मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १ मार्च, २०१७

कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या देवेंद्रा ?

दहिसर ते वांद्रा ह्या दोन उपनगरांना जोडणाऱ्या नवीन लिंक रोडवर सध्या मेट्रोचं काम जोरात चालु आहे. ह्या कामामुळं ह्या लिंक रोडवर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. माझा बोरिवली ते मालाड हा खरंतर २५ ते ३० मिनिटांचा प्रवास! हल्ली ह्याच प्रवासासाठी किमान एक तास वेळ लागत आहे. भविष्यातील सुखद प्रवासासाठी त्रास सहन करण्याची आमची नक्कीच तयारी आहे पण ह्या अंतरिम कालावधीत आखल्या जाऊ शकणाऱ्या योजना आणि काही प्रश्न मी नोंदवू इच्छित आहे.

१> एकाच वेळी पश्चिम द्रुतगती मार्ग आणि नवीन लिंक रोड ह्यावर काम सुरु करण्याच्या निर्णयामागची विचारधारा कोणी अधिकृत व्यक्ती स्पष्ट करेल का?
२> ह्या मेट्रोचं काम पुर्ण होण्याच प्रस्तावित वेळापत्रक आणि त्या वेळापत्रकानुसारची प्रगती जनतेस वेळोवेळी उपलब्ध केली जावी
३> ह्या मार्गावरील वाहतुकीचा होत असलेला खोळंबा पाहता ह्या दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांसाठी अधिक कालावधीसाठी हिरवा सिग्नल करणे अपेक्षित आहे.
४>  एकाच वेळी पश्चिम द्रुतगती मार्ग आणि नवीन लिंक रोड ह्यावर काम सुरु झाल्यावर बऱ्याच लोकांनी पर्यायी मार्ग म्हणुन स्वामी विवेकानंद मार्गाची निवड करुन पाहिली. पण ह्या मार्गावर सुद्धा प्रचंड बॉटलनेक्स आहेत. आणि त्यामुळं तिथंही वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊ लागली आहे. स्वामी विवेकानंद मार्ग खड्डाविरहित करणं आणि बॉटलनेक्स हटवणं ह्यावर शासकीय यंत्रणेने प्राधान्यक्रमानं लक्ष पुरवायला हवं.
५> विविध कारणास्तव रस्ते खोदून ठेवणं, नाकाबंदी करणं हे प्रकार अजुनही नवीन लिंक रोडवर नेहमीप्रमाणं सुरु आहेत. मेट्रोचे काम पाहता ह्या दोन प्रकारांपासून ह्या मार्गाला मुक्तता देण्याची मी विनंती करतो.
६> सध्याच्या नियोजनानुसार रस्त्याच्या काही भागात एक मार्गिका मेट्रोच्या कामासाठी आरक्षित केली आहे. मग थोडा भाग मोकळा आणि पुन्हा आरक्षण असला प्रकार आहे. होतं काय की रिक्षावाले आणि काही कारवाले ह्या मधल्या मोकळ्या भागात वेगानं पुढे जाऊन पुन्हा मधल्या मार्गिकेत यायचा प्रयत्न करतात आणि मग समजुतीच्या अभावी शंख निनाद करताना बराच वेळ वाया जातो. 


उच्चविद्याविभुषित भारतीय लोकांनी अमेरिकेत जाऊ नये असं आपणा सर्वांना वाटतं. पण सुखानं ऑफिसात जायला मिळणं हा मुलभूत हक्क आपल्याला मिळायला हवा ह्याची सरकारला थोडी तरी पर्वा असावी असं ह्या सर्वाना वाटणं स्वाभाविक आहे.

खालील छायाचित्रे मीठ चौकी सिग्नलच्या आधीची आहेत. नेहमी  प्रवासास २ ते ३ मिनिटे लागतात. काल  प्रवासानं ३० मिनिटं घेतली. 









पावसाळा ३ महिन्यावर आलेला आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास येत्या पावसाळ्यात ह्या मार्गावर अभूतपूर्व वाहतुककोंडी होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो ह्याची प्रशासनाने जाणीव ठेवावी हीच पूर्वसुचना  ह्या पोस्टद्वारे लेखक देऊ इच्छितो  


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

२०३५ - सक्रिय @ ६५



ऐकायला काहीसं आश्चर्यकारक वाटेल पण अमेरिकेत अधिकृतरीत्या निवृत्तीचे वय नाही. पण तुम्हांला जर सोशल सेक्युरिटीचे फायदे मिळण्यासाठी पात्र ठरायचे असेल तर ६२, ६५, ६६ वगैरे वर्षे महत्वाची ठरतात. पोस्टची सुरुवात ह्या विषयाने करण्याचं कारण की अमेरिकेतील जीवनशैलीच्या सरासरी उच्च आकडेवारीनुसार माणसं साठीनंतर सुद्धा मानसिकदृष्ट्या सक्षम राहतात आणि त्यामुळं ती व्यावसायिकदृष्ट्या / सामाजिकदृष्ट्या  सक्रिय राहणं पसंत करतात. 
अवतीभोवती इतक्या समस्या असताना देखील भारतात सुद्धा एका विशिष्ट गटाचे राहणीमान हळुहळू सुधारत आहे. हा गट बौद्धिक, सामाजिकदृष्ट्या अगदी सक्रिय आहे आणि स्वतःची योग्य काळजी घेण्याच्या दृष्टिकोनामुळं पुढील अनेक वर्ष सक्रिय राहील ह्यात तिळमात्र शंका नाही. ही झाली चांगली बाजू! आता दुसरी बाजू. अमेरिकेत माणसं आपल्याला एखादा चांगला छंद लावून घेतात. जंगलात फिरणं, पर्वतांवर कूच करणं वगैरे वगैरे! आपल्याकडे सुद्धा ह्या बाबतीत हल्ली चांगली प्रगती दिसुन येत आहे. ह्या सर्वांमागे एक अदृश्य, न बोलला जाणारा हेतू असतो. एखाद्या देशातील, क्षेत्रातील मुख्य बौद्धिक, आर्थिक घडामोड ज्या ठिकाणी होत असते तिथं तरुणाईनं कब्जा केलेला असतो. ह्या मुख्य कंपुत जेष्ठांना सामावुन घेण्याची मर्यादित भुक असते. केवळ मोजक्या जेष्ठांना ह्यात वाव असतो बाकीचे जण ह्यात हळुहळू डावलले जातात. अजुन एक महत्त्वाचा मुद्दा - वय आणि कार्यालयातील उच्चपद समप्रमाणात असायलाच हवं हा आपल्याकडं असणारा मोठ्या प्रमाणावरील (गैर) समज! आपल्या कुवतीनुसार कायम एखादया मध्यमपदावर राहण्यास मानसिकरीत्या तयार असणारा जेष्ठ विरळाच! कालांतराने ह्या परिस्थितीत नक्कीच फरक होणार! 
लेखाचा मुख्य मुद्दा! काही वर्षात ही तांत्रिकदृष्टया, शारीरिक आणि मानसिक  सक्षम अशा साठीतील तरुणाईची मोठी फौज आपल्याभोवती अस्तित्वात येणार! त्यावेळी त्यांच्या ह्या सक्रियेतला वाव देणारं एखादं समांतर क्षेत्र एक समाज म्हणून आपल्याला निर्माण करावं लागणार किंवा एक व्यक्ती म्हणुन प्रत्येकानं आपापली सोय करावी लागणार! म्हणायला गेलं तर एक संधी आहे - आपण अजुनही असलेली शहर अधिक कोंबून भरण्याची  मानसिकता धरुन आहोत. जर आपण नवीन शहरं निर्माण करण्याचा अथवा गावांकडे परतण्याचा निर्णय घेतला, जिद्द दर्शवली तर अशा विधायक कार्यात ही सक्रिय मंडळी मोठा हातभार लावू शकतील!

ही सर्व चर्चा आमच्या कौटुंबिक WhatsApp गटावरील! तिथं निशांकने म्हटल्याप्रमाणं कदाचित ही फार मोठी समस्या नसेल देखील! पण केवळ आरामदायक खोलीत बसुन असली मोठाली पोस्ट लिहिताना मला मात्र उगाचच ह्या समस्येचं रूप गंभीर वाटत राहणार! 

मराठी दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा! 

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

बयेचा कारनामा !


आवश्यक कारणास्तव (दुसरा कोणता पर्याय नाही म्हणुन) आपला जीव धोक्यात घालण्याची वेळ ह्या भुतलावरील असंख्य लोकांवर दररोज येत असते. युद्धसंक्रमित भागात वास्तव्य करणारे लोक, दुष्काळी भागातील लोक, दुर्गम भागात राहणारे लोक ह्या सर्वांना येणारा प्रत्येक दिवस कोणता धोका घेऊन येणार आहे ह्याविषयी शाश्वती नसते. तरीसुद्धा जीवनाविषयीची अपार श्रद्धा ह्या लोकांना समोरील सर्व संकटांचा मुकाबला करण्याचं बळ देतं. 

जगात अजून एका प्रकारची लोकं वास्तव्य करुन असतात. लौकिकार्थानं सर्वसामान्य जीवन जगण्याची त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती असते. परंतु त्यांच्या अंगात असणारी खुमखुमी त्यांना आपला जीव धोक्यात टाकणारी धाडसं करण्यास प्रवृत्त करते. आता ही खुमखुमी म्हणजे नक्की काय आणि ह्या सर्व प्रस्तावनेचा तात्कालीन संदर्भ कोणता ह्याविषयी थोडं!

गेल्या आठवड्यात विकी ओडींकोवा ह्या २३ वर्षीय रशियन मॉडेलनं एक साहस करण्याचं ठरवलं. ही बया आपल्या एका पुरुष सहकाऱ्यासोबत दुबईच्या ७४ मजली इमारतीच्या गच्चीवर गेली. थोडावेळ इथंतिथं सराव करुन ती  मग  केवळ आपल्या सहकाऱ्याच्या हाताचा आधार घेऊन ह्या ७४ मजली इमारतीवरून खाली लोंबकळली. आणि ह्या स्थितीत ती जवळपास १ मिनिट राहिली, तिथं हजर असलेल्या फोटोग्राफर मंडळींनी असंख्य फोटो, व्हिडीओ चित्रीत केला आणि अपेक्षेनुसार त्याला लाखो लोकांनी प्रतिसाद दिला. दुबईच्या महापौरांना हा प्रकार एकंदरीत आवडला नाही आणि त्यांनी विकीबाईंना बोलावुन कडक शब्दात समज दिली. ही समज जेव्हा दिली गेली तेव्हा मी प्रत्यक्ष हजर नव्हतो पण वाचलेल्या बातमीनुसार एकंदरीत "बाई तुला तुझा जीव धोक्यात घालायचा असेल तर त्याला माझी काही हरकत नाही पण माझ्या शहरात येऊन असले प्रकार करुन मला अडचणीत आणू नकोस!" असे त्या समजुतीचे स्वरूप दिसलं. 

आता विश्लेषण भागाकडे 
१) विकी आणि तिचा सहकारी ह्यांचा फिटनेस प्रशंसनीय! ७४ मजल्याच्या उंचीवर जोरदार वारे वाहत असताना केवळ एका हाताच्या आधारावर एक मिनिटभर लटकणे हा विकीच्या फिटनेसचा कौतुकाचा भाग तर विकीचे वजन एका हातानं इतका काळ पेलून धरणं हा तिच्या सहकाऱ्याच्या फिटनेसचा कौतुकाचा भाग! रशियन जिमनॅस्टची परंपरा ह्यास काहीशी कारणीभुत आहे अशी ह्यावर माझी काहीशी तज्ञ टिपणी!  

२) मानसिक कणखरता! ह्या मुद्यावर कदाचित मला धारेवर धरलं जाईल. मी ही पोस्ट लिहुन आपला जीव विनाकारण धोक्यात घालणाऱ्या विकीचं समर्थन करतो आहे असाही मतप्रवाह समोर येईल! प्रसिद्धीसाठी तिनं हा आततायी मार्ग स्वीकारला! पण क्षणभर हे सर्व बाजुला ठेवलं तर आपला जीव धोक्यात घालण्यासाठी जी मानसिक कणखरता दाखवावी लागते ती विकीने दाखवली. आणि आपण विकीला सुखरुप तोलुन धरू शकू ह्याचा आत्मविश्वास तिच्या सहकाऱ्याने दाखविला आणि निभावला देखील!
ह्या दोघांचा एकमेकांवरील आणि खासकरून विकीचा सहकाऱ्यावरील विश्वास हा ही उल्लेखनीय !

३) आता अजून एक विवादास्पद मुद्दा! जोशी, नेने, पाटील अथवा सावे आडनावाच्या मुलीने आपल्या सहकाऱ्याच्या साथीनं असं धाडस करण्याची हिंमत करण्याची शक्यता किती? ह्यात माझ्या सासरचं आडनाव सुद्धा वापरण्याइतपत माझ्या साहसाची सीमा मर्यादित आहे! सद्यकालीन घटना पाहता ही शक्यता मी शुन्य म्हणुन नक्कीच मांडणार नाही! पण ही शक्यता रशियन शक्यतेपेक्षा नक्कीच कमी असणार! कारण काय? सामान्यपणं कमीत कमी धोका पत्करत  दीर्घ कालीन जीवन जगण्याची मनोवृत्ती ह्या कमी शक्यतेचा गाभा असेल  असं एक विधान करुन  बाकीचा भाग मला  वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोपवुन द्यायला आवडेल!   

४) आयुष्यभर पुरणारी एका क्षणाच्या साहसाची खुमखुमी (त्यातील संभाव्य धोक्यासहित) विरुद्ध आयुष्याभरातील करोडो सामान्य क्षणांतून मिळणारं तसू तसूभर समाधान असा हा दोन मनोवृत्तीचा संघर्ष जाणवतो! बाकी असलं धाडस केलं म्हणून ह्या मुलीचं लग्न जमण्याची शक्यता कमी होणार नाही अशी माझी अटकळ आणि ही मराठी समाजाच्या आधुनिकतेची खूण! 

५) ह्या कमी शक्यतेमागे मराठी समाजाची फिटनेसची सद्यस्थिती हा ही एक वैचारिक चर्चेचा मुद्दा समोर येईल! 

६) ही शक्यता पुण्यात किती आणि महाराष्ट्रातील बाकीच्या किती? आणि त्यात किती तफावत असेल ; आणि ही तफावत धन असेल वा ऋण ह्यावर सुद्धा तज्ञांनी विचार करावा ही विनंती! पुण्यात ७४ मजली इमारत उभी रहावी का हा उपमुद्दा सुद्धा तज्ञांनी चर्चेत विचारात घ्यावा!

बाकी आजपासुन पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामना सुरु होणार आहे. दुपारी १ ते  ४ ह्या वेळात नक्की काय होणार ह्या शंकेनं मला जंगजंग पछाडलं आहे!

(Disclaimer - Author does not support such acts which would put individual's life at Risk 
मी  अशा जीव धोक्यात टाकणाऱ्या साहसांचं कोणत्याही प्रकारे समर्थन करीत नाही!) 

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

या बकुळीच्या झाडाखाली !



अधुनमधून आमच्या कुटुंबाच्या Whatsapp ग्रुपवर आमचे बापुकाका सुंदर जुनी मराठी गाण्यांची ध्वनीफीत त्यांच्या गीतासकट पाठवत असतात. ह्या आठवड्यात त्यांनी शेअर केलेलं  या बकुळीच्या झाडाखाली हे गीत सर्वांना भावलं आणि जुन्या काळात घेऊन गेलं. 

आपल्या प्रत्येकाचं असं एक बकुळीचं झाड असतं. आपल्याला जीवनातील सुखदुःखाच्या क्षणाची आठवण करुन देणारं! पुर्वीची बरीच आयुष्यं साधी असायची! बकुळीची झाडं फक्त गावातच असायची! स्त्रियांची बहुदा माहेरच्या गावातच असायची. सासरच्या गावातील बकुळीच्या झाडांशी त्यांचं जमायचं नाही असं नसेल पण जितकं माहेरच्या गावातील बकुळीच्या झाडांशी जितकं जमायचं तितकं बहुदा सासरच्या गावातील बकुळींशी नाही जमायचं! 

आताशा आयुष्यं तितकीशी साधी राहिली नाही . प्रत्येकानं बारा गावांचं पाणी चाखलं! बालपणाच्या गावासोबत ज्या गावात आपल्या कारकिर्दीचे महत्वाचे क्षण आले तिथल्या लोकांनी, वास्तुंनी ह्या गावाच्या बकुळीच्या झाडांची जागा घेतली. बऱ्याच वेळा आयुष्यात पुन्हा एकदा ह्या खास वास्तुंना भेट द्यायची संधी पुन्हा कदाचित यायची सुद्धा नाही!

अजून एक बदल आपल्या नकळत घडत आहे. कार्यालयात बऱ्याच वेळा आपल्याला आपलं मुळ वैयक्तिक रुप बाजुला ठेवुन अगदी व्यावसायिक रूप धारण करावं लागतं. हे व्यावसायिक रुप वैयक्तिक रूपापेक्षा अगदी वेगळं असतं. हळुहळू व्यावसायिक रुप वैयक्तिक रूपावर वर्चस्व गाजवु लागतं. मनातील एका कोपऱ्यातील बकुळ बिचारी हिरमुसते, कोमजते. 

कधीतरी मग सर्व व्यावसायिक जबाबदाऱ्या संपतात आणि शोध सुरु होतो त्या विसर पडलेल्या बकुळीचा! ती बिचारी केव्हाचीच नाहीशी झालेली असते ! असो पुर्वीच्या साध्या जीवनातील बकुळीच्या फुलांवर लिहिलेलं वसंत बापट ह्यांचं हे मूळ गीत! 

.         ||  या बकुळीच्या झाडाखाली  ||

गीत - वसंत बापट
संगीत - भानुकांत लुकतुके
स्वर - सुषमा श्रेष्ठ

या बकुळीच्या झाडाखाली 
आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्‍नांसाठी 
एक रेशमी झुला झुले

इथेच माझी बाळ पाऊले 
दंवात भिजली बालपणी
दूर देशीच्या युवराजाने 
इथेच मजला फूल दिले

तिने आसवें पुसली माझी, 
हृदयामधला गंध दिला
चांदण्यातले सोन कवडसे 
माझ्यासाठी अंथरले

बकुळी माझी सखी जिवाची 
जन्मांतरीचे प्रेम जुने
तिला पाहता खुलते मी अन्‌ 
मला पाहता तीही ही खुले

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

Trapped - भाग ८


आधीच्या भागाच्या लिंक्स 
भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 


भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html

भाग सातवा
http://patil2011.blogspot.in/2017/01/trapped.html

परस्वामी खूप विचारात पडला होता. त्याचं मनुष्यदेहातील वास्तव्य संपुष्ठात येऊन त्याला त्याची मूळ काया प्राप्त झाली होती. परंतु मनुष्यदेहातील वास्तव्याच्या काळातील विचार मात्र त्याचा पिच्छा सोडण्यास तयार नव्हते. सुक्ष्मरुपात आपल्या मूळ देहाबाहेर पडण्याची कला त्यानं आत्मसात करुन घेतली होती. ह्या सर्व प्रकरणात आपल्या प्रजातीचा प्रचंड रोष त्यानं ओढवून घेतला होता. त्याच्या हालचालीवर त्याची प्रजात जरी लक्ष ठेऊन असली परस्वामी महबुद्धिमान होता. ह्या पहाऱ्यातुन त्याला जे काही मोजके क्षण मिळायचे त्यावेळी तो योगिनीवर लक्ष ठेवण्यासाठी फेरी मारायचा. आताच्या ह्या प्रसंगानंतर आपली एक चुक त्याच्या ध्यानात आली होती. योगिनीची मागच्या काळातील स्मृती त्यानं तात्काळ नष्ट करायला हवी होती. ही चूक लक्षात येताच त्यानं तातडीनं तिची स्मृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता पण ते काही त्याला जमलं नव्हतं आणि तो स्वतःवर खूप संतापला होता. 

योगिनी दिवसभर अगदी घाबरलेल्या मनःस्थितीत होती. परस्वामी आभासी रुपात आपल्या भोवती वावरतो आहे ही जाणीवच तिला हादरवुन टाकणारी होती. नवस्वामी कालपासुन अगदी प्रेमानं जरी वागत असला तरी मागच्या काही महिन्यांत जे काही घडलं ते त्याला सांगण्याची तिला अजिबात हिंमत होत नव्हती. परस्वामी मनुष्यदेहातून निघुन जाण्याआधी शेवटच्या दिवसात त्यानं तिच्यावर जो काही सुखाचा वर्षाव केला होता, तो सुद्धा ती विसरू शकत नव्हती. मी, माझं भावनिक जीवन आणि वास्तवातील जीवन सर्व काही ह्या दोन स्वामीमध्ये Trapped झालं आहे! ती स्वतःशीच पुटपुटली. पण ह्या दोघांचीही प्रेमळ बाजु सुद्धा तिनं पाहिली होती आणि त्यामुळे ह्यातील कोणीही आपल्याला अथवा आर्यनला धोका पोहोचवणार नाही अशी आशा ती बाळगुन होती. पण आपणा दोघांना नसला तरी हे दोघं एकमेकांच्या जीवावर बेतणार नाहीत हे कशावरून हा प्रश्न तिच्या मनात प्रकट झाला. आणि ह्यात परस्वामीचा जीव म्हणजे नक्की काय हे तिला समजेनासं झालं होतं. ह्याउलट परस्वामी नवस्वामीविषयी सर्व काही जाणुन होता आणि नवस्वामीचं ह्या सर्व प्रकाराविषयीचं अज्ञान त्याला परस्वामीची सहज शिकार बनवु शकणार होतं. बराच विचार करुन करुन योगिनी थकली. आर्यनच्या रडण्याने तिचं लक्ष आपल्या विचारसाखळीतून उडालं पण नवस्वामीला सर्व प्रकार संध्याकाळी सांगुन टाकावा ह्या निष्कर्षाप्रती ती येऊन पोहोचली होती. 

सायंकाळ झाली तशी योगिनीच्या मनातील धाकधुक वाढू लागली होती. नवस्वामी आपली कहाणी कशी स्वीकारेल ह्याविषयी तिच्या मनात खूप धाकधुक होती आणि त्याचबरोबर परस्वामीने आपल्यावर शिंपडलेल्या सुखाच्या क्षणांशी आपण प्रतारणा करणार ही भावना तिला बोचत होती. 
नेहमीच्या वेळी नवस्वामी परतला. कॉफीचं प्रमाण एव्हाना योगिनीला जमु लागलं होतं. नवस्वामीचा सकाळचा प्रसन्न मूड अजुनही कायम होता. जेवणं वगैरे आटोपली. आर्यन नेहमीप्रमाणं खेळून झोपी गेला आणि मनाचा हिय्या करुन योगिनीनं हाक मारली, "स्वामी!"

नवस्वामीच्या चेहऱ्यावरील भाव पहिल्या काही मिनिटांत वेगानं बदलत होते. आधी योगिनीविषयी सहानुभूती, भय आणि असुया आणि मग संताप अशा क्रमानं विविध भावनांनी त्याचा ताबा घेतला होता. संतापाच्या एका क्षणी त्यानं टेबलावरील पाण्याचा ग्लास जोरानं भिंतीवर फेकून मारला. त्याच्याजवळ जाण्याची हिंमत योगिनीजवळ नव्हती. बराच वेळ असाच गेला. नवस्वामी खुर्चीवर क्रुद्ध होऊन बसला होता आणि योगिनी हतबल होऊन बिछान्यावर! शेवटी नवस्वामीनं तोंड उघडलं. "तरीच मला काही कळत नव्हतं! ऑफिसातील बऱ्याच गोष्टी मला अधुनमधून नव्यानव्या वाटायच्या, तुही बदलेली वाटायचीस आणि आर्यन तर मला बराच वेळ पूर्ण अनोळखीच वाटायचा!" नवस्वामी आपलं मन मोकळं करत होता. "छे ! कोणी परका माझ्या देहात स्वामी म्हणून इतका काळ वास्तव्य करुन गेला आणि तुझ्याशी संसार करुन गेला!" नवस्वामीच्या मनातील संताप पुन्हा उचंबळुन येत होता. 

आता मात्र योगिनी आपल्या जागेवरुन उठली. नवस्वामीचा हात हातात घेऊन म्हणाली, "स्वामी मी पूर्णपणे हतबल होती ह्या साऱ्या प्रकरणात!" नवस्वामीनं आपल्याला काहीसं सावरलं होतं. "ठीक आहे!" नजरेनंच त्यानं योगिनीला सांगितलं. "स्वामी - अजुन एक गोष्ट सांगायची राहिली - आज सकाळी हे सारं झालं त्यावेळी आर्यन त्याच्याशी नजरेनंच संवाद साधून खिदळत होता!" नवस्वामीचं डोकं आता बऱ्यापैकी ताळ्यावर आला होतं. "तो समजा परत आला तर?" त्यानं जणु काही योगिनीच्या मनातीलच प्रश्न विचारला होता. 
"आपण शब्दांशिवाय एकमेकांशी संवाद साधुयात!" योगिनी म्हणाली. इतक्या सगळ्या प्रकारानंतरही नवस्वामीच्या मनात योगिनीविषयी प्रेम, आदर दाटुन आलं. झोपायला जाताना योगिनीने घडयाळाकडं नजर टाकली. रात्रीचे दोन वाजले होते. 

योगिनीला बराच वेळ झोप लागत नव्हती. नंतर कधीतरी तिचा डोळा लागला. डोळा लागुन थोडा वेळच झाला असावा इतक्यात आर्यनच्या चुळबुळीने तिला जाग आली. आर्यन खिडकीच्या दिशेनं पाहुन हासत होता. योगिनी भयभीत झाली असली तरी तिनं ह्या शक्यतेवर विचार करुन ठेवला होता. पायाच्या अंगठ्यानेच तिनं नवस्वामीला उठवलं. काहीशा त्रासिक मुद्रेनं उठलेला नवस्वामीनं योगिनीकडे पाहिलं. तिचा इशारा त्याला कळला. त्याची नजर खिडकीकडं गेली. तिथलं परस्वामींच अस्तित्व त्याला समजलं. योगिनी आणि नवस्वामी एकमेकांकडे पाहत होते. नक्की काय करायचं हे दोघांपैकी कोणालाही  समजत नव्हतं. 

योगिनीला न जाणवलेली एक गोष्ट नवस्वामीला जाणवत होती. त्याच्या हृदयाच्या कप्प्यात एक वेगळीच धकधक त्याला जाणवत होती. परस्वामी आपल्या शरीरात काही त्याच्या अस्तित्वाची खूण ठेऊन गेला की काय? त्याच्या मनात नवीन शंकेनं प्रवेश केला!
(क्रमशः )

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

सलाम राहुल !



आपल्या भोवतालच्या लोकांचं थोडं काळजीपुर्वक निरीक्षण केलं तर एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते. आपण लोकांचं वर्गीकरण विविध प्रकारात करु शकतो. 

पहिला प्रकार ज्यांना आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्याविषयी, गुणांविषयी पुर्ण माहिती असते आणि त्याविषयी ते संतृप्त असतात.  त्यामुळं आपण जे काही नाही आहोत ते दाखविण्याचा आणि सोशल मीडियात त्यासाठी गवगवा करण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून ही लोक जीवन आपल्या मर्जीनं जगत असतात.  

आता हा पहिला प्रकार स्पष्ट केल्यावर बाकीच्या प्रकारांविषयी बोलणे सुज्ञास न लगे!

गेल्या आठवड्यात कोठंतरी आतल्या पानावर बातमी वाचनात आली. राहुल द्रविड ह्यानं बंगळुरू विद्यापीठानं देऊ केलेली सन्माननीय डॉक्टरेट पदवी नम्रतापुर्व नाकारली. ही पदवी नाकारताना त्यानं स्पष्टीकरण दिलं की सन्माननीय पदवी मिळविण्यापेक्षा संशोधन करुन खरीखुरी डॉक्टरेट मिळवणं मला आवडेल! राहुलला आपण सारे गेले कित्येक वर्षे ओळखतो. तो संशोधनात स्वतःला डुंबून घेईल ह्याविषयी जनांस संदेह नसावा. 

अजून एक गोष्ट! गेली एक दोन वर्षे भारतीय 'अ' संघ आणि युवा संघातून मुख्य क्रिकेट संघात येणाऱ्या गुणी क्रिकेटपटूंची संख्या नियमितपणे वाढीस लागली आहे आणि ती सुद्धा कोणता गवगवा न होता! थोडं डोकावून पाहिलं तर ह्या संघांच्या जडणघडणीत राहुल अगदी जवळून सहभागी झाल्याचं आढळून येतं. पण ह्याविषयी सोशल मीडियावर अजिबात कोठंही आत्मप्रौढी नाही! राहुलने कोठे क्लब विकत घेतला; ज्या खेळाशी त्याचा संबंध नाही त्याची जाहिरात केली असले प्रकार आपणास आढळणार नाहीत! 

एक समाज म्हणून आपण सोशल मीडियावर गवगवा करण्याची एक संस्कृती  गेल्या काही वर्षात उदयास आणली आहे (मी ही त्यात सहभागी आहे). ह्याचा परिणाम असा होतो की एखादं काम १०० टक्के परिपूर्णतेस नेण्याऐवजी ते ७० - ८० टक्के पुर्ण झालं की आपण तात्काळ प्रसिद्धीच्या मागे लागतो. अशी संस्कृती आपली पाळंमुळं रोवण्याच्या मार्गावर आहे अशावेळी शांतपणे आपलं कार्य पाडणाऱ्या राहुलकडं सुद्धा आपल्या सर्वांनी एक क्षणभर लक्ष देऊन योग्य ती शिकवण घेऊयात, हाच आजच्या पोस्टचा संदेश!

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

Trapped - भाग ७



आधीच्या भागाच्या लिंक्स 
भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 

भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html


खऱ्या तर जुन्या पण आताच्या नव्या स्वामींशी जुळवून घेण्याचा योगिनीचा आटोकाट प्रयत्न सुरु होता. ह्या स्वामीला (नवस्वामी) त्याच्या अनुपस्थितीमधील काळातील नक्की किती आणि काय आठवेल हा प्रश्न तिने आधीच्या (परस्वामी) ला विचारुन पाहिला होता. पण त्यानंदेखील काही खात्रीलायक उत्तर दिलं नव्हतं कारण ते त्याला पूर्णपणे माहित नव्हतं. योगिनीला सतत नवस्वामीवर लक्ष ठेवावं लागत होतं. 

नवस्वामीला ऑफिसात जाऊन दोन तीन दिवस झाले असतील पण त्याची चिडचिड काहीशी वाढीला लागली होती. बहुदा त्याला ऑफिसातील सर्वच गोष्टी समजत नव्हत्या. आणि आपल्याला अचानक हे सारं काही समजत नाही हे त्याला कळत नसल्यानं त्याचा संताप होत होता. घरी देखील आर्यन त्याच्या जवळ जात नव्हता. त्या छोट्या जीवानं हा फरक नक्की जाणला असा कयास योगिनीनं बांधला होता. 

नवस्वामी रात्री परतला तो अगदी तणावपूर्वक चेहरा घेऊनच! "काय झालं स्वामी!" योगिनीनं अगदी काळजीपुर्वक स्वरात विचारलं. तिच्या मनात एक दोन दिवसांपासून प्रचंड गोंधळ माजला होता. सुरुवातीची  नवस्वामीविषयीची तटस्थ भावना हळुहळू नाहीशी होत चालली होती. "ह्या साऱ्या प्रकरणात ह्याचा काही दोष नाही, मग आपण ह्याला शिक्षा का द्यायची" असा एकंदरीत तिचा विचार होऊ लागला होता. 
"मला नक्की काय झालंय ते समजत नाही योगिनी!" आर्यन झोपी गेला आहे ह्याची खात्री करुन आलेला नवस्वामी बोलला. "ऑफिसात काही जमत नाहीय, इथं आर्यन माझ्याकडं येत नाही, आणि तू सुद्धा अशी तुटकतुटकपणे वागतेस! माझ्याच्यानं हे सारं सहन नाही होतं!" इतकं बोलुन तो हमसाहमशी रडू लागला. योगिनीनं मनावर घातलेली सारी बंधनं तुटून पडली होती. 

सकाळी नवस्वामी बराच सावरला होता. आर्यन जरी त्याच्या जवळ यायला तयार नव्हता तरी त्यानं मोठ्या प्रेमानं त्याला खेळवला. जाताना योगिनीकडे एक प्रेमळ नजर टाकुन तो ऑफिसला गेला. हातात चहाचा कप घेऊन योगिनी खिडकीत बसली होती. मनातील विचारांचं वादळ थांबण्याचं नाव नव्हतं. रस्त्यावरची वाहतुक सुरळीत चालली होती. अचानक पलीकडं तिला तो वेडा दिसला. अगदी परस्वामीच्या आगमनाच्या पहिल्या आठवड्यात दिसला होता त्यानंतर आज पहिल्यांदा दिसला होता. योगिनीच्या हातातील चहाचा कप निसटता निसटता वाचला. "हे सर्व माझ्याच बाबतीत का घडत आहे!" असं ती स्वतःशीच पुटपुटली आणि भयानं तिनं खिडकी लावून घेतली. 

खिडकी लावून ती मागं वळली आणि तिला अजुन एक धक्का बसला. आर्यन खिदळत छताकडं पाहत होता. त्याला असा खिदळताना तिनं पहिल्यांदाच पाहिला होता. ती धावतच आर्यनच्या पाळण्याकडं गेली. आर्यनला हात लावणार इतक्यात तिला हवेत एक अदृश्य थराची भावना स्पर्शुन गेली. तिला ही भावना ओळखीची होती. मृत्यूनंतर कसा अनुभव येतो आणि तिथंही मी तुला सोडणार नाही ह्याची जाणीव करुन देण्यासाठी परस्वामीने जो तिला अनुभव दिला होता, नेमकी तीच भावना होती. 

"स्वामी, तू इथं आहेस?" योगिनी मोठ्यानं ओरडली. तिचा संयम सुटला होता. "हो!" रागीट स्वरात स्वामीच उत्तर आलं. आर्यन जिथं पाहून खिदळत होता नेमका तिथुनच आवाज आला होता. "मी आलेलं तुला आता कसं आवडणार?" परस्वामीच्या शब्दाशब्दातून क्रुध्दता प्रकट होत होती. "तू असं का म्हणतोयस स्वामी?" योगिनी रडवेल्या स्वरात म्हणाली. "मग काय एका पृथ्वीवासियासोबत तुझा संसार अगदी सुखानं सुरु झाला ना आता!" स्वामी म्हणाला. योगिनीच्या डोक्यात प्रकाश पडला होता. पण मग तिच्या डोक्यात अजून एक विचार आला. हा परस्वामी अगदी केव्हाही आपल्या अवतीभवती अदृश्य स्वरूपात असाच वावरत राहणार काय?  

आर्यनच खिदळणं असंच सुरु होतं. "चूप बस!" रागानं योगिनी आर्यनवर खेकसली. आर्यनचा चेहरा अगदी रडवेला झाला. त्याला पहिल्यांदा योगिनीनं ओरडलं होतं. आर्यन जसा रडवेला झाला तसं परस्वामीचा स्वर अगदी पालटला. "योगिनी, खबरदार त्याला ओरडलीस तर!" तो तारस्वरात ओरडला. योगिनीचं मन झपाट्यानं विचार करु लागलं होतं. सततच्या विपरीत परिस्थितीत राहिल्यानं स्वतःचा बचाव करण्याची वृत्ती तिच्या मनात प्रबळ झाली होती. ह्या परस्वामीपासून बचाव करण्यासाठी आर्यन हे एक साधन होऊ शकतो हा विचार तिच्या मनात आला होता. आपल्या पोटच्या बाळाविषयी असा विचार आपल्या मनात यावा ह्याची तात्काळ पश्चातापपूर्ण भावना तिच्या मनात आली. "मी त्याला घेऊन जाईन!" परस्वामीनं  आपलं अस्त्र बाहेर काढलं. "आला मोठा घेऊन जाणारा! तुझ्या लोकांपासून आपला जीव कसा वाचवायचा ते पहिलं पाहा तू ! " योगिनी एखाद्या वाघिणीपणे लढा देत होती. 
तिचं शेवटचं वाक्य बहुदा परस्वामीला मर्मी वार करुन केलं असावं. "योगिनी!" परस्वामी अगदी तारस्वरात ओरडायला आणि घराच्या दाराची बेल वाजायला एकच गाठ पडली. 
(क्रमशः )

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...