मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, ५ जानेवारी, २०१६

लग्नसमारंभ आणि पेहेराव!

यंदा लग्नाचा सणकून मोसम होता. २३ नोव्हेंबर पासून ते ३ जानेवारीपर्यंत एकंदरीत ९ - १० लग्नांची, वाङ्निश्चय, मुहूर्ताची अशा बऱ्याच कार्यक्रमांची  निमंत्रणे होती. आमच्या लग्नानंतर पत्नीने सुरुवातीला काही प्रयत्न करून पाहिले. म्हणजे मी शेरवानी, कुर्ता आणि तत्सम वर्गातील पेहेराव घालावा, लग्नात फेटा घालावा वगैरे वगैरे! ह्या विषयावर बरीच चर्चा, बौद्धिक वगैरे झालं आणि मग शेवटी तिने हात टेकले. हा माणूस काही बदलायचा नाही ही गोष्ट ती मग समजून चुकली. 

तिने माझ्या पेहेरावाकडे लक्ष देणे सोडून दिल्यावर मी मोकळा सुटलो. काळ्या ते निळ्या ह्या रंगांना समाविष्ट करून त्यामधील कोणत्याही शेडची एक पँट आणि जो ऑफिसला चालू शकेल असा एक शर्ट हाच लग्नाचा पोशाख हे माझ्या मनानं ठरवून टाकलं. मागच्या वर्षीपर्यंत हे सर्व खपून गेलं, पण यंदाच्या वर्षी अनेक समारंभ एका मागोमाग आल्याने थोडी पंचाईत झाली. 

स्त्रिया हिशोब ठेवण्यात कितपत चोख असतात ह्याविषयी मी काही भाष्य करू इच्छित नाही कारण हा स्फोटक विषय होऊ शकतो. पण कोणत्या लग्न समारंभात आपण कोणती साडी नेसली हे त्यांना बऱ्यापैकी आठवत असतं. काहींना तर दुसऱ्यांनी सुद्धा कोणती साडी नेसली हे सुद्धा आठवतं. त्यामुळे कोणत्याही दोन लग्नात जर साधारणतः सारखा पाहुणावर्ग अपेक्षित असेल तर साडी रिपीट करण्याची पद्धत त्यांच्यात नसते. बाकी लग्नाच्या मोसमात टेलरने शेवटच्या दिवसापर्यंत कपडे न शिवणे किंवा ऐन लग्नसमारंभात कपडे आणून देणे असले प्रकार स्त्रियांच्या बाबतीत होत असताना मी पाहिलं आहे, त्यामुळे एका तासात एकाच दुकानातून चार पाच शर्ट घेण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल मी आदर बाळगून आहे!!

पुन्हा वळूयात माझ्याकडे! तर एका महिन्यात इतके सततचे समारंभ आल्याने मी थोडा चिंतेत पडलो. साधारणतः लाईट निळा, प्लेन किंवा थोडा चेक्सचा शर्ट असेल तर तो दोन तीन लग्नात घातला तरी लोकांच्या नजरेत भरत नाही असा माझा अनुभव! पण यंदाच्या दिवाळीतील खरेदीत, किंवा भाऊबीजेत भेट मिळालेले काही शर्ट्स अगदी नजरेत भरण्यासारखे होते. त्यामुळे ते कितीही चांगले असले तरीही ते परत घालण्याचे धारिष्ट्य माझ्यानं झालं नाही.  

थोडं गंभीर होऊयात! माझ्यात किंवा माझ्यासारख्या काहीजणांत लग्नसमारंभात मिरविण्याचा उत्साह का नाही? एक तर लोकांनी आपल्याकडे फारसे लक्ष दिलेलं अशा स्वभावाच्या माणसांना नको असते. लग्नसमारंभात हजेरी लावून आपण वयोमानानुसार आपल्यावर पडलेली जबाबदारी पार पाडत असतो अशी प्रामाणिक भावना आमच्या मनात असते. माझं एक अजून गुपित! लग्नातील जेवणाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी आपण नेहमीच्या सरावाच्या पेहरावात असणे चांगलं असं माझं प्रामाणिक मत! आणि आपण कितीही खर्च केला, कितीही वेळ घालवला तरी आपला पेहराव लोकांच्या ते काही फार काळ लक्षात राहत नाही अशी आमची विचारधारणा! 

माझ्यासारखी लोक लग्न वगैरे समारंभ म्हणजे नेहमीच्या जीवनरगड्यामध्ये येणारे काही थांबे असे मानून जीवन जगतो तर उत्साही लोकांची मात्र नेहमीचं जीवन हे दोन समारंभाच्या मध्ये येणारे वेळ भरण्याचे माध्यम अशी विचारसरणी असते.

बाकी यंदाचा लग्नाचा मोसम बऱ्यापैकी आटोपला आणि मी हुश्य केलं. ह्या आठ -नऊ लग्नात मी किती शर्ट्स वापरली हे एक मोठं गुपित! आता ही शर्ट हळूहळू ऑफिसात वापरायला काढायला हरकत नाही!! ह्या मोसमातील नऊ लग्नातील माझा सर्वात उत्साही चेहरा! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...