शंतनु ऑफिसातून आला तो काहीसा अबोल होऊनच! तन्वीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखलं की आज काहीतरी बिनसलं आहे. त्याला तिने फ्रेश होवून दिले. तो ताजातवाना होऊन परत हॉल मध्ये येईपर्यंत तिने गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीच्या खारी बिस्किटाची डिश तयार ठेवली होती. चहा आणि आवडीची बिस्किटे पाहताच शंतनुचा चेहरा खुलला. त्याने सोफ्यावर बैठक मारली. चहाचा पहिला घोट घेताच त्याची मुद्रा खुलली. तोवर तन्वी आपला कप घेऊन त्याच्याजवळ येऊन बसली होतीच. तन्विचा स्पर्श होताच शंतनूची उरलीसुरली उदासी निघून गेली. तन्वीने आपला चहाचा कप टीपॉयवर ठेवला!"असं रुसून घरी परत यायला काय झालं होत?" "काही नाही" शंतनु म्हणाला. दोन मिनिटे कोणीच काही बोललं नाही. तन्वीला हा अबोला सहन न होऊन ती काहीशा रागानेच स्वयंपाकघरात गेली. "राग फक्त हिलाच धरता येतो" शंतनू मनातल्या मनात पुटपुटला. एक दोन मिनटे थांबून आज आपल्यालाच पडतं घ्यावं लागणार असा सुज्ञ विचार करीत तो स्वयंपाकघरात पोहोचला. एव्हाना तन्वीचे कांदा कापणे सुरु झालं होत. पाठमोरी असली तरी तिने शंतनुची चाहूल घेतली. १० - १५ सेकंद काही मागून हालचाल नाही हे पाहून मग ती वळली. तिच्या नजरेतील भावांनी आणि ओठात दडलेल्या स्मितहास्याने शंतनुची उरलीसुरली नाराजी दूर झाली. "माझी मुन्नारला बदली झालीय" फ्रीजला टेकून उभा राहिलेला शंतनू बोलला. भाजी कापणाऱ्या तन्वीच्या हातातील सुरी तिने कशीबशी आपले बोट कापण्यापासून वाचविली. तन्विसाठी ही बातमी म्हणजे मोठा धक्काच होता. पुढील एका महिन्यात मुन्नारला संसार उभारायचा होता. कोल्हापुरातील सर्व मैत्रिणी, नातेवाईक सोडून अचानक असे जाणे तिच्या जीवावर येत होते. परंतु नाईलाज होता. तिच्या मनातील वादळाचा जेवणावर परिणाम झालाच. परंतु शंतनु एव्हाना सावरला होता. भाजीतील कमी मिठाचा त्याने उल्लेखही केला नाही. त्याला वाढून तन्वीने आपले ताट वाढून घेतलं. पहिला घास घेताच तिला मिठाचा कमीपणा जाणवला. "अरे शंतनू, भाजीत मीठ कमी आहे! मला सांगायचं नाही का?" ती म्हणाली. शंतनुच्या डोळ्यात पाहून त्याने आपल्याला न दुखावण्यासाठी मौन राखलं हे तिला जाणवलं आणि इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. शंतनु लगेचच खुर्चीवरून उठला. "रडूबाई, अग लोक देशांतर करतात आणि मजेत राहतात. आपण तर आपल्याच देशात चाललो आहोत! आणि ते सुद्धा मुन्नरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी" दोघांच्या ताटात चिमुटभर मीठ ठेवता ठेवता शंतनु म्हणाला. शंतनुच्या समजूतदारपणाने तन्वी अगदी गहिवरली. एका हातानेच तिने शंतनुला आपल्याजवळ ओढले. जेवण आटोपल्यावर शंतनुने आवाराआवर करण्यास हातभार लावला. "चल पटकन खाली एक चक्कर मारून येवू" शंतनू म्हणाला. तन्वीला थोडे आश्चर्यच वाटलं. एकदा का ऑफिसातून घरी आला की शंतनुला घराबाहेर काढण्यासाठी फार कष्ट करावे लागायचे. परंतु तिलाही थोडा मोकळेपणा हवा होता. तिने तत्काळ पंजाबी ड्रेस चढविला. मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. हवेत कमालीचा उकाडा होता. रात्रीचे साडेनऊ झाले तरी हा उकाडा जाणवत होता. गावाबाहेरील ही कॉलनी गर्द झाडांनी व्यापलेली होती. रहदारी तशी चालू होती. कॉलनीच्या दुसऱ्या टोकाला एक आईसक्रीमवाल्याने गाडी लावली होती. तिच्याकडे बोट दाखवून शंतनू म्हणाला "चल, आईसक्रीमचा कोन घेऊयात!" तन्वीला आज तर एकावर एक आश्चर्यचे धक्के बसत होते. आईसक्रीमच्या गाडीपर्यंत दोघेही अगदी हातात हात घालून चालत होते. अचानक हवेत थंड वारा सुटला. जमिनीवर पडलेला पालापाचोळा वाऱ्याने अगदी हवेत उडवून दिला. तन्वी शंतनुला उगाचच बिलगली. आईसक्रीमवाला वाऱ्याचे रूप पाहून आपला गाशा गुंडाळायाच्या मागे होता. त्याने घाईघाईने ह्या दोघांना कोन बनवून दिले . आपल्या कोनाचा पहिला हक्क शंतनुने तन्वीला दिला. आनंदाने फुललेल्या तन्वीचे ते मोहक रूप शंतनू आपल्या डोळ्यात साठवत होता की दूरवरून पावसाच्या जोरदार सरींचा आवाज दोघांनीही टिपला. "पळ शंतनु, पाऊस आला" तन्वी ओरडली. जमेल तितकं आईसक्रीम तोंडात भरून दोघांनी पळ काढला. अर्ध्या वाटेवर दोघांना पावसाने गाठल. एका झाडाचा आसरा घेवून दोघे थांबले. जोरदार पावसाने उरलीसुरली रहदारी थांबवून टाकली होती. आणि तितक्यात वीजहि गेली. पहाटे चारच्या सुमारास तन्वीला जाग आली. बाजुलाच लहान मुलाप्रमाणे झोपलेल्या शंतनुला पाहून ती स्वतःशीच खुदकन हसली. रात्री पावसाने तास दोन तासभर जोरदार वर्षाव केला होता. आता मात्र आकाश बऱ्यापैकी निरभ्र झाले होते. कृष्णपक्षातील सकाळपर्यंत आकाशात रेंगाळणारा चंद्र तन्वीला खिडकीतून दिसला. अभावितपणे त्याच्या सोबतीला कुठे चांदणी दिसते का ह्याचाच ती शोध घेऊ लागली. आणि तिला चंद्राच्या बाजूलाच एक चांदणी दिसताच तिची कळी अजूनच खुलली. आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कसे अचानक आपणासमोर येतात ह्याचेच तन्वीला राहून राहून आश्चर्य वाटत होते. शंतनू तसा अगदी शिस्तीचा माणूस, त्याच्याकडून रात्री झालेला कलात्मक प्रेमाचा वर्षाव तिला अगदी अनपेक्षित होता. तन्वी आणि शंतनू ह्यांच्या लग्नाला आताशा सहा महिने होत आले होते. शंतनु दुनियेच्या मापदंडाप्रमाणे अगदी आदर्श नवरा होता. नावाजलेल्या प्रवासी कंपनीत मोठ्या व्यवस्थापकाच्या हुद्द्यावर होता. लग्न झालेली बहिण आणि आई वडील असं सुखी कुटुंब होते. आई वडिलांना पुणे सोडून कोठे जायचे नसल्याने, तन्वी आणि शंतनुचा राजाराणीचा संसार कोल्हापुरात चालू होता. म्हणायला गेलं तर कोल्हापुरात दोघांचेही नातेवाईक होते. लग्नानंतर ह्या दोघांना बोलावण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली होती. तन्वीला ह्या सर्व गोष्टीत खूप मजा वाटे तर शंतनुला कंटाळा येई . शंतनुला नवनवीन पर्यटन ठिकाणे धुंडाळण्यात रस असे. ह्या मुद्द्यावरून कधी कधी दोघांत खटका उडे. परंतु तन्वी समजुतीने घेई. शंतनुसोबत आपणही काहीवेळा भटकण्यास जाऊया अशी मनाची तिने तयारी केली होती. आणि अचानक काल संध्याकाळी शंतनू मुन्नरला जाण्याची बातमी घेऊन आला. तन्वीचे विचारचक्र असेच चालू होते. अचानक घड्याळाकडे तिचे लक्ष गेले. साडेपाच होऊन गेले होते. तन्वीने पुन्हा एकदा आपल्या राजसाकडे पाहिले. त्याची गाढ निद्रा अजून तशीच होती. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता अजूनही कायम होती. हा अजून रात्रीच्या आठवणीतून बाहेर आला नाही वाटत ह्या खट्याळ विचाराने तन्वी अजून हसली. तन्वीने स्वतःसाठी चहा बनविला. चहाचे घुटके घेत ती गॅलरीत आली. पूर्वेला आता उजाडून येत होते. रात्रीच्या पावसाने सर्वत्र पालापाचोळा विखरून दिला होता. काही फांद्याही मोडल्या होत्या. पक्षांचा मधुर किलबिलाट सुरु होता. मुन्नारला जाण्याबाबत तन्वीने काल रात्री विचारच केला नव्हता. विचार करायला म्हणा वेळच कुठे मिळाला होता तिला! पण आता मात्र तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले होते. तिची वाणिज्य शाखेतील पदवी होती. मुंबई सोडून कोल्हापुरात येतानाच तिला जीवावर आले होते. लवकरच कोठेतरी छोटी नोकरी मिळवावी असा तिचा मानस होता . परंतु शंतनु हे तिचे बोलणं मनावर घेत नव्हता आणि आता हे मुन्नरचे प्रकरण उद्भवल्याने आपली नोकरी आता अजून पुढे ढकलली जाणार ह्याची तिला खात्री झाली होती. ती ह्या विचाराने काहीशी अस्वस्थ होती. तिचे हे विचारचक्र शंतनुच्या अलगद स्पर्शाने खंडित झाले. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं, शंतनूने तिला एक स्मित हास्य दिलं. तन्वीच्या मनात अचानक सकाळच्या भाजीचा विचार आला आणि ती ताडकन उठून स्वयंपाकघरात गेली. शंतनुचा पुरता हिरमोड झाला होता. हिला दोन मिनिट बोलायला काय झालं होत असा विचार करीत तो नकळत आपल्या नाखुशीच्या कोशात शिरला. बाकी सकाळ मग तशी नेहमीप्रमाणे गेली . सर्व व्यवहार यांत्रिकपणे चालू होते. अंघोळ करताना टॉवेल विसरण्याचे नाटक करण्याचा विचार महत्प्रयासाने शंतनुने परतवून लावला. ऑफिसला निघताना त्याला टाटा करण्यासाठी तन्वी गॅलरीत आली. पण तिने हात उंचावून केलेल्या निरोपाकडे शंतनूने दुर्लक्ष केले. सकाळ आता बरीच स्थिरावली होती. रात्रीच्या पावसाच आता नामोनिशाण नव्हत. तन्वीने चपाती दुधात बुडवत आईला फोन लावला, शंतनुच्या बदलीची बातमी द्यायला. "काय बाई हे! मुन्नरला बदली? मी सांगते हो तुला, तू इकडे नोकरी पहा मुंबईला. सहा महिन्यात तो परत येईल की नाही ते बघ! ते काही नाही मी आजच गजाननकाकांना संध्याकाळी तुझ्याकडे पाठवते" आईची ही अखंडवाणी सहन न होत तन्वीने फोन ठेवला. ती तशीच किती वेळ रिकामा पेला घेऊन खिडकीतून दिसणाऱ्या एकट्या चिमणीकडे पाहत राहिली ते तिचे तिलाच माहित! तन्वीची तंद्री शेजारच्या मनीषाच्या बेल वाजविण्याने खंडित झाली. मनीषा सहजच गप्पा मारायला आली होती. तन्वीची एकंदरीत मुद्रा पाहून मनीषाने आपलं बोलणं आवरत घेतलं आणि ती परतली. तन्वीने घड्याळाकडे पाहिलं "अरे बापरे साडेनऊ होत आले, चटकन आवरायला हवं" ती स्वतःशीच म्हणाली. शंतनुला केलेल्या चपत्यातील उरलेल्या दोन मोरंब्यासोबत झटपट खाऊन तिने आपली न्याहारी आटोपली. ती क्षणभर थांबली. तिने फोनकडे नजर टाकली आणि शंतनुला फोन लावला. तीन चार रिंगनंतर सुद्धा त्याने फोन न उचलल्यामुळे तिने फोन ठेवला. तो बऱ्याच वेळा सकाळी कामात व्यग्र असतो त्यामुळे बहुदा त्याने फोन उचलला नसावा अशी अटकळ तिने बांधली. "पण त्याने मुद्दाम उचलला नसेल तर?" असा विचार मनात आणून द्यायचा तिचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ती अगदी उदास झाली. उदासपणावर सतत कामात राहणे हाच रामबाण उपाय आहे हे बाबांचे बोल तिला आठवले. मग ती नव्या जोमाने कामाला लागली. इतक्यात बाहेर फोन वाजतो आहे असा भास तिला झाला. ती धावतच बाहेर गेली. शंतनू फोनवर होता. त्याची कायम असलेली नाराजी स्वरातून डोकावत होती. "ह्या महिनाअखेरीला शिफ्ट व्हावे लागेल" तो म्हणत होता. "आणि हो फोन उचलायला इतका वेळ का लागला?" "मी आंघोळ करतेय" तन्वीच्या ह्या उत्तरावर शंतनु क्षण दोन क्षणभर तो फोनवर तसाच न बोलता थांबला. "ठीक आहे, ठेवतो मी फोन" असे बोलून त्याने फोन ठेवला होता. दोन प्रौढांच्या रुसून बसण्याच्या खेळात थोडी रंगत आली होती. जेवणं आटपून, टीव्ही पाहून तन्वी जरा पहुडली होती की दाराची बेल वाजली. गजाननकाका दारात उभे होते. ते थेट घरात शिरले. आईने त्यांना सर्व इत्यंभूत खबर दिली होती हे स्पष्ट होते. "वसुधा माझ्याशी सविस्तर बोलली, मी तुझ्यासाठी मुंबईत त्वरित नोकरी शोधतो. शंतनुराव काय सहा महिन्याच्यावर तिथे थांबायचे नाहीत" गजाननकाकांच्या बोलण्याकडे तन्वी दुर्लक्ष करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु ते थांबायचे लक्षण दिसेना तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी शंतनूसोबत मुन्नारला जाणार!" वसुधाताई आणि गजाननकाका सहजासहजी हार मानणाऱ्यातले नव्हते. गजाननकाकांच्या मित्राचा मुलगा एका स्थानिक बँकेत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याला फोन लावल्यावर त्या बँकेत वाणिज्य शाखेतील पदवीधरांसाठी भरती चालू असल्याचे काकांना कळलं. आणि मग! संध्याकाळी तन्वी एक बाहेर चक्कर मारून यायला म्हणून बाहेर पडणार तितक्यात तिचा फोन खणखणला! शंतनुचा फोन असेल ह्या आशेने तिने पाहिलं तर अनोळखी नंबर दिसला. शक्यतो ती अनोळखी क्रमांकावरील फोन घ्यायची नाही. पण कोणास ठाऊक कसं पण तिने हा फोन उचलला! बँकेतून मुलाखतीसाठी फोन होता आणि त्यांनी काकांचा संदर्भ दिला. "मला ह्यात अजिबात रस नाहीये" असे सांगून फोन ठेवायची तीव्र इच्छा झाली. पण नुसतं बोलून पाहायला तर काय हरकत आहे, आपण थोडेच जाणार आहोत तिथे, असा विचार करून तिने पाच मिनिटांचा वेळ मागितला. तयार होऊन ती मुलाखतीला बसली. मुलाखत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चालू झाली. तन्वीच्या सामान्यज्ञानावर, संगणकाविषयी आणि एकंदरीत जगभरच्या आर्थिक परिस्थितीविषयीच्या ज्ञानावर मुलाखतमंडळ खुश दिसत होत. तिचे गणितातील फंडे सुद्धा बऱ्यापैकी चांगले होते आणि वाणिज्यशाखेतील तिच्या प्राविण्यावर तर ते मंडळ फिदा झालं. "तुम्हांला ह्या पदाविषयी, त्यातील जबाबदाऱ्याविषयी काही प्रश्न आहेत का?" मुलाखतमंडळाने हा प्रश्न विचारायला आणि दार उघडून शंतनू आत यायला एकच क्षण मिळाला. "मला महिन्यातून १-२ आठवडे घरून काम करायला परवानगी मिळेल का? तन्वीच्या मनातील हा प्रश्न शंतनुच्या येण्याने तिच्या मनातच राहिला. "नाही" एका शब्दात ती उत्तरली. पुढे फोनवर आपला ई - मेल देत असलेल्या तन्वीकडे शंतनु काहीसा चकित होऊन पाहत होता. बाहेर फिरायला जायची वेळ टळून गेली होती. शंतनु एव्हाना ताजातवाना होऊन सोफ्यावर बसला होता. तन्वी चहा घेऊन सोफ्यावर येउन बसली. तिची नजर शंतनुने टेबलवर ठेवलेल्या राहण्यासाठी प्रस्तावित असलेल्या मुन्नरच्या दोन इमारतींच्या फोटोकडे गेली. त्यातील एका इमारतींचे फोटो तिला बेहद्द आवडले. त्याच्या भोवतालचे चहाचे हिरवे मळे, गॅलरीतून दिसणारे उंच पर्वतराजीचे विहंगम दृश्य! चहाचे घोट घेत पेपर वाचण्याचे नाटक करणाऱ्या शंतनुच्या एका डोळ्याने तन्वीच्या चेहऱ्यावरील ख़ुशी टिपली. तन्वीने सुद्धा मग खुशीत येऊन म्हटलं "आपण ना ह्याच इमारतीत सदनिका घेऊयात!" झालं गेलं विसरून ते दोघंजण अगदी खुशीत हसले. तितक्यात तन्वीचा फोन पुन्हा खणखणला. पलीकडे काका होते. "तन्वी, अगदी कमाल केलीस तू मुलाखतीत! तुला वार्षिक ९ लाखांचं पॅकेज द्यायला ते तयार आहेत! आणि दोन वर्षात बढती! मीच त्यांना हो सांगून टाकणार होतो पण त्यांना तुझ्याकडूनच होकार हवाय! सांगू ना मग हो त्यांना!" तन्वीला क्षणभराची उसंत न देता काकांची बडबड चालूच होती. तन्वीच्या तोंडून शब्द फुटेना. "मी तुम्हांला उद्या सकाळी फोन करते" ती कशीबशी उद्गारली. अचानक झालेल्या तिच्या चेहऱ्यावरील हावभावांच्या ह्या बदलाने शंतनू अगदी चकितच झाला. पुढे अर्धा तासभर त्याला सर्व परिस्थिती समजून सांगताना तन्वीची हालत खराब झाली. "तू मुलाखत दिलीच कशाला? शंतनूच्या ह्या प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर नव्हतच. तिलाच स्वतःला पडलेला तो प्रश्न होता. घड्याळाकडे पाहिलं तर आठ वाजत आले होते. पुन्हा एकदा हिरमुसलेल्या शंतनूला तसंच ठेवत तिने स्वयंपाकघराकडे धाव घेतली. शंतनुची जेवणाची साडेआठची वेळ पाळायची तर आता फक्त खिचडीसाठी वेळ होता. कुकर लावता लावता मुलाखतीतील आपल्या कामगिरीवर ती बेहद्द खुश होऊन मनातल्या मनात हसत होती. मागे आलेल्या शंतनुची चाहूल घेताच तिने त्या विचारांना आवरलं. "मग हा ब्लॉक भाड्याने द्यायचा की तसाच ठेवायचा? ती म्हणाली. तन्वीला प्रस्तावित केल्या गेलेल्या ९ लाखांच्या पॅकेजचे विचार शंतनूच्या मनातून अजून गेले नव्हते. आपल्याला चार वर्षानंतर आता कुठं १० चा आकडा गाठता आला आणि हिला पहिल्या नोकरीतच ९ लाख देतायेत! "मुलगी फार हुशार आहे हो!" तन्वीच्या मावशी साखरपुड्याच्या वेळी बोलल्या होत्याच. "आमचा शंतनुही काही कमी नाही" काही ऐकून घ्यायची सवय नसणाऱ्या त्याच्या काकूंनी त्याच वेळी ठसक्यात उत्तर दिलं होत. शंतनुला अचानक तो प्रसंग आठवला. तन्वी त्याचाकडे पाहत त्याच्या मनाचा ठाव घेत होती. अचानक बाहेर चिमण्यांची चिवचिव ऐकू आली. दोघांनी बाहेर उभारलेल्या चिमणीच्या घरट्यात राहणारे चिमणाचिमणी मेहनतीने उभारलेल्या आपल्या घरट्याकडे कौतुकाने पाहत होते! शंतनुला पहाटेच जाग आली. तन्वी बाजूला नव्हती. अभ्यासिकेतील दिवा चालू होता. डोळे चोळत शंतनू तिथवर गेला. तन्वी टेबललैम्पच्या उजेडात तिच्या वहीत काही नोट्स काढीत होती. "तन्वी, इतक्या सकाळ सकाळी काय लिहितेयस?" शंतनूने तिला विचारलं. तन्वीने वही पुढे केली. मुन्नारच्या स्थलांतरासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टींची ती यादी होती. "आपण गणपतीच्या सुट्टीत इथे परत येऊ, फ्लैट भाड्याने द्यायचा की नाही त्यावेळी ठरवू" तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. "तन्वी, तुझ्या नोकरीचं काय? समजा मी सुद्धा इथे दुसरी नोकरी शोधली तर आपल्या दोघांना अगदी मजेत राहता येईल" शंतनु म्हणाला. "नको राहू दे, मी चहा ठेवते आता!" असं म्हणून तन्वी तिथून पटकन उठून गेली. शंतनूची झोप आता पूर्ण उडाली होती. त्याने पटकन ब्रश केलं आणि तन्वीने आणून दिलेला चहा घेऊन तो स्वयंपाकघरात आला. बोलणं टाळायचं असेल तर कामात गढून जायची किंवा गढून जायचं नाटक करायची तिची सवय त्याला काही नवी नव्हती. शंतनू असाच काही क्षण तिच्या मागे उभा राहिला. नेहमीप्रमाणे तन्वीला त्याची चाहूल लागलीच. न राहवून तिने मागं वळून पाहिलं आणि नजरेनेच काय म्हणून विचारलं. "तन्वी, मनातलं खरं खरं सांगून टाक!" शंतनु म्हणाला. तन्वी मागं वळाली. खिडकीतून खालून जाणारा रस्ता दिसत होता. त्या रस्त्यावर जर पुढे गेल्यावर दोन फाटे यायचे. त्यातील एक नेहमीचा गावात जाणारा रस्ता होता पण दुसरा रस्ता कोठे जातो हे तन्वीला माहित नव्हतं. "आपण त्या रस्त्यावरुन पुढे जाऊन पाहूयात ना!" तन्वीने बराच वेळा शंतनुकडे आग्रह धरला होता. "जाऊ कधीतरी एकदा, बाकी पुढे कुठे हरवून गेलो तर?" शंतनु म्हणाला होता. "शंतनु, तू सोबत असशील तर दाट जंगलात सुद्धा हरवायची भीती नाही रे!" तन्वी त्यावेळी म्हणाली होती. हे सारे तन्वीला आठवत होते. ती पुन्हा एकदा वळाली. शंतनु तसाच उभा होता. "शंतनु, आज आपल्याकडे दोन पर्याय आहेत. खरं सांगू ह्यातील कोणताही एक १०० टक्के बरोबर नसणार आहे. कोणताही एक स्वीकारला तर काही मनासारखं होईल तर काही मनाविरुद्ध! जो मार्ग आपण स्वीकारू त्यात काही जास्तच मनाविरुद्ध घडलं तर कितीही इच्छा झाली तरी आपण आज उपलब्ध असलेला दुसरा पर्याय त्यावेळी स्वीकारू शकणार नाहीत! आणि मी स्वार्थी आहे शंतनु! मी त्याग केला ही भावना मला माझ्या करियरपेक्षा महत्वाची वाटतेय! एक काका आणि आई सोडले तर दोन्ही बाजूंचे नातेवाईक, आपण मुन्नारला जावे असेच म्हणणार! माझ्यावर इतकी मेहरबानी कर!" शंतनु निरुत्तर झाला. पुढे बाकी सर्व घडामोडी अगदी झटपट झाल्या. आई आणि काकांच्या कटकटीकडे तन्वीने अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं. सामानाची आवराआवर करून हवं असेललं सामान मुन्नारला निघालं सुद्धा! आणि मग एका शनिवारी सकाळी विमानानं दोघंजण कोचीला पोहोचले सुद्धा! कोचीहून मुन्नारचा वळणावळणाचा रस्ता तन्वीला खूप भावला. आणि मुन्नारचे छोटे टुमदार घर पाहून तर ती बेहद्द खुश झाली. खिडकीतून समोर हिरवेगार पर्वत दिसत होते. पावसानं चांगलाच जोर धरला होता. शनिवार - रविवार अगदी बेधुंद गेले. शंतनुने रसिकतेच्या बाबतीत अगदी परिसीमा गाठली होती. आणि मग दुष्ट सोमवार आला. शंतनुलासुद्धा आज ऑफिसला जावेसं वाटत नव्हत. पण नाईलाज होता. तिथे गेल्यावर मात्र शंतनु अगदी कामात गढून गेला. ह्या ऑफिसचा विस्तार होणार होता. परदेशी लोकांसाठी खास नवीन अद्ययावत सोयींनी युक्त असे हॉटेल उघडायचा त्याच्या पर्यटक कंपनीचा विचार होता. ह्या नवीन क्षेत्रात पाय ठेवताना नवीन रक्ताला वाव देण्यासाठी म्हणून शंतनुची निवड करण्यात आली होती आणि ह्यात चमक दाखवली तर त्याला भरभर पुढे जाण्याचा वाव होता. पहिल्याच दिवशी शंतनुला यायला रात्रीचे नऊ वाजले. तन्वीने आपला सगळा समजूतदारपणा एकत्र करून हसत हसत त्याचं स्वागत केलं. दमलाभागला शंतनु जेवल्यावर दहा मिनिटातच झोपी गेला. दिवसभर हिरव्यागार पर्वतराजीच्या दर्शनाने मूड खुललेल्या तन्वीला त्याच्याशी गप्पा मारण्याची फार इच्छा होती. ती तशीच मारून टाकून ती बिछान्यावर पहुडली. बराच वेळ तिचा डोळा लागत नव्हता. दुसरा दिवशी सकाळी शंतनुला लवकर निघायचं होतं. रात्री बोलायचं राहून गेलं होतं. तन्वीने सकाळी सातचा गजर लावला होता. त्याच्या तिला आवाजाने जाग आली तर शंतनु निघतच होता. आता मात्र तन्वीचा संयम सुटला. "रात्री मला सांगायचं ना? मी उठले असते लवकर!" ती रागानेच बोलली. शंतनुला आपली चूक कळली होती. "सॉरी तन्वी" असं बोलून तिच्याजवळ तो येणार तितक्यात त्याचा भ्रमणध्वनी वाजला. पलीकडे त्याचा बॉस होता. "हो हो आलोच" असं म्हणत शंतनू धावतच बाहेर पडला. खिडकीतून त्याला टाटा करणाऱ्या तन्वीकडे पाहायचं भानसुद्धा त्याला राहिलं नाही. शंतनुचा दिवस कामात अगदी बिझी होता. ह्या प्रोजेक्टला अर्थसहाय्य करणाऱ्या बँकेची अधिकारीमंडळी दुसऱ्या दिवशी येणार होती. त्यांना प्रेसेंटेशन द्यायचं होत. संध्याकाळी सात वाजत आले तरी ते काही मनासारखं बनत नव्हत. त्यात बरीच माहिती हव्या तशा स्वरुपात बसवायची होती. आणि बॉसचा होकार मिळत नव्हता. "यंग मॅन, आज रात्रभर बसून हे प्रेसेंटेशन आपण पूर्ण करूयात! उद्या आपल्याला बँकेकडून होकारच हवाय!" बॉसचे हे शब्द ऐकून शंतनु हादरलाच. निघताना आपण परत वळून पाहिले सुद्धा नाही हे त्यालाही दिवसा कधीतरी जाणविले होते. बराच वेळ तन्वीला फोन करायचा प्रयत्न त्याने केला होता. पण "तुम्ही प्रयत्न करीत असलेला भ्रमणध्वनी संपर्ककक्षेच्या बाहेर आहे" असा ध्वनिमुद्रित संदेश ऐकून त्याचा संयम सुटत चालला होता. इतक्यात त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला. तन्वी समोर होती. स्वागतकक्षातून हा नंबर मिळविण्यासाठी तिला बरेच प्रयास करावे लागले होते. "शंतनु, घरी कधी येणार आहेस? आणि एक फोन सुद्धा केला नाहीस" तिच्या आवाजात राग जाणवत होताच. हिला आपण रात्री बहुदा येऊ शकणार नाही हे कोणत्या तोंडाने सांगावे हा गहन प्रश्न शंतनुला पडला होता. "सर, रात्री जेवणाला काय मागवायचं?" नेमका त्याच वेळी अगदी जवळ येऊन बोललेल्या ऑफिसबॉयचे हे शब्द तन्वीपर्यंत पोहोचलेच. "तन्वी…. " शंतनु तिला हे सांगणार तितक्यात समोरून एक हुंदका त्याला ऐकू आला. आणि फोन कट झाला होता. शंतनुचा पुन्हा मोबाईलवरून फोन लावायचा प्रयत्न अयशस्वी होत होता. "साहेब, ऑफिसातून रेंज मिळत नाही, तुम्हांला बाहेर जाऊन फोन करावा लागेल" ऑफिसबॉय पुन्हा वदला. "ह्याला आपण आधीच विचारायला हवे होते" शंतनुच्या मनात विचार येऊन गेला. त्याने ताबडतोब बाहेर जाऊन फोन लावला. "ठीक आहे, शंतनु! मी थांबेन एकटी रात्रभर आणि खाईन पावभाजी एकटी!" तन्वीच्या आवाजात दुखावलेपणा आणि राग एकाच वेळी जाणवत होता. "आणि हो आता परत फोन करू नकोस, मी झोपले वगैरे असेल तर!" असे म्हणून तन्वीने फोन ठेवला. शंतनु क्षणभर सुन्न होऊन बसला. पण पुन्हा एका झटक्यात उठला. जे झाले ते झाले पण आता साहेबाला खुश करून दाखवणारच असा पक्का निर्धार त्याने केला. तन्वीला एकटेपण खायला उठलं होतं. अजून केबल टीव्ही वगैरे चालू नव्हता. संध्याकाळी मोठ्या प्रयत्नाने केलेली पावभाजी खायची तिला फारशी इच्छा नव्हती. नाईलाज म्हणून तिने एका डिशमध्ये थोडी भाजी आणि एक पाव घेऊन आपलं जेवण आटपून घेतलं. वातावरणात बराच उकाडा होता. पाऊस केव्हाही चालू होईल अशी लक्षणं दिसत होती. तन्वी बराच वेळ एकटी खिडकीतून दिसणाऱ्या अंधाराकडे पाहत होती. ढगाळ वातावरणामुळे आकाशात एकटी चांदणी शोधायचा तिचा प्रयत्न निष्फळ ठरणार होता असा कयास तिने आधीच बांधला होता. केव्हातरी तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. "अरे बापरे, साडेदहा वाजले, झोपायला हवं" तिने मनाशीच विचार केला. "बिचारा शंतनु, दिवसभर त्याने काय खाल्लं असेल" ह्या विचाराने तिच्या मनात काळजी निर्माण झाली. तन्वी बराच वेळ बिछान्यावर तळमळत होती. पाऊस अजूनही सुरु न झाल्याने उकाडा यं जाणवत होता. डोक्यावर उशी घेवून जोरात पंखा सुरु करूनही काही उपयोग झाला नव्हता. आणि अचानक बाहेर पावसाच्या थेंबांचा आवाज सुरु झाला. त्या आवाजावर आणि त्याबरोबर आलेल्या आवाजाने तन्वीला हळूहळू झोप येऊ लागली. तन्वीला समोरचा डोंगर दिसत होता. ती त्या रस्त्यावरून पुढे पुढे जात होती. उंच डोंगरात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. आणि तन्वी त्या ढगांच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्या ढगांना स्पर्श केल्यानंतरचा ओलावा तिला खूप भावून गेला. तिची नजर अचानक खाली गेली. ती एका रथात बसून तिचा प्रवास सुरु होता. ह्या सर्व गोष्टींचं आश्चर्य करण्याचं तिने सोडून दिलं. रथ तसाच पुढे पुढे चालला होता. आता काळे ढग मागे पडून अगदी नयनरम्य परिसर सुरु झाला होता. हिरव्यागार मैदानातून प्रवास करताना तिला दूरवर एक सुंदर नगरी दिसत होती. त्यातील एका वैभवशाली वस्तूकडे तिची नजर पुन्हा पुन्हा जात होती. "बहुदा हा ह्या नगरीचा राजवाडा असावा" तिने कयास केला. अचानक तिच्या रथाची गती कमी झाली असे तिला जाणवलं म्हणून तिने समोर पाहिलं. शुभ्र अश्वावर बसून आलेल्या एका देखण्या युवकाने त्यांचा रस्ता अडविला होता. "आपण कोण आहात आणि ह्या नगरीत प्रवेश करण्याचं आपलं प्रयोजन काय?" तो शस्त्रधारी युवक तिला प्रश्न करता झाला. त्या प्रश्नाचं उत्तर तिला काही देता आलं नाही. "मला आपणास महाराजांपुढे हजर करावं लागेल" तो युवक बोलता झाला. तन्विपुढे काही पर्याय दिसत नव्हता. "आपलं नाव काय? तन्वीने प्रश्न केला. "नकुल" काहीशा आश्चर्यचकित झालेल्या त्या युवकाने उत्तर दिलं. सैनिकांच्या नजरांना तोंड देत तन्वी आणि नकुल ह्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. राजवाड्यात थोडा गहन प्रश्न निर्माण झाला होता. सीमेवर असलेल्या सैनिकांच्या खर्चासाठी आणि प्रशासनीय व्यवस्थेसाठी द्रव्याचं विभाजन कसं करावं ह्यावर प्रधान, सेनापती आणि महाराज ह्यांच्यात खल सुरु होता. मुद्रांच्या वाटपावर घोडं अडलं होतं. "सोपं आहे, सद्याची संभाव्य युद्धस्थिती पाहता चौसष्ट हजार सुवर्ण मुद्रा प्रशासकीय कारभारासाठी आणि शहाण्णव हजार सुवर्ण सैनिकी खर्चासाठी!" न राहवून तन्वी बोलली. आणि बाकी कोणाला बोलण्याची संधी न देताना त्यामागील पृथ्थकरण विशद केलं. ह्या अनोळखी विदुषीच्या ह्या विद्वत्तापूर्ण विवेचनाने महाराज बेहद्द खुश झाले. नकुलाकडून ती सुरक्षेसाठी मोठा धोका नाही ह्याची खातरजमा करून घेत त्यांनी तन्वीला प्रश्न केला, "आमची खजिनदार होण्यास आपणास आवडेल काय?" तन्वीने नकळत होकार दिला. मग महाराजांनी नकुलास तिला तिच्या दालनात सोडण्याची आज्ञा केली. आपल्या दरबारातील विद्वत्तेने प्रभावित झालेल्या नकुलाची नजर तिला मनात खूप आवडली. दालन दाखवून परतणाऱ्या नकुलाने एकदा तरी मागं वळून पाहावं अशी तिची इच्छा पूर्ण होताच तिच्या चेहऱ्यावर लज्जापूर्ण स्मित आलं. तिने लाजूनच द्वार बंद केलं! शंतनु अगदी झपाटून गेला होता. त्याने अडीच वाजता बनवून आणलेलं प्रेसेंटेशन पाहून साहेब बेहद्द खुश झाले. हे असंच आपण उद्या सादर करायचं. "यंग मॅन! आता तू घरी जावून झोप घेऊ शकतोस! ग्रेट जॉब!" पडत्या फळाची ही आज्ञा मानत आणि जरासं जेवण घेऊन शंतनु घरी परतला. गाढ झोपी गेलेल्या तन्वीची मुद्रा पाहून एकाच वेळी त्याच्या मनात प्रेम, अपराधीपणाच्या भावना दाटून आल्या. तिथेच खुर्चीवर बसल्याबसल्या त्याला कधी झोप लागली हे त्यालाच कळलं नाही. सकाळी तन्वीचे डोळे उघडताच समोर बसलेल्या शंतनुला पाहुन तिला आश्चर्याचा धक्का बसला. रात्रीचा आपला त्याच्यावरील राग तिला आठवला. आणि अचानक नकुलही आठवला. नकुलच्या आठवणीने तिचा मूड बराच चांगला झाला. झटपट तिने ब्रश करून चहा बनविला आणि शंतनुला हळूच उठवीत ती म्हणाली "खूप दमला असशील नाही ? हा चहा घे! मी पटकन पोहे बनविते!" शंतनू आ वासून पाहताच राहिला! तन्वीने आणलेले पोहे नेहमीइतके किंबहुना त्याहून अधिकच चविष्ट होते. पण शंतनुचे त्याकडे लक्षच नव्हते. तिच्या शांतपणात काहीसा वेगळेपणा आहे असेच त्याला राहून राहून वाटत होते. खुशीत असल्यावर नेहमी त्याच्या अवतीभोवती घुटमळणारी तन्वी आज त्याला टाळत होती असाच भास त्याला होत होता. त्यावर तो तसाच बराच वेळ विचार करीत बसला असता पण पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. अपेक्षेनुसार बॉसच फोनवर होता. "अधिकारीमंडळी येतच असतील अर्ध्या तासात, शंतनु लवकर ऑफिसात पोहोचतोयस ना!" त्याचे हे शब्द ऐकून शंतनु ताडकन उठला. "येतो मी!" निघताना तो तन्वीला म्हणाला. "गुड लक" तन्वी पुढे येत म्हणाली. कुठे तरी काही तरी बदलल्यासारखे त्याला राहून राहून वाटत होते. शंतनु ऑफिसात निघाल्यावर तन्वीला हायसं वाटलं. तिला रात्रीच्या प्रकाराविषयी शांतपणे विचार करायचा होता. मनात एक छोटीशी खुशीची लहर जरी उमटून गेली असली तरी बेचैनीसुद्धा निर्माण झाली होती. नकुलचा देखणेपणा तिला राहून राहून मोहवीत होता. तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने स्वतःला कामात झोकून द्यायचं ठरविलं. त्या छोट्याशा घराला तिनं झाडून पुसून काढलं. नवीन सामान आणल्यावर ते कुठं लावायचं ह्याचाही विचार करून पाहिला. एका कोपऱ्यात जुनी फिल्मी मासिकं पडली होती. त्यातील हृतिकचा फोटो पाहून ती पुन्हा सैरभैर झाली. इतक्यात तिचा फोन वाजला. "अग आमचं प्रपोजल बँकेने स्वीकारलं! त्यांना बऱ्याच शंका होत्या पण त्या सर्वांचं निरसन केलं. बॉस तर भन्नाट खुश झालाय माझ्यावर!" शंतनु झपाटल्यागत बोलत होता. "आज संध्याकाळी मी लवकर येतो, आपण बाहेर जेवायला जाऊयात!"इतकं बोलून त्यानं फोन ठेवला. तन्वीलाही बरं वाटलं. "ह्याचा इथं चांगला जम बसू दे, माझ्या इथे येण्याचं सार्थक होईल!" तिच्या मनात विचार येऊन गेला. रात्री बाहेर जायच्या बेतानं मात्र जादू केली होती. तन्वीने दुपारचं जेवण आटपून घेतलं. रात्रीची पावभाजी गरम करून खाताना रात्रीच्या निराशेचा विचार मात्र तिने मनाला शिवून दिला नाही. दुपारी झोपायचा विचार येताच तिच्या मनात का कोणास ठाऊक खळबळ निर्माण झाली. आपण झोपुयाच नको असे ठरवून तिने टीव्ही सुरु केला. कोणत्यातरी जुन्या सौंदर्यस्पर्धेचे पुनर्प्रक्षेपण सुरु होते. त्यातील त्या सौंदर्यवती ललना पाहून तिच्या मनात एक विचार आला आणि त्या खुशीत असताना कधीशी तिला डुलकी लागली हे तिचे तिलाच कळलं नाही. जागं झाल्यावर दुपारची झोप विशेष काही न घडता गेली ह्याचं तिला बरं वाटलं. मग मात्र ती नव्या उत्साहाने तयारीला लागली. शैम्पूने केस धुवून नवीन केशरचना केली. कोचीहून घेतलेली ठेवणीतील कांजीवरम साडीही काढली. बऱ्याच दिवसात आपण स्वतःकडे लक्षच दिलं नाही हे तिला जाणवलं. आणि लग्नाआधी आपल्या सौंदर्याची मनापासून स्तुती करणाऱ्या शंतनुने सुद्धा गेल्या काही दिवसात आपल्याला काही बोललं नाही ही खंत तिच्या मनाला स्पर्शून गेली. थोड्याच वेळात स्वतःला सावरून तिने आपली तयारी पूर्ण केली. शंतनु आला तो खुशीच्या घोड्यावर स्वार होऊनच! "आपण कसं त्या अधिकारी मंडळीच्या शंकाचे समाधान केले, बॉस मध्येच काही चुकीचं बोलणार होता आणि मी कसं त्याला सावरलं" ह्याचं वर्णन करण्यातच त्याचं पूर्ण लक्ष होतं. तन्वीने दिलेला चहा घेता घेता तो म्हणाला, "चल आता आपण निघूयात". त्याच्यासाठी सजलेल्या तन्वीने अजून रात्र बाकी आहे अशी समजूत करून घेतली. तरीही कांजीवरम त्याच्या नजरेत भरायलाच हवी होती हे मात्र तिला ठामपणे वाटलं. बॉसने शंतनुसाठी ड्रायव्हर सकट गाडी पाठवली होती. ड्रायव्हर तसा जाणकार होता. पाण्याने ओथंबून भरलेल्या काळ्या मेघांच्या अस्तित्वानं सायंकाळच्या वेळी खुलून उठणारं मुन्नारच्या हिरव्यागार वैभवाचे दर्शन देणारे काही बहुसंख्य लोकांना फारसे परिचित नसणारी ठिकाणही त्याला माहित होती. तिथे गेल्यावर मात्र शंतनूच्या डोक्यातील बॉस आणि पॉवरपॉइंटचे भूत निघाल. आणि एकदा ढगांचा जोरदार गडगडाट झाल्यावर त्यानं तन्वीला जवळही ओढून घेतलं, तेव्हा मात्र तिचे रोमरोम शहारून गेले. रात्रीच्या जेवणासाठी त्यांनी वरच्या भागातील पंचतारांकित हॉटेलात जाण्याचे ठरविलं. तेथील मेणबत्तीच्या प्रकाशातील जेवण तर तन्वीला स्वर्गसुखाची जाणीव करून गेलं. परतीच्या प्रवासात पावसाचं आगमन झालं. विजांच्या गडगडाटाने भयभीत झालेली तन्वी शंतनुला मागच्या सीटवर बिलगली. कारमध्ये तिने दिलेली गाण्यांची सीडी चालू होती आणि "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे चालू होतं. शंतनुचे हे शृंगारिक रूप रात्री बराच वेळ टिकलं होत. केव्हा तरी दमून तो झोपी गेला. ह्याहून जीवनात तृप्तता म्हणजे अधिक काय असा विचार तन्वी करीत होती. अचानक कांजीवरम कडे तिचे लक्ष गेलं आणि ती अचानक बेचैन झाली. शंतनुने इतक्या वेळात एकदाही कांजीवरमचे सोडा तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले नव्हते. कौतुक करून घ्यायची तिची इच्छा अतृप्त राहिली होती. एका अप्रतिम परिपूर्ण संध्याकाळला गालबोट लागून गेलं होतं. तन्वीला बऱ्याच वेळ झोप लागत नव्हती. नकुलच्या विचाराने हुरहूर तर जाणवत होतीच. मग केव्हातरी तिला झोप लागली. राजदरबार भरला होता. महाराज सर्वांकडून कारभाराची इत्यंभूत माहिती घेत होते. तन्वीची नजर मात्र नकुलला शोधत होती. इतक्यात "खजिनदार - राजकोशाची स्थिती कशी आहे?" महाराजांचे गंभीर स्वर तिच्या कानी पडले. काहीशा अपराधी मुद्रेने तिने झटपट आर्थिक स्थितीचे विवेचन सादर केलं. त्यानंतर तिला राजदरबाराच्या कारभारात रस राहिला नव्हता. तो केव्हाचा संपेल ह्याचीच ती वाट पाहत होती. एकदाचा राजदरबार संपला. नकुल कोठेच दिसला नव्हता. ती तशीच त्याच्या शोधार्थ घोड्यावर स्वार होऊन बाहेर पडली. काल नकुल जिथे भेटला होता तिथे ती पोहोचली. एका तलावाच्या काठी एकट्याच बसलेल्या पाठमोऱ्या नकुलला तिने झटकन ओळखलं. त्याचा मानेवर विसावणारा कुरळा केशसंभार तिला खूपच मोहक वाटून गेला. मोहित होऊन ती त्याचे ते रूप आपल्या नजरेत साठवायचा प्रयत्न करीत असताना नकुलला तिची चाहूल लागली. मागे वळून त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मुद्रेवर स्मितहास्य आलं. पण त्याच्या नजरेतील दुःखी भाव मात्र तन्वीने बरोबर टिपले. बराच काळ दोघंही काही बोलली नाहीत. "आपण इतका काळ कुठं होतात ?" नकुलने विचारलं. तन्वीला ह्या प्रश्नाचा उलगडा झाला नाही. आकाशात मावळतीच्या सूर्याची तांबडी प्रभा पसरली होती. तिने तन्वीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. "आज आपले सौंदर्य आणि आपली वेशभूषा खूपच खुलून दिसत आहेत!" नकुल म्हणाला आणि मग शांतपणे उठून तो आपल्या निवासस्थानाकडे चालू लागला. आपल्या वेषभूषेकडे लक्ष गेल्यावर तन्वी दचकलीच. कांजीवरम खरोखरच त्या संधीप्रकाशात खुलून दिसत होती" आपल्या रूपाच्या कौतुकाने तन्वी अगदी बहरून गेली होती. शंतनुला मध्येच जाग आली होती. घोटभर पाणी पिऊन झोपी जाणार तितक्यात त्याची नजर तन्वीच्या चेहऱ्याकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर अधीरपणा दिसत होता. त्याला आश्चर्य वाटलं पण असेल असेच काही असे म्हणून तो पुन्हा झोपी गेला. पण पुन्हा एकदा त्याच्या मनात तोच विचार आला. मग त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तन्वी अगदी लज्जेने खूष झाली होती. शंतनू आता मात्र चकित झाला होता. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. आता मात्र तन्वी अगदी समाधानाने गाढ झोपी गेली होती. अगदी आकाशीचा चंद्र मागण्याचा हट्ट धरलेल्या बालकाच्या हाती खरोखर तो चंद्र हाती लागल्यावर त्याला जितकं समाधान होईल तितकं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शंतनुची झोप मात्र पूर्ण उडाली होती! पुन्हा एक अबोल सकाळ! मुन्नारला आल्यावर अबोला सुद्धा मल्याळी भाषेत असतो कि काय असा भास राहून राहून शंतनुला होत होता. झोपेतील तन्वीच्या चेहऱ्यावरील ती प्रसन्न मुद्रा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हती. परंतु हा विषय काढायचा कसा हेच त्याला समजत नव्हते. ती झोपेत होती, त्यावेळी नक्की काय चाललं होतं ते तिला विचारून सुद्धा आठवलं नाही म्हणजे? त्याचं एक मन त्याला सांगत होतं. नास्ता स्वादिष्ट होताच पण शंतनुचे लक्ष होते कुठे त्याच्याकडे? "तन्वी, कशी आहेस?" चहाचा कप टीपॉय वर ठेवून तसंच परत जाणाऱ्या तन्वीचा हात पकडून त्याने विचारलं. "काय झालं तुला शंतनू?, मी मजेत आहे!" ह्या वेळेला मात्र चेहऱ्यावर चांगलं हसू आणणं तन्वीला जमलं. "रात्री झोपेत अगदी प्रसन्न दिसत होतीस!" शंतनुच्या ह्या उद्गारावर मात्र तन्वी दचकली. "हो, का! असेल, हे वातावरण ना मला अगदी आवडतेय! मस्त थंडावा आणि धुळीचा लवलेशसुद्धा नाही!" कशीतरी तिने वेळ मारून नेली. शंतनुने मग जास्त ताणून धरलं नाही. उगाचच आपण संशय घेतोय अशी समजूत करून घेऊन तो ऑफिसात निघाला. आता बरंच काम होतं. शंतनुच्या बोलण्याने तन्वी मनापासून हादरली होती. स्वप्नातील हे विश्व बाहेरच्या दुनियेत म्हणजे शंतनुपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती तर! कोण आहे हा नकुल? माझ्या भावना ओळखतो, मला ऑफिसात कर्तबगारी दाखवायची इच्छा होती ती त्याने राजदरबारात पूर्ण केली, माझ्या सौंदर्याचे शंतनुने कौतुक करावं ही अपूर्ण इच्छा त्याने एका छोट्या भेटीतील मोजक्या वाक्यात पूर्ण केली. माझा उतरलेला मूड त्याने गेल्या दोन रात्री बराच चांगला केला. अगदी तो माझाच भाग बनत चालला आहे. पण मग तो कालच्या भेटीत काहीसा उदास का वाटत होता बरं? एकटाच जाऊन तलावाच्या काठी बसला होता. माझ्यावर चिडला असेल का बरं? पण मी काय केलं त्याला राग येण्यासारखं? तन्वीचे विचारचक्र भरधाव चाललं होतं. आणि मग तिला शंतनुबरोबरची घालवलेली संध्याकाळ आठवली. ती सुद्धा त्या वातावरणात नाही म्हणायला फुलून निघाली होती. "नकुलला त्यामुळे तर राग आला नाही?" ह्या विचाराने मात्र ती अजून चिंताग्रस्त झाली. ऊतू जाणाऱ्या दुधाच्या आवाजाने तिचे हे विचारचक्र भंगले. एकदा स्वयंपाकघरात गेल्यावर मात्र तिला बरीच कामे दिसली आणि नकुलचा विचार काहीसा खंडित झाला. आंघोळ वगैरे आटोपल्यावर तन्वी शांतपणे पेपर घेऊन बसली होती. दररोज पडणाऱ्या पावसानं हवेत थंडावा आला होता. उघड्या खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक येताच एक मस्त झोप काढावी अशी इच्छा तिच्या मनात आली. आणि ती बिछान्यावर पहुडली. झोप लागतच होती आणि पुन्हा एकदा ते डोंगर आणि घनदाट काळे मेघ दिसू लागले. इतक्यात दाराच्या वाजलेल्या बेलने तन्वी अचानक जागी झाली. शेजारणीने मोलकरणीला कामासाठी विचारायला पाठवलं होतं. तन्वीला भानावर यायला वेळ लागला. मोलकरणीचा महिन्याचा पगार सुवर्णमुद्रेच्या रुपात द्यावा कि काय ह्या विचारावर हसावं की रडावं हे तिला कळेना! मोलकरीणीशी बोलताना भाषेचा अडथळा येत होता. शेवटी मोलकरीण "Five Thousand" असे ठसक्यात म्हणाली. तेव्हा "मी साहेबांशी बोलून सांगते" असे इंग्लिश मध्ये सांगून तन्वीने तिला परत पाठविलं. आता तन्वी अगदी बेचैन झाली. अगदी दिवसाच्या डुलकीमध्ये सुद्धा नकुल यायला लागला तर? आपल्यावर इतका हक्क का बजावायला बघतोय तो? संध्याकाळी शंतनु आला की त्याला हे सर्व सांगून टाकावं अशा निष्कर्षापर्यंत ती येऊन पोहोचली! सायंकाळी निसर्गाने वेगळंच रूप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाने बिचारे वृक्षवल्ली भयभीत झाले होते. वारा जसं नाचवेल तसं नाचण्याव्यतिरिक्त त्यांना पर्यायच नव्हता. तन्वी सुद्धा काहीशी भयभीत झाली होती. ह्या अनोळखी प्रदेशात अशा वातावरणात एकट राहायची तिला जशी भिती वाटत होती त्याचप्रमाणे तिचं मन शंतनुच्या काळजीनेही व्याकुळ झालं होतं. हा बिचारा ह्या वातावरणात कसा येईल? काळ्या मेघांनी व्यापलेल्या आकाशामुळे नेहमीपेक्षा लवकरच अंधार झाला होता. तन्वी अचानक भानावर आली. तिने देवघरात जाऊन दिवा लावला. आणि पुन्हा खिडकीत येऊन बसली. दुरूनच तिला एक तरुण रेनकोट घालून जोरात पळत येताना दिसला. आपल्या विचारातच मग्न असलेली तन्वी त्याच्या पळण्याकडे पाहत होती. तो तरुण तिच्याच घराकडे जेव्हा आला तेव्हा ती अचानक दचकली. जरा निरखून पाहिल्यावर मात्र तिला कळलं "अरे हा तर शंतनु आहे!" लगबगीने ती दाराकडे गेली. शंतनु अगदी ओलाचिंब होऊन तिच्यासमोर होता. तन्वीला त्याचं ओलाचिंब रूप खूप भावलं, क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. "अग पाहत काय बसली? लवकर माझी बॅग घे आणि मला एक कोरडा टॉवेल आणून दे"! शंतनुच्या ह्या ओरडण्याने तन्वी भानावर आली. मग मात्र तन्वीने शंतनुची चांगलीच काळजी घेतली. बाथरूममध्ये लगेच गरम पाणी चालू केले. त्याची काही कागदपत्रे प्लास्टिकच्या बॅगेतून सुद्धा थोडीशी भिजली होती. ती तिने सुकवायला घेतली. नशिबाने त्यात काही महत्वाचे कागदपत्र नव्हते. शंतनु आंघोळ करून परत येईपर्यंत गरमागरम चहा आणि त्याचे आवडते नुडल्स तयार होते. वाफाळते नुडल्स पाहून शंतनुने तशीच तिथे धाव घेतली. "थांब, शंतनु, केस जरा नीट पुसू दे, मला!" तन्वी काहीशी किंचाळलीच! शंतनुला तिची चिंताग्रस्त मुद्रा आवडून गेली. नुडल्सची प्लेट हातात घेत त्याने तिला केस पुसून दिले. त्याला तिचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. केस बऱ्यापैकी सुकले हे जाणवल्यावर तन्वीच्या डोक्यात अजून एक किडा वळवळला. "एक मिनिटं" असे म्हणून तिने शंतनुकडून आपली सुटका करून घेतली. खरोखर एका मिनिटात परत आलेल्या तन्वीला पाहून खुशीत आलेल्या शंतनूची ख़ुशी क्षणभरच टिकली. त्याच्या छातीला लावल्या गेलेल्या बामच्या उग्र वासाने "तन्वी" असे जोरात ओरडून त्याने तिला दूर लोटलं. नुडल्सची प्लेट बाजूला सारून त्याने एका हातानं बामचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न केला. आपलं हे रूप तन्वी कौतुकाने पाहतेय हे पाहून मात्र त्याचा राग बराच निवळला. मध्येच केव्हातरी वीजपुरवठा खंडित झाला. मेणबत्तीच्या प्रकाशात खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या सोबतीने तन्वी आणि शंतनु एक अविस्मरणीय जेवण घेत होते. हे वातावरण एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या वातावरणाच्या तोडीचे आहे आणि तन्वीने केलेली कांदा भजी तिथल्या कोणत्याही स्टार्टरला लाजवेल असेच शंतनुला राहून राहून वाटत होते. रात्र बहरत होती. तन्वी अगदी खुशीत आली होती. दिवसाच्या भितीचा कोठेच मागमूस नव्हता. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून शंतनु झोपी गेला. "बिचारा दमला असेल", आपल्या ह्या विचाराने तन्वी स्वतःशीच खुदकन हसली. "लबाड कुठली" असा विचार तिच्या मनात आला. "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणं मनातल्या मनात गुणगुणताना असाच कधीतरी तिचा डोळा लागला. तिथलं वातावरण अगदी भीतीदायक होतं. अक्राळविक्राळ राक्षससदृश्य सैनिकांनी तन्वीला घेरलं होतं. तन्वी त्यांच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु ह्यांच्या तावडीतून सुटणं कठीण आहे हे लक्षात येऊन ती हताश होऊन खाली बसली. तिची नजर पलीकडे गेली. सर्वत्र असाच गोंधळ चालू होता. राजाचे काही सैनिक ह्या आक्रमणाला तोंड द्यायचा प्रयत्न करीत होते. परंतु एकंदरीत परीस्थिती कठीण दिसत होती. अचानक तिची नजर एका शूर योद्ध्याकडे गेली. त्याने शत्रूसैनिकांचा बिमोड करायला लावला होता. तन्वीने तशाही परिस्थितीत त्याला ओळखले. "नकुल" तिने त्याला हाक मारली. नकुलने तिच्याकडे वळून पाहिलेसुद्धा, एक क्षणभर थांबला देखील तो! पण मग मात्र तो तसाच पुढे गेला, शत्रूच्या घोळक्यात अडकलेल्या एका सरदाराची सुटका करायला! "नकुल, मला वाचव, नकुल!" तन्वी जोरात ओरडली. तन्वीच्या ह्या हाकेने शंतनु खडबडून जागा झाला. "तन्वी, काय झालं? ठीक आहेस ना? आणि हा नकुल कोण?" शंतनु विचारत होता. तन्वी आता भानावर आली होती. "हा नकुल कोण" हे शंतनुचे शेवटचे शब्द तिच्या कानी पडले. इतके दिवसाचं हे रहस्य आता उघड करणं भाग होतं. "मला एक ग्लास पाणी आणशील, शंतनु!" तन्वीची ही विनंती शंतनुने मान्य केली. ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन तन्वीने ग्लास बाजूला ठेवला. एक क्षणभर उसंत घेतली. पुढे बराच वेळ तन्वी शंतनुला तिच्या आयुष्यातील हा विश्वास न बसण्याजोगी कहाणी शंतनुला सांगत होती. शंतनु हादरला होता. शंतनुच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याचा तन्वी आटोकाट प्रयत्न करीत होती. आपल्या मनात नकुलविषयी निर्माण झालेली भावना मात्र न सांगण्याची दक्षता तिने घेतली होती. परंतु तिच्या चेहऱ्यावरील अपराधीपणाचा भाव आणि त्या दिवशी तिचे झोपेतील लाजणे ह्या सर्वांची संगती लावण्याचा शंतनुचा प्रयत्न चालू होता. अशीच केव्हातरी तन्वीची कहाणी आताच्या स्वप्नापर्यंत येऊन थांबली. आणि तिने शंतनुच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा इतका गंभीर चेहरा तिने कधीच पाहिला नव्हता. बराच वेळ दोघेही शांत होते. "शंतनु, काहीतरी बोल ना!" ती न राहवून बोलली. "ही प्रतारणा आहे" शंतनुचे हे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे तिच्या कानात शिरले! आपला राग एका शब्दात व्यक्त करून शंतनु झोपी गेला किंबहुना त्यानं झोपी गेल्याचं नाटक केलं. इथे तन्वी मात्र विमग्न परिस्थितीत तशीच बसून होती. ह्या सर्व प्रकारात आपला दोष काय हेच तिला कळत नव्हतं. एका क्षणी मात्र तिने अबलेची भूमिका घेण्याचं नाकारलं. शंतनुला गदगदा हलवून ती म्हणाली, "ह्यात कोणती प्रतारणा, शंतनु? माझ्या स्वप्नात जे काही येतं, त्यावर माझं नियंत्रण असतं का? आणि ह्याचा मला देखील त्रास होतोच आहे ना? तू ऑफिसात असताना मी एकटी कसे दिवस काढत असते ते माझं मला ठाऊक!" शंतनुला काही प्रमाणात त्याची चूक कळून चुकली होती. पण तो बराच दुखावला गेला होता. "उगाच का हिच्या मनात असे विचार येतात" त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. मध्येच एकदा तिची समजूत काढण्याची त्याला इच्छा झाली. पण त्याच्या अहंकाराने त्याला रोखले. सकाळी पाचच्या सुमारास त्याला जरी झोप लागली तरी तन्वी मात्र तशीच जागी होती. नकुलचा तिला अतिशय राग आला होता आणि भीतीही वाटू लागली होती. त्याने तिची झोप उडवून टाकली होती. खरतरं प्रेमात झोप उडवून टाकणं हा किती रोमांकित क्षण! पण इथले संदर्भ फार वेगळे होते. एका क्षणाच्या कल्पनेच्या दुनियेतील सुखाने किंबहुना सुखाच्या भासाने तिचं प्रत्यक्षातील सुंदर घरकुल पणाला लागलं होतं. नकुलच्या तिच्या आयुष्यातील आगमनाच्या प्रयोजनाचा थांगपत्ता तिला लागला नव्हता आणि लागण्याची शक्यताही नव्हती. तो जसा अगेला अचानक तिच्या आयुष्यात आला तसा केव्हाही निघून जाण्याची शक्यताच जास्त होती. त्याने निर्माण केलेलं विश्व कितीही सुखदायक असलं तरी त्या विश्वाच्या शाश्वतेची खात्री नव्हती. ह्यातून बाहेर पडण्याचीच तिला आता तीव्र इच्छा होऊ लागली होती. पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तिच्या शंतनुची गरज होती. आणि तो शंतनुच ह्या क्षणी दुखावला होता. सकाळचा गार वारा तन्वीच्या अंगाला सुखावत होता. मन मात्र दुखावलेलच होतं. तिच्या मनानं आता काहीस समजुतदारपणाचं वळण घेतलं होतं. "शंतनुचं सुद्धा फारस काही चुकलं नाही म्हणायचं! त्याला अजूनही मी खूप हवीहवीशी वाटतेय, त्याच्या मनात माझ्याविषयी स्वामित्वाची भावना आहे आणि म्हणून तो इतका चिडला!" ह्या विचारचक्राने तन्वीला काहीसं बरं वाटलं. ह्या बरेपणाच्या भावनेत तिला एक डुलकी लागली. तन्वीला जाग आली तेव्हा शंतनु घरात नव्हता. एकंदरीत लक्षणावरून तो ऑफिसात गेल्याचीच चिन्हं दिसत होती. तन्वीने त्याच्या ऑफिसातील क्रमांकावर फोन लावला. "पोहोचलास का?" शंतनुला एका शब्दात उत्तर द्यायची संधी देणारा प्रश्न तन्वीने केला. "हुं" अशा एका हुंकारात शंतनुने उत्तर देऊन फोन ठेवला. चहाचा कप घेऊन तन्वी शांतपणे बसली होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती केव्हातरी काहीशी परिचित होणार होती. नकुल कोण आहे, तो नेहमी आपल्या स्वप्नात का येतो ह्याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं आणि कधी मिळेल ह्याची खात्रीही नव्हती. पण त्याचं स्वप्नातील वागणं कधीतरी एका विशिष्ट प्रकाराकडे झुकणार होतं. आणि मग एकदा का त्याच्या वागण्याचा उलगडा झाला की मग तन्वी त्याच्याशी मुकाबला करणार होती. विचारांच्या ह्या शृंखलेने तन्वीला बरंच बरं वाटू लागलं होतं. पण मग एक विचार तिच्या मनात आला. आपण प्रत्यक्ष जीवनातील तन्वीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकतो पण त्या दुनियेतील तन्वीच्या वागण्याचा काय भरवसा? स्वप्नातील दुनियेतील भावना ह्या तन्वीला कळतात, पण इथला खंबीरपणा त्या तन्वीपर्यंत कसा पोहोचवायचा? ती नकुलच्या आकर्षणात अशीच वाहवत गेली तर? ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तन्वीकडे नव्हते. "गेली तर तर गेली ती तन्वी त्या नकुलच्या आकर्षणात वाहवत!" तन्वी स्वतःशीच पुटपुटली. शंतनुने जर ह्या दुनियेतील तन्वीला पूर्ण साथ दिली तर मग त्या तन्वीचे आणि नकुलचे काही का होईना! पहिल्यांदाच तन्वीने दोन्ही तन्वीच्या मतलबाची वेगवेगळी विभागणी केली होती. आणि हो तिथल्या आठवणी मला सुखावतात! वाटली शंतनुला ही प्रतारणा तर वाटू देत! ह्या विचाराने मात्र तन्वी थोडी घाबरून गेली. पण काहीसा बिनधास्तपणाच आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो हे तिने जाणले. जवळच्या हॉटेलचे मेनू कार्ड घेऊन बदललेली तन्वी मल्याळम भाषेत मसालाडोसा कसा ऑर्डर करायचा ह्याचा विचार करू लागली! शरीराने शंतनु ऑफिसात असला तरी त्याचं मन मात्र भरकटत होतं. हा सर्व प्रकार मुन्नारला आल्यापासून सुरु झाला म्हणजे इथलाच कोणता तरी घटक ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असणार असाच त्याचा समज झाला होता. तन्वीच्या पूर्वायुष्यातील कोणती तरी घटना ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असली तर? असा विचारही त्याच्या मनात डोकावला होता. पण असं असतं तर तन्वीने हे आपणास केव्हाच सांगितलं असतं इतका मात्र त्याचा तिच्यावरचा विश्वास शाबूत होता. इथे नोकरीचा जम तर चांगलाच बसत चालला होता आणि भविष्यही उज्ज्वल दिसत होतं. पण तन्वी आणि तिची मानसिक स्थितीसुद्धा महत्त्वाची होती. ह्या सगळ्या प्रकाराने तिचे मनःस्वास्थ्य बिघडलं तर? मग आपली कितीही प्रगती झाली तर काय उपयोगाची? शंतनुचे हे भरकटत चाललेले विचारचक्र त्याच्या साहेबांच्या येण्यानं थांबलं. "काय शंतनु इतका वेळ असाच बसून राहिला आहेस?" साहेब विचारात होते. एका क्षणी त्यांना हा सारा प्रकार सांगावा असेही त्याच्या मनाने घेतलं. पण हा सगळा प्रकार तिसऱ्या कोणाला सांगण्याआधी तन्वीला विश्वासात घेणं आवश्यक होतं. त्यामुळे शंतनुने तो विचार प्रयत्नपूर्वक मागे लोटला. "नाही हो साहेब, इथल्या ह्या पावसाळी हवेने माझं डोकं धरलंय?" तो म्हणाला. त्याच्या ह्या स्पष्टीकरणावर बॉसचा अजिबात विश्वास बसला नसला तरी त्याला आपल्याशी ही गोष्ट सध्या शेयर करायची नाहीय हे बॉसने ताडलं. बॉस व्यावहारिक होता. सध्यातरी शंतनु कामाच्या बाबतीत जोरात होता. त्याचे असे काही ताणग्रस्त क्षण पेलायची त्याची तयारी होती. शंतनु संध्याकाळी थोडासा लवकरच घरी आला. तन्वीने दुपारी जागल्यापणीच एक दोन डुलक्या काढल्या होत्या. सकाळी ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विचारपूर्वक ठरविलेल्या मार्गाची तिने दिवसा एक दोनदा उजळणी केली होती. घरात मल्याळी अबोला पुन्हा एकदा साथीला होता पण भावना मात्र मराठीच होत्या. आणि डोळ्यात सतत डोकावू पाहणाऱ्या अश्रूंची भाषा तर जगभर सारखीच असते. चहाचे कप घेऊन तन्वी दिवाणखान्यात आली. एक कप शंतनुसमोर टीपॉयवर ठेवून आपला कप घेऊन ती खिडकीपाशी आली. आज ढगाळ हवा होती. वातावरणात उकाडाही होता. शंतनुविषयी तन्वीची एक तशी जुनीच तक्रार होती. भांडण झालं की दूर करण्यासाठी तो केव्हा पूर्ण पुढाकार घेत नसे. "आज मला तुझी फार गरज आहे, शंतनु!" चहाचा घोट घेता घेता तन्वी मनात विनवणी करीत होती. आणि इतक्यात शंतनुच्या दोन्ही हातांची अलगद पकड तिच्या कमरेभोवती पडली. अगदी नाजूक मनःस्थितीत असणाऱ्या तन्वीच्या मनाचे सर्व बांध त्या क्षणी मोडून पडले. बराच वेळ मग ती शंतनुच्या मिठीत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होती. "शंतनु, मला कसंही करून ह्या सर्व प्रकारातून बाहेर पडायचं आहे रे, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवीय! एकदा त्या दुनियेत माझा प्रवेश झाला की तिथल्या माझ्या वागण्यावर माझे अजिबात नियंत्रण नसतं. इतकंच काय तर तिथल्या कालावधीत माझ्या मनातील भावनाही मला पूर्णपणे आठवत नाहीत." शंतनु तिच्याशी पूर्ण सहमत होता. "तन्वी, खरतरं तू झोपली असताना जागं राहून मला तुझ्यावर लक्ष ठेवायला हवं, पण मी पडलो मुलखाचा झोपाळू!जर मला जागं राहता आलं असतं तर ज्या वेळी तो नकुल तुझ्या स्वप्नात येतो ते मी तुझ्या हावभावांवरून मी ओळखलं असतं!" "आणि मग तू काय केलं असतं रे शंतनु?" तन्वीचा हा प्रश्न शंतनुला फारसा आवडला नाही कारण त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ नव्हते. "बाकी तन्वी, तुला एक प्रयत्न करून पाहायला हवा. त्या स्वप्नात तुला तुझे हे विश्व आठवता यायला हवं! तुझ्या ह्या विश्वातील चांगल्या गोष्टी (स्वतःकडे मिश्किल नजरेने पाहत) तुला त्याच्याशी लढल जाणारं हे मनोयुद्ध जिंकायला मदत करेल!" आपल्या मनातील सकाळचेच विचार काही प्रमाणात शंतनुच्या तोंडून ऐकून तन्वीला खूप बरं वाटलं. आणि त्याचा तो मिश्किलपणा, तो जर ह्याने परत प्राप्त केला असेल तर मला खूप बरं वाटेल शंतनु! सुखावलेली तन्वी विचार करीत होती. रात्रीचे जेवण शांतपणे पार पडले. तणावपूर्ण दिवसानंतर मनोमिलन झाल्याने एक प्रकारची मनःशांती दोघेही अनुभवत होते. फरक इतकाच होता ऑफिसातील कामाने दमलाभागला एक जीव शंतनु होता आणि कितीही झालं तरी ऑफिसातील विचार अधूनमधून त्याच्या मनातील तन्वीबद्दलच्या विचारांशी त्याच्या मनाचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. तन्वीलाही हे अपेक्षितच होते. काही वेळातच शंतनु झोपी गेला. तन्वी त्या तीन भेटीतील आठवणाऱ्या वातावरणाची उजळणी करण्याचा प्रयत्न करीत होती. मंद मेणबत्तीचा प्रकाश मिणमिणत होता. आजचं वातावरण अगदी वेगळं होतं. नेहमीचा राजदरबार, महाराज ह्याचं विश्व गायब झालं होतं. तिथं आता एक रम्य संध्याकाळ होती. सुर्य अस्ताला निघाला होता. एका छोट्या टेकडीवर तन्वी बसली होती. समोर दूरवर एक सुंदर नगर दिसत होते. आणि हो हे नगर पुराणकाळातील नव्हतं. आधुनिकतेच्या काही खुणाही तिथे दिसत होत्या. त्या तांबड्या आकाशात बगळ्यांची एक रांग आकाशात दूरवर कोठेतरी जात होती. ह्या बगळ्यांचं कसं बरं असतं असा एक विचार तिच्या मनात येऊन गेला. आपण इथे एकटेच काय करतो आहोत ह्याचा एव्हाना तन्वी अचंबा करू लागली होती. इतक्यात दूरवरून येणाऱ्या एका मोटारीच्या आवाजाने तिचे लक्ष वेधलं गेलं. ती कार तर एकदम मस्त होती. आणि चालविणाऱ्याचे सारथ्यकौशल्य वाखाणण्याजोगं होतं. टेकडीवरील थोडीफार वळणं झपाट्याने पार करीत तो कारला घेऊन तन्वीजवळ येऊन पोहोचला देखील. ती कार होंडा सिटी होती. आणि त्यातून अगदी आधुनिक वेशातील एक देखणा तरुण तिच्यासमोर उतरला. क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. आणि मग अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे हा तर नकुल! नकुलने अगदी आधुनिक कपडे परिधान केले होते. हातात चकाकते घड्याळ होतं. अरे हे तर टायटनचे घड्याळ! अगदी शंतनु घालतो तसं! शंतनु! कोण हा शंतनु? तन्वीच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. शंतनु म्हटल्यावर अगदी ओळखीचं वाटत होतं. पण नक्की कोण हे आठवत नव्हतं. "ओळखलं, मला?" नकुल विचारत होता. "आपण कोण?" आपल्याच दोन रूपांमधील तर्कसंगती लावण्याच्या प्रयत्नात असलेली तन्वी त्याचवेळी नकुलच्या ह्या दुसऱ्या रूपाचे प्रयोजन काय ह्याचा विचार करीत होती. "अरे हो, आपण नकुल नाही का?" तन्वी म्हणाली. त्याचवेळी तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचाही ड्रेस अगदी आधुनिक होता. टी शर्ट आणि जीन्स! "अरे अशीच जीन्स शंतनुने आपल्याला घेऊन दिली होती" आता शंतनु तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. "लवकर ओळखलं म्हणायचं," नकुल हसतच म्हणाला. त्याच्या हास्यात तन्वीला काहीसा खलनायकपणा दिसला. "आपण फिरायला जाऊयात?" नकुल विचारत होता. शंतनुला असं विचारायची कधीच गरज पडली नव्हती. "अरे, हा कोण शंतनु, हा सारखा सारखा माझा पिच्छा का पुरवतोय?" तन्वी काहीशी त्रस्त झाली होती. नकुलचे बारीक लक्ष तिच्याकडे होते. "तिथे शहरात आभूषणांच मस्त प्रदर्शन भरलं आहे?" एव्हाना तन्वी पुरती त्रस्त झाली होती. "हो, येते मी" असं म्हणत ती उठली. तो रस्ता ओळखीचा वाटत होता. "अरे हा तर कोल्हापुरातील रस्त्यासारखाच वाटतोय!" मनातल्या मनात तन्वी म्हणाली. आता हळूहळू तर्कसंगती लागत होती. नकुलने गाडी पार्क केली. हे प्रदर्शन अगदी अप्रतिम होतं. एकाहून एक अतिसुंदर दागिन्यांची तिथे रांग लागली होती. पण नकुल कोणत्याही ठिकाणी तिला जास्त वेळ थांबू देत नव्हता. एका ठिकाणी तन्वीला एक मोत्यांची माळ खूप आवडली. "मला ही माळ हवीय!" ती म्हणाली. आता मात्र नकुलचा संयम सुटला. "नाही, आपल्याला हिऱ्यांच्या विभागात जायचं आहे" जवळजवळ रागावतच तो म्हणाला. तन्वी घाबरली. "शंतनु असा कधी रागवायचा नाही." नकुलच्या मागे तन्वी भीतीनेच चालली होती. शेवटी एकदाचे ते हिऱ्यांच्या विभागात पोहोचले. बहुदा काय विकत घ्यायचं आहे हे नकुलला माहित असावं. तो थेट तिथपर्यंत पोहोचला. तिथे एक अतिशय मौल्यवान हिर्याने जडवलेली अंगठी होती. ती त्याने उचलली. तन्वीच्या समोर ती अंगठी आणून नकुल म्हणाला, "तन्वी, तू माझ्याशी लग्न करशील?" आता हा अगदी शेवटचा बिंदू होता. शंतनूने कसं तिला हळुवारपणे मागणी घातली होती. आणि त्या क्षणी तिला सर्व काही आठवलं. कोल्हापूर, मुन्नार, शंतनु आणि सकाळचा निर्धार, अगदी सारं काही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ! "नकुल मला माझ्या शंतनुकडे जाऊ देत!" विनवणी करीत ती म्हणाली. "शेवटी माझा अंदाज खरा ठरला तर!" काहीसा त्रस्त होऊन नकुल म्हणाला. "तन्वी, मी तुला अगदी सुखात ठेवीन! माझ्या विश्वात तुझ्या साऱ्या काही इच्छा पुऱ्या होतील! मी तुला दुःखाचा लवलेशही लागू देणार नाही!" तन्वी अगदी काळजीपूर्वक नकुलकडे पाहत होती. त्याची नजर तिने ओळखली होती. ह्याचं हे बोलणं आपण ऐकल नाही तर दुसऱ्या मार्गाचा तो वापर करणार अशी तिला चिन्ह दिसत होती. एकंदरीत प्रकरण हुशारीनं हाताळायचं तिने ठरविलं. "अरे इतकी घाई कशाला? आताच तर आपण एकमेकाला ओळखू लागलो आहोत. आणि मला ह्या विश्वाशी जरा सरावू तर दे!" तन्वी जरा वेळ काढायला पाहत होती आणि त्याचवेळी नकुलच्या चेहऱ्यावरील हावभाव निरखत होती. आता ह्या क्षणी तन्वीला दोन विश्वाच्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव झाली होती. आणि आपले डावपेच खेळायला ती पूर्ण तयार होती. "पण नकुल, मला कायमचं ह्या दुनियेत कायमचं राहता येईल का? प्रत्येक वेळी मला शंतनुच्या विश्वात जावं तर लागेलच ना?" नकुलला हा प्रश्न काहीसा अनपेक्षित होता. क्षणभर थांबून तो उत्तरला, "तुला शरीराने कायमच शंतनुच्या विश्वात राहावं लागेल. फक्त एक घडू शकत. तू मनानं कायमची ह्या विश्वात राहू शकतेस. जागेपणी आणि झोपेतसुद्धा!" "मग माझ्या शंतनुच्या दुनियेतील वागण्यावर त्याचा परिणाम नाही होणार का?" "हो अर्थातच होईल! तू त्या दुनियेत वावरताना सुद्धा माझ्या दुनियेतील संदर्भ घेऊनच वावरशील!" "म्हणजे मी त्या दुनियेच्या हिशोबाने वेडी समजली जाईल तर!" तन्वी म्हणाली. "अगं शहाणपणा आणि वेडेपणा ह्या सर्व सापेक्ष गोष्टी आहेत! शंतनुच्या दुनियेतील शहाणपणाच वागणं दुसरे कोणते संदर्भ लावले तर वेडेपणाचच होईल की!" आपला बुद्धिभ्रम करण्याचा नकुलचा प्रयत्न तन्वी चांगलाच ओळखली होती. "चल, ते सर्व राहू दे! बाहेर हवा कशी मस्त पडली आहे! आपण फिरून येवूयात की!" तन्वी म्हणाली. "तो पहा, तिथे कसा उंच पहाड दिसतोय, आणि आता चंद्र तर उगवतच असेल!" "पण तिथवर पोहोचायला वेळ लागेल की" नकुल कुरकुरला! "नकुल, तू ठरवलं तर एका क्षणात आपण तिथं पोहोचू शकू, मी ओळखून आहे!" तन्वीच्या ह्या वाक्यावर नकुल चमकला. "म्हणजे हिला सर्व काही समजलं आहे की!" दुसऱ्या क्षणी ते दोघे त्या उंच पहाडावर होते. सूर्य मावळला असला तरी त्याची तांबडी प्रभा आकाशात रेंगाळत होती. हवेत मस्त थंडावा होता. पूर्वेला अपेक्षेनुसार चंद्राचे आगमन झाले होते. बाजूला खोलवर दरी होती. त्या दरीकडे पाहताना तन्वीच्या मनात एक नाही दोन विचार चमकून गेले. आता तन्वी परिस्थितीच्या पूर्ण नियंत्रणात होती. तिनं मागे वळून पाहिलं. एक आलिशान प्रासाद तिथं उभा होता. नकुलचा हात तिने हळूच हातात घेतला. तिचं मन वेगाने धावत होते. तिच्यापुढे एक संधी होती. प्रणयाराधन करण्यात नकुलचा हात धरणारं कोणी नव्हतं. तो तिला प्रणयातील उत्कटता दाखवू शकला असता. अगदी शेवटापर्यंत हा क्षण तिने आयुष्यभर लक्षात ठेवला असता आणि हे कोणालाच कधी कळलं नसतं. आणि ह्यातून कधी आणि कसं बाहेर पडायचं ही ती ठरवू शकणार होती. .............. काही वेळानं तन्वीने नकुलला एक सुंदर फुल दाखवलं. "नकुल, मला ते फुल हवंय!" नकुल एकदम खुशीत होता. तो तत्काळ ते फुल आणण्यासाठी पुढे सरसावला. तिथल्या निसरड्या वाटेकडे त्याचं दुर्लक्ष झालं. आणि अचानक त्याच्या नजरेसमोर खोल दरी दिसली. खोल दरीत पडत असताना तो कायम तन्वीच्या डोळ्यात पाहत होता. "तू मला फ़सविलस" हेच भाव त्याच्या डोळ्यात होते. सकाळ प्रसन्न होती. तन्वी अगदी मजेत होती. शंतनुने तिची ही ख़ुशी पाहून हा विषय काढायचं टाळल. पुढे बरेच दिवस असच चाललं. तन्वी अगदी नेहमीसारखी झाली होती. अगदी कोल्हापुरासारखी! दोन आठवड्यांनी न राहवून शंतनुने हा विषय काढला. तन्वी हसतहसत म्हणाली, "नकुल केव्हाच इतिहासजमा झालाय, शंतनु!" त्याला बिलगताना "नकुल केवळ आभासी दुनियेत भेटला म्हणून बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं, हा विचार तिच्या डोक्यात आलाच!"
मंगळवार, ४ नोव्हेंबर, २०१४
जाणता अजाणता - एक मनोद्वंद
शंतनु ऑफिसातून आला तो काहीसा अबोल होऊनच! तन्वीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखलं की आज काहीतरी बिनसलं आहे. त्याला तिने फ्रेश होवून दिले. तो ताजातवाना होऊन परत हॉल मध्ये येईपर्यंत तिने गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीच्या खारी बिस्किटाची डिश तयार ठेवली होती. चहा आणि आवडीची बिस्किटे पाहताच शंतनुचा चेहरा खुलला. त्याने सोफ्यावर बैठक मारली. चहाचा पहिला घोट घेताच त्याची मुद्रा खुलली. तोवर तन्वी आपला कप घेऊन त्याच्याजवळ येऊन बसली होतीच. तन्विचा स्पर्श होताच शंतनूची उरलीसुरली उदासी निघून गेली. तन्वीने आपला चहाचा कप टीपॉयवर ठेवला!"असं रुसून घरी परत यायला काय झालं होत?" "काही नाही" शंतनु म्हणाला. दोन मिनिटे कोणीच काही बोललं नाही. तन्वीला हा अबोला सहन न होऊन ती काहीशा रागानेच स्वयंपाकघरात गेली. "राग फक्त हिलाच धरता येतो" शंतनू मनातल्या मनात पुटपुटला. एक दोन मिनटे थांबून आज आपल्यालाच पडतं घ्यावं लागणार असा सुज्ञ विचार करीत तो स्वयंपाकघरात पोहोचला. एव्हाना तन्वीचे कांदा कापणे सुरु झालं होत. पाठमोरी असली तरी तिने शंतनुची चाहूल घेतली. १० - १५ सेकंद काही मागून हालचाल नाही हे पाहून मग ती वळली. तिच्या नजरेतील भावांनी आणि ओठात दडलेल्या स्मितहास्याने शंतनुची उरलीसुरली नाराजी दूर झाली. "माझी मुन्नारला बदली झालीय" फ्रीजला टेकून उभा राहिलेला शंतनू बोलला. भाजी कापणाऱ्या तन्वीच्या हातातील सुरी तिने कशीबशी आपले बोट कापण्यापासून वाचविली. तन्विसाठी ही बातमी म्हणजे मोठा धक्काच होता. पुढील एका महिन्यात मुन्नारला संसार उभारायचा होता. कोल्हापुरातील सर्व मैत्रिणी, नातेवाईक सोडून अचानक असे जाणे तिच्या जीवावर येत होते. परंतु नाईलाज होता. तिच्या मनातील वादळाचा जेवणावर परिणाम झालाच. परंतु शंतनु एव्हाना सावरला होता. भाजीतील कमी मिठाचा त्याने उल्लेखही केला नाही. त्याला वाढून तन्वीने आपले ताट वाढून घेतलं. पहिला घास घेताच तिला मिठाचा कमीपणा जाणवला. "अरे शंतनू, भाजीत मीठ कमी आहे! मला सांगायचं नाही का?" ती म्हणाली. शंतनुच्या डोळ्यात पाहून त्याने आपल्याला न दुखावण्यासाठी मौन राखलं हे तिला जाणवलं आणि इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. शंतनु लगेचच खुर्चीवरून उठला. "रडूबाई, अग लोक देशांतर करतात आणि मजेत राहतात. आपण तर आपल्याच देशात चाललो आहोत! आणि ते सुद्धा मुन्नरसारख्या निसर्गरम्य ठिकाणी" दोघांच्या ताटात चिमुटभर मीठ ठेवता ठेवता शंतनु म्हणाला. शंतनुच्या समजूतदारपणाने तन्वी अगदी गहिवरली. एका हातानेच तिने शंतनुला आपल्याजवळ ओढले. जेवण आटोपल्यावर शंतनुने आवाराआवर करण्यास हातभार लावला. "चल पटकन खाली एक चक्कर मारून येवू" शंतनू म्हणाला. तन्वीला थोडे आश्चर्यच वाटलं. एकदा का ऑफिसातून घरी आला की शंतनुला घराबाहेर काढण्यासाठी फार कष्ट करावे लागायचे. परंतु तिलाही थोडा मोकळेपणा हवा होता. तिने तत्काळ पंजाबी ड्रेस चढविला. मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. हवेत कमालीचा उकाडा होता. रात्रीचे साडेनऊ झाले तरी हा उकाडा जाणवत होता. गावाबाहेरील ही कॉलनी गर्द झाडांनी व्यापलेली होती. रहदारी तशी चालू होती. कॉलनीच्या दुसऱ्या टोकाला एक आईसक्रीमवाल्याने गाडी लावली होती. तिच्याकडे बोट दाखवून शंतनू म्हणाला "चल, आईसक्रीमचा कोन घेऊयात!" तन्वीला आज तर एकावर एक आश्चर्यचे धक्के बसत होते. आईसक्रीमच्या गाडीपर्यंत दोघेही अगदी हातात हात घालून चालत होते. अचानक हवेत थंड वारा सुटला. जमिनीवर पडलेला पालापाचोळा वाऱ्याने अगदी हवेत उडवून दिला. तन्वी शंतनुला उगाचच बिलगली. आईसक्रीमवाला वाऱ्याचे रूप पाहून आपला गाशा गुंडाळायाच्या मागे होता. त्याने घाईघाईने ह्या दोघांना कोन बनवून दिले . आपल्या कोनाचा पहिला हक्क शंतनुने तन्वीला दिला. आनंदाने फुललेल्या तन्वीचे ते मोहक रूप शंतनू आपल्या डोळ्यात साठवत होता की दूरवरून पावसाच्या जोरदार सरींचा आवाज दोघांनीही टिपला. "पळ शंतनु, पाऊस आला" तन्वी ओरडली. जमेल तितकं आईसक्रीम तोंडात भरून दोघांनी पळ काढला. अर्ध्या वाटेवर दोघांना पावसाने गाठल. एका झाडाचा आसरा घेवून दोघे थांबले. जोरदार पावसाने उरलीसुरली रहदारी थांबवून टाकली होती. आणि तितक्यात वीजहि गेली. पहाटे चारच्या सुमारास तन्वीला जाग आली. बाजुलाच लहान मुलाप्रमाणे झोपलेल्या शंतनुला पाहून ती स्वतःशीच खुदकन हसली. रात्री पावसाने तास दोन तासभर जोरदार वर्षाव केला होता. आता मात्र आकाश बऱ्यापैकी निरभ्र झाले होते. कृष्णपक्षातील सकाळपर्यंत आकाशात रेंगाळणारा चंद्र तन्वीला खिडकीतून दिसला. अभावितपणे त्याच्या सोबतीला कुठे चांदणी दिसते का ह्याचाच ती शोध घेऊ लागली. आणि तिला चंद्राच्या बाजूलाच एक चांदणी दिसताच तिची कळी अजूनच खुलली. आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कसे अचानक आपणासमोर येतात ह्याचेच तन्वीला राहून राहून आश्चर्य वाटत होते. शंतनू तसा अगदी शिस्तीचा माणूस, त्याच्याकडून रात्री झालेला कलात्मक प्रेमाचा वर्षाव तिला अगदी अनपेक्षित होता. तन्वी आणि शंतनू ह्यांच्या लग्नाला आताशा सहा महिने होत आले होते. शंतनु दुनियेच्या मापदंडाप्रमाणे अगदी आदर्श नवरा होता. नावाजलेल्या प्रवासी कंपनीत मोठ्या व्यवस्थापकाच्या हुद्द्यावर होता. लग्न झालेली बहिण आणि आई वडील असं सुखी कुटुंब होते. आई वडिलांना पुणे सोडून कोठे जायचे नसल्याने, तन्वी आणि शंतनुचा राजाराणीचा संसार कोल्हापुरात चालू होता. म्हणायला गेलं तर कोल्हापुरात दोघांचेही नातेवाईक होते. लग्नानंतर ह्या दोघांना बोलावण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागली होती. तन्वीला ह्या सर्व गोष्टीत खूप मजा वाटे तर शंतनुला कंटाळा येई . शंतनुला नवनवीन पर्यटन ठिकाणे धुंडाळण्यात रस असे. ह्या मुद्द्यावरून कधी कधी दोघांत खटका उडे. परंतु तन्वी समजुतीने घेई. शंतनुसोबत आपणही काहीवेळा भटकण्यास जाऊया अशी मनाची तिने तयारी केली होती. आणि अचानक काल संध्याकाळी शंतनू मुन्नरला जाण्याची बातमी घेऊन आला. तन्वीचे विचारचक्र असेच चालू होते. अचानक घड्याळाकडे तिचे लक्ष गेले. साडेपाच होऊन गेले होते. तन्वीने पुन्हा एकदा आपल्या राजसाकडे पाहिले. त्याची गाढ निद्रा अजून तशीच होती. त्याच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता अजूनही कायम होती. हा अजून रात्रीच्या आठवणीतून बाहेर आला नाही वाटत ह्या खट्याळ विचाराने तन्वी अजून हसली. तन्वीने स्वतःसाठी चहा बनविला. चहाचे घुटके घेत ती गॅलरीत आली. पूर्वेला आता उजाडून येत होते. रात्रीच्या पावसाने सर्वत्र पालापाचोळा विखरून दिला होता. काही फांद्याही मोडल्या होत्या. पक्षांचा मधुर किलबिलाट सुरु होता. मुन्नारला जाण्याबाबत तन्वीने काल रात्री विचारच केला नव्हता. विचार करायला म्हणा वेळच कुठे मिळाला होता तिला! पण आता मात्र तिच्या मनात विचारचक्र सुरु झाले होते. तिची वाणिज्य शाखेतील पदवी होती. मुंबई सोडून कोल्हापुरात येतानाच तिला जीवावर आले होते. लवकरच कोठेतरी छोटी नोकरी मिळवावी असा तिचा मानस होता . परंतु शंतनु हे तिचे बोलणं मनावर घेत नव्हता आणि आता हे मुन्नरचे प्रकरण उद्भवल्याने आपली नोकरी आता अजून पुढे ढकलली जाणार ह्याची तिला खात्री झाली होती. ती ह्या विचाराने काहीशी अस्वस्थ होती. तिचे हे विचारचक्र शंतनुच्या अलगद स्पर्शाने खंडित झाले. तिने मागे वळून त्याच्याकडे पाहिलं, शंतनूने तिला एक स्मित हास्य दिलं. तन्वीच्या मनात अचानक सकाळच्या भाजीचा विचार आला आणि ती ताडकन उठून स्वयंपाकघरात गेली. शंतनुचा पुरता हिरमोड झाला होता. हिला दोन मिनिट बोलायला काय झालं होत असा विचार करीत तो नकळत आपल्या नाखुशीच्या कोशात शिरला. बाकी सकाळ मग तशी नेहमीप्रमाणे गेली . सर्व व्यवहार यांत्रिकपणे चालू होते. अंघोळ करताना टॉवेल विसरण्याचे नाटक करण्याचा विचार महत्प्रयासाने शंतनुने परतवून लावला. ऑफिसला निघताना त्याला टाटा करण्यासाठी तन्वी गॅलरीत आली. पण तिने हात उंचावून केलेल्या निरोपाकडे शंतनूने दुर्लक्ष केले. सकाळ आता बरीच स्थिरावली होती. रात्रीच्या पावसाच आता नामोनिशाण नव्हत. तन्वीने चपाती दुधात बुडवत आईला फोन लावला, शंतनुच्या बदलीची बातमी द्यायला. "काय बाई हे! मुन्नरला बदली? मी सांगते हो तुला, तू इकडे नोकरी पहा मुंबईला. सहा महिन्यात तो परत येईल की नाही ते बघ! ते काही नाही मी आजच गजाननकाकांना संध्याकाळी तुझ्याकडे पाठवते" आईची ही अखंडवाणी सहन न होत तन्वीने फोन ठेवला. ती तशीच किती वेळ रिकामा पेला घेऊन खिडकीतून दिसणाऱ्या एकट्या चिमणीकडे पाहत राहिली ते तिचे तिलाच माहित! तन्वीची तंद्री शेजारच्या मनीषाच्या बेल वाजविण्याने खंडित झाली. मनीषा सहजच गप्पा मारायला आली होती. तन्वीची एकंदरीत मुद्रा पाहून मनीषाने आपलं बोलणं आवरत घेतलं आणि ती परतली. तन्वीने घड्याळाकडे पाहिलं "अरे बापरे साडेनऊ होत आले, चटकन आवरायला हवं" ती स्वतःशीच म्हणाली. शंतनुला केलेल्या चपत्यातील उरलेल्या दोन मोरंब्यासोबत झटपट खाऊन तिने आपली न्याहारी आटोपली. ती क्षणभर थांबली. तिने फोनकडे नजर टाकली आणि शंतनुला फोन लावला. तीन चार रिंगनंतर सुद्धा त्याने फोन न उचलल्यामुळे तिने फोन ठेवला. तो बऱ्याच वेळा सकाळी कामात व्यग्र असतो त्यामुळे बहुदा त्याने फोन उचलला नसावा अशी अटकळ तिने बांधली. "पण त्याने मुद्दाम उचलला नसेल तर?" असा विचार मनात आणून द्यायचा तिचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर ती अगदी उदास झाली. उदासपणावर सतत कामात राहणे हाच रामबाण उपाय आहे हे बाबांचे बोल तिला आठवले. मग ती नव्या जोमाने कामाला लागली. इतक्यात बाहेर फोन वाजतो आहे असा भास तिला झाला. ती धावतच बाहेर गेली. शंतनू फोनवर होता. त्याची कायम असलेली नाराजी स्वरातून डोकावत होती. "ह्या महिनाअखेरीला शिफ्ट व्हावे लागेल" तो म्हणत होता. "आणि हो फोन उचलायला इतका वेळ का लागला?" "मी आंघोळ करतेय" तन्वीच्या ह्या उत्तरावर शंतनु क्षण दोन क्षणभर तो फोनवर तसाच न बोलता थांबला. "ठीक आहे, ठेवतो मी फोन" असे बोलून त्याने फोन ठेवला होता. दोन प्रौढांच्या रुसून बसण्याच्या खेळात थोडी रंगत आली होती. जेवणं आटपून, टीव्ही पाहून तन्वी जरा पहुडली होती की दाराची बेल वाजली. गजाननकाका दारात उभे होते. ते थेट घरात शिरले. आईने त्यांना सर्व इत्यंभूत खबर दिली होती हे स्पष्ट होते. "वसुधा माझ्याशी सविस्तर बोलली, मी तुझ्यासाठी मुंबईत त्वरित नोकरी शोधतो. शंतनुराव काय सहा महिन्याच्यावर तिथे थांबायचे नाहीत" गजाननकाकांच्या बोलण्याकडे तन्वी दुर्लक्ष करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होती. परंतु ते थांबायचे लक्षण दिसेना तेव्हा ती शांतपणे म्हणाली "मी शंतनूसोबत मुन्नारला जाणार!" वसुधाताई आणि गजाननकाका सहजासहजी हार मानणाऱ्यातले नव्हते. गजाननकाकांच्या मित्राचा मुलगा एका स्थानिक बँकेत मोठ्या हुद्द्यावर होता. त्याला फोन लावल्यावर त्या बँकेत वाणिज्य शाखेतील पदवीधरांसाठी भरती चालू असल्याचे काकांना कळलं. आणि मग! संध्याकाळी तन्वी एक बाहेर चक्कर मारून यायला म्हणून बाहेर पडणार तितक्यात तिचा फोन खणखणला! शंतनुचा फोन असेल ह्या आशेने तिने पाहिलं तर अनोळखी नंबर दिसला. शक्यतो ती अनोळखी क्रमांकावरील फोन घ्यायची नाही. पण कोणास ठाऊक कसं पण तिने हा फोन उचलला! बँकेतून मुलाखतीसाठी फोन होता आणि त्यांनी काकांचा संदर्भ दिला. "मला ह्यात अजिबात रस नाहीये" असे सांगून फोन ठेवायची तीव्र इच्छा झाली. पण नुसतं बोलून पाहायला तर काय हरकत आहे, आपण थोडेच जाणार आहोत तिथे, असा विचार करून तिने पाच मिनिटांचा वेळ मागितला. तयार होऊन ती मुलाखतीला बसली. मुलाखत अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चालू झाली. तन्वीच्या सामान्यज्ञानावर, संगणकाविषयी आणि एकंदरीत जगभरच्या आर्थिक परिस्थितीविषयीच्या ज्ञानावर मुलाखतमंडळ खुश दिसत होत. तिचे गणितातील फंडे सुद्धा बऱ्यापैकी चांगले होते आणि वाणिज्यशाखेतील तिच्या प्राविण्यावर तर ते मंडळ फिदा झालं. "तुम्हांला ह्या पदाविषयी, त्यातील जबाबदाऱ्याविषयी काही प्रश्न आहेत का?" मुलाखतमंडळाने हा प्रश्न विचारायला आणि दार उघडून शंतनू आत यायला एकच क्षण मिळाला. "मला महिन्यातून १-२ आठवडे घरून काम करायला परवानगी मिळेल का? तन्वीच्या मनातील हा प्रश्न शंतनुच्या येण्याने तिच्या मनातच राहिला. "नाही" एका शब्दात ती उत्तरली. पुढे फोनवर आपला ई - मेल देत असलेल्या तन्वीकडे शंतनु काहीसा चकित होऊन पाहत होता. बाहेर फिरायला जायची वेळ टळून गेली होती. शंतनु एव्हाना ताजातवाना होऊन सोफ्यावर बसला होता. तन्वी चहा घेऊन सोफ्यावर येउन बसली. तिची नजर शंतनुने टेबलवर ठेवलेल्या राहण्यासाठी प्रस्तावित असलेल्या मुन्नरच्या दोन इमारतींच्या फोटोकडे गेली. त्यातील एका इमारतींचे फोटो तिला बेहद्द आवडले. त्याच्या भोवतालचे चहाचे हिरवे मळे, गॅलरीतून दिसणारे उंच पर्वतराजीचे विहंगम दृश्य! चहाचे घोट घेत पेपर वाचण्याचे नाटक करणाऱ्या शंतनुच्या एका डोळ्याने तन्वीच्या चेहऱ्यावरील ख़ुशी टिपली. तन्वीने सुद्धा मग खुशीत येऊन म्हटलं "आपण ना ह्याच इमारतीत सदनिका घेऊयात!" झालं गेलं विसरून ते दोघंजण अगदी खुशीत हसले. तितक्यात तन्वीचा फोन पुन्हा खणखणला. पलीकडे काका होते. "तन्वी, अगदी कमाल केलीस तू मुलाखतीत! तुला वार्षिक ९ लाखांचं पॅकेज द्यायला ते तयार आहेत! आणि दोन वर्षात बढती! मीच त्यांना हो सांगून टाकणार होतो पण त्यांना तुझ्याकडूनच होकार हवाय! सांगू ना मग हो त्यांना!" तन्वीला क्षणभराची उसंत न देता काकांची बडबड चालूच होती. तन्वीच्या तोंडून शब्द फुटेना. "मी तुम्हांला उद्या सकाळी फोन करते" ती कशीबशी उद्गारली. अचानक झालेल्या तिच्या चेहऱ्यावरील हावभावांच्या ह्या बदलाने शंतनू अगदी चकितच झाला. पुढे अर्धा तासभर त्याला सर्व परिस्थिती समजून सांगताना तन्वीची हालत खराब झाली. "तू मुलाखत दिलीच कशाला? शंतनूच्या ह्या प्रश्नाचे तिच्याकडे उत्तर नव्हतच. तिलाच स्वतःला पडलेला तो प्रश्न होता. घड्याळाकडे पाहिलं तर आठ वाजत आले होते. पुन्हा एकदा हिरमुसलेल्या शंतनूला तसंच ठेवत तिने स्वयंपाकघराकडे धाव घेतली. शंतनुची जेवणाची साडेआठची वेळ पाळायची तर आता फक्त खिचडीसाठी वेळ होता. कुकर लावता लावता मुलाखतीतील आपल्या कामगिरीवर ती बेहद्द खुश होऊन मनातल्या मनात हसत होती. मागे आलेल्या शंतनुची चाहूल घेताच तिने त्या विचारांना आवरलं. "मग हा ब्लॉक भाड्याने द्यायचा की तसाच ठेवायचा? ती म्हणाली. तन्वीला प्रस्तावित केल्या गेलेल्या ९ लाखांच्या पॅकेजचे विचार शंतनूच्या मनातून अजून गेले नव्हते. आपल्याला चार वर्षानंतर आता कुठं १० चा आकडा गाठता आला आणि हिला पहिल्या नोकरीतच ९ लाख देतायेत! "मुलगी फार हुशार आहे हो!" तन्वीच्या मावशी साखरपुड्याच्या वेळी बोलल्या होत्याच. "आमचा शंतनुही काही कमी नाही" काही ऐकून घ्यायची सवय नसणाऱ्या त्याच्या काकूंनी त्याच वेळी ठसक्यात उत्तर दिलं होत. शंतनुला अचानक तो प्रसंग आठवला. तन्वी त्याचाकडे पाहत त्याच्या मनाचा ठाव घेत होती. अचानक बाहेर चिमण्यांची चिवचिव ऐकू आली. दोघांनी बाहेर उभारलेल्या चिमणीच्या घरट्यात राहणारे चिमणाचिमणी मेहनतीने उभारलेल्या आपल्या घरट्याकडे कौतुकाने पाहत होते! शंतनुला पहाटेच जाग आली. तन्वी बाजूला नव्हती. अभ्यासिकेतील दिवा चालू होता. डोळे चोळत शंतनू तिथवर गेला. तन्वी टेबललैम्पच्या उजेडात तिच्या वहीत काही नोट्स काढीत होती. "तन्वी, इतक्या सकाळ सकाळी काय लिहितेयस?" शंतनूने तिला विचारलं. तन्वीने वही पुढे केली. मुन्नारच्या स्थलांतरासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व गोष्टींची ती यादी होती. "आपण गणपतीच्या सुट्टीत इथे परत येऊ, फ्लैट भाड्याने द्यायचा की नाही त्यावेळी ठरवू" तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. तन्वी शंतनुची नजर चुकवीत बोलत होती. "तन्वी, तुझ्या नोकरीचं काय? समजा मी सुद्धा इथे दुसरी नोकरी शोधली तर आपल्या दोघांना अगदी मजेत राहता येईल" शंतनु म्हणाला. "नको राहू दे, मी चहा ठेवते आता!" असं म्हणून तन्वी तिथून पटकन उठून गेली. शंतनूची झोप आता पूर्ण उडाली होती. त्याने पटकन ब्रश केलं आणि तन्वीने आणून दिलेला चहा घेऊन तो स्वयंपाकघरात आला. बोलणं टाळायचं असेल तर कामात गढून जायची किंवा गढून जायचं नाटक करायची तिची सवय त्याला काही नवी नव्हती. शंतनू असाच काही क्षण तिच्या मागे उभा राहिला. नेहमीप्रमाणे तन्वीला त्याची चाहूल लागलीच. न राहवून तिने मागं वळून पाहिलं आणि नजरेनेच काय म्हणून विचारलं. "तन्वी, मनातलं खरं खरं सांगून टाक!" शंतनु म्हणाला. तन्वी मागं वळाली. खिडकीतून खालून जाणारा रस्ता दिसत होता. त्या रस्त्यावर जर पुढे गेल्यावर दोन फाटे यायचे. त्यातील एक नेहमीचा गावात जाणारा रस्ता होता पण दुसरा रस्ता कोठे जातो हे तन्वीला माहित नव्हतं. "आपण त्या रस्त्यावरुन पुढे जाऊन पाहूयात ना!" तन्वीने बराच वेळा शंतनुकडे आग्रह धरला होता. "जाऊ कधीतरी एकदा, बाकी पुढे कुठे हरवून गेलो तर?" शंतनु म्हणाला होता. "शंतनु, तू सोबत असशील तर दाट जंगलात सुद्धा हरवायची भीती नाही रे!" तन्वी त्यावेळी म्हणाली होती. हे सारे तन्वीला आठवत होते. ती पुन्हा एकदा वळाली. शंतनु तसाच उभा होता. "शंतनु, आज आपल्याकडे दोन पर्याय आहेत. खरं सांगू ह्यातील कोणताही एक १०० टक्के बरोबर नसणार आहे. कोणताही एक स्वीकारला तर काही मनासारखं होईल तर काही मनाविरुद्ध! जो मार्ग आपण स्वीकारू त्यात काही जास्तच मनाविरुद्ध घडलं तर कितीही इच्छा झाली तरी आपण आज उपलब्ध असलेला दुसरा पर्याय त्यावेळी स्वीकारू शकणार नाहीत! आणि मी स्वार्थी आहे शंतनु! मी त्याग केला ही भावना मला माझ्या करियरपेक्षा महत्वाची वाटतेय! एक काका आणि आई सोडले तर दोन्ही बाजूंचे नातेवाईक, आपण मुन्नारला जावे असेच म्हणणार! माझ्यावर इतकी मेहरबानी कर!" शंतनु निरुत्तर झाला. पुढे बाकी सर्व घडामोडी अगदी झटपट झाल्या. आई आणि काकांच्या कटकटीकडे तन्वीने अगदी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं. सामानाची आवराआवर करून हवं असेललं सामान मुन्नारला निघालं सुद्धा! आणि मग एका शनिवारी सकाळी विमानानं दोघंजण कोचीला पोहोचले सुद्धा! कोचीहून मुन्नारचा वळणावळणाचा रस्ता तन्वीला खूप भावला. आणि मुन्नारचे छोटे टुमदार घर पाहून तर ती बेहद्द खुश झाली. खिडकीतून समोर हिरवेगार पर्वत दिसत होते. पावसानं चांगलाच जोर धरला होता. शनिवार - रविवार अगदी बेधुंद गेले. शंतनुने रसिकतेच्या बाबतीत अगदी परिसीमा गाठली होती. आणि मग दुष्ट सोमवार आला. शंतनुलासुद्धा आज ऑफिसला जावेसं वाटत नव्हत. पण नाईलाज होता. तिथे गेल्यावर मात्र शंतनु अगदी कामात गढून गेला. ह्या ऑफिसचा विस्तार होणार होता. परदेशी लोकांसाठी खास नवीन अद्ययावत सोयींनी युक्त असे हॉटेल उघडायचा त्याच्या पर्यटक कंपनीचा विचार होता. ह्या नवीन क्षेत्रात पाय ठेवताना नवीन रक्ताला वाव देण्यासाठी म्हणून शंतनुची निवड करण्यात आली होती आणि ह्यात चमक दाखवली तर त्याला भरभर पुढे जाण्याचा वाव होता. पहिल्याच दिवशी शंतनुला यायला रात्रीचे नऊ वाजले. तन्वीने आपला सगळा समजूतदारपणा एकत्र करून हसत हसत त्याचं स्वागत केलं. दमलाभागला शंतनु जेवल्यावर दहा मिनिटातच झोपी गेला. दिवसभर हिरव्यागार पर्वतराजीच्या दर्शनाने मूड खुललेल्या तन्वीला त्याच्याशी गप्पा मारण्याची फार इच्छा होती. ती तशीच मारून टाकून ती बिछान्यावर पहुडली. बराच वेळ तिचा डोळा लागत नव्हता. दुसरा दिवशी सकाळी शंतनुला लवकर निघायचं होतं. रात्री बोलायचं राहून गेलं होतं. तन्वीने सकाळी सातचा गजर लावला होता. त्याच्या तिला आवाजाने जाग आली तर शंतनु निघतच होता. आता मात्र तन्वीचा संयम सुटला. "रात्री मला सांगायचं ना? मी उठले असते लवकर!" ती रागानेच बोलली. शंतनुला आपली चूक कळली होती. "सॉरी तन्वी" असं बोलून तिच्याजवळ तो येणार तितक्यात त्याचा भ्रमणध्वनी वाजला. पलीकडे त्याचा बॉस होता. "हो हो आलोच" असं म्हणत शंतनू धावतच बाहेर पडला. खिडकीतून त्याला टाटा करणाऱ्या तन्वीकडे पाहायचं भानसुद्धा त्याला राहिलं नाही. शंतनुचा दिवस कामात अगदी बिझी होता. ह्या प्रोजेक्टला अर्थसहाय्य करणाऱ्या बँकेची अधिकारीमंडळी दुसऱ्या दिवशी येणार होती. त्यांना प्रेसेंटेशन द्यायचं होत. संध्याकाळी सात वाजत आले तरी ते काही मनासारखं बनत नव्हत. त्यात बरीच माहिती हव्या तशा स्वरुपात बसवायची होती. आणि बॉसचा होकार मिळत नव्हता. "यंग मॅन, आज रात्रभर बसून हे प्रेसेंटेशन आपण पूर्ण करूयात! उद्या आपल्याला बँकेकडून होकारच हवाय!" बॉसचे हे शब्द ऐकून शंतनु हादरलाच. निघताना आपण परत वळून पाहिले सुद्धा नाही हे त्यालाही दिवसा कधीतरी जाणविले होते. बराच वेळ तन्वीला फोन करायचा प्रयत्न त्याने केला होता. पण "तुम्ही प्रयत्न करीत असलेला भ्रमणध्वनी संपर्ककक्षेच्या बाहेर आहे" असा ध्वनिमुद्रित संदेश ऐकून त्याचा संयम सुटत चालला होता. इतक्यात त्याच्या डेस्कवरचा फोन वाजला. तन्वी समोर होती. स्वागतकक्षातून हा नंबर मिळविण्यासाठी तिला बरेच प्रयास करावे लागले होते. "शंतनु, घरी कधी येणार आहेस? आणि एक फोन सुद्धा केला नाहीस" तिच्या आवाजात राग जाणवत होताच. हिला आपण रात्री बहुदा येऊ शकणार नाही हे कोणत्या तोंडाने सांगावे हा गहन प्रश्न शंतनुला पडला होता. "सर, रात्री जेवणाला काय मागवायचं?" नेमका त्याच वेळी अगदी जवळ येऊन बोललेल्या ऑफिसबॉयचे हे शब्द तन्वीपर्यंत पोहोचलेच. "तन्वी…. " शंतनु तिला हे सांगणार तितक्यात समोरून एक हुंदका त्याला ऐकू आला. आणि फोन कट झाला होता. शंतनुचा पुन्हा मोबाईलवरून फोन लावायचा प्रयत्न अयशस्वी होत होता. "साहेब, ऑफिसातून रेंज मिळत नाही, तुम्हांला बाहेर जाऊन फोन करावा लागेल" ऑफिसबॉय पुन्हा वदला. "ह्याला आपण आधीच विचारायला हवे होते" शंतनुच्या मनात विचार येऊन गेला. त्याने ताबडतोब बाहेर जाऊन फोन लावला. "ठीक आहे, शंतनु! मी थांबेन एकटी रात्रभर आणि खाईन पावभाजी एकटी!" तन्वीच्या आवाजात दुखावलेपणा आणि राग एकाच वेळी जाणवत होता. "आणि हो आता परत फोन करू नकोस, मी झोपले वगैरे असेल तर!" असे म्हणून तन्वीने फोन ठेवला. शंतनु क्षणभर सुन्न होऊन बसला. पण पुन्हा एका झटक्यात उठला. जे झाले ते झाले पण आता साहेबाला खुश करून दाखवणारच असा पक्का निर्धार त्याने केला. तन्वीला एकटेपण खायला उठलं होतं. अजून केबल टीव्ही वगैरे चालू नव्हता. संध्याकाळी मोठ्या प्रयत्नाने केलेली पावभाजी खायची तिला फारशी इच्छा नव्हती. नाईलाज म्हणून तिने एका डिशमध्ये थोडी भाजी आणि एक पाव घेऊन आपलं जेवण आटपून घेतलं. वातावरणात बराच उकाडा होता. पाऊस केव्हाही चालू होईल अशी लक्षणं दिसत होती. तन्वी बराच वेळ एकटी खिडकीतून दिसणाऱ्या अंधाराकडे पाहत होती. ढगाळ वातावरणामुळे आकाशात एकटी चांदणी शोधायचा तिचा प्रयत्न निष्फळ ठरणार होता असा कयास तिने आधीच बांधला होता. केव्हातरी तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. "अरे बापरे, साडेदहा वाजले, झोपायला हवं" तिने मनाशीच विचार केला. "बिचारा शंतनु, दिवसभर त्याने काय खाल्लं असेल" ह्या विचाराने तिच्या मनात काळजी निर्माण झाली. तन्वी बराच वेळ बिछान्यावर तळमळत होती. पाऊस अजूनही सुरु न झाल्याने उकाडा यं जाणवत होता. डोक्यावर उशी घेवून जोरात पंखा सुरु करूनही काही उपयोग झाला नव्हता. आणि अचानक बाहेर पावसाच्या थेंबांचा आवाज सुरु झाला. त्या आवाजावर आणि त्याबरोबर आलेल्या आवाजाने तन्वीला हळूहळू झोप येऊ लागली. तन्वीला समोरचा डोंगर दिसत होता. ती त्या रस्त्यावरून पुढे पुढे जात होती. उंच डोंगरात काळ्या ढगांनी गर्दी केली होती. आणि तन्वी त्या ढगांच्या अगदी जवळ पोहोचली होती. त्या ढगांना स्पर्श केल्यानंतरचा ओलावा तिला खूप भावून गेला. तिची नजर अचानक खाली गेली. ती एका रथात बसून तिचा प्रवास सुरु होता. ह्या सर्व गोष्टींचं आश्चर्य करण्याचं तिने सोडून दिलं. रथ तसाच पुढे पुढे चालला होता. आता काळे ढग मागे पडून अगदी नयनरम्य परिसर सुरु झाला होता. हिरव्यागार मैदानातून प्रवास करताना तिला दूरवर एक सुंदर नगरी दिसत होती. त्यातील एका वैभवशाली वस्तूकडे तिची नजर पुन्हा पुन्हा जात होती. "बहुदा हा ह्या नगरीचा राजवाडा असावा" तिने कयास केला. अचानक तिच्या रथाची गती कमी झाली असे तिला जाणवलं म्हणून तिने समोर पाहिलं. शुभ्र अश्वावर बसून आलेल्या एका देखण्या युवकाने त्यांचा रस्ता अडविला होता. "आपण कोण आहात आणि ह्या नगरीत प्रवेश करण्याचं आपलं प्रयोजन काय?" तो शस्त्रधारी युवक तिला प्रश्न करता झाला. त्या प्रश्नाचं उत्तर तिला काही देता आलं नाही. "मला आपणास महाराजांपुढे हजर करावं लागेल" तो युवक बोलता झाला. तन्विपुढे काही पर्याय दिसत नव्हता. "आपलं नाव काय? तन्वीने प्रश्न केला. "नकुल" काहीशा आश्चर्यचकित झालेल्या त्या युवकाने उत्तर दिलं. सैनिकांच्या नजरांना तोंड देत तन्वी आणि नकुल ह्यांनी राजवाड्यात प्रवेश केला. राजवाड्यात थोडा गहन प्रश्न निर्माण झाला होता. सीमेवर असलेल्या सैनिकांच्या खर्चासाठी आणि प्रशासनीय व्यवस्थेसाठी द्रव्याचं विभाजन कसं करावं ह्यावर प्रधान, सेनापती आणि महाराज ह्यांच्यात खल सुरु होता. मुद्रांच्या वाटपावर घोडं अडलं होतं. "सोपं आहे, सद्याची संभाव्य युद्धस्थिती पाहता चौसष्ट हजार सुवर्ण मुद्रा प्रशासकीय कारभारासाठी आणि शहाण्णव हजार सुवर्ण सैनिकी खर्चासाठी!" न राहवून तन्वी बोलली. आणि बाकी कोणाला बोलण्याची संधी न देताना त्यामागील पृथ्थकरण विशद केलं. ह्या अनोळखी विदुषीच्या ह्या विद्वत्तापूर्ण विवेचनाने महाराज बेहद्द खुश झाले. नकुलाकडून ती सुरक्षेसाठी मोठा धोका नाही ह्याची खातरजमा करून घेत त्यांनी तन्वीला प्रश्न केला, "आमची खजिनदार होण्यास आपणास आवडेल काय?" तन्वीने नकळत होकार दिला. मग महाराजांनी नकुलास तिला तिच्या दालनात सोडण्याची आज्ञा केली. आपल्या दरबारातील विद्वत्तेने प्रभावित झालेल्या नकुलाची नजर तिला मनात खूप आवडली. दालन दाखवून परतणाऱ्या नकुलाने एकदा तरी मागं वळून पाहावं अशी तिची इच्छा पूर्ण होताच तिच्या चेहऱ्यावर लज्जापूर्ण स्मित आलं. तिने लाजूनच द्वार बंद केलं! शंतनु अगदी झपाटून गेला होता. त्याने अडीच वाजता बनवून आणलेलं प्रेसेंटेशन पाहून साहेब बेहद्द खुश झाले. हे असंच आपण उद्या सादर करायचं. "यंग मॅन! आता तू घरी जावून झोप घेऊ शकतोस! ग्रेट जॉब!" पडत्या फळाची ही आज्ञा मानत आणि जरासं जेवण घेऊन शंतनु घरी परतला. गाढ झोपी गेलेल्या तन्वीची मुद्रा पाहून एकाच वेळी त्याच्या मनात प्रेम, अपराधीपणाच्या भावना दाटून आल्या. तिथेच खुर्चीवर बसल्याबसल्या त्याला कधी झोप लागली हे त्यालाच कळलं नाही. सकाळी तन्वीचे डोळे उघडताच समोर बसलेल्या शंतनुला पाहुन तिला आश्चर्याचा धक्का बसला. रात्रीचा आपला त्याच्यावरील राग तिला आठवला. आणि अचानक नकुलही आठवला. नकुलच्या आठवणीने तिचा मूड बराच चांगला झाला. झटपट तिने ब्रश करून चहा बनविला आणि शंतनुला हळूच उठवीत ती म्हणाली "खूप दमला असशील नाही ? हा चहा घे! मी पटकन पोहे बनविते!" शंतनू आ वासून पाहताच राहिला! तन्वीने आणलेले पोहे नेहमीइतके किंबहुना त्याहून अधिकच चविष्ट होते. पण शंतनुचे त्याकडे लक्षच नव्हते. तिच्या शांतपणात काहीसा वेगळेपणा आहे असेच त्याला राहून राहून वाटत होते. खुशीत असल्यावर नेहमी त्याच्या अवतीभोवती घुटमळणारी तन्वी आज त्याला टाळत होती असाच भास त्याला होत होता. त्यावर तो तसाच बराच वेळ विचार करीत बसला असता पण पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. अपेक्षेनुसार बॉसच फोनवर होता. "अधिकारीमंडळी येतच असतील अर्ध्या तासात, शंतनु लवकर ऑफिसात पोहोचतोयस ना!" त्याचे हे शब्द ऐकून शंतनु ताडकन उठला. "येतो मी!" निघताना तो तन्वीला म्हणाला. "गुड लक" तन्वी पुढे येत म्हणाली. कुठे तरी काही तरी बदलल्यासारखे त्याला राहून राहून वाटत होते. शंतनु ऑफिसात निघाल्यावर तन्वीला हायसं वाटलं. तिला रात्रीच्या प्रकाराविषयी शांतपणे विचार करायचा होता. मनात एक छोटीशी खुशीची लहर जरी उमटून गेली असली तरी बेचैनीसुद्धा निर्माण झाली होती. नकुलचा देखणेपणा तिला राहून राहून मोहवीत होता. तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे तिने स्वतःला कामात झोकून द्यायचं ठरविलं. त्या छोट्याशा घराला तिनं झाडून पुसून काढलं. नवीन सामान आणल्यावर ते कुठं लावायचं ह्याचाही विचार करून पाहिला. एका कोपऱ्यात जुनी फिल्मी मासिकं पडली होती. त्यातील हृतिकचा फोटो पाहून ती पुन्हा सैरभैर झाली. इतक्यात तिचा फोन वाजला. "अग आमचं प्रपोजल बँकेने स्वीकारलं! त्यांना बऱ्याच शंका होत्या पण त्या सर्वांचं निरसन केलं. बॉस तर भन्नाट खुश झालाय माझ्यावर!" शंतनु झपाटल्यागत बोलत होता. "आज संध्याकाळी मी लवकर येतो, आपण बाहेर जेवायला जाऊयात!"इतकं बोलून त्यानं फोन ठेवला. तन्वीलाही बरं वाटलं. "ह्याचा इथं चांगला जम बसू दे, माझ्या इथे येण्याचं सार्थक होईल!" तिच्या मनात विचार येऊन गेला. रात्री बाहेर जायच्या बेतानं मात्र जादू केली होती. तन्वीने दुपारचं जेवण आटपून घेतलं. रात्रीची पावभाजी गरम करून खाताना रात्रीच्या निराशेचा विचार मात्र तिने मनाला शिवून दिला नाही. दुपारी झोपायचा विचार येताच तिच्या मनात का कोणास ठाऊक खळबळ निर्माण झाली. आपण झोपुयाच नको असे ठरवून तिने टीव्ही सुरु केला. कोणत्यातरी जुन्या सौंदर्यस्पर्धेचे पुनर्प्रक्षेपण सुरु होते. त्यातील त्या सौंदर्यवती ललना पाहून तिच्या मनात एक विचार आला आणि त्या खुशीत असताना कधीशी तिला डुलकी लागली हे तिचे तिलाच कळलं नाही. जागं झाल्यावर दुपारची झोप विशेष काही न घडता गेली ह्याचं तिला बरं वाटलं. मग मात्र ती नव्या उत्साहाने तयारीला लागली. शैम्पूने केस धुवून नवीन केशरचना केली. कोचीहून घेतलेली ठेवणीतील कांजीवरम साडीही काढली. बऱ्याच दिवसात आपण स्वतःकडे लक्षच दिलं नाही हे तिला जाणवलं. आणि लग्नाआधी आपल्या सौंदर्याची मनापासून स्तुती करणाऱ्या शंतनुने सुद्धा गेल्या काही दिवसात आपल्याला काही बोललं नाही ही खंत तिच्या मनाला स्पर्शून गेली. थोड्याच वेळात स्वतःला सावरून तिने आपली तयारी पूर्ण केली. शंतनु आला तो खुशीच्या घोड्यावर स्वार होऊनच! "आपण कसं त्या अधिकारी मंडळीच्या शंकाचे समाधान केले, बॉस मध्येच काही चुकीचं बोलणार होता आणि मी कसं त्याला सावरलं" ह्याचं वर्णन करण्यातच त्याचं पूर्ण लक्ष होतं. तन्वीने दिलेला चहा घेता घेता तो म्हणाला, "चल आता आपण निघूयात". त्याच्यासाठी सजलेल्या तन्वीने अजून रात्र बाकी आहे अशी समजूत करून घेतली. तरीही कांजीवरम त्याच्या नजरेत भरायलाच हवी होती हे मात्र तिला ठामपणे वाटलं. बॉसने शंतनुसाठी ड्रायव्हर सकट गाडी पाठवली होती. ड्रायव्हर तसा जाणकार होता. पाण्याने ओथंबून भरलेल्या काळ्या मेघांच्या अस्तित्वानं सायंकाळच्या वेळी खुलून उठणारं मुन्नारच्या हिरव्यागार वैभवाचे दर्शन देणारे काही बहुसंख्य लोकांना फारसे परिचित नसणारी ठिकाणही त्याला माहित होती. तिथे गेल्यावर मात्र शंतनूच्या डोक्यातील बॉस आणि पॉवरपॉइंटचे भूत निघाल. आणि एकदा ढगांचा जोरदार गडगडाट झाल्यावर त्यानं तन्वीला जवळही ओढून घेतलं, तेव्हा मात्र तिचे रोमरोम शहारून गेले. रात्रीच्या जेवणासाठी त्यांनी वरच्या भागातील पंचतारांकित हॉटेलात जाण्याचे ठरविलं. तेथील मेणबत्तीच्या प्रकाशातील जेवण तर तन्वीला स्वर्गसुखाची जाणीव करून गेलं. परतीच्या प्रवासात पावसाचं आगमन झालं. विजांच्या गडगडाटाने भयभीत झालेली तन्वी शंतनुला मागच्या सीटवर बिलगली. कारमध्ये तिने दिलेली गाण्यांची सीडी चालू होती आणि "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणे चालू होतं. शंतनुचे हे शृंगारिक रूप रात्री बराच वेळ टिकलं होत. केव्हा तरी दमून तो झोपी गेला. ह्याहून जीवनात तृप्तता म्हणजे अधिक काय असा विचार तन्वी करीत होती. अचानक कांजीवरम कडे तिचे लक्ष गेलं आणि ती अचानक बेचैन झाली. शंतनुने इतक्या वेळात एकदाही कांजीवरमचे सोडा तिच्या सौंदर्याचेही कौतुक केले नव्हते. कौतुक करून घ्यायची तिची इच्छा अतृप्त राहिली होती. एका अप्रतिम परिपूर्ण संध्याकाळला गालबोट लागून गेलं होतं. तन्वीला बऱ्याच वेळ झोप लागत नव्हती. नकुलच्या विचाराने हुरहूर तर जाणवत होतीच. मग केव्हातरी तिला झोप लागली. राजदरबार भरला होता. महाराज सर्वांकडून कारभाराची इत्यंभूत माहिती घेत होते. तन्वीची नजर मात्र नकुलला शोधत होती. इतक्यात "खजिनदार - राजकोशाची स्थिती कशी आहे?" महाराजांचे गंभीर स्वर तिच्या कानी पडले. काहीशा अपराधी मुद्रेने तिने झटपट आर्थिक स्थितीचे विवेचन सादर केलं. त्यानंतर तिला राजदरबाराच्या कारभारात रस राहिला नव्हता. तो केव्हाचा संपेल ह्याचीच ती वाट पाहत होती. एकदाचा राजदरबार संपला. नकुल कोठेच दिसला नव्हता. ती तशीच त्याच्या शोधार्थ घोड्यावर स्वार होऊन बाहेर पडली. काल नकुल जिथे भेटला होता तिथे ती पोहोचली. एका तलावाच्या काठी एकट्याच बसलेल्या पाठमोऱ्या नकुलला तिने झटकन ओळखलं. त्याचा मानेवर विसावणारा कुरळा केशसंभार तिला खूपच मोहक वाटून गेला. मोहित होऊन ती त्याचे ते रूप आपल्या नजरेत साठवायचा प्रयत्न करीत असताना नकुलला तिची चाहूल लागली. मागे वळून त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या मुद्रेवर स्मितहास्य आलं. पण त्याच्या नजरेतील दुःखी भाव मात्र तन्वीने बरोबर टिपले. बराच काळ दोघंही काही बोलली नाहीत. "आपण इतका काळ कुठं होतात ?" नकुलने विचारलं. तन्वीला ह्या प्रश्नाचा उलगडा झाला नाही. आकाशात मावळतीच्या सूर्याची तांबडी प्रभा पसरली होती. तिने तन्वीचे रूप अधिकच खुलून दिसत होते. "आज आपले सौंदर्य आणि आपली वेशभूषा खूपच खुलून दिसत आहेत!" नकुल म्हणाला आणि मग शांतपणे उठून तो आपल्या निवासस्थानाकडे चालू लागला. आपल्या वेषभूषेकडे लक्ष गेल्यावर तन्वी दचकलीच. कांजीवरम खरोखरच त्या संधीप्रकाशात खुलून दिसत होती" आपल्या रूपाच्या कौतुकाने तन्वी अगदी बहरून गेली होती. शंतनुला मध्येच जाग आली होती. घोटभर पाणी पिऊन झोपी जाणार तितक्यात त्याची नजर तन्वीच्या चेहऱ्याकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर अधीरपणा दिसत होता. त्याला आश्चर्य वाटलं पण असेल असेच काही असे म्हणून तो पुन्हा झोपी गेला. पण पुन्हा एकदा त्याच्या मनात तोच विचार आला. मग त्याने पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तन्वी अगदी लज्जेने खूष झाली होती. शंतनू आता मात्र चकित झाला होता. तो बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिला. आता मात्र तन्वी अगदी समाधानाने गाढ झोपी गेली होती. अगदी आकाशीचा चंद्र मागण्याचा हट्ट धरलेल्या बालकाच्या हाती खरोखर तो चंद्र हाती लागल्यावर त्याला जितकं समाधान होईल तितकं तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. शंतनुची झोप मात्र पूर्ण उडाली होती! पुन्हा एक अबोल सकाळ! मुन्नारला आल्यावर अबोला सुद्धा मल्याळी भाषेत असतो कि काय असा भास राहून राहून शंतनुला होत होता. झोपेतील तन्वीच्या चेहऱ्यावरील ती प्रसन्न मुद्रा त्याच्या नजरेसमोरून जात नव्हती. परंतु हा विषय काढायचा कसा हेच त्याला समजत नव्हते. ती झोपेत होती, त्यावेळी नक्की काय चाललं होतं ते तिला विचारून सुद्धा आठवलं नाही म्हणजे? त्याचं एक मन त्याला सांगत होतं. नास्ता स्वादिष्ट होताच पण शंतनुचे लक्ष होते कुठे त्याच्याकडे? "तन्वी, कशी आहेस?" चहाचा कप टीपॉय वर ठेवून तसंच परत जाणाऱ्या तन्वीचा हात पकडून त्याने विचारलं. "काय झालं तुला शंतनू?, मी मजेत आहे!" ह्या वेळेला मात्र चेहऱ्यावर चांगलं हसू आणणं तन्वीला जमलं. "रात्री झोपेत अगदी प्रसन्न दिसत होतीस!" शंतनुच्या ह्या उद्गारावर मात्र तन्वी दचकली. "हो, का! असेल, हे वातावरण ना मला अगदी आवडतेय! मस्त थंडावा आणि धुळीचा लवलेशसुद्धा नाही!" कशीतरी तिने वेळ मारून नेली. शंतनुने मग जास्त ताणून धरलं नाही. उगाचच आपण संशय घेतोय अशी समजूत करून घेऊन तो ऑफिसात निघाला. आता बरंच काम होतं. शंतनुच्या बोलण्याने तन्वी मनापासून हादरली होती. स्वप्नातील हे विश्व बाहेरच्या दुनियेत म्हणजे शंतनुपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती तर! कोण आहे हा नकुल? माझ्या भावना ओळखतो, मला ऑफिसात कर्तबगारी दाखवायची इच्छा होती ती त्याने राजदरबारात पूर्ण केली, माझ्या सौंदर्याचे शंतनुने कौतुक करावं ही अपूर्ण इच्छा त्याने एका छोट्या भेटीतील मोजक्या वाक्यात पूर्ण केली. माझा उतरलेला मूड त्याने गेल्या दोन रात्री बराच चांगला केला. अगदी तो माझाच भाग बनत चालला आहे. पण मग तो कालच्या भेटीत काहीसा उदास का वाटत होता बरं? एकटाच जाऊन तलावाच्या काठी बसला होता. माझ्यावर चिडला असेल का बरं? पण मी काय केलं त्याला राग येण्यासारखं? तन्वीचे विचारचक्र भरधाव चाललं होतं. आणि मग तिला शंतनुबरोबरची घालवलेली संध्याकाळ आठवली. ती सुद्धा त्या वातावरणात नाही म्हणायला फुलून निघाली होती. "नकुलला त्यामुळे तर राग आला नाही?" ह्या विचाराने मात्र ती अजून चिंताग्रस्त झाली. ऊतू जाणाऱ्या दुधाच्या आवाजाने तिचे हे विचारचक्र भंगले. एकदा स्वयंपाकघरात गेल्यावर मात्र तिला बरीच कामे दिसली आणि नकुलचा विचार काहीसा खंडित झाला. आंघोळ वगैरे आटोपल्यावर तन्वी शांतपणे पेपर घेऊन बसली होती. दररोज पडणाऱ्या पावसानं हवेत थंडावा आला होता. उघड्या खिडकीतून थंड वाऱ्याची झुळूक येताच एक मस्त झोप काढावी अशी इच्छा तिच्या मनात आली. आणि ती बिछान्यावर पहुडली. झोप लागतच होती आणि पुन्हा एकदा ते डोंगर आणि घनदाट काळे मेघ दिसू लागले. इतक्यात दाराच्या वाजलेल्या बेलने तन्वी अचानक जागी झाली. शेजारणीने मोलकरणीला कामासाठी विचारायला पाठवलं होतं. तन्वीला भानावर यायला वेळ लागला. मोलकरणीचा महिन्याचा पगार सुवर्णमुद्रेच्या रुपात द्यावा कि काय ह्या विचारावर हसावं की रडावं हे तिला कळेना! मोलकरीणीशी बोलताना भाषेचा अडथळा येत होता. शेवटी मोलकरीण "Five Thousand" असे ठसक्यात म्हणाली. तेव्हा "मी साहेबांशी बोलून सांगते" असे इंग्लिश मध्ये सांगून तन्वीने तिला परत पाठविलं. आता तन्वी अगदी बेचैन झाली. अगदी दिवसाच्या डुलकीमध्ये सुद्धा नकुल यायला लागला तर? आपल्यावर इतका हक्क का बजावायला बघतोय तो? संध्याकाळी शंतनु आला की त्याला हे सर्व सांगून टाकावं अशा निष्कर्षापर्यंत ती येऊन पोहोचली! सायंकाळी निसर्गाने वेगळंच रूप धारण केलं होतं. सोसाट्याचा वारा सुटला होता. निसर्गाच्या ह्या रौद्र रूपाने बिचारे वृक्षवल्ली भयभीत झाले होते. वारा जसं नाचवेल तसं नाचण्याव्यतिरिक्त त्यांना पर्यायच नव्हता. तन्वी सुद्धा काहीशी भयभीत झाली होती. ह्या अनोळखी प्रदेशात अशा वातावरणात एकट राहायची तिला जशी भिती वाटत होती त्याचप्रमाणे तिचं मन शंतनुच्या काळजीनेही व्याकुळ झालं होतं. हा बिचारा ह्या वातावरणात कसा येईल? काळ्या मेघांनी व्यापलेल्या आकाशामुळे नेहमीपेक्षा लवकरच अंधार झाला होता. तन्वी अचानक भानावर आली. तिने देवघरात जाऊन दिवा लावला. आणि पुन्हा खिडकीत येऊन बसली. दुरूनच तिला एक तरुण रेनकोट घालून जोरात पळत येताना दिसला. आपल्या विचारातच मग्न असलेली तन्वी त्याच्या पळण्याकडे पाहत होती. तो तरुण तिच्याच घराकडे जेव्हा आला तेव्हा ती अचानक दचकली. जरा निरखून पाहिल्यावर मात्र तिला कळलं "अरे हा तर शंतनु आहे!" लगबगीने ती दाराकडे गेली. शंतनु अगदी ओलाचिंब होऊन तिच्यासमोर होता. तन्वीला त्याचं ओलाचिंब रूप खूप भावलं, क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. "अग पाहत काय बसली? लवकर माझी बॅग घे आणि मला एक कोरडा टॉवेल आणून दे"! शंतनुच्या ह्या ओरडण्याने तन्वी भानावर आली. मग मात्र तन्वीने शंतनुची चांगलीच काळजी घेतली. बाथरूममध्ये लगेच गरम पाणी चालू केले. त्याची काही कागदपत्रे प्लास्टिकच्या बॅगेतून सुद्धा थोडीशी भिजली होती. ती तिने सुकवायला घेतली. नशिबाने त्यात काही महत्वाचे कागदपत्र नव्हते. शंतनु आंघोळ करून परत येईपर्यंत गरमागरम चहा आणि त्याचे आवडते नुडल्स तयार होते. वाफाळते नुडल्स पाहून शंतनुने तशीच तिथे धाव घेतली. "थांब, शंतनु, केस जरा नीट पुसू दे, मला!" तन्वी काहीशी किंचाळलीच! शंतनुला तिची चिंताग्रस्त मुद्रा आवडून गेली. नुडल्सची प्लेट हातात घेत त्याने तिला केस पुसून दिले. त्याला तिचा स्पर्श हवाहवासा वाटत होता. केस बऱ्यापैकी सुकले हे जाणवल्यावर तन्वीच्या डोक्यात अजून एक किडा वळवळला. "एक मिनिटं" असे म्हणून तिने शंतनुकडून आपली सुटका करून घेतली. खरोखर एका मिनिटात परत आलेल्या तन्वीला पाहून खुशीत आलेल्या शंतनूची ख़ुशी क्षणभरच टिकली. त्याच्या छातीला लावल्या गेलेल्या बामच्या उग्र वासाने "तन्वी" असे जोरात ओरडून त्याने तिला दूर लोटलं. नुडल्सची प्लेट बाजूला सारून त्याने एका हातानं बामचे नामोनिशाण मिटविण्याचा प्रयत्न केला. आपलं हे रूप तन्वी कौतुकाने पाहतेय हे पाहून मात्र त्याचा राग बराच निवळला. मध्येच केव्हातरी वीजपुरवठा खंडित झाला. मेणबत्तीच्या प्रकाशात खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या सोबतीने तन्वी आणि शंतनु एक अविस्मरणीय जेवण घेत होते. हे वातावरण एखाद्या पंचतारांकित हॉटेलच्या वातावरणाच्या तोडीचे आहे आणि तन्वीने केलेली कांदा भजी तिथल्या कोणत्याही स्टार्टरला लाजवेल असेच शंतनुला राहून राहून वाटत होते. रात्र बहरत होती. तन्वी अगदी खुशीत आली होती. दिवसाच्या भितीचा कोठेच मागमूस नव्हता. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करून शंतनु झोपी गेला. "बिचारा दमला असेल", आपल्या ह्या विचाराने तन्वी स्वतःशीच खुदकन हसली. "लबाड कुठली" असा विचार तिच्या मनात आला. "जीवनात ही घडी अशीच राहू दे" हे गाणं मनातल्या मनात गुणगुणताना असाच कधीतरी तिचा डोळा लागला. तिथलं वातावरण अगदी भीतीदायक होतं. अक्राळविक्राळ राक्षससदृश्य सैनिकांनी तन्वीला घेरलं होतं. तन्वी त्यांच्या कचाट्यातून सुटण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु ह्यांच्या तावडीतून सुटणं कठीण आहे हे लक्षात येऊन ती हताश होऊन खाली बसली. तिची नजर पलीकडे गेली. सर्वत्र असाच गोंधळ चालू होता. राजाचे काही सैनिक ह्या आक्रमणाला तोंड द्यायचा प्रयत्न करीत होते. परंतु एकंदरीत परीस्थिती कठीण दिसत होती. अचानक तिची नजर एका शूर योद्ध्याकडे गेली. त्याने शत्रूसैनिकांचा बिमोड करायला लावला होता. तन्वीने तशाही परिस्थितीत त्याला ओळखले. "नकुल" तिने त्याला हाक मारली. नकुलने तिच्याकडे वळून पाहिलेसुद्धा, एक क्षणभर थांबला देखील तो! पण मग मात्र तो तसाच पुढे गेला, शत्रूच्या घोळक्यात अडकलेल्या एका सरदाराची सुटका करायला! "नकुल, मला वाचव, नकुल!" तन्वी जोरात ओरडली. तन्वीच्या ह्या हाकेने शंतनु खडबडून जागा झाला. "तन्वी, काय झालं? ठीक आहेस ना? आणि हा नकुल कोण?" शंतनु विचारत होता. तन्वी आता भानावर आली होती. "हा नकुल कोण" हे शंतनुचे शेवटचे शब्द तिच्या कानी पडले. इतके दिवसाचं हे रहस्य आता उघड करणं भाग होतं. "मला एक ग्लास पाणी आणशील, शंतनु!" तन्वीची ही विनंती शंतनुने मान्य केली. ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन तन्वीने ग्लास बाजूला ठेवला. एक क्षणभर उसंत घेतली. पुढे बराच वेळ तन्वी शंतनुला तिच्या आयुष्यातील हा विश्वास न बसण्याजोगी कहाणी शंतनुला सांगत होती. शंतनु हादरला होता. शंतनुच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याचा तन्वी आटोकाट प्रयत्न करीत होती. आपल्या मनात नकुलविषयी निर्माण झालेली भावना मात्र न सांगण्याची दक्षता तिने घेतली होती. परंतु तिच्या चेहऱ्यावरील अपराधीपणाचा भाव आणि त्या दिवशी तिचे झोपेतील लाजणे ह्या सर्वांची संगती लावण्याचा शंतनुचा प्रयत्न चालू होता. अशीच केव्हातरी तन्वीची कहाणी आताच्या स्वप्नापर्यंत येऊन थांबली. आणि तिने शंतनुच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याचा इतका गंभीर चेहरा तिने कधीच पाहिला नव्हता. बराच वेळ दोघेही शांत होते. "शंतनु, काहीतरी बोल ना!" ती न राहवून बोलली. "ही प्रतारणा आहे" शंतनुचे हे शब्द उकळत्या तेलाप्रमाणे तिच्या कानात शिरले! आपला राग एका शब्दात व्यक्त करून शंतनु झोपी गेला किंबहुना त्यानं झोपी गेल्याचं नाटक केलं. इथे तन्वी मात्र विमग्न परिस्थितीत तशीच बसून होती. ह्या सर्व प्रकारात आपला दोष काय हेच तिला कळत नव्हतं. एका क्षणी मात्र तिने अबलेची भूमिका घेण्याचं नाकारलं. शंतनुला गदगदा हलवून ती म्हणाली, "ह्यात कोणती प्रतारणा, शंतनु? माझ्या स्वप्नात जे काही येतं, त्यावर माझं नियंत्रण असतं का? आणि ह्याचा मला देखील त्रास होतोच आहे ना? तू ऑफिसात असताना मी एकटी कसे दिवस काढत असते ते माझं मला ठाऊक!" शंतनुला काही प्रमाणात त्याची चूक कळून चुकली होती. पण तो बराच दुखावला गेला होता. "उगाच का हिच्या मनात असे विचार येतात" त्याच्या मनात संशयाची पाल चुकचुकत होती. मध्येच एकदा तिची समजूत काढण्याची त्याला इच्छा झाली. पण त्याच्या अहंकाराने त्याला रोखले. सकाळी पाचच्या सुमारास त्याला जरी झोप लागली तरी तन्वी मात्र तशीच जागी होती. नकुलचा तिला अतिशय राग आला होता आणि भीतीही वाटू लागली होती. त्याने तिची झोप उडवून टाकली होती. खरतरं प्रेमात झोप उडवून टाकणं हा किती रोमांकित क्षण! पण इथले संदर्भ फार वेगळे होते. एका क्षणाच्या कल्पनेच्या दुनियेतील सुखाने किंबहुना सुखाच्या भासाने तिचं प्रत्यक्षातील सुंदर घरकुल पणाला लागलं होतं. नकुलच्या तिच्या आयुष्यातील आगमनाच्या प्रयोजनाचा थांगपत्ता तिला लागला नव्हता आणि लागण्याची शक्यताही नव्हती. तो जसा अगेला अचानक तिच्या आयुष्यात आला तसा केव्हाही निघून जाण्याची शक्यताच जास्त होती. त्याने निर्माण केलेलं विश्व कितीही सुखदायक असलं तरी त्या विश्वाच्या शाश्वतेची खात्री नव्हती. ह्यातून बाहेर पडण्याचीच तिला आता तीव्र इच्छा होऊ लागली होती. पण ह्यातून बाहेर पडण्यासाठी तिला तिच्या शंतनुची गरज होती. आणि तो शंतनुच ह्या क्षणी दुखावला होता. सकाळचा गार वारा तन्वीच्या अंगाला सुखावत होता. मन मात्र दुखावलेलच होतं. तिच्या मनानं आता काहीस समजुतदारपणाचं वळण घेतलं होतं. "शंतनुचं सुद्धा फारस काही चुकलं नाही म्हणायचं! त्याला अजूनही मी खूप हवीहवीशी वाटतेय, त्याच्या मनात माझ्याविषयी स्वामित्वाची भावना आहे आणि म्हणून तो इतका चिडला!" ह्या विचारचक्राने तन्वीला काहीसं बरं वाटलं. ह्या बरेपणाच्या भावनेत तिला एक डुलकी लागली. तन्वीला जाग आली तेव्हा शंतनु घरात नव्हता. एकंदरीत लक्षणावरून तो ऑफिसात गेल्याचीच चिन्हं दिसत होती. तन्वीने त्याच्या ऑफिसातील क्रमांकावर फोन लावला. "पोहोचलास का?" शंतनुला एका शब्दात उत्तर द्यायची संधी देणारा प्रश्न तन्वीने केला. "हुं" अशा एका हुंकारात शंतनुने उत्तर देऊन फोन ठेवला. चहाचा कप घेऊन तन्वी शांतपणे बसली होती. परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती केव्हातरी काहीशी परिचित होणार होती. नकुल कोण आहे, तो नेहमी आपल्या स्वप्नात का येतो ह्याचं उत्तर तिच्याकडे नव्हतं आणि कधी मिळेल ह्याची खात्रीही नव्हती. पण त्याचं स्वप्नातील वागणं कधीतरी एका विशिष्ट प्रकाराकडे झुकणार होतं. आणि मग एकदा का त्याच्या वागण्याचा उलगडा झाला की मग तन्वी त्याच्याशी मुकाबला करणार होती. विचारांच्या ह्या शृंखलेने तन्वीला बरंच बरं वाटू लागलं होतं. पण मग एक विचार तिच्या मनात आला. आपण प्रत्यक्ष जीवनातील तन्वीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवू शकतो पण त्या दुनियेतील तन्वीच्या वागण्याचा काय भरवसा? स्वप्नातील दुनियेतील भावना ह्या तन्वीला कळतात, पण इथला खंबीरपणा त्या तन्वीपर्यंत कसा पोहोचवायचा? ती नकुलच्या आकर्षणात अशीच वाहवत गेली तर? ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र तन्वीकडे नव्हते. "गेली तर तर गेली ती तन्वी त्या नकुलच्या आकर्षणात वाहवत!" तन्वी स्वतःशीच पुटपुटली. शंतनुने जर ह्या दुनियेतील तन्वीला पूर्ण साथ दिली तर मग त्या तन्वीचे आणि नकुलचे काही का होईना! पहिल्यांदाच तन्वीने दोन्ही तन्वीच्या मतलबाची वेगवेगळी विभागणी केली होती. आणि हो तिथल्या आठवणी मला सुखावतात! वाटली शंतनुला ही प्रतारणा तर वाटू देत! ह्या विचाराने मात्र तन्वी थोडी घाबरून गेली. पण काहीसा बिनधास्तपणाच आपल्याला ह्या परिस्थितीतून बाहेर काढू शकतो हे तिने जाणले. जवळच्या हॉटेलचे मेनू कार्ड घेऊन बदललेली तन्वी मल्याळम भाषेत मसालाडोसा कसा ऑर्डर करायचा ह्याचा विचार करू लागली! शरीराने शंतनु ऑफिसात असला तरी त्याचं मन मात्र भरकटत होतं. हा सर्व प्रकार मुन्नारला आल्यापासून सुरु झाला म्हणजे इथलाच कोणता तरी घटक ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असणार असाच त्याचा समज झाला होता. तन्वीच्या पूर्वायुष्यातील कोणती तरी घटना ह्या सगळ्या प्रकाराला कारणीभूत असली तर? असा विचारही त्याच्या मनात डोकावला होता. पण असं असतं तर तन्वीने हे आपणास केव्हाच सांगितलं असतं इतका मात्र त्याचा तिच्यावरचा विश्वास शाबूत होता. इथे नोकरीचा जम तर चांगलाच बसत चालला होता आणि भविष्यही उज्ज्वल दिसत होतं. पण तन्वी आणि तिची मानसिक स्थितीसुद्धा महत्त्वाची होती. ह्या सगळ्या प्रकाराने तिचे मनःस्वास्थ्य बिघडलं तर? मग आपली कितीही प्रगती झाली तर काय उपयोगाची? शंतनुचे हे भरकटत चाललेले विचारचक्र त्याच्या साहेबांच्या येण्यानं थांबलं. "काय शंतनु इतका वेळ असाच बसून राहिला आहेस?" साहेब विचारात होते. एका क्षणी त्यांना हा सारा प्रकार सांगावा असेही त्याच्या मनाने घेतलं. पण हा सगळा प्रकार तिसऱ्या कोणाला सांगण्याआधी तन्वीला विश्वासात घेणं आवश्यक होतं. त्यामुळे शंतनुने तो विचार प्रयत्नपूर्वक मागे लोटला. "नाही हो साहेब, इथल्या ह्या पावसाळी हवेने माझं डोकं धरलंय?" तो म्हणाला. त्याच्या ह्या स्पष्टीकरणावर बॉसचा अजिबात विश्वास बसला नसला तरी त्याला आपल्याशी ही गोष्ट सध्या शेयर करायची नाहीय हे बॉसने ताडलं. बॉस व्यावहारिक होता. सध्यातरी शंतनु कामाच्या बाबतीत जोरात होता. त्याचे असे काही ताणग्रस्त क्षण पेलायची त्याची तयारी होती. शंतनु संध्याकाळी थोडासा लवकरच घरी आला. तन्वीने दुपारी जागल्यापणीच एक दोन डुलक्या काढल्या होत्या. सकाळी ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी विचारपूर्वक ठरविलेल्या मार्गाची तिने दिवसा एक दोनदा उजळणी केली होती. घरात मल्याळी अबोला पुन्हा एकदा साथीला होता पण भावना मात्र मराठीच होत्या. आणि डोळ्यात सतत डोकावू पाहणाऱ्या अश्रूंची भाषा तर जगभर सारखीच असते. चहाचे कप घेऊन तन्वी दिवाणखान्यात आली. एक कप शंतनुसमोर टीपॉयवर ठेवून आपला कप घेऊन ती खिडकीपाशी आली. आज ढगाळ हवा होती. वातावरणात उकाडाही होता. शंतनुविषयी तन्वीची एक तशी जुनीच तक्रार होती. भांडण झालं की दूर करण्यासाठी तो केव्हा पूर्ण पुढाकार घेत नसे. "आज मला तुझी फार गरज आहे, शंतनु!" चहाचा घोट घेता घेता तन्वी मनात विनवणी करीत होती. आणि इतक्यात शंतनुच्या दोन्ही हातांची अलगद पकड तिच्या कमरेभोवती पडली. अगदी नाजूक मनःस्थितीत असणाऱ्या तन्वीच्या मनाचे सर्व बांध त्या क्षणी मोडून पडले. बराच वेळ मग ती शंतनुच्या मिठीत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देत होती. "शंतनु, मला कसंही करून ह्या सर्व प्रकारातून बाहेर पडायचं आहे रे, आणि त्यासाठी मला तुझी मदत हवीय! एकदा त्या दुनियेत माझा प्रवेश झाला की तिथल्या माझ्या वागण्यावर माझे अजिबात नियंत्रण नसतं. इतकंच काय तर तिथल्या कालावधीत माझ्या मनातील भावनाही मला पूर्णपणे आठवत नाहीत." शंतनु तिच्याशी पूर्ण सहमत होता. "तन्वी, खरतरं तू झोपली असताना जागं राहून मला तुझ्यावर लक्ष ठेवायला हवं, पण मी पडलो मुलखाचा झोपाळू!जर मला जागं राहता आलं असतं तर ज्या वेळी तो नकुल तुझ्या स्वप्नात येतो ते मी तुझ्या हावभावांवरून मी ओळखलं असतं!" "आणि मग तू काय केलं असतं रे शंतनु?" तन्वीचा हा प्रश्न शंतनुला फारसा आवडला नाही कारण त्या प्रश्नाचे उत्तर त्याच्याजवळ नव्हते. "बाकी तन्वी, तुला एक प्रयत्न करून पाहायला हवा. त्या स्वप्नात तुला तुझे हे विश्व आठवता यायला हवं! तुझ्या ह्या विश्वातील चांगल्या गोष्टी (स्वतःकडे मिश्किल नजरेने पाहत) तुला त्याच्याशी लढल जाणारं हे मनोयुद्ध जिंकायला मदत करेल!" आपल्या मनातील सकाळचेच विचार काही प्रमाणात शंतनुच्या तोंडून ऐकून तन्वीला खूप बरं वाटलं. आणि त्याचा तो मिश्किलपणा, तो जर ह्याने परत प्राप्त केला असेल तर मला खूप बरं वाटेल शंतनु! सुखावलेली तन्वी विचार करीत होती. रात्रीचे जेवण शांतपणे पार पडले. तणावपूर्ण दिवसानंतर मनोमिलन झाल्याने एक प्रकारची मनःशांती दोघेही अनुभवत होते. फरक इतकाच होता ऑफिसातील कामाने दमलाभागला एक जीव शंतनु होता आणि कितीही झालं तरी ऑफिसातील विचार अधूनमधून त्याच्या मनातील तन्वीबद्दलच्या विचारांशी त्याच्या मनाचा ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत होते. तन्वीलाही हे अपेक्षितच होते. काही वेळातच शंतनु झोपी गेला. तन्वी त्या तीन भेटीतील आठवणाऱ्या वातावरणाची उजळणी करण्याचा प्रयत्न करीत होती. मंद मेणबत्तीचा प्रकाश मिणमिणत होता. आजचं वातावरण अगदी वेगळं होतं. नेहमीचा राजदरबार, महाराज ह्याचं विश्व गायब झालं होतं. तिथं आता एक रम्य संध्याकाळ होती. सुर्य अस्ताला निघाला होता. एका छोट्या टेकडीवर तन्वी बसली होती. समोर दूरवर एक सुंदर नगर दिसत होते. आणि हो हे नगर पुराणकाळातील नव्हतं. आधुनिकतेच्या काही खुणाही तिथे दिसत होत्या. त्या तांबड्या आकाशात बगळ्यांची एक रांग आकाशात दूरवर कोठेतरी जात होती. ह्या बगळ्यांचं कसं बरं असतं असा एक विचार तिच्या मनात येऊन गेला. आपण इथे एकटेच काय करतो आहोत ह्याचा एव्हाना तन्वी अचंबा करू लागली होती. इतक्यात दूरवरून येणाऱ्या एका मोटारीच्या आवाजाने तिचे लक्ष वेधलं गेलं. ती कार तर एकदम मस्त होती. आणि चालविणाऱ्याचे सारथ्यकौशल्य वाखाणण्याजोगं होतं. टेकडीवरील थोडीफार वळणं झपाट्याने पार करीत तो कारला घेऊन तन्वीजवळ येऊन पोहोचला देखील. ती कार होंडा सिटी होती. आणि त्यातून अगदी आधुनिक वेशातील एक देखणा तरुण तिच्यासमोर उतरला. क्षणभर ती त्याच्याकडे पाहताच राहिली. आणि मग अचानक तिच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे हा तर नकुल! नकुलने अगदी आधुनिक कपडे परिधान केले होते. हातात चकाकते घड्याळ होतं. अरे हे तर टायटनचे घड्याळ! अगदी शंतनु घालतो तसं! शंतनु! कोण हा शंतनु? तन्वीच्या मेंदूला झिणझिण्या आल्या. शंतनु म्हटल्यावर अगदी ओळखीचं वाटत होतं. पण नक्की कोण हे आठवत नव्हतं. "ओळखलं, मला?" नकुल विचारत होता. "आपण कोण?" आपल्याच दोन रूपांमधील तर्कसंगती लावण्याच्या प्रयत्नात असलेली तन्वी त्याचवेळी नकुलच्या ह्या दुसऱ्या रूपाचे प्रयोजन काय ह्याचा विचार करीत होती. "अरे हो, आपण नकुल नाही का?" तन्वी म्हणाली. त्याचवेळी तिचं लक्ष स्वतःकडे गेलं. तिचाही ड्रेस अगदी आधुनिक होता. टी शर्ट आणि जीन्स! "अरे अशीच जीन्स शंतनुने आपल्याला घेऊन दिली होती" आता शंतनु तिचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. "लवकर ओळखलं म्हणायचं," नकुल हसतच म्हणाला. त्याच्या हास्यात तन्वीला काहीसा खलनायकपणा दिसला. "आपण फिरायला जाऊयात?" नकुल विचारत होता. शंतनुला असं विचारायची कधीच गरज पडली नव्हती. "अरे, हा कोण शंतनु, हा सारखा सारखा माझा पिच्छा का पुरवतोय?" तन्वी काहीशी त्रस्त झाली होती. नकुलचे बारीक लक्ष तिच्याकडे होते. "तिथे शहरात आभूषणांच मस्त प्रदर्शन भरलं आहे?" एव्हाना तन्वी पुरती त्रस्त झाली होती. "हो, येते मी" असं म्हणत ती उठली. तो रस्ता ओळखीचा वाटत होता. "अरे हा तर कोल्हापुरातील रस्त्यासारखाच वाटतोय!" मनातल्या मनात तन्वी म्हणाली. आता हळूहळू तर्कसंगती लागत होती. नकुलने गाडी पार्क केली. हे प्रदर्शन अगदी अप्रतिम होतं. एकाहून एक अतिसुंदर दागिन्यांची तिथे रांग लागली होती. पण नकुल कोणत्याही ठिकाणी तिला जास्त वेळ थांबू देत नव्हता. एका ठिकाणी तन्वीला एक मोत्यांची माळ खूप आवडली. "मला ही माळ हवीय!" ती म्हणाली. आता मात्र नकुलचा संयम सुटला. "नाही, आपल्याला हिऱ्यांच्या विभागात जायचं आहे" जवळजवळ रागावतच तो म्हणाला. तन्वी घाबरली. "शंतनु असा कधी रागवायचा नाही." नकुलच्या मागे तन्वी भीतीनेच चालली होती. शेवटी एकदाचे ते हिऱ्यांच्या विभागात पोहोचले. बहुदा काय विकत घ्यायचं आहे हे नकुलला माहित असावं. तो थेट तिथपर्यंत पोहोचला. तिथे एक अतिशय मौल्यवान हिर्याने जडवलेली अंगठी होती. ती त्याने उचलली. तन्वीच्या समोर ती अंगठी आणून नकुल म्हणाला, "तन्वी, तू माझ्याशी लग्न करशील?" आता हा अगदी शेवटचा बिंदू होता. शंतनूने कसं तिला हळुवारपणे मागणी घातली होती. आणि त्या क्षणी तिला सर्व काही आठवलं. कोल्हापूर, मुन्नार, शंतनु आणि सकाळचा निर्धार, अगदी सारं काही सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ! "नकुल मला माझ्या शंतनुकडे जाऊ देत!" विनवणी करीत ती म्हणाली. "शेवटी माझा अंदाज खरा ठरला तर!" काहीसा त्रस्त होऊन नकुल म्हणाला. "तन्वी, मी तुला अगदी सुखात ठेवीन! माझ्या विश्वात तुझ्या साऱ्या काही इच्छा पुऱ्या होतील! मी तुला दुःखाचा लवलेशही लागू देणार नाही!" तन्वी अगदी काळजीपूर्वक नकुलकडे पाहत होती. त्याची नजर तिने ओळखली होती. ह्याचं हे बोलणं आपण ऐकल नाही तर दुसऱ्या मार्गाचा तो वापर करणार अशी तिला चिन्ह दिसत होती. एकंदरीत प्रकरण हुशारीनं हाताळायचं तिने ठरविलं. "अरे इतकी घाई कशाला? आताच तर आपण एकमेकाला ओळखू लागलो आहोत. आणि मला ह्या विश्वाशी जरा सरावू तर दे!" तन्वी जरा वेळ काढायला पाहत होती आणि त्याचवेळी नकुलच्या चेहऱ्यावरील हावभाव निरखत होती. आता ह्या क्षणी तन्वीला दोन विश्वाच्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव झाली होती. आणि आपले डावपेच खेळायला ती पूर्ण तयार होती. "पण नकुल, मला कायमचं ह्या दुनियेत कायमचं राहता येईल का? प्रत्येक वेळी मला शंतनुच्या विश्वात जावं तर लागेलच ना?" नकुलला हा प्रश्न काहीसा अनपेक्षित होता. क्षणभर थांबून तो उत्तरला, "तुला शरीराने कायमच शंतनुच्या विश्वात राहावं लागेल. फक्त एक घडू शकत. तू मनानं कायमची ह्या विश्वात राहू शकतेस. जागेपणी आणि झोपेतसुद्धा!" "मग माझ्या शंतनुच्या दुनियेतील वागण्यावर त्याचा परिणाम नाही होणार का?" "हो अर्थातच होईल! तू त्या दुनियेत वावरताना सुद्धा माझ्या दुनियेतील संदर्भ घेऊनच वावरशील!" "म्हणजे मी त्या दुनियेच्या हिशोबाने वेडी समजली जाईल तर!" तन्वी म्हणाली. "अगं शहाणपणा आणि वेडेपणा ह्या सर्व सापेक्ष गोष्टी आहेत! शंतनुच्या दुनियेतील शहाणपणाच वागणं दुसरे कोणते संदर्भ लावले तर वेडेपणाचच होईल की!" आपला बुद्धिभ्रम करण्याचा नकुलचा प्रयत्न तन्वी चांगलाच ओळखली होती. "चल, ते सर्व राहू दे! बाहेर हवा कशी मस्त पडली आहे! आपण फिरून येवूयात की!" तन्वी म्हणाली. "तो पहा, तिथे कसा उंच पहाड दिसतोय, आणि आता चंद्र तर उगवतच असेल!" "पण तिथवर पोहोचायला वेळ लागेल की" नकुल कुरकुरला! "नकुल, तू ठरवलं तर एका क्षणात आपण तिथं पोहोचू शकू, मी ओळखून आहे!" तन्वीच्या ह्या वाक्यावर नकुल चमकला. "म्हणजे हिला सर्व काही समजलं आहे की!" दुसऱ्या क्षणी ते दोघे त्या उंच पहाडावर होते. सूर्य मावळला असला तरी त्याची तांबडी प्रभा आकाशात रेंगाळत होती. हवेत मस्त थंडावा होता. पूर्वेला अपेक्षेनुसार चंद्राचे आगमन झाले होते. बाजूला खोलवर दरी होती. त्या दरीकडे पाहताना तन्वीच्या मनात एक नाही दोन विचार चमकून गेले. आता तन्वी परिस्थितीच्या पूर्ण नियंत्रणात होती. तिनं मागे वळून पाहिलं. एक आलिशान प्रासाद तिथं उभा होता. नकुलचा हात तिने हळूच हातात घेतला. तिचं मन वेगाने धावत होते. तिच्यापुढे एक संधी होती. प्रणयाराधन करण्यात नकुलचा हात धरणारं कोणी नव्हतं. तो तिला प्रणयातील उत्कटता दाखवू शकला असता. अगदी शेवटापर्यंत हा क्षण तिने आयुष्यभर लक्षात ठेवला असता आणि हे कोणालाच कधी कळलं नसतं. आणि ह्यातून कधी आणि कसं बाहेर पडायचं ही ती ठरवू शकणार होती. .............. काही वेळानं तन्वीने नकुलला एक सुंदर फुल दाखवलं. "नकुल, मला ते फुल हवंय!" नकुल एकदम खुशीत होता. तो तत्काळ ते फुल आणण्यासाठी पुढे सरसावला. तिथल्या निसरड्या वाटेकडे त्याचं दुर्लक्ष झालं. आणि अचानक त्याच्या नजरेसमोर खोल दरी दिसली. खोल दरीत पडत असताना तो कायम तन्वीच्या डोळ्यात पाहत होता. "तू मला फ़सविलस" हेच भाव त्याच्या डोळ्यात होते. सकाळ प्रसन्न होती. तन्वी अगदी मजेत होती. शंतनुने तिची ही ख़ुशी पाहून हा विषय काढायचं टाळल. पुढे बरेच दिवस असच चाललं. तन्वी अगदी नेहमीसारखी झाली होती. अगदी कोल्हापुरासारखी! दोन आठवड्यांनी न राहवून शंतनुने हा विषय काढला. तन्वी हसतहसत म्हणाली, "नकुल केव्हाच इतिहासजमा झालाय, शंतनु!" त्याला बिलगताना "नकुल केवळ आभासी दुनियेत भेटला म्हणून बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं, हा विचार तिच्या डोक्यात आलाच!"
सुमेर ग्रह - एक अदभूत जग
प्रस्तावना ह्या कथेचा कालावधी, ठिकाण अज्ञात आहे. ही गोष्ट पृथ्वीवरील नाहीय. अंतराळातील कोण्या एका ग्रहावर अज्ञात कालावधीत मनुष्य सदृश्य प्राण्यांची वसाहत आहे. हा कालावधी भूतकाळातील आहे की भविष्यातील हे मलाही ठावूक नाही. मराठी भाषेतील कथा म्हणून पात्रांची नावे मराठी पण ती अर्थपूर्ण असतील किंवा नसतील आणि ते बोलतातही मराठी. कथा पूर्ण करीन ह्याची शास्वती नाहीय. कथेत सुसंगती लागेल ह्याची खात्री नाहीय. आपली काही मुलभूत गृहीतक असतात जसे निळे आकाश, पारदर्शक पाणी. ह्यातील काही इथे कधीतरी बरोबर असतील तर कधी नाही. कथेचा प्रत्येक भाग कसाही आणि कोठेही संपेल. भाग १ सुमेर ग्रहावरील एका वसाहतीत सामक एका वृक्षाखाली पहुडला होता. एका अतिउंच पर्वत राजीच्या शिखरावरील भव्य पठारावर सामकाची वसाहत होती. नेहमीप्रमाणे बदलणाऱ्या आकाशाच्या रंगाकडे सामक निर्विकार पणे पाहत होता. पठाराची व्याप्ती फार मोठी होती. दहा हजारच्या आसपास गणकांची इथे वस्ती होती. पठार संपताच पर्वत राजीचा खोल उतार होता. पर्वत राजीचा हा उतार घनदाट जंगलाने व्यापलेला होता. ह्या पठाराच्या पलीकडील भागांविषयी गणकांचे ज्ञान मर्यादित होते. गणकांची स्मृती सुद्धा बदलती असायची. काहींना मागच्या काही दिवसांच्या आठवणी लक्षात असायच्या तर काहींना मागच्या काही जन्माच्या! सुमेर ग्रहाला दोन सूर्य होते. एक एकदम वक्तशीर होता चाळीस तासाच्या दिवसापैकी २४ तास आकाशात असायचा दुसरा मात्र आपल्या मर्जीनुसार आकाशात यायचा. काही कालावधीनंतर सामक आपल्या वस्तीकडे परतला. गणकांचा एक मोठा समूह नृत्यात गुंतला होता. दुसरा एक समूह संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीत गुंतला होता. दुसर्या सूर्याच्या बेभरवशाच्या कारभारामुळे रात्रीची खात्री नसायची. सामक वृक्षाखाली बसला असता त्याच्या मेंदूत अनेक विचार यायचे. हे विचार कसे येतात कोठून येतात हे सामकला अजिबात कळायचे नाही. मेंदूत विचार येण्याची प्रक्रिया सुरु झाली की कृती करण्याची सामकची क्षमता संपून जायची. सामक अगदी निष्क्रिय बनून जायचा. हे विचार किती वेळ चालू राहणार हे त्याला कळायचे नाही आणि अचानक हे विचार संपून जायचे. मग सामक कृतीशील व्हायचा. कृतीशील झाल्यावर इतका वेळ आपण निष्क्रिय होतो आणि आपल्या डोक्यात कोणते विचार आले होते ह्याविषयी सामक पूर्णपणे अनभिज्ञ असायचा. त्याविषयी खंत करायचा विचार देखील त्याच्या डोक्यात यायचा नाही. वस्तीत परतल्यावर सामक नृत्याच्या समूहात सामील झाला. एका सुंदर लयीत त्या समूहाचे नृत्य सुरु होते. अचानक एक विशिष्ट प्रकारचे मंद संगीत सुरु झाले. विविध क्रियेत गुंतलेल्या गणकांच्या हालचाली मंदावत गेल्या. थोड्याच वेळात सर्व गणक अगदी स्तब्ध झाले. मग एक विशिष्ट वायूचा झोत आला. प्रत्येक गणकाच्या जवळ जावून त्याचे / तिचे जलद परीक्षण करण्यात आले. प्रगतावस्थेतील मोजक्या गणकांना उचलून हा वायुचा झोत नाहीसा झाला. थोड्याच वेळात उर्वरित गणक जागृतावस्थेत आले. आपल्यातील गायब झालेल्या गणकांविषयी अनभिज्ञ असलेले बाकीचे गणक पुन्हा आपल्या क्रियांमध्ये मग्न झाले. पर्वतराजीच्या घनदाट जंगलात विविध वृक्षांची गर्दी होती. पर्वतराजी संपली की विस्तृत सपाट प्रदेश सुरु व्हायचा. हजारो मैले पसरलेला हा सपाट प्रदेश संपला की एक महाकाय समुद्र सुरु होत असे. ह्या समुद्राच्या खोल तळाशी वेताळवस्ती होती. ही एक प्रगातावस्थेतील जमात होती. अशा ह्या वस्तीत एक आधुनिक प्रयोगशाळा होती. ह्या प्रयोगशाळेत कसले प्रयोग सुरु असतात ह्याचे फार थोड्या वेताळांना ज्ञान होते. फक्त ठराविक कालावधीनंतर तेथून नवनवीन बुद्धिमान वेताळ बाहेर येतात हे सर्वांना माहित होते. नृत्यात सहभागी झालेला सामक काहीसा बेचैन होवू लागला होता. नृत्याच्या समोरील गटातील निलोतम्मा ही ज्यावेळी त्याच्या समोर यायची त्यावेळी त्याची ही स्थिती होत असे. ती नजरेआड होताच मात्र तो सामान्य बनत असे. हळूहळू सामान्य सूर्य क्षितिजाआड गेला. अंधार होवू लागला. गणक जेवणाच्या तयारीला लागले. जोरात आलेली ही जेवणाची तयारी लहरी सूर्याच्या अचानक आगमनाने उधळली गेली. वेताळांच्या प्रयोगशाळेतील कच हा अतिबुद्धिमान म्हणून गणला जायचा. गणकांवरील सततच्या सारख्या प्रयोगामुळे तो काहीसा कंटाळला होता. ह्या प्रयोगात वैविध्य आणण्याची त्याची इच्छा त्याने बर्याच काळ दाबून ठेवली होती. परंतु हल्ली त्याला ही इच्छा दाबून ठेवणे कठीण जावू लागले होते. लहरी सूर्याचे गणकांच्या क्षितिजावरील आगमन भौमिक खुश होवून पाहत होता. गणकातील प्रगतावस्थेतील एककांना शोधून काढण्यात हा लहरी सूर्य मोलाची कामगिरी बजावत असे. प्रयोगशाळेचा प्रमुख म्हणून ह्या लहरी सूर्याच्या संरचनेत भौमिकने मोलाची कामगिरी बजाविली होती. ह्या लहरी सूर्याच्या क्षितिजावरील आगमनाची वारंवारता आणि प्रत्येक भेटीचा कालावधी ह्याचे एक क्लिष्ट समीकरण त्याने मांडले होते. अचानक त्याला काहीतरी शंका आली. आजच्या भेटीचा कालावधी जरा जास्तच लांबला असे त्याला वाटले. परंतु आपला हा भास असेल असे मानून घेवून त्याने पुढील कामात दंग होणे पसंद केले. असाच काही कालावधी गेला. सामक हल्ली थोडा बेचैन होवू लागला होता. वृक्षाखाली बसल्यावरचे डोक्यात आलेले विचार हल्ली जागृतावस्थेत सुद्धा त्याला साथ देत होते. सामक म्हणजे कोण असा प्रश्न जेव्हा त्याला प्रथम पडला तेव्हा तो गोंधळून गेला. निलोतम्माचा चेहरा त्याच्या मनात ती नजरेआड झाल्यावर सुद्धा राहत होता. दिवस असेच पुढे चालले होते. बरेच दिवस आकाशाने आपला लाल रंग कायम ठेवला होता. सामक सोडून बाकीचे गणक ह्याने बेचैन व्हायच्या पलीकडचे होते. असेच एकदा दुपारच्या सामुहिक कार्यक्रमाच्या वेळी मंद संगीताने आपला प्रवेश केला. हळूहळू सर्व गणक निद्रितावस्थेत जाऊ लागले. प्रयोगशाळेत सर्व गणकांच्या स्थितीचे अवलोकन करणारा निरीक्षक सामकाच्या स्थितीवर हैराण झाला. मंद संगीताचा कालावधी संपत आला तरी सामक पूर्णपणे जागृतावस्थेत होता. त्याने वेगाने कचाच्या कक्षाकडे धाव घेतली. वायुझोताचे आगमन थांबविणे अत्यंत गरजेचे होते. कच आपल्या कक्षात नाही हे पाहून मग त्याने भौमिकाकडे धाव घेतली. परंतु तोवर उशीर झाला होता. वायुने गणकांच्या समूहात प्रवेश केला होता. सामक आश्चर्यचकित होऊन सारे पाहत होता. अदृश्य वायूने आतापर्यंत दोन गणकांना गायब केले होते. सामकाच्या मनात तेथून पळण्याची इच्छा निर्माण झाली. परंतु तोवर अदृश्य वायू त्याच्या पर्यंत येऊन पोहोचला होता. एका जागृत गणकाला सामोरे जाण्याची संरचना अदृश्य वायूच्या आज्ञावलीत नव्हती. त्यामुळे अदृश्य वायू तिथे गडबडला. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक ह्यांना तसेच सोडून अदृश्य वायू तेथून निघाला. अत्यंत क्रुद्ध होऊन भौमिक हे सारे पाहत होता. जागृत सामक आणि निद्रीतावस्थेतील बाकी सर्व गणक अशी स्थिती दीर्घकाळ ठेवणे हितकारक नव्हते. त्यामुळे सर्व गणकांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. आपण जे काही पाहिले त्याने सामक जबरदस्त बेचैन झाला होता. आणि इथे भौमिक कचाच्या शोधार्थ निघाला होता. सामाकने जे पाहिले त्याने तो एकदम हबकून गेला होता. त्यात स्वत्वाची त्याची जाणीव आता अधिकाधिक तीव्र होऊ लागली होती. परंतु भावनाहीन गणकांबरोबर दिवस काढणे त्याला आता कठीण होऊ लागले होते. निलोतम्माविषयीचे त्याचे आकर्षण आता तीव्र होऊ लागले होते. इथे कच मात्र गायब झाला होता. त्याच्या शोधार्थ भौमिकने जंग जंग पछाडले होते. कचाने प्रथम समुद्राचा पृष्ठभाग गाठण्यात यश मिळविले आणि मग तेथून त्याने पर्वतराजीच्या जंगलात आश्रय घेतला होता. १-२ दिवस त्याचा सामकाशी संपर्क तुटला होता. परंतु त्यानंतर मात्र त्याने सामकच्या मेंदूवर पूर्ण ताबा मिळविला. सामकच्या मेंदूवर प्रयोगशाळेचा ताबा तुटला हे पाहून भौमिक प्रथम भयानक संतापला परंतु कचापर्यंत पोहचण्याचा हा एकमेव मार्ग आहे हे ओळखून त्याने थोडे सबुरीने घ्यायचे ठरविले. इथे कचाने मात्र आपला प्रयोग पुढे नेण्याचा निश्चय केला होता. सामक आता पूर्णपणे निलोतम्माच्या प्रेमात पडला होता. भावनाहीन निलोतम्माकडून काही प्रतिसाद मिळत नसतानादेखील त्याला तिच्या नजरेत दुनियेतील सर्व सुख मिळाल्याचा भास होवू लागला. गणकनृत्यातील लयबद्ध संगीतावर नाच करणारा तिचा कमनीय बांधा दिवसरात्र त्याच्या डोळ्यासमोर राहू लागला. निलोतम्माचे लक्ष वेधून घेण्यासाठी सामकाने जंग जंग पछाडले. निलोतम्मा समोर येताच त्याच्या हृदयाचे वेगाने उडणारे ठोके प्रयोगशाळेतील निरीक्षकांचे लक्ष वारंवार वेधून घेवू लागले. पण ही भावना नक्की काय आहे हे सामकला समजून देणारे तिथे कोणी नव्हते. न होते कोणी मित्र ना होती प्रेमगीते. अशा ह्या अज्ञानी प्रियकराच्या समोर होती एक हृदयशून्य प्रेयसी.ही प्रेमकथा पुरी करायला मदत करू शकणारा एकमेव होता तो कच जो आपल्या भागातून हद्दपार झाला होता. भौमिकने कचाचा माग घेण्यासाठी पाठविलेले वेताळ समुद्राच्या पृष्ठभागापर्यंत जावून परतले होते. त्यापलीकडच्या वातावरणात तग धरण्याची जिद्द त्यांच्यात नव्हती. त्यामुळे भौमिक दुसर्या योजनेच्या मागे लागला होता. इथे पर्वतराजीत टिकाव धरणे कचाला सुद्धा कठीण जाऊ लागले होते. प्रथमच त्याच्या डोक्यात वेताळ आणि गणक ह्याच्या पलीकडील विश्वाचे विचार डोकावू लागले. पर्वत राजीतून रात्रीच्या वेळी दिसणारे गूढ आकाश त्याला आता खुणावू लागले होते. कचाने गणकांवर होणाऱ्या प्रयोगांच्या वारंवारतेवर नियंत्रण प्रस्थापित केले होते, आकाशाचा बदलता रंगही थांबविला होता. परंतु गणकांच्या मनाचे खेळ थांबविल्यावर आपल्या मनातील आकाशाच्या कुतूहलाला थांबविण्यात मात्र तो अयशस्वी ठरला होता. भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता. इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता. कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची. सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच! भौमिक आणि कच ह्यांच्यामधील संघर्षाने एक औत्सुक्यपूर्ण वळण घेतले होते. कच हा पूर्णपणे स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हता. त्याच्या व्यक्तिमत्वाचा अत्यल्प भाग प्रयोगशाळेतील आज्ञावलीद्वारे नियंत्रित केला जायचा. परंतु आज्ञावलीच्या ह्या भागात बदल घडविणे सोपे काम नव्हते. ह्या भागात असा बदल घडविणे आवश्यक होते जेणेकरून फक्त कचचीच विचार करण्याची क्षमता संपुष्टात आली असती. परंतु आज्ञावलीचा तो भाग फार किचकट होता. त्यात थोडीसुद्धा चूक झाल्यास बहुसंख्य वेताळदेखील आपली स्वतंत्र विचार पद्धती गमावून बसणार होते. त्यामुळे भौमिक प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचलत होता. इथे कच सुद्धा शांत बसला नव्हता. ह्या आज्ञावलीत प्रयोगशाळेबाहेरून शिरकाव करून त्यात हवे तसे बदल घडवून आणण्याचे त्याने ह्यापूर्वी बरेच प्रयत्न केले होते. सध्याही तो अशाच प्रयत्नात गुंतला होता. कचने सामकच्या मेंदूवर तर पूर्ण कब्जा मिळविला होता. पर्वतराजीत बसून कच शांतपणे सामकच्या मेंदूतील प्रतिमांचे विश्लेषण करीत होता. अचानक निलोतम्माची प्रतिमा कचच्या समोर आणि कच एकदम स्तब्ध झाला. आपणच बनविलेली प्रतिमा इतकी सुंदर असू शकते ह्यावर त्याचा विश्वास बसेना. कच बराच वेळ तसाच बसून होता. त्याच्या मेंदूत विचारांचे थैमान माजले होते. विचार होते ते निलोतम्माचे! निर्माताच आपल्या कलाकृतीच्या प्रेमात पडला होता. कचच्या मेंदूची सारासार विचार करण्याची क्षमता साहजिकपणे कमी झाली होती. आता आज्ञावलीच्या क्लिष्ट भागाच्या विश्लेषणावर वेळ घालवायचा सोडून तो अधिकाधिक वेळ सामकच्या मेंदूवर घालवू लागला. त्याचे हेतू होते दोन, एक तर निलोतम्माविषयी जमेल तितकी माहिती गोळा करायची आणि आपणच सामकाच्या मनात रुजुवलेली निलोतम्माविषयीची प्रेमभावना नष्ट करायची. सह्याद्रीतील पर्वतराजीतील भव्य प्रयोगशाळेत बसून मिहिर मानवाने अंतराळात पाठविलेल्या विविध उपग्रहांद्वारे आलेल्या प्रतिमांचे निरीक्षण करीत होता. हे सर्व विश्लेषण संगणकाद्वारे नियंत्रित होत असल्याने फक्त जिथे गरज पडेल तिथेच मिहिरला लक्ष द्यावे लागत असे. शुक्रवार संध्याकाळ असल्याने मिहिर आपल्या साप्ताहिक सुट्टीचे बेत आखत होता. अचानक संगणक एका उपग्रहाद्वारे आलेल्या प्रतिमेला अधोरेखित करू लागला. त्या प्रतिमेत संगणकाला काहीतरी वेगळे दिसले होते. मिहिर बाकी सर्व सोडून तत्काळ त्या प्रतिमेचे काळजीपूर्वक निरीक्षण करू लागला. नक्कीच एका सजीवांच्या वस्तीसारखी ही प्रतिमा होती. आणि अजून बारकाईने पाहताच तिथे सजीवांच्या हालचालीही मिहिरला दिसल्या. मिहिरने तत्काळ आपले बॉस बोस ह्यांना बोलाविले. एका नजरेतच बोस ह्यांनी ह्या घटनेचे महत्व ओळखले. लगेचच त्या प्रयोगशाळेत आणीबाणी लागू करण्यात आली. मिहिरला आणि स्वतःला बोस ह्यांनी एका कुपीत बंद केले. नासाशी त्वरित संपर्क साधण्यात आला. मनुष्यजातीच्या इतिहासातील हा अत्युच्य प्रतीक्षेचा क्षण आज अचानक उगविला होता. बर्याच विचारविनिमयानंतर ही बातमी गुप्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गुप्ते हे आपले आडनाव आज सार्थक झाल्याचा विनोदी विचार मिहीरच्या मनात त्याही परिस्थितीत आलाच! नासा आणि भारतीय शास्त्रज्ञांनी मिळून उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचे सखोल परीक्षण चालविले होते. हा उपग्रह तसा त्याच्या मूळ मार्गाहून भरकटलेला होता. आता मिहिर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मिळून त्याच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले होते. उपग्रहातील बिघडलेली थेट प्रक्षेपणाची सुविधाही आता कार्यान्वित करण्यात आली होती. मिहिर आता पूर्णपणे ह्या उपक्रमात गुंतला होता. त्या ग्रहावरील सजीवांच्या हालचालीत त्याला एक विशिष्ट वारंवारता दिसत होती. आणि हा संशय त्याने आपल्या सहकाऱ्यांना बोलून दाखविला सुद्धा. परंतु त्याचे म्हणणे कोणी खास मनावर घेतले नाही. अपवाद फक्त बोस ह्यांचा. नासामध्ये ३० वर्षे काम करून भारतात परतलेल्या बोस ह्यांनी आपले वजन वापरून एक भारतातील आणि एक युरोपातील असे दोन महासंगणक ह्या प्रतिमांच्या विश्लेषणासाठी उपलब्ध करून दिले. गणकांच्या हालचालीचे विश्लेषण करायला हे महासंगणक मिळाल्यावर मात्र मिहिर आणि सहकाऱ्यांनी मागे वळून बघितले सुद्धा नाही. मिहिरने तर विदिशाचे, आपल्या भावी पत्नीचे फोनसुद्धा दुर्लक्षित करायला सुरुवात केली. त्याचे गंभीर परिणाम तो जाणून होता. मिहिर आणि त्याच्या सहकार्यांच्या प्रयत्नाला आणि महासंगणकाच्या अफाट माहिती विश्लेषण करायच्या क्षमतेला एकदाचे यश मिळाले. गणकांची ही संपूर्ण वसाहत बाहेरून नियंत्रित केली गेलेली वसाहत आहे हे एका आठवड्यातच सिद्ध झाले. आता हे नियंत्रण करतंय कोण ह्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. पठाराच्या आजूबाजूच्या भागातून येणारे संदेश उपग्रहाने पकडलेच आणि त्यावर महासंगणकाने हा संदेश अजून एका दुसऱ्या प्रकारच्या सजीवाकडून येत असल्याचा निर्वाळा दिला. दुनिया विसरलेल्या मिहिरने गणकातील एका वेगळ्या आज्ञावलीने नियंत्रित होणार्या सजीवाचा म्हणजेच आपल्या सामकाचा शोध लावला. आता ह्या सजीवांना नियंत्रित करणारे बहुतांशी संदेश दूरवरच्या द्रव पदार्थाच्या बऱ्याच खोलवरच्या भागातून येत होते आणि काही संदेश जवळच्या पर्वतराजीतून येत होते. बुद्धिमान मिहिरने अजून दोन तीन दिवसात सामक, निलोतम्मा, कच आणि भौमिक ह्या सर्व पात्रांचा शोध लावला आणि आज्ञावलीतील त्यांना नियंत्रित करणाऱ्या भागाचाही! ह्यापुढील धोरण कसे आखायचे ह्यावर बोस आणि नासातील वरिष्ठ अधिकाऱ्याची गोपनीय बैठक सुरु होती. मिहीरच्या जीवनात मोठे वादळ निर्माण झाले होते. विदिशाने त्याला आपण दुसऱ्या मार्गाने जात असल्याचा निरोप फोनवर सोडला होता. अंतराळातील वसाहतीने मिहिरला वेडे केले असले तरी विदिशाशिवाय आपण जगू शकत नाही हे त्याला पक्के माहित होते. पण ती तर आता दुसऱ्या मार्गाने चालली होती. मिहिरला मोठा प्रश्न पडला. पण तो काही काळच! त्याच्या डोक्यात एक विचार आला आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले. सामक आणि निलोतम्माच्या स्वभावाची व्याख्या जिथे लिहिली गेली होती त्या आज्ञावलीच्या भागात तो शिरला. स्वतःला जितका समजला आहे तितक्या प्रमाणात आपला स्वभाव सामाकाच्या स्वभावावर आणि विदिशाचा स्वभाव निलोतम्माच्या स्वभावावर त्याने लिहून टाकला. आपली प्रेमकहाणी अंतराळात पहिली तपासून पाहून मग पृथ्वीवर उतरवायचा त्याचा विचार फारच आगळावेगळा होता! भौमिक आणि कच पूर्णपणे गोंधळून गेले होते आज्ञावली आता पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणापलीकडे गेली होती. कोण्या अज्ञात व्यक्तीने त्यावर नियंत्रण मिळविले होते आणि कच आणि भौमिक ह्यांचा ह्या आज्ञावलीतील प्रवेश बंद करून टाकला होता. इथे नासा आणि बोस ह्यांची बैठक जोरात चालू होती. ह्या दोन्ही मनुष्य सदृश्य जीवसमूहांचे पुढे काय करायचे ह्याविषयी ह्या बैठकीत एकमत होत नव्हते. बहुसंख्य लोकांचे मत होते की त्यांना सद्यपरिस्थितीप्रमाणे राहू द्यावे. परंतु ही बातमी आतापर्यंत बाहेरील बड्या कंपन्याच्या वरच्या वर्तुळात पोहोचली होती. त्यातील पर्यंटन आणि वैद्यकीय कंपन्यांना ह्या ग्रहाविषयी आणि इथल्या सजीवाविषयी व्यावसायिक आकर्षण होते. त्यामुळे त्यांनी ह्या बैठकीत उपस्थित असलेल्या काही लोकांना आपल्या बाजूने वळवून घेतले होते. ही फितूर मंडळी मानवाने ह्या ग्रहावर आधिपत्य गाजवावे ह्या विचाराचा पुरस्कार करीत होती. मिहिर मात्र आपल्या प्रयोगात अधिकाधिक अचूकता आणण्याच्या मागे लागला होता. निलोतम्माचा स्वभाव आपल्याला समजलेल्या विदिशाच्या स्वभावाप्रमाणे त्याने बनविला खरा पण खरी मेख त्यातच होती. विदिशाचा स्वभाव त्याला पूर्णपणे त्याला कळला थोडाच होता आणि आजूबाजूच्या घटकांचे काय? त्यामुळे त्याने अजून एक धाडशी निर्णय घेतला आणि ह्या दोन पात्रांव्यतिरिक्त अजून काही पात्रे आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचे त्याने ठरविले. पर्वतराजीत बसलेल्या कचने आनंदाने एक उडी मारली. अथक प्रयत्नानंतर त्याला पुन्हा आज्ञावलीत प्रवेश करता आला होता. आपल्या आज्ञावलीचे पूर्ण बदलेले रूप पाहून तो थक्क झाला. वेताळांचे नियंत्रण करणारा आज्ञावलीचा भाग कच आणि भौमिक ह्यांच्या पलीकडचा होता. तिथे प्रवेश केल्यास वेताळ आपले स्वत्व गमावून बसेल अशी व्यवस्था करण्यात आली होती. हा भाग नियंत्रित करतो तरी कोण असा प्रश्न एकदा वैतागून कचाने भौमिकला केला होता. वेताळापेक्षा वेगळी अशी अतिवयस्क व्यक्ती जी प्रयोगशाळेच्या आतल्या कक्षात बसून असते ती भाग नियंत्रित करते अशी वदंता होती. परंतु ह्या वयस्क व्यक्तीला सद्य वेताळापैकी कोणी पाहिले नव्हते. बोस आणि नासा ह्यांच्या बैठकीत नेमका तोच मुद्दा चर्चिला जात होता. ह्या वसाहतीचा कर्ता करविता कोण. सह्याद्रीतील वैज्ञानिकांचे लक्ष राहून राहून दोनशे वर्षांपूर्वी अंतराळात गायब झालेल्या यानाकडे जात होते. त्यात निरंजन नावाचा अतिबुद्धिमान वैज्ञानिक अंतराळात गायब झाला होता. पुढे एक दोन वर्षे हे यान चर्चेत राहिले पण नंतर सर्वजण त्याला विसरून गेले होते. आता अचानक त्या यानाचा संभाव्य मार्ग तपासून पाहिला जावू लागला. निरंजन आपल्या दीर्घ निद्रावस्थेतून हळूहळू जागा झाला. आज्ञावलीमध्ये कुण्या आगंतुक व्यक्तीचा प्रवेश झाल्यास आपली निद्रा भंग होईल ह्याची त्याने तजवीज करूनच ठेवली होती. आपला महा महासंगणक सुरु करताच त्याला एकंदरीत सर्व परिस्थितीचा उलगडा होण्यास फारसा काही वेळ लागला नाही. आपली मनुष्यजात आपल्यापर्यंत येऊन पोहोचली ह्याचा त्याला सखेद आनंद झाला. सखेद ह्यासाठी की ही भेट काही शांत असणार नाही हे ते जाणून होता. निरंजनचे मन आपसूकच २०० वर्षांपूर्वीच्या घटनांकडे गेले. अंतराळातील निघालेल्या ह्या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटताच निरंजन एकदम कावराबावरा झाला होता. आता हे यान कोठे जाईल, आपण असेच अंतराळात भरकटून आपला अभागी अंत होणार अशा नको नको त्या विचारांनी त्याच्या मनात थैमान घातले. असेच काही दिवस गेले. यानातील इंधनाचा साठा आता संपण्याच्या मार्गावर होता. परंतु आता निरंजन ह्या सर्व गोष्टींची चिंता करण्याच्या पलीकडे गेला होता. त्याच्या मनावर एका निरंतन शांततेने कब्जा केला होता. हळूहळू निरंजन एका दीर्घ निद्रेत गेला होता. निरंजनची निद्रा ज्यावेळी भंग झाली त्यावेळी एका वेगळ्याच ठिकाणी असल्याचे त्याला आढळून आले. हे स्थळ समुद्राच्या खोल तळाशी होते. तिथे निरंजन सोडून कोणीच नव्हते आणि निरंजनच्या खाण्यापिण्याच्या गरजा अत्यंत मामुली स्वरूपाच्या राहिल्या होत्या. आपला मेंदू अत्यंत प्रगतावस्थेत गेला आहे हे काही दिवसातच निरंजनला जाणवले. कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा विचार मनात आल्यास त्या विषयाची इत्यंभूत माहिती मेंदू आपल्यासमोर सादर करतो हे निरंजनला कळून चुकले होते. संगणकावरील खेळाची निरंजनला फार आवड होती. असाच काही खेळ आपण निर्माण करावा असा विचार त्याच्या मनात आला. पण संगणक होता कोठे? असा विचार मनात येताच अत्याधुनिक संगणक निर्माण करण्याच्या सर्व सूचना मेंदूने त्याच्या समोर सादर केल्या अगदी त्याला लागणाऱ्या साधनसामुग्रीसकट. हे सर्व अतर्क्य घडत आहे हे निरंजनला समजत होते परंतु असे का घडत आहे हे हयची त्याला आता चिंता करावीशी वाटत नव्हती. एकंदरीत मनुष्यजातीने आतापर्यंत मिळविलेले सर्व ज्ञान आपल्या डोक्यात शिरले आहे असा एकंदरीत त्याचा ग्रह होऊ लागला होता. संगणकावरील खेळात नेहमी प्राथमिक Basic, Intermediate आणि Advanced अशा तीन पातळ्या असायच्या. आपल्या खेळात सुद्धा अशा पातळ्या बनवाव्यात असा निग्रह निरंजनने केला. पण खेळ कसला? निरंजनला हल्ली काहीसे एकटे वाटू लागले होते. आपल्या अवतीभोवती सजीव असावेत अशी इच्छा त्याच्या मनात रुजू लागली होती. असा विचार यायची खोटी, गणकांची संपूर्ण संरचना त्याच्यासमोर सादर झाली होती. मग निर्माण झाले होते वेताळ - म्हणजेच intermediate level. ह्या सर्व गडबडीत निरंजनला थोडासा थकवा आला होता. आणि त्यामुळे त्याने ही निद्रा घेतली होती. आता त्याच्या मनात अतिप्रगत पातळीचा शोध चालू झाला होता. अरे वेड्या अतिप्रगत पातळी तर स्वतःहून तुझ्यापुढे चालून आली आहे, त्याच्या मनाने त्याला सांगितले. प्रथमच निरंजनच्या मनात थोडी खळबळ माजली होती. ह्या सर्वाचा कर्ता करविता कोण ह्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे असे प्रथमच त्याला वाटू लागले. निरंजन आता एकदम थबकून गेला होता. आपल्या मेंदूतील विचारप्रक्रियेवर कोणीतरी नियंत्रण करू पाहत आहे हे त्याला पूर्णपणे जाणवत होते. त्या शक्तीशी करण्याचा त्याचे अंतर्मन आटोकाट प्रयत्न करीत होते. परंतु सध्यातरी त्याचा मेंदू त्या शक्तीने ताब्यात घेतला होता. आता निरंजन-१ कार्यान्वित झाला होता. निरंजन-१ ने पृथ्वीवरील सर्व अत्याधुनिक यंत्रणांचा ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु केला. सर्वप्रथम फटका बसला तो दूरसंवेदन उपग्रह सेवेला. ती ठप्प करण्यात आली. त्यानंतर इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली. मिहिर, बोस आणि नासाचे सर्व तंत्रज्ञ थक्क होवून हा खेळ पाहत होते. आतापर्यंत अशा घटना केवळ हॉलीवूडच्या सिनेमात पाहण्याचीच सर्वांना सवय होती. निरंजन-१ च्या मेंदूत लक्षावधी प्रतिमा अफाट वेगाने फिरवल्या जात होत्या. आता भूतलावरील प्रतिमांचा रोख भारताकडे वळला होता. अचानक ह्या लक्षावधी प्रतिमेतील एका प्रतिमेकडे पाहून निरंजन-१ अडखळला. विदिशाच्या गावातील पुरातन वाड्यात तिच्या पूर्वजांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. त्यातील एक प्रतिमा निरंजनचीच होती. निरंजन-१ च्या ह्या एका दुबळ्या क्षणाचा मूळ निरंजनने फायदा उठवत आपल्या मेंदूवर पुन्हा कब्जा मिळविला. आता निरंजन-० कार्यान्वित झाला होता. अचानक दूरसंवेदन उपग्रह आणि इंटरनेट सेवा सुरु होताच सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. निरंजन-० ने मिहिर, बोस, कच ह्यांच्या मेंदूत आपली ज्ञानसंपदा घुसविण्याचा प्रयत्न सुरु केला. आपले हे स्वत्व किती काळ टिकणार ह्याची त्याला शास्वती नव्हती. त्याचा हा अंदाज खरा ठरला. निरंजन-१ काही सेकंदातच पुन्हा कार्यान्वित झाला होता. परंतु निरंजन-० ने आपले काम अंशतः पार पाडले होते. आपल्या मेंदूतील बुद्धिमत्तेचा काही भाग intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित करण्यात त्याने यश मिळविले होते. निरंजन-१ पुन्हा आता सर्व ठप्प करण्याच्या मागे लागला होता परंतु ह्यावेळी त्यापुढे आव्हान होते ते intermediate आणि advanced पातळ्यांवर संक्रमित झालेल्या निरंजन-० च्या बुद्धिमत्तेचे. त्यामुळे निरंजन-१ काहीसा गोंधळून गेला. त्याचवेळी मिहिरने ह्या सर्व घडामोडींची कल्पना बोस आणि वरिष्ठ अधिकार्यांना दिली. आणीबाणीच्या वेळी कार्यान्वित करण्यात येणारी यंत्रणा चालू करण्यात आली. अतिमहत्त्वाचे संगणक माहितीमाया जाळापासून वेगळे करण्यात आले आणि त्यात फक्त १-२ व्यक्तींना शिरकाव करता येईल अशी सोय करण्यात आली. इथे आपल्याला मिळालेल्या अधिक बुद्धिमत्तेवर कच खुश झाला होता. पण त्याला एकंदरीत परिस्थितीची कल्पना नव्हती त्याचे लक्ष निलोतम्मावरच होते. आपल्या मिळालेल्या ह्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तो निलोतम्माला आपल्याजवळ आणण्याचा प्रयत्न करू लागला होता. इथे मिहिरच्या डोक्यात सुद्धा असलेच विचार चालले होते. सामक आणि निलोतम्माला उपग्रहात बसवून पृथ्वीवर आणण्याचा त्याचा मानस होता. ह्या सर्वात बोस एकच वस्तुनिष्ठ विचार करणारे होते. निरंजन-० ची बुद्धिमत्ता त्यांच्यात आल्याने त्यांनाही सर्व पात्रांची ओळख झाली होती. त्यांच्याकडे सर्वात जास्त अधिकार असल्याने शेवटी सामक, नीलोतम्मा, कच ह्यांना सुमेर ग्रहाजवळ गेलेल्या उपग्रहात जवळजवळ कोंबण्यात आले. आणि ह्या उपग्रहाचा परतीचा प्रवास सुरु झाला. ह्या उपग्रहाने सुमेर ग्रहाजवळ पोहोचण्यात बरीच वर्षे लावली होती. परंतु आपल्या नंव्याने प्राप्त झालेल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर बोस आणि मिहिर ह्यांनी हा परतीचा प्रवास केवळ एका दिवसात होईल अशी तजवीज केली होती. ह्या उपग्रहाचे पृथ्वीवर आगमन अगदी गुप्त ठेवण्यात आले होते. सुमेर ग्रह - अंतिम भाग? निरंजन-१ विरुद्ध मानवजात,कच, मिहिर, बोस आणि नासाचे शास्त्रज्ञ असा लढा जोमाने चालू होता. हा लढा जसा सुमेर ग्रहावरील दोन वसाहतींच्या नियंत्रणासाठी होता तसाच मानवजातीच्यासुद्धा! ह्या लढ्यातील मानवजातीच्या बाजूचे अग्रगण्य खेळाडू होते मिहिर आणि बोस! संगणकाव्यतिरिक्त एकही क्षण घालविण्याची सवय नसलेल्या मानवजातीला हे मधले निरंजन-१ च्या वर्चस्वाचे क्षण फार कठीण जात होते. खरे तर त्यांचेही प्याद्यात रुपांतर व्हायचेच परंतु मिहिर आणि बोस ह्यांच्या अथक प्रयत्नाने आतापर्यंत हा लढा थोपविला गेला होता. निरंजन-० सुद्धा निरंजन-१ वर मात देण्याचा प्रयत्न करीत होता. निरंजन-१ पृथ्वीवरील सर्व माहितीजालांचे निरीक्षण करीत होता. अचानक त्याचे लक्ष http://nes1988.blogspot.in/2013/02/blog-post_25.html ह्या संकेतस्थळाकडे गेले. . . . . . . . अरेरे हे काय होत आहे! कोणीतरी माझा (आदित्यचा) ताबा घेऊ पाहत आहे.........
पट मांडला - एक राजकीय कथा!
घरची सभा संपल्यावर कार्यकर्त्यांना घेवून जाणारी जीप जशी नजरेआड झाली तशी संपतरावने सुटकेचा निश्वास टाकला. विधानसभेची निवडणूक घोषित होणार होणार म्हणून जी काही इतके दिवसाची अनिश्चितता होती ती एकदाची काल संपुष्टात आली. पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या. संपतराव इतके दिवस लपूनछपून मोर्चेबांधणी करीत होता. आपल्याला स्थानिक पातळीवर किती पाठिंबा आहे याची चाचपणी करीत होता. ही सर्व चाचपणी करताना भाऊरावांना त्याचा सुगावा लागणार नाही याची कसोशीने काळजी घेत होता. दिवेपूर मतदारसंघ तसा मोक्याचा होता. सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार भाऊराव मागच्या दोन खेपेला निवडून आले होते. आणि गेल्या दहा वर्षात सत्ताधारी पक्षात त्यांनी तसे मोक्याचे स्थान बनविले होते. मंत्रिमंडळाच्या मागच्या खेपेच्या विस्तारात भाऊरावांची वर्णी लागणार अशी जोरदार बातमी होती. संपतराव बिचारा पाण्यात देव बुडवून बसला होता. एकदा का भाऊराव मंत्री बनले की आपल्या आमदारकीच्या स्वप्नांना कायमचा सुरुंग लागणार हे तो ओळखून होता. तसे त्याला एकदोन वेळा विरोधी पक्षाकडून निरोपही आले होते. परंतु एवढी मोठी जोखीम घ्यायची त्याची तयारी नव्हती. आणि मग ज्यावेळी मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आणि त्यात भाऊ रावांचा समावेश झाला नाही त्यावेळी संपतने सुटकेचा निश्वास टाकला. 'कसला विचार करत बसलात, जेवण वगैरे घ्यायचे कि नाही? आता तर निवडणुका नुसत्या जाहीर झाल्या आहेत! ' सगुणाबाईच्या ह्या शब्दांनी संपतराव भानावर आले. पुढचे विचार मनातच ठेवत त्यांनी हातावर पाणी टाकले आणि ते पानावर बसले. सगुणाबाई जिल्ह्याच्या सहकारी साखर कारखान्याच्या संचालकाच्या कन्या. त्या संपतरावांच्या आयुष्यात आल्या आणि संपतरावांचे आयुष्य पुरते पालटून गेले. कारखान्याच्या कार्यालयात सर्व हिशोब कसोशीने सांभाळणारा हा चुणचुणीत पदवीधर विश्वासरावांना आधीपासूनच आवडायचा. एकदा आर्थिक वर्षाच्या शेवटी हिशोबाचा ताळमेळ लावताना मोठा बाका प्रसंग उद्भवला. कार्यालय नियोजित वेळेच्या पुढे चालू ठेवले तर काहीतरी गडबड आहे हे साऱ्यांच्याच लक्षात यायचे. तसे व्हायला नको म्हणून विश्वासरावांनी सर्व कारभार घरी हलवायचा हुकुम दिला. संपतराव आणि कर्मचारीवर्ग विश्वासरावांच्या बंगल्यावर दाखील झाला. रात्रभर सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आणि त्यांच्या कामाची तपासणी करीत, सकाळपर्यंत संपंतरावने परिस्थिती आटोक्यात आणली. ह्या सर्व प्रकारात संपतने विश्वासरावांचा विश्वास तर संपादन केलाच आणि त्याच बरोबर सगुणाच्या नजरेतही ते भरले. आपल्या वडिलांना बिकट परिस्थितीतून बाहेर काढणारा हा सावळासा तरुण सगुणाला आवडून गेला. पुढे संपतचे बंगल्यावर कामानिमित्त येणेजाणे वाढत गेले. आणि एकंदरीत परिस्थिती ध्यानात येण्यास चाणाक्ष विश्वासरावांना वेळ लागला नाही. सुरुवातीला ह्या नात्याला फारसे अनुकूल नसणाऱ्या विश्वासरावांनी आधुनिक काळातील परिस्थिती ध्यानात घेत ह्या जोडीस आपली अनुकुलता दर्शविली. लग्नसमारंभ मोठ्या थाटात झाला. आपल्या लग्नात एवढी मोठी नेते मंडळी येतील असे संपतने स्वप्नातही पाहिले नव्हते. आमदार शंकरराव, जिल्ह्याचे राज्यमंत्री ह्या सर्वांनी त्यांच्या लग्नसमारंभास उपस्थिती लावली. विश्वासरावांनी गावजेवण घातले. लग्नानंतर काही दिवसांनी फुरसत मिळाल्यानंतर संपतने आपल्या परीने लग्नखर्चाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत आपली ही नोकरी आपण आयुष्यभर जरी केली तरी असे लग्न आपण आयोजित करू शकणार नाही याची त्याला खात्री त्याला पटली. मग अचानक बातमी आली ती शंकररावांच्या हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मिक मृत्यूची! त्यांचे गाव दिवेपुरच्या बाजूचेच! त्यांच्या मृत्यूचा शोक सरतो न सरतो इतक्यात आमदारकीच्या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली. त्या भागातील मोठे उस शेतकरी असलेल्या भाऊरावांनी आपली प्यादी व्यवस्थित मांडून ठेवली होती. त्यांचे वजीर होते ते विश्वासराव! एकदंरीत सर्व काही मनाजोगते होवून गेले आणि भाऊरावांची आमदारपदी वर्णी लागली. ह्या सर्व घडामोडीत नवा जावई संपत बैठकीत आजूबाजूलाच असायचा. एकंदरीत संपतला हे क्षेत्र आवडते हे जसे विश्वासरावांनी जाणले तसे सगुणानेही. थोड्याच दिवसात संपतने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. मग आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संपत बिनविरोध निवडून आला आणि संपतराव सरपंच म्हणून विराजमान झाले. एकदा सरपंच झाल्यावर संपतरावांनी मागे वळून पाहिलेच नाही. गावातील माध्यमिक शाळेला जोडून उभे केले गेलेले महाविद्यालय, मातीच्या रस्त्यांची जागा घेतलेले डांबरी रस्ते असो अथवा जवळच बांधल्या जाणाऱ्या प्रस्तावित धरणाची जागा असो सर्वांमध्ये त्यांचा पुढाकार राहिला. आतापर्यंत सर्व कसे सुरुळीत चालले होते, संसारवेलीवर दोन सुंदर फुलेही फुलली होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मध्येच येऊन गेलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊरावांना निवडून आणून देण्यात विश्वासरावांबरोबर संपतरावांनी खांद्याला खांदा लावून काम केले. निवडणुकीत विरोधी पक्षाचा धुव्वा उडविल्यावर मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. त्याचे नियोजनही अर्थात संपतरावांनी केले. म्हणायला तसे एक गालबोट लागले ते मिरवणुकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या विजयसभेच्या वेळी. व्यासपीठावर आपली जागा संपतरावांनी गृहीतच धरली होती. परंतु ऐनवेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आले आणि संपतरावांचे व्यासपीठावरील स्थान हुकले. त्यांच्या मनाला हे कुठेतरी लागून राहिले. विधानसभा निवडणुकीनंतर दोन वर्षातच विश्वासरावांचा संचालकपदाचा कालावधी संपला. भाऊराव आणि विश्वासरावांच्या बैठकी आता परत जोरात रंगू लागल्या. संपतराव सुद्धा त्यात असायचेच परंतु चर्चा होतेय ती फक्त बुजुर्गात आणि आपण केवळ नावापुरते तिथे असतो हे लक्षात आल्यावर संपतरावांनी तिथे आपले जाणे कमी केले. आता हळूहळू संपतरावांनी आजूबाजूच्या गावाकडे मोर्चा वळविला. निर्मळ गावाच्या प्रचारात त्यांना भाग घेण्याचे आलेले आमंत्रण त्यांनी खुशीने स्वीकारले. त्या गावातील पक्षाच्या विजयाचा आनंद त्यांनी स्वतःच्या विजयापेक्षा जास्त खुशीने साजरा केला. झाई गावाच्या निवडणुकीत अटीतटीचा सामना होता आणि त्यावेळी त्यांना प्रचारासाठी खास बोलावणे आले. इथेही आपल्या वक्तृत्वशैलीच्या जोरावर आणि केलेल्या कामगिरीची उदाहरणे देत त्यांनी गावकऱ्यांना जिंकून घेतले. ही ग्रामपंचायत जिंकताच संपतराव हे नाव परिसरात मोठ्या आदराने घेवू जावू लागले. इथे भाऊराव मात्र राज्यपातळीवरील राजकारणात गुंग झाले होते. मुख्यमंत्री अण्णासाहेबांच्या विरोधात सुजीतकुमार सक्रियपणे पक्षांतर्गत आघाडी चालवत होते. अण्णासाहेबांच्या खुर्चीवर त्यांचा डोळा होता. अण्णासाहेबांच्या वा त्यांच्या सहकार्यांच्या कारभारात कुठे काही खुसपट काढता येईल का याची ते कधीपासून वाट पाहत होते. त्यांनी ह्या कामासाठी स्थापन केलेल्या खास गटात भाऊरावांना आघाडीचे स्थान होते. परंतु ह्या कामानिमित्त आपल्याला मुंबईतच सतत राहावे लागते ह्याची खंत भाऊरावांना लागून राहिली होती. त्यांची अस्वस्थतता वाढली जाण्याचे अजून एक कारण होते ते जिल्ह्यातून येणाऱ्या संपतरावांच्या कामगिरीच्या बातम्या. दुसरा दिवस उजाडला. संपतराव सकाळची आन्हिक आटपून पेपर चाळत चहाचा घोट घेत बसले होते. इतक्यात महादेव जोरात आपली बाईक घेवून घराच्या दिशेने येताना त्यांना दिसला. महादेव त्यांचा सच्चा कार्यकर्ता. नवीन युगाशी, त्यातील सगळ्या नवनवीन गोष्टींशी नाते जोडून असणारा. महादेवने बाईक घाईघाईतच अंगणात लावली आणि तो संपतरावांकडे आला. 'परवा केंद्रीय शिष्टमंडळ मुंबईला येतेय', संपतरावांनी दिलेल्या खुर्चीवर बसता बसता महादेव म्हणाला. 'अरेच्चा पण हे सगळे पेपर तर मी चाळून काढले पण ही बातमी कोठे दिसली नाही! आश्चर्य चकित होवून संपतराव म्हणाले. 'इंटरनेटवर बातमी आलेय' असे महादेव म्हणताच संपतरावांचे आश्चर्य ओसरले. जी काही धडपड करायची ती येत्या दोन दिवसातच ह्याची जाणीव त्यांना झाली. केंद्रीय शिष्टमंडळाला भेटायला जाणाऱ्या जिल्ह्यातील पक्षाच्या गटाचे नेतृत्व विजयराव करणार हे माहित करून घ्यायला संपतरावांना फारसा वेळ लागला नाही. दुपारचे जेवण घाईघाईतच आटपून ते आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी जायला निघाले. 'जाताना आबांना भेटून जा' हा सगुणा बाईंनी त्यांना दिलेला सल्ला त्याच्या कपाळावर आठ्या उमटवून गेला हे सगुणा बाईंच्या लगेच लक्षात आले. नाईलाजास्तव त्यांनी आपली गाडी विश्वासरावांच्या बंगल्याकडे वळविली. 'साहेब आताच बाहेर कामानिमित्त गेले आहेत' हे सासू बाईंच्या तोंडचे उद्गार ऐकताच खुश होवून त्यांनी सासू बाईंचे आशीर्वाद घेतले आणि ते तडक निघाले. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात तुफान गर्दी होती. विजयरावांनी विविध मतदारसंघांचे क्रम आखून दिले होते. दिवेपुरचा क्रमांक बराच मागे होता. इतर मतदारसंघांची चर्चा अपेक्षेपेक्षा जास्तच लांबली. एकेका मतदार संघात ५ - ५ इच्छुक मंडळी होती. सर्वांचे म्हणणे ऐकून घेताघेता विजयरावांच्या नाकी नऊ आले. दिवेपुरचा क्रमांक आला त्यावेळी रात्रीचे ११ वाजून गेले होते. संपतरावांना पाहताच विजयरावांची कळी खुलली. ह्या तरुण कार्यकर्त्याविषयी ते बरेच ऐकून होते. महादेवने बनवून दिलेले संपतरावांच्या कामगिरीचे पॉवर पॉईटचे प्रेसेंटटेशन पाहून विजयराव अत्यंत खुश झाले. त्यांची ही खुशी पाहून संपतरावांना खूप बरे वाटले. त्या खुशीतच ते आपल्या सहकार्याच्या निवासस्थानी झोपावयास गेले. बिछान्यावर पहुडता पहुडता आपल्या मतदारसंघातून दुसरे कोणीच इच्छुक कसे आले नाहीत याचा त्यांना अचंबा लागून राहिला. सकाळ सकाळी विजय रावांच्या दूरध्वनीची बेल खणखणली तेव्हा त्यांनी अगदी वैतागून फोन उचलला. रात्री झोपताना त्यांना दोन वाजले होते आणि मुंबईला घेवून जाणारी जीप सकाळी १० वाजता निघणार होती. तोपर्यंत चांगली झोप काढावी असा त्यांचा मनसुबा होता. पण समोर भाऊराव आहेत हे समजताच त्यांचा नाईलाज झाला. बाकीच्या मतदारसंघांचा आढावा घेत चर्चेचा ओघ दिवेपुरकडे वळला. आता मात्र विजय रावांच्या बोलण्यात नवीन चैतन्य आले. संपत रावांची स्तुती करतांना त्यांना जणू काही शब्द कमी पडत आहेत असा भाऊरावांना भास झाला. आपला राग मोठ्या मुश्किलीने आवरून त्यांनी फोनवरील बोलणे आटोपते घेतले. हा फोन संपताच त्यांनी सुजितकुमारांना फोन लावला. सुजित कुमारांनी फोन उचलल्यावर त्यांच्या स्वरात नेहमीचे चैतन्य नाही अशी संशयाची पाल भाऊरावांच्या मनात चुकचुकली. 'भाऊराव, श्रेष्ठींनी यंदा नवीन रक्ताला वाव द्यायचे ठरविले आहे' हे सुजितकुमारांचे शब्द तप्त आगीच्या गोळ्याप्रमाणे त्यांच्या कानी पडले. पुढचे सुजीतकुमारांचे बोलणे ऐकण्याच्या मनःस्थितीत ते नव्हतेच. हा फोन संपताच ते रागारागाने अंगणात फेऱ्या मारू लागले. इतक्यात त्यांच्या मनात असे काही विचार आले की त्यांची मुद्रा खुशीने उजळून निघाली. त्यांनी तडक विश्वासरावांना फोन लावला. आजूबाजूचे बोलणे झाल्यावर त्यांनी मुद्द्याला हात घातला. 'विश्वासराव, तुम्ही बघा इतकी वर्ष साथ दिलीत आम्हाला! आता यंदा तुम्हीच निवडणुकीला उभे राहावे असे म्हणतो मी!' त्यांचे हे अनपेक्षित बोलणे ऐकून विश्वासराव प्रथम थोडे आश्चर्यचकित झाले पण आपल्या मनातली भावना कोणीतरी ओळखली ह्याचा त्यांना जबर आनंद झाला. 'आता बघा तशी काही माझी इच्छा नाही पण जर तुम्ही म्हणत असालच तर मी तयार आहे' विश्वासरावांचे हे बोलणे ऐकून मागे उभ्या असलेल्या इंदुमती बाई एकदम चकित झाल्या! केंद्रीय मंडळाचे संध्याकाळी मुंबईत आगमन झाले. शिष्टमंडळाचे नेतृत्व स्वरूपसिंग करीत होते. स्वरूपसिंगांच्या स्वागताला अण्णासाहेब आणि सुजितकुमार दोघेही विमानतळावर उपस्थित होते. ठेवणीतल्या शाब्दिक कोट्या, पत्रकारांसाठी / छायाचित्रकरांसाठी खास राखून ठेवलेल्या हास्यमुद्रा ह्यांना उधाण आले होते. पक्षात सर्व काही आलबेल आहे असा कोणाही पाहणाऱ्याचा समाज झाला असता. मंडळींचे रात्रीचे जेवण पंचतारांकित हॉटेलात आटोपल्यावर सुजीतकुमार म्हणाले, "मी सोडतो स्वरुपसिंगांना, त्यांच्या हॉटेलावर!" अण्णासाहेबांना काही पर्याय आहे कि नाही हे तात्काळ लक्षात न आल्याने त्यांनी मान डोलावली. स्वरुपसिंगाच्या हॉटेलावर सुजीतकुमारांची गाडी पोहचली. "आता इथपर्यंत आलात तर दोन मिनटे रूमवर या की!" स्वरूपसिंग उद्गारले! सुजीतकुमारांनी पडत्या फळाची आज्ञा मानून चालकाला गाडी पार्क करण्यास सांगितले. खोलीवर थोड्या वेळातच मदिरेने प्रवेश केला आणि वातावरणात जान आली. 'दिल्ली काय म्हणतेय?' सुजीतकुमार उद्गारले. स्वरुपसिंगांनी एक मोठा श्वास घेतला आणि मग दिल्लीची कहाणी सांगण्यास आरंभ केला. पक्षाचे युवा नेते मुकुल हे गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने प्रबळ बनत चालले होते. पंतप्रधान जीवनरामांची त्यांनी खास मर्जी संपादन केली होती. ह्याचाच पुरावा म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सारी सूत्रे मुकुल हे हलवीत होते. पक्षातील जेष्ठ नेत्यांमध्ये ह्यामुळे नक्कीच नाराजीचे वातावरण पसरले होते. तरुणांना राजकारणातील काय कळते असा त्यांचा पक्का समज होता. परंतु एकदा आपटी खाल्ल्याशिवाय ह्यांना काही समजणार नाही असे ठरवून ही जेष्ठ मंडळी शांत बसून सारा खेळ पाहत होती. मध्येच एक भाऊरावांचा फोन आला परंतु तो सुजीतकुमारांनी न घेता भ्रमणध्वनीला शांत (silent) अवस्थेत करून ठेवले. 'पण पैश्याशिवाय गाडी चालायची कशी? नवीन रक्त थोडेच पैसा पुरविणार आहे?' सुजीतकुमार विचारते झाले. 'आता नियमाला अपवाद असतातच की, तुमची अशी काही खास माणसे असतील आपण बघूयात' स्वरुपसिंगांच्या ह्या आश्वासनाने सुजीतकुमार थोडे शांत झाले. संपतराव सकाळीच परत आले होते. स्वारी एकंदरीत खुशीत असल्याचे सगुणाबाईंच्या केव्हाचेच ध्यानात आले. मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी संपतरावांनी स्वतः हून स्वीकारली. आकाशवाणीवर मराठी गाणी ऐकणारे संपतराव आज किशोरकुमारची गाणी ऐकत बसले होते. अशा प्रसन्न वातावरणातच दुपार गेली. चार वाजता मुले शाळेतून परत आली आणि त्यांनी बाबांमागे बाहेर जाण्याचा आग्रह धरला. 'कुठे जायचे फिरायला' असे संपतराव म्हणत असतानाच फोनची बेल खणखणली. आईचा आवाज ऐकताच सगुणाबाईंचा चेहरा खुलला. 'आज संध्याकाळी तुम्ही सर्वांनी जेवायलाच यायचे असे इंदुमतीबाई म्हणत होत्या. 'थांब ह्यांना विचारून बघते' असे सगुणाने म्हणताच. 'कशाला विचारायला पाहिजे? आम्ही तुमची वाट पाहत आहोत' असे म्हणून इंदुमतीबाईंनी फोन ठेवला. आश्चर्याची बाब म्हणजे संपतरावांनी सुद्धा फारसे आढेवेढे घेतले नाहीत. सुगरण इंदुमतीबाईंनी खास स्वयंपाकाची तयारी चालवली होती. 'या संपतराव या' असे म्हणत विश्वासरावांनी त्यांचे स्वागत केले. हवापाण्याच्या गप्पा झाल्यावर नातवंडांनी विश्वासरावांचा ताबा घेतला. आजोबांच्या तोंडून ऐतिहासिक गोष्टी ऐकणे त्यांचा आवडता छंद होता. सगुणाबाई आपल्या आईला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात शिरल्या. संपतरावांनी दूरदर्शनसंच सुरु केला. प्रादेशिक बातम्या सुरु होत्या. 'सत्ताधारी पक्षाच्या केंद्रीय शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन' दूरदर्शनवरील निवेदिका सांगत होती. संपतराव स्वतःशीच हसले. तसे म्हणायला गेले तर ही बातमी ही गेले कित्येक वर्षे काही महिन्याच्या कालावधीनंतर सतत येणारी! निमित्त वेगवेगळी असोत पण केंद्रीय शिष्टमंडळाशिवाय आपले पानही हलायचे नाही हे जाणवून संपतरावांना हसू आले. पण ह्या वेळचे शिष्टमंडळ आपल्या भवितव्याची किल्ली घेवून आले आहे ह्या जाणीवेने ते थोडे अस्वस्थ झाले. सगुणाबाई मात्र एकदम प्रसन्न मुद्रेत होत्या . जीवनात ही घडी अशीच राहू दे हे आपल्या आवडीचे गाणे गुणगुणत होत्या. इंदुमतीबाई मात्र थोड्याशा अस्वस्थ होत्या. ज्यावेळी विश्वासरावांनी जावयाला सहकुटुंब जेवायला बोलाविले तेव्हा ते सकाळच्या भाऊरावांच्या फोनविषयी चर्चा करायला असे त्यांना वाटले होते. पण इथे तर अशी काही चिन्हे दिसत नव्हती. आणि आपण हा विषय काढला तर विश्वासरावांना आवडेल की नाही ह्याची खात्री नसल्याने त्या गप्प राहिल्या. जेवणे एकदम प्रसन्न वातावरणात पार पडली. 'संपतराव, बाकी तुमचे वजन हल्ली वाढत चालले आहे' ह्या विश्वासरावांच्या वाक्यावर संपतराव मनापासून खुश झाले. आपल्या राजकीय प्रभावाची सासऱ्याने केलेली ही स्तुती आहे असे वाटून त्यांनी दोन घास अधिक घेतले. रात्री घरी परतताना अकरा वाजून गेले. सगुणाबाई मुलांना झोपवीत असताना सवयीनुसार संपतरावांनी दूरदर्शन संच लावला. आणि त्यावरील ब्रेकिंग न्यूज पाहून ते हादरून गेले. 'सत्ताधारी पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजयराव ह्यांच्या जीपला मुंबईला जाताना अपघात, विजयरावांचे अपघाती निधन!' इन्स्पेक्टर जाधव आणि त्यांच्या हवालदारांनी मध्यरात्रीच घटनास्थळी धाव घेतली होती. अपघाताचे कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हते. जीपचा साफ चेंदामेंदा झाला होता. रस्त्यावर दुभाजक नव्हता आणि जीप आपली बाजू सोडून समोरून येणाऱ्या ट्रकला आदळली होती.आदळल्यावर जीप बाजूच्या थोड्या खोल असणाऱ्या भागात जावून पडली होती. ट्रकवाल्याने स्वतःहून पोलिसांना खबर दिली होती. त्यालाही बराच मार लागला होता. पंचनामा करून सर्व सोपस्कार आटोपल्यावर जीपचे भग्न अवशेष अधिक तपासणीसाठी पाठवून देण्यात आले. मुंबईत मात्र मोठे उदास वातावरण होते. स्वरुपसिंग मोठ्या विचारात पडले होते. विजयराव तसे पक्षाचे उभारते नेते. ह्या निवडणुकीनंतर त्यांच्यावर अधिक जबाबदारी सोपविण्याचा श्रेष्ठींचा मनसुबा होता. त्यांच्या अशा ह्या अचानक जाण्याने सर्वच समीकरणे कोलमडून पडणार होती. आणि त्यांच्या जिल्ह्यातील पक्षात एक मोठी पोकळी निर्माण होणार होती. ह्या सर्व दीर्घकालीन समस्या होत्या. तत्कालीन समस्या होती ती जिल्ह्यातील उमेदवारी अर्जांच्या छाननीची! विजयरावांनी सर्व उमेदवारांच्या भेटी घेऊन आपला अहवाल बनविला होता. अहवालाचा विचार येताच एकदम स्वरुपसिंग उठून बसले, सुजीतकुमारांना त्यांनी हळूच विचारले, अपघातस्थळी अहवाल सापडला का? ह्या प्रश्नाने सुजितकुमारांचा चेहरा काहीसा उतरल्यासारखा त्यांना वाटला. परंतु सुजितकुमार सावरून म्हणाले, मी दिवेपुरला फोन करून विचारतो. सुजीतकुमार बाहेरच्या कक्षात आले आणि त्यांनी तात्काळ भाऊरावांना फोन लावला. भाऊरावांनी फोन काही उचलला नाही. नाईलाजाने त्यांनी विश्वासरावांचा फोन लावला आणि इन्स्पेक्टर जाधव ह्याच्याकडे अहवालाची चौकशी करण्यास सांगितले. हे भाऊराव गेले तरी कोठे असा विचार करीत, सुजीतकुमार पुन्हा स्वरुपसिंगांच्या कक्षात आले. एव्हाना अण्णासाहेबांचे आगमन झालेच होते. निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस होता आणि सर्व उमेदवारांना अर्ज भरण्यास वेळ मिळावा म्हणून आजच यादी जाहीर करण्याचा श्रेष्ठींचा आदेश होता. एकदमच काही अपवादात्मक परिस्थिती असेल तर मोजक्या जागांचा निर्णय दुसऱ्या दिवसावर थोपवून धरण्याची परवागनी देण्यात आली होती. इथे इन्स्पेक्टर जाधव विजयरावांच्या बंगल्यावर पोहचले होते. अतिशय शोकाकुल वातावरण होते तिथे. विजयरावांच्या पत्नीची आणि मुलांची स्थिती तर पाहवत नव्हती. कार्यकर्त्यांची पण ही गर्दी उसळली होती. जाधव तिथे पोहचल्यावर एका कोपऱ्यात जर शांतपणे जाऊन परिस्थितीची पाहणी करीत उभे राहिले. सदैव गावात ड्यूटी लागणाऱ्या इन्स्पेक्टरच्या मानाने त्यांचा स्वभाव तसा सौम्यच. इतक्यात एक विश्वासू कार्यकर्ता त्यांच्याकडे येत झाला. त्यांना एका बैठकीच्या खोलीत नेण्यात आले. जाधवांनी त्याला विजयरावाविषयी त्यांना विचारायचे होते ते प्रश्न विचारून घेतले. थोड्या वेळाने त्यांना विजयरावांच्या पत्नी आणि मुलांशीही बोलण्यास मिळाले. पत्नी तर धाय मोकलून रडत होती. सकाळीच मी नऊ वाजता ह्यांच्याशी बोलले आणि दहा वाजता निघायचे म्हणून हे काही जास्त बोलले नाही. मला काय माहित हे शेवटचेच बोलणे असणार आहे, रडता रडता ती बोलत होती. जाधव तिची समजूत घालून निघाले. पण आता मात्र ते अस्वस्थ झाले होते. सकाळी दहा वाजता निघणारी जीप इतक्या उशीरा का निघाली हे त्यांना समजत नव्हते. जीपमधील कोणीच व्यक्ती जिवंत न राहिल्याने माहितीचा तो स्त्रोत उपलब्ध नव्हता. जाधवांनी आपला मोर्चा विजयराव ज्या हॉटेलात उतरले होते तिथे वळविला. इतक्यात त्यांच्या फोनची घंटा खणखणली. विश्वासरावांचा फोन होता, जीपमध्ये काही कागदपत्रे वगैरे सापडली का असे ते विचारात होते. जाधवांनी त्यांना नकारार्थी उत्तर देवून फोन ठेवला खरा, पण आता मात्र त्यांचा मेंदू पूर्ण सक्रिय झाला होता. हॉटेलच्या स्वागतकक्षात त्यांच्या आगमनाने थोडीशी धांदल उडाली. पण मग व्यवस्थापकाने येवून तो त्यांना खोलीत घेऊन गेला. विजयरावांना हॉटेलातून निघण्यास उशीर होण्याचे कारण काय? जाधवांनी थेट मुद्द्याला हात घातला. उशीर कसला उशीर? ते तर बरोबर १० वाजता इथून निघाले. व्यवस्थापक उद्गारला. जाधवांना आता मात्र एकदम संशयास्पद वातावरण वाटू लागले होते. त्यांनी हॉटेलातील नोंदींची पाहणी केली त्यातही विजयरावांनी १० वाजता हॉटेल सोडल्याची नोंद होती. जाधव हॉटेलबाहेर उतरले. आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी करू लागले. जिल्ह्यातील ठिकाणी जितकी वर्दळ दिसावसाय हवी तितकी इथेही दिसत होती. त्यांची नजर समोरच्या पानवाल्याकडे गेली. इन्स्पेक्टरचा मोर्चा आपल्याकडे येतोय हे पाहताच तो बिचारा बावरला. विजयरावांची जीप जाताना पाहिली का रे? जाधवांनी त्याला विचारले. आपल्या छोट्याशा मेंदूला ताण देत त्याने हे विजयराव कोण हे आठवण्याचा प्रयत्न केला. मग त्याला आठवली ती कालच सकाळी आपल्या दुकानासमोरच बंद पडलेली जीप. तो म्हणाला विजयरावांची का काय माहित नाही पण एक जीप काल बंद पडलेली मी पाहिली इथे. ड्रायव्हरने कशी बशी चालू केली पण त्याने मला गराजचा पत्ता विचारला म्हणून माझ्या लक्षात राहिली ती. गराज कोठे आहे, जाधवांनी त्याला दरडावूनच विचारले. ह्या पहिल्या नाक्यावर डावे वळण घेतले कि सरळ जावा, शंभर मीटर गेलात की एक चहाची टपरी लागेल, त्याच्याच बाजूला आहे गराज, पानवाला उद्गारला. जाधव घाईघाईने गराजवर पोहचले. सर्व काही आलबेल होते. म्हणजे गाड्यांच्या दुरुस्तीची कामे जोरात चालू होती. तिथला मालक पुढे आला. जाधवांनी त्याच्याकडे कालच्या जीपविषयी विचारले आणि ती आली कधी, त्यात काय प्रॉब्लेम होता आणि तसा कसा दुरुस्त केला असा प्रश्नांचा मारा केला. 'साहेब काय सांगू, रमाकांतने गाडीवर काम केले आणि तोच काल संध्याकाळपासून बरे नाही वाटत म्हणून घरी गेला तर त्याचा काही पत्ताच नाही बघा' रमाकांतच्या घराचा पत्ता घेऊन जाधवांची बाईक सुसाट निघाली. रमाकांत घरी सापडेल अशी जाधवांनी आशाच केली नव्हती. परंतु त्याला जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल केल्याची बातमी त्यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक होती. तातडीने ते जिल्हा रुग्णालयाकडे निघाले. निघण्याआधी रुग्णालयावर पहाऱ्यासाठी २ हवालदार पाठवून देण्याचा फोन त्यांनी ठाण्यात केला. रुग्णालयातील निवासी डॉक्टरने त्यांचे स्वागत केले. रमाकांतला अन्नातून विषबाधा झाली असून पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तो म्हणाला. जाधवांनी बाहेरूनच रमाकांतकडे नजर टाकली. दोन हवालदार तिथे पोहोचताच केवळ रमाकांतच्या पत्नीसच त्याला भेटण्याची परवानगी द्यायचे बजावून जाधव निघाले. रुग्णालयाच्या जनरल वार्डात कालच दाखल झालेल्या एका रुग्णाकडे नर्स उषा खास लक्ष ठेवून होती. साधारणतः चाळीशीच्या आसपास असलेला हा रुग्ण छातीत दुखल्याची तक्रार घेवून तिथे दाखल झाला होता. पण नातेवाईक दाखल झाल्याशिवाय कोणतीही तपासणी करून द्यायला नकार देत होता. आता त्याला फोनवर बोलताना पाहून मात्र तिचे माथे सणकले. कसले बोलणे चाललंय फोनवर ह्या तिच्या दामटवून विचारण्याकडे त्याने चक्क दुर्लक्ष केले. 'साहेब, रुग्णालयापर्यंत पोलिस येवून पोहोचलेत की!, तो दबल्या आवाजात पलीकडील व्यक्तीशी बोलत होता. समोरून खास ठेवणीतले शब्द ऐकल्यावर त्याने बोलणे आटोपते घेतले. पलीकडील व्यक्ती मात्र प्रचंड अस्वस्थ झाली होती. तिने ताबडतोब मुंबईला फोन लावला. तीन चार वेळा समोरून फोन कट झाला. शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांनी केलेला पाचवा प्रयत्न मात्र यशस्वी ठरला. 'महत्वाची बैठक चाललेय, समजत नाही का?' समोरून रागीट आवाज आला. 'महत्वाची बातमी होती म्हणूनच फोन केला, रुग्णालयात पोलिस येऊन पोहोचलेत' हे ऐकताच मात्र मुंबईची व्यक्ती सावध झाली. 'तुम्ही कसलं झेंगट लावून दिलत असे त्रासिक स्वरात बोलत इन्स्पेक्टरचे नाव घेवून तिने फोन ठेवून दिला. जाधवांनी घरी पोहचल्यावर झटपट जेवण आटोपले आणि आरामखुर्चीत बसत ते सर्व विखुरलेले तुकडे एकत्र जोडण्याचा प्रयत्न करीत होते. इतक्यात त्यांच्या भ्रमणध्वनीची घंटा खणखणली. मोठ्या साहेबांचा फोन होता. 'काय जाधव, एका मेकानिकच्या मागे तुम्ही इतकी शक्ती काय वाया घालविता? साहेबांनी सुरुवात केली. 'बर ते जाऊ द्यात, उद्या जामपुरला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे. तिथली जबाबदारी तुमच्यावर लागली' साहेबांच्या ह्या बोलण्याने जाधव एकदम बुचकळ्यात पडले. जामपूर होते १०० किलो मीटर अंतरावर आणि त्यासाठी आपली निवड का व्हावी हे कोडे त्यांना उलगडेना. साहेबांनी फोन ठेवून दिल्यावर त्यांना निराशेने ग्रासले. त्या आरामखुर्चीतच सुन्नपणे त्यांची संध्याकाळ गेली. तिकीटवाटपाच्या चर्चेचे काम जोरात चालले होते. स्वरुपसिंग, अण्णासाहेब, सुजीतकुमार आणि शिष्ठमंडळांची बैठक जोरात चालली होती. युवाशक्तीचा जोर तिकीटवाटपात दिसतोय की नाही ह्याची मुकुल दिल्लीहून फोन करून अधूनमधून खात्री करून घेत होते. काही जागांच्या बाबतीत एकमत होत नव्हते. त्या जागा नंतरच्या चर्चेसाठी राखून ठेवण्याचे ठरले. विजयरावांचा अहवाल हाती नसल्याने त्या जिल्ह्याचे कामही बाजूला राहिले होते. दुपारनंतर अचानक स्वरुपसिंगांनी त्या जिल्ह्याच्या चर्चेला हात घातला त्यावेळी सर्वांना जरा आश्चर्यच वाटले. सुजीतकुमार आधी थोडे बावचळले पण लगेचच त्यांनी सावरले. 'आतापर्यंत १४० जागांचा निर्णय आपण पक्का केला त्यात युवा नेते १००, म्हणजे जवळजवळ 70 टक्के युवकांना प्राधान्य. आता निवडणूक निधीचे कसे बघायचे? तेव्हा अशी काही मंडळी विचारात घेतलेली बरी' त्यांच्या ह्या अनपेक्षित विधानाने सर्वच जरा आश्चर्यचकित झाले. परंतु मग त्यांनी आणि स्वरुपसिंगांनी मिळून चर्चेला अशी कलाटणी दिली की बघताबघता दिवेपुरच्या जागेवर विश्वासरावांची निवड पक्की झाली. सत्ताधारी पक्ष इतक्या सुसूत्रपणे काम करत असताना, विरोधकांची हालत खराब होती. युतीची अनेक समीकरणे बनली होती आणि त्यातले कोणते उद्या निश्चित होणार ह्याची भगवंतालाही खात्री नव्हती. संपतरावांचा दिवस एकदम व्यग्र गेला होता. विजयरावांच्या गावीच त्यांचा मुक्काम होता. विजयरावांच्या घरच्या माणसांच्या जोडीला काम करत त्यांनी पुढील दिवसांच्या विधींची सोय तर लावलीच आणि विजयरावांच्या आर्थिक व्यवहाराची सोय लावण्यासाठी एका सल्लागाराची नेमणूक करून ते आले. संध्याकाळी घरी परतल्यावर ते जरा निवांतपणे पहुडले होते की महादेव धावत धावत घरी आला. त्याचे स्वागत सगुणाबाईंनी केले. 'ताई अभिनंदन, बाबांना निवडणुकीचे तिकीट मिळालेय!' महादेवचे हे अनपेक्षित शब्द सगुणाबाईंना धक्का देवून गेले. तोंडदेखले हसून त्यांनी विश्रांतीकक्षात डोकावून पाहिले तर संपतरावांची संतप्त मुद्रा त्यांच्या नजरेस पडली. महादेवचे बोल त्यांच्याही कानी पडले होते तर. त्यांनी खुणेनेच सगुणाबाईंना महादेवला नंतर येण्यासाठी सांगितले. महादेव गेल्यावर विश्रांतीकक्षात जाण्याची हिम्मत सगुणाबाईंना झाली नाही. अभिनंदनाचे फोन घेता घेता विश्वासराव आणि इंदुमतीबाईंचा जीव मेटाकुटीला आला होता. मुली / जावयाकडून फोन आला नाही ह्याची खंत एकदा इंदुमतीबाईंनी बोलूनही दाखवली. विश्वासरावांची मनः स्थिती मात्र द्विधा झाली होती. मोठ्या जिकीरीनेच त्यांनी ह्या निर्णयाला होकार दिला होता. संपतरावांना तिकीट न मिळून देण्यासाठी भाऊरावांनी चंग बांधला आहे हे त्यांना कळून चुकले होते. आणि त्याचवेळी तुम्ही जर नाही म्हणालात तर दुसरा कोणी बाहेरचा बघू असा निरोप ज्यावेळी त्यांना मुंबईहून आला त्यावेळी त्यांनी होकार कळविला. जावयाची उमेदीची वर्षे बाकी आहेत आणि येत्या पाच वर्षात त्याच्यासाठी परिस्थिती अनुकूल करून ठेवू असेही त्यांनी मनोमन ठरविले होते. हे सर्व संपतरावांना बोलवून घेऊन स्पष्ट करून सांगण्याचे त्यांनी मनोमन ठरविलेही होते. परंतु गेल्या एक दोन दिवसात घडलेल्या घटनांमुळे त्यांना अजिबात फुरसतहि मिळाली नव्हती. सुजीतकुमारांनी भाऊरावांना चांगलेच फैलावर घेतले होते. एका दिवसाच्या अज्ञातवासानंतर आज भाऊराव फोनवर आले होते. त्यांचा आवाजही एकदम भयभीत वाटत होता. 'आपले ठरले होते काय, आणि तुम्ही काय करून बसलात? फक्त अहवाल गायब करायला मी तुम्हाला सांगितला होता आणि तुम्ही आखखा माणूसच गायब केलात?' सुजितकुमारांचा पारा एकदम वर चढला होता. चुकीच्या माणसाकडे काम सोपविल्याचा भाऊरावांना पश्चाताप होत होता. 'त्या रमाकांतचे काय करायचे आता?' भाऊरावांच्या ह्या प्रश्नाकडे सरळ दुर्लक्ष करून सुजीतकुमारांनी फोन ठेवला होता. हे प्रकरण आपल्या अंगावर एकदम मोक्याच्या क्षणी शेकणार अशी अनामिक भीती त्यांना वाटू लागली. संध्याकाळी सातच्या सुमारास आलेला महादेवचा फोन अखेरीस संपतरावांनी उचलला. त्यांची समजूत कशी घालायची ही कला महादेवाला चांगलीच अवगत होती. 'चला नदीकाठच्या धक्क्यावर जावून बसुयात', महादेवची ही विनंती संपतरावांना अव्हेरता आली नाही. तयारी करून ते तसेच निघाले. अशा प्रसंगी शांत राहणेच शहाणपणाचे असते हे सगुणाबाई अनुभवाने शिकल्या होत्या. महादेव तोपर्यंत अंगणात येवून पोहचलाच होता. त्याच्या बाईकवर मागे बसून जोडी नदीकाठी निघाली. रस्ता बाजारातून जात होता, तिथे नेमके ओळखीचे विश्वासू कार्यकर्त्ये भेटले. त्यांनी आग्रहाने त्यांना उपहारगृहात चहासाठी नेले. उपहारगृहाच्या एका कोपऱ्यात चहाला सर्वजण बसले. ते बसले त्यावेळी आजूबाजूची बाकडी रिकामीच होती. विश्वासू कार्यकर्त्याबरोबर बोलताना हळूहळू संपतरावांच्या जखमेची खपली पूर्ण निघाली आणि त्यांनी आपल्या मनातील शल्याला मोकळी वाट करून दिली. आपण गेले कित्येक वर्षे कसे खपलो, कसा आजूबाजूच्या भागाचा आणि त्याचबरोबर पक्षाचा ग्रामीण भागात विकास केला' हे ते मोठ्या उद्वेगाने कार्यकर्त्यांच्या ह्या गटास सांगत होते. ह्या सर्व गप्पामध्ये मागच्या बाकड्यावर येवून बसलेल्या एका माणसाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. थोड्यावेळाने सगुणाबाईंचा फोन आला तसे संपतरावांनी आपले बोलणे आटोपते घेतले आणि सर्वजण बिल चुकते करून निघाले. ते जाताच वसंतराव आपल्या जागचे उठले. हॉटेलबाहेर येताच त्यांनी मुंबईला फोन लावला. युतीच्या जागावाटपाची गणिते सोडवून शांत झालेल्या विरोधी पक्षाच्या जितेंद्ररावांनी फोन उचलला. 'दिवेपुरचा उमेदवार मिळाला आपल्याला' वसंतरावांचे बोलणे ऐकताच पुढील काही प्रश्न न विचारता हवापाण्याची चौकशी करून जितेंद्ररावांनी फोन ठेवला. संपतरावांचा राग दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत बराच निवळला होता. गरमागरम चहाचे घुटके घेता घेता त्यांनी विश्वासरावांना अभिनंदनाचा फोन लावला तेव्हा सगुणाबाईंच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. त्यांनी संपतरावांचे बोलणे आटोपता आटोपता फोन घेतला आणि वडिलाचे अभिनंदन केले. मायलेकीच्या गप्पा त्यानंतर तासभर चालल्या होत्या. संपतरावांनी आज मुद्दामच शेतीचे काम काढले. परीक्षा नापास झालेला मुलगा ज्याप्रमाणे काही दिवस तोंड लपवून बसतो त्याप्रमाणे थोडी त्यांची गत झाली होती. उसाच्या शेतीवर त्यांनी बऱ्याच दिवसांनी फेरफटका मारला होता. मालकांच्या अशा ह्या अचानक भेटीमुळे शेतावरचे मजूर आश्चर्यचकित झाले. त्यांच्या कामातील ढिसाळपणाचा संपतरावांनी आपल्या पद्धतीने समाचार घेतला. इतक्यात त्यांचा फोन खणखणला, अनोळखी क्रमांक न उचलण्याचा त्यांचा नेहमीचा शिरस्ता त्यांनी आज मोडत फोन उचलला. 'काय संपतराव काय म्हणता आहात', समोरची व्यक्ती विचारत होती. 'आपण कोण बोलत आहात?' संपतराव काहीशा त्रासिक स्वरात उद्गारले. वसंतरावांनी मग जास्त ताणून न धरता आपली ओळख करून दिली आणि आपला फोन करण्याचा उद्देश सांगितला. क्षणार्धात संपतरावांच्या मेंदूने अनेक गणिते मांडली. त्यातल्या बऱ्याचशा गणिताची उत्तरे नकारार्थी आल्याने त्यांनी नम्रपणे आपला नकार वसंतरावांना सांगितला. वसंतराव तसे लवकर हार मानणारे नव्हते. 'बघा दुपारपर्यंत विचार बदलला तर' असे म्हणून त्यांनी फोन ठेवला. शेतकरी मोर्च्याचे काम सांभाळून आल्याने इन्स्पेक्टर जाधव काहीसे थकले होते. सकाळ थोडी आळसात घालविण्याचा त्यांचा मनसुबा होता. साहेबांनी कालच रात्री फोन करून त्यांना सुट्टीवर जायचे सुचविले होते. बायकोशी सल्लामसलत करून संध्याकाळच्या बसने गावाला जायचा त्यांनी बेत जवळजवळ पक्का केला होता. गावाला जायच्या आधी थोडी खरेदी करण्यासाठी बाजारात एक चक्कर मारण्याचे ठरवून ते निघालेही. बाजाराच्या नाक्याच्या ठिकाणी रस्ता थोडा अडला गेला होता. त्यांनी जरा कुतूहलाने नजर वळवून पाहिले, तर एक अंत्ययात्रा चालली होती. मृतात्म्याला शांती लाभो अशी ईश्वराकडे प्रार्थना करीत त्यांनी आपली बाईक पुढे दामटली. जाता जाता अंत्ययात्रेतील दोन तीन चेहरे ओळखीचे असल्याचा त्यांना भास झाला. परंतु हे चेहरे नक्की कोठले हे न आठवल्याने त्यांनी तसेच पुढे जायचे ठरविले. बाजारात सामान खरेदी करता करता त्यांना अचानक आठविले की ते चेहरे गराजमधील कामगारांचे होते. आता मात्र त्यांना स्वस्थ बसवेना. त्यांनी बाजारात चौकशी केली आणि त्यांचा संशय खरा ठरला. ती रमाकांतचीच अंतयात्रा होती. आता जाधव भयंकर अस्वस्थ झाले. काय करायचे हे त्यांना सुचेना. थोड्या शांत डोक्याने विचार करायचे ठरवून त्यांनी घरचा रस्ता पकडला. वाटेत विश्वासरावांच्या अभिनंदनाचे एक दोन बोर्ड त्यांच्या नजरेस पडले आणि ते अधिकच बुचकळ्यात पडले. एकंदरीत परिस्थितीनुसार त्यांनीसुद्धा संपतरावांना तिकीट मिळेल असा अंदाज केला होता. जे काही चालले आहे ते आपल्या आकलनापलीकडचे आहे असेच त्यांना वाटले. परतीच्या रस्त्यावर अचानक त्यांची गाठ महादेवशी पडली. पोलिस खात्याचा मध्यंतरी संगणकीकरणाचा कार्यक्रम आखण्यात आला होता त्यावेळी महादेवनेच त्यांना प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर त्यांची बऱ्यापैकी दोस्ती झाली होती. दोघेही तसे सध्या मोकळेच होते. २ मिनटात आटोपतील असे वाटून त्यांनी गप्पांना सुरुवात केली परंतु अचानक जाधवांनी आपल्या मनातील खदखदीला मोकळी वाट करून दिली. महादेव एकदम आश्चर्यचकित झाला. एकंदरीत हे फार गंभीर प्रकरण आहे ह्याची त्याला खात्री पटली. जाधवांना ते न जाणवून देता गप्पा आटपेपर्यंत त्याने धीर धरला. जाधव तिथून निघताच त्याने बाईक वरून थेट संपतरावांच्या घराचा रस्ता पकडला. महादेवच्या बोलण्यावर संपतरावांचा अजिबात विश्वास बसेना. आपल्या पक्षात असे कटकारस्थान आणि ते ही आपल्या गावात! संपतराव एकदम सुन्न होऊन विचारात पडले. भ्रमणध्वनीच्या कॉलच्या नोंदीत सकाळी आलेला वसंतरावांचा फोन त्यांनी एक दोनदा चाळूनही पाहिला. सुजितकुमारांशी बोलणे आटोपल्यावर भाऊरावांना दरदरून घाम फुटला. ह्या प्रकरणातून निस्तरण्याची जबाबदारी आता तुमची, मी ह्यात अजिबात पडणार नाही असे त्यांनी स्पष्ट बजावून सांगितले होते. आणि ह्या विषयावर पुन्हा फोनवर न बोलण्याची तंबीही दिली होती. ह्याचा अर्थ स्पष्ट होता. एक तर हे प्रकरण पूर्णपणे दाबून टाकावयास हवे किंवा कोणाच्या तरी ह्यात अडकवायला हवे. ह्या दोन्ही शक्यता जर जमल्या नाहीत आणि हे प्रकरण जर बाहेर पडले तर भाऊराव त्यात पूर्ण अडकणार होते. राजकारणाची ही रीत भाऊरावांना नवी नव्हती. मोठा मासा केव्हाच गळाला लागत नाही, नेहमी छोटा मासाच अडकतो आणि जमेल तसं मोठा मासा मग छोट्याला सोडवितो. परंतु छोटा मासा होण्याची भाऊरावांची अजिबात तयारी नव्हती. दोन दिवस छातीच्या दुखण्याचे नाटक करून हणम्या अगदी वैतागला होता. आणि अचानक ज्यावेळी रमाकांतच्या मृत्यूची बातमी घेवून नर्स अतिदक्षता विभागातून बाहेर पडली तसा तो अगदी भेदरून गेला. पहिली संधी मिळताच त्याने रुग्णालयातून पलायन केले. घरात कालचा दिवस त्याने एकदम लपून काढला होता. बायकोच्या चौकश्यांना तोंड देता देता त्याच्या नाकी नऊ आले होते. त्यात भर म्हणून आता भाऊराव फोनही उचलत नव्हते. बाजारात ज्यावेळी जाधव आणि महादेव ह्याचे बोलणे चालू होते त्यावेळी भाऊरावांचा कार्यकर्ता रमेश हॉटेलात बसला होता. त्याच्या नजरेस ही जोडगोळी गप्पा मारताना दिसली. त्यावेळी त्याला फारसे काही विशेष वाटले नाही. परंतु नंतर जेव्हा महादेव घाईघाईने बाईक काढून निघाला तेव्हा त्याला काहीसे खटकले होते. पण नंतर तो ही गोष्ट विसरून गेला होता. भाऊरावांचा जसा फोन आला तसा तो घाईनेच त्याच्या घरी पोहचला. भाऊराव प्रचंड बेचैन दिसत होते. 'गावात सतत फिरत राहा, कोठे काय थोडे जरी घडताना दिसले तर तत्काळ मला कळवा' भाऊरावांनी त्याला आज्ञा केली. 'आता थोडे जरी म्हणजे काय?' रमेश प्रश्न विचारता झाला. कोणी निवडणुकीच्या चर्चा करताना दिसले, माझ्याविषयी बोलताना दिसले तर कळवायचे' . 'बघा आताच इन्स्पेक्टर जाधव आणि महादेव गप्पा मारताना दिसले आणि महादेव त्यानंतर अचानक घाईने बाईकवरून निघाला' आता हे ही कळवायचे का?' रमेशच्या ह्या प्रश्नाने भाऊराव हादरून गेले. त्याची कशीबशी बोळवण काढून ते खुर्चीवर बसतात तोच हणम्याचा फोन आला. भाऊरावांनी त्याचा फोन उचलण्याचे टाळले. अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार आला. ह्या हणम्याला कसे वापरता येईल ह्याविषयी त्यांनी काही कुटील योजना आखली. हणम्याला थोड्याच वेळात एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. निवडणुकीच्या कामाची पूर्वतयारी करण्यासाठी विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात कार्यकर्त्याची सभा भरविण्यात आली आहे असे समोरची व्यक्ती बोलत होती. विश्वासरावांनी कार्यकर्त्याच्या मोठ्या उपस्थितीत वाजतगाजत निवडणुकीचा अर्ज सकाळी ११ वाजता भरला. गावातील अनेक लोकही स्वेच्छेने त्यात सहभागी झाले होते. लोकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून त्यांचा विजय एकदम नक्की आहे असेच सर्व बोलू लागले होते. अर्ज भरून घरी पोहचेपर्यंत दुपारचे २ वाजले. जेवण आटपून आणि वामकुक्षी काढून दुपारचे तीन वाजले. आणि मग ती बातमी आली. विश्वासरावांच्या उसाच्या मळ्यात जबर जखमी अवस्थेत हणम्या सापडला होता. त्याला संपविण्याचाच मारेकऱ्यांचा हेतू होता. पण ऐनवेळी ऊसकामगार आल्याने त्यांनी तिथून पळ काढला. गावात ही बातमी पसरताच हल्लकल्लोळ माजला. विश्वासराव आणि संपतराव दोघेही एकदम अस्वस्थ झाले. अशा प्रसंगी थोड्या शांत डोक्यानेच काम केले पाहिजे हे ठरवत संपतरावांनी आपल्या सासऱ्यांना फोन लावला. पाच मिनटात वसंतराव आणि जाधवांबरोबर घडलेल्या घटनांचा सारांश त्यांनी विश्वासरावांना कथन केला. विश्वासराव अवाक झाले, पण इतक्या वर्षाचा अनुभव होता त्यांच्यापाशी. 'संपत, काहीतरी मोठे कारस्थान रचते आहे इथे! ताबडतोब वसंतरावांना फोन लावा, अर्ज भरायला दीड तास बाकी आहे. ताबडतोब अर्ज भरा.' संपतराव अवाक झाले. पण वेळेची मर्यादा लक्षात घेत त्यांनी ताबडतोब वसंतरावांना फोन लावला. मुंबईत पक्षाचे प्रवक्ते चिंतामण जोशी ह्यांनी पत्रकार परिषद बोलावली. विश्वासराव ह्यांच्या शेतात सापडलेला जखमी कार्यकर्ता हे विरोधी पक्षाचे कारस्थान आहे आणि विश्वासराव हे निर्दोषी आहेत अशी ग्वाही ते देत होते. गावात मात्र घडामोडींना जोरदार वेग आला. संपतरावांनी विरोधी पक्षातर्फे आपला अर्ज दाखल केला. वसंतराव आणि नगर जिल्ह्यातील विरोधी पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांच्या अर्ज भरण्याच्या वेळी जातीने उपस्थित होते. ह्या बातमीने सत्ताधारी पक्षाला जोरदार धक्का बसला. गावातही चर्चेला उधाण आले. चिंतामण जोशी ह्याची परिषद चालू असताना तिथेही संपतरावांच्या बंडखोरीची बातमी कळली. आधी ही अफवा आहे असे सांगून त्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला परंतु जेव्हा त्यांनाही फोन आला त्यावेळी मात्र मी अधिक माहिती मिळवून मगच बोलीन असे ते म्हणाले. पक्षातील बंडखोरांची गय केली जाणार नाही असा इशाराही जाता जाता देण्यास ते विसरले नाहीत. इन्स्पेक्टर जाधवांना परत ह्या केसवर बोलविण्यात आले. हणम्याला अत्यंत कडक बंदोबस्तात ठेवण्यात आले. सुजितकुमारांच्या डोक्यात मात्र वेगळेच चक्र फिरत होते. भाऊरावांना अडकवायचे हे तर नक्की ठरविले होते, पण त्यासाठी योग्य मुहूर्त कोणता हे त्यांना कळत नव्हते. विरोधी पक्षनेते जितेंद्रराव मांडलेली युतीची गणिते तपासून पाहत होते. नगर जिल्ह्यातील दिवेपुरची जागा मिळण्याची शक्यता आता अधिक दाट झाली होती. ह्या निमित्ताने संपत रावासारखा होतकरू युवा नेता पक्षाला मिळाला आणि आता त्यांना मोठ्या समीकरणात कसे गुंतवता येईल ह्याची जितेंद्रराव स्वप्ने पाहत होते. ह्या निमित्ताने दिवेपूर गाव खाजगी प्रादेशिक वाहिनींच्या बातमीपत्रातही झळकले. 'सासऱ्या - जावयाचा जंगी मुकाबला' ह्या ठळक मथळ्यावर ह्या वाहिन्यांच्या निवेदिका गळ्याच्या शिरा ताणून आपल्या परीने बातमी रंगवून सांगण्याचा प्रयत्न करीत होत्या. परंतु मुंबईत बसून अशी सनसनाटी लढत कव्हर करायची हे मायदेश वाहिनीच्या प्रमुखाला पटत नव्हते. त्याने आपली खास वार्ताहर आश्लेषा हिला थेट दिवेपूरला पाठविण्याचा निर्णय घेतला. अजून एक वाहिनीचा प्रमुख ह्या घटनेवर मराठी मालिका बनविता येईल का ह्याची चाचपणी करीत होता. भाऊराव आता विश्वासरावांच्या प्रचारात पूर्ण गुंग झाले होते. मतदारसंघात त्यांनी विश्वासरावांना घेवून प्रचारसभांचा जोरदार बार उडवून दिला होता. पक्षाने (आणि संपतरावांनी केलेल्या) कार्याची त्यांनी विस्तृत पत्रके बनविले होती आणि ती सर्वत्र वाटली होती. अण्णासाहेब ह्यांची प्रचारसभा तर त्यांनी नक्की ठरविली होती त्यावर मुकुल ह्यांचे जर राज्यात प्रचारासाठी येणे झाले तर त्यांनाही मतदारसंघात बोलाविण्याचा त्यांचा मनसुबा होता. प्रचाराच्या दोन दिवसानंतर मात्र चहा पिता पिता भाऊरावांना जाणविले की आपणच इथे जास्त मेहनत करतोय. जे उमेदवार आहेत ते विश्वासराव मात्र अलिप्तपणे ह्या सर्व कार्यक्रमांत केवळ एक कर्तव्य म्हणून भाग घेत आहेत. भाऊरावांच्या मते रमेश तसा कमी अकलेचा पण तोही चहाचे घोट घेत घेत म्हणाला 'पट मांडला खरा, पण पांढरी सोंगटी कोणती आणि काळी कोणती हे ही कळेनासे झालया!' त्याच्या तोंडून हे वाक्य ऐकून भाऊराव चमकलेच. पण नंतर ते ही म्हणाले 'सोंगट्याचे जाऊद्यात, पांढरा वजिराचाच इरादा काय आहे हेच कळेनासे झाले आहे!' दिवेपुरच्या मतदारसंघाचे विस्तृत विश्लेषण देण्याची बातमी आश्लेषासाठी तशी अनपेक्षितच होती. मग तिला आठवला तो तिचा महाविद्यालयीन कालावधी. नगर जिल्ह्याच्याच दुसऱ्या टोकाला असणाऱ्या गावात वाढलेली आश्लेषा गावात चांगले महाविद्यालय नाही म्हणून दिवेपुरला शिकण्यासाठी आली. कला शाखेत शिकणाऱ्या आश्लेषाला मराठीत फार रस होता, मराठीतील लिखाण, वक्तृत्व अशा दोन्ही पातळीत तिने लगेचच प्रसिद्धी मिळविली. कॉलेजातील स्पर्धांमध्ये तिने चांगलेच नाव कमावले होते. अशाच एका स्पर्धेत तिची ओळख बुजऱ्या संपतशी झाली होती. वाणिज्य शाखेतील संपत त्या स्पर्धेत स्वयंसेवकाचे काम करीत होता. ही ओळख हळूहळू मैत्रीत रुपांतरीत झाली. परंतु त्या पुढच्या पातळीवर हे नाते नेण्यासाठी ना बुजऱ्या संपतने पुढाकार घेतला ना आश्लेषाने धीटपणा दाखविला. आणि मग बघता बघता कॉलेजचे दिवस संपले आणि आश्लेषा लग्न करून मुंबईला निघून गेली. आणि आता दहा वर्षानंतर एका वळणावर आता हे दोघे परत भेटणार होते. हा बुजरा संपत अचानक इतका बंडखोर बनण्याइतपत धीट कसा झाला ह्याचेच आश्लेषाला राहून राहून आश्चर्य वाटत होते. जाधवांचा तपास जोरात चालू होता. रमाकांतनेच विजयरावांच्या जीपचे काम केले होते. त्या आधीच दोन दिवस विजयरावांनी जीपचे सर्विसिंग केले होते, आणि त्यात सर्व काही ठीकठाक असल्याचे कागदही जाधवांनी तपासून पाहिले. जीपच्या विश्लेषणानुसार तिचे ब्रेक फेल झाले होते. रमाकांतने हे कोणाच्या सांगण्यावरून केले आणि रमाकांतला अन्नातून विषबाधा कोणी केली ह्याकडे आता जाधवांनी लक्ष केंद्रित केले. जाधवांची बाईक गराजमध्ये पोहचली. त्या दिवशी रमाकांत जीपवर काम करीत असताना त्याने जेवण कोठून घेतले ह्याचा त्यांनी तपास सुरु केला. रमाकांत घरूनच डबा आणायचा अशी माहिती त्यांना देण्यात आली. रमाकांतच्या घरी अजून शोकाकुल वातावरणच होते. परंतु जाधवांना आपले कर्तव्य बजावायचे होते, त्यांनी हळू हळू रमाकांतच्या बायकोकडे त्यादिवशीच्या घटनांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्या दिवशी रमाकांतच्या मुलानेच डबा नेवून दिला होता. मुलगा कोपऱ्यात पुस्तक घेवून बसला होता. जाधवांनी आपला मोर्चा त्याच्याकडे वळविला. 'डबा नेवून देताना वाटेत कोठे थांबला होतास का?' जाधवांनी त्याला विचारले. मुलाने आठविण्याचा प्रयत्न केला. 'हो हो, मध्येच एक काका भेटले होते आणि त्यांनी मला बोलावून चॉकलेट दिले आणि एक लिफाफा समोरच्या दुकानदाराला द्यायला सांगितला'. तो म्हणाला. तू काय कोणीही सांगितले की ऐकतोयस का? जाधवांनी थोड्या रागाने विचारले. ' असं कसं, मी त्यांना नेहमी सभेला वगैरे बघतो आणि पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते', मुलगा म्हणाला. 'लिफाफा दुकानदाराला देईपर्यंत तू डबा त्यांच्या हाती दिला असशील ना?' जाधवांच्या ह्या प्रश्नाला मुलाने होकारार्थी उत्तर दिले. जाधवांच्या ह्या भेटीची बातमी योग्य (अयोग्य) ठिकाणी पोहचली होती. राज्यातील स्थिती एकदम दोलायमान होती. सत्ताधारी पक्षाला बहुमताची खात्री वाटत नव्हती आणि विरोधी पक्षांच्या युतीचे कडबोळे काही चांगल्या स्थितीत नव्हते. जितेंद्ररावांचा पक्ष युतीतील मुख्य घटक असला तरी जागावाटपात त्यांच्या पक्षाला मनासारख्या जागा मिळाल्या नव्हत्या. निवडणुकीनंतर समीकरण कसे असणार ह्याचेच आडाखे बांधण्याचा जितेंद्रराव विचार करीत होते. इथे अण्णासाहेब आणि सुजितकुमारांची स्थिती काही वेगळी नव्हती. आपआपल्या गटाला कमीच जागा मिळाल्या असे दोघांनाही वाटत होते. युवाशक्तीला पुढे आणण्याचे प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाले नव्हते आणि युवाशक्ती कितपत यशस्वी होणार ह्या बाबतीत शंका व्यक्त करणाऱ्या बुजुर्ग नेत्यांना संपतरावांच्या निमित्ताने आयतेच कोलीत मिळाले होते. संपतरावांच्या प्रचाराने हळूहळू वेग घेतला होता. विरोधी पक्षाची यंत्रणा तर त्यांच्या साथीला होतीच वर त्यांनी ज्यांच्याबरोबर इतकी वर्षे काम केले त्या कार्यकर्त्यांनीही पक्षांची बंधने झुगारून त्यांच्या प्रचारात भाग घेतला होता. राहता राहिला प्रश्न तो निधीचा. थोड्या तंगीत सापडलेल्या संपतरावांना एके रात्री माहेरी जावून आलेल्या सगुणाबाईंनी एक सूटकेस दिली. ती उघडल्यावर त्यातील नोटांची पुडक्यांकडे संपतराव आ वासून बघतच राहिले! ही कथा अचानक आटोपती घेतोय. मागचे काही भाग मनासारखे झाले नाहीत. कथानकातील रंगत काही वाढली नाही. वाचकसंख्या कमी होऊ लागली. एकंदरीत संदेश लक्षात घेऊन ही कथा / किंवा हे पर्व आज संपवतोय. पूर्ण कथा काही लिहित नाहीये. पण पुढील प्रमुख घटना अशा! आश्लेषा आणि संपत ह्यांची जुनी मैत्री भाऊरावांना समजते. तिला विपर्यस्त रूप देण्याचा ते आणि त्यांचे हस्तक प्रयत्न करतात. त्यामुळे संपतरावांच्या संसारात थोडे वादळ निर्माण होते. आपल्या मुलीच्या संसाराला वाचवायला विश्वासराव पुढे सरसावतात. भाऊरावांना ते वेळीच आवरतात. जाधवांचे फासे हळू हळू भाऊरावाभोवती पडतात. शेवटचा प्रयत्न म्हणून भाऊराव विश्वासरावांना त्यात अडकवायचा निष्फळ प्रयत्न करतो. त्यात यश न आल्याने भाऊरावास तुरुंगात जावे लागते. संपतराव अपेक्षेनुसार निवडणूक जिंकतो. निवडणुकीत कोणत्याही पक्षास निर्णायक बहुमत मिळत नाही. तरुण संपतरावांना आणि १० आमदारांच्या एका गटास फोडण्यास अण्णासाहेबास यश येते. ह्याचे पारितोषिक म्हणून संपतरावाचा मंत्रिमंडळात आश्चर्यकारकरित्या समावेश होतो. आणि अशा प्रकारे ह्या पर्वाचा गोड शेवट होतो.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
कोलाहलाच्या पलीकडं !
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...
-
गतकाळातील वैभवशाली साहित्यिक इतिहासाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची संधी आपण जरी गमावली असली तरी सुदैवानं ह्या कालखंडातील उत्कृष्ट का...
-
गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणत...
-
दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता दिवस, आठवडे, महिने, वर्षं आणि किंबहुना आयुष्य सरत जातं. भुतकाळाच्या रम्य आठवणींना उजाळा देत बसायचं की व...
