मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

भेटीगाठी!!


 
गेले काही दिवस वसईत बराच मुक्काम होता. आधी लग्नानिमित्त आणि मग सुट्टी मिळाली म्हणून. ह्या कालावधीत वसईत खूप माणसं भेटतात. अगदी लहाणपणापासून ओळखीतली ते नव्याने ओळख झालेली. थोडी फुरसत असल्याने माणसं मनमोकळेपणाने बोलण्याची शक्यता जास्त असते. 
जुन्या ओळखीतले लोक भेटतात. मन भूतकाळात जातं. गप्पांचा ओघ जुन्या आठवणीकडे जातो. कधी दोघांनाही ह्या आठवणी हव्याहव्याशा वाटतात, तर कधी एकालाच! काही माणसं जगतात वर्तमानकाळात पण मनाने भूतकाळात अडकून बसलेली असतात. काहीजण भूतकाळाला  फक्त फुरसतीच्या क्षणी आठवू शकण्याची क्षमता बाळगून असतात. काहीजणांना भूतकाळातील फक्त चांगले क्षण आठवतात तर काहींना भूतकाळातील कटू स्मृती कायम छळत राहतात. 
चौधरीबाई आणि त्यांच्या यजमानांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी जवळच्या नातेवाईकांना आणि आम्हां शेजाऱ्यांना एका सुंदर सोहळ्यासाठी आमंत्रित केलं. हे दोघं अगदी साधेपणाने आयुष्य जगले.   त्यांचा कुटुंबीय असलेल्या रॉबर्ट ह्याने अस्खलित मराठीत सुंदर भाषण केलं. हे जोडपं अगदी साधेपणाने आयुष्य जगलं, त्यांनी मोठा बंगला वगैरे उभारला नसेल, महागड्या गाड्या विकत घेतल्या नसतील पण एक साधं सुधं सार्थक जीवन जगलं. बाई जेव्हा बाजारातून काही भाजी वगैरे घेऊन यायच्या किंबहुना अजूनही येतात तेव्हा त्यांचे यजमान तात्काळ पुढे येतात. पिशवी घेतात; घरकामात त्यांना अजूनही मदत करतात. चौधरीबाई काहीशा भावनाविवश झाल्या होत्या. त्यांचं मन भूतकाळात गेलं. मुलांना सांभाळायचा प्रश्न तेव्हाही यायचा. काही काळ आईकडे तामतलावला शाळेत सोडून यायची वेळ आली. त्याकाळी बस रिक्षा सहजासहजी मिळत नसल्याने संध्याकाळी त्या लहान मुलीला घेऊन सुमारे दीड किलोमीटर अंतर चालत यावे लागत असे. पुढे चुलतदिरांनी सुद्धा लहान मुली सांभाळायला मदत केली. 
ह्याच दिवशी (२७ डिसेंबर १९६४) रोजी चौधरी बाईंच्या यजमानांच्या बहिणीचा सुद्धा विवाह झाला होता. त्या दांपत्याला  सुद्धा व्यासपीठावर बोलावून शुभेच्छा देण्यात आल्या. एकाच दिवशी बहीण भावांची लग्न लावायची जबाबदारी त्यांच्या पालकांनी पेलली. ही पद्धत अजूनही कधी कधी पाहायला मिळते. काही लोक ह्या पद्धतीविषयी साशंक असतात. त्यांनी ह्या दोन दीर्घकाळ विवाहबंधनात बद्ध असलेल्या जोडप्यांकडे पाहून निशंक व्हावे असे एक वक्ता म्हणाला. दोन तीन वक्त्यांनी हल्लीच्या काळात विवाहसंस्था कठीण काळातून जात असताना ह्या जोडप्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे वक्तव्य केले. 
राहून राहून असंच  वाटत गेलं - स्वयंप्रगतीचा ध्यास आणि शांत जीवन ह्या दोन रेषा कधी एकत्र जाऊ शकत नाहीत. कोण्या एकाचा त्याग पती पत्नीतील एकाला किंवा दोघांना करावा लागतोच. ती गोष्ट कोणती आणि त्याग कोणी करायचा ह्याविषयी नवराबायकोचं एकमत व्हावं लागत. पूर्वी हे विचार न करता होत असे कारण पर्याय कमी होते. आता मात्र परिस्थिती कठीण आहे. 
सुट्टीनिम्मित परदेशाहून आलेली मंडळी जसजशी सुट्टी संपू लागली तशी खिन्न होत गेली. आमच्या गल्लीत काही दिवसांपूर्वी एक दुःखद घटना घडली. आमच्या एक शेजारी, ज्या अगदी चांगल्या हिंडत्या फिरत्या होत्या, त्यांना सुमारे सहा महिन्यापूर्वी एका असाध्य आजाराचे (बहुदा ALS) निदान झाले. दोन्ही मुले, जावई परदेशात! दोन्ही मुले अगदी प्रेमळ! त्यांनी आपल्या परीने खूप प्रयत्न केला.शक्य असतील तितके उपचार केले, पैशाकडे पाहिलं नाही. पण ईश्वराच्या मनात मात्र वेगळंच होतं. काही दिवसांपूर्वी ह्या बाई देवाघरी गेल्या. अंकल एकटेच राहिले. त्यांना सोडून परदेशी जाताना मुलांच्या मनात काय भावना निर्माण झाल्या असतील ह्याची कल्पनासुद्धा करवत नाही. 
बहिण निऊ तीन वर्षे अमेरिकेत राहून तीन आठवड्याच्या सुट्टीवर आली होती. तिचीही सुट्टी जशी संपायला आली तशी तिच्या चेहऱ्यावर उदासी दिसू लागली. ज्या सुट्टीची इतक्या आतुरतेने वाट पाहिली ती इतक्या झटकन संपून जाईल ह्याची कल्पना केली नव्हती. शर्व आणि निरंजना सुद्धा मजेत होते. तीन वर्षांच्या मधल्या कालावधीत त्यांच्यात फारसा काही फरक पडलेला वाटला नाही. म्हणजे त्यांचा भारतीयपणा बऱ्यापैकी शाबूत आहे. निऊ आणि निशांकला ह्याचे श्रेय द्यायला हवं. शर्वला तर अमेरिकन असेंटमध्ये त्याच्याशी बोलण्याचा माझा प्रयत्न फारसा भावला नाही. मी अमेरिकेत राहिलो तरी मला मराठी समजतं असं सांगून त्याने माझी आणि स्वतःची सुद्धा सुटका केली. 
सुश्रुत दोन वर्षांनी न्यूझीलंड वरून आला. त्याने स्वरूपदादाच्या लग्नात खूप काम केलं. त्याची सुट्टी सुद्धा संपत आली. काहीसा हिरमुसला झाला तो! भारतात मनासारखी नोकरी मिळाली तर पुढे कधीतरी परत येईन असे म्हणाला. जबाबदारी त्याच्या चेहऱ्यावर, बोलण्यात जाणवत राहिली.

अजून काही लोक भेटत राहिले. काहींना आयुष्याने समृद्धी दिली होती. त्यांच्या चेहऱ्यावर समृद्धी उठून दिसत होती. काहींना आयुष्याने कष्ट दिले होते. तरीही हे लोक आयुष्यात जमेल तसा आनंद शोधत होते. पैसा आणि आनंद एकत्र नांदायला हवेत असं नाहीच. 


काही दिवस देवपूजेची जबाबदारी माझ्यावर पडली. पडली म्हणण्यापेक्षा मी आनंदाने घेतली. आजीने कधी लहान असताना पूजा कशी करायची हे दाखवलं होतं. त्यातलं किती लक्षात आहे हे माहित नाही. आता स्वतःच्या समजुतीनुसार पूजा करतो. 
बंबाच्या गरमागरम पाण्याने आंघोळीस मजा आली. आंघोळ संपवू नये असेच वाटायचे. सकाळी लवकर आंघोळ आटोपल्यावर दिवस कसा मोठा वाटतो. उत्साहाने भारून गेल्यावर क्षणनक्षण पुरेपूर चांगल्या कार्यात घालवावासा वाटतो. 

ताम्हाणात दुधसाखरेच्या नैवेद्याची वाटी, सोबत अभिषेक केलेल्या देवांना कोरडे करण्यासाठी घेतलेल कापड आणि अंगणातल्या फुलांची परडी. अंगणात जास्वंदाची तीन चार रंगांची झाड आहेत. पावसाळ्यात ती अगदी फुलांनी बहरून जातात. पावसाळ्यातील जमिनीचा ओलावा आता संपत आला आहे. त्यामुळे ह्या झाडांची फुले ओसरू लागली आहेत. आता वडील ह्या झाडांना पाणी द्यायला सुरु करतील. तर ह्या जास्वंदाची लाल, भगवी, पिवळसर फुले आणि टगर आणि अजून एक दोन झाडांची पांढरी फुले अंगणात सकाळी फुलतात. त्यांनी परडी तशी भरते. मग ताम्हाण, फुलांनी भरलेली परडी घेऊन पूजेला लागायचं. वर म्हटल्याप्रमाणे मी केलेली पूजा शास्त्रोक्त नसते. पण भावना महत्वाची! आजीने बऱ्याच देवांच्या मूर्ती देव्हाऱ्यात मांडल्या होत्या. काळानुसार थोडा त्यात बदल झाला पण बहुतांशी ठेवण तशीच आहे. ह्या सर्व देवांना क्रमाक्रमाने ताम्हाणात घ्यायचं, त्यांना अभिषेक घालायचा, कपड्याने (ह्याला एक चांगला शब्द आहे जो आता आठवत नाही) त्यांना कोरडं करायचं आणि मग त्यांच्या जागी पुन्हा त्यांची मांडणी करायची. मग सहाणेवर चंदन घासून त्यांना गंध लावायचा, कुंकू लावायचं. दुध साखरेचा नेवैद्य दाखवायचा. देवाला दिवा, अगरबत्ती लावायचं. मग तांब्यातल उरलेलं पाणी मागच्या दारी असलेल्या तुळशीला घालायचं. ते जास्तच उरलं असेल तर मग विहिरीत सोडून द्यायचं.  पूजा करत असताना खरं तर विशिष्ट स्तोत्र वगैरे म्हणायला हवं. माझी मर्यादा मारुतीस्तोत्र, गणपतीस्तोत्रच्या पलीकडे जात नसल्याने आलटून पालटून त्यांच्या सहाय्याने पूजा आटोपायची. शाळेत असताना पारनाक्यावरील कॉंग्रेस भवनात किंवा अजून एका हॉलवर सार्वजनिक गणपतीच्या वेळी पठण स्पर्धा होत. त्यावेळी मारुतीस्तोत्र पठनाची स्पर्धा असे. त्यात मला बहुदा उतेजनार्थ बक्षीस मिळे आणि दोन रुपये मिळत. त्या निमित्ताने मारुतीस्तोत्र पाठ झालं ते झालं! 

पावसाळ्यात अंगणाच्या एका कोपऱ्यात दुर्वानी बराच प्रसार केला होता. पावसाच्या पाण्यावर त्या मस्त भरारून आल्या होत्या. मोठीआई सकाळी उठून त्यातील मोजक्या देवपूजेला घेऊन जायची. जमिनीतला ओलावा संपला आणि दुर्वांची सुकलेली पानं दिसू लागली. त्या भागातली दुर्वांची मुळं मरू लागली. दोन दिवस त्यांना पाणी देऊन जगवायचा मी प्रयत्न केला. पुढे पण टिकली तर किती बरं होईल! अंगणातलं प्राजक्ताचं झाड अजून हिरवंच आहे पण बहर मात्र थोडा कमी झाला आहे.

होळीवर भाजीसाठी अनेक फेऱ्या झाल्या. बहुतेक सर्व भाजीवाल्या भाजीच्या दर्जाविषयी अगदी स्पष्ट सांगतात. ह्या मोसमातील होळीवरची भाजी अगदी मन प्रसन्न करून टाकते. मुळा, माठ, तांदूळका, लाल माठ, पालक, खापरा, लहान मेथी, मोठी मेथी - पालेभाजीचेच अनेक प्रकार! ह्या काळात अल्कोल आणि नवलकोल अशा दोन प्रकारची सुद्धा भाजी येते. थोडंस कळायला लागल्यापासून अल्कोल आणि अल्कोहोलचा काहीतरी संबंध असावा असा मला दाट संशय होता. कोथिंबीरसुद्धा मस्त दिसत होती. तिच्या हिरव्यागार रंगावर खुश होत चांगल्या दोन जुड्या घेतल्या. घरी काय होईल ह्याची पर्वा न करता! दुधी तर अगदी कोवळा मिळाला. पडवळ, वाल वांगी, फरसबी, भेंडी, पापडी, सिमला मिरची, पातीचा कांदा ह्यांनी समग्र पिशव्या काठोकाठ भरल्या. पण सफेद वेलचीची केळी, संत्र, डाळिंब, सफरचंद ह्यांना जागा तर करावीच लागली. कांदे बटाटे सुद्धा अगदी मस्त होते. ओला कांदा मस्त लाल दिसत होता. हा चांगला दिसतोय, तो पण चांगला दिसतोय असं करता करता चांगले दोन किलो झाले. पस्तीस रुपये किलोचा भाव देताना शरद पवार आठवले! कांदे बटाट्यांना स्कूटरच्या पोटात बसवले. त्या नाजूक स्कूटरवर मी आणि समग्र भाजीचे प्रतिनिधित्व घेऊन कसाबसा घरी आलो. 
दुसऱ्या एका दिवशी मासळीमार्केटला गेलो. पापलेटचे भाव अगदी आकाशाला भिडलेले होते. ३ पापलेट म्हणे २००० रुपये. त्यांनी सांगितलेल्या भावाचा थेट अर्धा भाव सांगायचा हा प्राजक्ताने सांगितलेला नियम आचरणात आणण्याचे धारिष्ट झाले नाही. पैसा उगाच खर्च नाही करायचा. मग मोर्चा कोलंबी, बोंबील आणि गोळीचं खारं ह्याच्याकडे वळवलं. गोळीचं खारं अगदी मस्त मिळालं. तिने थोडं महागच दिलं पण ताजेपणा अगदी भरभरून दिसत होता. तिला जरा चिडवायला "पण नक्की ताजं आहे ना?" असे मी पैसे देता देता शुद्ध मराठीत विचारलं. "आ, मी दररोज इथे बसे नयं? असे तिने गुश्श्यातच प्रत्त्युत्तर दिलं. मोठ्या कोलंबीचा सहाशेचा वाटा असा भाव सांगितल्यावर मी छोट्या कोलंबीकडे मोर्चा वळवला. ती कोळीण बिचारी चाळीस चाळीस असे दोन वाटे द्यायला तयार झाली. सोलून देशील का? असे मी फारशी अपेक्षा न ठेवता विचारलं. आणि ती तयार सुद्धा झाली. दहा मिनिटात तिने कोलंबी सोलून दिल्यावर मी शंभरची नोट तिच्या हाती सोपवल्यावर तिच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले.
वसईच्या कला क्रीडा महोत्सवाचे पंचविसावे वर्ष! तुम्ही जर मुंबईत राहणारे असाल तर नक्की ह्या प्रदर्शनाला भेट द्या! दरवर्षी २६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर ह्या कालावधीत हे प्रदर्शन भरतं. वसई विरार परिसरातील विविध शाळा नृत्य, गायन, सुगम संगीत, छायाचित्रण, क्रीडास्पर्धांत भाग घेतात. धावण्याच्या, कबड्डी, खोखोच्या, बॉक्सिंगच्या स्पर्धा होतात. रांगोळी विभाग तर अप्रतिमच! बाकी मग शरीरसौष्ठव, मिस वसई,  पर्सनॅलिटी स्पर्धा सुद्धा होतात. ह्या स्पर्धेच्या आयोजनात काम करणाऱ्या आणि कधीही व्यासपीठावर येऊ न शकलेल्या कार्यकर्त्यांना मनापासून सलाम! ह्या महोत्सवात उतेकर फिशरी ह्यांनी मस्त्य आणि पक्षीप्रदर्शनाचा जो विभाग मांडला आहे तो केवळ अप्रतिम! डोळ्याचे पारणे फेडून टाकणारा! असंच एक साधं घर असावं आणि त्यात असा एक फिश टैंक असावा. त्यातल्या त्या माशांच्या हालचालीकडे आणि त्या दगडांवरील धावणाऱ्या सूक्ष्म रेषांकडे तासंतास पाहत राहावं. मन भरून जायला इतकंस पुरेसं आहे ना! पक्षीप्रदर्शनात अगदी इवलेसे पक्षी होते. हे हिमालयातील दुर्मिळ पक्षी असावेत अशी माहिती तज्ञ प्राजक्ता ह्यांनी पुरवली. दुसऱ्या क्षणाला मी हिमालयातील ऋषी बनून गुहेत बसलो होतो आणि हे पक्षी माझ्या गुहेसमोरील आकाशाला भिडणाऱ्या सूचीपर्णी वृक्षावर विहार करीत होते. 
वसईच्या थंडीत अशा मस्त संध्याकाळी वडा पाव वगैरे खाण्याच्या आमच्या इच्छेवर आम्ही आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला. मैदानाच्या एका कोपऱ्यात मांसाहारी पदार्थांचे स्टॉल लागले होते. त्यातील वाडवळ स्टॉवर जाऊन वधडी ह्या खास वसई पदार्थाची एक डिश घेतली. 
सुट्टी संपत आली होती. अगदी लहानपणापासून ज्या वातावरणात दिवस घालवले तिथेच पुन्हा जवळजवळ दोन आठवडे होतो. ऑफिससुद्धा नशिबाने शांत होते. अशाच वातावरणात कायम राहावं असा विचार अनेकदा मनात येऊनसुद्धा गेला. पण कर्तव्य बोलावत होतं. अमेरिकेतील माझ्या कंपनीच्या कार्डची जबाबदारी जणू काही मीच माझ्या खांद्यावर घेतली होती. सोमवार सकाळी कार काढली आणि बोरीवलीला परतलो. 
२०१४ खरंतर येत्या दोन तासात संपेल पण माझ्यासाठी ते रविवारी रात्रीच वसई मैदानावरून परतताना संपलं होतं. 
आपणा सर्वांना २०१५ आरोग्यपूर्ण आणि सुखासमृद्धीच जावो ही शुभेच्छा!

शुक्रवार, २६ डिसेंबर, २०१४

इंद्रायणी - ४


 
रात्रीची वेळ असल्याने इंद्रायणी आणि यमुनाबाई झोपल्या होत्या. मी घरी परतलो आहे हे कोणालाच कळता कामा नये अशी सक्त ताकीद गोपाळरावांनी सगुणाबाईंना दिली होती. त्यामुळे अर्थातच इंद्रायणी आणि यमुनाबाईंनासुद्धा ह्या गोड बातमीपासून वंचित ठेवावं लागणार होतं. गोपाळराव स्वच्छ आंघोळ करून आले. कांबळीवर झोपलेल्या आपल्या लाडक्या इंद्रायणीला पाहून त्यांना अगदी गहिवरून आलं. "तीन महिन्यात आपली छकुली किती मोठी झाली नाही?"  त्यांनी सगुणाबाईंना म्हटलं. असा थेट संवाद आपल्याशी कधी साधला असेल ह्याच्याच विचारात पडलेल्या सगुणाबाई आपल्या स्वामीकडे एकटक पाहत होत्या. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाकडे खरंतर त्यांचं लक्षही नव्हतं. पण डोळ्यातील भावातून त्यांनी ओळखलं की ते इंद्रायणीविषयीच काहीतरी कौतुकाने बोलत असावेत. मानेनेच त्यांनी त्यांना हो म्हटलं. आपल्या धन्याच्या खंगलेल्या प्रकृतीकडे पाहून त्यांचे डोळे सारखे भरून येत होते. गोपाळरावांनी न राहवून इंद्रायणीच्या कपाळावरून हात फिरवला. गाढ झोपेतल्या इंद्रायणची झोप काहीशी चाळवली गेली. तिने कूस बदलली. गोपाळराव सावधपणे मागे अंधारात गेले. आणि काही क्षणातच इंद्रायणीने डोळे उघडले. "बाबा, बाबा!" तिची चौकस नजर सर्वत्र भिरभिरत होती. "नाही ग! बाबा कोठे आहेत! तुला भास झाला असेल!" सगुणाबाईंनी प्रसंगावधान राखून दिवा विझवता विझवता तिला म्हटलं. इंद्रायणीची  समजूत काही झाली नाही. बराच वेळ ती अंधारात चाहूल घेत राहिली. "बाबा खरंच येऊन गेले, त्यांनी माझ्या डोक्यावरून हात सुद्धा फिरवला!" असंच काही वेळ पुटपुटत शेवटी ती निद्राधीन झाली. 

गोपाळरावांनी असेच दोन दिवस मागच्या पडवीत लपून काढले. इंद्रायणीला त्यांच्या अस्तित्वाचा राहून राहून भास होत राहिला. चुकून एकदा गोपाळरावांची वहाणा सुद्धा तिच्या नजरेस पडली. पण सगुणाबाईंनी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. यमुनाबाईंची चौकस नजर मात्र चाहूल घेत राहिली. अख्खं आयुष्य ज्याच्या आसेवर काढलं तो पोटचा गोळा इतका जवळ आजूबाजूला वावरत असताना त्यांना कळणार नाही हे शक्यच नव्हतं. जेवायला भात ठेवताना सगुणाबाईचं वाढीव माप त्यांच्या नजरेतून सुटलं नाही. न राहवून त्यांनी सगुणाबाईंना नजरेनेच विचारलं. सगुणाबाईंच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी त्यांना उत्तर दिलं. "कसा आहे तो!" त्यांनी गदगदल्या स्वरांनी सगुणाबाईंना विचरलं. "ठीक आहेत, पण खूप कृश झालेत!" सगुणाबाईंनी उत्तर दिलं. "भेटेल का ग तो मला?" परिस्थितीची पूर्ण जाणीव असलेल्या यमुनाबाईंनी त्यांना विचारलं. "बघुयात आज रात्री! खूप काळजी घ्यावी लागतेय" सगुणाबाई म्हणाल्या. 
इंद्रायणी खेळायला तिच्या मैत्रीण, सुधाकडे आली होती. पण तिचं लक्षच लागत नव्हतं. राहून राहून बाबा घरी आलेच आहेत असंच तिला वाटत होतं. दोघीजणीचा नेहमीप्रमाणे भातुकलीचा खेळ चालला होता. "मी किनई आज मस्तपैकी वरणभात भाजी बनविली आहे, आई, बाबा, आपण सर्व जेवायला बसुयात!" सुधा म्हणाली. बाबा हे शब्द ऐकताच इंद्रायणीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. छोट्या सुधेला पट्कन काय करावं सुचेनासं झालं. तिने मग इंद्रायणीला म्हटलं, "रडू नकोस! आपण दुसरा काही खेळ खेळुयात!" "आता राहू देत, नंतर खेळुयात! मी येते नंतर!" असं म्हणून इंद्रायणी घराकडे निघाली. 
इंद्रायणी घरी परतली. आई स्वयंपाकघरात जेवण बनविण्यात तर आजी देवघरात पूजेत मग्न होत्या. इंद्रायणीच्या मनात खूप विचार येत. पूर्वी बाबांशी ती मनातले हे सर्व विचार बोलून दाखवायची. बाबांच्या उत्तराने मग तिचं विचारचक्र अजून पुढे जायचं. आता तिला ह्या संवादांची खूप खूप
आठवण यायची. ती बाहुलीशी, बागेतल्या झाडांशी संवाद साधायची. पण हा एकतर्फीच असायचा. मन मोकळं व्हायला हा संवाद बरा पडायचा. 

दिवसभराची काम आटपता आटपता रात्र कधी झाली हे सगुणाबाईंना समजलं सुद्धा नाही. यमुनाबाई मात्र दिवसभर आशेने त्यांच्याकडे पाहत राहिल्या.  एकदाची रात्र होताच मात्र सगुणाबाईं हळूच गोपाळरावांना हाक मारावयास गेल्या. पण तिथे त्यांना अजून एक अनोळखी माणूस नजरेस पडला. त्याच आणि गोपाळरावांचं हळू आवाजात बोलणं सुरु होतं. सगुणाबाईना पाहताच त्या माणसाने आपलं बोलणं आटोपतं घेतलं. तो माणूस निघून जाताच गोपाळराव ताडकन उठले. त्यांनी झटपट आपला बाडबिस्तारा आवरला. सगुणाबाई प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहत होत्या. "बहुदा इंग्रजांना खबर लागली आहे, मला तातडीने निघावं लागेल!" त्यांनी सगुणाबाईंच्या शंकेचे निरसन केले. "पटकन तितकं सासूबाईंना तरी भेटून जा, त्या समजून चुकल्या आहेत!" सगुणाबाई म्हणाल्या. एव्हाना यमुनाबाई कानोसा घेत मागे पोहोचल्याच होत्या. काठी घेत येणाऱ्या आपल्या वयोवृद्ध आईला पाहताच गोपाळरावांनी स्वतःवर घातलेले सर्व निर्बंध मोडून पडले. ते झटकन आईजवळ गेले. मायलेकराची ही भेट अनोखीच होती. यमुनाबाईंना भावनावेग अनावर झाला होता. "किती खंगलास रे तू!" आपल्या कृश हातांनी गोपाळरावांचे अंग चाचपत त्या म्हणाल्या. "हो ना आई!" गोपाळराव आईशी बोलत असले तरी त्यांचे कान आवाजाचा कानोसा घेत होते. अचानक त्यांना बहुदा कसली तरी चाहूल लागली असावी. "येतो मी!" असे म्हणत एका क्षणात ते मागच्या दाराने उडी मारून वाडीत गायब झाले. "काय ग बाई हा  प्रकार!" यमुनाबाई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या. सगुणाबाई मात्र सावध झाल्या होत्या. त्यांनी घाईघाईने यमुनाबाईंना त्यांच्या खोलीत नेऊन झोपावयास सांगितलं. आणि स्वतःसुद्धा सर्व झटकन आटपून दिवा बंद करून बसल्या. इतक्यात दारावर ठकठक ऐकू आली. सगुणाबाईनी हातात दिवा घेऊन दरवाजा उघडला. पोलिसच होते. पुढील तासभर त्यांनी घराची पूर्ण तपासणी केली. पण त्यांना कसलाच सुगावा लागला नाही. छोट्या इंद्रायणीला जाग येताच त्यांनी तिला सुद्धा विचारलं. "बाबा आले होते का इथे!" इंद्रायणी झोपेतून उठली होती पण तिने लगेचच आईच्या चेहऱ्यावरील भय जाणलं. आणि तिला जरी बाबांच्या वास्तव्याचा सतत भास होत असला तरी तिने प्रत्यक्ष बाबांना पाहिलं नव्हतं. त्यामुळे तिने नकारार्थी उत्तर दिलं. एव्हाना पोलिस सुद्धा वैतागलेच होते. आणि मग त्यांनी तिथून निघायचं ठरवलं. 
४६ चा पावसाळा अगदी जोरात सुरु होता. यमुनाबाईंनी गोपाळरावांचं जे कृश रूप पाहिलं होतं त्याच त्यांच्या मनाला खूप लागून राहिलं. ह्या प्रसंगानंतर यमुनाबाईंनी अंथरूण धरलं! त्यामुळे सगुणाबाईंची खूपच ओढाताण होऊ लागली. उपचारासाठी गावचा वैद्य अधूनमधून यायचा. पण औषधउपचारांसाठी आता सगुणाबाईंकडे   फारसे काही पैसे शिल्लक उरले नव्हते. त्यामुळे दिवसेंदिवस यमुनाबाईंची तब्येत ढासळू लागली होती. इंग्रज अगदी हात धुवून गोपाळराव आणि मंडळींच्या मागे लागले होते. त्यामुळे ही मंडळी कायमची भूमिगतच राहिली होती. सर्व भार एकट्या सगुणाबाईंवरच पडला होता. इतक्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी जिद्द करून इंद्रायणीला गावातल्या बालवाडीत टाकलं. 
छोट्या इंद्रायणीच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला होता. आईने तिला आता हळूहळू बरीच कामे करायला शिकवलं होतं. आळीतील गणपतकाकांकडून सकाळी दुध घेऊन येणं. घरातील कचरा गोळा करणं. आजीला काही हवं नको ते पाहणं. आपल्या इवलाश्या डोळ्यांनी इंद्रायणी सर्व पाहत होती. जमेल तितकी मदत आईला करत होती. सायंकाळी दिवेलागणी झाली की शुभंकरोति म्हणून एका कोपऱ्यात मुळाक्षरे गिरवत बसायची. लाड करून घ्यायची बालसुलभ इच्छा तिला अजिबात होत नसे असंही नव्हतं. पण परिस्थितीने तिला अचानक मोठेपण बहाल केलं होतं. आईचा मायेचा एक स्पर्श आणि बिछान्यावर पडलेल्या आजीची कौतुकाची एक नजर तिला ही जबाबदारी पेलवायची एक नवीन जिद्द देऊन जात असे. तिचं बालपण असं अचानक संपलं म्हणून खंत वाटणारे तिन्ही जीव अगदी असहाय होते. 

(क्रमशः)

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

जन पळभर म्हणतील हाय हाय!


 

जुन्या काळच्या ह्या प्रसिद्ध ओळी! एकंदरीत जगाचे रहाटगाडे कोणाच्या जगण्यावर अवलंबून नाही, जगी जन्मलेला प्रत्येक जीव कधी ना कधी मृत्यू पावणार, आणि त्यामुळे आपल्याशिवाय कोणाचे अडून राहील असा कोणी समज करून घेऊ नये असा ह्या ओळींचा मतितार्थ! ह्या ओळींत जगाच्या स्वार्थीपणाकडे थोडासा कल झुकला असावा असा मला नेहमीच संशय येत राहिला आहे. लोकांना तुमच्याकडून केल्या जाणाऱ्या कामाशी मतलब आहे, तुमच्याशी नाही असंही कविला म्हणायचं आहे असं कधी कधी मला वाटतं. शेवटी कवी म्हणतो की अशा ह्या दुनियेच्या मोहात पडू नये आणि ईश्वराच्या आराधनेत मग्न व्हावे कारण तेच अंतिम सत्य आहे!

माहिती आंतरजालावरून घेतलेलं ह्या गीताचं पूर्ण रूप!

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहील कार्य काय ?

सुर्य तळपतील, चंद्र झळकतील
तारे अपुला क्रम आचरतील
असेच वारे पुढे वाहतील
होईल काही का अंतराय ?

मेघ वर्षतील, शेते पिकतील
गर्वाने या नद्या वाहतील
कुणा काळजी की न उमटतील
पुन्हा तटावर हेच पाय

सखे सोयरे डोळे पुसतील
पुन्हा आपुल्या कामी लागतील
उठतील बसतील, हसूनी खिदळतील
मी जाता त्यांचे काय जाय ?

अशा जगास्तव काय कुढावे
मोही कुणाच्या का गुंतावे
हरीदूता का विन्मुख व्हावे
का जिरवू नये, शांतीत काय ?
 

आज हे गीत आठवायचं कारण की गेल्या काही दिवसात नात्यामध्ये अनेक दुःखद घटना घडल्या. काही तर अगदी जवळच्या!  एका महिन्यात जवळजवळ अशा दहा बातम्या आल्या. आणि धर्मसंकट असे होते की अगदी जवळच्या नात्यात एका वर्षापासून ठरविलेलं लग्नही होतं. आणि दुःखद बातम्या एकाच बाजूच्या नव्हे तर वरपक्ष आणि वधूपक्ष ह्या दोन्ही बाजूच्या!दोन तीन देशातून ह्या लग्नासाठी मंडळी तिकिटे आरक्षित करून आली होती. अशा वेळी मोठा बिकट प्रसंग होता. हल्लीच्या काळात लग्नाची सर्व तयारी जुळवून आणायचं म्हणजे मोठी कसरत! सर्व मंडळींनी मग अगदी संयमाने वागून लग्न व्यवस्थित पार पडलं. अगदी जवळचे नातेवाईकसुद्धा छातीवर दगड ठेवून लग्नसमारंभाला उपस्थिती लावून गेले. एकदाचं लग्न आटपलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला! आता आनंदाचा क्षण किती प्रमाणात साजरा करायचा ह्या प्रश्न ज्याचा त्याचा!
पूर्वीच्या काळात कदाचित हे लग्न पुढे ढकललं गेलं असतं पण हल्लीच्या इतक्या गुंतागुंतीच्या जगात हे काही शक्य नव्हतं. 

आता ह्या घटनेवरून मी ह्या गीताशी पूर्णपणे असहमती दाखवू इच्छितो. दुनियेला आपला कार्यभार सांभाळावाच लागतो. मनात कितीही दुःख असलं तरी कर्तव्य कोणाला चुकलंच नाही. जेव्हा कोणाच्याही मृत्यूची बातमी येते त्यावेळी बहुतेकजणांच्या मनात आपलंही कधीतरी असे होणारच आहे हा विचार क्षणभर येऊनच जातो. पण त्यानंतर मात्र ह्या निष्ठुर दुनियेतील आपल्या जबाबदाऱ्या हा विचार मागे टाकून देतो. 

बाकी आमच्या गावातील दोघाजणांचा खास उल्लेख ह्या पोस्ट्मध्ये! त्यांना त्यांची नावे घेतलेली सुद्धा आवडणार नाही. पण आनंदाचा क्षण असो वा दुःखाचा! दोघंही जण सर्व विधी व्यवस्थित पार पडले जात आहेत की नाही ह्याची पूर्ण जबाबदारी घेणार! अगदी बारीकसारीक गोष्टींवर पूर्ण लक्ष ठेवून असणार! गावातील लग्नघरी ह्या दोघांचं आगमन झालं कि यजमान निश्चिंत! आणि उपलब्ध परिस्थितीत हे दोघं हमखास मार्ग काढणार. ते सुद्धा अधिकारवाणीने!पण लग्न आटोपल्यावर समजा कोणी छोटासा भोजनसमारंभ आयोजित केला तर मात्र ते तिथे अजिबात येणार नाहीत!

लेखाच्या शेवटी पाकिस्तानातील त्या निष्पाप बालकांचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. इतकं क्रूर कृत्य कोणी माणूस कसा करू शकतो? जरी तुम्ही स्वतःचा जीव घेणार असाल तरीही ज्यांनी स्वतः आणि त्यांच्या आईवडिलांनी इतकी स्वप्नं पाहिली आहेत त्यांचा असा निष्ठुरपणे चोळामोळा करण्याचा कोणालाच अधिकार नाही. ह्या घटनेनंतर मात्र कवीचे बोल खरे वाटू लागतात!

शनिवार, २० डिसेंबर, २०१४

इंद्रायणी - ३


 
त्या रात्रीनंतर जोशी कुटुंबाचं जीवन अगदी बदलूनच गेलं. नारायणरावांच्या बैठकीवर ब्रिटिशांनी छापा घातला खरा पण त्याची कंपूला अगदी शेवटच्या क्षणी खबर लागली आणि सर्वांनी तिथून पोबारा केला. परंतु पळताना सर्व पुरावा नष्ट करण्याची संधी मात्र त्यांना मिळाली नाही. आणि मग गोपाळरावांच्या नावाची कागदपत्रे तिथेच राहून गेली. सरकारी नोकरीत असलेल्या शिक्षकाने इंग्रजांविरुद्धच्या कटात भाग घेणं म्हणजे मोठे पातक होते. गोपाळराव रात्री येणार नाहीत असा निरोप मिळाल्यावर सगुणाबाईच्या काळजात धस्स झालं. इतक्या शिस्तीच्या गोपाळरावांना बाहेर रात्र काढावी लागणार ही फार बिकट गोष्ट होती. पानावर लोणच्याची जागा तसूभर जरी बदलली तरी अस्वस्थ होणारे गोपाळराव आज जेवतील कोठे? हा विचार त्यांना छळत राहिला. घरात फक्त त्या तिघीजणीच होत्या. यमुनाबाई अगदी वार्धक्याला टेकलेल्या आणि छकुली इंद्रायणी अजून हे सारं समजण्याच्या पलीकडे होती. त्या दोघींची कशीबशी समजूत काढत त्यांना सगुणाबाईनी जेवायला लावलं.  त्या दोघीजणी झोपल्या खऱ्या पण सगुणाबाईंना मात्र डोळ्याला डोळा लागेना. जेवायची तर इच्छाच नव्हती. तांब्याभर पाणी पिऊन त्या रात्र जागवत बसल्या. 
त्या दिवसानंतर घरी पोलिसांच्या अधूनमधून फेऱ्या सुरु झाल्या. गोपाळरावांची घरी फेरी झाली वगैरे की नाही ह्याची कसून चौकशी केली जायची. यमुनाबाईनी ह्या सर्व प्रकरणाचा इतका धसका घेतला की त्या अंथरुणालाच खिळल्या. आताशा घर चालविण्याची जबाबदारी सुद्धा कठीण होऊन बसली होती. वाडीतील उत्पन्न असलं तरी त्या कामात सगुणाबाईंना मोजका अनुभव होता. आणि ह्या चौकशीचा ससेमिरा मागे लागल्यापासून सर्व नातलग सुद्धा चार पावलं दूरच राहत होते. पगार बंद झाल्याने हातात पैशाची चणचण भासू लागली होती. शेवटी एक दिवस मन धीट करून त्या वाडीतील भाजी घेऊन विकायला बाजारात घेऊन गेल्या. थोडेसे पैसे मिळाले आणि लोकही भेटली त्यामुळे मन कसं थोडं हलकहलक झालं. 
दोन तीन महिने असेच निघून गेले. तिचा तिसरा वाढदिवस येऊनही गेला. गोपाळराव घरी असते तर त्यांना समजला तरी असता. पण आता तर काही कोणाला समजायचा वावच नव्हता. छोट्या इंद्रायणीला हा सर्व प्रकार कळेनासा झाला होता. तिचे लाडके बाबा बरेच दिवस घरीच आले नव्हते. आईच्या डोळ्यात बराच वेळ पाणीच असायचं. आणि आजीतर बराच वेळ झोपूनच असायची. आई तिच्या परीने इंद्रायणीची काळजी घ्यायची पण त्यात आता बराच फरक पडला होता. हल्ली आई आपले लाड करू शकत नाही हे इंद्रायणीने कधीच ओळखलं होतं. पण समंजस असल्याने ती गप्प असायची. ह्या परिस्थितीत तिची बाहुली आता तिला जवळची वाटू लागली होती. तिच्या बोबड्या बोलांच कौतुक करणारे बाबा घरी नसल्याने तिचे बोबडे बोलही आता हळूहळू 
आज सगुणाबाईंची मनःस्थिती अगदी खिन्न झाली होती. मागच्या बाजाराच्या वेळी मिळालेले सर्व पैसे संपून गेले होते. काल वाडीत जाऊन काही विकायला योग्य अशी काही भाजी वगैरे मिळेल का ह्याची पाहणी करून त्या आल्या होत्या. पण फारसं काही मिळालं नव्हतं. आणि अशातच सकाळी इंद्रायणी उठतच नव्हती. बाजारात जायच्या आधी तिला उठवून घरावर लक्ष ठेवायला सांगायचा त्यांचा विचार होता. पण ती उठतच नसल्याने शेवटी चिडून त्यांनी तिला एक चापटी मारली. इंद्रायणीला आतापर्यंत कोणीच रागानं ओरडलं सुद्धा नव्हतं आणि अचानक आता आईने अशी रागाने चापटी मारली तेव्हा तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. आज कसं तिला अस्वस्थ वाटत होतं. पण तिला सांगता येत नव्हतं. ती गप्प उठून बसून राहिली. तिला उठलेली पाहून सगुणाबाई बाजारात निघाल्या. 
इंद्रायणी बाहुलीला घेऊन पुन्हा खाटेत शिरली. 
"आज न मला बरं वाटत नाहीय!" ती बाहुलीला म्हणाली. 
"आईने मला आज मारलं! बाबा असते तर कधीच मारलं नसतं!" डोळ्यात अश्रू आणत ती म्हणाली. 
"बाबांची मला खूप खूप आठवण येतेय! बाबा कधी येणार तुला माहितेय का ग?" अबोल बाहुलीच्या डोळ्यातील भाव बदलतायेत असं उगाचच इंद्रायणीला वाटून गेलं.
बाबांची तिला आज खूप खूप आठवण येत होती. बरं वाटत नसताना सुद्धा ती उठून वाडीत निघाली. पूर्वी तिला एकटीने ह्या वाडीत जायला खूप खूप भिती वाटायची. पण हल्ली मात्र इंद्रायणी खूप धीट बनली होती. ती एकटीच वाडीत जायला अजिबात भ्यायची नाही. फणसाचे झाड येताच ती त्या झाडाच्या गर्द छायेत बसली. पावसाळा अगदी तोंडाशी येउन ठेपला होता. काटेरी फणस कसे सुंदर दिसत होते. पण पुन्हा एकदा शंकरकाका ह्या सर्व फणसांना काढून नेणार ह्या विचारांनी ती दुःखी झाली. "बाबा आले ना की मी त्यांना सांगणार आहे, ह्या सगळ्या फणसांना इथेच राहून द्या म्हणून!" फणसाच्या झाडाला तिने आश्वासन दिलं. त्या झाडाला आपल्या नाजूक हातांनी तिने मिठी मारली. थोड्या वेळ तिथेच बसून मग ती घरी परतली. 
सगुणाबाईंना बाजारात भाजी विकून काही पैसे मिळाले. लगबगीने त्या घरी आल्या. छोट्या इंद्रायणीला उंबरठ्यावर बसून आपली वाट पाहत असलेली पाहून त्यांना गहिवरून आलं. त्यांनी टोपलं तसंच बाजूला ठेवत तिला कुशीत घेतलं. तिच्या अंगाचा स्पर्श त्यांना अगदी गरम लागला. कपाळाला हात लावला तर चांगलाच ताप होता तिला! त्यांनी मोठ्या अपराधी भावनेनं तिला तत्काळ खाटेवर झोपवलं. डोक्यावर मिठाच्या पट्ट्या ठेवल्या.  गरमागरम कणेरी करून दिली इंद्रायणीला.
दिवसभर आई मग इंद्रायणीच्या बाजूलाच बसून राहिली. आई बाजूला बसली म्हणून किंवा तिच्या उपचारांचा प्रभाव म्हणून संध्याकाळपर्यंत इंद्रायणीचा ताप अगदी उतरून गेला. इंद्रायणीचा ताप उतरलेला पाहून सगुणाबाईंना हायसं वाटलं. बऱ्याच दिवसांनी त्याही दोन घास व्यवस्थित जेवल्या. 
रात्री सर्व आटपून, कडी कोयंडे लावून सगुणाबाई झोपायला आपल्या जमिनीवरील कांबळीवर पहुडल्या. गार वारं सुटलं होतं. पावसाला केव्हाही सुरुवात होणार होती. 
इतक्या दिवसात फक्त दोनदा गोपाळरावांचे गुप्त संदेश आले होते. मी आता पूर्णवेळ स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायचं आहे म्हणून! बाजारात एखादा माणूस भाजी घ्यायला आला कि पैशासोबत ही चिठ्ठी सोपवायचा. गेल्या चार महिन्यात अशी चिठ्ठी दोनदा आलेली पाहून सगुणाबाईंचा धीर वाढला होता. आपल्या मातृभूमीसाठी गोपाळराव इतके कठोर श्रम घेत असतील तर आपणास सुद्धा कष्ट करायलाच हवे असा मनोमन निग्रह त्यांनी केला होता. इंद्रायणीला पुढच्या वर्षी शाळेत प्रवेश मिळवायला हवा असाही त्यांनी विचार केला.
अचानक पावसाच्या जोरदार सरींचा आवाज सुरु झाला. ओल्या मातीचा पहिला गंध वातावरणात पसरला. गोपाळरावांना हा मृद्गंध खुप आवडायचा. त्यासाठी ते खास पहिला पाऊस पडला की बाहेर पडायचे. एकदा तर त्यांनी नजरेने सगुणाबाईंना तू ही चल माझ्यासोबत हा मृद्गंध घ्यायला असेही सुचवले होते. आपल्या अगदी कडक जीवनात अशा मृदुल क्षणाचे अगदी क्वचितच होणारे शिडकावे सगुणाबाईंच्या कायम लक्षात राहिले होते. 
अचानक मागल्या दारावर कडी ठोठावल्याचा आवाज ऐकू आला. सगुणाबाई दचकल्या. काही वेळ पुन्हा शांत गेला. कदाचित आपल्याला भास झाला असेल म्हणून त्यांनी झोपायचं ठरवलं. पावसाने अगदी जोर धरला होता. पहिला पाऊस इतक्या जोरात क्वचितच होत असे. आज काहीतरी वेगळंच घडणार आहे कि काय असे सगुणाबाईंना  राहून राहून वाटू लागलं. पुन्हा एकदा मागल्या दारची कडी ठोठावली गेली. आता मात्र सगुणाबाई उठल्या. मनात भय तर होतंच पण हातात एक कोयता घेऊन त्या पुढे निघाल्या. दिवा केव्हाचा विझला होता. दाराजवळ येताच त्यांनी हळूच कानोसा घेतला. काही क्षण असेच शांत गेले. "सगुणा मी आहे!" अशी गोपाळरावांची हाक त्यांच्या कानी पडताच त्यांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना. अगदी घाईघाईने त्यांनी कडी उघडली. समोरची व्यक्ती पाहताच मात्र त्या अगदी हादरून गेल्या. दाढी वाढलेली, अगदी कृश देह, अंगावर पावसाने ओले झालेले, फाटके पण स्वच्छ कपडे - ही समोर उभी असलेली व्यक्ती गोपाळरावच आहे ह्यावर त्यांचा विश्वासच बसेना. पण त्या घाऱ्या डोळ्यातील चमक मात्र कायम होती. "गोपाळराव!" मोठ्यांने हंबरडा फोडून सगुणाबाईंनी त्यांच्या पायांना घट्ट मिठी मारली. 

(क्रमशः)










रविवार, १४ डिसेंबर, २०१४

इंद्रायणी - २


 
 जेवल्यानंतर छोट्या इंद्रायणीला झोप येऊ लागली  तशी सगुणाबाईनी सारवलेल्या खोलीत तिला एक घोंगड टाकून दिलं आणि अंगावर एक चादर ओढून दिली. इंद्रायणीनं मग आपल्या बाहुलीचा हट्ट धरला. कौतुकाने सगुणाबाईनी तिची ती जुनी बाहुली इंद्रायणीला आणून दिली. आपल्या इवलाश्या हातांनी इंद्रायणीनं बाहुलीला छातीशी घट्ट पकडलं. डिसेंबर महिन्यातला कोकणातला थंड वारा कौलारू घरातून आत शिरत होता. सगुणाबाई तिला हळुवार हातांनी थोपटू लागल्या. तिच्या नकळत त्यांनी तिच्या अंगावर चादरही ओढली. हळूहळू इंद्रायणीचे घारे डोळे पेंगू लागले. मोठ्या कौतुकाने झोपलेल्या ह्या आपल्या बाहुलीकडे सगुणाबाई काही वेळ कौतुकाने पाहतच राहिल्या. 
अचानक त्यांना गोपाळरावांची आठवण झाली तशा त्या उठल्या. गोपाळराव आपल्या अभ्यासाच्या खोलीत लिखाणात मग्न होते. अशा वेळी त्यात व्यत्यय आणलेला त्यांना खपत नसे. माजघरात नजर टाकली तर यमुनाबाईंचा सुद्धा डोळा लागला होता. मग सगुणाबाई शंकरने आणून टाकलेल्या फणसाची वर्गवारी करण्यात गढून गेल्या. उद्या बाजारात ह्याला चांगला भाव नक्कीच येईल अशी आशा करायला हरकत नाही असे त्यांना वाटू लागले. 
इतक्यात त्यांना गोपाळरावांच्या हालचालीचा आवाज आला. गोपाळराव तयार होऊन बाहेर निघाले सुद्धा होते. "असे अचानक कोठे निघालात?" मोठं धाडस करून सगुणाबाईंनी त्यांना विचारलं. "एक महत्वाची बैठक आहे नारायणरावांकडे!" असे म्हणत गोपाळराव निघाले सुद्धा! "आताशा ह्यांच्या नारायणरावांकडे खूप फेऱ्या व्हायला लागल्या आहेत" असा विचार करीत सगुणाबाई काहीशा चिंताग्रस्त झाल्या. ब्रिटिशांनी कोकणात अनेक ठिकाणी छापे घालण्यास सुरुवात केली होती. आणि अशा वेळी नारायणरावांसोबत गोपाळरावांच्या सततच्या बैठका सगुणाताईंना चिंतेत टाकत होत्या. नारायणराव एक दोनदा तुरुंगात जाऊन सुद्धा आले होते. अशाच चिंतेच्या विचारात असताना सगुणाबाईचा सुद्धा काही वेळ डोळा लागला. मग त्यांना जाग आली आणि त्या आपल्या कामाला लागल्या. थंडीचे छोटे दिवस असल्याने अंगणातील झाडांची देखरेख लवकर आटपायची होती. गोपाळरावांनी बाग अगदी मस्त बनविली होती. विविध रंगांची फुलझाडे अगदी डोळ्यांना तृप्त करीत.
सूर्य आकाशातून उतरणीला आला तशी छोटी इंद्रायणीची झोप पुरी झाली. आपल्याजवळच झोपलेल्या बाहुलीला पाहून ती हसली आणि तिची मस्त खळी पडली. काही वेळ ती तसाच घरातील आवाजाचा मागोवा घेत पडून राहिली. घरात तर सर्व शांत शांत होते. मग तिला आपल्या आईचा बागेत बोलण्याचा आवाज आला. मग एकदम उठून ती ओटीवर आली. सूर्याची अगदी कोवळी किरणे बागेतल्या झाडातून आपला मार्ग काढीत ओटीवर पसरली होती. सगुणाबाईनी काही फुले काढली होती. काही उनाडपणे पसरणाऱ्या वेलींना मार्गी लावले होते. आणि आता त्या चाफ्याच्या एका फुलाकडे लक्ष ठेऊन होत्या. ते कसे काढायचे असा त्यांना प्रश्न पडला होता. "आई!" छोट्या इंद्रायणीच्या आवाजाने त्या भानावर आल्या. मोठ्या कौतुकाने त्या तिच्याकडे पाहू लागल्या. "आई, मला पन बागेत ने ना!" इंद्रायणी म्हणाली. 
आईने जशा तिला पायरीवरून उतरवून दिलं तसं इंद्रायणी बागेत पळत निघाली. बागेत पहिलंच तिला आवळ्याचे झाड दिसले. त्याचे काही छोटे आवळे खाली पडले होते. त्यातला एक तिने तोंडात घातला. सगुणाबाई तिची गंमत पाहत होत्या. "आंबत!" करत तिने तो आवळा फेकून दिला. मग हळूच ती थांबली. खाली पडलेल्या पालापाचोळ्यात एक छोटी चिमणी
दाणे शोधीत होती. "चिऊताई!" इंद्रायणीने तिला हाक मारली. चिमणीने तिच्याकडे पाहिलं. ही छोटी आपल्याला काही धोकादायक नसावी असे तिला वाटलं. पण इंद्रायणीने एक दोन पावलं पुढे टाकताच मात्र ती चिऊताई घाबरून उडून गेली. "मला चिऊताई पाहिजे!" काहीशा नाराजीने इंद्रायणीने आईकडे तक्रार केली. पण मग अंगणासमोरील रस्त्यावरून येणाऱ्या खिल्लाऱ्या बैलांच्या बैलगाडीच्या आवाजाने तिचं लक्ष वेधलं गेलं. ही बैलगाडी नजरेपलिकडे जाईस्तोवर मग ती एकटक तिच्याकडे पाहत राहिली. तिची बागेतील ही भेट बराच वेळ चालली असती, पण मग जसा अंधार होऊ लागला तसं सगुणाबाईंनी तिला हाक मारून बोलावलं. 
"अजून गोपाळ कसा नाही आला?" इतका वेळ सगुणाबाईंच्या मनात असणारी चिंता यमुनाबाईंनी बोलून दाखवली. बराच वेळ त्याही गोपाळरावांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. देवघरात दिवे लावून त्या तिघींनी प्रार्थना केली. प्रार्थना संपवून होताच इंद्रायणी म्हणाली, "आई मला भूक लागली!" तिला गरम गरम भाकरी वाढताना सगुणाबाईंच लक्ष दाराकडे लागून राहिलं होतं. आणि अचानक दारावर हाक ऐकू आली. 

(क्रमशः)





 

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०१४

इंद्रायणी - १



 
शाळेतून परतणाऱ्या गोपाळरावांची मूर्ती दिसताच सगुणाबाईंची धावपळ उडाली. ते परतले तरी स्वयंपाक पूर्ण झाला नव्हता. आज छोट्या इंद्रायणीने खूपच धावपळ उडवली होती. आज अगदी मस्तीचाच मूड होता इंद्रायणीचा. आणि मग सगुणाबाईंना सुद्धा राहवलं नव्हतं. त्या ही बसल्या तिच्याशी खेळत. मग आला तो वाडीत काम करणारा शंकर! त्यानं वाडीतले फणस काढून आणले होते. ते मोजून घेता आणि त्याला पैसे देताना अजून वेळ गेला होता. आता रागीट गोपाळराव काय करणार ह्याचीच चिंता सगुणाबाईंना लागून राहिली होती.
गोपाळरावांनी आपली टोपी काढून खुंटीला लावून ठेवली. इतक्यात छोटी इंद्रायणी आपल्या दुडक्या चालीनं धावत धावत गोपाळरावांसमोर आली. "बाबा बाबा आज किनई खूप खूप मज्जा झाली! वादीतून शंकरतातांनी मोते मोते कातेवाले फनस आनले!" तिच्या ह्या बोबड्या बोलांनी गोपाळरावांची छबी खुलली. तिला त्यांनी उचलून आपल्याजवळ घेतले.  "मग तू फणसाचा गरा खाल्ला कि नाही?" गोपाळरावांनी तिला विचारलं. "आईने नाहीच दिल्ला!" आईची तक्रार करीत छोटी इंद्रायणी म्हणाली. चुलीच्या धुरात भाकऱ्या भाजणाऱ्या आपली पत्नीकडे गोपाळरावांनी मोठ्या कौतुकाने पाहिलं. आज ते एकंदरीत प्रसन्न होते. जिल्हा पातळीवर आदर्श शिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती.
"बापलेकीचा काय वार्तालाप चालू आहे?" देवघरातून आपली पूजा आटपून येणाऱ्या यमुनाताईंनी प्रेमाने विचारलं. तिला गोपाळराव उत्तर देणार इतक्यात "बाबा बाबा आपण फनचाच झाड बगायला जाऊ या का!" असं इंद्रायणीने विचारलं. आज तिचा हा हट्ट मोडण्याची गोपाळरावांची अजिबात इच्छा नव्हती. "चला जाऊयात!" पायात पुन्हा वहाणा चढवीत गोपाळराव म्हणाले. त्यांच्या वाक्य ऐकताच सगुणाबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला. आता भाकऱ्या सुद्धा होणार होत्या आणि गोपाळरावांची आवडती वाल वांग्याची भाजी सुद्धा!
वाडीत  फेरफटका मारताना गोपाळराव नेहमीच प्रसन्न होत. आज इंद्रायणी सोबत असल्याने त्यांना तिची दुडकी चाल पाहण्यात अजून मजा वाटत होती. घनदाट सावलीने त्यांची वाडी व्यापली होती. वाडी नारळ, सुपाऱ्या, फणस आणि आंबे अशा झाडांनी भरगच्च भरली होती. काही वड, पिंपळाची मोठाले वृक्षही होते. गोपाळरावांच्या वाडीला लागुनच त्यांच्या चुलत्याची जमीन होती. फणसाचे झाड दिसताच इंद्रायणीच्या छोट्या पावलांची गती आपसूकच वाढली. "अग अग धावू नकोस! पडशील!" पित्याच्या मायेने गोपाळराव बोलायला आणि इंद्रायणीचा पाय अडखळून ती पडायला नेमकी गाठ पडली. तिचे कपडे मातीने माखले. इंद्रायणी तशी धीट! ती झटकन उठली. तोवर गोपाळराव तिच्याजवळ पोहोचले होते. त्यांनी तिला उचलून घेतलं आणि छातीशी कवटाळून धरलं. आता मात्र इंद्रायणीच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरु झाल्या. "अग वेडूबाई असं जरासं पडलं म्हणून काय रडायचं असतं थोडंच!" गोपाळरावांनी तिला प्रेमानं दटावलं.
पित्याच्या उबदार पकडीतून मग इंद्रायणीने नजर वर उचलली. तिचं फणसाचं झाड समोरच होतं. "बाबा बाबा इथे किन्नई एकही फणस नाहीये!" आपलं पडण्याचं दुःख विसरून ती म्हणाली. "आता कसे असणार? शंकरकाकांनी सगळे काढून नाही का नेले!" गोपाळराव म्हणाले. "मग त्या सगल्या फनसांना किती वाईत वातलं असेल नाही!" तिच्या ह्या स्वरांनी गोपाळरावांना अगदी आश्चर्य वाटलं. "हो त्या सगळ्या फणसांना जसं वाईट वाटलं तसं झाडाला सुद्धा वाईट वाटलं असणार! ते पण कसं आता एकट पडलं नाही का!" गोपाळराव म्हणाले. ह्या इतक्या छोट्या मुलीच्या तोंडी अशी मोठ्यांना शोभतील अशी वाक्य कशी येतात ह्याचंच त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं.
एव्हाना इंद्रायणीच मन भरलं होतं. बापलेकीची जोडी घरी परतेस्तोवर सगुणाबाईंनी पानं मांडून ठेवली होती.  पायावर पाणी टाकून मोठ्या प्रसन्न मनाने गोपाळराव पानावर बसले. पहिला घास त्यांनी तोंडात टाकला आणि त्यांनी अगदी खुश होऊन सगुणाबाईंकडे पाहिलं. चुलीचा धूरही आताशा घरातून नाहीसा झाला होता. त्यांच्या एका नजरेने सगुणाचा आजचा दिवस सार्थकी लागला होता.

(क्रमशः)

रविवार, ७ डिसेंबर, २०१४

स्व - अनुभव - फक्त दुसऱ्यांच्या नजरेतून!!


 
निसर्गतः बहुतांशी स्वकेंद्रित असलेले आपण स्वतःच्या अनुभवांची चिंता वाहण्यात इतके गर्क असतो की आपल्या अस्तित्वाने, बोलण्या चालण्याने, लिहिण्याने दुसऱ्यांना कसे अनुभव मिळतात हे बऱ्याच वेळा आपल्या खिजगणतीत सुद्धा नसते. 
काही माणसं फक्त साधी माणसं असतात. ती दैनंदिन व्यवहार करण्यापलीकडे काही करत नाहीत. एकंदरीत मनुष्यजातीच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत ह्या माणसांच्या अस्तित्वाने फरक पडला नाही असेही विद्वान म्हणू शकतात. पण ह्या साध्या माणसांची एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते आणि ती म्हणजे ह्या साध्या माणसांवर बाकीच्यांना खास लक्ष दयावे लागत नाहीत. ती भोळी भाबडी आपले नित्यक्रम सहजरीत्या पार पाडतात. बऱ्याच वेळा ही साधी माणसे अनेकांना आपलं ध्येय साध्य करायला मदत करीत असतात. एखाद्या मोठ्या खेळाडूला सरावासाठी तासनतास नेट्समध्ये गोलंदाजी करणारा सामान्य गोलंदाज, मोठ्या कलाकाराबरोबर चित्रपटातील गाण्यात बाजूला नाचणारी extra मंडळी अशी अनेक उदाहरण देता येतील. 
लेखाच्या मूळ मुद्द्याकडे! आपल्या दररोजच्या जीवनात आपण आपला जीवनसाथी, मुलं, आईवडील, भाऊबहिण, नातेवाईक ह्यांच्या संपर्कात येतो. आपल्या संस्कृतीचे आपल्या आईवडिलांनी / मोठ्या माणसांनी आपणास संस्कार दिलेले असतात. काहींना हे संस्कार मिळतात काहींना मिळत नाही. काही जणांना त्याऐवजी ह्या जीवनसंघर्षात कसं तगून राहायचं ह्याचे धडे परिस्थिती देते. अशा लोकांना स्वतःच्या वागण्यातून दुसऱ्यांना कसा अनुभव मिळतो ह्याचा विचार करण्याची चैन परवडत नाही. 
ज्यांना आपल्या वागण्यातून दुसऱ्याला कसा अनुभव मिळतो ह्याचा विचार करण्याची संधी परिस्थितीने दिले असते त्यातील फारच कमी लोक असा विचार करत असतात. ह्या अशा वागण्याची ह्या लोकांच्या म्हणण्यानुसार कारणे अनेक असतात. 
१) माझे ध्येय खूप मोठं आहे. ते साध्य करण्याऐवजी मी दुसऱ्याचा विचार करून कसा चालेल. 
२) मला अनेक प्रकारच्या लोकांबरोबर व्यवहार करावे लागतात. कसं वागल्याने त्यातील प्रत्येकाला बरं वाटेल हे माहित करून घेणं कठीण आहे. त्यापेक्षा ह्याचा विचारच न केलेला बरा!
३) माझ्या मनाची कोण पर्वा करतं का? मग मी दुसऱ्यांची का करू? 


आता आपण हे पाहूयात की दुसऱ्यांच्या जीवनात निखळ आनंद पसरवणारे ह्या पृथ्वीवर कोण आहेत? 
वैयक्तिक जीवनात माता, पिता, अपत्य, काही नातेवाईक तर सामाजिक जीवनात कलाकार (गायक, चित्रकार, शिल्पकार, अभिनेता, लेखक वगैरे वगैरे), सुंदर स्त्री / पुरुष, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत ही मंडळी जनांच्या जीवनात आनंद पसरवत असतात. काहीच्या व्यवसायातील कृतीने हा आनंद निर्माण होतो. तर काही वेळा काही मंडळी पैशाच्या मोबदल्याची आशा न बाळगता हा आनंद निर्माण करीत असतात.   
पुन्हा  एकदा सर्वसामान्य लोकांच्या जीवनात डोकावूयात 
१> आपल्या श्रीमंतीचं, विविध परदेशातल्या ठिकाणच्या भेटींचे सतत सोशल मिडिया मध्ये प्रदर्शन करणारी व्यक्ती स्वानंद हा केंद्रबिंदू ठेऊन वागत असते. ह्या प्रदर्शनाने ज्यांना ह्या गोष्टी साध्य होणे शक्य नाही त्यांच्या मनात काहीशी अतृप्तीची भावना निर्माण होणे शक्य आहे ह्याचा विचार केला जात नाही. ह्याउलट निसर्गाची, पक्षी प्राण्यांची सुरेख चित्रे लोकांसोबत शेअर करणारी व्यक्ती सर्वांना निखळ आनंदाची अनुभूती देते. कारण ह्यातील श्रीमंती निसर्गाची असते आणि त्या व्यक्तीच्या मनाच्या मोठेपणाची!
२> सार्वजनिक जीवनात व्यासपीठावर ज्यांना मानाची जागा हवी असते अशा काही व्यक्ती असतात. ९९ टक्के ही त्यांची वैयक्तिक गरज असते तर १ टक्का ही समाजाची गरज असते. आपली वैयक्तिक गरज भागवत असताना त्यांच्या हातून जर काही सत्कृत्य होत असेल तर कोणी खेद मानू नये. 
सार्वजनिक जीवनात स्वतःची टिमकी वाजवणारी काही मंडळी असतात. जोवर स्वानंद ह्या भावनेसाठी ही टिमकी वाजवली जाते तोवर ठीक असते पण ज्या क्षणी दुसऱ्याच्या मनात असूया, राग निर्माण करण्यासाठी ही टिमकी वाजवली जाते तेव्हा हा एक क्लेशदायी अनुभव बनतो. 
३> मला सार्वजनिक ठिकाणी कोणी भाव देत नाही किंवा मला हल्लीच्या दिखाऊ दुनियेची तत्व पटत नाहीत म्हणून स्वतःभोवती दुःखाचा कोष विणून बसणारी मंडळी ही दुसऱ्यांच्या दृष्टीने काहीही चांगला अनुभव निर्माण करीत नाहीत. ह्यातील काही जणांना सहानुभूती हवी असते तर काहींना ती सुद्धा नको असते.
४> पोस्ट्च्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काही मंडळी अगदी भोळी असतात. स्वतःचे हित न पाहता ती एक साधं आयुष्य जगत असतात. हे आयुष्य जगताना अधूनमधून कळत नकळत त्यांच्या हातून परहित साधलंही जात असत.

शेवटी आपण आपल्या ह्या भूतलावरील अस्तित्वाने दुसऱ्याला कसा अनुभव देतो ह्याचा हिशोब कोठेतरी मांडला जात असेल काय? अगदी खेचूनच धरलं तर ह्या संकल्पनेला पाप पुण्य असंही म्हटलं जाऊ शकतं. देव काही स्वर्गात बसले नाहीत, आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा त्याचाच अवतार आहेत. केवळ हा हिशोब कोठेतरी मांडला जात असेल म्हणून लोकांशी चांगलं वागणं चूक की बरोबर? जाऊ देत डोक्याला खूप त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही!!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...