मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २९ मार्च, २०२६

मनाला काबुत ठेवताना !


खंबीर मनाची माणसं हल्ली पुर्वीइतक्या वारंवारतेने दिसत नाहीत किंवा माणसांची खंबीरता वारंवार आपल्यासमोर येत नाही. ह्या दोन्ही गोष्टींच्या अनुभवानं मन पुर्वी आपसुक शांत होत असे. हल्ली भोवतालच्या माणसांशी सखोल संवाद क्वचितच होतो. सखोल संवाद अपघातानं होत नाही. सखोल संवाद घडवून आणण्यासाठी जाणकार, जगाचा अनुभव घेतलेली माणसं बैठकीत असावी लागतात, त्यांना बोलतं करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी लागते. अशा माणसांची कदर करणारा समुह भोवताली असावा लागतो. हल्ली अशा माणसांची कदर करण्याची वृत्ती आपण एक समाज म्हणुन झपाट्यानं गमावत चाललो आहोत. 

वर्तमानपत्रांचं समाजजीवनातील स्थान मला अजुनही खूप महत्वाचं वाटतं. ती समाजातील अगदी साध्या बातम्या देखील आपणापर्यंत पोहोचवत असतात. त्यात भोवतालच्या जीवनातील विज्ञान समजावुन सांगणारं सदर असतं, तिथं जुनी माणसं आपलं मनोगत अजुनही मांडत असतात. मोबाईल, संगणकाद्वारे आपल्यापर्यंत पोहचणाऱ्या बातम्यांमध्ये, सदरांमध्ये जुन्या लोकांची मतं क्वचितच आपल्यापर्यंत पोहोचत असतात. केवळ ह्या माध्यमांवर अवलंबुन राहिल्यास एका महत्वाच्या दृष्टिकोनाला आपण मुकत राहतो. 

हल्ली सामाजिक क्षेत्रातील वावर असणाऱ्या व्यक्तींच्या अधःपतनाच्या बातम्या आपणासमोर येत राहतात. सामाजिक माध्यमांची गरज म्हणुन अशा प्रकारच्या बातम्यांचा भडीमार आपल्यावर होत राहतो. मी ह्या बातम्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतो. ह्या घटना समाजजीवनात प्रथमच घडत नाहीयेत फक्त समाजमाध्यमं त्यांना आपल्यासमोर अतिउग्र रूपात सातत्यानं आणत आहेत. मला कोणाचं समर्थन करायचं नाहीये. पण जीवनात अजुन खूप तीव्र अशी दुःख आहेत, तिच्याकडं एकतर आपलं लक्ष नाही किंवा आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही. 

जीवनाच्या संघर्षाला दररोज अजिबात कुरकूर न करताना सामोरी जाणारी माणसं आपल्याला दिसत राहतात. सफाळे - केळवा इथून दररोज सकाळी चार वाजताची ट्रेन पकडून सात वाजता बोरिवलीला ताज्या भाज्या घेऊन येणाऱ्या भाजीवाल्या असतात, त्यात सत्तरीला पोहोचलेली एक वृद्ध महिला देखील आहे. थंडी, पाऊस, दुपारचं ऊन ह्याविषयी कधीही तक्रार करताना मी तिला पाहिलं नाही. 

आपल्या नियंत्रणातील गोष्टींविषयीच फक्त वाईट वाटून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याविषयी नाही! ज्या व्यक्तींशी बोलुन चांगलं वाटतं, ज्या गोष्टी (अर्थात समाजातील चालीरीतीला अनुसरून) केल्यानं बरं वाटतं, ज्या ठिकाणांना भेट दिल्यानं बरं वाटतं, जे पदार्थ (योग्य) ग्रहण केल्यानं मन प्रसन्न होतं असं सर्व काही करावं. जी माणसं आपल्या आयुष्यात आनंद आणतात ते त्यांना योग्य प्रकारे सांगावं. 

एका विशिष्ट मर्यादेपलीकडे स्वप्रतिमेची फिकीर बाळगू नये. स्वानंद आणि स्वप्रतिमेची फिकीर ह्यात निर्णय घ्यायचा झाल्यास स्वानंदाला झुकतं माप द्यावं. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवावी की आपला स्वानंद दुसऱ्या कोणाच्या पीडेला कारणीभुत न व्हावा. आपल्यापायी कोणाला पीडा होऊ शकतेय ह्याची जाणीव, हे समाजभान आपण दर्शवावं. 

साध्या साध्या गोष्टी नकारात्मकतेकडे झुकू पाहणाऱ्या मनाला थोपवू शकतात. सकाळी लवकर उठुन स्नान करून देवपूजा / भगवंताचं स्मरण करणं हे देखील मनाला बरं वाटुन देऊ शकतं. निसर्गाच्या सानिध्यात जे राहतात त्यांना निसर्ग भरभरून देत राहतो, त्यांच्या मनाची काळजी तो वाहत राहतो. निसर्गाअभावी आपल्या महानगरांचं, त्यातील माणसांचं काय होणार ह्याची चिंता मात्र मला सतावत राहते. वरणभात, भाजी, चपाती, (मांसाहारी असल्यास मोजकाच सामिष आहार), सायंकाळी लवकर आणि मोजकं जेवणं ह्या साऱ्या गोष्टी मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. 

सतत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, भ्रमणध्वनीला खिळून राहणाऱ्या माणसांचं मन त्याच्या शांत स्थितीपासून दीर्घकाळ दूर राहतं . त्याला पूर्ण शांतीची आवश्यक वेळ न मिळाल्यास  ते बेभान होण्याची शक्यता वाढीस लागते. 

ही पोस्ट लिहूनही उद्या मी माझ्या मनाला शांत ठेवू शकेन असे अजिबात नाही. फक्त मनाची सैरभैर परिस्थिती ही कायम राहणारी नाही, परिस्थिती बदलताच पुन्हा एकदा मनाला मी काबुत आणू शकेन इतका विश्वास पुन्हा नव्यानं देण्याचे काम मात्र ही पोस्ट जरूर करेल. 

(पोस्टमधील छायाचित्र माझ्या कार्यालयातील सहकारीच्या नालासोपारा येथील शेतात डिसेंबरात घेतलेलं ! अशा ठिकाणांना दिलेल्या भेटी मनाला दीर्घकाळ शांत ठेवतात )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मनाला काबुत ठेवताना !

खंबीर मनाची माणसं हल्ली पुर्वीइतक्या वारंवारतेने दिसत नाहीत किंवा माणसांची खंबीरता वारंवार आपल्यासमोर येत नाही. ह्या दोन्ही गोष्टींच्या अनुभ...