मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

गहरा पानी


स्वस्वीकृत मानसिकता 

९ वर्षांपुर्वी ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती त्यावेळी मी एक आदर्शवादी मनोधारणा बाळगुन होतो. ब्लॉग लिहुन कुठंतरी समाजात चांगलं परिवर्तन होईल अशी ही मनोधारणा होती. कदाचित त्यावेळी माझा समाजात वावर कमी होता. तसा तो आताही कमीच आहे. परंतु जो काही वाढला त्यावरुन एक गोष्ट उमजुन आली. लोकांची मानसिकता बदलणं ब्लॉगद्वारे साध्य होणं शक्य नाही. ही मानसिकता कशानं बदलु शकते हे ज्याला कोणाला समजलं तो धन्य ! अर्थात मानसिकता बदलायची गरज आहे तरी काय हाही एक मोठा प्रश्न आहे. पुर्वी संस्कृती टिकविण्यासाठी  धडपड करण्याची जी मानसिकता होती तिचं प्रथम आर्थिक स्थैर्य मिळविण्याच्या मानसिकतेत परिवर्तन झालं. आर्थिक स्थैर्य हा काहीसा दुय्यम मुद्दा झाल्यावर सध्या काहीशी स्वस्वीकृत मानसिकता झाली आहे. मला समाजाकडुन ठराविक वेळानं काहीतरी acceptance मिळायला हवं अशी ही स्वस्वीकृत मानसिकता ! ह्या स्वस्वीकृत मानसिकतेच्या पल्याड अनेक मंडळी आहेत, ज्यांना अशा वारंवारच्या स्वीकृतीची गरज भासत नाही. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा?

उच्चवर्गात समाविष्ट होण्याची मानसिकता  

आपल्या देशात आपण घराबाहेर पडलो की आपल्याला प्रचंड गर्दीचा मुकाबला करावा लागतो. ह्या गर्दीमुळं आपल्या मनात अदृश्य तणाव निर्माण होतो. आपण ऑफिसात, शाळाकॉलेजात वेळेवर पोहोचु की नाही हा निर्माण होणारा तणाव एका पातळीवरचा! परंतु ह्या गर्दीमुळं निर्माण होणारा दुसरा तणाव म्हणजे जीवनातील प्रत्येक गोष्ट मिळविण्यासाठी आपल्याला ह्या सर्वांशी मुकाबला करावा लागणार ही काहीशी छुपी भावना आपल्या मनात निर्माण होते. ह्या सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं आपण स्वतः आणि आपल्या कुटूंबियांनी येनकेनप्रकारे जावं अशी जिद्द आपण नकळत मनात बाळगु लागतो.
ह्यातही बराच वर्ग असा असतो जो गर्दीपासुन वेगळा राहण्यासाठी म्हणुन शांत गावांची निवड करतो, एक अनुभवसमृद्ध जीवन जगतो. पण आठवड्यातील ५० तास कार्यालयीन कामात, काही काळ सोशल मीडियावर व्यतित करणाऱ्या माझा अशा लोकांशी संपर्क येणार कसा? 

आता सर्वसामान्य लोकांच्या पलीकडं जाण्याचे काही मार्ग म्हणजे राजकारणी , उद्योगपती बनणे, अभ्यासाद्वारे प्रगती करणे वगैरे वगैरे. ह्यातील पहिल्या दोन मार्गांशी माझा बादरायण संबंध नाही. तिसऱ्याशी काही प्रमाणात असावा. परत एकदा आपल्याला भोवताली दिसणाऱ्या गर्दीचा आणि अभ्यासाद्वारे पुढे जाऊ पाहणाऱ्या आपल्या मानसिकतेचा काही संबंध आहे का हे आपण पाहुयात! 
हल्ली शिक्षणक्षेत्रात competition खुप वाढली आहे हे मराठी माणसाच्या आवडीच्या आघाडीच्या वाक्यांपैकी एक असावं. आजच्या पोस्टला गाभा वगैरे नाही. ही मिसळपाव पोस्ट आहे. तरीही जर काही गाभा असला तो हा इथं पुढच्या परिच्छेदात आहे.
काही दिवसांपुर्वी मी बारावीचे Integrated क्लास घेणाऱ्या एका आघाडीच्या संस्थेच्या शाखाप्रमुखाला भेटलो. त्यानं काही महत्वाची वाक्यं मला सांगितली. 

१) खोलवर पाण्यात जाऊन कोणी बुडत नाही, उथळ पाण्यातच बहुतेक जण बुडतात. IIT Advanced परीक्षेचे विश्लेषण करणारी जी संस्था आहे तिच्या विश्लेषणानुसार त्या परीक्षेतील ५० -६० % टक्के भाग तुम्हांला वर्षभराच्या नियमित सरावाच्या आधारे सहजरित्या सोडविता यायला हवा. असं असलं तरी मोजक्या विद्यार्थ्यांनाच ह्या परीक्षेत ५० -६० % आणि त्यावर टक्के मिळविता येतात. तो म्हणाला कारण सोपं आहे, बहुतांशी मुलं सोप्या प्रश्नांच्या उत्तरातच चुका करतात

२) आता इथं महत्वाचा मुद्दा म्हणजे सोपा आणि कठीण प्रश्न कोणता हे आपल्याला ओळखता यायला हवं ! कठीण प्रश्न ओळखुन अशा परीक्षांमध्ये त्या प्रश्नांपासुन दूर राहता यायला हवं हे आम्ही मुलांना शिकवतो असे तो म्हणाला! 

३) मुलांनी परीक्षेत भावनाविरहित स्थितीत राहणं शिकावं असं तो म्हणाला. सोपा प्रश्न दिसला आणि आपण अगदी उत्साहित झालो की चुका होण्याची शक्यता वाढीस लागते त्यामुळं भावनाविरहित स्थिती महत्त्वाची !
आता गर्दीच्या / Competition च्या  मुद्द्याशी आणि वरील ३ मुद्द्यांशी सांगड घालण्याचा प्रयत्न करुयात. वरील ३ मुद्दे हे हल्ली काही प्रमाणात दुर्मिळ होत चाललेल्या स्थिर मानसिकतेशी निगडीत आहेत. तुमची Competition बाहेरील वाढलेल्या लोकसंख्येशी अजिबात नाही, ती आहे तुमचं मन स्थिर ठेवण्याच्या तुमच्या क्षमतेला अबाधित ठेवण्याशी !
हा मुद्दा मला केवळ शिक्षणक्षेत्रातच नव्हे तर व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा बऱ्याच प्रमाणात जाणवतो. तुमच्या व्यावसायिक कौशल्यांच्या इतकीच तुमची नियमितता, स्मरणशक्ती, लोकांशी व्यवस्थित बोलण्याची कला, प्रत्येकाला त्याच्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन देण्याची संधी उपलब्ध करुन देणं ह्या सर्व घटकांवर तुमचं यश अवलंबुन असतं. हे सर्व घटक तुम्हांला कुठून मिळतात, तर लहानपणी तुमच्यावर झालेल्या संस्कारांतुन ! तर मुलांना योग्य बोर्डातून, कॉलेजातुन शिक्षण देण्यासोबत संस्कार द्यायला विसरु नका !



बऱ्याच वेळा होतं त्याप्रमाणं पोस्टचा आणि फोटोचा संबंध नाही !!


सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

बारावीच्या पाल्यांची तणावाची स्थिती !



अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीनं अकरावी-बारावी या इयत्तेमध्ये कोणत्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घ्यावा याबाबतीत बहुतांशी पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. मला जी काही माहिती मिळाली आहे ती माहिती मी इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला ही माहिती माझे कंपनीतील सहकारी आणि माझा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्र राहुल ह्यांनी दिली आहे. त्यांचे मनःपुर्वक आभार! 

सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे की सद्यकालीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे तीन प्रकारात आपण वर्गीकरण करु शकतो.  
१) पहिला प्रकार म्हणजे VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.  यातील बहुतांशी विद्यालय सीईटी ह्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश देतात. सीईटी परीक्षा २०० गुणांची असुन ती एकच प्रवेशपरीक्षा असते

या सर्व प्रकारात बारावीच्या एचएससी बोर्डाच्या परीक्षेचे माहात्म्य कमी होत असलं तरी ह्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हांला किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये!  

या विद्यालयांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काहीशी वेगळी तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. 

३) तिसरा प्रकार आयआयटीच्या प्रवेश परीक्षा! 

आयआयटीच्या प्रवेश परीक्षा दोन पातळीवर घेण्यात येतात. आयआयटी मेन्स या परीक्षेद्वारे प्रथम पात्रता फेरी घेण्यात येऊन त्याद्वारे आयआयटी ॲडव्हान्स या परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. आयआयटी मेन्स या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी मिळते.  जानेवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यात ही परीक्षा घेण्यात येऊन ह्या दोघातील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाते. या परीक्षेत गुणांची विशिष्ट पातळी पार केल्यास तुम्हाला आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेला बसता येतं.  परीक्षेतील संपूर्ण भारतातील तुमच्या क्रमांकानुसार तुम्हाला कोणत्या आयआयटीमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश मिळतो हे ठरवले जाऊ शकते.  सर्व आयआयटीचे प्रथम पसंतीची  आयआयटी / द्वितीय पसंतीची आयआयटी असे काहीसे अलिखित वर्गीकरण आढळुन येतं.  विद्यार्थ्यांचा काही विशिष्ट आयआयटी निवडण्याकडे कल दिसून येतो जसे की मुंबईची आयआयटी सर्व भारतभर प्रसिद्ध आहे! एखाद्या प्रसिद्ध नसलेल्या आयटीमध्ये प्रथम पसंतीची नसलेली शाखा घेण्यापेक्षा VJTI /SPIT मध्ये प्रथम पसंतीची शाखा निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो. 

यामध्ये अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे जर  तुमचा मुलगा मुलगी सीबीएससी बोर्डामध्ये दहावीपर्यंत शिकत असेल तर अकरावी बारावी मध्ये सुद्धा हेच बोर्ड चालू ठेवायचे की एचएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या अकरावी बारावी या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? सध्या बऱ्याच ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्क्यांची अट घालण्यात आल्यानं तुलनेनं सोप्या असलेल्या HSC बोर्डात प्रवेश घेण्याकडं विद्यार्थ्यांचा कल दिसुन येतो.  

आता महत्त्वाचा मुद्दा!! म्हणजे या तीन प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाल्याला मदत करू शकेल किंवा त्याची शक्यता वाढवू शकेल असा नक्की कोणता क्लास आहे ज्यात आपण प्रवेश घ्यायला हवा !

सुरवात करूयात वर उल्लेखलेल्या तिसऱ्या प्रकाराकडे
ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पेस, Allen, Resonance हे शिकवणी वर्ग नक्कीच उत्तम मानले जातात.  यातील Allen, Resonance हे शिकवणी वर्गांच्या कोटा शहरात मुख्य शाखा आहेत आणि मुंबई शहरात त्यांच्या इतर शाखा आहेत. या तिन्ही शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला त्यांच्या फीमध्ये सवलत मिळू शकते. असं म्हटलं जातं की जर तुम्ही यातील कोणत्याही एका शिकवणी वर्गाच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि ते तुम्ही ती गुणपत्रिका घेऊन तुम्ही बाकीच्या क्लासेसकडे गेलात तर त्या गुणांच्या आधारे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सवलत मिळू शकते! लक्षात येण्यासारखा अजून एक प्रकार म्हणजे हे सर्व शिकवणी वर्ग एकमेकांचे चांगले शिक्षक पळवण्याच्या मागे लागलेले असतात असे ऐकिवात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा मानस दृढ असतो त्यांच्यासाठी हे वरील तीन शिकवणी वर्ग उत्तम होत!!

आय आय टी ऍडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्याची तयारी करणे हे काहीसे मानसिक तणावाचे कारण बनू शकतं! आणि यामुळेच साधारणतः अकरावीच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही विद्यार्थ्यांचा निर्णय बदलून ते बाकीच्या दोन पर्यायांच्या दृष्टीने तयारी करू लागतात. अशा वेळी मात्र जर तुम्ही त्यावरील तीन शिकवणी वर्गात जात असाल तर मात्र काहीशी बिकट परिस्थिती होऊ शकते. कारण या शिकवणी वर्गांचे लक्ष आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेकडे असते आणि तुम्हाला ह्या क्षणी मात्र या क्लिष्ट अभ्यासक्रमांमध्ये तिळमात्र रस नसतो. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये! जर तुम्ही सुरुवातीपासून बिट्स पिलानी अथवा व्ही आय टी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय ठरवला असेल तर तुम्ही प्रामुख्याने या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेऊ शकता! इथं प्रवेश घेतल्यास आय आय टी ऍडव्हान्सच्या क्लिष्ट अभ्यासक्रमावर लक्ष देण्याचे तुमचे श्रम वाचू शकतात! 

३) VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.
ज्याप्रमाणे या दोन संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणारे खास असे प्रवेश वर्ग आहेत त्याचप्रमाणे सीईटीसाठी खास प्रवेश तयारी करून घेणारे शिकवणी वर्ग आहेत हे बहुदा सायन्स परिवार यासारख्या शिकवणी वर्गांचा समावेश होतो. 

आपल्या मुलाची क्षमता किती आहे आणि त्या क्षमतेनुसार त्याच्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल हे आपल्याला आधीपासुन कळायला हवं असंच सर्व पालकांना वाटत असतं. परंतु हे माहिती करुन घेण्यासाठी खात्रीलायक असा मार्ग नाही. त्यामुळं सर्वजण सर्वात महत्वाकांक्षी पर्यायाची म्हणजेच IIT Advanced ची तयारी करुन घेणाऱ्या शिकवणी वर्गांची निवड करतात. हे क्लास घेणारे सुद्धा स्वतःचा फायदा नजरेसमोर ठेऊन तुमच्या मुलाच्या खऱ्या क्षमतेचं चित्र केव्हाही तुम्हांला सांगत नाही. साधारणतः एका वर्षांनी वगैरे आपल्याला IIT Advanced झेपणार नाही हे उमजुन चुकलेली अनेक उदाहरणं मी ऐकली आहेत. परंतु ह्यावेळी तुमचे परतीचे सर्व मार्ग कापले गेलेले असतात. त्यामुळं भावनाविवश न होता आपल्या मुलांच्या क्षमतेचं वस्तुनिष्ठ परीक्षण करुन मगच योग्य पर्याय निवडावा !

बाकी ह्या सर्व बारावीला असणाऱ्या मुलांना इतक्या तणावातून आपण का जायला भाग पाडत आहोत? स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाची परीक्षा आणि IIT प्रवेशासाठी IIT च्या परीक्षा असा सोपा मार्ग का अवलंबु नये? अगदीच झालं तर स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाच्या परीक्षेसोबत तुम्हांला IIT मेन्स विचारात घेता येईल. जेणेकरून मुलांची एका अधिकच्या प्रवेशपरिक्षेतुन (CET) सुटका होईल. 

इथं दोन बाबी जाणवतात. पहिली म्हणजे आपण शिक्षणक्षेत्राचा बाजार मांडला आहे. पालकांकडुन अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचे ह्या प्रवेशपरीक्षा हे एक साधन बनले आहे. दुसरी बाब म्हणजे आयुष्य अधिकाधिक क्लिष्ट बनविण्यात आपला कोणी हात धरु शकणार नाही !


मी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीचे क्लासेस ही पोस्ट लिहिली होती. त्याच पोस्टमध्ये थोडा बदल करुन आज ही पोस्ट लिहत आहे. 



शनिवार, २८ सप्टेंबर, २०१९

लेट गो ते मायेचे पंख !


बहुदा "लेट गो" हा आजच्या जीवनांचा मुलमंत्र असावा! कार्यालय अथवा कार्यालयाबाहेरील आपले वैयक्तिक, सार्वजनिक जीवन असो! हल्ली अप्रत्यक्ष संघर्षाचे प्रसंग वारंवार येत असतात. हल्ली कोणी थेट वाद घालत नाही. मोजक्या शब्दांतुन कटु संदेश दिला जाणं, महत्त्वाच्या बैठकी, समारंभ, चर्चा ह्यातुन वगळलं जाणं किंवा आपल्या उपस्थितीची दखल घेतली न जाणं अशा प्रसंगांना बऱ्याच वेळी जनांना तोंड द्यावे लागते. दुनियेत हल्ली वाचाळ अर्थात Loud जनांचे प्रमाण वाढत चालले आहे.  आपलं अस्तित्व जाणवुन देण्यासाठी अशा मोठ्यानं आरडाओरडा करण्याच्या संस्कृतीचा प्रसार वेगानं होऊ लागला आहे. 

बहुतांशी संवेदनशील माणसे अशा अनुभवामुळे एकतर निराश होतात किंवा काही प्रमाणात खचुन जातात. या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी त्यांना एक तर काही काळ जाऊ देण्याची किंवा कोणाच्या मानसिक आधाराची गरज लागते.  प्रत्येक वेळी अशा प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काळ जाऊन देणे शक्य होत नाही. कारण अशा अप्रिय प्रसंगांची आणि आपली भेट वारंवार होत असते.  त्यामुळे आपल्याला मानसिक आधार देऊ शकेल अशा व्यक्तीची आपल्याला बऱ्याच वेळा गरज भासत असते. 

पुढील काळात लोकांशी केवळ बोलून त्यांना मानसिक आधार देणाऱ्या व्यक्तींना खूपच मागणी येईल असं मला वाटतं! मुळ मुद्द्याकडे परत वळूयात!  इथं बहुदा आपल्या या संवेदनशील स्वभावाकडं आत्मपरीक्षणाच्या नजरेतुन पाहणं इष्ट! आपल्याला कोणी काही बोललं तर त्याचा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत विचार करावा, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत त्याला उत्तर देण्यात आपली शक्ती खर्च करावी. त्यापलीकडे आपण डेटा पॉईंट तत्व लक्षात घ्यावे. 

आपल्या आयुष्यात असंख्य डेटा पॉईंट असतात. ह्यातील काही कार्यालयात, काही वैयक्तिक जीवनात आणि काही तुमच्या दररोजच्या प्रवासात येतात. यातील प्रत्येक डेटा पॉईंटमध्ये तुम्हाला विजय मिळवणं शक्य नसतं. त्यामुळे एखाद्या डेटा पॉईंटमध्ये तुम्हांला जर काहीसा अप्रिय अनुभव येत असेल तर त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनातील आपल्या विषयीच्या प्रतिमेला तडा जाऊ देऊ नये.  इथे हमखास आपल्या मनातील आपली ही प्रतिमा उंचावता येईल येईल असा एखादा डेटा पॉईंट निवडावा, स्वतःला चांगल्या मनस्थितीत आणावं आणि आयुष्यात पुढं जावं! नाहीतर इतक्या संघर्षपूर्ण जीवनामध्ये तुम्हांला सतत मानसिक त्रास सहन करावा लागेल. 

आता हे झालं सध्याच्या पिढीचे! पुढच्या पिढीचं कसं होणार याबाबतीत मात्र काहीशी चिंताजनक अशी परिस्थिती आहे. या पिढीची त्यांच्या मनामधील स्वप्रतिमा कशी आहे याविषयी बरंच संशोधन व्हायला हवं! या नवीन पिढीतील बऱ्याच मुलांच्या मनात स्वतःच्या एका अवास्तव प्रतिमेचं भुत शिरलेलं असतं. ही आभासी प्रतिमा त्यांनी आणि कदाचित त्यांच्या पालकांनी बनवून ठेवलेली असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षात या आभासी प्रतिमेचे अस्तित्व सुरक्षित ठेवणे त्यांना शक्य जाते. परंतु त्यानंतर मात्र ही आभासी प्रतिमा आणि आपण वेगळे आहोत याचे खडतर जाणीव त्यांना होऊन जाते. 

आपल्या मागच्या पिढीने आपल्याला आपल्या कठीण काळात विनाअट त्यांच्या पंखाखाली घेतलं. आपण कधीकाळी संकटात सापडलो तर कशामुळे आपण संकटात सापडलो याची अजिबात चौकशी न करता unconditionally  त्यांनी आपल्याला आधार दिला. परंतु हीच घटना आपल्या आणि पुढील पिढीच्या बाबतीत मात्र कशाप्रकारे घडेल याविषयी मी साशंक आहे.  एकतर ही पुढील पिढी ज्यावेळी त्यांना मानसिक आधाराची  गरज असेल त्यावेळी खरोखर आपल्याला साद देईल का याविषयी आपण खात्री देऊ शकत नाही. कदाचित दुसऱ्यांची (यात त्यांचे पालकसुद्धा समाविष्ट ) मदत मागणे  हे त्यांना कमीपणाचे वाटू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे असा प्रसंग उद्भवला असता या पिढीला पंखाखाली घेणे हा जो प्रकार आहे त्यासाठी आपण कितपत तयार आहोत हा प्रश्न ज्याचा त्याने स्वतःला विचारला हवा!  

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

Happening जागा, गोष्टी वगैरे वगैरे



बहुसंख्य वर्गापासुन आपणाला वेगळं दाखविण्याची मानसिकता कदाचित पुर्वीपासुन अस्तित्वात असेल. हल्ली ही मानसिकता अधिक प्रकर्षानं व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळं सहजगत्या जाणवु सुद्धा लागली आहे. Happening Places चे मुळ उदाहरण बहुदा  Page ३ वर अवतीर्ण होणाऱ्या पार्ट्या हे असावं. सेलिब्रिटी / वलयांकित माणसं वेगळी आणि आपण वेगळे ही मानसिकता पुर्वी अस्तित्वात असायची. मग आपण सुद्धा Happening Places च्या स्थानिक आवृत्त्या का निर्माण करु नयेत हा विचार जनमानसात जोर धरु लागला. इथं मग बहुसंख्य वर्गापासुन दुर पळता पळता बहुसंख्य वर्गच Happening Places / थिंग्स मध्ये समाविष्ट होण्याची, त्यांचं वेगळेपण नाहीसे होण्याची शक्यता निर्माण झाली.   

Happening Places / Things ची बहुसंख्यांनी अंगिकारलेली उदाहरणे आजुबाजूला मुबलक प्रमाणात सापडतात. निसर्गरम्य ठिकाणांना भेटी, दीर्घ पल्ल्याच्या शर्यती, सामाजिक कार्य, आपत्कालीन जनसमुदायाला मदत, विशिष्ट नैसर्गिक घटनेला भेट ह्या खरंतर खरोखरीचा निर्मळ मानसिक आनंद देणाऱ्या गोष्टी! पण आपण Happening Places/ Things मध्ये समाविष्ट आहोत हे  दर्शविण्याचा हेतू ज्यावेळी ह्या गोष्टींत शिरतो त्यावेळी मात्र मग त्यातील निर्मलता काही प्रमाणात गढुळ बनते. ह्या गोष्टी करणारे सर्वचजण केवळ ह्या हेतूने ह्यात शिरकाव करतात असं मला अजिबात म्हणायचं नाही, तरी पण !!!

Happening Places / Things ची अजुन एक आवृत्ती म्हणजे आपल्या पाल्यांचा आयुष्यातील Happening Path !! विशिष्ट बोर्डात शालेय / महाविद्यालयीन शिक्षण, IIT किंवा तत्सम संस्थेत प्रवेश, परदेशशिक्षण वगैरे वगैरे ! आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर यश म्हणजे काय ह्याचा आपण एक बिंदु ठरवुन दिलेला आहे! ह्या विविध टप्प्यावरील बिंदूंना जोडुन काढलेली रेषा म्हणजेच हा Happening Path! ह्या रेषेपासून आपलं अंतर थोडंजरी वाढलं की बेचैन व्हायला होतं आपल्याला ! पण गंमत पहा ना ! शिक्षण संपल्यावर हा Happening Path तुम्हांला / तुमच्या पाल्याला एका शिखरावर सोडुन देतो आणि मग पुढं काय होऊ शकतं ह्याविषयी कोणीही खात्रीलायक मार्ग सांगु शकत नाही!

आपल्याला ह्या Happening गोष्टींचं इतकं वेड का असतं? आपण इतरांच्या नजरेतुन कुल व्हावं म्हणुन कदाचित ! गंमत अशी झालीय मित्रांनो, आपण सर्वचजण ह्या शर्यतीत उतरल्याने ह्यात न उतरणारे आता कुल वाटु लागलेत ! परवा एक मित्र भेटला, अगदी सहजपणे तो म्हणाला, अरे मी फेसबुक, व्हाट्सअँप, ट्विटर अगदी कुठेही नाही आणि त्यावाचुन माझं काही अगदी अडत नाही ! मला इतका कुल वाटला तो सांगु !!!

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील आव्हानं !


नुकत्याच येऊन गेलेल्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने आधुनिक काळातील शिक्षकवर्गासमोरील असणाऱ्या आव्हानांचा आढावा घ्यावा असे आमचे नातलग संदेश राऊत यांनी सुचविले. 

शिक्षक हे पुढील पिढी घडवत असतात हे पुर्वी म्हटलं जायचं, लोकांच्या मनात खरोखरीची ती भावना असायची! त्यावेळी शाळा-कॉलेजातील वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची मानसिकता कशी असावी याचा आपण विचार करुयात.  गुरुवर्य हा भगवंतासमान ही विचारधारणा घेऊन बहुतांशी विद्यार्थी शाळा-कॉलेजात जात असत. यामागं बहुदा घरातील शिकवण, संस्कार कारणीभुत असावेत. शिक्षकांकडून जे काही ज्ञान मिळतं त्यामुळं मुलं मार्गाला लागतात, शिक्षकांकडुन मुलांवर जीवनावश्यक संस्कार होतात ही धारणा त्यावेळी पालक बाळगुन असत.  

शिक्षकांना योग्य आर्थिक मोबदला देणं हे त्याकाळी फारसे प्रचलित नव्हतं. परंतु आपल्या परीने शेतातील पिकणारं धान्य, आपल्या व्यवसायातील उत्पादित होणाऱ्या वस्तु ह्या शिक्षकांना भेट देऊन शिक्षकांप्रती आपल्याला असलेला आदर व्यक्त केला जात असे.  ज्ञानधारणेसाठी विद्यार्थी बहुतांशी शिक्षकांवर अवलंबुन असत. ग्रंथवाचन वगैरे मार्ग महाविद्यालयात गेल्यावर उपलब्ध होत असत, परंतु सर्वानाच ते सहजासहजी उपलब्ध नसत. शिक्षकांना फी दिली म्हणजे त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याचा आपला हक्क आहे ही भावना जी आज मुळ धरु लागली आहे,  ती त्या काळी अस्तित्वात नव्हती. 

बहुतांशी शिक्षक वर्ग हा विषयाशी संबंधित संदर्भग्रंथांचं खोलवर वाचन करीत असे. त्यामुळे बऱ्याच वेळा शालेय / महाविद्यालयीन वर्गांमध्ये मुलांना एका अमर्याद अशा ज्ञानदालनाची आनंददायी सफर घडत असे! केवळ शब्दांनी आणि शिक्षकांच्या आदर्श वर्तवणुकीच्या माध्यमातुन मुलांची आयुष्य घडत, त्यांच्यावर जन्मभराचे संस्कार होत असत. मुलांचा मेंदु हा ज्ञानग्रहणासाठी शाळा-कॉलेजात आल्यानंतरच सक्रिय होत असे.  घरी असताना त्यांच्याकडं ज्ञानग्रहणासाठी शालेय पुस्तकांव्यतिरिक्त फारसे स्त्रोत उपलब्ध नसत. त्यामुळं शिक्षकांसमोर ज्ञानासाठी आसुसलेला विद्यार्थीवर्ग उपलब्ध असे. 

शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीतून पाहिलं असता बऱ्याचवेळा त्यांना शिक्षक ह्या भुमिकेच्या जोरावर वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्यांपासुन काहीशी सुटका मिळत असे. एकंदरीत शिक्षकानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायलाच हवं असं दडपण नसे ! शिक्षकांना दैवत्वाच्या गाभाऱ्यात बसवुन त्यांच्याप्रती असलेलं आपलं आर्थिक दायित्व झटकुन टाकायला समाज मोकळा होत असे. 

काळ खुप बदलला. विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांची मानसिकता बदलली. 
शिक्षकांपुढे बरीच आव्हानं दिसुन येत आहेत. आपल्या आर्थिक स्थितीकडं दुर्लक्षच करायला हवं ही मानसिकता शिक्षकवर्गानं  बऱ्याच प्रमाणात झटकुन दिली, कारण त्यांच्या वैयक्तिक जीवनातील भुमिकेविषयी त्यांना मिळणारी सुट काळानुसार नाहीशी झाली. आर्थिकदृष्ट्या केवळ शाळा, कॉलेजातील नोकरीवर अवलंबून राहणे अशक्यप्राय बनलं.  त्यामुळे उत्तम शिक्षकांना या पेशाकडे कायमचं टिकवून धरणे कठीण होत चाललं आहे! ज्ञानधारणेपेक्षा गुण मिळविण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढु लागला. त्यामुळे शिक्षक म्हणजे गुण मिळवून देणारे एक साधन आणि आपण त्यासाठी फीचे मोल मोजणारे उपभोक्ता ही अत्यंत चुकीची भावना काही प्रमाणात निर्माण झाली.  

त्याचप्रमाणे घरामधील संवादांमधुन शिक्षकांविषयी दिसण्यात येणारी आदरभावना सुद्धा संपुष्टात येत चालली आहे.  ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडे असंख्य स्त्रोत निर्माण झाले आहेत. पुर्वी  शिक्षक मिळालेल्या माहितीची वैधता तपासुन घेऊन त्यानंतरच ते विद्यार्थ्यांपुढे मांडत असत. ती अचुकतेची शक्यता विद्यार्थ्यांपुढे आज उपलब्ध असलेल्या सर्वच साधनांच्या बाबतीत खरी ठरत नाही. इंटरनेटच्या माध्यमातुन मिळालेलं  बरेचसं ज्ञान हे जरी शंभर टक्के अचूक नसलं तरी त्यावर विद्यार्थ्यांचा विश्वास बसण्याची शक्यता जास्त असते. या सहजासहजी मिळालेल्या माहितीच्या आधारावर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उगाचच बळावतो.  पुर्वी एखाद्या विषयाबाबतीत कोरा करकरीत मेंदु घेऊन शिक्षकांपुढे येऊन बसणारा विद्यार्थीवर्ग आज उरला नाही. हा विद्यार्थीवर्ग आधीच काही बरोबर आणि काही चुक अशा संकल्पनांचं ओझं घेऊन शिक्षकांपुढं बसतो. अशावेळी त्यांच्या मेंदुतील चुकीच्या संकल्पनांना दुर करुन योग्य संकल्पनांना त्या मेंदुत जागा करण्याची वाढीव जबाबदारी शिक्षकवर्गापुढं आहे! 

शिक्षकांकडून आपल्याला संस्कार, जीवनज्ञान मिळतं अशा काही संकल्पना अस्तित्वात आहेत याची जाणीवच या विद्यार्थ्यांना नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांशी वर्गांमध्ये संवाद साधताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे काहीसं  मित्रत्वाकडे झुकणारे असावं ह्या अधिकच्या ओझ्याचे बोजे शिक्षकवर्गावर आहे. 

कुठंतरी एक मोठी चुक घडत आहे. गुरुजनांविषयी असणारा आदर पुढील जीवनातील व्यक्तीच्या संस्कारी वर्तवणुकीचा पाया बनत असे. आयुष्यात केव्हाही आपण चुकीचं वागल्यास आपल्या शिक्षकांना काय वाटेल हा विचार सदैव मनात राही! आज ह्या विचाराचं बंधन विद्यार्थ्यांवर नाही! 

राहता राहिला शिक्षकवर्ग! दैवत्वाच्या गाभाऱ्यात अजुनही त्यांनी राहावं ही पालकवर्गाची अपेक्षा, उच्चशिक्षणाच्या आपल्या महत्वाकांक्षांना त्यांनी येनकेनप्रकारे बळ द्यावं ही विद्यार्थीवर्गाची अपेक्षा आणि शेजारच्या घरातील कमावत्या माणसाप्रमाणे त्यांनीही पैशाचा ओघ सुरु ठेवावा ही घरातल्या माणसांची अपेक्षा!  ह्या पुर्णपणे भिन्न दिशांना तोंड करुन असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरत जमेल तितकं ज्ञानग्रहणाचे आणि ज्ञानदानाचे कार्य हा शिक्षकवर्ग आजच्या काळात बजावत आहे !

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९

आजच्या युवकवर्गासमोरील आव्हानं !


वसई येथील सोमवंशीय क्षत्रिय समाज महामंडळ गेले कित्येक वर्षे स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधुन बालक पालक मेळावा आयोजित करत असतं. ह्या वर्षीच्या बालक पालक मेळाव्यात त्यांनी मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. त्यावेळच्या माझ्या भाषणातील महत्वाचे मुद्दे !

आज इथं मी सद्यकालीन नोकऱ्यांची अशाश्वतता या विषयावर बोलणार आहे.  आज नोकरी करणारा तरुण वर्ग आपल्या नोकरीच्या शाश्वततेविषयी जी काही गृहितके बाळगून आहे त्याविषयी त्यांच्या वैधतेविषयी आपण चर्चा करुयात. काही काळापूर्वी नोकऱ्यांमध्ये वयाच्या ५८- ६० वर्षांपर्यंत शाश्वती असायची, त्यानंतर निवृत्तीवेतन मिळायचं! एकंदरीत नोकरवर्गाचं जीवन शाश्वत असायचं! आज परिस्थिती बऱ्याच प्रमाणात बदलली आहे.  नोकरीमध्ये तुम्ही ज्या पदावर असता त्या पदासाठी आवश्यक कौशल्यं सतत बदलती असतात. महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या तरुणवर्गाचे उदाहरण  आपण विचारात घेऊयात. त्यांनी समजा माहिती तंत्रज्ञान किंवा व्यवस्थापन  क्षेत्रात नोकरी घेतली असेल तर प्रत्येक वर्षी त्यांचा पगार वाढत जातो. आपण त्यांना मिळणारा पगार आणि कंपनीच्या दृष्टीने त्यांच्याकडे असणारी आवश्यक कौशल्ये यांचा आलेख काढला असता त्यांच्या कारकिर्दीमध्ये असा एक क्षण येतो की त्यांना त्या पदावर ठेवणे कंपनीच्या दृष्टीने फायद्याचे ठरत नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हा  क्षण येतोच असे नाही. काहीजण काळाची पावले ओळखून आपली कौशल्ये सतत विकसित करत राहतात. त्यामुळे ते यशाच्या पायऱ्या चढत जातात.  आपली कौशल्ये कशी  विकसित करत जावी हा एका  वेगळ्या संवादाचा विषय आहे. 

परत एकदा मूळ मुद्द्याकडे वळुयात! काळानुसार आपण आपली कौशल्यं विकसित न केल्यास आपलं करिअर हे साधारणतः ४० ते ४५ वयाच्या आसपास अनिश्चिततेच्या भोवऱ्यात अडकू शकते याची जाण तरुण वर्गाने ठेवावी. या अनुषंगाने येणारा पुढील मुद्दा म्हणजे आपल्या आर्थिक जबाबदाऱ्यांचे नियोजन! हल्ली चांगल्या कंपन्यात नोकरीला लागलेल्या तरुणवर्गाच्या मागे कर्ज देणाऱ्या कंपन्या हात धुऊन पाठी लागलेल्या असतात. त्यांनी जाहिरात केलेल्या मालमत्तेचे अथवा कारचे वर्णन आपल्याला भुरळ पाडू शकते.  मग त्याचा परिणाम म्हणून आपण मोठाली कर्जे घेऊन बसतो. काही काळानंतर वाढलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरीमधील उच्च पदावरील तणाव आणि मासिक हप्ते वेळेवर भरण्याचा तणाव अशा विविध तणावांच्या गर्तेत तरुण वर्ग अडकतो. थोडक्यात सांगायचे झाले तर अंथरुण पाहून पाय पसरावेत या म्हणीची आठवण तरुण वर्गाने ठेवावी. आलिशान जीवनपद्धतीचा मोह नको असं मला म्हणायचं नाही परंतु व्यावसायिक जीवनात आपण नक्की कुठं आहोत ह्याचं भान ठेऊन मगच आर्थिक निर्णय घ्या! आपल्या Financial Liabilities आणि आपल्या व्यावसायिक जीवनावरील आपली पकड ह्याची व्यवस्थित सांगड बसवा !

आता या विषयाशी काहीसा संबंधित परंतु वेगळा विचार! तरुण वर्ग आज या स्पर्धेमध्ये का उतरतो? एक समाज म्हणून आपण या तरुणवर्गावर किती दबाव अप्रत्यक्षपणे टाकत आहोत याचीदेखील जाणीव आपणास असणे आवश्यक आहे.  आजही भोवताली कमी तणावाच्या नोकऱ्या अस्तित्वात आहेत, त्या नोकऱ्यासुद्धा तुम्हांला तुमच्या उपजीविकेसाठी योग्य असतात. परंतु आपण समाजात अशा वलयांकित नसलेल्या नोकऱ्या करणाऱ्या तरुण वर्गाला काहीसे दुय्यम स्थान अप्रत्यक्षपणे देत असतो.  साधी नोकरी करणाऱ्या किंवा शेतीवाडी करणाऱ्या तरुणाला मुलगी देण्यासाठी समाज तात्काळ तयार होत नाही हासुद्धा एक कळीचा मुद्दा आहे.  प्रशस्त घर, मोठाल्या गाड्या ही प्रतिष्ठेची प्रतिमा आपण निर्माण करत चाललो आहोत;  त्यामध्ये आपण सर्वजण अडकत आहोत. परंतु ह्या या प्रतिष्ठेच्या प्रतिमेमागे असणारी मेहनतीची पार्श्वभूमी आणि अनिश्चिततेचे सावट लक्षात असुद्यात. त्यामुळे भविष्याचे नियोजन करताना काहीशी सावधानतेची पावलं उचला अशीच माझी विनंती राहील!

(P.S. पोस्टच्या सुरुवातीचा फोटो आणि पोस्टचा विषय ह्याचा दुरान्वये संबंध नाही!)

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

सरदार पटेल अभियांत्रिकी विद्यालय स्थापत्यशाखा स्नेहसंमेलन



काही वर्षांपुर्वी महाविद्यालयीन जीवनाचा नकोनकोसा वाटणारा निरोप घेऊन आम्ही सर्व मित्रमंडळी विविध दिशांना विखरलो. काहीजणांनी पदव्युत्तर शिक्षणाचा मार्ग पत्करला, काहीजणांनी नोकरी पत्करली. त्यानंतर आयुष्य आम्हां सर्वांना वेगवेगळ्या प्रकारे भेटत राहिलं, आम्ही सुद्धा एकमेकांना छोट्यामोठ्या ग्रुपच्या स्वरूपात अधुनमधून जमेल तसे भेटत राहिलो. परंतु एकत्रितपणे भेटण्याचा योग आला नव्हता. 

ह्या वर्षी मात्र एकत्रितपणे भेटण्याचा विचार बऱ्यापैकी जोर धरु लागला.  सुरुवातीला साठ जणांच्या बॅचपैकी बरेचजण ह्या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहु शकतील अशी आशा वाटली होती. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर या देशांमध्ये बरेचसे सहाध्यायी वास्तव्य करुन आहेत. ठरवलेल्या 10 ऑगस्ट ह्या दिवशी स्नेहसंमेलनाला उपस्थित राहणे काहीजणांना  जमत नाही हे लक्षात आल्यानंतर ज्या लोकांना जमतंय त्यांना एकत्र घेऊन या दिवशी हे स्नेहसंमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

सतेज,  सुगंध, सचिन या मंडळींनी ठाणे येथील ब्ल्यू रुफ क्लब ह्या रिसॉर्टचं आरक्षण आदल्या शनिवारी भर पावसात केलं. बावीसजणांनी ह्या स्नेहसंमेलनासाठी आपला सहभाग निश्चित केला होता. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या आमच्या या सर्व मित्रमंडळींनी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. ही सर्व मंडळी एकत्र आल्यावर त्यांच्या आयुष्यातील अनुभवांविषयी बोलणं व्हावं ही कल्पना आशुतोषने मांडली. 

अभियांत्रिकी शिक्षण समाप्त झालं त्यावेळी आयुष्याच्या एका भव्य पटावर आम्ही सर्व उतरलो होतो. आयुष्य सुंदर असतं असं म्हटलं जातं ते खरं असलं तरी आयुष्याची ही सुंदरता सर्वांनाच काही सहजासहजी अनुभवायला मिळत नाही.  जसंजसं  प्रत्येकजण आपले अनुभव सांगू लागला तसतसं  "The journey has been sinusoidal" मंदारचे हे शब्द बहुतांशी सर्वांच्याच आयुष्याला लागू पडले आहेत हे आम्हांला जाणवत गेलं.  काहींचं या आयुष्याच्या आलेखाच्या शिखरावरील आगमन लवकर झालं तर काहींना शिखरावर पोहोचण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली. 

या बावीसजणांच्या समुहाच्या अनुभवांची व्याप्ती खूप मोठी आहे. काहींनी आपल्या स्थापत्य अभियांत्रिकीशी बांधिलकी कायम राखत स्थापत्य अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये आपले करियर प्रगतीपथावर नेले आहे.  यात Structural Engineering, Environmental Engineering, Geotechnical Engineering ह्या आणि अनेक स्थापत्यशाखेच्या उपशाखांचा समावेश होतो. 

धारिया जोडप्याने स्वतंत्रपणे व्यवसाय सांभाळत जी उंची गाठली आहे ती नक्कीच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे त्यांची मुलगी ही बुद्धिबळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत सहभाग घेते.  हे दोघेही आपल्या या व्यवसायाला सांभाळत तिच्यासोबत देशभर आणि विदेशात सुद्धा प्रवास करीत असतात. प्रवासात असताना सुद्धा आपल्या क्लायंटसना खोळंबुन राहायला लागु नये ह्यासाठी त्यांनी आपल्या व्यवसायात जे संगणकीकरण केले आहे, बहुतांशी निर्णय हे परदेशातूनसुद्धा एका माऊसच्या क्लिकवर घेण्याची क्षमता विकसित केली आहे ते ऐकून खूप आनंद झाला. 

ठाकूरदेसाई जोडप्याची मुलगी ही राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळते.  तिच्या बॅडमिंटन खेळातील कामगिरीला प्रोत्साहन देण्यासाठी ठाकूरदेसाई जोडप्याने आपल्या करिअरमध्ये बऱ्याच तडजोडी केल्या आहेत. परंतु या तडजोडी कराव्या लागल्या असुनसुद्धा दोघेही आज उच्चपदस्थ आहेत. मुलीविषयी बोलताना आई कशी भावनाविवश होऊ शकते ह्याचा अनुभव आम्ही घेतला. 

द्वि / त्रिपदवीधर अशी मंडळीसुद्धा उपस्थित होती. त्यांची मनोगते ऐकून धन्य व्हायला झालं. विविध देशांतील आपल्या वास्तव्याचे सुरेख वर्णन जोशी आणि आफळे ह्यांनी नमुद केले. इतके वर्षांनीही आम्ही खेळकरपणा बाळगुन ठेवला आहे. त्यामुळे उगाच नडायला (खास कॉलेजचा शब्द!) म्हणुन परदेश सुंदर आहे तसा भारतही सुंदर आहे ह्याची प्रेमळ आठवण सुद्धा करुन देण्यात आली! गुंतवणूक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समितचे मनोगत सुद्धा अगदी प्रांजळ होते. प्रवासक्षेत्रात आपला व्यवसाय उभ्या करणाऱ्या माधुरीने आपले अनुभव नमुद केले. अंबानी कुटुंबियांच्या खांद्याला खांदा लावून ज्याने काम केलं असं म्हणण्याइतकी जवळीक निर्माण करणारा मिश्किल राहुल आपले अनुभव सादर करत होता. गुण्यानं आपलं मनीचे मनिला मनोगत दिलखुलासपणे सादर केलं. आदल्या रात्री मनिलाहुन प्रदीर्घ प्रवास करुन आलेल्या सतीशचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यानं सादर केलेल्या काही स्टेप्सचा आज मी सराव केला.

सतेज आमच्यावर काही काळ नाराज झाला. ह्याची सुरुवात खरंतर मीच केली. बोलताना सहजपणे मी खरोखर स्थापत्यशास्त्र शाखेसाठी योग्य माणूस होतो का याविषयी शंका निर्माण केली.  अजुन एक दोघांनी त्याची री ओढली. हे सर्व ऐकणारा सतेज काहीसा नाराज झाला होता. आपल्या मनोगतामध्ये त्याने आपली ही खंत व्यक्त केली. बाकी कोणाला काही वाटो पण मला मात्र स्थापत्य शाखा नक्कीच आवडत होती अशा आपल्या भावना त्याने व्यक्त केल्या. एक व्यावसायिक म्हणून मुंबईत कार्यरत असताना येणारे वास्तववादी अनुभव त्याने अत्यंत सुरेखरित्या नमुद केले. 

बोलताना सतत खुर्ची मागे ढकलणाऱ्या मंगेशला पाहून त्याच्याविषयी वाटणाऱ्या काळजीपायी सुगंध सदैव बेचैन होत होता. शेवटी न राहवुन त्यानं मंगेशला थांबवलं! त्याची ही बेचैनी पाहून शेवटी मंगेश एका जागी स्थिरावला! बहुभाषिक वर्ग असला तरी बोलताना अधून मधून मराठीचा वापर होत होता, त्यामुळेच की काय गुजराथी भाषिक नीताने आपल्या पटेल या आडनावावर सुरेख कोटी केली. ती म्हणाली की माझे आडनाव पटेल असल्याने मी तुम्हां सर्वांकडुन बरीच आशा बाळगून होते! परंतु शेवटी तुम्ही सर्वांनी निराशा केलीत ! 

जेवण अत्यंत स्वादिष्ट होते. श्रावणी शनिवार असल्याने केवळ शाकाहारी पर्यायांकडे लक्ष देत जेवणाचा निखळ आनंद घेतला. जेवणानंतर आलेल्या आमच्या होस्टने आम्हांला काही मनोरंजक खेळ खेळायला लावून आमचं शैथिल्य नाहीसं केलं. त्यानंतर मग आमच्यात निर्माण असलेल्या नवचैतन्याचा फायदा घेत त्याने आम्हांला  जोडीनाच करावयास लावला.  इथं करावयास लावला हा शब्दप्रयोग सुरुवातीच्या काही क्षणापुरताच योग्य ठरेल. त्यानंतर मंडळी अगदी सुटलीच! लोकांनी धमाल नृत्य केली.  ह्या नृत्याच्या सार्वजनिक मीडियावरील प्रसिद्धीचे मर्यादित अधिकार आणि त्यासंबंधित अत्यंत कठोर अटी ह्यामुळं हा अप्रतिम नृत्याविष्कार इथं सादर करता येणार नाही. त्यामुळे वाचक वर्ग एका अप्रतिम सादरीकरणाला मुकला तरी माझा नाईलाज आहे!

हल्ली हाय टी  नावाचा प्रकार प्रमाणाबाहेर प्रचलित होऊ लागला आहे! कुठं उंचावर चहाची किटली ठेवून त्यातील चहा तुम्हांला प्राशन करायला भाग पाडत असावेत असा तुमचा जर समज होत असेल तर तुम्ही कदाचित एकटे नाही आहात! यामध्ये चहासोबत तुम्हाला एक किंवा अधिक नाश्त्याचे  पदार्थ दिले जाता.  काल पेश करण्यात आलेला बटाटवडा चविष्ट होता. आमच्यातील जी काही मंडळी दीक्षित वगैरे फॉलो करत होती (अथवा करत असावीत असा आम्हांला संशय आहे ) त्यांनी कालच्यापुरता आपला नित्यक्रम बाजूला ठेवला होता! परंतु बटाटवडा नक्कीच चविष्ट होता. 

त्यानंतर राहुलने सर्वांना वर्तुळाकार मांडणीमध्ये बसून आपला आवडता चित्रपट आणि त्यानंतर कोणत्याही चित्रपटातील आवडते संवाद सांगण्यास सांगितले. हे सर्वांना विचार करण्यास भाग पाडणारे होते. राहुल हा महाविद्यालयीन  जीवनापासुन हिंदी / इंग्लिश चित्रपटांविषयी उत्तम व्यासंगी म्हणुन प्रसिद्ध आहे. मंडळी एव्हाना बरीच मनमोकळेपणाने गप्पा मारु लागली होती. त्यामुळं दोन रुपये तिकीट दर असलेल्या चित्रपटाला आपण कसे दररोज हजेरी लावत होतो वगैरे चर्चा ऐकावयास मिळाल्या! आजही कॉलेजातील शेवटच्या बाकावर बसुन केलेल्या धमालीची आठवण येते हे सांगताना नीताच्या डोळ्यात अश्रुंनी प्रवेश केला. 

त्यानंतर चर्चा पर्यायी व्यवसायांकडे वळली.  ही देखील एक उत्तम चर्चा झाली. आर्थिक प्राप्ती आणि मानसिक समाधान या दोन घटकांमध्ये कुठेतरी पर्यायी व्यवसायांचे निर्णय घुटमळत असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या जडणघडणीनुसार आणि आयुष्यातील सद्यस्थितीनुसार हा निर्णय घेत असावी.  

खरंतर साडेपाच-सहा होत आले तरी तिथून पाय काढायची इच्छा होत नव्हती. परंतु घोडबंदर सु(?)प्रसिद्ध ट्रॅफिक जॅमच्या  भयाने आम्ही तिथून सहा वाजता काढता पाय घेतला!  एका संस्मरणीय स्नेहसंमेलनाची सांगता झाली! सायंकाळी केलेल्या चर्चेनुसार पुढील स्नेहसंमेलनासाठी अजुनइतका दीर्घकाळ आम्ही नक्कीच थांबणार नाहीत हा दृढ निर्धार व्यक्त करण्यात आला !

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...