मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, १५ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ४


 
नीलाने सुधीररावांच्या फोनची बातमी आपल्या आईवडिलांच्या कानावर घातली तेव्हा त्यांचा प्रतिसाद फारसा उत्साहवर्धक नव्हता. राजकारणापासून आणि विशेष करून राजकारणी लोकांपासून आपल्या लेकीने दूरच राहावं अशी सर्वसामान्य माणसांसारखी त्यांचीही अपेक्षा होती. त्यात नीला ही अभियांत्रिकी शिक्षण घेत होती. पुढील वर्ष महत्वाचं होतं. त्यामुळे हे नसतं शुक्लकाष्ठ आपल्या मागे नीलाने मागे लावून घेऊ नये अशीच तिच्या आईवडिलांची इच्छा होती. पण सुधीरराव हे सुशांतचे वडील ही गोष्ट त्या दोघांच्याही लक्षात होती. आपल्या मुलीच्या मनात ह्या मुलाविषयी नक्की काय भावना आहेत ह्याचा त्यांना पूर्ण ठावठिकाणा नव्हता आणि त्यामुळे पूर्णपणे नकार देण्याऐवजी सुधीररावांच्या सोशल मीडियावरील प्रचाराची जबाबदारी घ्यायची सूचना त्यांनी नीलाला केली. 

नीलाला सुद्धा त्यांचं म्हणणं पटलं. सुधीररावांनी एकदा ह्या प्रस्तावाला होकार दिल्यावर मात्र नीलाने मागं वळून पाहिलं नाही. सोशल मीडियाच्या सर्व माध्यमांवर रावांच्या प्रचाराचा जोरदार धुरळा तिने उडवून दिला. आपल्या कल्पनाशक्तीला पूर्णपणे मोकळं सोडत तिने रावांच्या आजवरच्या कामगिरीची योग्य माहिती ह्या माध्यमांतर्फे युवा मतदारांसमोर येईल ह्याची खात्री केली. सत्ताधारी पक्षात आता खळबळ माजली होती. रावांसमोर उभा केलेला तरुण डॉक्टरचा डाव फारसा यशस्वी न ठरण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागली होती. विविध बातमी वाहिन्यांनी घेतलेल्या प्राथमिक अहवालानुसार रावांची घोडदौड जोमात चालू होती. 

निवडणुकीचे वातावरण तापत चाललं होतं. सहाव्या सत्राचे सबमिशन आटपून कॉलेजात आता अभ्यासाची सुट्टी चालू झाली होती. नीलाने सुद्धा ह्या जोमदार तयारीनंतर अभ्यासाकडे लक्ष वळविले होते. पण काही विषयात मात्र तिचं घोडं अडून पडलं होतं. काही लेक्चर्स बंग झाली होती आणि त्यातच तो महत्वाचा भाग शिकविला गेला होता. आता कोणाकडून हा भाग समजवून घ्यायचा असा प्रश्न तिला पडला होता. म्हटलं तर तिच्या बैचैनीला अजून एक कारण होतं. सुशांत अगदी सहजरित्या पूर्णपणे अभ्यासात रंगून गेला होता. एक साधा फोन करण्याचे सौजन्य सुद्धा त्याने दाखवलं नव्हतं. उगाचच आपण मनोरे रचत होतो असे तिला राहून राहून वाटत होते. पण सध्या आपल्या अडलेल्या शंका निस्तरणे भाग होते. अशा विचारचक्रात असतानाच तिने कॉलेजात जायचं ठरवलं. वर्गातलं कोणी भेटलं तर बऱ्याच शंका सहज दूर होतील असा तिचा अंदाज होता. नेमकं तिचं मोबाईलचा इंटरनेट पॅक आज सकाळी संपला होता नाहीतर whatsapp तिला कॉलेजात कोण येणार का असा प्रश्न ग्रुपवर टाकता आला असता. 
कॉलेजात गेल्यावर मात्र तिची निराशाच झाली. सगळीकडे अगदी सामसूम होती. पहिल्या आणि दुसऱ्या वर्गातील काही मुलं लायब्ररीमध्ये चर्चेला बसली होती तितकंच! पण तिच्या वर्गातील कोणी दृष्टीला पडलं नव्हतं. आणि अचानक तिची नजर विकीवर पडली. विकी तोच तो ज्याने रावांच्या भाषणात भ्रष्टाचाराचा प्रश्न उगाचच विचारून खोडा घालण्याचा प्रयत्न केला होता. विकी एकटा नव्हता तर त्याच्या सोबत त्याचा टवाळ कंपू सुद्धा होता. "A.T.K.T. कमी करायचा जोरदार प्रयत्न चालू आहे वाटतं!" नीला मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली. तिला पाहताच विकीच्या नजरेत मात्र अगदी चमक भरली. नीलाच्या तडफदार उत्तराने त्याचा भर सभागृहात पाणउतारा झाला होता. खरतर असा प्रश्न विचारून गडबड करण्याचा त्याचा पिंड नव्हता. म्हणजे त्याचा पिंड मुळचा बदमाशगिरीचाच पण व्याख्यानात प्रश्न विचारणे वगैरे प्रकार त्याला झेपण्यासारखे नव्हते. पण त्याने हा प्रश्न विचारला तो त्याला कोणीतरी सांगितलं म्हणून! हा कोणीतरी होता सत्ताधारी पक्षाचा ओमकार शर्मा ! रावांना उगाचच कॉलेजात भाव मिळतोय हे शर्माला रुचलं नव्हतं आणि म्हणून त्याने विकीला हाताशी धरलं होतं. पण नीलाने हा डाव हाणून पाडला होता आणि उलट त्यामुळे रावांना अधिकच प्रसिद्धी मिळाली होती. 
विकीचा उपयोग करून झाल्यावर आता शर्मा त्याला फारसा भाव देतही नव्हता. पण विकीच्या मनात मात्र खुन्नस भरून आली होती. सर्वांसमोर आपला असा अपमान करणाऱ्या नीलाविषयी त्याच्या मनात सूडभावना निर्माण झाली होती. तिचा बदला घेण्याच्या योग्य संधीची तो वाट पाहत होता. परीक्षेनंतर ही संधी चालून येईल ह्याची त्याला खात्री होतीच पण आज नीलाला एकटीच पाहताच त्याची द्रुष्ट मती अतिवेगाने काम करू लागली. "आज पाखरू कसं एकटं फिरकलं बरं!" नीलाला ऐकू जाईल इतक्या जोरात तो म्हणाला. त्याचे हे उदगार ऐकून नीला दचकलीच. आपल्या कॉलेजात अशी कोणाची हिंमत होईल अशी तिची अपेक्षा नव्हती. आता लवकर इथून काढता पाय घेतलेला बरा असा विचार करून तिने पुस्तके आवरली. ती उठून बाहेर पडायला निघणार तितक्यात विकी आणि कंपू तिच्या बाहेर जाण्याची वाट अडवून उभा होता. नीलाने लायब्रेरियनच्या सीटकडे नजर टाकली. ते ही बहुदा आपली सीट सोडून आतल्या कक्षात पुस्तके शोधण्यासाठी वगैरे गेले असावेत. नीलाच्या हृदयाचा ठोका चुकला. लायब्ररीला बाहेर जाण्यासाठी दुसरा मार्ग नव्हता. "आज कशी बरी सापडली!" विकी म्हणाला. "हॅलो !" अचानक नीलाने त्यांच्या दिशेने पाहून हात उंचावला. सगळेजण एकदम चाट पडले. पोरगी वाघीण आहे हे ते जाणून होते पण इतक्या हिंमतीची त्यांनी अपेक्षा केली नव्हती. क्षणभर ते शांत होते इतक्यात त्यांना धक्का देत सुशांत लायब्ररीत शिरता झाला. सर्व टवाळ कंपूत निराशेची लहर पसरून गेली. 
पुढील तासभर सुशांतने नीलाच्या बऱ्याचशा शंका सोडवून दिल्या. विकी आणि कंपू कंटाळून निघून गेला. नीलाने काय झालं ते सुशांतला सांगण्याचं टाळलं. 
विकी आपल्या बाईकवरून घरी परतताना आपल्या नेहमीच्या बारवर नेहमीप्रमाणे काही वेळासाठी थांबला. हल्ली पेग घ्यायला वेळ नसला तरी मालकाशी गप्पा मारणे हा त्याचा आवडता छंद होता. काऊटर वर गप्पा मारता मारता अचानक त्याच्या पाठीवर जोरदार थाप पडली. काहीसं वैतागून त्याने मागे वळून पाहिलं तर ओमकार होता. 
ओमकारच्या जबरदस्तीपुढे विकीचे काही चाललं नाही आणि त्याला आतमध्ये जावंच लागलं. 
"पोरीने जीव कंठाशी आणलाय!" पहिल्या पेगचा अंमल ओमकारवर चढू लागला होता.
विकिची ट्यूब काही लगेच पेटली नाही. पण पुढील काही मिनिटातच त्याला ओमकार नीलाच्या सोशल मीडियावरील प्रचाराविषयी बोलतोय हे कळून चुकलं. 
"हं!! आज कॉलेजात तिला ऐकवायची आयती संधी मिळाली होती! पण नेमका एक पोरगा मध्ये कलमडला!" विकीने आपली कहाणी सुनावली. 

"कोण होतं रे कार्ट!" ओमकार रागाने म्हणाला. "सुशांत ! कॉलेजातला स्कॉलर आहे तो!" 

"त्याची आणि नीलाची खास मैत्री आहे का!" ओमकारचं विचारचक्र काहीसं सुरु व्हायच्या मार्गावर होतं. 

"तसं अजून काही खास दिसत नाही! एक दोनदा एकत्र फिरताना दिसले इतकंच!" विकी म्हणाला. 

"राजकारण्याच पोरगं असून इतका अभ्यास करतं!" विकीसोबत आलेला डिसोजा काहीशा रागानेच म्हणाला. 

ओमकारचे डोळे चकाकले "राजकारण्याचं म्हणजे?" 
"म्हणजे रावांचा!" फुकटची दारू चढायला डिसोजाला तसा वेळच लागायचा. 

इतके दिवस विकीने आपल्याला ही गोष्ट सांगितली नाही ह्याचा ओमकारला आलेला भयंकर संताप त्याने दाबून धरला. 

बऱ्याच दिवसांनी नीलाला चांगली झोप लागली होती. सुशांतने बऱ्याच शंकाचे निरसन केल्यानं काल तिचा बराच अभ्यास झाला होता आणि त्यामुळे झोपही चांगली लागली होती. त्या खुशीतच सकाळी उठून ती डायनिंग रूम मध्ये आईच्या हातचा सकाळचा चहा घ्यायला आली. आई बाबा दोघे अगदी गंभीर होऊन बसले होते. 
"काय झालं बाबा? " आपला मोबाईलकडे गंभीरपणे पाहत बसलेल्या बाबांना तिने विचारलं. 

बाबांनी आपला मोबाईल तिच्या हाती दिला. बाबांच्या एका जिवलग मित्राने त्यांना whatsapp वरचा मेसेज फोरवर्ड केला होता. 

"रावांच्या प्रचारात भावी सुनेचा मोठा हातभार!" अशा शीर्षकाखाली आलेला तो मेसेज होता. नीलाला क्षणभर आपल्या पायाखालील जमीन दुभंगत असल्याचा भास झाला !!

(क्रमशः)

रविवार, ९ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग ३


 

सुशांतसोबत चहा पिऊन कॅंटीनमधून बाहेर पडल्यावर नीलाचे विचारचक्र अगदी जोरात चालू झालं होतं. आर्थिक धोरणावरील चर्चेचा कार्यक्रम तर आता नक्की झाला होता आणि प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता सुद्धा निवडला होता,अगदी सुधीररावांच्या पार्टीचा सुद्धा! आता अशा परिस्थितीत सुधीररावांची मनधरणी कशी करायची हेच तिला कळेना! त्याच विचारात ती आयोजन समितीच्या मुख्य कार्यालय असलेल्या एका वर्गात शिरली. 

वार्षिक कार्यक्रमांचे अंतिम स्वरूप आता मूर्त स्वरूप घेत होते. प्रोफेसर पंडित एकेक कार्यक्रमातील निमंत्रितांची यादी आपल्या नजरेखालून घालत होते आणि आपल्या सूचना देत होते. नीला मुख्य कार्यालयात प्रवेश करायला आणि आर्थिक धोरणाचा कार्यक्रम चर्चेस यायला गाठ पडली. "सर्वच पक्षांच्या तरुण कार्यकर्त्यांना एका व्यासपीठावर आणून तुम्ही फारच मोठे धाडस करीत आहात! समजा त्यांची चर्चा अगदी तापली आणि हाताबाहेर गेली तर तुम्ही करणार काय? " पंडितांच्या ह्या प्रश्नाला आयोजन समितीकडे उत्तर नव्हते. काही क्षण ते सर्व एकमेकांकडे पाहताच राहिले. "सर आपण एखाद्या जेष्ठ नेत्याकडे सूत्रसंचालनाची जबाबदारी सोपवली तर!" नीलाच्या तोंडून अचानक वाक्य निघून गेलं. पंडितांना ही सूचना खुपच आवडली. "पण असा कोण नेता आहे का आपल्या नजरेसमोर जो इतक्या कमी कालावधीत तयार होईल? आणि हो त्याने आपल्या पक्षाच्या प्रवक्त्याची बाजू न घेता निःपक्षपाती भुमिका घ्यायला हवी!" पंडित सर म्हणाले. ताबडतोब सुधीररावांचे नाव घेण्याची नीलाची इच्छा तिने दाबून धरली. सुशांतचे बाबा राजकारणात आहेत हे इथल्या इतक्या मुलांपैकी कोणाला तरी माहित असणारच आणि त्यापैकी कोणीतरी एखादा बोलेलच असा तिचा कयास मंदारने बरोबर ठरवला. "सर आपल्या सुशांत सरपोतदारचे वडील सुधीरराव आहेत ना! त्यांना बोलवायचं का?" त्याच्या ह्या प्रश्नावर पंडित सर सुरुवातीला फारसे अनुकूल नव्हते. पण काही क्षण विचार केल्यावर दुसऱ्या कोणत्या पर्यायाअभावी त्यांनी ह्या प्रस्तावाला मान्यता दिली. "मग आता सुधीररावांना भेटायला जाणार कोण?" पंडित सरांनी रास्त प्रश्न विचारला."सर मी उद्या सकाळी जाऊ शकते!" ह्या कार्यक्रमात पुढाकार घेतलेल्या नीलाने तात्काळ संधी साधली. तसं म्हटलं तर आर्थिक चर्चेच्या कार्यक्रमात सुरुवातीपासून नीलाचा पुढाकार असल्याने तिच्यावर कोणी जास्त संशय घेतला नाही. 

नीलाच्या एकंदरीत प्रस्तावावर सुधीरराव खूपच खुश झाले. आपल्या पक्षात आपलं जेष्ठत्व दाखवून देण्याची संधी आपसूकपणे त्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळणार होती. त्यांनी फारशी चौकशी न करता नीलाला होकार देऊन टाकला. गीताताईंनी आणलेला चहा नीला संपवत नाही तोवर कॉलेजात जायला तयार होऊन आलेला सुशांत तिला पाहून अगदी दचकला. पण नीलाने त्याला नजरेनेच आश्वस्त केलं. "येते हं मी!" स्वयंपाकघरात कपबशी विसळून ठेवत नीलाने गीताताईंचा निरोप घेतला. क्षणभर सारं काही विसरून गीताताई तिच्याकडे पाहतच राहिल्या.

सुशांतला नीलाचं हे धाडस फारसं पसंत पडलं नव्हतं. आपल्या मनात नीलाविषयी नक्की भावना काय आहेत हे त्याला एकतर समजत नव्हतं आणि ते समजून घेणं हे सध्या त्याच्या प्राधान्यक्रमात बसत सुध्दा नव्हतं. नीला आपल्याला आवडते हे तो मनोमन समजून चुकला होता. आणि तिने आपल्या वडिलांना आर्थिक चर्चेविषयीच्या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी घेण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली हे ज्या क्षणी त्याला कळलं त्यावेळी तिचा आपल्या कुटुंबांशी जवळीक साधण्याचा तर प्रयत्न तर नाही ना अशी शंका त्याच्या मनात निर्माण झाली होती. पण नीलाची गेल्या तीन वर्षातील प्रतिमा, तिचा स्पष्टवक्तेपणा पाहता तिला असं काही करायची गरज भासणार नाही हे तो पक्कं जाणून होता.

महाविद्यालयाचा वार्षिक कार्यक्रम चांगलाच रंगत चालला होता. सर्वच  सांस्कृतिक कार्यक्रम एकापेक्षा एक रंगत होते. बाहेरच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आता प्रवेशासाठी खूपच मोठी रांग लागायला सुरुवात होऊ लागली होती. आर्थिक धोरणावरील कार्यक्रमाची हवा आता जोरात निर्माण करण्यात आयोजकांना बरंच यश मिळालं होतं. नीलाने गेल्या कित्येक रात्री केवळ दोन तीन तासांच्या झोपेवर काढल्या होत्या. सुधीररावांनी सुद्धा बरीच तयारी केली होती. ह्या कार्यक्रमाचं मीडियामध्ये व्यवस्थित कवरेज मिळवून देण्याची काळजी सुद्धा त्यांनी आधीच घेऊन ठेवली होती. 

गेले कित्येक दिवस सुशांत आणि सुधीरराव कधी एकत्र जेवलेच नव्हते. पण कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी सुशांतला एकटा जेवताना पाहून सुधीररावांनी गीताताईंना त्यांचसुद्धा ताट घेण्याचा आग्रह केला. "कसं चाललंय तुझं कॉलेज?" खुर्चीवर बसता बसता त्यांनी सुशांतला प्रश्न केला. "चाललंय तसं ठीक! सहाव्याचा अभ्यास जोरदार आहे आणि सातव्याला चांगल्या चांगल्या कंपन्या कॅम्पसला येणार तेव्हा आता चांगले मार्क तर मिळवायलाच हवेत!" सुशांत म्हणाला. बाबांचा मूड ठीक असला तर तो ही ठीकच असायचा. स्वतःहून त्याने कधी बाबांशी मतभेद उकरून काढले नव्हते. "तब्येतीची काळजी घे हो, इतका सर्व अभ्यास करताना! शेवटी काय तर हेल्थ इज वेल्थ!" सुधीरराव त्याला म्हणाले. बऱ्याच महिन्यानंतरचा त्या दोघांचा असा सुखसंवाद पाहून गीताताईंच्या डोळ्यात आपसूकच अश्रू आले. पदरानेच त्यांनी ते पुसून टाकले. सुशांतचे जेवण पहिलं आटोपलं. उठता उठता "बाबा उद्याच्या कार्यक्रमासाठी बेस्ट लक!" असं म्हणून आपल्या चेहऱ्यावरील भावुकता बाबांच्या नजरेस पडू नये म्हणून तो तात्काळ किचनच्या दिशेने निघाला. 

आर्थिक धोरणाचा कार्यक्रम अगदी सुरुवातीपासून चांगलाच रंगला. नीलाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींची ओळख करून दिली. आणि मग कार्यक्रमाची सूत्रे सुधीररावांकडे सोपवली. जर ही प्रचारसभा असती तर रावांनी हाती आलेला माईक पुढील तासभर हातचा सोडला नसता पण ते कोणत्या ठिकाणी कसे नियोजन करायचं ह्याची मेख चांगलीच जाणून होते. जरी ह्या कार्यक्रमाचा विषय भारताच्या आर्थिक धोरणाशी मर्यादित असला तरी सद्यकाळात जागतिक अर्थव्यवस्थेतील थोडीदेखील चढउतार कशी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकत असल्याने त्याचे भान राखणं सुद्धा कसं महत्वाचं आहे ह्याचं सुरेख विवेचन त्यांनी केलं. मग प्रत्येक पक्षाचा प्रवक्ता येऊन आपली बाजू मांडू लागला. त्यात रावांच्या पक्षाचा प्रवक्ता सुद्धा होता. सर्वच पक्षांच्या प्रवक्त्यांनी बाजू मांडून झाल्यावर सुधीरराव एकूण चर्चेचा आढावा घेण्यासाठी म्हणून पुन्हा व्यासपीठावर आले. त्यांचे आढावा घेण्याचे काम सुरु असतानाच कॉलेजातील विघ्नसंतोषी मुलांपैकी एक अचानक उठला आणि "इथे सर्व पक्ष जरी सुधारकांचा आव आणत असले तरी जोवर भ्रष्टाचारी लोक सर्व पक्षांत ठासून भरले आहेत तोवर ह्या देशाचे काही भले होणार नाही !" असे अगदी जोरात ओरडला. अगदी दृष्ट लागण्यासारख्या झालेल्या कार्यक्रमाला हे असं गालबोट लागणं म्हणजे अगदी दुर्देवी घटना होती. सुधीररावांचा चेहरा रागाने अगदी लालेलाल झाला होता. नीलाच्या ध्यानात हे सारं काही आलं. तात्काळ धावत जाऊन ती सुधीररावांच्या बाजूला जाऊन उभी राहिली. " आपल्या कॉलेजात आलेल्या माननीय पाहुण्यांसोबत असा अनादर व्यक्त करणारी मुलं आपल्या कॉलेजात आहेत ही दुर्दैवाची गोष्ट! पण ज्याप्रमाणे अशा मुलांच्या उपस्थितीमुळे आपल्या कॉलेजच्या प्रगतीत जशी बाधा न येता आपलं कॉलेज प्रगतीची शिखरं गाठत आहे त्याचप्रमाणे देशातील मोजक्या भ्रष्टाचारी लोकांच्या अस्तित्वाने आपल्या देशाच्या प्रगतीत बाधा येणार नाही!" नीलाच्या ह्या करारी बोलण्याने वातावरण अगदी पालटून गेलं. सभागृहातील मुलांनी एव्हाना त्या खट्याळ कार्ट्याला आणि त्याच्या साथीदारांना सभागृहाबाहेर पिटाळून लावलं होतं. सुधीरराव मोठ्या कौतुकाने नीलाकडे पाहत होते. इतक्यात मग एका अभ्यासू मुलाने FDI वर  प्रश्न विचारायला सुरुवात केली. ह्या विषयात तर सुधीररावांचा हातखंडा! मग त्यांनी पुढील अर्धा तासभर आपल्या ज्ञानाची पखरण सभागृहात केली. वेळ उलटून गेला तरी कोणालाच त्याचं भान राहिलं नाही. शेवटी मग नाईलाज म्हणून नीलानेच सुधीररावांना आवरतं घेण्याची नजरेने विनंती केली. कार्यक्रम संपल्यावर टाळ्यांचा कडकडाट पुढील दोन तीन मिनिटे चालूच राहिला. 

बऱ्याच दिवसांनी सुधीररावांना खूप खूप समाधान वाटत होते. बाहेर निघताना नीलाचे आभार मानण्याची संधी राहून गेली ह्याची बरीच चुटपूट त्यांना लागून राहिली. सुशांतने घरी परतताच त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. "अरे त्या नीलाचा नंबर आहे का तुझ्याकडे? त्या पोरीचं आभार मानायचंच राहून गेलं! तिने प्रसंगावधान दाखवलं म्हणून सारा कार्यक्रम यथासांग पार पडला!" आपल्याकडे नीलाचा मोबाईल क्रमांक नाही ह्याची पहिल्यांदाच सुशांतला जाणीव झाली. "बाबा मी तुम्हांला उद्या आणून देतो तिचा क्रमांक!" सुशांत काहीशा अपराधीपणाने म्हणाला. 

दुसरा दिवस उजाडला तोच एका मोठ्या बातमीने! महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची अचानक घोषणा झाली होती. सत्ताधारी पक्षाचे बहुमत धोक्यात आल्याची वदंता गेले कित्येक दिवस होतीच. नाहीतरी पुढील सहा महिन्यात विधानसभेचा कालावधी संपणार होताच तर मग आताच निवडणुका घेऊन टाकाव्यात असा रास्त विचार केंद्र सरकारने केला होता. 

पुढील दोन आठवड्याचा काळ राव दक्षिण मुंबईत हॉटेलात तळ ठोकून होते. नीलाचा नंबर त्यांना सुशांतने दिला खरा पण तिला फोन करण्याची त्यांना संधी सुद्धा मिळाली नाही. त्यांच्या मोर्चेबांधणीचे यश त्यांना एकदाचे मिळालं आणि त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याचं जाहीर झालं. रावांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. दोन आठवड्यांनी त्यांनी घरी प्रवेश केला. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी उत्साह पसरला होता. 

दुसऱ्या दिवशी राव विभागवार कार्यकर्त्यांच्या नेमणुकीत गुंतले होते. अचानक सत्ताधारी पक्षाने रावांच्या विरोधात एका तरुण डॉक्टरची उमेदवारी जाहीर केली. आणि रावांच्या पक्षात खळबळ माजली. 

वार्षिक कार्यक्रमामुळे अस्ताव्यस्त झालेल्या सबमिशनच्या व्यापात नीला अगदी गढून गेली होती. सर्व कार्यक्रमाचे अगदी खूप कौतुक झाले होते. पण नीलाला मात्र एक शल्य खुपत होतं. "कार्यक्रम चांगला झाला " असं एका वाक्याने कौतुक करून सुशांत Industrial Visit साठी बंगलोरला रवाना झाला होता. आणि रावांनी तर जाताना सुद्धा आभार मानले नव्हते. "होतं असं कधी कधी आयुष्यात!" असं म्हणत तिने स्वतःचीच समजूत काढली होती. आणि कालच त्यांना निवडणुकीचे तिकीट मिळाल्याची बातमी आली होती. 

अचानक तिच्या मोबाईलची रिंग वाजली. समोर राव होते. आपल्याकडून तिचे आभार मानायचे राहून गेले ह्याची खरोखरीची खंत त्यांच्या आवाजात जाणवत होती. त्यांच्या सारख्या इतक्या जेष्ठ नेत्याकडून फोन आल्यावर नीला झालं गेलं विसरून गेली होती. त्यांचे अभिनंदन करून फोन ठेवणार इतक्यात राव म्हणाले, "एक मिनिट थांब! माझ्या प्रचारासाठी एक युवा चेहरा मी शोधतोय! तू ही जबाबदारी घ्यायला तयार आहेस?"

 (क्रमशः)

शनिवार, ८ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग २


 

"आई, हा आमच्या कॉलेजातील सुशांत बरं का! अगदी स्कॉलर मुलगा आहे!" नीला मोठ्या कौतुकाने आईशी सुशांतची ओळख करून देत होती. तिचे बाबा मात्र शांतपणे आपल्या डिशचा आस्वाद घेण्यात दंग होते. "नमस्कार!" सुशांतने हात जोडून नीलाच्या आईला प्रणाम केला. "हिचे वडील थोडे खाष्टच दिसतात!" चिकन लेगचा आस्वाद घेण्यात मग्न असलेल्या तिच्या बाबांकडे नजरेचा कटाक्ष टाकत सुशांत मनातल्या मनात पुटपुटतो इतक्यात "हाऊ आर यु यंग मॅन !" म्हणत त्यांनी त्याला त्यांच्यात सामील होण्याची विनंती केली. "आणि हो त्या दिवशी नीलाला कॉलेजात लिफ्ट दिल्याबद्दल धन्यवाद!" बाबांच्या ह्या मनमोकळ्या बोलण्याने आपण उगाचच ह्यांच्याविषयी मत बनविण्याची घाई करत होतो ह्याचा सुशांतला मनातल्या मनात पश्चात्ताप झाला. 
आपण एकटेच इथे हॉटेलात का आलो होतो ह्याचे स्पष्टीकरण देणे सुशांतला काहीसं जड गेलं. पण मग नीलाने लगेचच त्याची परिस्थिती ओळखून विषय बदलण्यात त्याची मदत केली. मग निरोप द्यायची वेळ आली तेव्हा सुशांतचा मूड बराच सुधारला होता. 
दुसऱ्या दिवशी सकाळी उठायला नीलाला तसा उशीरच झाला. आज आपल्याला असं अगदी छान का वाटतंय ह्याचा तिला उलगडा होत नव्हता. चांगलासा ड्रेस घालून ती आरशासमोर केस विंचरत उभी होती. आणि अचानक तिला मागे सुशांत उभा आहे असा भास झाला. अगदी दचकून तिनं मागे वळून पाहिलं पण तिला झालेला हा भास होता. 
रिक्षाने कॉलेजात जाताना भिरभिरणारी तिची नजर प्रत्येक बाईकवाल्यावर पडत होती. हे आपल्याबाबतीत असं होऊ शकत ह्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. 
त्या दिवशी सुशांतची एका पाठोपाठ एक लेक्चर्स होती. मध्ये नीलाला एक फ्री लेक्चर मिळताच आपल्या मैत्रिणीला घेऊन उगाच तिने सुशांतच्या वर्गावरून चक्कर मारली. पाठमोरा सुशांत अगदी एकाग्रतेने प्रोफेसरकडे लक्ष देऊन ऐकत होता. "बाय द वे आपण ह्या वर्गापाशी का थबकलो आहोत?" चाणाक्ष शलाकाच्या ह्या प्रश्नाने भानावर आलेल्या नीलाने तातडीने आपल्या पावलांचा वेग वाढवला. तिच्या सुदैवाने शलाकाचे लक्ष कोठे दुसरीकडे वेधले गेले म्हणून ठीक नाहीतर तिची आज काही खैर नव्हती. 
दोन दिवसानंतर मात्र नीलाच्या प्रयत्नांना यश लाभलं. पुस्तक परत करायला लायब्ररीमध्ये ती प्रवेश करणार आणि सुशांत तिथून बाहेर पडायला एकच गाठ पडली. "हॅलो!" सुशांतने आपल्या मित्रांच्या अस्तित्वाचे भान ठेवत हळूच तिला अभिवादन केलं. त्याच्यासोबत ह्या वेळी त्याचा जीवलग मित्र निखिल होता. एकंदरीत परिस्थितीचा त्याला साधारणतः अंदाज आलाच होता. सुशांतला अनुकूल वातावरण निर्माण करण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात अचानक उबाळून आली. "ओह नो! माझे अजुन एक पुस्तक परत करायचं राहून गेलं! सुशांत माझं एक काम करशील? ही रांग भलीमोठी वाढतच चालली आहे. तू इथंच उभा राहा मी हा असा गेलो आणि पुस्तक घेऊन परत आलो!" निखिलचे हे उदगार सुशांतला कितीसे पसंत पडले हे जरी त्याला समजलं नसलं तरी नीलाच्या चेहऱ्यावर उमटलेलं छुपं हासू त्याच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलं नाही. 

"त्या दिवशी रात्री हॉटेलात तू असा अगदी टेन्स का दिसत होतास?" रांगेत सुशांतच्या पुढे उभ्या असलेल्या नीलाने त्याला विचारलं. "आणि हो असा एकटाच कसा काय आलास हॉटेलात?" तिच्यासोबत रांगेत एकत्र उभी रहायची पाळी आली तेव्हा सुशांतने अशा प्रश्नांना सामोरं जाण्याची तशी तयारी केलीच होती. गेले दोन दिवस घरी वातावरण तंगच होतं. अंगात ताप असल्याने बाबा घरीच होते आणि त्यामुळे आईशी ह्या परिस्थितीवर चर्चा करायची सुद्धा संधी त्याला मिळत नव्हती. त्यामुळे आता हिच्याशी ह्या विषयावर बोलण्याशिवाय पर्याय नाही असा निर्णय सुशांतने घेतला. 

"तुला थोडा वेळ असेल तर आपण कॅंटीन मध्ये चहा घेऊयात का?" सुशांतने तिला विचारलं तेव्हा नीला अगदी खुष होऊन गेली. त्या दोघांची एकत्र एंट्री कॅंटीन मध्ये झाली तेव्हा एका कोपऱ्यात बसलेल्या सुशांतच्या मित्रांच्या तोंडाचा उघडलेला आ तसाच काही वेळ कायम राहिला. नीलाने एका कोपऱ्यातील टेबल पकडलं आणि तोवर सुशांत दोन कप चहा हातात घेऊन तिथवर आला. "अबे क्या तू भी वही देख रहा हैं जो मैं देख रहा हूँ?" अशा ऐतिहासिक प्रसंगी हिंदी चित्रपटातील संवाद बोलण्याची सवय तशी सुशांतच्या मित्रांना होतीच. आतापर्यंत सुशांतने अनाथ सोडलेला निखिल सुद्धा त्यांच्यात सामील झाला होता. आपण सुरु केलेलं अभियान सुशांत इतक्या लगेच इतकं पुढे नेईल ह्याची कल्पना नसलेला निखिल मनातून खुश झाला. 

"हं तर अशी परिस्थिती आहे तर!" सुशांतच्या घरी हे वादळ घडवायला अप्रत्यक्षरित्या आपण कारणीभूत झालो ह्याचे नीलाला खूप वाईट वाटत होते. चहाचे घुटके घेत असताना ह्या परिस्थितीत कशी सुधारणा घडवता येईल ह्याची चक्रे तिच्या डोक्यात फिरू लागली. चहा आटपून मग काही वेळाने दोघंजण एकत्रच बाहेर पडली. सुशांतने कंपूला आपल्या नजरेतून कॅंटीनमध्ये प्रवेश करता करताच पाहिलं होतं. नीलाशी बोलल्यावर सुशांतला काहीसं हलकं वाटू लागलं होतं. त्या मूडमध्ये त्याने बाहेर पडताना कंपूला लांबूनच आत्मविश्वासपूर्ण हात केला. एव्हाना कंपू पूर्णपणे थंडगार झाला होता. 

आज सुधीररावांना तसं बरं वाटू लागलं होतं. सकाळीच उठून अंगणात एक फेरफटका मारून ते हॉलमध्ये बसले होते. त्यांना चहा घेऊन गीताताई आल्या. कप टीपॉय ठेवून स्वयंपाक घरात जायला निघतात तितक्यात दारची बेल वाजली. इतक्या सकाळसकाळी कोण आलं असेल असा विचार करतच त्यांनी दार उघडलं तर समोर एक सुंदर आकर्षक महाविद्यालयीन युवती उभी होती. "माझं नाव नीला! मला सुधीररावांना भेटायचं होतं. फोन न करता अचानक आल्याबद्दल क्षमस्व!" गीताताई अगदी आश्चर्यचकित झाल्या होत्या. "अहो ऐकलं का!" आपली ठेवणीतील हाक मारता मारता ही मुलगी कशी सोज्ज्वळ दिसते हा विचार त्यांच्या मनात डोकावलाच!!

(क्रमशः)

बुधवार, ५ ऑगस्ट, २०१५

वारसदार - भाग १


 
 सुधीररावांच्या आक्रस्ताळपणाकडे दुर्लक्ष करून सुशांतने आपला अभ्यास सुरूच ठेवला. "असली पुस्तकं वाचत बसलो असतो तर हा बंगला, ही जमीन कधीच मिळवता आली नसती!" सुधीररावांनी आपला संताप सुरूच ठेवला तसा न राहवून सुशांत म्हणाला, "हवीय कोणाला तुम्हांला तुमची संपत्ती!" त्यांच्या वाक्याने होऊ घातलेला सुधीररावांच्या संतापाचा स्फोट बाहेरून येणाऱ्या SUV च्या दर्शनाने त्यांना आवरता घ्यावा लागला. 
"तू आपलं शांतपणे जेवून घे पाहू!"  रावांची कार्यकर्त्यांबरोबर बैठक सुरु झाली तसं गीताताई सुशांतला म्हणाल्या. बापलेकांचे खटके तसे हल्ली वारंवार होऊ लागले होते. गेले नऊ वर्षे आमदारकीपासून वंचित राहिलेल्या रावांचा संयम हल्ली काहीसा सुटत चालला आहे असंच ताईंना वाटू लागलं होतं. नाहीतर अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या सुशांतच्या मागे पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता बनण्याचा घोषा त्यांनी उगाच का लावला असता! 
सुशांतने थोडक्यातच आपलं जेवण आटपून घेतलं आणि तसाच तडक तो आपली बाईक काढून महाविद्यालयाच्या दिशेने सुसाट निघाला. नुकताच पाचव्या सेमिस्टरला महाविद्यालयात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने तसा त्याचा जीव महाविद्यालयात चांगलाच रमला होता. आता सहाव्याला पहिलाच क्रमांक काढायचा असा त्याच्या मनाने ठाव घेतला होता. त्यामुळे एव्हाना महाविद्यालयाच्या वाचनालयातच त्याचा अधिकाधिक वेळ जायचा. 
सिग्नलला बाईक थांबवून त्याने क्षणभरासाठी हेल्मेट बाजूला केलं तशी बाजूच्या कारची काच वर झाली. "हॅलो सुशांत!" कारमधून एक मंजुळ आवाज आला. अचानक आलेल्या ह्या आवाजाने सुशांत दचकला. मेंदूला थोडा ताण दिल्यावर ही तर आपल्या कॉलेजातील मुलगी हे त्याने ओळखलं. "हाय !" त्याने काहीसा थंड प्रतिसाद दिला. हिचं नाव काय बर असा मनात येणारा विचार त्याने त्यात यश न मिळण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन सोडून दिला. सिग्नल कधी हिरवा होतोय ह्याची वाट पाहत असताना पुन्हा तिचा आवाज आला, "माझ्या वडिलांना किन्नई मीटिंगला जायला थोडा उशीरच होतोय, मी तुझ्यासोबत बाईकवर आले तर चालेल का?" वडिलांशी थोडा वेळ जास्त भांडलो असतो तर हा अनावस्था प्रसंग ओढवलाच नसता असा त्याच्या मनात विचार आला. पण स्त्रीदाक्षिण्याच्या विचाराने त्याने शेवटी तिला मानेनेच होकार दिला. 
महाविद्यालयाच्या बाहेर टपरीवर कटिंगचा आस्वाद घेत असलेल्या सुशांतच्या मित्रमंडळीच्या ग्लासातील चहा आपल्या नव्याकोऱ्या बाईकवरून येणाऱ्या सुशांतला पाहून हिंदकळला. सुशांत बाईकवरून येणे ह्यात काही नाविन्य नव्हतं पण त्याच्या मागे बसलेल्या नीलाचे दर्शन त्यांना अनपेक्षित होते. नीला ही कॉलेजातील बऱ्यापैकी फ़ेमस होती आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे कॉलेजातील जवळजवळ प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमातील तिचा सहभाग! वक्तृत्वस्पर्धा असो की गायनस्पर्धा वा नृत्यस्पर्धा, एकतर स्पर्धक किंवा सूत्रधार म्हणून तिचा सहभाग ठरलेलाच असायचा! हिची आणि सुशांतची ओळख कधी झाली हाच गहन प्रश्न सर्व मित्रमंडळीना पडला; आणि त्याहूनही आपल्या गुप्तहेर खात्याचं इतके मोठे अपयश त्यांना पचवणं जरा कठीणच गेलं. त्यातील काहींच्या असूयेची भावना निर्माण झाली हा अजून एक भाग!! ह्या मित्रांच्या घोळक्यासमोरून जाताना सुशांतने बाईक जरा अजून जास्तच झुपकन जोरात नेली. त्यातील काहींनी त्याला नजरेनेच "तू ये तर खरा इथे घोळक्यात, मग पाहून घेतो तुला!!" असे धमकावलं. 
"भेटली वाटेत आणि दिली तिला लिफ्ट! त्यात काय मोठं आभाळ कोसळून पडलं काय!" मित्रांच्या चेष्टामस्करीने मनातून सुखावलेला सुशांत उसने अवसान आणून त्यांच्याशी फुल फाईट देत होता. शेवटी सुशांतकडून कॅंटीनमधल्या प्रसिद्ध पावभाजीची पार्टी घेइस्तोवर मित्रांनी त्याचा पिच्छा सोडवला नाही. 
दिवस शांतपणे चालले होते. पितापुत्रांचा अबोला काहीसा कायमच होता. नीला आणि सुशांत पातळीवर सुद्धा काही विशेष घडामोड नव्हती. चुकून समोरासमोर आले तर "हाय, हॅलो"  व्हायचं इतकंच!! सुशांतचे लक्ष महाविद्यालयात सातव्या सत्रात येणाऱ्या कंपन्याद्वारे नोकरी मिळवण्याकडे लागून राहिलं होतं. कोठे बाहेरगावी नोकरी मिळवली तर बाबांच्या कटकटीपासून काही दिवस का होईना मुक्तता मिळेल असाही त्यामागचा हेतू होता. 
कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमाचे वारे एव्हाना जोरात वाहू लागले होते. आयोजनात अर्थातच नीलाचा पुढाकार होता. खरेतर राजकीय पक्षांपासून हा कार्यक्रम दूर ठेवण्याचा व्यवस्थापनाचा कटाक्ष होता, पण पुढील वर्षाच्या निवडणुका लक्षात घेता महाविद्यालयीन विद्यार्थांच्या मनात एकंदरीत विविध पक्षांच्या आर्थिक धोरणांबाबत जागृती निर्माण व्हावी असा प्रस्ताव नीलाने मांडला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राचार्य आणि व्यवस्थापनाने हा प्रस्ताव फारसे आढेवेढे न घेता उचलून धरला. 
नीलाने स्थानिक पातळीवरील विविध पक्षांशी संपर्क साधला आणि आपला प्रतिनिधी पाठविण्याची विनंती केली. बदलत्या वातावरणाचे भान असलेल्या सर्व पक्षांनी तत्परतेने आपल्यातील तरुण जाणकार नेत्यांची ह्या कार्यक्रमासाठी निवड केली. महाविद्यालयीन तरुणांसमोर आपल्या पक्षाची तरुण प्रतिमा निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू होता. 
सुधीररावांपर्यंत ही बातमी इथून तिथून का होईना पण पोहोचली. आपल्या मुलाच्याच कॉलेजातील कार्यक्रमात आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याला बोलावलं जात नाही हे त्यांच्या मनाला अगदी लागलं. अगदी खवळूनच ते रात्री घरी पोहोचले. सुशांत शांतपणे आपल्या खोलीत अभ्यासाला बसला होता. "बस झाली ही नाटकं!" त्याच्या खोलीचा दरवाजा धाडकन उघडत सुधीररावांनी त्याच्यावर आग ओकली. "बापाच्या पैशाने फी भरतो आणि बापाला कॉलेजात बोलवायला तुला लाज वाटते की काय!" त्यांच्या तोंडाचा पट्टा चालूच होता. क्षणभर काय झालं ते सुधीरला कळलंच नाही. पण क्षणभर विचार करता त्याची ट्यूब पेटली. "अहो बाबा, तसं काही नाहीय! ह्या कार्यक्रमाच्या आयोजनात माझा अजिबात सहभाग नाही! आणि आयोजकांनी असा कार्यक्रम आयोजित केला इतकंच मला माहितेय, पण त्यांनी प्रवक्त्यांना निमंत्रण पाठवली हे मला बिलकुल माहित नाही!" त्याच्या ह्या बोलण्याचा काही प्रभाव न पडल्याने रावांनी आपला पट्टा चालूच ठेवला. 
सुशांतने आपला शांतपणा कायम ठेवला. "आई मी बाहेर एक चक्कर मारून येतो!" आपल्या बाईकची चावी उचलत तो म्हणाला. आईनेही त्याला अडविले नाही. "तू ह्याला पूर्ण बिघडून ठेवला आहे! माझी ह्या घरात काहीच किंमत राहिली नाही !" सुधीररावांची धुसफूस सुरूच राहिली. 
ह्या वेळी कोठे जायचे हे सुशांतला समजत नव्हते. समोर एक हॉटेल दिसलं त्यात एक कॉफी पिऊन मग घरी जावं असा त्याने विचार केला. 
हॉटेलाच्या वातानुकुलीत कक्षाचा दरवाजा उघडून कोठे मोकळी जागा मिळते का ह्याचा शोध त्याची नजर घेत असतानाचा अचानक त्याला "हाय सुशांत !" अशी हाक ऐकू आली. हाकेच्या दिशेने नजर वळवून पाहतो तो आपल्या आईवडिलांसोबत जेवण घेत असलेली नीला त्याच्या नजरेस पडली!

(क्रमशः)

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

वेगवान मार्गिका !!

 
पुन्हा एक रविवार संध्याकाळ, पुन्हा एक वसईहून बोरीवली परतीचा प्रवास! दहिसर चेकनाक्याच्या साधारणतः १ किमी आधीपासूनच वाहनांची कोंडी! मग कोणती मार्गिका पकडायची हा नेहमी सतावणारा प्रश्न ! मध्येच एक उजवीकडे वळायचा सिग्नल येतो. तिथे बऱ्याच वेळा वाहनं खोळंबून राहतात हे अनुभवाने मिळालेलं ज्ञान! त्यामुळे आपण ही मार्गिका टाळायची हे आधीपासून ठरविलेलं! परंतु प्रत्येक वेळी हा अनुभव, हा ज्ञान प्रथमच अनुभवणारा कोणीतरी ह्या मार्गिकेत असतोच आणि मग त्याची आणि त्याची गाडीची नाक खुपसून बाजूच्या मार्गिकेत घुसण्याची धडपड! 
ह्या सर्व खटाटोपीत बऱ्याच वेळा आपली मार्गिका सोडून बाकीचीच वेगाने जात असल्याचा अनुभव येतो. सोबत सोहम, प्राजक्ता असले की मग "तुम्हांला तरी मी सांगितलं होतं!" हे वाक्य हमखास ऐकायला मिळणार! मग न राहवून मार्गिका बदलण्याची माझीही धडपड! त्यामुळे अचानक मागच्या चालकाचा रोष, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, मग त्याने बाजूने जाताना दिलेला मस्त लुक, क्वचितच दोन्ही कार एकमेकाला घासण्याचा दुर्धर प्रसंग ओढविण्याची शक्यता! 
डिस्कवरी वाहिनीवर एक तासाचा कार्यक्रम अशाच संबंधित विषयावर दाखविला गेला होता. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका मोठ्या वाहतूक कोंडीत सापडतो. "पुढे एखादं वाहन बिघडून बंद पडलं असेल किंवा खड्डा पडला असेल!" असेच काही विचार करीत वाहन चालवत राहतो आणि मग ज्या ठिकाणापर्यंत वाहतूककोंडी झाली असेल तिथे पोहोचतो.  आणि पाहतो तर काय अहो आश्चर्यम!  तिथे काहीच झालेलं नसतं आणि वाहतूक पुढे व्यवस्थित चालू असते. डिस्कवरीवाल्यांचं म्हणणं होतं की हा सर्व खोळंबा बऱ्याच वेळा अधूनमधून मार्गिका बदलायचा प्रयत्न करणाऱ्या उतावळ्या चालकांमुळे होतो. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे मागचा चालकाला ब्रेक मारावा लागतो आणि मग त्याची साखळी प्रतिक्रिया होत राहते. डिस्कवरवाल्यांचा सिद्धांत असा की जर कोणीच मार्गिका न बदलता व्यवस्थितपणे आपली मार्गिका पकडून गाड्या चालवल्या तर सर्व मार्गिकाच वेगवान राहू शकतील! 


चेकनाक्याच्या वाहतूककोंडीने अस्वस्थ असलेलं मन डिस्कवरीचा कार्यक्रम पाहून विचार करू लागलं. स्वाभाविकपणे मनात विचार आला, की हा वेगवान मार्गिकेचा अट्टाहास कशासाठी! काही मिनिटं घरी लवकर पोहोचण्यासाठीच ना! ह्या वाचविलेल्या काही मिनिटांचा जर आपण सदुपयोग करणार असू तरच मग ह्या धडपडीला अर्थ आहे. 

तसं पाहिलं तर वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे नक्की काय करणं ह्याविषयीचा माझा संभ्रम वाढत्या वयानुसार वाढतच चालला आहे. नियमित अभ्यास करून मग खेळणे म्हणजे वेळेचा सदुपयोग ही शालेय जीवनातील अगदी सोपी व्याख्या आता काहीशी क्लिष्ट बनत चालली आहे. कुटुंबासोबत गुणात्मक वेळ (Quality Time) - हयात 
१) मुलाचा अभ्यास, त्याच्याशी खेळणं, त्याच्यासोबत टीव्ही बघताना त्याला बातम्यातील / खेळातील अधिक संदर्भ देणे ह्यांचा समावेश होतो. 
२) पत्नीशी गप्पा - हे सांगायला अगदी भारदस्त वाटत असलं तरी प्रामुख्याने ह्यात श्रोत्याची भूमिका चांगली वठवता आली पाहिजे. 
३) आई वडिलांसोबत शांत बसणे - ह्यात त्यांच्यासोबत तासभर टीव्ही पाहत बसलं आणि त्यात दोन मिनिटं त्यांच्याशी बोललं तरीही ते खुष असतात. 
४) भाऊबहिण, आणि नातेवाईकांना फोन करणे - ह्या बाबतीत माझी कामगिरी अगदी सुमार आहे.
४) कार्यालयातील उरलेल्या कामात अधिकाधिक कशी परिपूर्णता आणता येईल ह्याचा विचार करणे!
५) शालेय / जुन्या मित्रांना फोन मन रिझविणे!
६) पुस्तके वाचणे, ब्लॉग द्वारे लोकांना ज्ञान देणे!
७) क्रिकेट / चित्रपट संगीत पाहणे

ह्या झाल्या काही अगदी पटकन आठवणाऱ्या गोष्टी! 

हल्लीच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला मिळालेला मोकळा वेळ कसा योग्य प्रकारे व्यतीत करायचा! वेगवान मार्गिका आयुष्यातसुद्धा आपल्यासमोर येतात! तरुणाईची खुमखुमी असल्याने आपण त्या स्वीकारतो सुद्धा आणि मग आपली ध्येय कधीकधी खूपच आधी प्राप्त होतात. असतं एक शिखर आणि काहीसा एकटेपणा! इथं पोहोचल्यावर काय करायचं ह्याचा विचार आधीपासूनच करून ठेवायला हवा!

मग आठवलं ते पूर्वी कधी वाचलेलं वाक्य! "केवळ ध्येयाकडे लक्ष ठेवून प्रवास करू नका! प्रवासाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करा!!"

मंगळवार, १४ जुलै, २०१५

रम्य ते बालपण - ४


 
एकत्र कुटुंब आणि बर्यापैकी मोठी वाडी ह्यामुळे त्यावेळी बऱ्याच कामगार वर्गाचा घरी राबता असे. शेतीत काम करणारी हे सर्व कामगार अगदी घरच्या मंडळीप्रमाणे लहान मुलांची काळजी घेत. ह्यातील प्रत्येकाची खास व्यक्तीवैशिष्टे असत.

मोठी आईचे माहेर मुळगावचे. तिच्या माहेरून आलेला बाबुराव पण घरी काही काळ होता. हा अगदी रंगात आला की "अपलम चपलम" , "तू गंगा की मौज मै यमुना का धारा!!" अशी ठेवणीतील गाणे गाऊ लागे. मग दिदीच्या नेतृत्वाखाली बच्चेमंडळी त्याची फिरकी घ्यायला सज्ज होत. 

रुपजी काका आणि गुलाब काकू हे जोडपे बहुदा ७० च्या दशकापासून घरी राहायला असावे. रुपजी काकाचा उल्लेख बाउल प्रकरणात येउन गेला आहे. त्यांची तीन अपत्ये दीपक, राजू  आणि सुरेखा. दीपकने मला विटी दांडू आणि गोट्या खेळाचे नियम शिकवले. विटी दांडू मध्ये तो मला ९९.९९% हरवायचा. पहिल्या फटक्याने हवेत उडवलेल्या विटीला हवेतच पुन्हा दांडूने मारल्यास दुप्पट गुण मिळत असे मला काहीसं आठवतं. पण मला ह्या दोन्ही खेळात काही विशेष गती प्राप्त न झाल्याने मी ह्या खेळांपासून दुरावला गेलो. दीपक तसा हरहुन्नरी होता. केळीच्या दोन लोदांना (जाड बुध्यांना) मजबूत रस्सीने जोडून त्याने त्याची कामचलावू नौका बनवली होती. गढूळ पाण्याने भरलेल्या बावखलात त्याची ही नौका आणि त्यावर दीपक हे दृश्य मला काहीसं स्मरत. पण पूर्ण खात्री नाही. 

दीपकची मस्ती दिदीला फार खटकायची. एकदा तिचा राग अनावर होऊन तिने त्याला पूर्ण अंगभर बाम चोळला. त्यामुळे कासावीस झालेल्या दीपकला पाहून गुलाबकाकू नाराज झाली होती.

कालांतराने हे जोडपे बेण्यावर स्थलांतरित झाले. रुपजीकाका लवकरच निवर्तले. आणि दीपक, राजू सुद्धा! पण गुलाबकाकू अजूनही काम करते.

अंगमेहनतीची खास कामे करण्यासाठी घाटावरून आलेले तातोबा आणि त्याचे कुटुंब येई. हा तातोबा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार सारखा दिसायचा. त्यालाही तसंच वाटायचं की नाही हे मला ठाऊक नाही. तो एकदा एका प्रकरणात अडकला. त्याने मग वकील वगैरे केले. हे वकील एकदा अण्णांना भेटायला घरीही येऊन गेले. मग काही वर्षाने बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर तातोबा मोठ्या अभिमानाने सांगत आला की "हेच माझे वकील होते!"

मे महिन्यात खूप वेळ असे. त्यावेळी मोठी माणसे सायकलवर फिरत. लहान मुले साधारणतः आठवी नववी पर्यंत ही सायकल चालवू शकत नसत. आणि त्यावेळी लहान मुलांना हजारो रुपयाच्या सायकली विकत घेण्याची पद्धत नव्हती. होळीवर एक दोन दुकाने होती. तिथे भाड्याच्या सायकली मिळत. पन्नास पैसे अर्धा तास आणि एक रुपया एक तास! ज्याला सायकल येते अशा मोठ्या भावंडाची  किंवा मित्राची विनवणी करून त्यांच्याकडून सायकल अंगणापर्यंत आणली जात असे. मग पुढील अर्धा तास मुलं पडत, खरचटवून घेत. पण कधीतरी मग सायकल शिकत! ह्या सायकल शिकण्याच्या कालावधीत मला सायकल चालवता येत आहे ह्याची बऱ्याच वेळा स्वप्ने पडत! दोन्ही हात सोडून काही अंतर सायकल चालवू शकणारा मुलगा प्रसिद्ध असे. 


आईचे माहेर बोर्डीला! तिथे माझी मोठी बहिण सुस्मितताई आणि बंधू बऱ्यापैकी मे महिन्यात राहिले. पण मी मोठा होईस्तोवर आईचे तिथे जाणे हळूहळू कमी होत चालले. तरी देखील बोर्डीचे अण्णा आणि आजीच्या आठवणी मला बर्यापैकी स्मरतात. मे महिन्याची सुट्टी संपून परत यायची वेळ झाली की रमणचा प्रसिद्ध टांगा बोलाविला जाई. आणि मग त्यात भाई, आई, आम्ही तिघे आणि बऱ्याच काही आठवणी घेऊन आम्ही परतत असू ! बोर्डीहून परतणाऱ्या गाड्या अगदी संथ गतीने धावत. तशा अजूनही संथ गतीने धावतात. वाटेत मग डहाणूची डाळ घेतली की आम्ही धन्य होत असू. 
बोर्डीचा समुद्रकिनारा सुंदर आहे. तिथे आम्ही संध्याकाळी फिरायला जात असू. उत्तरेला असेच चालत गेले की झाई गाव लागतं. ते गुजरात राज्यात आहे असे मला सांगण्यात आले होते. एका अशाच संध्याकाळी ओहोटीच्या वेळी आम्ही एक समुद्रातील पाण्याचा प्रवाह (ओढा) ओलांडून पलीकडे गेलो. त्यावेळी बंधू किंवा सुपितताईने मला आपण झाईत म्हणजे गुजरात राज्यात आलो आहोत असे सांगितलं. ती पूर्ण संध्याकाळ मी धन्य होतो. पुढे जून महिन्यात शाळा उघडल्यावर मित्रांना कधी एकदा हे सांगतो असे मला झाले होते. हल्लीच्या मुलांत युरोपला वगैरे गेल्याशिवाय अशी भावना निर्माण होत नाही. 

बोर्डीच्या अण्णांचे कुटुंबीय काही अंतरावर असलेल्या वाडा ह्या ठिकाणी राहत. "अण्णा वाड्यात गेलेत!" हे वाक्य आम्ही बऱ्याचजणांना सांगायचो. अण्णांचे मित्र शांताराम म्हणून होते. ते अण्णांना भेटायला बऱ्याच वेळा यायचे. त्यांची एक खासियत होती. ते अंगणात पडलेल्या सावलीवरून घड्याळाची वेळ अचूक सांगत. ते आले की मी त्यांना वेळ विचारे. मग ते सावलीकडे निरखून पाहत आणि मग मला वेळ सांगत. मग मी धावत जाऊन घरातील घड्याळात वेळ पाहून धन्य होऊन येई. 

बंधू आजूबाजूच्या अण्णांच्या शेजाऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असल्याने त्यांच्यात प्रसिद्ध होता. समोरच्या पाटलांकडचेअजित बंधुपेक्षा
वयाने बरेच मोठे असले तरी बंधूला दोस्त म्हणत! एकदा जोशात येउन बंधू त्यांना म्हणाला, "इतके दोस्त वगैरे म्हणता तर आइसक्रीम वगैरे खिलवा की!" अजितभाऊंनी ही गोष्ट फार मनावर घेतली. लगेचच सायंकाळी आम्हां सर्वांना समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलात घेऊन गेले.खिशातील शंभरची नोट बंधूला दाखवत म्हणाले, " तुझा दोस्त म्हणजे काय कमी समजू नकोस!" गोल्ड स्पॉट किंवा थम्सअप वर दहा रुपयाच्या वर खर्च करायची सवय नसलेल्या आम्हां सर्वांना ह्या गोष्टीचे फार मोठे अप्रूप वाटलं होते. सुपितताईची वसईच्या शाळेतील खास मैत्रीण नंदा हिचे सुद्धा बोर्डीला बहुदा आजोळ होते. त्यामुळे ती सुपितताईला तिथे भेटायची. मग सुपितताई खुश व्हायची. त्यावेळच्या पद्धतीनुसार सुपितताईवर घरातील मोठी मुलगी असल्याने कामाचा तसा बोजा पडायचा. 


बोर्डीला बऱ्याच वेळा पॉलीश न केलेला तांदुळ भातासाठी वापरत त्याचीसुद्धा एक वेगळी पण सुरेख चव असे! बोर्डीला आंब्याच्या वेगळ्या जाती असत. ते ही मनसोक्त खायला मिळत! अंगणात सकाळी वासुदेव येई. एका आठवड्यात विष्णू, राम वगैरे रूपे पाहून खुश झालेला मी नंतर अंगणात रावण प्रकटलेला पाहून पूर्णपणे भयभीत झालो होतो. दुपारी कधी मधी फेरीवाले पत्र्याच्या डब्यात नानाविध बिस्किटे , नानकटाई वगैरे घेऊन येत. ही बिस्किटे पाच रुपयाला शंभर असल्या स्वस्त दरात मिळत.

दुपारी जेवणं वगैरे आटोपली की आम्ही मेंढीकोट खेळायला बसू. खाली गोणपाट अंथरलेले असे. अण्णा सुद्धा सामील होत. हुकुम जो लपवित असे तो चतुराईने पायाखाली लपविलेले पान बाकी कोणाचे लक्ष नसताना हळूच वर करून समोरच्याला दाखवे. मग समोरचा कान पकडून, जीभ बाहेर काढून चौकट, बदाम वगैरे हुकुम असल्याचे खुणेनेच सांगे. बऱ्याच वेळा ही मंडळी पकडली जात मग मोठा गदारोळ माजे! गोणपाट अंथरून त्यावर मेंढीकोट खेळायला बसण्यात ह्या चतुराईला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असेच मला अजूनही वाटत आले आहे. पुढे १९८४ साली आजी अचानक स्वर्गवासी झाली आणि मग बोर्डीच्या फेऱ्या खूप कमी झाल्या. 

(क्रमशः)

शनिवार, ४ जुलै, २०१५

रम्य ते बालपण - ३



आधीचे दोन भाग काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध केल्याने संदर्भासाठी त्यांची लिंक इथे देत आहे. 

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post.html 

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_206.html 

वसईतील बहुसंख्य लोक पूर्वी स्टेशनवरून गावात परतण्यासाठी एसटी बसचा वापर करीत. पारनाका, होळी, रानगाव, गिरिज, किल्लाबंदर ह्या ठिकाणांसाठी बस सुटत. तशा ह्यातील काही बस अजूनसुद्धा चालू आहेत पण पूर्वीची शान नाही. ह्या बसच्या विशिष्ट वेळा असत आणि डेपोत असलेल्या बसच्या संख्येवरून आपल्याला बस कधी मिळेल ह्याचा अंदाज बांधता येई. बस देताना पारनाक्याला नेहमीच प्राधान्य दिलं जातं अशी होळीवाल्यांची समजूत होती आणि त्यांना त्याचा रागही यायचा. एखाद्या दिवशी बसला खूप उशीर झाला की मग बसच्या रांगेतील सामाजिक जीवनात सक्रिय असणारी मंडळी जाऊन कंट्रोलरला बस देण्यासाठी आपलं म्हणणं पटवून देत. मग थोड्या वेळानं बस येई. म्हटलं तर शाळेत असताना ह्या एसटी बसने प्रवास करायची वेळ क्वचितच येई. पण बाहेरगावी गेल्यावर परतताना नक्कीच एसटीशी गाठ पडे. ह्या एसटीचे ९० सालच्या आसपास स्टेशन ते होळी तिकीट हे ९० पैसे आणि रमेदी पर्यंत तिकीट १ रुपया होते. होळीच्या थांब्याला कंडक्टर बसमधल्या उरलेल्या प्रवाशांकडे नजर टाकून त्यांनी १ रुपयाचे तिकीट काढले असावे की नाही ह्याची खातरजमा करून घेई. अगदीच संशय आल्यास एखाद्याला विचारी सुद्धा! ह्या एसटी बसमध्ये बाकी सर्व दिवे पिवळ्या रंगाचे आणि एखाद दुसरा निळ्या रंगाचा असे. ह्या दिव्याखालची सीट मिळावी म्हणून माझा आटापिटा असे. 

पूर्वी सकाळी ८:४२ वाजता एक बडाफास्ट नावाची लोकल होती. ती बहुदा बोरिवली नंतर थेट बांद्र्याला थांबे. त्या लोकलला आमच्या गल्लीतून जाणारी २-३ मंडळी असत. ती साधारणतः बस पकडण्यासाठी एकत्रच निघत. 

आमच्या गल्लीत जॉनी अंकल राहतात. माझे वडील भाई, काका दाजी आणि जॉनी अंकल बऱ्याच वेळा ऑफिससाठी एकत्र निघत. जॉनी अंकल हे अनेक विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीमध्ये निष्णात आहेत. मी त्यांना ८० सालांपासून आमच्या घरी विविध उपकरणे दुरुस्त करताना पाहतो. ते अजूनही जमेल तसे येतात. दाजींकडे एक शंख असायचा. थोड्या दूर घर असलेल्या जॉनी अंकलना बोलावयाचे झाले की मग दाजी ह्या शंखाचा विशिष्ट नाद करीत. मग जॉनी अंकलना हा संदेश मिळून ते घरी येत. 

वसई स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वालीव ह्या गावी आमची शेती होती. पावसाळा आला की तिथे भाताची लागवड केली जात असे. तिथे एक बेडं होतं. तिथे अण्णा, मोठी आई, बाबा (मधल्या क्रमाकांचे काका) ह्या पावसाळ्याच्या काळात बऱ्याच वेळा जाऊन राहत. तिथे विद्युतपुरवठा वगैरे काहीच नसे. त्या शेताच्या बाजूने एक ओढा वाहत असे. त्या ओढ्याचे पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकाला सुद्धा वापरलं जात असावं अशी माझी आठवण आहे. शुद्धता ती पण किती!! आज घराच्या बाजूला असलेल्या विहिरीतील पाणी थेट पिताना जीव धास्तावतो. भाई मग रविवारी वगैरे ह्या शेतावर जात. माझ्या आठवणीत मी एकदा त्यांच्यासोबत एसटी पकडून गेलो होतो. सर्वत्र पाऊस पडून गढूळ पाणी झालं होतं. शेतात मजूर कामाला होते.  दुपारी गावठी कोंबडीचे जेवण चुलीवर बनवलं होतं. आणि चारच्या आसपास चहा आणि ग्लुकोज बिस्कीट खाऊन आम्ही परतलो होतो. माझे आजोबा भाऊ ह्या वालीवच्या शेतावरून बैलगाडी घेऊन रात्री अपरात्री सुद्धा घरी परतत असत. ती परंपरा बराच काळ बाबांनी चालू ठेवली होती. 
ह्या वालीव शेताच्या बाजूला एक छोटी टेकडी होती. ह्या टेकडीवर आंब्याची अनेक झाडे होती. एका वर्षी ह्या आंब्यांना खूप आंबे आले आणि मग ते पिकण्याच्या सुमारास बैलगाडीत भरून मग घरी आणण्यात आले. ह्यात अनेक प्रकारचे आंबे होते. त्या पिकलेल्या आंब्यांच्या मधुर सुवासाने आजीची खोली भरून गेली. आजी मग आम्हांला प्रत्येक दिवशी ह्या आंब्याचे वाटप करी.

घराच्या मागे असलेल्या बेड्यात दोन कणगे असायचे. त्यात मग ऑक्टोबरच्या आसपास झोडणी करून झालेलं भात आणून भरलं जायचं. आणि बाबा मग लॉरीवाल्यांबरोबर बोलणी करून पेंढा भरून आणत आणि अंगणातील मोकळ्या भागात टाकत. ह्याचं वर्णन मागच्या भागात आलं आहे. हा पेंढा आल्यानंतर काही काळातच मग दिवाळी येई. दिवाळीत आम्ही बाण लावताना ह्या पेंढ्याच्या दिशेने तो लावू नये म्हणून आम्हांला खास सूचना दिल्या जात. 
भाई आणि दाजी ह्यांना एकत्र कुटुंब असेपर्यंत एकच भाजी डब्यात मिळायची. एकदा डांगर वर्गातली एक भाजी कडू निघाली. परंतु ह्या सत्याचा महिलावर्गाला साक्षात्कार होईस्तोवर ह्या दोघातील एक आधीच डबा घेऊन ऑफिसात निघाले होते. त्यामुळे मग दुसऱ्याबरोबर दोघांनी अ-कडू भाजी पाठविण्याचे काम आजीने व्यवस्थित सुनांकडून करून घेतलं. 
आधी एक मजली असणारे घर ८४ च्या आसपास दुमजली करण्यात आले. युसुफभाई कंत्राटदार आणि डिसोजा वास्तुतज्ञ अशी जोडगोळी होती. खालच्या घराची जशी संरचना होती तशीच वरच्या मजल्याची सुद्धा ठेवण्यात आली. ह्या वर्षांतच केव्हातरी घरी पाण्याची मोटार बसविण्यात आली. वरच्या मजल्याचे काम सुरु असताना तिथल्या कच्च्या भितींना दररोज पाण्याने भिजविण्याचे काम मोठी मंडळी उत्साहाने करीत. आपली ह्या कामात मदत होतेय की अडथळा ह्याची चिंता न करता आम्ही सदभावनेने त्यात सहभागी होत असू. ह्या मजल्याचा स्लॅब जेव्हा टाकण्यात आला तेव्हा आम्हां बच्चे मंडळींना मोठे अप्रूप वाटलं. हा स्लॅब कसंही करून एका दिवसात / एका फटक्यात पूर्ण झाला पाहिजे हा महत्वाचा घटक होता. मिक्सरमधून वेगाने निर्माण होणार कॉंक्रीटआणि त्याहून अधिक वेगाने ते वरती चढवायचा प्रयत्न करणारी कामगार मंडळी हे चित्र पाहून मी धन्य झालो होतो. हा स्लॅब यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर सायंकाळी युसुफभाईच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधानाचे भाव अजूनही मला आठवतात. 

१९८० साली एक मोठे सूर्यग्रहण झालं होतं. त्यावेळी घरातील सर्व मंडळी सर्व दारं खिडक्या बंद करून घरात बसली होती. पण आमची अनिता दिदी बऱ्यापैकी बंडखोर होती. ती काहीतरी निमित्त काढून घराबाहेर पडली आणि मग घरातील सर्व मोठ्या मंडळींचा संताप झाला होता. 
१९८२ साली एकदा मुंबई पोलिसांनी बंड केले होते आणि त्या संबंधित कारणांमुळे माझ्या वडिलांना रात्रभर ऑफिसात थांबावे लागलं. परंतु त्याकाळी हा संदेश घरी पाठविण्याची सोय नसल्याने घरची मंडळी मात्र रात्रभर चिंतेत राहिली. मी लहान असलो तरी मलाही मोठी चिंता लागून राहिली आणि झोपही आली नाही. सकाळी शाळा होती आणि परीक्षाही होती. शाळेत निघायच्या आधी भाई घरी परतले आणि मग माझा जीव भांड्यात पडला. 
असंच एकदा पावसाळ्यात गल्लीतलं चिंचेचे मोठे झाड विजेच्या तारांवर पडून पूर्ण गल्लीतील विद्युतपुरवठा दोन तीन दिवस खंडित झाला. विहिरीतून पाणी काढून घरात भरणे वगैरे प्रकार करून सर्वांचाच जीव मेटाकुटीला आला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांच्या कर्मचाऱ्यांनी शेवटी जेव्हा तीन चार दिवसांनी हा विद्युत पुरवठा पूर्ववत केला तेव्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 
मला लहानपणी पेपर वाचण्याचा मोठा छंद जडला होता. आंघोळ वगैरे करून मी अंगणात पेपरवाल्याची वाट पाहत थांबे. आता नक्की आठवत नाही पण बहुदा त्यावेळी शुजा नावाचे कार्टून रविवारच्या लोकसत्तेत येई. ते मला भारी आवडे. १९८० सालचे ऑलिम्पिक सुद्धा मला काहीसं आठवत. भारताने ह्यात सलामीच्या हॉकीच्या सामन्यात टांझानियाचा १८ -० असा दणदणीत पराभव केला होता. अंतिम सामन्यात भारताने स्पेनचा ४-३ असा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. ह्या सामन्याचे धावतं वर्णन मी घरच्या रेडियोवर ऐकलं होतं. नंतर कधीतरी हे ऑलिम्पिक शीतयुद्धाच्या कालावधीत मॉस्कोत झाल्याने त्यावर अनेक देशांनी बहिष्कार टाकला होता हे मला समजलं तेव्हा मला काहीसं वाईट वाटलं. हा वॉल्वचा रेडियो अधून मधून बिघडे मग जॉनी अंकलना पाचारण केले जाई आणि मग ते आपल्या सवडीने हा दुरुस्त करीत. माझ्या आठवणीत त्यांनी हा रेडियो सात आठ वेळा तरी दुरुस्त केला असावा. हा रेडियो चालू स्थितीत असला की भाई न चुकता सकाळी सहा वाजताची मंगल प्रभात आणि रात्रीचा १० वाजताच छायागीत हे कार्यक्रम लावतं. सहा वाजता अडीच अडीच मिनिटाच्या हिंदी आणि इंग्लिश बातम्या झाल्या की मग सुंदर मराठी गाणी लागत. ह्यात भीमसेन जोशी ह्यांचं "माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी" हे खास प्रिय होतं. सहा पस्तीस झाले की मग एक हिंदी गाणं लागून मग ह्या कार्यक्रमाची सांगता होई. ही हिंदी गाणी - "हम होंगे कामयाब" "हर बस्तिका रहनेवाला हमको प्यारा है!" वगैरे असत.
१९८१ च्या साली आमच्या घरी दूरदर्शन संच आला. त्याआधी आम्ही सामने बघायला दामूतात्या यांच्या घरी वगैरे जायचो. नंतर मग जुन्या घरच्याच बंधूनी १९८४ -८५ साली रंगीत दूरदर्शन संच आणला. भारतात रंगीत दूरदर्शन संच इंदिरा गांधी ह्यांनी १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आणला. ह्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी भाई, आई, सुपितताई, बंधू आणि मी महामंडळाच्या सहलीला गेलो. ह्यात कर्नाळा अभयारण्य, महाबळेश्वर, गोवा आणि गणपतीपुळे वगैरे ठिकाणांचा समावेश होता. ही सहल एसटी बसने जायची आणि अजूनही जाते. स्वयंपाकी लोक बस मध्येच असत. ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं की मग ते स्वयंपाकाला लागत. रात्री झोपायला काही ठिकाणी मोठा हॉल असे त्यात सर्व मंडळी झोपत. आमच्याच कुटुंबातील सुभाषबंधू ह्यांच्याकडे आयोजनाची जबाबदारी होती. त्यांनी गणपतीपुळेला हॉटेलमध्ये आम्हांला चांगली रूम दिली. तिथे पौर्णिमेची रात्र होती आणि रात्री वीज गेली होती. त्यामुळे बाहेर समुद्रकिनारी अगदी मनोरम दृश्य होते. मी पेपर वाचत ह्या आशियाई खेळांशी संपर्क ठेवून होतो. सहलीवरून परत आल्यावर मग बाकीचे सर्व सामने पाहिले. गीता झुत्शीला रौप्य पदक मिळाले आणि भारताचा पाकिस्तानने ७-१ पराभव केला ते ही पाहिलं. ते मनाला खूप लागून राहिलं. तरी एकंदरीत १३ सुवर्ण मिळवून भारताने चांगली कामगिरी केली. 
त्याकाळी लग्नाला जायचं म्हणजे बरीच मजा वाटायची. रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास मध्ये सरबत, शेव आणि लाडू असे पदार्थ आदल्या दिवशी खायला मिळत. डॉन चित्रपटातील जिसका मुझे था इंतजार हे गाणं बऱ्याच लग्नाच्या आदल्या दिवशी ऐकल्याचे आठवते. 
(क्रमशः)

पोह्यांचा ऊहापोह

पारंपरिक मराठी घरांमध्ये दररोज सकाळी सर्वसाधारणपणे शिरा, उपमा आणि पोहा हे तीन होतकरू उमेदवार आपला अर्ज दाखल करत असत. घरातील मुख्य गृहिणी विव...