शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५
२०२५ सप्टेंबर अमेरिका भेट
शनिवार, २० सप्टेंबर, २०२५
अमिश जीवनपद्धती
आमचं अमेरिकेतील कार्यालय विल्मिंग्टन डेलावेर इथं आहे. तिथल्या एका सहकाऱ्याशी गप्पा मारत असताना त्याच्या तोंडून अमिश लोकांच्या वसाहतीविषयी उल्लेख ऐकला. ह्या लोकांविषयी आधी काही माहितीपट पाहिले होते. ह्या चर्चेनंतर ह्या वसाहतीला प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा निर्माण झाली. २०२३ साली जून महिन्यात ह्या वसाहतीला भेट देण्याची संधी मिळाली. त्या भेटीच्या वृतांताआधी थोडा अमिश जीवनपद्धतीचा आढावा घेणं इष्ट ठरेल.
अमिश जीवनपद्धतीचा उगम कसा झाला ह्याचा इतिहास जाणून घेणं ही एक मनोरंजक बाब आहे. सोळाव्या शतकात जन्मतःच ख्रिस्त धर्माची दीक्षा देण्याच्या प्रथेच्या विरोधात सुरु झालेली चळवळ कालांतरानं चांगलीच फोफावली. ह्या पंथाची मुलभूत तत्त्वं नम्रता, समुदायभावना, उर्वरित (अमिश व्यतिरिक्त) जगापासून वेगळं जीवन जगणं, अहिंसा आणि साध्या जीवनसरणीला अंगीकारणे ह्यावर आधारित आहेत. हे सर्व ऑर्डनुंग (Ordnung) नावाच्या अलिखित आचारसंहितेने मार्गदर्शित असते. थोडक्यात म्हणायला गेलं तर आधुनिकीकरणामुळं होणाऱ्या अनिष्ट परिणामांपासून आपल्या समुदायाचं संरक्षण करावं असा विचार ह्या मूलभूत तत्वांमागे / आचारसंहितेमागे दिसतो.
ह्या मुलभूत तत्वांकडे थोडं विस्तारानं पाहता व्यक्तीपेक्षा देव आणि समाजाला प्राधान्य देणे, गैर- अमिश समाजापासून जाणीवपूर्वक वेगळं राहणं, वादविवाद / संघर्षांचे निराकरण केवळ अहिंसेच्या मार्गाने करणे, साधे वस्त्र, ग्रामीण जीवन, आणि आधुनिक समाजातील गुंतागुंतीचे किंवा चैनीचे घटक टाळणे ह्या बाबी समोर येतात.
ऑर्डनुंग ही एक अलिखित आचारसंहिता दैनंदिन जीवनातील अनेक पैलूंना दिशा देत समाजातील मूल्ये व परंपरांचे पालन सुनिश्चित करते. श्रद्धेची कबुली दिल्यानंतरच प्रौढ व्यक्तींना बाप्तिस्मा दिला जातो, त्यानंतर त्यांचा चर्च समुदायात औपचारिक प्रवेश होतो. तंत्रज्ञानाचा स्वीकार हा केवळ समुदाय आणि परंपरेवर होणाऱ्या परिणामांच्या आधारे होतो. घरातील फोन, टीव्ही, इंटरनेट, आणि गाड्या नाकारल्या जातात. त्याऐवजी घोडागाडी (buggies) वापरणे पसंत केले जाते. सरकारी योजना किंवा सामाजिक सुरक्षा यावर अवलंबून राहण्याऐवजी अमिश समाज आपले संसाधन एकत्र करून गरजूंना मदत करतो. यात त्यांचा देवावरील विश्वास आणि सामुदायिक जबाबदारी स्पष्ट होते. औपचारिक शिक्षण साधारणतः आठवीपर्यंतच दिले जाते. त्यानंतरचे शिक्षण प्रामुख्याने प्रौढ जीवनासाठी आवश्यक कौशल्ये, कुटुंबाचा व्यवसाय आणि समाजातील व्यवहारांवर केंद्रित असते.
विल्मिंग्टनपासून कारने साधारणतः सव्वा तासाच्या अंतरावर पेनसिल्व्हेनिया राज्यात ही अमिश लोकांची वसाहत आहे. प्रवासात दुतर्फा पसरलेल्या हिरव्यागार वृक्षांच्या नजाऱ्यानं मन अगदी प्रसन्न झालं.
अमिश लोकांच्या वसाहतीचे एक वैशिष्ट्य म्हणजे खूप दूरवरून दिसणारे कॉर्न silos. मक्याच्या पिकाचं भरघोस उत्पादन करून त्यांच्या साठवणीसाठी हे उभारण्यात येतात. स्थानिक शेतीत उत्पादित पिकांचा वापर करावा हे ह्यामागील तत्त्व !
अमिश गावात आपले स्वागत आहे हे सांगणारा हा बोर्ड !
इथं आम्ही अमिश गावात फेरफटका मारण्यासाठी प्रत्येकी सव्वीस डॉलर्सचे बसचे तिकीट घेतले. बस सुटायला काही वेळ असल्यानं आम्ही पार्कात फेरफटका मारण्याची संधी दवडली नाही. तिथं मेंढा, मोर, वळू, बदके असे विविध प्राणी गुण्यागोविंदाने नांदत होते. अर्थातच बदके सोडून बाकी सर्वांना बंदिस्त करून ठेवलं होतं.
समाधिस्थ अवस्थेतील वळू !
अनेक शतके अमिश लोक दळणवळण माध्यम म्हणून जिचा वापर करतात ती ही बग्गी !
अमिश लोकांनी बनविलेली परंपरागत आयुधं इथं व्यवस्थित मांडून ठेवली होती.
अमिश वसाहतीतील एकवर्गीय शाळेची प्रतिकृती इथं बनविण्यात आली होती.
नियोजित वेळी आम्ही बसमध्ये प्रवेश केला. बसचे चालक एक वयस्क अमेरिकन गृहस्थ होते. त्यांचा आवाज अगदी खणखणीत होता. त्यांनी आम्हांला अमिश लोकांविषयी खूप छान माहिती दिली. ही माहिती मी आता इथं नमूद करतोय.
पुढील दीड तासभर आपण अमिश लोकांच्या वसाहतीचा फेरफटका मारणार आहोत. अमिश लोक त्यांच्या चेहऱ्याचे फोटो घेऊ देणे पाप समजतात. त्यामुळं तुमच्यापैकी कोणी जर त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हांला तात्काळ बसमधून उतरविले जाईल. इथं एक तर तुम्ही अमिश असता किंवा इंग्लिश ! अमिश घरात फोन नसतो. काही काळापूर्वी त्यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत फोन असावा अशी विनंती केली. त्यामुळं त्यांना काही घरांबाहेर फोन बसविण्यास परवानगी देण्यात आली. इंग्लिश माणसाचं घर अमिश माणसानं विकत घेतलं की त्याला घरातील विद्युतपुरवठा खंडित करावा लागतो. त्यासाठी त्याच्याकडं एक वर्षाची मुदत असते.
अमिश लोक शेतीसाठी आधुनिक उपकरणांचा वापर करत नाहीत. तंबाखू हे मुख्य पिकांपैकी एक पीक आहे. ऍलोपॅथी उपचारप्रणाली वापरण्यावर त्यांचा भर नसतो. प्रामुख्यानं ते होमिओपॅथीचा वापर करतात. परंतु अगदीच आणीबाणी उद्भवली तर ते मोठ्या इस्पितळातसुद्धा जातात. बहुतांश वेळा ते बिलाचा भरणा रोकड पैशानं करतात. आणि ते थेट पैसे देत असल्यानं त्यांची घासाघीस करण्याची क्षमता अगदी चांगली असते.
अमिश विवाहसंस्था !
अमिश मुलगा मुलीकडे आपल्या प्रेमाची थेट वाच्यता करू शकत नाही. त्याआधी तिच्या आईवडिलांची परवानगी घेणं आवश्यक असते. मुलीला लग्नाच्या मागणीला नकार देण्याचा अधिकार असतो. अमिश ज्ञातीत घटस्फोटाला परवानगी नाही. लग्नाआधी पाच वर्षांपर्यंत मुलगा - मुलगी एकत्र राहू शकतात. ह्या काळात त्यांनी एकमेकाला चांगल्या प्रकारे समजून घेणं अपेक्षित असते. ह्या दोघांनी एकदा लग्नाला संमती दर्शविली की बिशपच्या परवानगीने लग्नाची घोषणा होते. नोव्हेंबर ते डिसेंबर ह्या कालावधीत हिवाळ्यामुळं शेतीची कामे थंडावली असतात. त्यामुळं ह्याच काळात बहुतांश अमिश लग्ने होतात. लग्ने मंगळवार किंवा गुरुवारी होतात. अमिश स्त्रियाच लग्नातील जेवण बनवितात. लग्नाला साधारणतः ३०० ते ५०० लोक उपस्थित राहतात. दुपारचे भोजन अगदी साग्रसंगीत असते. त्यानंतर नवविवाहित दांपत्याला आलेल्या भेटी उघडण्याचा कार्यक्रम असतो. सायंकाळी मोजके लोक भोजनासाठी असतात. दुपारच्या मेजवानीतील उरलेले पदार्थ ह्या भोजनात समाविष्ट असतात.
अमिश शाळेत स्त्रिया शिक्षिकेची भुमिका बजावतात. शाळा फक्त आठवीपर्यंत असते. शाळेत फक्त गणित आणि इतिहास हे विषय शिकविले जातात. महिला शिक्षिकेचा विवाह झाल्यानंतर ती शाळेत शिकवू शकत नाही.
हा माहितीजालावरून घेतलेला फोटो! ह्या बग्गीची किंमत चौदा हजार अमेरिकन डॉलर्सपर्यंत जाऊ शकते. बग्गीला टायर लावण्यास अजून बिशपमार्फत परवानगी देण्यात आली नाही. अमिश लोकांच्या वसाहतीतून मार्गक्रमण करताना जर तुमच्या पुढं बग्गी असेल तर तिला मागं टाकून पुढं जाणं उचित नाही.
अमिश शेती
अमिश माणसाने केलेली शेती आणि इंग्लिश माणसानं केलेली शेती ह्यात मूलभूत फरक असतात. अमिश माणूस मक्याच्या दोन भागांमध्ये गवताची लागवड करतो. गवताने जमिनीची धूप थांबावी असा उद्देश ! अमिश माणूस जमिनीच्या उंचसखल भागानुसार पिकांची लागवड करतो. प्रत्येक अमिश कुटुंबाकडं सरासरी ३० ते ६० एकर जमीन असते. बस ड्रायव्हरने एक शेत दाखविले. त्या शेतकऱ्याचे शेत ह्या सरासरीला अपवाद होतं. त्याच्याकडं १०० एकर जमीन आहे. त्याची तीन मुले त्याला शेतीच्या कामात मदत करतात.
अमिश लोक जमिनीचा पोत सुधारण्यासाठी पीक फेरपालट, नैसर्गिक खतांचा वापर, पारंपरिक बियाणे इत्यादी पद्धतींचा वापर करतात. इंग्रजीमध्ये heirloom seeds ह्या नावानं ओळखली जाणारी ही बियाणे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जातात, अनेक वर्षांपासून जतन करून ठेवलेली असतात. ती विशिष्ट भागात किंवा कुटुंबात वाढलेली असतात आणि त्यांच्या चव, रंग आणि त्या ठिकाणच्या हवामानाला जुळवून घेण्याची क्षमता ह्या खास गुणधर्मांसाठी ओळखली जातात. ही बियाणे हायब्रीड नसल्यानं त्यांच्यापासून तयार होणाऱ्या वनस्पती पुन्हा त्याच प्रकारची फळे किंवा फुले देतात. ह्या बियाणांद्वारे निर्माण झालेल्या उत्पादनामध्ये औद्योगिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बियाणांद्वारे मिळणाऱ्या फळ, पीक ह्यापेक्षा जास्त चव असते.
अमिश स्त्रिया रविवार व्यतिरिक्त बाकीचे सर्व दिवस कपडे धुतात. पुलीचा वापर करून कपडे उंचावर वाळविण्यासाठी दोरीवर टांगलेले असतात. प्राण्यांनी ते खराब करू नयेत हा त्यामागील हेतू ! एकंदरीत अमिश पुरुष घरकामात मदत करत असल्याचा उल्लेख आढळला नाही.
आता आम्ही अमिश लोकांच्या उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानाकडं आमचा मोर्चा वळविला. मोठ्या आकाराच्या टोमॅटो आणि टरबुजांनी आमचं लक्ष वेधून घेतलं.
पुढील दालनात अनेक परंपरागत, नक्षीकाम केलेल्या आणि जीवनावश्यक वस्तू विक्रीस ठेवल्या होत्या.
परतीच्या मार्गावर असताना मनात विचारांचं वादळ निर्माण झालं होतं. ह्या भेटीनं मनात अनेक प्रश्न निर्माण केले होते. काळानुसार अनिवार्य मानला जाणारा मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा प्रवास सर्वांनीच स्वीकारला आहे ह्या समजुतीला मोठा धक्का देणारी ही भेट आणि अमिश समाजाची जीवनसरणी ! त्यांची तत्त्वं, आचारसंहिता आदर्शवादाकडं झुकणारी! अजुनही बऱ्यापैकी त्यांचं पालन करण्यात हा समाज यशस्वी ठरला आहे. पण उर्वरित जगात आलेली आधुनिकतेची त्सुनामी लाट अत्यल्प प्रमाणात जरी ह्या समाजातील पुढील पिढीपर्यंत पोहोचली तर हा समाज त्याला थोपवू शकेल का हा यक्षप्रश्न !
रविवार, ७ सप्टेंबर, २०२५
शॉर्ट्स गाथा
बालपणी झालेले संस्कार, शिकवणुक सहजासहजी विसरले जात नाहीत. त्यांच्यासोबत तात्कालीन चालीरिती पण मनात रुजल्या गेल्या आहेत. काळानुसार चालीरिती बदलत राहतात पण बदलत्या काळातील वस्त्र परिधान करण्याच्या आधुनिक चालीरिती मनात काही अगंभीर विचार निर्माण करतात.
लहानपणी फक्त लहान मुलंच शॉर्ट्स (Shorts - आखूड विजार - हा मराठी ब्लॉग असल्यानं मराठी शब्द एकदा का होईना वापरतोय!) घालून घराबाहेर पडत, शाळेत जात वगैरे वगैरे! मोठी माणसं मात्र फुल पँट (लांबी विजार) परिधान करूनच बाहेर पडत. त्याकाळातील माझ्यासारख्या "जमेल तेव्हा कर्मठ" माणसानं हल्ली माणसं कशी धोतर, टोपी वगैरे परिधान न करता बाहेर पडतात असा लेख लिहिला असावा. असो, त्यावेळची लहान मुलं मोठी झाली पण त्यांची शॉर्ट्स प्रति निष्ठा मात्र कायम राहिली. हे समजण्यासारखं होतं पण ज्या व्यक्ती आमच्या लहानपणी तरुण होत्या आणि तात्कालीन चालीरितीप्रमाणे फुल पँट परिधान करत असत; त्यांतील बऱ्याच जणांनी आपली निष्ठा शॉर्ट्सला बहाल केल्याचं हल्ली वारंवार आढळून येत आहे.
माझ्या एका मित्राशी बोलताना हा विषय निघाला. त्याचंही हेच निरीक्षण होतं. परंतु शॉर्ट्स परिधान करून सार्वजनिक जीवनात वावर करणाऱ्या आपल्या समवयस्क आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 'शॉर्ट्स आचारसंहिता' लागू करावी असे त्याचं म्हणणं पडलं. 'शॉर्ट्स आचारसंहिता' हा शब्द ऐकताच माझ्या भुवया माझ्या नकळत उंचावल्या गेल्या. ते पाहून त्यानं आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासाठी बाह्या सरसावल्या. त्याच्या म्हणण्यातील काही ठळक मुद्दे !
१. सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्याची पद्धती पाश्चिमात्य देशांतून आपल्याकडं आली. ह्या पद्धतीचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीनं शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठणं आवश्यक आहे. मी त्याच्या ह्या मुद्द्याचा तात्काळ विरोध केला. शारीरिक तंदुरुस्तीची एक विशिष्ट पातळी गाठण्यासाठीच ह्यातील बरेच सज्जन बाहेर पडतात हा मुद्दा तुझ्या लक्षात कसा येत नाही ह्यावर मी आश्चर्य व्यक्त केलं. तरीही ही विशिष्ट पातळी म्हणजे तुला काय अभिप्रेत आहे असा रोखठोक प्रश्न मी त्याला विचारला. त्यावर त्याच्याकडं उत्तर तयार होतं. तो म्हणाला, एक विजेचा दिवा उजव्या किंवा डाव्या बाजूला पेटवून आपण काटकोनातील समोरच्या दिशेकडं तोंड करून उभं राहिलं असता दिव्याच्या समोरील भिंतीवर पडलेल्या आपल्या छायेत वर्तुळाचा कंस, अर्धाकृती व्यास वगैरे दिसता कामा नये. आपलं पोट वगैरे सुटलेलं असता कामा नये हे त्याला म्हणायचं आहे हे कळायला मला थोडा वेळ लागला.
२. घरी परिधान करायच्या शॉर्ट्स (ह्याला मराठी भाषेतील सर्वमान्य असणारा शब्द मी महत्प्रयासानं टाळत आहे) सार्वजनिक ठिकाणी परिधान करण्याचा आत्मविश्वास जरी तुमच्याकडे असला तरी सार्वजनिक जीवनात तुम्हांला वावरताना पाहणाऱ्या लोकांच्या अनुभवाविषयी तुम्ही थोडीतरी अनुकंपा बाळगावी. त्याचा हा मुद्दा ऐकून मला सकाळी बाजारात दृष्टीस पडणाऱ्या अनेक व्यक्तींची आठवण झाली. त्याचा हा मुद्दा मी मनापासून मान्य केला. शॉर्ट्सचा थ्री फोर्थ हा राजमान्य प्रकार परिधान करणे उचित राहील. ह्यात आपल्या जवळील असलेल्या तथाकथित शॉर्ट्स ला पाऊण मापावर आणण्याचा दीडशहाणपणा करू नये.
३. शॉर्ट्स परिधान करायचंच झाल्यास वर साजेसा असा टी शर्ट घालणे योग्य राहील. त्याला शॉर्ट्स मध्ये खोचणं उचित नाही. टी शर्ट आणि शॉर्ट्स ह्यांच्यात रंगसंगती असावी. "हे जरा थोडं अति होतंय असं नाही का वाटत तुला ? " मी न राहवुन माझ्या मनातील बोललो.
मित्रानं गंभीर चेहरा केला. तो बोलता झाला, "आदित्य, एक समाज आपला अतिआत्मविश्वास सध्या ओसंडून चालला आहे. पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काही मार्गदर्शक तत्वांचे पालन करणं आवश्यक आहे. आपण आपल्या देशात आहोत ना, मग आम्हांला हवं तसं वागलं तर काय हरकत आहे असा विचार करणं चुकीचं आहे, कारण हल्ली आपल्यापैकी बरेच परदेशी जातात आणि तिथं आपण इथल्या काही सवयी घेऊन जातो. त्यामुळं एक समाज म्हणून आपल्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो"
विषयाला फारच गंभीर वळण लागलं होतं. मी वातावरण थोडं हलकं करण्यासाठी त्याला विचारलं, "मग काय सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स परिधान करण्यासाठी परवाना वगैरे लागू करण्याचा विचार आहे का तुझा ?" तो ही लगेचच हसला. म्हणाला सार्वजनिक जीवनात शॉर्ट्स घालून वावरताना फोटो असल्यास पाठवून दे, मग कळवतो.
पोस्टच्या सुरुवातीला दिलेला फोटो त्याला पाठवला आहे. अजून काही त्याचं उत्तर आलं नाही ! बघुयात. बाकी सर्व पोस्टभर काही वाचकांना शॉर्ट्स ऐवजी शॉटस (मद्याचा इवलासा घोट) ची सतत आठवण येत राहिल्यास अपेक्षाभंगाबद्दल क्षमस्व !
रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५
भारताचे पितामह - दादाभाई नवरोजी
मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्याच वर्षांनी अचानक वर्तमानपत्रे, मासिके ह्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामोऱ्या येतात तेव्हा मन त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलायला लागतं. भावनामय अवस्थेतून बाहेर आल्यानंतर त्या लेखातील सखोल माहिती वाचल्यानंतर अशा व्यक्तींच्या ज्ञानाविषयी प्रचंड आदराची भावना निर्माण होते. अशीच भावना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादाभाई नवरोजी ह्यांच्याविषयी आज त्यांच्या जन्म द्विशताब्दीनिमित्त लोकसत्तेने प्रसिद्ध केलेल्या दोन लेखांमुळं निर्माण झाली. एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाविषयी निरंजन राजाध्यक्ष आणि गोविंद तळवळकर ह्या अभ्यासू लेखकांनी लिहिलेल्या लेखांतील काही महत्वाचे मुद्दे माझ्या मतांसहित इथं उद्धृत करत आहे. गोविंद तळवळकर ह्यांच्या व्यासंगाविषयी बोलण्याचं धारिष्टय मी करू नये.
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...










































































