मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, ४ मार्च, २०१६

Manu's Farm House Wedding!!

आमच्या लाडक्या मनुचा शुभविवाह रविवारी पार पडला. हा समारंभ अनेक बाबतीत सद्यकालीन विवाहांपेक्षा वेगळा ठरला. ह्या लग्नानिमित्त ही पोस्ट!

बऱ्याच वर्षांनी आमच्या घरी म्हणजे घरी आणि बाजुच्या वाडीमध्ये लग्नसमारंभ पार पडला. १९९३ साली आमच्या घरी कुटुंबातील ह्या आधीचे लग्न झाले होते. त्यानंतर आमच्या कुटुंबियांचा गोतावळा वाढत गेला पण मनुष्यबळ त्या प्रमाणात वाढलं नाही. त्यामुळे लग्नसमारंभ हॉलवर करण्याचे प्रमाण वाढलं. पण मनुने मात्र वाडीतच लग्न करण्याचा मानस व्यक्त केला. आम्ही सर्वांनी मनुचा हा विचार उचलून धरला. 

आमच्या समाजातील रितीप्रमाणे आदल्या दिवशी मुहुर्त, काकण वगैरे विधी शनिवारी पार पडले. ह्या आदल्या दिवशीच्या रितींना प्रामुख्याने गावातील मंडळी हजर असतात.गावातील मंडळी ही ह्या रितींच्या बाबतीत अगदी तज्ञ असतात. त्यामुळे चुकून एखाद्या रितीमध्ये आपलं काही काम आल्यास निमुटपणे त्यांचं ऐकण्यात हित असतं

दिलीप कॅटरर्सकडे दोन्ही दिवसाच्या नास्ता आणि जेवणाचे कंत्राट होते. शनिवारी सकाळी वाफाळत्या उपम्याचा आस्वाद घेताना आम्ही मंडळी धन्य झालो. नास्ता झाल्यावर आलेल्या मंडळींचे स्वागत करणे आणि त्यांना नास्त्याचा आग्रह करणे ह्या भुमिका आम्ही चोख पार पाडल्या.मागच्या एका पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे लग्नसमारंभात पारंपारिक वेशभूषा करण्याचा उत्साह दाखविण्यात मी आणि माझी पत्नी म्हणजे दोन टोके आहोत. ह्याचा हा साक्षात पुरावा

 

सामाजिक बदल सदैव होत राहतात. नेहमीच्या जीवनात व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत असणारी नवीन पिढी आणि निवृत्त झालेली जेष्ठ पिढी ह्यांचा संपर्क सहसा येत नाही. पण अशा समारंभात मात्र ही गाठ हमखास पडते.ह्या दोन पिढीतील संवाद मनोरंजक होण्याची शक्यता अधिक असते. जेष्ठ पिढी आधी थोडे कुतुहल दाखवून ह्या नवीन पिढीच्या प्रतिनिधीकडून त्याच्या / तिच्या व्यवसायाविषयी थोडीफार माहिती काढून घेते. आणि मग मात्र आपले उपदेश किंवा निरीक्षण नवीन पिढीला ऐकवते. अशा वेळी दुसरा एखादा पाहुणा येऊन आपली सुटका करुन घेईल अशी आशा करण्याव्यतिरिक्त नवीन पिढीकडे मार्ग नसतो

मुहुर्ताच्या रिती यथासांग पार पडल्या. दुपारचे जेवण अगदी रुचकर होते. वसई आणि विरारच्या पलिकडील भागातील सोमवंशीय क्षत्रिय समाजातील मुहुर्ताच्या दिवशी केली जाणारी वाल वांग्याची भाजी अगदी स्वर्गीय आनंद देऊन जाते. ह्या लग्नातील सुद्धा ही भाजी विशेष आकर्षण होती. पनीर कुर्मा, खीर, मठ्ठा, फोडणी दिलेली खमंग डाल असा तोंडाला पाणी आणणारा रुचकर मेनु होता. मनुची आई दादी ह्या न्यु इंग्लिश स्कुलच्या माजी शिक्षिका. त्यामुळे शाळेतील बऱ्याच माजी शिक्षिकांनी ह्या लग्नाला हजेरी लावली

इतकं रुचकर जेवण घेतल्यावर मी काहीसा सुस्तावलो. अजूनही रिती सुरुच होत्या. उंबराचा मान, काकण वगैरे प्रकार सुरु होते. ह्या सर्व प्रकारात पुरुष मंडळींना काही भुमिका नसते. आमचे प्रदीपभाई म्हणतात त्याप्रमाणे मांडवाला शोभा आणण्याचं काम पार पाडायचं असते. हीच संधी साधून सर्वांच्या नजरा चुकवून मी हळूच अर्धा तास पहुडलो.घरीच लग्न असण्याचा हा फायदा होता. तितक्यात नवरदेवाकडील मंडळी हळद घेऊन आली. घाईघाईने शर्ट बदलून मी पुन्हा मांडवात हजर झालो. आता रीतींचा नवीन क्रम सुरु झाला होता. सायंकाळ होऊ लागली होती आणि वसईच्या सुप्रसिद्ध डासांनी मांडवाचा ताबा घेतला होता. ह्या हल्ल्यापुढे मांडवातील मंडळी हैराण झाली. नवरदेवाकडील पाहुण्यांनी काढता पाय घेतला

भारत पाकिस्तान सामना सुरु झाला होता. पाकिस्तानची खराब स्थिती पाहुन आम्ही सर्व टीव्हीपुढे दाखल झालो. काही वेळाने पुन्हा मांडवातून रात्रीच्या जेवणासाठी हाक आली. दिलीप कॅटरर्सच्या एकदम लाजबाब शाकाहारी बिर्याणीचा आम्ही आस्वाद घेतला. शुक्रवारी संकष्टी आल्याने शाकाहारी जेवणाचा हा सतत तिसरा दिवस होता आणि त्यामुळे मंडळींना ह्या बिर्याणीतल्या मसालेदार बटाट्यांना पाहून मनातल्या मनात चिकन पिसेसची आठवण होत होती. मनातील दुःख मनात ठेऊन आम्ही वेज बिर्याणीची तोंडभरून तारीफ करत होतो. एकदा का परिस्थिती स्वीकारली की मग वातावरणात प्रसन्नता आणण्यात कुचराई करायची? 

मनुच्या लग्नासाठी तिची मोठी बहीण, "चैतन्याचा खळखळता झरा", निऊ सहकुटुंब अमेरिकेहून आदल्या रात्री आली होती. लग्नाच्या आदल्या दिवशीच्या रात्री बेंजो लावून सर्वांना मंडपात नाचायला लावण्यास तिला खुप मजा येते. त्यामुळे रात्रीची जेवणं संपल्यावर तिने ह्यावेळेला सुद्धा सर्वांना मंडपात बोलावलं. परंतु ती केवळ आदल्या दिवशी रात्री आल्याने हळुहळू तिला जेट लँगने गाठलं होतं. त्यामुळे तिने मग आम्हांला नाचातून मुभा दिली. आणि आधुनिक हिंदी गाण्यावर माझा एक वेडावाकडा डान्स पाहण्याची प्रेक्षकांची संधी हुकली.  

रविवारी सकाळी लवकरात लवकर तयार होऊन आम्ही मांडवात हजर झालो. मांडवाचे शोभिकरण चालूच होते. स्वरुप, सुश्रुत ह्यांनी रात्रभर जागरण करुन हे काम नियंत्रणात आणलं होतं. आमच्या घरासमोर पार्किंगला मोजकी जागा असल्याने आम्ही चर्चला विनंती करुन त्यांची पार्किंगची जागा मिळविली होती. परंतु ती जागा दहा वाजेपासुन उपलब्ध होणार होती. त्यामुळे गल्लीच्या तोंडावर उभे राहुन येणाऱ्या वाहनांना आम्ही नियंत्रित करत होतो. आमच्या शेजारच्या चौधरीबाई आणि त्यांच्या कुटुंबानेसुद्धा त्यांची पार्किंगची जागा आम्हांस उपलब्ध करुन दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद

नवरा मुलगा गौरंग आणि वऱ्हाडी मंडळींचं मग नऊच्या सुमारास आगमन झालं. आमचा भाचा नीरज ह्याची बोर्डी गावात कलात्मक फुलांची शेती आहे. तिथुन नीरजने भेट दिलेली ही सुंदर फुलं! 

 

दिलीप कॅटरर्सने आज मेदुवडा, इडली सांबार असा नास्ता ठेवला होता. त्यामुळे पुन्हा एकदा मनसोक्त नास्ता झाला. भटजी कामाला लागले होते. आणि लग्नविधी अगदी जोरात सुरु झाले होते


आमची मनु वस्त्र डिझाईन क्षेत्रात काम करते. त्यामुळे तिच्या मैत्रिणीसुद्धा अगदी हाय फाय! अशीच एक पंजाब प्रांतातील मैत्रीण छायाचित्रणाचे काम करीत होती. तिचा विधी सुरु असतानाचा त्या क्षेत्रातील मुक्त वावर पाहुन एव्हाना हजर झालेल्या ज्येष्ठ मंडळीनी काहीशी नाराजी व्यक्त केली. ह्या लग्नातील मुख्य विधी लग्न लागल्यानंतर होणार होते. मांडवातील इतर गडबडीत मंगलाष्टके केव्हा सुरु झाली हे कळलं सुद्धा नाही. मग धावपळ करीत आम्ही अक्षता मिळविल्या आणि मनुच्या बाजूने जाऊन उभे राहिलो. इथेही बहुदा तिच्या छायाचित्रकार मैत्रिणीचा मुक्त वावर सुरु होता. मंगलाष्टके सुरु असताना तिने पोझ देण्यासाठी मनुला सांगितलं आणि मनुसुद्धा लग्नाकडे कानाडोळा करून पोझ द्यायला तयार झाली तेव्हा मात्र दाजींनी दोघांना खडसावलं. पाचाचे अंतर, चाराचे अंतर करता करता लग्न लागलं. आणि गुलाबपुष्पांचा वर्षाव झाला

भोजनमंडपाची क्षमता लक्षात घेता आलेल्या मंडळींना ताबडतोब भोजनमंडपात आमंत्रित करणे आवश्यक होते. आम्ही काही खाशी मंडळी हे काम हरीषभाई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत होतो. मुख्य भोजन सुरु करण्याआधी नेवैद्य दाखविणं, सर्व पदार्थांची चव घेऊन त्यांना मान्यता देणं ह्या सर्व कामात हरिषभाई पुढे होते. अख्खं लग्न वेळेवर, यथासांग पार पडण्यासाठी त्यांची उपस्थिती अत्यावश्यक असते.

लग्न लागल्यावर मातब्बर मंडळी पहिल्या रांगेत बसून परिस्थितीचा आढावा घेत होती. मांडवात उपस्थित असलेली कोणतीही व्यक्ती ह्या मातब्बर मंडळीच्या नजरेतुन सुटणं केवळ अशक्य होतं.




लग्न लागुन गेल्यावर रिती चालु होत्या. मग आम्हांला मांडवात पाहुण्यांना भेटण्याची संधी मिळाली. अशा वेळी बरीच जुनी मंडळी भेटतात. लहानपणीच्या आपल्या विश्वात ह्या मंडळींना खास स्थान असतं. पण नंतर काळाच्या ओघात आपला त्यांच्याशी संपर्क तुटलेला असतो. आणि मग अचानक अशा प्रसंगी ही मंडळी समोर येतात आणि मग जुन्या आठवणी जागृत होतात

रिती आटोपल्यावर मनु आणि गौरंग तयारीसाठी दिदीच्या घरात गेले आणि बालमंडळीनी स्टेजचा ताबा घेतला. खरंतर त्यांना तिथे खेळून देण्यात काही हरकत नव्हती. पण जुन्या लोकांना असले प्रकार का कोणास ठाऊक पण खटकतात आणि मग ते ह्या मुलांना ओरडतात. आताशा माझेही असेच व्हायला लागलं आहे!! बालकांनो त्या दिवशी तुम्हांला ओरडल्याबद्दल क्षमस्व! एव्हाना मनु आणि गौरंग तयार होऊन मांडवात परतले. स्टेजवर उभे राहण्याऐवजी त्यांनी मंडपात फिरुन सर्वांची भेट घेणं पसंत केलं. आगरकरानंतर महाराष्ट्रात सामाजिक सुधारणा आणणारे म्हणुन ह्या जोडप्याचा समावेश व्हावा अशी माझी मनापासुनची इच्छा

एव्हाना भोजनमंडपातील गर्दी कमी होऊ लागल्याने आम्ही समाधानी होतो. भोजन मेनु मला खुणावत होता. मी संधी साधून रांगेत घुसलो आणि रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ लागलो. इतक्यात हरिषभाईचे माझ्याकडे लक्ष गेले. "तुला ताट दिलेच कसे?" असा जहाल प्रश्न त्यांनी मला केला. त्या प्रश्नाचे गांभीर्य मला त्या वेळी कळलं नाही. मस्तपैकी जेवण आटपून, दोन ग्लास ताक पिऊन आणि दोन कप आईसक्रीम रिचवून माझा जडावला देह मांडवातील खुर्चीत विसावला. पाच दहा मिनिटे होत नाहीत इतक्यात मुख्य पंगतीची तयारी सुरु झाली. हरिषभाईंची शोधक नजर मांडवात चौफेर फिरत होती. आणि शेवटी जिसे डरते थे वोही बात हो गई! एका लग्नात दोनदा जेवण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग! मनु आणि गौरंग ह्यांनी मजेशीर उखाणे घेतले. दोघेही फक्त एकमेकाला ऐकू जाईल अशा आवाजात काहीतरी पुटपुटत होते. बहुदा लग्नानंतर जेवण कोणी करायचं वगैरे अशा राहून गेलेल्या बाबींवर निर्णय होत असावा! माझ्या बाजुला प्राजक्ता आणि वहिनी बसल्या होत्या. त्यांचेही दुसरे जेवण होते. वाढपी लोक आम्हां तिघांकडे संशयाने पाहत होते. सगळ्या पदार्थांना नाही नाही म्हणतात तर बसले तरी कशाला जेवायला असा बहुदा त्यांच्या मनात विचार चालु होता. कसबसं हा प्रसंग निभावून अधिक जडावलेला माझा देह मांडवातील खुर्चीत विसावला.

सर्व पाटील कुटुंबीय आणि माहेरकरणी एकत्र बसले होते. चेष्टामस्करी चालू होती. इतक्यात मनु आणि गौरंग आमच्या दिशेने येताना दिसले. बहुदा गौरंगला दोन निवांत क्षण हवे होते. परंतु आम्ही त्याला आमच्या कंपूत येऊन बसण्याची विनंती केली. नाही नाही म्हणता त्याने ती मंजुर केली. आमच्या प्रश्नांना त्याने समर्पक उत्तरे दिली. थोडक्यात आम्हां सर्वांना तो पुरुन उरला. परंतु नव्या जावयाची फारशी कठोर परीक्षा न घेण्याची आमची सवय आहे ही पार्श्वभुमी वाचकांनी आणि ही पोस्ट गौरंग वाचत असल्यास त्याने लक्षात घ्यावी

मनुची पंजाब प्रांतातील मैत्रीण एव्हाना पाठारे कुटुंबियांना एकत्र करुन नवविवाहित दांपत्यासोबत त्यांचा ग्रुप फोटो दीदीच्या घराच्या पायरीवर घेण्यात गुंग होती. पाठारे कुटुंबीय बहुदा गुणी लोकांनी भरलेले असावेत, कारण हा ग्रुप फोटो तसा झटपट आटोपला. मग खट्याळ पाटील कुटुंबियांची पाळी आली. वेळेकडे लक्ष ठेऊन असणाऱ्या हरिषभाईंना हा प्रकार फारसा पसंत पडला नाहीये हे त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. साधारणतः तीस लोकांना चार पायऱ्या आणि त्यापलीकडील ओटी ह्यावर उभे करून उंचीनुसार उभे करण्यात पंजाब प्रांतीय कन्येस बरेच प्रयास पडत होते. आंग्ल भाषेत ती आम्हांला सूचना देत होती. आमचा सर्वांचा उल्लेख "This one", "The tall one", "the short one" असा चालला होता. ग्रुपमधल्या शाब्दिक कोट्या इतक्या जोरात चालु होत्या की चेहऱ्यावर स्मित हास्य नव्हे तर खळखळते हास्य होते. पंजाबी कन्येचा संयम पणास लागला होता. "At the count of three, only those standing in last row should raise their toes" ह्या सुचनेचे पालन करता करता आमची हसूनहसुन पुरती मुरकुंडी वळली. बहुदा मागची रांग सोडून बाकी सर्वांनी आपल्या टाचा वरती केल्या होत्या. पंजाब प्रांतीय कन्येने भरपूर फोटो काढले. त्यातील एकतर ठीक आला असावा असे आम्ही देवाला साकडं घातलं आहे. ह्या प्रसंगानंतर गौरंगने आम्हां पाटील कुटुंबियांचा, त्यातील सुनांचा आणि जावयांचा पुरता धसका घेतला असेल तर नवल नाही

हरिषभाईंनी सुत्र आता पूर्णपणे हातात घेतली. भावपुर्ण प्रसंग होता. आमची लाडकी मनु आता पाठारे कुटुंबियांची लाडकी सून बनून चालली होती. तोंडावर हसू असलं तरी आम्ही सर्व मनुच्या आठवणीनी भावपुर्ण झालो होतो. आणि मग काही वेळातच पाठारे कुटुंबीयांनी आमच्या लाडक्या मनुसोबत दहिसरला प्रस्थान केलं.  

पुर्वी लग्नानंतर आठवडाभर तरी नातेवाईक घरी राहत. आता मात्र अर्ध्या तासात सर्व घर रिकामी झालं. आणि मनुची आठवण अधिकच तीव्र बनली

We miss you Manu! 
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी राहा!!

 

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच

स्थळ - मुंबई २०६५ 

संदर्भ - विनय मांडे (वर्षे ९०) दैनंदिनी 

आज पहाटे थोडी लवकरच जाग आली. रात्रभर तशी बेचैनीत गेली. अखिलची तब्येत अगदी नाजुक बनली होती. कधी वाईट बातमी येईल ह्याचा भरवसा नव्हता. अखिल आणि सर्व शालेय मित्रांच्या आठवणी डोळ्यासमोरून अगदी झरझर सरकत राहिल्या. 

अखिल माझा बालपणीचा शालेय मित्र! लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी धमाल दिवस घालविले. सरस्वती विद्या मंदिरची आमची बॅच तशी हुशार म्हणून गणली गेलेली. शालेय जीवनातील आठवणी अगदी हृदयाशी जपुन ठेवल्या. शालेय जीवनानंतर आम्ही सर्व दुरावले गेलो. मधली काही वर्षे फारसे एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. मग २०१० च्या सुमारास फेसबुक, whatsapp ने आम्हांला एकत्र आणले ते कायमचे! 

whatsapp चा आमचा 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच ' ग्रुप म्हणजे एक धमाल कट्टा बनला. शालेय जीवनातील आठवणी, प्रत्येकाच्या जीवनातील सुखदुःखाचे क्षण सर्वांसोबत शेयर करण्याचे हे साधन बनले. आम्ही असे जवळ आलो की कधी दूर गेलोच नव्हतो. 

वर्षे पुढे सरकत गेली. केंद्रबिंदू आमच्यावरून आमच्या मुलांच्या जीवनाकडे वळला. मुलांच्या दहावी, बारावी, पदवी परीक्षामधील यशांचे आम्ही कोडकौतुक केले. हे करताना मग हळुहळू ह्या नवीन पिढीच्या लग्नाच्या निमित्ताने आमच्या भेटी होऊ लागल्या. कोणाच्या गुडघेदुखीचे, सांधेदुखीचे अपडेट 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' वर येऊ लागले. ह्यासाठी नवनवीन चिन्हांचा वापर वाढू लागला. वेगवेगळ्या जोक्सचे प्रमाण हळुहळू कमी होत गेले. जीवनातील अखिल आनंदाचा झरा वाहता ठेवणे फार कमी जणांना जमत राहिलं. ग्रुपवर अभंगाचे प्रमाण वाढत गेले. 

२०४० चे दशक मात्र सुरुवातीलाच दुःखी बातम्या घेऊन आले. आजारपणात आमचे दोन सवंगडी स्वर्गवासी झाले. मग ग्रुप अगदी हबकून गेला. जीवनाचे अंतिम सत्य सर्वांना अगदी अंतर्मुख करून गेले. वर्षे काळाच्या पडद्यामागे जात राहिली आणि त्यांच्यासोबत आमचे साथीदारही! गेल्या वर्षी कादंबरी गेली आणि मग मी आणि फक्त अखिलच राहिलो ह्या ग्रुपवर. काहींचे नंबर तसेच ग्रुपवर राहिले होते. 

मला अखिल हवा आहे! माझ्या बालपणाशी जोडणारा एकमेव दुवा अखिल; त्याची तब्येत सुधारावी अशी खुप खूप इच्छा! पण गेले दोन दिवस त्याचा काही पत्ता नाही. last seen चार दिवसांपूर्वीचे! 

बिनसाखरेचा चहा घेता घेता नवीन मेसेज whatsapp वर आला. धीर होत नव्हता तरी पाहिलं - मेसेज अखिलच्या मुलाकडून आला होता. तो उघडून पाहायची गरज नव्हती. 

आताशा मला खूप खूप एकट वाटतंय! 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' चा ग्रुप उघडून पाहायची इच्छा सुद्धा होत नाही! हा ग्रुप कधीपर्यंत अस्तित्वात राहील कोण जाणे! अधुनमधून बालवाडीचा पहिला दिवस डोळ्यासमोर सरकत राहतो इतकं मात्र खरं! 

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

लवचिकता

व्यावसायिक जग वाटतं तितकं पुर्णपणे कठोर नसतं, त्यातही क्वचित का होईना पण हृदयस्पर्शी क्षण येत राहतात. असाच एक क्षण गेल्या आठवड्यात आला. जिम (नाव बदललं आहे) ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अमेरिकेत निवृत्त झाला. ह्या निमित्ताने भारतातील सर्व टीमने त्याच्यासोबत विडीयो कॉल केला. आपली ६० जणांची टीम समोर पाहून जिम बराच भावनाविवश झाला. सुरुवातीला नक्की काय बोलावं हे त्याला सुचेनासं झालं. मग मात्र त्याने स्वतःला सावरलं. 
खरं तर जिम उच्चपदस्थ! पण अमेरिकन संस्कृतीप्रमाणे सर्वजण त्याला एकेरीतच संबोधित होते. "जिम , उद्या सकाळी उठल्यावर तुला कसं वाटेल?" एकाने इथून विचारलं. आपल्या विचारांची सुसंगती लावण्यासाठी जिमने एक क्षणभर घेतला. मग त्याने आपलं मनोगत मांडलं. "रात्री बेरात्री, सुट्टीवर क्रुझवर असताना, कोण्या परिचिताच्या अंत्यविधीला असताना सुद्धा महत्वाच्या बाबींमध्ये निर्णय घेण्यासाठी त्याला फोन येत असत. सकाळी ७ वाजल्यापासुन मिटींग्स सुरु होत. ह्या कामाच्या सर्व रगाड्यात दिवस अगदी कसा निघून जाई हे सुद्धा कळत नसे! आणि उद्यापासून सकाळी पूर्ण दिवस कसा घालवायचा हा यक्षप्रश्न त्याच्यासमोर ठाकणार होता. बायकामुलांना जिम दिवसभर बाहेर असण्याची सवय होती. जिमला समुद्रकिनाऱ्याची खुप आवड होती. पण किती दिवस समुद्रकिनारा घेऊन बसणार?" जिमने पुन्हा एकदा एक क्षणभराचा विसावा घेतला. "कोणास ठाऊक दोन वर्षांनी मी कदाचित पुन्हा नोकरीच्या शोधात असेन!" जिमचे मनोगत पुढे काही काळ चालु राहिलं पण त्याच्या मनोगताचा हा भाग माझ्या चांगलाच लक्षात राहिला. 
आपलं सुद्धा असंच काही होत असतं. मोकळेपणाचे आयुष्य बालवाडीत कधीतरी संपल्यानंतर आपणही कधीतरी ह्या साचेबंध आयुष्याचे गुलाम होत जातो. साचेबंध आयुष्यासोबत एका ठराविक वैचारिक पद्धतीचे सुद्धा गुलाम होत जातो. आपल्याला विशिष्ट गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनेच केलेल्या आवडतात कारण त्यातील एखादा भाग आपणास आवडत असतो. पण हा आवडता भाग, ही आवडती बाब वगळता बाकीच्या गोष्टींचे मुल्यमापन करण्याची आपण बऱ्याच वेळा तयारी दाखवत नाही. 
माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला मुंबईची रहदारी आवडत नाही. म्हणून भली पहाट किंवा ऐन दुपार अशा कमी गर्दीच्या वेळा निवडून मी माझा प्रवास करण्याचं ठरवतो. आणि मग होतं काय की मी माझा कौटुंबिक वेळ कमी करतो. 
असंच म्हटलं तर सकाळी अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत! माझ्या मुलावर सुद्धा हीच सवय लावण्याचा मी आटोकाट प्रयत्न अगदी हल्ली हल्ली पर्यंत केला. 
आता आपण सवयीचे गुलाम का बनतो? एका विशिष्ट वयानंतर आपण आपलीच स्वतःविषयी एक अप्रत्यक्ष प्रतिमा बनवून घेतो. आणि मग ह्या प्रतिमेशी सुसंगत असे वागण्याचा प्रयत्न करीत राहतो. जीवनाच्या प्रवासात ह्या प्रतिमेचे आणि अनुषंगाने बनलेल्या आपल्या जीवनपद्धतीचे पुन्हा विश्लेषण करण्याचा आपण क्वचितच प्रयत्न करतो. 
जीवनप्रवास पुढे सरकत राहतो. काही लोकांशी आपलं अगदी मनापासून पटतं, काही लोकांशी आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो तर काही लोकांना मात्र आपण चक्क टाळतो. त्या लोकांविषयींच्या गैरसमजांचं ओझं घेऊन आपण जीवन व्यतित करत असतो. ह्या गैरसमजांची सुरुवात कधी झाली हे पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा असं आढळून येतं की आपण थोडा का होईना पण काही काळ हा एका सीमारेषेवर काढला असतो. एका बाजुला असतो विश्वास तर दुसऱ्या बाजूला गैरसमज! जर ही व्यक्ती खरोखर महत्वाची असेल तर गैरसमजांना पुर्णपणे टाळण्यासाठी तो एक अधिकचा मैल चालुन जाणे आवश्यक असतं. अशा वेळी थोडी लवचिकता दाखवणं आवश्यक असतं. 
आजच्या पोस्टचा मुख्य मुद्दा हाच! व्यावसायिक जीवनात लवचिकतेची हद्द दाखविणारे आपण वैयक्तिक जीवनात मात्र इतके अट्टाहासी का बनतो? 

ह्या सर्व विचारशृंखलेला चालना देणाऱ्या जिमचे आभार! त्याला दोन- तीन महिन्यानंतर संपर्क करुन समुद्रकिनाऱ्याचा कंटाळा आला आहे की काय हे विचारण्याचा माझा मानस आहे. जर त्याने स्वयंपाकघरात बायकोला मदत करण्यास सुरुवात केली तर लवचिकतेच्या ह्या परीक्षेत तो यशस्वी झाला असे म्हणता येईल!

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

Valentine दिवस !

Valentine दिवसाचा बरेच दिवस चाललेला कल्लोळ काल एकदाचा संपला. "शब्दावाचुन कळले सारे" चे दिवस कधीच संपले. कधी काळी केलेल्या आणि फक्त दोघांत गुपित म्हणुन हृदयाशी जपुन ठेवलेल्या प्रितीचे दिवस केव्हाचेच सरले.   

जमाना बदलला. तरुणाईसोबत ज्यांचे लौकिकार्थाने प्रेम करण्याचे दिवस सरले असे लोक सुद्धा ह्या कल्लोळात सामील होऊ लागले. हे विधान स्फोटक आहे. प्रेम करण्याचे दिवस कधीच सरत नाहीत असं मानणाऱ्या सदाहरित लोकांचा जमाना आहे हा! मोठा सखोल विषय आहे हा! प्रेम म्हणजे नक्की काय असतं ह्यावर मोठमोठ्या दिग्गजांनी विश्लेषण केलं आहे

पूर्वीच्या काळातील काही प्रेमं तशी अव्यक्तच राहिली. कधी ते कोणाच्या हास्यावर फिदा झाल्याने झालेलं ते प्रेम होतं , तर कधी कोणाचे डोळे आवडल्याने झालेलं ते प्रेम होतं. ते वयच असं होतं  की आपलं कोणीतरी असावं अशी भावना प्रबळ झालेली असते दोघं दुर गेले ते परत न भेटण्यासाठी आणि एकमेकांची त्या वयातील प्रतिमा, रम्य आठवणी कायम ठेऊन! आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा डोळ्यात दोन आसवं आणण्याची क्षमता देणारं हे प्रेम होतं. हे अव्यक्त प्रेम असंच राहून देण्यातच जी गहराई आहे ती कशात नाही!

ह्या उलट आत्ताच! कोणाला पाहुन हृदयाचा अर्धा एक ठोका चुकतो , न चुकतो काय आणि मग सर्वांना झाली प्रेम व्यक्त करण्याची घाई! मागच्या पिढीने केवळ कल्पिलेल्या प्रेम व्यक्त करण्याच्या सर्व पातळ्या काही दिवसात पार पाडून होतात आणि मग सुरु होतो तो परीक्षणाचा काळ! आणि मग ह्या परीक्षणाच्या कसोटीला मात्र बरीच प्रेमं यशस्वीरित्या तोंड देऊ शकत नाहीत. बहुदा मागच्या पिढीतील सुद्धा देऊ शकली नसती. पण होतं काय आयुष्यभर जी प्रतिमा जपायची, ज्या आठवणी जपुन ठेवायच्या त्यांचा चक्काचुर होण्याचीच शक्यता वाढीस लागते

सांख्यिकीदृष्ट्या विचार केला तर तरुणाई एका दशकाची तर बाकीचं आयुष्य त्यामानानं मोठं

शेवटी प्रश्न प्राध्यान्यक्रमाचा आहे! क्षणिक मदहोष सुखं उपभोगायचं की आयुष्यभराच्या आठवणीचा अनमोल ठेवा घेऊन जगायचं ! हा दोन पिढींतील फरक! मला चिंता वाटते ती हल्लीच्या पिढीतील बहुसंख्य तरुणाईची! आयुष्याच्या सायंकाळी कोणत्या आठवणी त्यांना जपाव्या लागतील? 

नवीन पिढीच्या वरील वर्णनाला अपवाद असणारे अनेक प्रतिनिधी असतील, त्यांनी ह्या वर्णनाबद्दल मला क्षमा करावी 

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...