उकल करण्याचा प्रयत्न मी करणार नाही. प्रत्येकानं आपापली उकल करावी! 

वानगीदाखल पहिल्या दोन लेखांविषयी थोडंसं लिहिलं. पूर्ण अंक असा प्रेरणादायी!  निसर्ग, परिसंस्थेसोबत कसं जोडून घ्यावं, बहुस्तरीय, बहुपीक रचना कशी स्वीकारावी ह्याविषयी मार्गदर्शन करणारा, शेतीत रमलेल्या डॉक्टरची गोष्ट सांगणारा ! प्रवरा खोऱ्यातील शेती संस्कृती बहुविध संकटांना तोंड देत आजही कशी टिकून आहे, त्यात निसर्गाचं आणि शेतकरी, पशुपालकांचं जैवसांस्कृतिक नातं कसा मोलाचा हातभार लावतं ह्याचा उलगडा करणारा! शेतकरी महिला आणि पुरुष मानस समजावून सांगणारा! शेतीतील जोखीम कमी करणाऱ्या शाश्वत शेतीचं माहात्म्य सोप्या भाषेत विशद करणारा! निसर्गाचं पूजन आणि वंदन ह्या तत्वांवर आधारित आदिवासांच्या निसर्गपूरक शेतीची कहाणी सांगणारा ! 

पुढे कहाण्या येतात त्या शेतीच्या माध्यमातून उन्नती साधणाऱ्या महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या ! इथं काही महत्वाचे मुद्दे जाणवतात. कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकोपा आणि शेतात एकत्र राबता, रासायनिक अवशेषमुक्त शेती, आरोग्यदायी अन्नाचा ध्यास, शेतीमालाची थेट विक्री, नेटके व्यवस्थापन, पीक विविधतेचे गणित, पशुपालनातून मिळणारे भांडवल, शिस्त आणि कष्ट ह्यातील सातत्य! शेतीचा समाधानकारक ताळेबंद ! काही आश्चर्यकारक सत्यं पुढे येतात जसे की आपल्या जनावरांना हिरवा चारा अधिकाधिक काळ मिळावा ह्या साठी डोंगरातील गुहेत वास्तव्य करणारं कुटुंब! पुढे  कृषी क्षेत्रात पदवी घेतलेल्या आणि यशस्वीरीत्या शेती करणाऱ्या दोन तरुण महिला शेतकऱ्यांच्या अगदी प्रेरणादायी कथा वाचायला मिळतात. 

संपूर्ण अंकाचा आढावा घेणं वेळेअभावी शक्य नाही! पण बऱ्याच काळानंतर काहीसं प्रेरणादायी असं वाचायला मिळालं ! असंही हल्ली चाळीस - पन्नाशीनंतर नोकरी टिकविताना अत्यंत तणावाला सामोरे जावं लागतं. अशा वेळी आपल्यातील सर्वांनी नाही पण तीस - चाळीस टक्के तरुणाईनं कृषी क्षेत्राची कास का धरू नये? ह्यासाठी आर्थिक, मानसिक तयारी कशी करावी? कितपत आर्थिक यशाची अपेक्षा धरावी अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देणारा हा अंक! आपल्याभोवती आपल्याच राज्यात इतकं काही चांगलं घडतंय हे जाणवून देणारा हा अंक ! शक्य असेल तितक्या सर्वांनी विकत घेऊन वाचायलाच हवा ! अगदी ह्या क्षणी तुम्ही नोकरी सोडून शेतीकडं वळणार नसलात तरी ह्या विचारांचं बीज म्हणा अथवा खूळ म्हणा तुमच्या मनात रुजवण्याची नक्कीच ताकद असणारा हा अंक !

२०२५ - शिकवण

'२०२५ - आठवणींच्या हिंदोळ्यावर' हा जरी चांगला लेख असला तरी छायाचित्रांनीच जास्त व्यापलेला होता अशी दिलखुलास प्रतिक्रिया मिळाली. तिचा...