मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ४ मे, २०१९

मुक्त निर्मितीचा महोत्सव




गंगाधर गाडगीळ ह्यांचं एका मुंगीचे महाभारत हे आत्मचरित्र वाचणं हे गेले दोन वर्षे माझ्या To Do List मध्ये आहे. आज काही वेळ मिळाल्यामुळे पुन्हा एकदा या पुस्तकाने आणि खास करुन मुक्त निर्मितीचा महोत्सव  या प्रकरणाने माझे लक्ष वेधून घेतले.  या प्रकरणामध्ये गंगाधर गाडगीळ यांनी आपल्या या साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी एक विस्तृत असे विश्लेषण केलं आहे.  हा अत्यंत एक वाचनीय असा अनुभव आहे. मराठी भाषेतील एका नावाजलेल्या लेखकानं केलेलं साहित्यनिर्मितीच्या प्रक्रियेचे हे अत्यंत अभ्यासपुर्ण विश्लेषण आहे. ह्या पोस्टमध्ये गाडगीळांची काही वाक्ये जशीच्या तशी नमुद करण्यात आली आहेत. ह्यात वाडःमयचौर्य हा हेतु नसुन गाडगीळांच्या प्रतिभाशाली भाषाशैलीचा वाचकांना आनंद मिळावा हा हेतु आहे. 

१) या प्रकरणाच्या सुरुवातीला ते समीक्षालेखन आणि ललित साहित्य निर्मिती या दोन प्रकारांविषयी लिहतात. आपल्या समीक्षालेखनामागे नवनिर्मितीच्या मार्गातील अडचणी दूर करणे आणि तिच्यासाठी विशाल रिंगण निर्माण करणे हे मुख्य हेतू असावेत असे त्यांना वाटतं. 

२) ज्या लेखकाकडे स्वतंत्रनिर्मितीची क्षमता आहे त्यानं समीक्षेच्या क्षेत्रात अधिक काळ गुंतून राहून वाद निर्माण करत बसणे हे काहीसे अपकारक ठरण्याची शक्यता आहे. यामागं मर्यादित वेळेचा वापर हा एक घटक तर आहेच परंतु त्यासोबत समीक्षा आणि लेखन निर्मिती या दोन भिन्न प्रकारांत लेखक वेगवेगळ्या पातळ्यांवर सक्रिय असतो हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. 

समीक्षा ही बऱ्याचदा बौद्धिक पातळीवर असते तर साहित्यनिर्मितीमध्ये लेखकाला अकरणात्मक भूमिका घ्यायची असते असे ते म्हणतात. आता अकरणात्मक या शब्दाचा अर्थ शोधून काढणे हे ही पोस्ट लिहुन झाल्यानंतर माझ्यापुढील कार्य आहे.  आपण केलेल्या त्या काळातील साहित्यनिर्मितीचा वेध घेणाऱ्या समिक्षेमुळे आपल्या साहित्यनिर्मितीवर विपरीत परिणाम झाला नाही असे त्यांना वाटते. आपण कविता सोडून बाकी सर्व वाडःमय प्रकार हाताळले असे ते म्हणतात. 

३) त्याकाळी गाडगीळांनी बहुदा प्रस्थापित साहित्याला मोठ्या प्रमाणात आव्हान दिले असावे. या प्रकरणांमध्ये ते याविषयी विस्तृतपणे विवेचन करतात.  प्रस्थापित साहित्यातील सुबोधता,  सामाजिक परिणाम आणि सौंदर्य याविषयी एकंदरीत जे काही मापदंड निर्माण केले असावेत त्यामुळं मराठी साहित्याला कदाचित एक संकुचित रिंगण घातलं गेलं असावं असं त्यांना वाटलं. हे रिंगण विस्तारित करण्यासाठीच आपण प्रस्थापित साहित्याला आणि त्यातील वरील घटकांना आव्हान दिलं असे ते म्हणतात. 

४) समीक्षालेखन हे बौद्धिक पातळीवर असल्यानं सातत्याने केलेल्या समीक्षालेखनामुळे आपल्या भूमिकेत किंवा लिखाणात सुसंगती यावी असा प्रयत्न अजाणतेपणी होऊ लागतो. त्यामुळे कदाचित आपल्या साहित्यनिर्मितीतील अबोधता आणि अस्पष्टता ह्या घटकांवर प्रतिकूल परिणाम झाला असावा असं त्यांना वाटलं.  "जाणवणाऱ्या आशयाच्या पलीकडे जे अस्पष्ट मोठे हुंकार असतात त्यांच्याकडे मी दुर्लक्ष तर नाही केलं " असंही त्यांना वाटुन गेलं. 

५) या अशा सखोल विश्लेषणानंतर गाडगीळ हे त्यांनी मोठ्या प्रमाणात हाताळलेल्या लघुकथा या प्रकाराकडे वळतात.  इथं एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी विशद केला आहे, "मला काय सांगायचं आहे ते मी थोडक्यात सांगतो ! एखादं काम पार पडण्यासाठी आवश्यक काय आहे ते मला पटकन कळतं आणि मी आवश्यक तितकी मोजकी पावले टाकून ते काम पार पाडतो. इतर माणसं काम करू लागली की मला वाटतं इतका ही माणसं घोळ का घालत आहेत? कदाचित गाडगीळांची अर्थशास्त्रातील पार्श्वभूमी ह्या मुद्देसुदपणाला कारणीभुत असावी. 

आपल्यामधील या संक्षिप्तपणा साध्य करण्याच्या क्षमतेमुळं बऱ्याच खरंतर कादंबरीच्या स्वरुपात लिहिल्या जाऊ शकणाऱ्या कल्पनांना आपण लघुकथा म्हणून जन्म दिला असे ते म्हणतात. दुसऱ्या बाजूने विचार करता कदाचित माझ्यामध्ये दीर्घकाळ मन एकाग्र ठेवण्याची क्षमता अंगी नव्हती, मोठ्या रचना करण्याची आणि हाताळण्याची कुवत नव्हती म्हणून मी कादंबऱ्या कदाचित लिहिल्या नसाव्यात असं तर नाही ना हा विचार त्यांच्या मनात येतो!!  

६) कथा सुचण्यासाठी व्यावहारिक व्यवधानातून मुक्त होणे माझ्याबाबतीत तरी अत्यावश्यक असतं हे सांगताना आपला चिंतातुर जंतुचा स्वभावदेखील ते थोडक्यात नमूद करतात. या स्वभावामुळे निवांतपणा मिळण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते असं त्यांना वाटतं. यामुळे आपल्या बर्‍याचशा कथा या एखादं मोठं काम संपवून मोकळे झाल्यावर अथवा कॉलेजला सुट्टी पडल्यावर लिहिल्या गेल्या आहेत असे ते म्हणतात.  

ह्यासोबत चांगलं चालणं सुद्धा साहित्यनिर्मितीला  पूरक आहे हा मुद्दा ते अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करतात.  चालताना भोवताली असणाऱ्या वातावरणातील प्रसन्नता हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे असे त्यांना वाटतं.  पावसानं, जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या धारांनी, वाहणाऱ्या पाण्याच्या ओहोळांनी आपल्या निर्मिती प्रक्रियेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे असे ते म्हणतात. 

७) आपल्या निर्मितीप्रक्रियेच्या वेळी आपल्याला निवांतपणा आणि त्याच्यासोबत एकटेपणा ही लागतो. आसपास काही अंतरावर माणसे असली तर चालतात पण ती आपापल्या उद्योगात व्यग्र असावीत. 

८)  ते आपल्या कथानिर्मितीच्या प्रक्रियेविषयी आणि त्यातील व्यक्तिरेखा आपल्याला कशा सुचल्या याविषयी विस्ताराने लिहितात. लहानपणापासून आपल्या जीवनात आलेली विविध माणसे ही थेट जरी जशीच्या तशी आपल्या कथेत येत नसली तरी त्या व्यक्तिरेखांचा मूळ गाभा घेऊन आपल्या कथेतील अनेक पात्रे आपण अजाणतेपणे रेखाटली आहेत हे त्यांना विश्लेषणानंतर समजलं. आपल्या मर्यादित स्मरणशक्तीचा देखील ते इथं उल्लेख करतात. त्यामुळे आपण प्रवासवर्णन या प्रकारात जास्त गुंतलो नाहीत असं त्यांना वाटतं. 

९) एखादी कथा लिहिताना एकदा मन त्या निर्मितीच्या अवस्थेत गुंतलं की निरनिराळ्या आणि कधीकधी अगदी वेगळ्या प्रकृतीच्या कथाकल्पना मनात उमटत राहतात.  आपलं मन हे या विविध प्रकृतीच्या कथांमध्ये स्वच्छंदपणे वावरत असतं. ह्यातील नक्की एखादा कोणता प्रकार, कोणती कल्पना आपण शेवटी उचलतो हा मात्र अगदी जाणतेपणे घेतलेला निर्णय असू शकत नाही ते म्हणतात. ज्यावेळी कथा सुचते तेव्हा ती एखाद्या ढगासारखी असते. ह्या ढगाचा पाठलाग करताना त्याच्या अनेक कथा देखील बनू शकतात.  आपल्या काही कथा या कशा जुळ्या बहिणी आहेत हा प्रकार देखील ते या ढगाच्या रूपकातून स्पष्ट करून सांगतात.  

बऱ्याच वेळा कथा लिहिताना आपली कथा बिनसले आहे हे मध्यावर आपल्याला जाणवलं आहे मग त्यावेळी आपला हातच पुढे चालत नाही मग ती पुढची पाने अथवा सगळी कथाच मी फाडुन टाकतो असे ते म्हणतात. 

१०) एखादी कथा लिहायला सुरुवात केली की आपल्याला नक्की काही म्हणायचं आहे हे आपल्या मनात नक्की ठरलेलं नसतं. त्यामुळे सुरुवातीचा बराचसा काळ हा अनिश्चिततेचा असतो. पण एक क्षण मात्र असा येतो की कथा आपल्याला जमली असं वाटू लागतं. त्यानंतर सुरळीतपणे लिहिली जाते कोणत्याही कथेमध्ये वेगवेगळी वर्तुळे असतात,  कथेतील व्यक्तिरेखा या वर्तुळांमध्ये फिरत असतात. 

१०) लेखकाची एक विशिष्ट प्रकारची लिखाणशैली काही कालावधीनंतर तयार होते,   त्यामुळे कथानकरचना, पात्र यामध्ये काहीसा तोचतोचपणा येऊ लागतो.  हा घटक लेखकांनी टाळावा असे ते म्हणतात. 

११) चांगलं साहित्य म्हणजे काय नक्की काय हे लेखकाला जरी माहीत असलं तरीदेखील प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी त्या जाणिवेचा प्रत्यक्षात अंमल करणे हे इतकं सोपं नाही.  पुन्हा एकदा ढगाच्या उदाहरणाकडे वळुन ते म्हणतात की कथा ज्यावेळी सुचते त्यामध्ये त्या ढगामध्ये एकच नव्हे तर अनेक कथारुपी ढग असतात. त्यातील एका ढगांवर मन केंद्रित होण्याची क्रिया सावकाश आणि रेंगाळत होते. आपण एका विशिष्ट ढगावर लक्ष केंद्रित करावं असं ठरवावं आणि मनानं तसं करायला नकार द्यावा असेही अनेकदा घडतं आणि मग शेवटी जो ढग निवडला गेला त्यावर कथा लिहिली जाते.  

१२) विनोदी साहित्य या प्रकाराकडे आपण केंद्रित केले नाही असे ते  म्हणतात. मराठी भाषेत झालेल्या विनोदी लिखाणाविषयी आपण फारशे समाधानी नाही आहोत असे विधान ते करतात. त्या मानाने  इंग्लिश भाषेत अधिक चांगल्या दर्जाच्या विनोदनिर्मिती झाल्या आहेत ह्याचं सोदाहरण विवेचन त्यांनी केलं आहे.  

१३) विनोद कथांची निर्मिती प्रक्रिया काहीशी वेगळी आहे. गंभीर कथा जशा मनाच्या खोल अज्ञात व्यापारापासून जन्माला येतात त्याप्रमाणे विनोदी कथा जन्माला येत नाही. मनाच्या वरच्या थरांतून विनोदी कथा जन्म घेतात. काल परवा घडलेल्या कुठल्यातरी घटनांशी त्यांचा संबंध असतो. 

१४) विनोदी लेखकांकडुन त्यांनी समाजावर ताशेरे झाडले पाहिजेत, समाजातील अपप्रवृत्तीवर त्यांनी टीका केली पाहिजे अशी अपेक्षा साधारणतः केली जाते. 

१५) विनोद हा सहजपणे आपल्या गतीने आणि आपल्या पद्धतीने व्यक्त झाला पाहिजे. त्याचप्रमाणे विनोद करताना कुठे थांबायचं आणि अतिशयोक्ती कशी किती ताणायची, संभाषणातील घोटाळा कुठपर्यंत वाढत जाऊ द्यायचा हे कळावं लागतं. 

१६) मराठी भाषेची माझी नीट उमज आणि समज होती का?  मी मराठी जुनं साहित्य वाचलं नव्हतं,  संस्कृतचाही माझा व्यासंग नव्हता. संगीताचा मला कान नव्हता यामुळे माझी भाषिक क्षमता फार मर्यादित झाली होती का?  भाषिक क्षमतेवर अनुभव ओळखायची,  त्याचा वेगळेपणा,  खास त्याची चव टिपण्याची शक्ती काही प्रमाणात तरी अवलंबून असते.  त्याच बरोबर भाषिक क्षमता हा एक अडथळा देखील होऊ शकतो असं जरी वाटत असलं तरी  एकंदरीत आपल्या मर्यादित भाषिक क्षमतेबद्दल मला खंत वाटायची असे ते म्हणतात. ती खंत दूर करण्यासाठी ज्ञानेश्वरी तुकारामाचे अभंग बखरी वगैरे जुनं  साहित्य मी थोडंफार वाचलं पण त्यात माझे मन रमेना!

१७) ते आपल्या स्वभावाविषयी सुद्धा म्हणतात. मी आयुष्यात अनेक धोके पत्करले. अनेक संघर्ष अंगावर ओढून घेतले तरी पण मला वाटायचं की मी भित्रा आहे. मला वाटायचं की मी साहित्यातही  तसंच करतो का? तीव्र आणि उत्कट अनुभवांपासून मी दूर पळतो का? ज्या अलिप्तपणे मी साहित्य लिहितो ते या पळपुटेपणाचेच वाङमयीन रुप आहे का?

गाडगीळांनी ह्या आणि बऱ्याच अनेक मुद्द्यांच्या आधारे स्वतःच्या साहित्याचे विस्तृत वर्णन केलं आहे. हे करताना ते  स्वतःच्या  व्यक्तिमत्वाचं देखील सखोल  विश्लेषण करतात. मराठी साहित्यिकांपैकी किती जणांनी असा प्रयत्न करुन पाहिला आहे हे मला ठाऊक नाही , पण  गाडगीळांचा हा प्रयत्न एक प्रामाणिक आणि मराठी भाषासौंदर्यानं  नटलेला  समृद्ध  अनुभव म्हणुन माझ्या ध्यानात राहील !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...